मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ “काळजी—घेणे आणि करणे…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “काळजी—घेणे आणि करणे…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल एक गौरगोपालदासजींची छोटीशीच पण भरपूर समज देणारी आँडीओक्लीप ऐकली.गौर गोपाल दास सांगतात, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, पण तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित करता की सुखावर, यावर तुमचे भवितव्य अवलंबून असते. गौर गोपाल दास यांनी साधू संतांच्या बाबतीत म्हटले, की संसारी माणसालाच दुःख असते असे नाही, तर सन्यस्त माणसालाही दुःख आहेच. कारण जोवर आपण देहाने या जगात आहोत, तोवर राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकार चिकटलेले असणारच. तसेच जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी पैसा लागणारच, शारीरिक व्याधी होणारच, थंडी, ऊन, वारा, पाऊस  यांचा जाच होणारच. मात्र या सगळ्या गोष्टी घडूनही आपण त्यातून स्वतःसाठी जर आनंद शोधायचा ठरवले तरच आनंदी राहू शकतो.

ही क्लीप ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपलं जितकं नुकसान येणाऱ्या संकटाने होतं त्याच्या कित्येक पट  जास्त नुकसान ते संकट प्रत्यक्ष यायच्या आधीच्या भितीने, कल्पनेने आपलं आँलरेडी होऊन जातं फक्त आपल्या ते लक्षात येत नाही वा जाणवत नाही. काही वेळा आपण करीत असलेल्या अवास्तव काळज्याचं आपले जास्त मानसिक खच्चीकरण करतात.

मानवी स्वभाव मोठा अनाकलनीय आहे. बरेच वेळा आपल्या स्वतःला “बाबापुता” करुन स्वतःच्या मनाला कुरवाळयला,सांत्वना द्यायला फार आवडायला लागतं,मग आपण ते सहाणेवर गंध उगाळल्यासारखं आपल्याच दुःखाचे, व्यथांचे वेटोळे ,फेरे स्वतःभोवती फिरवीत बसतो आणि इथेच आपला घात होतो.

स्वतःच्या मनाला कणखर बनवून संकटाला दटके सामना करायला फक्त आणि फक्त तुम्हीच शिकवू शकता.

..सद्यस्थितीत नैराश्याने ग्रासलेले लोक परदेशातच नाही तर भारतातही मोठ्या प्रमाणात आहेत. याचे कारण शोधायचे झाले तर लोक स्वमग्न होत आहेत. आपल्या विषयात अडकून राहिलो कि आपल्याला आपले प्रश्न मोठे वाटतात आणि आपण त्याचाच विचार करत बसतो. दर दिवशी नवीन आव्हाने, नवीन प्रश्न समोर येणारच आहेत, मात्र प्रश्नांनी समस्यांनी खचून न जाता आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला तर आपणही आनंदी होऊ शकतो. म्हणजेच काय तर राग, दुःख, त्रास आपोआप येऊन आपल्याला चिकटणार आहेच, पण त्यातून आनंद आपल्याला जाणीवपूर्वक निवडावा लागेल.

…कुठल्याही संकटाचा कमी जास्त प्रकोप हा आपल्याला वाटणा-या भितीशी संलग्न असतो.नुकत्याच आलेल्या संकटाच्या लाटेनं हे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव करुन दिली.ह्या भितीचा उगम हा काळजी मधून होतो.काळजीचा अतिरेक झाला की त्याची जागा भिती घेऊ लागते आणि भीतीची का एकदा मनावर पकड बसली की संकटाचा उद्रेक सुरू होतो.

कुठलही नवीन संकट सामोरं येऊन उभं ठाकलं की त्याबद्दलची भिती मनात घर करुन बसते,नव्हे अगदी ठाणच मांडून बसते.त्या संकटाची तीव्रता ही परिस्थिती पेक्षाही आपल्या मनाच्या अवस्थेतील काळजी,भीती ह्यांनी वाढते.

पण ह्या मनाने लाऊन घेतलेल्या भितीलाही शेवटी कुठेतरी मर्यादा ही असतेच.कालांतराने ही भितीही आंगवळणी पडल्यासारखी मानगुटीवर चढूनच बसते.पण नंतर एकवेळ अशी अवस्था येते की ह्या काळजी,भिती ची कमाल मर्यादा ओल्यांडल्या जाते आणि मग त्या क्षणापासून त्यातील हवाच निघून जाते.मनात निर्माण झालेली भिती हीच परिस्थिती बिघडवण्यास जास्त कारणीभूत असते.नोकरी घरकाम, वाचन लेखन वा तत्सम आपल्या आवडत्या कला ह्या सारख्या सकारात्मक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं तर मग परिस्थिती चुटकीसरशी सकारात्मक होते.

कदाचित काही वेळी परिस्थिती फारशी बदलली जरी नसली तरीही स्वतः मधील बदलांमुळे ह्या संकटातून बाहेर पडल्यासारखं वाटतं हे नक्की. त्यामुळे सभोवताली निरभ्र आकाश आणि घेतलेला मोकळा श्वास सुखावू लागतो.काळजी जरुर घ्यावी पण काळजी करीत बसू नये हे मात्र कोरोनानेच शिकविले

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दडपण — महिला दिनाचे !!… ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ दडपण — महिला दिनाचे !!… ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

मला ‘महिला दिन’ आला की दडपण येते… महिला दिनी मला काय वाटले पाहिजे, मी काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे म्हणजे महिला दिनाचा आनंद मला आहे असे प्रतीत होईल, हे मला कळत नाही. एकाहून एक सुंदर आणि कलात्मक banners, भावनेला हात घालणारे संदेश, स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणारे लेख, ह्यांनी फोन भरून गेलेला असतो. ह्या दिवसाच्या निमित्ताने गोष्टींचा व्यापक आढावा घेणे, सिंहावलोकन करणे, हे कुठेच दिसत नाही. फक्त उत्सवी प्रक्षेपण दिसते. 

वास्तविक भारत हा खूप मोठा देश आहे आणि ज्याला जसा पाहिजे तसा तो त्याला दिसतो. म्हणजे देशातल्या सर्व महिला आपल्या सारख्याच आहेत, असा भाबडा समज होऊ शकतो. खरं तर आपला देश म्हणजे वीसेक युरोपीय देशांचा ऐवज होय. तर मग वीस प्रदेश, त्यांच्या भाषा, संस्कृती, समाजव्यवस्था – आणि ओघानेच तितक्याच प्रकारात मोडणाऱ्या महिला. त्यात भर म्हणून प्रत्येक प्रांतातले विविध स्तर – प्रिविलेज्ड क्लास, एन्टायटल्ड क्लास, अंडर प्रिव्हिलेज्ड क्लास, असे अनेक. शिवाय धर्म, जात इत्यादी वर्गीकरणं, ती तर आहेतच. ह्या व इतर प्रकारात मोडणाऱ्या महिला, त्यांच्या समस्या, कसोट्या, अडचणी एका सूत्रात बांधता येतील का? मग महिला दिन हा सगळ्यांसाठी एकच प्रकारात मोडेल का? मला जे वाटते तेच माझ्यापासून शंभर किलोमीटरवर राहणाऱ्या महिलेला वाटेल का? मग महिला दिन सामान्यकृत असू शकतो का?

काय केले किंवा कसे वागले म्हणजे आपण योग्य अर्थाने स्त्री म्हणून स्वाभिमानाने आणि आनंदाने जगू शकू? काय विचार केल्याने आपण खऱ्या अर्थाने मुक्त पण जबाबदारपणे आयुष्य जगू शकू? कुठल्या दिशेने आपल्याला ‘स्व’चा शोध होऊ शकेल? महिला म्हणून आपल्या स्वतःकडून काय अपेक्षा आहेत?  त्याचप्रमाणे महिला म्हणून इतरांनी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात?—- अनेक वर्षं शोषण व अन्याय सहन करणाऱ्या वर्गाच्या हातात अधिकाराचे बळ आले की तोच वर्ग तसेच शोषण आणि अन्याय करू लागतो हा अनुभव खरं तर बऱ्याचदा येणारा. मग आता स्त्रीच्या बाबतीतही ही अशीच व्याख्या होणार नाहीये ना? आपल्याला स्त्री म्हणून विशेषाधिकार हवा आहे का समानाधिकार? —– ह्या व अश्या अनेक गोष्टींचे विचार महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षी माझ्या डोक्यामध्ये येतात. त्यामधे एक भीती देखील वाटते….. स्त्रीची खरी अस्मिता आणि भावना या ‘ महिला दिना ‘च्या गलक्यात हरवत जात नाहीये ना? नाहीतर स्त्री समानता, स्त्रीमुक्ती, महिला सशक्तीकरण या चळवळी, फक्त दिसायला सुरेख असणाऱ्या banners आणि भाषिक सौंदर्य असणार्‍या संदेशापलीकडे जाऊच शकणार नाहीत !… असेही होऊ शकते की …

© सुश्री अश्विनी अभ्यंकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैदिक मूर्तीकार श्रीमान अत्तार…लेखक – अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

वैदिक मूर्तीकार श्रीमान अत्तारलेखक – अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आज एक वेगळाच विषय मांडतोय!! जिथे जिथे म्हणून हिंदु संस्कृती विस्तारली, फोफावली, विकसित झाली, अशा जगाच्या एका मोठ्या भूभागावर आजही त्या संस्कृतीच्या खुणा ठळकपणे दिसतात! मग ते आंगकोरवाटचे मंदिर असो वा अफगाणिस्तान मधील भव्य बुद्ध मंदिर असो. त्या त्या ठिकाणी हिंदुंच्या पूजा पद्धतीतील अनिवार्य अशा विविध देवांच्या मूर्ती आढळतात! भारतात खूप ठिकाणी संगमरवराची मंदिरे असतात आहेत. पण या प्राचीन मंदिरात श्रीमूर्ती मात्र काळ्या पाषाणाचीच असते !!

आमच्या गावात पुरातन गणेश मंदिर आहे. ते अगदी हायवेला नजीकच आहे. पण त्यात मूर्ती नव्हती. खूप वर्षे ! आमची पिढी अगदी गद्धेपंचविशीत होती तेव्हा आम्ही त्या देवळाचा जीर्णोद्धार केला अन् पंढरपूरहून संगमरवरी गणेशाची मूर्ती आणली ! आमच्या बुद्धीप्रमाणे त्या मूर्तीकाराला, मूर्तीला रंग देऊ नको असे सांगितले.कारण जर का मूर्ती कुठे भंग पावली असेल तर ती जाणवावी ! यथावकाश विधीवत अर्चा वगैरे होऊन नित्यपूजा सुरु झाली ! पूजेत वापरण्यात येणाऱ्या दूध, दही, साखर, तुप, मध वगैरे बाबी अन हवामानामुळे त्या मूर्तीवर जो पावडरचा थर त्या ‘जाणत्या’ मूर्तीकाराने दिला होता, तो निघून गेला; अन् एक भयानक वास्तव सामोरे आले !! त्या मूर्तीला पोटापासून कंबरेपर्यंत तडा होता हो !असो.

मग जाणत्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मूर्तीचा शोध सुरु झाला. अन नांव समोर आले ते बेळगांवचे प्रसिद्ध मूर्तीकार श्रीयुत अत्तार यांचे !!लगेचच आम्ही बेळगांवला गेलो अन अत्तारजींकडे पोहोचलो !नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी येण्याचे प्रयोजन विचारले. आम्ही सारं घटीत अघटित सांगितले. त्यावर ते उत्तरले की माझ्याकडून मूर्ती हवी असेल, तर किमान एक वर्ष तरी लागेल. आम्ही कबूल झालो !

त्यांनी विचारले की मूर्ती कशी हवी ?क्षणांत आम्ही म्हटले की, दगडुशेठ सारखी हवी! मग ते विचारते झाले की तुम्हाला मूर्तीकलेतील कितपत ज्ञान आहे? मग आमची बोलती बंद! मग त्यांनीच मूर्तीकलेबाबत सखोल माहिती दिली. ते स्वत: कर्नाटक विद्यापीठात, आयकॉनॉलॉजी विभागाचे (निवृत्त) मुख्य होते. अन महत्वाचे हे की त्यांचे घराणे म्हैसूर नरेश वाडीयार यांचे पिढीजात राज शिल्पी आहेत! ते म्हणाले की तुम्ही कोणतीही पुरातन देवालये पहा, ती वस्तीत नव्हती. तर कुठे जंगलात, डोंगरावर आहेत. याचे कारण ज्या देवाचा वास ज्या स्थळी आहे तिथेच ते देवालय बांधायचे असते. उदाहरणार्थ देवीचे मंदिर जर बांधायचे असेल तर एक विशिष्ट विधी करुन ठरवावे लागते की देवीचा वास कुठे जास्त आहे ते! मग तिथे एक विहिरसदृष्य खड्डा खणण्यात येतो. ठराविक खोलीवर त्या विहिरीला जिवंत झरा मिळतो. त्या झऱ्यावर सहा ते आठ इंच जाडीचा तांब्याचा पत्रा ठेवायचा. अन त्या पत्र्यातून तीनचार इंच जाडीचा ताम्ररज्जु जमिनीवर आणायचा. त्या तांब्याच्या दोराला ‘एनर्जी थ्रेड’ असे म्हणतात. मग त्या दोऱ्यातून सप्त धातुंचे सप्त कलष ओवायचे. त्या सप्तकलशात सप्तधान्य, सप्तनद्यांचे पाणी वगैरे पवित्र वस्तू भरत भरत ती विहिर बुजवायची. आणि त्या दोराचे जे वर आलेले टोक आहे तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. आणि मूर्तीच्या मूलाधार चक्राजवळ तो दोरा जोडून द्यायचा. म्हणजे  मग ती देवालये निरंतर टिकतात. त्यांची ख्याती होते वगैरे!

आणि मूर्ती कोणत्या दगडाची असावी हे सांगताना ते म्हणतात की मूर्ती ही कृष्णशीळेतच हवी !

भारतात साधारण तीन प्रकारचे दगड आढळतात. ते म्हणजे काळा दगड, संगमरवर आणि ग्रॅनाइट! यातील ग्रॅनाइट हा नपुंसक दगड आहे. संगमरवर हा स्टोअरेज कॅपॅसीटी नसणारा दगड आहे. तर कृष्णशीळा हा दगड, तुम्ही जे जे संस्कार त्या मूर्तीवर कराल ते साठवून ठेवण्याची क्षमता अन् योग्य वेळी भक्तांना फळ देण्याची शक्ती, कृष्णशीळेच्या मूर्तीत असते ! नंतर ते म्हणाले की मी वेदात जसे वर्णन आहे, तशीच मूर्ती घडवतो ! जर वेदपाठशाला असेल तर तिथे विद्यागणेशाची मूर्ती आवश्यक. नांदत्या घरात कधीही नटराजाची मूर्ती स्थापू नये कारण ती नाट्यदेवता आहे. घराचं नाट्यमंदिर व्हायला वेळ लागणार नाही ! तसेच गणेशाच्या मूर्तीच्या हातात परशु, पाश, लाडु/मोदक ह्या बाबी अत्यावश्यकच. प्रभावलय(प्रभावळ) हवेच. त्याचा किरीटही विशिष्ट असा हवा! प्रत्येक देवतेच्या मूर्तीला एक ताल असतो. जसे विष्णूची मूर्ती नवतालात, देवीची सप्ततालात तर गणेशाची मूर्ती पंचतालातच असावी! आता म्हणाल ‘ताल’ म्हणजे काय? तर मूर्तीच्या चेहऱ्याच्या पांचपट मूर्तीचे शरीर; म्हणजे पंचताल!  बघा विष्णुच्या मूर्ती ह्या उंच असतात अन् गणपतीची बैठी असते !

एवंच आम्हाला अत्तारसाहेबांनी ज्ञानी केले. मूर्ती घडवून दिली ती अगदी सुबक!

आता हे ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी लिहिलेय. आपल्या पूर्वसुरींनी आपल्यासाठी केव्हढे ज्ञानभांडार ठेवलंय याचीही कल्पना यावी. आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याची जाणीव असावी.

म्हणून हा लेखन प्रपंच!!

लेखक – अप्पा पाध्ये गोळवलकर

गोळवली, कोंकण, ९८९०८ ३९४९३

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पूर्णांगिनी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ पूर्णांगिनी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

(अंतरराष्ट्रीय महिला दिन 2023)

नवरा बायको, दोन मुलं वा एक मूल अशी साधारण कुटुंबाची हल्ली रचना आढळते. संयुक्त कुटुंब पद्धती आता कमी होऊ लागली आहे. या आगोदर कोणत्याही कारणाने जोडीदाराचा मृत्यू झाला तर त्या बाईला आणि तिच्या मुलांना सर्वस्वी सासरच्या किंवा माहेरच्या लोकांवर अवलंबून राहावे लागत असे. एका बाजूला तिची ते त्यांच्या परीने जबाबदारी उचलताना दिसत होते. दूसऱ्या बाजूला तिला कुणाकडूनही मदत न मिळाल्याने तिची खूप वाईट अवस्था होत असे. आता ही काही ठिकाणी हे पाहावयास मिळत आहे. सावित्रीजोतीबांनी शाळेची सुरुवात केली त्या काळात जे स्त्रीयांचे हाल होते ते आता कमी झाले आहे. तेव्हा पेक्षा बराच बदल झालेला आहे. त्यावेळी मुलींचे शिक्षण खूपच कमी असायचे अगदी वाचायला येण्या इतपतच होते. हल्ली मुलींचे माध्यमिक तसेत उच्च माध्यमिक शिक्षणाचे प्रमाण चांगले आहे. त्यांचे स्वाभिमान, आत्मभान जागृत होताना दिसत आहे. अडथळे कमी झालेले नाहीत वा पुरुषसत्ताक/ पितृसत्ताक  व्यवस्थेत खूप काही अफलातून बदल झालेले दिसून येत नाहीत, तरीही शिक्षणाने इच्छाशक्ती व आत्मविश्वास वाढला आहे असे म्हणता येईल. सावित्रीजोतीबांच्या आणि बाबासाहेबांच्या योगदानाचे हे फलित आहे. हे विसरुन चालणार नाही. कुणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी होण्याची इच्छा प्रबळ होताना दिसते आहे. त्या प्रबळ ईच्छाशक्तीला सहकार्याची जोड म्हणावी तशी मिळत नाही. सगळेच अलबेला आहे असे नाही पण जात्यापासून काॕम्पुटर, स्मार्ट फोन पर्यंतचा तिचा प्रवास अनेक अडथळ्यांच्या शर्यतीतही उठावदार झाला आहे.

