मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

वहिनी

बंडू आणि बेबीची वहिनी म्हणून गल्लीतले सारेच त्यांना वहिनीच म्हणायचे.  आयुष्याच्या संपूर्ण प्रवासात अनेक स्त्रिया माझ्या जीवनात आल्या. नात्यातल्या,  शेजारपाजारच्या,  काही सहज ओळखीच्या झालेल्या,  काही शिक्षिका,  काही मैत्रिणी,  लग्ना आधीच्या,  लग्नानंतरच्या,  एका संस्थेच्या माध्यमातून काम करण्याच्या निमित्ताने भेटलेल्या तळागाळातल्या स्त्रिया, घरातल्या मदतनीस,  ठिकठिकाणच्या प्रवासात ओळख झालेल्या, निराळ्या धर्माच्या,संस्कृतीच्या,  सहज भेटलेल्या अशा कितीतरी सबल,  दुर्बल,  नीटनेटक्या,  गबाळ्या,  हुशार,  स्वावलंबी,  अगतिक,  असहाय्य, परावलंबी,  जिद्दी,  महत्त्वाकांक्षी तर कुठलंच ध्येय नसलेल्या वारा वाहेल तशा वाहत जाणाऱ्या स्त्रिया मला ठिकठिकाणी भेटल्या पण लहानपणीच्या वहिनींना मात्र माझ्या मनात आजही एक वेगळाच कोपरा मी सांभाळून ठेवलेला आहे.  त्यावेळी वहिनींच्या व्यक्तिमत्त्वातलं जे जाणवलं नाही त्याचा विचार आता आयुष्य भरपूर अनुभवलेल्या माझ्या मनाला जाणवतं आणि नकळत त्या व्यक्तिमत्त्वासमोर माझे हात जुळतात.

विस्तृत कुटुंबाचा भार वहिनींनी पेलला होता.  त्यांचं माहेर सातार्‍याचं. तसा माहेरचाही  बहीण भावंडांचा गोतावळा काही कमी नव्हता पण सातारचे बापूसाहेब ही एक नावलौकिक कमावलेली असामी होती.  साहित्यप्रेमी, नाट्यप्रेमी म्हणून सातारकरांना त्यांची ओळख होती आणि त्यांची ही लाडकी कन्या म्हणजे आम्ही हाक मारत असू त्या वहिनी.  वहिनींनाही बापूसाहेबांचा फार अभिमान होता.  पित्यावर त्यांचं निस्सीम प्रेम होतं.  उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलाबाळांना घेऊन त्या माहेरपणाला सातारी जात आणि परत येत तेव्हा त्यांच्यासोबत धान्य,  कपडे, फळे, भाज्या, मिठाया विशेषत: कंदी पेढे यांची बरीचशी गाठोडी असत. वहिनींचा चेहरा फुललेला असे आणि त्यांच्या मुलांकडून म्हणजेच आमच्या सवंगड्यांकडून आम्हाला साताऱ्याच्या खास गमतीजमती ऐकायलाही मजा यायची.

अशी ही लाडकी बापूसाहेब सातारकर यांची  कन्या सासरी मात्र गणगोताच्या गराड्यात पार जुंपलेली असायची.

आमचं कुटुंब स्वतंत्र होतं. आई-वडील, आजी आणि आम्ही बहिणी. मुळातच वडील एकटेच असल्यामुळे आम्हाला फारशी नातीच नव्हती, विस्तारित नात्यांच्या एकत्र कुटुंबात राहण्याचा आम्हाला अनुभवच नव्हता. त्या पार्श्वभूमीवर या मुल्हेरकरांचे कुटुंब नक्कीच मोठं होतं.  बाबासाहेब आणि वहिनी या कुटुंबाचे बळकट  खांब होते. आर्थिक बाजू सांभाळण्याचं कर्तव्य बाबांचं आणि घर सांभाळण्याची जबाबदारी वहिनींची.  घरात सासरे, नवऱ्याची म्हातारी आजारी आत्या, दीर, नणंद आणि त्यांची पाच मुलं.  धोबी गल्लीतलं त्यांचं घर वडिलोपार्जित असावं.  बाबासाहेबांनी त्यावर वरचा मजला बांधून घेतला होता.  वहिनींच्या आयुष्यात स्वत:चं घर हा एकच हातचा मौलिक असावा. 

त्यावेळी दोनशे रुपये महिन्याची कमाई म्हणजे खूप होती का?  बाबासाहेब आरटीओत होते.  त्यांचाही स्वभाव हसरा, खेळकर, विनोदी आणि परिस्थितीला टक्कर देणारा होता. बाबासाहेब आणि वहिनींच्यात  त्याकाळी घरगुती कारणांमुळे धुसफुस  होतही असेल पण तसं त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि त्याच सामर्थ्यावर वहिनी अनंत छिद्रे असलेला संसार नेटाने शिवत राहिल्या.  काहीच नव्हतं त्यांच्या घरात. झोपायला गाद्या नव्हत्या,  कपड्याचं कपाट नव्हतं,  एका जुनाट पत्र्याच्या पेटीत सगळ्यांचे कपडे ठेवलेले असत. म्हातारी आजारी आत्या— जिला “बाई” म्हणायचे.. त्या दिवसभर खोकायच्या. सासरे नानाही तसे विचित्रच वागायचे पण बंडू बेबी आणि बाबासाहेबा या भावंडांचं मात्र  एकमेकांवर खूप प्रेम होतं.  बेबीला तर कितीतरी लहान वयात जबाबदारीची जाणीव झाली असावी.  ती शाळा, अभ्यास सांभाळून वहिनींना घर कामात अगदी तळमळीने मदत करायची. खरं म्हणजे तिच्या आणि माझ्या वयात फारसं अंतरही नव्हतं पण मला ज्या गोष्टी त्यावेळी येत नव्हत्या त्या ती अतिशय सफाईदारपणे तेव्हा करायची. त्यामुळे बेबी सुद्धा माझ्यासाठी एक कौतुकाची व्यक्ती होती.  शिवाय त्यांच्या घरी सतत पाहुणेही असायचे.  त्यांच्या नात्यातलीच माणसं असत.  काहींची मुलं तर शिक्षणासाठी अथवा परीक्षेचं केंद्र आहे म्हणून त्यांच्या घरी मुक्कामी सुद्धा असायची.  प्रत्येक सण त्यांच्याकडे पारंपारिक पद्धतीने,  साग्रसंगीत साजरा व्हायचा.  दिवाळी आणि गणपती उत्सवाचंच तर फारच सुरेख साजरीकरण  असायचं.  खरं सांगू ? लहानपणी बाह्य गोष्टींचा पगडा मनावर नसतोच.  भले चार बोडक्या भिंतीच असतील  पण त्या भिंतीच्या मधलं जे वातावरण असायचं ना त्याचं आम्हाला खूप आकर्षण होतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रस्थानी वहिनी होत्या. 

किती सुंदर होत्या वहिनी!  लहानसाच पण मोहक चेहरा,  नाकीडोळी नीटस,  डोळ्यात सदैव हसरे आणि प्रेमळ भाव,  लांब सडक केस, ठेंगणा पण लवचिक बांधा,  बोलणं तर इतकं मधुर असायचं …! संसाराची दिवस रात्रीची टोकं सांभाळताना दमछाक झाली होती त्या सौंदर्याची.

अचानक कुणी पाहुणा दारी आला की पटकन त्या लांब सडक केसांची कशीतरी  गाठ बांधायच्या, घरातलंच गुंडाळलेलं लुगडं,  सैल झंपर सावरत अनवाणीच लगबगीने वाण्याकडे जायच्या. उधार उसनवारी करून वाणसामान आणायच्या आणि आलेल्या पाहुण्यांना पोटभर जेवायला घालून त्याने दिलेल्या तृप्तीच्या ढेकरानेच त्या समाधानी व्हायच्या. वहिनी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा. साधं  “लिंबाचं सरबत सुद्धा”  अमृतासारखं असायचं.  त्यांच्या हातच्या फोडणीच्या भाताची चव तर मी आजही विसरलेली नाही.  अनेक खाद्यपदार्थांच्या चवीत त्यांच्या हाताची चव मिसळलेली असायची.  मला आजही आठवतं सकाळचे उरलेले जेवण लहान लहान भांड्यातून एका मोठ्या परातीत पाणी घालून त्यात ठेवलेलं असायचं,  त्यावर झाकण म्हणून एखादा फडका असायचा. शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर मी कित्येकदा चित्रा, बेबी बरोबर त्या परातीतलं सकाळचं जेवण जेवलेली आहे. साधंच तर असायचं.   पोळी, कधी आंबट वरण, उसळ, नाहीतर वालाचं बिरडं, किंवा माशाचं कालवण  पण त्या स्वादिष्ट जेवणाने खरोखरच आत्म्याची तृप्ती व्हायची. त्या आठवणीने आजही माझ्या तोंडाला पाणी सुटतं!  लहानपणी कुठे कळत होतं कुणाची आर्थिक चणचण, संसारातली ओढाताण, काळज्या,  चिंता.  एका चपातीचीही वाटणी करणे किती मुश्कील असतं हा विचार बालमनाला कधीच शिवला नाही. घरात जशी आई असते ना तशीच या समोरच्या घरातली ही वहिनी होती. आम्हाला कधीच जाणवलं नाही की वहिनींच्या गोऱ्यापान,  सुरेख, घाटदार मनगटावर गोठ पाटल्या नव्हत्या.  होत्या त्या दोन काचेच्या बांगड्या.  त्यांच्या गळ्यात काळ्या  मण्याची सुतात ओवलेली पोतही आम्हाला सुंदर वाटायची.  त्यांच्या पायात वाहणा होत्या की नव्हत्या हे आम्ही कधीच पाहिले नाही.  आम्हाला आठवते ते सणासुदीच्या दिवशी खोलीभर पसरून ठेवलेला सुगंधित, खमंगपणा दरवळणारा केवढा तरी  चुलीवर  शिजवलेला स्वयंपाक आणि पाहुण्यांनी भरगच्च भरलेलं ते घर आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद लुटणाऱ्या त्या पंगती आणि हसतमुखाने आग्रह कर करून वाढणाऱ्या वहिनी.  हे सगळं त्यांना कसं जमत होतं हा विचार आता मनात येतो. 

मला टायफॉईड झाला होता.तोंडाची चव पार गेली होती. वहिनी रोजच माझ्याजवळ येऊन बसायच्या. एकदिवस मी त्यांना म्हटलं, “शेवळाची कणी नाही का केली?” दुसर्‍या दिवशी त्या माझ्यासाठी वाटीभर “शेवळाची कणी” घेउन आल्या. अत्यंत किचकट पण स्वादीष्ट पदार्थ.पण वहिनी झटपट बनवायच्या. 

काळ थांबत नाही.  काळा बरोबर जीवन सरकतं  नाना—बाई स्वर्गस्थ झाले. बाबासाहेबांनी यथाशक्ती बहीण भावाला  त्यांना पायावर उभे राहण्यापुरतं शिक्षण दिलं.  बेबी च्या लग्नात आईच्या मायेने वहिनींनी तिची पाठवणी केली. आयुष्याच्या वाटेवर नणंद भावजयीत वाद झाले असतील पण काळाच्या ओघात ते वाहून गेलं.  एक अलौकिक मायलेकीचं घट्ट नातं त्यांच्यात टिकून राहिलं.  माहेरचा उंबरठा ओलांडताना दोघींच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या.  विलक्षण वात्सल्याचं ते दृश्य होतं. बेबी आजही म्हणते!” मी माझी आई पाहिली नाही.  मला माझी आई आठवत नाही पण वहिनीच माझी आई होती.”

 धन, संपत्ती, श्रीमंती म्हणजे काय असतं हो?  शब्द, भावनांमधून जे आत्म्याला बिलगतं त्याहून मौल्यवान काहीच नसतं.

बाबा वहिनींची मुलंही मार्गी लागली, चतुर्भुज झाली.  जुनं मागे टाकून वहिनींचा संसार असा नव्याने पुन्हा फुलून गेला.  पण वहिनी त्याच होत्या. तेव्हाही आणि आताही. 

बाबासाहेब निवृत्त झाले तेव्हा काही फंडांचे पैसे त्यांना मिळाले. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. तेव्हा ते म्हणाले,” सहजीवनात मी तृप्त आहे. मला अशी सहचारिणी मिळाली की जिने माझ्या डगमगत्या जीवन नौकेतून हसतमुखाने  सोबत केली.  माझ्या नौकेची  वल्ही  तीच होती.  मी तिच्यासाठी काहीच केलं नाही.  तिचं डोंगराएवढं ॠण मी काही फेडू शकणार नाही पण आज मी तिच्या भुंड्या मनगटावर स्वतःच्या हाताने हे सोन्याचे बिलवर घालणार आहे. “ .. त्यावेळचे  वहिनींच्या चेहऱ्यावरचे भाव मी कोणत्या शब्दात टिपू?  पण त्या क्षणी त्यांच्या परसदारीचा सोनचाफ्याचा वृक्ष अंगोपांगी फुलला होता आणि त्या कांचन वृक्षाचा दरवळ असमंतात पसरला होता. तो सुवर्ण वृक्ष म्हणजे वहिनींच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होता आणि तोही जणू काही अंतर्यामी आनंदला होता.

अशोक (त्यांचा लेक)  एअर इंडियात असताना त्याने वहिनी आणि बाबासाहेबांसाठी लंडनची सहल आयोजित केली. विमानाची तिकिटे तर विना शुल्क होती. बाकीचा खर्च त्यांनी केला असावा.  वहिनींना मुळीच जायचं नव्हतं पण सगळ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी अखेर जाण्याचे मान्य केले. वहिनींच्या आयुष्यात असा क्षण येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते पण त्याचवेळी त्यांच्या प्रियजनांचा आनंदही खूप मोठा होता. त्या जेव्हा लंडनून परत आल्या तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होते. धोबी गल्ली ते लंडन— वहिनींच्या आयुष्यातला अकल्पित टप्पा होता तो!  मी त्यांना विचारलं,” कसा वाटला राणीचा देश ?”

तेव्हा त्या हात झटकून म्हणाल्या,” काय की बाई, एक मिनिटंही मी बाबासाहेबांचा हात सोडला नाही.  कधी घरी जाते असं झालं होतं मला! “

 .. .. .. त्यावेळी मात्र वहिनींकडे पाहताना “इथेच माझे पंढरपुर”  म्हणणारी ती वारकरीणच मला आठवली.

“ ते जाऊदे ग!  हे बघ सकाळी थोडी तळलेली कलेजी केली होती. खातेस का?”

 .. .. त्या क्षणी मला आठवलं ते मोठ्या परातीत पाणी घालून झाकून ठेवलेलं सकाळचं उरलेलं चविष्ट जेवण!

 या क्षणी माझ्याजवळ होती ती तीच अन्नपूर्णा वहिनी.  प्रेमाने खाऊ घालणारी माऊली…

 आज वहिनी नाहीत पण जेव्हा जेव्हा मी काटेरी फांदीवर उमललेलं टवटवीत गुलाबाचे फुल पाहते तेव्हा मला वहिनींचीच आठवण येते..

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्याचं असं झालं… भाग-१- लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

डॉ. संदीप श्रोत्री

परिचय

शिक्षण – MBBS.MS. FIAGES. (लॅप्रास्कोपी व जी आय एंडोस्कोपी सर्जन.सातारा.)

फाउंडर सेक्रेटरी, सातारा सर्जिकल सोसायटी, फाउंडर सेक्रेटरी,असोसिएशन ऑफ हाॅस्पिटल ओनर्स, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संस्थांचे पदाधिकारी. तसेच या क्षेत्रातून सामाजिक सेवेचे उपक्रम यशस्वी रित्या राबवले आहेत.

कार्य व सन्मान:

  • संस्थापक, रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ, सातारा
  • दुर्ग साहित्य संमेलनांचे आयोजन व सक्रीय सहभाग
  • वन्य लोकसंस्कृती व जैव विविधता यांच्या संवर्धनासाठी अनेक प्रकारे जनजागृती
  • डोंगर पठारावरील वनस्पतीत व पक्षी यांचा विशेष अभ्यास
  • हिमालय ट्रेकिंग मोहिम… सहभाग व लेखन
  • पक्षीनिरीक्षण, आकाशदर्शन, वृक्षारोपण, जलसंधारण यावर व्याख्याने,स्लाईड शो, वृत्तपत्रीय लेखन
  • वसंत व्याख्यानमाला, पुणे
  • निमंत्रित विख्यात :  इंडिया क्लब, दुबई येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त व्याख्यान… “माझी भटकंती” इत्यादी
  • अध्यक्ष, तिसरे ‘ शिवार ‘ साहित्य संमेलन. इत्यादी

पुरस्कार

वसुंधरा पर्यावरण पुरस्कार, किर्लोस्कर वसुंधरा सन्मान, कोयना निसर्ग मित्र पुरस्कार, द. महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, मुंबई मराठी प्रवासी संघटना पुरस्कार, गिरिमित्र सन्मान पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी(कासवाचे बेट),  वसुंधरा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार (कासवाचे बेट),  श्री स्थानक ठाणे मराठी ग्रंथालय पुरस्कार (उत्कृष्ट प्रवास वर्णन), धन्वंतरी पुरस्कार, महाराष्ट्र. राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ यांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (कासवाचे बेट)

प्रकाशित साहित्य

एव्हरेस्टच्या पायथ्याशी, पुष्पपठार कास, मार्क इंग्लिस, साद अन्नपूर्णेची, काटेरी केनियाची मुलायम सफर, दुर्ग महाराष्ट्रातील, कासवांचे बेट, मनू राष्ट्रीय अरण्य, इंकांची देवनगरी, रहस्यमय पेरु, निसर्ग गुपिते भाग १, सातशे पेक्षा जास्त लेखांचे विविध माध्यमातून प्रकाशन

? इंद्रधनुष्य ?

☆ त्याचं असं झालं… भाग-१ – लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

(एक आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा आगळा वेगळा परिचय)  

पुस्तक : त्या चं असं झालं

लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर   

प्रकाशक : चतुरंग प्रकाशन 

पृष्ठ : 264 

किंमत :  रु. 150

त्याचं असं झालं, .. मी एकदा दुपारी सांगली मधील क्लिनिकमध्ये बसलो होतो, मला मिरज येथील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ डी के गोसावी यांच्याकडून फक्त ‘एक व्ही आय पी रुग्ण’ येणार आहे, इतकेच माहिती होते, आणि त्या मागील दराने आत येतील. बरोबर साडे तीन वाजता मागील दारात एक गाडी थांबली, गाडीतून पांढरीशुभ्र साडी नेसलेली एक शालीन, डोक्यावरून पदर घेतलेली, नम्र स्त्री उतरली, तिने तिच्या जगप्रसिद्ध खळाळत्या हास्यमय आवाजात सांगितले, ‘नमस्कार डॉक्टर साहेब, माझाच छातीचा एक्स रे काढायचा आहे!’ अंदाजे तासभर ती माझ्या क्लिनिक मध्ये होती. एकूण आठ एक्सरे मला काढायला लागले. त्या दरम्यान माझ्या गाण्याच्या आवडीमुळे आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या, इतक्या कि ‘सैंया’ चित्रपटातील ‘काली काली रात रे, बडा सताये, तेरी याद में..’ हे गाणे आठवून आम्ही दोघांनी मिळून एकसुरात गुणगुणलो! ती होती गान कोकिळा, स्वरशारदा लता मंगेशकर !

त्याचं असं झालं, .. दुपारी डॉ डी के गोसावी यांचा फोन आला, त्यांच्या मिरज येथील फार्म हाउस वर गप्पा मारायला संध्याकाळी बोलावले होते. मी वेळेवर गेलो, टेबलावर स्कॉच आणि तीन ग्लास ठेवलेले होते, एक अस्ताव्यस्त केस वाढवलेला गोरापान लहान चणीचा माणूस बसला होता. डॉक्टरांनी ओळख करून दिली, हे कविवर्य बा भ बोरकर!

त्याचं असं झालं, .. ती व्यक्ती दोन वेळा माझ्या घरी राहिली होती, तोंडात पान सतत असल्यामुळे ओठाचा चंबू, चणीने लहान, बुटके, गोल चेहरा, गोबरे गाल. त्यांचा एक्स रे छातीचा मी बघितला आणि म्हणले, ‘एक फुफ्फुस अर्ध्यापेक्षा जास्त निकामी, दुसरे देखील हवेचे फुगे झाल्यामुळे (एम्फिझिमा) लवकरच कामातून बाद होणार! तरिही ते गात होते, तासंतास! त्यांचे नाव पंडित कुमार गंधर्व ! 

त्याचं असं झालं, .. मिरज रेल्वे स्टेशनवर मित्राला सोडायला गेलो होतो, खूप गर्दीमध्ये पाठीवर थाप पडली, मागे वळून बघितले तर दोन मित्र होते, त्यांना मुंबईला जायचे होते. इथे रेल्वे बदलावी लागायची, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये त्यांना जागा मिळत नव्हती. रिझर्वेशन केले नव्हते, अगदी काकुळतीला येऊन त्यांनी मदतीसाठी विचारले. त्याचवेळी माझा मित्र असलेला आमदार विक्रम घाटगे भेटला, त्यांने दोन बर्थ मिळवून दिले, त्या दोघांपैकी एक होता माझा खास मित्र मुकुंद जोशी आणि दुसरा होता आमचा मित्र सुनील गावस्कर!

त्याचं असं झालं, ..  एकदा सांगली सिव्हील हॉस्पिटलसाठी एकस रे मशीन खरेदी करण्यासाठी मुंबईमध्ये गेलो होतो, कामे आटोपून सचिवालयाजवळ फिरत असताना समोर स्टेट बँकेची इमारत होती, नुकताच आपल्या क्रिकेट टीमने इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्यावर विजय मिळविला होता. सहज म्हणून वर गेलो. केबिनबाहेरील सेक्रेटरीकडे ‘ओल्ड फ्रेंड’ म्हणले आणि स्वतःचे नाव न लिहिता चिठ्ठी दिली, आतून ती व्यक्ती स्वतः बाहेर आली, दार उघडल्याक्षणी मला मिठी मारून विचारले, ‘काय श्री, काय म्हणतोस?’ ती व्यक्ती होती, भारताचा यशस्वी कर्णधार अजित वाडेकर ! 

त्याचं असं झालं, .. सांगलीच्या पोलीस सांस्कृतिक भवनाच्या हॉलमध्ये माडीवर व्हरांड्यात मोडकळीस आलेल्या दोन खुर्च्या हाताने साफ करून दोन व्यक्ती बसल्या होत्या, एका पोलिसाने आणलेल्या मळकट किटलीमधून दोन कप चहाचे भरले, ते कप देखील कळकट आणि टवके उडालेले होते, चहा आणि बिस्कीट खात गप्पा मारत बसलेल्या त्या दोन व्यक्तिपैकी एक म्हणजे मी होतो, आणि दुसरी व्यक्ती होती भारताचे माजी  पंतप्रधान चौधरी चरणसिंग!

त्याचं असं झालं, ..  एकदा सकाळी माझे मित्र माधवराव आपटे यांचा फोन आला, लगेच विलिंग्डन क्लब वर ये, आम्ही तिघे आहोत, चौथा पार्टनर हवा आहे. मी गेलो. हातात रॅकेट, पायात महागडे बूट घालून माझी वाट पाहणारे ते होते प्रसिद्ध उद्योगपती  श्री आदित्य बिर्ला! 

त्याचं असं झालं, ..  सांगलीमध्ये एकदा १९९४ साली प्रभाताई कुलकर्णी यांच्या एका कारखान्याचा उद्घाटन समारंभ होता. सूत्रसंचालन मी करणार होतो, माझ्या इंग्रजी संभाषण कलेमुळे कारखाना दाखवण्याची जबाबदारी देखील माझीच होती. पाहुणे आले. समारंभ छान पार पडला, शेवटी पाहुण्यांनी माझी ओळख झाल्यावर एकाच वाक्य म्हणले, ‘नेव्हर इमाजिंन्ड यु आर अ मेडिकल डॉक्टर!’ ती व्यक्ती होती,  श्री रतन टाटा!

त्याचं असं झालं, ..  घरीच संध्याकाळी गप्पा रंगात आल्या होत्या, समोरची व्यक्ती सांगत होती, ‘आमच्या वाटेला हिरॉईन कधी येत नाही, येतात त्या मर्कटचेष्टा करणाऱ्या बारबाला, स्कॉच बाटलीमधील कोरा काळा कडू चहा आम्हाला प्यावा लागतो आणि झिंगावे लागते खोटे खोटे ! आम्ही पडलो व्हिलन, आमच्या गोळीबारात कधी कुणी मारत नाही, उलट हिरोच्या मात्र प्रत्येक गोळीने एकेक मुडदा पडतो.’ ती व्यक्ती होती सदाशिव अमरापूरकर!

त्याचं असं झालं, ..  माझा मित्र डॉ आडिगा याचा फोन आला, आज रात्री साडेसात वाजता घरी जेवायला यायचे आहे. मी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी पोहोचलो. तिसर्या मजल्यावरील खोलीत तीन खुर्च्या होत्या, टेबलावर ‘जॉनी वॉकर’ होती, समोरच्या खुर्चीत एक वृद्ध सद्गृहस्थ बसले होते, गोरेपान, तुळतुळीत टक्कल, भुरभुरणारे किरकोळ पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, झब्बा आणि त्यावर असणारी सोनेरी बटणे.  ते होते ओंकारप्रसाद उर्फ ओ पी नय्यर! 

त्याचं असं झालं, ..  घरी ‘काका’ आले होते, गप्पांना सुरुवात होणार, तितक्यात लेदर बॅगमध्ये हात घालता घालता काका म्हणाले, ‘चला संध्येची वेळ झाली’, मी म्हणले, ‘काका तुम्ही माझ्या घरी आहात, तेंव्हा व्हिस्की माझी!’  गप्पा रंगात येत असताना मध्येच काका ओरडून माझ्या बायकोला सांगतात, ‘सुधाताई, आमचं अमृतप्राशन झाल ग, आता वाढ!’ मला वाटले, काका स्वतःच्या कवितेतील अनुभूती आणि त्यांचा जन्म उलगडून सांगत होते, त्यावेळी त्या ग्लासमध्ये जे काही असते, ती दारू नसतीच, ते असते अमृत! आणि काका म्हणजे साक्षात कविवर्य ‘मंगेश पाडगावकर’!

त्याचं असं झालं, ..  बंगल्याच्या दारात एक मर्सिडीज गाडी उभी होती, पांढरीशुभ्र लुंगी आणि नुकतीच अंघोळ केलेला उघडाबंब तुकतुकीत देह सांभाळत ती व्यक्ती मनापासून गाडी धूत आणि पुसत बसली होती. मीही त्यांच्याबरोबर हातात फडके घेतले आणि ती गाडी पुसायला लागलो. सकाळची वेळ, त्या वेळी दूरदर्शनवर रामायण मालिका सुरु होती. आमच्या घरात आणि आसपासच्या बंगल्यातदेखील त्याचा आवाज मोठा असल्यामुळे आमच्यापर्यंत येत होता. रविंद्र जैन यांचे संगीत रामायण मालिकेमध्ये भरपूर आहे. विविध प्रसंगात विविध रागांचा वापर केल्यामुळे मालिकेमध्ये रंगत आली आहे. तिकडे तो राग ऐकला कि गाडी धुता धुता इकडे ती व्यक्ती त्या रागांचे विस्तारण करून, विडंबन करत गंमतजमत करून गात होती. तिकडे रामायण संपले, इकडे गाडी स्वच्छ धुवून झाली, मी ऐकत होतो आणि गाणारी व्यक्ती होती, ‘पंडित भीमसेन जोशी !’ 

  – क्रमशः भाग पहिला 

© डॉ. संदीप गजानन श्रोत्री,

सातारा 

मो 9822058583

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – सुख… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – सुख… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सुख म्हटलं की नकळत प्रशांत दामले समोर आले.. सुख म्हणजे नक्की काय असतं..काय पुण्य असतं की ते घर बसल्या मिळतं..अर्थात सुखाच्या कल्पना प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या असतात.. कोणाला कशात सुख वाटेल हे सांगता येणं कठीण आहे.. करोडोंच्या घरात राहणाऱ्या, गाडी घोड्यातून फिरणाऱ्या,दिमतीला नोकरचाकर असणाऱ्या.. सर्व सोयी सुविधा पायाशी लोळण घेत असणारी व्यक्ती सुखी असेलच असे नाही.. ह्या उलट काही वेळा झोपडी वजा छोट्याश्या घरात राहणारी आणि उद्या काय हा प्रश्न असणारी व्यक्ती सुद्धा आजचा दिवस छान गेला ना मग झालं तर म्हणून नेहमी सुखात असलेली पहायला मिळते.. म्हणूनच तर सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना ह्या भिन्न असतात..आता माझ्या बाबतील म्हणाल तर माझी विशेष अशी जगावेगळी सुखाची काही कल्पना नाहीय.. तरीही.. पहाटेच्या शितल वाऱ्याची झुळूक.. क्षितिजावर पसरलेला लालिमा, मध्येच पक्षांचा ऐकू येणारा किलबिलाट, ह्या सगळ्यांना चार चाँद लावणारा मोगरा, जुई चा सुगंध म्हणजे सुख.. अशावेळी नुकतेच उठून आपण गॅलरीत ह्या निसर्गाचं रूप डोळ्यात साठवतो आहोत आणि आपल्या सख्या ने आपल्या हातात आयता चहा द्यावा आणि मग गप्पांची मैफिल पहाटेच रंगावी हे म्हणजे सुख… बागेत खूप दिवसांनी अचानक उमललेल एखादं गोंडस फुलं अचानक दृष्टीस पडावं हे म्हणजे सुख..स्वयंपाकघरात काम करताना तडतडनारी मोहरी आणि हिंगाचा तो घरभर भरून राहिलेला सुगंध.. आणि घरच्यांनी वा फक्कड झालीय फोडणी म्हणून केलेलं छोटंसं कौतुक म्हणजे सुख.. लेकीने प्रेमाने बनवून दिलेलं साद्या कागदावरच छोटंसं ड्रॉइंग ग्रीटिंग म्हणजे सुख.. मान्सून च्या पहिल्या पावसात चिंब भिजता येणं म्हणजे सुख.. एखादं बीज अंकुरताना त्याला रोज वाढताना पाहणं म्हणजे सुख.. रखरखत्या प्रवासात थंडगार चिंब हिरवी, नजर जाईल तिथ पर्यंत भाताची डोलणारी शेत अचानक दृष्टीस पडावी हे म्हणजे सुख…एखाद्या टपरीवरचा चहा पिताना आपल्या मैत्रिणीची आलेली गोड आठवण म्हणजे सुख..काही वेळा नुसतच बसून जुन्या गोड रम्य आठवणीत रमता येणं म्हणजे सुख..चांदण्या रात्री दूर समुद्र किनारी अनवाणी पायांनी त्या मऊशार वाळूवर सख्याच्या हातात हात घालून नुसत फिरत राहणं म्हणजे सुख.. तुफान कोसळत्या पाऊसधारा हातात चहा चा कप घेऊन खिडकीत बसून पाहत राहणं म्हणजे सुख.. एखादं सुंदर पुस्तक वाचताना स्थळ काळाच भान विसरून जाणं म्हणजे सुख…एखाद्या विशाल धबधब्या कडे पाहत राहण, त्याचे तुषार अंगावर झेलणं म्हणजे सुख… खरं सांगू का मैत्रिणींनो ह्या विषयावर मी इतकं लिहू शकते की एक पुस्तकं होईल.. पण खरचं मानलं तर दगडात ही देव दिसतो नाहीतर काहीच नाही.. तसचं सुखाच आहे.. सुख आपल्या मनात असतं.. कुठल्या गोष्टी, कुठली परिस्थिती त्याच्यात बदल घडवू शकते असं मला तर नाही वाटतं..सुखाची कल्पना प्रत्येकाची भिन्न असली तरी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतातच.. तो भरभरून देत असतो प्रत्येकाला.. अर्थातच ते ओळखता आलं पाहिजे.. सुख हे मानण्यावर आहे.. तसचं सुख हे मान्य करण्यावर ही आहे.. माझ्यासाठी तर मन उल्हसित करणारा प्रत्येक क्षण म्हणजे सुख आहे.. आणि असे सुखद क्षण माझ्या आयुष्यात रोज नव्या रुपात माझ्या आयुष्यात येतात आणि हो मला ते कळतात हे माझं भाग्य आहे…

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंग मनाचे… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ रंग मनाचे… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

कोकणांतील एक गावात गायत्रीचा जन्म झाला. पु. ल देशपांडे यांनी ‘अंतु बरवा ‘चे केलेलं वर्णन आणि गायत्रीच्या बाबांचे केलेले वर्णन यात फार फरक नसावा. एक काळ होता, तेव्हा अर्धी अधिक घरे पेंढ्यांनी शाकारलेली, एखादं दुसरे घर कौलारू असायचे. गावात एखाद दुसरा श्रीमंत असायचा, बाकीचे सर्व गरीब. त्यामुळे गरिबीची कोणाला लाज वाटतं नव्हती. कोकण आणि गरिबी या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जायच्या.

गायत्रीच्या कुटुंबात ६ जण. आई वडील आणि चार भावंडे. ही सर्वात मोठी, मग दोन बहिणी आणि दोन भाऊ. वडिलांची शेती/वाडी. काटकसरीने संसार करुन त्यांनी चारी मुलांना शिकविले. उपवर झाल्यावर गायत्रीच्या लग्नाचा विचार सुरू झाला. बरेच प्रयत्न केल्यानंतर तिचे लग्न ठरले. सासर शहरात होते. शहरात कधीही न राहिलेली मुलगी आता कायम शहरात राहण्यासाठी जाणार होती..

लग्न झालं, संसार सुरू झाला. मग सामान्य घरात ज्या गोष्टी घडतात त्या घडू लागल्या. सासू आणि सून…. हे एक न उलगडणारं कोडं आहे. दोघींची बाजू ऐकली तर आपल्याला दोघींचे म्हणणे पटते, बाजू कोणाची घ्यायची? समजूत कशी काढायची आणि सल्ला काय द्यायचा ? तिची घुसमट व्हायला लागली. गाव दूर, संपर्काचे साधन नाही. पत्र टाकले तर घरात सर्वांना कळणार. त्यामुळे तिने ‘मौन’ राहायचे ठरवले.

एकदा तिचा भाऊ आला तिला भेटायला. भावाशी तिचं नातं एकदम घट्ट होतं. भाऊ वयाने तिच्यापेक्षा लहान होता, पण तिची समजूत काढण्याइतपत विचारी होता. त्याने सर्व ऐकून घेतले आणि एकच वाक्य बोलला, “ ताई !! प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार बोलत असतो…. कुत्रा भुंकणार, मांजर म्याव म्याव करणार….. “ 

… या एका वाक्याने गायत्रीला उभारी आली…. मग गायत्री कधीच दुःखी झाली नाही.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “‘हो ची मिन्ह‘ च्या विमानतळावरची दिवाळी…” ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

??

हो ची मिन्ह‘ च्या विमानतळावरची दिवाळी…☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

मोठी सुट्टी लागली की एखादी परदेशात सहल करावी असे बरेच दिवसापासून मनात होते. माझी आणि मुलीची सुट्टी अगदी दिवाळीच्या दिवसातच होती, त्यामुळे दिवाळी घरी साजरी न करता सहलीला जायचे ठरवले.

खूप विचारपूस व चौकशी केल्यावर आम्ही एक आठवड्याची व्हिएटनामची सहल ठरवली. दिवाळीचे कुठलेच दिवस घरी नसल्यामुळे दिवे पणत्या, आकाशकंदील रांगोळी, फराळ बनवणे ह्या सगळ्या गोष्टी सोडून फिरायला जावे लागत होते त्यामुळे मनात थोडी खंत होते. पण सुट्टी कमी असल्यामुळे तसे करणे भाग होते.

मुंबईहून आम्ही सकाळी हो ची मिन्ह ला पोचल्यावर जेवण कुठे करता येईल ह्याचा शोध घेत आम्ही खूप फिरलो. शुद्ध शाकाहारी जेवणाच्या शोधात खूप वेळ गेला व शेवटी दमल्यामुळे राहत्या हॉटेलमध्येच अननसाचा भात व बटाट्याच्या चिप्स यावर जेवण भागवावे लागले. एकूण काय तर जेवणाची आबाळच झाली. हे जेवतांना घरच्या भाजी भाकरीची निश्चितच आठवण आली. यापुढे प्रवासात जेवण कसे मिळेल ह्याची मनात पाल चुकचुकली.

रात्री मात्र केळीच्या पानात छान जेवण जेवायला मिळाले. दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात भारतीय भोजनालय शोधून गूगलची मदत घेवून आम्ही तंदूर नावाच्या हॉटेलमध्ये पोहचलो. दारातच शिवलिंग व त्याचा अभिषेक आणि दुसऱ्या बाजूला गणपती, लक्ष्मी, बाळकृष्ण अशा अनेक देवदेवतांच्या मोहक मुर्त्या मांडल्या होत्या. त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न वाटले. जगजितसिंहची गझल कानावर पडली आणि आनंदात अजून भर पडली. मेनू कार्ड बघून तर आनंद अगदी द्विगुणित झाला. कांदा भजीपासून खिचडी पर्यंत सगळे पदार्थ तिथे उपलब्ध होते. तृप्तीची ढेकर देत आम्ही आमच्या राहत्या स्थळी पोहोचलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच आम्हाला ‘ मॅकाँग डेल्टा ‘ बघायला जायचे होते. नाश्ता करायला गेलो आणि जरा हिरमुडच झाली. उकडलेले रताळे, कणीस, कच्च्या भाज्या आणि फळे ह्या पुढे फारसे काही शाकाहारी तिथे नव्हते. जे काही एक दोन भाताचे प्रकार होते त्यालाही फार काही चव नव्हती. तिथले लोक एवढे तंदुरुस्त ह्या जेवणामुळेच असावेत. मग भाज्या व फळे आणि ब्रेड खाऊन आम्ही गाडीची वाट पाहत बसलो. आम्हाला मॅकाँग डेल्टा बघायला जायचे होते व दुपारी तिथेच आमच्या जेवणाची सोय केली होती.

आम्ही जेवायला पोहोचलो तेव्हा काही स्टार्टर्स आमच्या टेबल वर आधीच ठेवले होते ते पाहून जरा बरे वाटले. नंतर खूप मोठ्या मोठ्या भाज्यांचे तुकडे असलेली पाणीदार भाजी आणि कोरडा पांढरा भात असे आम्हाला जेवायला आणून दिले गेले. एकूण काय बाहेर कितीही सृष्टी सौंदर्य असले तरी जेवण स्वादिष्ट मिळाले नाही तर चिडचिड होतेच. एकूणच हो ची मिन्ह ला फळं, फुलं आणि आत्ता ह्या भाज्या सगळे आकाराने खूप मोठे मोठे होते. दुसरा काही पर्याय नसल्यामुळे आम्हाला मिळालेल्या जेवणामधेच समाधान मानावे लागले. रात्रीच्या जेवणासाठी आम्ही भारतीय हॉटेल शोधले. इथल्या हॉटेलमध्ये चक्क मसाला डोसा, मेदू वडा व पावभाजी मिळाली व खूप छान वाटले.

दुसऱ्या दिवशी आम्हाला ‘दनांग’ ला जायचे होते म्हणून आम्ही परत त्या उकडलेल्या भाज्या व फळे खाऊन विमानतळावर आलो. विमानतळावर आल्यावर समजले की दनांगला जायचे विमान जवळ जवळ दोन तास उशीराने येणार आहे. त्यामुळें विमानतळावरच खूप वेळ घालवावा लागणार होता. अचानक तिथे एक चाळीस जणांचा घोळका आला. चौकशी केल्यावर समजले की ते मुंबईहून शाह कंपनीतर्फे व्हिएतनाम फिरायला आले आहेत. आम्ही आमच्या जवळचे फराळाचे पदार्थ खात वेळ घालवत होतो. त्यांच्यातील एकाने सगळ्यांना जेवणाची पॅक ताटे दिली. सगळेजण अगदी हसत खेळत आवडीने जेवू लागले. खूप दिवसांनीं ओळखीच्या अन्नाचा सुवास अगदी हवाहवासा वाटला. अचानक एक व्यक्ती तीन ताटे घेऊन आमच्याकडे आली आणि आम्हाला जेवायचा आग्रह करू लागली. तिथे भारतीय आम्हीच होतो म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जास्ती असलेली ताटे आम्हाला दिली व ते आम्हाला जेवायचा आग्रह करू लागले.

त्यांनी खूपच आग्रह केल्यावर आम्ही त्याच्यातील एक जेवणाचे ताट घेतले. जेवण खूपच स्वादिष्ट होते. त्यानंतर एकजण आमच्यासाठी गुलाबजाम घेऊन आला व आग्रहाने आम्हाला त्यांनी ते खाऊ घातले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या पद्धतीचे अगदी स्वादिष्ट जेवण मिळाले त्यामुळे मन अगदी तृप्त झाले.

ह्या सर्व प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे.. बाहेर कितीही सृष्टी सौंदर्य असेल, झगमगाट असेल, तरी घरची भाजी भाकरी किंवा भारतीय जेवण करून आम्हाला जे समाधान मिळाले ते खूप जास्त होते.

धनत्रयोदशीच्या दिवशी भारतीय जेवणाचा आस्वाद घेता आला.

…. ‘ हो ची मिन्ह ‘ ला विमानतळावर दिवाळीच्या दिवशी जे स्वादिष्ट जेवण मिळाले त्यामुळे दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाल्यासारखे वाटले.

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अलेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ अलेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर

अलेक पद्मसी

त्या दिवशी ‘लिंटास’ मध्ये मिटींग होती. ‘युनीलिव्हर’ चं एक प्रॉडक्ट ‘रिन डिटर्जंट बार’ भारतामध्ये लॉंच करायचं होतं. तसं हे प्रॉडक्ट इतर देशात फेल गेलेलं.. ‘लिव्हर्स’ चा आग्रह होता की जाहिराती मध्ये ‘हा बार स्वस्त आहे’ यावर भर द्यावा पण अलेक आणि त्याच्या टिमचं म्हणणं.. शुभ्रतेवर भर द्यावा.

बऱ्याच चर्चेनंतर अखेर भर शुभ्रतेवरच द्यावा हे म्हणणं मान्य झालं. आणि मग अलेक पद्मसी आणि त्याच्या सहकार्यांनी ‘ती’ जाहिरात बनवली आसमंतातुन येणारा विजेचा झोत.. आणि मग त्यामागे येणारे शब्द..

Whitening strikes again and again with RIN

आणि मग त्यानंतर इतिहास घडला. रिन आणि भारताचे अतूट नाते निर्माण झाले. रिनच्या विक्रीचे आकडे छप्पर फाडून वर गेले.

अगदी याउलट झाले ते काहीवर्षांनंतर. ‘निरमा’ पावडरचा खप प्रचंड वाढला होता. ‘सर्फ’ ची विक्री खूपच घसरलेली. ‘सर्फ’ साठी नवीन जाहिरात बनवायची होती. पुन्हा एकदा अलेक पदमसी आणि त्याची टीम कामाला लागली. यावेळी ‘लिव्हर्स’ चं म्हणणं जाहीरातीत शुभ्रतेवर भर द्यावा. वास्तविक ‘निरमा’ च्या तुलनेत ‘सर्फ’ खूपच महाग होता. यावेळी अलेकचं म्हणणं वेगळं होतं. अर्धा किलो सर्फ एक किलो निरमाच्या बरोबरीचा आहे हे त्याला गिऱ्हाईकांना पटवून द्यायचं होतं. अंतिमतः सर्फच घेणं फायदेशीर कसं आहे हे दाखवण्यासाठी त्याने एक भारतीय गृहिणी उभी केली.. ‘ललिताजी’ तिचं नाव. वेगवेगळ्या जाहिरातीतुन ललिताजी मग पटवुन देऊ लागली…

” भाई साब, सस्ती चीज और अच्छी चीज में फर्क होता है”… ती प्रत्येक गोष्ट विचार करुनच खरेदी करते.. आणि शेवटी म्हणते..

 “ सर्फ की खरीददारी में ही समझदारी है “

आणि मग तिथुन सर्फने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली.

अश्या अनेक जाहिरातींमागे अलेकचं कल्पक डोकं होतं. मग ‘चेरी ब्लॉसम’ चा चार्ली असो.. की धबधब्याखाली आंघोळ करणारी ‘लिरील गर्ल’ असो.. ‘कामसुत्र’ची पूजा बेदी असो की ‘एमआरएफ’ चा मसलमॅन… अलेक पद्मसीने भारतीय समाजमन अचुक जाणलं होतं. प्रत्येक जाहिरात तो विचारपूर्वक बनवायचा.

अलेक पद्मसी.. एक खरा भारतीय. दक्षिण मुंबईत कुलाबा कॉजवेवर त्यांची अलिशान हवेली होती. वडिलांचा काचेचा व्यवसाय. घरात पाश्चात्य वळण.. पाश्चिमात्य वस्तूंची रेलचेल.. हंड्या.. झुंबरं.. भव्य पेंटिंग्ज.. इटालियन फर्निचर.. रविवारी सगळं कुटुंब ‘मेट्रो’ ला जायचं…. इंग्लिश फिल्मस् पहायला.

पण अलेक आणि त्याच्या भावंडांना मात्र नाटकाचं वेड. रात्र रात्र त्यांच्या दिवाणखान्यात तालमी चालायच्या. आणि मग त्यातुनच अलेकमधला अभिनेता घडत गेला.

रिचर्ड अँटनबरो ‘गांधी’ बनवत होते. महंमद अली जिनांच्या भुमिकेसाठी त्यांनी अलेकची निवड केली.

‘गांधी’ च्या संपुर्ण निर्मिती प्रक्रियेत तो अँटनबरो सोबत होता. गांधींच्या अंत्ययात्रेचं शुटींग करायचं होतं. त्यासाठी दिल्लीतल्या राजपथावर सुमारे पाच लाख लोकांची आवश्यकता होती. 31 जानेवारी 1981 या दिवशी हे शुटींग करण्याचं ठरलं. लोकांनी यात सहभागी व्हावं म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची होती.

रिचर्ड अँटनबरो अलेकला म्हणाले.. “ तू जाहिरात क्षेत्रातला आहेस.. लोकांनी शूटींगसाठी यावं यासाठी तू एक जाहिरात बनवशील? “…. आणि मग 30 जानेवारीच्या हिंदुस्थान टाईम्समध्ये अलेक पदमसीने बनवलेली एक ओळीची जाहिरात प्रसिद्ध झाली…. ३१ जानेवारीला इतिहासाची पुनर्निर्मिती होणार आहे. त्यावेळी तुम्ही तिथे असाल ?

… आणि खरंच त्या जाहिरातीला मिळालेला प्रतिसाद अपूर्व होता. अँटनबरोंच्या मनातील कल्पना ते जशीच्या तशी साकारु शकले ते केवळ आलेकमुळे.

अलेक पद्मसीच्या आत्मकथेचं नाव आहे.. “ अ डबल लाईफ. ”

खरंच तो दुहेरी आयुष्य जगला. चित्रपट.. दूरदर्शन.. वर्तमानपत्र.. यासाठी त्याने शेकडो जाहिराती बनवल्या.. पण तो एक उत्तम अभिनेता होता, दिग्दर्शक होता आणि एक रत्नपारखी सुध्दा.

अलेकनं अनेक जणांना घडवलं. त्यात श्याम बेनेगल होते.. कबीर बेदी होता.. डान्स डायरेक्टर शामक दावर.. अलीशा चिनॉय होती.. पॉपसिंगर शेरॉन प्रभाकर तर त्याची बायकोच. तिच्यामधले गुण हेरुन …. त्याच्याच मार्गदर्शनाने ती पॉप म्युझिकमध्ये टॉपला पोहोचली.

भारतीय समाजमन अचूक जाणणारा.. आपल्या जाहिरातींमधून त्यांच्या भावनेला हात घालणारा इंग्रजी रंगभूमीवर पन्नास नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारा अलेक पद्मसी…. उच्च कोटीची प्रतिभा. कलात्मकता.. सर्जनशीलता.. आणि अपूर्व संघटन कौशल्य.. नाटकातून पैसा कमावणं हे त्याचं उद्दिष्ट कधीच नव्हतं. म्हणूनच तो म्हणतो ….

“रंगभूमी रोजीरोटी मिळवून देऊ शकत नाही, हे खरं आहे…. पण तो माझा श्वास आहे. जाहिरात क्षेत्रात मात्र असं नाही. कॉपी लिहा…. शब्दांशी खेळ करा.. चित्रिकरण करा.. सुंदर कल्पना प्रत्यक्षात आणा.. आणि भरपूर पैसे खिशात टाका. “

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चुकून घडलेले अपघात… – लेखिका : सौ. माधुरी म. इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ चुकून घडलेले अपघात… – लेखिका : सौ. माधुरी म. इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

माझी मुलगी कायम माझ्यावर, स्वयंपाक घर आणि माझे काम यावर चिडलेली असते. दररोज कशाला सगळ्यांच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ करत बसतेस?आणि सगळ्यांच्या हातात देत बसतेस? त्यांच्या वेळा सांभाळत बसतेस?तुझा तुला किती वेळ मिळतो सांग, असं म्हणते.

माझी लेकही सगळेच पदार्थ खूप छान करते. पुरणपोळी ते तांदळाचे मोदक. अगदी नवीन पदार्थही. तिचा स्वतःचा फूड ब्लॉग पण आहे. पण त्यावेळी जावई इतर कामे करतो. एकूणच सगळीच कामे ते मिळून करतात. खरे सहजीवन कसे असते, हे मला कॅनडामध्ये गेल्यावरच समजले. आता इकडेही काही पुरुष सगळी कामे करतात, हे मी बघतेय. (अलीअलीकडे आमच्या घरातील पुरुषही काही बाबतीत तरी छान मदत करत आहेत.)

हे सगळे आठवायचे कारण.. काल सकाळी नाश्त्यासाठी मी भरपूर भाज्या घातलेले आप्पे, चटणी करायची ठरवली.. बाकी सगळे तयार होते. पण चटणीला फोडणी घालायला गेले आणि कसे काय कोण जाणे, हातातून फोडणीचा डबा निसटला आणि तो मायक्रोवेव्ह, मिक्सर आणि ओटा यांच्यावर पडल्याने सगळ्या रंगाची रंगपंचमी झाली.. त्यांचे शुभ्र रंग हळद, तिखट, मसाला इत्यादी रंगात माखून गेले. (इकडे आल्यावर मी डबा घासून पूर्ण भरला होता.) ओटाही सगळा भरून गेला. हे नाष्टा करून बाहेर जायच्या तयारीत बसले होते. सून माहेरी. मुलाने नुकताच लॅपटॉप उघडला होता. (वर्क फ्रॉम होम). पण माझा झालेला गोंधळ बघून लगेच मुलगा आला. बाबा आणि त्याने मिळून बाहेर घेऊन जाऊन मायक्रोवेव्ह आणि मिक्सर स्वच्छ एरियल लावून पुसून उन्हांत ठेवले. तोपर्यंत मी कट्टा आवरला. या सगळ्या गोष्टींमुळे नाश्त्याला वेळ लागला, तो वेगळाच. पण सगळ्यांनी मिळून, समजून केल्याने मला कसलाच त्रास वाटला नाही.

या घटनेमुळे सहजच एक जुनी आठवण जागी झाली. मिरजेत असताना एकदा कोणीतरी खास पाहुणे आले, म्हणून मी माझ्या ठेवणीतील क्रोकरी काढली होती. त्या वेळी मी नोकरीही करत होते. सासूबाईंची तब्येत बिघडली होती, म्हणून त्या झोपल्या होत्या. सिंक कपबश्या, क्रोकरीने भरले होते. आम्हा सगळ्यांना रोज ताक लागतेच. तर मी घाईघाईत ताक केले. त्यावेळी घरी फिल्टर नव्हता. स्टीलचे मोठे पिंप. आणि त्यावर पाण्याने भरलेली कळशी होती.. (पिण्याचे पाणी भरून ठेवण्यासाठी). पिंपात पाणी भरणे घाईत विसरले होते. त्यामुळे ते खाली गेले होते. मी ताकाच्या गुंडीत तसाच पिंप वाकवून पाणी घ्यायला गेले.. आणि वरची कळशी गुंडीवर पडून ताक तर सगळीकडे उडालेच आणि माझी काचेची क्रोकरी बहुतेक सगळी फुटली. एक, दोन बाऊल तेवढे वाचले. त्या वेळी आर्थिक चणचणही जास्त होती आणि त्यात हे अती घाईने झालेले नुकसान. त्यामुळे माझे डोळे लगेच भरून आले. मुले कॉलेजला जाण्याच्या तयारीत होती.. जोरात झालेला आवाज ऐकून दोघं आत पळत आली. माझ्या अंगभर ताक उडून अगदी अवतार झाला होता. दोघांनी लगेच हसत हसत मला आरसा दाखविला. “होतं आई असे कधी कधी. त्यात रडण्यासारखे काय आहे?” म्हणून राहिलेले दोन बाऊल माझ्या हातात देऊन त्यांनी काचा गोळा करून टाकल्या.

असे चुकून झालेले अपघात थोड्या वेगवेगळ्या फरकाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. पण त्यातील नकळत राहिलेल्या पक्क्या रंगाकडे बघायचे की पुसून शुभ्र झालेल्या रंगाकडे बघायचे?तसेच तुटलेले आठवायचे की त्यातूनही सही सलामत वाचलेले बघायचे?हे तर नक्कीच आपल्या हातात असते ना?

लेखिका:सौ. माधुरी म. इनामदार

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ थेम्सच्या नदीकिनारी… ☆ प्रा. डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ.सतीश शिरसाठ

? क्षण सृजनाचे ?

थेम्सच्या नदीकिनारी… ☆ प्रा. डॉ.सतीश शिरसाठ ☆

लंडन येथील नदीचे नाव- थेम्स, त्या नदीवर एक मोठा ऐतिहासिक पूल आहे- टाॅवर ब्रिज. या पुलाच्या बाजूंना दोन मोठे टाॅवर असून राजघराण्यातील व्यक्ति बोटीने जाताना मध्यभागातून तो उघडला जातो.त्या नदीवर एक मोठा दुसरा पूल असून त्याला लंडन ब्रिज म्हणतात. मी त्यावर  मुक्त पध्दतीत एक कविता लिहीली आहे. 👇🏻

☆ थेम्सच्या नदीकिनारी… ☆ प्रा. डॉ.सतीश शिरसाठ ☆

थेम्सच्या नदीकिनारी

पाहिला मी टाॅवर  ब्रिज

ब्रिटिश राजसत्तेला

अभिवादन करताना

मध्यातून  मुडपणारा.

 *

थेम्सच्या नदीकिनारी

पाहिला मी लंडनब्रिज

मुखवटे घालून फिरणा-या

शेकडो  माणसांच्या

घामांत भिजलेला.

 *

थेम्सच्या नदीकिनारी

पाहिला मी एक भिकारी

कळकटलेल्या कपडयांवर

फेकलेली नाणी

गोळा करताना.

© प्रा. डाॅ. सतीश शिरसाठ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वृद्धपण आणि मौन… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ वृद्धपण आणि मौन… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

वृद्धपण आणि मौनः

मौन” हा शब्द ऐकल्याक्षणी कुसुमाग्रजांची कविता आठवली.

शिणलेल्या झाडापाशी

कोकिळा आली

म्हणाली, गाणे गाऊ का ?

झाड बोललं नाही

कोकिळा उडून गेली.

 

शिणलेल्या झाडापाशी

सुग्रण आली

म्हणाली घरटे बांधु का?

झाड बोललं नाही

सुग्रण निघून गेली.

 

शिणलेल्या झाडापाशी

चंद्रकोर आली

म्हणाली जाळीत लपू का?

झाड बोललं नाही.

चंद्रकोर मार्गस्थ झाली.

 

बिजली आली

म्हणाली मिठीत येवू का?

झाडाचे मौन सुटलं

अंगांअंगातून

होकारांचे तुफान उठलं.

.

.

.

.

 

पहिल्यांदा वाचली तेव्हा नव्हती समजली. परत वाचली….

परत परत वाचली…

आणि लक्षात आले की हे तर शिणलेल्या झाडाचे समजूतदार मौन आहे….

अनेक वर्ष कोकिळा येवून  गात असेल, बर्‍याच सुगरण पक्षांनी पिल्लांसाठी सुंदर घरटी विणली असतील, चंद्रकोर तर कितीतरी वेळा झाडाच्या जाळीत लपली असेल….

असे सगळ्यांच्या सोबतीत ऐश्वर्यसंपन्न आयुष्य घालवलेल्या झाडासाठी आता आपण थकलो आहोत…

शिणलो आहोत हे स्विकारणे किती कठिण झाले असेल…

 

पक्षांच्याही लक्षात आले आहे की झाड दमलेय….

म्हणून तर विचारताहेत….

की शिणलेल्या झाडाला एकटे वाटू नये म्हणून येताहेत…

 

“नाही” पण म्हणता येत नाही आणि “हो” पण…

 

अश्या वेळी मौनाची सोबत असते….

थोडीशी घुसमट…

पण शब्दाशिवाय पोहोचते बरेच काही….

अशी ही मौनाची भाषा…

आणि कवितेचा शेवट तर….

 

समर्पणाचा…

मनाला चटका लावणारा…..

 

यानिमित्ताने आठवत राहिले ते स्वतःहून स्विकारलेलेले मौन….

 

पटत नसले तरी त्या क्षणी वाद वाढू नये म्हणून,

खूप आनंदाच्या वेळी शब्दातून व्यक्त होता येत नाही तेव्हा,

जंगलातील नीरव शांततेत,

कधीतरी स्वतः लाच चाचपडत असतांना….

 

माणसामाणसातील नात्यांमध्ये तर

कधीतरी  समोरच्याला समजून घेतांना

एकाने थांबणे पण गरजेचे….

.

.

.

.

 

यानिमित्ताने एक प्रसंग आठवला. तरुण मंडळींनी गावातल्या एका आजीबाईंना विचारले की

 

 इतकी वर्ष तुम्ही आनंदाने कसा संसार केला?

त्या म्हणाल्या “तो आग झाला की मी पाणी व्हते…”

 

गम्मत म्हणजे एका तरुण मित्राने लगेच प्रतिसाद दिला आणि म्हणाला

 “म्हणून तर ती राजाची राणी होते “

 

……असे पाणी होतांना मौनाची सोबत नक्की होत असेल का? 

खरं तर मला असे वाटते की ठरवून धारण केलेल्या मौनाची ताकद असतेच असते पण कधी व्यक्त व्हायचे आणि कधी मौनात रहायचे हे  समजले की आयुष्य मात्र नक्की सोपे, सहज होते.

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सकारात्मकता : एक कला…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सकारात्मकता : एक कला☆ श्री जगदीश काबरे ☆

पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी एका उद्यानात फिरायला गेलो होतो. तिथे दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढलेली दिसली. मैत्रिणीच्या झाडाखालीच गप्पा मारत बसल्या होत्या. मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वाऱ्यानं गदागदा हालू लागलं.

पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, “अरे, पडशील !”

तर दुसऱ्या मुलाची आई म्हणाली, ” सांभाळ, फांदी घट्ट पकडून ठेव.”

खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं. परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र खूप फरक होता. परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा घाबरून फांदीवरून घसरून खाली पडला. मात्र दुसऱ्या स्त्रीच्या मुलानं फांदी घट्ट धरून ठेवली आणि तो अलगद उतरून खाली आला.

काय बरं असेल यामागचं कारण? ….. 

…. पहिल्या स्त्रीच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती. जी तिच्या मुलानं ग्रहण केली आणि तो पडला.

…. या उलट दुसऱ्या स्त्रीनं उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्याने तिच्या मुलानं ती ग्रहण केली आणि तो फांदीवर आपले पाय घट्ट रोवून बसला आणि नंतर सावकाश खाली आला. 

…… म्हणून सकारात्मक वागणं, बोलणं ही एक कला आहे आणि ती प्रत्येक पालकाने आत्मसात करायला हवी.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares