मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शांता…” – लेखिका : श्रीमती जयश्री दाणी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “शांता…” – लेखिका : श्रीमती जयश्री दाणी ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

मी शांता. नाही ना ओळखले? श्रीरामाची थोरली बहीण. अवघे रामायण श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सीतेच्या विविध कथातरंगांनी व्यापले असताना माझा उल्लेख तिथे कुठेच आढळत नाही. अर्थात मला अनुल्लेखाने मारणे हा कुणाचाच उद्देश नव्हता. मी होतेच तशी अदृश्य. गुप्त. अयोध्येत अनोळखी.

माझी ओळख फक्त कौसल्यामातेच्या हृदयात जागी होती. कदाचित तातही मला पदोपदी स्मरत असतील. मी त्यांची पहिली लेक ना! कसे अलगद मला ओटीत टाकून दिले दोघांनी वर्षिणी मावशीच्या. अंगदेश नरेश रोमपाद आणि राणी वर्षिणीला अनेक वर्षे लोटली तरी अपत्य झाले नाही. माता कौसल्येच्या भेटीला दोघे आले असता माझ्या अवखळ बाललिलांनी त्यांचे मन मोहून गेले.

” मला तुझी ही देखणी, मेधावी सुपुत्री देशील का?” माता वर्षिणीने केविलवाण्या आसुसलेल्या स्वरात विचारले. कौसल्या मातेचे मन द्रवले. तिने आणि तात यांनी क्षणात  मला दत्तक देऊन टाकले. मला विचारायची गरज नसेल का भासली? कधीतरी पुढे मेंदूत असे विचार येऊनच गेले की माझ्याजागी जर पहिला पुत्र असता तर त्याला इतक्या सहजासहजी दत्तक दिले असते?

अंगदेश नरेशांनी मला प्रेमाने वाढवले. वेदविद्या, शिल्पकलेत निपुण केले. पण मी कन्या असल्याने तिथेही मला राजपद सांभाळायचा अधिकार नव्हता. एकदा तात रोमपद आणि माझा सुसंवाद सुरू असताना एक गरीब ब्राह्मण शेतीची समस्या घेऊन आला. तात यांचे थोडे दुर्लक्ष झाले त्याच्याकडे. दुखावलेल्या ब्राम्हणाने देश सोडला. इंद्रदेवांना ते सहन झाले नाही आणि त्यांच्या क्रोधाने अंगदेशात दुष्काळ पडला.

अस्वस्थ मातापिता ऋषी श्रृंग यांच्याकडे गेले. ऋषीवर्यांनी सांगितलेल्या उपायाने अंगदेशाची भूमी पुन्हा हिरवीगार झाली. प्रसन्न पित्याने माझा विवाह ऋषीदेवांशी लावून दिला. कालांतराने राजा दशरथ यांनी आयुष्याचा उत्तरार्ध जवळ येत आहे, हे बघून कुलगुरू वशिष्ठ यांच्या मार्गदर्शनाने पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचे ठरविले. प्रमुख अतिथी म्हणून यांना व मला मान मिळाला. नाथ म्हणाले, “आतिथ्य स्विकारले तर माझे पूर्वपुण्य पूर्ण लयाला जाईल.” मी म्हणाले, “जाऊ द्या. पितृऋण उतरवायची तेव्हढीच संधी.”

यज्ञपूर्तीच्या वेळी दिलेल्या पायसाने तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या व पुढे मनुष्य जन्माला हरघडी पडणाऱ्या प्रश्नाला ठोस, समर्पक उत्तर देणारे ‘रामायण’ घडले हे सर्वश्रुतच आहे.

रामायण ही रामाची कथा आहे. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ अशा रघुकुलाची गाथा आहे. त्यात माझे संपूर्ण अस्तित्व लुप्त झाले असले तरी माझ्याही रोमारोमात राम आहे! फारशी चर्चा नसली तरी मी, शांता आणि पती ऋषी श्रृंग यांना या चौघा राजकुमारांच्या जन्माचे श्रेय मिळाले आहे.

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे माझे मंदिर आहे. या मंदिरात मी पती ऋषी श्रृंग यांच्यासोबत विराजमान आहे. हा पल्ला गाठणे शक्य नसेल तर वाल्मिकी रामायणातील बालकांड मधल्या

“आनाय्य तु महीपाल ऋष्यशृङ्‍गं सुसत्कृतम् ।

विभाण्डकसुतं राजन् ब्राह्मणं वेदपारगम् ।

प्रयच्छ कन्यां शान्तां वै विधिना सुसमाहितः ॥”

या नवव्या सर्गात मला शोधाल. माझा संदर्भ तिथे  नक्कीच सापडेल. एका श्रीरामभक्त राजपुत्रीचा इतका परिचय पुरे नव्हे का?

लेखिका:श्रीमती जयश्री दाणी

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रथसप्तमी… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ रथसप्तमी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

प्रातः स्मरामि खलु तत्सवितुर्वरेण्यं

रूपं हि मण्डलमूचोSथ तनुर्यजूंषि |

सामानि यस्य किरणा: प्रभवादि हेतुं

ब्रह्माहरात्मकमलक्ष्यमचिन्त्यरूपं ||

अर्थ –

ज्याचे रूप ऋग्वेदाची मंडले आहेत, शरीर यजुर्वेद आहे, सामवेद ही किरणे आहेत, जो जगाची उत्पत्ती स्थिती व लय यांचे कारण आहे, जो ब्रह्मदेवाचा दिवस असून अचिंत्य व अलक्षी आहे त्या श्रेष्ठ सूर्य देवतेचे मी प्रातःस्मरण करतो.

रोजच सूर्याला नमस्कार करण्याची आपली पद्धत कारण सूर्य आहे म्हणून आपले अस्तित्व आहे, हे आयुष्य आहे हे आपण केंव्हाच जाणले आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण हा चांगल्या विचाराने, भावनेने साजरा केला जातो.तसाच हा माघ शुक्ल सप्तमीचा म्हणजेच रथसप्तमी चा  सण, सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तो याच दिवशी साजरा करण्याची कारणे म्हणजे सूर्याचा हा जन्मदिन आहे अशी एक कल्पना, या दिवशी संवत्सर सुरू झाले. याच दिवशी सूर्याला त्याचे वाहन म्हणजे रथ मिळाला ही एक कल्पना!

वास्तव असे आहे की या दिवसापासून सूर्याचे तेज वाढत जाते, तो जास्त वेळ म्हणजे दिवसाचे जास्त तास प्रकाश देतो, आणि आपले आयुष्य आरोग्यदायी करतो.सूर्य आता उत्तरायणात असतो. वसंत ऋतू येतो म्हणजेच सृष्टीची सृजशीलता वाढते.म्हणून सुर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी हा हेतू!त्याचे हे वाढलेले तेज सहन करणारे रथाचे घोडे व त्याचा सारथी अरुण यांच्याप्रती सुध्दा कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी रथासह सूर्याची पूजा करण्याची पद्धत आहे.

(सहज मिळाली म्हणून थोडी रथाबद्दल माहिती सांगते. रथ हे आपले फार प्राचीन वाहन आहे. रथाचे अनेक प्रकार आहेत.देवगणांचा तो देवरथ, राजेमहाराजे यांचा पुष्परथ, खेळांसाठीचा क्रीडारथ, स्त्रियांसाठी चा कणीरथ, रथ विद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रमिक रथ.रथ चक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह, उत्कर्षाचे प्रतीक आहे.)

सूर्याच्या रथाला संवत्सर नावाचे एकाच चाक आहे.त्याला बारा राशी म्हणजेच बारा महिन्यांचे प्रतीक म्हणून बारा आरे आहेत.गायत्री, वृहति, उष्णिक,जगती, त्रिष्टुप , अनुष्टुप, पंक्ती हे सात छंद अश्व रुपात सूर्याचा रथ ओढण्याचे काम करतात. रथाचा विस्तार नऊ हजार योजन तर त्याची धुरा एक करोड सत्तावन हजार योजन आहे.( चौथ्या – पाचव्या शतकात सूर्य सिद्धांतानुसार एक योजन म्हणजे ५ मैल -८ किलोमीटर, पण नंतर १४ व्या शतकात परमेश्वर नावाच्या गणितज्ञाने एक योजन म्हणजे ८ मैल – १३ किलोमीटर आहे असे सांगितले)

एका सूर्य किरणात सात प्रकारच्या ऊर्जा असतात.

प्रभा – तमनाशक, प्राण शक्तिदाता

आभा – धर्मशक्ती दाता

प्रफुल्ला – आत्मज्ञान दाता

रश्मी – सृजनशक्ती दाता

ज्योती – भक्तीरस निर्माती

तेजस्विनी – स्थिती म्हणजेच विष्णूला मदत करणारी

महातेजा – उत्पत्ती व लय म्हणजेच ब्रह्माला व शिवाला सहाय्य करणारी

या सात ऊर्जा रुपी किरणांना त्यांचे त्यांचे रंग असतात. या सात ऊर्जा एकत्रित येऊन सविता तयार होते, ही श्वेत असते.

सूर्याच्या जन्मा बद्दल सांगायचे तर तो आजन्मा आहे. कमळाच्या नाभितून ब्रह्माजी अवतरले. त्यांच्या मुखातून प्रथम ओम् शब्द निघाला, हा तेजरुपी सूर्याचे सूक्ष्म रूप होते. त्यानंतर ब्रह्माजींच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले. जे ओम् च्या तेजात एकाकार झाले. हे वैदिक तेजच आदित्य आहे. हा वेद स्वरूप सूर्य पंचदेवांपैकी ( शिव, देवी, विष्णू, गणपती, सूर्य ) एक आहे.

