मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नाग वासुकी मंदिर, प्रयाग… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(फोटो मोठा करून पाहिल्यास त्यातील सौंदर्य स्पष्ट दिसू शकेल.)

☆ नाग वासुकी मंदिर, प्रयाग… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

वरील चित्रातली ही मूर्ती एकाच दगडात कोरून बनवलेली आहे असे सांगितले तर कदाचित खरे वाटणार नाही. ती कशी बनवली गेली हे एक तो देव, नाहीतर तो मूर्तिकारच जाणे असे आश्चर्याने म्हटले जाते.

हे आहे “ नाग वासुकी मंदिर ” प्रयाग. 

पाहिल्यापाहिल्या हा एक वटवृक्ष आहे असेच वाटते. पण नाही. हे सर्व नक्षीकाम भल्यामोठ्या दगडावर कोरून केले गेलेले आहे. 

आपल्या भारतात प्राचीन काळातल्या अशा अनेक सुंदर आणि आश्चर्यकारक वाटणाऱ्या गोष्टी अजूनही बघायला मिळतात, ज्या पाहून, त्या कशा बनवल्या असतील याचे आश्चर्यमिश्रित कौतुक बघणाऱ्या प्रत्येकालाच वाटल्याशिवाय रहात नाही. पण त्या कशा बनवल्या असतील हा प्रश्न एखाद्या न सुटणाऱ्या कोड्यासारखा वाटत रहातो. 

अशी अविश्वसनिय कलाकारी बघायची असेल तर अशा स्थळांना आवर्जून भेट द्यायला हवी. 

लेखक : अज्ञात 

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मोरया… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ मोरया…  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

“काय आली का सगळी “

एस्.डी. इंडस्ट्रीच्या मालकाच्या घरून आलेल्या गणपतीने विचारलं. लगेच दुसरा म्हणाला “थांबा थोडा वेळ ! झोपडपट्टीतला छोटा गुंड्या मोरयाला सोडतच नाहीय सारखा मोरयाला मिठी मारून  ” नको ना जाऊस,” म्हणून  जोरजोरात रडतोय. त्यामुळे मोरयाचाही पाय निघत नाहीय.येईलच आता तो. संध्याकाळ होत आली.आता  आलच पाहिजे त्याला. तेवढ्यात मोरया गुंडा भाऊला सोडून कसाबसा धावत आला. त्याचे डोळे भरून आले होते. गळ्यात हुंदका दाटून आला होता.सगळ्यानी त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याचं सांत्वन  केलं.

“चला रे चांगला मोठा गोल करा” आज विसर्जन झालेले सर्व  गणपती एकत्र आले होते.”आता शिदोरी सोडा बरं!” प्रथम मोरयाच्या सुचनेनुसार सगळ्यानी आपापली शिदोरी सोडली.

प्रथम आलेला मोरया म्हणाला.आणि हो! आपापला अनुभव पण सांगा बरं.

सगळ्यांनी गोल करून आपापली शिदोरी सोडली.तळलेले मोदक तर सगळ्यांच्याचकडे होते.पण प्रत्येकाला आलेला अनुभव मोदकांच्या सारणासारखा गोड होताच,असं नाही.शेवटी पदार्थ  करणारीच्या  भावना पदार्थात उतरतातच नाही का! 

प्रथम आलेला मोरया म्हणाला मीच पहिल्यांदा माझा अनुभव सांगतो.

एस्. डी  इंडस्ट्रिजच्या मालकाकडचा मी दीड  दिवसाचाच पाहुणा होतो.घर कसलं भलामोठा बंगलाच होता तो.जागोजागी श्रीमंती ओसंडून वहात होती. मला बसायला मऊ मखमली आसन.समोर थुईथुई उडणारं कारंज.त्यात पोहणारे हंस.माफक प्रकाश योजना.दारातच चेहर्‍यावर  वैतागलेला भाव असलेल्या,खूप नटलेल्या बाईनं जरा घाईघाईतच माझं स्वागत केलं.तिचं तिच्या नवऱ्याबरोबर  भांडण झालं असावं.केवळ नाईलाज म्हणुन  मला यानी घरी आणलंय असं मला वाटलं.ना कुणी “गणपती बाप्पा, मोऽऽरऽया” अशी आरोळी ठोकली, ना दणक्यात आरती  ना घसघशीत नैवेद्य.ती बया नोकराना  सारख्या सूचना करीत होती.”अगदी नैवेद्यापुरतंच करा .आम्ही दोघेही गोड खाणार नाही.” खरं सांगू का, माझातर मूडच गेला. दुसरे दिवशी  घरच्या स्वयंपाकीणीनेच  चांदीच्या ताटात नैवेद्य दाखवला.तो नैवेद्य माझ्या उंदराचंही पोट भरु शकला नसता.एवढुसाच होता .अगदी बाराच्या ठोक्याला माझ्या हातावर दही ठेवून बोळवण झाली सुद्धा.  शिदोरी म्हणून चॉकलेटचे मोदक, विकत आणलेले मला दिले. हे पहा. हा दीड दिवसाचा पाहुणा म्हणजे मी  केव्हा एकदा परत जातो असं घरातल्यांना झालं होतं. कामाच्या बायका स्वच्छता टापटीप करत होत्या. स्वयंपाकीण  नैवेद्याचे पदार्थ करत होती. नुसतं  पाणी फिरवून फक्त नैवेद्य दाखवायलासुद्धा  मालकिणीला वेळ नव्हता. अगदी कोरड्या डोळ्यांनी माझी पाठवणी केली रे. फक्त एवढंच गाडीतून गेलो आणि गाडीतून परतलो.बस्स इतकंच .

प्रत्येकाला आपण गेलेल्या घरातला संवाद आठवत होता.

भल्या मोठ्या फोर बीएचके मध्ये राहणाऱ्या गोळे आजी-आजोबांना  हौस दांडगी.  शरीर साथ देत नव्हते तरीसुद्धा त्यांनी परंपरा सांभाळायची आणि आवड म्हणून म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव केला. दरवर्षीप्रमाणे  आजीनी  माझ्यासाठी नवीन कुंची शिवून त्यावर  मोती लावून ठेवलेली होती. घरात नैवेद्यासाठी डिंकाचे, बेसनाचे, रव्याचे,बुंदीचे, तिळाचे असे विविध प्रकारचे लाडू तयार  केलेले होते.अत्यंत हंसतमुखानी त्यांनी माझं स्वागत केलं.  मी घरी गेल्यावर मला कुठे ठेवू नी काय काय करू असं त्यांना झालं होतं.गोळेआजी  रोज माझी फुलांनी  दृष्ट काढायच्या. आजी  गजरा घालून छान नटायची.तिच्या नटण्यापेक्षा तिच्या चेहर्‍यावरचं हंसूच मला जास्त विलोभनीय वाटायचं.आरामात लोडाला टेकून आजी आजोबांचे खुसखुशीत संवाद ऐकताना मला मोठी मजा यायची. आरतीसाठी  आपार्टमेंट मधल्या  सगळ्या  बाळ गोपाळांना जमा करून दणक्यात  आरती करायचे. केवळ खाऊ मिळतो म्हणून हे बाळ गोपाळ जमायचे. ना त्यांना आरती यायची ना मंत्रपुष्प. देवघरातली घंटीसुद्धा  मुलाना  वाजवायची माहित नव्हती.  

आजी आजोबानी मनापासून केलेला पाहुणचार मला फारच आवडला. सकाळी सकाळी आजोबा माझ्यासाठी व आजीसाठी चहा करायचे. चहा काय फक्कड करायचे माहिती आहे!.मला चहाचा नैवेद्य दाखवून म्हणायचे.”गणराया,बघ जमलाय का चहा.अरे पृथ्वीवरचं अमृत आहे हे. तिथं स्वर्गात नाही मिळायचं.बघ..

आणखी एक कप हवा का?”आणि खळखळून हसायचे. मग मला नाश्ष्टा त्यानंतर सुग्रास जेवण. असं दोन्ही वेळेला मिळायचं. दोन्ही वेळची आरती अगदी सुगंधी फुलं अत्तर लावून असायची. फार फार आवडलं मला. येताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझा  पाय काय घरातून निघेना. मोठ्या प्रेमानं शिदोरी म्हणून  21 तळणीचे मोदक, गुळाचा खडा,पाणी देऊन  हातावरास  गोड दहीसाखर देऊन त्यानी माझी बोळवण केली.  “तझा प्रवास सुखकर होवो.पार्वती मातेला महादेवाना आमचा नमस्कार सांग ” असा आशीर्वादही दिला.ही गोड शिदोरी मी कायम लक्षात ठेवीन . त्यांची मुलं अमेरिकेत ना! मग मलाच मुलगा म्हणून त्यांनी खूप प्रेम दिलं .वाईट इतकंच वाटते की मी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही.

द्रौपदी आजीच्या घरी गेलेला गणपती म्हणाला द्रोपदी आजीना तीन नातीच आहेत. सगळ्या हुशार  चटपटीत,आपापल्या कामात एकदम हुशार . द्रौपदी आजी आपल्याला  नातू नाही म्हणून त्या नातींचा राग राग करायच्या. त्यांच्याबरोबर माझाही त्यांनी राग राग केला.

म्हणाल्या परंपरा सांभाळायच्या म्हणून तुला आणला. मला एखादा नातू  द्यायला तुला काय झालं होतं रे,?  नाईलाजाने करतीय मी हे सगळं, लक्षात ठेव!.उद्या कोण बघेल हा संसाराचा पसारा”? मी मनात म्हंटलं आजीबाई “आपण गेलं,जग बुडलं” ही म्हण माहीत नाही का? जे नाही त्यासाठी का रडायचं? तरीही नातीने केलेली सेवा पाहून मला खूप छान वाटलं.

कुलकर्णी कडून आलेला गणपती म्हणाला, “अगदी ऐसपैस स्वागत झालं हं माझं.” सगळ्या जावा भावा एकत्र येऊन माझा उत्सव साजरा करत होत्या. अगदी गोकुळात गेल्यासारखा वाटलं मला.काय तो आग्रह…. जेवायला बोलावलेले गुरुजी जेवून तिथेच कलंडले तरी आग्रह संपेना.झोप म्हणून दिली नाही मला. भजन,पारंपरिक खेळ, हास्यविनोद आणि आरती सुद्धा दणक्यात हो. एक नाही चांगल्या दहा दहा आरत्या म्हटल्या जायच्या. त्यामुळे मला खरोखर झोपायला सुद्धा वेळ मिळाला नाही . त्यांची मोलकरीणसुद्धा  खुष होती बर का! सणाचं  जादा काम पडणार म्हणून कुलकर्णी वहिनींनी आधीच गणपतीसाठी म्हणून तिला एक हजार रुपये  जादाचे दिले होते.मोठ्ठ घर तसं मन ही मोठ्ठ आहे हो त्यांच.त्याही आनंदाने काम करत होत्या.  प्रेमाने माझ्याकडे बघायच्या माझी अलाबला घ्यायच्या.  खूप खूप मजा आली.

गोखले आजींच्या कडे गेलेला  गणपती म्हणाला गोखले आजीना  दोन नातीच पण कोण कौतुक त्यांना. दोघी हुशार अभ्यासात तर हुशार आहेतच  शिवाय गायन, वादन, नृत्य यातही त्या पारंगत  आहेत. काय सुरेख नृत्य केलं त्यांनी. क्षणभर मलाही वाटले की आपणही त्यांच्याबरोबर नृत्य करावं.

पंत वाड्यातून परतलेला गणपती थोडा उदास होता शिसवी महिरपीचा खास गणपतीचा भला मोठा कोनाडा  त्यासमोर फळांचा मांडव. चांदीच्या समया पासून सगळ्या वस्तू चांदीच्या. भल्या मोठ्या वाड्यात दोनच व्यक्ती  राहतात . मुलं, सुना, नातवंडं  सगळी परदेशात. त्यामुळे वाडा अगदी उदास दिसत होता. त्यांनी माझा आगत स्वागत खूप चांगलं केलं, पण उदास वातावरणानं मलाही उदास वाटायला लागलं.घर कायम भरलेलं हवं असं मला वाटलं.

शांतीनगर मधून आलेला गणपती आला तोच मुळी कानात बोटं घालून. आल्या आल्या डोळे मिटून  शांत बसून राहिलेला होता. तो म्हणाला  काय तो कर्कश आवाज. ते गलीच्छ नाच.ते पाहून केव्हा एकदा आपण आपल्या घरी जातो असं वाटलं मला.कैलासाची,पार्वती मातेची मलाखूप  आठवण आली.

एक मोरया म्हणाला मी खरंच भाग्यवान बरं का! खाऊनपिऊन सुखी असलेल्या  मध्यमवर्गीय रोकडेंकडे  गेलो होतो मी.तिथे बाप लेक  अगदी मित्रासारखे वागत होते. सुना हंसतमुख होत्या.नातवंड आजी आजोबांबरोबर दंगा मस्ती करत होते.शुभंकरोती,रामरक्षा म्हणत होती. संध्याकाळी मला नमस्कार करून वडीलधार्यानाही नमस्कार करत होती. फारच छान वाटलं मला.त्या आजी माझ्याशी तासनतास बोलायच्या.नातवंडांना माझ्यासमोर उभं करून म्हणायच्या “मुलानो  पाहुण्यांपाशी बसा जरा.बोला त्याच्याशी.कसा आहेस तू,तुला घरची आठवण येते का विचारा त्याला.झोपण्यापूर्वी  त्या एकट्या माझ्याशी बोलायला बसायच्या.कुठं दुखतं खुपतं सांगायच्या.मग तोंडभर हंसून आपणच म्हणायच्या “मी कांही मागत नाही हो तुला! मी कुणापुढं बोलणार सांग ना!तेवढंच मन मोकळं झालं . तू सुखी रहा.बरं का म्हणजे आम्हालाही सुखी ठेवशील.हो ना!” 

गंमत म्हणून  विचारते.  आमच्या घरासाठी आम्ही तुझी निवड केली.खूष आहेस ना तू?  का तुला अमिताभ बच्चनच्या, तेंडुलकरच्या, आमदार,खासदारांच्या  घरात जावंस वाटत होतं??? आम्ही माणसं ना खूप सुंदर ,सुंदर  स्वप्नं पाहतो. ती पुरी होणार नाहीत हे माहीत असतं पण ” वचने कीं दरिर्द्रता  ”  हो की नाही?.स्वप्नंच ती. मग मोठी बघितली म्हणून  कुठं बिघडलं?  खूप हसायच्या त्या.मला भरपूर शिदोरी दिलीय.मी निघताना सगळ्यांचेच डोळे पाणावले.खूप मस्त वाटलं मला. 

पहिला मोरया म्हणाला. खूप छान अनुभव सांगितले सगळ्यानी.असं वाटतं आपण प्रत्येकाची इच्छा पूर्ण  करावी.पण प्रत्येकाचं प्राक्तन असतं ना!त्यात  आपण देव असूनही ढवळाढवळ करू शकत नाही. 

सगळ्यात छोटा आवेकरांकडचा गणपती गंमतीनं  म्हणाला.आपलं प्राक्तनतरी कुठं चुकलंय.कुणाच्या घरी आपण जायचं हे आपण थोडच ठरवलं होतं?तसं असतं तर सगळेच लालबागचा राजा झाले असते.यावर एकच हंशा पिकला.  

आपण दरवर्षी विविध रुपात पृथ्वीवर  जातो.माणसाना आपल्या येण्याने थोडाफार आनंद मिळतो. त्यांचं सुखदुःख   ऐकतो.त्यात  सामिलही होतो.आपण परत येताना ते म्हणतात.” पुढल्यावर्षी लवकर या “.  आपणही एवढंच म्हणूया ….  

सर्वे सुखिनः सन्तु……

आणि पुढच्या वर्षाची वाट पाहू या.

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

२८ सप्टेंबर १९२९ चा अत्यंत मंगलमय दिवस! या दिवशी घडलेली ‘न भूतो न भविष्यति’ अशी घटना! गंधर्वगायनाच्या पल्याड असलेले ‘लता मंगेशकर’ नामक सात अक्षररुपी चिरंतन स्वरविश्वाचे मूर्तरूप जन्माला आले.  अक्षय परमानंदाची बरसात करणारी स्वरशारदा लता आज संगीताच्या अक्षय अवकाशात ध्रुव ताऱ्यासारखी अढळपदी विराजमान झाली आहे. तिचे सूर अवकाशात असे कांही विखुरलेले आहेत की, ती या नश्वर जगात नसल्याचे जाणवतच नाही. ‘शापित गंधर्व’ दीनानाथ मंगेशकरांचा वारसा घेऊन लता आयुष्याचा प्रत्येक क्षण काटेरी वाटचाल करीत संगीताला समर्पित करूनच जगली. एखादी मूर्ती घडत असतांना टाकीचे घाव सहन करते, तसेच तिच्या आयुष्याची सुवर्णसांगता होण्याआधी तिने अगणित घाव सहन केले.  तिच्या संगतीने काम करणाऱ्या गायक, संगीतकार, गीतकार, सिनेसृष्टीतील अनेक व्यक्ती आणि बाबासाहेब पुरंदरे तसेच गो नी दांडेकरांसारख्या दिग्गजांच्या सहवासाने तिच्या व्यक्तिमत्वाला अन मखमली स्वरांना दैवी सुवर्णकांती प्राप्त झाली. लता आयुष्यभर एक अनोखी अन अनवट सप्तपदी चालली, सप्तसुरांबरोबर! 

मंगेशकर भावंडे म्हणजे आजच्या भाषेत मी म्हणेन, ‘मंगेशकर ब्रँड’ याला अन्य नसे उपमान! अन्य नसे पर्याय! दीनानाथ आणि माई (शेवंती) मंगेशकरांचे हे पंचप्राण होते, प्रत्येकाचा गुणविशेष निराळा.             लताच्या या साफल्याचे रहस्य होते लहानपणापासून आपल्या पित्याकडून, अर्थात मराठी संगीत नाटकांचे प्रसिद्ध गायक अभिनेता ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ यांच्याकडून वारसाहक्काने आणि शिक्षणातून आलेली संगीतविद्या, तिची स्वयंस्वरप्रज्ञा आणि कठोर स्वरसाधना! अजाणत्या वयापासूनच लताचे हे संगीतज्ञान तिच्या पिताला जाणवले होते. तेव्हांपासूनच त्यांनी तिच्या गायकीला समृद्ध केले. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच ती रंगमंचावर गायला लागली. १९४२ मध्ये त्यांचा अकाली मृत्यु झाला तेव्हां लता केवळ १३ वर्षांची होती. या कोवळ्या वयापासूनच ती भावंडांचा आधारवड झाली! संघर्षांची मालिका समोर होती, पण त्यांतूनच तिने हे काटेरी मार्गक्रमण केले.

प्रथम प्रसिद्धी मिळाली ती ‘महल'(१९४९) चित्रपटातील ‘आएगा आने वाला’ या गाण्याला! तेव्हा लता वीस वर्षांची होती आणि या चित्रपटाची नायिका मधुबाला होती सोळा वर्षांची. या चित्रपटामुळे या दोघींची कारकीर्द बरोबरच बहरली, एक स्वरसम्राज्ञी अन दुसरी सौंदर्यसम्राज्ञी! गंमत म्हणजे या गाण्याच्या रेकॉर्डप्लेअरवर गायिका म्हणून नाव होते ‘कामिनी’ (तेव्हा रजतपटावर गाणे साकार करणाऱ्या पात्राचे नाव लिहीत असत)! नंतर लतानेच संघर्ष करून रेकॉर्डप्लेअर वर नावच नव्हे तर रॉयल्टी, तसेच गायक गायिका यांना वेगवेगळे फिल्मफेअर पुरस्कार इत्यादी मिळवून त्यांना त्यांचे श्रेय मिळवून दिले! लता आणि सिनेसृष्टीची अमृतगाथा समांतर म्हणायला हरकत नाही. १९४० पासून ते अगदी २०२२ पर्यंत जवळपास ८० वर्षांची असलेली ही सांगीतिक सोबत. तिच्या सोबतचे गायक, गायिका, नायक, नायिका, संगीतकार, गीतकार, तंत्रज्ञ, वादक, दिग्दर्शक, निर्माते असे हजारोंच्यावर लोक तिच्या बरोबर मार्गक्रमण करते झाले, कोणी अर्ध्या वाटेवर सोडून गेलेत. आता तर तीही त्यांच्या सोबत गेली आहे. आता हा स्वरामृताचा वेलू गगनाला भिडलाय!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचं गाणं इतकं ऐकलं तरी असं कां होतं? ‘अगंबाई, अरेच्चा, हे सुंदर गाणे आजवर ऐकले कसे नाही! आई शप्पथ, हे असं कसं मिस झालं!’ मंडळी, ही कथा प्रत्येक रसिकाचीच असावी, इतके हे स्वरभांडार विशाल आहे. आणिक एक वेगळीच गंमत आहे हिच्या जादुई स्वरांत! ऋतूबदलाप्रमाणे आपल्या बदलत्या मूडनुसार आपल्यासाठी लताच्या आवाजाचे पोत बदलल्याचा आपल्याला भास होतो. खरे पाहिले तर एकदा ऐकून हा स्वरानंद आपल्या हृदयात झिरपत नाही असे असावे! बघा ना, आज जर माझा मूड ऑफ आहे, तर या अमुक गाण्यात लताचा आवाज मला जास्तच शोकविव्हल लागलाय असा फील येतो. काय म्हणू या बहुरंगी, बहुढंगी, फुलपाखरी आवाजाच्या कळांना, या स्वरांबद्दल बोलायचे तर संत तुकारामांची रचना आठवली, ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे’! तिला काय माहिती की, तिने आमचे आयुष्य किती अन कसे समृद्ध केले ते! तिच्या आवाजाने समृद्ध झालेल्या ३६ भाषांपैकी कुठली बी भाषा असू द्या, या एकाच आवाजात ती भाषाच धन्य होईल अशी गाणी, एकदम ओरिजिनल लहेजा आणि स्वराघात! लता तू वरून काय घेऊन आलीस अन इथे काय शिकलीस, याचा अचेतन हिशोब करणे म्हणजे तारे मोजण्यापेक्षा दुष्कर. त्यापेक्षा सच्च्या रसिकांनी एक ऍटिट्यूड (वर्तमान संदर्भात नव्हे) ठेवावा, ‘आम खाओ, पेड मत गिनो’. फक्त तिच्या गाण्यावर फिदा व्हायचे, की विषय तिथंच आटोपला!

तिने दयाबुद्धीने कांही प्रांत अगदी तिच्या आवाक्यात होते तरी सोडले, शास्त्रीय संगीत अन नाट्यसंगीत. (यू ट्यूब वर आहेत मोजके)! दत्ता डावजेकर यांनी नमूद केल्याप्रमाणे जिच्या नांवातच लय आणि ताल आहे, जिच्या गाण्याने ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण होतात, जिने ‘आनंदघन’ या नावाने मोजक्याच (चार) चित्रपटांना संगीत देऊन तमाम संगीतकारांवर उपकार केलेत, जिने शास्त्रीय संगीताचे उच्चशिक्षण घेऊन, त्यात प्राविण्य संपादून देखील व्यावसायिकरित्या शास्त्रीय संगीताच्या बैठकी सजवल्या नाहीत (प्रस्थापित शास्त्रीय गायकांनी देखील तिचे याकरता जाहीररीत्या आभार मानलेले आहेत!), तिच्याबद्दल संगीतकार वनराज भाटिया म्हणतात, ’she is composer’s dream!’ कुठल्याही संगीतकाराची गाणी असोत, खेमचंद प्रकाश, नौशाद, अनिल बिस्वास, ग़ुलाम मोहम्मद, सज्जाद हुसैन, मदनमोहन, जमाल सेन यांच्यासारख्या दिग्गजांची कठीण चालींची, सलिलदा किंवा सचिनदांच्या लोकसंगीतावर आधारित असलेली, वसंत देसाई, सी. रामचंद्र, रोशन अन शंकर जयकिशन यांच्या अभिजात संगीताने नटलेली, की आर डी, ए आर रहमान, लक्ष्मी प्यारे, कल्याणजी आनंदजीची आधुनिक गीते असोत, त्या गाण्याला लताचा परीसरुपी स्वरगंधार लाभला की, त्याची झळाळी नवनवीन सुवर्ण उन्मेष घेऊन रसिकांच्या कलेज्याचा ठाव घ्यायची. अतिशय कठीण अन घनगंभीर चाली रचून लताकडून असंख्य रिहर्सल करून घेणारा संगीतकार सज्जाद हुसैन तर म्हणायचा, ‘फक्त लताच माझी गाणी म्हणू शकते!’

ही स्वरवल्लरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलपेक्षा वरचढ! कुठलाही रोग असू देत, हिच्याजवळ गाण्याच्या रूपात औषध हाजिर है! बरे यात ‘औषध मजला नलगे’ चे बहाणे अजिबात चालायचे नाहीत. लहान मुलीचे ‘बच्चे मन के सच्चे’, १६ वर्षांच्या नवयौवनेचे ‘जा जा जा मेरे बचपन’, विवाहितेचे ‘तुम्ही मेरी मंजिल’, समर्पितेचे ‘छुपा लो यूं  दिल में प्यार मेरा’, तर एका रुपगर्वितेचे, ‘प्यार किया तो डरना क्या’, एका मातेचे ‘चंदा है तू’, एका क्लब डांसरचे (आहे मंडळी) ‘आ जाने ना’ एका भक्तिरसाने परिपूर्ण अशा भाविकेचे, ‘अल्ला तेरो नाम’, एका जाज्वल्य राष्ट्राभिमानी स्त्रीचे, ‘ऐ  मेरे वतन के लोगों’! अशी ही किती म्हणून लताच्या मधुमधुरा स्वरमाधुरीची बहुरंगी स्त्रीरूपे आठवावीत? 

क्रमशः…

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “डीजेवाले बाबू … मला अंध नका करू…” – लेखक : डॉ. गणेश भामरे / डॉ. सचिन कासलीवाल ☆ प्रस्तुती – डॉ. प्राप्ती गुणे ☆

डॉ. प्राप्ती गुणे

? मनमंजुषेतून ?

☆ “डीजेवाले बाबू … मला अंध नका करू…” – लेखक : डॉ. गणेश भामरे / डॉ. सचिन कासलीवाल ☆ प्रस्तुती – डॉ. प्राप्ती गुणे ☆

कालच अनंत चतुर्दशी आनंदात पार  पडली आपल्या लाडक्या गणरायाला आपण आनंदात विसर्जित केलं. ढोल ताशा आणि हा … आत्ता सध्या  D  J च्या   ट्रेण्डिंग  गजरात आपण नाचत, थिरकत गणपती बाप्पाला निरोप दिला !

दुसर्‍याच दिवशी मी नेहमीप्रमाणे ओपीडी मध्ये नेत्ररोगाचे रुग्ण पाहू लागलो. थोड्या वेळात एक विशीतला तरुण काल अचानक दिसायला कमी झालं म्हणून आला. प्राथमिक तपासणी करून बघितली तर त्याची नजर खूपच कमी झाली होती.  मग डोळ्याचे pressure घेऊन त्याला नेत्रपटल तपासणीसाठी घेतले.  बघतो तर काय त्याच्या नेत्रपटलावर खूप मोठे रक्त साखळले होते आणि नेत्रपटलावर भाजल्यासारख्या जखमा आढळल्या. 

नेहमीप्रमाणे वाटणारा हा आजार नव्हता याची मला जाणीव झाली. मग फेर हिस्टरी तपासणीत त्याला विचारलं की काही मार लागला होता का?  किंवा तू काही ग्रहण बघितले का? की कुठे वेल्डिंग बघितले? तर यातील काहीच पॉझिटिव्ह नव्हते . खोलवर विचार केल्यावर त्याने सांगितलं की काल मिरवणुकीत नाचलो आणि D J वर लेसर शो बघितला.  

मग मनात पाल चुकचुकली आणि लेसर शोचा लेसर बर्न रेटिना वर असल्याची खात्री पटली. मग रेटिनाचा O C T स्कॅन करून माझं निदान कन्फर्म केलं. पुढील दोन तासात असेच जून दोन रुग्ण आलेत.  त्यांना पण रेटिनावर याच प्रकारचे चित्र दिसले. मग मात्र मी आमच्या नेत्ररोग संघटनेच्या माध्यमातून विचारपूस केली असता अजून दोन हॉस्पिटलला असेच रुग्ण आहेत असे निदर्शनात आले.

बापरे ! म्हणजे ५ च्यावर तरुण एकाच दिवशी DJ लेसर शोचे शिकार झालेले पाहिले. यातील बरेच जण अजून कदाचित रिपोर्ट झालेले नसतील किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्टचे असतील. हा आकडा याहून जास्त प्रमाणात असावा .. नेत्रपटलावर आम्ही या प्रकारचे लेसर बर्न क्वचितच बघितले असावेत. 

हा काहीतरी भलताच प्रकार समोर आला आणि जनजागृतीसाठी हा पत्रप्रपंच केला. मग प्रश्न पडला की, ठराविक लोकांनाच असे का झाले. याचा खोलवर अभ्यास केला आणि कळाले की या green लेसरचे frequency खूप जास्त होती आणि जे युवक त्या लेसर च्या frequency च्या फोकल लेंग्थवर आलेत किंवा त्यांचे नेत्रपटल आले, त्यांनाच हे प्रकार घडले. आपण लहानपणी भिंग घेऊन ज्याप्रमाणे उन्हात कागद पेटवायचो तसाच  प्रकार या लेसरने या तरुणाईवर केला होता.

असल्या लेसर वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. नाहीतर याचे भयंकर परिणाम पुढील नवरात्र आणि दिवाळीत दिसतील आणि कित्येक निष्पाप लोकांची नजर यात जाईल. आपल्याकडच्या भाऊ ,दादा आणि राजकारणी चमकोगिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या DJ लेसरचा इतका वाईट परिणाम सामान्य नागरिकांवर होईल याची यत् किंचित कल्पना पण करवत नाही. 

या सगळ्या तरुणांना आणि तरुणींना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या करियरसाठी किती भयावह असेल?  यातील बरीच मंडळी उच्च शिक्षण घेणारी होती. 

प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि वेळीच हा प्रकार थांबवावा. नाहीतर लातूरच्या अनंत चतुर्दशीच्या भूकंपाप्रमाणे अंधत्वाचा भूकंप आपली वाट बघत आपल्या तरुण पिढीचा घास घेईल.

लेखक : 

डॉक्टर गणेश भामरे (रेटिना स्पेशालिस्ट )

डॉक्टर सचिन कासलीवाल (नेत्ररोग तज्ज्ञ )

 जनहितार्थ : नाशिक नेत्ररोग तज्ञ संघटना ) 

संग्राहिका –  डॉ. प्राप्ती गुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पुण्याचे वैभव महात्मा फुले मंडई…” – ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पुण्याचे वैभव महात्मा फुले मंडई…” – ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुण्याचे वैभव समजली जाणारी ‘ महात्मा फुले मंडई ‘ ही १४२ वर्षे पूर्ण होऊन १४३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. 

इ. स. १८८० साली पुण्याची लोकसंख्या ९०,००० होती.  पुण्यात बंदिस्त जागेत एक मोठी मंडई उभी झाली पाहिजे, म्हणून सन १८८२ साली पुणे नगर पालिकेत एक ठराव झाला.  त्याला महात्मा फुले व चिपळूणकरांनी विरोध केला होता. पण बहुमताच्या जोरावर तो ठराव पास झाला. 

सरदार खासगीवाले यांची बाग-वजा ४ एकर जागा ही ४०,०००रुपयांना खरेदी केली गेली होती  व त्यावेळेचे बांधकाम अभियंते वासुदेव बापूजी कानिटकर यांनी केले होते. या कामासाठी ३ लक्ष रुपये खर्च आला होता. 

या कामासाठीचा  वाहतूक खर्च कमी व्हावा म्हणून पिंपरी चिंचवड येथून सिमेंट, चुना, बेसॉल्ट दगड आणले गेले होते. ह्यावरील खांबांवर ग्रीक पानांची नक्षी आहे. रोमन शैलीमध्ये हे बांधकाम केले गेले. ते अष्टकोनी असून मध्यभागी कळस आहे, जो ८० फूट उंचीचा आहे. 

१ ऑक्टोबर १८८६ रोजी  मुंबईचे गव्हर्नर जनरल रे यांच्या हस्ते या मंडईचे उद्घाटन झाले होते. त्यांच्याच नावावरून या मंडईला तेव्हा “ रे मार्केट “ हे नाव दिले गेले होते. पुढे सन १९३९/४० मध्ये आचार्य अत्रे यांनी तिचे “ महात्मा फुले मंडई “  असे नामकरण केले.

मंडईला ‘ मंडई विद्यापीठ ‘ हे नाव काकासाहेब गाडगीळ यांनी दिले,  कारण इथे खरेदी करायला येणारा असो की व्यवसाय करणारा असो,  कुणीच कधीच व्यवहारात चुकत नाही, अशी तेव्हा या मंडईची ख्याती होती. नंतर बऱ्याच वर्षांनी ही इमारत अपुरी पडायला लागल्याने या मूळ इमारतीच्या शेजारीच आणखी एक मोठी जागा घेऊन तिथेही भाजी बाजार भरायला सुरुवात झाली, ज्याला सुरुवातीला ‘ नवी मंडई ‘ असे म्हटले जात असे. 

या जागेला लागूनच असलेल्या एका प्रशस्त जागेत गेली अनेक वर्षे सार्वजनिक मंडई मंडळाचा गणपती ठेवला जातो. आणि श्री शारदेसह झोपाळ्यावर बसलेली ही मोठी गणेश मूर्ती हे अनेक पुणेकरांचे एक श्रद्धास्थान आहे, जिथे गणेशोत्सवात दर्शनासाठी पुणेकर प्रचंड गर्दी करतात. 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पुत्रसुख…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

🌺 “पुत्रसुख…” लेखक : अज्ञात 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं. आणि सामंतकाका दारापाशी आले. हातात एक गोंडस बाल गणेशाची मूर्ती… कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आत घेतलं. मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली. कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं,

” थांबा जरा ..गणपती मूर्ती आहे….!” त्यानं गाडी थांबवली. लोकांनी मागे वळून मूर्तीकडे पाहिलं.

 ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हात नकळत जोडले गेले.

कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं. डबलबेल दिली. एस.टी.सुरु झाली..! कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला…!

काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते. पण मांडीवर मूर्ती असतांना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी. त्यांची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला, ” राहू दे काका. उतरतांना द्या. एस.टी. थांबवून माझ्या या सीटवर मूर्ती ठेऊ. तेव्हा द्या.”

थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, ” काका एक विचारू? तुमच्या गावात गणेशमूर्ती मिळत असेलच नं? मग दुस-या गावांतून ही घेऊन येणं ; ते ही एस.टी.च्या प्रवासाची दगदग करुन? “

सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, “आमच्या गांवात मिळतात मूर्त्या. पण अशी नाही. ही मूर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? जिवंत वाटते. अगदी लहान बाळच..!”

कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हात जोडले. हलकेच स्पर्शही केला.

काका म्हणाले,  ” आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही. सगळे उपाय करुन थकलो. मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं. माझी पत्नी या गावी पंधरा वर्षापूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मूर्ती तिथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणूकाही… तिचे डोळे भरुन वाहू लागले. तोंडातून नकळत शब्द फुटले  “माझं बाळ…! ” …. हे असं घडल्यापासून. ह्या गावातून मुर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला. हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो “

कंडक्टर हे ऐकून स्तिमीत झाला. थोड्यावेळानं त्यानं विचारलं– ” पण काका तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावात ..”

” ते ही केलं पण… जास्त मूर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट.. आणि असे भाव येतीलच याची शाश्वती नाही “

हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते. एका स्त्रीनं विचारलं, ” काका मग विसर्जित करायचीच नाही मुर्ती ..!”

सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले, ” विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..! आत्ताही दारात वाट पहात बसली असेल…  रांगोळी काय, आंब्याची तोरणं काय..! भाकरतुकडा काय.., दृष्ट काढण्यासाठी ..!! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे. छोटा तांब्या भांडं काय….. विचारु नका.. मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीये . “

यांवर कुणाचे डोळे पाणावले. कुणी स्मित केले. नंतर मौन राहिलं. काकांचं गाव आलं. एका व्यक्तीनं पुढं होऊन मूर्ती हातात घेतली, म्हणाला, ” काका तुम्ही तिकीट काढा. तोपर्यंत धरतो मी..” काहीजण त्या मूर्तीकडे जवळून पहात राहिले. आता लोकांची नजरच बदलली….! सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले 

” दीड तिकिट द्या. एक हाफ आणि एक फुल “*

कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं, ” दीड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? “

काकांनी स्मित केलं, ” दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? “

हे ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले..!

काका म्हणाले, “असे कोड्यात का पडलात बरे? त्याला नमस्कार केलात. त्याला आपला देव मानता.. व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मूर्ती याच भावाने भजतो; पूजतो.. अगदी पूजा केल्यावरही … पण त्याला एकाच प्रेमाची गरज .. आपल्या आलिंगनाची .. द्या दीड तिकिट..!” ..  हे बोलतांना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरनं दीड तिकीट दिलं..!

…. सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी. तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हात जोडले गेलेले ….. अगदी अनाहूतपणे …!!

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मुली असाव्यात!… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

मुली असाव्यात!… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सहजच गप्पांचा, चर्चेचा फड रंगला की बायकांचे किंवा पुरुषांचे एक वाक्य ऐकायला येते, “एखादी मुलगी असावीच बघा. ” मलाही दोन मुलेच आहेत मग कुणीपण म्हणते, “मुलगी एक हवी होती बघा!”पण मी म्हणते का?मुलीला माया असते, अमुक तमुक… म्हातारपणी एखादे विसाव्याचे ठिकाण असावे.. वगैरे. पण खरेच असे असते का? मुली प्रेमळ असतात न मुले नसतात, हा शोध कुणी लावला?(माझी दोन्ही मुले प्रेमळ आहेत आणि आईच्या सेवेसाठी तत्पर असतात)असे कोणतेच विधान सरसकट करता येत नाही. मुली प्रेमळ, मुले कठोर, किंवा मुली सेवा करतात, मुले टाकून देतात.. खरे तर व्यक्ती परत्वे स्वभाव, संस्कार भिन्न असतात. अमुक एक जात, पंथ, धर्म चांगला/वाईट असे काहीच नसते, प्रत्येक जाती, धर्म पंथात वेगवेगळ्या आचार विचार आणि स्वभावाची माणसे असतातच.

तसेच आपल्या अपत्याबाबत देखील असते. मुळात आपल्या म्हातारपणी काठी व्हावीत, आपली सोय व्हावी म्हणून मुले जन्माला घालणे चूक आहे. मनुष्य हा प्राणी आहे आणि तो आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्यासारखाच दुसरा प्राणी किंवा जीव निर्माण करतो. समाज टिकवण्यासाठी एका जिवातून दुसरा जीव तयार होतो. मुलांचे पालन पोषण नीट करून सुसंस्कृत बनवून त्यांना सशक्त सुदृढ बनवणे व एक बलशाली राष्ट्र बनवणे हे प्रत्येक पालकांचे आद्य कर्तव्य आहे. तसेच त्याला त्याच्या कलेने  योग्य ते शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे, स्वावलंबी बनवणे हेही कर्तव्य आहे. हे करत असताना स्वतःही स्वतःसाठी जगत, स्वत:बरोबर कुटुंबाला वेळ देणे, मुलांना वेळ देणे आणि मुलं सज्ञान झाली की आपण आपण वानप्रस्थाश्रम याचा अर्थ स्वतःचे उर्वरित पूर्ण  आयुष्य समाधानात, आनंदात घालवणे ही आजच्या काळातील अतिशय महत्वाचे आहे. पण हे घडताना दिसते अतिशय दुर्मिळ. उलट ‘आम्ही तुला लहानाचे मोठे केले, ‘यावं त्यांव करून पालक सतत पाल्याभोवती भुण भुण लावतात, जेष्ठ झाल्यावर तर अजूनच जास्त.

याच्या विरुद्ध पालक कितीही चांगले वागले तर मुले त्यांना समजून घेण्याच्या मानसिकतेत नसतात आणि अशा पालकांना पण उतारवयात दुःख होते. एकूण मुली आहेत म्हणून आनंदी आनंद आणि मुले म्हणजे दुःखच दुःख असे काहीच नाही. चांगले पालक मिळणे ही जशी भाग्याची गोष्ट असते तशीच मुले चांगली, सद्गुणी निघणे हेही भाग्यावरच अवलंबून आहे असेच चित्र आता सगळीकडे दिसत आहे, कारण भारतीय समाज एका मोठ्या स्थित्यंतराच्या टप्प्यावर आला आहे, यात ग्रामीण, शहरी फरक  राहिला नाही.

परवाच ऐकलेली दोन उदाहरणे सांगते. मुलींनी वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळावा म्हणून आईवडीलांवर केस घातली. वडिलांना मानसिक धक्का बसून अर्धांग झाला. एकुलता एक भाऊ बिचारा खाजगी बसवर चालक म्हणून काम करून कुटुंब चालवत आहे.

दुसरे उदाहरण वडिलांचा वार्धक्याने मृत्यू झालाय. तिन्हीसांज झाली आहे. टिपटीप पाऊस आहे, अंत्ययात्रेला माणसे जमवण्याचा प्रयत्न सुरू आहे, इतक्यात मुलगा दिसत नाही म्हणून शोध घेतला जातो, तासभर शोधूनही तो मिळत नाही(दारू पिऊन कुठल्या कोपऱ्यात पडला होता कोण जाणे!)शेवटी वडिलांवर अंत्यसंस्कार झाले. काय करायची असली मुले-मुली असून?ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

आजकाल किती मुली मोठ्या झाल्या की घरची सर्व कामे करून आईला विश्रांती देतात?मी तर म्हणेन हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतच, उलट शिक्षण चालू आहे तोवर आईच सगळं करते, पुढं नोकरी लागते, लग्न होते मग वर्षभराच्या सर्व बेगमी(चटण्या, उन्हाळी पदार्थ)मुली आईकडूनच करून घेतात. काही मुली राहिलेलं शिक्षण परत माहेरीच राहून पूर्ण करतात आणि आईच सर्व मुलीचे पाहते, घरकाम पाहते. आई आपल्या अपत्यावरील प्रेमाखातर सर्व आनंदाने करते पण मुलीला आपल्या आईबद्दल कणव कधी वाटणार?अशी बरीच उदाहरणे आसपास दिसतात.

सज्ञान झाल्यावर चांगले-वाईट, नैतिक अनैतिक यातला फरक कळण्याची व त्याप्रमाणे आचरण करण्याची व जबाबदारीने वागण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाची असते. पालक ठराविक वयापर्यंतच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात तिथून पुढं आपण त्यांनी दाखवलेल्या चांगल्या मार्गावर चालणे अपेक्षित असते, पण असे होत नाही. आज ढवळलेले सामाजिक वातावरण, गढूळ झालेली माणुसकी, यातून निरक्षीर विवेक जागृत ठेवणे फारच जिकिरीचे झाले आहे. यातून जे तरतात, त्यांची कुटुंबे संतुलित आणि आनंदी राहतात बाकी प्रवाहात गटांगळ्या खातात.

असो, पालकांनीच आता मुलांकडून अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे मुलांवर प्रेम आणि पालन पोषण केलं तर भविष्यात मुलं आपल्यासोबत प्रतिकूल वागली तर दुःख व पश्चाताप होणार नाही. अन्यथा शेक्सपिअर म्हणतोच, ‘माणसाच्या दु:खास तो स्वतः कारणीभूत असतो.’

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रवास… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ प्रवास… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

बस सुटणार, एवढ्यात एक तरूण घाईघाईने बसमध्ये शिरला.

बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती. ती थोपविताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला झोकून दिले.

त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या वृध्दाला अडचण होतेय का? याचा जराही विचार न करता, स्वतःच्या बाजूला आणि त्या वृध्दाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच पिशव्या कोंबल्या.

तो वृध्द अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला.

इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरफडत पहात होते.

साधारण तासभराच्या प्रवासानंतर तो तरूण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला.

तो वृध्द आता थोडा सैल होऊन बसला. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकुतलेल्या चेह-यावर दिसत नव्हता. न राहवून मी त्या वृध्दाशेजारी जाऊन बसले. आणि म्हणाले,

“आजोबा, ” तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचले आणि जाताना साधे आभार मानण्याचेही सौजन्य दाखवले नाही. तुम्ही हे एवढे का सहन केले.. ?”

चालत्या बसमधून खिडकीबाहेर पहात त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिले. चेह-यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले,

” आपला प्रवास किती घडीचा असतो. ? निर्धारित थांबा आला, की तो किंवा मी उतरून जाणारच होतो. आता तो अगोदर उतरून गेला. मग एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला. ? 

जमेल तेवढा सहप्रवास सुखाने, सामंजस्याने करायचा. त्याचा दोघांनाही त्रास होत नाही. !”

आजोबा बोलत राहिले. मी स्तब्ध होऊन शब्द न् शब्द मनात साठवित राहिले…

“  बाळ, जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे. जीवन असतेच दो घडीचे !

जन्माच्या वेळी वाटल्या जाणा-या मिठाईपासून या प्रवासाची सुरूवात होते आणि श्राध्दाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस, हाच जीवनाचा गोडवा.. ! त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण.. ! बाळ, या दोन्ही वेळी आपण स्वत: त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाही. मग मधल्या काळात येणारे कडू-गोड क्षण.. त्याचा सारखाच आनंद घेत जगता आले पाहिजे. !” 

“ आणि अगं अनेक माणसं भेटतात या प्रवासात.. त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न असतात.. त्यातली काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात. त्यात गणगोत, नातलग आले..

काही कसलीही नाती नसताना सहज भेटली तरी ती मनात घर करणारी असतात. आणि कधी जवळचे म्हणणारे साथ सोडतात.. त्यासाठी कारणच हवं, असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळी.., त्यांचा पिंड निराळाच असतो… आपण नेहमी लक्षात ठेवावं, अशी साथ देणारी माणसं कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी कधी साथ देत नाहीत.. ! जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असतं.. ते जेवढं वाट्याला येईल, तेवढं आनंदानं जगून घ्यावं; म्हणजे कोणी सामानाचे असो, की विचारांचे.. ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही !.. आयुष्याच्या या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कला आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते. !”

रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत, तर कधी खिडकीतून मागे पळणा-या झाडांकडे.., खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते.

थोडा वेळ स्तब्धतेत गेला. ते कसल्यातरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे, म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होते.

त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली,

” बघ ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा.. पुढे वय वाढत गेलं, की सुखाच्या बाबतीतही तेच होतं.., वास्तविक दोन्ही तिथंच असतात. फक्त आपण धावत असतो. !

धावण्याची शर्यत जणू. त्यात कधी कधी धरून ठेवावे, असे हात निसटून जातात. लक्षात येतं, तेव्हा उशीर झालेला  असतो.. पण एक मात्र खरं….

 …. व पु एके ठिकाणी लिहितात,

 ” जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून चालत नाही. ती दोघांनाही असावी लागते. कारण “भाळणं ” संपल्यावर उरतं ते “सांभाळणं.. “

…. हे सांभाळणं ज्याला जमलं, त्यालाच ” जीवन जगणं ” कळलं.. !”

असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं, काय माहित.. बसचा शेवटचा थांबा आला. दोघेही खाली उतरलो. दोन पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले.., सावरले. दाटल्या स्वरांत म्हणाले,

…. ” अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत.. !” 

मीही उत्तरादाखल पुटपुटले, ” आजोबा, ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं, असे पाय देखील दुर्लभ झालेत हो.. !”

दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणा-या…. आपापली वाट चालता चालता आकृत्या धूसर होईपर्यंत दोघेही पुनः पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो.

” दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव… “

लेखिका : माहीत नाही…( पण विचार…. विचार करण्यासारखे !) 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं…

साधा सर्दी खोकला झाला,

की आलं, तुळशीचा काढा घ्यायचो,

पोट दुखलं की ओवा चावत जायचो,

ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो,

ना टेस्ट, ना स्पेशालिस्टचं झंझट,

ना हॉस्पिटलच्या एडमिशनमध्ये अडकत होतो…

निरोगी आयुष्य जगत होतो..

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☺️

 

राम राम ला राम राम,

सलाम वालेकुम ला, वालेकुम अस्सलाम,

आणि जय भीम ला जय भीमनेच प्रेमाने उत्तर देत होतो,

ना धर्म कळत होता

ना जात कळत होती 

माणूस म्हणून जगत होतो…

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☺️

 

सकाळी न्याहारीला दूध भाकरी,

दुपारी जेवणात कांदा भाकरी आणि..

रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी पोटभर खात होतो,

हेल्दी ब्रेकफास्टचा मेनू…. लंचचा चोचलेपणा आणि 

डिनरच्या सोफेस्टिकेटेड उपासमारीपेक्षा दिवसभर भरपेट चरत होतो…

साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☺️

 

शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो

रामायणात रंगून जात होतो, ‘चित्रहार’सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो,

ना वेबसिरीजची आतुरता,

ना सासबहुचा लफडा,

ना बातम्यांचा फालतू ताण सहन करत होतो…

खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो…

*साला मी अडाणी होतो तेच बरं होतं… ☺️

 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गणपती बाप्पा मोरया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ गणपती बाप्पा मोरया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

हुश्श! कालचा अनंत चतुर्दशी चा दिवस आटोपला.. सगळया भाविकांचा निरोप देता घेता इतकी दमछाक झाली म्हणून काय सांगू… आणि तो गजर गुंजतोय अजूनही माझ्या कानात…

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या… आजवर कित्येक वर्षे विसर्जनाच्या वेळी तुम्ही मला म्हणता आणि मीही तत्परतेने दरवर्षी न चुकता तुमच्याकडे येतोच येतो… यात तसूभरही बदल झाला नाही… कारण तो होणारच नसतो ना… सगळं कसं यांत्रिकपणे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे ना ही… हां बदल फक्त सण साजरा करण्याच्या पद्धतीत झाला आहे… दर वर्षी मी नित्य चांगल्या गोष्टी देण्यासाठी हिथं मनात योजून येत असतो… पण इथं आल्यावर मला दिसतं कि आधीच सगळ्या  चांगल्या गोष्टींचा फज्जा उडालेला आहे… मग मी नविन काही न देताच निघतो  आणि तुम्ही तुमचं जुनं एकेक सोडून नव नवीन टुकार गोष्टी दाखवता.. तेव्हा माझ्या मनाला कितीतरी क्लेश होतात… अरे मी तो चौसष्ट कला नि चौदा विद्याचां अधिपती ही माझी ख्याती.. पण ऐकेक तुमच्या अंतरीच्या नाना कळा पाहून मलाच म्हणावेसे वाटते कि रे तेथे कर माझे जुळती… दिव्यांची रोषणाई, रंगीबेरंगी सजावट, वाद्यांचा  गजर, लाऊडस्पीकरच्या किंकाळ्या, छमछमत्या छम्मकछल्लूचां   नाचाचा धांगडधिंगा… यालाच खरच  हल्ली गर्दी जमते फार.. हवसे गवसे नि नवसेच फार… भक्तांच्या  अभिरुचीला पैशाचा पाऊस पडे धुंवाधार… आणि माझ्या  पुजाआरती करायच्या वेळी चार टाळकी जमे पर्यंत होतसे  नित्याची मारामार… मी मात्र मखरात बसून अर्धडोळे उन्मलित अवस्थेत पाहत असतो. ओठावर मंदस्मित आणत असतो.. लबाडांची मागण्यांची बाडची बाड भिडभाड न ठेवता  वाढता वाढे होत जातात… बदल्यात मलाही काही  द्यायचं हेच हेतूपुरस्सर विसरून जातात… अशाने होतील  कश्या पूर्ण तुमच्या मनोकामना.. राजाची बिरुदावलीचं लेबल माझ्या माथी मारून तुमचं उखळ पांढरं करून घेतात… तुम्ही बदललात मग मीच मागे का राहू आजकालच्या जमान्यात… मी ही नुसता देखावा करतो तुमचं ऐकून घेतल्यासारखं करतो.. दहा दिवस माझी करमणूक छान होते.. अन जाताना मी आठवतो यावेळेला नवे काय बरं दिसतं होते… बाकी काही असो दहा दिवस तरी मनापासून नसले तरी माझ्या भक्तीचा गुलाल तो उधळता… आपल्या घरातल्या, गल्लीतल्या, गावातल्या माणसांशी हसून खेळून राहता… तेव्हढचं एक बघून माझा उर भरून येतो… आणि केवळ हेच बघण्यासाठी दरवर्षी इथं येण्याचं मनात ठरवून निरोप घेत असतो… बरे वाटतं  तुमचं आपापसातलं त्या दिवसातले प्रेमाचं भरतं पाहून… मला निरोप देताना जड जातयं तुम्हाला हे कळतंय मला… एक मागणं मी ही मागतो तुमच्या जवळ नाही म्हणू नका मला.. जे दहा दिवस प्रेमाने तुम्ही सगळे एकत्र येऊन घालवले माझ्या सहवासात.. ते पुढच्या वर्षीच्या चतुर्थी पर्यंत तसेच ठेवाल का… तर मग दुखाचा कापूर, नैराश्याच्या अगरबत्या पेटवण्याची गरजच तुम्हाला उरणार नाही.. आनंदाचे निरांजन, समाधानाची समई तेवत राहील  अखंडपणे तुमच्या जीवनात.. दोन हस्तक नि एक मस्तक श्रद्धेने मजजवळ  झुकलेले पुरेसे असते मला.. साधी राहणी नि उच्च विचारसरणी पण तुम्ही करतायं ते अगदी उलटं असते उच्च राहणी नि टुकार विचारसरणी… अरे कुठलाच फापट पसाऱ्याचा सोस नको असतो मजला… चिंता करू नका, तरीही मी हो हो नक्की येईन बरं लवकरच पुढच्या वर्षाच्या चतुर्थीला… तो पर्यंत गणपती बाप्पा मोरया…     

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares