मराठी साहित्य – विविधा ☆ “अक्षय्य तृतीया मुहूर्त खास…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ अक्षय्य तृतीया मुहूर्त खास…सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

विशाखा नक्षत्र येई पौर्णिमा

आला पहा वैशाख मास हा

साडेतीन मुहूर्तातील एक

अक्षय्य तृतीया मुहूर्त खास हा

अक्षय्य तृतीया, पितृ, देव व शुभ तिथी, वसंतोत्सव, दोलोत्सव चंदन यात्रा दिन, अखतारी, आखिती व आख्यातरी (गुजरात) अशा अनेक नावाने परिचित असलेला हा सण भारतातील प्रत्येक घरात संपन्न केला जातो.

या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीयेचे विशेष महत्त्व समजले जाते. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय्य तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या प्राचीन संस्कृती, परंपरांमध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षय्य तृतीया असल्यामुळे यालाही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे. हे सांगताना श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षय्य तृतीयेचे व्रत सांगितले.

शाकल नावाच्या नगरात ‘सुनिर्मल’ वाण्याने हे व्रत केल्याने दुसऱ्या जन्मात तो ‘कुशावती’ नगरीचा राजा झाला अशी एक कथा आहे. ‘नाभी’ व ‘मरुदेव’ यांचे पुत्र ऋषभदेव हे भगवान विष्णूचे अवतार होते. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी इंद्राने धरतीवर पाऊस पाडला नाही. तेव्हा ऋषभदेवाने आत्मसामर्थ्याने पाऊस पाडून धरती सुजलाम-सुफलाम केली. तेव्हा प्रभावित होऊन इंद्राने आपली कन्या ‘जयंती’ हिचा ऋषभदेवांबरोबर विवाह लावून दिला. ऋषभदेवांना शंभर मुले झाली. गंगा, यमुनेच्या मधल्या भूमीचा राजा व ऋषभदेवांचा मुलगा ‘ब्रह्मावर्त’ याला त्यांनी जो आध्यात्मिक उपदेश केला तो विश्व प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ पुत्र ‘भरत’ याच्या स्वाधीन राज्यसत्ता देऊन त्यांनी विदेही अवस्थेत कोंक, कुटक, कर्नाटक या दक्षिणेकडील प्रदेशात बराच प्रवास केला. एकदा ते अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हस्तिनापूरचा राजा ‘श्रेवांस’ याच्या घरी गेले. तेव्हा राजाने त्यांना ऊसाचा रस पिण्यास दिला त्यामुळे त्यांच्या भोजनशाळेतील अन्नदेवता व हस्तिनापूरचे ऐश्वर्य अक्षय्य टिकले म्हणून आजही हस्तिनापूर उर्फ दिल्ली शहर संपन्न राजधानीचे ठिकाण आहे.

देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो सर्व पापांतून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.

अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला, असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेपासून चारधाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात. याच दिवशी नर-नारायण यांचे अवतरण झाले होते अशी मान्यता आहे. त्रेतायुगातच महाभारत घडले होते. याच युगात जगत्कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रगट झाले आणि कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता.

विविध राज्यांमध्ये अक्षय्य तृतीया वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या दिवशी ओरिसा व बंगाल प्रांतात परस्परांना चंदनाचे तेल लावून तीन आठवडे चालणाऱ्या ‘चंदनयात्रा’ या उत्सवाची सांगता करतात. जगन्नाथ पुरीला मदनमोहनाच्या मूर्तीला चंदनाचे तेल लावून शोभायात्रेने नरेंद्र तलावात नौकाविहार करतात. गुजरातमध्ये द्वितीयेला गावाबाहेर धान्य, कापूस व साखर या वस्तुंचे एक नगर तयार करतात. त्यामध्ये एक तांब्याचे नाणे ठेवून त्याला ‘राजा’ व त्याच्याजवळ एक सुपारी ठेवून तिला ‘दिवाण’ असे म्हणतात. गावातील सर्व लोक हे नगर पाहण्यासाठी जातात. या नगरीतील जे धान्य मुंग्यांनी वाहून नेले असेल ते धान्य महागणार किंवा त्याचे पीक चांगले येणार नाही असे भाकीत केले जाते व ज्या दिशेला मुंग्या कापूस घेऊन जातात त्या दिशेला कापसाची निर्यात करतात.

राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला ‘आखाजी’ म्हणून ओळखले जाते. खान्देशात आखाजीचा हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो.

अक्षय्य तृतीया सागर भरती

नौकाविहारा कोणी न जाती

उसळो ना सागर, रहावी शांती

सागरोत्सव अक्षय्य संपन्न करती

अक्षय्यतृतीया ते श्रावण पौर्णिमेपर्यंत समुद्र खवळलेला असतो म्हणून या महिन्यात समुद्रपर्यटनाला कोणीही जाऊ नये. या काळात सागराने त्रास देऊ नये म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुजरातमध्ये सागराची पूजा करण्यासाठी ‘सागरोत्सव’ संपन्न केला जातो.

कोकणात कुमारीकांना घरी आमंत्रित करून त्यांच्या अंगाला चंदनाचे उटणे लावून शिरा असलेला शंख फिरवितात व पाद्यपूजा करून कैरीचे किंवा दाह कमी करून पचनशक्ती वाढविणारे कोकमचे सरबत पिण्यास देऊन गुलकंद व मोरावळा खाण्यास देतात. या दिवशी शेतीच्या कामाला प्रारंभ केला जातो.

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी व्यवसायास प्रारंभ करतात. आपल्या पूर्वजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला पूर्वजांच्या स्मरणार्थ पूजा करून, त्यांना प्रथम आमरसाचे जेवण देऊन मगच आंब्याचा रस सेवन केला जातो अशी प्रथा, परंपरा आहे.

अक्षय तृतीया दिन भाग्याचा

अक्षय घट तो भरू पाण्याचा

पलाशपत्रे रास गव्हाची

आंबे ठेवून पूजा त्यांची

कुंभार वाड्यातून मातीचा कलश आणून पळसाच्या पत्रावळीवर गव्हाची रास घालून त्यावर कलश ठेवून त्यात पाणी भरावे व आपल्या पूर्वजांसाठी तीळ तर्पणविधी करून ते कलश आमंत्रित केलेल्या व्यक्तिला दक्षिणेसहित दान देऊन आंब्याच्या रसाचे जेवण घालावे.आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ देह, नेत्र, रक्त, वस्त्र, धन, जमीन, विद्या, पायातील जोडा, छत्री, जलकुंभ, पंखा, विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य दान करावे. अक्षय तृतीयेला सत्य, कृत व त्रेता या युगांचा प्रारंभ झाला असून नर-नारायण, हयग्रीव व परशुराम यांचे जयंती उत्सव संपन्न करून, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाने चैत्रगौरी उत्सवाच्या सांगतेबरोबर अक्षय्य तृतीया हा सण संपन्न करतात.

वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या निमित्याने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते, तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते. अक्षय्य तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते अशा मान्यता आहेत. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती, असेही सांगितले जाते.

