कॉलेजमध्ये प्रवेश घेताना केतकी अगदी बेचैन होती. मुद्दाम सगळ्यांचा विरोध पत्करून हौसेने तिने शहरातल्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला खरा, पण या सगळ्या मॉडर्न जगात आपला निभाव लागेल का, असं वाटून तिला दडपण आलं फार. खेडजवळ असलेल्या अगदी दहा हजाराची वस्ती असलेल्या खेड्यातून केतकी एकदम शहरात पोचली. आत्तापर्यंत तिचं जग किती सीमित होतं. आजी आजोबा, आई बाबा आणि धाकटा भाऊ कुणाल.
शाळेत अभ्यासात चांगली होती केतकी. अगदी स्कॉलर नाही पण अभ्यासू आणि नाकासमोर बघून चालणारी. केतकीच्या घरची पिढीजात श्रीमंती होती. कित्ती मोठी शेतीवाडी, बागायती गावात आणखी दोन मोठे वाडे. त्यांच्या बांधाला बांध लागून पोतदार काकांचीही शेती घर सगळं होतं. पोतदार सुद्धा कर्वे लोक इतकेच श्रीमंत, जमीनदार आणि प्रतिष्ठित होते. , पण पूर्वी काय घडलं कोणाला माहीत नाही पण या दोन कुटुंबातून विस्तव जात नसे.
— — कर्वे लोकांचं म्हणणं की पोतदारांच्या मागच्या पिढीत खोट्या सह्या करून, लबाड्या करून कर्व्यांच्या जमिनी लुबाडल्या. पैसे चारून सातबारा आपल्या नावावर करून घेतले. कोर्टात कर्वे पोतदारांविरुद्ध केस हरले. मग तर काय, हे वैर कायमचं वाढतच गेलं. कर्व्यांनी आपल्या दोन घरांच्या मध्ये मोठी भिंत बांधून घेतली. , जेणेकरून पोतदारांचे तोंडही बघायला लागू नये.
पोतदारांना दोन मुलगे होते. एक खूप शिकून शहरात स्थायिकच झाला होता. दुसरा असेल केतकी एवढा.
कर्वे कुटुंब आणि पोतदार एकमेकांच्या कोणत्याच भानगडीत पडत नसत की चौकश्या करत नसत. बिचाऱ्या बायकांची मात्र यात फार घुसमट होत असे. , त्यांना एकमेकांशी बोलावेसे वाटे, पण पुरुष लोकांचा दराराच असा होता की कोणी त्यांच्या विरुद्ध जायला धजत नसे.
केतकी शहरात कॉलेजला गेली. नवीन नवीन अगदी बुजरी असलेली केतकी आता या शहरी जीवनाला रुळायला लागली. फार आवडायचं तिला हे मोकळं वातावरण. केतकी आता पक्की शहरी झाली. सुट्टी पडली की केतकी गावाकडे जात असे. नाही म्हटलं तरी तिचं जन्मगाव होतं ते. तिला ओढ होतीच गावाकडची. पण थोड्याच दिवसात तिला तिच्या होस्टेलच्या आठवण यायची. त्या मैत्रिणी, कॉलेज, तिकडचे मोकळे वातावरण अगदी हवंहवंसं वाटे तिला.
केतकी आता शेवटच्या वर्षाला होती. डिग्री नंतर तिने एम ए करायचे ठरवले होते. त्या दिवशी सगळ्या मैत्रिणी केतकीला बोलवायला आल्या.
” केतकी. , आम्ही सगळ्या या शीतल च्या फार्म हाऊस वर दोन दिवस जाणार आहोत. येतेस का? चल ना. मग एकदा हे वर्ष संपलं की कधी कोणाला भेटणार ग आपण? चल की. शीतलच्या बाबांचे फार्महाऊस जवळच आहे दोन तास अंतरावर. चल चल. आपण सात आठ जणी आहोत ”.
केतकीला त्यांचं मन मोडवेना. अगदी उत्साहाने त्या सगळ्या गाड्या करून रमत गमत शीतलच्या फार्म हाऊसवर पोचल्या. खूपच सुंदर होते त्यांचे फार्म हाऊस.
शीतलच्या आईबाबांनी प्रेमाने सगळ्या मुलीचं स्वागत केलं. खाण्या पिण्याची नुसती रेलचेल उडवून दिली त्यांनी. मुली मनसोक्त हिंडल्या, बागेत रमल्या. जवळच तळं होतं तिथे पाण्यात पाय बुडवून बसल्या..
शीतलच्या आई म्हणाल्या, ”बरं झालं ग तुम्ही सगळ्या आलात. आता डिग्री नंतर कोण कुठे जाल सांगता येत नाही. “
त्या दिवशी मुली फिरायला गेल्या आणि येताना अंधार पडल्याचे भान राहिले नाही त्यांना. झपझप चालत येत असताना केतकी एका मोठ्या दगडाला अडखळून जोरात पडली.
आई ग असं तिचं विव्हळणं ऐकून सगळ्या थांबल्या.
“काय झालं केतकी? ”अग बघ ना शीतल. पाय अडखळून पडलेच मी. थांब. मला हात द्या. मी तुम्हाला धरून धरून येते घरापर्यंत. ” केतकीचा पाय भप्प सुजला होता. कळ तिच्या मस्तकात जात होती. त्या वेदना सहन करत ती कशीबशी घरापर्यंत आली.
शीतलच्या आईने बघितलं आणि म्हणाल्या बाई ग! केवढा सुजलाय हा पाय. इथे तर आता डॉक्टर पण नसतात ग. थांब. मी लेप लावून देते. केतकीने तिच्या जवळची पेन किलर गोळी घेतली. दुसऱ्याच दिवशी सगळ्या परत शहरात जाणार होत्याच. रात्रभर केतकीला असह्य वेदना होत होत्या. कधी एकदा शहरात जाऊन डॉक्टरला दाखवते असं झालं तिला. पोचल्यावर तिची मैत्रीण स्नेहा म्हणाली “, केतकी खूप सुजलाय ग पाय. इथून जवळ एक चांगलं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे. मी रिक्षा आणते. आपण जाऊया तिकडे.”
केतकीने मान डोलावली. स्नेहा रिक्षा घेऊन आली आणि दोघीही त्या हॉस्पिटलमध्ये पोचल्या.
थोड्याच वेळात तिला आत नेलं आणि सगळे सोपस्कार झाले.
बाहेर येऊन डॉ. स्नेहाला म्हणाले, ”तुमच्या मिस केतकीना घोट्याजवळ आणि पावलाजवळ दोन फ्रॅक्चर्स आहेत. त्यांना प्लास्टर घालावे लागेल. तुम्ही त्यांचं हॉस्टेल वर मॅनेज कसं करणार? त्या पेक्षा त्यांना आठ दिवस आमच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं तर चालेल का? मग नंतर तुम्ही काय करायचं ते ठरवा. ”
स्नेहा आणि केतकी बरं म्हणाल्या. अशा स्थितीत ती गावाला तरी कशी जाणार होती?
केतकीला प्लास्टर घातले. तिने गावी फोन करून सगळं सांगितलं. आई बाबा आजोबा घाबरून गेले.
“आई तू मुळीच काळजी करूनकोस. मग आठ दिवसांनी तुम्ही आपली गाडी घेऊन याआणि मला घेऊन जा. तोपर्यंत माझं दुखणंही बरंच बरं होईल. ”
डॉक्टरांशी बाबा बोलले आणि त्यांनाही ते पटलं. त्या असह्य वेदना जरा कमी झाल्यावर केतकीला जगाचे भान आले. प्रथमच आज डॉक्टर सकाळच्या राऊंडला आल्यावर ती त्यांच्याशी छान बोलली. त्यांच्या एप्रन वरची नेमप्लेट बघितली तिनं. डॉ. निखिल असं नाव होतं. किती छान रुबाबदार डॉक्टर होता तो. तरुण आणि अगदी हसरा.
“काय मग? बरं वाटतंय का? जेवण आवडतंय का इथलं? ” त्यांनी हसून विचारलं.
“काय लाजवताय सर. माझी घरच्यासारखी काळजी घेतात अहो तुमच्या आया आणि सगळे तुम्ही. ” केतकीच्या डोळ्यात पाणी आलं.
चारच दिवसात केतकीला खूप बरं वाटायला लागलं.
तिचं प्लास्टर आता तीन आठवडे रहाणार होतं.
” डॉक्टर, मी घरी जाऊ का? माझे आईबाबा कार घेऊन मला न्यायला येतील, तुम्ही परवानगी दिलीत तर. मग आम्ही तुम्ही सांगाल तेव्हा प्लास्टर काढायला येऊ” केतकी म्हणाली.
डॉक्टर म्हणाले, ” हो पण नीट औषधे आणि काळजीही घ्या ”
केतकीचे आईवडील दुसऱ्याच दिवशी आले. तिचे आईवडील डॉक्टर निखिल ना भेटले. त्यांचे शतशः आभार मानत हॉस्पिटलचे बिल भरून केतकीला घरी घेऊन गेले. केतकीने जाताना बरोबर खूप पुस्तकं घेतली. आता निदान तीन आठवडे तिला फक्त काठी घेऊन घरातल्या घरात चालायचं होतं. केतकी दुपारी पुस्तक वाचायला लागली की तिचं मन लागत नसे वाचनात.