बायका स्वबळावर कुणाचाही आधार नसताना खूप घडपडताना दिसतात. यात सुशिक्षित आणि अशिक्षित असा भेद होऊ शकत नाही. करुच नये. प्रत्येक स्त्री स्वतःच्या कौशल्याचा कुटुंबासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहे. 

जोडीदाराचा अचानक मृत्यू झाल्यावर अथवा शेतकरी कुटुंबात व इतर व्यवसायात जोडीदाराने अनेक अडचणींना तोंड देताना आलेल्या मानसिक तणावाने स्वतःचे जीवन संपवलेले असले तरी या महिला हिंमतीने जगणं उभे करताना दिसतात. कोविडच्या काळात अनेक जणींनी जोडीदार गमावला. अशा एकल स्त्रीया न खचता पुर्णांगीनी होऊन आई व बापाची भूमिका निभावताना दिसतात. अजूनही पुनर्रविवाह म्हणावे इतके होत नाही. शिवाय विधूर पुनर्विवाहासाठी कुमारीच शोधताना दिसतात. विधवांच्या पर्यायाचा विचार पुनर्विवाहासाठी विधूर करीत नसतील तर त्यांना त्या अगोदरच्या आपत्यासहित स्विकारणे तर दूरची गोष्ट. अगदीच अपवाद म्हणून कुठेतरी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आपत्यासहित विधवेशी लग्न करणारे दिसतात. फुलेंनी त्यांच्या काळात सुरु केलेले विधवा पुनर्रविवाह अजूनही प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. पण विधवा बायका स्वबळावर ताठ मानेने जगताना दिसतात. किंवा काही महिला लग्न न करता अथवा लग्न राहून गेलेल्या स्वतःच्या हिंमतीवर जगताना दिसतात. हे चित्र माणूस म्हणून आनंदादायी आहे. अशांनाच मला पूर्णांगिनी म्हणायचे आहे.

माझ्या मते कर्तव्यतत्पर, निस्पृह, निष्कपट, निःस्वार्थी, परोपकारी, धेय्याला समर्पित, जगण्याची आस असलेले, मृदू पण तितकेच कठोर आणि कणखर ते नेहमी सुंदर…! 

माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुंदर असलेल्या अशा अनेक स्त्रिया आहेत. यांचे जोडीदार तसे नावापुरतेच जोडीला होते. काही करकोळ गोष्टी सोडल्या तर मुलं जन्माला घालण्यातच जोडीदाराचा काय तो सहभाग. अन्यथा संसाराचा गाडा या माऊलींनीच पुढे ओढत नेला. जोडीदार सोडून गेल्यावरही कोणत्याही प्रसंगाला बळी न पडता, सामाजिक व्यवस्थेला शरण न जाता, प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ जगण्यावर त्यांनी मनापासून प्रेम केले. अतिशय कष्टाने, परिश्रमाने जीवनाची वाट चालत त्या जगण्यावर स्वार झाल्या. माणूस म्हणून अनेक प्रसंगाशी दोन हात करत स्वतःला जिंकत आल्या. अशा सखींचा मला खूप अभिमान आहे..! त्या खऱ्या अर्थाने पूर्णांगिनी आहेत. असे मला वाटते.

खरंतर शेतीचा शोध लावणारी, मातृत्व पेलणारी, संगोपन करणारी, समर्पणाने मानवी मुल्ये पेरणारी, शिवबा घडवणारी, वेळप्रसंगी युद्धात लढणारी, आणि युद्धापेक्षा बुद्ध मानणारी ती कधीच दुर्बल नव्हती. पण व्यवस्थेने तिला एकीकडे देवीचा दर्जा दिला त्याचवेळी तिला अबला, दुर्बल, दुय्यम ठरविले आणि तिच्यावर अन्याय होत गेला. सत्ता संपत्तीला खूप महत्त्व आले. क्रांती प्रतिक्रांती आणि परत क्रांती होत महिला सबलीकरण सुरु झाले. आता प्रत्येक जण महिलांना सक्षम करण्यात गर्क आहे. पण या सक्षम झालेल्या महिलांशी पुरुषांनी योग्य रीतीने वागावे यासाठी त्यांची मानसिकता घडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. ही आजची खंत आहे. म्हणून पुरुष सबलिकरणाची गरज भासू लागली आहे. 

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री सक्षमपणे उभी आहे. तिच्या शिवाय जन्मच नाही. पण तिची तारेवरची कसरत चालू आहे. मदतीचा हात तिला कुणाकडून मिळत नाही. तिच्या मनात दाटलेले काळे ढग कुणाला दिसतील का? तिने पापण्यांपर्यंत आडविलेला पाऊस कुणाला जाणवेल का ? वादळातही मन सावरुन इतरांसाठी झटणारी ती कधी कुणाला उमगेल का ? आशा, आकांक्षा जपण्यासाठी तिला वेळीच साथ मिळेल का ? का तिने सोडून द्यावे त्याग, समर्पण सारे? मुक्त वावरावे अनिर्बध, स्वतःला शोधण्यासाठी?….. 

ती म्हणेल कधीतरी तळमळून “नकोच बाईपण, ओझ्याने थकलेले आईपण.” मग काय कराल ?  माणूसपणाच्या सागरात तिलाही डुंबायचे आहे. त्यामुळे वेळीच आवरा, माणूस म्हणून सावरा नाहीतर विपरीत घडेल ! आई, आईपण दोन्ही गोठून जाईल !

ग्रामीण भागातील सखी तर कुणी कितीही पसरो, ती मुकाट्याने आवरत असते. काबाड कष्ट करून मुलांना वाढवते. जगण्याच्या शोधात कामानिमित्त  रानोरान भटकते. अनेक संकटांना निमूटपणे सहन करते. मध्येच जोडीदाराचा साथ सुटला तरी हिंमतीनं पोटच्या मुलांसाठी झटते. मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करताना दिसते. वेळप्रसंगी अनेकांच्या समोर पदर पसरते. पण हार मानत नाही. मनातली घुसमट कोंबून ठेवते. ठेच लागली तरी एकाचवेळी डोक्यावरील घागर आणि कडेवरचं तान्हुलं बाळ अलगद सावरताना दिसते. अनेक वेदना घेऊन हसणं जपून ठेवते. तिच्या समर्पणाची, कष्टाची, आणि सहनशीलतेची कला कुणाला कधीच जमणार नाही, असे मला वाटते. अशा माणसातील पूर्णांगिनी आईला मी मनापासून मनापासून सलाम् करते. शेवटी जाताजाता माझ्याच कवितेतून मला एवढेच म्हणावेसे वाटते की …… 

तू कोणाशी बरोबरी करु नकोस, 

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तू जन्मदात्री, तू संगोपन करणारी

तू शेतीचा शोध लावणारी

त्यागाची परिभाषा तू

सती जाणारी ही तूच

युद्धापेक्षा बुद्ध मानणारी तू 

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तू जिजाऊ, तू सावित्री 

तू झाशीची राणी, तू रणरागिणी

तू इंदिरा, तू कल्पना चावला,

अनेक रूपात, अनेक क्षेत्रात

पाय रोवून उभी आहेस तू,

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तू सुंदर आहेस, कर्तृत्ववान आहेस 

चेहऱ्याला लेप लावून सजवू नकोस 

तू नितळ, निर्मळ, प्रेमळ, आहेस 

तू निधर्मी व विज्ञानवादी हो 

तू दैववादात अडकू नकोस,

प्रयत्नवाद कधी सोडू नकोस 

तूच कुटुंबाचा गाभा आहेस..

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तुला कुणी विकू नये.

तुला कुणी विकत घेऊ नये..

अशी आईच्या हृदयाची माणसं

तूच घडवू शकतेस..

बलात्कार, अन्याय, अत्याचार तू 

स्वतःच थांबवू शकतेस…

तू सर्व सामर्थ्याने पेटून उठू शकतेस

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!…. 

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हुतात्मा मैनावती पेशवे : कर्तव्यकठोर लखलखीत रूप” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “हुतात्मा मैनावती पेशवे : कर्तव्यकठोर लखलखीत रूप”… लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

नानासाहेब पेशवे यांची एकुलती एक मुलगी मैनावती. चौदा वर्षांचे वय, परंतु धाडसी वृत्तीमुळेच नानांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका-मुलांना वाचवण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली. त्याच दरम्यान ती इंग्रजांच्या तावडीत सापडली. नानासाहेबांचा ठावठिकाणा विचारण्यासाठी त्यांनी तिचा खूप छळ केला. पण तिने तोंड उघडले नाही ते नाहीच. तिला झाडाला बांधून पेटवून देण्यात आले. आणि या देशाच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून पंचत्त्वात विलीन झाली.

आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या या कर्तव्यकठोर स्त्रीचं, हे बहुआयामी लखलखीत रूप खास जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने.

१८५७ च्या बंडाचा काळ, बंडाचा वणवा उत्तर भारताइतक्या मोठय़ा प्रमाणात दक्षिण भारतात पेटला नव्हता. या बंडाचे नेतृत्व मात्र राणी लक्ष्मीबाई झाशीवाली, नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांनी केले. याच काळातील कर्तव्यकठोर, सहृदय मैनावतीची कथा.

मैनावतीबद्दल एक पानभर मजकूर एका हिंदी पुस्तकात वाचायला मिळाला होता. ते पुस्तक उत्तरेकडच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या माहितीचा कोश होता. त्यानंतर आणखी एका हिंदी भाषिक लेखिकेने तिच्याबद्दल थोडासा मजकूर लिहिलेला वाचनात आला. मराठय़ांच्या इतिहासाबद्दल अभ्यास असणाऱ्या अनेकांना मैनावतीबद्दल विचारले. पण कुणालाच अशी कुणी मुलगी/बाई १८५७ च्या वणव्यात विद्युल्लतेप्रमाणे कडाडून अमर झाल्याची माहिती मिळाली नाही. गेली ४/५ वर्षे माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. माझ्या मानगुटीवर स्त्री अभ्यासाचे भूत बसलेले आहे व ते मी बाजूला करावे व उतारवयात नाही ती म्हणजे नसलेली मढी उकरू नयेत, असा उपदेशवजा सल्ला मला मिळत राहिला. पण मैनावतीला मी माझ्या मनातून बाहेर काढू शकले नाही आणि अचानक तात्या टोपे यांचे नातू विनायकराव टोपे मु. बिठूर यांनी संपादित केलेली ‘क्रांती का संक्षिप्त परिचय’ ही पुस्तिका हाती आली. या पुस्तिकेत मैनावतीची कथा आहे. आशालता व्होरा यांनी आपल्या पुस्तकात केलेले उल्लेख, उत्तर भारतीय स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश व विनायकराव टोपे यांच्या पुस्तिकेतील मैनावतीची माहिती यांचे धागेदोरे विणत गेले व वाटले की टोपे कुटुंब हे पेशवे कुटुंबाशी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या जवळचे कुटुंब होते. त्यांच्याबरोबरच टोपे कुटुंब उत्तरेकडे आले होते. त्यामुळे विनायकराव टोप्यांची माहिती दंतकथेवर आधारलेली असण्याची शक्यता कमी आहे. कोश व टोपे यांच्या मजकुरावरून स्पष्ट दिसते की मैनावतीची कथा ही सत्यकथा आहे. त्यावर संशोधन करून भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात तिला तिचे मानाचे पान मिळायलाच हवे.

नानासाहेब पेशवे यांना एकुलती एक मुलगी होती. मुलीला आजीचे नाव मैनावती हे ठेवले. मैनावतीची आई लवकरच गेली व आजीतर त्यापूर्वीच गेली होती. मैनावतीला पेशवे घराण्याच्या रीतीप्रमाणे लिहिणे, वाचणे, पत्रे तयार करणे इत्यादी गोष्टी शिकवल्या असणारच. धार्मिक ग्रंथांची पारायणे ही गोष्ट त्यात आलीच. नानासाहेबांचे आपल्या मुलीवर जिवापाड प्रेम होते. आईविना मुलगी म्हणून तसे ते शक्य होतेच तसेच आपल्याला परक्याच्या घरी जाणाऱ्या या मुलीला वेळ देता येत नाही या विचारामुळेही अधिक होते. नानासाहेब पेशवे व इंग्रज यांचे सुरुवातीचे संबंध बरे होते (इति टोपे). त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांच्या बरोबर प्रसंगापरत्वे ऊठबस होत असावी. मैनावतीचेही इंग्रज मुलींच्या बरोबर संबंध होते. त्यामुळे त्यांच्या सहवासात तिला कामचलाऊ इंग्रजी समजू लागले व बोलताही येऊ लागल्याचे टोप्यांच्या माहितीवरून कळते.

मैनावतीची कथा सुरू होते ती पेशव्यांच्या कानपूर विजयापासून. शिपायांनी कानपूर लुटले. बिबिका घर, सतीचौरा ही ठिकाणे जाळली. इंग्रज बायका व मुले यांना कैद केले. हे कैदी नानासाहेब पेशव्यांसमोर हजर करावे की कानपूरच्या इतर इंग्रजांप्रमाणे त्यांनाही येशूकडे पाठवावे, असे शिपायांनी नानासाहेबांना विचारले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे इंग्रज मुलाबायकांचा निकाल लावायचा असे ठरवून शिपाई  नानासाहेबांच्या आज्ञेची वाट पाहू लागले. शिपायांचा मानस कळल्यावर नानासाहेबांना वाईट वाटले. मराठय़ांच्या इतिहासात शत्रूच्या बायका-मुलांची कत्तल कधीच झाली नव्हती. शिपायांचे असे वर्तन हे मराठय़ांना शोभणारे नाही. त्यामुळे ‘इंग्रज मुला-बायकांना सन्मानाने बिठूरला पोहोचवावे व त्यांची व्यवस्था आपण जातीने करू’ असा उलटा खलिता नानासाहेब पेशव्यांनी पाठविला. इंग्रजांचा कुटुंबकबिला त्यांनी मैनावतीच्या स्वाधीन केला. त्या सर्वाचा दोन दिवस पाहुणचार करून त्यांना इंग्रजांच्या फौजेत परत पाठविण्याचा आपला बेत त्यांनी मैनावतीला सांगितला. इतकेच नाही तर ते सर्व सुरक्षित पोहोचण्याची जबाबदारीही मैनावतीवर सोपवली. त्या करता त्या कबिल्याबरोबर मैनावतीला जातीने सोबत करावयास सांगितले. मैनावतीबरोबर असल्यामुळे त्यांचा प्रवास निर्धोक पार पडेल याचा नानासाहेबांना विश्वास होता. या प्रवासात पहिला इंग्रज फौजेचा जथ्था जिथे भेटेल तिथे इंग्रज बायका-मुले त्यांच्या स्वाधीन करून मैनावतीने परत फिरावे, असा आदेश मैनावतीला होता. मैनावतीच्या सोबतीमुळे इंग्रज कुटुंबे सुखरूप प्रवास करू शकली. रस्त्यातील दंग्याधोप्यांचा त्यांना त्रास झाला नाही. आपल्याला सुखरूपपणे आपल्या लोकांच्या हवाली केल्याबद्दल त्यांना मैनावतीबद्दल कृतज्ञता वाटली तर नवल नाही. मैनावती ही नानासाहेबांची मुलगी आहे हे त्या इंग्रज बायकांना माहीत होते की नव्हते, की त्यांना ही मैनावती सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी तिचे नाव गुप्त ठेवणे योग्य वाटले असावे हे कळायला मार्ग नाही.

मैनावती बिठूरला पोहोचण्यापूर्वी नानासाहेबांनी बिठूर सोडले होते. कारण शिपायांनी जिंकलेले कानपूर परत इंग्रजांनी हिसकावून घेतले होते व ते बिठूरच्या दिशेने निघाले होते. बिठूरला येऊन इंग्रजांनी पेशव्यांचा किल्लेवजा वाडा लुटला. पेशवे कुटुंबातील फक्त मैनावती व नोकर चाकर व आश्रयदाते वाडय़ात होते. मैनावती सोडून सर्व पळून गेले. वाडा बेचिराख करण्याकरता त्यावर तोफा डागण्याचा हुकूम दिला. तोफांची हलवाहलव मैनावतीच्या कानी पडली. ती तडक वाडय़ाच्या बाहेर येऊन उभी राहिली. तिला तिथं उभी पाहताच इंग्रज सेनापती थॉमसला आश्चर्य वाटले. कारण वाडा लुटताना तिथे चिटपाखरूही आढळले नव्हते. तिला पाहता क्षणीच थॉमसने तिला ओळखले. मैनावतीने त्याला इंग्रजीत पण नम्रपणे विचारले. ‘‘ज्या वाडय़ाला आपण बेचिराख करायला निघाला आहात त्या वाडय़ाने आपले काय वाकडे केले आहे? तो तर आश्रयदाता आहे. त्याने आपला असा कोणता अपराध केला आहे? ’’ थॉमसने उत्तर दिले, की वाडा न जाळण्याची परवानगी मला व्हाईस रॉयकडून तार करून मागवावी लागेल. त्यांनी परवानगी दिली तर वाडा जाळणार नाही. तार लंडनला पोहोचली. लॉर्ड सभेत चर्चा झाली. काही लॉर्डानी एक विचित्रच सूर लावला. थॉमसचे मैनावतीवर प्रेम बसले असावे म्हणून तो वाडा तोफांच्या साहाय्याने उडवायला हिचकीच करतो आहे. वाडा तर उद्ध्वस्त झालाच पाहिजे पण थॉमसच्या समोरच (मैनावतीकडून नानासाहेबांचा पत्ता विचारून) मैनावतीला जिवंत जाळली पाहिजे. लॉर्ड सभेचा हा अजबच न्याय होता!

मैनावतीने विद्रोही सैनिकांच्या पासून इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका-मुलांना वाचवले होते. त्यांना प्रथम वाडय़ात ठेवून घेऊन सुरक्षितपणे इंग्रजांच्या गोटात पोहोचवले होते. अशा मैनावतीला ही शिक्षा इंग्रज लॉर्डाची सभ्य संस्कृती किती बेगडी होती हे लक्षात येते. आठव्या शतकात हिंदुस्थानच्या उत्तर सीमेवर आलेल्या रानवट मुसलमानांच्या टोळ्यांनी केलेल्या कृत्याइतकेच ते भीषण होते. थॉमसची मुलगी मैनावतीची मैत्रीण होती. मैनावतीचे मोठेपण व तिने इंग्रज कुटुंबांना विद्रोही सैनिकापासून वाचविले ही गोष्ट म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांवर असलेले उपकारच आहेत असे ती परत परत ओरडून सांगत होती. मैनावतीच्या देखतच तिचे राहते घर तोफांच्या भक्ष्यस्थानी पडले. तिला कैद्यासारखी वागणूक देत कानपूरला इंग्रज कमिशनरसमोर उभे केले. नानासाहेबांचा ठावठिकाणा विचारण्यासाठी तिचा खूप छळ केला. मैनावतीने छळ सहन केला पण काहीही बोलण्यासाठी तोंड उघडले नाही ते नाहीच. मैनावतीचे वय त्यावेळी १४/१५ वर्षांचे असावे. मैनावतीचा छळ करूनही ती काहीच माहिती देत नाही याचा कानपूर कमिशनरला खूप संताप आला. त्यांनी तिला झाडाला बांधून पेटवून देण्याची आज्ञा दिली. हा भीषण प्रसंग बघण्याकरता कानपूर शहरवासीयांस मुद्दाम हजर राहण्यास सांगितले होते. दहशत बसविण्याचा तो एक मार्ग होता. मैनावती जळत होती. लोक अश्रू ढाळत होते. पण मैनावतीने तोंडाने जराही आवाज केला नाही आणि या देशाच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून पंचत्वात विलीन झाली.

मैनावतीला नानासाहेबांचे नाव न सांगितल्यामुळे जाळून मारली यात टोपे व आशालता व्होरा यांचे एकमत आहे. तपशिलात थोडा फरक आहे. टोपे यांच्या म्हणण्याप्रमाणे कानपूर मधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘बखर’ नावाच्या वर्तमानपत्रात तत्कालीन इतिहासकार महादेव चिटणीस यांनी  नानासाहेबांच्या एकुलत्या एक कन्येच्या जिवंत जाळण्याची व तिने शांतपणे मरणाला कवटाळण्याची बातमी दिली होती. तिला शांतपणे जळताना पाहून हिंदवासीयांना ती देवतास्वरूपी वाटत होती. मैनावती ही हिंदी स्वातंत्र्याच्या लढय़ात आहुती देऊन अमर झाली.

एका स्त्रीचं हे कर्तव्यकठोर रूप. त्यासाठी आगीचा दाह सहन करण्याची सोशिकता, इंग्रजांच्या बायका-मुलांना सुखरूप पोहोचण्यामागची ममता, त्यासाठी संरक्षक कवच म्हणून जाण्यातलं साहस, पत्ता गुप्त ठेवण्यासाठीची कणखरता, मृत्यू कवटाळण्यातलं धाडस, एका स्त्रीचं हे बहुआयामी लखलखीत रूप, एक स्त्री काय करू शकते हे दाखवणारं…

लेखक : अज्ञात   

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 60 – स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान – लेखांक एक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 60 – स्वामी विवेकानंदांचं राष्ट्र-ध्यान – लेखांक एक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडून संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर,  “आपल्याला सार्‍या मानवजातीला आध्यात्मिक प्रेरणा द्यायची आहे, तेंव्हा आपला भर तत्वांचा, मूल्यांचा, आणि विचारांचा प्रसार करण्यावर हवा. संन्यास घेतलेल्यांनी किरकोळ कर्मकांडात गुंतू  नये”. असे मत नरेंद्रनाथांचे होते. या मठातलं जीवन, साधनेला वाहिलेलं होतं. अभ्यासाबरोबर ते सर्व गुरुबंधुना पण ते प्रोत्साहित करू लागले की, भारत देश बघावा लागेल, समजून घ्यावा लागेल. लक्षावधी माणसांच्या जीवनातील विभिन्न थरांमध्ये काय वेदना आहेत, त्यांच्या आकांक्षा पूर्ण न होण्याची कारणे काय आहेत ते शोधावे लागेल. हे ध्येय समोर ठेऊन ,भारतीय मनुष्याच्या कल्याणाचे व्रत घेऊन स्वामी विवेकानंद यांचे हिंदुस्थानात भ्रमण सुरू झाले.

परिव्राजक स्वामीजी सगळीकडे फिरून आता धारवाड, बंगलोर करत करत म्हैसूरला आले. म्हैसूर संस्थांचे दिवाण सर के. शेषाद्री अय्यर यांच्याकडे स्वामीजी राहिले होते. त्यांनी म्हैसूर संस्थानचे महाराज चामराजेंद्र वडियार यांचा परिचय करून दिल्यानंतर त्यांनी स्वामीजींना संस्थानचे खास अतिथि म्हणून राजवाड्यावर ठेऊन घेतले. एव्हढी सत्ता आणि वैभव असलेल्या या तरुण महाराजांना धर्म व तत्वज्ञान याविषयी आस्था होती. म्हैसूर हे भारतातील सर्वात मोठ्या संस्थांनांपैकी एक होते. इथे अनेक विषयांवर स्वामीजी बरोबर चर्चा आणि संवाद घडून येत.

महाराजांशी स्वामीजींचे चांगले निकटचे संबंध निर्माण झाले होते. त्यांनी एकदा स्वामीजींना विचारलं स्वामीजी मी आपल्यासाठी काय करावं ? त्यावर तासभर झालेल्या चर्चेत स्वामीजी म्हणाले, “भारताचा अध्यात्म विचार पाश्चात्य देशात पोहोचला पाहिजे आणि भारताने पाश्चात्यांकडून त्यांचे विज्ञान घेतले पाहिजे. आपल्या समजतील सर्वात खालच्या थरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे आणि धर्माची खरी तत्वे सामान्य माणसाला समजून सांगितली पाहिजेत. शिकागोला जाण्याचा विचार ही त्यांनी बोलून दाखवला होता, त्यांना स्वामीजींनी शिकागोहून पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे “हे उदार महाराजा, मानवाचे जीवन फार अल्पकालीन आहे आणि या जगात हव्याशा वाटणार्‍या सुखाच्या गोष्टी केवळ क्षणभंगुर आहेत. पण जे इतरांसाठी जगतात तेच खर्‍या अर्थाने जगतात. भारतातील तुमच्यासारखा एखादा सत्ताधीश जर मनात आणेल, तर तो या देशाला आपल्या पायावर उभे करण्यासाठी महान कार्य करू शकेल. त्याचे नाव पुढच्या पिढ्यांत पोहोचेल आणि जनता अशा राजाबद्दल पूज्यभाव धरण करेल”. यावरून स्वामीजीं स्वत:साठी काहीही मागत नसत. इथून महाराजांचा निरोप घेऊन स्वामीजी केरळ प्रदेशात गेले.

त्रिचुर, कोडंगल्लूर,एर्नाकुलम, कोचीन इथे फिरले. केरळ, मलबार या भागातल्या जुनाट चालीरीती आणि ख्रिस्त धर्मी मिशनर्‍यांचा तिथे चाललेला धर्मप्रचार या गोष्टी स्वामीजींच्या लक्षात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटलं की हिंदू धर्माच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली नाही. स्वामीजींना उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात आलेले अनुभव वेगळे होते. त्यांच्या लक्षात आले की, दक्षिणेत पाद्री लोक खालच्या वर्गातील लाखो हिंदूंना ख्रिस्त धर्मात घेत आहेत. जवळ जवळ एक चतुर्थांश लोक ख्रिस्त धर्मात गेले आहेत.

कोचीनहून स्वामीजी त्रिवेंद्रमला आले. एर्नाकुलम पासून त्रिवेंद्रम सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर, बैलगाडी आणि पायी प्रवास करताना केरळचं निसर्ग वैभव त्यांना साथ करत होतं. आंबा, फणस, नारळ यांची घनदाट झाडी, लहान मोठ्या खाड्या, पक्षांचे मधुर आवाज असा रमणीय रस्ता स्वामीजी चालत होते.

कन्याकुमारी भारत वर्षाच्या दक्षिणेचे शेवटचे टोक. त्रिवेंद्रम हून नव्वद किलोमीटर. २४ डिसेंबरला त्रिवेंद्रमहून स्वामीजी निघाले आणि कन्याकुमारीला पोहोचले. संपूर्ण वंदेमातरम  या गीतातलं मातृभूमीचं वर्णन स्वामीजींनी ऐन तारुण्यात ऐकलं होतं. याच वर्णनाचा भारत देश स्वामीजींनी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे हजारो किलोमीटर प्रवास करून पालथा घातला होता. डोळ्यात साठवून ठेवला होता.वर्तमानकालीन भारताचं विराट दर्शन त्यांना घडलं होतं. शतकानुशतके आपला समाज निद्रितवस्थेत आहे आणि तो आपला वारसा विसरला आहे,रूढी परंपरा यांचा दास झाला आहे असं भीषण चित्र त्यांना दिसत होतं. अशी ही स्वदेशाची आगळीवेगळी यात्रा  करायला त्यांना अडीच वर्ष लागली होती. कन्याकुमारीच्या आपल्या मातृभूमीच्या दक्षिण टोकावरच्या खळाळत्या लाटांच्या हिंदुमहासागराला ते भेटणार होते आणि या अथांग सागराला वंदन करून आपल्या विराट भ्रमणाची पूर्तता करणार होते. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फ्यूज उडालेले बल्ब… लेखक – जोशी काका☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ फ्यूज उडालेले बल्ब… लेखक – जोशी काका ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

सर्व फ्यूज उडालेले बल्ब एक सारखेच असतात !…… 

एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर महालासारखे सरकारी घर सोडून एका हाउसिंग सोसायटीत, त्यांच्या स्वत:च्या फ्लॅट मध्ये राहायला गेले. ते सेवा निवृत्त असले तरी, अजूनही स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असतं आणि कधीही कोणाशी जास्त बोलत नसतं. ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्क मध्ये फिरत असतांनासुद्धा, दुसऱ्यांची उपेक्षा करत आणि तिरस्कृत नजरेने पाहात असत.

एके दिवशी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाने त्यांच्याशी संभाषण सुरू केले आणि हळूहळू या गप्पा-गोष्टी पुढेही चालू राहिल्या. आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत.  

प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे बहुत करून एकतर्फी असे, कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एक सारखे फक्त स्वतःबद्दलच बोलत असत. 

ते कधीही बोलायला लागले की म्हणायचे, “सेवानिवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदावर कार्यरत होतो, की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पनासुद्धा करू शकणार नाही, केवळ नाइलाज आहे म्हणून मी येथे आलो आहे.” आणि ते गृहस्थ अशाच अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्कर गृहस्थ शांतपणे  त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेत असत.

बरेच दिवसांनंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखविली, तेव्हा मग त्या गृहस्थाने इतर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यास सुरुवात केली.

ते म्हणाले, “सेवानिवृत्त झाल्यावर, आपण सगळेच फ्यूज उडालेल्या बल्बसारखे असतो. याने काही फरक पडत नाही की त्या बल्बची वॅट क्षमता किती होती, फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाश अथवा उजेड दिला.”

पुढे ते म्हणाले, “मागील 5 वर्षांपासून मी ह्या सोसायटीत रहात आहे, परंतु आजपर्यंत कोणालाही हे सांगितले नाही की मी दोन वेळा सांसद म्हणून राहिलो होतो. तुमच्या उजवीकडे वर्माजी आहेत, जे भारतीय रेल्वेत महाप्रबन्धक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तिकडे सिंग साहेब आहेत, जे सेनेत मेजर जनरल होते.  तिकडे बाकावर पांढऱ्या शुभ्र पोशाखात बसलेले ते गृहस्थ मेहराजी आहेत, जे इस्रो (ISRO) च्या प्रमुख पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत.

— आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, अगदी मलासुद्धा, पण मला  माहीत आहे—- 

“सगळे फ्यूज उडालेले बल्ब आता  एक समानच आहेत – त्यांची वॅट क्षमता काहीही असो  – 0, 10, 40, 60, 100 वॅट – आता त्याने काहीही फरक पडत नाही. आणि यामुळेसुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज  उडायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता – एलईडी, सीएफएल, हॅलोजन, फ्लोरोसेंट, किंवा सजावटीचा.

— आणि माझ्या मित्रा, हीच गोष्ट तुलासुद्धा लागू होते— 

ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल, त्यादिवशी तुला या सोसायटीतसुद्धा शांती आणि समाधान लाभेल.

उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात.

परंतु, खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्त्व दिले जाते. इतके की त्याची पूजा सुद्धा केली जाते. पण मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्त्व दिले जात नाही. ही गोष्ट जितक्या लवकर  समजेल तितके चांगले आहे.”

आपलं वर्तमान पद, नाव आणि रुबाब हे स्थायी नसतात. 

या गोष्टींबद्दल जास्त जिव्हाळा व आसक्ती ठेवली असता, आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टींना मुकणार असतो. 

— लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो, तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात. 

— आज, आपल्या जवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा .

लेखक : जोशी काका

प्रस्तुती : सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी… लेखक – श्री अजित दांडेकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी… लेखक – श्री अजित दांडेकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी हैदराबाद येथे  एका मंदिराचे उदघाटन केले आणि ही बातमी स्मृती पटलाच्या एका उंच जागेवर कुठेतरी जाऊन पडून राहिली होती … 

मागील एका शनिवारी हैदराबाद येथे अचानक जाण्याचा योग आला आणि वरील बातमीची आठवण झाली व लगेच गूगल काकांची मदत घेण्यात आली .. त्यांनी असे सांगितले की ‘ स्टॅच्यु ऑफ इक्वालिटी ‘ असे त्याचे नाव असून ते हैदराबाद पासून फक्त  ३७ कि मी अंतरावर आहे. 

स्टॅच्यु  ऑफ इक्वालिटी असे वाचल्यावर प्रथम वाटले की हे सर्व धर्म सद्भावना वगैरे पैकी ठिकाण असावे … पण मला चांगलीच उत्सुकता होती बघायची कारण श्री नरेंद्र मोदी यांनी त्याचे उदघाटन केले होते… 

तर कामात वेळ काढून मी रविवार दिनांक १२ फेब्रुवारी या दिवशी पुन्हा: एकदा गूगल काकांना विचारून येथे जायला निघालो . यावेळी मॅप वर अंतर दाखवले गेले ३७ किमी, आणि अंतर कापण्यास लागणार वेळ ३४ मिनिटे .. हे कसे शक्य आहे अशा  विचारात असतानाच लक्षात आले की मार्ग हा आऊटर रिंग एक्सप्रेस रोड येथून पोहोचतो पुढे …  आणि खरोखरीच हा एक्सप्रेस हायवे प्रत्येक बाजूने सहा लेनमध्ये 

विभागलेला असून त्यातील दोन लेन या अनुक्रमे ८० व १०० एव्हढ्या किमान वेगासाठी राखीव आहेत.  अशी मोकळीक मिळाल्यावर काय मग गाडी आपोआपच सुस्साट निघाली. आणि ठरलेल्या वेळात पोचलो देखील ..

मुख्य गेट समोरचे गणवेशातील सुरक्षा अधिकारी तत्परटेने पुढे आले आणि बाजूतील रस्त्याने मार्गक्रमण करण्यास सांगितले . मी थोडा साशंक झालो, कारण हा रस्ता मागील बाजूला जात असून गाडी लावून खूप अंतर चालले जाऊ शकले असते.. इतक्यात अजून एक चेक पोस्ट व अधिकारी समोर आला आणि सांगितले की पार्किंग चे ३० रु द्यावे लागून ते मी कुठल्या प्रकारे भरणार आहे अथवा फास्ट टॅग असल्यास मी त्यातून घेऊ शकतो असे तो म्हणाला. आता मला फास्ट टॅग फक्त रस्त्यावर चालतो एव्हढेच माहित होते तरी पण मी त्याला हो म्हटले… त्याने लगेचच एक छोटे गॅजेट काढून फास्ट टॅग ट्रॅन्झॅक्शन पूर्ण केले देखील. 

पुढे साधारण अर्धा किलोमीटरवर गाडीतळ असून एका दर्शिकेवर स्वागत करून येथे थांबण्यास सांगितले गेले. काही मिनिटातच दोन इलेक्ट्रिक व एक डिझेल बस या गाड्या हजर झाल्या आणि त्यांनी तत्पर मुख्य दरवाज्याकडे सोडले. येथे असे कळले की आत जाण्यासाठी तिकीट काढावे लागेल २०० रुपयांचे … 

तिकीट काढताच सांगण्यात आले की मोबाइल फोन हे जमा करावे लागतील व त्याची व्यवस्था लगेच करण्यात आली… 

पुढे अतिशय शिस्तबद्ध अशी रांग असून आत जाणाऱ्यांना हातावर टॅटू काढण्यात आला … फरक एवढाच की टॅटू हा ओम ह्या चिन्हाचा असून प्रत्येक व्यक्तीच्या हातावर ऐच्छिक स्वरूपात फुकट नोंदवला जातो. पुढे अश्याच प्रकारे कपाळावर पण गंध लावण्यात आले …. आणि येथूनच सुरु झाली १०८ मंदिरांची परिक्रमा . ही मंदिरे भगवान विष्णू यांचे  १०८  अवतार असून यापुढील प्रत्येक मंदिरामध्ये एक पुजारी आणि एक स्वयंसेवक / सेविका आपल्यासाठी त्या मंदिराचे महत्व आणि त्या अवतारासंबंधी मंत्र घोष आपल्याकडून म्हणून घेतात … प्रत्येक मंदिर हे विशिष्ठ आकारात असून त्या त्या अवतारासंबंधित बांधणी ह्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. उदाहरणार्थ वन अवतार दाखविताना मंदिर हे एका झाडातून कोरण्यात आले आहे असे वाटते. अतिशय अद्भुत अशी ही योजना वाटते … 

पुढे सर्व १०८ मंदिरांचे दर्शन संपल्यावर वेळ येते ती रामानुजाचार्य यांची भव्य प्रतिमा जवळून पाहण्याची … अनेक पायऱ्या चढून गेल्यावर एक मजला हा त्यांच्या सुवर्ण प्रतिमेसाठी  राखण्यात आलेला आहे… ही प्रतिमा जवळपास सहा फूट इतकी मोठी असून संपूर्ण सोन्याची आहे…  या पुतळ्यासाठी 120 किलो सोनं वापरण्यात आलं असून त्याची निर्मिती भद्रपीठम इथे झाली. रामानुजाचार्य 120 वर्षं जगले, त्यामुळे 120 किलो सोनं या पुतळ्यासाठी वापरण्यात आलं असे सांगितले जाते ….  अर्थातच येथे सुरक्षा कडक असून उगाचच जास्त वेळ थांबू दिले जात नाही.. पण दर्शन व्यवस्थित करू दिले गेले आणि प्रत्येकाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट हा आशीर्वादाच्या स्वरूपात पुजारी ठेवतात …  

दर्शन झाल्यावर पुढील मजला हा भव्य पुतळ्यास्वरूपात आहे, याची उंची २१६ फूट असून हा सुवर्ण रंगात ल्यालेला आहे. येथूनच आजूबाजूला सुंदर परिसर दृश्य होतो … अतिशय सुंदर रस्ते, आजूबाजूला उभारू पाहिलेल्या अनेक मजली इमारती, हवा थंड ठेवणारी झाडे असा हा परिसर आहे… 

खाली उतरल्यावर लगेचच एग्झिट गेट असून मोबाइल फोन परत मिळण्याचे ठिकाण होते.. हाताळण्याची अतिशय शिस्तबद्ध पद्धत आणि वागणूकही विनयशील असे हे सर्व कर्मचारी निमूटपणे आपले काम करीत होते. 

योगायोग असा होता की रविवारचा तो दिवस ब्रम्होत्सव सुरु होता आणि एक मोठा यज्ञ श्री चिन्न जियरस्वामी ह्यांच्या हस्ते सुरु होता …. मंत्र घोषांनी भारावलेला तो परिसर एका वेगळ्या सृष्टीत घेऊन गेला … 

विविध वनस्पतींच्या त्या समिधा, शुद्ध तुपातील अर्घ्य, मंत्रांचा जयघोष एखाद्या पौराणिक कथेप्रमाणे वाटत होते …   स्वतः स्वामीजी अनेक मंत्र घोष करीत असून माईकवर त्या संबंधी विवरण हे स्थानिक भाषा आणि इंग्रजीमधेही सांगत होते… 

येथे हे नक्की सांगावे लागेल की श्री रामानुजाचार्य हे आद्य संत होते, ज्यांनी सर्व जाती समावेशक मंदिर प्रवेशाची द्वारे उघडली होती, आणि ती ही तब्बल एक हजार वर्षांपूर्वी … 

पुढे बाहेर  आल्यावर अतिशय निगुतीने तेथील स्वयंसेवक पुढे आला आणि म्हणाला की त्वरित प्रसाद-लाभ घ्यावा कारण तो संपण्याच्या मार्गावर आहे… मग काय पाय लगेच तिथे वळले, कारण या सर्व उलाढालीत भूक लागलेली कळलीच नव्हती, दुपारचे चार वाजूनही प्रसाद अजूनही दिला जात होता  … 

पोटभर भात, भाजी, रसम, ताक आणि लोणचे ह्याच्यावर  चांगलाच ताव मारून तृप्त मनाने बाहेर पडलो ते पार्किंगला जाईपर्यंत …. पुनः इलेक्ट्रिक गाडीत बसण्यासाठी … 

लेखक : श्री अजित दांडेकर

पुणे

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ अंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त – दुसरी बाजू ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ अंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त  – “दुसरी बाजू…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आठ मार्च,महिलादिन. आजकाल बरेच ठिकाणी महिलादिन वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरे केले जातात.खरंतरं महिलादिनी सरसकट महिलांची अपेक्षा असते की हार,बुके सत्कार समारंभा ऐवजी तिला आधी एक स्वतंत्र विचार, स्वतंत्र भावना,स्वतंत्र आवड आणि स्वतंत्र मत असलेली व्यक्ती म्हणून आधी समजून घेतल्या जावं, तिच्या कष्टांची दखल घेतल्या जावी.

आपण सगळ्याजणी तशा नशीबवान. आपण अशा घरात जन्म घेतला जेथे कदाचित महिलादिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात नव्हता पण संपूर्ण वर्षभरच जणू महिलादिन असल्यासारखी मोकळी हवा,मोकळा श्वास, मुलगी म्हणून कुठलिही दुय्यम दर्जाची वागणूक आपल्याला कधीच मिळाली नाही त्यामुळे माहेरी महिलादिन हा काही वेगळा साजरा करावा असे प्रकर्षाने कधीच वाटले नाही.

पुढे लग्न झालं. ति.आईंनी एका महिलेचं दुसऱ्या महिलेशी कसं सख्य असू शकतं हे आम्ही एकाच छताखाली तीस वर्षे म्हणजे मी त्यांच्याजवळ राहून शिकायला मिळालं,त्यामुळे वेगळा महिला दिन साजरा करायचा विचार खरतर मनात आलाच नाही.

“अहो”नी संसाराच्या वाटचालीत तो सुरळीत आणि व्यवस्थित चालविण्याचा कासरा मोठ्या विश्वासाने हाती निश्चींतपणे सोपविला. अर्थातच आपले स्वतः चे बाबा सोडून , मग अहोंपासून नंतरची पिढी “मेन वील बी मेन “असल्यासारखी तोंडाने कौतुक कधीच करणार नाही पण नजरेतील विश्वास कधीकधी त्याहीपेक्षा जास्त सांगून जातो. त्यामुळे ही नजरेतील पसंतीची पावती हाच माझा महिलादिन.

पुढे लेक मात्र नवीन पिढीप्रमाणे महिलादिन स्पेशल म्हणून फेसबुक वर पोस्ट टाकू लागला,पिझ्झा पार्टी घडवू लागला.आणि असं करतांना आईमुलातं मित्रमैत्रीणीचा मोकळेपणा कधी आणि कसा येतं गेला तेच कळलं नाही.पण जेव्हा व्यंकटेश अगदी लहानातल्या लहान गोष्टीपासून ते महत्वाच्या मोठ्या गोष्टींपर्यंत सगळ्यात आधी.,बेझिझक मला सांगू लागला तोच माझा महिलादिन ठरला.

पुढे नोकरीच्या ठिकाणी जेव्हा सहकारी वर्ग आपल्यावर कामाची जबाबदारी सोपवून ते काम निटनेटकं होऊनच पुर्णत्वाला मी नेणारच ही खात्री, विश्वास बाळगून निश्चींत होऊ लागला नं तोच माझा महिलादिन ठरला.

तसेच मित्रमैत्रीणी, जवळील लोकं, माझा रोजचा वाचक वर्ग हा माझ्यातील लेखणीला, माझ्या भावनांना, विचारांना, माझ्या सवयींना हा माझा पेक्षाही जास्त ओळखू लागला आणि माझ्यावर भरभरून प्रेम करु लागला तोच माझा महिलादिन ठरला.

असो बरेच वेळा सत्कारसमारंभ, बुके,फुलं आणि गिफ्ट ह्यांच्यापेक्षाही ही भावनांनी जोडलेली नाती बाजी मारुन जातात नं तेव्हाच खरा महिलादिन धुमधडाक्यात साजरा झाल्याचा फील येतो हे मात्र खरं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

(धावायचे आणि आपल्याला लक्ष असलेले अंतर धाऊन पुरे करून अंतिम रेषा गाठणे हेच खरे असते. … आता पुढे)

त्याचदिवशी आमच्या गिरगावातल्या ठाकूरद्वार नाक्यावरचे  इराणी हॉटेल ” सनशाईन ” चा शेवटचा दिवस होता. त्यानंतर ते हॉटेल कायमचे बंद होणार होते. आमच्या लहानपणीच्या कडक ब्रून मस्का पाव आणि मावा सामोसाच्या आठवणी त्या हॉटेलशी निगडित होत्या त्यामुळे माझ्या मित्रांबरोबर मॅरेथॉन मेडल मिळाल्याचे सेलिब्रेशन हे ठाकूरद्वारच्या सनशाइन इराण्याकडेच झाले.

४८ व्या मेडल साठी  १० डिसेंबर २०२२ अभिजित भोसले, निखिल पोवार आणि मी असे आम्ही तिघे जण गोव्याला गेलो. ज्या ठिकाणी मी माझे पहिले मॅरेथॉन मेडल कमविले होते तेथे मधली कोरोनाची २ वर्षे सोडली तर दरवर्षी मी धावायला जात आलो आहे. अभिजित आणि निखिल पोवार  ह्यांनी १० कि मी मध्ये भाग घेतला होता तर. मी २१ कि मी मॅरेथॉन धावलो. गोव्याचा धावण्याचा मार्ग हा चढ उताराचा असल्याने आणि तेथील हवेतली आद्रता जास्त असल्याने, तेथे धावताना चांगली वेळ देणं खूप कठीण असते तरीही मी ती  मॅरेथॉन २ तास ५२ मिनिटात धाऊन पुरी करून माझे ४८ वे मॅरेथॉन मेडल मिळविले.

आता पुढची मॅरेथॉन १५ जानेवारी २०२३ ला होती ती, आपल्या भारतातली १ नंबरची मॅरेथॉन म्हणजेच टाटा मुंबई मॅरेथॉन. त्या मॅरेथॉनसाठी धावायला खूप जण उत्सुक असतात पण सगळ्यांनाच धावायला मिळतेच असे नसते. त्याचे रजिस्ट्रेशन खूप आधी करायला लागते. ह्या नावाजलेल्या मॅरेथॉनसाठी ह्यावर्षी जवळ जवळ ५५००० जणांनी भाग घेतला होता. ह्या मॅरेथॉन मार्गात एक केम्प्स कॉर्नरचा ब्रिज काय तो चढ लागतो बाकी सरळ रस्ता, समुद्र किनारा, वांद्रे सी लिंक आणि हवेतील गारठा ह्यामुळे ह्या मॅरेथॉनला धावायला खूप मजा येते. धावण्याच्या मार्गात आम्हा रनर्सना चिअर अप करायला दुतर्फा खूप माणसे उभी असतात त्यामुळे धावायला जोर ही येतो. ह्यावर्षी वातावरणात अती थंडावा असल्याने आम्हां सगळ्या रनर्सना ह्या मॅरेथॉनचा चांगल्या तऱ्हेने आनंद घेता आला त्यामुळे हे माझे २१ कि मी धाऊन ४९ वे मॅरेथॉन मेडल मी २ तास ३२ मिनटात मिळविले. तेथेच गिरगांव  चौपाटीच्या आयडियल हॉटेल मध्ये नेहमी प्रमाणेच माझ्या काही गिरगावातल्या मित्रांबरोबर सेलिब्रेशन करून माझ्या ५० व्या मॅरेथॉन मेडल साठी सगळ्या मित्रांच्या शुभेच्छा घेतल्या.

आता वेध लागले ते माझ्या ५० व्या मॅरेथॉनचे. १२ फेब्रुवारी २०२३ ला हिरानंदानी ठाणे हाल्फ मॅरेथॉन होती. माझे होम पीच. ह्यावेळेला गेल्या महिन्यांत माझ्याबरोबर गोव्याला धावलेला माझा मित्र निखिल पोवार हा ही धावणार होता. गोव्याला त्याची पहिलीच मॅरेथॉन तो दहा कि मी धावला होता पण हिरानंदानी मॅरेथॉनसाठी त्यांनी माझ्या आग्रहात्सव २१ कि. मी.मध्ये सहभाग घेतला होता. ही मॅरेथॉन हिरानंदानी इस्टेट पासून चालू होऊन ब्रह्माण्ड वरून हायवे क्रॉस करून खेवरा सर्कल, उपवन ते थेट येऊर डोंगरच्या पायथ्याशी जाऊन परत फिरते. तसे  बघायला गेलो तर ह्या मॅरेथॉनचा मार्ग चढणीचा असल्याने मॅरेथॉनची चांगली वेळ नोंदवणे कठीण असते. पहाटे ५.३० ला मिलिंद सोमण ह्याने मॅरेथॉनला फ्लॅग दाखवून धावायला सुरवात झाली. निखिल आणि मी बरोबरीने धावत होतो. दोघेही एकमेकांना साथ देत होतो. काही वेळेला मी पुढे गेलो तर निखिल मागून त्याचा वेग वाढवून माझ्या बरोबर धावत होता. आम्ही दोघेही १६ कि मी पर्यंत पुरते दमलो होतो. निखिल तरुण वयाचा तिशीतला जरी असला तरी त्याच्याकडे धावण्याचा अनुभव कमी होता तर माझ्याकडे धावण्याचा दांडगा अनुभव जरी असला तरी वाढीव वयाचा अडसर होत होता. शेवटचे दोन किमी खूप थकायला झाले होते तरीही ही माझी ५० वी मॅरेथॉन मी २ तास २९ मिनिटांत पूर्ण केली आणि माझे ५० वे मेडल माझ्या गळ्यात पडले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पहिला आला तरच जिंकला असे नसते तर स्वतःचा चांगला परफॉर्मन्स देणे म्हणजे जिंकल्यासारखेच असते आणि तो मी माझ्या ५० व्या मॅरेथॉनला दिला होता.

हे ५० वे मेडल म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातली मोठी कमाई आहे. माझी ही सगळी ५० मेडल म्हणजे माझ्या तिजोरीतली नाही तर भिंतीवर प्रदर्शित केलेली माझी अनमोल संपत्ती आहे, जिची कधीही, कोणीही किंमत करू शकत नाही तसेच ती कोणीही माझ्यापासून चोरून किंवा हिरावून घेऊ शकत नाही. मॅरेथॉनचा ५० मेडलचा एक टप्पा मी पार केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच  १३ फेब्रुवारील मला ६२ वर्षे पूर्ण होणार होती त्याच्या एक दिवस आधी देवानेच मला मोठे बक्षीस मिळवून दिले होते, अर्थात ह्या मध्ये माझे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी आणि रेषा चा हातभार खूप आहे. तुमचे माझ्यावरचे प्रेम आणि तुम्ही मला देत असलेले प्रोत्साहन, ह्यामुळेच मला धावायला अजून ऊर्जा मिळते.

… असेच माझ्यावरचे प्रेम तुमचे द्विगुणित होऊ दे आणि माझ्या धावण्यासाठी तुम्ही देत असलेले प्रोत्साहन मला मिळत राहिले  तर पुढच्या पाच वर्षात माझे १०० वे मॅरेथॉन मेडल नक्की माझ्या गळ्यात असेल ह्याची मला खात्री आहे.

— समाप्त — 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares