ई-अभिव्यक्ती समुहाचे मुख्य संपादक श्री. हेमंतजी बावनकर यांना हिंदी आंदोलन परिवार या संस्थेतर्फे हिंदी साहित्याच्या प्रसाराबद्द्ल ‘हिंदीश्री’ हा सन्मान जाहीर झाला आहे. आपणा सर्वांसाठी ही आनंदाची व अभिमानाची घटना आहे.
💐 अभिव्यक्ती परिवार तर्फे श्री बावनकर यांचे हार्दिक अभिनंदन !💐
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कुणाच्यही ह्रदयात शिरायचा मार्ग हा त्याच्या पोटातूनच जातो अशी आपल्याकडे एक म्हण आहे. खरचं, आपल्याकडील खवैय्येगिरी बघितली की ही म्हण पटते सुद्धा. खाद्यसंस्कृती म्हंटली की त्यात दोन बाजू असतात. एक बाजू खाण्याची आवड असणाऱ्यांची आणि दुसरी बाजू सुगरणगिरी करीत मनापासून आग्रहाआग्रहाने खिलवणा-यांची.
खाण्याची आवड असणाऱ्यांमध्येही प्रकार असतात काही सरसकट सगळेच पदार्थ आवडीने,खाण्याचा मनमुराद आनंद लुटणारे तर काही चोखंदळपणे नेमकेच विशिष्ट पदार्थ आवडून त्याचा मनापासून स्वाद घेणारे. मी माझ्याच बाबतीत अभ्यास केल्यावर लक्षात आलं,आधी शिक्षण,मग नोकरी ह्यामुळे स्वयंपाकघरात घुसघुस करणा-यातली मी नक्कीच नव्हे. त्यामुळे मला स्वतः ला शक्यतोवर घरचं,ताजं अन्न इतकीच माझी डिमांड मग बाकी नो आवडनिवड. फक्त एक गोष्ट जे काही पदार्थ करते ते होतात मात्र चवदार, सगळ्यांना आवडतील असे.आता ही कदाचित अन्नपूर्णेची कृपा असावी वा आपल्या जवळच्या माणसांच माझ्यावरील प्रेम, मला बरं वाटावं म्हणून गोड पण मानून घेत असतील बिचारे.
खिलविणा-यांमध्येही प्रकार असतात. काही अगदी ओ येईपर्यंत मनापासून आग्रह करून करून खाऊ घालणार तर काही मला आग्रह अजिबात करता येत नाही तेव्हा हवं तेवढं मनसोक्त पोटभर खा असा सज्जड दम देणारे.
ह्या सगळ्यांमुळे आज अगदी हटकून घराघरात पोहोचलेल्या अन्नपूर्णेची आठवण प्रकर्षाने झाली. 20 एप्रिल ही तारीख खास सुगरण व्यक्तींच्या आणि त्या सुगरपणाला दाद देणा-या खवैय्ये लोकांच्या तोंडची चवच घालवणारी तारीख. 20 एप्रिल 1999 रोजी साक्षात अन्नपूर्णेची छाप असणा-या प्रतिअन्नपुर्णा म्हणजेच कमलाबाई ओगले ह्यांचा स्मृतिदिन.
कमलाबाईंना “सव्वालाख सुनांची सासू”असं म्हंटल्या जायचं.खरोखरच 1970 साली अगदी अल्पावधीतच मेहता पब्लीकेशन्सने प्रकाशित केलेल्या कमलाबाई ओगले ह्यांनी लिहीलेल्या “रुचिरा”ह्या पुस्तकाच्या सव्वालाख प्रती हातोहात विकल्या जाऊन त्यापासून ब-याच जणींना बरचं काही शिकता आलं ही गोष्टच खूप अलौकिक खरी. नवीनच संसाराला सुरवात करणाऱ्यांसाठी रुचिरा पुस्तक म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेले नवनीत ,बालविद्या डायजेस्टच जणू.
खरतरं कमलाबाई फक्त चार इयत्ता शिकलेल्या. पण दांडेकर घराण्यातून एका लहानशा खेडेगावातून लग्न करून त्या सांगलीच्या ओगले कुटूंबात आल्या आणि त्यांच्या सासूबाईंच्या हाताखाली पाकशास्त्रात एकदम पारंगत झाल्यात.पुढे त्यांचे वास्तव्य काही काळ आँस्ट्रेलियात पण होते.
