मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-३० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग- ३० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

धन्य ते गुरु शिष्याचे नाते..

जोगेश्वरी ते भावे स्कूल माझा आणि ति. नानांचा प्रवास खूप आनंदात चालला होता. माझे वडील भावेस्कूलला खूप मानत होते तन, मन, श्रद्धेनी त्यांनी विद्यादान केलं.

माझे परमपूज्य वडिल ति. स्व. दत्तोपंतस. माजगांवकर हे सुप्रसिद्ध इतिहासकार शिवशाहीर, पद्मभूषण श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे मुलांच्या भावेस्कूलमधले आदरणीय शिक्षक होते. पुण्यभूषण मासिकांत त्यांनी आवर्जून आपल्या सरांचा म्हणजे माझ्या वडिलांचा मानाने उल्लेख केला आहे.

बाबासाहेबांसारखा थोर माणूस आपल्या गुरुंना इतक्या वर्षांनंतर मानवंदना देतो. केवढी ही गुरुनिष्ठा आणि गुरुंवरील श्रद्धा. सारं जग, श्री. बाबासाहेबांपूढे मान देऊन झुकत. जगाची मानवंदना घेणारे हे शिवशाहिर. श्री. माजगावकर सरांचं नुसत नांव ऐकल तरी नम्रतेने त्यांना मानवंदना देतात. प्रत्येक मुलाखतीत आवर्जून सरांचा उल्लेख करायचे. ते म्हणाले, “शिवरायांनी इतिहास घडवला तर माजगावकर सरांनी माझ्या मनात इतिहास जागवला” केवढी ही शालीनता. आज माझे वडील असते तर ते कृतकृत्य झाले असते. बाबासाहेबांनी पण, कुठल्याही कार्यक्रमाला निघतांना पहिला मानाचा मुजरा सर्वप्रथम आपल्या सरांनाच केला असता

शिवाजी राजांची अढळ श्रद्धा आपल्या गुरुंवर श्रीसमर्थ रामदास स्वामींवर होती. तितकीच श्रध्दा या शिष्याची आपल्या गुरुंवर होती. जगापुढे शिवरायांचा आदर्श मांडणारे इतिहासकार शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे आपले श्रेय माननीय सरांनाच देतात. त्यांच्या नम्रतेची, श्रध्देची, गुरुभक्तीची प्रचिती आम्हाला एका प्रसंगानें प्रत्ययास आली.

त्याच असं झालं. शरद जोशी हे बाबासाहेबांचे शालेय मित्र होते. आणि त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे, माझ्या बहिणीची कमलची, जवळची बालमैत्रिण. शरद जोशींची एकसष्टी होती. आणि त्या कार्यक्रमाला बाबासाहेब आले होते. बाबासाहेबांनी आपल्या कर्तबगारीनें, सुस्वभावाने लोकांची मने जिंकून किर्तीचं शिखर गांठलं होत. आणि जनसागरांत मानाच पान पटकावल होत. त्यांना इतका मान होता की, त्यांचा प्रवेश झाला. आणि श्री. बाबासाहेब आले, असं नुसतं म्हणाल्यावरही लोकं जागेवरून उठून उभे राहयचे. तर सुप्रसिद्ध इतिहासकार असे हे माननीय, श्री शरद जोशींच्या ६१ ला आले. त्यांच्या उत्साही चपळ कणखर व्यक्तिमत्वानें, आगमनाने त्या कार्यक्रमाला वेगळीच रंगत चढली. माझी बहिण पण या कार्यक्रमाला हजर होती. सौ. जोशींनी माझ्या बहिणीशी ओळख करून देतांना बाबासाहेबांना सांगितले,

” बरं का बाबासाहेब, ही कमल, माझी बाल मैत्रिण. म्हणजे तुमच्या श्री. माजगांवकर सरांची मुलगी आहे”. हे ऐकताक्षणी, बाबासाहेबांनी काय करावं! ते ताड्कन उठले. आणि कमलच्या समोर आले. तिच्यासमोर उभे राहून त्यांनी तिला मुजरा केला. माझी बहिण गोंधळून गेली. कार्यक्रमाला आलेले सगळेच पाहूणे आश्चर्य चकित होऊन बघायलाच लागले. अवघडलेल्या माझ्या बहिणीकडे बघून ते म्हणाले, “तुमचे वडिल माजगांवकर सर म्हणजे माझे सन्मानीय, आदरणीय गुरु आहेत. दुदैवाने ते आता नाहीत. हा मानाचा मुजरा, सरांची मुलगी म्हणून तुम्हाला करतोय. पण हा त्रिवार मुजरा माझ्या सरांसाठी आहे. आणि तो त्यांना पोहोचलाही असेल. “

– – केवढी ही नम्रता. आणि केवढी ही गुरुभक्ती! ती बघून कमलचे डोळे वडिलांच्या आठवणीने भरून आले.

तर मंडळी असे होते हे गुरुशिष्याचे अलौकिक अढळ नाते. बाबासाहेबांना बघण्याची, भेटण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. पण योग येत नव्हता. म्हणून वाईट वाटत होते. आणि अचानक=अचानक

तो योग जुळून आला. मला कम्मालीचा आनंद झाला. खूप दिवसापासूनची माझी मनांतली इच्छा पूर्ण झाली. फोनवर, “बाबासाहेब, मी माजगावकर सरांची मुलगी बोलतेय ” अशी ओळख सांगून भेटण्याची इच्छा दर्शवली. माजगांवकर सरांच नांव ऐकून, श्री बाबासाहेबांनाही खूपच आनंद झाला. माझे जावई श्री. सुजित सु·जोशी खूप उत्साही आहेत. त्यांच्या ओळखीने हा सुवर्ण योग जुळून आला- ते आम्हांला बाबासाहेबांकडे घेऊन गेले. त्यांच्याबरोबर आमचा फोटो काढला. अतिशय दुर्मिळ आजकाल बघायलाही सापडणार नाही, अशी मोडी लिपीतली, बाबासाहेबांची वळणदार, सुरेख सही आम्हांला मिळाली. मी अगदी भारावून गेले होते. सारखा मनात विचार येत होता. बाबासाहेबांची ऐतिहासिक वास्तू, त्यांची कर्तबगारी, त्यांचा लोकसंग्रह आणि समाजांत मिळवलेला मोठ्ठा मानसन्मान बघायला या पट्टशिष्याचें गुरु ति. माजगांवकर सर माझे वडील आज हवे होते,. आज हवे होते.. हया गुरु शिष्याच्या नात्याचा शोध माझा भाचा सतीशमुळे लागला होता. आज तोही हयात नाही. शेवटी हात जोडून मी मनांत म्हणालें “कालाय तस्मै नमः”

निघतांना बाबासाहेब मला म्हणालें ” सरांचा शालेय जीवनातला फोटो असेल ना तुमच्याकडे? मला तो हवा आहे. मी माझे आत्मवृत्त लिहीतोय. त्याच्या मुखपृष्टावर मला माननीय सरांचा फोटो लावायचा आहे. सुदैवाने कोट टोपी धोतर असा ति. नानांचा फोटो भाच्याकडून चि. हेमंतकडून मला मिळाला. तो बघितल्यावर बाबासाहेब प्रसन्न हसले. सतीश माझा भाचा.. त्याच्यामुळे हया गुरु शिष्य नात्यांचा शोध लागला. आणि चि. सुजित जोशींमुळे मला श्री. बाबासाहेब प्रत्यक्ष भेटले. माझ्याशी प्रेमाने बोलले. तो आनंद, तो क्षण माझ्या आठवणीतल्या शिदोरीतला, अत्यंत मोलाचा,.. अत्यंत मोलाचा.. असा क्षण आहे.

तर मित्र-मैत्रिणींनो असे होते हे गुरुशिष्याचे महान, आदर्श आणि वाखाणण्यासारखं नातं, धन्य ते माझे वडील आणि धन्य ती गुरुभक्ती. श्री. बाबासाहेब तुम्हाला माझा मानाचा, त्रिवार मुजरा.

जय शिवाजी, जय भवानी ||

– क्रमशः भाग ३०

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बिघाड…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “बिघाड…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

फ्रिज बिघडला.

टीव्ही बंद.

वाय-फाय डाऊन.

 

शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं.

 

“आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं! ” – तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता.

 

सहा वेळा प्लग काढून लावला.

टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला.

नेट कनेक्शन गायब.

 

सगळीकडे जणू “No Signal”.

 

तो चिडून म्हणाला,

“हे घर आहे की संकटमोचक केंद्र? दर आठवड्याला काहीतरी बिघडतंय. “

 

त्या आवाजावर ती स्वयंपाकघरातून बाहेर आली.

ओढणी खांद्यावर टाकत, केस मानेवरून बाजूला करत तिने विचारलं,

“काय झालं? “

 

“काय झालं? बघ ना, फ्रिज बंद, टीव्ही बंद, वाय-फाय नाही… म्हणजे मी इथे राहत आहे की तुटक वस्तूंमध्ये? “

 

ती थोडं हसली. त्या हसण्यात थोडा थकवा, थोडा मिश्कीलपणा आणि थोडी चीड लपलेली होती.

ती म्हणाली—

“तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का? “

 

क्षणभर तो गोंधळला.

काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर एका जाणिवेचा प्रकाश पडला.

त्या एका वाक्यानं तो आत कुठे तरी ढवळून निघाला.

 

फ्रिज बंद झाला, म्हणून त्याला गरम पाणी प्यावं लागलं…

टीव्ही बंद झाला, म्हणून क्रिकेटचं स्कोअर समजलं नाही…

नेट गेलं, म्हणून ऑफिसच्या मेल्स थांबल्या…

 

पण ती?

ती अजूनही सकाळी उठून सगळं करत होती.

गरम चहा, पोळीभाजी, मुलांची तयारी, सासूबाईंची औषधं…

सगळं ‘नॉर्मल’ चालू.

 

ती बिघडत नाही? ती थकत नाही?

 

ते वाक्य तिच्या तोंडून खूप सहज आलं, पण त्याचा अर्थ खोल होता.

“तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का? “

 

ते वाक्य त्याच्या काळजात जाऊन बसलं. जिच्यात बिघाड झाला तरी ती स्वतःलाच दुरुस्त करते,

ती कधी ‘डाऊन’ होते का विचारतो आपण?

 

ती तापातही उठते.

 

पाळीच्या दुखण्यातही काम करते.

मनात राग असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवते.

सासूबाई टोचून बोलल्या तरी चूप राहते.

 

कारण हे घर तिचं आहे… ती ‘चालू’ ठेवते.

 

तो क्षण त्याला मागच्या कित्येक वर्षांचं स्मरण करून देऊन गेला.

 

काही वर्षांपूर्वी तो नवीन नोकरीला लागला होता.

तिच्या हातचं डब्यातलं जेवण खाऊन सहकारी चाट पडायचे.

ती लग्नानंतर शहरात आली. नवीन माणसं, नवीन रस्ते, नवीन भाषा… पण एकही तक्रार नाही.

सगळं ती शिकत गेली.

रात्री उशीर झाला की डोळे लाल करून वाट पहायची.

त्याचं हसणं परत यावं म्हणून ती मुलांचं हसवणं, खेळणं, स्वतः थकलेली असूनही करत राहायची.

 

एकदा ती तापात होती… तरी सकाळी उठून स्वयंपाक केला.

तो म्हणाला होता, “आराम कर ना थोडा…”

ती म्हणाली होती, “तू कामावर जातोस, मी घरी राहते… आराम माझ्या वाट्याला नाहीच. ”

 

 

आणि आत्ताच…

 

तो फ्रिज उघडून पाहतो, “कसं जमवायचं आता सगळं? “

 

पण त्याच क्षणी त्याच्या मनात चमकून गेलं—

“माझ्या आयुष्याचं तपमान बिघडत असताना… किती वेळा हिने ‘फ्रिज’सारखं स्थिर राहून सगळं थंड केलंय! ”

 

तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो.

ती पोळ्या लाटत आहे. डोळ्यांत थकवा आहे, पण हात स्थिर आहेत.

 

“कधी बिघडशील गं तू? ” तो हळूच म्हणतो.

 

ती थांबते. थोडा वेळ शांत.

मग म्हणते—

“बिघडले होते… पण तुमच्यासाठी परत चालू केले स्वतःला! “

 

त्याच्या छातीत काहीतरी धडधडतं.

 

दुपारी…

 

तो स्वतः स्वयंपाकघरात जातो.

मुलाला विचारतो, “तुला सॅंडविच खायचंय का? “

 

मुलगा म्हणतो, “पप्पा, तुम्ही बनवाल? “

 

तो म्हणतो, “हो, आई विश्रांती घेत आहे. “

 

ती हसते, पण त्या हसण्यात प्रश्न असतो—

“उद्या काय? पुन्हा मीच चालू? “

 

तो म्हणतो,

“नाही. आता मीही चालू राहीन. “

 

रात्री…

 

ती शांत झोपलेली असते.

तो तिच्या पायाशी चादर घालतो.

लपवून ठेवलेला गुलाब तिच्या उशाशी ठेवतो.

 

आणि स्वतः मोबाईलच्या नोट्समध्ये लिहितो—

“तू चालू होतीस… म्हणून घर चाललं.

पण उद्यापासून आपण दोघं चालू राहू… कारण आता समजलंय—

तू बिघडलीस तर मीही संपलो! “

 

या जगातली सगळी यंत्रं बंद पडल्यावर आपण त्यांच्या मेंटेनन्सकडे लक्ष देतो.

पण जी व्यक्ती रोज चालू आहे – आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी… तिच्या चालू असण्यामागची किंमत ओळखतो का?

तिचा बिघाड टाळायचा असेल, तर अधूनमधून तिला थांबू द्या.

कारण ती जर एक दिवस खरंच “Shutdown” झाली,

तर घर चालणार नाही… फक्त ‘जगणं’ चालू राहील… पण त्यात ‘जीव’ नसेल.

घराच्या गृहिणीचं काम कधीच बंद पडत नाही, कारण ती चालू असते त्या अनंत प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या तारेवर, ज्याला कुणी कधीच ऑफलाईन करू शकत नाही.”

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र-“नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन महाराजांचे आशीर्वाद घेऊन मगच रुजू व्हा. सगळं छान होईल. ” काकू म्हणाल्या.

मीही हेच ठरवलं होतं. काकूंच्या तोंडून जणूकांही गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असं वाटलं आणि मी निश्चिंत झालो!

पण हे वाटतं तेवढं सोपं नसून या नंतर येणारा प्रत्येक क्षण माझी कसोटी पहाणारा ठरणार आहे याची पुसटशीही कल्पना मला नव्हती!)

काकूंचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. बोलाफुलाला गांठ पडावी तसं त्याच संध्याकाळी मला रिलीव्ह व्हावं लागलं. सामानाची बांधाबांध, रात्रीच्या प्रायव्हेट लक्झरी स्लीपिंग कोचचं रिझर्वेशन हे व्याप होतेच.. पण सर्व स्टाफ मेंबर्सच्या आपुलकीच्या सहकार्यामुळे सगळं सुरळीत पार पडलं. अकोला ब्रँचचा चार्ज ज्या परिस्थितीत मला घ्यावा लागणार होता याचा विचार केला तर तिथं काय वाढून ठेवलं असेल याच विचाराने मी एरवी अस्वस्थ झालो असतो. पण आश्चर्य म्हणजे रात्रभर मनात या कशाचंच दडपण नव्हतं. उद्या अकोल्याला पोचल्यानंतर तातडीने चांगल्या लॉजचा शोध घेऊन, सकाळी ब्रॅंचला रिपोर्ट करण्यापूर्वी शेगावला जाणं कसं जमवायचं याचेच विचार मनात होते. मी अकोल्याला बसमधून उतरलो तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. तो गुरुवार असणं हा मला एक शुभशकूनच वाटला. मनानं उभारी धरली तरी आदल्या संपूर्ण दिवसभराची दगदग आणि रात्रभराच्या प्रवासातलं जागरण यामुळे शांत झोप नव्हतीच. सगळं शरीर ठणकत होतं. पण आता झोपून चालणार नव्हतं. मी वेळ न दवडता रिक्षा करून स्टॅंडपासून जवळचंच एक लॉज गाठलं, तेव्हा पहाटेचे सव्वा चार वाजले होते.

“इथून शेगावला पहिली बस कधी आहे? ” चेकइनच्या फॉर्मॅलिटीज सुरू असतानाच मी रिसेप्शनला विचारलं.

“आत्ता पाच वाजता. नंतर साधारण दीड दोन तासांच्या अंतरानं. “

‘आता आराम करायच्या मोहात पडायचं नाही. कांहीही झालं तरी पाचची बस चुकवायची नाही.. ‘ मी स्वतःलाच बजावलं आणि…. ,

“रूमवर गरम चहा पाठवून द्या लगेच आणि गरम पाणी असेलच ना आंघोळीसाठी? ” मी विचारलं.

किमान या दोन साध्या गोष्टी माझ्यासाठी त्या क्षणी तरी अत्यावश्यकच होत्या.

“कॅन्टीन सहाला सुरू होईल साहेब.. आणि गरम पाणी सात नंतर. “

यावर बोलण्यासारखं काही नव्हतंच. नाईलाजाने मी रूम गाठली. पाय धुऊन कपडे बदलले. तातडीनं शेगावच्या बससाठी बाहेर पडणं आवश्यक होतं आणि माझं थकलेलं शरीर तर अंथरुणाला पाठ टेकायला आसुसलेलं होतं! ही बस चुकली तर सगळं वेळापत्रकच विस्कळीत होणार होतं पण त्याला आता नाईलाज होता. कारण आंघोळ न करता शेगावला जाणं योग्य वाटेना. अखेर आता तातडीने शेगावसाठी निघणं शक्य नाही हे मी मनाविरुद्ध स्वीकारलं आणि अंथरुणाला पाठ टेकली. तो एकच क्षण आणि त्यानेच जादूची कांडी फिरवावी तसं झालं! सहजच माझं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं आणि समोर जे पाहिलं त्या दृश्यानेच गारूड केलं. मी भान हरपून पहातच राहिलो! त्या संपूर्ण भिंतीवर गजानन महाराजांचं खूप मोठ्ठं अतिशय जिवंत असं चित्र रंगवलेलं होतं! त्यांच्या मिष्कील हसऱ्या नजरेने ते माझ्याकडेच पहात असल्याचा भास मला झाला न् मी ताडकन् उठून बसलो. घड्याळ पाहिलं. साडेचार वाजून गेले होते. बॅग उचकटून मी घाईघाईने टॉवेल /कपडे घेऊन बाथरूमकडे धावलो. गार पाण्याचे चार तांबे अंगावर घेऊन आंघोळ उरकली. तेवढ्यानंही प्रवासाचा शीण निघून गेल्यासारखं मन प्रसन्न झालं. घाईघाईने कपडे बदलून, सॅक घेऊन बाहेर धावलो. रिसेप्शनजवळ किल्ली दिली आणि गडबडीने बाहेर पडलो. जवळपास रिक्षा दिसत नव्हती आणि रिक्षासाठी थांबायला माझ्याकडे वेळ नव्हता. स्टॅन्ड जवळ आहे हा अंदाज होताच. मी क्षणाचाही विलंब न लावता स्टॅंडच्या दिशेने धाव घेतली तेव्हा पावणेपाच वाजून गेलेले होते. स्टॅण्ड जवळ जाताच त्याक्षणीच्या अनिश्चित परिस्थितीत धीर न सोडता निकराचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून थेट स्टॅंडवर जाऊन चौकशी करून प्लॅटफॉर्म शोधण्यात वेळ न घालवता मी बसेस् बाहेर पडतात तिथून आत जायचा निर्णय घेतला. त्या दिशेने धावत फारतर दोन-चार पावलेही गेलो नसेन तेवढ्यांत समोरून एक बस बाहेर पडताना दिसली. प्रयत्न करूनही अंधारात बस वरचा बोर्ड दिसत नव्हता. पुढे झेपावत हात हलवून मी बस थांबवायचा केविलवाणा प्रयत्न केला. बस थांबली. कंडक्टरने दार उघडलं. बस कुठं जाणाराय याची चौकशी केली. आश्चर्य म्हणजे ती शेगावला जाणारीच बस होती. मी गडबडीने बसमधे चढलो न् पाहिलं तर बस पूर्ण रिकामी होती. बसमधे फक्त कंडक्टर. जणू खास माझ्यासाठीच ती बस सोडलेली असावी तसा मी एकटाच प्रवासी आहे हे लक्षांत येताक्षणी मनाला स्पर्शून गेलेलं अतीव समाधान तोवरच्या धावपळीचा सगळा शीण नाहीसा करणारं होतं! !

आजवरच्या असंख्य प्रवासांमधला तो प्रवास मी कधीच विसरू शकणार नाही. तो प्रवास फक्त शेगावचा नव्हता. कारण मी थेट महाराजांपर्यंत जाऊन पोचल्याचा आभास निर्माण व्हावा असे अनेक अनुभव पुढे अकोल्याच्या माझ्या त्या अल्प वास्तव्यात मला आले. अकोल्यातलं जेमतेम सहा महिन्यांचं माझं वास्तव्य. या दरम्यान दर पौर्णिमेला शेगावला दर्शनाला जाण्याचे योग सहज जुळून येत असत. शेगावहून मुद्दाम आणलेली गजानन महाराजांची पोथी मी याच अल्पवास्तव्यात सर्वप्रथम वाचली, तेव्हा.. ‘ तू स्वतःच ती पोथी एकदा वाच म्हणजे तुझं तुलाच समजेल हे गजानन महाराज कोण ते‌.. ‘ हे माझ्या ताईचे शब्द शब्दश: खरे झाल्याची मनाला स्पर्शून गेलेली अनुभूति मला अनेक अर्थाने समृध्द करणारी होती! माझ्या अंतर्मनातला तो आणि गजानन महाराजांसारख्यांचं अवतारी रूप यांच्यामधलं अद्वैत मला लख्खपणे जाणवलं ते ही पोथी वाचल्यानंतरच!

‘आपल्या घरी चालत आलेला दत्तसेवेचा राजमार्ग सोडून ताई ही पोथी कां वाचते? ‘ या त्यावेळी केवळ अज्ञान आणि अहंकारातून माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर ही पोथी वाचूनच मला मिळालं! किंबहुना माझ्या मनातल्या तेव्हाच्या त्या प्रश्नातली निरर्थकताही मला नेमकी जाणवली. जसा कांही तो प्रश्न मी महाराजांनाच विचारला असल्यासारखं त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर महाराजांनी १९ व्या अध्यायात मला दिलं असल्याचं प्रथम वाचनातच माझ्या लक्षात आलं. या अध्यायात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी आपल्याला भेटायला येणार असल्याचा संकेत गजानन महाराजांना मिळतो तेव्हा गजानन महाराज त्यांच्या सेवेकऱ्याला यांची पूर्वकल्पना देताना म्हणतात, ” अरे बाळा, उदयिक माझा बंधू येतो देख मज साठी भेटण्या, त्याचा आदर करावा l” ती भेट कशी तर फक्त कांही सेकंदांची! ‘एकमेकांसी पहाता, दोघे हसले तत्वता l हर्ष उभयतांच्या चित्ता, झाला होता अनिवार ll ‘ असं नेमक्या शब्दातलं त्यांच्या भेटीचे वर्णन!

ही नजर भेट होताच एकमेकांकडे पाहून स्मितहास्य आणि.. ” बंधो, आम्ही निघतो.. ” असे टेंबे स्वामी महाराजांचे अनुमती मागणारे मोजके शब्द आणि त्यानंतर गजानन महाराजांनी होकारार्थी मान हलवताच त्यांचे निघून जाणे… सगळंच अतर्क्य! श्री गजानन महाराज आणि टेंबे स्वामी महाराज दोघेही समकालीन आणि दोघांचेही नियत कार्य पूर्ण होताच त्यांची झालेली अवतार समाप्ती! या अवतारी पुरूषांच्या अवतारकार्याचे प्रयोजन आणि नियोजन या दोन्हींमागचं गूढ म्हटलं तर अनाकलनीय पण तरीही सहजसोपंसुध्दा! आता हेच पहा ना. श्री. टेंबे स्वामी अतिशय कर्मठ आणि गजानन महाराज अतिशय साधे, सोवळ्या-ओवळ्याचा कसलाच विधिनिषेध न बाळगणारे… आणि तरीही त्या दोघांमधे हे सख्य आणि हे अद्वैत कसं? हाच प्रश्न त्यांच्या सेवेकऱ्याच्या मनात निर्माण झाल्याचे जाणवताच त्या शंकेचे निरसन करताना कर्म, भक्ती आणि योग या परमेश्वरापाशी नेणाऱ्या तीनही वाटांचं गजानन महाराजांनी केलेले नेमकं निरूपण मुळातूनच वाचावं असंच आहे. माझ्या अंतर्मनातल्या ‘ तो’ चं खरं स्वरूप मला लख्खपणे जाणवलं म्हटलं ना ते हे सगळं समजून घेतल्यानंतरच, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं!

“नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन महाराजांचे दर्शन घ्या आणि मगच रूजू व्हा. सगळं छान होईल” असं काकू मला म्हणाल्या होत्या. मीही तेच ठरवलं होतं. म्हणूनच काकूंच्या तोंडून गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असंच मला वाटलं होतं. यातल्या ‘सगळं छान होईल’ म्हणजे नेमकं काय आणि कसं याचा प्रत्यय, कलियुगातला एखादा चमत्कार घडावा तसाच माझ्या अकोल्यातील वास्तव्यात लवकरच मला अगदी अकल्पितपणे येणार होता‌, पण त्याबाबतीत मी स्वत: मात्र तेव्हा अनभिज्ञच होतो! !

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेमाचे सिंचन… ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

अल्प परिचय 

  • सेवानिवृत्त मुख्याध्यापिका.
  • गोरेगाव (पूर्व) मुंबई येथे सन्मित्र मंडळाच्या बैरामजी जीजीभाय प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका.
  • महापौर पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आणि अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित.
  • सध्या बोरिवली (मुंबई) व पुणे येथे वास्तव्य.

? मनमंजुषेतून ?

 ☆ प्रेमाचे सिंचन☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

विक्रांत मोरे (नाव बदललेले) काल माझ्याजवळ आला, अगदी शेजारी येऊन उभा राहिला. मी शिकवण्यात दंग होते. हळूच तो माझा पदर खेचत होता.

“काय रे? काही सांगायचंय का? ” असं विचारल्यावर अगदी अस्पष्ट आवाजात म्हणाला, “बाई, मला बक्षीस मिळालं. ” 

मी हसून मोठ्याने म्हणाले, “अरे वा, छान! कुठल्या स्पर्धेत बक्षीस मिळालं? ” माझ्या वाक्यासरशी सगळा वर्ग त्याच्याकडे बघू लागला, बाईंनी दखल घेतली याचा त्याला खूप आनंद झालेला दिसला.

विक्रांत दोन बहिणीच्या पाठीवरचा. तो अगदी लहान असतानाच आई गेली. घरची अगदी गरिबी. वडील कुठेतरी वॉचमन. मोठी बहीण १४-१५ वर्षांची, तीही नोकरी करत होती. दुसरी बहीण असेल दहा-बारा वर्षांची, परिस्थितीने अकाली गृहिणी केलं होतं बिचारीला.

वर्गात अगदी पहिलीपासून “तो अभ्यास करत नाही” अशी बाईंची तक्रार आणि घरी अभ्यास न करता बहिणींना मारतो ही बहिणींची तक्रार. मला मात्र तो कधीच आगाऊ किंवा आक्रमक वाटला नाही. काही विचारलं की खाली मान घालून जमिनीकडे बघायचा.

गेल्या वर्षी नऊ मुलं चौथीच्या वर्गात नापास झाली होती, त्यात हाही होता. सगळेच एककाच्या मार्कांचे धनी. मी हा वर्ग घ्यायचा म्हणजे ७०चा पट होणार, पण पालकांनी खूप आग्रह केला आणि यावर्षी मी चौथीचा वर्ग घेतला. सर्वप्रथम मी नापास झालेल्यांना सगळ्यांना विश्वासात घेतलं. रोज मनापासून अभ्यास केलात तर तुम्ही नक्कीच चांगल्या मार्काने पास व्हाल या आत्मविश्वासाचं बीज त्यांच्याते पेरलं. मला जमेल तसं त्यांच्याकडे लक्ष देऊ लागले आणि खरं सांगू, मुलांनीही मला निराश केलं नाही. एक ऋजुता सोडता (नाव बदललेलं) सर्व मुलं अत्यंत चांगल्या मार्कांनी पास झाली. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना एवढे छान मार्क मिळाले होते सगळ्यांना.

विक्रांतही खूप चांगल्या मार्कांनी पास झाला होता आणि तेव्हापासून अबोल असणारा विक्रांत माझ्याजवळ बोलू लागला. घाबरत घाबरत बोलणाऱ्या विक्रांतच्या मनावर, आपल्यात काही चांगले नाही आपले कोणी कौतुक करणार नाही हे दडपण असावे हे माझ्या शिक्षकी नजरेने लगेच हेरले आणि मी त्याच्या छोट्या गोष्टींची खूप आत्मीयताने दखल घेऊ लागले.

“अरे वा, विक्रांत, अक्षर छान काढले आहे, ” असं म्हटल्याबरोबर त्याच्या लहान चेहऱ्यावर हास्याचे गुलाब फुलंत. कालच्या प्रसंगाने त्याला खूप आनंद झालेला दिसला.

आज कामाच्या डोंगरात मी बुडून गेले होते. १२:१५ ला ऑफिसच्या दाराशी कोण घुटमळते म्हणून पाहिलं तर विक्रांत. म्हटलं “आत ये रे. ” तो आला. त्याच्या हातात घड्याळाचा खोका होता.

“बाई, हे बघा ते बक्षीस. ” असं म्हणून त्याने खोका माझ्या हातात ठेवला. मी सर्व काम बाजूला सारून त्याचं घड्याळ सर्व शिक्षिकांना दाखवलं, म्हटलं, “बघा ग, माझ्या विक्रांतला बक्षीस मिळालं. छान आहे ना घड्याळ! ” घड्याळ सगळ्यांना दाखवून मी पुन्हा व्यवस्थित त्याच्याकडे दिलं. त्यावेळेचा त्याचा आनंदाने उजळून निघालेला चेहरा अजूनही माझ्या नजरेसमोर तरळतोय.

माझ्या या दोन वाक्यांनी त्याला दिला प्रचंड आत्मविश्वास. त्याच्यातील नकारात्मक भूमिका जाऊन सकारात्मक रोपांची वाढ सुरू झालेली दिसली. नकळत अत्यानंदाने दोन अश्रू बाहेर टपकलेच. खूप खूप आनंद झाला मला. आज माझं रोप सुकत चालले होते परंतु प्रेमाच्या खताने ते पुन्हा मूळ धरू लागले होते, चांगले तरारून वाढीला लागले होते. एका शिक्षिकेला (शिक्षिका कमी पण आईच जास्त) यापेक्षा दुसरं काय हवं?

दिवसभर हा प्रसंग माझ्याभोवती पिंगा घालत होता. आजच्या मुलांना सगळ्यात जास्त गरज आहे ती प्रेमाची पण त्याचाच इतका तुटवडा आहे की विचारू नका. म्हणूनच आम्हा शिक्षकांचे काम जरा वाढलं आहे. शिकवण्याबरोबर थोडे प्रेमाचे खतही या रोपांना आवश्यक आहे, तरच ही रोपं निरोगी आणि टवटवीत होतील.

(हे प्रेम, आपुलकी, मायेचा ओलावा याची गरज आपल्या घरातील सदस्यांना देखील खूप असते. आपण आपल्या कामात मग्न असतो, गर्क असतो, खरंच वेळ नसतो. पण या नात्यांना जगवायचं, फुलवायचं, तर मनापासून घेतलेली दखल आणि प्रेमाच्या शब्दांचं सिंचन या दोन गोष्टींची नितांत गरज आहे.)

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक अजोड आठवण ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ एक अजोड आठवण ☆ श्री जगदीश काबरे ☆

जागतिक कीर्तीचे प्रख्यात शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि फलज्योतिष्याच्या विरोधात ठाम भूमिका घेणारे डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाची बातमी सकाळी कळली आणि त्यांच्याबरोबर घालवलेल्या क्षणांच्या आठवणीने मन उचंबळून आले. त्यांनी त्यांचे गुरु फ्रेड हॉयल यांच्यासोबत ‘स्थिर-स्थिती विश्वाचे’ समर्थन करणारा ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ मांडला होता. तसेच त्यांनी मराठी भाषेत विज्ञान साहित्याचे दालन खुले केले. हे त्यांचे खूपच मोठे काम होते.

मी जेव्हा मराठीतून विज्ञान प्रसार करण्यासाठी लेखक म्हणून लिहिता झालो होतो, त्या सुरुवातीच्या काळात त्यांनी माझ्या ‘कथा ही रक्ताची’ — रक्ताबद्दल वैज्ञानिक माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. तेव्हा त्यांनी मी नवखा असूनही माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याचे आठवते. एवढे मोठे शास्त्रज्ञ असूनही ते एवढ्या मित्रत्वाच्या नात्याने बोलत होते की, मी अचंबित होऊन गेलो. त्यानंतर ‘ज्योतिष शास्त्रावर प्रकाशझोत’ हे माझे पुस्तक मी त्यांना अभिप्रयार्थ पाठवले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रचंड कामाच्या व्यापातूनही तत्परतेने ते पुस्तक वाचून त्यावर त्यांच्या हस्ताक्षरात मला अभिप्राय पाठवला होता. (छायाचित्रात तेच पत्र आहे.) माझ्यासाठी हा अनमोल ठेवा आहे. तो मी मरेपर्यंत जपून ठेवणार आहे. त्यांच्या या प्रोत्साहनपर अभिप्रायामुळेच पुढे मी लिहिता राहिलो.

त्यांच्याबरोबर माझ्या अशा अधून-मधून भेटी होत राहिल्या आणि मी समृद्ध होत गेलो. अशी व्यक्ती आयुष्यातून निघून जाणे म्हणजे आपल्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण होणे असते. पण अर्थातच त्यांच्या साहित्यामुळे ती पोकळी भरून निघेल याची मला खात्री आहे आणि ते कायम आपल्या सोबत असतील.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बासरी” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “बासरी” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.

पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.

त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो. याच ‘ मीपणाच्या ‘ अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.

कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, म्हणजे समस्त गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, ‘आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो. तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? ‘

बासरी हसली आणि म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल. ‘

अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं… बासरी पुढे म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ… ना एखादं वळण… मी पोकळ आहे. त्या पोकळीतूनच माझ्यातला अहंकार गळून पडलाय.

माझ्या अंगावरच्या सहा छिद्रांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.

मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली, तरच मी बोलते.

तो जशी फुंकर मारतो, तशी मी बोलते. ‘ यावर गोपी निरुत्तर झाल्या.

अहंकाररहित शरीर (जीवन)…

हीच श्रीकृष्णाची बासरी होय!

ज्याने आपल्या जीवनातून अहंकार घालवला, ‘मी’पणाला आपल्यापासून दूर केलं, त्याचंच जीवन हे शांतीपूर्ण, सुखमय, आनंदमय व त्यागमय झालंय आहे. आणि तोच मनुष्य अध्यात्माच्या मार्गावर आरूढ झाल्याशिवाय राहत नाही. तो एकनिष्ट श्रीकृष्णभक्ती मध्ये तल्लीन होऊन, नश्वर सुखाचा त्याग करून, खऱ्या सुखाचा, आनंदाचा अनुभव करतो…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भारतीय आधुनिक पंचदर्शने (Indian Renaissance)” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “भारतीय आधुनिक पंचदर्शने (Indian Renaissance)☆ श्री जगदीश काबरे ☆

हा १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि बौद्धिक जागरणाचा काळ होता. याला भारतीय पुनर्जागरण असेही म्हणतात. या काळात भारतात पाश्चात्त्य विचारसरणी आणि भारतीय परंपरांचा समन्वय घडून आला, ज्यामुळे समाज सुधारणा, शिक्षणाचा प्रसार, धार्मिक सुधारणा आणि राष्ट्रीय जागृतीला चालना मिळाली.

या भारतीय ‘पंचदर्शना’ ची प्रमुख वैशिष्ट्ये:

  1. सामाजिक सुधारणा: यात बालविवाह, सतीप्रथा, विधवांच्या दुरवस्थेसारख्या सामाजिक कुरीतींविरुद्ध आवाज उठवला गेला. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथेविरुद्ध लढा दिला आणि १८२९ मध्ये सतीप्रथा बंदी कायदा लागू झाला. ते आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जातात. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवापुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. तर आगरकरांनी विधवांच्या दुरावस्थेचे विदारक सत्य मांडले. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला.
  2. धार्मिक सुधारणा: महात्मा फुले, आगरकर, महर्षी विठ्ठल शिंदे, स्वामी विवेकानंद, काही प्रमाणात सावरकर यांनी परंपरागत हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना आव्हान देण्यात आले. राजा राममोहन रॉय यांनी ब्रह्मो समाज (१८२८) स्थापन करून एकेश्वरवाद आणि तर्कशुद्ध धार्मिक विचारांना प्रोत्साहन दिले. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज (१८७५) स्थापन करून वैदिक धर्माचा पुरस्कार केला आणि मूर्तिपूजा, जातीप्रथा यांना विरोध केला.
  3. शिक्षणाचा प्रसार: याच काळात पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव वाढला, विशेषतः इंग्रजी शिक्षण देणारे राजा राममोहन रॉय यांनी कोलकात्यात हिंदू कॉलेज (१८१७) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न केले.
  4. राष्ट्रीय जागृती: टिळक, गांधी, नेहरू यासारख्या राजकीय धुरीणांनी भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना आणि राष्ट्रीय अस्मिता जागृत केली. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ (१८८२) मधील “वंदे मातरम्” गीताने स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा पाश्चात्त्य जगात – विशेषत: १८९३ च्या शिकागो धर्मसभेत प्रचार केला.
  5. साहित्य आणि पत्रकारिता: या काळात बंगाली, हिंदी, मराठी, तमिळ अशा प्रादेशिक भाषांमध्ये नवीन साहित्य निर्माण झाले. पत्रकारितेने सामाजिक आणि राजकीय जागृतीला चालना दिली. उदा. , राजा राममोहन रॉय यांचे “संवाद कौमुदी” आणि “मिरात-उल-अखबार” यांनी सुरुवातीच्या काळात केलेल्या जागृतीच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करायला हवा.

या काळाने भारतीय समाजाला आधुनिकतेच्या दिशेने नेले आणि स्वातंत्र्यलढ्याचा पाया घातला. जातीप्रथा, अंधश्रद्धा यांना आव्हान देत सामाजिक समानतेचा विचार पुढे आला. शिक्षण आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारतीय समाजात नवीन विचारांचा उदय झाला. हे खरे असले तरी या ‘पंचदर्शना’ चा प्रभाव मुख्यतः शहरी आणि उच्चवर्गीय समाजापुरता मर्यादित राहिला. ग्रामीण भागात त्याचा प्रभाव कमी होता. काही सुधारणांना परंपरावादी समाजाकडून विरोधाला सामोरे जावे लागले. पण भारतीय ‘पंचदर्शना’ नी भारताला सामाजिक, धार्मिक आणि बौद्धिकदृष्ट्या नवीन दिशा दिली, हे मान्यच करावे लागेल. यामुळे भारतीय समाजात आधुनिकता, तर्कशुद्धता आणि राष्ट्रीय जागृतीचा उदय झाला, ज्यामुळे स्वातंत्र्यलढ्याला गती मिळाली.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ …बकुळ फुले… लेखिका : सौ. सरोज चंद्रात्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ …बकुळ फुले… लेखिका : सौ. सरोज चंद्रात्रे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे

* बकुळ फुले *

नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात मुल्हेर म्हणून छोटेसे गाव आहे. तेथे उद्धव महाराजांची समाधी आहे. उद्धव महाराजांच्या निर्वाणीच्या वेळेस सुमारे तीन साडेतीनशे वर्षांपूर्वी त्यांच्या शिष्यांनी तिथे बकुळीचे झाड लावले. अजूनही त्या झाडाला फुले येतात व त्यातून साखरे सारखा पदार्थ निघतो. जणू काही उद्धव महाराजांचा प्रसादच!

मी बागलाण तालुक्यातच राहत असल्यामुळे मुल्हेरला वारंवार जाणे येणे व्हायचे. तेव्हा तो समाधीपुढे उभा असलेला प्रचंड मोठा बकुळीचा वृक्ष माझ्या नेहमी पाहण्यात यायचा. बकुळीच्या फुलांचा मंद सुगंध त्याचे औषधी उपयोग आणि माझे झाडांवरचे प्रेम, त्यामुळे बकुळीचे झाड आपण लावायचे असे मी वारंवार ठरवत होते. कितीतरी वेळा मी त्याच्या बिया गोळा करून आणल्या. हम्पीला गेले होते तेथून देखील बकुळीच्या झाडाच्या बिया आणल्या होत्या. घरी रोप करण्याचा प्रयत्न केला. परंतु जमले नाही.

नर्सरीतूनही बकुळीचे रोप काही आणले गेले नाही आणि बकुळीचे झाड लावायचा माझा मानस मनातच राहून गेला.

मी नव वसाहतीत रहायला आल्यावर रस्त्याच्या कडेला झाडे नाहीत म्हणून एक बहाव्याचे झाड व एक गुलमोहाराचे झाड असे लावायचे ठरवले. त्याप्रमाणे रोपे आणून लावली देखील. रोपांची झाडे झाली. परंतु बहाव्याची म्हणून आणलेली रोपे बहाव्याची नव्हती. दुसऱ्या झाडाची निघाली. ती कोणती झाडे आहेत हे मला ओळखू आले नाही. त्यामुळे मन अगदी खट्टू झाले. परंतु आता झाडे वाढली आहेत तर राहू दे ना असं म्हणून ती तशीच वाढू दिली. गुलमोहाराची लावलेली झाडे व्यवस्थित वाढली होती. पण त्याचा पालापाचोळा खूप पडतो म्हणून कॉलनीतल्या लोकांनी ती काढून टाकली आणि वसंत ऋतूत लाल पिवळ्या रंगाची उधळण आकाशात व्हावी ही माझी इच्छा अर्धवटच राहून गेली.

दोन-तीन दिवसांपूर्वी अचानकच सकाळी सकाळी कॉलनीतून चालत बाहेर गेले. जाताना घाई होती, पण येताना रेंगाळत आले आणि थबकलेच…. माझ्याकडून बहावा म्हणून लावल्या गेलेल्या परंतु मला ओळखू न आलेल्या झाडाखाली बकुळीच्या फुलांचा सडा पडला होता.

बकुळीची फुलं पाहिली आणि मन अगदी पिसे पिसे झाले. अहो आश्चर्यम्, जे बकुळीचे झाड मला लावायचे होते ते मी लावले नव्हते. परंतु माझ्या मनातले झाड मात्र माझ्याही अपरोक्ष परमेश्वराने माझ्या हातूनच माझ्या घराजवळ लावून घेतले होते आणि त्या झाडाने मी कितीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरी आज माझ्यापुढे त्याच्या फुलांचा नजराणा माझ्या ओंजळीत टाकला होता.

पटपट खाली वाकून बकुळीची फुले वेचली. घरी येऊन गजरा केला आणि केसात माळूनही घेतला. मला इतका आनंद झाला होता की ती बकुळीची फुले आणि गजरा मी वारंवार हातात घेऊन वास घेऊन त्याचा सुगंध तन मनात भरून घेत होते.

अजूनही बकुळीच्या फुलांचा हंगाम सुरू आहे. झाडाखाली बकुळीची फुले पडतातच आहेत. त्यामुळे लहान मुलासारखी मी त्या झाडाखाली जाते आणि मनाशी,

‘या बाई या 

बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया ‘

असे म्हणत ती नाजूक सुंदर सुवासिक फुले वेचत राहते अन् मनाशीच म्हणत राहते,

‘गोड गोडूले,

मोतीयाचे दाणे कुणी खाली पाडले? ‘

 *** इति ***

लेखिका : सौ. सरोज चंद्रात्रे 

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ धीरे से आजा रे अखियन में… –  लेखिका : माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ धीरे से आजा रे अखियन में… –  लेखिका : माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

संगीतकार सी. रामचंद्र 

” धीरे से आजा रे अखियन में “….

अनेक वर्षांपूर्वीची पण विसरता न येणारी ही हकीकत आहे — 

“बाळ रडतंय? ग्राईप वॉटर दे त्याला” अशी माझी परिस्थिती झाली होती. संध्याकाळी मी ऑफीस मधून घरी आले तेव्हा मस्त खेळत असलेला माझा तान्हा मुलगा अचानक खूप रडू लागला. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगमध्ये लहान बाळ म्हणून त्याचे लाड होत असत. कौतुक होत असे. संध्याकाळी त्याच्याशी खेळायला आजूबाजूची लहान मुलं येत असत. तसेच बिल्डींग मधल्या शेजार्‍यांची जा – ये त्याच्यासाठी आमच्या घरी असे. त्याचं रडणं थांबवण्यासाठी सगळ्यांनी वेगवेगळे प्रयत्न करून बघितले, उपाय सुचवले. पण ते व्यर्थच. असा इतका, तो कधीच रडत नसे. मी मनातून धास्तावले होते.

या काळात, शिवाजी पार्कला आमच्या शेजारच्या गल्लीत राहणारे सी. रामचंद्र उर्फ अण्णा चितळकर यांच्याशी नुकताच परिचय झाला होता. आमच्या शेजार्‍यांचे ते मित्र होते. नेमके त्याच वेळी ते रात्री गप्पा मारायला म्हणून तिथे आले. आमच्या मजल्यावरच्या चारही ब्लॉक्समधील सगळी मंडळी आमच्या घरात, आणि “बाळ रडतंय” चा गोंधळ बघत ते थोडा वेळ शांतपणे आमच्या दाराच्या चौकाटीत उभे राहिले.

काही मिनिटांनंतर ते पुढे आले आणि मला म्हणाले,

“दे त्याला माझ्याकडे! ” 

साशंक मनाने मी बाळाला त्यांच्या हातात दिलं. त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि किंचित हसून मला म्हणाले, “अगं मुली, त्याचं काही दुखत नाही. त्याला कंटाळा आलाय. तुमची औषधं, तुमच्या नजरेतील भिती, तेच तेच चुटक्या वाजवणं हे सगळं त्याला नको आहे. शांत रहा आता जरा मी बघतो”.

ते सोफावर छान मांडी घालून बसले. बाळाशी हंसले, त्याला मांडीवर घेऊन थोपटू लागले. बाळाचं रडण कमी झालं. आम्ही सगळे चकित होऊन बघत होतो. तोंडावर बोट ठेवून त्यांनी आम्हा सगळ्यांना शांत रहाण्याची खूण केली.

-एखाद मिनीट गेलं असेल…. आणि आमच्या घराच्या भिंती जणू झंकारल्या. खुद्द सी. रामचंद्र उर्फ अण्णा चितळकर माझ्या मुलासाठी लोरी म्हणत होते”.

“धीरेसे आजा रे अंखियन मे, निंदिया आजा रे आजा.. “

आणि बाळ मजेत त्यांचं बोट मुठीत धरुन हसत होतं.

आम्ही सगळे स्तब्ध. एक इतकं मोठं नामवंत, प्रज्ञावंत, कीर्तिवंत असं संगीतातलं व्यक्तिमत्त्व, आमच्या घरात केवळ एक लहान बाळ रडतय् म्हणून ही लोरी, जी लता मंगेशकरांच्या आवाजात देशातल्या घराघरात पोचली आहे. ती म्हणतांना ऐकणं, बघणं हा एक शब्दातीत अनुभव होता. मुख्य म्हणजे ते स्वत: त्या लोरीत इतके रमले होते की गाणं पूर्ण होतांना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि माझा मुलगा त्यांच्या मांडीवर गाढ झोपला होता.

मला योगायोगाने भेटलेल्या प्रतिभावंतांच्या भेटी संबंधीच्या आठवणीतील ही एक मनावर कोरली, नव्हे, गोंदली गेलेली आठवण आहे.

नंतरही ते अधून मधून येत राहिले. गप्पांच्या ओघात कधी ते विविध चाली ऐकवत असत, कधी एखाद्या गाण्यामागची आठवण सांगत असत. ते गप्पात रमून जायचे आणि इतरांनाही मजा आणायचे.

एखादा गायक, कलाकार, लेखक, कवी यांना सर्वसामान्य माणसं त्यांच्यातील प्रतिभेमुळे ओळखत असतात, त्यांच्या कलेवर प्रेम करत असतात. हेच प्रतिभावंत जेव्हा एखाद्या क्षणी स्वत:चं समाजातलं मोठेपण विसरुन, नकळत, सहजगत्या आपला स्वभाव, माणूसपण दाखवतात तेव्हा ती एक स्मृती बनून मनात घर करुन रहाते.

सी. रामचंद्र या नावापुढे एक संगीत रसिक म्हणून तर पूर्वी माझे हात जुळायचेच पण वर दिलेल्या घटनेनंतर त्यांच्या नावाच्या उल्लेखाने एक “आई ” म्हणूनही माझे हात आपोआप जुळतात. कोणत्याही वाद्याशिवाय, कोणतीही साथ नसतांनाचा त्यांचा निखळ आवाज, ती तल्लीनता आणि चेहर्‍यावरचे लहान बाळा प्रतीचे वत्सल भाव आठवतांना मला आजही गहिवरुन येतं.

मंदिरातल्या घंटा नादासारखा त्यांचा आवाज या गाण्याच्या संदर्भात मला आश्वासक वाटला. कोणत्याही अस्वस्थ क्षणी तद्रूप होऊन त्यांनी गायलेले लोरीचे शब्द आठवत रहातात आणि डोळे झोपेच्या आधीन होतात.

“धीरे से आजा रे अँखियन में

निंदिया आजा रे आजा, धीरे से आजा

छोटे से नैनन की 

बगियन में

निन्दिया आजा रे आजा,

धीरे से आजा

लेकर सुहाने सपनों की कलियाँ

आके बसा दे पलकों 

की गलियाँ,

पलकों की छोटी सी 

गलियन में

निन्दिया आजा रे आजा,

धीरे से आजा. “

लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आज अचानक गाठ पडे” – लेखिका : सुश्री प्राची पेंडसे ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “आज अचानक गाठ पडे” – लेखिका : सुश्री प्राची पेंडसे ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

आपल्या आयुष्यात सजीव भेटतातच. तशाच काही निर्जीव गोष्टीही अवचित, अचानक भेटतात. पण निर्जीव तरी कशा म्हणू? कारण अशा वस्तू कधी सुखावतात, अल्लद मोरपीस फिरवतात. काही रडवतात. काही तर आपल्या आठवणींचा अगदी आतला, आतला कप्पा उघडून देतात. पुनःप्रत्ययाचा आनंद देतात.

अशा अचानक, अवचित गाठ पडलेल्या अलक कथा… 

  1. अण्णासाहेब सकाळचे फिरून आले. सूनबाई एप्रिलच्या कडकडीत उन्हात आमची परंपरागत सोन्याची जर असलेली पैठणी दांडीवर ऊन दाखवायला घालत होती.

अण्णासाहेब तिकडून जात असताना दांडीवरच्या पैठणीने त्यांच्या अंगाशी लडिवाळपणे घसट केली. “आलात फिरून, दमला असाल, ” पाठोपाठ बोलण्याचा भास.. गर्रकन अण्णासाहेब 65 वर्ष मागे गेले.. अंगापेक्षा बोंगा मोठा असूनही पैठणी सावरत असलेली कावेरी आठवली. क्षणभर त्या पैठणीला हळूवार कुरवाळत म्हणाले “आज अचानक गाठ पडे. “

सूनबाईच्या नजरेतून सासऱ्यांच्या डोळ्यांत आलेले पाणी सुटले नाही. तिचेही डोळे पाणावले.

2. दिवाळीची साफसफाई चालू होती. माळ्यावरचे सामान खाली आले होते. नको असेल ते सामान काढून टाकायचे, असे ऑडिट चालू होते. एवढ्यात चांदीची मूठ असलेली सामानातली काठी उचलून चार वर्षांचा नातू घोडा घोडा खेळायला लागला. शांताक्का ती काठी पाहून खूप मागे जाऊन पोचल्या. नातवाचे खेळून झाल्यावर ती काठी हातात धरून शांताक्का‌ कितीतरी वेळ नुसत्याच बसून होत्या. कुठूनसा आवाज येत होता, “वापर तू आता, फिरायला जाताना असू दे आधाराला. “

काठीचे निमित्त.. पण एवढ्या वर्षांनी “आज अचानक गाठ पडे” असे वाटून मन भूतकाळात फिरून आले.

3. सव्वा महिन्याचा पणतू मजेत मुठी चोखत मऊशार दुपटयावर राजासारखा पहुडला होता..

मी मात्र….

आई खूप आजारी होती. शेवटचेच आजारपण. भेटायला गेले तेव्हा मला क्षीण आवाजात म्हणाली, “ताई, तुला काय देऊ ग? हातातल्या दोनच बांगडयांपैकी एक तू घेऊन जा,” असे म्हणून काढत होती.

“आई ग, बांगडी नको ग.. तुझी आठवण म्हणून तुझी एक मऊसूत नऊवारी साडी घेऊन जाते.. त्याची छानशी गोधडी शिवून रोज पांघरूण म्हणून वापरेन. तेवढीच तू कायम माझ्या अगदी जवळ असशील ना ग.”

आई गेली, पण होती माझ्या अगदी जवळच. गोधडी थोडी जीर्ण झाली तरी मी वापरत होते. एकदा लेकाने नवीन छान पांघरूण आणले आणि म्हणाला “आता हे वापर आई. ” त्याचे मन मला मोडवले नाही. पण अंथरुणाच्या तळाशी मी गोधडी ठेवून दिली होती. माझ्या आईची आठवण.

नातसुनेला मुलगा झाला. यांच्या माॅडर्न जमान्यात दुपटी शिवायला छान मऊसे काही सापडेनाच. मग मीच माझ्या आईच्या गोधडीची चार दुपटी शिवली..

आत्ता तो गुलाम तिच्यावरच पहुडला आहे.. जणू काही त्याची खापरपणजी त्याला अंगाई म्हणत जोजावत आहे..

मनोमन मी आणि आई बाळाजवळ बसलो होतो.. “आज अचानक गाठ पडे”.

4. मी सोळाच वर्षांची होते.

नुकतीच अकरावीची परीक्षा झाली होती आणि तेव्हाची फॅशन म्हणून आम्ही सगळ्या मैत्रीणींनी मिळून उंच टाचाच्या चपला खरेदी केल्या होत्या.. टाॅक टाॅक करत रुबाबात चालायचे स्वप्नरंजन होते तेव्हाचे.. दोनच महिन्यांत माझे लग्न ठरले(तेव्हाचा काळ). आम्ही दोघे उंचीने जवळपास सारखेच होतो. झाले! टाॅक टाॅक चालायचे स्वप्न पूर्ण झालेच नाही. उंच टाचांच्या चपला बासनात गुंडाळून ठेवल्या. परवाच नातीला त्या सापडल्या..

म्हणाली, “आज्जी तू का नाही वापरल्यास ग? आता घालत जा.”

दोन्ही पायांची कनी Replacement झाली होती. आणि आत्ता त्या टाॅक टाॅक अवचित समोर आल्या. “आज अचानक गाठ पडे”.

5. मोबाईल ची लांब रिंग वाजली. बंगलोरहून मावसभाऊ बोलत होता. लग्न होते त्याच्या लेकाचे. त्यासाठी त्याला आमच्या आईच्या पिढीतील एका नातेवाईकांचा पत्ता हवा होता. खूप जुने असल्यामुळे मोबाईल मध्ये त्यांचा काँटॅक्ट मिळणे अशक्यच होते. म्हणूनच त्याने मला फोन केला होता.. माझ्याजवळ माझ्या आईची डायरी होती. आणि मोबाईलच्या जमान्यातही मी ती वेळोवेळी अपडेट करत होते.

 त्याला हवा होता तो पत्ता मी दिला आणि सहज म्हणून डायरी चाळत होते.

तेव्हा त्या डायरीतून टुपकन दोन जुनी पोस्टकार्डं माझ्या मांडीवर पडली.. माझ्या नमू आणि कुसुम मावशांनी लिहिलेली पत्र होती ती.. काय नव्हते त्या पत्रांमधे? अगदी वरच्या टोकापासून ते थेट पत्त्याच्या लाईनपर्यंत गिचमीड करून मजकूर ठासून भरलेला होता.. ती नुसती गिचमीड नव्हती. तर त्यात ओतप्रोत माया, प्रेम, काळजी भरून वाहात होती.. ओसंडत होती.

आजच्या मोबाईलच्या जमान्यातील इमोजी, खोटे खोटे वरपांगी मेसेजेस, वाढदिवसानिमित्त आणि मेल्या-गेल्यां बद्दल खोटी सहानुभूती.. या पत्रांच्या पार्श्वभूमीवर सगळेच कसे उघडे बोडके पडले होते..

जुना पत्ता शोधता शोधता मला माझ्या जिवाभावाच्या, माझ्यावर निखळ, निस्वार्थी प्रेम आणि माया करणाऱ्या मावशा भेटल्या.. कित्ती तरी वेळ आम्ही बोलत होतो.. “आज अचानक गाठ पडे.. आज अचानक गाठ पडे.”

लेखिका : श्रीमती प्राची पेंडसे

प्रस्तुती : श्रीमती राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares