मराठी साहित्य – विविधा ☆ श्रमाची ॲलर्जी: एक राष्ट्रीय रोग – लेखिका- सुश्री परिज्ञा पुरी ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?  विविधा ?

☆ श्रमाची ॲलर्जी: एक राष्ट्रीय रोग – लेखिका- सुश्री परिज्ञा पुरी ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे

एक विचार की आजचे वास्तव?

आधुनिक शिक्षणाने औद्योगिक क्रांतीला लागणारे कामगार तयार झाले का? होय. पण त्याच आधुनिक शिक्षणाने पारंपरिक आणि सामाजिक जीवनातील श्रमाची प्रतिष्ठा नष्ट करून टाकली का? दुर्दैवाने त्याचेही उत्तर होकारार्थी आहे.

शेतकऱ्यांना शेती नको, कष्टकऱ्यांना मोलमजुरी नको, विद्यार्थ्यांना अभ्यासाचे कष्ट नकोत आणि स्त्रियांना घरकाम नको, त्यातही स्वतःच्या मुलांना पूर्णकालिक आई होऊन मोठे करण्याचे दिव्य तर नकोच नको. कोणालाही शारीरिक कष्टाची कामेच नकोशी झाली आहेत. सगळ्यांना खुर्चीत बसून आरामात मिळणारा पगार हवा आहे.

श्रमाची एक खासियत आहे. शारीरिक, अंगमेहनतीची कामे क्वचितच कुणाला आवडतात. पण एकदा का श्रमाची सवय शरीराला जडली की शरीरही तिला सोडू इच्छित नाही. श्रमाने तयार होणारे न्यूरल पाथवेज आयुष्यभर साथ देणारे ठरतात. शारीरिक श्रम ही एक थेरपी आहे. मनात दुःखाचा, अपमानाचा, क्रोधाचा आगडोंब जरी उसळला तरी त्याला शांत करण्याची किंवा त्याची तीव्रता कमी करण्याची शक्ती श्रमात आहे.

मला मनस्वी राग आहे त्या सर्व तथाकथित समाजसुधारकांच्या शिकवणुकीचा ज्यांनी पुस्तकी शिक्षणाला महत्त्व देता देता श्रमाने मिळणाऱ्या भाकरीची किंमत शून्य करून टाकली. या जगात अशी कुठलीही अर्थव्यवस्था अस्तित्वात नव्हती आणि येणार नाही जी सगळ्यांना व्हाइट कॉलर जॉब देऊ शकेल. ब्लू कॉलर जॉब हे जगाचे वास्तव आहे आणि ते कधीही कमी महत्त्वाचे नव्हते.

शेतीसाठी मजूर मिळत नाहीत, घरकामाला बायका मिळत नाहीत, चांगले कामसू आणि होतकरू व्हाइट कॉलर स्टाफ मेंबर्ससुद्धा आजकाल मिळत नाहीत, विद्या ही कष्टाने अर्जित करायची गोष्ट आहे हे आजकालच्या परीक्षार्थींच्या गावीच नसल्याने वर्कफोर्समध्ये गाळ माल भरला आहे ज्यांच्या हातात केवळ कागदाचे तुकडे आहेत, ज्ञान नाही. कारण कुठल्याही प्रकारचे कष्ट कोणालाच नको आहेत. घरातील मोठ्या माणसांची सेवा नकोशी झालीय, लहान मुलांना त्यांचे समाधान होईपर्यंत वेळ देणे नकोसे झाले आहे, सुनेला घरकामात मदत करायला सासूला नकोसे झाले आहे आणि बायकोला घरकामात मदत करायला नवऱ्याला नकोसे वाटत आहे. मी चार पुस्तके शिकले आणि बाहेरून कमावून आणते म्हणजे माझा आणि घरकामाचा आणि स्वयंपाकाचा संबंध नाही हे लग्नाआधी डिक्लेअर करण्यात मुली आणि त्यांच्या आईवडिलांना धन्यता वाटू लागली आहे. एकूण काय, आनंदी आनंद आहे सगळा!

हे सगळं डोळ्यासमोर घडतंय तरी आपलं काही चुकतंय अस कोणालाच वाटत नाहीये. सगळे कसे बदललेली परिस्थिती, जीवनशैली, इ. ना दोष देण्यात व्यस्त आहेत. पण ते बदलणारे आपणच आहोत, हे मात्र कोणालाच मान्य नाहीये.

एकीकडे श्रमाची प्रतिष्ठा नष्ट करणे आणि दुसरीकडे माणसातील मीपणा वाढीस लावणे, ह्या आधुनिक शिक्षणाने निर्माण केलेल्या अशा समस्या आहेत की, त्या समस्या आहेत हेच मुळी लोकांच्या लक्षात येत नाही.

श्रमाने अहंकार ठेचला जातो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे! मग मोठ्या माणसांनी सुनावलेल्या खड्या बोलांचा राग येत नाही, धाकट्यांनी काळजीपोटी केलेल्या प्रेमळ सूचनांचा त्रास होत नाही, घरातल्या किंवा ऑफिसमधल्या आळशी माणसांनी न केलेल्या कामामुळे आपल्यावर वाढलेल्या बोजाचा अवाजवी त्रास होत नाही आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे मी कोणीतरी विशेष आहे, माझे काही अस्तित्व आहे आणि इतरांची मर्जी राखता राखता माझे अस्तित्व कसे नष्ट होत चालले आहे आणि काय माझ्या शिक्षणाचा उपयोग, चूल मूल शिवाय मला आयुष्य आहे किंवा मी काय पैसे कमावण्यासाठी आणि इतरांना आधार देण्यासाठीच जन्माला आलो आहे का, असे प्रश्न लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन पडणे कमी होते.

या पोस्टद्वारे आधुनिक शिक्षणाचा विरोध करायचा नसून आधुनिक शिक्षणामुळे केवळ लाभ नाही तर हानीही झाली, हे निदर्शनास आणणे आहे. आणि ती हानी वैचारिक, सांस्कृतिक पातळीवर घडून आली आहे, हे शोचनीय आहे.

जाता जाता एक वास्तवात घडलेला प्रसंग: माझी एक आंबेडकरवादी मैत्रीण होती. तिच्या मोठ्या बहिणीला जिने पदव्युत्तर शिक्षण घेतले तिच्या सासरी तिला खूप जाच होऊ लागला. त्याला अनेक कारणे होती पण त्यातील एक मुख्य कारण असे होते की ही बहीण पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्या कारणाने शेतीत सासरच्यांची मदत करू इच्छित नव्हती. माझ्या मैत्रिणीचेही असे म्हणणे होते की शिक्षण घेतले तर तिने मोलमजुरीची, कष्टाची कामे का करावीत? हाच माझा मुद्दा आहे: शिक्षण घेतले की स्वतःच्या घरच्या शेतीतही काम करणे कमीपणाचे वाटावे, हे जे ब्रेनवॉश काही तथाकथित समाजसुधारकांनी गेल्या अडीचशे वर्षांत भारतीयांचे घडवून आणले आहे ना, ते आपल्या ऱ्हासास कारणीभूत ठरत आहे.

लेखिका – सुश्री परिज्ञा पुरी 

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो – 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ माझे आजोळ… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझे आजोळ… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

का. रा. केदारी.

ईश्वरदास मॅन्शन, बी ब्लॉक, पहिला मजला, नाना चौक, ग्रँट रोड, मुंबई.

हे माझे आजोळ.

वास्तविक आजोळ हा शब्द उच्चारला की नजरेसमोर येतं एक लहानसं, टुमदार  गाव.  झुळझुळणारी नदी, दूरवर पसरलेले डोंगर,  हिरवे माळरान,  कौलारू,  चौसोपी,  ओसरी असलेलं घर. ओटीवरचा पितळी कड्यांचा,  शिसवी पाटाचा झोपाळा, अंगणातलं पार असलेलं बकुळीचं किंवा छान सावली देणार झाड.  सुट्टीत आजोळी जमलेली सारी नातवंडं.  प्रचंड दंगामस्ती,  सूर पारंब्यासारखे खेळ आणि स्वयंपाक घरात शिजणारा  सुगंधी पारंपारिक स्वयंपाक.

हो की नाही?

पण माझे आजोळ असे नव्हते. ते मुंबई सारख्या महानगरीत, धनवान लोकांच्या वस्तीत, अद्ययावत पारसी पद्धतीच्या सदनिका असलेल्या देखण्या प्रशस्त सहा मजली इमारतीत होतं.  गुळगुळीत डांबरी रस्त्यांवर बसेस, काळ्या—पिवळ्या टॅक्स्या, ट्राम्स अविरत धावत असत. अंगण नव्हतं. सदनिकेच्या मागच्या बाजूला फरशी लावलेली मोकळी जागा होती.  तिथेच काही आऊट हाऊसेस, आणि सदनिकेत राहणाऱ्या धनवान लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी गॅरेजेस होती. 

त्या मोकळ्या जागेत ईश्वरदास मॅन्शन मधली मुलं मात्र थप्पा, आंधळी कोशिंबीर,डबा ऐसपैस, लगोरी,  लंगडी, खो खो असे दमदार खेळ खेळत. यात काही मराठी मुलं होती पण बरीचशी मारवाडी आणि गुजराथी होती. ही सारी मुलं मुंबईसारख्या महानगरीत शहरी वातावरणात वाढत होती.  विचार करा. त्यावेळी ही मुलं सेंट  कोलंबस अथवा डॉन बॉस्को सारख्या इंग्रजी माध्यम असलेल्या नामांकित शाळेत शिकत होती. फाडफाड इंग्लिशमध्ये  बोलायचे सारे.

मी ठाण्याची. माझा घरचा  पत्ता – धोबी आळी, शा.मा. रोड, टेंभी नाका ठाणे.

पत्त्यावरूनच कुटुंब ओळखावे. साधे, बाळबोध पण साहित्यिक वातावरणात वाढत असलेली, नगरपालिकेच्या बारा नंबर शाळेत,  मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेली मी.  सुट्टीत आईबरोबर आईच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे त्यांच्या पाश्चिमात्य थाटाच्या घरी जायला आम्ही उत्सुक असायचो.

माझ्या आजोळीच्या आठवणी वयाच्या पाच सहा वर्षापासूनच्या अजून पक्क्या आहेत. आजोळ  म्हणजे आजी आजोबांचं घर. आजीचा सहवास फार लाभला नाही. तरीही कपाळी ठसठशीत कुंकू लावणारी, कानात हिऱ्याच्या कुड्या आणि गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र मिरवणारी,  इंदुरी काठ पदराची साडी नेसणारी,प्रसन्नमुखी  मम्मी अंधुक आठवते. ती मला “बाबुराव” म्हणायची तेही आठवतं. पण ती लवकर गेली.

वयाच्या पस्तीस—चाळीस  वर्षांपर्यंत म्हणजे आजोबा असेपर्यंत मी आजोळी जात होते.  खूप आठवणी आहेत.  माझ्या आठवणीतलं आजोळ, खरं सांगू का? दोन भागात विभागलेलं  आहे. बाळपणीचं आजोळ आणि नंतर मोठी झाल्यावरचं, जाणतेपणातलं आजोळ.

वार्षिक परीक्षा संपली की निकाल लागेपर्यंत आई आम्हाला आजोबांकडे घेऊन जायची. मी, माझ्या बहिणी आणि आई.  वडील आम्हाला व्हिक्टोरिया टर्मिनसला सोडायचे. आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक. तेव्हा व्हीटी म्हणून प्रसिद्ध होतं. ठाणा स्टेशन ते व्हीटी हा प्रवासही मजेदार असायचा. व्हीटीला उतरलं  की सारा भव्यपणा सुरू व्हायचा. समोर महानगरपालिकेची इमारत.  तिथे आम्हाला घ्यायला आलेली आजोबांची मरून कलरची, रुबाबदार रोव्हर गाडी उभी असायची  पण त्यापूर्वीचा, व्हीटीला उतरल्यावर पप्पांच्या आग्रहास्तव प्राशन केलेल्या थंडगार निरेचा अनुभवही  फारच आनंददायी असायचा. 

आजोबांकडे मावशी आणि माझी मावस भावंडंही आलेली असायची, रंजन, अशोक,  अतुल आणि संध्या.  संध्या मात्र जन्मल्यापासून आजी-आजोबांजवळच राहायची.  सेंट कोलंबस मधली विद्यार्थिनी म्हणून तिच्याबद्दल मला खूपच आकर्षण होतं.  आम्ही सुट्टीत तिथे गेलो की तिलाही खूप आनंद व्हायचा. महिनाभर एकत्र राहायचं, खेळायचं, उंडरायचं, खायचं,  मज्जा करायची. धम्माल! 

धमाल तर होतीच.  पण?  हा पण जरा मोठा होता बरं का. माझे आजोबा गोरेपान, उंचताड, सडसडीत बांध्याचे. अतिशय शिस्तप्रिय. बँक ऑफ इंडियात  ते मोठ्या हुद्द्यावर होते. त्यावेळी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले नव्हते. ब्रिटिशकालीन शिस्तीत त्यावेळी कार्यालयीन कामं चालत. आणि त्या संस्कृतीत माझ्या आजोबांची कर्मचारी म्हणून जडणघडण झाली होती. त्यांची राहणी, आचार विचार सारेच पाश्चिमात्य पद्धतीचे  होते. त्यावेळी आजोबांकडे वेस्टर्न टॉयलेट्स, बॉम्बे पाईप गॅस, टेलिफोन, फ्रिज वगैरे होते. घर म्हणाल तर अत्यंत टापटीप,  स्वच्छ.  फर्निचरवर धुळीचा कण दिसणार नाही.  दिवाणखान्यात सुंदर काश्मिरी गालिचा अंथरलेला,  वॉशबेसीनवरचा  पांढरा स्वच्छ नॅपकिन टोकाला टोक जुळवून टांगलेला. निरनिराळ्या खोलीत असलेल्या काचेच्या कपाटात  सुरेख रचून ठेवलेल्या जगभरातल्या अनेक वस्तू. खिडक्यादारांना सुंदर पडदे,शयनगृहात गादीवर अंथरलेल्या विनासुरकुतीच्या स्वच्छ चादरी आणि असं बरंच काही. असं माझं आजोळ  सुंदरच होतं.

आता आठवत नाही पण आम्ही इतके सगळे जमल्यावरही आजोबांचं घर विस्कटायचं नाही का?

आम्ही कुणीच नसताना आणि आजी गेल्यानंतर त्या घरात आजोबा आणि त्यांची  निराधार बहीण म्हणजे आईची आत्या असे दोघेच राहायचे.. आत्याही तशीच शिस्तकठोर आणि टापटीपीची पण अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची. आम्ही सारी भावंडं जमलो की तिलाही आनंद व्हायचा. सखाराम नावाचा एक रामागडी होता. दिवसभर तो आजोबा— आत्या साठी त्यांच्या शिस्तीत राबायचा. आमच्या येण्याने  त्यालाही खूप आनंद व्हायचा. तो आम्हा बहिणींसाठी गुलाबाची आणि चाफ्याची फुले आणायचा. 

आजोबा सकाळी दहा वाजता बँकेत जायचे. रामजी नावाचा ड्रायव्हर होता तो त्यांची बॅग घ्यायला वर यायचा. आजोबा संध्याकाळी सात वाजता समुद्रावर फेरफटका मारून  घरी परतायचे. म्हणजे दहा ते सात हा संपूर्ण वेळ आम्हा मुलांचा.  पत्ते, कॅरम! सागर गोटे आणि असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. एकमेकांशी भांडणं, मारामाऱ्या एकी-बेकी सगळं असायचं.  आत्या रागवायची पण आजोबांना..ज्यांना आम्ही  भाई म्हणायचो, त्यांना जितके आम्ही घाबरायचो तितके तिला नव्हतो घाबरत. सात वाजेपर्यंत  विस्कटलेलं घर आम्ही अगदी युद्ध पातळीवर पुन्हा तसंच नीटनेटकं करून ठेवायचो.

एकदा एका  सुट्टीत मला आठवतंय, भाईंची शिवण्याची सुई माझ्या हातून तुटली.  तुम्हाला खोटं वाटेल पण तीस वर्षं भाई ती सुई वापरत होते. पेन्सिल, सुई यासारख्या किरकोळ वस्तू सुद्धा त्यांना इकडच्या तिकडे झालेल्या, हरवलेल्या,  मोडलेल्या चालत नसत. या पार्श्वभूमीवर सुई तुटण्याची ही बाब फार गंभीर होती.  पण रंजनने खाली वाण्याकडे जाऊन एक तशीच सुई आणली आणि त्याच जागी ठेवून दिली. सात वाजता भाईंची दारावर बेल वाजली आणि माझ्याच काय सगळ्या भावंडांच्या छातीत धडधड सुरू झाली. जो तो एकेका कोपऱ्यात जाऊन वाचन नाही तर काही करण्याचं नाटक करत होता. सुदैवाने भाईंच्या लक्षात न आल्यामुळे ते सुई प्रकरण तसंच मिटलं. पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘आपण काहीतरी चुकीचे केले’ याची मला खूप रुखरुख वाटते.आपण आजोबांपासून हे लपवायला नको होतं.

 – क्रमशः भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका सैनिकाची एकहाती लढाई ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एका सैनिकाची एकहाती लढाई ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

आज आठ एप्रिल,२०२०….उजवा हात कोपरापासून कापून काढला गेला त्या घटनेला एक वर्ष झालंय जवळपास. कुण्या सम्राटानं कारागीरांना एक सुंदर वास्तू निर्मायला लावली आणि तशी वास्तू पुन्हा कुणीही उभारू नये म्हणून त्या कारागीरांचे हातच कापून टाकल्याचं ऐकलं होतं….त्या कारागीरांच्या आत्म्यांना काय क्लेश झाले असतील नाही? मी सुद्धा एक कारागीरच की. फक्त मी काही घडवत नव्हतो..तर काही राखीत होतो….होय, देशाच्या सीमा! ११ ऑक्टोबर,१९८० रोजी मी या जगात आलो आणि समजू लागल्याच्या वयापासून अंगावर सैन्य गणवेश चढवण्याचंच स्वप्न पाहिलं. वयाच्या अठराव्या वर्षी खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षणार्थी सैन्य अधिकारी म्हणून रुजू झालो आणि २००२ मध्ये वडीलांच्या पावलावर पाऊल टाकीत सैन्यात अधिकारी झालो. मनात सतत काहीतरी धाडसी करण्याची उर्मी होतीच म्हणून स्पेशल फोर्सेस मध्ये स्वत:हून दाखल झालो…..आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर पॅरा कमांडो म्हणून यशस्वीरीत्या प्रशिक्षित झालो आणि २,पॅरा एस.एफ. या भारतीय सैन्यातल्या अतिशय महत्त्वाच्या दलात सामील झालो….एक स्वप्न पूर्णत्वास गेले होते. रक्तच सैनिकी होतं…सैन्यातलं सगळंच आवडायचं. त्यामुळे प्रत्येक बाबतीत पुढे असायचोच. माझी कामगिरी बघून सैन्याने मला भूतान या आपल्या शेजारी मित्र देशाच्या सैनिकांना प्रशिक्षित करण्याच्या कामगिरीवर धाडले. भूतान मधील मिशन पूर्ण करून भारतात परत येताच मला जम्मू-कश्मिर येथे पाठवण्यात आले. इथं तर काय माझ्या उत्साहाला पूर्णत: वाव होता. किती तरी अतिरेकी-विरोधी कारवायांत मी अग्रभागी असायचो. २००८ मध्ये अशाच एका कारवाईत मी दोन अतिरेक्यांचा पाठलाग करून त्यांना अगदी जवळून गोळ्या घालून यमसदनी पाठवलं…..याबद्दल मला शौर्य चक्र बहाल करण्यात आलं. खरं तर ते माझं कामच होतं…किंबहुना स्पेशल फोर्सेस कमांडोजचं तर हे काम असतंच असतं. माझं हे काम पाहून सैन्याने मला आणखी एक जबाबदारी सोपवली….परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय शांतिसेनेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची…कोंगो या आफ्रिकी देशात संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेत मिलिटरी ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून मी काही काळ काम केले. 

तुम्हांला आठवत असेलच….२०१६ मध्ये आपल्या सैन्याने शत्रूच्या हद्दीत घुसून अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते…..सर्जिकल स्ट्राईक! यावेळीही मी याच भागात कर्तव्यावर होतो! आणि आता तर मी २ पॅरा एसएफ चा कमांडिंग ऑफिसर बनलो होतो…जबाबदारी आणि अर्थातच कामेही वाढली होती. माझ्या जवानांना मला सदोदित सज्ज ठेवायचं होतं,सक्षम ठेवायचं होतं आणि यासाठी मी स्वत: सक्षम होतो! एके दिवशी मी एकवीस किलोमीटर्सच्या मॅरेथॉन स्पर्धेत धावलो. उजवा हात खूप दुखू लागला. हातावर एक मोठी गाठ आल्यासारखं झालं. रीतसर तपासण्या झाल्या आणि माझ्यावर एक हातगोळा येऊन पडला…खराखुरा नव्हे…आजाराचा! सहकारी,मित्र मला म्हणायचे..तु फार वेगळा आहेस…अगदी दुर्मिळातला दुर्मिळ प्रकारचा माणूस आहेस! मग मला आजार तरी सामान्य कसा होईल? काय नाव होतं आजाराचं माहित आहे? telangiectatic osteosarcoma! आनंद चित्रपटात राजेश खन्नाला असाच काहीसा वेगळा आजार होता..आठवत असेल तुम्हांला! चित्रपटातला हा आनंदही इतका जीवघेणा आजार होऊनही शेवटपर्यंत हसतमुख राहतो….मी तसंच रहायचं ठरवून टाकलं मनोमनी. माझ्यावर उपचार करणारे एक डॉक्टर तर म्हणाले सुद्धा…कॅन्सर सारख्या दुर्धर आजारातही एवढा हसतमुख रुग्ण मी आजवर पाहिला नाही! मी म्हणायचो…का भ्यायचं मरणाला? मी सैनिक आहे हाडामांसाचा. रोज एक नवी लढाई असते…जिंकायची असते सर्वस्व पणाला लावून.  

केमोथेरपी सुरू झाली. एक वर्ष उलटून गेलं आणि शेवटी नाईलाज म्हणून माझा उजवा हात कोपरापासून कापून टाकण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागला! हे ऑपरेशन होण्याच्या आठ दिवस आधीपर्यंत मी कमांडिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडत होतो. शेवटी एकदाचा उजवा हात माझ्या शरीरापासून विलग करण्यात आला! सैनिकाचा उजवा हात म्हणजे त्याचा जीव की प्राण. उजव्या हातानेच तर फायरींग करायचं असतं रायफलीतून….आणि माझा नेम तर अगदीच अचूक असायचा! 

या राईट हॅन्ड अ‍ॅम्प्युटेशन ऑपरेशन नंतर मी लगेचच कर्तव्यावर रुजू झालो….सदैव सैनिका पुढेच जायचे…न मागुती तुला कधी फिरायचे! मी रुग्णालयातून घरी म्हणजे माझ्या सैन्य तुकडीत परत आल्या आल्या पहिली गोष्ट केली ती म्हणजे माझी सायकल मला हवी तशी सुधारून घेतली…एका हाताने सायकल धरून चालवता आली पाहिजे अशी. स्वत:चं स्वत: आवरायला शिकलो, युनिफॉर्म घालणे, बुटाच्या लेस बांधणे….जखमेची मलमपट्टी करणे आणि हो डाव्या हाताने अचूक फायरींग करणे! माझ्या आडनावातच बल हा शब्द…बल म्हणजे सामर्थ्य! डाव्या हाताच्या सामर्थ्यावर सर्व जमू लागले..इतकंच नव्हे…जीपही चालवायला लागलो….एक हाती! आणि हो…पुन्हा पार्ट्यांमध्ये नाचूही लागलो….आधीसारखा. “Never give in, never give in, never, never, never, never – in nothing, great or small, large or petty – never give in except to convictions of honor and good sense” – Sir Winston Churchill. विन्स्टन चर्चिल यांनी म्हणून ठेवलंय…काहीही झालं तरी माघार घेऊ नका….स्वाभिमान आणि सदसदविवेकबुद्धीचं रक्षण यासाठी काहीही करा! 

सौ.आरती…माझ्या सौभाग्यवती…अर्धांगिनी. एखाद्या पर्वतशिखरासारख्या… अतिशय खंबीर. त्यांनीच मला धीर द्यावा,माझी काळजी घ्यावी एखाद्या लहान बाळासारखी. मी पंजाबी जाट तर त्या दाक्षिणात्य. शाळेत असल्यापासून आमचा परिचय. त्यातून प्रेम आणि पुढे त्यातून विवाह. दोन गोंडस मुलगे दिलेत आम्हांला देवाने. आम्ही यावेळी बंगळुरू मध्ये आहोत. आई-बाबा दूर तिकडे एकवीसशे किलोमीटर्स अंतरावर असलेल्या  दिल्लीला असतात. एक भाऊही आहे. 

सारे काही आलबेल आहे असं वाटत असताना समजलं…कॅन्सर खांद्यापाशी संपला नव्हता….सा-या शरीरभर त्याने हातपाय पसरले होते! आता निघावं लागणार…..जावं लागणार…इथली कामगिरी आता संपलीये! मी या रूग्णशय्येवर…नव्हे मृत्यू शय्येवर नेमका दिसतो तरी कसा? पहावं तरी. म्हणून माझ्याच डाव्या हातानं मोबाईल कॅमेरा वापरून सेल्फी घेतला…स्वत:कडे स्मित हास्य करीत!

ते क्षण आता फार दूर नसावेत असं दिसतंय. 

मी कागद लेखणी मागून घेतली…आणि लिहिलं…मी मरणाच्या भीतीला भीक न घालता…चांगल्या वाईट दैवाचा नेटाने सामना केला! विल्यम अर्नेस्ट हेनले या कवीने जेंव्हा त्याचा स्वत:चा एक पाय,तो अवघ्या सतरा वर्षांचा असताना गमावला होता, तेंव्हा Invictus means ‘unconquerable  नावाचा काव्य लिहिलं होतं. त्यातील शेवटच्या ओळी होत्या. …..I am the master of my fate: I am the captain of my soul. ती मीच माझ्या नशिबाचा मालक आणि माझ्या आत्म्याचा कर्ताधर्ता!

यापुढे माझे दोन्ही मुलगे माझा अभिमानाचा वारसा चालवतील…

आरती, प्रिये..माझे प्राण तुझ्यातच तर श्वास घेतात…

आज माझ्या शरीरात चैतन्य आहे आणि मी 

आपला तिरंगा अभिमानानं फडकवतोय आभाळात….

भारत माते…तुझ्या चरणाशी हा माझा अखेरचा प्रणाम!  

हे मृत्यो….उगाच गमजा करू नकोस…मी जिंकलो आहे आणि अमर झालो आहे! 

माझे अंत्यविधी इथेच,माझ्याच जवानांच्या उपस्थितीत करावेत….ही माझी अंतिम इच्छा राहील. 

आई-बाबा,भाऊ दिल्लीहून बंगळुरूला यायला निघालेत…कारण माझ्या अंतिम इच्छेचा मान राखून सैन्याने माझा अंत्यविधी इथंच करायचं ठरवलं आहे…दिल्ली ते बंगळुरू….प्रवासाचा पल्ला मोठा आहे. त्यात कोरोनाची महामारी सुरू आहे…विमानसेवा उपलब्ध नाही.त्यांना यायला आणखी तीन दिवस तरी लागतील सहज…म्हणजे १३ एप्रिल…२०२०..बैसाखीच्या जवळचा पवित्र दिवस! याच दिवशी माझ्यावर अंत्यसंस्कार होतील…काय योगायोग आहे ना? जय हिंद ! 

(कर्नल नवज्योतसिंह बल, शौर्य चक्र विजेते. कमांडिंग ऑफिसर, २,पॅरा एस.एफ. यांचं हे मी माझ्या शब्दांत मांडलेलं मनोगत. कॅन्सरसारख्या भयावह आजारात उजवा हात कोपरापासून कापला गेल्यानंतरही नवज्योतसिंह बल साहेबांनी आपली सैन्य सेवा अव्याहतपणे आणि अतिशय दर्जेदाररीत्या सुरू ठेवली….ती अगदी रुग्णालयात मृत्यूशय्येवर जाऊन नीजेपर्यंत. ९ एप्रिल,२०२० या दिवशी कर्नल साहेबांनी या जगाचा हसतमुखाने निरोप घेतला. आज त्यांचा चौथा स्मृतिदिन. कर्नल साहेबांना भावपूर्ण आदरांजली ! जय हिंद.)  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अरे , लग्न झालं वाटतं !… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अरे, लग्न झालं वाटतं ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

जोपर्यंत गाव छोटं होतं

प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखत होतं 

परकं , अपरिचित कुणीच नव्हतं , कोणीही असो ” आपलं ” होतं !

 

एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायला कुठलंही वाहन लागायचं नाही.

आम्ही येउ का ? तुम्ही घरीच आहात का ? असं विचारावं लागायचं नाही .

माणसं सतत एकमेकाला भेटत रहायची , बोलत राहायची , सारं काही सांगत रहायची .

कुठल्यातरी निमित्याने भांडण झाल्या शिवाय संवाद खुंटतच नव्हता .

भांडण म्हणजे उगी थोडीशी कुरबुर , अर्थात दोन दिवसात ” दो ” व्हायची आणि पुन्हा बोलणं सुरू व्हायचं !

म्हणजे लहानपणी , गावाकडे , ” न करमन्याला वावच नव्हता .”

बरं सगळ्या गोष्टी जवळ होत्या 

दुकान , शाळा , राम मंदिर , मारुतीचा पार , बस स्टॅण्ड सगळं हाकेच्या अंतरावर , त्यामुळे चालणं व्हायचं आणि ओळखीचं माणूस दिसलं की बोलणं व्हायचं !

पुन्हा भजन , पूजन , रामायण , भागवत , हरिपाठ , देवळातल्या पंक्ती , दिंडी , पालखी , गुरवारची पंचपदी माणसाला रिकामपणच नव्हतं .

 

माणसं busy होती , पण income नव्हतं , त्याच्यामुळे स्पर्धा , आसूया , चिंता , काळजी या गोष्टींना थाराच नव्हता .

(मोठा टीव्ही, चार चाकी, मोठा बंगला.. इंग्रजी शाळा याचा विचार शिवायचा नाही…)

आणि बायांना तर भलतेच कामं होते .त्यांच्या वाट्याच्या कामाची नुसती यादी जरी नवीन पिढीने केली तरी त्यांच्या छातीत कळ येईल .

 

अजून एक गोष्ट ….

इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतं 

ABCD …….XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच !

आणि आता 

ABP माझा , CID , MRI , X-ray , Z-TV विचारूच नका .

आमच्या लहानपणी , 

This is Gopal . अन That is Seeta .हे दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायचे तरी जबरदस्त कौतुक व्हायचं !

आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्या सारखंच वाटायचं !

 

अहो कंडक्टर याच्यामुळे की …..आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने , 

हं sss काय रे बाळ मोठेपणी तू काय होणार ?

असा प्रश्न विचारला की ते पोट्ट हमखास म्हणायचं …..

मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार !

तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळालं असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं 

फक्त एवढंच विचारायचे ….

पहिल्या झटक्यात पास झालास न ?

आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा !

म्हणजे पहा सुखाच्या , आनंदाच्या , मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या !

लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो , त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं .

तुम्ही बघा पूर्वी ….

गाव छोटं , घर छोटं , घरात वस्तू कमी , पगार कमी , त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी 

उसनपासन केल्या शिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता , तरीही मजा खूप होती!

 

तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !

उसनपासन करावंच लागायचं ……

साखऱ्या , पत्ती , गोडेतेल , कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता 

त्यामुळे कोणाकडे ” हात पसरणे ” म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही .

उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा ” कमीपणा ” वाटत नव्हता !

डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृत अंजनच एक बोटं उसन मागायला सुद्धा अजिबात लाज वाटली नाही .

घरातल्या वडील माणसासाठी 10 पैश्याच्या तीन मजूर बिड्या किंवा 15 पैशाचा सूरज छाप तंबाखूचा तोटा आणतानाही मान कशी ताठ असायची !

 

कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !

गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती , कारण शेजाऱ्या-पाजाऱ्या कडून पोह्याच्या प्लेट , चमचे , बेडशीट ,

 तक्के , उषा , दांडी असलेले कपं आदी साहित्य मागून आणल्या शिवाय ” पोरगी दाखवायचा  कार्यक्रम ” होऊच शकत नव्हता !

आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती , ते आत्ता कळतंय !

आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही !

जेंव्हा Status वर डान्सचा व्हिडीओ येतो तेंव्हा कळतं , अरे लग्न झालं वाटतं !

 

हे सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश आहे

भेटत रहा , बोलत रहा , जाणे-येणे ठेवा , विचारपूस करा …..

जेवलास का ?

झोपलास का ?

सुकलास का ?

काही दुखतंय का ? असे प्रश्न विचारतांना लागलेला मायेचा , काळजीचा , आपुलकीचा कोमल     स्वरच जगण्याचं बळ देत असतो !

 

माणसाशिवाय ,गाठीभेटीशिवाय , संवादाशिवाय काssssही खरं नाही !

कवी :अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिपज्योती नमोस्तुते ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

दिपज्योती नमोस्तुते ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

दीप हे अग्नीचे व तेजाचे प्रतिक आहे तर ज्योती हे ज्ञानाचे व बुद्धीचे प्रतिक आहे. मानवी  जीवनात दिव्याला फार महत्व आहे. कारण दिवसा तळपणारा सूर्य असतो पण रात्री अंधार नष्ट करण्यासाठी मानव निर्मित दिव्याची गरज असते.

पूर्वी प्रकाशासाठी व कुठेही नेण्याला सोपे असे कंदील, चिमणी वापरली जायची. देवळात काचेच्या हंड्यातील दिवे असायचे तर बाहेर दीपमाळ असते आणि गाभाऱ्यात नंदादीप अखंड तेवणारा!श्रीमंतांच्या दिवाणखान्यात हंड्या, झुंबरे असत. त्यांचा वापर मेणबत्या लावून व्हायचा. समूहासाठी आधी मशाली मग बत्त्या, नंतर पेट्रोमॅक्स चे दिवे आले. कंदील कालबाह्य झाले तसं घरोघरी विजेवर चालणारे दिवे आले. त्यांच्या अनिश्चिततेमुळे emergency दिवे, मेणबत्या आल्या. आता तर सोलर दिवे वापरात आले आहेत.पूर्वी सजावटीसाठी आधी तेलाच्या पणत्या, मग मेणाच्या पणत्या, अलिकडे विविध प्रकारच्या, विविध रंगांच्या, विविध आकारातल्या लाईट च्या, LED च्या माळा असतात.

अर्थात दिव्यांचे प्रकार, नमुने, त्यांचं सौंदर्य यात विविधता असली तरी त्यांची गरज बदलली नाही व आपली संस्कृतीही बदलली नाही.आजही तिन्हीसांजेला ‘दीपज्योती नमोस्तुते ‘ म्हणत देवघरात समई लावली जाते, तुळशीसमोर दिवा ठेवला जातो. कांहीही म्हणा पण तेल, तूप यात तेवणारी मंद ज्योत जी प्रसन्नता, मंगलता, सात्विकता, शुभकारकता यांची अनुभूती देते ती दुसरी कोणतीही ज्योत देऊ शकत नाही.आपण नकळत तिच्यासमोर नतमस्तक होतो.

आपल्या संस्कृतीत दीप प्रज्वलनाला फार महत्व आहे. दिवा तमनाशक असल्याने तो प्रकाशाची आस जागवणारा, ऊर्जा देणारा, शुभकारक!म्हणून कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने करतात. कोणतीही पूजा पूर्ण होईपर्यंत तेलाचा व तुपाचा दिवा तेवत ठेवलेला असतो. षोडशोपचारे पूजा करताना शंख, घंटा, कलश याबरोबर दिव्याची ही पूजा करतात. नवरात्रासारख्या कुळाचाराच्या वेळी किंवा अनुष्ठानाच्यावेळी अखंड दीप, नंदादीप ठेवला जातो. आषाढ अमावस्या दिव्याची अवस म्हणून साजरी केली जाते. दीपावली सारखा दिव्याचा सण साजरा करतो. दीप- आवली, म्हणजे दिव्यांची ओळ! कार्तिक पौर्णिमेला पाण्यात दिवे सोडले जातात.

तसं पाहिलं तर हिंदू संस्कृतीत अग्निलाच खूप महत्व आहे. तो अग्नेय दिशेचा रक्षक असून पंचमहाभूतांपैकी एक आहे. इंद्राखालोखाल महत्वाचा देव अग्नि आहे. हिंदू संस्कारात नामकरणापासून मृत्यूपर्यंत सगळे संस्कार अग्निच्या साक्षीने होतात. फक्त नामकरणादिवशी होम नसतो पण तेलाचे दिवे लावले जातात. अग्नि ही उर्जा असल्याने निर्मिती, पोषण, नाश सर्वांना कारणीभूत आहे. म्हणून अग्नि हा परिवर्तनशील मानतात. गर्भ निर्मिती करतो, पोषणाने त्याचे बाल्यात, मग शैशवात , तारुण्यात , गृहस्थात परिवर्तन करतो आणि  शेवटी देहाचा नाश करून मुक्त आत्म्याला  दुसऱ्या देहात परिवर्तीत करतो. कांही घरात संध्याकाळी अग्निहोत्र करतात. अग्निद्वारे होमातील आहुती देवांपर्यंत पोचविल्या जातात. होळीदिवशी अग्नीची पूजा केली जाते.

दिव्याचा एक प्रकार रोजच्या वापरातला म्हणजे निरांजन!निरांजन हा शब्दच किती शांत, मृदू, नि वत्सल आहे.मूळ शब्द निरंजन, निः + अंजन, पवित्र, निष्कपट, काजळी न धरणारे, शुभकारक, सकारात्मक उर्जेच्या स्पंदनांचे वहन करणारे!

आपल्याकडे ज्या ओवाळण्याच्या पद्धती आहेत त्या थोड्या सविस्तर सांगणार आहे कारण सिरीयल मधलं ओवाळणं पाहून हीच खरी पद्धत आहे असं वाटायला लागलंय.आपण

देवाला ओवाळतो त्याला देवाची आरती म्हणतात. आरतीसाठी ताम्हनात दोन निरंजने ठेवावी, त्यात तुपाच्या दोन दोन फुलवाती(फुलासारख्या दिसणाऱ्या कापसाच्या तयार केलेल्या )घालव्यात. कापूर घालून कापुरारती ठेवावी व अक्षता ठेवाव्या. आपण आरतीतून देवाची स्तुती करतो व त्याच्याकडे आशीर्वाद मागतो. त्यामुळे आरती करताना ज्या देवाची आरती करणार असू त्या देवावर अक्षता टाकायच्या व ओवळायचं. आरती झाली कि ज्योतीत जे तेज येतं किंवा देवाचा आशीर्वाद येतो, तो उपस्थित सर्वांना मिळावा यासाठी आरतीचं ताट फिरवतात. सगळे ओंजळीने ते तेज घेऊन मस्तकावरून तो हात फिरवतात. आरतीचं ताम्हन परत देवासमोर ठेवताना ताम्हनाखाली अक्षता ठेवतात. बऱ्याचवेळा आरती नंतर मंत्रपुष्प म्हणतात त्यावेळी उपस्थितांना फूल व अक्षता किंवा नुसत्या अक्षता देतात. उजव्या हातात अक्षता ठेवून त्यावर डावा हात झाकावा. म्हणजे त्या अभिमंत्रित होतात अशी कल्पना. मंत्रपुष्प झाल्यावर त्या अभिमंत्रित अक्षता देवावर वाहून नमस्कार करावा. कधी कधी निरंजना ऐवजी पुरणाचे पाच दिवे करून त्यात तुपाच्या पाच वाती लावून देवाची आरती करतात. नंतर कांही लोकांच्यात त्या पुरणाच्या आरतीने घरातल्या मुलांना ओवाळतात.ज्योतीमधील देवाचा आशिर्वाद मुलांना मिळावा यासाठी, (इथे सुपारी फिरवत नाहीत ) कारण हे ओवाळणे बहुधा श्रावण शुक्रवारी करतात त्यावेळी  आपण ज्या जीवतीच्या कागदाची पूजा व आरती करतो ती लहान मुलांचं रक्षण करणारी आहे.

अक्षताही पवित्र व सकारात्मकता वाहणाऱ्या मानतो. मूळ शब्द अक्षत, म्हणजे छिद्र किंवा जाळी नसलेला, म्हणून अक्षता करण्यासाठी अखंड तांदूळ घेऊन त्याला तेलाचा हात लावून कुंकवाने लाल करतात. तसेच फक्त देवाची पूजा, आरती करताना तूप व फुलवाती लागतात. एरवी केंव्हाही निरांजन किंवा दिवा, समई लावताना तेल व वळलेल्या वाती लागतात.

जेंव्हा आपण माणसांना ओवाळतो त्याला औक्षण म्हणतात. औक्षण म्हणजे आशिर्वाद देणे, दृष्ट काढणे.उदा. वाढदिवस, यासाठी ताम्हनात दोन निरांजने घ्यावीत, त्यात वळलेल्या वाती, प्रत्येक निरांजनात दोन दोन च्या दोन, अशा एकूण आठ वाती व तेल घालतात. ताम्हनात अक्षता व सुपारी ठेवावी. सोन्याची अंगठी प्रत्येक घरात असेलच असे नाही त्यामुळे ती हौस म्हणून असेल तर घ्यावी. महत्व सुपारीला आहे.ज्याचं औक्षण करायचं त्याला उभं किंवा गोल (मुलगा, मुलगी याप्रमाणे )कुंकू लावावे.हे मात्र कुठल्याही प्रसंगी ओवाळताना लावावे.मुलाला उभे कुंकू लावणे यालाच नाम ओढणे म्हणतात. मग डोक्यावर अक्षता टाकून एकदा ताम्हन गोल फिरवावे,हातात सुपारी घेऊन ओवाळणाऱ्याने आपल्या डाव्याबाजूने उजवीकडे अर्धगोलात सुपारी फिरवावी व ताम्हनात टेकवावी, मग उजवीकडून डावीकडे ताम्हनात टेकवावी व शेवटी आणखी एकदा डावीकडून उजवीकडे आणून ताम्हनात ठेवावी. त्यापूर्वी कांही ठिकाणी सुपारी व अंगठी कपाळाला लावतात. हे औक्षण आशीर्वादाचे असल्यामुळे मोठ्यानी छोट्याना ओवाळायचे असते. याशिवाय गणपती, गौर आणणाऱ्यालाही पायावर दूध पाणी घालून दारातून आत आल्यावर ओवाळतो. तेंव्हा आशिर्वाद द्यायचा नसल्याने सुपारी फिरवत नाहीत फक्त दोनदा अक्षदा टाकून ताम्हन फिरवतात. कदाचित ते फक्त देवाचं स्वागत असावं. असं ओवाळून स्वागत, जिंकून आलेल्या व्यक्तीचं दारात करतात.

भाऊबीज, रक्षाबंधन, पाडवा हे नाजूक बंध असणाऱ्या नात्यासाठीचे सण असतात. त्यावेळी ओवाळणी घालणं असल्यामुळे  वयाचा विचार केला जात नाही. ओवाळताना सुपारी फिरवली जात नाही. ज्याला ओवाळतो त्याच्या हातात सुपारी द्यायची व त्याने ती ओवाळणीसह ताम्हनात ठेवायची. ओवाळणी म्हणून एक रुपायचं नाणं सुद्धा चालतं, एकमेकांतलं प्रेम ओवाळणी पेक्षा महत्वाचं असतं.नेहमीप्रमाणे दोनदा अक्षता टाकून ताम्हन फिरवायचं.

मोठ्यांच्या 61,75,81,100 अशा महोत्सवाच्या वेळी वयाएवढ्या वातीनी ओवाळतात, त्यावेळी ओवाळणारे बहुधा त्या व्यक्तीपेक्षा लहानच असतात त्यामुळे फक्त वातींचे ताट फिरवतात.

अर्थात यांसगळ्या गोष्टी श्रद्धेच्याच आहेत. हे असंच का याला तर्कशुद्ध उत्तर देता येणार नाही. कदाचित कुटुंबातील सर्वांना एकमेकांशी प्रेम भावनेने जोडून ठेवावं, प्रत्येकाला कुटुंबात कांही विशिष्ट स्थान असावं, कर्तव्याची, जबाबदारीची जाणीव असावी, घर आनंदी असावं. आपलं कुटुंब कोणत्याही संकटापासून दूरअसावं, एवढाच निर्मळ विश्वास किंवा आशावाद असावा.श्रद्धेचा पाया असला कि नात्यांची इमारत सहज कोसळत नाही. आणि असंच करावं, अशी पद्धत घालून दिली कि आत्मियतेने गोष्टी केल्या जातात.ऊरका पाडून प्रसंगाचं, सणाचं महत्व कमी होऊ नये यासाठीही!

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसः तेज उत्तमम् l

गृहाणं मत्कृतां पूजा, सर्वकाम प्रदो भवः॥

हे दीपदेवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामधे उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा स्विकार कर. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सज्जनगडावरील प्रसादाची खीर!…” – लेखक : डॉ. वीरेंद्र ताटके ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “सज्जनगडावरील प्रसादाची खीर!” – लेखक : डॉ. वीरेंद्र ताटके ☆ श्री मोहन निमोणकर

सज्जनगडावर भोजनप्रसादात मिळणारी गव्हाची खीर हा पीएचडीचा विषय होऊ शकतो. गेल्या शेकडो वर्षात गडावरील रामदासी लोक बदलले, त्यांची खीर करायची पद्धत देखील इतक्या वर्षांमधये   बदलली असेल पण खिरीची चव मात्र जैसे तैशीच ! 

लहानपणी गडावर जाण्याचे मुख्य आकर्षण असायचे ते या खिरीचे….. आणि आता वयाने मोठं झाल्यावर…. खोटं कशाला बोलायचं…. आजही त्या खिरीचे आकर्षण तेवढेच आहे. काहीजण या खिरीला लापशी म्हणतात परंतु ‘खीर’ या शब्दात जो जिव्हाळा आहे तो ‘लापशी’ या शब्दात नाही.

भोजनप्रसादात या खिरीचे आगमन होण्यासाठी मोठी वाट पाहावी लागते. आधी प्रसादाच्या रांगेत उभे राहून आतून येणाऱ्या  सुगंधावरून आज पानात  भातासोबत फक्त  आमटी आहे की एखादी भाजी सुद्धा आहे याचा अंदाज लावायचा… त्यानंतर थोड्या वेळाने ताटं-वाट्यांचा आवाज येतो.  नंतर भोजनगृहात प्रवेश मिळाला की नामस्मरण झालं की सर्वप्रथम भात -आमटी मीठ, चटणी यांचे पानात आगमन होतं….. आणि मग  खरपूस सुगंधाचा सांगावा आधी पाठवत त्यानंतर त्या बहुचर्चित खिरीच्या बादल्यांचे आगमन होते….. पण सांभाळून…. डेक्कन एक्सप्रेसच्या वेगाने तुमच्याकडे येणारी खीर तुमच्या पानापर्यंत पोहचण्याआधी भात आमटी संपवून ताट चकचकीत करायचं कसब तुमच्याकडे हवं.  भोजन-प्रसादाला नियमित येणाऱ्या बंधू-भगिनींना हे अंगवळणी पडलेलं असतं.

अर्थात हा भोजनप्रसाद घेणारा मनुष्य सुद्धा चांगला बलदंड असला पाहिजे. उगाच ‘नको-नको ‘ म्हणणारा ( आदरणीय मकरंद बुवांच्या शब्दात -‘कायमचूर्णवाला’ ) नको. त्यासाठी  पंगतीच्या त्या टोकाला खिरीने गच्च भरलेली बादली घेतलेले काका  दिसले की त्यांच्या वाढण्याच्या वेगाचा अंदाज घेऊन ते आपल्यापर्यंत पोहचण्याआधी आपल्या पानातील खीर संपविण्याचा वेग पाहिजे. टाईमपास करत – गप्पा मारत प्रसाद घेणाऱ्याचे हे कामच नाही.

काही गृहिणी म्हणतात की आम्ही आमच्या घरी सुद्धा अशी खीर करतो पण  तुम्ही  गडावर मिळते तशी  खीर  घरी करून दाखवली तर मी कसलीही पैज हरायला तयार आहे. मुळात रेसिपीची पुस्तके वाचून – “अमुक एवढा गुळ, अमुक एवढे पाणी, तमुक मुठी गहू, मंद आचेवर  इतका  वेळ  ठेवावी ” असली वाक्ये वाचून करण्याचा हा पदार्थच नाही.

गडावर मिळणारी खीर ही ‘रेसिपी’ नसते तर ‘प्रसाद’ असतो. त्यात भिक्षाफेरीत रामदासी मंडळींनी दारोदारी अनवाणी जाऊन, मनाच्या श्लोकांचा जागर करत गोळा केलेला आणि  असंख्य भक्तांनी प्रेमाने दिलेला  शिधा असतो, गडाच्या पायथ्यापासून घाम गाळत गव्हाची पोती गडावर पोहचविणाऱ्या सेवेकऱ्यांचे श्रम असतात, जमा झालेले गहू निवडून-पाखडून, त्याला ऊन  दाखवून वर्षभर जपून ठेवणाऱ्या माता-भगिनींचे कष्ट असतात.

या सर्वांसोबत मला सर्वाधिक आश्चर्य वाटतं ते भोजनप्रसादाची खीर  तयार करणाऱ्या बल्लवाचार्य मंडळींचे !  प्रसादाला नक्की किती लोक आहेत हे पहिली पंगत बसेपर्यंत सांगता येत नाही. तरीही आलेल्या सर्वांना पुरेल एवढी आणि नेमकी त्याच चवीची खीर रोज तयार करायची. या सेवकांच्या या  ‘स्कील’पुढे  तर नतमस्तकच व्हावेसे वाटते. (आपल्या घरी एखादा पाहूणा अचानक आला तर जेवणासाठी आपली किती तारांबळ उडते याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे).

आदर्श दिवसाची कल्पना काय असं विचारलं तर मी उत्तर देईन, ” सकाळी प्रसादापूर्वी गडावर पोहचावे.  रामराया, मारुतीराय, समर्थ, परमपूज्य श्रीधर स्वामी  यांचे दर्शन घेऊन प्रसादाच्या रांगेत वेळेत उभे राहावे, भोजनप्रसादात खिरीची बादली आपल्यापुढे तीन-चार वेळा यावी आणि त्यावेळी आपले पान चकचकीत असावे, भोजनप्रसादानंतर थोडा वेळ कलंडून दुपारचा चहा घेऊन धाब्याच्या मारुतीचे दर्शन घेऊन यावे. सायंउपासनेला, दासबोध-वाचनाला हजर रहावे. शेजारती झाल्यानंतर रात्रीच्या पंगतीला पिठलं-भातासोबत  पुन्हा एकदा सकाळची मुरलेली खीर असावी  आणि त्यानंतर मुक्कामाला खोली मिळालेली असावी…… सगळं जग विसरून जाण्यासाठी यापेक्षा अधिक काय हवं ?

लेखक :  डॉ वीरेंद्र ताटके 

पुणे, ९२२५५११६७४ 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ झाडांची भिशी – – ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

झाडांची भिशी – – ☆ श्री सुनील देशपांडे

दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘झाडांची भिशी’ ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल. झालं असं, यशवंत पेठकर नावाचे डॉक्‍टर शाळेपुढील जागेत शाळेच्या परवानगीनं वृक्षारोपण करीत होते. त्यांचे मित्र डॉ. सचिन पुराणिक यांनी ते पाहिलं. शाळेपुढं झाडं लावण्याची त्यांची कृती सचिन यांना अभिनव वाटली. पण एकट्या-दुकट्यानं हे काम केलं, तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही, काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे, असं त्यांच्या मनानं घेतलं. एका-दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी, पण त्यासाठी पैसे हवेत. ते कसे उभे करायचे? डॉ. सचिन यांचा आपल्या मित्रांवर भरवसा होता. त्यांनी काही मित्रांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता ती आकाराला आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वतः झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्‍य नव्हतं. शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा काढला. दोन वर्षांत सोलापुरात ७०० झाडं लावण्यात आली आणि ती सगळी जिवंत आहेत.

अशी आहे भिशी …. 

सुरवातीला बारा डॉक्‍टरांनी मिळून सुरू केलेल्या या भिशीमध्ये आता ८८ सदस्य आहेत. त्यातील अनेक जण उद्योजक, इंजिनिअर, आर्किटेक्‍ट किंवा अन्य व्यवसायांतील आहेत. प्रत्येकाकडून दरमहा दोनशे रुपये घेऊन महिन्याला दोन लकी ड्रॉ काढले जातात. ज्यांच्या नावाचा ड्रॉ निघाला, त्यांच्या पसंतीची योग्य वाढ झालेली रोपं खरेदी केली जातात. त्यांच्याच सूचनेनुसार वृक्षारोपणाची जागा निश्‍चित केली जाते. त्याची निगा आणि संगोपनाची जबाबदारी ठरवली जाते. त्यानुसार कधी समारंभपूर्वक, तर कधी साधेपणानं लागवड केली जाते. भिशीच्या पैशातून रोपखरेदी, जाळीचे किमान पाच फुटांचे ट्री गार्ड खरेदी केले जाते. ड्रॉ निघालेल्या सदस्याच्या घराच्या, बंगल्याच्या आवारात रोप लावले जाते. तेथे जागा नसल्यास शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ते लावले जाते. सोलापुरातील विविध शाळा या मंडळींना आपल्या शाळेत वृक्षारोपणाची विनंती करतात. रेंज फॉरेस्ट ऑफिसर संजय माळी यांना ही संकल्पना समजली. दिवंगत ‘वृक्षमित्र’ बाबूराव पेठकर आणि पर्यावरणतज्ज्ञ सिद्राम पुराणिक या सगळ्यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले.

दोन वर्षांत सातशे झाडं स्वखर्चाने लावणाऱ्या या निसर्गप्रेमींची दखल राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही घेतली. त्यांनी या ग्रुपमधील काही सदस्यांना मुंबईला निमंत्रण देऊन ही कल्पना समजून घेतली. त्यांच्यापुढे झालेल्या सादरीकरणामुळे हा उपक्रम आणखी जोमाने सुरू झाला. हिमाचल प्रदेशात एक लाख औषधी वृक्षांची लागवड केलेल्या योगी अरविंद यांना या उपक्रमाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी सोलापूरला आवर्जून भेट देऊन या मंडळींना मार्गदर्शन केले. 

झाडांचा वाढदिवस – – 

लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते. रोप व्यवस्थित रुजले आहे की नाही ते पाहिले जाते. बऱ्याचदा रोप रुजत नाही, तेव्हा दुसरे रोप लावले जाते. लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो. झाडाचं संगोपन करणाऱ्यांचे कौतुक केले जाते. हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला आहे. आता कित्येक जण आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात व या उपक्रमात सहभागी होतात. डॉ. सचिन यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे. एकाच ग्रुपमध्ये अधिकाधिक सदस्य वाढवण्यापेक्षा शहराच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे भिशी ग्रुप व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आणखी ग्रुप तयार झाले आहेत. झाडं लावणाऱ्यांची सावली झाडंच सांभाळतात, असं हा उपक्रम पाहता म्हणावे लागेल. कवी नारायण सुमंत यांच्या शब्दांत सांगायचे, तर .. .. 

‘फुलता आले नाही त्यांनी फुलवून जावे थोडे, 

रुजण्याजोगे झाड पाहून लावीत जावे झाडे.’

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गेस्टापो — ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ गेस्टापो ☆ श्री प्रसाद जोग

‘गेस्टापो‘  या हेरखात्याची सुरवात २६ एप्रिल ,१९३३ रोजी झाली.

नुसतं नाव जरी उच्चारलं तरी आजही छातीत धडकी भरते.तर मग दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ज्यांनी त्यांचे क्रौर्य , निर्दयीपणा , माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना प्रत्यक्ष अनुभवल्या असतील त्याची काय हालत झाली असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही.

हिटलर तरुण वयात ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना शहरात रहात होता. धड शिक्षण पुरे झाले नव्हते ,त्यातच त्याने काढलेली चित्रे पाहून तेथील बेली स्कुल ऑफ आर्टस् ने प्रवेश नाकारला होता. पोटासाठी पोस्टकार्डच्या आकाराची चित्रे बनवून त्याने उदरर्निवाह चालवला होता. जर त्याला प्रवेश मिळाला असता तर आज जग वेगळेच दिसले असते.

त्या वेळी सर्व अवैध धंद्यामध्ये ज्यू लोक प्रामुख्याने आढळून येत होते. ते लोक वेश्याव्यवसाय चालवत असत त्या मध्ये जर्मन स्त्रियांची पिळवणूक आणि लैंगिक शोषण होताना त्याने पहिले.सावकारी करताना प्रचंड व्याजदर लावून गरीब लोकांना पिळणारे ज्यू त्याने पहिले. ही जात नालायक असे त्याच्या मनाने घेतले.या जातीचे उच्याटन करून पृथ्वी ज्यू विरहीत करावी असे त्याला वाटे. नंतर योगायोगाने तो राजकीय पक्षामध्ये खेचला गेला आणि बघता बघता त्याने त्या पक्षावर कब्जा मिळवला. अस्खलित वक्तृत्व ही त्याला मिळालेली मोठी देणगी होती. ऐकणारे मंत्रमुग्ध होत असत आणि तो काय म्हणतोय त्याला माना डोलवत.आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत असत.

थोड्याच दिवसात जर्मनीमध्ये हिटलरच्या शासनाला सुरवात झाली,वर्ष होते १९३३ . तेंव्हा सुरवातीपासूनचा त्याचा सोबती हर्मन गोअरिंग याला गुप्तहेर संघटना उभी करायला सांगितली आणि तिला नाव दिले “गेस्टापो” . नाझी पक्षात हिटलरच्या खालोखाल दोन नंबरचे खाते होते गोअरिंग चे (अंतर्गत पोलीस खाते ) गोअरिंगने रुडॉल्फ डिएल्स याला गेस्टापो प्रमुख नेमले होते. त्याच्याकडून अपेक्षित असलेले काम करण्यास तो कमी पडत होता म्हणून गोअरिंग ने ते खाते त्याच्या ऐवजी हेनरिक हिमलरला सोपवले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्यूंची धरपकड सुरु झाली.

या खात्याला अमर्याद अधिकार दिले. कोणाही व्यक्तीला कोणतेही कारण न देता पकडून नेले जात असे . आणि पुढे हेनरिक हिमलरच्या एस.एस. गार्ड्सच्या ताब्यात दिले जात असे,जो पर्यंत काम करून घेता येईल तो पर्यंत काम करवून घ्यायचे आणि नंतर रवानगी भयाण मृत्यूच्या छळछावण्यांमध्ये केली जात असे.

ज्यू जात नष्ट व्हावी म्हणून सामूहिक नरसंहार (Racial massacre) केला जात असे. मोठं मोठ्या गॅस चेंबर मध्ये कोंडून विषारी वायूने वांशिक नरसंहार केला जात होता आणि हे करण्यात पुढे असायचे हे गेस्टापो हेरखाते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अंदाजे पन्नास ते ऐशी लाख लोक मारले गेले असे म्हटले जाते, सैनिक सोडले तर जादा करून ज्यू लोकच मारले गेले.

युद्धाचे पारडे फिरल्यावर हेनरिक हिमलर पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. रशियन सुरक्षा चौकीवर त्याला पकडले गेले. त्याची चौकशी करण्यापूर्वीच त्याने लपवून ठेवलेली सायनाईड ची कॅप्सूल चावली आणि मृत्यूला कवटाळले.

दुसरे महायुद्ध संपल्यावर या युद्धातील गुन्हेगारांवर न्यूरेंबर्ग येथील न्यायालयात खटले चालवले गेले आणि गोअरिंगला फाशीची शिक्षा सुनावली गेली ,परंतु फाशीची अंमलबजावणी होण्याआधीच त्याने कडेकोट बंदोबस्तातील कोठडीमध्ये सायनाईड मिळवले आणि ते खाऊन आत्महत्या केली आणि त्याने गुप्तहेर प्रमुख असल्याचे सिद्ध करून दाखवले.

३० एप्रिल ,१९४५ रोजी हिटलरने आत्महत्या केली,आणि ८ मे १९४५ रोजी गेस्टापो खाते बरखास्त केले . व जगभरातील ज्यूंनी काहीसा निश्वास टाकला .

जगभरात वेगवेगळ्या जाती,धर्म, पंथ आहेत, त्या मध्ये मृत्यूनंतर केलेल्या कृत्यांची फळे स्वर्ग अथवा नरक या मध्ये मिळतात असे मानले जाते . पण या क्रूरकर्मा लोकांची कृत्ये एवढी तिरस्करणीय आहेत की त्यांना स्वर्गातच काय नरकामधे देखील घेतले नसेल आणि हे अतृप्त आत्मे चराचरात फिरत असतील त्यांना मोक्ष मिळणे अशक्य .

जे निष्पाप जीव यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे मृत्युमुखी पडले त्यांना सद्गती लाभली असेल अशी आशा करायची .

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ व.पु.काळे यांची एक बोधकथा – कथालेखक : व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

व. पु. काळे यांची एक बोधकथा – कथालेखक : व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

गावे का दुसऱ्याच्या मनासारखे ? हे समजावणारी सुंदर अशी व.पु.काळेंची बोधकथा

बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची. 

पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा… 

एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.  

घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहीलं. ‘मेलं की काय’ अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं. 

त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघीतलं, आणि चक्क ‘शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार..’ असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी..!

त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, 

टी पॉय वरचा चष्मा आणून दे…  अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.

मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. ‘अग मन्या दिसत नाही गं कुठं ?’ बायकोला सतत विचारत राहायचा.

असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या गेटसमोर बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महापालिकेची व्हॅन येऊन थांबली. 

मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅन मधे बसला. 

नवऱ्याने हे बघितले.  हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.

नवरा म्हणाला, “मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे. तुझ्यासाठी नाही.”

“मला माहितेय..! पण मला जायचंय आता.” मन्या शांतपणे बोलला.

“मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही.  माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता.” काकुळतीला येवून नवरा बोलला.

मन्या गोड हसला, आणि बोलला, “तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर?”

“म्हणजे काय शंकाय का तुला?”

“मित्रा, अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो,  हवं तिथं हवं तेंव्हा  तोंड घालत होतो, तेंव्हा मी तुझा नावडता होतो.  सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा

पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो,  तुला हवं तसं करू लागलो…. तेंव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय?” 

नॉट सो स्ट्रेंज यार…!!

वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते……

जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?

समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं. 

पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणंही आता नकोसं वाटतं. त्याला टाळत राहतो.

भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.

आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?

आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं.

अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!

कथालेखक :  व.पु.काळे

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अक्षय तृतीया…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “अक्षय तृतीया…” ☆ सौ राधिका भांडारकर 

अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो.  यावर्षी अक्षय तृतीया १० मे ला साजरी होत आहे.  हा सण गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात साजरा केला जातो.

अक्षय याचा अर्थ ज्याचा क्षय होत नाही ते.  या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असा संकेत आहे.  या दिवशी आपण दान केले तर विपुल प्रमाणात ज्या वस्तूंचे दान केले त्या पुन्हा आपल्याजवळ प्राप्त होतात अशी भावना आहे.

अक्षय तृतीया सणाच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा आहेत.  भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत.

याच दिवशी भगवान गणेशांना वेदमहर्षी व्यासांनी महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती. 

अक्षय तृतीया म्हणजे भगवान विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता.

अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेता युगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात.

हा दिवस म्हणजे  माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे.  त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णेची आराधना केल्यास आयुष्यभर घरात सुखसमृद्धी नांदते.

याच  दिवशी  श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्र्य संपवले.

वनवासी असलेल्या पांडवांसाठी श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षयपात्र भेट दिले होते ज्याचा उल्लेख ‘द्रौपदीची थाळी’ असा केला जातो ज्यामुळे वनवासातही पांडवांना कधीही उपासमार घडली नाही.

अक्षय तृतीयेलाच पृथ्वीवर गंगा अवतरली होती.

भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले.

जैन बांधव हा दिवस भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा करतात.

जगन्नाथ पुरी येथे याच दिवसापासून रथयात्रेला सुरुवात होते असा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक मंगल पवित्र दिन!

अक्षय तृतीयेचा हा सण खानदेशात मात्र अगदी दिवाळी सारखाच साजरा केला जातो.  तिकडे या सणास आखाजी असे म्हणतात.

आखाजी हा जसा सासुरवाशिणींचा सण तसेच तो पितरांचाही सण मानला जातो. खरं म्हणजे हा शेतकरी बांधवांचा सण. मातीशी अतूट नातं सांगणारा सण. या दिवशी शेतमजुरांना सुट्टी असते.  सालगडी (सालदार) यांची नवी कामेही ठरविली जातात.  खानदेशातील आगळीवेगळी अक्षय तृतीया परंपरा आजही तितक्याच, भक्तीभावाने,  उत्साहाने पाळली जाते.  या सणाला अक्षय घट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते.

वसंत ऋतू संपून ग्रीष्माची चाहूल लागते. घागर हे त्याचं प्रतीक आहे.  या घागरीवर छोटे मातीचे भांडे ठेवले जाते त्यावर खरबूज,  सांजोऱ्या,  आंबे ठेवले जातात. यातील छोटे भांडे हे पितरांसाठी असते.  आधी ह्या पितरांना पाण्याचा घट दिला जातो त्यानंतरच नवीन माठ आणून घरात वापरला जातो.

पाटावर धान्य पसरून सभोवती रांगोळी घालून त्यावर या घटाची पूजा केली जाते.  या पूजेला ‘घागर भरणे’ असेही म्हटले जाते.  पितरांचे श्राद्ध किंवा तर्पणविधी या दिवशी केला जातो.  घरातल्या उंबरठ्याचे औक्षण करून आपल्या पूर्वजांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाते.  एकेका पूर्वजांची नावे घेऊन त्यांना आमंत्रण दिले जाते व चुलीवर पितरांना घास अर्पण केला जातो.  या दिवशी घरोघरी पुरणपोळी, आमरस, कटाची आमटी,(रश्शी) कुरडया, पापड,  भजी असा साग्रसंगीत नैवेद्य दाखवला जातो.

अक्षय तृतीया— आखाजी हा श्रमण संस्कृती दर्शविणारा  कृषी उत्सव आहे.याच दिवसापासून शेती  कामाला सुरुवात होते.  हलोत्सव, वप्पमंगल अशी वेगवेगळी नावे या सणाला आहेत.

आखाजी म्हणजे माहेराचा  विसाव्याचा आरामाचा सण. सासरी कामाच्या घबाडग्यातून मुक्त होऊन माहेरी लाडकोड, कौतुक करवून घेण्याचा सण.

घरोघरी उंच झाडाला झुले बांधले जातात. खानदेशात सासुरवाशिण लेकीला गौराई म्हणतात आणि जावयाला शंकर.

“ वैशाखाच उन्हं

 खडक तापून लाल झाले वं माय”

 

“झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं

 माय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजो

बंधूंना हातमा दी ठेवजो दी ठेवजो

बन्धु  मना सोन्याना सोन्याना

पलंग पाडू मोत्याना मोत्याना”

 

“ गडगड रथ चाले रामाचा

नि बहुत लावण्याचा

सोला साखल्या रथाला

नि बावन खिडक्या त्याला”..

अशी गोड बोली भाषेतील अहिराणी गाणी सख्या झुल्यावर झुलताना आनंदाने गातात, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने जपलेली ही लोकपरंपरा अतिशय लोभस आहे.

ऋतुचक्र फिरत असते.  एका मागून एक ऋतू बदलतो. वसंत सरतो ग्रीष्म येतो. आपले सारेच भारतीय सण नव्या ऋतुच्या स्वागतासाठी पारंपरिक आणि शास्त्रयुक्त पद्धतीने साजरे केले जातात. त्यातलाच हा अक्षय तृतीयेचा सण.  पाण्याची घागर भरून उन्हाळ्याचे स्वागत करणारा सुंदर सण!!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print