कृतज्ञता पितरांच्या प्रती

आशीर्वच भरभरून देती

कृपाच त्यांची मिळण्या यशप्राप्ती

अक्षय अखंड अक्षय्य तृतीया ती

*

पूर्वज सांगून गेले आम्हा

परंपरा साऱ्या येतील कामा

पाऊलखुणांवर आम्ही चालतो

अक्षय्यदिनी या पूर्वजास स्मरतो

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “आत्मनिर्भर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“आत्मनिर्भर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… अजुन किती पैसे पैसै करतेस गं…पाकिट तर केव्हाच रिकामं करून झालं… शर्टाचे नि पॅंटचेही खिसे सगळे झाडून झाडून दाखवले… आता माझ्या जवळ एक दिडकी देखील शिल्लक ठेवली नाही… नोकरी धंद्याचा माणूस मी ,मलाही काही किरकोळ खर्च वगैरे रोज करावे लागतात कि … आणि तू तर मला कफ्फल्लकच करून सोडलसं… तरी बरं तुला महिन्याच्या पगाराचा नि त्यानंतर केलेल्या सततच्या मागणीनुसार दिलेल्या पैशाचा हिशोब कधीच मागितला नाही… आणि इनमिन  दोघचं आपण नवरा बायको घरात राहत असताना  एव्हढे भरमसाठ पैसै लागतातच कशाला.. त्यात माझं दिवसाचं जेवणखाण, चहापाणी तर बाहेरच्या बाहेर निपटत असतं…ती तुझी सतरा महिला मंडळ, अठरा भिशीची वर्तुळं, किटी पार्टीची महिला संमेलनं, साडी ड्रेसेचे सतराशेसाठ exhibitions…गेला बाजार  माॅल मधील शाॅपिंग,अख्खं टाकसाळ जरी तुझ्या हाती दिलं तरी तुला ते कमीच पडेल… आणि आणि एव्हढी ढिगानं ढिग खरेदी करूनही कुठल्याही समारंभासाठी म्हणून नेसण्यासाठी एकही साडी तुझ्याकडे कधीच नसते…याबाबत तु कायम चिंतित राहतेस… मला ते दर वेळेला न चुकता ऐकवून दाखवतेस.. यावर मी काही आहेत त्या साड्यांमध्ये सुचवू पाहतो तेव्हा वसकन अंगावर येत म्हणतेस शी या कार्यक्रमाला असल्या साड्या काही उपयोगाच्या नाहीत.. त्याला ती तसलीच हवी… मागच्या वेळी माझी घ्यायची राहून गेली… आता ती साडी नसेल तर मला काही या कार्यक्रमला जायला लाज वाटेल बाई… म्हणजे थोडक्यात काय आली नवी खरेदी… मी आता असं करतो साड्यांच्या दुकानातच नोकरी करतो.. म्हणजे निदान तुला साड्यांचीं चिंता कधीच भेडसावणार नाही…

… तुम्ही सारखं सारखं माझ्या साडीवर काय घसरताय… तुम्हा पुरुषांना त्यातलं काय कळणार म्हणा… आणि तुम्ही दिवसभर ऑफिस मध्ये असता मग मी काय घरी बसून माश्या  मारू… विरंगुळा म्हणून महिला मंडळ, भीशी क्लब, किटी पार्टी, यातून चार शहाण्या , हूशार बायकांच्या सहवासात काढते… कितीतरी नवी नवीन गोष्टी कळतात…आजं जगं कुठं चाललयं आणि आजची महिला कुठे आहे… याचं वास्तवातलं भान येतं… तो आपल्या केंद्र सरकारने केलेला महिला आत्मनिर्भर चा कायदा आता मला चांगलाच समजलाय बरं… सारखं सारखं उठसुठ तुमच्या कडून किती दिवस पैश्यासाठी याचना ती करावी म्हणतेय मी… मलाही वाटतं आता आपण आत्मनिर्भर व्हायला हवं… आणि आणि तुम्ही मला ते तसं होऊ देण्यास तयार असायलाचं हवं… नाही का?.. मग देताय ना दर महिन्याला माझे म्हणून खास   आत्मनिर्भरतेचे पैसे…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हरीणकाळजातील हळवी भीती! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

हरीणकाळजातील हळवी भीती! ☆ श्री संभाजी बबन गायके 

गीतकार आनंद बख्शी

किसी राहमें किसी मोड पर…कहीं चल न देना तू छोडकर ! .. मेरे हमसफर…मेरे हमसफर !

सृष्टी अव्याहतपणे सृजनाची,नवनिर्माणाची,चैतन्याची वाट चालावी म्हणून स्त्री-पुरुषांमधील नातेसंबंधांना नियतीने एकमेकांच्या हातात हात गुंफून एकपावलाने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली असावी! अन्यथा हा केवळ देहव्यवहार उरला असता प्राणीजगतातला!

मराठीतल्या एकांड्या ‘मी’ चं अनेकवचन म्हणजे आपण…  हिंदीतल्या मैं चं बहुवचन म्हणजे हम! या अनेकवचनांत एकापेक्षा अधिकजणही असू शकत असले तरी याचा ‘आपण दोघं’ हा अर्थ गृहस्थाश्रमी माणसांना अधिक भावणारा!

माणसं व्यवहारानं,प्रेमानं,योगायोगानं आयुष्यभरासाठी एकत्र येतात आणि मग चार पावलं असली तरी वाट आणि चाल एक होऊन जाणं साहजिक,सहज होऊन जातं. आणि मग जसजसा रस्ता पावलांना पुढे पुढे नेत राहतो तसतशी पावलांना एकमेकांची मोहिनी पडत जाते..हाताच्या बोटांना गुंफलेले राहण्याची गोडी अनुभवण्याचे सुख सोडवत नाही….जसा जीव देहाला बिलगून रहावा तसंच की हे!

वाटेत ठेचा लागूही शकतात,नव्हे लागतातच. पण सावरायला सोबत असतं आपलं माणूस. क्षणिक रागाचे खाचखळगे एखाद्या अंधा-या वळणावर दबा धरून बसलेले असतात आणि पावलं त्यांच्या जाळ्यात अडकतातही कधीकधी नकळतपणे….पण जाणती मनं हात सोडत नाहीत सहजी! यातूनच हातांची आणि काळजांची गुंफण अधिकाधिक घट्ट होत जाते.

पण….मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात ते का असंच? संसारसुखाचा चषक ओठांना स्पर्शत राहून प्रेमरस जिव्हेला तृप्ततेचा अभिषेक घालीत देहात उतरत जात असताना हा अमृतचषक रिता होत जातो आहे, याची नकोशी जाणीवही उभी असते आतल्या मनातल्या अंगणात अंग चोरून. आपण माळरानावर उभे असावं आणि बोचरा वारा वाहू लागावं मधूनच…या बोचरेपणातून देहाची सुटका नाही. पण हा बोचरा वारा काही सतत येत-जात नाही….अगदी विसर पडून जातो त्याचा. आणि मग तो हळूच अवतरतो.

जगण्याच्या या प्रवासातल्या सोबतीला हमसफर,हमराह म्हणतात हिंदीत,ऊर्दुत. यातला हम मात्र सोबती अशा अर्थानं आणि सफर म्हणजे अर्थातच प्रवास! अखेरच्या श्वासापर्यंत सोबत करण्याच्या आणाभाका घेतलेल्या असल्या तरीही ही  प्रेमसरिता मध्येच खंडीत होऊ नये असं वाटतंच….जगातल्या इतर कोरड्या नद्या पाहून. शेवटी इतरांच्याही अनुभवांची गोळाबेरीज करत असतंच हृदय. विरह म्हणजे दुसरं मरणच. म्हणून ती दोघं एकमेकांना हळुवारपणे सांगू पाहताहेत…रस्त्यात कुठलं वळण कधी येईल याचा भरवसा नाही…..

किसी राह में…किसी मोड पर…कहीं चल न देना तू छोडकर…मेरे हमसफर…मेरे हमसफर!

तु एखाद्या आंधळ्या वळणावर हात सोडून जाणार नाहीस ना माझा हात सोडवून घेऊन?

किसी हाल में किसी बात पर…..कहीं चल न दे ना तू छोडकर!

विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी,एखाद्या गोष्टीवरून तु मला गमावणार तर नाही ना?

मेरा दिल कहे कहीं ये न हो, नहीं ये ना हो

किसी रोज तुझसे बिछड के मैं तुझे ढुंढती फिरूं दर-बदर.

माझं मन सतत आशंकित असतं…असं नाही ना होणार? नकोच तसं व्हायला….आपण एकमेकांना पारखे झालोत आणि मग एकमेकांना शोधत रानोमाळ भटकत आहोत…असं नको व्हायला.

तेरा रंग साया बहार का तेरा रूप आईना प्यार का

तुझ्या मनाचा रंग जणू चैत्रपालवीची ओली सावली आणि तुझं दृश्यरूप म्हणजे प्रेमाचं दर्पण…विविध रंगछटा उभं करणारं.

तुझे आ नजर में छुपा लूं मैं तुझे लग न जाये कहीं नजर!

तुला जगाच्या अप्रिय नजरेपासून लपवून ठेवण्यासारखी एकमेव जागा म्हणजे माझ्या डोळ्यांच्या पापण्या…त्यांच्या आड तु सुखरूप.

तेरा साथ है तो है जिंदगी तेरा प्यार है तो है रोशनी.

जीवनाचं दुसरं नाव म्हणजे तुझा सहवास. तुझी प्रीती म्हणजे या वाटेवरलं प्रकाशाचं झाड. श्वास क्षितीजापल्याड जायला केंव्हा निघतील काही सांगता येत नाही मर्त्य मानवाला.

कहॉं रात हो जाए क्या खबर..

या जाण्यादरम्यान अंधार गाठेल तेंव्हा तुझ्या निरंजनातील ज्योतीचा स्निग्ध उजेड पुरेसा होईल!

आनंद बख्शी! सामान्यांच्या असामान्य भावनांना शब्दरूप देणारे कवी. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी मातृसुखाला पारखे झालेल्या या माणसाला आपल्या वडिलांचं पत्नी-विरहदु:ख त्यावेळी समजलं असेल की नाही ठाऊक नाही.पण विरहवेदनेची जाणीव त्यांना पुढील आयुष्यात कुठे न कुठे अनुभवायला निश्चित मिळाली असावी. त्याशिवाय नेमके आणि तरीही साधे शब्द लेखणीतून प्रसवत नाहीत. प्रारंभीच्या उमेदीच्या काळात ब्रिटीश नौदलात कनिष्ठ साहाय्यकाची नोकरी, ब्रिटीशांविरोधी उठावत सहभागी झाल्याने झालेली अपमानास्पद हकालपट्टी,स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय फौजेत केलेली अल्पकाळ सेवा यानंतर आनंद बख्शी (बक्षी नव्हे!) सिनेसृष्टीत आले आणि रमले! मदनमोहन यांच्या नंतर सैनिकाचा संगीतकार झालेला कदाचित दुसराच माणूस. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगिकारलेल्या या कवीने शेकडो गाणी लिहिली. आनंदजींसारखी, केवळ आठ मिनिटांत एखादे संपूर्ण गाणे लिहिण्याची हातोटी फार कमी कवींना लाभलेली असेल!

मेरे हमसफर (१९७०) हिंदी चित्रपटासाठी आनंदजींनी लिहिलेल्या या गीताला लतादीदींशिवाय अन्य कुणी न्याय देऊ शकलं असतं का ही शंकाच आहे. मुकेशजींना हे गाणं देण्याचा आग्रह धरणा-या आनंदजींना मुकेश यांच्या साध्या,सरळ स्वरांचं सामर्थ्य माहीत होतं….कारण सर्वसामान्यांचं भावजीवन नजरेसमोर उभे करणारे शब्द सर्वसामान्यांनाही गुणगुणता यावेत असं गायलं जावं असं त्यांना वाटत होतं आणि यासाठी मुकेशच हवे होते.

आनंदजींच्या या शब्दांना चालीचं कोंदण द्यायला आणखी एक आनंदजी होते आणि त्यांच्यासोबतीला कल्याणजी! मनात भक्तीभावना निर्माण करण्याचं सामर्थ्य असलेला कर्नाटकी संगीतातला राग चारूकेशी त्यांनी निवडला आणि ताल रूपक. अतिशय हळूवारपणे संतुर श्रवणेद्रिंयाला साद घालत येते….सोबतीला नाजूक परंतु तितकाच स्पष्ट तबला…आणि बासुरी! आणि लगेच लता नावाच्या स्वरपालखीत विराजमान होऊन शब्द उमटतात…किसी राहे में..किसी मोड पर! यानंतर येणा-या कहीं शब्दाची तर मोठी खुमारी. एकच शब्द तीन अर्थाने ऐकवणं म्हणजे स्वरांची पूजा केल्यावरच प्राप्त होणारा कृपाप्रसाद! एक ‘कहीं’ म्हणजे कुठेतरी किंवा कुठेही..अर्थात स्थान निश्चित नसलेलं स्थळ. तु मला सोडून तर जाणार नाहीस ना? दुसरा ‘कहीं’ म्हणजे शक्यता,शंका,आशंका अशा अर्थाने..प्रश्नार्थक! या ‘कहीं’ ला ‘नहीं’ चं गोड यमक म्हणजे गुलाबावर शिंपडलेलं कस्तुरी अत्तर. या कहीं चं उत्तर नकारार्थीच यावं अशी वेडी आशा असतेच मनात कहीं न कहीं ! सतार हळूच डोकावून जाते ओघात. एका कडव्यानंतर तेरा रंग साया बहार का म्हणत मुकेशजींनी गाण्यात केलेला पुन:प्रवेश सुखावणारा आहे.

हे गाणं संपावंसं वाटत नाही…जसा आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास संपावा असं वाटत नाही तसं. कुणाचं जाणं न जाणं आपल्या हाती नाही ठेवलं विधात्यानं. पण जाऊ नकोस असं आर्जव करण्याची ताकद मात्र ठेवली आहे. कुणी सांगावं मनाच्या या आर्ततेमुळं एखाद्याचा इथला मुक्काम आणखी थोडा वाढू शकेल!

५४ वर्षे हे गाणं हळव्या माणसांच्या मनाचा ठाव घेत आलं आहे…आणि जोपर्यंत मानवी जीवनात आत्मिक प्रेमाला जागा असेल तोवर अशी गाणी ऐकली,गायली,गुणगुणली जातीलच. या गाण्यासाठी आनंद बख्शींना अगणित हृदयं तळापासून धन्यवाद देत असतील, यात शंका नाही.

            (मनात येतं ते शब्दांत उतरवण्याची ऊर्मी दाटून येते आणि मग असं काहीबाही लिहिलं जातं. यानिमित्तानं आपल्याही भावनांची उजळणी होते हा स्वार्थ!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक आनंद दिवस आणि बालकवींची पुण्यतिथी… – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

जागतिक आनंद दिवस आणि बालकवींची पुण्यतिथी… – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

५ मे १९१८ ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्‍या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्‍या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी एैकू आली. ही गाडी दुसर्‍या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत अडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली. 

एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती. पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता. मराठी कवितेत ‘बालकवी’ म्हणून अजरामर ठरलेल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही गोष्ट आहे. जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. किती जणांना आठवण आहे या कवीची?

जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस आजच म्हणजे ५ मे रोजी आहे. 

आनंदी आनंद गडे

इकडे तिकडे चोहिकडे

वरती खाली मोद भरे

वायूसंगे मोद फिरे

नभांत भरला

दिशांत फिरला

जगांत उरला

मोद विहरतो चोहिकडे

आनंदी आनंद गडे !

अशी सुंदर आनंदावरची कविता लिहीली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्‍यांना होणार नाही. आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे

स्वार्थाच्या बाजारात

किती पामरे रडतात

त्यांना मोद कसा मिळतो

सोडुनी तो स्वार्था जातो

द्वेष संपला  

मत्सर गेला  

आता उरला

इकडे तिकडे चोहिकडे

आनंदी आनंद गडे

बालकवींचा जन्म १३ ऑगस्ट १८९०  रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्‍या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी 

हिरवळ दाटे चोहीकडे, 

क्षणात येती सरसर शिरवे 

क्षणात फिरूनी उन पडे 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालीचे 

हरित तृणाच्या मखमालीचे 

त्या सुंदर मखमालीवरती 

फुलराणीही खेळत होती

या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्‍याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? केशवसुत, बालकवी पासून ते कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना.घ.देशपांडे, बा.भ.बोरकर, वा.रा.कांत, ग.ल.ठोकळ, ग.ह.पाटील अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्‍यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.

या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा.भ.बोरकर लिहून जातात

तू नसताना या जागेवर 

चिमणी देखील नच फिरके

कसे अचानक झाले मजला 

जग सगळे परके परके

आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो

नसतेच घरी तू जेंव्हा 

जीव तुटका तुटका होतो

जगण्याचे तुटती धागे 

संसार फाटका होतो

आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.

आजकाला सर्वच गोष्टींना जातीचा रंग चढवला जातो. मग बालकवी म्हणजे त्यांची जात कोणती? त्याचा काय फायदा आहे? त्याप्रमाणे त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करायची की नाही ते ठरते. कुठलाही खरा प्रतिभावंत नेहमीच जातीपाती, देश, काळ याच्या सीमा ओलांडून आपली निर्मिती करत असतो. 

बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे. त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे  त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्‍याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे

घड्याळांतला चिमणा काटा

टिक_ टिक् बोलत गोल फिरे

हे धडपडते काळिज उडते

विचित्र चंचल चक्र खरे!

घड्याळातला चिमणा काटा

त्याच घरावर पुन्हा पुन्हा

किति हौसेने उडत चालला

स्वल्प खिन्नता नसे मना!

काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?

शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?

सूर्यकिरण सोनेरी हे 

कौमुदि ही हंसते आहे

खुलली संध्या प्रेमाने

आनंदे गाते गाणे

मेघ रंगले

चित्त दंगले

गान स्फुरले

इकडे तिकडे चोहिंकडे 

आनंदी आनंद गडे !

बालकवींना १०६ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

लेखक : श्रीकांत उमरीकर

जनशक्ती वाचक चळवळ, छत्रपती संभाजीनगर

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोणती साडी नेसू ???? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ कोणती साडी नेसू ????  – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

बायकांना पडणारा सर्वात मोठ्ठा गहन प्रश्न…

.. .. ..  कोणती साडी नेसू.. प्रत्येक बाईच्या आयुष्यात, ‘संध्याकाळी भाजी काय करू’? प्रमाणेच, ‘कोणती साडी नेसू’ हा प्रश्न पण फार ज्वलंत प्रश्न असतो. पुरूषांना जसं मयताला आणि लग्नाला एकच ड्रेस चालतो तसं बायकांचं मुळीच नसतं बरं…  बाहेर पडताना साडी चॉईस करणं बाईसाठी मोठंच  चॅलेंज असतं.  प्रत्येक प्रसंगाची साडी वेगळी असते. त्यातही बऱ्याच साड्या, ब्लाऊज अभावी बाद झालेल्या असतात. साड्या चांगल्या असतात. पण ब्लाऊज पुन्हा शिवावं इतक्या पण नसतात. 

तुमच्याकडे भले शंभर साड्या असल्या तरी त्यातली प्रत्येक साडी तुम्ही कुठेही नेसू शकत नाही. म्हणजे भाजी बिजी आणायला साधीशी वॉश अँड वेअर साडी नेसावी लागते. इथे साधी म्हणजे कॉटन नाही बरं. कॉटनची साडी मुलांच्या शाळेत वगैरे जायचं असेल, लायब्ररीत वगैरे, एखादी कामकाजी मिटींग असेल तेव्हा. वाढदिवस, डोहाळेजेवन वगैरेला जाताना अगदी लाईट जरी बॉर्डर असलेली. लग्नाला जाताना प्युअर सिल्क, कांजिवरम, वगैरे साड्या नेसाव्या लागतात. दहाव्याला, तेराव्याला वेगळ्या लाईट कलरच्या, बारीकशी किनार असलेल्या. त्यात पण समारंभ किती जवळच्या संबंधात आहे, त्याप्रमाणे साडीचा भारीपणा..  हलकेपणा ठरतो. गेलेली व्यक्ती म्हातारी होती की तरूण ह्यावरून पण बायका जरीची /  बिनजरीची असे प्रकार ठरवतात. म्हणजे म्हातारी व्यक्ती गेली की जरा साधीशी पण जरीबॉर्डरची नेसली तरी चालते. तरूण व्यक्ती गेली असेल तर मात्र दु:ख जास्त दाखवावं लागतं. मग जरा जास्त साधी साडी. 

साडी ठरवताना जिच्याघरी लग्न आहे तिला तुम्ही किती किंमत देता त्यावर पण साडी बदलते.काही जणी चांगल्या श्रीमंत साडी सम्राज्ञी असतात… साडी खरेदी हे ह्यांचं आद्य कर्तव्य. म्हणजे ह्यांचं जन्माला येण्याचं प्रयोजनच साड्यांची खरेदी हेच असावं असं वाटावं इतक्या साड्या घेतात.  

साडी नेसताना स्मरण शक्तीचा पण खूप कस लागतो. म्हणजे ही साडी आपण कोणाच्या घरच्या कार्यक्रमाला नेसलो होतो. तिथे तेव्हा कोण कोण होतं. कोणी कोणी ही साडी पाहिली आहे. आता ज्या कार्यक्रमाला चाललोय तिथे त्या आधीच्या कार्यक्रमाच्या कोण कोण येतील. ही सगळी व्हिडीओ फिल्म मनातल्या मनात प्ले करावी लागते. मग त्याप्रमाणे साडी ठरते. 

बरं एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपण चांगल्यातली साडी नेसून जावं तर बाकीच्या अगदी साध्या साड्यांमधे आलेल्या असतात. मग ‘बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना’ अशी आपली गत होते. आणि ते  पाहून आपण दुस-या तशाच कार्यक्रमाला साधीशी साडी नेसावी तर बाकीच्या झकपक साड्या नेसून आलेल्या असतात. पुन्हा पचका!! हे गणित तर मला कधीच जमलेलं नाही. अगदी क्वचित एखाद्या वेळेस आपण चुकून परफेक्ट साडी नेसली की मला धन्य धन्य होऊन जातं. 

बरं साडी कितीही सुंदर असली तरी बायका एकमेकींच्या साडीला कधी मोकळेपणी ‘छान आहे साडी’ असं म्हणत नाहीत. त्या नुसत्या डोळ्याच्या कोप-यातून तुमच्या साडीकडे बघत असतात. आणि अगदीच असह्य झालं तर अशी दखल घेतात.

“माझ्याकडेपण होती अशातली, खूप पिदडली मी. मग मागच्या वर्षी बहिणीला देऊन टाकली.” अशा शब्दांमधून आपण ठरवायचं हे साडीचं कौतुक होतं की पोस्टमार्टेम. 

खूप छान साडी बघून एखादी म्हणते, “हिच्यापेक्षा परवाच्या डोहाळे जेवणातली तुुझी साडी चांगली होती”.पुन्हा आपण कोड्यात. म्हणजे ही साडी चांगली नाही असं हिला म्हणायचं आहे, *पण मग ती साडी चांगली होती तर तेव्हा का नाही बोलली तसं?*असा विचारही मनात येतो.

त्यामुळे साड्यांनी कपाट ओसंडून वहात असलं तरी ‘कोणती साडी नेसू’ ह्या प्रश्नाचं उत्तर काही ते कपाट देऊ शकत नाही. म्हणजे साडया ठेवायला जागा नाही आणि नेसायला साडी नाही अशातली गत. त्यात आता ड्रेसेसची पण भर. ड्रेसेसमधे पण गावात वापरायचे वेगळे, पुण्या-मुंबईत वापरायचे वेगळे, फॉरिन टूरचे वेगळे. ट्रीपचे वेगळे. म्हणजे साड्यांचा जेवढा स्टॉक तेवढाच ड्रेसेसचा…  किती ते डोकं लावायचं बाईने. 

पुरूषांना दोन ड्रेस दिले तरी ते त्याच्यावर दोन वर्ष आनंदाने काढून टाकतील.उलट काही ऑप्शनच न ठेवल्याबद्दल आभार मानतील. त्यामुळे त्यांना ह्या गहन प्रश्नाला तोंड द्यावं लागत नाही परिणामी अनेक महत्वाची कामं त्यांच्या हातून पार पडतात.   

पण *बायका* बिचा-या .. ..  कोणती भाजी करू?.. कोणती साडी नेसू?.. ह्या दोन प्रश्नांपायीच केवळ आयुष्यात मागे पडतात….

लेखिका : अज्ञात 

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवपूजा… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ देवपूजा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

आमचे एक शेजारी होते. मला आठवतं ते रोज सकाळी दहा वाजता पुजेला बसायचे.अगदी साग्रसंगीत पुजा चालायची त्यांची.दोन अडीच तास.नंतर मग नैवेद्य वगैरे.त्यांची ही पूजा इतक्या वर्षांनंतरही.. म्हणजे जवळपास चाळीस वर्षांनंतरही मला आठवते यांचं कारण म्हणजे टीव्ही.त्यांचं देवघर  एक मोठ्ठा कोनाडा होता.इतका मोठा कि त्या कोनाड्यात ते स्वतः सुद्धा बसत.तर त्या मोठ्ठ्या कोनाड्यात त्यांनी एक छोटासा टीव्ही बसवुन घेतला होता.अगदी छोटा.. ब्लॅक अँड व्हाईट.एकीकडे पूजा.. मंत्र.. अभिषेक आणि दुसरीकडे टीव्ही बघणं.आरतीच्या वेळी मात्र तो टीव्ही बंद होई.

त्यांना या बद्दल बरेच जणांनी टोकलं.. टीकाही केली.पण त्यांच्यावर काही परीणाम झाला नाही.त्यांचं म्हणणं मी मनापासुन पूजा करतो.. माझ्या मनातला भाव महत्त्वाचा.. आणि माझा देव तो भाव जाणतो.त्यांची देवाला एकच प्रार्थना असायची.

‘तु पारोसा राहु नकोस..मला पारोसा ठेवु नको.’

याचाच अर्थ रोज स्नान करून तुझी पुजा करण्या इतपत मला फिट ठेव. आणि खरंच.. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ते पुजा करत होते.स्नान करुन पूजा करण्याएवढी त्यांची शारीरिक क्षमता अखेरपर्यंत टिकून होती. देवानं त्यांची प्रार्थना ऐकली होती.

रोज पूजा करण्याचा नियम अनेकांचा असतोच.प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी.. कालावधी वेगळा.कोणाची पुजा पंधरा मिनिटांत होते..तर कुणाला दोन तासही लागतात.कुणाला पुजा करताना मदतीसाठी बायको लागते.तिनं मागे बसुन गंध उगाळून द्यायचं..फुलं हातात द्यायचे..तीन पर्ण असलेली बेलाची पानं नीट निवडून द्यायची .काही जण पूजा झाली की तिथुन लगेच उठुन जातात ‌मग बायकोने बाकीचा पसारा आवरायचा.

एकाची पुजेची पध्दत काही औरच होती.तो ताम्हणात देव काढायचा.. आणि सरळ वॉश बेसिनखाली धरायचा अगदी भांडे विसळल्या सारखं.मग ते देव कोरडे करून हळदी कुंकु लावायचा..शिंपडल्या सारखं.फुलं वाहिली की झाली पुजा.

अलीकडे काहीजण खुर्चीत बसूनही पुजा करतात. गुडघ्यांच्या प्रॉब्लेम मुळे मांडी घालून बसता येत नाही. मग खुर्चीत बसायचं..आणि पुढे टी पॉय  ठेवायचा..त्यावर ताम्हाण..

मंदिरांमध्ये पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. तिथे देवाच्या मुर्तीला रोज मंगलस्नान..म्हणजे पूर्ण अभिषेक घातला जात नाही. केली जाते फक्त पाद्यपुजा.फक्त एकादशी आणि सणांच्या दिवशी पुर्ण मूर्तीला अभिषेक केला जातो.

गुरुचरित्रात एका अध्यायात पुजे बद्दल विस्ताराने मार्गदर्शन केलं आहे.पुजेला बसण्यासाठी कोणतं आसन घ्यावं इथपासून त्यात सांगितलं आहे.पळी पंचपात्र कुठे ठेवावं.. निर्माल्य कसं काढावं..शंखपुजा,कलश पुजा, निरांजनाची पुजा करावी‌‌‌‌.. ही पूर्वतयारी झाल्यावर मग चारी दिशांचं पूजन करावं.पुरुष सूक्तामधील वेगवेगळ्या ऋचा म्हणत अभिषेक करावा.त्यातही कोणत्या क्रिया करताना ऋचा म्हणाव्या हेही सांगितलंय.

अभिषेक झाल्यानंतर फुलं कशी वहावी.. कोणत्या देवाला कोणती पुष्पें अर्पण करावी..कोणती वर्ज्य करावी हे सांगितलंय..काही फुलं ही दुसर्या दिवशी पण शिळी समजली जात नाही हे पण सांगितलंय.निरांजन ओवाळताना कोणता मंत्र म्हणावा ..सगळं सगळं विस्ताराने सांगितलंय.

इतकी शास्त्रशुद्ध पूजा आजच्या जमान्यात तशी कठीणच..पण जशी जमेल तशी पूजा आजही घरोघर होतेच.व्यंकटेश स्त्रोत्रात तर अगदी थोडक्यात पूजेचे सुंदर वर्णन केलंय.

करुनी पंचामृत स्नान.. शुद्धोदक वरी घालुन

तुज करु मंगलस्नान.. पुरुषसूक्ते करुनिया

वस्त्रे आणि यज्ञोपवीत.. तुज लागी  करु प्रित्यर्थ

गंधाक्षता पुष्पें बहुत.. तुजलागी समर्पूं

धूप दीप नैवेद्य.. फल तांबुल दक्षिणा शुद्ध

वस्त्रे भूषणे गोमेद.. पद्मरागादी करुनी

ऐसा षोडशोपचारे भगवंत.. यथाविधी पुजिला ह्रदयात

मग प्रार्थना आरंभिली बहुत.. वर प्रसाद मागावया.

पूजेचे असं वेगवेगळं वर्णन.. मार्गदर्शन बऱ्याच ग्रंथात आहे.अगदी तश्याच पध्दतीने पूजा झाली पाहिजे असं नाही.खरंतर कोणताच देव  पूजा करा म्हणत नाही.पूजा ही देवासाठी नसतेच मुळी.ती असते आपल्यासाठी.आपलं मन प्रसन्न करण्यासाठी.आपण या कारणाने देवापुढे तासभर बसतो.कधी अथर्वशीर्ष..कधी रुद्रातील मंत्र म्हणतो..देवाला स्नान घालतो.छान लाल सुती रुमालाने देवाचं अंग पुसतो.अष्टगंधाचा टिळा लावतो.. हळदीकुंकू लावतो..मग फुले वहातो..त्यानंतर धुपदिप.. नैवेद्य..आरती.

असं सगळं झाल्यावर मग देवघरातील देवाचं ते रुप..नजर हटत नाही त्यावरुन.कानात अजुनही ‘घालीन लोटांगण..’ मधील शब्द निनादत असतात..

अष्टगंध..अत्तर..उदबत्ती..रंगीबेरंगी सुवासिक फुले या सर्वांचा संमिश्र दरवळ.. देवाच्या कपाळावरचं ते ओलसर ताजं  गंध.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे‌‌ देवाच्या चेहर्यावरंच मंद स्मित..ते प्रसन्न सुहास्य.जणु देव सांगत असतो..आता नि:शंक मनाने कामाला जा..मी आहे तुझ्यासोबत..

आणि साक्षात देव आपल्या सोबत असणं.. यापेक्षा अधिक आपल्याला काय हवंय? मानसिक बळ म्हणजे हेच तर असतं….. पूजा करायची ती यासाठी.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तपत्या झळा उन्हाच्या… ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? मनमंजुषेतून ?

☆ तपत्या झळा उन्हाच्या… ☆ श्री प्रसाद जोग

सध्या  सकाळ उजाडली की कालचा दिवस बरा होता म्हणायची वेळ आलीय.दिवसेंदिवस  उन्हाळ्याचा रखरखाट वाढायला लागला. त्यामुळे तापमान नाही तर तापमान अंगाची काहिली करायला लागलंय.

उन्हाळ्याचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.काही भागामध्ये तपमान ४४/४५  डिग्री पर्यंत वाढले आहे. तशातच लोकसभेच्या निवडणुकांचे प्रचार जोरावर आहेत.  

अश्या रखरखाटामध्ये कवींना  वेगवेगळी गाणी सुचली हे विशेष.

कवी अनिल यांना केळीचे सुकले बाग आणि वेळ झाली भर माध्यान्ह ही गाणी सुचली असावीत.सुधीर मोघ्यांना तपत्या झळा उन्हाच्या हे  लिहावे वाटले असेल.

आज ही  गाणी ऐकली की तपमानात एखाद्या डिग्रीची वाढच  झाल्यासारखे वाटेल.

सगळं असह्य व्हायला लागल्यावर अचानक एक दिवशी आकाशात काळे ढग गर्दी करतील, सोसाट्याचा वारा सुटेल,विजांचा कडकडाट होऊन वळिवाच्या कोसळधारा तप्त झालेल्या जमिनीला गारे गार करतील. मातीचा सुगंध दरवळेल.हे अनुभवत असताना शान्ता शेळके यांना आला पाऊस मातीच्या वासात ग गाण्याचे शब्द सुचले असतील..

मग एन्जॉय करा उन्हाळा सुद्धा

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वेताळ विक्रम…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “वेताळ विक्रम…” ☆ श्री मंगेश मधुकर

गावाबाहेरच्या टेकडीवर भेटल्यावर विक्रम वेताळाकडं पाहून नेहमीसारखा हसला नाही.असं पहिल्यांदाच घडल्यानं वेताळाला आश्चर्य वाटलं.“काय झालं.असे अस्वस्थ का दिसताय.”

“तुझ्यामुळेच”विक्रम ताडकन म्हणाला.

“मी काय केलं”

“गेले काही दिवस एकदम विचित्र वागतोयेस.अंगावर ओरडणारा,बारीकसारीक गोष्टींवर संतापणारा अचानक गोड,नीट बोलायला,चांगला वागायला लागलास.बरायेस ना.”

“अहो,हा तुमच्या पाहण्यातला फरक आहे.मी तोच आहे.फक्त परिस्थिती वेगळी आहे”

“कुणी अचानक चांगलं वागायला लागलं की शंका येते.नेतेमंडळी कशी निवडणूक आली की एकदम बदलतात त्याची सवय आहे पण तुझं काय?”

“मी पण यंदा निवडणुक लढविण्याचा विचार करतोय म्हणून तर…”

“काय?कशासाठी?”विक्रम आश्चर्यानं ओरडला.

“जनतेच्या सेवेकरता.तुमचं शिफारस पत्र मिळालं तर फायदा होईल.एवढी मदत करा.”

“पण गरज काय?ही नस्ती उठाठेव कशाला?”

“पद,सत्ता आल्यावर समाजासाठी जे काम करायचं ते अधिक चांगल्याप्रकारे करता येईल त्यात तुमचा पाठिंबा मिळाला तर सहज निवडून येईल.” 

“पाठिंब्याविषयी विचार करावा लागेल.”विक्रम 

“त्यात विचार काय करायचा.माझ्याविषयी चार कौतुकाचे शब्द लिहिणं अवघड नाही.”

“तुला चांगलाच ओळखतो म्हणून तर…..नेहमी तू विचारतो आता माझ्या 

प्रश्नांची उत्तरं दे.”

“जशी आज्ञा”वेताळ 

“चल,गाडी काढ”विक्रमच्या बोलण्यावर वेताळानं डोळे विस्फारले.इच्छा नसताना बाईक घेऊन निघाला.पाठीमागे विक्रम होताच.गावात रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टँकरभोवती तोबा गर्दी होती.दोघं ट्राफिक जाममध्ये अडकले.तापलेलं ऊन त्यात रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी खोदलेलं.जिकडं तिकडं माणसांची,गाड्यांची गर्दी, खड्डे,रस्त्यावरची दुकानं यातून वाट काढताना वेताळाच्या नाकी नऊ आले.सिग्नलची पर्वा न करता जीव धोक्यात घालून गाड्या चालवणाऱ्यांपासून एकदोनदा तर वेताळानं कशीबशी धडक चुकवली. असल्या प्रकारांची सवय नसल्यानं प्रचंड वैतागला. 

“वेताळा,पाहिलेस किती वाईट परिस्थिती आहे.इथं येऊन थोडाच वेळ झाला तरीही नको नको झालंय अन सामान्य माणसं हा त्रास वर्षानुवर्षे निमूटपणे सहन करतात.यावर तुझ्याकडं काही उपाय आहे का?”वेताळानं नकारार्थी मान डोलावली. 

“लोकांच्या महत्वाच्या गरजा, समस्यांवर मार्ग काढण्याऐवजी मोफत आरोग्य शिबिरे,यात्रा,भेट असले दिखाऊ प्रकार सुरू आहेत. त्याचीच फ्लेक्स लावून जाहिरातबाजी करतायेत.”

“माझी तळमळ खरी आहे.इतरांपेक्षा वेगळाय.” वेताळ.

“सगळे असंच म्हणतात.तुझ्यातलं वेगळपण काय.” 

“निवडणूक म्हणजे लोकशाहीची सेवा करण्याची संधी,समाजाचे देणं फेडण्यासाठी गरजू,गरीबांची सेवा करायची आहे.आतापर्यंत स्वार्थासाठीच जगलो,बोललो,वागलो पण आता जे काही करेल ते जनतेच्या कल्याणासाठीच……”.

“अरे वा,ऐकायला भारी वाटतं.हे भाषणात बोलायला चांगलयं.आता जे खरं खरं सांग.”बराच वेळ वेताळ काहीच बोलला नाही.विक्रम बाईकवरून उतरून चालायला लागला तेव्हा वेताळ म्हणाला 

“तुम्हांला सगळं माहिती आहेच तरी कशाला?”

“चांगलंच माहितीये.मला सांग,एवढं करून काय मिळणार”

“जिंकलो तर पद मिळेल.प्रतिष्ठा वाढेल,मान मिळेल,कायम मागेपुढे असणारे लोक,इतरांना वाटणारा धाक,शब्दच काय थुंकीसुद्धा झेलायला तयार असणारे चमचे याची नशा,धुंदी,कैफ काही औरच.. त्यासाठीच हा आटापिटा.”वेताळ एकदम बोलायचं थांबला.

“खरं बोललास त्याबद्दल अभिनंदन,”विक्रम. 

“धन्यवाद,म्हणजे शिफारस पत्राचं नक्की”

“देणार नाही.तुझे विचार लोकांच्या भल्यासाठी नाहीत.” 

“लोकशाहीत असंच चालतं.प्रेमात,युद्धात आणि निवडणुकीत सर्वकाही माफ असतं.”वेताळ ओशाळवाणं हसत म्हणाला. 

“चूकतोयेस.एका दिवसासाठी राजा असणाऱ्या जनतेला गृहीत धरू नकोस.काळ बदलतोय.भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करून मतदान करणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे.निवडून आल्यानंतर राहणीमानातली श्रीमंती,वागण्या-बोलण्यातला बदल जनता विसरत नाही.मतदानातून सर्व गोष्टींचा हिशोब चुकता करते.आश्वासनांचा पाऊस  धो धो कोसळला तरी आपण किती भिजायचं हे ज्यानं त्यानं ठरवायचं .  पब्लिक सब जानती है.”

“तुमचं बरोबरयं पण अनेक सोकॉल्ड सुजाण,सुशिक्षित मंडळी राजकारणाविषयी फक्त बोलतात,टीका करतात पण मतदान मात्र करत नाही याउलट गरीब,गरजू प्रलोभनाला भुलून का होईना पण आवर्जून मतदान करतात.हीच गोष्ट फार फार महत्वाची आहे.” वेताळ 

“भूलथापांना,पैशाच्या लोभाला बळी पडून मतदान करणारे आणि जाणीवपूर्वक मतदान करणारे एकाच माळेचे मणी..प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे . असा कायदाच पाहिजे आणि मित्रा,एक सांगू.. ”

“बोला”

“तुझी खरोखर समाजासाठी काम करायची इच्छा असेल तर लोकांच्या अडचणी समजून घ्यायला आतापासून सुरवात कर.त्यांच्यामध्ये जाऊन काम कर.अडचणी सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न कर.यात सातत्य ठेव.मगच निवडणुकीचा विचार कर.असं वागलास तर पुढच्या वेळी फक्त शिफारस नाही तर मी स्वतः तुझा प्रचार करेल.”

‘विचार करून सांगतो” म्हणत वेताळानं गाडी फिरवली.परतीच्या प्रवासात वेताळचा चेहरा पडलेला तर मागे बसलेला विक्रम मात्र गालातल्या गालात हसत होता. 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ १, चैत्र – – –  लेखिका : सुश्री दीपा झानपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

, चैत्र – – –  लेखिका : सुश्री दीपा झानपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

कित्येक लक्ष योजनं दाटून आलेला गच्च अंध:कार, जिकडे पाहावं तिकडे निर्वात पोकळी आणि त्यात स्वतःच्या गतीनं परिवलन आणि परिभ्रमण करणारे कोट्यवधी ग्रह, तारे, धूमकेतू, उपग्रह…. प्रत्येकाची गती वेगळी, प्रत्येकाचा मार्ग वेगळा… अफाट विश्वाच्या या निबिड साम्राज्यात साक्षीभावानं बसलेला तो निराकार कालपुरुष… +

असंख्य ग्रहताऱ्यांची गती, स्थिती, उत्पत्ती,लय यांचा हिशोब करता करता किती काळ लोटून गेला, याची गणना करणं अवघडच… या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात फिरत असलेल्या प्रत्येक वस्तुमात्राच्या कालगणनेचा हिशोब ठेवण्याचं काम या कालपुरुषाचं. 

निराकार, निर्गुण, निर्विकार, निर्विकल्प अवस्थेत हे काम युगानुयुगं करणाऱ्या त्या कालपुरुषाच्या समोर अचानक एक नीलमणी चमकून गेला… 

किंचित् उत्सुकतेनं त्यानं नजर उचलून चित्त एकाग्र केलं. 

“विश्वकर्म्याची नवीन निर्मिती दिसते आहे!” 

त्याचं कुतूहल किंचित् चाळवलं. तो निळसर हिरवट गोलाकार ग्रह आपल्याच गतीनं डौलदारपणे तिरक्या चालीनं स्वतःभोवती आणि त्याच्या कर्त्याभोवती आपल्याच तंद्रीत गिरक्या घेत होता. एरवी निर्विकार असलेला कालपुरुष या लोभस दर्शनानं किंचित् सुखावला. कितीही साक्षीभावानं काम करायचं म्हटलं, तरी काही गोष्टी मनाला कुठेतरी स्पर्शून जायच्याच!

आपोआप त्याच्या तोंडी शब्द आले, “वसुंधरा… मी वसुंधरा म्हणेन हिला..”

आणि ब्रह्मांडात तो शब्द रेंगाळला… “वसुंधरा”!

विश्वकर्म्याच्या या नव्या निर्मितीला नाव मिळालं, ओळख मिळाली… “वसुंधरा”!

तिच्या या जन्मदिवसाची कालपुरुषानं  नोंद करून ठेवली: ‘, चैत्र !

आपल्या गतीनं भ्रमण करत करत कालपुरुषाच्या नजरेसमोरून वसुंधरा पुढे निघून गेली. 

अनंतकोटि ब्रम्हांडामधल्या असंख्य ग्रहताऱ्यांचा हिशोब ठेवता-ठेवता, या नीलहरित वसुंधरेची आठवण त्याला अधूनमधून किंचित गारवा देत असे. 

या गतिमान विश्वाच्या आवर्तात पुन्हा कधी येईल बरं ती माझ्या डोळ्यांसमोर? 

तिच्या भ्रमणाची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा तोच नीलमणी लख्खकन् चमकला… तिच्या  सूर्यसख्याच्या तेजामुळे तिचा मूळचा निळसर हिरवा रंग अधिकच झळाळून उठत होता. कालपुरुषाचं कुतूहल चाळवलं.

त्यानं नजर आणि अंत:चक्षु अधिक एकाग्र करून वसुंधरेच्या सान्निध्यात काय चालू आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

असंख्य प्राणिमात्र, वनस्पती, मनुष्यमात्र यांना अंगा-खांद्यावर खेळवणारी ही वसुंधरा बघून, त्या विश्वकर्म्याच्या कर्तृत्वाचं कालपुरुषाला फारच कौतुक वाटलं. शिवाय या प्रत्येक जीवमात्राचं आयुष्य,नशीब, भविष्य यांचीही ठराविक योजना त्या जगन्नियंत्याने आधीच करून ठेवली होती. 

अधिकाधिक एकाग्रतेनं तिथल्या घडामोडींकडे बघत असताना अचानक त्याचे डोळे दिपले.

वसुंधरेवर ‘सत्ययुग’ चालू होतं. कुणी ‘श्रीराम’नामक राजा महायुद्धात विजय मिळवून स्वगृही येत असताना त्याला दिसला. त्याचे प्रजाजन त्याचा जयजयकार करीत होते.. घडून गेलेल्या अशुभाची आणि अतर्क्य घटनांची उजळणी करत होते. परंतु दुष्टावर सुष्ट प्रवृत्तींनी मिळवलेला विजय, म्हणून सगळीकडे विजयपताका, ब्रह्मध्वजा लावून रामराजाचं स्वागत करत होते. 

कालपुरुषानं पुन्हा एकदा नोंद केली: १, चैत्र ! 

बघता बघता आपल्या परिभ्रमणाच्या गतीनं वसुंधरा कालपुरुषाच्या डोळ्यांसमोरून पुन्हा एकदा विश्वाच्या अफाट पसारात निघून गेली. 

आणखी काही युगं लोटली… कालगणनेतल्या ठराविक वेळी कालपुरुष या वसुंधरेच्या आगमनाची वाट पाहत असे : १, चैत्र…

तीही त्या ठराविक काळात दर्शन देऊन पुढे जात असे. दरवेळी आपल्या अंत:चक्षूंनी तिचं अंतरंग जाणून घेण्याचा कालपुरुषाला छंदच जडला होता. 

या छंदापोटी मग महाभारतकालीन युद्ध, जय-पराजय, आणखीही अनेक साम्राज्यांचे उदयास्त आणि प्रत्येक वेळी विजयाच्या वेळी उभारलेले ब्रह्मध्वज यांचा तो साक्षीदार होत गेला. 

प्रत्येक वेळी ती समोर आली, की काहीतरी नवीन घडामोडी त्याला बघायला मिळत. 

वसुंधरेची सर्व अपत्यं तिचा जन्मदिवस अतिशय जल्लोषात साजरा करीत‌ असत. सूर्यसख्याची किरणं, वनस्पतींची कोवळी पालवी आणि वृक्षांनी भरभरून दिलेलं फळांफुलांचं दान, यांमुळे मनुष्यांच्या चित्तवृत्ती अधिकच उल्हसित होत असत. 

युगांमागून युगं गेली. वसुंधरेवरचे प्राणिमात्र बदलले, वनस्पती संक्रमित झाल्या. त्यांच्या अधिकाधिक प्रगत पिढ्या निर्माण झाल्या. विश्वाच्या पसा-यात एका कोपऱ्यात बसलेल्या कालपुरुषाचं सर्व घडामोडींवर ठराविक काळानं लक्ष जात असे. 

अलिकडे मात्र तो जरा चक्रावून जाऊ लागला होता. त्याच्या डोळ्यांसमोर वसुंधरेचं नवीन रूप आल्यानंतर, जुन्या खुणा त्याला कुठेच दिसेनाशा झाल्या होत्या. .. त्याला न समजणाऱ्या अनेक गोष्टी तिथे घडत होत्या. 

वसुंधरेचा जन्मदिवस हा ठिकठिकाणी व्यापाऱ्यांचे मेळे, प्रचंड धनाची उलाढाल, खरेदी-विक्रीचे अफाट आणि अचाट व्यवहार यांच्या योगानंच साजरा करण्याची प्रथा आजकाल पडली होती. आकाशी उंच लहरणाऱ्या ब्रम्हध्वजांना खुजं स्वरूप देऊन त्यांचं आधुनिकीकरण करण्यात आलं होतं. वृक्ष-वेली, लता-पल्लव यांच्या सहवासात साजरा करण्याचा हा जन्मदिवस! पण मूळ गाभा भलतीकडेच जाऊन कडुलिंबाची पानं आणि आंब्याचे डहाळेदेखील विकत घेऊन तोंडदेखलं ‘शास्त्र’ करण्याची मनुष्यमात्रांची प्रवृत्ती झाली होती. ‘दुष्टांवर सुष्ट प्रवृत्तीनं मिळवलेला विजय’ ही कल्पना पारच मोडीत निघाली होती. त्याऐवजी भरभरून खरेदी करा, मुहूर्तावर गाड्या घ्या, कोट्यवधींची घरं विकत घ्या, अशांसारख्या धनदा़ंडग्या उन्मादानं धुमाकूळ घातला होता…

कर्कश गोंगाटात निघणाऱ्या शोभायात्रा, आणि धर्मांधर्मांमधला कट्टरतावाद जोपासण्यासाठी सुरू झालेली चढाओढ ह्याच जन्मदिनाच्या साक्षीनं सुरू होत होती.

‘अधिक, अजून अधिक, अजून अधिक’, या हव्यासापोटी मनुष्यांनी निर्माण केलेल्या कचऱ्याच्या महाप्रचंड दबावाखाली वसुंधरा दिवसेंदिवस दबून चालली होती. 

कालपुरुषाला उमज पडेनासा झाला. ‘विश्वकर्म्यानं मेहनत घेऊन घडवलेली कलाकृती’ असलेली वसुंधरा आज कुठे नेऊन ठेवली होती तिच्याच लेकरा-बाळांनी? 

कालाय तस्मै नमः!

विचार करता करता पुन्हा ती त्याच्या नजरेसमोरून दिसेनाशी झाली- तिच्या पुढच्या भ्रमणकक्षेत. 

केवळ साक्षीभावाचा धनी असलेला कालपुरुष मात्र उद्विग्न मनानं तिच्याकरिता मनोमन प्रार्थना करत राहिला…

हे वसुंधरे, भविष्यकाळात तुझ्या अंगा-खांद्यावर तीच ती प्राचीन पिंपळाची कोवळीलूस पालवी दिसू दे…त्या पिंपळपानावर विसावलेल्या, पायाचा अंगठा चोखत पडलेल्या गोजिरवाण्या बालकापासून एक नवं हिरवंगार आणि निरागस विश्व पुन्हा निर्माण होऊ दे… 

आणि हे वसुंधरे, त्या जुन्या नवतरुण नीलहरित स्वरूपातल्या तुला शुभेच्छा देण्याची संधी मला पुन्हा पुन्हा येऊ दे.   प्राचीन काळापासून, तुझ्या कक्षेत भ्रमण करत असताना ज्या वेळेस तू माझ्यासमोर येत गेलीस, त्या तुझ्या जन्मदिवसाची नोंद  मी कायमस्वरूपी करून ठेवली आहे: १, चैत्र !!

.. .. .. शुभास्ते पंथान: सन्तु !!

लेखिका : सुश्री दीपा झानपुरे

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अखेरची आस…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ “अखेरची आस” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे. वय उताराकडे चाललेले आहे. अशावेळी आपलं पुढच आयुष्य कसं जगायचं?…

याचा विचार करता करता आपल्या मृत्यूनंतर चा विचारही मनात यायला लागलेला आहे. मृत्यू अटळ आहे… आजारी पडलो तर.. बोलणेच बंद झाले तर…

मग ठरवलं..

यावर आपल्या मनात जे विचार आहेत ते लिहून ठेवायचे. म्हणजे मुलांना सोपं होईल.

व्हेंटिलेटर वर ठेवायची वेळ आली तर तो किती दिवस ठेवायचा?

कारण व्हेंटिलेटर” काढा “असं कोणी कसं म्हणायचं…. हा मोठा प्रश्न असतो…

एकदम आठवण आली भाचे सुनेच्या वडिलांची. वय वर्ष 85…

दवाखान्यात ठेवल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर लावायची वेळ आली. ते बोलू शकत होते. त्यांनी दोन दिवसांनी व्हेंटिलेटर काढायला स्वतःच सांगितले. त्यानंतर ते अनेक जणांशी बोलले त्यांना लोक भेटायला आले.

चार दिवसांनी शांतपणे त्यांची जीवन यात्रा संपली.

हे खरं तर अवघड आहे पण करायचं म्हटलं तर शक्य पण आहे.

देहदान… नेत्रदान करायचं मनात आहे अस आपण म्हणतो. पण त्यासाठी आधी तयारी करावी लागते.

नलू ताई म्हणजे माझी नणंद. यांनी देहदानाचा फॉर्म भरला होता. त्यांचा मृत्यू मध्यरात्री झाला. पुढे काय करायचे ?हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हते. फारच गोंधळ सुरू झाला.

बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी हा दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांनी सर्व मदत केली म्हणून नलू ताईंची अंतिम देहदानआणि नेत्रदानाची इच्छा पूर्ण करता आली.

काही लोक यासाठी काम करत आहेत. त्यांचे फोन नंबर आपण घेऊन ठेवले पाहिजेत.

पुण्यात श्रीयुत खाडीलकर हे यासाठी काम करत आहेत. कोणाला त्यांचा फोन नंबर हवा असेल तर मी जरूर देईन.

माझी मैत्रीण हेमा. तिच्या वडिलांनी तीस वर्षांपूर्वी सांगितले होते की मी गेल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून तुमच्या उद्योगाला लागा. असेही आदर्श आपल्यासमोर आहेत.

घरात कोणाचा मृत्यू झाला की मन भावुक, हळवे आणि कातर झालेले असते.

त्यात लोक काय म्हणतील ही ही भीती असते. त्यामुळे काही लोक कर्ज काढून दहावा बारावा करतात. मोठ्या जेवणावळी घालतात.

प्रसादाला आलेले लोक टॉवेल, टोपी, शर्टपीस असा आहेर घेऊन येतात.

पाठीवर टॉवेल घालण्यापेक्षा मी तुझ्या पाठीशी आहे. काही लागलं तर मला सांग.. मी मदत करीन अस पाठीवर हात ठेवून म्हटलं आणि तसं वागलं तर ते योग्य ठरेल.

एखाद्या सवाष्ण स्त्रीचे निधन झालं तर लोक पाच जणींना साडी, चोळी सौभाग्य अलंकार देतात. भरमसाठ खर्च करतात. ऐपत नसेल तर कर्ज काढतात. आधीच घरातली स्त्री गेली असेल तर घराची घडी विस्कटलेली असते. त्यात हा अमाप खर्च…

घरातले दुःखी कष्टी असतात. त्यावेळेस एखादी बाई किंवा पुरुष ही सूत्र हातात घेतात. हे केल पाहिजे, ते आणलं पाहिजे… अस म्हणतात. त्यावेळेस त्यांना विरोध करता येत नाही.

हे कितपत योग्य आहे ?

याचाही विचार करा. काहीजणांना मनात नसतानाही हा खर्च करावा लागतो.

शिवाय आपण हे केल नाही तर काय होईल ही भीती असतेच….

मृत्यूनंतर भाषण देण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असताना बोलून घ्या. भेटून घ्या. तिचं कौतुक करा.

काळानुरूप आपण आपले विचार, रूढी, परंपरा यात बदल करायला हवा आहे. आणि तो आपणच करायचा आहे.

अर्थातच हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याला जे वाटेल ते त्यांनी करावे.

आता शांतपणे लिहायला बसले की असे काही काही विषय सुचतात. खरंतर अशा विषयांवर कोणी स्पष्टपणे बोलत नाही.

पण ठरवलं…

लेखणीतून तुमच्याशी बोलावं.

त्यातून तुम्ही काही सांगता.. सूचना करता…. मलाच नाही तर इतरांनाही त्याची मदत होते. माहिती समजते.

वाचता वाचता आज फार गंभीर झालात का ?

असू दे एखादा दिवस असा…

पण खरंच…

अंध माणसांकडे एकदा बघा..

तुम्ही नेत्रदान केले तर दोन जणांना दृष्टी येणार आहे याचाही विचार करा.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print