सहसा कुठलाही आजार हा अकस्मात येत नाही. आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला तसे संकेत देत असतं ,आपण मात्र त्याकडे विशेष गंभीरपणे न बघता तसंच दामटायला वा रेटायला बघतो. सध्या सगळीकडे व्हायरल इंफेक्शनचा सामना जनताजनार्दनाला करावा लागतोयं. सध्याच्या असमतोल हवामानामुळे हे चढउतार आपल्याला अनुभवावे लागतात.
इकडे लगातार तीन दिवस तीन वेगवेगळ्या टोकाच्या हवामानाचा अनुभव सगळ्यांनी घेतला. पहिल्या दिवशी ढगाळ वातावरण,कुंद हवा, पाऊस तर दुसऱ्या दिवशी थंडी, बोचरे वारे,आणि तिस-या दिवशी अचानक सर्वत्र ऊन. ह्या अचानक बदलत्या हवामानाने सगळीकडे सर्दी, ताप,घसा खवखवणे आणि खोकला ह्यांच्या मा-याला आपल्याला तोंड द्यावं लागतयं.
खरतरं एकादिवसाच्या मुलाचं देखील कोणावाचून काहीही अडत नाही. जो जन्माला घालतो तोच सोय करतो ही म्हण खरी असली तरी अशा संकटाच्या काळात मानसिक, शारीरिक भक्कम राहतांना शेवटी माणसाला माणसाचीच गरज लागते.मग ती कोठल्याही रूपात का असेना,कधी ती गरज आपली जवळची घरची माणसं भागवतात तर कधी आपली जोडून ठेवलेली मित्रमंडळी वा स्नेही भागवतात.
त्यामुळे ह्या आजारपणाच्या काळात मात्र माणसाला माणसाची खरी किंमत कळायला लागते.सध्या ह्या आजारपणात घरात वा नोकरीच्या जागी तीन गट पडलेतं.पहिल्या गटात संपूर्णपणे आजारी असलेल्या व्यक्ती, दुसऱ्या गटात थोडफार बरं वाटत नसलेल्या व्यक्ती आणि तिस-या गटात एकदम ठणठणीत व्यक्ती. ह्यापैकी तिसऱ्या गटातील व्यक्तींचे संख्याबळ अगदी कमी आहे.
काल परवापर्यंत ह्या आजारपणात मी दुसऱ्या गटात मोडत होते.नंतर मात्र अंगावर काढल्याने शेवटी तिसऱ्या फेज मध्ये प्रवेशकर्ती झालीय. आता दोन दिवस सक्तीची विश्रांती घेतल्या शिवाय पर्यायच नाही.
त्यामुळे आता दोन दिवस सक्तिची विश्रांती घेऊन झाल्यावर ह्या आजारपणात आलेल्या चांगल्या अनुभवांविषयीची पोस्ट काही दिवसात लिहीनच.
औषधांपेक्षाही सर्वांगीण आराम,शांत स्वस्थ झोप,डोळ्यांना डोक्याला त्रास होणाऱ्या मोबाईल चा अत्यंत कमी वापर ह्याने लौकर बरं वाटायला लागतं. असो शेवटी काय तर “जान है तो जहाँ है”.,”सर सलामत तो पगडी पचास” ही मोलाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवी.
आज चिवडा करू…. उद्या लाडू…. असं म्हणत दिवाळीआधीच फराळाचं वेळापत्रक बनतं खरं… पण ते सोयीनुसार बदलतही राहतं. म्हणजे असं, दाणे भाजून झाले नाहीत म्हणून आजचा चिवडा उद्यावर ढकलला जातो आणि भाजणी लवकरच आणली म्हणून परवाची चकली आज होऊनही गेलेली असते. थोडक्यात, हे ‘सवडीचं’ वेळापत्रक असतं… आणि ते सवडीनुसार पाळलं किंवा बदललं जातं!
आता…’आवडीचं’ वेळापत्रक सुरु होतं…. आवडीचे पदार्थ संपण्याचं वेळापत्रक !
सवडीने दिवाळीचा फराळ कोणत्याही क्रमाने बनवला जावो… आवडीने संपण्याचा क्रम आमच्या घरात अगदी निश्चित ठरलेला असतो…. या वेळापत्रकात बदल नाही म्हणजे नाहीच!—-
सर्वात पहिला मान चकलीला ! त्यामुळे, सगळ्यात आधी ती संपलेली असते. “नेहमीपेक्षा जरा जास्तच खुसखुशीत झालीय नै चकली ” असं नेहमीपेक्षा जास्त कौतुक ऐकू आलं की समजावं… चकल्या संपत आल्यात !
तिच्या पाठोपाठ करंज्या…. !! करतांना सर्वात शेवटी; पण संपताना मात्र या आघाडीवर असतात ! अर्थात, चूक त्यांची नाहीच… चार खाऊन एक आकडा मोजायचा असं ठरवल्यावर दुसरं काय होणार म्हणा..!!
चकल्या आणि करंज्या ही पहिली आघाडी संपल्यानंतरची दुसरी आघाडी बेसन लाडू आणि कडबोळी एकत्रितपणे पार पाडतात. दोनच दिवसात कडबोळ्यांच्या डब्याच्या तळाशी तेलकट झालेला केविलवाणा टिश्यू पेपर उरलेला असतो आणि बेसन लाडवांच्या डब्यात लाडू वळतांना टोचलेले बेदाणे, दाताखाली खडा आल्यावर जसा बाजूला केला जातो, तशी उपेक्षा झाल्याने निपचित पडून असतात.– थोडक्यात, बिनीचे सर्व शिलेदार गारद झालेले असतात. चिवड्यातले काजू चाणाक्ष नजरांनी टिपलेले असतात. मग शेव-चिवडा, चहा-शंकरपाळे अशा जोड्या, किल्ला काही काळ लढवत ठेवतात.
मानाचे पाच गणपती यात्रेत आपापल्या क्रमाने गेल्यानंतर या आळीचा, त्या गल्लीचा असं करत सगळे सामील होतात तसं .. या क्रमाने फराळाचे मानाचे डबे संपल्यानंतर कुण्या काकूकडचे अनारसे, ताईकडून आलेले चिरोटे वगैरे सर्वांचा यथायोग्य समाचार घेतला जातो…
फराळाची ही भाऊगर्दी कमीच होती की काय !!! म्हणून अगदी ठरवून दिवाळीच्या या चार दिवसात, पहिल्या दिवशी नैवेद्याला बासुंदी, पाडव्याला छोले-भटुरे, घरातच एक वाढदिवस म्हणून गुलाबजाम आणि भाऊबीजेला भाऊ कित्येक दिवसांनी येणार म्हणून सूप, स्टार्टर्स, स्वीट, मेन कोर्स आणि डेझर्ट्स असं फाईव्ह कोर्स डिनर झालेलं असतं — आणि …….
हा अस्सा रविवार उजाडतो….अस्सा म्हणजे… आजच्यासारखा !!!
“आज मी फक्त मऊभात करणारे ” अशी घोषणा माझ्याकडून केली जाते… आणि सगळ्यांचे चेहेरे गेल्या चार दिवसांपेक्षा जास्त उजळतात !
पदार्थांच्या भाऊगर्दीत त्या गरमगरम मऊभाताला आणि त्यावर घेतलेल्या तूप-मेतकुटाला अमृताची चव येते. अगदी सकाळीच विरजलेलं दही आणि डावीकडचं लोणचं या आजच्या मेन्यूला फाईव्ह कोर्स डिनरच्या फाईव्ह स्टार मेन्यूपेक्षा जास्त स्टार दिले जातात… तळलेल्या पदार्थाचा खमंगपणा, मसालेदार फोडणीचा झणझणीत स्वाद, चीझ-बटर-क्रीमचा श्रीमंती थाट, तुपात तळलेल्या आणि साखरेत घोळलेल्या मिष्टान्नाची गोडी, काचेच्या प्लेट मधून आलेल्या डेझर्टची नजाकत… यातलं काही – काही नसतं त्या मऊभातात….. पण आजच्या दिवशी ‘तोच’ हवा असतो.. ‘ फक्त आणि फक्त तोच ‘ हवा असतो…… आणि हवं असतं त्याच्या साधेपणातलं समाधान…..
–कित्येक दिवस परदेशातल्या झगमगाटात फिरून परत येतांना आपला देश दिसू लागल्यावर मनात असतं ते समाधान……
ब्रँडेड कपड्यांच्या दिखाऊपणानंतर एक जुनाच, पण मऊसूत कुर्ता घातल्यावर मिळतं ते समाधान…..
पुस्तकांचं कपाट आवरतांना अचानक जुनी कवितांची वही मिळाल्यावर मिळतं ते समाधान…..
☆ मोठे व्हाल तसतसे अधिक बोला… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
तुम्ही वयानं जसजसे मोठे व्हाल तसतसे अधिक बोला— असे डॉक्टर्स म्हणताहेत..
ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलले पाहिजे कारण स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्याचा कोणताही इतर मार्ग नाही. अधिक बोलणे हा त्यातल्यात्यात प्रभावी मार्ग आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलण्याचे किमान तीन फायदे आहेत—-
१)बोलण्याने मेंदू सक्रिय होतो आणि सक्रिय राहतो, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात, विशेषत: पटकन बोलत असताना, ज्यामुळे नैसर्गिकरित्या विचारांचे प्रतिबिंब जलद होते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. जे ज्येष्ठ नागरिक अबोल असतात, कमी बोलतात, त्यांची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता जास्त असते.
२) बोलल्याने मनावरचा बराचसा ताण दूर होऊ शकतो, मानसिक आजार टळू शकतात. आपण बरेचदा काही बोलत नाही, पण आपल्या मनात मात्र असतं. अश्यानं आपला भावनिक कोंडमारा होऊ शकतो आणि आपण गुदमरतो. कुणी वयस्कर व्यक्ती बोलत असेल तर बोलू द्या..
३) बोलण्याने चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम होतो, घशाचाही व्यायाम होतो आणि फुफ्फुसाची क्षमता देखील वाढते. तसेच डोळे आणि कान खराब होण्याचा धोका, चक्कर वगैरे येण्यासारखे सुप्त धोकेही कमी होतात.
थोडक्यात, ज्येष्ठ नागरिक – सेवानिवृत्त व्यक्तींना अल्झायमरसारख्या विकारांपासून स्वतःचा बचाव करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बोलणे – शक्य तितके बोलणे, इतरांशी संवाद साधणे.
म्हणून, आपण सारे अधिक बोलूया आणि इतर ज्येष्ठांनाही नातेवाईक अन मित्रमंडळीसोबत अधिक बोलण्यास प्रवृत्त करूया…
संग्राहक : सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
संपूर्ण भारत भ्रमण करताना स्वामी विवेकानंद यांनी सत्ताधीशांपासून अगदी गरीब माणसापर्यंतचा भारत उघड्या डोळ्यांनी पाहिला. कान उघडे ठेऊन, त्यासर्वांशी त्यांच्या पातळीवरून संवाद साधला. हे सर्व अनुभव यायला वराहनगर मठ सोडून तीन साडेतीन वर्षाचा काळ मध्ये गेला होता. उघड्या आकाशाखाली आणि भव्य समुद्राने घेरलेल्या शिला खंडावर तीन दिवस तीन रात्री राहून चौथ्या दिवशी सकाळी नावेतून काही लोकांबरोबर स्वामीजी किनार्यावर परत आले. त्यांच्या भोवती गोळा झालेल्या लोकांनी त्यांना विचारलं, “तीन दिवस आपण त्या खडकावर कशासाठी ध्यानस्थ बसला होता? स्वामीजींनी त्यांना, आपण श्रीरामकृष्ण यांचे शिष्य आहोत हे सांगून, “गेली दोन अडीच वर्षे देशभर फिरत होतो, माझं मनही अनेक विषयांचा विचार करीत होतं. ज्या प्रश्नाचा शोध या सार्या भ्रमंतीत मी घेत होतो, त्याचं उत्तर मला त्या खडकावर मिळालं”. हे सांगितलं. स्वामीजींच्या जीवनातली ही सर्वात मोठी घटना होती. आज कन्याकुमारीच्या समुद्रातल्या त्या शिलाखंडाहून चिंतन करून उठलेले स्वामीजी आणि कलकत्त्याहून बाहेर पडलेले स्वामीजी ही दोन रूपं वेगळी होती. हे आतापर्यंतच्या प्रसंगावरून आपल्याला जाणवतेच.
अध्यात्माबरोबरच त्यांच्यातल्या देशभक्तीचा विचार भ्रमण काळात पक्का होत गेला. खरं तर भारत देश पारतंत्र्यात होता, अन्याय अत्याचारांचा सामना करत होता. त्यासाठी अनेक चळवळी सुरू होत्या. पण स्वामीजींच्या मते ही अवस्था तात्पुरती असून आज ना उद्या संपेलच. पण, सर्वसामान्य जनतेची झालेली आजपर्यंतची उपेक्षा थांबवणं हे जास्त महत्वाचं वाटत होतं. त्यांच्या दृष्टीने इंग्रजी सत्ता हे याचं कारण नव्हतं. या उपेक्षेला त्यांच्या दृष्टीने समाजच जबाबदार होता.
बेळगावच्या भेटीपासून त्यांचा रामेश्वर इथं जायचा विचार होता तो त्यांनी वेळोवेळी सांगितला होता. कन्याकुमारीहून ते रामेश्वर इथं जाऊन भगवान शिवाचं दर्शन घेऊन मनाशी केलेला संकल्प पूर्ण केला. तिथून ते पॉन्डिचरीला गेले. तिथे मन्मथनाथ भट्टाचार्य कामानिमित्त आलेले होते. त्यांच्याकडे स्वामीजी थांबले. त्यानंतर काम आटोपून दोघेही मद्रासला परतले, त्यांना घ्यायला मद्रास स्टेशनवर अलसिंगा पेरूमाल आणि त्यांचे मित्र आणि मन्मथनाथांच्या ओळखीचे काही उच्चशिक्षित स्वागतासाठी हजर होते. दीड महिना स्वामीजी मद्रासला राहिले पण हे वास्तव्य त्यांना भविष्यातल्या कार्यारंभासाठी खूप महत्वाचे ठरले. त्यांना ह्या कामाला मदत करणारी माणसे प्रथम मद्रासलाच मिळाली. ती झोकून देऊन काम करणारी होती.
मद्रासला अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने होत होती, भेटी होत होत्या. श्रोत्यांवर त्याचा प्रभाव पडून तरुण वर्ग आकर्षित होत होता. प्रौढ आणि उच्च शिक्षित वर्ग ही आकृष्ट होत होता. तिथल्या एका साप्ताहिकात स्वामीजीन बद्दल लिहून आले. अशी प्रसिद्धी पहिल्यांदाच त्यांना मिळाली होती. एका ठिकाणी त्यांची प्रकट मुलाखत झाली त्यात तर त्यांना, वैदिक धर्माचे स्वरूप, हिंदुधर्मानुसार आदर्श मानवी जीवन, स्त्रीशिक्षण, श्राद्धासारखे धार्मिक विधी, यावरही प्रश्न विचारले लोकांनी. त्यांच्या कडून ऐकलेल्या विचारांच्या प्रकाशात पुढचे आयुष्य चालत राहण्याची जिद्द असणारे तरुण स्वामीजींना मद्रासला भेटले. त्यांना इथे अनुयायी मिळाले. केलेला संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठीचे पहिले पाऊल मद्रासला पडले होते. त्याला निमित्त झाले होते मन्मथबाबू भट्टाचार्य आणि आलसिंगा पेरूमाल. मंडम चक्रवर्ती आळसिंगा पेरूमाल हे त्यांचं नाव .
म्हैसूरचे असलेले आलसिंगा पेरूमाल मद्रासला एका शाळेचे मुख्याध्यापक होते. वेदांताचे अनुयायी आणि कट्टर वैष्णवपंथी. गरीबी असली तरी ध्येयवादा मध्ये ती आली नाही. त्यांनी मुख्याध्यापक असूनसुद्धा स्वामीजींना अमेरिकेत जाता यावे म्हणून दारोदार फिरून पंचवीस पैशांपासून सामान्य लोकांकडून वर्गणी गोळा केली होती, आयुष्यात काहीतरी करावे असे त्यांना वाटत होते, ते स्वामीजींची भेट झाल्यावर त्याला दिशा मिळाली होती. अलसिंगांनी घेतलेल्या कष्टामुळे स्वामीजी अमेरिकेत जाऊ शकले.
स्वामीजींचा मद्रासला असा मोठा जनसंपर्क झाला होता. ही ख्याती हैदराबादला जाऊन पोहोचली होती. आणि स्वामीजींनी हैदराबादला भेट द्यावी असे एक पत्र आल्याने स्वामीजींनी ते निमंत्रण स्वीकारलं. कमी वेळात इतकी सूत्र हलली, की हैदराबाद स्टेशन वर स्वामीजींना घ्यायला पाचशे माणसे आली होती. दुसर्या दिवशी सिकंद्राबादहून शंभर जण भेटायला आली आणि “आमच्या कॉलेज मध्ये एक प्रकट व्याख्यान द्यावे” असा आग्रह केला. विषय होता, ‘पाश्चात्य देशात जाण्यातील माझा उद्देश’. या व्याख्यानाला हजार श्रोते उपस्थित होते. स्वामीजींच्या विवेचनात उदात्तता होती, तात्विक चिंतन होते, देशप्रेम होते, आपल्या मातृभूमीचं पुनरुत्थान आणि वेदवेदांन्तातील उत्कृष्ट तत्वे पाश्चात्य जगासमोर ठेवावीत अशी एक भारतीय धर्मप्रवक्ता म्हणून अमेरिकेला जाण्याची आपली भूमिका आहे, असे या व्याख्यानात स्वामीजींनी सांगितले. इथे दहा बारा दिवस ते राहिले. नुकतीच ते वयाची तिशी पूर्ण करत होते. हैद्राबादला पण सार्वजनिक व्यासपीठावर ते पहिल्यांदाच बोलले होते. सर्वा क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी त्यांना आदराची वागणूक दिली. त्यांच्या विचारांचे स्वागत केले. ते पुन्हा मद्रासला परतले.
अमेरिकेला जाण्याच्या संकल्पाला अजून श्री रामकृष्णांचा आदेश मिळत नव्हता, तोपर्यंत त्यांचे निश्चित होत नव्हते. त्यातच एक घटना घडली. त्यांना एकदा रात्री स्वप्न पडलं की आपल्या आईचं निधन झालं. त्यांना आईबद्दल खूप आदर आणि प्रेम होतं. पण घरदार सोडून आल्यामुळे आणि प्रपंचाच्या गोष्टीत अडकू नये म्हणून ते संपर्क ठेवत नसत. पत्रही पाठवत नसत. मन दोलायमान झाले, कलकत्त्याहून काहीतरी कळणे आवश्यक होते. हे त्यांनी मन्मथबाबूंना सांगितलं. मन्मथबाबूंनी मनाचे समाधान व्हावे म्हणून स्वामीजींना एका भविष्य सांगणार्या व्यक्तीकडे नेले. त्या सिद्ध माणसाने स्वामीजीची पूर्ण माहिती सांगीतली, धर्मोपदेशाच्या कामासाठी तुम्ही लवकरच कुठेतरी दूरदेशी जाल, तुमच्या बरोबर सतत तुमचे गुरु असतील आणि आई बद्दल विचारले आई कुशल आहे हे ही सांगीतले आणि स्वामीजींचा जीव भांड्यात पडला. मन हलक झालं. थोड्याच वेळात कलकत्त्याहून तार आली, भुवनेश्वरीदेवी कुशल आहेत. मनाचा वारू कसा धावत असतो. संवेदनशील मनात किती आणि कसे विचार येत असतात. त्याचा परिणाम कसा होतो हे स्वामीजींच्या या घटनेवरून दिसतो. हा एव्हढा उद्योग ते देशातील लोकांसाठी करत होते पण आई, जन्मदात्री माता, तिचं स्थान हृदयामध्ये कायम असतं. तिचा विसर जराही पडला नव्हता. हीच ती भारतीय मूल्यं. आज याची पण शिकवण गरजेची आहे.
आता मन निश्चिंत झालं होतं. दूर जायचे तर गुरुमाता श्री सारदादेवींचा आशीर्वाद घेणं पण आवश्यक होतं. माताजींना पत्र लिहून आशीर्वाद मागितला. अमेरिकेला जाण्याचा संकल्प कळवला. त्यांनी आशीर्वादाचे पत्र पाठवले. हे पत्र मिळाले आणि स्वामीजीचे मन हर्षभरीत झाले. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. कोणाला कळू नये म्हणून स्वामीजी समुद्रावर एकटेच गेले आणि मन शांत झाल्यावर परत आले. तोवर सर्व भक्तगण जमा झाले होते. “माताजींनी आशीर्वाद दिला आहे, आता कोणतीही अडचण नाही. निर्णय ठरला. मी सर्वधर्म परिषदेला अमेरिकेस जाणार”हे जाहीर केले. अनुयायी तर खूप खुश झाले. निधि संकलन कामाला जोरात सुरुवात झाली. आता एकदम दिशाच बदलून गेली. उत्साहाचे वातावरण तयार झाले. पैसे गोळा करण्याचा प्रयत्न अलसिंगा यांच्या पुढाकाराने जोरदार सुरू झाला.
एक दिवस अचानक खेतडीचे महाराज राजा अजितसिंग आणि त्यांचे सचिव जगमोहनलाल स्वामीजींना भेटायला दत्त म्हणून हजर.अजितसिंग यांना मुलगा झाला होता आणि त्याप्रीत्यर्थ त्यांनी एक समारंभ ठेवला होता. त्यासाठी स्वामीजींना आमंत्रण द्यायला स्वत: आले होते.पण आपण ३१ मेला अमेरिकेला जाण्याच्या गडबडीत आहोत त्यामुळे शक्य नाही होणार असे स्वामीजींनी सांगीतले, जगमोहनलाल यांनी आपण एक दिवस तरी यावे असा आग्रह केला आणि आपण पश्चिमेकडे जाणार आहात हे महाराजांना खूप आवडले आहे . जो काही पैसा लागेल तो महाराज व्यवस्था करतील, आपण फक्त चलावे असे म्हटले.
आतपर्यंत म्हैसूर बंगलोर, हैद्राबाद इथून काही पैसे गोळा झाले होते.म्हैसूरच्या राजांनी पण मोठी रक्कम दिली. स्वामीजींचा खेतडीला जाण्याचं बेत ठरला आता पैसे गोळा करण्याचे प्रयत्न कराची आवश्यकता नव्हती. अलसिंगा आनंदित झाले, स्वामीजींची आर्थिक सोय पूर्ण होणार होती. स्वामीजी सर्वांचा निरोप घेऊन जगमोहनलाल यांच्या बरोबर खेतडीला निघाले. मुंबईहून जहाजाने अमेरिकेला निघण्याचे आधीच ठरले होते. त्यासाठी मुंबईत काही तयारीसाठी स्वामीजी थांबले. तिथे ब्रम्हानंद, तुरीयानंद यांची भेट झाली.स्वामीजींच्या जाण्याची बातमी सगळीकडे पोहोचली.
स्वामीजी खेतडीला समारंभाला पोहोचले. समारंभ थाटामाटात पार पडला. स्वामीजींनी नव्या युवराजांना आशीर्वाद दिले. या मुक्कामात आणि याआधीही स्वामीजींच्या महाराजांशी घरगुती गप्पा पण व्हायच्या. श्रीरामकृष्ण यांची समाधी घरदारचे पाश तोडून बाहेर पडणे हा इतिहास महाराजांना माहिती होतं. संन्यास घेतला तरी मनाच्या कोपर्यात भावंडांची काळजी, आईची मनाची चिंता आणि त्यांचे कसे चालले आहे याचं शल्य त्यांना बोचत होतं हे महाराजांना माहिती होतं. बोलता बोलता मद्रासला आताच पडलेल स्वप्न कदाचित महाराजांना स्वामीजींनी संगितले असेल, महाराज अजितसिंग यांचं मनही द्रवलं. स्वामीजींचे मन किती पोळत असेल या विचारांनी असं अजितसिंग यांच्याही मनात आलं. त्यांनी स्वामीजींना आश्वस्त केलं, “मी तुमच्या मातोश्रींना दरमहा शंभर रुपये पाठवत जाईन. आपण ही चिंता मनातून काढून टाका”. हे उत्स्फूर्त बोलणे ऐकून क्षणभर स्वामीजी आनंदित झाले. नरेंद्रने घर सोडल्यावर सात वर्षानी ही अडचण दूर होणार होती.तेही अजितसिंग यांच्या औदार्यामुळे. पुढे स्वामीजींनी त्यांना पत्र पाठवून म्हटले आहे की, ‘मी जो काही आज या जगत आहे तो तुम्ही केलेल्या सहाय्यामुळे आहे. एका घोर चिंतेतून मुक्त होणं हे मला तुमच्यामुळे शक्य झाले. त्यामुळे मी जगाला सामोरे जाऊ शकलो’. ही मदत अजितसिंग यांच्याकडून १९०१ पर्यन्त त्यांचे निधन होईपर्यंत शंभर रुपये दरमहा मिळत होते. त्यामुळे स्वामीजींची खेतडीची ही भेट महत्वाचीच ठरली होती.
स्वामीजींची सर्व व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी जगमोहनलाला यांना त्यांच्या बरोबर मुंबईला पाठवले होते. अमेरिकेला जाताना, अंगावर गुढग्यापर्यन्त पोहोचणारा रेशमी झुळझुळीत भगव्या रंगाचा झगा, कमरेभोवती गुंडाळलेला तशाच रंगाच्या कापडाचा आडवा पट्टा, आणि मस्तकावर केशरी रंगाचा फेटा, हा विवेकानंदांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाला शोभून दिसणारा वेष, ही राजा अजितसिंग यांनी दिलेली एक राजेशाही देणगी होती आणि विविदिशानंद चे स्वामी विवेकानंद हे नाव सुद्धा खेतडीच्या अजितसिंगानीच अमेरिकेला जाताना बदलायला लावले होतं.
मुंबईला मद्रासहून अलसिंगा आले होते, मुंबईला जगमोहनलाल यांनी बाजारात नेऊन स्वामीजींना झगा आणि फेटा यासाठी उत्तम भारीपैकी रेशमी कापड घेतले ,तसेच तुम्ही महाराजांचे गुरु आहात महाराजांना शोभेल अशा राजेशाही थाटात तुमचा प्रवास झाला पाहिजे.म्हणून जहाजाचे आधीचे दुसर्या वर्गाचे तिकीट बदलून त्यांनी पहिल्या वर्गाचे तिकीट काढून दिले. आपल्या गुरुच्या व्यवस्थेत काहीही कमी पडू दिले नाही महाराजांनी .
३१ मे या दिवशी विवेकानंद यांनी मुंबई सोडली.पी अँड ओ कंपनीच्या पेनिन्शूलर जहाजातून ते जाणार होते. थेट जहाजपर्यंत सोडायला अलसिंगा आणि जगमोहनलाल गेले होते. भोंगा वाजला, दोघांनी स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला. दोघांच्याही डोळ्यात आसवं तरळली. स्वामीजी अखेर अमेरिकेला निघाले हे पाहून अलसिंगांना आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान झाले. जहाजाने किनारा सोडला. विवेकानंदांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा मागे पडला होता आणि जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली होती.
☆ आहोत आम्ही पुण्यवान… लेखिका- सुश्री मृदुला बर्वे आणि डाॅ.अपर्णा कल्याणी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
एका बातमीवर नजर पडली – आपल्या सर्वांच्याच आवडत्या – the most famous – Switzerland – स्वित्झर्लंड मध्ये आत्महत्येला सहाय्य करणारे – suicide pods बनवले गेले आहेत आणि त्या पॉडमध्ये जाऊन आत्महत्या करण्यासाठी म्हणे “waiting list” आहे. ज्या वेस्टर्न जगाची, तिथल्या राहणीमानाची भूल पाडून आपल्याला आपल्या धर्मापासून दूर केले गेले, तिथे ही अवस्था?आत्महत्या करायला रांग? आणि कुपन्स? आपसूक उद्गार निघाले – मी भारतात जन्मले, हो आहेच मी भाग्यवान ! In this land, every birth and every death counts!
त्याच आठवड्यात एका लग्नाच्या मीटिंगसाठी ओपंडित (म्हणजे ओव्हर्सिज भटजी/पंडित) कडून गेले होते. मुलगी मराठी आणि मुलगा अमेरिकन. लग्न विधी समजावून सांगताना त्याला मी विचारले – तुझे पालक? म्हणतो – “ I have no idea, I haven’t spoken with my parents for 12 odd years :O”
मी त्याला विचारले – “ don’t you feel lonely? “ त्याने प्रामाणिकपणे उत्तर दिले – “ I do… I miss them. Then I drink and then I am okay. I want to change this and hence I decided to get married to an Indian woman. I envy you guys…” मी कसंनुसं जराशी हसले – मनात तेच शब्द, तेच वाक्य – ‘ होय, होय आहोतच आम्ही भाग्यवान, पुण्यवान…’
न मागता मिळालेले सुख म्हणजे भारतात जन्म ! त्यातही हिंदू कुटुंबात जन्म ! त्यातही धार्मिक, भगवंतावर विश्वास असणाऱ्या कुटुंबात जन्म !
“सर्वेपि सुखिन: सन्तु |” अशी मागणी करणारा आपला धर्म ! —
“Hindus seek out life, not destroy it. Hindus are the only people who have never invaded any land. We live in perfect harmony with nature.”
आपले अकरावे इंद्रिय – मन. हे मन जे आपल्या सर्व आयुष्याला आकार देते, त्यावर सर्वात जास्त संस्कार करणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म.
” मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव|” – ह्या मूल्यांवर आधारित आपली संस्कृती व धर्म !
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जर कुठली संस्कृती देऊ शकते तर ती आहे ‘ वैदिक सनातन आर्य हिंदु संस्कृती!’
‘ जीवन तर धन्य कराच पण मृत्यूही धन्य करा,’ अशी शिकवण देणारी आपली संस्कृती!
प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक पंथात – मनाला बळकटी देणारे अध्यात्मिक ज्ञान, संत वाङ्मय, उपासना – म्हणजे भारत देश !
” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ” – असे सांगणारे स्वामी समर्थ…
” समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?”, किंवा “आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो “- असे मनोबल वाढवणारे समर्थ रामदास स्वामी…
” शिवछत्रपती राजा महाराष्ट्राचा, अवतार महादेवाचा ” – हिंदु साम्राज्य प्रस्थापित करणारे राजे…
—अगणित उदाहरणे, अगणित संदेश, पण उद्देश्य एकच –- “ बाबारे, ८४ लाख योनिंमधून प्रवास करून मिळालेला मनुष्य जन्म धन्य कर—- तू कुठल्याही वर्णात असशील, तू कुठल्याही आश्रमात असशील, तू श्रीमंत असशील, गरीब असशील, तू आंधळा असशील, पांगळा असशील, तरी हा मनुष्य जन्म धन्य कर. अध्यात्मिक व पारमार्थिक प्रगती कर !”— अशी शिकवण देणारी आपली संस्कृती, अशा भारत देशात आम्ही जन्मलो… एक अख्खा जन्म कमी पडेल एवढे ज्ञान ह्या भूमीने आम्हाला दिले…
होय ! आहोतच आम्ही पुण्यवान, आहोतच आम्ही भाग्यवान !
☆ “श्री सुधांशु मनी”… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
सुमारे ६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , २०१६ची.
रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे. पेशाने इंजीनियर होते. त्यांच्या रिटायरमेंटला केवळ दोन वर्षे बाकी होती. सहसा रिटायरमेंटच्या वेळीजेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे. पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी की कर्मचार्याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्यानेने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.
ICF म्हणजे Integral Coach Factory, रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना.
रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, काय करणार?
ते इंजीनियर म्हणाले, “ आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे.” —–
–ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी १८० किमी धावणारी Spanish Talgo कंपनीच्या डब्यांची चाचणी सुरू होती.
चाचणी सफल होती.. पण ती कंपनी १० डब्यांच्या गाडीसाठी सुमारे २५० कोटी रुपये मागत होती. शिवाय तंत्रज्ञान देण्याचा करारही करत नव्हती.
अशा परिस्थितीत या इंजीनियरने संकल्प केला की ‘ आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.’
रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले, “Are You Sure, We Can Do It ?”
उत्तर होते… “Yes Sir! “
“ किती पैसे लागतील R&D साठी ?” —- “ फक्त १०० कोटी रु सर!”
रेल्वेने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.
त्या अधिकार्याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले.
दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले, त्याला आपण ट्रेन १८– म्हणजेच “ वन्दे भारत रॅक” नावाने ओळखतो.
आणि ठाऊक आहे या १८ डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला? केवळ ९७ कोटी ! जेव्हा की Talgo केवळ १० डब्यांच्या ट्रेनचे २५० कोटी मागत होती.
ट्रेन १८ हा भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हिरा आहे.
या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे की, या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण हिचा प्रत्येक डबा स्वतःच ‘ सेल्फ प्रोपेल्ड ‘ आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.
दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक, वन्दे भारत ट्रेन या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.
या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे सुधांशु मनी.२०१८ मध्येच हे निवृत्त झाले.
या देशात ट्रेन-१८ च्या यशासाठी कुणी या टीमचे कौतुक तर केले नाहीच, परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा वन्दे भारत म्हशीला धडकली आणि तिचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला, तेव्हा सर्व वामपंथी आणि देशद्रोही ट्रेनच्या अपयशाच्या नावाने शंख करायला लागले, तेव्हा सुधांशु सरांना दु:ख झाले. आणि त्यांनी एक लेख लिहून त्या ट्रेनच्या डिझाईनची वैशिष्ठ्ये सांगितली…
श्री. मनी सेवानिवृत्त होऊन सध्या लखनऊला रहात आहेत.
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ देवा तू करतोस ते योग्यच आहे… सौ.शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
आज फ्रीज उघडला तर काय काय त्यात भरलेले. महालक्ष्मी साठी केलेले पुरण ,ओल्या नारळाचे उरलेले सारण, परवा बाप्पांच्या विसर्जनासाठी केलेली वाटली डाळ, असे बरेच उरलेले ठेवलेले.
बाप्पा आले पण येताना काही आणले नाही,अगदी दहा दिवस लागणार माहित असूनही, कपडे नाही,औषधे नाही,अंथरायला नाही, पांघरायला नाही, छत्री,रेनकोट ,अगदी साधा रुमालही नाही.
त्यांना माहीत होत खाली भौतिक सुखाचा सतत विचार करणाऱ्यांनी त्यांची चोख व्यवस्था केली आहे. नसती केली तरी बाप्पा कोणत्याही परिस्थितीत अगदी आनंदात आहेतच.
ते जातांना माझ्याच मनाची घालमेल, की शिदोरी द्यायची बाप्पांना. पुन्हा २१ मोदक केले, डाळ केली. नैवेद्याच्या वाटीत नैवेद्य ठेवला. तेवढाही नेला नाही. पण आले तेव्हा जसे आनंदी होते, प्रसन्न होते, तसेच जातांना होते. डोळ्यातून आशिर्वादाची,समाधानाची झलक दिसत होती.
महालक्ष्मी येण्याआधी तेच झाले. किती ती तयारी. घराची स्वच्छता,आरास करण्यासाठी बाजाराच्या चकरा. महालक्ष्मीसाठी साड्या घेतांना मला आवडल्या म्हणून बाजूला काढलेल्या अजून दोन तीन साड्या. तिच्यासाठी म्हणून दोन आणल्या खऱ्या, पण त्यातही एक मला होतीच….. मग फुलोरा, पुरण, त्या १६ भाज्या,चटण्या, कोशिंबिरी.
आधीच्या खूप पसाऱ्यातून, आधीच्या कुळाचारातून ,रीतीरीवाजातून, माझ्या मनाच्या घालमेलीनंतर मीच कमी कमी केलेले ,थोडे सुटसुटीत होईल असे पदार्थ, नैवेद्य, त्यात माझा ओतलेला सुगरणपणा……. हे सगळं सगळं करून खूप थकायला झाले. पण त्या महालक्ष्मी आणि त्यांच्या बाळांनी जाताना काहीही नेले नाही, त्या पिटुकल्यांनी जाताना आई जवळ काहीही हट्ट केला नाही. त्याही जाताना भरभरून आशीर्वाद देऊन गेल्या….. कुंकवाच्या करंड्यात मला भासतील असे दोन चिमटीच्या खुणा ठेवून गेल्या. दोन्ही सणांनी खूप खूप आनंद दिला.
पण आता हा उरलेला मागचा पसारा बघता सहज मनात विचार आला, मला जर कोणी दहा दिवसात किंवा तीनच दिवसात सगळं पटापट आवरून आता चला, बास आता इथले वास्तव्य ,असे जर म्हणाले तर माझे कसे आवरेल?
…… बापरे! हा विचार नुसता मनात आला आणि सर्व ब्रम्हांडच आले डोळ्यासमोर…..
नुसते थोडा वेळ बाहेर जायचे म्हंटले तरी पाऊस येईल का?—कपडे बाहेर आहेत का?—अन्न झाकलेय का?—
मी बाहेर गेल्यावर गॅसवाला येईल का?—मोबाईल घेतलाय का?——बापरे बाप किती विचार डोक्यात.
साधे एक दिवस गावाला जायचे म्हंटले तर मी १० साड्या पलंगभर पसरवून ठेवते. कोणत्या दोन घ्याव्यात ह्यावर माझेच माझे एकमत होत नाही. काही साड्या जाड,जड, फुगणाऱ्या, काही चुरगळणाऱ्या, काही ओल्या झाल्या तर खराब होतील का? असे ढीगभर विचार डोक्यात—-
——मग कायमचे जायचे असेल, त्यात बरोबर काहीच न्यायचे नाही ,आणि दोन, तीन, फारतर दहा दिवसात सगळाच पसारा आवरायचं म्हंटले तर कसे होणार?
परवा त्या सायरस मिस्त्री नावाच्या टाटा कंपनीच्या मोठ्या व्यक्तीला अपघात झाला. केवढा पसारा,केवढे साम्राज्य असेल त्यांचे? किती कोटींची गुंतवणूक, किती कोटींची उलाढाल… कसं आणि कोणी आवरायचं हे सगळं. त्यांनी जे ठरवले असेल ते तसेच राहिले की मनात…..
खूप वेळा एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं.
मग कधी कधी वाटते की ह्या पॉलिसीज, इन्शुरन्स, ही संपत्ती, हे खोऱ्याने चोरून लपवून ठेवलेले पैसे, काळे धन, लॉकर्स, शेती, जमिनी, कारखाने, नाव, पद, प्रतिष्ठा, इगो,ह्या सगळ्या सगळ्याला खरंच काय अर्थ आहे?—-
—-तरी माणूस धावतोच आहे, धावतोच आहे ,तोंडाला फेस येईपर्यंत पळतोच आहे ,खोटी खोटी स्वप्न बघतोच आहे, झगमगाटी दुनियेमध्ये रमतोच आहे. कसलाच भरवसा नाही तरी तीन तीन महिन्यांचे रिचार्ज मारतोच आहे.
गाड्या ,फ्लॅट,बुक करतोच आहे—-
—- का ? कशासाठी?
दरवर्षी येणाऱ्या आणि बुद्धीची देवता असणाऱ्या बाप्पाकडून काहीच शिकत नाही. उलट त्या बाप्पांनाच पुन्हा पुन्हा ह्या येण्याजण्याच्या फेऱ्यात अडकवतोय—-
“ गणपती बाप्पा मोरया — पुढच्या वर्षी लवकर या.” –
बाप्पा ही येतात तेही काहीच न घेता, जाताना काहीच न नेता. आणतात फक्त आनंद..देतात फक्त आनंद.
आपणच अडकलो आहोत ह्या चक्रव्यूहात— अडकण्याचे सगळे मार्ग आपण माहित करून घेतलेत. बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नकोय.
ह्या जीवाचे तंतर काही समजत नाही—
आला सास गेला सास, जिवा तुझं रे तंतर..
अरे जगणं मरण एका सासाच अंतर!
देव कुठे? देव कुठे,आभायाच्या आरपार!
देव कुठे, देव कुठे तुझ्या बुबाया मधी र !
हा आपल्याच बुबुळामधील देव, आपल्याच बुबुळामधील आपल्या प्रेमाचा माणूस, आपल्याला शेवटपर्यंत दिसत नाही.
देव येतात ,देव जातात, आशीर्वाद देतात ,आनंद देतात. प्रत्येक वर्षी तेच ते सांगण्यासाठी येतात. पण तरीही आपल्याला काहीही समजत नाही. देवांच्याकडून, निसर्गाकडून आपल्याला काही शिकवण घ्यायचीच नाही. ते दोघेही नुसते देतच असतात. कसलीच अपेक्षा न ठेवता– पण मुळात आपल्याला समजूनच घ्यायचे नाही.
आपण तर आपल्या आईवडिलांच्याकडून ,आणि आईवडील मुलांच्या कडून अपेक्षा ठेवतात.
एक साडी कुणाला दिली तर तिने चार डबे घासून द्यावे अशीही आपली अपेक्षा असतेच.
गणपती बाप्पा तू बुध्दीची देवता.
लहानपणी रोज आई म्हणून घ्यायची ते आजही आठवतंय— ‘ की देवा मला चांगली बुध्दी दे.’—आता कुणी हे असे मागणे फारसे मागताना दिसतच नाही.
मागण्या पण काळानुरूप बदलल्या आहेत. गणपतीकडे तरी तेच मागायचे लोक.
तो येताना बुद्धी आणत असेल वाटायला सोबत… पण कुणी मागितली तर ?
असो. माणसाच्या ह्या सगळ्या वागण्यामुळे त्याने काही प्यादी अजून त्याच्या हातात ठेवली आहेत.
त्याला माहित आहे की ह्या आधाशी माणसाला नेण्याची पूर्व कल्पना दिली, तर काय काय बांधून वर नेईल हा.
तो सगळा विचार करूनच त्याची गणितं संपली की तो काहीच विचारत नाही.–बोलावणे आले की नेतोच.
नाहीतर हा माणसाचा जमवलेला पसारा तीन दिवसात, दहा दिवसात काय, तर कधीच न आवरता येणारा आहे.
तो फक्त ह्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतो. बाकी काही नाही.
देवा तू करतोस ते योग्यच आहे.
लेखिका : सौ.शुभांगी देशपांडे
संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी छत्रपती संभाजी महाराज नगरमधे येतो…!!
एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकते का?
या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल.
मात्र औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचा रहिवासी तब्बल तीस वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची..
सध्या केनियाचे रहिवासी असलेले रिचर्ड शिक्षणासाठी औरंगाबादेत होते. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल ३० वर्षांनी परत आले. तब्बल तीस वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून औरंगाबादच्या गवळी कुटुंबीयांना झाली. खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण औरंगाबादेत झालं होतं. मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते औरंगाबादेत एकटे रहायचे. खाण्याची-राहण्याची सगळीच अडचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडेनगरमध्ये काशिनाथ गवळी यांचं किराणाचं दुकानं होतं. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायची. रिचर्डही त्यापैकीच एक. रिचर्डना काशिनाथकाकांनी मदत केली आणि त्यांना रहायला घर मिळालं. इतकंच नाही, तर खाण्यापिण्याच्या वस्तूही ते काशिनाथकाकांच्या दुकानातूनच घ्यायचे. १९८९ मध्ये त्यांनी औरंगाबाद सोडलं त्यावेळी काशिनाथकाकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती. रिचर्ड मायदेशी परतले. तिकडे राजकारणात जाऊन त्यांनी मोठं पदही मिळवलं, मात्र भारताची आठवण त्यांना कायम यायची. त्यात खास करुन काशिनाथकाका यांनी केलेली मदत आणि त्यांच्या 200 रुपये उधारीची जाणीव त्यांना होती. गेली 30 वर्ष त्यांना भारतात यायला जमलं नाही,
मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्यांची पावलं आपसूकच औरंगाबादकडे वळली आणि त्यांनी शोध घेतला तो काशिनाथकाकांचा. तब्बल दोन दिवस त्यांनी काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली. ही भेट रिचर्डसाठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली. काकांना पाहून ते रडायला लागले. खरंतरं काकांच्या नीटसं लक्षातही नव्हतं. मात्र रिचर्डने ओळख दिली आणि काकांना सगळं आठवलं. ही भेट म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आल्याचं रिचर्डने सांगितलं. आणि पैसै परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारतानेच शिकवला असल्याचंही ते आवर्जून सांगतात.
“ काकांनी त्यावेळी मदत केली, त्यांचे फार उपकार माझ्यावर आहेत, अनेक वर्ष त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करु, हे सुचत नव्हतं. मात्र यावेळी भारतात आलो आणि थेट त्यांचं घरचं गाठलं. त्यांना भेटून आनंद झाला, पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे, असं लोक म्हणतात, मात्र हे मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे, अशा शब्दात रिचर्डने आपल्या भावना व्यक्त केल्या.”
‘ अनेक वर्ष रिचर्ड गवळी कुटुंबाबद्दल सांगत होते, मात्र भेट काही शक्य होत नव्हती. अखेर यावेळी ती झाली, याचा रिचर्डना आनंद आहेच, मात्र मलाही अभिमान असल्याचं’ रिचर्डची पत्नी मिशेल टोंगी यांनी सांगितलं. “काशिनाथकाकांचा उल्लेख त्याने बरेच वेळा केला होता, मात्र आज भेट झाल्याचा आनंद वाटला.’ नवऱ्याच्या प्रामाणिकपणाचा निश्चितच अभिमान असल्याचं मिशेल म्हणतात.
काशिनाथ गवळी यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात टोंगी दाम्पत्याचं स्वागत केलं. मराठमोठ्या पद्धतीनं टॉवेल-टोपी आणि साडी देऊन त्यांनी दोघांचा सत्कार केला. रिचर्डने त्यांच्या घरी जेवणही केलं. अजूनही काशिनाथरावांचं प्रेम कायम असल्याची भावना रिचर्डने व्यक्त केली. त्यांनी काशिनाथकाकांना केनियाला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे.
प्रामाणिकपणा कोणी कोणाला शिकवू शकत नाही, तो रक्तातच असावा लागतो, हेच खरं.
लेखक : अज्ञात
संग्राहिका – माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळही असतो.आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा …!
घराघरात कुशल गृहीणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपुर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात.मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो. निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो.
ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं तशा केल्या आणि संपल्या सुध्दा अशा गायब होतात.
चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो ती खाल्ल्यावर डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणा-याला फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी असं माझं मत आहे.
पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय.
प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते ती गृहीणींना अचूक माहीती असते ईतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळीभाबडी जनता उगाच आनंदून जाते पण त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं.
डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळयांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवला जातो कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ येत असते.
जास्त मीठ मसाला तळाशी असलेला दाणे संपत चाललेला चिवडा कांदा- टाॅमेटो -कोथिंबीरीचा मेकअप करुन समोर येतो. मिसळीचा बेत आखला जातो.
शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही तो संपतो पोहे उपमा करुन त्यावर सजावटीसाठी वापरली जात ती संपते.
असा हा ‘परतीचा फराळ’ दिवाळीच्या आठवणींचा… रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा…जिभेवर रेंगाळणा-या चवीचा… जाताजाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र धमाल करु म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यातून बाहेर पडणारा… गृहिणीला केल्याचं समाधान- कौतुक देणारा…आणि शेवटी शेवटी संपत जाताना आणखी चविष्ट होत जाणारा … परतीचा फराळ
हो आणि एक राहीलंच घरोघरी ताटं यायची घरोघरी ताटं जायची.
त्यात घरोघरच्या चकल्या कडबोळ्या काही कडक काही तिखट काही खुसखुशीत तर काही वातड पण सगळ्यांना मुक्ती मिळायची ताकाच्या झणझणीत कढीत समाधी मिळायची. एक वेगळीच सबगोलंकारी चव यायची जठराग्नीची तृप्ती व्हायची.
काही फुकट जाण्याचा विषयच नसायचा.
अन्नब्रह्माची किंमत असायची
🙏
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दिवाळी तशी आटोपून गेली तरी अजून फराळाचे डबे गच्च भरलेले आहेतच. आम्हां बायकांची एक गम्मतच असते एकीकडे वजन वाढतयं म्हणून काळजीत पडतो आणि एकीकडे खाद्यपदार्थांच्या डब्यांची शीग उतरु मुळी देत नाही. खरचं आपली खाद्यसंस्कृती आहे मोठी विलक्षण.
ह्या खाद्ययात्रेत दोन गट पडतात . एक गट तब्येतीनं खाणा-यांचा आणि एक गट भरभरून खाऊ घालणा-यांचा. आग्रहाने खाऊ घालणा-या तमाम लोकांना सलाम आणि त्यांच्या पदार्थांना न्याय देणा-या, अन्नदात्यांना “सुखी भव”असा आशिर्वाद देणा-यांनांपण सलाम.
एक नोव्हेंबर. नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस,पहिली तारीख. ही एक तारीख पुर्वी नोकरदारांसाठी फार महत्त्वाची असायची. आजचा हा दिवस “जागतिक शाकाहार दिन” म्हणून ओळखल्या जातो.
कुठल्याही व्यक्तीची आहाराविषयी आवडनिवड ही त्याच्या रहिवासाच्या भोवताली असणारी भौगोलिक परिस्थिती, हवामान तसेच आजुबाजुचे वातावरण, लहानपणापासूनच्या सवयी,मनावर असलेला पगडा ह्यावर अवलंबून असते. खरं सांगायचं तर ज्या गावातून, घरातून, संस्कृतीतून,संस्कारांमधून आम्ही मोठे झालो, घडलो त्यात लहानपणी तर शाकाहाराशिवाय दुसरा कुठला आहार असतो हे आमच्या गावीही नव्हंतं.किंबहुना शाकाहाराशिवाय दुसरा कुठला सामिष आहार असतो ही गोष्ट लहानपणीच्या आकलनशक्ती पलीकडील बाब होती.
पुढे हळूहळू वयाची शाळकरी फेज पार करतांना विज्ञानाचा अभ्यास करतांना “जीवनसाखळी”ची संकल्पना वाचनात आली, आणि मग सामिष आहार हा आपण घेत नसलो तरी तो आहार निषीद्ध नसून उलटपक्षी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक सुद्धा असतो ही नवी बाब कळली. जीवनसाखळी सुरळीत सुरू राहण्यासाठी मी जरी शाकाहारी असले तरी सामिष आहार घेणारे पण भरपूर लोक असतात हे मैत्रिणींच्या बरोबर गप्पांच्या ओघातून कळले.
आपली शाकाहारी खाद्यसंस्कृती होते पण एक अफाट खाद्यसंस्कृती आहे हे नक्की. खरतरं फक्त शाकाहारी आणि दोन्ही प्रकारचा आहार घेणाऱ्यांमध्ये कोण चूक कोण बरोबर हा मुद्दाच नसतो मुळी.कारण मानवाला नुसते उदरभरण म्हणून अन्न सेवन करायचं नसतं तरं त्याचबरोबर “जिव्हा”याने की “रसना”तिलापण प्रसन्न, तृप्त ठेवायचं असतं.आणि प्रत्येक व्यक्तीचे जीभेचे चोचले हे वेगवेगळे असूच शकतात. फक्त खाणं असो वा बोलणं, आपली जिव्हा ही आपल्याच ताब्यात हवी हे मात्र नक्की.
मी स्वतः संपूर्णपणे शाकाहारी असले तरी वेगवेगळे सामिष, पौष्टिक पदार्थ खाणा-या दर्दी मंडळींचं मला प्रचंड कौतुक वाटतं.खरी दर्दी मत्स्यप्रेमी,मांसाहारी मंडळी डोळेमिटून कुठल्या प्राणीजातीचा आहार आपण घेतोय हे छातीठोक सांगू शकतात त्यांच्या खव्वैयेगिरीला आणि अभ्यासाला सलाम.
शाकाहारी मंडळींमध्ये एकच प्रकार असतो परंतु मासांहारी मंडळींमध्ये वेगवेगळे प्रकार असतात,एक बेधडक सामिष आहार घेतो हे सांगणारे आणि दुसरे लपूनछपून खाणारे. असो
पु.ल.देशपांडे ह्यांची खाद्यसंस्कृती वाचली की शाकाहाराचा आवाका किती मोठा,प्रचंड आहे ह्याची कल्पना येते.मी तर पु.ल.चं खाद्यसंस्कृती वाचल्यानंतर प्रत्येक वाचनानंतर मला काहीतरी दरवेळी वाचन हाती लागतं.