मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – ५ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – ५ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

समृद्ध प्राचीन वारसा – ग्रामीण उद्योग

हेमाडपंती मंदिर पाहिल्यानंतर पिंकी आणि राजेश खुशीत होते. त्यातच खूप दिवसांनी उसाचा रस प्यायल्याने त्यांना आनंद झाला होता. गाडी घनदाट अशा अभयारण्यातून जात असल्याने प्रवासाची मजा काही औरच होती. एका ठिकाणी विश्रांतीसाठी जागा पाहून श्यामरावांनी गाडी थांबवली. ते ठिकाण डोंगरापासून अगदी जवळ होते. झाडांच्या गर्द सावलीत मध्यभागी मोकळी जागा होती. समोरच्या बाजूस असलेल्या भव्य डोंगररांगा लक्ष वेधून घेत होत्या. निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज कानावर पडत होते. मधूनच झाडांवर असलेली माकडे इकडून तिकडे मजेत उड्या मारीत होती. आपल्या छोट्या पिल्लाला छातीशी कवटाळून माकडिणी सुद्धा झाडांवर उड्या घेत होत्या. ते सगळे पाहून पिंकी आणि राजेशला खूपच गंमत वाटली. त्यांनी आपल्याजवळील बिस्किटे, घरून आणलेल्या नारळाच्या वड्या त्यांना खाण्यासाठी दिल्या.

मोकळी हवा, गर्द झाडी, प्रदूषणरहित आणि शांत वातावरण मन प्रसन्न करीत होते. श्यामरावांनी आपल्याजवळील कॅमेऱ्याने भोवतालच्या निसर्गाचे सुरेख चित्रीकरण केले. आता सगळ्यांनी झाडांच्या सावलीत असलेल्या मोकळ्या जागी सतरंजी टाकून जेवणाचा आस्वाद घ्यायचे ठरवले. सगळ्यांनाच भूक लागली होती. श्यामलाताईंनी घरून निघताना जेवणाची सगळीच तयारी करून घेतली होती. तांबड्या भोपळ्याच्या दशम्या, पोळ्या, वांग्याचं भरीत, शेंगदाण्याची चटणी, घरीच लावलेले मस्तपैकी दही, जोडीला नारळाच्या वड्या असा फर्मास बेत होता. रोज डायनिंग टेबलवर जेवण घेऊन कंटाळलेल्या मुलांना हे वनभोजन फारच आवडले.

श्यामराव म्हणाले, ‘ पिंकी आणि राजेश, जरा नीट ऐका मी काय म्हणतो ते ! आपण परत जाताना आलो त्याच रस्त्याने जायचं की जवळच एक छानसं खेडं आहे, त्या बाजूने जायचं ? तिथे माझा सोपान म्हणून एक मित्र राहतो. त्यालाही भेटता येईल. जाताना तुम्हाला रस्त्याने शेतं पण बघायला मिळतील. ‘ 

‘अहो बाबा, विचारताय काय ? आम्हाला तर ते खेडेगाव, शेती बघायला आवडेलच. आपण तिकडूनच जाऊ. ‘ पिंकी म्हणाली. राजेशने तर आज मज्जाच मज्जा म्हणून टाळ्या वाजवल्या. सगळे गाडीत जाऊन बसले. श्यामलाताईंनी आपल्या मोबाईलमध्ये जुनी गाणी लावली होती. त्यांना जुनी मराठी गाणी खूप आवडायची. ‘ ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊ दे…’ या गाण्याचा व्हिडीओ त्या पाहत होत्या. पिंकी आणि राजेश कुतूहलानं आई काय पाहतेय हे बघत होते. त्या गाण्यातील लोहाराचा भाता, ऐरण मुलं कौतुकानं बघत होती. गाणं संपलं. पिंकी म्हणाली, ‘ आई, हे गाणं किती छान आहे नाही. आणि गाण्यातली माणसं किती साधी आहेत ! ‘ आई म्हणाली , ‘ पिंकी, अग हे गाणं ज्या चित्रपटात आहे, त्या चित्रपटाचं नावसुद्धा ‘ साधी माणसं असंच आहे. ‘

‘अरे वा, किती छान ! ‘ पिंकी म्हणाली.

‘आई, हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं आहे ना ? ‘ राजेश म्हणाला.

‘हो, बरोबर आहे राजेश. पण आणखी एक गंमत आहे बरं का ! ‘

‘कोणती गंमत, आई ? सांग ना . ‘ राजेश म्हणाला.

‘अरे या गाण्याचं संगीत ऐकलंस ना ! किती छान आहे. हे संगीत कोणी दिलं माहिती आहे का ?

‘कोणी तरी प्रसिद्ध संगीतकार असतील त्या काळातले, ‘ पिंकी मध्येच म्हणाली.

‘बाळांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या गाण्याच्या संगीतकार लतादीदीच आहेत. त्यांनी ‘आनंदघन ‘ या नावाने काही चित्रपटांना संगीत दिलं होतं ‘ श्यामलाताई म्हणाल्या.

तेवढ्यात गाडीने एक वळण घेतले आणि दूरवर गावाच्या खुणा दिसायला लागल्या. थोडं अंतर गेल्यानंतर एका मोठ्या कमानीतून गाडी आत शिरली. एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली शयमरावांनी गाडी पार्क केली. या गावात श्यामरावांचा बालमित्र सोपान राहत होता. श्यामराव आल्याचं कळताच सोपान मोठ्या आनंदानं त्यांच्या स्वागतासाठी पुढे झाला. दोन्ही मित्रांची खूप दिवसांनी भेट होत होती. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली.

श्यामराव म्हणाले, ‘ अरे सोपान, ही माझी मुलं. त्यांना एखादं खेडेगाव बघावं असं वाटत होतं. म्हणून  तुझ्याकडे हक्काने आणले त्यांना. त्यांना जरा गावातून फिरवून आणू या. ‘

‘अरे हो पण आधी आपण घरी जाऊ. तुम्ही सगळे फ्रेश व्हा. मग जाऊ की मुलांना गाव दाखवायला. ‘ सोपान म्हणाला.

सोपानच घर म्हणजे एक जुना वाडा होता. दगडी बांधकाम आणि लाकडाचं छत. घरात स्वच्छता, उजेड भरपूर होता. बाहेरच्या उन्हाचा अजिबात ताप जाणवत नव्हता. निर्मलावहिनींनी सगळ्यांना घर दाखवलं. निर्मलावहिनी सगळ्यांसाठी गूळ घातलेलं कैरीचं पन्हं घेऊन आल्या. सगळ्यांच्या छानपैकी गप्पा झाल्या. श्यामलाताई मुलांना म्हणाल्या, ‘ बाळांनो, सोपानकाकांचं घर नीट पाहिलंत का ? ‘

‘हो आई,’  पिंकी आणि राजेश म्हणाले.

‘बाळांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का ? सोपानकाकांकडे फ्रिज नाही. ‘ श्यामलाताई म्हणाल्या. ‘ ‘ अग आई, खरंच की. ही गोष्ट लक्षातच आली नाही आमच्या. ‘ पिंकी म्हणाली.

बाळांनो, आता आपण कैरीचं पन्हं घेतलं. किती चवदार होतं ते ! थम्स अप, कोका कोला,पेप्सी यासारखी कृत्रिम शीतपेयं पिण्यापेक्षा घरीच बनवलेलं कैरीचं पन्हं, लिंबाचं सरबत, कोकम सरबत, यासारखी पेयं शतपटीनं आरोग्यदायी असतात. कृत्रिम शीतपेयात मोठ्या प्रमाणावर साखर आणि घातक रसायने असतात. शिवाय फ्रिजपेक्षा माठातील पाणी आरोग्याला अतिशय चांगले असते. ‘

‘व्हय व्हय पोरांनो, तुमची आई सांगते ते बरोबर आहे बरं का. आणि एक सांगतो. आमच्याकडे कोणीच चहा घेत नाही. गोठ्यात गाई आहेत. त्यांचे ताजे दूध असते. घरीच बनवलेलं ताक, दही आम्ही वापरतो. शेतातील ताज्या भाज्या, फळे आम्ही खातो. फ्रिजची गरजच नाही. ‘ श्यामराव हसत हसत म्हणाले, ‘ हे आमच्या सोपानरावांच्या उत्तम तब्येतीचं रहस्य आहे म्हणायचं. ‘

‘व्हय की. श्यामभाऊ आम्ही काही मोठा आजार असला तरच शहरात डॉक्टरकडे जातो. नाहीतर आम्हाला साधी गोळी बी म्हाईत नाय. ‘

मग सोपानकाका म्हणाले, ‘ चला रे मुलांनो. आमचं गाव दावतो तुम्हाला. तुमच्या शहरासारखं मोठं नाही बरं का ! बघा, आवडतं का तुम्हाला. ‘

श्यामराव म्हणाले, ‘ सोपान, अरे आम्ही पण येतो की. आपण सगळेच जाऊ. ‘

श्यामलाताई पण तयारच होत्या. सगळेच निघाले. गावात छोटी छोटी घरं होती. काही मातीची, काही सिमेंटची. काही घरे उंच अशा दगडी ओट्यावर होती. मुलांना मजा वाटत होती. गावाच्या एका कोपऱ्यात रामू लोहार राहत होता. एका उंच दगडी ओट्यावर त्याचे घर होते. मुले तिथे पोहोचली तेव्हा रामू कामच करीत होता. एका हाताने तिथे असलेला भाता खालीवर होत होता. त्याच्या हवेने भट्टीतील निखारे लालभडक फुलले होते. त्या भट्टीत त्याने काहीतरी लोखंडाची वस्तू ठेवली होती. ते सगळं पाहून मुलं काही काळ तिथं थबकली.

सोपानकाका म्हणाले, ‘ हे बघायचं का रे बाळांनो. ‘

पिंकी, राजेश दोघेही एकदम हो म्हणाले. शहरात त्यांना असं काही बघायला मिळत नव्हतं. पिंकीला आईने मघाशी लावलेलं गाणं आठवलं. ती म्हणाली, ‘ आई, आपण त्या गाण्यात पाहिलं, अगदी तसंच आहे ना इथे ! ‘

‘अगदी बरोबर आहे पिंकी. आता तू आणि राजेश बघा ते काका कसं काम करताहेत ते ! ‘ आई म्हणाली.

रामुकाकांनी मग भट्टीतील ती वस्तू बाहेर काढली. ती तापून चांगलीच लाल झाली होती. रामुकाकांनी एका मोठ्या सांडशीत पकडून ती ऐरणीवर ठेवली आणि आपल्याजवळ असलेल्या मोठ्या लोखंडी घणाने ते त्यावर घाव घालू लागले. तसतसा त्या वस्तूला आकार यायला लागला. कोणीतरी आज आपल्याकडे आपलं काम बघायला आलं आहे याचा रामुकाकांना कोण आनंद झाला होता. ‘ पोरांनो, वाईच बसा की. समदं नीट बघा. हेच आमच्या रोजीरोटीच साधन, ‘

‘काका, तुम्ही काय बनवताय ? ‘ राजेशनं विचारलं.

‘पोरा, आता शेतीचा हंगाम सुरु व्हईल. मंग वावरात कामासाठी निंदणीसाठी, कंपनीसाठी विळे, खुरपं लागत्यात. त्येच मी बनवतो आहे आता. शेतीसाठी, बैलगाडीसाठी लागणाऱ्या वस्तू बी बनवतो म्या.बैल, घोडे यांच्या पायामंदी नाल ठोकावी लागते. त्ये बी बनवतो. घरात लागणारी विळी, खलबत्ता, अडकित्ता आणि काय काय समदं बनवतो म्यां. पण आता आमचा धंदा लई कमी झालाय. लोकं मोठ्या गावात जाऊन वस्तू घेत्यात. ‘

मग रामूने आपण बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू मुलांना दाखवल्या. मुलं मोठ्या कौतुकानं ते पाहत होती. कारखान्यात बनणाऱ्या वस्तूपेक्षा एखादा कारागीर जेव्हा हाताने वस्तू तयार करतो, तेव्हा त्याला किती मेहनत घ्यावी लागते याची जाणीव मुलांना ते पाहून झाली. राजेश आणि पिंकीच्या मनात खूप सारे प्रश्न होते. श्यामलाताई म्हणाल्या, ‘ बाळांनो, आता सगळं व्यवस्थित बघून घ्या. मग जाताना मी तुम्हाला आणखी छान छान माहिती देणार ! ‘

आपल्या छोट्याशा बागेत काम करण्यासाठी मग श्यामरावांनी त्याच्याकडून एक कुदळ, एक फावडे आणि एक विळा विकत घेतला. रामूलाही खूप छान वाटले.

‘ मुलांनो, झालं का तुमचं समाधान ? आता आपण दुसरीकडे जाऊ. ‘ सोपानकाका म्हणाले.

मग सगळेच सोपानकाकाबरोबर पुढे निघाले. राजेश आणि पिंकीला आता सोपानकाका आणखी काय दाखवतात याची उत्सुकता होती. 

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फ्रेंडशिप बॅन्ड… ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

डॉ. प्राप्ती गुणे

??

☆ फ्रेंडशिप बॅन्ड… ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

लहान असतो तेव्हा इतकं अप्रूप असतं ना ‘फ्रेंडशिप डे’ चं…

फ्रेंडशिप बँड निवडताना माझी अमुक रंगाची लेस फिक्स म्हणजे फिक्स. सगळ्यांना कळायला हवं आणि लक्षात राहायला हवं की हा फ्रेंडशिप बँड मी बांधलाय. पण माझ्या बेस्ट फ्रेंडला मात्र हा स्पेशल बँड हां ! यात मणी आहेत, ह्यात तिचं नाव ओवून घेतलंय, तिच्यासाठी स्पेशल अंगठी घेतलीये, वगैरे वगैरे.

लहानपणीचे दिवस, नजरेसमोर आता बसलेल्या चिमणीने भुर्रकन उडून जावे, तसे पटकन निघून जातात. मोठे झाल्यावर बालपणीच्या मित्र-मैत्रिणींमध्ये आपण जणू लहानपणीच्या स्वतःलाच शोधत असतो. त्यांच्या डोळ्यात आपल्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांचे प्रतिबिंब आपल्या आठवणींना उजाळा देत राहतं.

शाळेतून कॉलेजात, कॉलेजमधून ऑफिसमध्ये जाताना काही जणांची आपल्या आयुष्यात भर पडते, तर काहीजण नकळत वजा होतात. ही बेरीज वजाबाकी होता होता काही जण मात्र या हिशेबात नेहमी आपल्या सोबत राहतात. ही शिल्लक म्हणजेच आपली खरी मिळकत असते, बरं. हा आपला खजिना म्हणजेच आपले स्पेशल फ्रेंडशिप बँड्स !

… कधी आपण एकाकी बसल्यावर हलकेच पाठीवर हात ठेवणारे…

… आपण इतक्यात रडणारच की तितक्यात पांचट जोक मारून हसवणारे….

… एकाच गोष्टीवरची वारंवार चर्चा, थोडीशी नापसंतीने, पण हजार वेळा मन लावून ऐकणारे….

… टेन्शनमध्ये असलो की ‘ सब ठीक हो जाएगा ‘, ‘ ऑल इज वेल, जस्ट चील ‘, असे टिपिकल डायलॉग मारणारे….

… व्हाट्सअप वरच्या एका रिप्लाय वरून तुमचा मूड ओळखणारे….

… तुमचं दिखाऊ हसू आणि तुमचं खळखळणारं गडगडाटी हास्य तोंडपाठ असलेले….

… असे हे आयुष्यातले स्पेशल फ्रेंडशिप बँड्स !

मोठे झाल्यानंतर मैत्रीची परिभाषा बदलत जाते. कारण वयापरत्वे माणूस अधिक गुंतागुंतीचा होतो

पण जर कोणती गोष्ट तशीच राहत असेल तर ती असते ” भावना “!…

… प्रत्येक संकटात मित्रासोबत खंबीर उभं राहायची भावना….

… मित्राला काहीतरी दुखावत असेल तर त्या गोष्टीपासून मित्राला प्रोटेक्ट करायची भावना….

… मित्राला मनसोक्त व्यक्त होण्यासाठी त्याचा आधार बनायची भावना….

… मित्राचे सुखदुःख ऐकून त्याला ‘ एक्सपर्ट ॲडव्हाइस ‘ द्यायची भावना…

… मित्र जास्त हवेत उडायला लागला तर त्याला जमिनीवर आणायची आणि मित्र अंधारात असेल तर त्याला प्रकाशात खेचून आणायची भावना…..

… आणि ह्या भावनेलाच तर “मैत्री” म्हणतात.

… हा लेख माझ्या सगळ्या ‘ स्पेशल फ्रेंडशिप बँडस ‘ साठी समर्पित…

©  डॉ. प्राप्ती गुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कथा आमच्या मैत्रीची- मैत्रिणीची… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

कथा आमच्या मैत्रीची- मैत्रिणीची… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

जवळपास तीन वर्षे होत आली मीनाला भेटून ! मी आणि अलका तिला भेटून आलो आणि आठ दहा दिवसातच मीना गेल्याचे कळले आम्हाला! तिचे ते टपोरे डोळे डोळ्यासमोरून जाईनात! त्या डोळ्यात तेव्हा ना ओळखण्याची खूण होती, ना आमच्या अस्तित्वाची जाणीव! ना स्पर्शाची! तरीपण ती मनात कुठेतरी हलली असेल, तिला व्यक्त करता आलं नाही तरी!

मीना आमची लहानपणापासूनची जिवलग मैत्रीण! शोभा, अलका, मीना आणि मी! चौघींची खूप गट्टी होती. मीना आणि मी किती वर्ष शाळेत एका बाकावर बसत होतो. हसत – खिदळत होतो, भांडत होतो, आणि पुन्हा गळ्यात गळे घालत होतो. दुर्दैवाने आम्ही नववीत असतानाच तिचे वडील गेले आणि मीना आपल्या आईबरोबर पुण्याला आपल्या मोठ्या भावाकडे शिफ्ट झाली. मॅट्रिक झाल्यानंतर एस्. पी. कॉलेजला शिक्षण घेत असतानाच ती डेक्कन वर एका लायब्ररीत पार्ट टाइम जॉब करत होती. आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचा स्वभाव होता तिचा! त्या काळात ती आणि मी भेटत होतोच. ग्रॅज्युएशन नंतर दोघींचीही लग्न एकदमच ठरली. अगदी रुखवताची तयारी सुद्धा दोघींनी मिळूनच केली!

लग्न झाली आणि आम्ही आपापल्या संसारात गुरफटलो! कधीतरी खुशालीचे पत्र जाई एवढेच! तिला दोन मुलगे, मला एक मुलगा आणि एक मुलगी.. संसार गाडी रुळावरून चालू होती. आणि अचानक एक दिवस मीनाला ब्रेन ट्यूमर निघाल्याचे कळले. तिचे मोठे ऑपरेशन झाले. त्यातून ती सही सलामत बाहेर पडली! पण दुर्दैवाने तिच्या मिस्टरांना हार्ट अटॅक येऊन ते अकस्मात गेले. दोन लहान मुले घेऊन मीना पुण्यात सासरच्या घरी परत आली. हे सगळे कळल्यावर खूप वाईट वाटले. तिला आता स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे होते. म्हणून तिने मूकबधिर शिक्षणाचा कोर्स केला आणि नोकरीला सुरुवात केली. नोकरीचे ठिकाण लांब होते, पण सासू-सासर्‍यांच्या आधाराने तिने आपली नोकरी सुरू केली. यथावकाश मुलांची शिक्षणं झाली. नोकरीतून रिटायरमेंट घेऊन मुलांसह आनंदाने राहायची स्वप्ने मीना बघू लागली. मोठ्या मुलाचे लग्न झाले. त्याने सहकार नगर मध्ये फ्लॅट घेतला. आता सुखाचे दिवस आले होते. मध्यंतरीच्या काळात मी एकदा तिला भेटून आले.

धाकटा मुलगा इंजिनियर होऊन दिल्लीला नोकरीला लागला होता. मीना त्याच्याबरोबर दिल्लीला गेली. पण काय झाले कोण जाणे ?पुन्हा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. ट्रीटमेंट चालू होती, पण आता तिला खूपच त्रास होत होता. म्हणून ती पुण्याला मोठ्या मुलाकडे आली, पण त्यानंतर तिने अंथरूणच धरले. मी आणि अलका तिला भेटायला गेलो. पण ती आता जाणीव नेणीवेच्या पलीकडे होती.

तिच्याकडे बघून खूप काही आठवत होते. ते शाळेचे दिवस, खूप खळखळून हसणे, बडबड करणे, दंगा करणे, हे सगळे आठवले, पण आता त्यातले काहीच नव्हते !ती आम्हाला ओळखत सुद्धा नव्हती. रत्नागिरीचे फाटक हायस्कूल ही आमची शाळा! लहानपणापासून आम्ही एका वर्गात, एका बाकावर! शाळेच्या स्नेहसंमेलनात प्रत्येक गोष्टीत भाग घ्यायचा उत्साह! खेळात, नाचात, नाटकात सगळीकडे भाग घ्यायचा. रत्नागिरी गाव लहान, त्यामुळे सगळेच एकमेकांच्या ओळखीचे !कुणाच्या बहिणीचा, मावशीचा, वहिनीचा कुठलाही कार्यक्रम असू दे आमची तिथे हजेरी असायची! विशेष करून मंगळागौर जागवायला आवडायची. रात्रभर जागायचं, पहाटे घरी यायचं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन रात्री किती मजा केली, याची चर्चा करायची. असे मजेचे दिवस होते ते!

आम्हा सर्व मैत्रिणींचे केस लांब होते. रत्नागिरीत फुले भरपूर !त्यामुळे रोज डोक्यात फुलांचा गजरा किंवा फुले असंतच! परीक्षेच्या दिवसात कैऱ्यांच्या फोडी तिखट मीठ लावून शाळेत आणायच्या आणि सगळ्यांनी त्या आंबट चिंबट गप्पा मारत खायच्या. मधल्या सुट्टीचा डबा तर वर्ग चालू असतानाच संपायचा! उन्हाळ्याच्या सुट्टीत रोज बंदरावर जाऊन भेळ खायची आणि सूर्यास्त झाला की घरी यायचे, असे फुलपाखरी दिवस होते ते!

मीना आमची जिवाभावाची मैत्रीण! रत्नागिरीत असेपर्यंत केलेल्या या गमती जमती ती पुण्याला गेली तरी आम्ही जेव्हा एकत्र भेटत असू तेव्हा चवी चवीने बोलल्या जायच्या! ती वर्षे मागे पडली. सगळ्या जणी बोहल्यावर चढलो आणि वेगवेगळ्या दिशेला, वेगवेगळ्या घरात नांदायला गेलो. मुले बाळे झाली. संसारात रमलो, पण ते लहानपणचे दिवस काही स्मरणातून गेले नव्हते! वेळ मिळेल तेव्हा आम्ही एकत्र येत होतो. तीच मीना आजारी आहे असं कळतात मी आणि अलका तिला भेटायला गेलो. तिच्याशी जरा बोलता येईल असे वाटत होते, पण कसचे काय, तिची अवस्था बघून अक्षरशः भडभडून आले! तिच्या सुनेने तिला आम्ही मैत्रिणी आलोय हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या डोळ्यात आम्हाला ती ओळख पटण्याची खूण दिसेना. खूप वाईट वाटले. तिला भेटून आल्यानंतर काही दिवसातच ती गेल्याचे कळले, पण डोळ्यासमोरून तिचे ते टपोरे डोळे जाईनात !आता तीन वर्षे होतील पण आज मीनाच्या आठवणीने मन भरून आले. नकळत डोळे पाणावले. “मैत्री” म्हणजे काय ते जाणवते आता! इतके वय झाले तरी हा रेशीम बंध तुटत नाही… हीच खरी मैत्री !

(वरील लेख लिहून काही वर्षे झाली, पण अजूनही “मैत्री” म्हंटले की ही माझी जिवाभावाची मैत्रीण आठवते. लहानपणीची ती मैत्री काळजातील असते हेच खरे)

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न केलेल्या पापाचे धनी? – भाग-1 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

न केलेल्या पापाचे धनी? – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

माझे मित्र अजित जाधव यांची राज्यातल्या एका जिल्ह्यातील जेलमध्ये मोठे अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. ते नागपूर, मुंबई, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी असताना मला त्यांना भेटता आले नाही. म्हटले आता ते आपल्या जवळच आहेत तर भेटून घ्यावे. मी त्यांच्याशी संपर्क केला. माझा फोन आल्याने तेही आनंदीत झाले. ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो. मला भेटताच क्षणी त्यांनी कडाडून मिठी मारली.

त्या जेलमध्ये त्यांनी जे जे काम सुरू केले ते ते मला सांगितले. जेलमधला चांगुलपणा, चालणारे काम, नक्कीच वेगळे, चांगले होते. चित्रपटात जेलला घेऊन काहीही दाखवतात, असा माझा मनातल्या मनात विचार सुरू होता. बराच वेळ आमचे बोलणे झाल्यावर मी जाधव यांना म्हणालो, ‘‘भाई, मला जेलमध्ये काही कैद्यांशी बोलण्यासाठी जाता येईल का?’’ 

जाधव बराच वेळ काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने ते म्हणाले, ‘‘बघू, काय करता येते ते, थांबा. ’’ ते आतमध्ये गेले.

थोड्या वेळाने जेलमध्ये असणारे पोलिस माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला जाधव साहेबांनी आतमध्ये बोलावले आहे. ’’ मी आतमध्ये निघालो.

मी जेलचे सारे वातावरण अगदी डोळ्यात आणि मनात साठवून घेत होतो. जेलमध्ये असणारे जेव्हा बाहेर होते, तेव्हा त्यांना बाहेरच्या जगाविषयी फार कुतुहल वाटायचं नाही, पण आता ते सगळेजण आतमध्ये आहेत, तर त्यांना बाहेर काय चाललेय याचे फार कुतूहल वाटते. वर्तमानपत्रात असलेला शब्द न शब्द ते वाचून काढतात. मोठ-मोठी पुस्तके वाचून संपवतात. चांगले तेव्हढेच बोलायचे. मला हे सारे काही दिसत होते.

 जाधव यांनी काही कैद्यांशी माझी ओळख करून दिली. जाधव मला म्हणाले, ‘‘तुम्ही यांच्याशी बोला, मी जरा फेरफटका मारून येतो. ’’ 

एक एक करून मी अनेकांशी बोलत होतो. माझ्याशी फार कोणी बोलण्यासाठी उत्साह दाखवत नव्हते. काहींना शिक्षा झाली होती. काहींना शिक्षा होणे बाकी होते. काहींची सुटका झाली होती, पण अजूनही कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे ते तिथेच होते. काहींचे शासकीय रक्कम भरण्यावरून अडलेय, तर काहींना वकील लावायला कोणी पुढाकार घेत नाही. असे अनेक जण होते जे केव्हाच या जेलच्या चार भिंतींतून बाहेर पडले पाहिजे होते.

तिथे असणाऱ्या प्रत्येकाची कहाणी वेगळी होती. जसे आपण पिक्चरमध्ये पाहतो अगदी त्याहूनही भयंकर. बोलताना कैद्यांच्या डोळ्यात दिसत होते, तो गुन्हेगार नाही, त्यांच्या हावभावावरून ते लक्षात येत होते, हा चांगल्या घरचा आहे. पण अहंकार आणि रागामुळे त्याच्या हातून जे घडायला नाही पाहिजे होते ते घडून गेले.

जेलमध्ये कोण गरीब आणि कोण श्रीमंत, सगळे बिचारे सारखे. प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये एकच आग बघायला मिळत होती, ती म्हणजे ‘मला सोडवण्यासाठी कोणीतरी बाहेरून येईल आणि मला इथून घेऊन जाईल. ‘

अनेक निरक्षर असणाऱ्या कैद्यांना सतत कोर्टात जाऊन-येऊन कायदे एकदम पाठ होते. वकील चुकले कसे इथपासून ते पोलिसांच्या कागदपत्रांमुळे कसा गोंधळ झाला, इथपर्यंत ही सगळी गणिते, अनुमान या कैद्यांना माहिती होते. हे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते.

जाधव यांनी माझ्यासोबत दोन पोलिस दिले होते. ते दोघेही म्हणाले, ‘‘आम्ही पेपरमध्ये, पुस्तकातून तुम्हाला नेहमी वाचतो. ’’ जसेही ते दोन पोलिस मला बोलायला लागले, तसे माझ्यासमोर असलेल्या अनेक कैद्यांची माझ्यासोबत बोलण्याची भाषाच बदलली.

मी अनेक कैद्यांशी बोललो, बऱ्याच जणांनी बोलण्याचा समारोप अश्रूंनी केला होता. कुणी फसले, कुणाला फसवले गेले. अनेकांचा दोष नसताना ते तिथे होते. त्यांनी कधीही न केलेल्या पापाची शिक्षा ते भोगत होते, असे मला वाटत होते.

जेलमधली सगळी माणसे तशीच होती. ‘मला आयते खायला मिळते. मी इथे आरामात आयुष्यभर राहतो’ असे तिथे कुणालाही वाटत नव्हते. मी अनेकांशी बोलत होतो.

लक्ष्मण तुरेराव नगरचे. शेतीच्या वादामध्ये भावाचा खून त्यांच्या हातून झाला. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही जन्मठेपेची शिक्षा भोगतात. लक्ष्मण म्हणाले, ‘‘आमचा मोठा परिवार. चार भाऊ, आई, वडील, आम्ही सगळेजण एकत्रित राहायचो. सर्वात लहान भावाच्या बायकोला वेगळे व्हायचे होते. तिथूनच आमच्या घराचे वासे फिरले. हळूहळू आमच्या घरात फूट पडत गेली. सगळे भाऊ वेगवेगळे झाले. एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणारे भाऊ छोट्या-छोट्या वादावरून एकमेकांचा जीव घ्यायला लागले. शेतीच्या वाटणीवरून वाद झाले.

मधल्या भावांनी माझ्या जमिनीवर नांगर फिरवला. त्यावरून भांडण इतक्या टोकाला गेले की, भांडणामध्ये त्याच मधल्या भावाचा जीव गेला. रागात सगळे काही घडून गेले. शेतीचे सोडा, कोणाला तोंड दाखवायला आता जागा राहिली नाही.

तो माझ्यापेक्षा लहान होता. तो चुकला असला तरी त्याला समजून सांगायचे. नाही तर त्यांना जे पाहिजे ते देऊन टाकायचे ही भूमिका मी मोठा असल्यामुळे घ्यायला पाहिजे होती, पण तशी भूमिका घेतली गेली नाही. आई, वडील, बहीण या सगळ्यांना मी मुकलो होतो. आता असे वाटते, ही शिक्षा संपूच नाही. आपण इथेच संपून जावे. एवढे सारे कमावले होते, ते एका क्षणात संपवले.’’ 

– क्रमशः भाग पहिला

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सगळ्यांना कशाला मिळायला हवा आहे शून्य? – ॲड. ऋचा मायी ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

सगळ्यांना कशाला मिळायला हवा आहे शून्य?ॲड. ऋचा मायी ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

‘मुलांना एका विशिष्ट उंचीवरून सुरूवात करता आली तर आकाशाला हात लावणं सोपं होईल का? आपण दिलेल्या सोयींचा, वस्तूंचा देतानाच जर महत्त्व समजावून दिले तर मुलं त्याचा गैरवापर करत नाहीत असं माझं मत. नक्की सांगा तुमचे अनुभव, तुमची मतं.

प्रत्येकानेच शून्यापासून सुरूवात केली तरच ते यशस्वी होतात हे पटतं का तुम्हाला? की मुलांनाही पालकांच्या कष्टाची जाणीव असते ?

नक्की सांगा काय वाटतं?’ 

 – ॲड. ऋचा मायी

सगळ्यांना कशाला मिळायला हवा आहे शून्य?

“बाबा मला बाईक हवी आहे. आजूबाजूला जायला बरी पडते, ऑटोमधे उगाच सारखे पैसे फार लागतात. ” कार्तिक बाबांना म्हणाला.

“अरे मग चाल की जरा, जवळपास जायला बाईक कशाला हवी? तुझे आजोबा दहा दहा मैल चालायचे रोज आणि तुझ्या बाबाला पण आम्ही बाईक दिली नव्हती, बसने जायचं किंवा सरळ चालत.

हे आजकाल नुसती चावी फिरवायची की निघायचं, ह्यामुळेच आजार वाढत चालले आहेत. तुम्ही आजकालची पिढी म्हणजे कठीण आहे. कॉलेजात पाय ठेवत नाही तर मागण्या सुरू. ” जुन्या काळात काटकसरीने, निगुतीने संसार केलेली आजी नातवाची कानउघाडणी करत होती.

“अगं आजी माझं कॉलेज बघ किती मोठं आहे! नुसतं हॉस्टेलपासून क्लासमधे जायचं तर भरपूर चाललं जातं. परत सुट्टीच्या दिवशी कुठे जायचं ठरतं मित्रांचं, मग सगळ्यांकडे वाहन असतं, फक्त माझ्याकडे नाही. मग ह्याला गळ घाल, त्याला गळ घाल करावं लागतं उगाच. बाबाला घेणं शक्य आहे म्हणूनच मागितली बाईक. ”

कार्तिक जरा वैतागला होता पण आजीशी आवाज वाढवून बोलायचा रिवाज नव्हता देशपांडेंकडे, थोडं ठसक्यात तो आपला मुद्दा सोडत नव्हता इतकंच.

“तुम्ही ते हायफाय कॉलेज निवडलं ना तेव्हाच खरं तर मला पटलं नव्हतं, मी बोलले पण होते बाबाला. आता सगळे चोचले पुरवावे लागतील देखादेखीमधे. आज बाईक, उद्या ब्रँडेड कपडे, परवा अजून काही, अभ्यास करायला गेला आहात एवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं. ” 

आजीच्या बोलण्यात नातवाबद्दल धाकधूक दिसत होती. आपण खर्चाला मोकळीक दिली म्हणजे मुलं बिघडतात, हा एक साधा हिशोब पिढ्यानुपिढ्या ऐकत आली होती ती.

नातवावर प्रचंड जीव होता, त्यामुळेच त्याचं पाऊल कुठेच घसरता कामा नये ह्यासाठी तिला काहीही विचारलेलं नसताना तिचे सल्ले सुरूच होते.

“मुलांना जितकं आपण तावून सुलाखून वाढवतो तितके ते तयार होतात, जितके जास्त त्यांचे नखरे पुरवाल तितके अंगाशी येईल महेश, अनुभवाचे बोल आहेत हे. नका त्यांच्या सवयी बिघडवू.

आजोबा जर करू शकतात मेहनत, बाप जर करू शकतो तर मुलगाही करूच शकतो ना?”

आजी जरा आता ताणते आहे हे दिसल्यावर कार्तिक ने तिथून मी क्रिकेट खेळायला जात आहे सांगून पळ काढला.

“आई, अगं हे सगळं त्याच्यासमोर बोलायची काय आवश्यकता होती? मी काही लगेच बाईक देणार नव्हतोच पण जरा त्याच्या कलाने घेऊन समजावलं असतं ना. सगळ्या मित्रांकडे आहे तर वाटतं मुलांना. ” बाबांनी कार्तिकची बाजू घेत म्हणलं.

“पालकांना आपलं मूल बरोबर माहित असतं, कार्तिक अत्यंत विचारी मुलगा आहे आणि त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीच, सुखसोयींचं तो सोनंच करेल ह्या आजोबाचे पण अनुभवाचे बोल आहेत.

हजारो मुलं गेली आहेत डोळ्याखालून इतके वर्षाच्या शिक्षकी पेशात नजर तयार आहे माझी. वाहीयात मुलं एका नजरेत ओळखू येतात. “

“आजोबा थॅन्क यू” म्हणत क्रिकेट खेळून घरात शिरणाऱ्या कार्तिकने पळत येऊन आजोबांना मिठी मारली.

आजोबांनी दाखवलेल्या विश्वासामुळे बळ तर मिळालं होतं पण एक जबाबदारी पडली होती खांद्यावर, मेहनत करून शून्यापासून पन्नास पर्यंत पोहोचलेली देशपांड्यांची गादी लवकरात लवकर शंभरी पार न्यायची.

लाखाचे बारा हजार करणारी आमची पिढी नाही हे आता सिद्ध करायचं ठरवलं होतं त्याने.

बाबा म्हणाले, ”आई ऑफिसहून आली की जाऊ बाईक बघायला, मग पुण्याला पोहोचलास की तिथेच डिलीवरी मागवू. ”

आजीने बटव्यातून पैसे काढून नातवाच्या हातात ठेवत म्हणलं, ”बाईकच्या आधी हेलमेट घ्यायचं कार्तिक, त्याच्याशिवाय चालवली ना तर आजीशी गाठ आहे. ”

कार्तिकला आजीचा विरोध मावळलेला बघून मनापासून आनंद झाला होता. आता एक डगर आई आल्यावर लढावी लागणार होतीच. कारण बाईक म्हणलं की आईचा विरोध असणार होता. लाड म्हणून नसला तरी सुरक्षिततेसाठी नक्कीच असणार होता. पण आई घरी यायच्या आधी आजी तयार झाली असल्याने आईला मनवणे सोपे जाणार होतं आणि नाहीतर आजोबा होतेच, हुकमी एक्का!

लेखिका – सुश्री ऋचा मायी

दिल्ली

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? क्षण सृजनाचे ?

☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

माझे वडील संस्कृत चे माध्यमिक शिक्षक व गाढे अभ्यासक होते. जुन्या अकरावीचे संस्कृत व पी.टी. घेत. करवीर पीठात त्यांनी उत्तम अध्ययन केले. त्यांना पीठाचे शंकराचार्य पद स्वीकारा म्हणत होते पण घरच्या जबाबदाऱ्या मुळे त्यांनी ते स्वीकारले नाही. वृद्धत्वात ते थोडे विकलांग झाले नि ते पाहून मला ही कविता स्फुरली‌.

 – दीप्ती कुलकर्णी

☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती

माझे,माझे म्हणती सारे

फोलता हि नच ,कुणा ही ठावे

क्षणभंगुरता कळेल का परी

उरते अंती मृत्तिका जरी

यात्रिक सारे सममार्गावरी

नियतीचीही मिरासदारी

नियतीचीही सर्व खेळणी

कुणा छत्र,कुणी अनवाणी

श्वासासंगे श्वास येई रे

दुजा न कोणी सांगाती

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती ||

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – ४ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – ४ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

समृद्ध प्राचीन वारसा 

श्यामराव, श्यामलाताई , पिंकी आणि राजेश यांची जंगल सफारी मजेत सुरु होती. पिंकी आणि राजेश तर अतिशय खुश होते. बऱ्याच दिवसांनी आई बाबांबरोबर गाडीतून ते सहलीसाठी जात होते. तेथून जवळच एक प्राचीन हेमाडपंती शिवमंदिर होते. ते मुलांना दाखवावे म्हणून श्यामराव त्यांना तिथे घेऊन जात होते. सगळ्यांची वटवृक्षाखाली खाणं आणि थोडी विश्रांती झाली होती. त्यामुळे सगळ्यांचा मूड फ्रेश होता. गाडीत बाबांनी ‘ जय जय शिव शंकर ‘ गाणं लावलं होतं आणि त्या तालावर त्यांचं डोलणं आणि गुणगुणणं सुरु होतं. रस्त्यावर एके ठिकाणी प्राचीन शिवमंदिराकडे असा बोर्ड त्यांना लावलेला आढळला. मुख्य रस्त्याला सोडून गाडी आतमधील छोट्या कच्च्या रस्त्याकडे वळली. थोडेसे अंतर गेल्यानंतर लगेच शिवमंदिर होते. श्यामरावांनी एका लिंबाच्या झाडाच्या दाट सावलीत गाडी पार्क केली. सगळे खाली उतरले.

तिथे एका बाजूला काही माणसे फुले, हार, बेलपत्रे आदी विक्रीसाठी घेऊन बसली होती. शामलाताईंनी एका बाईजवळून बिल्वपत्रे विकत घेतली. दुरूनच शिवमंदिराची दगडी हेमाडपंती बांधणी लक्ष वेधून घेत होती. राजेशच्या मनात नेहमीप्रमाणेच काही प्रश्नांनी गर्दी केली होती. पण बाबा म्हणाले, ‘ बेटा, आपण आधी भोलेनाथांचं दर्शन घेऊ. मंदिरात दर्शन  घेताना काही बोलू नये. मग निवांतपणे तू काहीही विचार. ‘ राजेश म्हणाला, ‘ हो, बाबा.

‘गाभाऱ्याच्या बाहेर एक सुंदर दगडी नंदी होता. सगळ्यांनी आधी त्याला नमस्कार केला. मंदिरात गेल्यानंतर श्यामलाताईंनी आपल्याजवळील बेल काहीतरी मंत्र म्हणत भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केला. श्यामराव, राजेश, पिंकी यांनीही काही बेलाची पाने पिंडीवर वाहिली.

बाहेरचा दगडी सभामंडप खूपच छान होता. तेथील खांबांवर आणि बाजूच्या कमानीवर छानपैकी नक्षी, पौराणिक चित्रे आणि आकृत्या कोरलेल्या होत्या. आजूबाजूला असलेला उन्हाचा ताप तिथे जाणवत नव्हता. काही क्षण तिथे बसल्यानंतर सगळे बाहेर पडले. आता मंदिराच्या भोवतालचा परिसर ते न्याहाळत होते. राजेश म्हणाला, ‘ बाबा, तुम्ही मघापासून हे मंदिर हेमाडपंथी आहे असं म्हणत होता. हेमाडपंथी म्हणजे काय ? ‘

बाबा म्हणाले, ‘ अरे बाबा, हेमाडपंथी नाही, हेमाडपंती. बरेच लोक हेमाडपंथी असा चुकीचा उच्चार करतात. पण ही मंदिर बांधण्याची पद्धत किंवा शैली हेमाडपंत याने सुरु केली म्हणून हेमाडपंती मंदिर असे म्हटले जाते. अरे तेराव्या शतकात देवगिरीत यादव राजांचे राज्य होते. हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत हा यादवांचा प्रधान होता. तो फार बुद्धिमान होता. त्याने मंदिर बांधण्याची एक नवीन पद्धत विकसित केली. ‘ पिंकी, राजेश, या मंदिराची बांधणी तुम्ही पाहिली का ? ‘ पिंकी म्हणाली, ‘ हो बाबा, नुसते दगडावर दगड ठेवलेले दिसतात. ‘

बाबा म्हणाले अगदी बरोबर, ‘ त्यालाच हेमाडपंती शैली म्हणतात.आजकाल बांधकामासाठी आपण जसा सिमेंटचा वापर करतॊ, तसाच पूर्वी चुन्याचा वापर केला जायचा. पण या अशा मंदिरांमध्ये हेमाडपंत याने असा कोणत्याच पदार्थाचा वापर केला नाही. चौकोनी, त्रिकोणी, पंचकोनी या आकारात दगडी चिरे कापून त्यांच्या खाचा किंवा खुंट्या एकमेकात घट्ट बसतील अशा आकारात कापून या मंदिरांची उभारणी केली आहे. ती इतकी मजबूत झाली आहे की अनेक शतके झाली तरी ही मंदिरे आजही टिकून आहेत. त्याशिवाय कित्येक टन वजन असलेल्या शिळा पंचवीस फुटांपेक्षाही अधिक उंचीवर नेऊन हे बांधकाम करण्यात आले आहे. केवढे विकसित तंत्रज्ञान असेल त्या मंडळींजवळ ! ‘ 

‘कमालच आहे ना बाबा, सिमेंट, चुना न वापरता अशा प्रकारचे बांधकाम करणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ‘ राजेश म्हणाला.

‘हो, राजेश, आणि अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत बरं का ! वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, औंढा नागनाथ येथील मंदिरे अशीच आहेत. चाळीसगावाजवळील पाटणादेवी येथे असेच शंकराचे हेमाडपंती मंदिर आहे. ‘

पिंकी म्हणाली, ‘ बाबा, किती छान माहिती मिळाली या मंदिराबद्दल ! शाळेत ही माहिती सांगून मी बाईंची शाबासकी मिळवणार. ‘

‘शाब्बास पिंकी. आणि तुम्ही काय करणार राजे ? ‘ बाबा राजेशकडे पाहत म्हणाले.

‘बाबा, आपण या मंदिराचा फोटो घेतला आहे ना ! मी या मंदिराचे चित्र काढून आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांना दाखवेन. माझे मित्र सुद्धा ते पाहून खुश होतील. ‘ दॅट्स ग्रेट! ‘बाबा म्हणाले.

‘आई, मला तुला काही विचारायचे आहे. मघाशी आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलाची पाने वाहिली. ती का वाहायची आणि तू काहीतरी मंत्र पुटपुटत होतीस तो पण सांग ना, ‘ राजेश म्हणाला.

‘राजेश, पिंकी, अरे बेलपत्र किंवा बेलाची पाने भोलेनाथांना अतिशय प्रिय बरं का ! श्रावणात तर दर सोमवारी भगवान शंकरांना बिल्वपत्रे अर्पण करतात. तुम्ही देव दानवांनी केलेल्या समुद्र मंथनाबद्दल ऐकले असेलच. त्यावेळी समुद्र मंथनातून निघालेले हलाहल शंकरांनी प्राशन करून आपल्या कंठात धारण केले. त्यांच्या सर्वांगाचा भयंकर दाह म्हणजे आग व्हायला लागली. तेव्हा त्यांच्या मस्तकावर बेलाचे पान ठेवण्यात आले. तेव्हापासून शंकराला बेलपत्र वाहण्याची प्रथा आहे. बेलाची तीन पाने सुद्धा अतिशय महत्वाची आहेत बाळांनो. तीन पाने म्हणजे भगवान शंकरांचे त्रिनेत्र, तशीच ही पाने म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच महादेव या तिन्ही देवांचे प्रतिनिधित्व करतात.’ 

‘अरे बापरे ! केवढे महत्व आहे बिल्वपत्राचे ! ‘ पिंकी म्हणाली. ‘ आई, तू कोणता मंत्र म्हणत होतीस बेल अर्पण करताना  ? ‘

‘सांगते, ‘ आई म्हणाली. भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना, ‘त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रं च त्रिधायुतम | त्रीजन्मपापसंहारम बिल्वपत्रं शिवार्पणम ‘ या पौराणिक मंत्राचा जप करतात बरं का पिंकी.  या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण, तीन डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव, तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान आम्ही अर्पण करतो. बेलाच्या पानांमध्ये विषनाशक गुणधर्म असतो. शिवाला बेल वाहताना आपल्या हातावरील विषाणू तर नष्ट होतातच पण त्या पानांचा एक प्रकारचा सुगंधही आपल्या हाताला येतो. ‘

‘आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला. भगवान शंकरांना हे बेलपत्र इतके प्रिय आहे की आपल्याजवळ दुसरे काही नसेल आणि आपण भक्तिभावाने एखादे बिल्वपत्र जरी त्यांना अर्पण केले, तरी ते संतुष्ट होतात. म्हणूनच त्यांना ‘ आशुतोष ‘ म्हणतात. आशुतोष म्हणजे सहज संतुष्ट होणारा. भगवान शंकर आपल्याला जणू सांगतात की तुम्ही सुद्धा माझ्यासारखे सहज संतुष्ट, समाधानी असणारे व्हा. ‘

‘आई, आशुतोष या नावाचा किती सुंदर अर्थ सांगितलास. माझ्या वर्गात शेखरकाकांचा मुलगा आशुतोष आहे ना. तो माझा चांगला मित्र आहे. पण आता मला या नावाचा अर्थ कळला. ‘ राजेश आनंदाने म्हणाला.

 खरंच आई, आपल्या देवांची नावं, हे बिल्वपत्राचं महत्व, आपल्या वनस्पती आणि एकूणच  सगळ्या गोष्टी, परंपरा किती अर्थपूर्ण आहेत ! पण कोणी अशा त्या समजावून सांगत नाही. ‘

श्यामराव म्हणाले, ‘ अरे, पण बेलाच्या झाडाची माहिती तर तुम्हाला आईने सांगितलीच नाही. तुम्हाला ऐकायची आहे का ? ‘

‘हो बाबा, सांगा. मी आता एका वहीत आपल्या सगळ्या वृक्षांची माहिती लिहून काढणार आणि तिथे त्यांची चित्रे चिकटवून एक छान हस्तलिखित तयार करणार. ‘ राजेश म्हणाला.

‘शाब्बास बेटा ,’ बाबा म्हणाले, ‘ बेल हा एक देशी वृक्ष आहे. बेलाची झाडे आपल्या आशिया खंडात सर्वत्र आढळतात. त्याची पाने, फुले, फळे, खोड असे सगळेच भाग औषधी आहेत. अनेक आयुर्वेदिक औषधात बेलाचा वापर केला जातो. अगदी पोटदुखीपासून ते मधुमेहाच्या आजारापर्यंत या पानांचा उपयोग होतो. बेलाच्या झाडापासून मुरंबा, जॅम, सरबत आदी गोष्टी बनवल्या जातात. बेलाच्या झाडावर पक्षी आपली घरटी बांधतात. कीटक त्याच्या आश्रयाने राहतात. त्याच्या फुलांवर बसलेल्या मधमाशा, फुलपाखरांमुळे परागीभवन होते. बेलाचे लाकूड टणक आणि टिकाऊ असल्याने त्याचा वापर फर्निचरसाठी सुद्धा केला जातो. शेतकरी शेतीची अनेक औजारे तयार करतात. मी तुम्हाला मागच्या वेळी जी वड, पिंपळ यासारख्या वृक्षांची माहिती सांगितली, त्याबरोबरच हे झाडही महत्वाचे आहे बरं, त्याचीही लागवड आपण केली पाहिजे. केवळ धार्मिकच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा अशी झाडे खूप महत्वाची असतात. ‘

पिंकी म्हणाली, ‘ बाबा, तुम्ही आणि आईने आज खूप वेगवेगळ्या विषयांची नवीन माहिती दिली आम्हाला. आम्ही आता आमच्या वहीत ही सगळी माहिती लिहून काढू. ‘

समोरच एका ठिकाणी उसाच्या रसाची गाडी होती. सगळेच आता तहानलेले होते. राजेश म्हणाला, ‘ बाबा, उसाचा रस घेऊ या ना. ‘

‘चला, आपण सगळेच रस घेऊ या, ‘ सगळ्यांनी मस्त थंडगार आले, लिंबू घातलेल्या उसाच्या आस्वाद घेतला आणि गाडी मग पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. 

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कृष्ण चिंतन…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “कृष्ण चिंतन…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म. हा कुणा व्यक्तीचा जन्म नाही. किंबहुना व्यक्तीच्या निमित्ताने नवाच एक विचार पुढे आला आहे.  व्यक्ती काल्पनिकही  असू शकेल. पण व्यक्तीपेक्षा तो विचार खरा आणि महत्त्वाचा आहे. त्याचे तत्वज्ञान आणि त्याचे चरित्र यातून हा विचार आपल्यापुढे मांडता येतो असे मी मानतो. 

लहानपणी श्रीकृष्णाने इंद्राच्या पूजेला विरोध करून गोवर्धनाची पूजा, गाई वासरांची पूजा करण्याचा विचार मांडला.  म्हणजेच परंपरा कितीही जुनी असली तरी जे जुने आहे ते पवित्रच आहे असे न समजता, कालमानपरत्वे जुन्या परंपरांचा विचार टाकून दिला पाहिजे. कालमानानुसार जे नवे विचार आहेत त्यांचा अंगीकार केला पाहिजे. ( वाचा ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ — लेखक वि. दा. सावरकर) श्रीकृष्णाने गीता सांगितली, परंतु गीतेच्याद्वारे त्याने तत्वज्ञान सांगितले ते महत्त्वाचे.

‘मी सर्वकाही आहे, मी असे करतो, मी जगाचा आदि आहे, अंत ही आहे.’  असे तत्वज्ञान त्याने मांडले आहे असे वरकरणी वाटते.  परंतु हे तत्त्वज्ञान म्हणजे ‘ मी-पणा ‘ नसून, ‘ मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार ‘ या प्रकारचे तत्त्वज्ञान मी मानतो. मी जो उपदेश करतो ते तत्वज्ञान मी स्वतः अंगिकारतो असे त्याचे म्हणणे आहे.  मी म्हणजे कुणीही व्यक्ती. माझ्या दृष्टीने त्याचा अर्थ इतकाच की जेव्हा माझा जन्म झाला तेव्हाच या विश्वाची निर्मिती झाली. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या दृष्टीने या विश्वाचा अंत होणार आहे.   

श्रीकृष्ण मानला जर विश्वाचा शासक, तर त्याचे असे म्हणणे की जो सर्वोच्च पदावर आहे तो तुम्हाला तुमच्या लढाईमध्ये कोणतीही सक्रिय मदत करणार नाही. तो फक्त तुम्हाला तत्वज्ञान सांगेल.  कृष्ण म्हणतो ‘ न धरी शस्त्र करी मी, सांगेन युक्तीच्या गोष्टी चार ‘ म्हणजेच सर्वोच्च शासक हा तुम्हाला काही युक्तीच्या गोष्टी सांगेल परंतु तो स्वतः तुमच्या जीवनाच्या युद्धात तुमच्या बरोबर सामील होणार नाही. सक्रीय मदत करणार नाही.  उलट त्याचे सैन्य हे तुमच्या विरोधात लढणार आहे.  त्याच्या सैन्याला तुमच्या भल्याचं काहीही घेणं देणं नाही.  हीच परिस्थिती आज आणि पूर्वीही दिसते आहे नाही का?  शासन कोणतेही असो  तुमच्या बाजूने लढणारे फक्त  तुमचे चार पाच जण असतात जे खरे मनापासूनचे हितचिंतक आणि मित्र असतात.  तेच फक्त तुम्हाला मदत करतील. पण लढणारे फक्त तुम्ही आहात.  त्यामुळे सर्वोच्च शासकाने कोणत्याही प्रकारे सामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार केला असला तरी  प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतःच लढायची आहे. ती लढाई लढण्यासाठी अंधश्रद्धांची झापडे आणि परंपरांच्या कुबड्या उपयोगाच्या नाहीत.  

सकारात्मक विचार, जपलेली नाती आणि आयुष्यासाठी लढण्याची जिद्द हीच फक्त उपयोगाची आहे. मला वाटते हेच जीवनाचे तत्त्वज्ञान आपण अनुभवत आहोत.  म्हणून हा आजच्या काळातील जगण्याचा महत्त्वाचा विचार आहे असे मला वाटते. 

… राम-कृष्ण चरित्रातून अजूनही बरेच विचार आपल्याला जगण्यामध्ये समजून घ्यावे लागतील. 

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रुक जाना नही… ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ रुक जाना नही… ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(लेखक भावे भाटिया यांच्या पुस्तकावरून)

“आई, मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. सगळेजण मला ‘आंधळा, आंधळा’ असं चिडवतात”.

आईने कुशीत घेऊन भावेशला समजाविले की,’तू जग पाहू शकतोस की नाही याने काहीही फरक पडत नाही. मात्र तू असे काम करून दाखव की सारे जग तुझ्याकडे पाहू लागेल’

आईचा उपदेश हृदयावर कोरून छोट्याशा भावेशने जीवनात निश्चयपूर्वक वाटचाल चालू केली.

भावेश भाटिया यांना’रेटिना मस्क्युलर डिजनरेशन’या आजारामुळे  बालपणीच दृष्टी गमवावी लागली.  जिद्द, निश्चय व मेहनतीच्या बळावर त्यांनी स्वतः बनविलेल्या विविध आकाराच्या, आकर्षक, सुगंधी, रंगीत मेणबत्यांची विक्री महाबळेश्वर इथे एका हातगाडीवर सुरू केली . आज त्यांची ‘सनराइज कॅन्डल्स’ही कंपनी देश-विदेशात कोट्यावधी रुपयांची उलाढाल करीत आहे.

सुरवातीला भावेश यांचे वडील गोंदिया इथल्या सिमेंट वर्क्समध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होते.  गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलमध्ये भावेश यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. आई वडिलांनी त्यांना सर्वसामान्य मुलाप्रमाणे वागविले. शाळेत फळ्यावरील काही दिसत नसल्याने आई त्यांना सर्व अभ्यास तसेच त्यांची आवडती कॉमिक्सची पुस्तके वाचून दाखवीत असे. कपडे धुणे, भांडी घासणे, स्वयंपाक करणे अशी दैनंदिन कामे शिकवून  आईने त्यांना स्वयंपूर्ण केले. वडील त्यांना सिनेमाला नेत. सायकलवरून सर्व ठिकाणी फिरवून तिथली माहिती सांगत. वडिलांना शास्त्रीय संगीताची व गझल ऐकण्याची आवड होती.  गझलमधील अनेक शब्द त्यांच्या विशेष भावार्थासह ते भावेशला समजावून सांगत. तीच आवड भावेश यांच्यामध्येही उतरली.  भावेश यांनी घरातच त्यांनी जमविलेल्या कॉमिक्सची लायब्ररी सुरू केली. त्यामुळे अनेक मुलांबरोबर त्यांची छान मैत्री झाली. सिमेंट फॅक्टरीमधल्या वाळूमध्ये खेळणे, ओल्या वाळूतून वेगवेगळे प्राणी बनविणे,  लाकडाच्या वखारीतून बांबू आणून ते तासून त्याच्या वस्तू बनविणे , झाडांवर चढणे ,शेतात भटकणे, निरनिराळ्या पक्ष्यांची किलबिल ऐकणे यात त्यांचं बालपण गेलं. फॅक्टरीमध्ये सिमेंटचे पाईप बनविताना त्याचे डाय  कसे वापरले जातात हेही त्यांनी समजावून घेतलं.

भावेश यांचे मोठे भाऊ जतीन यांना कुत्रा चावल्यामुळे मृत्यू आला. त्यामुळे खचलेल्या आईला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी नातेवाईकांनी  शिवणक्लासमध्ये घातलं. भावेश आईबरोबर तिथे जात. तिथे कला कौशल्याच्या वस्तूही बनवायला शिकवत. छोट्या भावेशने स्पर्शाच्या सहाय्याने अनेक आकार शिकून घेतले व कापडाची खूप खेळणी बनविली.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी दोन मित्रांबरोबर सायकलवरून गोंदिया ते काठमांडू असा दोन हजार किलोमीटर्सचा   प्रवास केला. त्यावेळी त्यांना आलेले अनुभव , मनुष्य स्वभावाचे अनेक नमुने, वाटेतील अडचणी या साऱ्यांना तोंड देऊन त्यांनी धाडसाने  तो प्रवास कसा पूर्ण केला हे सर्व मुळातून वाचण्यासारखे आहे.

काही काळाने वडील  महाबळेश्वरला कच्छी समाजाच्या आरोग्य भवन इथे  व्यवस्थापक म्हणून काम करू लागले. तिथल्या आवारात त्यांना एक लहानशी खोली राहायला मिळाली.

आईच्या कॅन्सरच्या आजारात भावेश यांनी शर्थीने पैशांची जमवाजमव  करून मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये अनेक खेपा घातल्या. आईच्या मृत्यूनंतर त्यांना खऱ्या अर्थाने दृष्टिहीन झाल्यासारखे वाटले.

मुंबईला वरळी येथील नॅब(National association for blind) इथे त्यांना ब्रेल लिपी आणि इतर जीवनावश्यक गोष्टींचे शिक्षण मिळाले. तिथेच त्यांनी मेणबत्ती बनवण्याचे शिक्षणही घेतले.

अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी महाबळेश्वर येथे भाड्याने हातगाडी घेऊन सुंदर, सुगंधी, विविध आकारातील मेणबत्यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला त्यावेळी भावेश अर्थशास्त्र घेऊन एम. ए. झाले होते.

सुट्टीसाठी म्हणून महाबळेश्वरला आलेल्या नीता, उत्स्फूर्तपणे भावेश यांना त्यांच्या मेणबत्ती विक्रीच्या कामात मदत करू लागल्या. मदतीचा हात देताना त्या , रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या भावेश यांच्या प्रेमात पडल्या.  सुशिक्षित, धनाढ्य कुटुंबातील एकुलती एक मुलगी असलेल्या, बी.कॉम झालेल्या नीताच्या या ‘आंधळ्या प्रेमाला’ सहाजिकच घरच्यांचा विरोध होता. जेव्हा नीता यांनी भावेश यांच्यापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ते अंतर्बाह्य थरारून गेले. पण भावेश यांना फक्त सहानुभूती नको होती . नीता तिच्या या विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयावर  ठाम होती.   घरच्यांचा विरोध असूनही फक्त आईच्या पाठिंब्यावर अगदी साधेपणाने हे लग्न झाले.  भावेश यांची एकच अट होती की, नीताने माहेरचा एकही पैसा त्यांच्या घरात आणायचा नाही. 

नीता यांनी भावेशना सर्वार्थाने डोळस साथ दिली. खरं म्हणजे नीताच्या रत्नपारखी नजरेने भावेश यांच्यामध्ये लपलेला लखलखणारा हिरा पाहिला आणि त्याला पैलू पाडून जगासमोर आणला.  उत्तम पद्धतीने संसाराची घडी बसवली. अनेक मानसन्मानासहित नीताने स्वतःसह भावेश यांना खूप उंचीवर नेऊन ठेवले. ‘अंध व्यक्तीशी लग्न करण्याचा वेडेपणा करून तू आत्महत्या करीत आहेस’ या माहेरच्या मताला नीताने स्वकर्तृत्वाने  उत्तर दिले. लग्नानंतर दोन वर्षांनी कुणाल या त्यांच्या अव्यंग, सुदृढ अपत्याच्या जन्म झाला .सासर माहेर एक झाले.

महाभारत काळात  गांधारी आयुष्यभर डोळ्यांवर पट्टी  बांधून वावरली हा फार मोठा त्याग समजला जातो. भावेश यांच्या मताप्रमाणे गांधारीने डोळ्यांवर पट्टी न बांधता, महाराज धृतराष्ट्रांचे डोळे बनून राहणं अधिक आवश्यक होतं. गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली नसती तर कदाचित महाभारताचे युद्धही झाले नसते. नीताने गांधारीपेक्षाही अनेक पटीने त्याग केला आहे. ती केवळ भावेश यांचे डोळे झाली नाही तर तिच्या तेजस्वी  डोळ्यांनी तिने भावेश यांना सुंदर जगाचा परिचय करून दिला. उभयतांनी अनेक प्रदर्शनांमध्ये भाग घेऊन भावेश यांची कला जगासमोर आणली.

भावेश आणि नीता यांचा उद्देश केवळ स्वतःची प्रगती साधण्याचा नव्हता.  इतर दृष्टिबाधित मित्रांना रोजगार मिळून ते स्वयंपूर्ण व्हावेत यासाठी दोघांनीही अथक प्रयत्न केले. महाबळेश्वर येथे राहत्या घराजवळ एक छोटी जागा भाड्याने घेऊन त्यात अंध मुला-मुलींच्या राहण्याची  सोय केली. त्यांना मेणबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आणि स्वतःच्या पायावर उभे केले. मेणबत्ती व्यवसाय शिकण्यासाठी वाढत्या संख्येने येणाऱ्या  दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महाबळेश्वर- सातारा रोडवर मोळेश्वर येथे एक जागा विकत घेतली आणि दीडशे मुला- मुलींचे वसतीगृह उभारले. जागा मिळविणे आणि वसतीगृह बांधणे यासाठी अनंत अडचणी उभ्या राहिल्या. त्यावेळी अनेक सुहृदांनी  अनंत हस्ते  त्यांच्या या सत्कार्याला मदत केली. प्रतीथयश व्यक्तींचे पूर्णाकृती पुतळे बनवून त्यांनी एक वॅक्स म्युझियमही उभारले आहे.  अनेक लोक त्याला आवर्जून भेट देतात.

कॉम्प्युटर इंजिनियर झालेला कुणाल याचे या कामात खूप मोठे योगदान आहे. भारतातील अनेक प्रांतातील  दृष्टिहीन मुला-मुलींना त्यांच्या घरीच मेणबत्त्या बनविणे, कागदी पिशव्या बनविणे व इतर  उद्योग शिकण्यासाठी कुणालने अनेक ॲप्स विकसित केली आहेत. त्याचा भारतभरच्या अंध विद्यार्थ्यांना फायदा होतो. तसेच कुणाल परदेशी निर्यातीचे सर्व काम सांभाळतो.

भावेश यांनी त्यांची मैदानी खेळाची आवड जपली आणि नीताच्या सक्रिय सहाय्यामुळे वाढविली. गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, पॉवर लिफ्टिंग, फुटबॉल, कबड्डी, अशा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पॅरालिंपिक व इंडियन ब्लाइंड स्पोर्ट्स असोसिएशनची एकूण ११४ पदके त्यांनी जिंकली आहेत. त्यामध्ये ४० सुवर्ण पदके आहेत. ते अनेक वेळा प्रतापगड, सिंहगड चढून गेले आहेत. इतकेच नाही तर कळसुबाई शिखरावरही तीन वेळा गेले आहेत. डॉक्टर भावेश यांचे असे म्हणणे आहे की, खिलाडू  वृत्ती आपल्याला परिपूर्ण बनवते, अंतर्बाह्य माणूस बनविते.  शरीर सुदृढ असेल तर मेंदू आणि मन हे सुद्धा सुदृढ राहतात. यशस्वी उद्योजक आणि दृष्टिहीनांसाठी कार्यरत असलेल्या भावेश यांना तीन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने चन्नमा विद्यापीठातर्फे भावेश यांना डॉक्टरेट ही पदवी दिली.

गुजराती समाजाच्या रक्तातच उद्योगधंद्याचं बाळकडू असतं. व्यापारासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची त्यांची तयारी असते. नीता यांचे बालपण पूर्व आफ्रिकेतील सोमालिया इथे गेले कारण वडील व्यापारासाठी तिथे गेले होते.

भावेश यांचे   पहिले मेणबत्ती प्रदर्शन टिळक स्मारक मंदिर पुणे इथे यशस्वीपणे पार पडले . त्यासाठी महाबळेश्वर येथील ‘आनंदवन’ या सुप्रसिद्ध हॉटेलचे मालक वैद्य कुटुंबीय यांनी खूप मदत केली ,मेहनत घेतली. अनेक गुजराती व्यवसायिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि त्यानंतर या धडपडणाऱ्या व्यवसाय बंधूला गुजराती समाजातून फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. त्यांच्या उद्योगधंद्याची भरभराट होण्यासाठी, दृष्टिहीनांसाठी वसतीगृह उभारण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यात आली .’एकमेका सहाय्य करू’ हा गुजराती लोकांचा  विशेष गुण अनुकरणीय  आहे.

आज डॉ .भावेश यांना त्यांचे अनुभव आणि विचार ऐकविण्यासाठी सन्मानाने झारखंड येथील ‘टाटा स्टील’ पासून इतर सर्व मोठ्या उद्योगधंद्यामध्ये आवर्जून बोलावलं जातं. हा सर्व प्रवास महाबळेश्वरपासून ते एकट्याने करतात. त्यांचे अनुभव सांगताना भावेश सांगतात की अंध, अपंग व्यक्तींबद्दल नुसती सहानुभूती,दया दाखवून त्यांना मदत करू नका.  त्याऐवजी अंध अपंगांना सक्षम करण्यासाठी स्वतःच्या पायावर ते उभे राहतील अशा उद्योग धंद्यात मदत केलेली जास्त चांगली. अंध व्यक्तींची इतर  ज्ञानेन्द्रिये अधिक प्रगल्भ असतात. अशा व्यक्ती अधिक संवेदनशील असतात. या त्यांच्या गुणांचा फायदा घेऊन त्यांचा आत्मविश्वास जागृत करावा व योग्य ती मदत जरूर करावी. ‘सर्व शिक्षा अभियानां’तर्गत आता पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणे अंधांनाही सहज शक्य आहे. ते स्वानुभावावरून सांगतात की अंध, अपंग विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या शाळा नकोत तर त्यांना इतर  सर्वसामान्य मुलांबरोबर नेहमीच्या शाळेत शिक्षण मिळाले पाहिजे .

एखाद्या वाढदिवसानिमित्त किंवा काही कारणासाठी आपण अशा अंध, अपंग संस्थांमध्ये भोजन देणे, भेटवस्तू देणे असे करतो. भावेश यांना ते अजिबात पसंत नाही. कारण त्यामुळे या अंध, अपंगांना तुम्ही दुबळे करता, त्यांना घेण्याची सवय लावता असं ते अनुभवाने सांगतात.त्यांचं स्पष्ट मत असं आहे की अंध अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थांपैकी फारच थोड्या संस्था तळमळीने काम करतात. इतर अनेक संस्थांमधील परिस्थिती भीषण असते. अंधांकडून काम करून घेतले जाते पण त्यांना पुरेसा आहार, पैसे दिले जात नाहीत. उलट संस्थाचालकंच ‘मोठे’ होत जातात. अंध निधीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा निधी गोळा केला जातो. प्रत्यक्षात त्यातील फार थोडा पैसा अंधांसाठी खर्च होतो. समाजाने जागृत होऊन योग्य ठिकाणी मदत केली पाहिजे. दृष्टीहीनांनी अभ्यासाबरोबर कौशल्य विकासाकडे लक्ष दिले पाहिजे असे ते सांगतात.

डॉक्टर भावेश यांच्या संस्थेतर्फे दृष्टीहीनांवर आधुनिक उपचार करून थोडे यश मिळत असेल तर तसा प्रयत्न केला जातो. लहान मोठी ऑपरेशन करण्यासाठी मदत केली जाते. समाजाने  नेत्रदान चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला  तर त्याचा अनेक दृष्टीहीनांना लाभ होईल असं डॉक्टर भावेश यांना वाटतं.

नीता या स्वतः दुर्गम भागात जाऊन दृष्टीबाधित भगिनींना भेटतात. घरातील सदस्यांना विश्वासात घेऊन, नीता त्या अंध भगिनींना प्लास्टिक हार, तोरणे, कागदी पिशव्या, डिटर्जंट बनविणे  अशी अनेक कामे शिकवतात.

डॉक्टर भावेशजींसारखं व्यक्तिमत्व ज्यांचं संपूर्ण आयुष्य ऊर्जा व सकारात्मकतेने परिपूर्ण आहे ते आणि आपण इतर डोळस यांच्यात खऱ्या अर्थाने दृष्टिबाधित कोण आहे असा प्रश्न  हे पुस्तक वाचताना नक्की पडतो .

डॉक्टर भावेश यांचे आयुष्य घडविणाऱ्या महत्त्वाच्या  दोन व्यक्तींमधील एक अर्थातच त्यांची आई! आईने त्यांच्या मनातील न्यूनगंड काढून टाकून त्यांना आत्मविश्वासाने उभे केले आणि दुसरी व्यक्ती म्हणजे पत्नी नीता! नीता यांच्या ‘डोळस प्रेमाची’ एक छोटी गोष्ट सांगून थांबते.

एका आंतरराष्ट्रीय शर्यतीत भाग घेण्यासाठी भावेश यांना दररोज पंधरा-सोळा किलोमीटर धावण्याची प्रॅक्टिस करणे जरुरी होते. नीता यांनी काय करावे? आपल्या चार चाकी गाडीला कॅरियर बसून घेतले. त्याला पंधरा फुटांची एक लांब दोरी घट्ट बांधली. दोरीचे दुसरे टोक भावेश यांच्या हातात दिले आणि दररोज त्यांना पोलो ग्राउंडवर नेऊन धावण्याची प्रॅक्टिस करता येईल अशा पद्धतीने गाडी चालवून त्यांचा सराव करून घेतला. महाबळेश्वरला आलेले पर्यटक आणि पोलो ग्राउंडवर आलेले खेळाडू यांनी हे दृश्य डोळे भरून पाहिले.

 गृहिणी सचिव सखी प्रिया… असलेल्या नीता यांना आदराने नमस्कार

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जीवन… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ जीवन… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं. 

मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, ” काही त्रास नाही ना झाला ?”

सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा यत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं. 

… काही क्षण असेच गेले…

… आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, ” झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ? “

म्लान पाकळ्यांवर मंद स्मित झळकलं. 

… फुल म्हणालं, ” निमिषार्धासाठी वाईट वाटलं.. कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं….  

… पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा…. कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं. 

… पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो, त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो… “

” तू आता स्वतंत्र झालास खरा. पण आता तू क्षणाक्षणाला कोमेजत चाललायस …. आता काय करणार ?” – मातीचा प्रश्न.

दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, ” आता हवा जिकडे नेईल तिकडे मी जाईन… वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असेतोवर जमेल तितके जग पाहून घेईन….. मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन…. पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन. त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईन. त्या बीजातून अंकुरलेल्या झाडावर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल, माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेनच !”

फुलाचं उत्तर ऐकून सदगदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेतले. 

काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली… 

आपलं आयुष्यही असंच आहे.

… संसार, कुटुंब, आप्तेष्ट, मित्र, ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं… 

… मग सुरु होते एका जीवाची एकाकी सफर, जी आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देते. 

… आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, कारण इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं.

… नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्पगुच्छात पुन्हा अवतीर्ण होतो ! 

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares