मराठी साहित्य – विविधा ☆ लॉकडाऊन चार नंतर भेटलेल्या मैत्रिणी ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ लॉकडाऊन चार नंतर भेटलेल्या मैत्रिणी ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

अनलॉक ४ नंतर भेटलेल्या मैत्रिणी

(जूना लेख नवीन बदलांसह)

ठिकाण: लोणावळा

??????

अरे अजून कशी आली नाही ही स्वारगेट हिरकणी एव्हान यायला पाहिजे होती. माझी तर आता  निघायची वेळ झाली असे विचार बोरिवली शिवनेरीच्या मनात येत असतानाच लोणावळा एक्झीट मधून अर्ध गोलाकार वळण घेत धापा टाकत. ठाणे – स्वारगेट हिरकणी अवतरली.

अग हो, हो,  जरा हळू,

उशीर झाला म्हणून एवढं जोरात यायचं? लागलं असतं की तुलाच.. शिवनेरी जरा काळजीच्या भावनेने म्हणाली..

ए शिवनेरी Sorry हं,  जरा उशीरच झाला मला, आता नेहमी सारख्या गप्पा नाही जमणार गडबड होईल इती – हिरकणी

‘अगं असू दे ‘ गप्पा काय संध्याकाळी परत येताना करु, तू आधी ३० रुपयाचा नाष्टा करुन ये. उपमा घे आज. मस्त आहे गरम. पण त्या आधी हे घे आधी सॅनिटायझर. स्वच्छ हात धू. कोण कोण असतं गाडीत देव जाणे. आपणच आपली काळजी घ्यायची

हो गं,  किती वाईट दिवस होते मागचे.  डेपोत नुसते पडून होतो. एक दोन दिवसात आपले मेकॅनिक मामा येऊन फक्त आपल्याला चालू करुन जायचे आपण कायमचे बंद पडू नये म्हणून खूप आठवण यायची सगळ्यांची

अग जातीयस ना नाष्ट्याला

नको ग, अजून काही दिवस बाहेरचे नको. घरुनच डबा आणलाय मी. स्वारगेटला पोहोचले की खाईन.

अगं पण एवढा घाट चढून आलीयस. दमली असशील की निदान चहा तरी घे.

नको गं शिवनेरी,  सध्या नुसते गरम पाणी.  तो बघ थर्मास भरुन ठेवलाय. निघताना घेईन पाणी.

शिवनेरी, घाटावरुन आठवलं,मला तर बाई या आपल्या कोकणातल्या मैत्रिणींच नवल वाटत. कशा एकदम फीट ना. ती अशोक लेल्यांची सून माहित आहे ना.

‘हो ना गं’ किती ते मोठे घाट असतात ना कोकणात. या आपल्या कोकणातल्या मैत्रीणी एकदम बिंधास्त. मी  मात्रफारशी त्या मार्गावर जातच नाही

आपला हा पुणे-मुंबई बोर घाटच बरा.

हो ना, नाहीतर आपण. अमृतांजन पाँईंट ला केंव्हा टाटा करतो असं होऊन जातं आपल्याला.

हिरकणी , तो बघ अश्वमेध येतोय, दादर – पुणे स्टेशन, बोलायचं का त्याच्याशी

“काही नको ग”, तो कुठं आपल्याशी बोलतो ग्रुप वर. तो फक्त  पुणे – दादर – पुणे  शिवनेरींशींच  बोलतो. आपला ग्रुप त्यानेच बनवून दिला अन   एकंदरीत  पुणे – दादर –  पुणे ची मक्तेदारी   आपण सगळ्या  ग्रुप मध्ये आल्यामुळे  मोडली गेलीय ना , त्याचे  त्यांना  दुःख आहे ग , लक्ष देऊ नकोस तू . आणि मुख्य म्हणजे तो दोन्हीकडच्या कंटॅन्मेंट झोन मधून येतो. येतोय तो, मास्क घाल निट. आणि मगाच पासून सारखं खालीवर का करतीयस हा मास्क. अजिबात असे करायचे नाही हं

हो ग बाई, अजून नीट सवय झाली नाही ना गं. पण घेईन काळजी

ए आपली

‘परळ – सातारा’ ती नाही ग दिसली ब-याच दिवसात नेहमीच्या वेळेला इथे

अग गणपती असतो ना तिच्याकडे  साता -याला. मला म्हणलेली  एक दिवस  पुणे – सांगली रूट  करून ये दर्शनाला . पण नाही ग जमलं . उद्या परत जॉईन होतीय ती  परळ डेपोत.

तिने गणपती विसर्जनाचे फोटो पाठवलेले की . नाही पाहिलेस  ग्रुपवर ?

नाही ग , राहून गेलं . पण ही परळ खूप सरळ हो . किती दमते  बिचारी.   आपण पुण्यापर्यतच जातो ग बिचारीला साता-या पर्यत जाऊन रात्री उशीरा पर्यत परत परळला  यावे लागते. खूपच हेक्टिक काम आहे तिचे.

हो ना. कुणाला कधी नाही म्हणत नाही. ग्रुप मध्ये सगळ्यात जास्त टोल पार्टी देणारी म्हणून तिचे सगळेच कौतुक करतात. आता उद्या मुद्दाम जरा  जास्त थाबते लोणावळ्याला अन कंदी पेढ्याचा प्रसाद. तिच्याकडून घेऊनच निघेन म्हणते

शिवनेरी,  ती बघ यशवंती .हाक मारतीय आपल्याला

यशवंती, ये  चहा घेऊन जा ..

अग नको  अजून चार चकरा मारायच्या आहेत  लोणावळा ते कार्ला आणि मी अजून बाहेरचे  काहीच खात नाही सध्या. भेटू परत केंव्हातरी

कमाल आहे ना या मुलीची.  केव्हा ही बघा ही आँन लाईन असतेच. जवळच्यांची खूप काळजी घेते, मैत्रीण असावी तर हीच्या सारखी

खरंय ग

ए शिवनेरी, तो बघ तुझा राजा हिंदुस्तानी आला ‘

“आले का सगळे का कोण राहिलय”

या आवाजाने मला जाग आली तेंव्हा ही शिवनेरी आणी समोरची हिरकणी माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसतायत असा भास मला झाला

तरीही त्यांचा संवाद संपत नव्हता:-

हो हो , चल आज खूप वेळ झाला, आता बोरिवलीला केव्हा पोचणार देव जाणे

नीट जा ग , सायन पासून पुढे बांद्रया पर्यत प्रत्येक  ९ मिटरवर खोल खडडे आहेत. कंबरडं मोडून जाईल

हो हो  काळजी घेईन, थॅक्स हं

मोरया ?

एसटीचे अनलॉक पर्व  ????

लोणावळ्याला जमू सर्व

 

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाहुली ☆ सौ. मानसी काणे

सौ. मानसी काणे

☆ विविधा  ☆ बाहुली ☆ सौ. मानसी काणे ☆

 हजारो वर्षांपासून बाहुली आस्तित्वात आहे.  अगदी मोहेंजोदडो,  हडप्पा सारख्या प्राचीन उत्खननातसुद्धा बाहुल्या सापडलेल्या आहेत.  जगातल्या प्रत्येक देशात वेगवेगळ्या रुपात बाहुली पहायला मिळते.  मुलीला कळायला लागल की तिला पहिल खेळण आणल जात ते म्हणजे बाहुली.  मुलींच्या भावविडात बाहुलीला फार मोठ स्थान आहे.  अगदी मुली क्रिकेट,  कुस्ती किंवा बॉयिसंग खेळू लागल्या तरीही.  इतिहासात खोलवर डोकावल तर इसवीसनापूर्वीदेखील बाहुल्या असल्याची माहिती मिळते.  ‘‘लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली. घारे डोळे फिरवीते,  नकटे नाक उडविते’’अस सुंदर वर्णनाच गाण प्रसिद्ध आहे. पूर्वी लाकडी ठोकळ्याला नाकडोळे काढलेल्या ओबडधोबड बाहुल्या असत.  त्याना ठकी म्हणत.  त्यानंतर चिंध्याच्या बाहुल्या आल्या.  मग प्लॅस्टिकच्या बाहुल्या आल्या.  आज डोळे फिरविणार्‍या,  बाटलीतून दूध पिणार्‍या अगदी खर्‍या बाळासारख्या दिसणार्‍या बाहुल्या मिळतात.  किी दिल्यावर नाच करणारी बाहुली,  छत्री आणि पंखा घेतलेली किमोनो घातलेली जपानी डॉल,  लांबडे हातपाय आणि लांब वेण्या घातलेली सँडी आणि या सर्वांवर कळस म्हणजे सोनेरी केसांची,  तरुणीच्या रुपातली बांधेसूद बार्बी.  आता बार्बीबरोबर तिचे कंगवे,  तिचे कपड्यांचे सेट,  तिच मेकअप किट,  तिच रंगीबेरंगी टुमदार घरसुद्धा मिळत.  इंटरनेटवर तिच्या हेअरस्टाईलचे वेगवेगळे प्रकार दाखविले जातात.  आपली ऐडर्या रॉय बार्बीच्या रुपात पहायला मिळते.  अनेक शहरात बाहुल्यांची संग्रहालये आहेत .   त्यात देशोदेशीच्या बाहुल्या पहायला मिळतात.  बाहुला बाहुलीचे लग्न हा बालपणीचा एक आवडीचा खेळ असतो.   चुरमुर्‍याच्या मुंडावळ्या आणि हार,  वाजंत्री,  मंगलाष्टक आणि वरात सुद्धा या खेळात असते.  पूर्वीच्या राजकन्यांच्या बाहुलीच्या लग्नाच्या रम्य आणि सुरस कथा वाचायला मिळतात.  लाडयया लेकीच्या लग्नानंतर कपाटातल्या तिच्या बाहुलीकडे पाहून तिच्या आठवणीत रमलेले आईबाबा पहायला मिळतात.  ‘‘सुनो छोटीसी गुडियाकी लंबी कहानी किंवा गुडिया हमसे रूठी रहोगी कबतक ना हँसोगी’ यासारखी गाणी प्रसिद्ध आहेत.  ‘‘जहाँ मैं चली जाती हूं वहीं चले आते हो ह्या किंवा बोल रे कठपुतली बोले या गाण्यावरचा पपेट डान्स खूप छान आहे.

परदेशात पपेट शो असतात.   राजस्थानात दोर्‍यांच्या सहायाने बाहुल्या नाचवून कथा सांगितल्या जातात.  रामदास पाध्यांच्या बोलयया बाहुल्या प्रसिद्ध आहेत.  त्यांचे अर्धवटराव आणि आवडाबाई कोण विसरेल?तसाच त्यानी तयार केलेला तात्या विंचू हा भयानक बाहुला.  त्यांच्या कुटुंबान बाहुल्यांच्या खेळासाठी,  शब्दभ्रम ही कला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य वेचल आहे.  बाहुली फ्क्त खेळातच असते अस नाही.   कपड्यांच्या,   दागिन्यांच्या दुकानात मॉडेल म्हणून तिचे वेगळे स्थान आहे.  घराला,  वाहनाना दृष्ट लागू नये म्हणून काळी बाहुली बांधतात.   जादूटोण्यासाठी कापडी बाहुल्या वापरतात. अनेक सिनेमात किंवा टीव्ही सिरिल्समधे बाहुली हे स्वतंत्र पात्र आहे. रहस्य निर्माण करण्यासाठी किंवा ते उलगडण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. एखादी व्यक्ती दुसर्‍याच्या तालावर नाचत असेल,  दुसर्‍याच्या सांगण्यानुसार वागत असेल तर तिला कळसुत्री बाहुली म्हणतात.  छान दिसणार्‍या मुलीला बाहुलीसारखी गोड  ठेंगणी ठुसकी आहे अस म्हणतात.   नुसतीच नटून बसलेल्या मुलीला बाहुलीसारखी बसू नको काम कर अस म्हणतात.   आणखी एक बाहुली प्रसिद्ध आहे ती म्हणजे फिल्मफेअरची. तिच्यासाठी नटनट्या जीव तोडून प्रयत्न करत असतात. ऑस्करच्या बाहुलीसाठी तर सगळ्या जगात चढाओढ सुरू असते.  ***

© सौ. मानसी काणे

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अनेकरंगी शब्द-बहारदार ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆  अनेकरंगी शब्द-बहारदार ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘बहारदार’ हा एरवी मी अनेकदा ऐकलेला, वाचलेला आणि स्वत: ही बर्याचदा वापरलेला शब्द..! पण आज लेखनाचा विषय म्हणून याचा विचार सुरु झाला,तेव्हा या शब्दाने शब्द आणि भाषा यांच्यातल्या नात्यांचे बहारदार रंग अधिकच रंगतदार होत असल्याची समृध्द करणारी जाणिव मन प्रसन्न करुन गेली.

‘बहर’ म्हंटलं कि निसर्ग आठवतो आणि बहार हा शब्द अनेक जुन्या हिंदी सिनेमांच्या सुखद बहारदार आठवणी ताज्या करतो.बहर या शब्दात सुगी,सराई,मोसम,अशा अनेक सुखद विविधरंगी निसर्गावस्था जशा लपलेल्या लपलेल्या आहेत तसेच बहर हाच शब्द नव्हाळी, टवटवी, ताजगी, जोम अशा विविध अर्थरंगातली नवतारुण्याची चाहूलही सूचित करतो.

‘बहार’ या शब्दाने जागवलेल्या अनेक जुन्या हिंदी चित्रपटांच्या आठवणी बहार या शब्दाचे विविध रंग अधोरेखित करणार्याच आहेत. ‘बहार’, ‘बहारोंके सपने’,’बहारे फिर भी आयेंगी’ही अशा काही चित्रपटांची प्रातिनिधिक उदाहरणे. ‘बहार’ हे चित्रपटाचे नाव. त्या नावात समृध्दी, भरभराट, संपन्नता यातल्या समाधान, संतुष्टता यांचे सूचन आहे. ‘बहारों के सपने’ विपन्नावस्थेतील गरीबांनी पाहिलेली समृध्दीची स्वप्ने रंगवणारा वाटतो, तर ‘बहारे फिर भी आयेगी’ निराश मनोवस्थेला दिलासा देणारा हेही दिवस जातील अशा आशावादाचा परिसस्पर्श करुन सावरु पहाणारा असल्याचे लक्षात येते.

बहर, बहार या शब्दांनी अशा अनेक उमलत्या आनंद सौख्य, समृध्दीच्या अर्थरंगानी आपल्या मनात सुखद असोशी निर्माण केलेली असते.पण या सुखद वास्तवाचा मोसम कायम टिकणारा नसतो हे आपण गृहीत धरलेले नसेल तर बहरानंतर येणारा शिशीर आपल्याला अधिकच चटके देणारा वाटण्याची मात्र शक्यता असते.तसे होऊ नये म्हणूध बहर असो वा शिशिर दोन्हीही क्षणभंगूर आहे हे लक्षात घेऊन सुखात तरंगत न रहाता,आणि दु:खाने खचून न जाता या दोन्ही अवस्थेत मनाला सावरणारे ओठावरले गाणे आपण अलगद जपायला हवे.

बहारदार या शब्दनिर्मितीतील वैशिष्ठेही लक्ष वेधून घेणारी आहेत. बहार आणि दार या दोन शब्दांनी बनलेला हा संयुक्त शब्द..! एक नाम आणि दुसरा विशेषण. नामाचं वर्णन करण्यासाठी एरवी विशेषण वापरले जाते आणि ते नामाच्या आधी येते आणि आपलं वेगळं अस्तित्व जपतही असते. उदाहरणार्थ -सुखद धक्का, दुष्ट माणूस, लाल गुलाब इत्यादी. ‘बहारदार’ मधे मात्र ‘बहार’ या नामाच्या नंतर ‘दार हे विशेषण येते. गंमत म्हणजे हे विशेषण स्वत:चे वेगळे अस्तित्व न जपता त्या नामाशी संलग्न होते. पण हे होत असताना स्वत:चं वैशिष्ठ हरवत नाही.तर प्रत्यय बनून त्या नामालाच स्वत:त सामावून घेऊन स्वत:चा रंग त्याला देते. म्हणजे इथे ‘ दार ‘ या विशेषणाच्या स्पर्शाने ‘बहार’ या नामाचे बहारदार या वेगळ्या विशेषणात रुपांतर होते. दार हा शब्द श्रीमंत या अर्थाचा.बहार म्हणजे सौंदर्याची, रंगरसांची, अभिवृध्दीची श्रीमंती..! बहारदार सादरीकरण, बहारदार रंगत, बहारदार अभिनय,  याप्रमाणे हे विशेषण वापरले जाते. दार या विशेषणाच्या प्रत्यय रुपातल्या नामसंलग्नतेतून तयार झालेली चवदार, रंगतदार, मजेदार अशी इतरही उदाहरणे आहेत.

‘बहारदार’ या शब्दाच्या स्पर्शाने माझ्या मनात उमटलेले हे विचारतरंग भाषासमृध्दीसाठी निदान माझ्यापुरतेतरी शब्दांशी खेळायला प्रवृत्त करणारे ठरलेयत हे मात्र खरे..!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळ आला होता पण ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ मनमंजुषेतून ☆ काळ आला होता पण ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

रोजच्यासारखीच मी बँकेत जायला निघाले होते. आदल्या दिवशी पित्ताचा प्रचंड त्रास झाल्याने खूप अशक्तपणा

जाणवत होता. पण किल्ल्यांची जबाबदारी असल्याने जाणे भागच होते. म्हणून टूव्हीलर ऐवजी रिक्षाने निघाले होते. एक दीड कि. मि. गेले असेन, आणि अचानक मला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं. छाती जड झाली. कुणीतरी बरगड्यांची घट्ट मोळी बांधत आहे असं वाटायला लागलं. जीवाची घालमेल व्हायला लागली.

नकळत मी रिक्षाच्या सीटवरच आडवी झाले… परत उठत होते ..झोपत होते. माशासारखी तडफड व्हायला लागली. रिक्षा वाला पार घाबरून गेला. “परत” घरी सोडतो म्हणाला. पण परत जाईपर्यंत मी मरेन असं मला आतून तीव्रपणे जाणवत होतं. पुढे वाटेत एक नामांकित हॉस्पिटल असल्याचं आठवलं.

‘तिथे घेऊन चला’ म्हटल्यावर ‘रस्ता माहिती नाही’ म्हणत तोच रडवेला झाला. मग मीच कसातरी रस्ता दाखवला.

तिथे पोहोचताच तिथल्या मोठ्या लॉबीतून कशीबशी चालत मी रिसेप्शनपाशी गेले. तिथली मुलगी फोनवर बोलण्यात इतकी गुंग होती की तिने माझ्याकडे बघितलेही नाही. आता आधार घेत उभे राहणेही अशक्य होत होतं.

समोर एक स्ट्रेचर ट्रॉली दिसताच मी कशीतरी जाऊन त्यावर झोपले. काही मिनिटे मी तिथेच तडफडत पडले होते. तिथून चाललेल्या वयस्करशा दोन ‘ मावशींनी’ मला पाहिलं आणि पटकन ती ट्रॉली ढकलत मला आत कुठेतरी नेऊन ठेवलं.

शिकाऊ दिसणारे दोन तीन डॉक्टर्स तिथे बसलेले होते. वॉर्डबॉयने मला तिथल्या टेबलवर झोपवलं. माझी तळमळ जास्त वाढली होती. मग एक एक करत तिथला प्रत्येक जण घरचा, बँकेचा फोन नंबर विचारायला लागला.

‘आधी काहीतरी इलाज करा‘

असं शेवटी मी ओरडले, तेव्हा ऑक्सिजन मास्क लावला गेला यात किती वेळ गेला कोण जाणे. मग आमचे मॅनेजर सर्वात आधी तिथे पोहोचले.

कुठल्याशा फॉर्मवर त्यांनी सही केली, आणि ” काळजी करू नका” एवढेच बोलून, किल्ल्या घेऊन ते निघूनही गेले. पुन्हा मी सोडून सगळे शांत … एव्हाना माझा घसा आवळल्यासारखा व्हायला लागला होता. छाती-पाठ- मान गळच प्रचंड दुखत होतं. शुद्ध हरपेल असं वाटत होतं. मग त्यांनी मला एक इंजेक्षन दिलं, आणि स्ट्रेचर-ट्रॉलीवर झोपवून लिफ्टमध्ये नेले. लिफ्टमध्ये मला माझी बहीण दिसली आणि माझी शुद्ध पूर्ण हरपली.

संध्याकाळी कधीतरी मी शुद्धीवर आले….आणि सकाळपासून घडलेला एक एक प्रसंग मला आठवायला लागला. प्रत्येक प्रसंगात, माझं आयुष्य संपवायला आलेला काळ जाणवायला लागला.

पण तरी अजून मी जिवंत कशी काय होते?….. मग हळूहळू लक्षात यायला लागलं की…… काळ आला होता हे तर १००% सत्य होतं, कारण त्या अवस्थेत ते मला क्षणाक्षणाला जाणवत होतं. पण वेळ? ती नक्कीच आली नसावी. कारण ती आली असती ,तर त्याही अवस्थेत हॉस्पिटलमध्ये जाण्याची अंतः प्रेरणा श्री स्वामींनी मला दिलीच नसती. रिक्षावाला मला वाटेतच उतरवू शकला असता.

त्या दोन मावश्यांना माझ्याकडे लक्ष द्यावं असं वाटलं नसतं. जे एक अत्यावश्यक इंजेक्शन तेव्हा मला दिलं लं, ते केमिस्टकडून आणायला माझ्याबरोबर कुणीच नव्हतं हे लक्षात येताच तिथला वॉर्ड – बॉयरुपी देवमाणूस ट्कन जाऊन, त्या इंजेक्शनचे ४००० रू स्वतःच्या नावावर लिहायला सांगून, ते घेऊन आला नसता. अर्थात हे मला नंतर कळलं होतं……. आणि या सगळ्यांनी मिळून, काळ बरोबरच घेऊन आलेल्या त्या वेळेला भक्कमपणे अडवून गदी वेळीच परतून लावलं होतं, म्हणून मी जिवंत राहिले होते…..त्या सर्वांची मी आजन्म ऋणी आहे.

दुसऱ्या दिवशी डॉक्टर तपासायला आले तेव्हा अगदी गंभीरपणे म्हणाले की” अजून अर्धा तास उशीर झाला असता तर यांचं काही खरं नव्हतं”……. आणि त्यांच्या त्या बोलण्याने मला मात्र तेव्हा नकळतच हसू आलं होतं.

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

पत्ता : ४, श्रीयश सोसायटी, ५७१/५७२, केंजळे नगर, पुणे  ४११०३७.

मोबाईल: ९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अधिकमास ☆ श्रीमती अनुराधा फाटक 

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ विविधा ☆ अधिकमास ☆ श्रीमती अनुराधा फाटक  ☆ 

दरवर्षीच्या बारा चांद्र मासापेक्षा अधिक असणारा असा अधिक मास १८ सप्टेंबरला सुरु होत असून १६ आक्टोबरला संपत आहे.साधारणपणे दोन वर्षे आठ महिन्यानी असा चांद्रमास येतो.

पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते तसा पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो.चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे २९.७५ दिवस लागतात. आपण ३०दिवसांचा (तिथींचा) एक चांद्रमास मानतो. चंद्राच्या उगवण्या-मावळण्याच्या वेळेप्रमाणे तिथीत वृध्दी किंवा क्षय होत असतो .त्यामुळे साधारणपणे आपले चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे व सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते या दोन प्रकारच्या वर्षात ११ दिवसांचा फरक पडतो अशी तीन वर्षे झाली एक महिना अधिक म्हणून ओळखला जातो. म्हणून दर दोन वर्षे आठ महिन्यानी अधिक महिना येतो.

चांद्रमासाच्या बारा महिन्यात आपल्या सणसमारंभाची जशी योजना असते तशी अधिक महिन्यात नसलयानेच कदाचित या महिन्याला मलमास म्हणत असावेत.

‘आपल्या कालावधीत इतर मासाप्रमाणे काहीच नसते’ याची खंत वाटून हा मलमास श्रीविष्णूकडे गेला. त्याने आपली दुर्लक्षितता भगवान विष्णूला सांगताच भगवान विष्णूने त्याला आपले ‘पुरुषोत्तम ‘ हे नाव दिले तेव्हापासून तो पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जाऊ लागला अशी एक आख्यायिका सांगितली जाते. या मासात ‘भागवत’ सप्ताह करण्याची प्रथा असून ‘माझ्या परिवाराचे आयुष्य अछिद्र व्हावे ‘ अशी प्रार्थना भगवान विष्णूला करून त्याच्या स्मरणार्थ अपूप( अनारसा) वाण देतात.

हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नरसिंहावतार झाला तो अधिक मासातच!

असे हे अधिक मासाचे महत्व !

आपल्या मनोकामनांचे पूर्तत्व करणारे !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणगोत ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

B.Sc Microbiology, P.G.Diploma in Hospital Management

 ☆ विविधा ☆ गणगोत ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

माझी परसबाग हे माझ्यासाठी माझं नंदनवन! ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हे संतांचे वचन तंतोतंत पटावं अशी ही विसाव्याची जागा! मनमोकळं व्हायच ठिकाण जणू! मौनातून बरच काही सांगून जाणार विश्वच ते! सजीव सचेतन असं जिवाभावाचं कुटुंब….

परस दारावर जाईचा नाजूक वेल पसरलाय. उंबर्‍यावर पाय पडताच तिचा सुवास श्वासात भरून जातो. शुभ्र पांढऱ्या फुलांचे सात्विक तेज मन उजळून टाकतो.

परसाच्या मध्य भागी आपल्या सावळ्या मंजिऱ्या लेऊन नटलेली कृष्ण तुळस मन प्रसन्न करते. तिचे भक्ती रूप दर्शन नतमस्तक व्हायला लावते.

तिच्याच बाजूला जास्वंद नम्रतेने वाकून तिला लाल फुलं अर्पण करतोय असं काहीसं दृश्य दिसतं.

अबोली नावाप्रमाणेच अबोल आणि शांत..,,

परस दाराच्या मागच्या दारापाशी वेगवेगळ्या रंगात गुलाब हसतात. काटेरी भाले अंगावर घेऊन जणू आतील सर्व गणगोतांचे चे ते संरक्षण करतात.

गुलाब भालदार तर बकुळ चोपदार सावळीशी अशी ही नाजूक पण दाराशी खडा पहारा ठेवते तिच्या सुगंधाने आकर्षित होऊन निमिष भर थांबून घराकडे एक दृष्टीक्षेप टाकून पुढे जाणाऱ्या प्रत्येका पासून बागेला दृष्ट लागू नये म्हणून ही सावळी सर्वांना काळं तीट लावते जणू!

आंबा गर्द सावली ढाळतो ते केवळ माझ्या मनी साठीच, असे मला वाटते कारण मनी दिवसभर त्याच्या सावलीत पहुडलेली असते.

वृद्ध पारिजात अंगणाची शोभा वाढवतो पारिजातकाची नाजूक फुलं रोज तुळशीवर बरसतात आणि तिची यथासांग पूजा होते.

चाफा निमुटपणे पान पिसाऱ्यातून दर्शन घडवतो तो अगदी माझ्या झोपायच्या खोलीपर्यंत पसरला त्यामुळे मलाही जणू त्याचाच सुगंध.

अशीही माझी परसाबाग माझ्या जिव्हाळ्याची…..

त्या दिवशी मी खूप उदास होते. आईचं वर्षश्राद्ध नुकतच झालं आणि बाबांचं एक दोन महिन्यावर येऊन ठेपलं होतं.आईला सोडून बाबांना जणूं एकट राहणं जमलच नाही गेले पाठोपाठ तिला भेटायला. आम्हाला इथे एकटं सोडून…

दोघांच्या आठवणीने डोळे पाणावले. नकळत हळूहळू टीपं ढाळू लागले. अंगणातील मंडळींच्या नजरेतून हे सुटले नाही आणि मग प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.

“ताई काय झालं? का रडतेस? आमचं काही चुकलं का? काही तरी बोल बाई!” सर्वांनी एकदम गलका केला.

गुलाबाने री ओढली “ताई तू काळजी करू नकोस. तुझं सगळं दुःख मी पचवतो. सगळे काटे मी माझ्या अंगावर घेतो”

जास्वंद म्हणाले, “आता जाते कशी बाप्पाकडे आणि तुझी आणि त्यांची भेटच घडवते. मग हवं ते मग त्याच्याकडे”

चाफा म्हणाला, “रडू नको ताई. बोलून सगळे निपटूया. तू अगोदर तुझ्या मनात जे दाटलय ते मोकळं कर”

अबोली म्हणाली, “मी नावाचीच अबोली ग तुझी माझी बट्टी! सांग मला तुझ्या मनातलं आणि मोकळी हो.

बकुळ म्हणाली,“ दृष्ट लागली माझ्या ताईला, दृष्ट काढून टाकते आता ताबडतोब!”

आंबा म्हणाला,“अशी संतापू नकोस ताई शांत हो जराशी. ये पाहू माझ्या सावलीत आणि सांग मनातलं….”

मनी माझ्या दोन पायात घुटमळला लागली तिच्या झुबकेदार शेपटीने मला गोंजारायला लागली. मूकपणे मला बोलतं करायचा तिचा प्रयत्न होता.

तुळशी ने मौन सोडले. तिने माझ्या मनातलं जाणलं. “अगं ताई आई-बाबांच्या जाण्याने तू इतकी दुःखी झाली आहेस ते मला ठाऊक आहे तुझे अश्रूच ते सांगतात पण ‘उपजे ते नाशे’ या न्यायाप्रमाणे अशा घटना घडणारच.हे जीवन चक्र आहे. आपण वास्तव स्वीकारले पाहिजे. नाही का?

इतका वेळ शांत असलेला वृद्ध पारिजात बोलू लागला, “अगं बाळा मीच तुझा तात!

दारावरची जाई म्हणाली अगं राणी मीच तुझी आई!”

आई-बाबांना भेटल्याचा कोण आनंद झाला म्हणून सांगू?….. माझा मन मोर नाचू लागला.

इतक्यात वार्‍याची एक मंद झुळूक आली आणि गुलाब अबोली चाफा बकुळ जास्वंद सर्वांना घेऊन फेर धरून नाचू लागली. संपूर्ण आस मंतात एक मंद सुगंध दरवळू लागला. एक असा अप्रतिम गंध जशीअत्तराची कुपी सांडली जणू………

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एम्. विश्वेश्वरय्या ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

 ☆ इंद्रधनुष्य ☆ एम्. विश्वेश्वरय्या ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता होती, त्या वेळची गोष्ट आहे. खचाखच भरलेली एक रेल्वेगाडी चालली होती. इंग्रज प्रवाशांची संख्या जास्त होती. एका डब्यात एक प्रवासी गंभीर चेहरा करून बसला होता. रंगाने सावळा, देहयष्टीने साधारण, पोशाखही सामान्यच! त्यामुळे डब्यातील इतर इंग्रज प्रवासी त्याची कुचेष्टा करत होते; पण कोणाच्याही चेष्टेकडे त्याचे लक्ष नव्हते. अचानक त्याने उठून रेल्वेची साखळी खेचली. वेगात जाणारी रेल्वे तात्काळ काही अंतरावर थांबली. सर्व प्रवासी त्याला ओरडू लागले. थोड्या वेळाने रेल्वेचे सुरक्षा रक्षक तेथे आले व त्यांनी विचारले, ‘साखळी कोणी व का खेचली?’ त्या व्यक्तीने उत्तर दिले, ‘मी खेचली साखळी. माझा अंदाज आहे, साधारण एक फर्लांग अंतरावर रेल्वेचे रुळ उखडले आहेत.’

सुरक्षारक्षकाने आश्चर्याने विचारले, ‘तुम्हाला कसे काय कळले?’ तो म्हणाला, ‘महोदय, मी शांत बसून अंदाज घेत होतो. गाडीच्या गतीमध्ये मला फरक जाणवला. रेल्वे रुळाच्या आवाजातील फरकही मला पुढील धोक्याची सूचना करत होता.’

सुरक्षारक्षकांनी त्याला घेऊन रेल्वे रुळांची पाहणी केली, तर खरोखरच काही अंतरावर रुळांचे नटबोल्ट उखडले होते. इतर प्रवासी आता मात्र या व्यक्तीने एवढ्या मोठ्या अपघातातून सर्व लोकांचे प्राण वाचवले म्हणून त्याचे कौतुक करू लागले.

कोण बरे होते ते? ते होते एक इंजिनीअर. त्यांचे नाव होते ‘मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या.’

वैज्ञानिकांच्या पंक्तीत इंजिनीअर (अभियंते) कसे काय बसू शकतात, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. खरे म्हणजे स्थापत्य क्षेत्रातही अनेक नवनवीन शोध लागत असतात. त्यामध्ये प्रतिभावान अशा अभियंत्यांचे बौद्धिक योगदान महत्त्वपूर्ण असते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत निर्माण आणि विकास यामध्ये इंजिनीअर तंत्रज्ञांची कुशलता महत्त्वाची ठरली आहे. यामध्ये महत्त्वाचा वाटा होता तो भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रेणादायी वाटचालीचा.

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या म्हणजेच एमव्ही… अभियांत्रिकी, पाणी व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, औद्योगिकीकरण व शिक्षण व्यवस्थापनातील एक अलौकिक असे व्यक्तिमत्त्व! त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी म्हैसूर प्रांतातील मुदेनाहल्ली या गावात झाला. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री वेदविद्येचे प्रकांड पंडित व आयुर्वेदतज्ज्ञ होते.

असेच एकदा शास्त्रीजी गंगावतरणाची गोष्ट सांगत होते. सात-आठ वर्षांच्या विश्वेश्वरैय्याच्या मनात या गोष्टीने घर केले. भगीरथाच्या प्रयत्नाने गंगा पृथ्वीवर आली, ही गोष्ट त्याने आपल्यासाठी आदर्श मानली. ज्ञान, आत्मविश्वास आणि साधनेच्या बळावर माणूस एखाद्या नदीची दिशा बदलू शकतो, गंगेला भागीरथी बनवू शकतो, हे त्यांना कळले. त्यांनी मन लावून अभ्यास केला. माध्यमिक शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांच्यातील दडलेल्या भगीरथामुळे त्यांनी पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८८३मध्ये इंजिनीअर होऊन सहायक अभियंता या पदावरून त्यांनी श्रीगणेशा केला. पुढे एकेक यशोशिखर पादाक्रांत करत गेले. नदीचा प्रवाह जसा पुढे पुढे जातो, तसे विश्वेश्वरय्या यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. सिंधू नदीवर धरण बांधले. या धरणामुळे दक्षिणेतील पठारी भागात सिंचनाची सोय तर झालीच, शिवाय सक्कर शहराला पाणीपुरवठाही होऊ लागला.

ते पुण्याच्या खडकवासला धरणाचे अभियंता असतानाची एक गोष्ट आहे. त्या काळी पुण्यामध्ये पाण्याची फार टंचाई होती. धरणासाठी ऑटोमॅटिक गेट सिस्टीम म्हणजे ‘स्वयंचलित दरवाजे’ हा एकमेव पर्याय होता; पण ग्रामीण भागात विजेशिवाय स्वयंचलित दरवाजे ही कल्पना म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट होती; मात्र ‘सर एमव्हीं’नी विज्ञानाच्या नियमांचा केवळ अभ्यासच केला नव्हता, तर ते नियम आपल्या रोजच्या जीवनात उतरवले होते. ‘पाण्यात बुडल्यानंतर कोणत्याही पदार्थाचे द्रव्यमान कमी होते,’ या विज्ञानाच्या साध्या नियमाचा त्यांनी खडकवासला धरणाचे दरवाजे बांधताना उपयोग करून घेतला. त्यासाठी त्यांनी दोर, गेट, डक्ट आणि प्रतिवजनाचा आधार घेतला. पाण्याचा दाब वाढला की पाणी डक्टमध्ये येते आणि प्रतिवजन कमी झाल्याने दरवाजे आपोआपच उघडतात. पाणी ओसरले, की प्रतिवजन पूर्वपदावर येते आणि दरवाजे आपोआप बंद होतात. विजेशिवाय चालणारे हे स्वयंचलित दरवाजे म्हणजे धरणक्षेत्रात नवीन क्रांतीच होती. या तंत्राचे पेटंट त्यांच्या नावे झाले; पण देशप्रेम व जनसेवा या गुणांमुळे या पेटंटचे पैसे घेण्यास त्यांनी नकार दिला.

सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था त्या काळी नसल्याने ते सांडपाणी नदीच्या पाण्यात जाऊन पाणी दूषित होते, ही मोठी समस्या होती. अशा दूषित पाण्यामुळे प्लेग, नारू, अतिसार असे साथीचे रोग फैलावण्याचा सतत धोका असे. यावर उपाय म्हणून ‘सर एमव्हीं’नी बंद पाइपमधून शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना तयार केली. भारतातील २१ शहरांसाठी पाणीपुरवठ्याच्या योजना त्यांनी आखल्या आणि प्रत्यक्षातही उतरविल्या. सॅनिटरिंग इंजिनीअरिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना ‘सर एमव्हीं’ नी हैदराबाद, कराची आणि दक्षिण आफ्रिकेत एडन शहरासाठी मलनि:सारणाची भूमिगत योजना आखून दिली.

त्या काळी शेतीची सारी मदार पावसावर असे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि जलविद्युत निर्मिती ही काळाची गरज होती. ही गरज ओळखून त्यांनी निरा नदीच्या किनारी सिंचनासाठी ब्लॉक व्यवस्थेची सुरुवात केली. या व्यवस्थेमध्ये पाण्याचे वितरण शास्त्रीय पद्धतीने केले गेले. त्यामुळे प्रभागाच्या एक तृतीयांश क्षेत्रात उसाचे व दोन तृतीयांश क्षेत्रात रब्बी आणि खरीपाची पीके घेता येऊ लागली. ही योजना तात्कालिक नव्हे, तर सार्वकालिक ठरली.

सर विश्वेश्वरय्या हे केवळ अभियंताच नव्हते, तर ते एक पर्यावरणतज्ज्ञ आणि हळव्या मनाचे छायावादी कवीही होते. त्याच भावनेतून त्यांनी प्रत्येक धरण आणि जलाशयाच्या आसपास उद्याने व वॉक वे तयार केले. प्रचंड मोठा पाणीसाठा आणि दूरवर पसरलेली हिरवाई! ‘स्वच्छ शहर, हरित शहर’ ही घोषणा बहुधा यातूनच आली असावी. कृष्णराजसागर धरण आणि वृंदावन गार्डन यांमुळेच ‘सर एमव्हीं’ना ‘आधुनिक म्हैसूरचे जनक’ असे म्हटले जाते. विश्वासार्हता, व्यवस्थापन कौशल्य, समर्पण वृत्ती आणि प्रामाणिकपणा या अद्वितीय गुणांमुळे म्हैसूरच्या महाराजांनी १९१२मध्ये त्यांची राज्याच्या दिवाणपदी नियुक्ती केली. दिवाण म्हणून काम करताना त्यांनी उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली.

विकासासाठी, दळणवळणासाठी उत्तम व्यवस्था अपरिहार्य आहे, या विचाराने त्यांनी राज्यात रेल्वे सुविधेचे नवे जाळे विणले. तिरुमाला ते तिरुपती हा रस्तेमार्गही त्यांचीच देणगी. ‘सर एमव्हीं’चे जीवन म्हणजे जणू वाहता प्रवाहच! कुठेही ओंजळीतून पाणी घ्या, ते निर्मळ अमृतासारखेच असणार. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. सातहून अधिक संस्थांची मानद डॉक्टरेट त्यांना मिळाली. सुमारे दोन डझन संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. ब्रिटिश सरकारचा सीआयई हा बहुमान त्यांना मिळाला. १९५५मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

आपल्या देशाच्या विकासालाच त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. भारतीय संस्कृती सहकार्य आणि कार्यकौशल्याचे जणू प्रतीक म्हणजे सर एमव्ही. त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्यासारख्या इंजिनीअर्सच्या योगदानाचा गौरव म्हणून १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस सर्वत्र ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. सहायक अभियंता ते भारतरत्न हा सर विश्वेश्वरय्या यांचा अद्भुत प्रवास साधी राहणी व उच्च विचारसरणी हे तत्त्व अधोरेखित करतो.

 

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर.

प्राथमिक शिक्षक, जि. प. केंद्र शाळा मसुरे नं. १ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)

मोबाइल : ९४२०७ ३८३७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जन्म – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : जन्म – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मी जन्म १- कविता लिहिली, त्या गोष्टीला दहा वर्षं होऊन गेली.  सालातील शेवटच्या आकड्यांची उलटापालट झाली. १९७६ साल. या वर्षी खरोखरच गुलबकावलीचं फूल माझ्या उदरात वाढत होतं. प्रेशस बेबी म्हणून जसं खूप कौतुक होतं, तसंच देखभाल, काळजीही खूप होती. डॉ. श्रीदेवी पाटील या त्या काळातल्या निष्णात आणि लौकिकसंपन्न डॉक्टर होत्या. त्यांच्या दवाखान्यात महिना-दीड महिना बेड रेस्टसाठी रहावं लागलं होतं. मला तसं काहीच होत नव्हतं, पण तसं डॉक्टरांना म्हंटलं की त्या म्हणायच्या, `तुला काही होतय म्हणून नव्हे, काही होऊ नये म्हणून दवाखान्यात ठेवलय.’ या काळात मला कथांचे अनेक विषय मिळाले आणि त्यानंतर काही काळाने मी कथालेखन सुरू केलं.

अखेर प्रसूतीचा काळ जवळ आला. मी दिवसभर कळा देत होते. पण फारशी काही प्रगती नव्हती. संध्याकाळची पाच- साडे पाचची वेळ असेल. मला कळा येण्याचं इंजक्शन दिलं आणि लेबर टेबलवर घेतलं. दोन कळातलं अंतर कमी होत होतं, पण म्हणावी तशी प्रगती नव्हती.

एवढ्यात हॉस्पिटलच्या दारात एक रिक्षा उभी राहिली. त्यातून दोन महिला उतरल्या. एकीचा चेहरा वेदनेने पिळवटलेला. दुसरी तिला धरून आता आणत होती. ती बहुधा तिची आई असावी.

तिला पाहिल्याबरोबर नर्सनी मला लेबर टेबलवरून खाली उतरवलं आणि तिला टेबलवर घेतलं. आकांती वेदनेनं ती किंचाळली. एकदा… दोनदा… आणि नर्सच्या हातात तिचं बाळ होतं. मी विस्मित होऊन तिच्याकडे पाहत राहिले. कळा द्यायचीच विसरून गेले. नंतर तिला रूममध्ये हलवलं आणि मला टेबलवर घेतलं. मी कळा देत होते पण डोळ्यापुढे मात्र तिची प्रसूती होती. मनात शब्द उतरत होते-

 

पापणीवर उतरणारा गडद अंधार

प्रकाशाची भिरभिरणारी वलयं

त्यात विरघळून गेलेली.

झुलत्या पुलावरची अरुंद निसरडी वाट

अजूनही सरत नाही.

दोन्ही बाजूच्या खोल डोहात पसरलीय

गूढ, भयाण आकारहीन सावली.

पायातलं सारं बळ ओसरलय..

प्राण कासावीस झालेत, श्वास कोंडलेत.

दूरच्या सुरक्षित निवांत किनार्‍यावरून वळलेल्या नजरा कुजबुजताहेत,

इतकं का अवघड आहे सारं?

थोडं सोसायला हवं…सोसायलाच हवं.

एवढा बाऊ कशासाठी?

काहीच कळत नाही… उमजत नाही. अपराध्यासारखं वाटतय.

पण अंगातलं सारं त्राण सरलय.

आणि इतक्यात…

मायेने ओलावलेला गहिरा स्वर

अंगभर थरथरत जातो संजीवनी होऊन.

सारी वाटचाल सरलीय… आता फक्त वितीचं अंतर

एवढी एकच कळ… एवढंच… थोडा धीर धर…

मरगळलेल्या प्राणात पेटतात पुन्हा चैतन्याचे पलिते

जीवाच्या कराराने घेतली जाते एक साक्षात्कारी झेप

आणि त्याच सुरक्षित किनार्‍यावर टेकतात पाय

छातीशी बिलगलेल्या नन्ह्या फरिश्त्याचं वरदान घेऊन.

तिने बाळाला जन्म दिला होता. मी कवितेला. असा त्यावेळी माझ्या बाळाच्या जन्माआधी माझ्या `जन्म’ कवितेचा जन्म झाला होता.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सागरतीरी ☆ श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

☆ विविधा :  सागरतीरी – श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण 

“सागरकिनारी”

मी परवा  असाच एकटा समुद्राकाठी बसलो होतो. आजूबाजूला बरेचजणं होते,कोणी खेळत होते, हातात हात घेऊन एकमेकांच्या प्रेमात गुंतून गेले होते, कोणी भेळ खात होते वगैरे वगैरे !!!

जवळच एक जोडपं बसलं होतं,एकमेकांपासून बर्या पैकी अंतरावर…..बहूधा नवविवाहित आणि तेही arranged marriage वालं असावं. तो बोलत असताना तिची मान खाली आणि ती बोलत असताना  त्याचे डोळे तिच्या चेहर्यावर थबकलेले.

थोड्या वेळाने दोघांनी एकमेकांकडे पहात पहात वाळूवर एकमेकांची नावे कोरली आणि पहात राहीले…. तो तिच्या नावाकडे आणि ती त्याच्या…..दोघेही भावी आयुष्यातील स्वप्नात जणू बुडून गेले होते. आजूबाजूला काय घडतंय याची त्यांना जाणीवही नव्हती….. असाच बराच वेळ झाला….आणि दोघेही अचानक भानावर आले………भरतीच्या लाटेनं कधी गाठलं ते कळलंच नाही. त्याच लाटेनं त्या जोडप्यानं कोरलेली नांवेही पुसून टाकली. दोघेही सावकाश उठले. हातात हात गुंफले… ती त्याच्या दंडावर डोकं टेकवून  बिलगली आणि दोघंही चालू लागले.

मी मात्र सुन्न झालो होतो नि संतापलो समुद्राच्या या कृतघ्नपणाला…..खरंतर ते दोघेही माझे कोणीही नव्हते….तरीही मला वाटलं..त्या दोघांच्या नाजूक भावनांशी खेळायचा समुद्राला काय अधिकार???? आणि थेट समुद्रालाच तो सवाल ठोकला……

समुद्राला खळाळून हासू फुटलं….. आणि मला उत्तरला……अरे वेड्या, हे तुझ्या मनाचे खेळ आहेत. तुला काय वाटलं त्यांनी कोरलेली नावं माझ्या लाटेनं पुसून टाकली?? अरे, ते दोघे इथून जाताना पाहीलं नाहीस????

त्याने तीचा हात हाती घेतला….प्रेमानं आणि तीही त्याच्या दंडावर विसावली….विश्वासानं. यालाच संसार म्हणतात,हेच खरं प्रेम असतं,यातंच सार्या आयुष्याचं सुख दडलेलं असतं. तुला वाटत असेल माझी लाट भुसभूशीत वाळूवर रेखाटलेली नावं पुसून टाकते. अरे हट… इथून जाणारं प्रत्येक जोडपं घेऊन जातं असं प्रेम कि जे माझ्यासारखं  अथांग आहे, तितकंच गहीरं आहे……ऊथळ नाही. काही कालानंतर हेच जोडपं पुन्हा इथं येईल, ते आपल्या चिमुकल्याला घेवून. त्यावेळी ते बांधतील वाळूत एक चिमुकलं घर….पुन्हा माझी लाट ते घर माझ्यात सामावून घेईल….पण ते आईबाबा नाराज नाही होणार कारण त्यांनी केलेलं घर विश्वास आणि प्रेमाच्या धाग्यांत घट्ट आहे. कोणतीही लाट ते उध्वस्त नाही करू शकणार……

पायावर आलेल्या लाटेच्या स्पर्शाने मी भानावर आलो…..खूप खूप सुखावलो…..आणि  लक्षात आलं……समुद्र कधीच काहीच उध्वस्त करत नाही……उध्वस्त करतात ती माणसांना न कळलेली एकमेकांची मनं!!!!! आणि इतके दिवस जे मला वाटतं होतं कि  कांहीतरी चुकतंय माझ …..आज अचानक मला जाणवलं….कांही  नावं पुसून टाकण्यांन सुखाच्या लाटा आयुष्यात येत असतात.

हे सागरा…..शतशः धन्यवाद!!!

 

© राजीव पुरुषोत्तम दिवाण

बदलापूर(ठाणे)

फोन:९६१९४२५१५१

वॉट्स ऍप :८२०८५६७०४०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जन्म-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : जन्म – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

या गोष्टीला खूप म्हणजे खूपच वर्षं झाली. पण काही वेळा स्मृतीच्या तळातून ती अचानक वर उसळून येते. १९६७ सालची गोष्ट. त्या वर्षी मी बी.एड. करत होते.फेबु्रवारी महिना. आमचा फायनल लेसन प्लॅन लागला होता. परीक्षेच्या वेळी पहिल्या दिवशी पहिलाच माझा मराठीचा लेसन होता. युनीट कोणत घ्यावं, कसा लेसन घ्यावा इ. विचार स्वाभाविकपणेच मनात घोळत होते. लेसनसाठी पाठ्य पुस्तकातील कविता निवडावी, की बाहेरची? असं सगळं विचार मंथन चालू होतं. त्यातच माझी मासिक पाळी सुरू झाली. यावेळी चार-पाच दिवस उशीर झाला होता. तरी पाठपरीक्षेपूर्वी ३-४ दिवस सहज सगळं निपटलं असतं. पण यावेळी नेहमीप्रमाणे चार-पाच दिवसानंतरही ब्लिडींग थांबेना. मग मात्र धाब दणाणलं. पाठ परीक्षा हातची गेलीच बहुतेक, असं म्हणत डॉक्टरांकडे गेले.

डॉ. श्रीनिवास वाटवे हे त्या वेळचे नावाजलेले गायनॅकॉलॉजीस्ट. त्यांना दाखवले. त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी `क्युरेटिन’चा सल्ला दिला. संध्याकाळी अ‍ॅडमिट झाले. रात्री सात-साडे सातला क्युरेटीन होणार होते. त्याप्रमाणे मला प्रिपेअर करून टेबलवर घेतले. तिथे भिंतीला लागून असलेल्या शो-केसमध्ये सर्जरीची साधने होती. वेगवेगळ्या आकाराच्या सुर्‍या, कात्र्या, चाकू , सुया, पकडी आणखी किती तरी. लखलखित. चकचकित.

अ‍ॅनॅस्थेशिया देणारे डाक्टर अद्याप यायचे होते. त्यामुळे डॉक्टर, सहाय्यक, नर्सेस सगळी मंडळी डॉक्टरांची वाट बाहेर उभे होते. रूममध्ये टेबलावर फक्त मी आणि भोवतीनं शो-केसमधली लखलखित साधने. हत्यारे.

मी मनाशी पाठाबद्दलचा विचार करायचे ठरवत होते. कशी सुरुवात करायची्… कोणते प्रश्न विचारायचे? वगैरे… वगैरे… पण त्यातलं काही डोक्यात येतच नव्हतं. भरकटलेल्या विचारांना शब्द मिळत गेले-

 

घटका भरत आलेली

जीवघेणी कळ

मस्तक भेदून गेलेली

ललाटीची रेषा,

वाट हरवून बसलेली

घड्याळाची टिक टिक

जिण्याचा तोल साधत

सांडत असलेली

 

इतक्यात डॉक्टर आले. मला भूल दिली गेली. डॉक्टरांनी आपलं काम पूर्ण केलं.

काही वेळाने माझी भूल उतरली. भूल उतरता उतरताही मगाच्याच ओळी मनावर उमटत राहिल्या. त्या पुसून मी पुन्हा पाठाचा विचार करू लागले. पण तो विचार मनातून हद्दपारच झाला. त्याच्याच पुढच्या ओळी प्रगटत राहिल्या.

 

इथरची बाधा

नसानसातून शरीरभर भिनलेली…

लाल… हिरवी… पिवळी… निळी वर्तुळं

काळवंडत गेलेली…

पांढर्‍या शुभ्र ठिपक्यांच्या

लयबद्ध हालचाली.

पाजळत्या रक्तपिपासू हत्यारांची

लांबच लांब पसरलेली

अशुभ सावली.

संज्ञा बधीर होताना

सारं सारं दूर सरतय.

रक्तात उमलणार्‍या

गुलबकावलीचं हसू,

लाटालाटांनी मनभर उसळतय.

अणूरेणू व्यापून उरतय.

 

इथे माझ्या नेणिवेने क्युरेटिनचं `सिझेरियन केलं होतं आणि कल्पनेनं गुलबकावलीचं फूल माझ्या ओंजळीत ठेवलं होतं. माझ्या `जन्म’ या कवितेचा जन्म अशा रीतीने तिथे ऑपरेशन टेबलवर झाला.

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print