मराठी साहित्य – विविधा ☆ – कुठे चाललोय आपण?– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – कुठे चाललोय आपण? – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

कुठे चाललोय आपण? काय साध्य करायचंय? विनाशाची सुरुवात तर नसेल ना ही? कलियुग कलियुग म्हणतात ते हेच का? गेल्या आठवड्या भरापासून ज्या बातम्या येतायत त्या वाचून ऐकून मन सुन्न होऊन गेलंय.. रात्रीची झोप उडालीय… घरात लाडो ला वावरताना बघून अजून काळजी वाढतीय… प्रेगन्सी मध्ये अगदी नवस केल्यासारखं मुलगी मागितली होती आज मात्र भीती वाटतीय.. ज्या समाजात स्त्रियांना देवी समजून पूजा केली जाते तिथेच स्त्रियांची होणारी अमानुष, पाशवी, वासनांध विकृतीने किळसवाणी हत्या पाहुन अंगावर शहारा येतोय.. गेल्या आठवड्यात कोलकत्यात घडलेली घटना अजून जिवंत असताना कालच्या बदलापूर येथील घटनेने बधीर व्हायला झालंय… एका मुलीची आई होण किती कठीण आहे ह्याची जाणीव व्हायला लागलीय.. काल बदलापूर घटनेने आतून हादरून गेलीय.. साडेतीन वर्षांची ती बाळी, ती लाडो न पाहता सुद्धा डोळ्यासमोर येतेय.. एक ओळखीचा चेहरा घेऊन…कोणती विकृती आहे ही? वासनांध विकृती पाहून मनाचा थरकाप होतोय… प्रत्येक वेळी मुलींना संस्काराचे धडे देणारा समाज मुलगा वंशाचा दिवा काजळत चालला आहे ह्याकडे लक्ष देत नाहीय का? मुलीनी अमुक कपडे घातले, उत्तान, सेक्सी वाटणारे कपडे घातले, लली लिपस्टिक लावली मग अस होणारच ना ही असली मल्लिनाथी करणारी मंडळी आता कुठल्या बिळात जाऊन बसलीयेत.. शाळेत जाणारी ती चिमुकली युनिफॉर्म मध्ये होती ओ… ना प्रक्षोभक कपडे होते ना सेक्सि हिंट देत होती.. तरीही तिच्यावर अत्याचार झाले एक कळी फुलण्या आधीच कुस्करली गेली पुन्हा एकदा राक्षसी वासनांध मनोवृत्तीची शिकार झाली.. आता ह्यात दोष कोणाचा? दोष फक्त इतकाच तिच्या स्त्री असण्याचा.. तीस बत्तीस तासाची ड्युटी करून थकलेल्या डॉक्टर मुलीवर तिच्याच सोबत काम करणाऱ्या नराधमाने अमानुष बलात्कार केला ज्यातक तिच्या शरीरावर ११४ चावे होते, तिच्या डोळ्यात काचा खुपसल्या गेल्या आणि अजून जे किळसावाणे प्रकार झाले ते तर लिहण्याची ही हिम्मत होत नाहीय माझी.. आणि हे सगळं होत असताना ह्यात स्त्रियांचा ही समावेश होता हे वाचून तर तळ पायाची आग मस्तकात गेलीय… 

कानावर येणाऱ्या हया अशा अनेक घटना पाहून आणि आपल्या ही घरी एक लाडो वाढते आहे हे पाहून मन सुन्न होतंय.. मुलींना फक्त गुड टच बॅड टच समजावून तिच्यावर संस्काराचे ओझे लादून हा प्रश्न सुटेल अस मुळीच वाटतं नाहीय.. साडेतीन वर्षाचे ते लेकरू काय प्रतिकार करणार ओ.. वासनांध झालेल्या राक्षसापुढे तिचा काय निभाव लागणार ओ.. नुसत्या कल्पनेने ही अंगावर शहारा येतोय.. आता काही दिवस हया सगळ्याची खूप चर्चा होईल, मोर्चे निघतील, निषेध होतील, कँडल मार्च निघेल आणि पुन्हा काही दिवसांनी अशाच बातम्या कानावर येतच राहतील.. जोपर्यंत स्त्री आहे तोपर्यंत हे असंच होत राहणार… कोर्टात केसेस वाढत राहणार एकेक अपराधी जेल मध्ये मजेत तीनवेळा मिळणारं फुकटच अन्न खात मजेत जगणारं आणि इकडे जिच्यावर अत्याचार झाला ती झोपेत ही दचकून उठणार तिच्या मनावर आयुष्यभरासाठी असंख्य ओरखडे उठणारं.. आपली न्याय व्यवस्था अशीच हतबल होत राहणार.. आणि तुम्ही आम्ही हे उघड्या डोळ्यांनी पाहत राहणार..

ही सगळी परिस्थिती पाहून मन खचून जातंय.. स्त्रिया कुठेच सुरक्षित नाहीत हे सतत त्रासदायक होतेय.. घरट्यात असूदे, शाळेत असुदे, ट्रेन, बस, रस्ता, ऑफिस कुठे ही जा ही वखवखलेली नजर स्त्रियांचा पाठलाग करतच राहणार.. हया परिस्थितीवर आपण फक्त आणि फक्त उद्विग्न होऊन निषेध करत राहणार का? आपल्या लाडोला कसे वाढवणार आपण.. तीन चार वर्षाच्या मुलीना पेपर स्प्रे आणि कराटे क्लासेस वाचवू शकतात का? ही सगळी परिस्थिती पाहून अस्वथपणा वाढत जातोय मन सुन्न होतेय हे कसे बदलणार की आपण फक्त मुलीनी घातलेल्या कपड्यावर चर्चा करत राहणार.. छे हया अनेक प्रश्नांची उत्तर माझ्याकडे तर नाहीत तुम्हाला सुचत असतील तर सांगा मला ही कारण मी ही एक स्त्री आहे आणि एका लाडोची आई ही… 😭

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तो चिडतो… आणि आता तो चिडत नाही… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ तो चिडतो… आणि आता तो चिडत नाही… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆

“हॅलो, मंगेश का” तासाभरात काकूंचा आलेला तिसरा फोन.

“हो, काकू. बोला”

“अरे, एक सांगायचं राहिलं म्हणून परत फोन केला. तीन-चार रविवार ‘संडे डिश’ आल्या नाहीत. ”

“मी तर पाठवल्यात”

“मला नाही मिळाल्या. बहुतेक व्हाटसपचा प्रॉब्लेम झालाय. आता काय करू”

“घरातल्या दुसऱ्या कोणाचा नंबर सांगा. त्यावर पाठवतो. ”

“नको रे बाबा”

“का”

“लेकाला कळलं तर चिडेल आणि तुला फोन केलेला त्याला आवडणार नाही. ”

“मी अवीशी बोलतो”

“नाही. नको, फोनच्या प्रॉब्लेमविषयी रोज सांगतेय पण माझ्यासाठी कोणाला वेळच नाहीये. सगळे बिझी फक्त मीच रिकामटेकडी आहे आणि त्यात तू जर अवीला काही बोललास तर आमच्या घरात महाभारत होईल. ”

“तसं काही होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. ”

“अवीला सांगण्यापेक्षा तूच फोन दुरुस्त करून दे ना. प्लीज. विनंती समज”

“असं परक्यासारखं का बोलतायं. ”

“म्हातारपण वाईट रे!! माझ्यामुळं सगळ्यांना त्रास होतो. वयामुळे विसरायला होतं. थोडावेळा पूर्वी बोललेलं लक्षात राहत नाही. पुन्हा पुन्हा तेच बोललं जातं”

“आत्ता घरात कोणी आहे का”मी विषय बदलला.

“सगळे बाहेर गेलेत म्हणूनच फोन केला. अवी परत यायच्या आत म्हटलं बोलून घ्यावं. आजकाल फार चिडचीड करतो. मला तर सारखं धारेवर धरलेलं असतं. हे कर, ते कर, असं करू नको, तसं करू नको. हेच चाललेलं असतं. तो घरात असला की फार टेंशन येतं. भीती वाटते. कसं वागावं हेच कळत नाही. ”काकू भावुक झाल्या. मलाही काय बोलावं हे सुचेना म्हणून विषय बदलण्यासाठी म्हणालो “एक उपाय आहे. ”

“अरे वा!! कोणता?”काकूंनी उत्साहानं विचारलं.

“व्हॉटसप डिलिट करून नवीन डाउनलोड करायचं. ”

“असं करता येतं. ”काकू 

“हो, एकदम सोपयं”

“मग तूच दे ना करून”

“त्यासाठी तुमचा फोन लागेल”

“अरे देवा!! मग रे”

“अवीला सांगतो”

“नको, तो चिडेल”

“मग सूनबाई”

“तिच्याविषयी न बोललेलं बरं”

“मग एखादी मैत्रीण, शेजारी, नातेवाईक वगैरे”

“ढीगभर आहेत पण अवीला कळलं तर तो चिडेल. ”

“मग काय करायचं तुम्हीच सांगा. ”

“सॉरी हं!!तुला खूप त्रास देतेय पण काय करू. हा फोन चांगला टाईमपास होता पण आता तो सुद्धा रागावला”

“अवीसारखा!!”माझ्या बोलण्यावर काकू दिलखुलास हसल्या.

“बरं ठेवते. दाराची बेल वाजतेय म्हणजे अवी आला. फोनवर बोलताना पाहिलं तर परत पन्नास प्रश्न विचारेल. ” काकूंनी घाईघाईत फोन कट केला.

 शालिनीकाकू, माझ्या मित्राची आई, वय सत्तरीच्या आसपास. तब्येतीमुळे घराबाहेर पडणं अवघड झालेलं. वेळ घालवण्यासाठी मोबाईल, टीव्ही हाच मोठा आधार. त्यात मोबाईल नीट काम करत नसल्यानं काकू अस्वस्थ.

स्पष्ट बोलल्या नसल्या तरी काकूंच्या वेदनेचा ठणका जाणवला. खूप बेचैन झालो. डोक्यात विचारांचा भुंगा सुरु झाला. कितीतरी वेळ फोनकडचं पाहत नुसताचं बसून होतो.

“काय झालं. असा का बसलायेस. ”बायकोच्या आवजानं भानावर आलो. काकूंविषयी सांगितल्यावर तीसुद्धा अस्वस्थ झाली. “हे नवीनच ऐकायला मिळालं.

“वयस्कर आईला धाकात ठेवायला काहीच कसं वाटत नाही. ”

“त्यांच्याही काही अडचणी असतील आणि फक्त एका बाजूनं विचार करू नकोस. ”

“तुला नक्की काय म्हणायचंयं”

“काकूंचं ऐकून लगेच मित्राला दोष देऊन मोकळा झालास. ”

“वस्तुस्थिती तीच आहे ना. काकू कशाला खोटं सांगतील. ”

“आणि अवीभाऊजी सुद्धा मुद्दाम असं वागत असतील हे वाटत नाही”

“तुला काय माहीत”

“नसेल माहिती पण भाऊजीची सुद्धा काहीतरी बाजू असेल ना. ”

“क्षणभर तू म्हणतेस ते मान्य केलं. काकूंच्या वागण्याचा त्रास होत असेल तरी त्यांच्या वयाचा विचार करता घरातल्यांनी समजून घ्यायला काय हरकत आहे. थोडी अडजेस्टमेंट करावी. ”

“शंभर टक्के मान्य पण एक सांग आजकाल आपण सगळेच एकाच वेळी अनेक फ्रंटवर लढतो. वेगवेगळ्या अडचणींना तोंड देताना वारंवार तडजोडी कराव्या लागतात. इच्छा नसताना मन मारावं लागल्यामुळे चिडचिड होते. ऑफिसमध्ये बोलता येत नाही. मग वड्याचं तेल वांग्यावर निघतं” 

“म्हणजे”

“घरातली लहान मुलं आणि म्हातारी माणसं म्हणजे सॉफ्ट टार्गेट.. म्हणून त्यांच्यावर राग निघतो. त्यातल्या त्यात म्हाताऱ्यांवर जरा जास्तच…”

“खरंय तुझं. यात अवीची सुद्धा काही बाजू असेल याचा विचारच हा केला नव्हता. बरं झालं तुझ्याशी बोललो. कधीही एका बाजूनं विचार करू नये. हा चांगला धडा मिळाला. ”

‘तेच तर सांगायचं होतं. नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा देखील विचार करावा. ”

“मग आता??”

“अवीभाऊजीना फोन कर”

“त्याच्याशी डायरेक्ट बोललो तर काकूंना त्रास होईल. ” 

“त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐक. तुझ्या पद्धतीनं समजावून सांग आणि तसंही भाऊजी काकूंवर चिडतातच फार तर अजून जास्त चिडचिड करतील. ”एवढं बोलून बायको किचनमध्ये गेली आणि मी अवीचा नंबर डायल केला रिंग वाजत होती.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प. पू. सद्गुरू श्रीमहाराज ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

प. पू. सद्गुरू श्रीमहाराज ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

(माझे सद्गुरू गोंदवलेकर महाराज)

शिरसाष्टांग प्रणिपात,

उद्या गुरू पौर्णिमा आहे. त्यामुळे आपले स्मरण मला होणे अगदीच स्वभाविक आहे.

आपले एक प्रसिद्ध वचन आहे. “जेथें नाम, तेथें माझा प्राण। ही सांभाळावी खूण।।” हे वचन माझं तोंडपाठ आहे, परंतु माझी तितकी साधना नसल्याने, मी देहबुद्धीच्या आधीन असल्याने मला या वचनाची अल्पशी अनुभूती देखील नाही. मला गोंदवल्यात यायला आवडते, आपल्या घरचे अन्न (भोजनप्रसाद ) खायला आवडते. आपल्या सहवासात राहायला आवडते. पण तो योग अनेक दिवसांत आला नाही. आज आपली आठवण अनावर झाली, म्हणून हे पत्र लिहीत आहे. हे पत्र प्रातिनिधिक आहे, आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात कमीअधिक प्रमाणात माझ्या सारखीच भावना असेल… !

प्रपंच करताना दिवस कसे पटापट निघून जातात ते कळत देखील नाही. कालच गोंदवल्यात जाऊन आलो असे म्हणता वर्ष कधी होत ते लक्षात देखील येत नाही. आम्ही बेमालूमपणे प्रपंचात गुरफटले जात असतो…..

आपण म्हणता की अनुसंधान ठेवत जा, पण खरं सांगू महाराज, नेमके तेच मला जमतं नाही. सुखाचा प्रसंग आला की मी किती आणि कसा मोठा झालो आहे असे वाटते आणि दुःखाचा प्रसंग आला की मला आपली आठवण येते. आपण मला अनुग्रह देऊन कृपांकित केले आहे, परंतु मला तसे कायम वाटत नाही. माझी देहबुद्धि मला फसवते आणि ती माझ्यावर स्वार होते. सर्व कळलं असं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात काहीच येत नाही. मी नामस्मरण या विषयावर खूप छान चर्चा करतो, चांगलं व्याख्यानही देतो, परंतु माझं नामस्मरण किती होतं, हे आपल्याला माहीत आहेच. जो सर्वज्ञानी आहे, त्यापासून काय लपुन राहणार… ?

मी या पत्रात काय लिहिणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याशी बोलून माझं मन हलकं होतं, म्हणून हा प्रयत्न….. ! आई पुढे चूक मान्य केली, तिची क्षमा मागितली की आई जवळ घेते, मायेने कुरवाळते आणि आपलं बाळ ‘द्वाड’ आहे हे माहीत असूनही म्हणते, बाळ माझं गुणांचं!!! हे मायेचे बोल ऐकण्यासाठी माझे कान व्याकुळ झालेत हो महाराज!! आपण अखिल ब्रह्मांडाच्या माऊली आहात. आपल्या मुलाला जवळ घ्या. मी अनेक वेळा चुकतो, करू नको ते करतो, अनेकांची मने दुखावतो, आपल्याला भूषण होईल असे वागत माही. हे सर्व खरं आहे. पण काय करू महाराज, मला सर्व कळतं पण वळत काहीच नाही हो…… आणि जेव्हां कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते….

श्रीमहाराज, एक करा…. तुम्हीच काहीतरी करा, जेणेकरून मला यातून बाहेर पडता येईल…. प्रपंचाच्या मोहात पडून अधिकाधिक बुडणारा मी, मला फक्त आपला आधार आहे. ज्याला जगाने दूर लोटलं, त्याला आपण मात्र स्विकारले…. आता आपणच माझे मायबाप!! 

प. पू. श्रीसद्गुरुंच्या समोर कसं बोलावं, कोणता विधिनिषेध पाळावा याचं ज्ञान आणि भान मला नाही. आपण माझ्या माऊली आहात आणि आईशी कसेही बोललं तरी ती माऊली लेकराला समजून घेत असते, साऱ्या जगाने अंतर दिलं, तरी आई कधीच लेकराला अंतर देत नाही. आणि याच भावनेने हे पत्र लिहिण्याचे धाडस मी केलं आहे…! 

या पत्रामागील माझा भाव आपण शुद्ध करून समजून घ्यावा आणि मला आपल्या चरणांशी स्थान द्यावे ही प्रार्थना!!!

आपला,

दासचैतन्य.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिक्षक दिनानिमित्त… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ शिक्षक दिनानिमित्त… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

५ सप्टेंबर — शिक्षक दिन ! 

.. हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस! हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो..

मी शिक्षिका म्हणून शाळेत नोकरी केली नसली तरी शिक्षण देण्याचे काम घरात राहून बरेच वर्ष केले. माझे वडील आयुष्यभर शिक्षण खात्यात नोकरी करत होते.. बदलीनिमित्ताने ते महाराष्ट्रभर 

वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले होते. नांदेड जिल्ह्यातील अगदी लहानशा गावात असणाऱ्या सरकारी हायस्कूल वर हेडमास्टर म्हणूनही त्यांनी काम केले होते. ते खरे हाडाचे शिक्षक होते. एखादा विषय शिकवायचा म्हणजे जीव ओतून, अगदी मुळापर्यंत जाऊन शिकवणे!

त्यांचे स्वतःचे इंग्रजी खूप चांगले होते. ते घरी सुद्धा आम्हाला इंग्रजी शिकवत, पाठांतर करून घेत असत. आमच्या अभ्यासाकडे त्यांचे पूर्ण लक्ष होते. नोकरीनिमित्ताने ते मराठवाड्यात गेले आणि आम्ही मुले होस्टेलवर राहून आमचे शिक्षण पूर्ण केले. खरोखरच ते आम्हाला गुरु समान होते.

माझ्या लग्नानंतर मी सासरी आले. माझे मिस्टर मेडिकल ऑफिसर म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत होते. त्यामुळे मला नोकरीची गरज नव्हती आणि पहिली पाच वर्षे दोन मुलांच्या संगोपनात चालली होती. ज्यावेळी आम्ही सांगलीला बदली करून आलो, तेव्हा माझा मोठा मुलगा शाळेत बालवाडीत जाऊ लागला. तेव्हा माझी छोटी मुलगी तीन वर्षाची होती. तिला जवळपास बालवाडी नव्हती. त्याच वर्षी जून मध्ये माझे वडील माझ्याकडे आले होते. मी संसारात गुरफटून बाकी क्षेत्रात निष्क्रिय झाले होते. ते त्यांना बघवत नव्हते. ‘ अगं, तू एवढी शिकलीस, काहीतरी कर.. ‘ आणि त्याला निमित्त मिळाले की, छोटीला जवळ बालवाडी नाही, तेव्हा तू बालवाडी चालू कर’ असे त्यांच्या मनात आले आणि त्या दृष्टीने त्यांनी मला प्रोत्साहन दिले. माझ्यासाठी एक कॅटलॉग आणून दिला. “दुर्वांकुर” बालवाडी मी सुरू केली. प्रथम माझ्या बालवाडीत फक्त पाच मुले होती. वाढत वाढत ही संख्या 25 मुलांपर्यंत वाढली, पण त्यासाठी घर लहान होते. तरीही रोज बारा ते अडीच शाळा आणि ३ वाजेपर्यंत डबा खायला देणे आणि मुलांचे पालक आले की मुलांना सोडणे…. असा कार्यक्रम सुरू झाला होता. श्लोक, गाणी, नाच, गोष्टी सांगणे यात दोन-तीन तास कसे जात हे कळत नसे. खेळायला आमच्या घराचे अंगण पुरेसे होते. या बालवाडीमध्ये माझे मन रमले होते, पण नंतर असे झाले की माझ्या बालवाडीतील मुलांना दुसऱ्या शाळेत पहिलीत प्रवेश घेताना अडचण येऊ लागली, कारण माझी बालवाडी रजिस्टर्डं नव्हती. शेवटी हा बालवाडी प्रयोग मी थांबवला आणि क्लासेस घेण्यास सुरुवात केली.

आता माझी मुले थोडी मोठी झाली होती. त्यामुळे मी गणित आणि इंग्लिश चे क्लास सुरू केले. प्रथम प्रथम मलाच कॉन्फिडन्स वाटत नव्हता की, आपण पाचवी, सहावी पासूनचे विषय शिकवू शकू की नाही! तेव्हा शेवटी गुरु कोण होते तर माझेच वडील! त्यांनी मला प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, ‘तू सुरुवात तर कर, म्हणजे आपोआपच तुला क्लास घेणे कळू लागेल. इकडे सासर घरात ‘आमचे सगळे नीट करून मग उरलेल्या वेळेत तू काय ते कर’ असा दृष्टिकोन असल्याने मलाच थोडी तारेवरची कसरत करावी लागली. सकाळी लवकर उठून गडबडीने सर्व आवरून साडेआठ ते साडेदहा/ अकरा पर्यंतच्या वेळेत क्लास चालू ठेवायचा आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत क्लास घ्यायचा. त्यातही वेगवेगळ्या वर्गाची, शाळेची मुले- मुली ॲडजस्ट करत राहायचे.. ही सगळी कसरत तेव्हा स्वेच्छेने केली. कारण पैसा मिळवणं हा हेतू आणि मोठी गरज नव्हतीच!

माझ्या मुलांबरोबरची मुले- मुली क्लासला येऊ लागली. नकळत मुलांचाही अभ्यास चांगला होऊ लागला. साधारणपणे पंधरा वर्षे मी वेगवेगळ्या वर्गांचे क्लास घेत होते.

त्या नंतर मुलांच्या काॅलेज शिक्षणाच्या काळात मला क्लास बंद करावे लागले. पण या काळात मनाला खूप समाधान मात्र मिळाले. अजूनही जुने विद्यार्थी- विद्यार्थिनी भेटले की” बाई” म्हणून हाक मारतात,

 कधीतरी गुरुदक्षिणेची फुले मोबाईलवर देतात, तेव्हा आनंद वाटतो. ‘अरे, आपल्या नकळत हे विद्यादान थोडे तरी घडले आहे. आणि त्यातूनच काही मुले इंजिनियर, डॉक्टर, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रात काम करत आहेत, हे पाहिले की मन आपोआपच भरून येते! खूप काही घडवले असे नाही, पण आपणही या शिकवण्याच्या ज्ञान यज्ञात छोटासाच स्फुल्लिंग पेटवू शकलो याचे मनाला समाधान मिळते, हे तर खरेच! पण या सगळ्याच्या मुळाशी माझे वडील माझे गुरु होते, या भावनेने मन भरून येते ! 

त्या वडिलांच्या स्मृतीला मी आज वंदन करते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मोक्षपट’ — माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

‘मोक्षपट‘ —  माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे, तो म्हणजे सापशिडीचा खेळ ! या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वरमाऊली यांनी केली आहे, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या या खेळाविषयी जाणून घेऊया.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सापशिडीचे गुपित ‘डेन्मार्क’चे जेकॉब आणि पुणे येथील ज्येष्ठ संशोधक वा. ल. मंजुळ यांनी उलगडले..

संत ज्ञानेश्वर महाराजांनीच सापशिडीचा शोध लावला, याचे स्पष्ट पुरावे मिळत नव्हते; पण ‘डेन्मार्क’ देशातील जेकॉब यांच्या साहाय्याने काही वर्षांपूर्वी हे गुपित उलगडले गेले. ‘इंडियन कल्चरल ट्रॅडिशन’ या संकल्पनेच्या अंतर्गत डेन्मार्क येथील ‘डॅनिश रॉयल सेंटर’चे संचालक डॉ. एरिक सँड यांचे विद्यार्थी असलेल्या जेकॉब यांनी ‘मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ’, हा विषय संशोधनासाठी निवडला. या संशोधनाच्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की, १३ व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो.

जेकॉब यांनी अनेक जुने सापशिडीचे पट त्यांनी मिळवले; परंतु योग्य संदर्भ मिळत नव्हते. संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रातही याविषयी कुठे उल्लेख नव्हता. अखेर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा. ल. मंजुळ यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. मंजुळ यांनी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयामध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि ‘मोक्षपट’ उलगडा गेला.

मनुष्याने आयुष्य कसे जगावे, याचे तत्त्वज्ञान सांगणारा सापशिडी खेळ!

‘मोक्षपट’ हा पहिला सापशिडीपट होता, असे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात जात असत. घरात एकट्या असलेल्या संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांचे मन रमावे; म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ यांनी या खेळाचा शोध लावला, असे सांगितले जाते. लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून चांगले संस्कार मिळावेत, असा, यामागील उद्देश होता.

मोक्षपटाचे दोन्ही पट २० X २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोनी घरे आहेत. पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे आहे. माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे. ‘मोक्षपट’ खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच ६ कवड्यांचा वापर करावा लागतो. ६ कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या, तर दान मिळते. सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत. त्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूंची नावे देण्यात आली आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे. तिला सत्संग, दया, सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत. माणसाने आयुष्य कशा प्रकारे जगावे, याचे तत्त्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे.

जेकॉब यांना डेक्कन महाविद्यालयामध्ये रा. चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन ‘मोक्षपट’ मिळाले.

मोक्षपटाच्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे ? कोणती कवडी पडली की, काय करावे ? याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले आहे. सापशिडी जरी अधुनिक असली, तरी गर्भितार्थ तोच राहील, यात काही शंका नाही.

इंग्रजांनी सापशिडी हा खेळ नेऊन त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नामकरण करणे ‘व्हिज्युअल फॅक्टफाईंडर-हिस्ट्री टाइमलाईन’ या पुस्तकात वर्ष ११९९ ते १२०९ या कालखंडातील जगातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे. ‘उल्लेखनीय गोष्ट’ या शीर्षकाखाली ‘१३ व्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या आणि फासे यांचा उपयोग करून एक खेळ सिद्ध केला. यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार आणि सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार. शिडीच्या साहाय्याने वर चढणे हे चांगले समजले जाई, तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे. हा खेळ ‘सापशिडी’ या नावाने अद्यापही लोकप्रिय आहे’, असा उल्लेख सापडतो.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई ही सर्व भावंडे हा खेळ खेळत असत. पुढे भारतभर या खेळाचा प्रसार झाला. इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला. बुद्धीबळ, ल्युडोप्रमाणे ते हा खेळही इंग्लंडमध्ये घेऊन गेले, असे म्हटले जाते. व्हिक्टोरिया राणीच्या म्हणण्याप्रमाणे त्यात काही पालट करण्यात आले आणि त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नव्याने नामकरण करण्यात आले. सध्या आपण त्यांच्या पद्धतीने सापशिडी खेळत असलो, तरी त्याची मूळ संकल्पना भारतीय आहे आणि संत ज्ञानेश्वरमाऊली हेच या खेळाचे जनक आहेत. ’

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझा श्रावण.. ! ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

माझा श्रावण.. ! ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

आषाढातल्या ‘नभ मेघांनी आक्रमिले ‘ झालं की, श्रावणातलं देखणं रूप घेऊन पाऊस येतो त्याच्या म्हणजे श्रावणांच्या स्वागताची दिव्याच्या अमावस्येला दीप पूजनाने सुरुवात होते अन आषाढाची सांगताही सगळ्यां घराला प्रकाशमान करून मनंही प्रकाशमान झालेलं असतं या प्रकाशातच वाळ्यांचा रुणुझुणु नाद करीत श्रावण नाचत, लाजत, बागडत, असा प्रथम आपल्या मनात घरात रिमझिमत येतो श्रावणंधारांनी!… मनं प्रसन्न होऊन जात. जाई जुईचे झेले सुवासाने दरवळतात आणि तसा तो एकटा येत नाही तर, प्रत्येक दिवसाचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या सणावारांची संगत -पंगत घेऊन या ढगाळ ओल्या दिवसांना उत्साहाची रंगत देत असतो. मग सुरू होतो ऊन -पावसाचा खेळ लप्पा छप्पीच ती जणू ! 

 — हळदुल्या उन्हाच्या या 

पावसात येरझारा |..

 ऊन पावसाचा खेळ 

असा श्रावण साजरा |..

या खेळातच आजही मंगळागौरीचे रंगलेले खेळ, दारातल्या निंबोणीला टांगलेल्या दोरखंडाच्या झोक्यांवर मैत्रिणींबरोबर घेतलेले झोके – मनाचा झुला उंच उंच नेतात. नागपंचमीला माईच्या म्हणजे आईच्या हातची, गरम-गरम पुरणाची दिंडी, वर घरी कढवलेल्या तुपाची धार, जेवताना आम्ही भावंडांनी लावलेली जास्तीत जास्त दिंडी खाण्याची लावलेली पैज, मेहंदीने रंगलेले हात, मोरपंखी रंगाच्या सोनेरी वरखाच्या बांगड्यांची किणकिण, नवकोर जरीच परकर पोलक, अन् नंतर साडी, हाताने बनवलेले गोविंद विडे, रात्री जागून माई बरोबर केलेल्या केवड्याच्या वेण्यां केसात माळल्यावर घरभर पसरलेला केवड्याचा सुगंधी दरवळ, नागपंचमीचे गाणे म्हणत धरलेला फेर, फुगडी, झिम्मा असे मनसोक्त खेळलेले खेळ ! 

माझ्या माहेरी वालचंदनगरला फार मोठी बाग म्हणजे फुलझाडे दारात लावलेली नव्हती. रंगीबेरंगी तेरडा, आघाडा, दुर्वा, गणेश वेल, जाई ही मात्र श्रावणांत असायची. निळ्या, पांढऱ्या गोकर्णाचे वेल, प्राजक्त अंगणात होता. श्रावणी सोमवारी श्री महादेवाला लक्ष-फुले वाहण्यासाठी मग लवकर उठून फुलं वेचायची आणि सगळ्या भावंडांनी आपापल्या भांड्यातला फुलांचा वाटा मोजून माईला द्यायचा. मग बाकीच्या फुलांचे हार, गजरे करायचे. थोडी फुले शेजारी द्यायची आणि त्यांच्याकडून कर्दळीची, सोनचाफ्याची फुलं आणायची. श्रावणांत उपवासाची पण एक मालिकाच असते. सोमवारचा शंकराचा, शुक्रवारचा जिवतीचा उपवास आम्ही माईबरोबर सगळेच करायचो. दादांबरोबर शनिवार आणि गुरुवार. ! हे उपास तसे आमचे जेवण करून फक्त खिचडी, भगर, शेंगादाण्याची आमटी आवडते म्हणून खाण्यासाठीच बरेच वेळा असायचे. वालचंदनगरला गोकुळाष्टमीला देवळात श्रीकृष्ण जन्म साजरा व्हायचा. भजन, कीर्तन, प्रसाद असायचा. तसं तर श्रावणात रोज कुठल्या ना कुठल्या गल्लीमध्ये भजन कीर्तन असायचं. पहायला ऐकायला आम्हाला आवडायचं. देवळाच्या प्रांगणात दहीहंडी व्हायची.

सकाळी सकाळी पत्री गोळा करून आणताना मैत्रिणींचा ग्रुप असायचा. शाळेत जाण्यापूर्वी हे एक महत्त्वाचं काम असायचं. नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, असे एकामागून एक येणारे सण खाण्याची अन् श्रावणांची रंगत वाढवायचे.

– डोंगरावर वसलेलं शिखर शिंगणापूर हे माझं माहेरचं मूळगाव. तेथील महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे. माझी आत्या शिंगणापूरला असायची. एकदा नागपंचमीला मी तिथे होते. डोंगर माळावर असंख्य वारुळे आहेत. तिथे पूजेला घरातील स्त्रिया व मैत्रिणींबरोबर मी गेले होते. नागचौकिला म्हणजे नागोबाच्या उपवासाच्या दिवशी तिथे गिरीला जाण्याची पद्धत आहे. म्हणजे-महादेवाच्या डोंगराला सबंध प्रदक्षिणा घालून कडे कपारीत असलेल्या शिवपार्वतीच्या पिंडींच- शाळुंकांचं दर्शन घेतलं होतं.. तिथून निघालेल्या झऱ्यासारख्या झुळूझुळू वाहणाऱ्या भागीरथीचं दर्शन घेतलं होतं. तिथेच बसून फराळ केला होता. उपवासाच्या फराळाची ती अंगतपंगत मस्त जमली होती.

या गिरी भ्रमणाचा रस्ता म्हणजे एक खडतर मार्ग आहे. तरी बरोबरीच्या मैत्रिणी, काही बायका, मुले यांच्यामुळे, शंकर पार्वती, राम सीता यांची गाणी म्हणत पायाखालची डोंगरवाट ऊनं उताराला लागल्यावर संपली. पाय दुखतात हे जाणवलेच नाही. श्रावणांतला तो एक खूप सुंदर दिवस किंवा योग पुन्हा आला नाही याचे मात्र वाईट वाटते. अन् – – आता तर तो दिवस स्वप्नवत वाटतो. नातवंडांना सांगायला ही छानशी गोष्ट आहे एवढंच !

असा – – आठवांच्या शिंपल्यात..

 झुले माहेरचा झुला..

 त्या आनंद क्षणांचा..

 असे श्रावणं आगळा||

श्रावण म्हटलं की श्री सत्यनारायण पूजा, फुले, पत्री, दूर्वा, बेल अन् सुगंधी केवड्याशी नकळत छानसे बंध जुळून गेलेले आहेत. आज कुंडीतली थोडीशी फुले असली तरी फुलपुडा पत्री घेताना आठवते, लग्नानंतर दौंडला आमच्या रेल्वे कॉर्टरच्या प्रशस्त अंगणात आम्ही दोघांनी दारासमोर फुलवलेली बाग ! 

जाई, जुई, कृष्ण कमळाचे वेल विविध रंगी तेरडा आणि विविध रंगांची गंधांची फुलंझाडे ही सगळी हिरवाई श्रावणांत अगदी फुलून यायची. मग मंगळागौर, सत्यनारायण पूजेला दोन ओंजळी भरून फुलं, पत्री कर्दळीचे खुंट, शेजारीपाजारी देताना एक आगळाच आनंद असायचा. दारी फुललेल्या फुलांचे भरगच्च गजरे, लांब सडक केसांच्या दोन वेण्यांवर माळून, फुलराणीच्या दिमाखात मिरवणारे आमची सोनुली लेक.. !

असा माझ्या मनातला श्रावण पिंगा घालू लागला की, आठवांच्या सरीवर सरी डोळ्यांतल्या श्रावणसरीं बरोबर गालांवर रिमझिमतात.

 -गावाकडचा रानातला श्रावण तर खूप विलोभनीय. सोनेरी किरणांनी चमचमणारी हिरवाई, पावसाच्या सरींची नादबद्ध रिमझिम, निसर्गाने आभाळभर कोरलेलं इंद्रधनुष्य, आनंदाने कलकलाट करत येणारी सूर्याची किरणे, पाऊस अंगावर घेत स्वैरपणे उडणारी पाखरं …. ही सगळी अपूर्वाई रम्य काव्यमयच. ! दिवसभर रानात कष्ट करून दमलेल्या बायका रात्रीच्या वेळी नागोबाची, राम सीतेची गाणी म्हणून खूप छान फेर धरतात, उखाणे घेतात. ते पाहताना ऐकताना व अनुभवतांना मला आमच्या गावचा निसर्गाच्या सान्निध्यातला श्रावणही मनाला खूप आनंद देऊन जायचा.

आपलं वयं वाढत जातं तसं पावसात भिजणं आपण कमी करतो. तरी श्रावणातल्या रेशीमधारात, एक तरी गिरकी घ्यावी… वयाबरोबर आपल्या वाढलेल्या मनाला पुन्हा टवटवीत करण्यासाठी… जगण्यातला आनंद पुन्हा पुन्हा घेण्यासाठी…

अशा माझ्या श्रावणांत…

 चाफा सुगंध उधळे..

 मोर फुलवी पिसारा 

 ओल्या श्रावणाचा झुले 

 माझ्या मनी फुलोरा.. ! 

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

डोळे

काही गोष्टी सहजच घडतात पण बालपण सरलं तरी ती आठवण आणि त्यातली गंमत मात्र जात नाही. कधी विषय निघाला आणि पुन्हा ती आठवण सहजपणे मनाच्या कोपऱ्यातून वाट काढत वर आली की नकळत हसू फुटतेच.

आमच्या पप्पांच्या व्यक्तिमत्वातली ठळक आणि आकर्षक बाब म्हणजे त्यांचे तेजस्वी, मोठे, पाणीदार डोळे. आम्हा पाचही बहिणींचे काहीसे मोठे डोळे म्हणजे पप्पांकडून आलेला वारसाच असे म्हणायला हरकत नाही.

तर त्या डोळ्यांचीच गोष्ट आज मला लिहिता लिहिता आठवली. गल्ली मधला आमचा सवंगड्यांचा चमू तसा फारच विस्तारित होता आणि कळत नकळत वयाच्या थोड्याफार फरकांमुळे असेल पण वेगवेगळे समूह सहजपणे बनले गेले होते. लहान गट, मध्यम गट, मोठा गट अशा प्रकारचे. गटागटातले खेळही वेगळे असायचे. एक मात्र होतं की हे ‘मुलींचे खेळ” हे “मुलांचे खेळ’ असा फरक नाही केला जायचा. विटी दांडू, गोट्या, पतंग उडवणे, हुतुतु (कबड्डी), क्रिकेट या खेळातही मुलींचा तितकाच दांडगा सहभाग असायचा. लहान गटातल्या मुलांचा मोठ्या गटातल्या मुलांशी खेळण्याचा खूपच हट्ट असायचा आणि ती पण कुणाकुणाची भावंडे असायची, त्यामुळे त्यांना खेळायला घ्यावंच लागायचं पण तत्पूर्वी त्यांना एक लेबल मिळायचं कच्चा लिंबू आणि या कच्च्या लिंबाला मात्र बऱ्याच सवलती असायच्या.

खेळातल्या नियमांची माफी असायची पण माझी धाकटी बहीण छुंदा हिला मात्र ‘कच्चा लिंबू” म्हटलेलं अजिबात आवडायचं नाही. तिला तो ‘रडीचा डाव” वाटायचा. ‘रडीचा डाव खडी’ वगैरे तिला कोणी बोललं की तिला फारच राग यायचा. शिवाय तिचे स्वतःचेच तिने ठरवलेले नाही रे ही बरेच असायचे. ती नेहमीच काहीशी शिष्ट, भिडस्त आणि ‘मला नाही आवडत हे’ या पठडीतली होती पण गल्लीतल्या मोरया आणि शेखरशी तिचे मस्त जुळायचे. हे तिघेही तसे बरोबरीचेच होते आणि म्हणून असेल पण छुंदा, मोरया आणि शेखर यांची मात्र घट्ट मैत्री होती आणि या मैत्रीतली आणखी एक गंमत म्हणजे छुंदाला लहानपणापासून मुलांसारखे शर्ट— पॅन्ट घालायला आवडायचे आणि माझी आई, कधी आजीही तिच्यासाठी अगदी हौसेने तिच्या मापाचे शर्ट— पॅन्ट घरीच शिवत. त्यावेळी रेडीमेड कपड्यांची दुकाने फारशी नव्हती. कपडे शिवून देणारे शिंपी असायचे पण आमचे गणवेशापासून, रोजचे, घरातले, बाहेरचे सगळेच कपडे आई अतिशय सुंदर शिवायची.

तर विषय असा होता की शेखर, मोरया आणि ही मुलांच्या वेषातली बॉयकट असलेली मुलगी छुंदा. मस्त त्रिकूट. ते नेहमी तिघंच खेळायचे. खेळ नसला तर आमच्या घराच्या लाकडी जिन्यावर बसून गप्पा मारायचे. मोरया जरासा गोंडस आणि दांडगट होता. शेखर तसा मवाळ होता पण नैसर्गिकपणे असेल कदाचित ती दोघं छुंदाचं मात्र ऐकायचे. तिला त्यांनी कधी दुखवलं नाही. भांडणं झाली तरी परत दोघेही तिला हाक मारून खेळायला घेऊन जायचे.

आज हे लिहीत असतानाही मला ती एकाच उंचीची, एकाच वयाची, निरागस तीन मुलं जशीच्या तशी दिसत आहेत. खरं सांगू गद्र्यांचा नवसाचा मोरया, मोहिलेंचा शेखर… गद्रे, मोहिले आमचे टेनंट्स, त्यांच्याशी असलेली स्वाभाविक बनती बिघडती नाती पण या साऱ्यांचा छुंदा— मोरया— शेखर यांच्या मैत्रीवर काहीच परिणाम कधीच झाला नाही. बाल्य किती निष्पाप असते ! छुंदा त्यांच्या घरातही सगळ्यांची फार आवडती होती.

सर्वसाधारणपणे आम्ही सारीच मुलं गल्लीतच खेळायचो. गल्लीच्या बाहेर खेळायला जायची फारशी वेळ यायचीच नाही आणि जायचंच असलं तर घरून परवानगी घेतल्याशिवाय तर नाहीच. शिवाय संध्याकाळचं दिवेलागणीच्या वेळेचं शुभंकरोति, परवचा, गृहपाठ हे कधी चुकायचं नाही पण त्या दिवशी खेळता खेळता.. मला वाटतं मुल्हेरकरांच्या दिलीपच्या लक्षात आलं की हे त्रिकूट कुठे दिसत नाही.

गेलं कुठे ?

घराघरात, पायऱ्या पायऱ्यांवर, जिन्यात, सगळीकडे शोधाशोध झाली. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. एव्हाना खात्री पटली “हे तिघे हरवले. ”

यांना स्वतःची नावं, घराचा पत्ता तरी सांगता येईल का ?

कुठे गेले असतील ?

तसं त्यावेळेस ठाणे एक लहानसं गावच होतं आणि हे गावही अनेक गल्ल्यागल्ल्यातूनच वसलेलं होतं. कुणीतरी म्हणालं, “ठाण्यात मुलं पळवण्याची टोळी आलेली आहे. ”

बापरे !

आई, पप्पा, जीजी आणि आम्ही सारेच पार हादरून गेलो.

संध्याकाळ होत आली. घरोघरी दिवे लागले. तोंडचं पाणी पळालं तरी या तिघांचा पत्ता नाही. शोध मोहीमही असफल ठरली. आता शेवटचा मार्ग— पोलीस चौकी. मागच्या गल्लीतली, त्या पलीकडची, इकडची, तिकडची बरीच माणसं गोळा झाली.

मुलं हरवली.

कुणी म्हणालं, ”पण अशी कशी हरवली ?”

दिलीप तापट. आधीच बेचैन झालेला. तो ताडकन म्हणाला, “कशी हरवली माहीत असतं तर सापडली नसती का ? काय विचारता काका तुम्ही…?”

आणि हा सगळा गोंधळ चालू असताना एकाएकी त्या लहानशा गल्लीत पांढरी, मोठी, अँम्बॅसॅडर गाडी हाॅर्न वाजवत शिरली. घोळक्यापाशी थांबली आणि गाडीतून ठाण्यातील मान्यवर आणि प्रसिद्ध समाजसेविका मा. विमल रांगणेकर आणि त्यांच्या समवेत ही तीन मुलं उतरली. विस्कटलेली, भेदरलेली, रडून रडून डोळे सुजलेली, प्रचंड भ्यायलेली… छुंदाने तर धावत जाऊन जीजीला मिठी मारली. आता त्या मुलांच्या मनात भीती होती.. घरच्यांचा मार बसणार की काय याची.

विमलताई म्हणजे प्रसन्न व्यक्तीमत्व. उंच, गोऱ्या, मोहक शांत चर्या. सुप्रसिद्ध क्रिकेटर खंडू रांगणेकर यांच्या त्या पत्नी. यांना कुठे सापडली ही मुलं आणि या स्वतः मुलांना घेऊन आल्या? घंटाळी रोडवरच्या कोपऱ्यावर खंडू रांगणेकरांचा प्रशस्त बंगला होता. आजही आहे. ही तिघं मुलं गप्पांच्या नादात चालता चालता रस्ता चुकले असावेत. रांगणेकरांच्या बंगल्यासमोर कोपऱ्यात बावरलेल्या, रडवेल्या स्थितीतल्या या मुलांना विमलताईंनी पाहिले आणि त्यांनी चौकशी केली.

त्या सांगत होत्या, ”या मुलांना काहीही धड सांगता येत नव्हतं. नावं सांगितली. तीही पूर्ण नाही. कुठे राहतात, घराचा पत्ता त्यांना काहीही सांगता येत नव्हतं. खूप घाबरलेली होती म्हणूनही असेल. मी निरखत होते या मुलांना आणि त्यापैकी एकाच्या डोळ्यात मला ओळखीची चमक दिसली. मनात म्हटलं हे तर ढग्यांचे डोळे पण ढग्यांना तर मुलगा नाही. तरी मी याला विचारलं, ‘तू ढगे का ?’

हा म्हणाला, ”हो”

“तूच ढग्यांचा मुलगा आहेस का ? पण… ”तेव्हा तडफदार उत्तर आलं,

“नाही. मी मुलगी आहे. ”

मग सारा उलगडा झाला.

खंडू रांगणेकर आणि पप्पा दोस्तच होते. त्यांना आमचं घर माहीतच होतं.

हरवलेली मुलं सापडली.

तर असा हा गमतीदार किस्सा.

आजही, वेळप्रसंगी गल्लीतली ती माणसं कशी आपुलकीनं जोडलेली होती याची जाणीव झाली की मन भरून येतं. आता जग बदललं.

पण खरी ही गोष्ट डोळ्यांची.

गोष्ट मोठ्या डोळ्यांची. आयुष्यभर पपांनी आम्हाला स्वतःचे संरक्षण स्वतःच कसे समर्थपणे करावे याचे भरपूर धडे दिले पण या पप्पांसारख्याच असलेल्या डोळ्यांमुळे माझ्या धाकट्या, लाडक्या बहिणीचे असे रक्षण झाले, याला काय म्हणावे ?

आज हे आठवत असताना सहज ओठातून ओळी येतात..

या डोळ्यांची दोन पाखरे

फिरतील तुमच्या भवती

पाठलागही सदैव करतील

असा कुठेही जगती…

वंश, कुल, जात, गोत्र, नाव याची परंपरा भले तुटली असेल पण आम्हा बहिणींच्या परिवारात या डोळ्यांची परंपरा अखंड वाहत आहे आणि या डोळ्यातच ढग्यांची प्रतिमा आजही टिकून आहे. आता थांबते. भावूक होत आहे माझी लेखणी..

 – क्रमशः भाग दहावा

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सात खड्यांच्या गौरी ”… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “सात खड्यांच्या गौरी ”… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

(कोकणस्थ ब्राह्मणांच्या गौरी ७ खड्यांच्या का?)

गणपती बाप्पा आले, म्हणजे त्यांची आई गौरीही येणार. या प्रथम पूजनीय गणपतीनंतर त्याच्या आईचा म्हणजे गौरींचा मान ! हा गौरींचा उत्सव तसेच पूजा, विविध नैवेद्य या सर्व गोष्टी या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात. हा सृजनाचा उत्सव असल्याने तो साहजिकच स्त्रियांच्या अधिकारात येतो. विविध ठिकाणी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी या मुखवटे, उभ्या मूर्ती, भिंतीवरील चित्र, तेरड्याच्या रोपट्याला देवीचे चित्र लावून, कलश इत्यादी स्वरूपात पुजल्या जातात.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये मात्र देवीचे प्रतीकात्मक रूप म्हणून ७ खडे आणून पुजले जातात. या संबंधात केले जाणारे विविध विनोदही ऐकायला मिळतात. पण याची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ या. कोकणामध्ये पावसाचे प्रमाण खूप असते. सगळीकडचे जलसाठे तुडुंब भरलेले असतात. हे जलसाठे पावसाळ्यानंतरच्या काळात सर्वाधिक धोकादायक असतात. फोफावलेल्या वनस्पती, वेली, निसरडी जमीन, सर्वत्र चिखल यामुळे अपघात आणि मृत्यूची भीती असते. अपरिचित जलसाठ्यांच्या ठिकाणी, तिन्ही सांजेला उजेड कमी होताना, खूप झाडीच्या ठिकाणी कांहींचा अनपेक्षित अपमृत्यु ओढवतो. अत्यंत पुढारलेल्या अशा आजच्या काळातही पावसाळ्यात नदीत, ओढ्यात, धबधब्यात, समुद्रात बुडून मरण्याचे प्रमाण वाढते. मग यातून भीतीची, दंतकथांची परंपरा सुरु होते. कांही कथा तर खूपच भीतीदायक आहेत. अशा ठिकाणी पूर्वी अपघातात मरण पावलेल्या कांही स्त्रियांची पिशाच्चे येथे वास करतात असे मानले गेल्याने आणखीनच भीतीदायक पार्श्वभूमी लाभते. त्यांच्या कहाण्या, कथा अनेक पिढ्यांपर्यंत सांगितल्या जात राहतात. त्यामुळे विविध प्रकारचे विधी, तोडगे हे भक्तिभावाऐवजी भीतीमुळे केले जातात.

मोक्षदायी अशी सप्त तीर्थे, सप्त मातृका, सात पवित्र नद्या तशी आपल्याकडे सप्त देवतांची कल्पना मांडलेली आणि मानलेली आहे. विहिरी, तळी, सरोवर, पाणवठे अशा ठिकाणी सात देवतांचे वास्तव्य मानलेले आहे. त्यांना सात जल योगिनी, जलदेवता, अप्सरा म्हणतात. त्याचे साती आसरा, सती आसरा असे अपभ्रंशही झाले. कांहीं समाजात त्यांना गुरुकन्या मानले जाते. मत्सी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा, मकरी अशी त्यांची नावे आहेत. ही सर्व नावे जलचरांची आहेत. त्यांना त्रास दिल्यामुळे, नीट सेवा न केल्यामुळे त्यांचा कोप होतो. म्हणून त्या माणसांना ओढून पाण्यामध्ये नेतात अशी लोकांची श्रद्धा आहे. तसा कोप होऊ नये म्हणून प्रतीकात्मक ७ खडे आणून त्यांची पूजा केली जाते. हे खडे जल साठ्याजवळून, वाहत्या पाण्यातून, पवित्र वृक्षतळ अशा ठिकाणांहून आणले जातात. त्यांना समृद्धी देणाऱ्या, रक्षणकर्त्या सप्त देवता मानून त्यांची भक्तिभावाने सेवा केली जाते. गौरींच्या परंपरागत कहाणीमध्ये, दारिद्र्यामुळे तळ्यात जीव द्यायला निघालेल्या गरीब ब्राह्मणाला, वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेल्या गौरी देवीने वाचविले व त्याला समृद्धी दिली, असे वर्णन आहे.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये या सप्त देवतांचे, ७ खड्यांच्या रूपात पूजन करण्याचे व्रत पाळले जाते. कोकणातील अन्य ब्राह्मण पोट जाती तसेच अन्य जातींमध्ये सुद्धा खड्यांच्या गौरी आणण्याची पद्धत आहे. कोकणात अनेक सुप्रसिद्ध मंदिरातील देवता या सप्त शिळांच्या रूपात आढळतात. त्यामुळे सप्त शिळांचे महत्व केवळ ब्राह्मणच नाही तर अन्य अनेक समाजांमध्ये आहे. त्यांच्या त्या कुलदेवताही आहेत.

“ज्येष्ठे, श्रेष्ठे, तपोनिष्ठे, धर्मीष्ठे, सत्यवाहिनी, समुद्रवसने देवी, ज्येष्ठा गौरी नमोस्तुते.” असा श्लोक खड्याच्या गौरी आणताना म्हणतात. ही सात खड्यांच्या सात देवींची नावे नसून, एकाच जेष्ठा गौरीची ही सर्व विशेषणे आहेत.

आनंदाच्या सणासुदीच्या काळात (म्हणजे सध्याच्या पावसाळ्यात) माणसाने आपण देवापेक्षाही (निसर्गापेक्षाही) शक्तिवान, बुद्धिवान आहोत असे समजून आपला जीव घालविण्यापेक्षा, त्याचा सन्मान राखावा हेच या ७ खड्यांच्या गौरींच्या कहाणीचे फलित आहे.

लेखक : श्री मकरंद करंदीकर

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जातीचं काय घेऊन बसलात राव ? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ जातीचं काय घेऊन बसलात राव? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

जातीचं काय घेऊन बसलात राव.. अरे जात म्हणजे काय ? … माहित तरी आहे का.. ?

अरे कपडे शिवणारा शिंपी, ! तेल काढणारा तेली, !

केस कापणारा न्हावी. ! लाकुड़ तोडणारा सुतार. !

दूध टाकणारा गवळी. ! गावोगावी भटकणारा बंजारा. ! 

भांडी बनविणारा कासार, दागिने बनविणारा सोनार, मूर्ती- मातीची भांडी बनविणारा कुंभार, रानात मेंढी-

बकरी वळणारा धनगर.. !

पुजा-अर्चा, पौरोहित्य करणारा ब्राह्मण. !

बूट चप्पल शिवणारा चांभार, बागायती शेती करणारा-वृक्ष लावणारा माळी. !

आणि लढाई लढणारा क्षत्रिय. !

आलं का काही डोस्क्यात.. ?

आरं काम म्हणजे जात.

आणि सर्वात महत्त्वाचे वरीलप्रमाणे कामे आता कुठल्याही एका जातीचीच व जातीसाठी राहिली नाहीत.

आता शिक्षणाने व्यवसाय प्रत्येकाचे बदलले आहेत.

आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला……

आता इंजीनीयर ही नवी जात.

कॉम्प्युटर, केमिकल ही पोटजात.

“सी. ए” ही पण जात,

तर 

“एम. बी. ए” ही नवी जात.

डॉक्टर ही पण जात 

तर वकीलही जातच 

तर “शिक्षण” व “माणुसकी” हाच खरा धर्म.

बदला की राव कवाचं तेच धरुन बसलात!

घरीच दाढी करता नवं? … तेव्हा तुम्ही न्हावी होता 

बुटाला पालीश करता नव्हं?…. तेव्हा तुम्ही चांभार होता 

गैलरी टेरेसवर झाडे लावता ना ! बगीचा करता …. तेव्हा तुम्ही माळी होता 

घरच्या घरीच पुजा-अर्चा करता नव्ह?.. , , तेव्हा ब्राम्हण पण होताच की ?

आरं कामानं मोठं व्हा जातीनं न्हाय !

आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला, हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय?

मंग कशाला उगीचच बोंभाटा करता राव ?

तुम्ही शहरात/खेडेगावात राहत असाल.. तुम्ही आजारी पडल्यावर/अडीअडचणीला मदतीला सगळ्यात आधी धावून येतो तो तुमचा शेजारी/मित्र आणि तो तुमच्या वरीलप्रमाणे जुन्या जातीचा नसतोच हे मान्य कराल की नाही?

सगळ्याला आता आधुनिक पद्धतीने काम हाय !

सगळ्याला शिक्षण खुले हाय !

खूप शिकायचं काम करायचे ! 

माता पित्याचे- -गावाचे- जिल्हय़ाचे- राज्याचे- देशाचे नावलौकिक करायचे.

कधीतरी लक्षात घ्या की… ” जात फक्त राजकारणी लोकांनी स्वार्थासाठी जिवंत ठेवली आहे “

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माणुसकीचा ठाव नसे… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ माणुसकीचा ठाव नसे… कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे ☆

जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे

पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे

सुधारलेल्या या देशी संस्कृती ना कोणी पुसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके

दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके

आंसू आटलेले मातृत्वाची मान झुके

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

माय अपुली बहिण तरी गर्भातच लेक खुडे

समाजा ना घोर कुठे कुणाचे काय अडे

मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे

दारी गाड्यांची रांग असे कोण नेसाया साडी नसे

निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके

बैठकी खणखण पडती विद्येसाठी मोल थके

विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे 

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

*

आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची

मनात आतल्या आत जळून ती गुदमरायची

हाची का समाज हेचि असेच का जगायचे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

☆ रसग्रहण :  माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे ☆

जिव्हा चटावली बाजारा कोपऱ्यात चूल रुसे

पंगती आग्रह भरपेटी भुकेल्या तोंडी घास नसे

सुधारलेल्या या देशी संस्कृती ना कोणी पुसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

माणूस स्वतः हरवला आहे यातील गर्भितार्थ मनाला भिडतो. तो माणुसकीला ही विसरला. त्याला याविषयी काहीही घेणेदेणे नाही.

“जिव्हा चटावली म्हणताना भुकेविषयीचा सात्विक भाव नाहीसा झाला आहे हे अधोरेखित केले आहे.. “चटावली” शब्दांतून परिस्थितीचे गांभीर्य व तीव्रता नेमकेपणाने ध्यानात येते. बदलत्या परिस्थितीमुळे घरातील चूल रुसली आहे अशी कल्पना करून उत्तम चेतनगुणोक्ती अलंकार योजिला आहे. “कोपऱ्यात” या शब्दातून होत असलेले दुर्लक्ष कळते. पंगतीत पोट भरलेल्या लोकांना आग्रह केला जातो. पण भुकेल्या माणसाला घासही मिळत नाही याची जाणीव व पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण करताना देश स्वतःच्या संस्कृतीला विसरतो आहे. “अतिथी देवो भव” ही भारतीय संस्कृतीतील भावना दुर्लक्षित होते आहे.

पेले फेसाळले मदीरा स्तन आटले ओठ सुके

दूध रस्त्यावरी ओतता बालकांची क्षुधा सुके

आंसू आटलेले मातृत्वाची मान झुके

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

वर्तणुकीचे व हरवलेल्या माणुसकीचे वर्णन केल्यानंतर समाजाचे बदलते भान आणि वर्तन विशद केले आहे.. मदिरापानाची अवाजवी व गैरवाजवी प्रतिष्ठा देताना तिचे पेले फेसाळताना दिसतात. पण लहान बालकांना पूर्णान्न ठरणारे आईचे दूध मात्र आटत चाललेले आहे. माया व लहान मुलांना स्तनपान न देण्याकडे स्त्रियांचा वाढता कल लक्षात येतो. लहान मुलांचे ओठ सुकून गेले आहेत. त्यांची तहान भूक भागत नाही. मूलभूत गरजांविषयी माणुसकी जपली जात नाही. नात्याने पाहिले जात नाही हे सूचित केले आहे. अपेक्षित भाव न मिळाल्याने दूधाचा नाश झाला तरी बालकांची क्षुधा नजरेआड होते. ती भूकही सुकून जाते असे म्हणून अतिशयोक्ती अलंकाराचा समर्पक वापर केल्याने परिस्थितीची तीव्रता समजते.. असे असूनही कुणालाही दुःख होत नाही. या अर्थी आंसू, अश्रू आटून गेलेले आहेत. मातृत्वाच्या भावनेला प्रामाणिक न राहणारी ही भावना फैलावल्यामुळे मातृत्वाची मान ही झुकली आहे असे म्हणताना “मातृत्वाची मान झुकणे” यातून मांडलेला गर्भितार्थ अतिशय भेदक आहे. मातृत्वही शरमून गेले आहे. चेतनागुणोक्ती कवितेच्या आशयाला उंची व खोली प्रदान करतो.

माय अपुली बहिण तरी गर्भातच लेक खुडे

समाजा ना घोर कुठे कुणाचे काय अडे

मी माझे हे खरे समाजाचे तर भान नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

प्रत्येक माणूस हा स्त्रीच्या पोटी जन्म घेतो. स्त्रीच्या रूपात माय, बहिण व लेक ही मिळते. या सत्याकडे दुर्लक्ष करून स्त्री गर्भ मात्र खुडला जातो. “खुडे” या शब्दातून “कळी खुडणे” या अर्थाने कळी व तिचा विकास अशा जीवन क्रमाशी स्त्री गर्भाचा मेळ साधला आहे. समाजाची मूल्ये वर्धन करणारी, संस्कार करणारी स्त्रीचे अस्तित्व आवश्यक आहे. हा व्यापक विचार करण्यात समाज भावनिक दृष्ट्या कमी पडत आह. मी आणि माझेच खरे व स्वतः पुरते आत्मकेंद्री जगणे हा जणू आयुष्याचा नियम झाला आहे. अपवाद म्हणूनही समाजाचे भान ठेवण्याचे भान जपले जात नाही.

उत्तुंग इमले धनिका दीनदुबळ्यांना वास नसे

दारी गाड्यांची रंग असे कोण नेसाया साडी नसे

निर्दयी कठोर धरती गगनालाही कणव नसे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

भूक तहान या नंतर या निवारा अर्थात घर याविषयी कवी सांगतो कि श्रीमंतांना व श्रीमंतांची उत्तुंग मोठी घरे असतात. परंतु दीनदुबळ्यांना मात्र “वास नसे” म्हणताना त्यांना घर, अधिवास नसणे हा भाव मांडला आहे. गरजेपेक्षाही जास्त असणे व गरजेपुरते ही नसणे हा विरोधाभास, विषमता लक्षात येते. श्रीमंतांच्या घरी गाड्यांची रांग लावताना पैशाचा अपव्यय दिसून येतो. त्याच वेळेस स्त्रियांसाठी लज्जा रक्षणार्थ वस्त्रही उपलब्ध नसते. धरतीवरील निर्दयी कठोरवृत्ती प्रकर्षाने मांडली आहे. “निर्दयी कठोर धरती” मधील श्लेषात्मक अर्थ ही अतिशय उच्च प्रतीचा आहे. पृथ्वीतलावर वास करणारे लोक निर्दयी व अन्न वस्त्र निवारा या गोष्टींची गरज भागवणारी धरती ही निर्दयी बनलेली आहे. गगनालाही कणव नसे म्हणताना वरुणराजाची कृपा नसल्याने लक्षात येते.. देव गगनात वास करतो असा समज आहे. त्या दृष्टीनेही त्याला कणव येत नाही असा श्लेषात्मक अर्थ आशयाला पूरक ठरतो. संपूर्णपणे विपरीत परिस्थिती मांडून माणुसकी कशी हरवत चालली आहे हे प्रत्येक कडव्या गणिक उदाहरणे देत स्पष्ट केले आहे.

मंचकी लावणी रंगली सुवासिनीचा अश्रू सुके

बैठकी खणखण पडती विद्येसाठी मोल थके

विभ्रमे मन भरे दूरदृष्टीचा अभाव दिसे 

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

समाजाचे अध:पतन दाखवताना माणुसकीप्रमाणे त्याचे नैतिक पतनही कसे होत आहे सांगितले आहे. लावणी पाहताना दंग झालेले लोक त्या नादामध्ये स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष करतात. घरातील सुवासिनीचा, स्त्रीचा अश्रूही सुकून गेला आहे याचे भानही पुरुषजात ठेवत नाही. “अश्रू सुके “असे म्हणताना दुर्लक्षित परिस्थितीचा सामना दीर्घकाळ चाललेला कळतो आहे. लावणीच्या बैठकीत पैशाची उधळण होते. मुलांच्या विद्याप्राप्तीसाठी पैसा उपलब्ध होत नाही. व शैक्षणिक फीया थकून जातात, बाकी राहतात. विभ्रमांनी मन रमवून काळाचा व पैशाचा अपव्यय केला जातो. क्षणिक सुखात दूरदृष्टीचा अभाव दिसतो.. संपूर्ण घराघराचा ऱ्हास, विध्वंस होऊ शकतो याकडे तीळमात्र लक्ष दिले जात नाही. आर्थिक, मानसिक शारीरिक व नैतिक पातळीवरील चांगला समाज चांगला देश निर्माण करू शकतो. परिपूर्ण समाजाची आस न ठेवल्यामुळे एकूणच माणूस म्हणून जगण्याच्या विविध भागांवर कवीने प्रकाश टाकला आहे. व माणुसकीच्या लोप पावण्याने अंध:कारमय परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.

आता कसली आशा नाही स्वप्न ही ना पहायची

मनात आतल्या आत जळून ती गुदमरायची

हाची का समाज हेचि असेच का जगायचे

माणूस हरवला माणुसकीचा ठाव नसे

विविध पातळ्यांवर हरवलेली, लोपलेली माणुसकी कवीने उदाहरणे देत शब्दांकित केली आहे. विपरीत वातावरणात विकल, हतबल, उदास मनाला आता कसलीही आशा नाही. काही बदल, सुधारणा होईल असे स्वप्न पहायचीही आशा उरली नाही. ” स्वप्न ही ना पहायची ” यातील श्लेषात्मक अर्थ अत्यंत अर्थपूर्ण. स्वप्न पाहायची नाहीत म्हणजे ती सत्यात उतरणार नाहीत याची जाणीव असल्याने ती पाहायची नाहीत व परिस्थितीमुळे स्वप्न पहायची आशा उरली नाही हा दुसरा अर्थ. ही गोष्ट सत्यात उतरेल याची शाश्वती मनाला उरलेली नाही. विस्तवासम दाहक वास्तवाने आशा मनातल्या मनात जळून जाणार, गुदमरून जाणार. “गुदमरणे” या शब्दातून तगमग, कळकळ, जीवाची काहिली लक्षात येते. हा समाज आता असाच राहणार का, यालाच समाज म्हणायचे का आणि इथे असेच जगायचे का असे विविध प्रश्न कवीच्या सजग व खिन्न मनाला पडलेले आहेत. या प्रश्नातूनच त्याचे नकारात्मक उत्तरही अध्याहृतपणे दिलेले आहे.

संपूर्ण कवितेत यमक, अनुप्रास या बरोबरच साहित्यिक अलंकारांची योजना केल्याने नादमयता व अर्थपूर्णता दिसून येते.

डोळ्यांत अंजन घालून वास्तवाची प्रखर जाणीव करून देणारी, विचार करायला प्रवृत्त करणारी ही कविता ! अत्यंत हृदयस्पर्शी तर आहेच तिचे सामाजिक मोलही अनमोल आहे. समाजभान असणारे लोक प्रयत्नशील असतात. स्वतःचा व्यावसायिक पेशा समर्थपणे व यथार्थपणे सांभाळून, सामाजिक भान सजगपणे साहित्यातून सक्षमपणे व भाषेचे सौंदर्य जपून मांडण्याचे अनमोल कार्य डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांनी नेहमीच केलेले आहे.

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares