मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ One liner Geeta ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

One liner Geeta ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

One liner Geeta.

हिंदू धर्मात मुलांना लहानपणापासून आपला धर्मग्रंथ गीता शिकवला जात नाही हे सत्य आहे.

त्यावर एका काकांनी लिहिले आहे. पण नुसतीच टीका न करता त्यांनी एक सोल्युशनही देण्याचा प्रयत्न केला आहे.

फक्त हे सोल्युशनच पुरेसे नाही हे मला मान्य आहे. पण आताच्या इंग्रजी मिडीयमच्या मुलांना गीतेत नक्की आहे तरी काय हे प्रत्येक चॅप्टरचे सार इंग्रजीत एका वाक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. गीता तत्वज्ञानाची तोंडओळख म्हणा ना.

☆ ☆ ☆ ☆ 

मला सांगा, दूरदर्शन मालिका सर्वसामान्य कुटुंबाकडून बघितल्या जातात. त्या मालिकेत गीतेचे नाव सुद्धा नसते . शाळेत गीता शिकवली जात नाही . कॉलेजात अर्थ समजावला जात नाही. खाजगी क्लासेस मध्ये गीतेचा अंतर्भाव नाही. 

तरुणपणी संसाराची सुरुवात करण्यापूर्वी गीता अभ्यासणार नाही . वयाच्या ४०/५० व्या वर्षी भविष्याच्या तरतुदीमध्ये व्यस्त .

संपूर्ण आयुष्य असेच निघून जाते . 

वाचकहो, मी तुम्हाला कसे समजावून सांगू ? गीतेशिवाय पर्याय नाही. आपणच आपल्या पायावर दगड मारून घेत आहे .

आजच्या ४०  वय असलेल्या मुलाला/ मुलीला विचारा , त्याला गीतेतील एका तरी श्लोकाचा अर्थ माहित आहे का ?

मी तुम्हाला  १८ अध्यायांचे सार सांगणारी १८ वाक्ये देतो  – इंग्रजी मध्ये देतो – One liner Geeta. 

करताय त्याचा प्रसार ?

प्रत्येकानी ४  दिवसात त्याला

किमान १०० फॉरवर्ड करा .

सगळ्या महाराष्ट्रात काय पण सर्व भारतभर पसरवा.

☆ One liner Geeta.

Chapter 1 – Wrong thinking is the only problem in life .

(चुकीचा विचार ही जीवनातील एकमात्र समस्या आहे)

Chapter 2 – Right knowledge is the ultimate solution to all our problems .

(सार्थ आणि पूर्ण ज्ञान हा सर्व समस्ये वरील अंतिम उपाय आहे)

Chapter 3 – Selflessness is the only way to progress and prosperity .

(निस्वार्थ हा प्रगती आणि उन्नतीचा उत्तम मार्ग आहे)

Chapter 4 – Every act can be an act of prayer .

(प्रत्येक कर्म ही एक प्रार्थना समजून करा)

Chapter 5 – Renounce the ego of individuality and rejoice the bliss of infinity .

(आत्मगौरवामधील अहम् चा त्याग करून अनंतातील अमर्याद आनंदात सहभागी व्हा)

Chapter 6 – Connect to the higher consciousness daily.

(नेहमी उच्च चेतनेशी एकरूप रहा)

Chapter 7 – Live what you learn .

(जे शिकाल त्याचे तसेच आचरण करा)

Chapter 8 – Never give up on yourself .

( स्वतः माघार घेऊन हार मानू नका)

Chapter 9 – Value your blessings .

(तुम्हाला लाभलेल्या आशिर्वादाची कदर करा)

Chapter 10 – See divinity all around .

(तुमच्या सभोवतालच्या देवत्वाची प्रचिती घ्या)

Chapter 11 – Have enough surrender to see the truth as it is.

(सत्याच्या प्रचितीसाठी स्वतःला समर्पित करा)

Chapter 12 – Absorb your mind in the higher.

(उच्च विचारसरणीत अंतर्भूत रहा)

Chapter 13 – Detach from Maya and attach to divine .

(मायावी जालापासून दूर रहा आणि देवत्वाशी जवळीक साधा)

Chapter 14 – Live a life- style that matches your vision.

(तुमच्या विचारांशी जुळेल अशीच जीवनशैली आचरणात आणा)

Chapter 15 – Give priority to Divinity .

(देवत्वाला अग्रक्रम द्या)

Chapter 16 – Being good is a reward in itself .

(सृजनशीलता हे एक वरदान आहे)

Chapter 17 – Choosing the right over the pleasant is a sign of power .

(आनंदाचा हक्क हे एकप्रकारे शक्तीचे दर्शक आहे)

Chapter 18 – Let go, let us move to union with God .

(ईश्वराशी तद्रुप होण्यासाठी पुढाकार घ्या)

(Introspect on each one of this principle)

(वरील सर्व विचारांचा परिचय करून घ्या)

|| ॐ तत् सत् ||0

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पाऊस – ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पाऊस – ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

गोव्याचा पाऊस गोव्याच्या दारू सारखा आहे. 

जशी गोव्याची दारू भरपूर पितात पण चढतच नाही. 

तसा पाऊस भरपूर पडतो पण  दिसतच नाही 

🤪😃

 

कोल्हापूरचा पाऊस…..घरजावयासारखा..

घुसला की…मुक्कामच..

रहा म्हणायची पंचायत…आणि 

जा म्हणायची पण पंचायत…

😃😃

 

अन मुंबईचा पाऊस 

प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..

कधी येऊन टपकेल 

धो धो आपल्याला धुउन 🤛🏻🤛🏻 निघून जाईल सांगता येत नाही 

🤣😂😅

 

पुण्याचा पाऊस बायकांसारखा. 

त्या चिडल्या की धड स्पष्ट बोलत नाहीत. 

नुसती दिवसभर पिरपिर चालू . 

पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालू असते. नुसता वैताग !

😂 ☔

 

कोकणचा पाऊस ……..

लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा 

एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो …

☔ 💦

 

नी

  खान्देशातील पाऊस म्हणजे लफडं…! 

जमलं तर जमलं नाहीतर सारंच  हुकलं …!!      

☔ 💦

 

बेळगावचा पाऊस सात जन्म मिळालेल्या अनुभविक बायकोसारखा…!

प्रेमाची रिमझिम,आपुलकीच्या धारा 💦

व वरून वर्षाव करत असतात मायेच्या गारा..

️️️

पावसाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

तुम्हाला अजून कुठला कुठला पाऊस आठवत असेल तर सांगा.

 

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! नळ आणि बादली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 नळ आणि बादली ! 😅  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“अगं ऐकलंस का, जरा घोटभर आल्याचा चहा देतेस का ? घसा अगदी सुखून गेलाय !”

“पाणी नाहीये !”

“म्हणजे ? आज पाणी आलंच नाही नळाला ?”

“मी असं कुठे म्हटलं ?”

“अगं पण तू आत्ताच म्हणालीस ना की पाणी नाहीये म्हणून !”

“हजारदा सांगितलं कान तपासून घ्या, कान तपासून घ्या, पण माझं मेलीच कोण ऐकतोय ?”

“आता यात माझे कान तपासायच काय मधेच ? मला नीट ऐकू येतंय आणि तूच म्हणालीस की पाणी नाहीये म्हणून, हॊ की नाही ?”

“हॊ मी म्हणाले तसं, पण नळाला पाणी नाहीये असं कुठं म्हणाले ?”

“बरं बाई, चुकलं माझं !”

“नेहमीप्रमाणे !”

“कबूल ! नेहमीप्रमाणे चुकलं ! तू नुसतंच पाणी नाहीये असं म्हणालीस ! पण चहा पुरतं तरी पाणी असेल ना घरात ?”

“अहो यंदा पावसाने सगळ्यांच्या तोंडच पाणी पळवलंय आणि तुम्हांला आल्याचा चहा प्यायची हौस आल्ये ?”

“अगं येईल तो त्याच्या कला कलाने, त्यात काय एवढं ? आता तरी मला जरा घोटभर चहा देशील का ?”

“अजिबात नाही, आधी मला पाच हजार द्या, नवीन साडी घ्यायला मग करते तुमच्यासाठी आल्याचा चहा !”

“आता हे काय मधेच साडीच काढलयस तू ? अजून कपाटातल्या 10-12 साडया एकदा तरी तुझ्या अंगाला लागल्येत का सांग बरं मला ? आणि त्यात ही आणखी एक नवीन साडी घेणार आहेस आणि ती सुद्धा पाच हजाराची ?”

“अहो कालच आमच्या ‘ढालगज महिला मंडळाने’ एक ठराव पास केलाय आणि त्या नुसारच आम्ही सगळयांजणी ही विशिष्ट डिझाईनची नवीन साडी घालून लग्नाला जाणार आहोत !”

“सध्या तरी लग्नाचा कुठलाच मुहूर्त नाही, मग ही पाच हजाराची विशिष्ट डिझाईनची साडी नेसून तुमचं महिला मंडळ कुणाच लग्न अटेंड करणार आहे, हे कळेल का मला ?”

“अहो मी मगाशी म्हटलं नाही का ? या मेल्या पावसाने गडप होऊन सगळ्यांच्या तोंडच पाणी पळवलं आहे म्हणून ?”

“हॊ, पण त्या मेल्या पावसाचा आणि तुम्ही जाणार असलेल्या लग्नाचा काय संबंध ?”

“सांगते नां, तुम्हांला माहितच आहे आपल्याकडे गावा गावातून, जर पाऊस पडला नाही तर तो पडावा म्हणून, भावला भावलीच किंवा बेडूक बेडकीच लग्न लावतात !”

“हॊ, वाचलंय खरं तसं मी पेपरात, पण अशी अनोखी लग्न लावून खरंच पाऊस पडतो यावर माझा अजिबात विश्वास नाही हं !”

“पण आमच्या महिला मंडळाचा आहे नां !”

“म्हणजे आता तुम्ही पाऊस पडावा म्हणून तुमच्या मंडळात असं बेडका बेडकीच किंवा भावला भावलीच लग्न लावणार की काय ? आणि त्या साठी पाच हजाराची नवीन साडी ?”

“अहो आपल्या मुंबईत कुठे मिळणार बेडूक आणि बेडकी लग्न लावायला ?”

“का नाही मिळणार ? अगं तुम्ही क्रॉफर्ड मार्केटला गेलात तर बेडूक आणि बेडकीच काय, मगर किंवा सुसरीची जिवंत जोडी सुद्धा मिळेल त्यांच लग्न लावायला !”

“मिळेल हॊ पण काही प्राणी प्रेमी बायकांचा त्याला विरोध आहे म्हणून….”

“मग भावला भावलीच लग्न लावा की ?”

“अहो आता आम्ही सगळ्याजणी दिसत नसलो, तरी आज्या झालोय म्हटलं ! मग आम्ही भावला भावलीच लग्न लावलं तर लोकं हसतील नाही का आम्हांला !”

“आता भावला भावली नाही, बेडूक बेडकी नाही म्हणतेस, मग तुमच्या लग्नात नवरा नवरी कोण असणार आहेत ते तरी सांग मला ?”

“नळ आणि बादली !”

“का ssss य ssss ?”

“अहो केवढ्यानं ओरडताय ?”

“नळाच आणि बादलीच लग्न लावणार आहे तुमचं ढालगज महिला मंडळ ?”

“मग, त्याला काय झालं ? आपण शहरात राहातो आणि या दोन गोष्टींचा पाण्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे हे विसरू नका तुम्ही ! आणि पाऊस जर चांगला झाला तरच आपल्या घरात नळाला पाणी येतं हे पण तितकंच खरं आहे नां ?”

“हॊ खरं आहे तू म्हणतेस ते !”

“नेहमीप्रमाणे !”

“हॊ नेहमीप्रमाणे, पण म्हणून या लग्नाला पाच हजाराची साडी ?”

“अहो मी सुरवातीलाच म्हटलं नाही का, आम्ही सगळ्याजणी या लग्नात विशिष्ट डिझाईन केलेली साडी नेसणार आहोत म्हणून !”

“हॊ, पण म्हणून या अशा लग्नाला पाच हजारची साडी घ्यायची म्हणजे….. !”

“अहो आमची प्रत्येक साडी, प्रोफेशनल साडी डिझाईनर कडून स्पेशली बनवून घेतल्यामुळे त्याची किंमत तेवढी असणारच ना आता ?”

“एवढं कसलं डिझाईन असणार आहे त्या साड्यांवर ?”

“अहो मी आत्ताच म्हटलं नां तुम्हांला, की पाऊस पडावा म्हणून आम्ही आमच्या मंडळात नळाच आणि बादलीच लग्न लावणार आहोत म्हणून ?”

“हॊ ! “

“अहो म्हणूनच आमच्या प्रत्येकीच्या साडीचा रंग जरी वेगळा असला, तरी या लग्नाचा पावसावर इम्पॅक्ट पडण्यासाठी आमच्या सगळ्या साड्यांवर वेगवेगळ्या साईझचे व डिझाईनचे नळ असणार आहेत आणि त्याच्या जोडीला वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या बादल्या पण असणार आहेत !”

“धन्य आहे तुमच्या मंडळाच्या ढालगजपणाची !”

© प्रमोद वामन वर्तक

१९-०६-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सखी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ सखी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘पुन्हा कधी भेटशील गं? नक्की ये, खूप कंटाळा येतोय गं हॉस्पिटलमध्ये !’ हेच तिचं माझ्याशी शेवटचं बोलणं ठरलं! माझी जिवाभावाची मैत्रीण, कॉलेजमध्ये एकत्र एका डिपार्टमेंटला शिकलो. अतिशय हळुवार, कवी मनाची होती ती!

माझं एम ए पूर्ण झाल्यावर  लगेचच माझे लग्न झाले आणि मी संसारात गुरफटले ! एम ए पूर्ण करून ती तिच्या गावी एका कॉलेजला प्राध्यापिका म्हणून नोकरीला लागली . ती कॉलेजमध्ये आणि मी माझ्या संसारात रमून गेले. दिवस पळत होते. प्रत्येक जण आपापल्या विश्वात बिझी होतो. प्रथम काही काळ पत्रव्यवहार होई. हळूहळू त्याचाही वेग मंदावला.तेव्हा फोन फारसे कुठे नव्हते आणि मोबाईल तर नव्हताच! तिचे लेख, कविता वाचायला मिळतं. त्यातून तिचे निराश, दु:खी मन प्रकट होई. तिच्या मनात काहीतरी खोलवर दुःख होतं ते जाणवत राही! पण त्यावर फारसे कधी बोलणे झालेच नाही !

अशीच वर्षे जात होती. अधून मधून भेटी होत असत. ती साहित्य संमेलनं, वाड्मय चर्चा मंडळ, कॉलेजचे इतर कार्यक्रम यात गुंतलेली होती, तर मी संसारात मिस्टरांच्या बदली निमित्ताने वेगवेगळ्या गावी फिरत होते. परत पाच सहा वर्षानंतर आम्ही आमच्या मूळ गावी परत आलो. यांची नोकरीही तिथेच स्थिरावली. घर बांधलं. मुलगी मोठी झाली आणि अचानकपणे मुलीच्या गायन स्पर्धा निमित्ताने सखीच्या गावी जाणे झाले.  त्यादिवशी गायन स्पर्धेपेक्षा मला जिची ओढ होती ती सखी नेमकी परगावी गेली होती.

त्यानंतरच्या बातम्या ज्या कळल्या त्या फारशा चांगल्या नव्हत्या. तिला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आणि एका ब्रेस्टचे ऑपरेशनही झाले. या सगळ्यावर मात करून तिचे आयुष्य पुढे चालले होते. युनिव्हर्सिटीतील  प्रोफेसर वर्गाशी तिचा चांगला संपर्क होता. लेखनामुळे चांगली प्रसिद्धी मिळाली होती. अशाच एका कार्यक्रमासाठी ती आमच्या गावात आली असता माझी तिची भेट झाली. तिलाही खूप आनंद झाला. मी तिला घरी बोलावले, त्याप्रमाणे ती घरी आली. खूप आनंद झाला मला ! ‘काय देऊ भेट तुला मी?’ प्रथमच भेटतेस इतक्या वर्षांनी ! डोळ्यात टचकन पाणी आले तिच्या ! ‘ माझं काय गं, किती आयुष्य आहे देव जाणे! आपण भेटलो हीच मोठी भेट !’असं म्हणून रडली.  तेव्हा मी तिला ड्रेसवर घालायचे जॅकीट दिले. ती खुश झाली.

एक दिवस अचानक तिचा कोणाबरोबर तरी दिलेला निरोप मला मिळाला. निरोप होता की, ‘ मी  हॉस्पिटल मध्ये आहे, मला भेटून जा.’ मी तेव्हा मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होते, तरीपण एक दिवस दुपारच्या वेळात आम्ही दवाखान्यात गेलो. आजारपणामुळे ती खूप थकली होती. कॅन्सरने पुन्हा आपले अस्तित्व दाखवले होते. अगदी बघवत नव्हते  तिच्याकडे! त्यातूनही हसून तिने मला जवळ बोलावले. तिच्या कवितांचे पुस्तक माझ्यासाठी तिने आणून ठेवले होते. त्या हळव्या कविता वाचून मन आणखीच दुःखी झालं ! तिथून पाय निघत नव्हता. ‘ पुन्हा वेळ काढून नक्की 

येते ‘ असं तिला म्हंटलं खरं, पण मला पुन्हा लग्नाच्या गडबडीत जायला झाले नाही. साधारण महिन्याभरातच ती गेल्याचे कळले. खूप खूप हळहळ वाटली. आपण तिला परत नाही भेटू शकलो, ही रुखरुख कायम मनाशी राहिली. तेव्हापासून मनाशी ठरवलं की, अशा भेटी पुढे ढकलायच्या नाहीत. त्या आवर्जून वेळेत करायच्या ! तिच्या ‘सारंगा तेरी याद में….’ गाण्याचे स्वर ते गाणं लागलं की अजूनही कानात घुमत राहतात !  सखीची बाॅबकट केलेली, काळीसावळी, हसतमुख मूर्ती डोळ्यासमोर येते. काळाने हे सुकुमार पुष्प आपल्यातून फार लवकर खुडून नेले, नाहीतर तिच्याकडून आणखी खूप काही चांगले लेखन आपल्याला मिळाले असते. तिच्या दु:खासह ती अकाली गेली. पण अजूनही जून महिन्याच्या दरम्यान ती गेली ही आठवण मनात रहाते .वीस वर्ष झाली. आठवणींच्या माळेतील हा सुंदर मणी आज गुंफला गेला !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “तिनं काय करायचं?” ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ “तिनं काय करायचं?” ☆ सौ. अमृता देशपांडे 

तिचा स्वभाव मुळातच थोडा अस्थिर. बहिणी ,भाऊ आणि  आई यांच्या नजरेत आणि प्रेमात मोठं झालं हे शेवटचं अपत्य.

लग्न करुन दिलेला परिवार ही  मोठाच. कोल्हापूर जवळचं खेडेगाव. ही घरची सर्वात मोठी सून. मिस्टरांचे नोकरी निमित्ताने मुंबईत वास्तव्य. त्यांचा स्वभाव ” संत माणूस “. आपलं काम, अणि योगी, ऋषी,  संत, अध्यात्म यात सदैव मग्न.

लग्नानंतर ती पण मुंबईत गेली. आर्थिक परिस्थिती त्यावेळी 40 -43 वर्षापूर्वी सर्वांचीच जेमतेम. तिने मशीन वर शिलाई करुन, साड्या फॉल पिको करुन आर्थिक बाजू आपल्या परीने उचलून धरली. मुंबई सारख्या

मायापूरीत छोटेसे घर घेणे शक्य करुन दाखवले.पुढे तर एकावर एक 1 +2 इमले उभे केले.दोन मुले मोठी झाली.उच्च शिक्षित झाली.यथावकाश लग्ने झाली. दोघानाही 2-2 मुले झाली. तिचे मिस्टर 60 व्या वर्षी निवृत्त झाले. मुले, सुना, नोकरी करणा-या . नातवंडे आज्जीजवळ. आज्जी निगुतिनं सगळं करत होती. दोन्ही मुलांनी आपले संसार थाटले. हिचं स्वयंपाकघर मोठ्या सुनेनं ताब्यात घेतलं. धाकट्यानं  जवळच घर घेतलं. आज्जिची विभागणी झाली. तिनं ही साठी ओलांडलीच की. शरीर आणि मन यांची सांगड घालताना तिची

घालमेल होऊ लागली आणि इथेच तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं. आता तिचा कामा पुरताच उपयोग राहिला. काम होत नाही तर सहवास ही नकोसा झाला होता.

त्यातच गावाकडे तिचे सासरे निवर्तले. खेडेगाव च्या पद्धतीप्रमाणे सासुबाईचे लेणे काढण्यात आले.हिला त्यांचे  भुंडे हात बघवले नाहीत. पठ्ठीन आपल्या हातातल्या पाटल्या ( ज्या तिच्या  आईन तिला लग्नात घातल्या होत्या) सासूच्या हातात चढवल्या.

🤦🏻‍♀️ हे कळताच नवरा, मुले, सुना तिच्यावर इतक्या नाराज झाल्या की तिच्याशी बोलणेच बंद केले. मोबाइल चालू ठेवायला ही पैसे देत नाहीत.

आता ना तिच्या हातात पैसा, ना कुणाचा शब्द!

आयुष्यभर तिने पार पाडलेल्या जबाबदा-या, खस्ता, कष्ट, पतीला दिलेली साथ, प्रेमाने एकत्र बांधून ठेवलेला परिवार, सुनाना वेळोवेळी  केलेली मदत, नातवंडांचं प्रेम हे सगळं इतक्या सहजतेनं संपतं?

काय चुकलं तिचं?

काय करायचं तिनं?

ती साधी?

ती भोळी?

ती बावळट?

की ती खुळी?

 

मला तरी या प्रश्नांनी  भंडावून सोडलय…..

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शोध आनंदाचा…भाग – 3 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆

सुश्री शुभदा जोशी

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग – 3 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

आनंद म्हणजे झुळूक! सहज अलगद स्पर्शून जातो पण पकडून ठेवता येत नाही मुठीत! काही क्षणच किंचित बरं वाटतं… आणि भुर्रकन उडून जातो तो. पुन्हा आपलं जैसे थे! 

कशामुळे सुखावते मी? सगळ्यात जास्त वेळा… कुणी माझ्याबद्दल चांगलं  बोललं की… तोंड देखली स्तुती किंवा भारावून जाऊन केलेली स्तुती समजते, त्याबद्दल नाही बोलत मी पण माझ्या प्रयत्नांचे आवर्जून कुणीतरी कौतुक केले, खरंतर दखल घेतली गेली माझ्या असण्याची, कामाची की बरं वाटतं. 

त्यातही हे कौतुक किती मनापासून आहे, कितपत  खरं आहे, नेमकं आहे का अशा अनेक बाबींवर त्या आनंदाची तीव्रता अवलंबून असते.

याचा अर्थ इतरांवर अवलंबून आहे का माझा आनंद? माझ्या हातात नाही का? नाही नाही अगदी असं नाही म्हणता येणार! त्या वेळची माझी मनस्थितीदेखील पूरक असायला हवी ना? तर घेता येईल मला ते कौतुक! पण काहीही म्हणा, appreciation हा बऱ्यापैकी खात्रीचा मार्ग आनंदापर्यंत पोचण्याचा हे मात्र मानावे लागेल. 

अनेकदा सोशल मेडियामध्ये मी तुम्हाला चांगले म्हणते, तुम्ही मला म्हणा असा खेळ चाललेला जाणवतो. हे म्हणजे ‘fishing for the compliments’ झाले.

असला ओढून ताणून आनंद नको बाबा आपल्याला!

माझ्या मनात जर सभोवतालच्या लोकांबद्दल प्रेमाची आणि आस्थेची ज्योत तेवत असेल तर आपसूकच माझ्या असण्यातून, वागण्यातून आनंदाची सुखद झुळूक लोकांना अनुभवायला मिळते नि साहजिकच ती परतून माझ्यापर्यंतही पोचते. खरंतर ती आपली आपल्याला देखील जाणवत रहाते…   

हृदयातली प्रेमाची ज्योत जेव्हा अलगद सुलगते…त्यात कोणतीही अपेक्षा नसते, संपूर्ण स्वीकार असतो, आपलं मानलेलं असते. कुणासाठी तरी खूप आस्था, प्रेम वाटतं, काही तरी करावसं वाटतं… अगदी स्वतः त्रास सोसून देखील… ही भावना किती सुरेल असते! 

मनातल्या अस्वस्थतेला, असाहायतेला, निराशेला पार करण्याचं बळ लाभतं त्यातून… मात्र तिथवर  पोचण्यात किती अडचणी? निखळ प्रेम आणि स्वीकार येतच नाही अनुभवाला. किती तरी ‘पण…’ असतात मध्ये. तक्रारी, जुने अपेक्षाभंग, आरोप अशा अनेक गोष्टी त्या प्रेमाच्या ज्योतीला जीवच धरू देत नाहीत. त्यासाठी भूतकाळात त्या त्या क्षणात शिरून गोष्टी resolve कराव्या लागतात, पाहिल्यांदा स्वतःच्या मनात आणि नंतर त्या व्यक्तीपर्यंत पोचून देखील! आपला दृष्टिकोन बदलला असेल तर सकारात्मक प्रतिसाद निश्चित मिळणार… 

अगदी जवळच्या आणि प्राथमिक – जैविक नात्यातल्या माणसांबरोबर जगताना आजवर झालेल्या जखमा, ओरखडे आपण जर वागवत राहिलो बरोबर तर ते नाते आणखी आणखी कडवट बनत जाते. ते नाते heal व्हायला हवे तर त्यासाठी जखमा बऱ्या व्हायला हव्यात. ही वाट चालून जाण्यासाठी आपल्याला उर्मी आणि बळ लाभो.

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समिधा..!! ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ समिधा..!! 🔥 ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एका वळणावर दोन गुरुजी स्कूटरवरून माझ्या शेजारून गेले. तर… त्यातले एक गुरुजी दुसऱ्या गुरुजींना म्हणत होते, “अरे समिधांची काय एव्हढी काळजी करतोस? त्यांचं काम फक्त अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू अग्नीपर्यंत पोचवायचं…!”

बस्स एवढंच? 

ह्या पलीकडे त्या ‘समिधां’च्या जळून जाण्याला काहीच महत्व नाही ? 

खरं तर ह्या अशा अनेक ‘समिधा’ आहेत ज्यांनी मूकपणे जळून जाऊन अनेक यज्ञ यशस्वी केलेत —-!

विचारांच्या वावटळीवर स्वार होऊन मन प्रवासाला निघालं—-

पहिलीच आठवली ती उर्मिला. 

लक्ष्मण तर गेला निघून भावामागून चौदा वर्षं वनवासाला… रामसीतेच्या बरोबरीनं लक्ष्मणाचं कौतुक झालं, भरताचंही झालं—- पण अयोध्येत राहूनसुद्धा चौदा वर्षं वनवास, तोही एकटीनं भोगणाऱ्या, उर्मिलेच्या आयुष्याच्या आहुतीची दखल वाल्मीकींनीही घेतली नाही—-मला नेहमी वाटतं की त्या उर्मिलेला कुणीतरी बोलतं करायला हवं. रामराज्याच्या आदर्शवादी यज्ञात ह्या एका ‘समिधेची आहुती अशीच पडून गेली.

मग आठवतात त्या… काशीबाई, सकवारबाई आणि इतर तिघी—शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांपैकी तीन—

सईबाई, सोयराबाई व पुतळाबाई या आपल्याला माहीत असतात. त्यांच्याबद्दलच्या खऱ्याखोट्या गोष्टीही 

आपण ऐकलेल्या असतात—पण बाकीच्या पाच…? केवळ राजकीय कारणासाठी जिजाबाईंनी ह्या पाचजणींबरोबर महाराजांचा विवाह लावला. पण नंतर? —-‘अफझलखान येतोय,’ म्हटल्यावर ह्या पाचजणींना चिंता वाटली नसेल? आपला नवरा औरंगजेबाच्या कैदेत अडकलाय म्हटल्यावर यांचाही जीव सैरभैर झाला नसेल ? निश्चितच झाला असणार ! पण स्वराज्याच्या यज्ञात ह्या पाच ‘समिधा’ तशाच जळून गेल्या!

बहुतेक सर्व ‘समिधा’ या  स्त्रियाच ! —-

 कारण हे निमूटपणे जळून जाणं त्यांच्या अंगवळणीच पडलेलं असतं जणू! 

गोपाळराव जोशांसारखा एखादा अपवाद की आपल्या पत्नीला- आनंदीबाईला

डॉक्टर करण्यासाठी स्वतः ‘समिधा’ झाला !

काही थोड्याफार ‘समिधा, कस्तुरबा म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा—

स्वकर्तृत्वाने उजळूनही गेल्या ! पण बाकीच्या…?

टिळकांनी, सावरकरांनी मांडलेल्या स्वराज्याच्या यज्ञात पहिली आहुती सौ. टिळकांची व सौ. सावरकरांची पडली. 

या आणि अशा अनेक…!!!

विचारांच्या चक्रात घरी आलो. आमच्या घरच्या ‘समिधे’नं दार उघडलं. 

मुलाचा अभ्यास आणि नवऱ्याचं करीअर यासाठी स्वतःचं आयुष्य पूर्णपणे झोकून देणाऱ्या त्या ‘समिधे’ला पाहून 

मला एकदम भरून आलं!

घरोघरी अशा ‘समिधा’ रोज आहुती देत असतात. घर उभं करत असतात, सावरत असतात. माझं घरही याला काही अपवाद नाही.

मात्र यापुढे या ‘समिधां’ची आहुती दुर्लक्षित जाऊ न देणं गरजेचं आहे !

या नव्या कठीण काळात, सर्व आव्हानांना भिडण्याची तयारी करतांना, जी आनंदाने स्वतःची आहुती देऊन 

आपल्याला ऊर्जा देणार आहे, त्या आपल्या प्रत्येकाच्या घरच्या ‘समिधे’ला… मनापासून नमस्कार..

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आवरा ही प्रदर्शने… ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ आवरा ही प्रदर्शने… ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

खरं तर, कार्यक्रम, सभा, संमेलने या खेरीज ध्वनिप्रदूषण करणा-या कर्णे, भोंगे आदि गोष्टींचा वापर सगळ्यांनीच शहाणपणाने टाळायला हवा. आरत्या, नमाज, बांग हे ईशस्तवन असेल, तर ते ठाणठाण बोंबलल्याशिवाय देवाला कळत नाही, असा गैरसमज आहे का? की, आपली भक्ति ही प्रदर्शनाची बाब आहे, असा समज आहे?                                               

मला दुसरी शक्यता जास्त बरोबर वाटते. ही सगळी प्रदर्शने ओंगळ व्हायला लागली आहेत आणि धूर्त राजकारण्यांची शक्ति-प्रदर्शने ठरू लागली आहेत. गोंगाट, गलका हे किती त्रासदायक होतात, हे एखाद्या शांत, निरव ठिकाणी जाऊन आल्यावर कळतं. सांगीतिक श्रेणीतील किती तरी नादमधुर आवाजांना आपण मुकतो – पक्ष्यांच्या शीळा, झाडांची सळसळ, ही तर उदाहरणे आहेतच, पण वा-याच्या झुळकेला किंवा झोतालाही नाद असतो, समुद्राची गाजेची रात्रीची जाणीव थरारक असते, रातकिड्यांची किरकिर, बेडकांचं डरांव डरांव हे रात्रीच्या झोपेसाठी पार्श्वसंगीताचं काम करतं. निसर्गाची चाहूल असते ती. हे सगळं आपण गोंगाटांत हरवून चाललो आहोत, असं नाही का वाटत?                                               

मला आठवतंय ->                                                          

मी अगदी पाऊल न वाजवता पाळण्याशी जाऊन उभी राहिले तरी माझ्या दिशेला वळलेले तान्हुल्याचे डोळे!

लोणावळ्याला रायवुड पार्क हा जंगलसदृश भाग होता. त्या दिशेने जात असतांना दिवसाउजेडी तिथं रातकिड्यांची चाललेली सामूहिक कर्कश्श किरकिर – त्या झाडांच्या समूहाच्या मध्यभागी जाऊन उभं राहिल्यावर क्षणांत थांबली. आपला श्वास आपल्याला ऐकू येईल, इतकी शांतता क्षणात पसरली. असं वाटत होतं की लक्षावधी अदृश्य डोळे आपला वेध घेताहेत, आपल्याला जाणून घेताहेत. तो परिसर सोडला मात्र, ताबडतोब त्यांचं समूहगान सुरू झालं.                                                                               

झाडावर खारीचं कर्कश्श चिरकणं सुरू झालं की समजायचं, आपली मांजर घराकडे यायला निघालीय.

लिलीचं फूल उमलतांना अतिकोमल असा फट् आवाज करतं आणि सगळ्या पाकळ्या बाहेर फेकल्यासारख्या एकदम  उलगडतात.                                          

परदेशांत जन्मलेल्या आणि वाढलेल्या आपल्या भारतीय मुलांचे इथं – भारतात पाय ठेवताक्षणी इथल्या असह्य आवाजांनी गांगरलेले चेहरे, झाकून घेतलेले कान, हे न सांगता काही सुचवत असतं, जे आपल्याला ऐकू येत नाही, समजत नाही.                                                                                      

मोठमोठ्या आवाजातील बोलणं, गाड्यांचे कर्णकटु भोंगे, दुचाक्यांचे फर्रर्र आवाज, गजबज ह्या अनैसर्गिक – मानवनिर्मित प्रदूषणात आता भर पडली आहे ही या डीजे, डॉल्बीवर वाजणा-या ठणाण गाण्यांची ! आश्चर्य वाटतं, हे सगळं चवीने उपभोगणा-यांचे!                                                                                                                     

सगळेच काही जंगलात वा हिमालयात जाऊ शकत नाहीत. गंमत म्हणजे तिथला निसर्गही आता या ध्वनिप्रदूषणापासून स्वतःला वाचवू शकत नाही. बहिरं असण्याचं दुःख मला माहीत आहे, पण आता बहिरं होण्यात आनंद शोधावा लागेल का?  ——

© सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 22 – मठातली साधना ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 22 – मठातली साधना ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

वराहनगर मठात श्री रामकृष्ण संघाचं काम सर्व शिष्य नरेंद्रनाथांच्या मार्गदर्शनाखाली करत होते. उत्तर भारतातले आखाड्यातले साधू बैरागी, वैष्णव पंथातले साधू समाजाला परिचित होते. पण शंकराचार्यांच्या परंपरेतल्या संन्याशांची फार माहिती नव्हती. त्यामुळे वराहनगर मठातल्या तरुण संन्याशांबद्दल समाजाची उपेक्षित वृत्ती होती. चांगले शिकले सवरलेले असून सुद्धा काही उद्योगधंदा न करता, संन्यास घेऊन हे तरुण लौकिक उन्नतीचा मार्ग दूर ठेवत आहेत, हे पाहून लोक खेद करत, उपेक्षा करत, कधी अपमान करत. तिरस्कार करत. कधी कधी कणव येई, तर कधी टिंगल होई.

पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही करायचे म्हणजे असेच सर्व गोष्टींना सामोरे जावे लागते. समाजाने स्वीकारे पर्यन्त, बदल होण्याची वाट बघत हळूहळू पुढे जावे लागते. तसे सर्व शिष्यांमधे हा वाट पाहण्याचा संयम होता. दूरदर्शीपणा होता. कारण तसे ध्येय ठरवूनच त्यांनी घरादारचा त्याग केला होता आणि संन्यस्त वृत्ती स्वीकारली होती. हे तरुण यात्रिक अध्यात्म मार्गावरचे एकेक पाऊल पुढे टाकत चालले होते. भारताच्या आध्यात्मिक जीवनात संन्यस्त जीवनाचा सामूहिक प्रयोग नवा होता.

“आपल्याला सार्‍या मानवजातीला आध्यात्मिक प्रेरणा द्यायची आहे, तेंव्हा आपला भर तत्वांचा, मूल्यांचा,आणि विचारांचा प्रसार करण्यावर हवा. संन्यास घेतलेल्यांनी किरकोळ कर्मकांडात गुंतू  नये”. असे मत नरेंद्रनाथांचे होते. या मठातलं जीवन, साधनेला वाहिलेलं होतं.

शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास, संस्कृत ग्रंथ व धर्म आणि अध्यात्म संबंधित ग्रंथांचे वाचन होत असे. हिंदूधर्म याबरोबर ख्रिस्तधर्म आणि बुद्धधर्म यांचाही अभ्यास केला जात होता. या धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व्हायचा. इथे धर्मभेदाला पहिल्यापासूनच थारा नव्हता असे दिसते. शंकराचार्य आणि कांट यांच्या तत्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास पण इथे होत होता. हे सर्व अनुभवास आल्यानंतर जाणकारांची उपेक्षा जरा कमी झाली आणि जिज्ञासा वाढली.

कधी ख्रिस्त धर्माचे प्रचारक मिशनरी येत त्यांच्या बरोबर चर्चेत हिंदू धर्माच्या तुलनेत ख्रिस्त धर्म कसा उणा आहे ते चातुर्याने आणि प्रभावी युक्तिवादाने नरेंद्र पटवून देत असत. ख्रिस्ताचे खरे मोठेपण कशात आहे तेही समजाऊन सांगत. हे विवेचन ऐकून धर्मोपदेशक सुद्धा थक्क होऊन जात.

हिंदू धर्मातील इतर पंथांचाही इथे अभ्यास चाले. तत्वज्ञानाच्या आधुनिक विचारवंतांनाही इथे स्थान होते. जडवादी आणि निरीश्वरवादी विचारसरणीचा परिचय करून घेतला जात होता. फ्रेंच राज्यक्रांतीचं महत्व सुद्धा नरेंद्रनाथ समजाऊन सांगत असत. साधनेच्या जोडीला अभ्यास हे वराहनगरच्या मठाचं वैशिष्ठ्य होतं. श्री रामकृष्ण यांच्या गृहस्थाश्रमी शिष्यांना एकत्र यायला हा मठ एक स्थान झालं होत. हळूहळू लोकांच्या मनातील दुरावा कमी झाला होता.

तीर्थयात्रा ही आपली पूर्वापार चालत आलेली परंपरा आणि धार्मिक जीवनाचा एक भाग पण. शिवाय श्रीरामकृष्ण यांनीही एकदा संगितले होते, की, “संन्याशाने एका जागी स्थिर राहू नये. वाहते पाणी जसे स्वच्छ राहते, तसे फिरत राहणारा संन्यासी आध्यात्मिक दृष्ट्या स्थिर आणि निर्मळ राहतो”.

या मठातील गुरुबंधूंना तीर्थयात्रेची उर्मी येत असे. त्याप्रमाणे नरेंद्रनाथांना पण एका क्षणी वाटले की, आपणच नाही तर सर्व गुरुबंधूंनी पण परिभ्रमण करावे. अनुभव घ्यावेत, त्यातून शिकावे. त्यामुळे प्रत्येकाच्या आंतरिक शक्तींचा विकास होईल. वराहनगर मठ हा एक मध्यवर्ती केंद्र म्हणून असेल, कोणी कुठे ही गेलं तरी सर्वांनी या केंद्राशी संपर्कात राहावं. शशी यांनी हा मठ सांभाळण्याची जबाबदारी घेतली. दोन वर्षानी १८८८ मध्ये नरेंद्रने वराहनगर मठ अर्थात कलकत्ता सोडले आणि त्यांच्या परिव्राजक पर्वाचा प्रारंभ झाला.

सुरूवातीला ते वाराणशीला आले. प्रवासात ते आपली ओळख फक्त एक संन्यासी म्हणून देत. अंगावर भगवी वस्त्रे, हातात दंड व कमंडलू, खांद्यावरील झोळीत एकदोन वस्त्रे, एखादे पांघरुण एव्हढेच सामान घेऊन भ्रमण करत. शिवाय बरोबर ‘भगवद्गीता’ आणि ‘द इमिटेशन ऑफ ख्राईस्ट’ ही दोन पुस्तके असायची. रोख पैशांना स्पर्श करायचा नाही, कोणाकडे काही मागायचे नाही हे त्यांचे व्रत होते.

सर्व गुरुबंधुना पण ते प्रोत्साहित करू लागले की, भारत देश बघावा लागेल, समजावा लागेल. लक्षावधी माणसांच्या जीवनातील विभिन्न थरांमध्ये काय वेदना आहेत, त्यांच्या आकांक्षा पूर्ण न होण्याची कारणे काय आहेत ते शोधावे लागेल. हे ध्येय समोर ठेऊन ,भारतीय मनुष्याच्या कल्याणाचे व्रत घेऊन स्वामी विवेकानंद यांचे हिंदुस्थानात भ्रमण सुरू झाले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवाचे लेकरू— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ देवाचे लेकरू— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

माझ्या हॉस्पिटलमध्ये अनेक  प्रकारच्या रुग्ण मी बघत असायची. काहीवेळा, श्रीमंत लोक अत्यंत  विचित्र वागताना मी बघितलेत. तर काहीवेळा,अत्यंत निम्न स्तरातले लोक फार मोठ्या मनाचे आढळून आलेलेही बघितले.

माझ्याकडे सरला बाळंतपणासाठी आली. त्याकाळी सोनोग्राफी भारतात आलेली नव्हती. तेव्हाची ही गोष्ट.

आधीच्या दोन मुलीच होत्या सरलाला. यावेळी मुलाच्या आशेने तिसरा चान्स घेतला होता खरा. 

पण मग मात्र operation नक्की करायचे ठरवले होते तिने. योग्य वेळी सरला प्रसूत झाली. मी  प्रसूती पार पाडून बाळाकडे वळले. मुलगी होती ती. पण दुर्दैवाची गोष्ट, मुलीला डावा हात कोपरापासून नव्हता.

कोपरालाच बोटासारखे दोन विचित्र कोंब होते. मला, आमच्या सर्व स्टाफला अतिशय वाईट वाटले.

सरलाने उत्सुकतेने विचारले, “ बाई काय झाले मला,सांगा ना “

मी म्हटले, “ सरला, सगळे उत्तम आहे. तू आता छान विश्रांती घे हं.उद्या बाळ देणारच आहोत तुझ्या जवळ. “ 

सरलाने निराशेने मान फिरवली.

दुसऱ्या दिवशी राऊंड घेत असताना सरलाच्या कॉटजवळ गेले तर ती धाय मोकलून रडत होती.

“ अहो डॉक्टर,आता मी काय करू. ही असली अपंग मुलगी कशी सांभाळू मी. देव तरी बघा कसा. देऊन द्यायची ती मुलगी,आणि वर असली अपंग.” 

मी तिची खूप समजूत काढली. “ सरला,देवाचीच इच्छा म्हणायचे ग. तू हिलाच आता नीट वाढवायला हवेस.

नशीब समज, ती बाकी ठीक आहे. आणखी कोणते व्यंग नाहीये नशिबाने. अग, फारसे नाही अडणार ग तिचे.

शिकव ना तू तिला सगळे. “ 

सरला गप्प बसली आणि पाचव्या दिवशी घरी निघून गेली. तिचा नवरा बिचारा खरच समजूतदार होता.

म्हणाला, “ बाई,देवाचे लेकरू म्हणून आम्ही  सांभाळू हिला.काय करणार.” 

सरलाने मुलीला खंबीरपणे वाढवायचे ठरवले. 

तिचे  ना कोणी बारसे केले, ना  कसला समारंभ. पहिल्या दोघी रुपाली दीपाली म्हणून ही वैशाली. हेही बहिणीच म्हणू लागल्याम्हणून पडले नाव. बहिणी  म्हणाल्या,” आई हिला आमच्या शाळेत नको हं घालू . सगळ्या चेष्टा करतील आमची.” 

सरलाने चौकशी केली आणि तिला मिशनच्या फुकट असलेल्या शाळेत घातले. निदान तिथे तरी तिला कोणी हसणार नाही, तिच्या व्यंगावर बोट ठेवणार नाही,अशी आशा वाटली सरलाला.

 मुलगी चांगली वाढत होती. बुद्धी सुद्धा छान होती तिची. मिशन स्कूलमध्ये उलट ती छान शिकत होती.

इंग्लिश माध्यम असल्याने तिला फायदाच होत होता. 

सरला घेऊन  यायची तिला माझ्याकडे–कधी औषधासाठी, कधी काही विचारायचे असेल तर–

एकदा मला म्हणाली,” बाई हिला कृत्रिम हात नाही का बसवता येणार हो ?”

 मी तिला आमच्या बालरोग तज्ञांकडे पाठवले. ते म्हणाले, “अजून ही खूप लहान आहे. जरा मोठी झाली की करूया आपण प्रयत्न.” 

दिवस भरभर पळत होते. मोठ्या बहिणी  डिग्री घेऊन लग्न करून गेल्या. त्यांचीही माया होतीच वैशालीवर. 

तिला कोणी हसू नये, कुचेष्टा करू नये म्हणून त्याही दक्ष असायच्या. वैशाली समजूतदार होती. आपल्यात काहीतरी कमी आहे, हे त्या लेकराला जणू जन्मापासून माहीत होते.

वैशालीचे त्या हातामुळे कुठेही अडत नव्हते. ती लाटणे हातात धरून छान पोळ्या करायची. त्या बोटासारख्या कोंबाचा उपयोग करून शिवणसुद्धा शिवायची. खरे तर मोठ्या बहिणींपेक्षा वैशाली दिसायलाही खरंच चांगली होती.

वैशाली 10 वी झाली, तेव्हा सरला म्हणाली,” आपण तुला कृत्रिम हात बसवूया का “. 

 वैशाली म्हणाली, “ नको आई. मी आहे ही अशी आहे। माझे काहीही अडत नाही ग. नको मला तो हात.” 

वैशाली बी.कॉम. झाली. सरकारच्या अनुकम्पा तत्वावर तिला सरकारी बँकेत नोकरीही लागली.  छान साडी  नेसून,डाव्या हातावर पदर घेतलेली वैशाली बघितली की मला कौतुक वाटे तिचे. लक्षात सुद्धा येत नसे की हिला डावा हात पुरा नाहीये. ती भराभर बँकेत काम करत असायची. 

नंतर  बँकेत कॉम्प्युटर आले. वैशालीला बँकेने training साठी पाठवले. हसतमुख वैशाली,सगळ्या बँकेची लाडकी झाली. क्लायंट पण ती नसली की विचारायचे,`आज वैशाली ताई दिसत नाहीत. मग उद्याच येतो,त्या आल्या की.`

सरलाने वैशालीचे नाव विवाह मंडळात घातले. वैशाली म्हणाली, “ आई मला निर्व्यंग मुलगा नको. व्यंग असलेलाच नवरा बघ, जो मला समजून घेईल, स्वतः जो या भोगातून गेलाय, त्याच्याशीच मी लग्न करीन. नाही मिळाला तर राहीन की अशीच. आई, तुला सांगितले नाही ग कधी, पण शाळेतही खूप भोगलय मी. डबा खायला मुले बोलवायची नाहीत

मला उजव्याच हाताने पाण्याचा ग्लास उचलावा लागतो म्हणून चेष्टा करायची मुले. खरकटे हात लावते मी म्हणून.

माझे पाठांतर किती छान आहे. पण टीचरने मला स्पर्धेत कधीही निवडले नाही. .म्हणूनच जो या सर्वातून गेलाय,असाच जोडीदार मला हवा। “ 

सरलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 

“ किती ग सोसलस माझ्या बाळा. पण मिळेल हो असा समजूतदार मुलगा तुला. देव असतो ग  वैशू.” 

वैशू खिन्न हसली. म्हणाली, “असता तर त्याला माझा  पूर्ण हात का नाही देता आला त्याला “. सरला निरुत्तर झाली.

बँकेत एक दिवस एक आजोबा आले. या मुलीला ते खूप दिवस बघत होते. तिला म्हणाले,” जरा बोलायचे आहे तुझ्याशी. येतेस का लंचअवर मध्ये ? हे बघ,मी तुला गेले खूप महिने बघतोय. तुला अवघड वाटणार नसेल तर

एक विचारू का? माझा नातू खूप हुशार आहे. इंजिनीअर आहे, छान नोकरी आहे त्याला. तो तुला  बँकेत येऊन बघून गेलाय. त्याला तू मनापासून आवडली आहेस. हे बघ, या गुणी मुलाला लहान असताना पोलिओ झाला दुर्दैवाने.

वेळीच उपचार केले म्हणून सावरला, पण तरीही, तो एका पायाने लंगडतो. त्याचे काहीही अडत नाही. कार चालवतो, चांगली नोकरीही आहे त्याला. आमची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. बघ भेट त्याला. तुमच्यावर कोणतीही बळजबरी नाही.” 

वैशालीने आईला हे सांगितले. सरलाला तर स्वर्ग ठेंगणा झाला. पुढच्या आठवड्यात आजोबा आणि नातू मनीष वैशालीच्या घरी आले. दोघे अनेक वेळा भेटले बोलले. सहा महिने एकमेकांना भेटल्यावर मगच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अगदी साधे, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वैशाली मनीषचे लग्न झाले.

आज वैशाली एका गोंडस मुलीची आई आहे. एकाच मुलीवर तिने ऑपरेशन करून घेतलंय.  मुलगी एकदम 

अव्यंग, हुशार आणि छान आहे.

आता सांगा,—

 देव लग्नगाठी स्वर्गात बांधतो , आणि एक दार बंद असेल तर तो दुसरे उघडतो हे किती खरे आहे न..

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print