त्यांच्या “रुचिरा” ह्या पुस्तकात मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे पदार्थांसाठी लागणा-या जिन्नसांची मापं ही चमचा वाटीने मापलेली आहेत.ते ग्रँम,मिलीग्रँम असं आखीवरेखीव मोजमाप माझ्यासारख्या वैदर्भीय खाक्याला झेपणारचं नव्हतं मुळी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकात असलेली साधी,सरळ,सोपी,चटकन डोक्यात शिरणारी भाषा.आणि तिसरी ह्या पुस्तकातील आवडणारी बाब म्हणजे ह्या पुस्तकातील पदार्थ हे आपल्याला नित्य लागणा-या जेवणातील वा आहारातील आहेत.जे पदार्थ आपण वर्षानुवर्षे, सठीसहामाशी कधीतरीच करतो अशा पदार्थांचा भरणा कमी व नित्य स्वयंपाकात लागणा-या अगदी चटण्यांपासून चा समावेश ह्या पुस्तकातं आहे.
मला स्वतःला हे “रुचिरा” पुस्तक बरचं पटल्याने,भावल्याने बहुतेक लग्न ठरल्यावर वा नुकतेच नवविवाहित मुलींना मी हे पुस्तक आवर्जून भेट द्यायचे.आतातर शिक्षणाच्या, नोकरीच्या निमीत्त्याने घरापासून दूर राहणाऱ्या तसेच लग्नाळू मुलांना पण हे पुस्तक भेट म्हणून द्यायला अगदी योग्य आहे.किमान स्वतःच्या उदरभरणाइतके तरी पदार्थ स्वतःचे स्वतः करता यायलाच हवे मग तो मुलगा असो वा मुलगी. कुठल्याही व्यक्तीने स्वतः हाताने आपल्या आवडीनुसार घरच्या घरी रांधणं ह्यासारखी तर उत्तम आणि फायदेशीर गोष्ट नाही. आपल्या घरात आपण जे शिजवू ते आपल्या चवीनुसार असेल,त्यात उत्तम जिन्नस वापरलेले असतील,स्वच्छता सांभाळलेली असेल आणि नक्कीच विकतच्यापेक्षा निम्म्या किमतीत हे पदार्थ घरच्याघरी बनतात.
ज्यांची ह्या रुचिरा वर श्रद्धा वा विश्वास होता त्या आमच्या शेजारच्या काकू कितीही खिळखीळं झालं असलं तरीही त्यांचं जुनं रुचिरा हे पुस्तक वापरायच्या.मला ते बघून कायम भिती वाटायची की खिळंखीळी झालेली ती पुस्तकाची पानं इकडची तिकडं का सरकली तर त्या पदार्थांची काय वाट लागेल कोण जाणे. म्हणून मी त्यांच्या वाढदिवसाला मुद्दाम नवीन रुचीराची प्रत भेट म्हणून दिली. तरीही त्या ग्रेट काकू नवीन पुस्तक छान कव्हर घालून शेल्फ मध्ये ठेवायच्या आणि ते जूनंचं पुस्तक बरोबर असल्यासारख्या वापरायच्या.
काहीही असो आज ह्याच रुचिराकार कमलाबाईंच्या पुस्तकातून वाचून, शिकून कित्येक नवीन सुनांच्या घरची मंडळी “अन्नदाता सुखी भव,अन्नदात्याचे कल्याण होवो”हे आपोआप म्हणायला लागले.
ह्या रुचिरावाल्या आजींच दिनांक 20 एप्रिल 1999 साली निधन झालं. पण आजही त्यांच्या रुचीराच्या रुपांत घरोघरी त्यांच अस्तीत्व जाणवतयं हे खरं.
भागिरथीबाई वयाच्या ८१व्या वर्षी वारल्या. काल दिवसकार्य झालं आणि आज चौदाव्याचं गोडाचं जेवण!आता जरा आराम करून मंडळी आपापल्या घराकडे निघणार होती. गजानन आणि त्याची बायको गडी माणसांकडून मागची आवरा-आवर करून घेण्यात गुंतली होती. हो, हातासरशी कामं करून घेतली नाही, तर परत कामाला माणसं कुठून मिळणार? बाकीची तीन मुलं, त्यांच्या बायका, एक मुलगी आणि जावई माजघरात बसली होती. त्यांची हलक्या आवाजात कुजबुज चालू होती.
भागिरथीबाईंना एकूण नऊ मुलं झाली, पण आज घडीला चार मुलगे आणि एक मुलगी तेवढी जिवंत आहेत. सगळी, लग्न, पोरंबाळं होऊन रांगेला लागलेली. मोठा गजानन आणि त्याचं कुटुंब, भागिरथीबाईंसोबत रत्नागिरीजवळ चिखलीला राहात होतं. त्याच्या पाठचा सुरेश, रमेश, आणि वसंता ही मुंबईत, तर नंदा पुण्यात स्थिरावलेली.
चिखलीतलं जुनं कौलारू घर तसं लहानच, पण दरवर्षी काही ना काही दुरूस्तीचा खर्च असायचाच. म्हणून मोठ्या मनानं सगळ्या भावंडांनी घरावरचा हक्क सोडून, ते गजाननाच्या नावावर करून दिलं होतं. थोडी नारळ-सुपारीची झाडं आणि आंब्याची कलमं होती. दरवर्षी सगळे भाऊ, एकेक जण करून आठ दिवस राहून जायचे.गाडीनी आसपासच्या कोकणात फिरायचे आणि जाताना आपल्या वाटणीचे आंबे, नारळ, कोकमं असं गाडीत भरून घेऊन जायचे. नंदा तर बोलून चालून माहेरवाशीण, ती देखील सहकुटुंब दोन-तीन आठवडे मुक्काम ठोकून असायची. जाताना सारा वानोळा घेऊन जायचीच.
गजानन आणि माधवी, मोठेपणाचा आब राखत, सगळं हसून साजरं करायचे.तक्रार करायचा स्वभावच नव्हता दोघांचा! माधवी लग्न होऊन नेन्यांच्या घरात आली, तेव्हा धाकटी नंदा अवघी दोन वर्षांची तर होती.आणि बाकी तिघे शाळेत जाणारे.
नंदा सहा वर्षांचीअसतानाच, माधवीचे सासरे लकवा होऊन अंथरुणाला खिळले. मग सासूबाई त्यांच्या शुश्रूषेत गुंतल्या आणि कुटुंबाचा बाकी सारा भार गजानन आणि माधवीवर पडला.
पोटची पोरं असल्यागत सगळ्यांना सांभाळलं होतं तिनं! शिक्षण संपल्यावर दिरांना नोकऱ्या लागल्या आणि लग्न करून त्यांचे संसारही थाटून दिले होते. पंधरा वर्षे सासरे आजारी होते. त्यांचं पथ्यपाणी, आल्यागेल्याचा पाहुणचार, सासूबाई आणि स्वतःचा संसार माधवीनं छान सांभाळला होता. सासरे गेले आणि सासूबाईंनी संसारातून पूर्णच लक्ष काढून घेतलं. गेली सात-आठ वर्षे त्याही अस्थमा आणि संधिवातानं बिछान्यावरच होत्या. गजानन घरातली पिढीजात भिक्षुकी चालवत होता. थोडं नारळ-सुपारीच्या बागेचं उत्पन्न येत होतं. त्यावर त्यांचा निर्वाह ठीक चालला होता. पण वेळेला हातात नगद पैसा नसायचा.त्याला एक मुलगा, एक मुलगी. मुलगा इंजिनिअर होऊन नुकताच नोकरीला लागला होता चिपळूणला. मुलगी बी. काॅम. झाली होती. तिच्या लग्नाचं बघायचं होतं आता.
गडी माणसांकरवी कामं मार्गी लावून, गजानन आणि माधवीदेखील माजघरात येऊन टेकले. नणंदा-भावजयांची जरा नेत्रपल्लवी झाली. नंदा थोडी माधवीजवळ सरकली.
‘वहिनी,दमलीस ना ग! आईचं तुम्ही खूप केलंत!आईचं काय आमचं सगळ्यांचंच केलंस बाई तू! आता चार दिवस सवड काढून तू आणि दादा माझ्याकडे या आराम करायला.’ माधवीच्या दिर-जावांनीही नुसत्या माना हलवल्या.
‘मी काय म्हणते,’ आईचे काही दागिने होते का ग? मला वाटतं एक मोहनमाळ होती ना पाचपदरी? नाही म्हणजे तसं काही नाही म्हणा, पण आठवण म्हणून सगळ्यांना देता येईल ना काहीतरी, ती मोडून!या सगळ्यांचंच मत आहे हं असं!
‘मोहनमाळ म्हणजे ७-८ तोळ्याची तरी असेल ना हो वन्सं! ‘ वसंताच्या बायकोनं विचारलं.
माधवीला काय बोलावं सुचेना. ती आपल्या नवऱ्याच्या तोंडाकडे बघू लागली. गजानन हाताने थांबा अशी खूण करत, माडीवरच्या त्याच्या खोलीकडे गेला. येताना त्याच्या हातात एक कागदी लखोटा होता. त्याने आतला कागद काढून नंदाच्या हातात ठेवला. ती सोनाराकडची पावती होती. माधवजी शाह.. त्यांच्या नेहमीच्या सोनाराचा सही-शिक्का होता त्यावर. पाकिटातच मोहनमाळ होती.
‘सगळ्यांना वाचून दाखव नंदा काय लिहिलंय ते!’ गजानन म्हणाला.
‘मोहनमाळ, वजन चार तोळे, दहा मासे.. लाखीमणी. सोन्याचा मुलामा’.
‘अरे, पण आई तर एकदा म्हणाली होती की बाबांच्या आजारपणात पैशासाठी तू दोन्ही गहाण टाकलंय.’
‘हो, बरोबर आहे. बाबांच्या औषधपाण्यासाठी पैसा पुरत नव्हता. त्यात ऐन पावसाळ्यात स्वैपाकघरातली भिंत ढासळली. पैशाची सोय करणार तरी कुठून? म्हणून एकदा फोन केले होते सगळ्यांना नाईलाजाने. पण त्यावेळी तुमचीही प्रत्येकाची काही ना काही अडचण होतीच. आईने तिची ही मोहनमाळ जीवापाड जपली होती,तिच्या माहेरची आठवण म्हणून तिच्या लग्नात तिला घातली होती ती. एकदाच कधीतरी ती गहाण ठेवायची वेळ आली होती. पण थोड्याच दिवसांत बाबांनी ती सोडवून आणली होती.
मी माधवजींकडे ती घेऊन गेलो. त्यांनी ती माळ हातात घेऊन तीनतीनदा पाहिली आणि मला म्हणाले,’ गजा, अरे ही सोन्याची नाही. नुसता मुलामा आहे वरून सोन्याचा! असं कसं झालं? तुझ्या आईची मोहनमाळ एकदा मी पाहिली आहे. ती पिवर सोन्याची होती. तुझे बाबा एकदा गहाण ठेवायला आले होते. मी त्यांना म्हणालो,’ अरे हे स्त्रीधन घरात राहू दे. मी देतो ना तुला पैसे. आपले मैत्रीचे संबंध किती जुने आहेत.’ पण त्यांच्या स्वाभिमानी मनाला ते पटलं नाही.
पण मला नाही कसं म्हणायचं? म्हणून म्हणाले, ‘ तुझं बरोबर आहे माधव, दुसरी काही सोय होते का बघतो.’
तेच्यानंतर माझे वडील आजारी झाले म्हणून मी गुजरातला गेलो. वडील गेले म्हणून महिनाभर तिकडेच होतो.
‘ मी आल्यावर तो भेटायला आला होता मला. मी पैशाची सोय झाली का विचारलं. तेव्हा म्हणाला मुरली मारवाड्याकडून घेतले होते. पण नंतर कोणाची थकबाकी आली आंब्याची, दोन वर्षांची आणि सोडवली माळ. मला वाटतं तवाच कायतरी झोल केला असणार मुरलीनं! आतातर तो पण देवाघरी गेला. कोणाला धरणार? ‘
मी सटपटलो. ही तर मुरलीनं घोर फसवणूक केली होती. आणि बाबांनी विश्वासानं तो दागिना खरा समजून घेतला होता परत. आईनं घेऊन हडप्यात ठेवून दिला. आता आईला काय आणि कसं सांगायचं? एकतर तिला खूप धक्का बसणार, नाहीतर माझ्यावरचा पण विश्वास उडणार. एकूण सर्व परिस्थिती खूपच नाजूक होती.
माधवशेठ मदतीला धावला. त्याने ही पावती करून दिली,आणि मोहनमाळ मला परत केली. माझी पैशाची गरज भागवली. घराची भिंत उभी राहिली. बाबांच्या औषधपाण्याची सोय झाली. आईला मात्र मोहनमाळ गहाण ठेऊन पैसे आणल्याचं सांगितलं. पण त्याचे पैसे तर फेडायला हवेच ना! माझ्या तुटपुंज्या उत्पन्नात ते तरी कसं जमणार? मग माधवशेठनी मला त्याच्या पेढीचं हिशोबाचं काम सोपवलं. महिना ३०रू.पगार! ते पैसे मी न घेता कर्जफेड करायची. ३००० रूपयाचं मुद्दल फेडायचं तरी आठ वर्षे जाणार होती. व्याजाची गोष्ट माधवनी केलीच नाही. त्यातच बाबा गेले, पुन्हा त्यांच्या दिवसकार्याचा खर्च झाला. त्यामुळे दोन-तीन महिने ती कर्जफेड करणंही झालं नाही. घराचीही काही न काही डागडुजी करावी लागतच होती.
तशात माधवशेठनी बायको खूप आजारी पडली. टायफॉइडनी ती अंथरुणालाच खिळली.त्याचा मुलगा-सून गुजरातेत. माधवी घरचं सांभाळून रोज तिच्याकडे जायची. तिचं सर्व अंथरूणातच करावं लागत होतं. पण ते करायची. तिला पथ्याचं काही करून जबरदस्ती भरवायची. तिच्या या शुश्रुषेमुळे मायाबेन आजारातून उठली. तिनं हिचे पाय धरले, ‘ तुझ्यामुळे मी जिवंत राहिले. माझ्या कातड्याचे जोडे घातले तरी तुझे उपकार फिटणार नाही.मी तुला काय देऊ?’
‘ माझ्या धाकट्या बहिणीसारखीच ना तू! मग घरच्या माणसाची काळजी आपणच घ्यायला नको का? ‘ माधवी म्हणाली.
माधवीनं कोणत्या अपेक्षेनं थोडीच तिची सेवा केली होती. ही तर माणुसकी आहे ना! आणि आपल्या वेळेला माधवनी मदत केली, त्याला गरज आहे तेव्हा आपणही करायलाच हवी की! पण त्यानंतरच्या दसऱ्याला माधवशेठ आणि मायाबेन आईला भेटायला आले होते.
जाताना माधवशेठ मला एक लिफाफा देऊन गेला. त्यामध्ये दहा हजार रुपये होते आणि कर्जफेड पूर्ण झाल्याची पावती सही-शिक्क्यानिशी होती.
‘ तू काही बोलू नको. माझी पण आईच आहे ही!तिला तिचा जिन्नस दे,खूप आनंद होईल बघ तिला! आणि तिचं औषध-पाणी नीट होऊ दे. काय लागलं तर बिनधास्त सांगायचं मला.’ असं म्हणून त्यानं मिठी मारली घट्ट! ‘
मग मी आईला तिची मोहनमाळ दाखवून, कर्ज फिटल्याचं सांगितलं. तिनं खूप आनंदानं ती मोहनमाळ स्वतःच्या गळ्यात घालायला माधवीला सांगितलं. खूप समाधान वाटलं म्हणाली आणि मग पुन्हा ती माळ काढून माधवीच्या हातात दिली.
‘ नंदा, आईची आठवण म्हणून तुम्हाला हवं तर तुम्ही कोणीही ती घेऊन जा. आमचं दोघांचं काही म्हणणं नाही ! गजानन म्हणाला आणि माधवीनंही मानेनं होकार दिला.
नंदाचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि इतरांच्या माना शरमेने खाली झुकल्या होत्या.
(वडिलांनी व्यवहारज्ञान दिले, अभ्यासातली कौशल्य शिकवली. तर आईने संसार सुखाचा होण्याची गुपितं शिकवली.) इथून पुढे —
त्यांनी आम्हा भावंडांना अतिशय डोळसपणे खूप चांगले घडवले. वडील कधी पुण्या मुंबईला गेले की तिथून उपयोगी अशा नव्या वस्तू, पुस्तके, गावात जे मिळायचे नाही ते आवर्जून आणायचे. आपण खेड्यात राहतो म्हणून मुले नवीन गोष्टींपासून वंचित राहू नयेत हा दृष्टिकोनच खूप मोठा होता.
आईवडील अतिशय धोरणी होते. आम्ही कॉलेजला जायच्या वेळेस त्यांनी पुण्यात घर घेतले होते .आम्ही चार भावंडे तिथेच राहू शिकलो. आम्ही दोघी बहिणी घरी स्वयंपाक करायचो. त्यासाठी आई माळशिरसहून सतत मसाले, चटण्या, पीठे, फराळाचे पाठवायची. या प्रात्यक्षिकामुळे लग्नापूर्वीच आम्ही बहिणी तयार झालो होतो.
आई-वडिलांचे सहजीवन अतिशय आदर्श होते. दोघांनीही एकमेकांना मान देत कायम योग्य आदर केला. त्यांच्यातही मतभेद असतीलच पण ते कधी उघडपणे सर्वांसमोर आले नाहीत. अगदी आमच्या सुद्धा. कधीच टोकाची भूमिका नसायची. जे करायचं ते एकमेकांच्या साथीनंच. तो काळ एकमेकाबद्दलच्या भावनाज बोलून दाखवण्याचा नव्हताच. पण न बोलताच दोघेही एकमेकांच्या आवडीनिवडी जपत, कौतुक करीत. आईला जेवायला थोडा जास्त वेळ लागायचा तर स्वतःचं जेवण झाल्यावरही वडील तिच्यासोबत गप्पा मारत बसायचे. ती भाजी निवडत असेल तर ते पण निवडू लागत. ह्या गोष्टी जरी लहान असल्या तरी त्यांचं प्रेम यातून दिसून येतं. त्यामुळंच त्यांचं नातं घट्ट होत गेलं. त्या काळात घरातल्या बायकांना नुसतं गृहित धरलं जायचं. त्यांचं मत कुणी विचारायचं नाही तर निर्णय सांगितले जायचे. पण वडील प्रत्येक गोष्ट आईला सांगत असत आणि ती पण त्यांना योग्य साथ देई. ते कुठे गेले तरी तिला बरोबर नेत आणि ती पण त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी टापटिपीत असायची. दोघेही आनंदाचे, सुखाचे सहजीवन जगले. सुखी संसारासाठी हा आमच्यासाठी वस्तूपाठच आहे.
जिथे जाऊ तिथे आनंद द्यायचा हे धोरण असल्याने आई कधी कुणाकडे मोकळ्या हाताने गेली नाहीच पण तिथे गेल्यावर कामाला हातभार लावायची. हेही अंगीकारण्या सारखेच आहे. आईवडील दोघेही गावातील सार्वजनिक जीवनात एकत्र हिरीरीने भाग घेत असत. गावातल्या असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले. त्यामुळे दोघेही लोकांमध्ये तितकेच लाडके, हवेहवेसे होते. यानिमित्ताने अनेक नामवंत साहित्यिक, वक्ते, नेते आमच्या घरी आलेले होते.
दुर्दैवाने वडील अचानकपणे ६६ व्या वर्षी गेले त्यांच्या माघारी २३ वर्षे आईने दोघांचीही भूमिका उत्तम निभावली. सगळी कर्तव्यं पार पाडली. आई एवढी कर्तबगार हिंडती फिरती, आनंदी पण शेवटी तिचे हाल झाले. पडल्यामुळे ऑपरेशन झाले. त्यावेळी एक गुडघा आखडल्याने पुढे ती चालू शकली नाही. बरीच वर्षे एका जागेवरच आली. हे परावलंबित्व स्वीकारणे सुरवातीला खूप जड गेले.पण शेवटी या वास्तवाशी तिने जुळवून घेतलं. कोणते भोग वाट्याला यावेत हे आपल्या हातात नसतं हेच खरं.
आपले आईवडील तर प्रत्येकालाच प्रिय असतात. शिवाय त्याकाळी बऱ्याच अशा कर्तबगार बायका होत्या. मग आईत विशेष काय ? तर तिच्यात अनेक चांगले गुण एकवटलेले होते. तिने ते जाणीवपूर्वक जोपासले होते. ती आदर्श गृहिणी, चांगली कलाकार, हाडाची शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती होती. त्यामुळे तिची शिकवणच होती जे काम करायचे ते चांगलंच, सुबक, आखीवरेखीव, परिपूर्ण करायचं.
आजकाल व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक मार्ग, अनेक साधने उपलब्ध आहेत .पण आई-वडिलांच्या काळाचा विचार करता ही गोष्ट सोपी नव्हती. त्यामुळेच त्यांनी जीवनात अनेक गोष्टींमध्ये एक विशिष्ट आदर्श पातळी गाठली होती ही कौतुकाची गोष्ट आहे. एकेका क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणारे असंख्य असतात. पण सर्वच क्षेत्रात अशी आदर्श पातळी गाठणारे फार कमी असतात. अशाच लोकांपैकी माझे आई वडील होते हे विशेष आहे.
हिऱ्याला जितके जास्त पैलू तितके त्याचे मोल जास्ती. त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्वाला शक्य तितके विकसित करावे. त्यासाठी अनेक कला आत्मसात करणे, अनेक गोष्टींचे ज्ञान मिळवणे, सतत नवनवीन गोष्टींचा ध्यास घेऊन त्यांचा अभ्यास करणे, जीवनाच्या सर्व अंगांचा आस्वाद घेणे अशी त्यांची शिकवण होती. त्यांनी स्वतः ती अंमलात आणलीच पण आम्हालाही ते बाळकडू दिले. आज कोणतीही नवीन गोष्ट करताना त्यांच्या विचारांनी नवीन उभारी मिळते. त्यांची शिकवण आचरणात आणण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते आणि काही अंशी त्यात यशस्वी झाले आहे ही समाधानाची बाब आहे.
आईवडीलां पैकी फक्त एकाचेच स्वतंत्र कर्तृत्व सांगता येणार नाही. त्यात दुसरा सहभागी असायचाच इतके त्यांचे जीवन एकमेकांत मिसळून गेलेले होते. याचा नुकताच आम्ही अनुभव घेतला. २०२२ साली वडिलांची जन्मशताब्दी होती. त्या निमित्ताने आम्ही त्यांच्या स्मृतींचे पुस्तक काढले. तर नातेवाईक, स्नेही यांच्या लेखांचा वर्षाव झाला. वडिलांना जाऊन ३४ वर्षे तर आईला जाऊन ११ वर्षे झालीत. पण अजूनही लोक त्यांना विसरलेले नाहीत. त्यांच्या आठवणींचे, सहवासाचे वर्णन वाचून मन भरून आले. सर्वांनीच दोघांबद्दल अगदी भरभरून लिहिले आहे. संत कबीरजींचा एक दोहा आहे,
कबीरा जब हम पैदा हुए
जग हॅंसे हम रोये
ऐसी करनी कर चलो
हम हॅंसे जग रोये |
या उक्तीप्रमाणे आईवडील जगले आणि आमच्यासाठी मोठा आदर्श घालून दिला आहे.
आज समाजात कुटुंब व्यवस्थेला हादरे बसत आहेत. अशावेळी आई-वडिलांच्या शिकवणीची गरज अधोरेखित होते. म्हणूनच हे स्मरण.
प्रत्येक व्यक्तीमधे अधिक-उणे असतेच. पण ज्यांच्या व्यक्तिमत्वात अधिकांची बेरीज जास्ती तेच आदर्श होतात. म्हणूनच माझी आई माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी प्रेरणादायी व्यक्ती आहे.
☆ ‘संगमनेरमध्ये सुरु आहे आगळी वेगळी परंपरा …’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
— इंग्रजांनाझुकवणारीस्त्री – शक्ती .
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे साजऱ्या होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळं महत्त्व आहे.
या दिवशी या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना मिळतो.
महिलांना या ठिकाणी मिळणाऱ्या या मानाला ब्रिटीशकालीन इतिहास आहे. ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते. २३ एप्रिल १९२९ रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहता नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक २०० ते २५० महिलांनी एकत्र येत रथ ताब्यात घेतला. ब्रिटीशांनी बंदी घातलेल्या रथाला, बंदी झुगारून शेकडो महिलांनी रथ यात्रा काढली होती. पोलिसांनी महिलांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली. सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला. पण या आदिशक्ती स्वरूप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला.
या गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली, महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा रथावर ठेऊन ” बलभीम हनुमान की जय ” चा जयघोष केला, आणि रथयात्रा व्यवस्थितपणे पार पाडली. तेव्हापासून ही परंपरा आजही सुरु आहे.
आता या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो.
माहितीसंग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पत्नी कशी असावी ?… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी
तो म्हणाला – दिसायला देखणी, गोरीपान, मनमिळाऊ , मला व माझ्या घरच्यांना सांभाळून घेणारी, उत्तम स्वयंपाक बनवणारी, घर स्वच्छ ठेवणारी, मुलांचा सर्व अभ्यास घेणारी, कटकट न करणारी किंवा एखाद्या गोष्टीचा तगादा पाठी न लावणारी, ऐकून घेणारी, नेहेमी आनंदी आणि समाधानी असावी एवढंच !
त्याला समजावले. . .
पोरा, एकाच झाडाला गुलाब, मोगरा, जाई, जुई, कमळ, रातराणी, निशिगंध, चाफा लागत नसतात रे !
संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“जीजी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच दि.२६ मार्च २०२३ रोजी गुणवंतांच्या उपस्थितीत सुरेख पद्धतीने संपन्न झाला.
अवघ्या ८८ पृष्ठांचे हे पुस्तक जसजशी वाचत गेले तसतशी त्यांत मनाने पार डुंबून गेले,शेवटचे पान वाचेपर्यंत एका जागेवर या पुस्तकाने खिळवून ठेवले.एका आजीची ही कहाणी अत्यंत ह्रदयद्रावक आणि कुठेतरी भेदून जाणारी…!जीजीचे संपूर्ण चरित्र यात रेखाटले असले तरी ते आत्मचरित्र नाही,किंवा चरित्र या साहित्यप्रकारातही मोडणारे नाही असे मला वाटते.
हे पुस्तक म्हणजे जीजीने स्वतः लिहीलेली तिची कहाणी वाचताना लेखिकेच्या भावनांचा
झालेला हा कल्लोळ आहे.त्यामुळे पुस्तकातील एकेक शब्द,एकेक ओळ वाचकाच्या ह्रदयाला जाऊन भिडते.
अत्यंत सुस्थितीत वाढलेली,सधन कुटुंबात विवाह होऊन आलेल्या जीजीला तिच्या पुढील आयुष्यात नशीबाने अल्पवयात वैधव्य आल्याने,तिने समाजाशी धीराने आणि आत्मविश्वासाने कसा लढा दिला,तिच्या एकमेव पुत्राला उत्तम प्रकारे कसे घडविले हे वाचताना डोळ्यातील आसवे थांबत नाहीत.
अतिशय प्रभावी शब्दांकन…..!अगदी तिर्हाईत,अपरिचित वाचकाच्या
नजरेसमोरही ही जीजी उभी रहाते.
सुरवातीलाच राधिकाताई लिहितात,”एक व्यक्ती म्हणून तिला वाचायचं होतं,तिचा शोध घ्यायचा होता.तिच्यातलं स्त्रीत्व जाणायचं होतं.तिच्यातली शक्ती जाणायची होती.आमच्या व्यतिरिक्त तिच्या शब्दातून बघायचं होतं.”
“खरंच बोराच्या झाडासारखंच होतं ना तिचं आयुष्य! काटेरी रक्तबंबाळ करणारं!पण तिने मात्र रुतलेल्या काट्याचा विचार न करता गोड बोरांचाच आनंद उपभोगला.”
ह्या अशाप्रकारच्या लेखनाने जीजी वाचायची वाचकांची उत्सुकता ताणते.त्यामुळे पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही.
जीजीची कहाणी सांगत असताना राधिकाताईंचा जीजीसोबतचा वास आणि घेतलेले अनुभव ह्यामुळे वर्तमान काळात वावरल्यासारखे वाटते.आजही जीजी सोबत आहे असा विचार मनात येऊन काहीतरी आत्मीक बळ आल्यासारखे वाटते.
जीजीचे तिच्या पाचही नातींवरचे नितांत प्रेम हे लेखिकेने स्वानुभवावरून फार समर्थ शब्दात प्रदर्शीत केले आहे.प्रत्येकच वाचकाला जीजी वाचत असताना स्वतःची आजी कोणत्या ना कोणत्या रूपात दिसल्याशिवाय रहाणार नाही हे निश्चित!त्यामुळे ह्या पुस्तकाविषयी कुठेतरी आत्मीयता वाटते.
१०० वर्षापूर्वीच्या काळातील जीजी आणि तिने दिलेले आधुनिक संस्कार या विषयी राधिकाताई सांगतात,”मुलीच्या जातीला हे शोभत नाही बरे?असा पळपुटा,मळकट,कडू संस्कार मात्र तिने आमच्यावर कधीही केला नाही.आयुष्यात अनेक चढउतार आले,रस्ते काही नेहमीच गुळगुळीत नव्हते,दगड,खडे,काटे सारे टोचले.अपरंपार अश्रू गाळले पण कणा नाही मोडला,”जीजीने तिच्या कुटुंबाला(मुलगा/सून आणि पाच नाती) समर्थ बनविले.
राधिकाताईंच्या प्रभावी लेखनशैलीमुळे जीजी प्रत्येकाला आपली वाटते हेच या व्यक्तीचित्रणाचे यश आहे.
सर्वांनी वाचावे आणि जीवनात सकारात्मकतेचा बोध घ्यावा असे हे पुस्तक जीजी.
पुस्तकाच्या मुखपृष्ठासंबंधी थोडेसे~ मुखपृष्ठावर ज्या काही ओळी छापलेल्या दिसतात ते जीजीचे हस्ताक्षर आहे आणि तिच्या फोटोचे स्केच तिची सगळ्यात
धाकटी नात,जिचे तीन महिन्यापूर्वीच निधन झाले ती उषा ढगे हिने केले आहे.
जीजीच्या बाकीच्या चार नातींनीही त्यांच्या व जीजीच्या एकत्रीत सहवासाचे विविध अनुभव लिहीले आहेत.
राधिकाताईंची ही वाटचाल अशीच सतत चालत राहो आणि त्यांची विविध विषयावरील पुस्तके झपाट्याने प्रकाशित होवोत ह्या माझ्या त्यांना शुभेच्छा!
पुस्तक परिचय – सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