मराठी साहित्य – विविधा ☆  असंही एक नातं ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ असंही एक नातं ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

यमुनेचे नितळ पाणी शांत होतं. मधूनच वाऱ्याची एखादी झुळूक येऊन पाण्याची लय हलकेच बदलून जात होती. राधा आणि तिचा मोहन, दुसरं कुणीच नव्हतं यमुनेवर! आज काय झालं होतं कुणास ठाऊक, नेहमी इतका बोलणारा कान्हा आज जरा गप्पच होता. शेवटी राधाच म्हणाली, “बासरी वाजव नां!” त्याने  बासरी ओठांना लावली पण आज भैरवीचे  सूर लागले होते. राधेला विचारावं वाटलं पण ती त्या सुरात इतकी हरवून गेली होती की शब्द सपडलेच नाहीत. बासरी थांबली अन् ती भानावर आली.

लगेच उठून म्हणाली, “उशीर झाला, जायला हवं.”

आर्जवी स्वरात तो राधेला म्हणाला, “इतक्या लवकर?”

“पाहिलसनं रात्र पश्चिमेला सरायला लागली.”

“तरी अजून थोडा वेळ?”

“तो थोडा वेळ संपतो का कधी? चल, निघू या.”

ती चालायला लागली, तो तिच्या मागे.

आज तिला अर्थ कळतोय, ती भैरवी, तो आर्जवी स्वर यांचा!

जेंव्हा अक्रुराचा रथ माधवाला

नेण्यासाठी आला आणि सारं गोकुळ आक्रंदत होतं, नेऊ नको माधवा, अक्रुरा! राधाही पळत होती, पण तिला काय होतंय काही कळतच नव्हतं. ना माधवानं  रथ थांबवला ना मागे वळून पाहिलं. तिचा कृष्ण गेला होता, तिचा निरोपही न घेता! परतताना यमुनेच्या काठावरच्या वाळूतून मंद पाऊले टाकत राधा निघाली. वेड्यासारखी कालची त्याची पाऊलं शोधत होती. तिच्या लक्षात आलं, कोणतीही खूण मागे न ठेवता तो गेला. तिच्या मनात आलं, “कालच त्यानं मला का नाही सांगितलं? मी काय अडवलं असतं कां? नाही! एवढं सहज त्याच्यापासून दूर जाणं जमलं असतं मला? मी ही  कदाचित असाच आकांत केला असता, पायाला घट्ट मिठी मारून बसले असते, जाऊच दिलं नसतं त्याला! हे आयुष्य तर तुलाच समर्पित आहे. तू कुठेही असलास तरी!”

कृष्ण आणि राधा यांची गोष्ट इथेच संपली. ना तो नंद-यशोदेत गुंतला होता, ना गोप-गोपिकेत आणि ना राधेत! पुन्हा तो कधीच गोकुळात परत आला नाही. त्याची बासरी पुन्हा कधीच गोकुळात घुमली नाही.

कृष्ण वेगळाच होता, सगळ्यांच्यात असूनही, कुणाचाच नव्हता. तो देव होता, कितीही खोल बुडाला तरी निर्लेप वर येणारा! त्याने जन्म घेतला तोच मुळी काही उद्दिष्ट ठेवून. त्याचे विहित कर्म करण्यासाठी त्याला जावेच लागणार होते. अर्थात त्यालाही हे देवत्व निभावणे अवघड गेलं असेल. देवाला कुठे मन मोकळं करायचं स्वातंत्र्य आहे! त्यामुळेच त्यानं ती बासरी पुन्हा कधीही वाजवली नाही.पण त्याला काही ध्येय होतं, त्यामुळं गोकुळ विसरणं  शक्य झालं असेल. राधेला मात्र त्याला विसरून जाणं शक्यच नव्हतं. ती तिच्या कृष्णात इतकी एकरूप झाली होती की तिचा कान्हा तिच्या जवळच होता. नीळं आभाळ डोळ्यात पांघरून, बासरीचे सूर कानात साठवून, सहवासाचा क्षण अन् क्षण मनात रुजवून ठेवण्याची तिला गरजच नव्हती, तिला वेगळं अस्तित्व होतंच  कुठे? यमुनेवर पाणी भरायला गेली की बासरीचे सूर अलगद कानावर यायचे, घागर तशीच पाण्यावर तरंगत असायची. पाणी भरायला आलेल्या गोपी तिला जागं करायच्या. जाताना थोडा पाचोळा वाजला की तिला कृष्णाची चाहूल लागायची. पान हललं की तिला मोरपीस दिसायचं. पक्ष्याच्या तोंडातून बी खाली पडली की माठ फुटला असं वाटून थरथरायची. ओलेत्यानं घरी कशी जाऊ? रागानं त्याच्याकडे पाहायची. अखंड त्याचीच स्वप्नं, त्याचाच ध्यास! बाकीचं विश्व तिच्यासाठी नव्हतंच. तो आणि त्याचे विचार, त्याचं अस्तित्व नाकरण्या इतके बाजूला व्हायचेच नाहीत.ती तृप्त होती अन् ही तृप्तीच तिला अतृप्ती कडे नेत होती.

या गोष्टीला तिसराही कोन आहे हे अरुणा ढेरे यांची ‘अनय ‘ ही कविता वाचल्यावर लक्षात आलं. लक्षात आलं की अनय होऊन जगणं सर्वात अवघड आहे. अनय हा राधेवर मनापासून प्रेम करणारा, तिला समजावून सांगण्यात अपयशी ठरलेला, तिची अवस्था बघून कावरा बावरा झालेला, तिच्या सुखासाठी झटणारा, तिच्याकडून कोणत्याही सुखाची अपेक्षा न करता! अनय होऊन जगणं अवघड आहे कारण राधेच्या डोळ्यात तिची स्वप्नं पहायची, जी कधीच आपली होणार नाहीत, त्यांना आपल्या काळजात उतरवायचं, आपल्या स्वप्नांना तिच्या डोळ्यात जागा नसली तरी! राधेला कृष्णा सोबतचे कित्येक क्षण होते ज्यावर ती उर्वरित आयुष्य काढू शकत होती,  पण अनय कडे एकही असा भाबडा क्षण नव्हता, ज्यावर उरलेलं आयुष्य ओवाळून टाकावं.

अनय शेवटपर्यंत तिचा होऊन तिच्या अस्तित्वाभोवती घुटमळत, जिंकण्याची आशा मनात फुलवत राहिला.त्यानं कधी त्याबद्दल उपकाराची भाषा केली नाही की आपल्या आयुष्यातून तिला वजा केले नाही.

राधा कृष्ण एकमेकावर प्रेम करणारे पण सारं अधुरंच राहिलेले, राधा अनय लौकिकार्थानं पती पत्नी पण सारं अधुरंच राहिलेले! कृष्णाला मुक्त ठेवण्यासाठी राधेनं आपल्या प्रेमाचा त्याग केला. कृष्णानं कर्तव्य पूर्तीसाठी राधेच्या प्रेमाचा त्याग केला. अनयनं राधेच्या सुखासाठी आपल्या प्रेमाचा त्याग केला. सांगू शकता कोणाचा त्याग मोठा आहे?राधा – अनय असंही नातं असू शकतं?

हे लिहिताना ही मी डोळ्यांना आवरू शकले नाही. तर हे सारं सोसताना अनय चं काय झालं असेल?

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खरं म्हणजे संकल्प ही संकल्पना माझ्या स्वभावाशी कधीच जुळली नाही. संकल्प वगैरे करण्याच्या भानगडीत मी फारशी पडतच नाही. मूळात कुठलाही संकल्प ,योजना, काही ठरवणं हे आजपासून नसतच..ते असतं ऊद्यापासून…म्हणजे असं.”आता ऊद्यापासून मी हे नक्की करणार हं..!!”आणि तो ‘उद्या” कधीच ऊगवत नाही.Tomorrow has no end-Tomorrow never comes.

असो,तर तमाम संकल्प कर्त्यांचा आदर ठेऊन मी खात्रीपूर्वक  म्हणेन,संकल्प करुन मनाची फसवणुक करून घेण्यापेक्षा,रोज रोज हाती येण्यार्‍या पत्त्यांचाच चांगला डाव मांडावा. वर्ष संपले म्हणजे नक्की काय होते. कॅलेंडरचे शेवटचे पान उलगडते. आणि नव्या वर्षाचा नवा आकडा समोर येतो. बाकी कालचा दिवस संपला आणि आजचा दिवस सुरु झाला. नेहमीप्रमाणेच.

संकल्प ही एक सकारात्मक संज्ञा आहे खरी.पण नव्या वर्षासाठी माझा हा असा व्यापक संकल्प आहे.

एक तणावमुक्त आयुष्य जगायचं. ठरवून केलेल्या संकल्पाचंही दडपण नको. माझा हाच संकल्प असतो की संकल्पच करायचा नाही .मुक्त मनाने मस्त जगायचं. अटकलेल्या वृत्तीलाच निवृत्त करायचं.

जाग आली की सकाळ आणि झोप आली की रात्र.

इतकं साधं सुबक सुलभ !या ऊतरंडीवरच्या आयुष्याचं  हेच गणित.

कुणाचा त्रास करुन घ्यायचा नाही अन् ज्यात त्यात

लुडबुड करुन कुणाला त्रास द्यायचा नाही. *जगा आणि जगू द्या*हेच मूलतत्व.

भूतकाळात जास्त रमायचं नाही. विशेषत: मनाला टोचणार्‍या, वेदना देणार्‍या ,कष्टी करणार्‍या आठवणीत रेंगाळायचं नाही. फक्त क्षण आनंदाचे जपायचे.

शक्यतो सगळ्यांना माफच करुन टाकायचं. मनात नको राग..नको वैर नको सूडबुद्धी..एक माफीनामा आपणही सादर करायचा. त्यासाठी ऊशीर नको.

सांगायचं राहूनच गेलं ही रूखरूख नको.

नव्या पालवीला बहरु द्यायचं. जुनं थापत नाही बसायचं. जे अपुरं, तुटलेलं,ते यथाशक्ती सांधण्याचा प्रयत्न करायचा. मनापासून, अगदी झोकून.

असे दिगंताला भिडणारे पण तरीही बद्ध नसलेले

स्वैर संकल्प माझे. वर्तमानात जगायचं. आनंदाचे दवबिंदु वेचायचे.

आनंद द्यायचा. आनंद घ्यायचा.

येणारे हे नवे वर्ष तुम्हा आम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अफाट बुद्धिसंपदेचा मालक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अफाट बुद्धिसंपदेचा मालक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

अमिताभ बच्चनजी ८० वर्षाचे झाले तरी अजूनही काम करतात म्हणून बातमी होते. मोदीजी सत्तरी पार करूनही किती राबतात यावर भरपूर कौतुकास्पद चर्चा होते. देवआनंदच्या चिरतरूण देहबोली वर मासिकांची कितीतरी पाने भरलेली असतात. हेमामालिनी या वयातही किती सुंदर दिसते यावर जवळपास सगळी चॅनेल्स चर्चा करतात. रेखाच्या उतारवयात उम्फ फॅक्टर जपण्यावर सोशल मिडियावर तुफान चर्चा होते.

आपण फिल्मी सितारे व राजकारणी यांच्यात इतके गुरफटून गेलो आहोत की त्यापलिकडे बरेचदा बहुसंख्य लोकांना इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी दिसतच नाहीत. फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात.

हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे डॉ रघुनाथ माशेलकर. १ जानेवारी २०२४ रोजी ते ८२ वर्षाचे झाले.

शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महापालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून अकरावीला बोर्डात ११ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. अकरावीपर्यंत अनवाणी चालणारा हा माणूस न्यूटनने सही केलेल्या रजिस्टरवर सही करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला.

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डॉक्टरेट, २८ च्या आसपास पेटंटस्‌, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दीसंपदेचा मालक असलेला हा महामानव.

हळद आणि तांदूळ यांची पेटंट लढाई जिंकून भारताला पेटंटविषयी नवी दिशा देणारा भारताचा सुपुत्र. २८००० तज्ञांसह ४० प्रयोगशाळा संचलित करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) ही फक्त आकाराने मोठीअसलेली संस्था यश व किर्तीरुपाला आणणारा हा कर्मयोगी.

२३ व्या वर्षी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पी एच डी मिळविणारे माशेलकर जेल रसायनशास्त्र, पॉलिमर रिऍक्षन, फ्लुईड मेकॅनिक या विषयातील नावाजलेले तज्ञ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीन पुरस्कार, म्हणजे फक्त भारतरत्न बाकी!

असा क्रषितुल्य भारतीय ८३ व्या वयात पदार्पण करताना अजुनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. याची दखल म्हणावी अशी कुणी घेत नाही हे भारतीयांचे करंटेपण म्हणावे लागेल

या महान वैज्ञानिकाला शंभरी पार केल्यानंतरही कार्यमग्न राहण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!

वंदे मातरम !!

संग्राहक : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काळा दोरा ते  नथ ….  एक सुरेल प्रवास… लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 काळा दोरा ते  नथ ….  एक सुरेल प्रवास… लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

नऊ-दहा वर्षाचं वय..  शाळेतली तिसरी चौथी असेल..

दिवाळीची सुट्टी संपलेली असायची.शाळेचा पहिला दिवस. वर्गात उत्साहानं प्रवेश झालेला असायचा. गप्पा जोरदार रंगलेल्या असायच्या.दारातून सुनिता वर्गात यायची. सगळ्या पोरींचं लक्ष तिच्याकडं जायचं.

आज सुनिता काहीतरी वेगळीच दिसत असलेली. अचानक लक्षात यायचं की तिनं नाकात काळा दोरा घातलाय.सगळ्यांचा तिच्याभोवती गराडा..

मग कळायचं की तिनं दिवाळीच्या सुट्टीत नाक टोचलय.

कुठे टोचलं,कसं टोचलं, किती दुखलं  अशी इथ्थंभूत माहिती सुनिताकडून मिळायची नि तो सगळा दिवस डोक्यात फक्त ” नाक टोचणं” घर करून बसायचं..

” आई ,माझं नाक आजच्या आज टोचायचं ” आईचा पिच्छा पुरवलेला..

शेवटी हो नाही करत एकदाचं आईबरोबर सराफांचं दुकान गाठलेलं..

आतापर्यंत साठवलेलं सगळं धैर्य सोनारकाकांपुढे बसल्यावर कोसो दूर पळून गेलेलं..

सोन्याची काडी नाकाच्या पाळीत शिरताक्षणी नाकापासून पार डोक्यापर्यंत गेलेल्या कळीनं गच्च मिटलेल्या डोळ्यातूनही पाणी बाहेर काढलेलं..

त्या सोन्याच्या तारेत एक छानसा मोती घालून त्या तारेचं वेटोळं करून  नाकाच्या आत गाठ मारलेली..

याचं  नाव सुंकलं..

परवडणा-यांच्या नाकाच्या नशीबाला हे सोन्याचं सुंकलं …गरीबाच्या लेकीच्या  नाकात काळ्या दो-याचं वेटोळं…

मोठ्ठं युद्ध जिंकल्याचा आनंद चेह-यावर धारण करून दुसरे दिवशी शाळेत मिरवलेलं..

दिवसातून हजारदा आरशात त्या सुंकल्याला  न्याहाळून मिळालेला जगभराचा आनंद…

” सुंकलं हातानं सारखं फिरव बरंका..नाहीतर ते अडकून बसेल ” 

आईची सूचना..

” अरे व्वा ..नाक टोचलं वाटतं ” भेटणा-या प्रत्येकाकडून कौतुक..

आनंदाच्या डोहात तरंगत असताना दुस-या दिवशी मात्रं  नाक ठणकत असल्याची जाणीव व्हायची.नाकपुडी लालेलाल झालेली असायची. 

तिसरे चौथे दिवशी लाल फोडाने त्या सुंकल्यावर आक्रमण केलेलं असायचं..

प्रचंड दुखणं ..पण  आईला सांगायला  कमीपणा वाटायचा..

दोन दिवस सहन करायची ती वेदना..

कदाचित स्त्री म्हणून वाट्याला येणा-या वेदनेची नि सहनशक्तीची इथूनच सुरूवात होत असावी!

आता त्या फोडात पू भरलेला असायचा..सुंकल्यातल्या मोत्याशी साधर्म्य जोडू पहाणारा तो फोड आता मात्रं आईच्या नजरेतून सुटायचा नाही..

रात्री गरम फुलवातीनं त्याला शेकण्याच्या नावानं नाकाला दिलेले चटके पार काळजापर्यंत पोहोचायचे..

सुंकल्याच्या तारेच्या गाठीचं नाकाच्या आतल्या बाजुला सतत टोचणं , ते सुंकलं पांघरुणात अडकून नाक दुखणं, कपडा काढताना सुंकल्यात अडकणं, खेळताना मैत्रीणीकडून सुंकलं ओढलं जाणं नि नाकातून जीवघेणी कळ उमटणं , चेहरा धुताना त्या सुंकल्यात हमाम साबणं अडकून  मैत्रिणींचा शेंबूड अडकल्याचा गैरसमज होऊन चेष्टा होणं…

यांमुळे ” घी देखा लेकीन बडगा नही देखा ”  …अशी त्या सुंकल्याची अवस्था व्हायची  नि चार -सहा  महिन्यांत त्या सुंकल्याशी  काडीमोड  व्हायचा!!

” नाक बुजू देऊ  नको गं..नाहीतर लग्नात नथ घालायला अडचण यायची ” ..असे सल्ले मिळायचे नि अधूनमधून खराट्याच्या छोट्याश्या काडीनं  नाकाच्या छिद्राचं अस्तित्त्व टिकवलं जायचं!

शाळेच्या स्नेहसंमेलनात   छोट्याशा खोट्या कोळीछाप  नथणींनं नाक सजायचं

नि ” टिमक्याची चोली बाई  ” गाण्यावर  मनमुराद नाचायचं..

” सागरपानी ढानी जाय सानी नजर लग जाय ”  अशा गुजराती मारवाडी  नाचाला मात्रं बांगडी एवढी मोठी नथणी नाकात विराजमाव व्हायची  नि  सुरेखशा साखळीनं  ही  नथनी  केसाशी नाहीतर कानातल्याशी  संग करायची..तिच्या सोबतीला कपाळाला महिरप करणारी मोठी बिंदीही असायची!

या नथन्या  त्या बालपणात मोठा आनंद देऊन जायच्या नि हृदयातील स्मरणपेटीत  निपचित पडून रहायच्या!

आयुष्याच्या प्रवासात शाळेचं गाव मागे पडलं  नि  महाविद्यालयाचं शहर लागलं..

या फुलपाखरी दिवसांत चित्रपटांच्या मोहमयी दुनियेनं भुरळ घातली नाही तरच नवल…

कधी  रेखाची  नाहीतर राखीची नाकातली रिंग  तर कधी श्रीदेवीची नाकातली चमचमणारी चमकी किंवा मोरणी   मनातल्या मोरपिसाला साद घालायची..

अशी  चमकी घातली तर एखाद्या अमिताभ किंवा जिंतेंद्रला आपली भुरळ पडेल,अशा आशेनं मनाचं पाखरू फडफडायचं..

भाऊबिजेचे किंवा कुणीतरी खाऊला दिलेले पैसे साठवून एखादी खड्याची चमकी घेतली नि नाकात घातली की  जीव शांत शांत व्हायचा..

त्या चमकीचा  प्रभाव प्रत्यक्ष आयुष्यात मात्रं निष्प्रभ ठरतो; हे चार दिवसातच कळायचं नि  अंतराळात भरारी मारणारं मनाचं पाखरू जमिनीवर आपटायचं..

एकदा अस्मादिकांनी मैत्रिणीबरोबर जाऊन सोन्याची चमकी घेतली नि नाकात घातली. दोन-चार दिवसांनी नाक दुखायला लागलं. अजून दोन -चार दिवसांनी चमकी दिसेनाशी होऊन त्याजागी मोठा फोड आला. फणफणून ताप आला.डॉक्टरांकडे गेल्यावर तापाचं मूळ नाकावरील फोडात असल्याचं कळलं. छोटसं ऑपरेशन करून फोड आणि त्याखालील चमकी काढावी लागली..

चमकी काढल्यावर चमकीची तार जी सोन्याची म्हणून विकत घेतलेली होती ती प्रत्यक्षात गंजलेल्या लोखंडाची निघाली..

नंतरचे अनेक दिवस औषधाचे  नि आईवडिलांच्या कठोर शब्दांचे कडू  डोस गपगुमान गिळावे लागले..

चमकीचं गारूड नाकाबरोबरच मनातूनही उतरलं…

आईची नथ मात्रं मनात घर करून बसली होती. मखमलीच्या छोट्याशा पेटीतली नथ प्रत्येक वेळी पाहिली की अजूनच आवडायची.सोन्याच्या तारेत  गुंफलेले तजेलदार टपोरे मोती ,एखाद-दुसरा वेगळ्याच आकाराचा हिरवा नि लाल रंगाचा खडा , एखादा हिरा,एखादा पाचू नि एखादं माणिक …

कुयरीच्या लयबद्ध आकारात जमलेली  ही रत्नांची मैफल मनात ठाण मांडून बसायची..

त्या पेटीतून दरवळणारा मंदसा अत्तराचा सुगंध त्या मैफिलीला साथ करायचा..

घरच्या एखाद्या लग्नात भरजरी शालू  नेसून अंगभर दागिने घातलेल्या आईने नाकात नथ घातली की  तिचं  अगोदरचं सोज्ज्वळ सौंदर्य  स्वर्गीय भासायचं…!!

आमच्या मिरजेत त्याकाळी अगदी घरच्या हळदीकुंकवालाही बायका नथ घालत. अगदी ओठापर्यंत ओघळणारी ती नथ पाहिली की या बायका कशा जेवत असतील ? त्यांना नथीमुळे शिंका येत नसतील का? नाक दुखत नसेल का? असले अचरट प्रश्न पडत …

नि  आपण कधीही  नथ घालायची नाही,असा नकळत निश्चय मन करून टाकी..

लग्न लागलं..सुन्मुख पाहण्याचा दागिना म्हणून सासुबाईंनी  एक सुरेखशी ,छोटीशी चांदीची पेटी हातात दिली..

उघडून पाहिली.आत सुरेखशी नथ होती. आईकडे होती तशीच ..मोती,हिरे,माणिक नि पाचुची..

” ही माझ्या सासुबाईंनी मला दिली होती..ती मी तुला देतेय ..मोठ्या सुनेचा  मान  आहे हा ..तुझ्या सरळ नाकावर ही छान दिसेल “

आता ही नथ दागिना राहिली नव्हती..

ती जबाबदारी होती ..घरातल्या थोरल्या सुनेची …

आधीच्या किती पिढ्यांची कितीतरी  गुपितं,आनंद , दु:खं, जबाबदा-या ती बरोबर घेऊन आली असेल…!!

मी  अचानक मोठी झाले..

लेकीच्या बारशाला या नथीनं अजून मोठं केलं..!!

आता यापुढे त्या नथीचा प्रवास कसा असेल माहीत नाही..!!

सुंदर दिसावं ही  प्रत्येक स्त्रीची इच्छा..नि त्यासाठीच्या प्रयत्नातलाच नथ हा एक अविष्कार…

फक्त महाराष्ट्रातच  नाहीतर भारतात नि परदेशातही आढळणारा…

केवळ हिंदूच नव्हे तर इतर सगळ्याच धर्मात असणारा..

मंगळसुत्राखालोखाल  सौभाग्याचं प्रतीक म्हणून हिचा  मोठा मान…

तिची रूपं अनेक ..अगदी छोट्याशा चमकीपासून ते मोठ्या पेशवाई नथीपर्यंत..कुणी एका नाकपुडीत तर कुणी दोन्हीतही घालतं..

या अलंकाराचं एक वैशिष्ट्य असं की या अलंकारावर फक्त स्त्रियांचाच अधिकार..

नाकात नथणी घालणारे पुरुष मी तरी अजून पाहिले नाहीत..

महिलांच्या शरीराची डावी बाजू ही  प्रजननाचं प्रतिनिधित्त्व करते..

म्हणून डाव्या नाकपुडीत नथ घालायची पद्धत..

यामुळे स्त्रीची प्रजननक्षमता वाढते, बाळंतपणाच्या वेदना सोसण्याची शक्ती येते..गर्भाशयाचे आजार होत नाहीत, असं म्हटलं जातं..

खरंखोटं त्या परमेश्वरालाच ठाऊक…

मधल्या काळात नथीचं महत्त्व थोडं कमी झालेलं…

पण आता मात्रं नथीचा सुवर्णकाळच सुरू झालाय..

इतरवेळी  जीन्समधे वावरणारी महिला समारंभातमात्रं पैठणी नेसते नि आवर्जून नथ घालते.

नथ आता नाकापुरती मर्यादित न राहता अगदी मंगळसूत्रं,कानातलं,अंगठी 

अगदी  उंची साडीवरही  दिसू  लागलीय…!!

असतो  एकेकाचा  काळ …

कालाय  तस्मै  नम: !!

लेखिका : सुश्री नीला  महाबळ गोडबोले

सोलापूर

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निरोप तुजला देता… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

?  विविधा ?

निरोप तुजला देता… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

निरोप…  हा शब्द  उच्चारताच मन हेलावते. भावनांचा गहिवर आठवणींचा बांध फोडतो. सुखदुःखाचे सडा शिंपण सृजनाच्या पायघड्या घालते.  वाईटातून चांगले घडते. मन मनाला समजावते.  माणूस महत्वाचा. हे सूत्र लक्षात घेऊन काही  आठवणी विसरायचा प्रयत्न करतो आणि निरोपाची घटिका समिप येते.

आयुष्यात वेळ प्रसंगी, कलाटणी देणाऱ्या प्रत्येक वळणावरती आपण सुख दुःखाची, अनेक शतके लिलया पार करतो.यावेळी अनेक‌ व्यक्ती ,भावना, प्रसंग आपला निरोप घेतात आणि आपल्याच अंतरी आठवणी बनून विराजमान होतात.

निरोपाचे क्षण हा देखील आयुष्याच्या अविभाज्य भाग आहे त्यांचा उपभोग घेताना आपल्या इतर नात्यांवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आपले आणि पारीवारीक व्यक्तीशी जडलेले नाते हे.. भावनिक आणि शारीरिक असल्याने आपल्या कौटुंबिक जीवनाशी..स्वभावाशी अत्यंत निगडित असते.

आप्तेष्ट जिवलग व्यक्तीची साथ तुटावी,‌आणि पोरकेपणाची जाणिव ,दुर्देवी घेतलेला निरोप मन विषण्ण करते. मन विचलीत होते. निर्णय घेण्याची‌ क्षमता क्षीण होते..अशा वेळी‌ समाज मदतीला धावून येत़ो.

जाणारा केव्हाच दूरच्या प्रवासाला निघून गेलेला असतो.‌ त्याने कधीच परलोकी चे हटके स्टेशन गाठलेले असते. कमावलेलं‌ सारं काही इथंच असतं..जे आहे त्यात‌ समाधान मानायचे ही शिकवण अशा‌ वेळी कामी‌ येते.

स्नैहमैत्रीचे, अनुभूतीचे नाते निरोप घेताना‌ माणसाची सर्वंकष परीक्षा घेतात. त्याचं दुःखात वहावत जाणं,शोक करणं, इतकंच काय‌ ,त्याचं‌ सावरणं देखील त्याला निरोपाची भिती घालत रहातं.

इह‌लोकीचे ,अतूट बंधन, हळव्या ओल्या, विरह‌ वेदना, समाचारात दिलेला दिलासा, जग रहाटीला सामोरं जाण्यासाठी रिती,रिवाज परंपरांचे बंधन घालतो. माणुस माणसाला निरोप‌ देताना आठवणींच्या निजरूपानं त्यांनी त्या‌ माणसाला काळजात बंदिस्त केलेलं असतं..त्याला मोकळं करणं अशावेळी अत्यंत गरजेचं असतं.‌त्या‌साठी उत्तर कार्य विधी माणसाला माणसात रहाण्यासाठी मार्ग दाखवतात.

येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सामोरे जाताना थोडे द्यायचे,  थोडे घ्यायचे.  देणा-याचे हात घ्यायचे  हा निश्चय केला की जगणे सोपे होते.  अनुभूती वेचताना प्रतिभा शक्ती जागृत होते. चारोळी,  कथा, कविता, लेख  कोणत्याही स्वरुपात ही अभिव्यक्ती व्यक्त होते.  कौतुक आणि प्रोत्साहन ही गरज माणसाला माणूस करते. छोट्या छोट्या गोष्टीत  आनंद, समाधान मानायला शिकलं की मोठ मोठी संकटं, आपली गती धीमी करतात. “जोरका झटका धीरेसे लगे”.. याप्रमाणे काही  आघात  आपण सहन करतो ते या मुळेच. भाव फुलांचे,मोहरते क्षण दिठी मिठीचे, हळवे स्पंदन  निरोपाचा क्षण संकलीत, संग्रहित करतात.

गतवर्षी  अनेक संकल्प, योजना,  उपक्रम यातून प्रेरणा मिळाली.   अनेक‌ साहित्यिक, सामाजिक,सांस्कृतिट संस्थांनी मला, माझ्यातल्या कवीला,  माणसाला घडवले.  अनेक नाती लाभली.  एकमेकांवर जीवापाड प्रेम करताना रूसवा,राग, लोभ ,  आणि निर्व्याज प्रेम  करीत गेलो.नव्याचा स्विकार करताना कोणाला कधी..? कसा निरोप‌ द्यायचा ‌हे वेळ, काळ, प्रसंगांनी शिकवलं..

या प्रवासात काही‌ व्यक्तींच्या अतिशय जवळ गेलो. यश मिळवताना अनेकअपेक्षा ठेवल्या.  अपेक्षा भंगाचे दुःख पचवले. पण कर्म फलाची अपेक्षा न ठेवल्याने जबाबदारी वाढत गेली. नवीन जबाबदारी स्वीकारताना काही चुका झाल्या.  चुका निस्तरायला  आपल्या माणसांनी दिलेला वेळ , निभावून नेलेले नाते ,दिलेली‌ साथ.. यातून माझ्या सहित प्रत्येकाचे मुखवटे गळून पडले. माणूस माणसाच्या सोबत राहिला.  आणि हीच सोबत कार्य प्रवणता ,  कार्य‌क्षमता, कलाकौशल्य वृद्धीगंत करते.

अशा‌ वेळी कौतुकाची  अपेक्षा  आणि राग  आपल्या जवळच्या माणसावर व्यक्त होते. चुकातून माणूस शिकतो. ही शिकवण सृजनाच्या पायवाटा सुजलाम सुफलाम करते.  शब्द, स्वभाव  आणि विश्वास  आपल्यातला माणूस जिवंत ठेवतात. माणूस जपायला शिकलो तरच  आपण  आपली कला त्यातील बारकावे  अधिक सखोलपणे शिकू शकतो.  चारदोन कौतुकाच्या शब्दांनी किंवा  ऑनलाईन स्पर्धात्मक प्रमाणपत्रांनी साहित्यिक घडत नाही.  साहित्यिक तेव्हाच घडतो,  जेव्हा  “काय लिहायचं नाही ..?” हे त्याला  उमगलेले असते.  आणि काय लिहायचे नाही यासाठी स्पर्धा,  उपक्रम यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे.  स्पर्धेत सहभागी होताना, यश मिळाले नाही तर परीक्षकांना दोष देण्यापेक्षा आपली चूक  आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर  आपण  आपला कला व्यासंग  अधिक  उत्तम प्रकारे जोपासू शकतो.

जोपर्यंत आपण आपल्या चुका मान्य करीत नाही तोपर्यंत  आपली आकलन शक्ती प्रतिभा शक्तीला थोपवून धरते. हे थोपवून धरणे घातक ठरू शकते.  प्रसिद्धी हव्यास  आणि सदोष लेखन कमी करायचे असेल तर दैनंदिन लेखन व्यासंग  अत्यंत गरजेचा आहे.  माफ करा या शब्दांनी  इतरांना दिलेले मोठेपण  आपल्यातला कलाकार घडवीत जातो.

अनुभव‌ हा  एकमेव असा गुरू आहे कि जो आधी परिक्षा घेतो..आणि‌ नंतर धडा शिकवतो. आपल्या अहंकाराला निरोप द्यायला शिकलो कि जिवनाच्या‌परीक्षेत आपण उत्तम गुणांनी पास‌ होतो.

 दुसर्‍याला दिलेला आनंद,  समाधान  आपल्याला मोठे करतो हे मोठेपण माणसातला विवेक जागृत ठेवतं..  अशा विवेकी माणसांच्या ह्रदय कोंदणात निर्माण झालेले साहित्य… ही त्याची  ओळख बनते. ही ओळख  मी सातत्याने जपतो आहे.  माणसांचे स्वभाव दोष समजून घेताना कदाचित मी देखिल चुकलो असेल पण ती चूक माफ करताच मी मला सावरू शकलो.  मोठेपणा मिळवणे खूप सोपे आहे पण हा मोठेपणा टिकवून ठेवणे फार  अवघड आहे.  सतत नवनवीन साहित्य निर्मिती करायची  असेल तर चुकांना निरोप  आणि नव्या  आव्हानांचा स्वीकार यशोमंदिराची वाट दाखवीत रहातो.

सरत्या वर्षाला निरोप देताना इतकच म्हणावसं वाटत – 

☆ निरोप तुजला देता ☆

कुणीतरी येत, कुणीतरी जातं

स्वभाव तोच आठवण बदलते

आकडे तेच तिथी वार बदलेला

आठवणींचा ओला श्वास

पानापानावर थांबलेला.. !

 

शब्दाचं कुटुंब कागदावर सजलेलं

आठवणींच गोकुळ मनामध्ये नटलेलं

भूत, भविष्य, वर्तमान, पानामध्ये सामावलेलं

नवीन वर्ष,  नवीन कॅलेंडर,  प्रतिक्षेत थांबलेलं

निरोप आणि स्वागताला सदानकदा  आसुसलेलं.. !

 

निरोप घेतोय..तो नववर्षाच्या भरभरून शुभेच्छा देऊन..चला‌ तर मग तयार होऊ यात..नववर्षाच्या स्वागतासाठी..!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जनाबाई… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ जनाबाई… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सकाळी साडेसहाची वेळ .

शांत वातावरणात गाण्याचे सूर कानावर पडले.

 

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा……….

कुणीतरी रेडिओ लावलेला असावा. इतक्या सकाळी कधी आवाज ऐकू आला नसल्याने तिकडे लक्ष गेले.

हळूहळू आवाज बंद झाला.

 

दुसरी दिवशी पण

 सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले… ऐकू आले

तिसऱ्या दिवशी फिरायला निघाले तेव्हा आवाज कुठून येतो ते समजले.

 

 एक पंचावन्न.. साठ वर्षाच्या बाई रस्ता झाडत होत्या.

 त्यांनी मोबाईलवर गाणी लावली होती. 

आपल्याच तंद्रीत त्या गाणी ऐकत काम करत होत्या.

 

“ ताई तुम्ही नवीन आलात का? “

“ हो बदलीवर आले आहे आठ दिवसाच्या.. माझी मैत्रिण इथं काम करायची तिला बरं नाही म्हणून मी येत आहे. “

 

“ असं का? तरीच आधी कधी तुम्हाला पाहिलं नव्हतं. नीट झाडलं जातंय ना? “

 “ हो हो त्याचं काही नाही देवाची गाणी ऐकू आली म्हणून विचारलं.”

 

“ अहो मुलीनी मोबाईल मध्ये गाणी  भरून दिली आहेत. कसं लावायचं ते शिकवलं आहे 

 विठुरायाची गाणी ऐकतं.. काम कधी होतंय समजतच नाही बघा …..आणि शीण पण वाटत नाही……”

“ भजनाला जाता का?”

“ कुठलं  हो…..मला खूप आवड आहे पण वेळच भेटत नाही बघा…माझी आई गाणी  म्हणायची..

 आता आमच्या घराजवळ विठ्ठलाचे देऊळ आहे तिथे ही गाणी लावतात ..”

 

“ हो का? तुमच्या लेकीला गाण्याचे हे चांगल  सुचलं….” त्या हसल्या आणि कामाला लागल्या..

मला जनाबाईचा अभंग आठवला

 

झाड लोट करी जनी

केरभरी चक्रपाणी 

पाटी घेऊन या शिरी

नेऊन  टाकी दूरी 

ऐसा भक्तिसी  भुलला

नीच कामे करू लागला 

जनी म्हणे विठोबाला

काय उतराई होऊ तुला

 

विठुराया तु जनीला मदत करत होतास हे तिच्या अभंगातून आम्हाला माहित आहे.

पण खरं सांगू इतकी वर्ष लोटली तरी आजही तू भक्तांच्या  तनामनात आहेसच…

नाम रूपानी…

 

तुझे अभंग आजही मनाला उभारी देत आहेत. 

संकटात साथ देत आहेत. काम करताना भक्तांना कष्ट  जाणवत नाहीत …

तुझ्यावर अलोट प्रेम करणारी जनी आज मला दिसली रे या ताईंमध्ये….

 

खरंच  ….विठुराया जनीची कामे निश्चितच करत असेल..

 

असं होतच असेल…. 

फक्त श्रद्धा आणि दृढ विश्वास हवा ….. जनी इतका…

मग तो येतोच मदतीला…  सगळं सोपं करतो .नीट लक्ष दिल की ध्यानात येते की प्रत्यक्ष जगतानाही अशीच आपल्याला पण पांडुरंगाची साथ असते … त्याची रूपे वेगवेगळी असतात. ती एकदा दिसायला लागली की मग सगळीकडेच तो दिसतो….

….. आता ठरवलं आहे सवयच करून घ्यायची रोजच्या जगण्यात त्याला बघायची…

…. मग  तो विठुराया  दिसेल….. पंढरपूरला न जाता पण…… आपल्या आसपास…

…. आज  कशी मला जनी भेटली तसाच….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओंजळीत येईल तितके… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ओंजळीत येईल तितके… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

म्हणता म्हणता चोरपावलांनी २०२३ सरत चालले. काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत कडू गोड अनुभव आले. बघा ना, जेव्हा आपण घर बदलतो त्या वेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्या वेळेस आठवल्या शिवाय राहत नाही. कारण, त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो. तसेच, जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गत वर्षाच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात.

व.पुं.नी एक सुरेल विचार मांडला आहे, ” आठवणींचे रम्य नजराणे देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते..” शेवटी भुतकाळ म्हणजे काय तर, अनेक अनुभव, आठवणी यांचं कोलाज. असं म्हणतात, पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य. वर्ष कोणतेही असो, एक गोष्ट ते प्रत्येकाला शिकवते, ते म्हणजे आपले कोण, परके कोण, ज्यांना आपण आपले समजतो ते कठीण काळात आपल्यासाठी धावून येतात की नाही? एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते तसंच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो.

नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो, पण काही अडचणींमुळे ते पुर्णत्वास जात नाही, विशेष करून स्त्रियांसाठी. कारण, घरची जबाबदारी, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टींमुळे त्या तशाच राहतात. वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाहीत. मनातली घुसमट व्यक्त करण्यासाठी आपल्याच माणसांची गरज लागते. कारण, पुन्हा व.पु. म्हणतात तसं, ” समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात..” मला असे वाटते, वर्ष कधीच खराब नसते तर त्या वर्षात आपल्याला असे अनुभव मिळतात जे आपण या आधी कधी घेतलेले नाही. म्हणून तर सुखाच्या पाठोपाठ दुःख असतेच.

असो, सुर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावं लागतच, तसंच नवीन संकल्प करुन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ या.. गुरू ठाकूर यांच्या दोन ओळी फारच सुंदर आहेत,

“आयुष्य वाहते म्हणूनी बेचैन उगा का व्हावे

ओंजळीत येईल तितके आपले धरुनी चालावे…”

लेखक : अज्ञात

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आईनस्टाईनचा जिना” – लेखक : राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “आईनस्टाईनचा जिना” – लेखक : राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

हृषीकेश मुखर्जी या प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाने 70 च्या दशकात एक अप्रतिम चित्रपट केला होता. त्या चित्रपटाचं नाव “बावर्ची”. एक प्रगल्भ प्राध्यापक ‘बावर्ची’ म्हणजे स्वयंपाकी बनून एका अशांतीने भरलेल्या कुटुंबात येतो आणि साध्या साध्या प्रसंगातून नातेसंबंधात प्रेम आणि कुटुंबात  शांती आणि आनंद कसा निर्माण करता येतं, हे कथाबीज  केंद्रस्थानी ठेवून बांधलेला तो अफलातून चित्रपट.  

त्या चित्रपटात त्या बावर्चीच्या पात्राच्या तोंडी रवींद्रनाथ टागोर यांचं एक वाक्य दिलं आहे ते असं;

“It’s very simple to be happy but its very difficult to be simple”

हा चित्रपट पाहिला होता तेव्हा ते वाक्य मनाला भिडून गेलं होतं आणि ते कायम स्मरणात राहिलं. त्यावर थोडं चिंतन झालं होतं पण त्या वाक्यातील खरं गूज मात्र लक्षात आलं नव्हतं. 

दोन तीन दिवसांपूर्वी गुगलवर काही शोधत असताना एक चित्र डोळ्यासमोर आलं. आईन्स्टाईनने बुद्धिमत्तेच्या पायऱ्या सांगितल्या आहेत त्यापासून तयार झालेला एक जिना त्या चित्रात दाखवलेला होता.

त्यातल्या पायऱ्या अश्या …. 

सर्वात खालच्या पातळीवर; 

Smart – हुशार

त्याच्या वरची पायरी:

Intelligent – बुद्धिमान

त्याच्या वरची पायरी;

Brilliant – तल्लख किंवा तरल

त्याच्या वरची पायरी; 

Genius – प्रतिभाशाली

आणि त्याच्याही वरची आईन्स्टाईनने सांगितलेली पायरी म्हणजे 

Simple –  सहज

आईन्स्टाईनच्या या बुद्धिमत्तेच्या पायऱ्यांच्या जिन्याचं चित्र बघितलं आणि पू. रवींद्रनाथ टागोर यांच्या वाक्यामागचं गुह्य अचानक उमगलं.  त्या वाक्याचा मराठीतील भावानुवाद करायचा तर तो असा होईल; 

“आनंदी होणं खूप सोपं किंवा सहज असतं. पण सहज होणं अतिशय कठीण असतं.”

त्या वाक्याच्या गुह्यातील काही मुद्दे आइन्स्टाईनच्या जिन्याच्या संदर्भातून मला लक्षात आले. 

पहिली गोष्ट ही की कुठल्याही विषयात सहजता मिळवणं ही कठीण गोष्ट आहे कारण ती मिळवण्यापूर्वी हुशार ते प्रतिभासंपन्न हा बुद्धिमत्तेच्या पायऱ्यांचा प्रवास खूप कठीण, कष्टसाध्य आहे जो अनेक तपं करत रहावा लागतो. त्यामुळे संगीत असो, साहित्य असो, इतर व्यवसाय असो, किंवा जीवनातील आनंदसाधना असो, या पायऱ्या साधण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न केल्याशिवाय ते साध्य होणार नाही आणि म्हणूनच एखाद्या विषयात ‘सहज’ ही पातळी गाठणं कठीण आहे.

दुसरा मुद्दा असा लक्षात आला की हुशार ते प्रतिभाशाली या पायऱ्या कष्टसाध्य आहेत.  प्रयत्नांनी त्या साधल्या जाऊ शकतील पण सहजता मिळवायची असेल तर? 

यावर चिंतन करताना असं लक्षात  आलं की 

” प्रतिभा जेव्हा भगवंताशी शरणागत होते, तेव्हा ती सहज होते “. 

प्रतिभा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांमागचा रजोगुणी अहंकार जेव्हा एका स्थितीला भागवंतापुढे शरणागत होऊन लयाला जाईल तेव्हा भगवंताच्या कृपेनेच सहजता येईल. 

याचाच दुसरा कंगोरा असा की केवळ प्रयत्नांनी सहजता मिळणार नाही आणि प्रयत्नांशिवाय केवळ शरणगातीनेही सहजता मिळणार नाही. म्हणून खूप प्रयत्न केल्यानंतरही भागवंतापायी शरणागती नसेल तरीही चालणार नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय नुसतंच शरणागत होऊनही चालायचं नाही. इतकंच नव्हे तर प्रयत्नांशिवाय जर मी शरणागत होण्याची भावना बाळगत असेन तर ती कोरडी शरणागती असेल, त्या शरणागतीतही सहजता नसेल.

यासाठी प्रयत्नांची परिसीमा गाठल्यावर, केवळ प्रयत्नांनी साधत नाही हे लक्षात आल्यावर, स्वाभाविकपणे घडणारी  संपूर्ण शरणागती, यानेच केवळ सहजता प्राप्त होईल हेही लक्षात आलं. 

या विचाराबरोबरच योगवासिष्ठ्य या अद्भुत ग्रंथात सांगितलेल्या प्रयत्नवादावरच्या काही सिद्धांतांचीही थोडीफार उकल झाली.

हा सगळा उहापोह मनात झाल्यावर एक मात्र झालं. आइन्स्टाईनच्या त्या जिन्यावर मी कुठे आहे हे जरी सांगता आलं नाही तरी कुठे जायचं आहे हे मला लक्षात आलं आहे यानेच अतीव  समाधान अनुभवत आहे. 

लेखक : राजेंद्र वैशंपायन 

मो – ९३२३२ २७२७७

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जिसका मन मस्त है, उसके पास समस्त है!…”– लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “जिसका मन मस्त है, उसके पास समस्त है!…” – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची ही कथा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते. आजच्या काळात तर ती फारच गरजेची…. म्हणून सांगतोय.

हे डॉक्टर अतिशय निष्णात. सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला. मृत्यूच्या दाढेतून अनेकांना त्यांनी बाहेर काढून जणू नवीन जीवन दिलेलं.

मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्सर्न फॉर्म (ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज) भरून घेतला जातो, त्याच फॉर्मसोबत हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे.

त्यात त्यांनी विचारलेलं असायचं की, जर तुम्ही या ऑपरेशनमुळे वाचलात, तर बाकीचे आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात, ते इथं लिहून द्यायचं आणि त्याचबरोबर आजवरच्या जीवनात “करायचं राहून गेलेलं” असं काही असेल तर तेही लिहायचं . की मला जीवदान मिळाले तर मी अमुक तमुक करेन !

ऑपरेशनला आलेले रुग्ण तो फॉर्म भरून डॉक्टरकडे देत.

त्यात कुणी लिहिलेलं असायचं की, आजवर कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही. तर आता यापुढे देईन.

– तर कुणी लिहायचं …. माझ्या लहान मुलासोबत मी भरपूर खेळेन. ते राहूनच गेलं आहे.

– कामधंद्याच्या नादात निसर्गात भटकायचं, टूरवर जायचं राहून गेलं आहे. ते नक्की आता करणार

– एकाने तर हेही लिहिलं की, माझ्याकडून आजवर कुणाला दुखावलं गेलं असेल, तर त्यांना शोधून त्यांच्याकडे स्वतः जाऊन माफी मागेन.

– एकीने लिहिलं…. संसार, पै पाहुण्याच्या नादात स्वतःसाठी जगायचं , हसायचंच विसरून गेलेय… यापुढं मनसोक्त हसत हसत जगणार

– निवृत्त वडिलांनी लिहिलेलं…. माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळे अनेकांना माझ्याबद्दल तक्रारी होत्या. उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कुणाचीच येऊ देणार नाही.

– एका सासूने लिहिलं होत…. लेक आणि सुनेत मी थोडं डावं-उजवं करत आले. आता लेकीसारखंच सुनेशी वागेन !

अशी अनेकांनी त्यांची- त्यांची उर्वरित जीवनाची संकल्पचित्रे त्या फॉर्ममध्ये शब्दात मांडली.

*

आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थियेटरमध्ये नेत आणि यशस्वीरीत्या ऑपरेशन करून जीवनदान मिळवून देत. नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या त्या रुग्णाने भरून दिलेला तो “उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म” त्याला परत देत. आणि त्याला सांगत की, तुम्ही घरी जाल, नव्याने जीवन जगाल, तेव्हा तुम्ही राहून गेलेल्या ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या प्रत्यक्षात आणल्यावर त्याच्या समोर “टिकमार्क” करत जा. आणि मग सहा महिन्यांनी तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा की त्यातल्या कशासारखं जीवन तुम्ही जगला ?

*

आणि मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की, सगळ्यांनी सगळं लिहिलं पण कुणाशीच भांडण / वैर झालं नाही असा एकही नसणार ! पण तरीही कुणीही असं लिहिलं नव्हतं की, “जर मी वाचलो तर मला अमुक व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे. माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे. आणि जमलं तर त्याला पूर्ण बरबाद करायचं आहे.”

किंवा असेही कुणी लिहिले नव्हते की, मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत. खूप श्रीमंत व्हायचं आहे. स्वतःला खूप बिझी ठेवायचं आहे.

*

आणि मग सहा महिन्यांनी भेटायला आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारत, “ऑपरेशनपूर्वी जेव्हा कधी तुम्ही स्वस्थ होता. तेव्हा असं आयुष्य का जगला नाहीत, जे गेल्या सहा महिन्यात जगलात. तुम्हाला तसे जगण्यासाठी कुणी अडवलं होतं?”

यावर रुग्ण निरुत्तर होत. मात्र निघताना डॉक्टरचे पाय धरून समाधानाने घरी जात.

डॉ. डीडी क्लास : मृत्यूची घंटा वाजल्यावरच आपण जागे होतो. हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्कारण होणारी धावपळ थांबवतो. जेवणाखाण्याची हेळसांड थांबवतो. शिस्तबद्ध आयुष्य जगतो. आज जरा हे सगळं वाचून झाल्यावर खुर्चीत स्वस्थ डोळे मिटून थोडं चिंतन करा. की हातात किती आयुष्य आहे, माहीत नाही. पण निदान जितके आहे ते कशा प्रकारे जगायचे, ते मनाशी नियोजन करा. आणि जमलंच तर ते सगळं एकाखाली एक असं वहीत लिहून काढा.

आणि मस्तपैकी हातपाय तोंड धुवून नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरु करा. आणि स्वतःला आधी हेच सांगा की, “अजून कुठं उशीर झालाय? जब जागो तब सवेरा” यामुळे तुम्हाला अजून उत्साह येईल. आणि हे मी स्वानुभवातून सांगतोय.

*

पंधरा वर्षांपूर्वी मीही अशीच चूक केलेली आणि मी ती जाहीरपणे मान्य देखील करतोय.  जेवणाकडे हेळसांड करून धाव धाव धावत होतो. सगळं मनासारखं प्रत्यक्षात आणलं खरं, पण अचानक अटॅकपायी पूना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल व्हावं लागलं. त्यातून बाहेर आलो खरा, पण आत जातानाचा मी अन बाहेर आल्यावरचा मी यात जमीन-अस्मानाचा फरक होता. जिथं चार पायऱ्या चढायला डॉक्टरांनी बंदी घातली होती आणि चौथ्या मजल्यावरचे (विना लिफ्ट)चे घर ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोअरला दुसरं घ्या, असं सांगितलं होतं,तिथं मी ते काहीही न करता मस्त ठणठणीत जगतोय. गडकिल्ले चढून जातोय.  योग्य आणि वेळेवर आहार, रोज स्वतःसाठी एक तास (morning walk)  आणि योगासने, रात्री झोपताना गार दूध, नो जागरण…. बास! याच उपायावर त्या आजारातून बाहेर आलो. एकही गोळी न खाता. म्हणून म्हणतो, मला जी अक्कल “घंटा” वाजवून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा लेखप्रपंच !

*

आणि अजून एक म्हणजे…. फार वखवख करत जगणे सोडून द्यावे.

कारण… असं म्हणतात की

जो प्राप्त है-पर्याप्त है

जिसका मन मस्त हैtt

उसके पास समस्त है!

लेखक :डॉ. धनंजय देशपांडे

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

दत्त म्हणजे देणारा… ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

स्वत:च्याच ठायी असणारा आनंद चाखण्यासाठी निर्गुण निराकार परमेश्वर सगुण साकार झाला. आणि आपल्याला प्राप्त झाली. सर्व काही देणारा तोच म्हणून तो आहे दत्त.

विश्वरूपाने समोर, शरीर रूपाने जवळ व सच्चिदानंद रूपाने तो आपल्या अंत:करणात आहे.

शरिराच्या रुपाने साकार झाला, अवतिर्ण झाला. शरीर रुपाने आपण दिसतो पण मन व चैतन्य (ईश्वर) रुपाने आपण गुप्त आहोत. याचेच प्रतिक म्हणजे दत्त.  

तीन शिरे :- शरीर + मन + चैतन्य  (ईश्वर).

सहा हात :- शरीराचे दोन हात – डावा व उजवा

मनाचे दोन हात – बहिर्मन व अंतर्मन

चैतन्याचे दोन हात – जाणिव व नेणीव.

गाय म्हणजे अधिष्ठान असणारी चैतन्य शक्ती.

श्वान म्हणजे श्वास की ज्यामुळे जीवन आहे.

हातात त्रिशूळ म्हणजे हाताने काम, मुखाने नाम व अंतकरणात  राम अशी जगण्याची जीवन शैली.

काखेत झोळी म्हणजे अहंकार सोडून जिथून ज्ञान मिळते तिथून सतत ज्ञान मिळवत रहा.  

किंबहुना आपण (दत्त) जन्माला येतो तो ज्ञान मिळविण्यासाठी.

जो ज्ञान देतो तो गुरु आणि देतो तो देव.

सदगुरुने दिलेल्या ज्ञानाने आपणच दत्त म्हणजे देव होणे म्हणजेच गुरुदेव दत्त.

म्हणून खर्‍या अर्थाने असा दत्त आपल्या ठिकाणी जन्माला येणं म्हणजेच दत्तजयंती.

अशा दत्तजन्मौत्सवच्या मनःपूर्वक शुभेच्छा….

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print