मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एम्. विश्वेश्वरय्या ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

 ☆ इंद्रधनुष्य ☆ एम्. विश्वेश्वरय्या ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता होती, त्या वेळची गोष्ट आहे. खचाखच भरलेली एक रेल्वेगाडी चालली होती. इंग्रज प्रवाशांची संख्या जास्त होती. एका डब्यात एक प्रवासी गंभीर चेहरा करून बसला होता. रंगाने सावळा, देहयष्टीने साधारण, पोशाखही सामान्यच! त्यामुळे डब्यातील इतर इंग्रज प्रवासी त्याची कुचेष्टा करत होते; पण कोणाच्याही चेष्टेकडे त्याचे लक्ष नव्हते. अचानक त्याने उठून रेल्वेची साखळी खेचली. वेगात जाणारी रेल्वे तात्काळ काही अंतरावर थांबली. सर्व प्रवासी त्याला ओरडू लागले. थोड्या वेळाने रेल्वेचे सुरक्षा रक्षक तेथे आले व त्यांनी विचारले, ‘साखळी कोणी व का खेचली?’ त्या व्यक्तीने उत्तर दिले, ‘मी खेचली साखळी. माझा अंदाज आहे, साधारण एक फर्लांग अंतरावर रेल्वेचे रुळ उखडले आहेत.’

सुरक्षारक्षकाने आश्चर्याने विचारले, ‘तुम्हाला कसे काय कळले?’ तो म्हणाला, ‘महोदय, मी शांत बसून अंदाज घेत होतो. गाडीच्या गतीमध्ये मला फरक जाणवला. रेल्वे रुळाच्या आवाजातील फरकही मला पुढील धोक्याची सूचना करत होता.’

सुरक्षारक्षकांनी त्याला घेऊन रेल्वे रुळांची पाहणी केली, तर खरोखरच काही अंतरावर रुळांचे नटबोल्ट उखडले होते. इतर प्रवासी आता मात्र या व्यक्तीने एवढ्या मोठ्या अपघातातून सर्व लोकांचे प्राण वाचवले म्हणून त्याचे कौतुक करू लागले.

कोण बरे होते ते? ते होते एक इंजिनीअर. त्यांचे नाव होते ‘मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या.’

वैज्ञानिकांच्या पंक्तीत इंजिनीअर (अभियंते) कसे काय बसू शकतात, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. खरे म्हणजे स्थापत्य क्षेत्रातही अनेक नवनवीन शोध लागत असतात. त्यामध्ये प्रतिभावान अशा अभियंत्यांचे बौद्धिक योगदान महत्त्वपूर्ण असते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत निर्माण आणि विकास यामध्ये इंजिनीअर तंत्रज्ञांची कुशलता महत्त्वाची ठरली आहे. यामध्ये महत्त्वाचा वाटा होता तो भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रेणादायी वाटचालीचा.

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या म्हणजेच एमव्ही… अभियांत्रिकी, पाणी व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, औद्योगिकीकरण व शिक्षण व्यवस्थापनातील एक अलौकिक असे व्यक्तिमत्त्व! त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी म्हैसूर प्रांतातील मुदेनाहल्ली या गावात झाला. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री वेदविद्येचे प्रकांड पंडित व आयुर्वेदतज्ज्ञ होते.

असेच एकदा शास्त्रीजी गंगावतरणाची गोष्ट सांगत होते. सात-आठ वर्षांच्या विश्वेश्वरैय्याच्या मनात या गोष्टीने घर केले. भगीरथाच्या प्रयत्नाने गंगा पृथ्वीवर आली, ही गोष्ट त्याने आपल्यासाठी आदर्श मानली. ज्ञान, आत्मविश्वास आणि साधनेच्या बळावर माणूस एखाद्या नदीची दिशा बदलू शकतो, गंगेला भागीरथी बनवू शकतो, हे त्यांना कळले. त्यांनी मन लावून अभ्यास केला. माध्यमिक शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांच्यातील दडलेल्या भगीरथामुळे त्यांनी पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८८३मध्ये इंजिनीअर होऊन सहायक अभियंता या पदावरून त्यांनी श्रीगणेशा केला. पुढे एकेक यशोशिखर पादाक्रांत करत गेले. नदीचा प्रवाह जसा पुढे पुढे जातो, तसे विश्वेश्वरय्या यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. सिंधू नदीवर धरण बांधले. या धरणामुळे दक्षिणेतील पठारी भागात सिंचनाची सोय तर झालीच, शिवाय सक्कर शहराला पाणीपुरवठाही होऊ लागला.

ते पुण्याच्या खडकवासला धरणाचे अभियंता असतानाची एक गोष्ट आहे. त्या काळी पुण्यामध्ये पाण्याची फार टंचाई होती. धरणासाठी ऑटोमॅटिक गेट सिस्टीम म्हणजे ‘स्वयंचलित दरवाजे’ हा एकमेव पर्याय होता; पण ग्रामीण भागात विजेशिवाय स्वयंचलित दरवाजे ही कल्पना म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट होती; मात्र ‘सर एमव्हीं’नी विज्ञानाच्या नियमांचा केवळ अभ्यासच केला नव्हता, तर ते नियम आपल्या रोजच्या जीवनात उतरवले होते. ‘पाण्यात बुडल्यानंतर कोणत्याही पदार्थाचे द्रव्यमान कमी होते,’ या विज्ञानाच्या साध्या नियमाचा त्यांनी खडकवासला धरणाचे दरवाजे बांधताना उपयोग करून घेतला. त्यासाठी त्यांनी दोर, गेट, डक्ट आणि प्रतिवजनाचा आधार घेतला. पाण्याचा दाब वाढला की पाणी डक्टमध्ये येते आणि प्रतिवजन कमी झाल्याने दरवाजे आपोआपच उघडतात. पाणी ओसरले, की प्रतिवजन पूर्वपदावर येते आणि दरवाजे आपोआप बंद होतात. विजेशिवाय चालणारे हे स्वयंचलित दरवाजे म्हणजे धरणक्षेत्रात नवीन क्रांतीच होती. या तंत्राचे पेटंट त्यांच्या नावे झाले; पण देशप्रेम व जनसेवा या गुणांमुळे या पेटंटचे पैसे घेण्यास त्यांनी नकार दिला.

सांडपाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था त्या काळी नसल्याने ते सांडपाणी नदीच्या पाण्यात जाऊन पाणी दूषित होते, ही मोठी समस्या होती. अशा दूषित पाण्यामुळे प्लेग, नारू, अतिसार असे साथीचे रोग फैलावण्याचा सतत धोका असे. यावर उपाय म्हणून ‘सर एमव्हीं’नी बंद पाइपमधून शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना तयार केली. भारतातील २१ शहरांसाठी पाणीपुरवठ्याच्या योजना त्यांनी आखल्या आणि प्रत्यक्षातही उतरविल्या. सॅनिटरिंग इंजिनीअरिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना ‘सर एमव्हीं’ नी हैदराबाद, कराची आणि दक्षिण आफ्रिकेत एडन शहरासाठी मलनि:सारणाची भूमिगत योजना आखून दिली.

त्या काळी शेतीची सारी मदार पावसावर असे. पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि जलविद्युत निर्मिती ही काळाची गरज होती. ही गरज ओळखून त्यांनी निरा नदीच्या किनारी सिंचनासाठी ब्लॉक व्यवस्थेची सुरुवात केली. या व्यवस्थेमध्ये पाण्याचे वितरण शास्त्रीय पद्धतीने केले गेले. त्यामुळे प्रभागाच्या एक तृतीयांश क्षेत्रात उसाचे व दोन तृतीयांश क्षेत्रात रब्बी आणि खरीपाची पीके घेता येऊ लागली. ही योजना तात्कालिक नव्हे, तर सार्वकालिक ठरली.

सर विश्वेश्वरय्या हे केवळ अभियंताच नव्हते, तर ते एक पर्यावरणतज्ज्ञ आणि हळव्या मनाचे छायावादी कवीही होते. त्याच भावनेतून त्यांनी प्रत्येक धरण आणि जलाशयाच्या आसपास उद्याने व वॉक वे तयार केले. प्रचंड मोठा पाणीसाठा आणि दूरवर पसरलेली हिरवाई! ‘स्वच्छ शहर, हरित शहर’ ही घोषणा बहुधा यातूनच आली असावी. कृष्णराजसागर धरण आणि वृंदावन गार्डन यांमुळेच ‘सर एमव्हीं’ना ‘आधुनिक म्हैसूरचे जनक’ असे म्हटले जाते. विश्वासार्हता, व्यवस्थापन कौशल्य, समर्पण वृत्ती आणि प्रामाणिकपणा या अद्वितीय गुणांमुळे म्हैसूरच्या महाराजांनी १९१२मध्ये त्यांची राज्याच्या दिवाणपदी नियुक्ती केली. दिवाण म्हणून काम करताना त्यांनी उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली.

विकासासाठी, दळणवळणासाठी उत्तम व्यवस्था अपरिहार्य आहे, या विचाराने त्यांनी राज्यात रेल्वे सुविधेचे नवे जाळे विणले. तिरुमाला ते तिरुपती हा रस्तेमार्गही त्यांचीच देणगी. ‘सर एमव्हीं’चे जीवन म्हणजे जणू वाहता प्रवाहच! कुठेही ओंजळीतून पाणी घ्या, ते निर्मळ अमृतासारखेच असणार. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. सातहून अधिक संस्थांची मानद डॉक्टरेट त्यांना मिळाली. सुमारे दोन डझन संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. ब्रिटिश सरकारचा सीआयई हा बहुमान त्यांना मिळाला. १९५५मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

आपल्या देशाच्या विकासालाच त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. भारतीय संस्कृती सहकार्य आणि कार्यकौशल्याचे जणू प्रतीक म्हणजे सर एमव्ही. त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांच्यासारख्या इंजिनीअर्सच्या योगदानाचा गौरव म्हणून १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस सर्वत्र ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. सहायक अभियंता ते भारतरत्न हा सर विश्वेश्वरय्या यांचा अद्भुत प्रवास साधी राहणी व उच्च विचारसरणी हे तत्त्व अधोरेखित करतो.

 

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर.

प्राथमिक शिक्षक, जि. प. केंद्र शाळा मसुरे नं. १ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)

मोबाइल : ९४२०७ ३८३७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जन्म – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : जन्म – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

मी जन्म १- कविता लिहिली, त्या गोष्टीला दहा वर्षं होऊन गेली.  सालातील शेवटच्या आकड्यांची उलटापालट झाली. १९७६ साल. या वर्षी खरोखरच गुलबकावलीचं फूल माझ्या उदरात वाढत होतं. प्रेशस बेबी म्हणून जसं खूप कौतुक होतं, तसंच देखभाल, काळजीही खूप होती. डॉ. श्रीदेवी पाटील या त्या काळातल्या निष्णात आणि लौकिकसंपन्न डॉक्टर होत्या. त्यांच्या दवाखान्यात महिना-दीड महिना बेड रेस्टसाठी रहावं लागलं होतं. मला तसं काहीच होत नव्हतं, पण तसं डॉक्टरांना म्हंटलं की त्या म्हणायच्या, `तुला काही होतय म्हणून नव्हे, काही होऊ नये म्हणून दवाखान्यात ठेवलय.’ या काळात मला कथांचे अनेक विषय मिळाले आणि त्यानंतर काही काळाने मी कथालेखन सुरू केलं.

अखेर प्रसूतीचा काळ जवळ आला. मी दिवसभर कळा देत होते. पण फारशी काही प्रगती नव्हती. संध्याकाळची पाच- साडे पाचची वेळ असेल. मला कळा येण्याचं इंजक्शन दिलं आणि लेबर टेबलवर घेतलं. दोन कळातलं अंतर कमी होत होतं, पण म्हणावी तशी प्रगती नव्हती.

एवढ्यात हॉस्पिटलच्या दारात एक रिक्षा उभी राहिली. त्यातून दोन महिला उतरल्या. एकीचा चेहरा वेदनेने पिळवटलेला. दुसरी तिला धरून आता आणत होती. ती बहुधा तिची आई असावी.

तिला पाहिल्याबरोबर नर्सनी मला लेबर टेबलवरून खाली उतरवलं आणि तिला टेबलवर घेतलं. आकांती वेदनेनं ती किंचाळली. एकदा… दोनदा… आणि नर्सच्या हातात तिचं बाळ होतं. मी विस्मित होऊन तिच्याकडे पाहत राहिले. कळा द्यायचीच विसरून गेले. नंतर तिला रूममध्ये हलवलं आणि मला टेबलवर घेतलं. मी कळा देत होते पण डोळ्यापुढे मात्र तिची प्रसूती होती. मनात शब्द उतरत होते-

 

पापणीवर उतरणारा गडद अंधार

प्रकाशाची भिरभिरणारी वलयं

त्यात विरघळून गेलेली.

झुलत्या पुलावरची अरुंद निसरडी वाट

अजूनही सरत नाही.

दोन्ही बाजूच्या खोल डोहात पसरलीय

गूढ, भयाण आकारहीन सावली.

पायातलं सारं बळ ओसरलय..

प्राण कासावीस झालेत, श्वास कोंडलेत.

दूरच्या सुरक्षित निवांत किनार्‍यावरून वळलेल्या नजरा कुजबुजताहेत,

इतकं का अवघड आहे सारं?

थोडं सोसायला हवं…सोसायलाच हवं.

एवढा बाऊ कशासाठी?

काहीच कळत नाही… उमजत नाही. अपराध्यासारखं वाटतय.

पण अंगातलं सारं त्राण सरलय.

आणि इतक्यात…

मायेने ओलावलेला गहिरा स्वर

अंगभर थरथरत जातो संजीवनी होऊन.

सारी वाटचाल सरलीय… आता फक्त वितीचं अंतर

एवढी एकच कळ… एवढंच… थोडा धीर धर…

मरगळलेल्या प्राणात पेटतात पुन्हा चैतन्याचे पलिते

जीवाच्या कराराने घेतली जाते एक साक्षात्कारी झेप

आणि त्याच सुरक्षित किनार्‍यावर टेकतात पाय

छातीशी बिलगलेल्या नन्ह्या फरिश्त्याचं वरदान घेऊन.

तिने बाळाला जन्म दिला होता. मी कवितेला. असा त्यावेळी माझ्या बाळाच्या जन्माआधी माझ्या `जन्म’ कवितेचा जन्म झाला होता.

 

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सागरतीरी ☆ श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

☆ विविधा :  सागरतीरी – श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण 

“सागरकिनारी”

मी परवा  असाच एकटा समुद्राकाठी बसलो होतो. आजूबाजूला बरेचजणं होते,कोणी खेळत होते, हातात हात घेऊन एकमेकांच्या प्रेमात गुंतून गेले होते, कोणी भेळ खात होते वगैरे वगैरे !!!

जवळच एक जोडपं बसलं होतं,एकमेकांपासून बर्या पैकी अंतरावर…..बहूधा नवविवाहित आणि तेही arranged marriage वालं असावं. तो बोलत असताना तिची मान खाली आणि ती बोलत असताना  त्याचे डोळे तिच्या चेहर्यावर थबकलेले.

थोड्या वेळाने दोघांनी एकमेकांकडे पहात पहात वाळूवर एकमेकांची नावे कोरली आणि पहात राहीले…. तो तिच्या नावाकडे आणि ती त्याच्या…..दोघेही भावी आयुष्यातील स्वप्नात जणू बुडून गेले होते. आजूबाजूला काय घडतंय याची त्यांना जाणीवही नव्हती….. असाच बराच वेळ झाला….आणि दोघेही अचानक भानावर आले………भरतीच्या लाटेनं कधी गाठलं ते कळलंच नाही. त्याच लाटेनं त्या जोडप्यानं कोरलेली नांवेही पुसून टाकली. दोघेही सावकाश उठले. हातात हात गुंफले… ती त्याच्या दंडावर डोकं टेकवून  बिलगली आणि दोघंही चालू लागले.

मी मात्र सुन्न झालो होतो नि संतापलो समुद्राच्या या कृतघ्नपणाला…..खरंतर ते दोघेही माझे कोणीही नव्हते….तरीही मला वाटलं..त्या दोघांच्या नाजूक भावनांशी खेळायचा समुद्राला काय अधिकार???? आणि थेट समुद्रालाच तो सवाल ठोकला……

समुद्राला खळाळून हासू फुटलं….. आणि मला उत्तरला……अरे वेड्या, हे तुझ्या मनाचे खेळ आहेत. तुला काय वाटलं त्यांनी कोरलेली नावं माझ्या लाटेनं पुसून टाकली?? अरे, ते दोघे इथून जाताना पाहीलं नाहीस????

त्याने तीचा हात हाती घेतला….प्रेमानं आणि तीही त्याच्या दंडावर विसावली….विश्वासानं. यालाच संसार म्हणतात,हेच खरं प्रेम असतं,यातंच सार्या आयुष्याचं सुख दडलेलं असतं. तुला वाटत असेल माझी लाट भुसभूशीत वाळूवर रेखाटलेली नावं पुसून टाकते. अरे हट… इथून जाणारं प्रत्येक जोडपं घेऊन जातं असं प्रेम कि जे माझ्यासारखं  अथांग आहे, तितकंच गहीरं आहे……ऊथळ नाही. काही कालानंतर हेच जोडपं पुन्हा इथं येईल, ते आपल्या चिमुकल्याला घेवून. त्यावेळी ते बांधतील वाळूत एक चिमुकलं घर….पुन्हा माझी लाट ते घर माझ्यात सामावून घेईल….पण ते आईबाबा नाराज नाही होणार कारण त्यांनी केलेलं घर विश्वास आणि प्रेमाच्या धाग्यांत घट्ट आहे. कोणतीही लाट ते उध्वस्त नाही करू शकणार……

पायावर आलेल्या लाटेच्या स्पर्शाने मी भानावर आलो…..खूप खूप सुखावलो…..आणि  लक्षात आलं……समुद्र कधीच काहीच उध्वस्त करत नाही……उध्वस्त करतात ती माणसांना न कळलेली एकमेकांची मनं!!!!! आणि इतके दिवस जे मला वाटतं होतं कि  कांहीतरी चुकतंय माझ …..आज अचानक मला जाणवलं….कांही  नावं पुसून टाकण्यांन सुखाच्या लाटा आयुष्यात येत असतात.

हे सागरा…..शतशः धन्यवाद!!!

 

© राजीव पुरुषोत्तम दिवाण

बदलापूर(ठाणे)

फोन:९६१९४२५१५१

वॉट्स ऍप :८२०८५६७०४०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जन्म-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ क्षण सृजनाचे : जन्म – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

या गोष्टीला खूप म्हणजे खूपच वर्षं झाली. पण काही वेळा स्मृतीच्या तळातून ती अचानक वर उसळून येते. १९६७ सालची गोष्ट. त्या वर्षी मी बी.एड. करत होते.फेबु्रवारी महिना. आमचा फायनल लेसन प्लॅन लागला होता. परीक्षेच्या वेळी पहिल्या दिवशी पहिलाच माझा मराठीचा लेसन होता. युनीट कोणत घ्यावं, कसा लेसन घ्यावा इ. विचार स्वाभाविकपणेच मनात घोळत होते. लेसनसाठी पाठ्य पुस्तकातील कविता निवडावी, की बाहेरची? असं सगळं विचार मंथन चालू होतं. त्यातच माझी मासिक पाळी सुरू झाली. यावेळी चार-पाच दिवस उशीर झाला होता. तरी पाठपरीक्षेपूर्वी ३-४ दिवस सहज सगळं निपटलं असतं. पण यावेळी नेहमीप्रमाणे चार-पाच दिवसानंतरही ब्लिडींग थांबेना. मग मात्र धाब दणाणलं. पाठ परीक्षा हातची गेलीच बहुतेक, असं म्हणत डॉक्टरांकडे गेले.

डॉ. श्रीनिवास वाटवे हे त्या वेळचे नावाजलेले गायनॅकॉलॉजीस्ट. त्यांना दाखवले. त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी `क्युरेटिन’चा सल्ला दिला. संध्याकाळी अ‍ॅडमिट झाले. रात्री सात-साडे सातला क्युरेटीन होणार होते. त्याप्रमाणे मला प्रिपेअर करून टेबलवर घेतले. तिथे भिंतीला लागून असलेल्या शो-केसमध्ये सर्जरीची साधने होती. वेगवेगळ्या आकाराच्या सुर्‍या, कात्र्या, चाकू , सुया, पकडी आणखी किती तरी. लखलखित. चकचकित.

अ‍ॅनॅस्थेशिया देणारे डाक्टर अद्याप यायचे होते. त्यामुळे डॉक्टर, सहाय्यक, नर्सेस सगळी मंडळी डॉक्टरांची वाट बाहेर उभे होते. रूममध्ये टेबलावर फक्त मी आणि भोवतीनं शो-केसमधली लखलखित साधने. हत्यारे.

मी मनाशी पाठाबद्दलचा विचार करायचे ठरवत होते. कशी सुरुवात करायची्… कोणते प्रश्न विचारायचे? वगैरे… वगैरे… पण त्यातलं काही डोक्यात येतच नव्हतं. भरकटलेल्या विचारांना शब्द मिळत गेले-

 

घटका भरत आलेली

जीवघेणी कळ

मस्तक भेदून गेलेली

ललाटीची रेषा,

वाट हरवून बसलेली

घड्याळाची टिक टिक

जिण्याचा तोल साधत

सांडत असलेली

 

इतक्यात डॉक्टर आले. मला भूल दिली गेली. डॉक्टरांनी आपलं काम पूर्ण केलं.

काही वेळाने माझी भूल उतरली. भूल उतरता उतरताही मगाच्याच ओळी मनावर उमटत राहिल्या. त्या पुसून मी पुन्हा पाठाचा विचार करू लागले. पण तो विचार मनातून हद्दपारच झाला. त्याच्याच पुढच्या ओळी प्रगटत राहिल्या.

 

इथरची बाधा

नसानसातून शरीरभर भिनलेली…

लाल… हिरवी… पिवळी… निळी वर्तुळं

काळवंडत गेलेली…

पांढर्‍या शुभ्र ठिपक्यांच्या

लयबद्ध हालचाली.

पाजळत्या रक्तपिपासू हत्यारांची

लांबच लांब पसरलेली

अशुभ सावली.

संज्ञा बधीर होताना

सारं सारं दूर सरतय.

रक्तात उमलणार्‍या

गुलबकावलीचं हसू,

लाटालाटांनी मनभर उसळतय.

अणूरेणू व्यापून उरतय.

 

इथे माझ्या नेणिवेने क्युरेटिनचं `सिझेरियन केलं होतं आणि कल्पनेनं गुलबकावलीचं फूल माझ्या ओंजळीत ठेवलं होतं. माझ्या `जन्म’ या कवितेचा जन्म अशा रीतीने तिथे ऑपरेशन टेबलवर झाला.

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अहंकार ☆ डाॅ मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ अहंकार ☆ डाॅ मेधा फणसळकर ☆ 

मनुष्याला ‛मी’ पण मिळवून देणारा सार्थ शब्द म्हणजे ‛अहंकार’! मनुष्य हा बुद्धिवादी प्राणी आहे. म्हणूनच इतर पशु- पक्ष्यांपेक्षा तो वेगळा गणला जातो. आपल्या भावना तो आपल्या संवादातून , कृतीतून व्यक्त करु शकतो. म्हणूनच  जिथे सुख आहे तिथे दुःख, जिथे प्रेम आहे तिथे द्वेष आणि जिथे राग आहे तिथे लोभ हे हातात हात घालून असतात. त्यामुळेच जिथे स्वत्व आहे तिथे ‛अहम्’ असलाच पाहिजे असा अलिखित नियम आहे.

हा अहम् माणसाला कोणत्या स्तरापर्यंत पोहोचवू शकतो याची शेकडो उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात. या ‛अहम्’ नेच हिटलरचा बळी घेतला. जग जिंकणारा सिकंदर या ‛अहम्’ पुढेच नमला. आपल्या मुझद्दीपणाने अनेक लोकांचा बळी घेणारा औरंगजेबाचा  अहम् चा तोरा  संभाजीराजांसारख्या राष्ट्रनिष्ठ व्यक्तीच्या देशभक्तीपुढे फिका पडला. मात्र अहम् ला जिंकणारे या जगात अजरामर झाले.स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ,जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, मदर तेरेसा…… किती नावे घ्यावीत तेवढी थोडीच आहेत.

खरं तर मनुष्य जन्माला येताच त्याचा ‛को$हम्’ (मी कोण?) चा प्रवास सुरु होतो. परंतु ‛अहम् ब्रह्मा$स्मि’ (मी ब्रह्म आहे) पर्यंत सर्वांचा प्रवास होतोच असे नाही. त्यामुळे हा अहम् च आपण कुरवाळू लागतो.

लहान असताना आपण पंचतंत्रात एक गोष्ट वाचली होती . त्यामध्ये बेडकीची पिल्ले गाय बघून येतात आणि आईकडे तिचे वर्णन करतात. ती केवढी मोठी होती हे समजण्यासाठी ती स्वतःचे शरीर फुगवून “ एवढी मोठ्ठी का?”असे विचारते. तेव्हा मुले म्हणतात,“नाही, त्यापेक्षा मोठ्ठी!” मग बेडकी आणखी अंग फुगवते. पुन्हा विचारते, मुले पुन्हा नकार देतात, पुन्हा ती फुगते व फुगत फुगत शेवटी मरुन जाते. त्याचप्रमाणे आपण या अहम् चा  फुगा फुगवू लागतो. आपल्याच कौतुकात आपण मग्न होऊन जातो. त्यामध्ये आपण इतरांचा बळी घेतो आहोत हे लक्षातच येत नाही.मात्र कधीतरी या भ्रमाचा भोपळा फुटतो व आपण जमिनीवर येतो. पण त्यावेळी हातात  बाकी शून्य राहिलेली असते.

पण अहंकार सोडणे म्हणजे स्वाभिमान सोडणे नव्हे. जिथे गर्वाची भावना येते तिथे अहम् वाढतो.मात्र आत्मसन्मान स्वाभिमान वाढवतो. आमचा ‛आयुर्वेद’ म्हणता म्हणता अमेरिकेसारखा देश आमच्या देशातील हळदीसारख्या औषधी वनस्पतींचे पेटंट मिळवते. जगात क्रिकेटमध्ये  अव्वल नंबरवर असणारे आम्ही वर्ल्ड कप क्रिकेटमधून बाहेर पडतो किंवा एक अहवाल ओबामाना सांगतो की त्यांच्या देशातील बरीच ‛ टॅलेंट’ ही भारतीय आहे ज्याचा उपयोग ते त्यांच्या देशाच्या प्रगतीसाठी करुन घेतात. किंवा आमच्या सहिष्णुतेला दुर्बलता समजून पाकिस्तान किंवा चीनसारखे देश आम्हालाच आव्हान देत घुसखोरी करतात.  या सर्व घटना खरोखरच आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या आहेत. म्हणूनच आता केवळ अहम् कुरवाळण्यापेक्षा स्वाभिमानाची कास धरण्याची गरज आहे.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आई नावाचं विद्यापीठ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ विविधा ☆ आई नावाचं विद्यापीठ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

नऊ दहा वर्षाची सुमन आज आजीबरोबर कामाला आली होती.

” कशी आहेस सुमन? शाळा चांगली चाललीय ना? आज कशी काय आलीस तू?”

“अहो वहिनी,आत्ता शाळेला आठवडाभर सुट्टी आहे.म्हणून आता सुट्टीत आजीच्या मदतीला येणार आहे मी.”

तिच्या बोलण्यात प्रौढत्वाची झलक डोकावत होती. मी बघत होते.कधी सुमन भांडी घासत होती तर कधी विसळत होती. आजी तिला भांडे कसे आणि कुठे जोर देऊन घासायचे,तर कसे चोळून विसळायचे हे काम करता करताच दाखवून देत होती. धुणे कसे धुवायचे, कसे पिळायचे, कसे झटकून वाळत घालायचे हे समजावून देत होती. आजीच्या हाताखाली हळूहळू तयार होणाऱ्या सुमनमधे मला उद्याची हुशार, चुणचुणीत, कामसू गृहिणी दिसत होती.

आमच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरील वॉचमनबाईची सकाळी कामाची नुसती धांदल सुरू असायची. आज तिच्या मुलींचा दंगा ऐकू येत होता. म्हणून खिडकीतून डोकावले तर  वाॅचमनबाई धुणे धूत होती.होती जवळच तिची चार पाच वर्षांची मुलगी सावकाशपणे पुढ्यातली भांडी यथाशक्ति घासत, विसळत होती. तिला मधून मधून आईच्या सूचना सुरू होत्या. तर छोटी दीड दोन वर्षाची मुलगी पाण्यात खेळत होतीऋ अचानक तिने ओरडून रडून आईकडून हट्टाने अंगातला फ्रॉक काढून घेतला आणि तो ती पाण्यात बुडवून धूवू लागली. मधूनच ती तो फ्राॅक चोळत होती ,तर मधूनच उठून  आपटत होती. त्या नादात तिचा तोल जात होता. मला तिचे खूप कौतुक वाटले. आईचे अचूक निरीक्षण करून तिची प्रत्येक कृती सुरू होती.

मनात विचार आला आई एक’ चालतं बोलतं ‘विद्यापीठ असते.जगण्याचे शास्त्र आणि प्रात्यक्षिक यांचा असा एकत्र सुंदर मिलाफ कोणत्याच शाळेत नसतो आणि असा अंत:करणापासून शिकवणारा दुसरा प्रेमळ गुरूही  अन्य कोणीच नसतो.  आईची ही शाळा आयुष्यभर अशीच सुरु असते. फक्त अभ्यासाचे विषय बदलत असतात आणि आपल्या मुलांना उत्तम माणूस म्हणून घडवण्यासाठी आई आयुष्यभर धडपडत असते.

अशा विचारात मी आत वळले तर माझी दोन्ही छोटी मुले खोलीच्या सफाईला लागली होती.

“अग रेवा, तुम्ही हे काय करताय ?”

“आई, काल शाळेत बाईंनी  आम्हाला ‘शामची आई’ धडा शिकवला. मला शामची गोष्ट खूप आवडली. छोटा शाम आईला किती मदत करायचा ना !आता सुट्टीत मी पण तुला मदत करणार आहे.

” मी पण”,  छोट्याने ताईची री ओढली. मला मुलांचे खूप कौतुक वाटले.

आज मुली उच्च शिक्षण घेऊन घराबाहेर पडत सर्वच क्षेत्रात उत्तम करिअर करीत आहेत. सर्वोत्तम स्थान मिळवत आहेत. त्याचवेळी त्या घरातली जबाबदारीही नीटनेटकी पार पाडतात.ही दुहेरी कसरत त्यांना जमते.मग मुलांना का नाही जमणार?शिक्षणासाठी,  नोकरीसाठी परदेशी किंवा घरापासून लांब राहताना मुलांनाही घरातली सर्व कामे व्यवस्थितपणे करता आली तरच निभाव लागतोय. नाहीतर खूप हाल होतात.मुलांची कामे आणि मुलींची कामे अशी विभागणी आजकाल राहिलेली नाही.

म्हणूनच आज काळाची गरज झाली आहे की फक्त मुलींकडूनच नव्हे तर मुलांकडून सुद्धा घरातल्या सर्व कामांचा गृहपाठ गिरवून घेतला पाहिजे.उद्याची कुशल ‘आदर्श गृहिणी’ कशी बनेल या संस्कारातच मुलगी लहानाची मोठी होत असते.मुलांवर सुद्धा बालपणापासूनच हे कामाचे संस्कार होणे आवश्यक आहे. उद्याचा समंजस जोडीदार बनण्यासाठी आणि घराच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा.

“अग रेवा, या इकडे. मी दाखवते तुम्हाला दोघांना सफाई कशी करायची ते.”  असे म्हणत मी हातात झाडू घेतला.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दैवगती ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी 

सौ. शशी नाईक-नाडकर्णी 

शिक्षा- बी.कॉम

नोकरी- युनियन बॅक ऑफ इंडिया, अधिकारी  निवृत्त – 2017

अभिनयाची आवड,सिध्दार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स एन्ड  इक्नोमिक्स  मध्ये मराठी एकांकीका ‘ सारे कसं शांत शांत.’ अभिनयाचे पारितोषिक

निवृत्तीनंतर पौरोहित्याचा अभ्यास चालू आहे. सुगम संगीताची आवड. जुनी नाती जपणे. नवीन माणसं जोडण्याची आवड.

 

☆ विविधा ☆ दैवगती ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

“आई,छानशी गोष्ट सांग ना, आजी झोपायच्या आधी रोज गोष्ट सांगायची. श्रावणांत तर तिच्या पुस्तकातली आटपाट नगर वाली कहाणी  सांगायची”. श्रुतीला गोष्ट सांगितल्याशिवाय माझी सुटका नव्हती. तसेच सगळं काम ठेवून तिला घेवून बेडरूम मध्ये आले.

चला चालू —- “आटपाट नगर—– तिकडे एक भाऊ आणि बहिण  भाऊ —— भावाकडं  पूजा  होती——–माझी गोष्ट चालूच होती. तात्पर्य काय? शेवटी दिवस कोणाचे  कधी बदलतील सांगता येत नाही म्हणून कोणी कोणाला हंसू नये, कमी लेखू नये.अरेच्चा पण हे ऐकायला आमचे बाळ  जागं कुठे आहे  ? ते तर केव्हाच झोपलं.

ती झोपली तरी आम्ही ऐकली ताई  तुमची गोष्ट. लगेच इकडून तिकडून एकदम आवाज आले. दांडीवरचा गाऊन सांगू लागला काल पर्यंत ती पैठणी,कांजीवरम् तो-यांत मिरवायच्या आणि मला हसायच्या .आज  पाच महिने झाले कश्या  गपगुमान कपाटात पडून  आहेत.

तेवढ्यात बेसिनवरचा डेटॉल हॅण्डवॉश ओरडला ,”एकदम बरोबर रोज बाहेर पडतांना दादा ,ताई सगळेजण फुस्. फुस  सेंट मारून जायचे.अगदी आजी आबांना  उग्र वासाचा त्रास झाला तरी. आणि ती  सेंट ची बाटली  माझ्या कडे तुच्छतेने बघायची.पण आता दिवस फिरले.आबांपासून ते छोट्या श्रुतीपर्यंत अगदी कामावाल्या मावशीं सुध्दा सकाळ संध्याकाळ मला हातावर घेऊन कुरवाळतात.

“हो रे बाबा सध्या तुम्हालाच चांगले दिवस आले आहेत. तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत.”

तेवढ्यात जाऊबाई ने खणाचा शिवलेला  मास्क बोलू लागला कित्येक महिने मी वहिनीच्या कपाटात  पडून  होतो.परवा you tube वर वहिनी ने खणांचा मास्क बघितला आणि माझं नशीब फळफळलं.आता सगळे मला

त्यांच्या चेह-यावर विराजमान केल्याशिवाय बाहेर पाय टाकत नाही.शशांकदादांचा  बिच्चारा टाय. पाच महिने त्याला बाहेरचं दर्शन नाही.

हो ना . करोना ने तर सगळ्या सृष्टीचीच उलथापालथ  केली.

तेवढ्यात कोप-यातून हुंदका आला. माझी सुंदर लाल प्लॅस्टीकची पिशवी रडत  म्हणाली ,’ताई करोनाने  नाही काही त्याच्या आधीच आमचं नशीब  रुसलं.”

रद्दी तिला डावलून खुद्कन हसून म्हणाली ,”मारे हिणवत होतीस ना ,आमच्या शिवाय कुणाच काही  चालत नाही. कागदा, तुझा उपयोग काय ?  Xxपुसायला. पण तुझ्या हे लक्षात नाही आले आजपर्यंत जे शिकले सवरले ते आमच्यामुळेच.पण हे लक्षात यायला अक्कल  लागते ना.”

म्हणजे  थोडक्यात काय? चांगले  वाईट  दिवस सगळ्यानाच असतात. सजीव  असो वा निर्जीव .म्हणून कोणाला कमी लेखू नये .त्याची चेष्टा  करू नये.

ही साठा उत्तरांची कहाणी—

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शेती संस्कृती मधील स्त्रियांचा सहभाग ☆ सौ. सावित्री जगदाळे

☆ विविधा ☆ शेती संस्कृती मधील स्त्रियांचा सहभाग ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆ 

 

मानव प्रगत झाला. गुहेमधून घरात राहू लागला. त्याही आधी तो जेव्हा गुहेत राहत होता. शिकारीला जात होता. अनेक दिवस शिकरीहून परत येणं होत ही नसेल. तेव्हा बाई आपल्या चिल्या पिल्यांना घेऊन कसे जगत असेल, त्यांना काय खाऊ पिऊ घालत असेल ? हा प्रश्न पडतो. तेव्हा वाटते बाईने का केली असेल शेतीला सुरुवात? कशी सुचली असेल तिला ही किमया? कुठून मिळाली असेल ही प्रेरणा?

फळे कंदमुळे .अनेक मुलांमुळे शोधणे हेही शक्य नसेल तर तिला वाटलेही असेल की ही फले कंदमुळे आपल्या आसपास जवळच असावीत, त्याचे बी  लावावे… मनात आल्यावर कृती करायला काय वेळ लागणार… तिचेच राज्य. तिच्या मनात असं का आले असेल… ? बी लावल्यावर त्याचे झाड उगवून येते हे तिला कधी आणि कसे कळाले असेल? कसा असेल तो क्षण?

न्यूटन ला सफरचंद पडल्यावर अचानक लख्ख जाणवले आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला…. लहानपणापासून तो पडलेलं सफरचंद बघत असेलच की…. पण असा जाणिवेचा क्षण नेनिवेतून यायला तशी वेळही यावी लागत असेल…

कुठे तरी वाचल्याचे आठवते, खार किंवा खारोटी हिला एक सवय असते, बिया गोळा करायच्या आणि कुठे ना कुठे पुरायच्या. तिच्या या सवयीने जंगलं वाढतात म्हणे.

हेही बाईने बघितले असेलच. तिला अशी प्रेरणा मिळू शकली असेल. आणि बिया पेरणी कळत नकळत सुरू झाली. ही बाईच्या मनातली आदिम प्रेरणा मुळीच कमी झालेली नाही, अजूनही!

आजही शेती मध्ये अनेक अवजड यंत्रे आली, नांगरणी पेरणी यंत्रे करू लागली तरी पेरणीच्या वेळी घरातल्या गृह लक्ष्मीच्या हाताने मुठभर धने पेरले जातातच. हा पिढ्यान् पिढ्या चालत आलेला शेती संस्कृती मधील संस्कार किंवा, रुढी परंपरा म्हणा अजूनही आहे. तिने शेतीला सुरावत केली याची आठवण म्हणून  , तिचा सन्मान म्हणून ही पद्धत अजूनही कायम आहे. पुरुष सत्ता क पद्धतीमध्ये अनेक बदल झाले असले तरी या सत्तेने स्त्रीच्या निर्मिती क्षमतेची जाणिव ठेवली आहे म्हणायचे.

आजही  मुख्य पीक पुरुष ठरवत असेल , पण बांधावर, मधल्या सरीत काय माळवं लावायचे हे बाईच ठरवते.

त्याची निगुतीने काळजी घेते. मिरच्या,  धने, लसूण काही ओली तरकारी म्हणजे, वांगी, गवार, दोडकी, घेवडा यावर फक्त तिचीच सत्ता असते. ते विकायचे की वाटायचे हे तीच ठरवते. त्या पैशावर हक्क नावापुरता तरी तिचाच असतो.( नंतर गोड बोलून काढून घेतले जातात ती गोष्ट वेगळी. )

पेरणी करणे आणि पाणी पाजणे एवढे पुरुष करतो. पण बाकीच्या उगनिगी बाईच करते. पीक पोत्यात भरेपर्यंत तिची कितीतरी कामे असतात. भांगलान, खुरपणी दोनतीन वेळा करावी लागते. हे घरातील स्त्रीच करून घेते. कापणी, खुडणी आहेच. तिच्याशिवाय कोण करणार …

मातेरे, सरवा , काशा वेचने या सर्वांना बाईचाच हात पाहिजे. ही हलकी कामे पुरुष थोडाच करतो. वाळवणं सारख्या गोष्टींना तर बाई शिवाय कुणाचा हात लागणार … भरलेली पोती उचलायला फक्त बाप्या येणार… धान्याला कीड लागतेय का कधी चाळायचे, वाळवायचे हे तीच बघणार… कडधान्यांचा भुंगा कीड लागू नये, बियांनासाठी टिकवून ठेवण्यासाठी ते राखेत ठेवायचे काम तिचेच. मग चुलीतली राख वर्षभर साठवायची. नंतर चालून त्यात कडधान्य मिसळून छोटी कणगी किंवा पत्र्याचे डबे मिळवून त्यात ठेवायचे. यासाठी खूप बारकावा लागतो, सायास लागतात. हे सगळे काम बाई बिनबोभाट, आनंदाने करत असते. एक ना दोन शेतकऱ्याची बाई आणि शेती वेगळी होऊ शकेल काय…

शेती बाई शिवाय शक्य तरी आहे का..

 

© सौ. सावित्री जगदाळे

१४/२/१९

१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विस्मरणात खरोखर जग जगते ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी 

श्री एस्.एन्. कुलकर्णी 

स्वपरिचय 

मी एस्. एन्. कुलकर्णी. मुळचा सोलापूरचा. शालेय आणि काॅलेज शिक्षण सोलापुरातच पूर्ण झाले. बॅंक ऑफ़ महाराष्टमधून ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालो. नौकरीनिमीत्त महाराष्टातील अनेक शहरात राहणे आले. तेथील समाजजीवन अनुभवता आले. लहानपणापासून वाचनाची आवड़ती  आजपर्यंत जोपासली आहे . आता पुणे येथे स्थिरावलो आहे.

☆ मनमंजुषेतून ☆ विस्मरणात खरोखर जग जगते  ☆ श्री एस्.एन्. कुलकर्णी ☆ 

जवळ जवळ ५३/५४ वर्षापूर्वीचा प्रसंग/घटना आहे ही. १९६७ मध्ये मी मॅट्रीकला शाळेत शिकत होतो. मार्च महीना होता. बोर्डाच्या परिक्षेचे दिवस होते. मॅट्रीकला आम्हाला त्यावेळी पुष्पा आगरकरबाई ह्या मराठी शिकवत होत्या. अतिशय छान मराठी शिकवावयाच्या. गद्य असो वा पद्य त्या अाम्हाला मन लावून शिकवायच्या. “मरणात खरोखर जग जगते” ही भा. रा. तांबेंची कविता त्यानी आम्हाला खुप छान प्रकारे शिकविली. या विषयावर बोर्डाच्या परिक्षेत निबंधसुध्दा येऊ शकेल अशी शक्यता बोलुन दाखविली. त्यामुळे त्यानी निबंधाचीपण तयारीपण करून घेतली.

बोर्डाची परिक्षा सुरू झाली. पहीलाच पेपर मराठीचा होता. पेपर सुरू झाला. ऊत्तरपत्रिका तसेच प्रश्र्नपत्रिकेचेही वाटप झाले. पहिलाच प्रश्र्न निबंधाचा होता.  चार पांच विषय होते आणि त्यामध्येच “विस्मरणात खरोखर जग जगते” हाही विषय होता. मुलांमध्ये चुळबुळ सुरू झाली. मी शेवटी वर्गावरच्या शिक्षकांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली.  छपाईची चुक असावी असेही मी बोललो. त्यानीपण ही गोष्ट गांभीर्याने घेऊन मुख्याध्यापकांच्या नजरेस आणून दिली. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते.  एका शहारातून दुसर्‍या शहरात फोन लावायचा असेल तर फोन बुक करावा लागायचा. बराच वेळ लागायचा फोन लागायला. जवळ जवळ तासानी पुण्याला बोर्डाकडे फोन लागला. बोर्डाने स्पष्ट केले की निबंधाचे सर्व विषय बरोबर आहेत. त्यामध्ये छपाईची चुक नाही. हे समजताच विद्यार्थी नाराज झाले. आज  आठवत नाही पण कोणत्या तरी विषयावर निबंध लिहुन ऊत्तरपत्रिका शिक्षकांकडे दिली आणि मी बाहेर पडलो.

आज हा प्रसंग आठवला आणि या विषयाचे गांभीर्य लक्षात आले. बरे झाले मी त्यावेळी “विस्मरणात खरोखर जग जगते” या विषयावर निबंध नाही लिहीला. या विषयाला मी न्याय देऊ शकलो नसतोच.  आपल्या रोजच्या जीवनात असे अनेक कटु प्रसंग घडतात, दु:खद प्रसंग घडतात. प्रिय व्यक्तिंचा मृत्यु असो, अपघात असो, अपमानाचे प्रसंग असो अशा अनेक गोष्टी आपण जस जसा काळ सरत जातो तस तसे अशा गोष्टी आपण विसरण्याचा प्रयत्न करतो. खर तर अशा गोष्टी विसरल्या तरच आपण वर्तमानकाळात जगु शकतो. अशा दु:खद गोष्टींचे आपल्याला विस्मरण झाले तरच आपण रोजचे आयुष्य जगु शकतो.  वाईट गोष्टींचे विस्मरण हेच तर आपल्या रोजच्या जगण्याला अतिशय आवश्यक बाब आहे. भुतकाळाचे विस्मरण हे रोजच्या आनंदी जगण्याचा पाया आहे.  भुतकाळातील वाईट गोष्टी, दु:खद प्रसंग आपण विसरले पाहीजेत.  आत्ता मी या विषयावर इतका विचार करू शकलो.  मॅट्रीकमधील विद्यार्थ्यानी इतका विचार केला असता कां आणि विषयाला न्याय देऊ शकला असता कां? नक्कीच नाही.

 

©  श्री एस्. एन्. कुलकर्णी

वारजे, पुणे-४११०५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सुखी निवृत्त जीवनाचा कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ 

श्री उद्धव भयवाळ

संक्षिप्त परिचय 

सेवानिवृत्त बँक अधिकारी

  • विनोदी कथा, एकांकिका, बालकथा , बालकवितेपासून लावणी प्रकारापर्यंत लिखाण .
  • “इंद्रधनू” हा कवितासंग्रह आणि “हसरी फुले” हा बालकवितासंग्रह  “तारांबळ” हा विनोदी कथासंग्रह प्रकाशित झाला आहे.
  • “हसरी फुले” या बालकवितासंग्रहास  “अंकुर वाड्मय पुरस्कार-२००८” प्राप्त.
  • “सुभद्रा प्रतिष्ठान” सेलू (जि. परभणी) यांचा कवितेसाठीचा प्रतिष्ठेचा “गौरव पुरस्कार” .
  • नाशिक येथील “कलाकुंज”  प्रकाशनाच्या वतीने साहित्यसेवेबद्दल नाशिक येथे सत्कार.
  • भारतीय नरहरी सेना {महाराष्ट्र प्रदेश} यांचा ‘नवरत्न’ पुरस्कारांपैकी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार.
  • ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे मी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या “साने गुरुजींच्या छान छान गोष्टी” या पुस्तकाचा समावेश.
  • अ.भा.सानेगुरुजी कथामाला,जालना यांच्या बालकुमार कविसंमेलन अध्यक्षपद.
  • “सलिला साहित्यरत्न सन्मान” प्रदान.”अहिंदी भाषी क्षेत्रामध्ये हिंदी भाषेतील साहित्य निर्मिती” यासाठी हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान.

☆ विविधा ☆ सुखी निवृत्त जीवनाचा कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ 

एका पाहणीनुसार भारतामध्ये साठ वर्षांवरील जनसंख्या आठ कोटी आहे. याचा अर्थ आज घडीला भारतातील सात टक्के लोक ‘ज्येष्ठ नागरिक’ या व्याख्येत येतात. आणि दरवर्षी वेगवेगळ्या आस्थापनांमधून साधारणपणे सात लाख लोक निवृत्त होत आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेदिवस वाढत जाणार हे निश्चित. यावरून कुणाचा असा समज होऊ शकतो की, या ज्येष्ठ नागरिकांपुढे जगण्यासाठीच्या खूप समस्या असणार आहेत. काही प्रमाणात ते खरे असेलही. पण निवृत्तीनंतरचे जीवन सुखी, आनंदी आणि चैतन्यमय कसे करायचे ते आपल्या हातात आहे.

निवृत्त जीवन आनंदाने जगण्यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टींची आवश्यकता आहे.

१. आर्थिक स्थैर्य  २. आरोग्य   ३. प्रेमाची माणसं  (आप्तेष्ट, मित्र इत्यादि )

त्यापैकी आर्थिक स्थैर्य हवे असण्यासाठी निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्नाची हमी पाहिजे. दरमहा मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त बँकेमधील ठेवीवर मिळणारे मासिक व्याज हासुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो. आपण कष्टाने कमावलेल्या पुंजीचा आपल्याला निवृत्तीनंतर चांगला उपयोग व्हावा म्हणून जास्तीत जास्त परतावा मिळेल अशा ठिकाणी पैसा गुंतवावा. मात्र त्या गुंतवणुकीत कमीत कमी जोखीम असावी. कारण जसजसे वय वाढत जाते, तसतशी जोखीम घेण्याची मानसिकता कमी होत जाते. त्याचप्रमाणे अचानक उद्भवणाऱ्या आजारपणासारख्या गोष्टींसाठी थोडे पैसे बाजूला काढून ठेवावेत म्हणजे ऐनवेळी त्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आरोग्य. ते चांगले राहण्यासाठी आपणास झेपेल तसा नियमित व्यायाम करणे, खाण्यापिण्याच्या बाबतीत योग्य ती काळजी घेणे आणि स्वत:ला कशात तरी गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. जसे की, नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकामध्ये आपले काही छंद जोपासायचे राहून गेले असतील तर आता ते आपण करू शकतो. कारण अशा गोष्टींमुळे आपला मेंदू तरतरीत राहतो. त्याचप्रमाणे स्वत:चा आणि जोडीदाराचा आरोग्यविमा आपण नोकरीमध्ये असतांनाच काढून ठेवणे हेसुद्धा आवश्यक आहे.

सुखी निवृत्त जीवनासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेमाची माणसे. यामध्ये ज्याप्रमाणे आपले कुटुंबीय आहेत, त्याचप्रमाणे नातेवाईक आणि मित्रही आहेत. या सर्वांना आपल्याविषयी प्रेम आणि काळजी वाटत असतेच. पण ते प्रेम वृद्धिंगत कसे होईल हे पाहणे आपल्याच हातात आहे. यासाठी आधी काही पथ्ये आपण पाळणे आवश्यक आहे. एक म्हणजे घरामध्ये कुणालाही अनाहूत सल्ला देण्याचे टाळावे. मुलांना त्यांचा संसार त्यांच्या मनाप्रमाणे करू द्यावा. त्यात अनावश्यक ढवळाढवळ नको. घरातील मुले, सुना, नोकरीस असतील तर नातवंडांची काळजी घेणे हे आपणास जमू शकते. त्याचप्रमाणे विजेचे किंवा टेलिफोनचे बील भरणे इत्यादी छोटी छोटी कामे आपण करू शकतो. त्यामुळे कुटुंबियांना आपली मदतच होते. दुसरे म्हणजे नोकरीमध्ये व्यस्त असतांना आपण जास्तीत जास्त वेळ नोकरीच्या ठिकाणी  घालवलेला असतो. कुटुंबियांना देण्यासाठी तेव्हा वेळच नसतो. आता निवृत्तीनंतर मात्र आपण जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसाठी द्यायला हवा. कुटुंबियांसोबत पर्यटनाला जाणे, सर्वांनी एकत्र बसून नाटक, सिनेमा पाहणे हे आपण करू शकतो. आपल्या जोडीदाराच्याही काही इच्छा, आकांक्षा आपल्या नोकरीच्या व्यग्रतेमुळे पूर्ण करायच्या राहून गेल्या असतील तर आता त्या पूर्ण करण्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण प्रेम दिल्याने प्रेम वाढत असते ही गोष्ट सदैव ध्यानी असू द्यावी.

त्याचप्रमाणे सामाजिक कार्यासाठीसुद्धा थोडा वेळ आपल्या दिनक्रमातून काढला पाहिजे. कारण ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचेही आपण देणे लागत असतो. तसेच नवनवीन मित्र मिळविणे, एखाद्या सामाजिक संस्थेशी स्वत:ला जोडून घेणे, सदैव उत्साही राहण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी नक्कीच आपले निवृत्त जीवन सुखी बनवितील यात शंका नाही.

© श्री उद्धव भयवाळ

औरंगाबाद

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print