वैवस्वत मन्वंतरात अदितीने सूर्याची कठोर आराधना केली, सूर्यदेव प्रसन्न झाले. तिने सुर्यासारखा पुत्र मागितला. कालांतराने अदिती गर्भवती झाली. तिचे कठोर व्रत सुरूच होते. रागावून कश्यप म्हणाले, अशी उपाशी राहिलीस तर गर्भ कसा वाढेल? तिने तो गर्भ शरीरातून काढला तेंव्हा तो सोन्यासारखा चमकणारा होता. कालांतराने त्यातून एक तेजस्वी, सूर्याचा अंश जन्माला आला, त्याचे नाव विवस्वान ठेवले. असे अदिती कश्यप यांना बारा पुत्र झाले, त्यांना द्वादश आदित्य म्हणतात. हे आदित्य अवकाशातील इतर आदित्यांना ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात. (म्हणजे अवकाशात अनेक सूर्य निर्माण होतात अशी कल्पना त्याकाळी सुध्दा होती?)

सूर्याचा विवाह देवशिल्पी व विश्वकर्मा यांची मुलगी संज्ञा हिच्याबरोबर झाला. त्यांना वैवस्वत मनू, यमदेव ही दोन मुले व यमुना (नदी) ही मुलगी झाली. परंतु फार काळ संज्ञा सूर्याचे तेज सहन करू शकली नाही म्हणून तिने आपल्या जागी आपली छाया सोडली व आपण वनात निघून गेली. छायेला सावर्णी मनू, शनिदेव हे दोन मुलगे व तपती ही मुलगी झाली. कालांतराने सूर्याला संज्ञा सापडली, त्यावेळी सूर्य घोडीच्या रुपात होते, त्यांच्या मीलनातून जुळ्या मुलांचा जन्म झाला. अश्व रुपात असताना जन्माला आली म्हणून त्यांचे नाव अश्विनीकुमार!

त्रेता युगातील सुग्रीव हा पण सुर्यपुत्र, त्याच्या जन्माची कथा वेगळीच आहे. ऋक्षराज नावाचे वानर होते, ते एका सरोवरात स्नान करण्यासाठी गेले, सरोवराला मिळालेल्या शापामुळे त्यात स्नान केल्यावर त्याला एका सुंदर स्त्री चे रुप प्राप्त झाले. प्रथम त्या स्त्री वर  इंद्रदेव  मोहित झाले त्यामुळे बाली चा जन्म झाला. नंतर सूर्यदेव ही मोहित झाले आणि सुग्रीवाचा जन्म झाला. दोन्ही मुले त्याने गौतम ऋषी व अहिल्या यांच्याकडे सोपविली. द्वापार युगात मंत्र सामर्थ्याने कुंतीच्या पोटी जन्माला आलेला कर्ण हा पण सुर्यपुत्र!

सूर्यदेवा,

पहाट वारा जेंव्हा भूपाळी गात असतो तेंव्हा एखादा मोत्यांचा सर  सुटावा तसे मोती धारेवर विखुरतात. कोठून आले हे मोती?  हां! बरोबर आहे, तुझ्या कंठातला तो मोत्यांचा हार पश्चिमेकडे ठेऊन गेला असशील आणि तिने मोत्यांचा सडा टाकला! सूर्यदेवा,  तू येण्याआधीच प्राचीवर गुलाल उधळून तुझ्या येण्याची बातमी अरुण देतो.

माथी किरीट, हाती  कमळ,चक्रधारी, शंखधारी,आशीर्वाद मुद्रा, कानी मकर कुंडलांची प्रभा, गळ्यात हार,लाल रंगाच्या सात  घोड्यांच्या रथावर, वामांगी पत्नीला घेऊन पद्मासनात आसनस्थ झालेलं, सुवर्ण कांती ल्यालेलं हे तुझं देखणं रुप!

तू तर तिन्ही लोकांचा पालनकर्ता अन्नदाता, त्रिगुणधारी,रोगांचा नाश करणारा, स्वयंप्रकाशी,अध्यात्माचा प्रेरक, आकाश रुपी लिंगाची आराधना करणारा, आकाशाचा स्वामी, ग्रह नक्षत्रांचा अधिपती, तमनाशक, असत्याकडून सत्याकडे, मृत्यूपासून अमरत्वाकडे नेणारा, धर्मपरायण, धर्माच्या व कर्तव्याच्या मार्गाने जाणारा म्हणून कधीही लोप न पावणारे तुझे तेज, चौदा भुवनांचा पालक, चराचर सृष्टीचा आत्मा, विश्वाचा साक्षीदेव, विराट पुरुषाचा नेत्र, अंतराळाचा अलंकार, अमूर्त अशा अग्नी देवतेचे मुख, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तूच, देव,पितर, यक्ष ज्याची सेवा करतात तो तूच, राक्षस, निशाचर, सिद्ध ज्याला वंदन करतात तो तूच, इतका महान असून तुझे किरण क्षुद्र जीव जंतू, मनुष्य, सर्वांचे चरण स्पर्श करून नम्रतेची शिकवण देतात.

कालस्वरूप, कालचक्राचा प्रणेता, निर्मळ, विकल्प रहित, सर्वज्ञानी आहेस. म्हणूनच मारुतीला आणि कर्णाला तू ज्ञान दिलेस. आणखी काय आणि किती लिहू ? सारं न संपणारे! माझा अवाका ही तेवढा नाही. मला माहित आहे,  अनासक्त आहेस तू, त्यामुळेच तिन्हीसांजेला तुझा एवढा मोठा पसारा क्षणात आवरून घेतोस.

तुला एक वचन देते, मावळताना तू जी सूक्ष्म रूपातील तुझी शक्ती व तेज दिव्यात ठेऊन जातोस, त्याचा सन्मान आम्ही करू, आणि घरात रोज एक ज्योत तेवती ठेवू.

आणखी एक –

स्तुती सुमनांची नाही ओंजळ

 ही तर आहे कबुली प्रांजळ

दिनमणी

आकाशी अरुणिमा पसरली,

 रविरथ चाहूल विश्वा आली

शतशतकोटी किरणे ल्याली,

तमनाशक ती प्रभा उमलली ।।

*

सप्त वारु अन् एक चक्री रथ,

सारथी त्याचा पांगुळा

ना आकाशी,ना धरेवरी

तरीही आक्रमितो भूमंडळा ।।

*

घेऊन संज्ञा वामांगी,

पद्मासनी तो वरद हस्त साजे

शंख, चक्र, पद्मधारी

शिरी सुवर्ण मुकुट विराजे ।।

*

रविवासर तो सप्तमीला

उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आले

तेजःपुंज ते रुप पाहुनी

अदिती कश्यप धन्य झाले ।।

*

सुग्रीव, कर्ण हे तुझेच अंश रे,

ज्ञान दिले तू हनुमंता

ब्रह्मा, विष्णू, शिवस्वरूप तू

पंच महाभूतांचा निर्माता ।।

*

देव, पितर, यक्ष तव सेवेला

ग्रहांचा तू अधिपती

असूर, निशाचर, सिद्ध वंदिती

त्रिलोका तू कालगती ।।

*

रूप ऋग्वेदी, तनू यजुर्वेदी,

सामवेदी तव रश्मी

पितामह तू या विश्वाचा,

आकाशाचा तू स्वामी ।।

*

मार्ग दाविसी आम्हा पामरा

असत्या कडून सत्याकडे

धर्मसूर्य तू नेसी जीवा

मृत्यू पासून अमरत्वाकडे ।।

*

दिपते धरती तव तेजाने

क्षुद्र जीव रे आम्ही सारे

तरी स्पर्शूनी आमुचे चरण तू

नम्रतेचा आदर्श रे  ।।

*

निर्विवाद असे, अधिराज्य तुझे

या त्रैलोक्यावरती

अनासक्त तू , क्षणात सारे,

आवरुन घेशी या मावळती ।।

*

तू येण्याच्या आधीच पडतो,

सडा मोतियांचा भूवरी

कंठातील तो हार देऊनी

जाशी का पश्चिमेवरी ।।

*

जपून ठेवीन ठेव तुझिया

तेजाची अन् शक्तीची

देवघरी या रोज तेवते

एक वात तव ज्योतीची ।।

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “पैश्याचं झाडं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“पैश्याचं झाडं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

 राम्या! रग्गड झाली बाबा तुझी शाळासुळा… आरं शाळंत जातुयास कि रोज रोज नवा नव्या खर्चानं बापाच्या सदऱ्याचा खिसाचं फाडतूयासं… आज का म्हनं नवीन वही पायजेल, उदयाला नविन कसलसं पुस्ताकं.. कंपास पेटी, पेन्सल, पट्टी , रबरं, ह्याचं रोजचं विकात घेणं असतयाचं.. काव आला बाबा तुझ्या शाळा शिकण्याचा… आरं लेका शाळतं काय  दुसरं शिकवित्यात कि न्हाई.. का नुसतं उगी आज ते आना आनि हे आना एव्हढ्यावरचं शाळा चालली व्हयं… ते बी शाळा सुरू व्हायच्या टायमाला योकदाच काय ते भाराभर घेऊन दिल्यालं असतानं पुन्हा पुन्हा कसली हि पिरपिर चालूच असती.. कवा संपायची रं हि रटरट.. इथं दिवसरात घाम गाळवा तवा कुठं घराचा खुटाना चालतूया… पैश्याचं झाडं अगदी दारात लावलेलं असल्यागत..मागन्याचं भूत कायमचं मानेवरचं बसल्यालं..खाली उतराया मागना व्हयं…काय गरज लागली कि तोड चारपाच पैश्याची पानं भागीव तुझी नडं असं सांगायला येतयं व्हयं… कष्टाबिगर पैका उगवत न्हाई.. आमच्या सारखं ढोर मेहनतीचं काम तुला पुढं करायला लागु नये म्हनुशान दोन चार बुकं शिकलास तर कुठं बी चाकरी करून चार घास सुखानं खाशिला.. म्हनुन ह्यो शाळंचा आटापिटा करायला गेलो तर गळ्यात हि नसस्ती पीडाच पडलीया बघं.. जरा म्हनुन दम खावा इळभर तर  तुझ्या शाळंचा एकेक नव्या खर्चाचा वारू चौखूर उधळलेल्या.. आम्ही बी शाळंत गेलो व्हतो.. एक दगडी काळी पाटी नि पेन्सल यावरच शिकलो शाळा सुटं पर्यंत.. कधी वही लागाया न्हाई तर कधी पुस्तकाचं नावं न्हाई.. सगळं घोकंपट्टीचा आभ्यास हुता… आजबी समधं हाताच्या बोटावर नि तोंडावर सगळं आपसूकच येतयं… नि तुमचं टकुऱ्यात तर शिरतं न्हाई पन डझनावारी वह्याचीं रद्दी वाढत जाती… आन तु एकला असतास तरी बी काय बी न कसंबी चालवून घेतलं असतं पर एकाला सोडून तुम्ही चार पाच असताना माझा कसा टिकावं लागावा रं.. एक मिळविनार आनि पाचसहा तोंड खानार..समध्यास्नी लिवता वाचता आलं म्हंजे माप रग्गड झालं… तू थोरला हाईस तवा  झाली एव्हढी शाळा लै झाली.. आता कामाधंद्याचं बघुया.. अरं बाबा बाकी सगळी सोंग करता येत्यात पन पैश्याचं सोंग न्हाई आनता येत… आनि त्याचं झाडं बी कुठं लागलेलं नसतयं.. हे तुला आता कळायचं न्हाई.. तू बाप झाला म्हंजी तवा समधं कळंल…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ या जगण्यावर शतदा प्रेम करावे — लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

??

☆ या जगण्यावर शतदा प्रेम करावे — लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मी आणि आजार ह्यांची ‘दोस्ती ‘ऐन तिशीतली.

‘दोस्ती’ शब्दाने चमकलात? आजार बरोबर घेऊन जगायचं म्हटलं कि दोस्ती होते.          .                    

वयाच्या अडतिसाव्या वर्षी आमच्या दादरच्या शिवाजी पार्कला धावत फेऱ्या मारत असताना मला ह्रृदयविकाराचा गंभीर धक्का जाणवला. माझा भाऊ डाॅक्टर प्रकाश संझगिरीने मला वाचवलं. मी आठवड्याने दक्षिण कोरियातल्या ‘सोल’ ला ऑलिंपिक कव्हर करायला जाणार होतो. तो थेट आयसीसीयूत जाऊन झोपलो. आयुष्य प्रथम तिथे बदललं. पण आधुनिक औषध, भावाची ट्रीटमेंट, जेवण्यातली शिस्त, बायकोचा देवावरचा विश्र्वास, मित्रांचा आधार, सकारात्मक विचार, एन्जियोप्लास्टी आणि ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ही वृत्ती त्यामुळे मी जवळपास नाॅर्मल झालो.

त्यानंतर ३४ वर्ष भूरर्कन निघून गेली. त्यात अनंत कलात्मक उद्योग मी माझं इंजिनिअरिंग सांभाळून केले. जग फिरलो. मनाच्या एका कोपऱ्यात मृत्यूची भीती होती. पण मनाचा इतर भाग मध्यान्हासारखा उजळला होता. विविध गोष्टी करण्यासाठी मनाला नवी पालवी फुटत होती. नवा मोहर येत होता.

इतक्यात एक दिवस असा आला की सारा मोहरा फिरून गेला. 

ती तारीख होती २२ ऑक्टोबर २०२२. मी निघालो होतो ऑस्ट्रेलियाला, टी २० विश्वकपासाठी. त्यावेळची दिवाळी संपता संपता निघणार होतो. बरोबर धनत्रयोदशीला कॅन्सर नावाच्या नरकासुराने गाठलं मला. अचानक रक्ताळलेली लघवी झाली आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्य अस्ताला जायच्या आत, किडणीच्या चौथ्या टप्प्यातल्या कॅन्सरचं निदान झालं.

मी हादरलो. पण स्वतःला सावरलं. सर्व विसरून तीन दिवस मुलाबाळांसह दिवाळी साजरी केली. दिवाळी संपल्यावर मी एकटाच शिवाजी पार्कच्या एका गल्लीत गेलो. रड रड रडलो. मनात साठलेलं दुःख, भीती, अश्रुतून बाहेर फेकून दिलं. अश्रु पुसले. कुसुमाग्रजांच्या कवितेतले शब्द आठवले. “सर, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा.” आणि लढायला सज्ज झालो.

डॉक्टर स्मृतीच्या इम्युनो थेरपिने ८ सेंटिमीटरची गाठ, वर्षभरात ५.४ सेंटिमीटर वर आली. त्याकाळात औषधांचे फार वाईट परिणाम मी सहन केले.

कधी कधी वाटायचं, “बस झाले उपचार. थांबवावं सगळं. जे काही आयुष्य त्यानंतर उरेल ते तरी नीट जगावं.” 

कधी अतिसार, कधी बध्दकोष्ट, त्यामुळे भगंदरचा त्रास. त्वचेवर लाल व्रण, जिभेची चव पूर्ण गेलेली. इडली सांबारचं सांबारही तिखट लागायचं. 

भूक नाही, खाणं कमी, त्यामुळे वजन कमी होत गेलं. मला स्वतःला आरशात पाहणं कठीण जात होतं.

डॉक्टर स्मृतीचं म्हणणं होतं, “आता ऑपरेशन करून ट्युमरग्रस्त किडनी काढून टाकावी” पण माझ्या हृदयरोग तज्ञ भावाने ती कल्पना स्वीकारली नाही. माझी ३५ वर्षाची हृदय रोगाबरोबरची मैत्री काहीतरी परिणाम हृदयावर  करणार होती. माझ्या हृदयाच्या पंपाची ताकद कमी झाली होती. ज्याला इजेक्शन रेशो म्हणतात तो ३५ वर आला होता. माझं शरीर माझ्या भावाइतकं कुणालाच ठाऊक नाही.

पण देवाच्या मनात वेगळंच होतं. त्यानेच बोटं धरून मला ऑपरेशन थिएटरकडे नेलं. 

पुन्हा दिवाळी जवळ आलेली. क्रिकेटचा विश्वकप सुरू होता. माझं लिखाण सुरू होतं. आणि एक दिवस पोटात दुखायला लागलं. आणि निदान झालं. माझ्या पित्ताशयात खडे आहेत.:

मी स्वतःशी हसलो. कारण विविध आजार माझ्या शरीरावर हल्ला करायला उत्सुक असतात. काय काय आजारांनी ३५ वर्षात माझ्या शरीराचा पाहुणचार घेतलाय! तुम्ही नाव सुध्धा ऐकली नसतील.

‘पायलोनायडल सायनस’ ऐकलंय?

एपिडीडीमायटीस, आय टीपी, वगैरे… सर्जन, डॉ हितेश मेहतांनी माझ्या भावाला सांगून टाकलं, पित्ताशय काढायलाच हवं. म्हणजे ऑपरेशन आलं.

पित्ताशय नाही काढलं तर….

तर ते आत फुटण्याचं भय मोठं. ते फुटलं तर परिणाम भयानक. म्हणजे बहुदा “आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा.” ऑपरेशनची जोखीम घ्यायलाच लागणार होती.

माझा भाऊ डॉ. प्रकाश संझगिरी हा अत्यंत हुशार डॉक्टर आहे. तो हृदयरोग तज्ञ असला तरी त्याचं इतर वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत असतं. त्याची बौध्दीक चक्र फिरायला लागली. पित्ताशय काढायला ऑपरेशनची जोखीम घ्यायची मग त्याच वेळी उजवी, ट्यूमरग्रस्त किडनी काढायला काय हरकत आहे.? त्याने विचार मांडला.

पण विचार मांडणं वेगळं आणि प्रत्यक्षात तो उतरवणं वेगळं. तो सर्जीकल स्ट्रायिक असतो. त्याचं यश वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. अत्यंत कुशलतेने आखणी करावी लागते. प्रत्येक टप्प्यावर एक नवी अडचण येते आणि त्यावर मात करून पुढे जायचं असतं.

डॉ प्रकाशने त्याचा उत्कृष्ठ संघ निवडला. ॲनेस्थेटिस्ट सर्वात महत्वाचा. बदलत्या परीस्थितिनुसार योग्य निर्णय घेणारा हवा. डॉ प्रकाशने त्याच्या विश्र्वासातला निवडला. डॉ फाल्गुनीची टीम होती. डॉ हितेश मेहता हे पित्ताशय काढणार होते. डॉ हेमंत पाठक किडनी काढणार होते. आखणी अशी होती. आधी पित्ताशय काढायचं. आणि त्यावेळेला इतर महत्वाची (vital) प्यारामिटर्स व्यवस्थित असतील तर किडनी काढायची.

ते विश्वचषकाचे दिवस होते. मी लीलावती हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर पडून सामने पाहत होतो. लिहित होतो. ऑपरेशन पासून मन दुसरीकडे नेत होतो.

पण एकाक्षणी मी भाऊक झालो. मी भावाला म्हटलं, “दिवाळी नंतर ऑपरेशन करूया का?”

तो म्हणाला, “ऑपरेशन शिवाय मी तुला लीलावती बाहेर पाऊल ठेवायला देणार नाही.”

मी म्हटलं, “बरं मला तीन तास सोड. मी माझं जन्मस्थळ, माझी शाळा किंग जॉर्ज, कॉलेज रुईया, व्हि जे टी आय, शिवाजी पार्क, सावरकर स्मारकाचं स्टेज, शिवाजी पार्कचा गणपती (गणेश उद्यान) सिध्दीविनायक, वानखेडे, आणि माउंट मेरीलां जाऊन येतो.” लहानपणी मला वडील खांद्यावर घेऊन माउंट मेरीला जात असत. ते मला डोळे भरून पाहायचं होतं.

तो म्हणाला, “तू काळजी करू नकोस. ह्या सर्व ठिकाणी तू नंतर स्वतःच्या पायाने जाशील.” ह्या शब्दांनी मला धीर दिला. मनातली ऑपरेशन थिएटर मध्ये आयुष्य संपू शकतं ही भावना दूर पळाली.

ऑपरेशनच्या दिवशी माझी रवानगी आ य सी सी यू मध्ये झाली. लग्नापूर्वी वधूला नटवतात, तसं माझं नटणं झालं.

वेगवेगळ्या नळ्या शरीरात गेल्या. माझी धाकटी सून हेमांगी हळूच पडदा सरकवून आत आली आणि म्हणाली, “बाबा, काय ऐकायचंय?”

मी म्हटलं, “माझा सी रामचंद्र ह्यांचा कार्यक्रम ऐकव.” 

मी संगीतात त्या  ‘नटण्याच्या’ वेदना विसरून गेलो. नव्या आयुष्याशी लग्न करायला सज्ज होऊन मी ऑपरेशन थिएटर नावाच्या स्टेजवर उभा राहिलो. 

आठ तास ती मंगलाष्टकं चालली. शेवटच्या शुभ मंगल सावधानने सर्वांनी निःश्वास सोडला. नव्या आयुष्याच्या उंबरठयावरचं माप मी ओलांडलं होतं. 

पण हे इतकं सहज घडलं नव्हतं. माझी अँजिओप्लास्टी आणि एक प्रोसिजर आधी झालेली असली तरी मेजर ऑपरेशनचा अनुभव पहिलाच होता.

जवळचे नातेवाईक, आणि मित्र ह्यांचे हात हातात घेत ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना, त्यांच्या स्पर्शातून प्रेम आणि काळजी जाणवत होती. माझ्या अनंत मित्रांनी, चाहत्यांनी देवाकडे केलेल्या प्रार्थनेची ताकद घेऊन मी आत गेलो. आत देवाचं अस्तित्व डॉक्टरांच्या रूपात होतं. हे डॉक्टर्स त्या परमेश्वराचे दूत होते.

युरोलॉजिस्ट डॉ हेमंत पाठक, अनेस्थेटिस्ट डॉ फाल्गुनी, आणि गॅसस्ट्रो इंटेस्टाईनल सर्जन डॉ हितेश मेहता, यांची टीम माझ्याशी अत्यंत हसून बोलले, माझ्यावरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. एक सुई टोचली, आणि जवळपास काही सेकंदात मी झोपेच्या अधीन झालो. अशी झोप, ज्यात स्वप्न नव्हतं, वेदना नव्हत्या, जेंव्हा झोपेतून जागं करण्यात आलं तेंव्हा मधल्या आठ तासातलं काहीही आठवत नव्हतं. मी अशी झोप एकदाच अनुभवली होती. हार्ट ॲटॅकच्या वेळी मला माॅर्फिंनचं इंजेक्शन दिलं होतं तेव्हा.

माझ्या ऑपरेशनचं वैद्यकीय भाषेतल वर्णन Laparoscopic cholecystectomy and right radical nephrectomy असं होतं. डॉ मेहतांनी जेंव्हा पित्ताशयावर हल्ला केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की पित्ताशयात पस झाला होता. गँगरीन झाल्याचं लक्षण होतं. प्रत्येक अवयवाला एक आवरण असतं त्या आवरणाला आणि यकृताला ते चिकटलं होतं.

चांगल्या शल्य विशारदाचे हात हे कलावंताचे हात असतात. डॉ मेहतांनी हा गुंता, अत्यंत सुंदरपणे आणि अचूक सोडवला. डॉक्टरी ज्ञान, अनुभव आणि कलेचा त्यांच्या हातात अपूर्व संगम होता. डॉ पाठकांनी त्यांना मदत केली.

त्यांनी नुसतं पित्ताशय बाहेर काढलं नाही. पोटातला टाईम बॉम्ब बाहेर काढला. माझा भाऊ हॉस्पिटलच्या बाहेर मला क्षणभरही सोडायला का तयार नव्हता, हे मला कळलं. अपेक्षेपेक्षा जास्त रक्त गेलं होतं. अत्यंत गुंतागुंतीचं ऑपरेशन पार पडलं होतं. जीव वाचला होता. 

आणि मग माझ्या भावाने मास्टर स्ट्रोक मारला. माझा भाऊ आणि दोन सर्जन ह्यात चर्चा झाली. पुढे जायचं आणि किडनी काढायची का? माझे इतर पॅरामीटर्स चांगले होते. किडनी काढून टाकायची ही उत्तम संधी होती. हे माझ्या भावाने ताडलं, आणि निर्णय घेतला, जायचं पुढे.

हा निर्णय अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा होता. 

मग डॉ पाठकना डॉ मेहतांनी किडनी काढायला मदत केली. ऑपरेशन थिएटर मध्ये वैद्यकीय ज्ञान आणि कसब पणाला लागलं होतं. बाहेर बसलेली रक्ताची आणि मैत्रीची नाती, देवाचा धावा करत होती. आणि मी शांतपणे दोन जगाच्या सीमारेषेवर गाढ झोपलो होतो. 

त्याच वेळेला वानखेडेवर अफगाणिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलियाचा  सामना अटीतटीने खेळला जात होता. ग्लेन मॅक्सवेल जिवाच्या आकांताने खेळत होता. आमचे डॉक्टर्स तसेच खेळले. आणि जिंकलें. दोघंही जवळपास एकाचवेळी जिंकले. 

डॉ स्नेहाने मला जागं करून तो स्कोअर सांगायचा प्रयत्न केला. पण शुध्दी आली नव्हती. नीट शुध्द मी पुन्हा आय सी सी यू त आल्यावर आली. तेंव्हा पाहिलं लक्षात असलेलं वाक्य बायको कानात कुजबुजली, “ऑपरेशन चांगलं झालं. पित्ताशय, किडनी दोन्ही काढलं.”

भारतीय संघ विश्वचषक ऐन मोक्याच्या वेळी दबावाखाली हरला.

माझ्या आयुष्यातला हा मोठा विश्वचषक डॉक्टरांनी दबावाखाली जिंकून दिला. माझा भाऊ डॉ प्रकाश संझगिरी ह्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स सारखं नेतृत्त्व केलं.

देवाने आजार दिले, पण त्यातून बाहेर काढण्यासाठी भाऊही दिला. लढाई संपलेली नाही, पण पुन्हा नवी उमेद मिळाली आहे. या जगण्यावर शतदा प्रेम करण्यासाठी.

लेखक :  श्री द्वारकानाथ संझगिरी

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गदिमांचा एक किस्सा … – लेखक : श्री सौमित्र श्रीधर माडगूळकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ गदिमांचा एक किस्सा … – लेखक : श्री सौमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

गदिमा ग्वाल्हेरला विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

मुक्काम प्रसिद्ध कायदेपंडित प्रिं. करकरे यांच्या बंगल्यावर होता. ग्वाल्हेरच्या साहित्यसंस्थेचे ते अध्यक्षही होते. तिथल्या मुक्कामात बोलता बोलता वकिलांनी गीतरामायणासंबंधी चौकशी केली.

वकील म्हणाले, “अण्णासाहेब, इतरही काही गायक आता गीतरामायणाचे कार्यक्रम करायला लागले आहेत.ते रॉयल्टी वगैरे देतात?”

गदिमांनी वस्तुस्थिती सांगितली.

करकऱ्यांनी एक कोरा कागद त्यांच्या पुढे सरकवला व ते म्हणाले, ”यावर सही करून द्या.”

गदिमांनी विचारले, “कशासाठी ?”

“ मला वकीलपत्र दिलंय म्हणून. मी तुमचे गीतरामायणाच्या रॉयल्टीचे पैसे वसूल करून देतो. वकील फी घेणार नाही.”

क्षणात कागद परत करीत गदिमा म्हणाले,

“मग गीतरामायण लिहिलं, याला काहीच अर्थ उरणार नाही. वकीलसाहेब, अहो, रामनामाने दगड तरले, मग काही गायकमित्र तरले म्हणून काय बिघडलं? “

करकरे नुसते गदिमांकडे बघतच राहिले.कौतुक, आदर, भक्तिभाव, प्रेम अशा अनेक संमिश्र छटा त्यांच्या नजरेत तरळत होत्या. किती हा मनाचा मोठेपणा!गीतरामायणाच्या शेवटच्या ओळीत गदिमा म्हणतात-

‘नच स्वीकारा धना कांचना

नको दान रे, नको दक्षिणा

काय धनाचे मूल्य मुनिजना

अवघ्या आशा श्रीरामार्पण’

*

प्रभू रामाच्या चरणी गदिमांची सेवा रुजू झाली आहे.

‘अवघ्या आशा श्रीरामार्पण!’

*****

लेखक : श्री.सौमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू).    

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोहळा मेणाच्या पुतळ्यांचा… लेखिका : सुश्री ऋचा सुनील पारेख ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ सोहळा मेणाच्या पुतळ्यांचा… लेखिका : सुश्री ऋचा सुनील पारेख ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ,,’वेलेन्टाइन डे’! वेलेन्टाइन डे हा शब्द काही वर्षांपूर्वी भारतात फारसा परिचित आणि प्रचलित नव्हता.आता मात्र ढिगाने ढिगारे जन्माला आलेत ह्या वेलेन्टाइनचे पोवाडे गायला!

आपल्या देशात प्रेमाची व्याख्या समर्पणाने सुरू होऊन भक्तीवर विसावते.परंतु दुर्भाग्य आपलं की ,आपण वेगाने आधुनिकीकरण नावाचा गुळगुळीत दाखला घेऊन पाश्चत्यांचे अंधानुकरण करण्यात बुडालेले ,नव्हे धुंद झालो आहोत.बुडणारा कधीतरी हातपाय हलवतो,पण धुंद झालेल्यांची तर मतीच गुंग असते.

असं म्हटलं जातं की,14 फेब्रुवारी 269 मध्ये संत वेलेन्टाइनला मारण्यात आलं. आणि त्या दिवसाला वेलेन्टाइन डे नाव दिलं गेलं.

राजा कलाउडियस ला सैनिकांचे प्रेम किंवा लग्न मान्य नव्हते  कारण त्यामुळे त्यांची एकाग्रता भंग होते असं त्याला वाटायचं, आणि वेलेन्टाइनने याचा विरोध केला म्हणून त्याना मारण्यात आलं हे एक कारण.दुसरं वेलेन्टाइन बंदी असताना कारागृहात त्यांना जेलरच्या मुलीशी प्रेम झालं .हे समजल्यावर त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. त्याच्या आदल्या रात्री त्यांनी प्रेयसीला जे पत्रं लिहिलं त्यात युअर वेलेन्टाइन  असं लिहिलं त्यानंतर हा वेलेन्टाइन डे सुरू झाला.

रोम संस्कृती हे मानते ते ठीक आहे,पण आपण का म्हणून तो दिवस साजरा करतो?तर म्हणे प्रणय दिवस आहे,प्रेमाचा दिवस आहे.आता ह्या भारतीय विलायती गाढवांना कोण सांगेल की वसंत पंचमी काय आहे ?तर जातील लगेच गुगलबाबाच्या गुहेत!

ज्या देशातल्या युवापिढीला साधं गणतंत्र दिवस म्हणजे काय?रावण महाभारतात होता की रामायणात? हे माहीत नसतं त्यांना वेलेन्टाइन डे चा पूर्ण इतिहास माहीत असतो.दोष त्यांचा नाही आपला आहे.लेखक वृत्तपत्र, संपर्क माध्यमं हे खरे तर समाजाचा आरसा असतात.निदान त्यांनी तरी आपण भारतीय असल्याची जाणीव ठेवावी.

हग डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, किस डे, काय निष्पन्न होतं त्यातुन? आणि कुठले आदर्श तुम्ही निर्माण करता?हे करतांना कुठेतरी आतलं मन बोचणी देत असतं,हे योग्य नव्हे सांगून, मग ती सल लपवण्यासाठी मग हग डे ला शिवाजीराजे अफजलखान मिठीची उपमा द्यायची.प्रॉमिस डे ला बाजीप्रभूच्या पावनखिंडीची झालर लावायची.लाज वाटायला हवी देशासाठी लढणाऱ्या राष्ट्रपुरुषांना इतकं स्वस्त करतांना!

आणि आपल्या संस्कृतीत सगळे दिवस आहेत की साजरे करायला,पूर्वजांसाठी पितृपक्ष,प्रेमासाठी वसंत पंचमी,भावासाठी रक्षाबंधन, पतीसाठी करवा चौथं,गुरुसाठी गुरू पौर्णिमा, एकेक दिवस प्रेम,कृतज्ञता,समर्पण,आणि संस्कारांनी परिपूर्ण आहेत. एकाच दिवशी सगळ्यांचा भाजीपाला करून खाणे निव्वळ बाजारीकरण आहे.त्यांची कदाचित ती संस्कृती असेल त्यांनी ती जोपासावी.कुठल्याही संस्कृतीला विरोध नाही पण भारतात त्याची गरज आहे का?

वसंतोत्सव प्रेमाचं प्रतीक नाही का? साक्षात सरस्वती कृष्णावर मोहित होऊन त्याला पतिरुपात स्वीकारण्याची इच्छा प्रकट करते तेव्हा कृष्ण स्वतःला राधेच्या प्रति समर्पित असल्याचे सांगून,सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी वरदान मागतो आणि पंचमीला देवीची पूजा करतो.हे असतं प्रेम!ही असते आस्था! आजच्या भाषेत सांगायचं तर ही असते कमिटमेंट!

संस्कृती प्रत्येक देशाला असते.कुठल्याही धर्म किंवा संस्कृतिला माझा विरोध नाही,तसेच विदेशी संस्कृती आपल्या देशात शेवाळासारखी पसरू द्यावी याला समर्थनदेखील नाही

वेलेन्टाइनला विरोध केला तर आम्ही जुनवाणी आणि तुम्ही मानता म्हणजे पुरोगामी ,असं होतं नसतं.

आपण जे काही करतो त्यातून काय निष्पन्न होतं हे महत्त्वाचं आहे.वेलेन्टाइनच्या नावाखाली मोकाटपणे वावरणं,महागडी गिफ्ट्स देणं घेणं,वारेमाप पैसा पार्ट्यांमध्ये घालवणं, हे अंधानुकरण किती अंधगर्तेत आपल्याला ढकलतंय याची तसूभरही कल्पना येत नाही खरंच खंत वाटते.आपल्या या मूर्खपणाचा पुरेपूर वापर मल्टिनॅशनल  कंपनीत असलेले शकुनी मनसोक्तपणे करून घेतात.चामडी आणि दमडी चा व्यापार म्हणजे असले सो कोल्ड डे…

बरं! वेलेन्टाइन डे अगदी आठ वर्षाचं पोर ही सांगू शकेल,कारण त्याच्या कानावर तेच पडतं आणि दृष्टीस तेच!त्यात त्याचा दोष नाही.आपण कारणीभूत आहोत.किती जणांना भगतसिंग, राजगुरू,सुखदेवला कोणत्या दिवशी फाशी दिल्याचं आठवतं?अरे तुमचे सगळे डे(निरर्थक) तर या तिघांनी जगून दाखवले.

१) हग डे-हसत हसत मृत्यूला कवटाळले.

2) प्रॉमिस डे-देशाला गुलामगिरीतून सोडवण्याची प्रतिज्ञा केली

3) टेडी डे-इंग्रजांना खेळणं बनवून सोडलं

4) चॉकलेट डे-मेरा रंग दे बसंती चोला म्हणत देशप्रेमाची गोडी लावली

5) किस डे-देशाच्या रक्षणासाठी भूमातेचे चुंबन घेऊन शपथ घेतली.

जर वेलेन्टाइनला फाशी दिल्याचा दिवस इतक्या उत्साहाने साजरा करता तर 23 मार्च हा ‘शहीद  दिन’ केवळ कागदोपत्री का? आपला शहीददिन किती देश साजरे करतात?

हे लिहिताना देखील रक्त उसळतंय आणि डोळे पाणावतात आहे ज्या देशात मृतात्म्यांच्या छायाचित्रासमोर पणती लावण्याची प्रथा आहे त्याची जागा आता मेणबत्त्यांनी घेतली.आपल्याकडचे वैभव सोडून दुसरीकडून उसने घेण्यात कुठली बुद्धिमत्ता दिसते तेच कळत नाही.मेणबत्त्या लावत लावत आपणही मेणाचे होत आहोत हे समजतच नाही का?वाढदिवस काय तर मेणबत्त्या विझवून करायचे.अरे आपल्या संस्कृतीमधले संस्कार बाजूला सारून का पाश्चात्यांच्या पायाशी लोळताय बाबांनो!मेणाचे पुतळे होऊनच जगा मग!जिथे एखाद्या विचाराची गर्मी मिळाली तिथे वितळले,जिथे नर्मी मिळाली तिथे घट्ट झाले.आचरण मेणासारखं, आदर्श मेणासारखे,आणि अस्तित्वही मेणासारखे!

त्यांच्या नकलाच करायच्या असतील तर शिस्तीच्या करा, टेक्नॉलॉजीच्या करा,वेळेच्या सदुपयोगाच्या करा,राष्ट्रविषयीच्या प्रेमाच्या करा,उत्तम बाबींचे अनुकरण करता येत नाही,तिथे भिंतीवरच्या पिचकाऱ्या आदर्श वाटतात!

क्षणाक्षणाला विरघळणाऱ्या मेणबत्त्यांचीं नाही,तर कोरीव काम करून रेखीव शिल्प साकार होऊ शकेल अशा पाषाणांची देशाला गरज आहे.जे अक्षत असतील, अटल असतील,त्यांचीच वंदना होते!त्यातूनच इतिहास सर्जतो!

हात जोडून कळकळीची विनंती आहे,देशासाठी फार काही करू शकत नसाल तर निदान स्वतःला आणि भावी पिढीला इंग्रजाळलेल्या अवस्थेत जगण्यापासून परावृत्त करा.इतकं केलं तरी भारतीय असल्याचे सार्थक होईल.

नाहीतर आहेच उद्यापासून ‘तेरी मेरी प्रेम कहाणी

मी तुझा राजा तू माझी राणी

बाकी सगळं पालथ्या घड्यावर पाणी…

*********

लेखिका : सुश्री ऋचा सुनील पारेख

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझ्या चुका…” – लेखक : सुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ “माझ्या चुका…” – लेखक : सुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

“पुढील महिन्यात माझ्याकडे वृद्ध आईबाबा येणार आहेत. तुम्ही तुमच्या आईसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करत होतात. आणि असं बरचं काही माझी आई नेहमीच सांगायची. तर काय करु?

जरा pl. टिप्स द्या..” सुलक्षणा विचारत होती.–

तेव्हा मी तिला बरेच पदार्थ लिहून दिलेच. आणि वृद्ध,आजारी व्यक्ती संभाळताना माझ्या हातून झालेल्या बऱ्याच चुका सांगितल्या — म्हणजे तिने सावध रहावे.. खूप खूप चुका झाल्या-

** *** अहमदाबादला आमच्या घरी माझे वृद्ध सासु..सासरे अगदी आनंदात असायचे .पण..

एकदा सासरे फिरायला गेले.. ” नीट सावकाश जा हं !काँलनीबाहेर जाऊ नका …” या सूचना मी दिल्या.

पण.. आमच्या घराचा  नंबर व पत्ता द्यायला विसरले, ते भटकतच राहिले .त्यांना वयोमानानुसार घरनंबर आठवलाच नाही. ते सैरभैर झाले. अर्थातच मी अर्ध्या तासात त्यांना शोधत गेलेच.. दाखवलेच नाही त्यांना काही…. पण.. वयोवृद्धांना आपला पत्ता बरोबर लिहून देणे, हे महत्त्वाचे..

वयोमानानुसार त्यांना पोथी वाचन अवघड होते. हे माझ्या बऱ्याच उशिरा ..आठदहा दिवसांनी लक्षात आले..मग चूक सुधारली..रोज सकाळी वृत्तपत्रे वाचून दाखवणे. व दुपारी.. माझ्या लेकीला मांडीवर घेऊन थोपटत..अंगाई ऐवजी..त्यांच्यासाठी पोथी वाचन केले.

माझ्या सासूबाई.. हाँस्पिटलमधे होत्या. मी रोज रात्रभर असायची. हाँस्पिटल  सुसज्ज होते. तरीही –.बेडपॅन देतात..  निघून जातात. असा अनुभव आला..शारीरिक स्वच्छता करत नाहीत.. हे मला दुसऱ्या दिवशी कळले. माझी चूक झाली… मग सेवेकरींवर अवलंबून रहायचे नाही. रुग्णांची आंतर्बाह्य शारीरिक स्वच्छता, शुश्रूषा आपल्यालाच करायची आहे. हे  लक्षात घेऊन .. रोज रात्री  कडूलिंब पाणी व सकाळी उठल्यावर गुलाबपाणी त्या जागेवर शिंपून..बेबी पावडर लावून ठेवणे.. हे केले. नारळपाणी हे तर अंतर्गत शुद्धीकरण करतेच. मी पुढे सर्व रुग्णांबाबत ते पाळले.

— ती चूक वेळेवर लक्षात आली म्हणून त्या जवळजवळ दोन महिने हाँस्पिटलमधे असूनही त्यांना bed sores झाले नाहीत. माझ्या सासूबाईनी त्यांच्या बहिणीला सांगितले —

 ” संपूर्ण शरीराची स्वच्छता किळस वा आळस न करता उन्नती सतत करत होती. म्हणून बोटभर सुद्धा जखम झाली नाही.”

पहिल्याच दिवशी मी नर्सवर भरोसा ठेवला ही चूक लक्षात आली, म्हणून  बरे झाले. धडा घेतला.. कुणावरही  अवलंबून रहायचे नाही, स्वतः रुग्णसेवा करायची.

**** माझी आई आजारी असताना..(स्मृती भ्रंशाने तिला बोलता येत नव्हते) अल्झायमर पराकोटीचा  होता. ती माझ्याकडे येऊन दोनच दिवस झाले होते. तिला आईस्क्रीम भरवताच… एकदम ती किंचाळली.. चवताळली..मला मारत सुटली..माझे केस उपटले. कडकडून चावली. चूक तिची नव्हती.(तिला स्मृती भ्रंश होता. या भयंकर आजाराच्या शेवटच्या टप्प्यावर..रुग्ण हिंसक बनतो. चवताळतो, बेदम मारतो. नाते विसरतो. जवळच्या व्यक्तीला सहन करावेच लागते. व मार खाणे असह्य झाले तर दूर ठेवावेच लागते.नाईलाजाने. )

—  तिला तो गार स्पर्श  सहन झाला नाही. चूक माझी होती. मग लक्षात आले.. वार्धक्यात आईसक्रीम खूप खूप गार चालत नाही.. जरा वेळाने.. तिने आवडीने खाल्ले..आणि पुढे नंतरही मी ती चूक सुधारली..अति गार काही दिले नाही. व तिनेही आनंदाने चाटून पुसून खाल्ले…. प्रत्येक क्षण कसोटीचा होता.

**माझे वडील….  त्यांना नागीण झाली होती. त्यामुळे व वाढत्या वयानुसार थकल्याने हातात जोर नव्हता. त्यामुळे त्यांना आंघोळ घालणे, कपडे घालणे, जेवताना.. पोळीचे तुकडे करून देणे, मुख्य म्हणजे पाठीला ,पायांना मालीश करणे हे सर्व मी करत होतेच…

*वडिलांना आंघोळ  घालून त्यांचे अंग पुसताना लक्षात आले की म्हातारपणात  कातडी नाजूक होते. म्हणून टर्कीश  टाँवेल, V.I.P. Shorts  वापरणे योग्य नाही. नाजूक कातडी दुखावते… आपले वडील हेच मुळात आपल्या साठी.. V.I.P. असतात. हे लक्षात आल्यावर पंचा, कोपऱ्या, लुंगी मागवून ती सुखद वस्त्रे  वापरली.

* कवळीची डबी उघडून कवळी घासण्यासाठी हातात घेतली तेव्हा लक्षात आले.. छी.. छी.. छी–

दात किती अस्वच्छ.. कवळीतील तीन दात तुटलेले.. काही दात झिजलेले.बघून मी स्वतःला लाखो दुषणे देऊ लागले. दर महिना वडील माझ्या घरी येतात. किमान पाचसहा दिवस राहतात. त्यांची कवळी वीस वर्षांपूर्वीची होती. बदलायला हवी, हे माझ्या लक्षात कसे आले नाही?

केवढी मोठी चूक झाली माझी !!!

मी लगेचच डेंटिस्टला फोन करुन.. ‘ ते रुग्ण आहेत. आपण येऊन  बघता का? नवी कवळी करुन देता का?’  विचारले. माझ्या विनंतीवरून  ते  बहुमल्य वेळ खर्चून आले. माप वगैरे घेऊन.. अर्ज़ंट कवळी बनवून दिली. माझे वडील जेव्हा जेव्हा आमच्या घरी येत, ..तेव्हा..त्यांना चष्मा पुसून देत होते..नखे कापून देत होते.. डोळ्यात औषध घालून देत होते. तेल लावून देत होते, तेव्हा दात/कवळी स्वच्छ आहे की नाही, हे पहाणे मी कशी विसरले बर? खरच मोठी चूक झाली होती–माझी !!!

आणि खरं म्हणजे मी अगदी माझ्या नवव्या वर्षीपासून माझ्या आजोबांची कवळी घासून पुसून लख्ख करणे, पायांना, पाठीला मालीश करणे.. हे संस्कार आमच्यावर बालपणापासून आहेतच…तरीही माझ्या लक्षात आले नाही? चुकलेच माझे !!! अस्वच्छ दात मुखात असताना.. मी काळजीपूर्वक केलेले पदार्थ पचणार कसे??? डॉ.नी माझी समजूत घातली.. तुम्ही रोज खीर/दुध,आणि सार/सूप्स /नारळ पाणी ,आणि मऊ पातळ खिचडी वगैरे देत होतात तेव्हा ते दात लावत नव्हते. खरं म्हणजे..तेव्हढेच पुरेसे असते.जास्त खायचेच नसते इतके आजार असणाऱ्यांनी !!!…. वगैरे. पण चूक ती चूकच होती.

ते पुण्यात गेल्यावर रोज फोनवर सांगायचे..

आंघोळ घालणे, कवळी साफ करणे, बूटसाफ करून  घालणे. गरमागरम पौष्टिक आहार वेळेवर देणे…प्रत्येक वेळी तुझी आठवण येते. येथे काही नीट कुणी करत नाही…  वगैरे.. मी हसत असे.

कारण  काही  व्यक्तींना सवय असते–प्रत्येकाला तोंडावर.. “तू किती माझी काळजी घेतेस,नाही तर ती.. 

हे प्रत्येकाला म्हणणे. हा मनुष्य स्वभाव असतो.त्यामुळे स्वतःच्याच मुलांच्यात भांडणे होतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही.

— हे मी पूर्णपणे लक्षात ठेऊन ती चूक आम्ही पुढे करणार नाही..असे मनाशी ठरवले आहे. 

****माझ्या मोठ्या नणंदताई  रूग्ण म्हणून माझेकडे होत्या. दोन्ही डोळ्यांना पट्टी होती.

सेवा करायला बाई ठेवली की नीट करत नाही.. हा अनुभव गाठी होता. म्हणून  त्यांचे सर्वकाही मी करत होते. दुखणे डोळ्यात होते. बाकी त्या हसून खेळून मजेत होत्या. गप्पा, टप्पा, गाणी-गोष्टी चालू असत.

त्यांच्या डोळ्यांवर पट्टी आहे  म्हणून मी खरतर त्यांना आंघोळ घालणे, वगैरे सर्व काही करत होते.तरीही अनावधानाने..मी–एकदा..'””ताईवन्सं ,या लवकर ! तुमच्या आवडीचे गाणे लागले आहे. बघायला या””

असे बोलले. असेच एकदा..”‘ताई वन्सं, बेल वाजली. दार उघडता का? मी कणीक भिजवत आहे. आणि मला दुसऱ्या अधू हाताने दार उघडता येत नाही !” असे मी चुकून बोलले

त्यांना किती वाईट वाटले असेल ना..नंतर आम्ही दोघी खूप खूप हासलो..आंधळ्या–पांगळ्याची जोडी !

त्या समजून घेणाऱ्या होत्या म्हणून.. माझ्या चुकीवर हासून पांघरूण घातले.

— ते सर्व झाले. पण जी चूक झाली ती चूकच असते..

— आणि प्रत्येकावर अशी आबालवृद्धांचे संगोपन करण्याची वेळ येतेच. .. जागृत रहावे..

लेखिका : सुश्री उन्नती गाडगीळ

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऑपरेशन रांदोरी बेहाक…. अर्थात थेट भेट गनिमांना ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

ऑपरेशन रांदोरी बेहाक…. अर्थात थेट भेट गनिमांना ! 

जपानी युद्धसदृश खेळांमध्ये प्रतिस्पर्धी एकमेकांवर सर्व शक्तिनिशी चालून जातात… निकराचा हल्ला चढवतात…. आपल्या जीवाची पर्वा न करता… कारण शत्रूही तसाच चालून आलेला असतो… एखाद्या मस्तवाल रानडुकरासारखा. या युद्धप्रकाराला रांदोरी म्हणतात बहुदा. 

एप्रिल, २०२० मधील ही घटना आहे. लोकांना आपल्या जीवाची भ्रांत असल्याने इतर ठिकाणी काय सुरू आहे, याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती! 

कोरोनामुळे सर्व जगासारखाच हिंदुस्थानही थांबला होता. जीवघेण्या रोगाच्या भीतीने रस्ते ओस पडले होते…. पण सीमेवर गस्त सुरू होती. हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तुफान बर्फवृष्टी होत होती. दोन्ही देशांच्या सीमांना एकमेकांपासून अलग करणारी काटेरी तारांची कुंपणेही बर्फात गाडली गेलेली होती. आसमंतात बर्फाच्या पांढऱ्या रंगाशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते. पण अत्याधुनिक यंत्रांना बरेच काही दिसत होते. 

अत्यंत कमी दृश्यमानता असल्याचा आणि सीमेपलीकडून झालेल्या फायरींगचा आडोसा घेत पाच प्रशिक्षित पाकिस्तानी अतिरेकी भारतीय सीमा ओलांडून कश्मिरात दाखल झालेही होते… रक्तपात घडविण्यासाठी… 

स्थळ कुपवाडा सेक्टर मधील केरन भाग. भारताच्या Unmanned Ariel Vehicle अर्थात छोट्या चालक विरहीत विमानांत बसवलेल्या कॅमेऱ्यांनी आणि इतर उपकरणांनी शत्रूच्या त्या पाच जणांच्या पावलांचे ठसे अचूक टिपले आणि नियंत्रण कक्षाला पाठविलेही होते… दिवस होता १ एप्रिल,२०२०. 

अधिकाऱ्यांनी त्वरीत योजना आखली. आदेश दिले गेले आणि जवान त्या तसल्या भयावह हवामानात अतिरेक्यांच्या मागावर निघाले. बर्फवृष्टी, तुफान वारा आणि कमी प्रकाश याची तमा न बाळगता आपले वाघ पिसाळलेल्या लांडग्यांच्या मागावर निघाले. त्यादिवशी अतिरेकी टप्प्यात आले नाहीत. दोन आणि तीन एप्रिल या दोन्ही दिवशी ही शोधमोहिम सुरू राहिली. या दिवशी मात्र एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा आपले जवान आणि अतिरेकी यांच्यात गोळीबाराच्या फैरी झडल्या…पण त्या अवलादी निसटून जाण्यात यशस्वी ठरल्या. पण पळून जाताना त्यांना त्यांच्याजवळची जड हत्यारे टाकून पळावे लागले होते.

रांदोरीचा आजचा पाचवा दिवस. लांडग्यांना सीमेपलीकडे पळूनही जाऊ द्यायचे नव्हते आणि आपल्या सीमेत घुसूही द्यायचे नव्हते…. त्यांना वर पाठवणे गरजेचे होते. 

ते पाचही जण एक नाल्यात लपून बसले. आधुनिक दळणवळण साधने, खाण्या-पिण्याचे मसालेदार पदार्थ, मद्य, वेदनाशामक औषधे, दारूगोळा…. असा सगळा जामानिमा करून आली होती मंडळी. 

त्यांचा ठावठिकाणा लक्षात आला. पण एकतर शेकडो मीटर्स उंचीवरची रणभूमी. गळ्याइतके बर्फ साठलेले. श्वास घेणे महाकठीण. आता रामबाण सोडायला पाहिजे असे लक्षात आले….

पॅरा एस.एफ. अर्थात स्पेशल फोर्स कमांडोज मैदानात उतरवण्याचे ठरले. भीती आणि अशक्य या शब्दांची साधी तोंडओळखही न झालेले नीडर, उच्च दर्जाचे आणि शारीरिक, मानसिक क्षमातांची अंतिम कसोटी पाहणारे प्रशिक्षण प्राप्त केलेले सहा-सहा कमांडोंचे दोन गट हेलिकॉप्टरमधून अतिरेक्यांच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणाच्या जवळ उतरवण्यात आले. शस्त्रसज्ज असलेले हे बहाद्दर जमिनीवर उतरले तेंव्हा त्यांच्या कमरेपेक्षा जास्त उंचीचा बर्फ तिथे साठलेला होता.. जणू ते एखाद्या सरोवरातच उतरलेले असावेत. 

एका तुकडीचे नायक होते सुभेदार संजीव कुमार साहेब. सोबत पॅराट्रूपर बाल कृष्णन, पॅराट्रूपर छत्रपाल सिंग, पॅराट्रूपर अमित कुमार, हवलदार दवेंद्र सिंग आणि ….

दिवसभर माग काढला गेला…. रात्र पडली आणि उलटून जाण्याच्या बेतात होती. 

पहाट झाली. रस्ता कसा होता? मूळात रस्ताच नव्हता. प्रचंड चढ-उतार, काही ठिकाणी गळ्याइतके बर्फ, तर काही ठिकाणी जीवघेणी खोली असलेल्या दऱ्या. एका दरीच्या किनाऱ्यावर जमा झालेले बर्फ घट्ट होऊन दरीच्या बाजूस साठून राहिलेलं. जमीन ते दरीची किनार यातील फरक लक्षात येणं अशक्य झालेलं. पण अतिरेक्यांच्या पावलांचे ठसे तर त्याच आसपास दिसले होते… ते तिथेच लपून बसलेले असावेत! 

सुभेदार संजीवकुमार साहेब नेतृत्व करीत पुढे पावले टाकीत होते… सावधानतेने. त्यांच्या अर्धा पाऊल मागे बाल कृष्णन आणि छत्रपाल सिंग होते… त्यांचे एकत्रित वजन त्या बर्फाच्या तुकड्याला पेलवले नाही आणि ते तिघेही दीडशे फूट खाली कोसळले….. अत्यंत वेगाने. त्यांच्या शरीरातील अनेक हाडं तुटली….. 

पण त्यांना आपल्या वेदनांचा विचार करायला सवडच मिळाली नाही! त्यांच्या समोर ते पाच अतिरेकी उभे होते… म्हणजे ते लपून बसलेले अतिरेकी ही तीन शरीरं आपल्या पुढ्यात अचानक कोसळलेली पाहून ताडकन उभे राहिले होते. यांच्या रायफल्स सज्ज होत्या… नेम धरण्याची गरज नव्हतीच. काही फुटांचंच तर अंतर होतं…. त्यांनी अंदाधुंद फायरींग सुरू केलं. या तिन्ही जखमी वाघांनी डरकाळी फोडत प्रत्युत्तर दिलेच…. 

गोळीबाराचा आवाज ऐकून वर असलेल्या वीरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या रक्षणार्थ त्या तेवढ्या उंचीवरून बेधडक खाली उड्या घेतल्या…. त्यात पॅराट्रूपर सोनम शेरींग तमंग सुद्धा होते. 

सुभेदार संजीवकुमार साहेब आणि अमितकुमार समोरच्या लांडग्यांवर तुटून पडले होते… जखमी हातांनी मारामारी सुरू केली…. त्यांच्या शरीरात तोवर पंधरा गोळ्यांनी प्रवेश केला होता. इतर दोघांची गतही काही वेगळी नव्हती…

तमंग यांनी एका अतिरेक्याला अगदी जवळून टिपले. एकावर हातगोळा टाकला. अमित कुमार जागीच हुतात्मा झाले होते. संजीवकुमार साहेब गंभीर जखमी होतेच. तमंग यांनी त्यांना मागे खेचलेही होते…. पण उशीर झाला होता. पण या पाचही वाघांनी स्वर्गाकडे प्रयाण करताना त्या पाच जनावरांना नरकात नेऊन फेकण्यासाठी स्वत:च्या दातांत घट्ट धरले होते…! 

एक अतिरेकी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला… पण आपल्या इतर जवानांच्या गोळ्या तो चुकवू शकला नाही. 

आपल्या सहकाऱ्यांचा पराक्रम सांगण्यासाठी दैवाने पॅराट्रूपर सोनम शेरींग यांना सुखरूप ठेवले होते जणू! पण देशाने पाच वाघ गमावले होते. देशाने या पाचही योद्ध्यांचा मरणोत्तर यथोचित गौरव केला. 

सोनम शेरींग यांना मा. राष्ट्रपती मा. श्री.रामनाथजी कोविंद साहेबांच्या हस्ते शौर्य चक्र स्विकारताना आपल्या हुतात्मा सहकाऱ्यांच्या आठवणींनी गहिवरून आले होते! 

५ एप्रिल, २०२३ रोजी या बलिदानाला तीन वर्षे झाली! भारतमातेच्या पांढऱ्या शुभ्र हिमभूमीवर आपल्या लालभडक रक्ताचे शिंपण करणाऱ्या या वीरांचे स्मरण होणं साहजिकच आहे, नाही का? 

सामान्य लोकांना या असामान्य बलिदानाची पुन्हा माहिती व्हावी म्हणून हे सामान्य लेखन. प्रतिक्रिया देताना या हुतात्म्यांचं एकदा स्मरण आणि त्यांच्या आत्म्यांच्या कल्याणासाठी आराध्य देवतांकडे प्रार्थना तुम्ही करालच, याची खात्री आहे. 

🇮🇳 जय हिंद. जय हिंद की सेना. 🇮🇳

सोबत दिलेले छायाचित्र शेरींग साहेबांचे आहे. पुरस्काराचे वेळी घडलेल्या प्रसंगाचे थोडक्यात वर्णन केले जाते. ते ऐकत असतानाची त्यांची ही भावमुद्रा आहे !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुजी यत्ता कंची? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ तुजी यत्ता कंची? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

शनाया आईला विचारत होती, ‘आई तू किती शिकली आहेस गं?’

आज या प्रश्नाने आई किंचित गडबडली, मग मंद हसली. ‘

आज हे काय नवीन नवीन माझ्या शानूचं?’ 

‘अगं, आज शाळेत झिरो पिरेड (शून्य प्रहर) होता. त्यात मुलांनी आपल्या पालकांविषयी सांगायचे होते. कुणी म्हणालं, माझे बाबा डॉक्टर आहेत. कुणी म्हणालं, माझी आई सी ए आहे. कुणाचे आई बाबा दोघंही नावाजलेले वकील आहेत. असं काय काय सांगत होते. माझी वेळ आली तेंव्हा मला जसं सुचलं तसं मी बोलत गेले. माझी आई खूप खूप शिकली आहे. ती डॉक्टर आहे. मला जेंव्हा ताप येतो तेंव्हा ती माझ्या कपाळावर मिठाच्या पाण्याचा घड्या ठेवते. माझ्या पोटात दुखतं तेंव्हा ती मला ओवा मीठ देते. ती गायिका आहे, कारण माझ्याबरोबर ती गाण्याच्या भेंड्या त्याही सुरात लावते. आणि मला झोप येत नाही तेंव्हा ती देवा तुझे किती सुंदर आकाश म्हणते. ती उत्तम वकील आहे कारण माझ्यासाठी एखादी गोष्टं, एखादा क्लास किंवा एखादी वस्तू आवश्यक आहे असं तिला कळतं तेंव्हा माझ्या बाबाकडे माझी बाजू मांडून मला ती वस्तू आणून देते. मला कधी कधी क्षुल्लक भांडणाने इतर मुली खेळायला घेत नाहीत तेंव्हा माझी बाजू ती माझ्या वतीने पटवून देते आणि समेट करुन देते. ती उत्तम ज्योतिष जाणते कारण माझ्या मनात काय चाललंय ते तिला बरोबर कळते. माझ्यासाठी भविष्यात काय उत्तम आहे ते ती जाणते. ती उत्तम शेफ आहे, कारण बाहेरचं खाऊन माझं आरोग्य बिघडेल म्हणून उत्तमोत्तम पदार्थ ती मला घरीच बनवून देते. ती उत्तम ब्युटीशीयन आहे कारण माझ्या गँदरिंगसाठी ती मला घरीच तयार करते. ती उत्तम शिक्षिका आहे कारण मला कठीण वाटणारी गणितं ती मला पूर्ण समजेपर्यंत शिकवत रहाते. ती उत्तम टेलर आहे कारण माझ्या वाढदिवसासाठी उत्तम प्रतीचा ड्रेस ती घरीच मशीनवर शिवून देते. ती उत्तम मॅनेजर आहे कारण एकाचवेळी अनेक गोष्टी ती लीलया मॅनेज करते आणि शेवटी ती एक उत्तम मैत्रीण आहे आणि तिची आणि माझी मैत्री पार अवीट आहे. आई, तुला सांगू, सर्व मुलं आणि बाई तन्मयतेने ऐकत होती आणि माझं बोलणं झाल्यावर तास संपायची बेल होईपर्यंत बाई आणि मुलं टाळ्या वाजवत होती. मला खूप रडू आलं.’

आई ऐकत राहिली. आपली शानू एवढी मोठी झालीये. तिने शनायाला जवळ घेऊन कुरवाळलं. 

‘आई, बाई पण मला असंच कुरवाळत होत्या प्रेमाने! म्हणत होत्या, हिची आई खूप भाग्यवान आहे.’

— आईला गहिवरून आलं. तिने देवाला दिवा लावला आणि तूप, गूळ, खोबऱ्याचा प्रसाद ठेवला. देव बोलला असता तर म्हणाला असता, ‘यांची इयत्ता जगातल्या कुठल्याच शाळेत नं धरणारी आहे. ही साक्षात माझी म्हणजे देवाची यत्ता आहे!’

लेखक – अज्ञात

प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्हॅलेंटाईन डे ☆ सौ. अर्चना देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? विविधा ?

☆ ❤️ “व्हॅलेंटाईन डे” ❤️☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

आता पाश्चात्य लोकांचे पाहून आपणही मदर डे फादर डे साजरे करू लागलो आहोत.

आता 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाईल पण प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या दिवसाची गरज काय? त्या दिवसासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जातात, कार्यक्रम आखले जातात, प्रेम व्यक्त केले जाते, रोमान्स ताजा ठेवण्यासाठी आटापिटा केला जातो आणि सगळेजण करतात म्हणून आपणही करतो. सगळेजण लॉंग ड्राईव्ह जातात म्हणून आपणही जातो. कॅण्डल लाईट साजरा करतात त्याचेही अनुकरण करतो काहीतरी भेट द्यायची म्हणून खिशाला परवडत नाही तरी खरेदी केली जाते, उसनवारीने  पैसे घेतले जातात आणि पैसे परत करावे लागणार म्हणून दुःखी होतात.

पाच रुपयाचे गुलाबाचे फुल 25 रुपये देऊन खरेदी करतो पण या सगळ्याची परत गरज आहे का? कशासाठी पाश्चात्य लोकांचे अनुकरण करायचे?

ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी  पैसे खर्च करूनच केले पाहिजे असं कोणी सांगितलंय?

“प्यार करने के लिए पैसा नही लगता… और प्यार मे कोई सही या गलत भी नही होता| … प्यार सिर्फ प्यार होता है।”  म्हणून त्याला किंवा तिला जे आवडते ते केले तर आनंद द्विगुणित होईल. एखादा मित्र अनेक दिवस भेटला नसेल तर त्याची घालून देता येईल, आवडीचा पदार्थ पोटभर खाऊ घालता येईल ,एखादे चांगले पुस्तक भेट देता येईल., आपल्या मनातील भावना कागदावर लिहून देतायेतील की ज्यामुळे त्याला किंवा तिला आनंद होईल. त्यासाठी व्हॅलेंटाईन ग्रीटिंग देण्याची गरज नाही. त्या ऐवजी भांडण झालेल्या मित्र-मैत्रिणींचा समेट घडवून आणता येईल. मागील चूकीची माफी मागता येईल, दिलगिरी व्यक्त करता येईल हीच खरी प्रेमाची कसोटी ठरेल.हेच गिफ्ट आयुष्यभर पुरेल असे मला वाटते.

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print