☆ भगवंत सगळे बघत असतो… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
महेशचं घर एका देवळासमोर होतं. पहाटेच लोक मंदिरात यायला लागायचे. एक दिवस महेश उठून पाहतो तर काय, रस्त्यावर असलेल्या त्याच्या गाडीला मागून कोणीतरी धडक दिलेली होती.
चडफडत महेश गाडीजवळ गेला, किती नुकसान झालंय ते बघायला. तर काचेवर एक चिठ्ठी अडकवलेली होती. त्या चिठ्ठीवर एक नाव आणि फोन नंबर लिहिलेला होता, आणि फोन करण्यास सांगितले होते.
त्याने त्या नंबरवर फोन लावला.
पलीकडचा माणूस म्हणाला, ‘‘ मी वाटच पाहत होतो तुमच्या फोनची. तुमच्या गाडीला धडक देणारा मीच.
मी काकड आरती करून बाहेर आलो. चुकीचा गियर पडल्यामुळे गाडी मागे जायच्याऐवजी पुढे गेली आणि तुमच्या गाडीवर आदळली. पहाटे तुम्हाला त्रास द्यायला नको म्हणून चिठ्ठी ठेवली. मी तुमचं सगळं नुकसान भरून देतो.’’
त्याने सगळं नुकसान भरूनही दिलं, आणि तो माफीही मागत होता.
महेशला काही राहवेना. त्याने विचारलं, ‘‘ तुम्हाला धडक देताना कोणीही पाहिलं नव्हतं. आपणहून कबूल कसं काय केलंत? हे सगळं टाळू शकला असतात.”
यावर तो माणूस म्हणाला…
“कोणी बघत नव्हतं कसं? भगवंत सगळं बघत असतो आणि रोज पहाटे दर्शन घेऊन माझ्या अंगात एवढाही प्रामाणिकपणा नसेल तर— तर माझ्यासारख्या माणसाला मंदिरात जाण्याचा काय अधिकार? “
संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
स्वप्न म्हंटलं किं ‘मुंगेरीलालके हसीन सपने’ आठवणं सहाजिकच आहे.पण ‘स्वप्न’ म्हणजे फक्त तेवढंच नव्हे.मुंगेरीलालसारखे दिवास्वप्ने पहाणारे जसे आहेत तसेच आयुष्यातलं नेमकं उद्दीष्ट ठरवून त्यादिशेने प्रदीर्घकाळ अथक, प्रयत्न न् कष्ट करीत ध्येय प्राप्तीनंतरचा स्वप्नपूर्तीचा कधीच न विरणारा आनंद मिळवणारे आणि जपणारेही आहेतच. दिवास्वप्नं पहात स्वप्नरंजनात मश्गूल रहाणाऱ्यांबाबतची किंव आणि स्वप्नपूर्तीसाठी जीवाचं रान करणाऱ्यांबद्दलचा कौतुकमिश्रित आदर यांना निमित्त होणाऱ्या स्वप्नांच्या या दोन रुपांमधे गूढ असं कांहीच नाहीय.पण प्रत्येकालाच सुप्तावस्थेत दिसणाऱ्या स्वप्नांमधे मात्र कधीच थांग न लागणारं गूढ ठासून भरलेलं आहं.ती स्वप्ने हेच एक गूढ विश्व आहे. जाणवतं, दिसतं.. पण ते जसंच्या तसं इतरांना त्याचवेळी दाखवता मात्र येत नाही. ते खास ज्याचं त्याचंच असतं. त्या क्षणांपुरतं त्याच्यासाठी अगदी खरं..तरीही तो एक भासच.भास-आभासाचा चकवा देत रहाणारा एक खेळ!
‘स्वप्न’ मला एखाद्या भरकटत गेलेल्या नाटक किंवा सिनेमासारखं वाटतं.बघताना त्यात गुंतत जात असलो तरी त्यातून बाहेर पडल्यावर न पटणारं, असंबद्ध, अविश्वसनीय सगळं कृत्रिम,तद्दन काल्पनिक, कशाचा कशाला मेळ नसणारं असं काहीसं वाटत रहाणारं..!
खरंतर स्वप्न एखाद्या नाटक किंवा सिनेमातल्या प्रसंगांच्या विखुरलेल्या तुकड्यांसारखंच तर असतं.आपल्या मन:पटलाच्या रंगभूमीवर दिसणारं नाटक किंवा मन:पटलाच्या पडद्यावर दिसणाऱ्या सिनेमासारखं..!स्वप्न आपण समोर बसून नाटक-सिनेमासारखं पहातही असतो आणि अकल्पितपणे त्याचाच एक भाग बनून स्वतः त्यात भूमिकाही करत असतो. तरीही आपला स्वतःचाच मन:पटलावरचा आपलाच वावर समोर बसून पहावा तसं पाहूही शकत असतो.सगळंच गूढ.. अतर्क्य..!
हे स्वप्न पडणं जसं तसंच त्यांचं विरणंही तितकंच गूढ!त्याचा थांगच लागू नये असं.मला स्वतःला आजपर्यंत पडलेल्या असंख्य स्वप्नांपैकी अगदी मोजकीच स्वप्ने आज आठवतात हे जसे , तसेच इतर न आठवणाऱ्या स्वप्नांचे विरुन जाणेही मला अनाकलनीय वाटतं आलंय हेही खरेच.स्वप्न पहात असताना त्यातले सगळेच घटना-प्रसंग एखाद्या वास्तव क्षणांसारखे अनुभवत असताना त्या क्षणी मनाला झालेल्या त्या स्वप्न-घटनादृश्यांच्या स्पर्शांची जाणिव, त्या स्पर्शांमधला त्या त्या वेळचा दिलासा,आनंद किंवा दुःख, वेदना,थरारही लख्ख जाणवत राहिलेला पुढे बराच वेळ. पण दचकून जाग येताच कुणालातरी ते स्वप्न, तो अनुभव सांगावं असं उत्कटतेने वाटत असतानाच जादूची कांडी फिरावी तसं सगळंच विरून गेलेलं..! हे विरुन जातंच कसं आणि कुठे हे प्रश्नही स्वप्ने कां आणि कशी पडतात या प्रश्नांसारखीच अनुत्तरीत, अनाकलनीयच! या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम मानसशास्त्रीय संशोधनाद्वारे अखंडपणे सुरु आहेही.पण ‘आपल्या मनातल्या सुप्त इच्छा,भावनांचा कल्लोळ, दडपणं,नैराश्य,अस्वस्थ करणारे त्रासदायक विचार..असं सगळ्याचं आपल्या सुप्तावस्थेत चित्रभाषेत प्रकट होणं म्हणजे स्वप्न’ यासारखे आजवरच्या संशोधनाचे निष्कर्ष मला तरी अनेक शक्यतांपैकी फक्त एक शक्यता आहे असेच वाटते. एखाद्या हिमनगाचे टोक दिसावे तसे न् तेवढेच.स्वप्नाच्या गूढ अर्थांच्या एका सूक्ष्म कणाएवढे!कारण स्वप्नांच्या इतर अतर्क्य, सूचक,प्रेरणादायी,दृष्टांतसदृश स्वप्न-प्रकारांचा थांग या निष्कर्षानंतरही अद्याप कुणालाच लागलेला नाहीय.अगदी तो अनुभव,त्यातली उत्कटता ज्याने स्वतः अनुभवलीय त्यालाही नाही.
या अतर्क्य अशा सूचक स्वप्नांचा मी स्वतःही अनुभव घेतलेला आहे.अतिशय उत्कट आनंदानुभव दिलेले ते क्षण आणि त्यातील बारकाव्यांसकट ते मोजके स्वप्नानुभवही मी इतक्या वर्षांनंतरही विसरु शकत नाहीय..!आणि तरीही त्यामागील गूढ मात्र अथक प्रयत्नांनंतरही मला उकललेलं नाहीय.निदान ते उकलेपर्यंततरी ‘स्वप्न’ म्हणजे अतिशय गूढ असं बरंच कांही.. असंच म्हणावं लागेल.
☆ मानवी सवय…(एक खरी गोष्ट)☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
एक महिला आहे जयपूरमध्ये, ती PG ( पेइंग गेस्ट ) ठेवते. त्यांचे वडिलोपार्जित घर आहे, ज्यामध्ये मोठ्या १०-१२ खोल्या आहेत. 3 बेड प्रत्येक खोलीत ठेवल्या आहेत. त्यांच्या पीजीमध्ये जेवणही उपलब्ध आहे.
त्या मनापासून स्वयंपाक करतात. खाणाऱ्यांनाही ते आवडते. इतके उत्तम की सर्वोत्तम शेफला बनवता येणार नाही. नोकरदार लोक आणि विद्यार्थी त्यांच्या PG मध्ये राहात.
प्रत्येकजण सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण घेई, ज्यांना गरज आहे त्यांना दुपारचे जेवण पॅक करून मिळे.
पण त्यांचा एक विचित्र नियम आहे, प्रत्येक महिन्यात फक्त 28 दिवस अन्न शिजवले जाई, उर्वरित 2 किंवा 3 दिवस स्वयंपाकघर बंद. ते दिवस हॉटेलात खा अथवा काहीही करा, पण बाहेर.
मी विचारले, “ हे का ? किती विचित्र नियम आहे हा. तुमचे स्वयंपाकघर फक्त २८ दिवसच का ?”
“ आमचा नियमच आहे. म्हणूनच आम्ही फक्त २८ दिवसांसाठीच जेवणाचे पैसे घेतो. “
मी म्हणालो, “ हा काय विचित्र नियम आहे ? आपणच बनवला आहे, मग नियम बदला.”
ती म्हणाली, “ नाही. नियम हा नियम असतो.”
एके दिवशी मी त्यांना पुन्हा चिडवले, २८ दिवसांच्या त्या विचित्र नियमावर.
त्यादिवशी ती बोलली आणि म्हणाली, “ तुला समजणार नाही भाऊ, सुरुवातीला हा नियम नव्हता. मी खूप प्रेमाने असा स्वयंपाक करून खायला घालत असे. पण त्यांच्या तक्रारी कधी संपतच नसत. कधी ही उणीव, कधी ती उणीव, नेहमी असमाधानी आणी नेहमी टीका…… त्यामुळे वैतागून हा नियम केला. २८ दिवस प्रेमाने खायला द्या आणि उरलेले 2-3 दिवस बाहेरचे खा. आता त्या ३ दिवसात नानी आठवते. मैदा आणि मसूर यांचे भाव कळतात. बाहेर किती महाग आणि तरीही निकृष्ट अन्न मिळते हे कळते. चहाचे दोन घोट १५ ते 20 रुपयांना मिळतात.—- माझे मूल्य त्यांना या ३ दिवसांतच कळते, त्यामुळे उरलेले २८ दिवस अतिशय नरम राहतात.”
खरंय — जास्त आरामाची व आयत्याची सवय माणसाला असमाधानी आणि आळशी बनवते.
अशीच परिस्थिती देशात राहणार्या काही जनतेची देखील आहे, ज्यांना देशाच्या प्रत्येक परिस्थितीत नेहमीच काही उणिवा दिसतात. अशा लोकांच्या मते देशात काहीही सकारात्मक घडले नाही, होत नाही आणि होणारही नाही.
अशा लोकांनी काही दिवस पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा श्रीलंकेत घालवावे, जेणेकरून त्यांची बुद्धी बरोबर ठिकाणावर येईल.
संग्राहक : विनय गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ इंजिन ऑइल बदला… श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
“ओ ताई, तुम्ही त्याला काही देऊ नका. ह्यांची सवयच आहे दिवसभर भीक मागत फिरण्याची.. वर्षानुवर्षे भीक मागत फिरतात, पण काम करत नाहीत, कष्ट करत नाहीत. काम करायचा आळस असतो. आयते पैसे मिळत असतील तर कोण कशाला कष्ट करेल?” तो दुकानदार माझ्या बायकोला सांगत होता. आणि तिच्या सोबत असलेला माझा साडेतीन वर्षांचा मुलगा मात्र “आपण त्या बाळाला बिस्कीट देऊया” असा आग्रह करत होता.
असे प्रसंग खरंच खूप कठीण असतात. कोणत्याही स्वार्थाशिवाय किंवा मतलबीपणाशिवाय आपली मुलं आपल्याकडं दुसऱ्याच कुणासाठी तरी काही मागतात तेव्हा फार कौतुक वाटतं आणि भरूनही येतं.
पूर्वानं त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि ती त्यांना म्हणाली, “दादा, तुम्हीच त्यांना काही काम का देत नाही?”
त्यावर तो लगेच म्हणाला, “असल्या भिकरड्याला कोण काम देणार हो?”
“हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. त्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे असं तुम्ही जोरात म्हणणार आणि त्यांना काम द्या म्हटलं की मागे फिरणार. या माणसांना कुणीच काम दिलं नाही तर ही माणसं भीक मागण्याशिवाय दुसरं करणार तरी काय?” ती म्हणाली.
“पण हे सरकारचं काम आहे. माझं नाही.”
“जर ते सरकारचं काम असेल तर मग तुम्ही या माणसांना वाटेल तसं बोलणं बंद केलं पाहिजे, कारण ते तरी तुमचं काम कुठं आहे? तुमच्या व्यवसायाव्यतिरिक्त तुम्ही इतर कुणालाही काहीही उलट सुलट बोलू शकत नाही. कुणाला काही बोलायचं असेल तर ते सरकार बोलेल.” ती शांतपणे आणि तितक्याच ठामपणे म्हणाली. समोरच्या दुकानदाराचे डोळे टोमॅटोसारखे लाल झाले.
“तुम्ही मला शिकवू नका. हे माझं दुकान आहे, मी कुणालाही काहीही बोलेन. तुम्ही ते सांगू नका.” तो रागाने म्हणाला.
“हा आपला देश आहे. या देशातल्या कुणाही माणसाला तुम्ही विनाकारण काहिही बोलू शकत नाही.” ती म्हणाली.
हा माझा पण देश आहे. मग काय मी भिकाऱ्याला काम देत बसू काय?” दुकानदार.
“हा तुमचा पण देश आहे ना? मग जसा मला सल्ला दिलात, तसा लोकांना सल्ला का देत नाही तुम्ही? ‘ मॅगी खाऊ नका, मैद्याचे पदार्थ खाऊ नका, चायनीज गोष्टी वापरू नका’ वगैरे वगैरे..?” ती.
“असं सांगत बसलो तर धंदा बुडेल माझा. लोक या गोष्टी घेतात म्हणून तर धंदा चालतो आमचा. हे खाऊ नका असं मी लोकांना कसं म्हणू?” दुकानदार.
“म्हणजे तुमच्या फायद्यासाठी लोकांच्या प्रकृतीला हानिकारक असलेल्या गोष्टी तुम्ही विकणार आणि नफा मिळवणार. बरोबर ना?” ती.
“मग तसे सगळेच वागतात. मी एकटाच नाहीये.” तो म्हणाला. एव्हाना काऊंटर वर आठ- दहा आणि रस्त्यावर आठ – दहा माणसं गोळा झाली होती.
“हे बघा दादा, त्या माणसाचा प्रश्न सुटावा यासाठी तुम्ही काय केलंत? तुम्ही काहीच केलं नाहीत आणि वर तो माणूस गुन्हेगार असल्यासारखं बोलताय.” ती.
“हो मग.. ही माणसं अशीच असतात. त्यांच्या बद्दल चांगलं बोलावं अशी त्यांची लायकी तरी आहे का?” दुकानदार.
“अहो, भिकारी म्हणजे चोर – दरोडेखोर नव्हे. त्याचं पोट भरण्यासाठी तो तुमच्याकडे पैसे मागतो. तुमची इस्टेट मागत नाही. तुम्ही दिलेल्या पैशातून तो सोनं-चांदी घेत नाही, मॉलमध्ये जात नाही, फॉरेन टूरला जात नाही. पण तुम्ही त्याची पार लायकीच काढलीत. हे चुकीचं आहे. माझी तुमच्या दुकानातली ही शेवटची खरेदी.” असं म्हणून ती बाहेर निघून आली. तिनं त्या बाहेरच्या माणसाला दोन फरसाणचे पुडे दिले आणि घरी आली.
घरी आल्यावर मुलानं मला “आईचं दुकानात भांडण झालं बघा” अशी बातमी लगेच सांगितली. त्याला आम्ही अजून भीक आणि भिकारी या दोन्ही संकल्पना शिकवलेल्या नाहीत. ज्या लोकांकडे काम नसतं, पैसे नसतात, राहायला घर नसतं, अशी माणसं रस्त्यावर वगैरे राहतात आणि भूक लागली की लोकांकडे पैसे मागतात किंवा खायला अन्न मागतात, एवढंच त्याला शिकवलं आहे. त्यामुळं, भिकारी हे प्रकरण “खूप भूक लागलेला आणि खिशात पैसे नसलेला माणूस” एवढंच त्याच्या लेखी आहे. म्हणूनच, तो बावरून गेला होता. एखाद्या माणसाला आईनं खायला दिलं तर त्यात भांडण करण्यासारखं काय आहे, हेच त्याला समजत नव्हतं. पुष्कळ समजावून सांगितल्यानंतर तो शांत झाला.
पण या निमित्तानं एक जाणीव मात्र आणखी घट्ट झाली की, काळ वाऱ्याच्या वेगानं बदलत असला आणि दिवसेंदिवस जग अधिकाधिक व्यावहारिक होत असलं तरीही लहान मुलांच्या मनांमध्ये माणसांविषयीचं प्रेम, आस्था, आपुलकी उपजत असते आणि ती जाणवते. आपण जितके रुक्ष, आणि व्यावहारिक कोरडेपणाने वागू त्याचंच अनुकरण मुलं करतात आणि आपसूकच तिही तशीच होतात.
यंदा दिवाळीच्या खरेदी दरम्यान असं जाणवलं की, लहान मुलांना सामाजिक भान फार उत्तम असतं आणि ते बऱ्यापैकी नैसर्गिक असतं. मुलं काही समोरच्या मुलाला पैसे द्या असं म्हणत नाहीत. आपण त्याला खाऊ देऊ, खेळणी देऊ असं म्हणतात. पैसा हा मुद्दा त्यांच्या लेखी नसतोच.
“स्वतःच फुगे विकणारे काका- काकू त्यांच्या मुलाला फुगा का देत नाहीत?” या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण असतं. डी मार्ट मध्ये पॉपकॉर्न काऊंटर वरच्या काकांना त्यानं प्रश्न विचारला होता की, “तुमच्या बाळाला तुम्ही पॉपकॉर्न नेता का?” त्यावेळी त्या समोरच्या माणसाचा निरुत्तर झालेला चेहरा मी वाचला आहे. अशावेळी अंगावर काटा येतो. पण माझ्या मुलानं आईला दोन पुडे घ्यायला लावले आणि एक त्या माणसाच्या हातात दिला, त्यांच्या बाळासाठी…! अनेकदा लहान मुलं अशी काही व्यक्त होतात की, ती लहान आहेत यावर विश्वासच बसत नाही.
रस्त्यावरून जाताना कुठं एखादा अपघात झालेला दिसला की, मोठी माणसं नुसतंच पाहून निघून जातात किंवा कित्येकजण तर बघतही नाहीत. पण लहान मुलं “आपण त्या काकांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया” म्हणून मागं लागतात. आणि आपण मात्र ‘कुठं ही नसती उठाठेव करा आणि ब्याद मागं लावून घ्या’ असं स्वतःशीच म्हणत पुढं निघून जातो.
मुलांना नुसतं “सॉरी, थँक यू किंवा एक्सक्यूज मी” एवढं म्हणायला शिकवणं म्हणजे सामाजिक शिष्टाचार शिकवणं नसतं. माणूस म्हणून जगावं कसं, हे त्यांना प्रत्यक्ष आचरणातून शिकवावं लागतं. मुलांची भावनिक बुद्धिमत्ता लहान वयात फार उत्तम असते. त्यामुळं, आपल्या आचरणातला फोलपणा, दुटप्पीपणा, ढोंगीपणा मुलं लगेच व्यवस्थित ओळखतात. आपले आईवडील आपल्याला शिकवताना वेगळं शिकवतात आणि स्वतः वागताना मात्र वेगळंच वागतात, हे मुलांना पटकन समजतं.
ज्या मुलाला रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पिल्लाला भूक लागली आहे हे समजतं, त्याला काहीतरी खाऊ घालावं असं त्याला वाटतं, त्या पिल्लाला आपण घरी घेऊन यावं असं वाटतं, त्या मुलाला ‘काहीच समजत नाही’ असं कसं म्हणावं? उलट त्यांनाच खरं तर जे समजायला हवं ते नेमकं समजत असतं.
कितीतरी गोष्टी मुलांना आवडत नाहीत. त्यांना सिगारेट ओढणारी माणसं आवडत नाहीत, रस्त्यांवर पचापच थुंकणारी माणसं किंवा घाणेरड्या शिव्या देणारी माणसं आवडत नाहीत. शू किंवा शी लागली की रस्त्यातच भिंतीशी जाणं तर त्यांना अजिबातच आवडत नाही. पण तरीही हे सगळं आपण एक समाज म्हणून त्यांना स्विकारायला लावतो. हे आपलं चुकत नाही का?
मुलांचे डोळे आणि कान अत्यंत तीक्ष्ण असतात आणि सदैव तत्पर असतात हे सगळ्या समाजानंच कायमचं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समाजातल्या एकाही मुलावर चुकीच्या गोष्टींचा प्रभाव पडता कामा नये, उलटपक्षी त्यांच्या जडणघडणीसाठी सर्वार्थाने उत्तम सामाजिक वातावरण आपण राखलंच पाहिजे, ह्या जाणिवेची आवश्यकता आहे. आणि आपण आपल्या मुलांना योग्य ते सामाजिक वातावरण देण्यात अपयशी ठरत आहोत हीच वस्तुस्थिती आहे.
काही दिवसांपूर्वीच माझ्या शेजारच्या मुलानं त्याच्या शिक्षिका असणाऱ्या बाईंचे बिकिनी मधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले मला दाखवले होते. त्यात एका फोटोत तर त्या बाईंच्या हातात भरलेला ग्लास देखील होता. स्वतःचे बिकिनी घातलेले आणि दारू पितानाचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करण्याची इतकी हौस असणाऱ्या बाईंनी प्राथमिक शिक्षिका होऊच नये असं मला प्रामाणिकपणे वाटलं. त्यांनी मॉडेलिंगच करायला हवं.
इतकंच काय, मी स्वतःसुद्धा अनेक शिक्षकांना समाजात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना, मद्यपान करताना पाहिलेलं आहे. कित्येक शिक्षकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर विचित्र पोस्ट पाहिल्या आहेत. विविध ऐतिहासिक ठिकाणी, गडकोटांवर मुलांच्या सहली घेऊन आलेल्या कितीतरी महिला शिक्षिकांना तोकड्या कपड्यात पाहण्याची वेळ आली आहे. हे सगळं मुलांवर कोणते प्रभाव पाडणार आहे, याची जाणीव माणसांना नसते का? असा प्रश्न पडतो.
ऐन वसुबारसेच्या संध्याकाळी आम्ही सवत्स धेनू पूजा करून येत असताना, माझे दोन-तीन वर्गमित्र सहकुटुंब – सहपरिवार (मुलाबाळांसकट) कारमध्ये होते. तिघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. उच्च पदस्थ आहेत, यशस्वी आहेत. त्यांच्यातला एक जण तर नामांकित विधिज्ञ आहे.
माझ्या गाडीपुढेच त्यांची गाडी होती. एका वाईन शॉप बाहेर त्यांनी गाडी थांबवली, दोघे जण गाडीतून उतरले आणि दारूच्या बाटल्या घेऊन आले, गाडी निघून गेली. बायका मुलांसह एकत्र असताना दारू कशाला हवी? मला खेदाचा धक्का बसला. एक क्षणभर मी मनातून हादरून गेलो. ऐन दिवाळीच्या दिवशी दारू का हवी? कुटुंबं बदलतायत आणि खरोखरच चुकीच्या पद्धतीने बदलतायत, हे फार प्रकर्षानं जाणवलं.
पालकमित्रांनो, आपल्या देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या महिला राष्ट्रपती कशा राहतात, कशा वागतात, कशा बोलतात, त्यांची जीवनशैली कशी आहे, हे तरी पहा. त्यांनी स्वतः शिक्षिका म्हणून काम केलं आहे, हे लक्षात घ्या. एकूण काय, आपल्याला खूप बदलावं लागेल. निदान पुढच्या पिढ्यांच्या उत्तम जडणघडणीसाठी तरी आपल्याला बदलावंच लागेल..
आपला समाज ज्या इंजिनावर चालतो ना, त्यातलं इंजिन ऑईल म्हणजे आपली मनं आहेत. ती जितकी स्वच्छ असतील तितकं इंजिन व्यवस्थित चालेल. ती जितकी उत्तम असतील, तितकं इंजिनाचं स्वास्थ्य उत्तम राहील आणि ती जितकी सकारात्मक प्रभावी असतील तितकी त्या इंजिनाला सकारात्मक गती येईल..
म्हणून, समाजाच्या इंजिनातलं इंजिन ऑईल बदला मित्रहो.. नाहीतर एके दिवशी ते इंजिन कायमचं बिघडून बसेल…
(आवडल्यास लेखात कुठलाही बदल न करता मूळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती.)
☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – २ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
ग्लोबल व्हिलेज आणि डेझर्ट सफारी या दोन दुबईतील स्थळांना भेटी दिल्या त्या अगदी उल्लेख करण्याजोग्या ! ग्लोबल व्हिलेज म्हणजे सर्व जग जणू एका मोठ्या मैदानावर पसरलेले…… चीन, येमेन, मलेशिया, पाकिस्तान, भारत अशा विविध देशांच्या स्टाॅल्सनी भरलेली रंगीबेरंगी दुनिया ! सगळ्या आसपासच्या छोट्या देशातील लोक या ग्लोबल व्हिलेज मध्ये खरेदीसाठी येतात. इथे जाण्यासाठी रेंटवर गाड्या मिळतात. आम्हीही ग्लोबल व्हिलेजला भेट दिली. खरेदी झाली ती येमेनच्या मसाल्याच्या पदार्थांची ! एवढे मोठे दालचिनीचे भारे आणि लवंगा – मिऱ्याचे डोंगर प्रथमच पाहिले ! इराण मधील सुंदर वस्तूंचे तसेच गालिचांचे स्टॉल बघायला मिळाले. बऱ्याच प्रकारच्या करमणुकीच्या गोष्टीही तिथे होत्या. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात ग्लोबल विलेजला खूप गर्दी असते.
‘डेझर्ट सफारी’ हे दुबईतील आणखी एक अट्रॅक्शन ! दुबईच्या एका ट्रिपमध्ये आम्ही डेझर्ट सफारीची ट्रीप केली. फक्त चार-पाच तासांची ट्रिप ! पण खूपच वेगळी ! डेझर्ट सफारी बुक केल्यानंतर ठराविक वेळी पिकप् साठी गाडी येते. दुबईपासून काही अंतरावर पोहोचले की या गाडीतून आपण उतरतो. तिथून वाळूत जाणाऱ्या स्पेशल गाड्या असतात, त्यामध्ये आपल्याला बसवून देतात. वाळूचे डोंगर धडाधड चढत उतरत या गाड्या जातात तेव्हा आपल्या पोटात भीतीचा गोळा उठतो ! तरुण लोक मात्र आरडाओरडा करून या गाडीत एन्जॉय करत असतात ! नंतर या गाड्या ग्राउंड लेव्हलवर असलेल्या मोठ्या तंबूसारख्या दिसणाऱ्या ठिकाणाजवळ आपल्याला घेऊन जातात. आम्ही तिथे गेलो तेव्हा संध्याकाळ होत आली होती. डिसेंबर २००८ मध्ये आम्ही गेलो होतो. हवेत खूप गारवा होता. वातावरण छान होते. प्रथम कॅमल राईड करून आम्ही आत गेलो. तेथे तऱ्हेतऱ्हेचे स्टॉल्स होते. सिनेमात पाहतो तसे खास अरबी वातावरण ! बसायला गाद्या, लोड तक्के, हुक्क्याचे स्टॅन्ड शेजारी ! मेहेंदी स्टाॅल, खास अरबी ड्रेस घालून फोटो काढायची सोय, विविध सरबते, जादूचे प्रयोग करणारे लोक, काचेच्या फ्लाॅवरपाॅटमध्ये वाळू घालून त्यात डिझाईन काढणारे, असे भरपूर काही बघायला मिळत होते. जेवणाची सोय तिथेच होती. जेवणानंतर तिथे वैशिष्ट्यपूर्ण असा ‘ बेली डान्स ‘ बघायला मिळाला.बऱ्याच जणांनी तिथे नाचून घेतले. दोन-तीन तास अशी जत्रा अनुभवताना वाटलं, जगाच्या पाठीवर कुठेही जा, माणूस स्वतःच मनोरंजन कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने करत असतोच !
अशी ही अनोखी डेझर्ट सफारीची ट्रिप केल्यानंतर आम्ही ‘धाऊ’ ट्रीप केली. ही खाडीवरची सफर होती. ‘धाऊ’ क्रूजवर नातवाचा वाढदिवस साजरा केला ! संध्याकाळची क्रूज बुक केली होती. ठरल्याप्रमाणे सात वाजता
आम्ही खाडीवर गेलो. सगळीकडे दिव्यांचा लखलखाट आणि लोकांचा कलकलाट होता. खाडीवर सजवलेल्या, छान छान नाव दिलेल्या बोटी निघण्यासाठी सज्ज होत्या. आमच्या बोटीचं नाव होतं “चांदनी”! बोटीतून एक दीड तासाची खाडीवरची सफर होती ती ! आम्ही बोटीत बसल्यावर प्रथम वेलकम ड्रिंक दिले गेले. बोट चालू झाली. बोटीतून बाहेरचा परिसर खूपच छान दिसत होता. आकाशातील चांदण्यांबरोबर स्पर्धा करणारे दुबईच्या खाडी तीरावरचे लायटिंग पहात आम्ही सफरीचा आनंद घेतला. काही करमणुकीचे कार्यक्रम क्रूझवर चालू होते. नातवाच्या वाढदिवसासाठी तिथे केकही सांगितला होता आम्ही ! त्यामुळे केक कटिंग करून बोटीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गाण्याच्या तालावर तिथे नाचही सुरू होता. जेवणाचा बेत छान होता. मस्तपैकी जेवण करून आम्ही धाऊ ट्रिप एन्जॉय केली.
ग्लोबल व्हिलेज डेझर्ट सफारी, धाऊ, या सर्व वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांना भेटी देत दोन-तीन वर्ष कशी गेली कळलंच नाही. ९ सप्टेंबर २००९ साली दुबई मेट्रो सुरु झाली. मेट्रोत बसून आम्ही दुबई मॉल, बुर्ज खलिफा पहायला गेलो होतो. दुबई मॉल बघत बघत आत गेले की बुर्ज खलिफापर्यंत जाता येते. ‘ बुर्ज खलिफा ‘ ही जगातील उंच इमारतींपैकी
एक ! बुर्ज खलिफाच्या १२४ व्या मजल्यापर्यंत जाता येते. पूर्ण दुबईची माहिती एका छोट्या थेटरमध्ये स्क्रीनवर दिली जाते आणि मग लिफ्ट इतकी झुमकन् जाते की १२३ वा मजला कधी आला ते कळतच नाही. तिथे साधारणपणे अर्धा पाऊण तास ३६० अंशाच्या गोलाकार भागातील खिडक्यातून, दुर्बिणीतून संपूर्ण दुबई पाहता येते.
—अशाप्रकारे दुबई फिरता फिरता आम्ही आता 2014 सालापर्यंत आलो होतो.
बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना वेटिंग रूम मध्ये बसून ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत, त्यांचा नातेवाईक लवकर पूर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा ही शुभेच्छा….!
फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत ही शुभेच्छा…..!
शेजारणीच्या घरचा भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं ही शुभेच्छा…..!
काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जिभेला मिळावं ही शुभेच्छा…..!
बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा ही अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण व्हावी ही शुभेच्छा…..!
गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्यांना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा ही शुभेच्छा…..!
आपल्या खिशाला कात्री लावून आपल्या कुटुंबाची आनंदाची दिवाळी साजरी व्हावी यासाठी स्वतःकरता काही न घेता मन मारुन दिवाळी साजरी करतात अशा वडलांना मन न मारून दिवाळी साजरी करता यावी त्याबद्दल शुभेच्छा..!
सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे आई जगदंबे—- हीच इच्छा…
संग्राहक – श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वाचनाचे विविध फायदे आहेत. ह्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती होऊन ज्ञानात भर पडते. वाचनामुळे वाडःमय, साहित्य अशा नानाविध प्रकारांची गोडी लागून एक प्रकारची समृद्धी येते. आणि ही लाभलेली श्रीमंती वा लाभलेलं समाधान पण काही ओरच असतं बरं का.
वाचनाच्या साहित्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत.त्यापैकी कमी शब्दांत उच्च कोटीच्या भावना जागवणारं माध्यम म्हणजे काव्य , कविता. कविता करतांना आपल्या मनातील वा आपल्याला अपेक्षित असणारा संपूर्ण आशय हा अगदी मोजक्या शब्दांत रसिकांपर्यंत पोहोचवायचा असतो.ही कामगिरी खरोखरीच कसोटीची बरं.त्यामुळे गीत रचयितांना,कविंना मानाचा मुजरा.
आपल्याकडे एकसे बढकर एक काव्य रचयिते होऊन गेलेत आणि सध्या सुद्धा आहेत. ह्या होऊन गेलेल्या कविंमध्ये एक अजरामर नाव म्हणजे भा.रा.तांबे ह्यांचं. तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’, ‘कशी काळनागिणी, सखे ग, वैरीण झाली नदी’, ‘कळा ज्या लागल्या जिवा’, ‘मावळत्या दिनकरा’, ‘जन पळभर म्हणतील’ यांसारखी एकाहून एक सुमधुर भावगीतं रचून मराठी काव्य समृद्ध आणि श्रीमंत करणारे राजकवी भा. रा. तांबे यांचा २७ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने हा आठवणींचा कप्पा परत एकदा उलगडतोयं.
खरतरं काव्य करणारे हातं,मनं,डोळे हे सरसकट फक्त आणि फक्त भावनिक क्षेत्रात आढळतात. पण ही समजूत कशी चूकीची आहे हेच जणू ह्या राजकवींनी सिद्ध केलयं. ह्यांची कामकाजाची ठिकाणं आणि हुद्दे म्हणजे हे संस्थानी वकील, दिवाण, न्यायाधीश, सुपरिटेंडंट अशा रुक्ष नोकऱ्या करीत होते आणि ह्या रूक्ष क्षेत्रात एकीकडे कार्यरत राहून एकीकडे मात्र स्वत्ःमधील कोवळं मनं,कविमनं ह्यांनी निगुतीने जपलं.आणि एकाहून एक सरस अशा गोड कविता आणि गाणी ह्यांनी सहजतेने रचल्यात. त्यांनी एकीकडे ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, वारा नेई सोने वाटे वाहुनिया दूर’ ह्यासारखी निसर्गकविता, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’सारखं बहीणभावाचं खेळीमेळीचं नातं वर्णन करणारं गीत, ‘या बालांनो सारे या, लवकर भरभर सारे या’सारखी बालकविता आणि त्याच सहजतेने ‘डोळे हे जुल्मी गडे रोखून मज पाहू नका’ अशी एका प्रेयसीची लोभस विनवणीही त्यांचीच देणं. ‘नववधू प्रिया मी बावरते’ अशी नवपरिणित तरुणीची घालमेलही ते एकीकडे मांडतात आणि दुसरीकडे ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?’सारखं जीवनातलं कटू सत्य सांगणारं गीतसुद्धा लिहून जातात.
भा.रा.तांबे यांनी १९२६ सालच्या मध्य भारतीय कविसंमेलनाचं आणि १९३२ सालच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. प्रणयप्रभा, तांबे यांची समग्र कविता अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सात डिसेंबर १९४१ रोजी ग्वाल्हेरमध्ये त्यांचं निधन झालं.
☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – १ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
दुबईसंबंधी लिहिताना मला काही त्या देशाचा राजकीय, ऐतिहासिक किंवा सामाजिक विषय डोळ्यासमोर नाहीये, पण गेल्या दहा बारा वर्षात मी जशी बदलत गेलेली दुबई बघितली आहे, त्यासंबंधी थोडक्यात लिहावसं वाटतंय !
२००६ मध्ये माझ्या जावयांनी जेव्हा दुबईमध्ये एमिराईट्स एअरवेज जॉईन करायचे ठरवले तेव्हा ‘अरेच्चा, दुबई?’ अशी प्रश्नचिन्हांकित झाले होते मी ! कारण तोपर्यंत बरेच तरुण शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी अमेरिका, इंग्लंड, युरोप किंवा फार तर ऑस्ट्रेलियात जातात हेच माहिती ! पण अमेरिका, सिंगापूर खालोखाल ‘ एमिराईट्स एअरवेज’ अतिशय चांगली एअरवेज कंपनी आहे हे तेव्हा मला कळलं, आणि लगेचच त्यानंतर २००७ मध्ये आमची पहिली दुबई ट्रिप झाली !
तेव्हाचे दुबईचे वर्णन ‘दुबई मुंबई सारखीच आहे’ इतपतच माहीत होते. पण दुबईच्या एअरपोर्टवर प्रथम उतरल्यावर मनाला भावले ते येथील स्वच्छ, मोठे रस्ते आणि जागोजागी दिसणारे फुलांचे ताटवे, कारंजी ! इथे पाणी नाही अशी एक कल्पना होती, पण इथे तर पाण्याचा काहीच दुष्काळ नव्हता ! माझी मुलगी रहात होती तो ‘बर् दुबई’ भाग मुंबईसारखाच मध्यम उंचीच्या इमारतीने भरलेला असा होता. पहिल्या फेरीतच आम्ही दुबईचे मंदिर आणि म्युझियम पाहिले. दुबईमध्ये फिरताना लक्षात आले की दुबईमध्ये शीख, गुजराथी, उत्तर प्रदेशी, तमिळ आणि केरळ या भागातील लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. म्युझियममध्ये दुबईचा इतिहास कळला. साधारणपणे १९७० सालानंतर दुबई पृथ्वीच्या गोलावर ठळकपणे दिसू लागले. प्रथम टोळ्याटोळ्यांनी राहणाऱ्या लोकांनी कुवेत, शारजा, अबुधाबी, सौदी अशी छोटी छोटी मुस्लिम राज्य निर्माण केली ! तसेच हे दुबई ! दुबई,अबुधाबी,शारजा,अजमान,फुजेराह,रस् अल् खैमा,उमल् क्वेन, असे संयुक्त अमिरातीचे सात भाग आहेत.
खाडी किनाऱ्यावर फिरल्यावर असे लक्षात आले की इथला व्यापार मोठ्या जहाजामार्फत चालत असे. मोती, मासे आणि मुख्य म्हणजे सोन्याची मुक्त बाजारपेठ यामुळे दुबई हे मोक्याचे ठिकाण होते. अनेक कन्स्ट्रक्शन कंपन्या येत असल्याने इंजिनियर्स आणि वर्कर्स दोन्हींचे येणे वाढले होते.
दुबईमध्ये पाणी मुबलक होते. लाईट कधी जात नसत. इन्फ्रास्ट्रक्चर चांगले होते आणि शिस्तबद्ध, सर्व सुख सोयींनी युक्त असे तेथील जीवन होते. अमेरिकेसारख्याच सुखसोई! पण येथे सर्वात विशेष काय होते तर कामाला, स्वयंपाकाला माणसे मिळत असत ! ते सौख्य अमेरिकेत महाग असते !
२००७ ते २०१० ही तीन वर्षे आम्ही दुबईमध्ये दरवर्षी येत होतो, कारण माझा नातू तेव्हा लहान होता. मुलीचा जॉब होता, घरी कामाची बाई होती, तरीही घरचं माणूस आवश्यक वाटत असे.
त्यावेळी ‘ बुर्ज अल् अरब ‘ ही मोठ्या जहाजाच्या आकाराची बिल्डिंग समुद्रातच नव्याने बांधलेली होती. ती आम्हाला अर्थातच खूप आकर्षक वाटली. एस्केलेटर्स,मोठमोठे मॉल फिरताना खूप मजा वाटत होती.
२००८ च्या मुक्कामात मेट्रोचे काम जोरात चालू होते.९-९-२००९– मेट्रो चालू करण्याचा संकल्प खरोखरच त्यावर्षी पूर्ण झाला ! डिसेंबर ते फेब्रुवारी दुबई शॉपिंग फेस्टिवल असे. बऱ्याच जवळच्या देशातील लोक फिरायला, खरेदी करायला येथे येत असतात. त्या काळात रात्री साडेआठ वाजता क्रिकवर फायर फेस्टिवल होई. दिवाळीप्रमाणे तऱ्हेतऱ्हेचे, रंग रूपाचे फटाके साधारणपणे दोन तीन मिनिटं सलगपणे उडवले जात. त्यांचे रंग आणि पाण्यात पडणारे प्रतिबिंब दोन्हीही विलोभनीय दिसत असे !
तिथे असणाऱ्या काही मराठी कुटुंबांबरोबर मैत्री झाल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून ‘अलेन’ची ट्रीप केली. तेथील झू फारच प्रेक्षणीय होते. वाघ,सिंह,जिराफ,यासारखे प्राणीही, वाळवंटी प्रदेशात असूनही खूपच चांगले राखले होते.जबेल हफित अलेन मधील एक उंच डोंगर ! खूप उंच नव्हता, पण सपाट पसरलेल्या वाळवंटात तो जास्त उंच वाटत होता. एक दिवस ‘ गोल्ड सुक् ‘ पहायला गेलो. ते पहाणे म्हणजे डोळ्यांना सुख देणे असे वाटले !– तुळशीबागेसारखा मोठा बाजार ! दुतर्फा सोन्याने भरलेली दुकाने, सोन्याच्या माळा, मोठमोठे दागिने, आणि दारात उभे राहून बोलावणारे दुकानदार लोक! बघूनच डोळे तृप्त झाले. एवढे सोने तिथे दिसत होते पण आपल्या खिशातले पैसे तिथले काय खरेदी करू शकणार या विचारानेच आम्ही दृष्टी सुख घेऊन परत आलो. तिथून जवळच खास मसाल्याचा (स्पाइस सुक्) बाजार होता. तिथे मात्र लवंग, दालचिनी, मिरे, तमालपत्र यासारख्या पदार्थांचे ढीग लागलेले होते. तसेच केशरही बऱ्यापैकी स्वस्त होते. आम्ही या पदार्थांची थोडीफार खरेदी केली.
दिसायला अगदी साध्या वाटत असल्या तरी या कुणी सामान्य गृहिणी नाहीत. अफाट आणि अचाट कर्तृत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे टेसी थॉमस– एक असे नाव जे बऱ्याच जणांनी बहुतेक ऐकले नसणार.
डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण ” मिसाईलमॅन ” म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थॉमसना ” मिसाईल वुमन ” म्हणून ओळखतात. टेसी थॉमस ” भारतीय अंतराळ संशोधन संस्थे ” ( इस्रो ) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायजेशनमध्ये कार्यरत आहेत. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने ” अग्नी ” क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर इतका गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा वाटा उचलला. टेसी थॉमस यांच्या त्या अफाट कर्तुत्वाला त्रिवार सलाम !
केरळमधे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या टेसीचे नाव टेसी पडले ते मदर तेरेसा यांना आदर्श मानणाऱ्या तिच्या आई वडिलांमुळे. लहानपणापासूनच जवळून अवकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्राना, उपग्रहांना पाहून तिला त्या क्षेत्राविषयी कुतूहलमिश्रित ओढ लागून राहिली होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे आयपीएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं. पण ती वळली अंतराळ संशोधन संस्थेकडे. पुण्यामधे राहून तिने एम.टेकची पदवी घेतली. तिच्यातील अफाट बुद्धिमत्ता हेरून डॉक्टर अब्दुल जे. कलाम यांनी तिचा समावेश अग्नी क्षेपणास्त्र प्रोजेक्टमधे केला. आणि स्वतःच्या अफाट बुद्धीमत्तेच्या बळावर त्या तडक अग्नी क्षेपणास्त्र ५ च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर जाऊन पोहोचल्या. तेव्हा त्यांनी एक इतिहासच घडवला. तेव्हापासून त्यांची ओळख ” अग्निपुत्री ” म्हणूनही झाली.
आज ४९ वर्षे वय असलेल्या टेसी थॉमस एक आदर्श गृहिणीही आहेत. करिअर आणि संसार अशी कसरत त्यांनाही रोजच करावी लागते. २४ तासामधे कोणत्याही क्षणी कामावर हजार रहावे लागत असूनही आपल्या हाताने बनवलेला स्वयंपाक कुटुंबातील सदस्यांना देण्यातील आनंद त्या भरभरून घेत असतात. देश अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या नवनवीन कल्पना राबविताना, त्यांना आपण हे सारे जागतिक शांततेसाठीच करतोय ह्याचे चांगलेच भान असते. दुर्दैवाने आपल्या देशाने त्यांना कधी पद्मश्री, पद्मभूषण किताबाने सन्मानित केले नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव.
टेसी थॉमस यांची ही कहाणी देशातील करोडो स्त्रियांना प्रेरणा देणारी ठरावी. आज इस्रोमध्ये तब्बल बाराशे महिला ‘शास्त्रज्ञ’ म्हणून कार्यरत आहेत. देशातील करोडो महिलांची मान गर्वाने उंचावणारी टेसी थॉमस यांची ही अफाट कामगिरी येत्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यायला प्रेरित करेल याविषयी शंकाच नाही.
संग्राहिका: सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्वर आले… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
” नवकिरणांचे दूत निघाले पूर्व दिशेहुन नाचत नाचत
नवीन गाणी ओठावरती किलबिलते पक्षांची पंगत
सोनेरी स्वप्नांची झालर पहाटवा-यावरती विहरत
नवी चेतना भरून घ्यावी जाने त्याने हृदयागारी
उल्हासाचे रंग भरले नभांतरी दशदिशांतरी “🌅
दिवाळी सुट्टीचा शेवटचा रविवार, उद्यापासून परत रोजचा दिनक्रम सुरु होणार. मस्त पडलेल्या या थंडीत नव-उत्साहात ,नव्या चेतना नवीन स्वप्ने घेऊन सुरवात करायची.
” स्वप्नचूर लोचनात एक रम्य आकृती
सूर सूर होता सर्व भावना निनादती 🎼
वाजतात पायीची बघ अजून नुपूरे
तेच स्वप्न लोचनात रोज रोज अंकुरे”
“दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी” म्हणता म्हणता दिवाळी येऊन केंव्हा गेली हे कळलच नाही. मात्र प्रत्येकाच्याच आनंदाची ‘जीवनातली घडी अशीच राहू दे, प्रितीच्या फुलावरी वसंत नाचू दे “
आता फूल घ्यायचे तर काट्यांचा सामना करायलाच पाहिजे का दरवेळेला? तरीपण
” हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे
आहे फुलात काटा तो ही पसंत आहे
कधी सांगता न आल्या शब्दात प्रेमगोष्टी
श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे “
ही देव गाणी आठवत, मनात गुंजन करत पुढे जात रहायचे
कवी यशवंत देव यांचा ३० आँक्टोबर स्मृतीदिन तर १ नोव्हेंबर जन्मदिन त्यांच्या स्मृतीस विनम्र 🙏🙏