मराठी साहित्य – विविधा ☆ काल्या आणि पंडी… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ? 

☆ काल्या आणि पंडी… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

काल्या म्हणजे आमच्या घरादाराचं रक्षण करणारा आमचा लाडका ईमानी कुत्रा..अगदी काळ्या कुट्ट रंगाचा… 

म्हणून त्याला आम्ही सगळे काल्याच म्हणतो…काही वर्षापूर्वी गावात उंट घेऊन आलेल्या भटक्या कुटूंबासोबत काल्या आला होता.उंटवाले गेले पण काल्या मागे राहिला.घरातल्या भाकरी तुकड्यावर मोठा झाला आणि घरातला रक्षक सदस्यच बनून राहीला..

तशीच आमची मनी माऊ पंडी…घरभर फिरून पायात लुडबूड करणारी आमची मनी तिला आम्ही सगळेच पंडी म्हणतो. काल्या आणि पंडी दोघांची जाम मैत्री…दोघेही आपल्या आपल्या तोऱ्यात अंगणभर वावरत असतात.

आम्ही गावी गेलो की काल्याला खूप आनंद होतो. काल्या अंगावर झेप घेत कडकडून भेटायला हमखास अंगणात असतोच.त्याचं काळं नूळनूळीत शरीर आणि तशीच वळवणारी शेपटी सारखी हलत असते…आणि पंडी तर म्याऊ म्याऊ करत पायात घुटमळत येत असते.. रात्री आणि दिवसभर कोणीही अनोळखी दिसला तर काल्या गुरगुरला म्हणून समजाच…. रस्त्यावर,अंगणात, झाडाखाली आणि शेडमध्ये ऐटीत बसून जागरूक राहणारा काल्या..तर  अंगणात आणि झाडावर फिरून भक्ष पकडून घरभर मिरवत मट्ट करणारी पंडी…!

सगळ्यांची जेवणावळ बसली की पंडी ताटाभोवती लुडबुडत राहते आणि काल्या दारात शेपटी हलवत जिभळ्या चाटत केविलवाण्या चेहर्‍याने बसलेला असतो.संध्याकाळी अंगणात जागरूक असलेला काल्या आणि शांत झोपलेलं घर असतं.पंडी मात्र पायात घरघरत मस्त झोप घेत राहते…. अंगणातल्या शेळ्या,गाई आणि कोंबड्यांच्या रखवालीची जबाबदारी काल्या घेतो.आणि पंडी घरातली जबाबदारी पार पाडते..कधी कधी चोरून दुध गट्ट्म करताना आईच्या हातचा फटका बसतो तिला.मग दूर जाऊन पाय आणि तोंड जिभेने साफ करत बसलेली असते पंडी….. मोकळ्या वेळात आरामात लोळण घेत पडलेली निरागस वाटते पंडी..पण तशी ती नसते.. पंडी आणि काल्या कधी कधी मजेत खेळत असतात… त्यांच्यातल्या अनोख्या मैत्रीने अंगण खेळकर बनून राहते.पहाटे आम्ही बच्चे कंपनी खडीवर भटकायला निघालो की काल्या आमच्या पुढे असतोच..त्याच्या शिवाय भटकंतीला मजा येत नाही. लहानपणी ‘पदी ‘नावाची कुत्री पण अशीच आठवण ठेवून गेलेली.

अशा मुक्या प्राण्यांनी आणि पक्षांनी गावचे घर अंगण असं सजून नेहमी किलबिलत असतं…सगळेजण घरादाराशी दिवस रात्र गप्पा मारत राहतात.मुक्या प्राण्यांची अशी बोलकी प्रीत काळजात जपून ठेवावी अशीच असते….अशी ही आमची मैत्री गावाकडे गेलो की हमखास एकमेंकांच्या स्वागतासाठी सज्ज असते…!

चित्र – प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

‘काळजातला बाप ‘कार..

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ते रवी, मी साधा चंद्र… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ ते रवी, मी साधा चंद्र.. ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

(दिग्गज ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चित्रकार श्री. रवी परांजपे यांचे दि. ११/६/२२ रोजी दुःखद निधन झाले. त्यांना वाहिलेली ही शब्द – सुमनांजली) 

साहित्य, कला, संस्कृतीचं माहेरघर असलेल्या महाराष्ट्राला, अनेक थोर चित्रकार लाभले आहेत.. एस.एम. पंडित, रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल, एम.आर. आचरेकर, इत्यादींनी सप्तरंगांवर हुकूमत गाजवून कलाजगतात प्रसिद्धी मिळविली.. या थोर चित्रकारांच्याच पिढीतील ज्येष्ठ चित्रकार, रवी परांजपे यांनी काल आपले ‘ब्रश मायलेज’ गाठले..

मला लहानपणापासूनच चित्रकलेचे आकर्षण आहे. किराणा मालाच्या दुकानातून आणलेल्या सामानाच्या कागदी पिशवीवर एखादे चांगले चित्र दिसले, तर ती पिशवी पाण्यात बुडवून खळ निघून गेल्यावर तो कागद सुकवून जपून ठेवलेली चित्रं, अजूनही माझ्या संग्रही आहेत.. अशाच छंदातून मुळगावकर व दलाल यांची चित्रे, कॅलेंडर्स जमविली. त्याकाळी टाईम्स ऑफ इंडियाच्या धर्मयुग, इलस्ट्रेटेड विकली अशा पाक्षिकात रवी परांजपे सरांची रंगीत कथाचित्रे, पाहिल्याची आठवतात.. 

काही वर्षांनंतर त्यांची चित्रे असलेली ग्रिटींग्ज कार्ड्स पाहिली. काही कॅलेंडर्स, सरांच्या वेगळ्या शैलीमुळे लगेच ओळखू यायची.. वर्तमानपत्रातील व रीडर्स डायजेस्ट या इंग्रजी मासिकातील सरांच्या जाहिराती पाहिल्या की, सरांच्या शैलीचं कौतुक वाटायचं.. अशा ज्येष्ठ चित्रकाराशी कधी संपर्क येईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.. तरीही, तो आला…

माझ्या मोठ्या भावाने, रमेशने अभिनव कला महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापक मारुती पाटील सरांच्या शिफारशीवरुन, मुंबईला रवी परांजपे सरांकडे कलाक्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी जाण्याचे ठरविले.. 

सरांचा स्टुडिओ दादर येथील काॅलेज गल्लीतील, मनाली बिल्डींगमध्ये होता. त्यावेळी सर बिल्डर्सना लागणारी माऊंट साईजमधील बिल्डींगची कलरफुल पर्स्पेक्टिव्ह ड्राॅईंग्ज काढून देत असत. सरांकडे रमेशसारखेच चार असिस्टंट काम करीत असत. 

त्यावेळी परांजपे सरांना भेटायला कधी अभिनेत्री स्मिता पाटील तर कधी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे येत असत. मी दोन वेळा रमेशला भेटायला म्हणून, स्टुडिओत गेलो होतो. सर मितभाषी होते. याच दरम्यान सरांकडे काम करणाऱ्या, दिपक गावडे या चित्रकार मित्राशी मैत्री झाली.. जी आजही अबाधित आहे.. 

सहा महिन्यांनंतर रमेशने, सरांकडचा अनुभव घेऊन मुंबई सोडली. १९९० साली, सर पुण्यात आल्यानंतर आम्ही दोघेही सरांना भेटत होतो. सरांची अनेक प्रदर्शने पाहिली. कधी सरांचं प्रदर्शन मुंबईत जहांगीरला असेल तर तेही जाऊन पाहिलं..

वर्तमानपत्रातून आलेले सरांचे लेख वाचत होतो. मोठमोठ्या सांस्कृतिक समारंभांना  सरांची उपस्थिती हमखास असायची. तिथे भेट होत असे..

आठवड्यापूर्वी ज्येष्ठ चित्रकार अनिल उपळेकर यांचा मेसेज आला.. ‘काही दिवसांपूर्वी सर घरात पडले, घोले रस्त्यावरील हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं आहे. आयसीयू मध्ये आहेत..’ हे वाचून मला धक्काच बसला.. 

..काल दुपारी परांजपे सरांच्या कलाप्रवासाने पूर्णविराम गाठला.. दिग्गज चित्रकारांमधील जो एक शेवटचा दुवा होता, तोही निखळला.. दीनानाथ दलालांना, केतकर सर गुरुस्थानी होते.. रघुवीर मुळगावकरांनी, एस.एम. पंडितांना गुरुस्थानी मानलं होतं.. एम.आर. आचरेकरांकडे शिकलेले विद्यार्थी आज यशस्वी चित्रकार झालेले आहेत.. रवी परांजपे सरांची चित्रशैली ही इतरांपेक्षा खूप वेगळी होती.. अशी ही चालती बोलती विद्यापीठं काळाच्या ओघात नाहीशी झाली.. वास्तव चित्रशैली जपणारी पिढी, हळूहळू नामशेष होत आहे.. नवीन पिढीचा कल, हा वास्तव पेक्षा अमूर्त कलेकडे अधिक आहे.. यातूनही वास्तव कला टिकवायची असेल तर, जुन्या पिढीतल्या पंडित, दलाल, मुळगावकर, परांजपे सरांना कदापिही विसरुन चालणार नाही..

सूर्य म्हणजेच रवी, हा स्वयंप्रकाशी व तेजस्वी ग्रह आहे.. तारांगणातील माझ्यासारखे असंख्य ग्रह, हे चंद्रासारखे परप्रकाशी आहेत.. अशा रवीचे थोडे जरी प्रकाशकिरण ज्याच्या अंगावर पडले, तो धन्य झाला.. मीही असाच एक…

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे सरांना, ही शब्दफुलांची भावपूर्ण श्रद्धांजली!!! 

© सुरेश नावडकर

१२-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 2 ☆ श्री मंदार दातार ☆

श्री मंदार दातार 
? इंद्रधनुष्य ?

☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 2 ☆ श्री मंदार दातार ☆

(या प्रमुख सुधारणा होत्या व त्यामुळे सण आणि उत्सव यांच्या तारखांमध्ये फरक पडणार होता ! ) इथून पुढे —-

केरोपंत यांनी इतर अनेक सुधारणाही सुचवल्या. त्यांतील शेवटची, झीटा अक्षराची सुधारणा वगळता बाकी सर्व पुढील काळात स्वीकारल्या गेल्या. पंचांग करणारे सर्वजण आधुनिक गणित शिकलेले नव्हते. त्यांना गणित आधुनिक प्रमाणे (मानके) वापरून करता यावे यासाठी केरोपंतांनी ‘ग्रहलाघवा’च्या धर्तीवर ‘ग्रहगणिताची कोष्टके’ हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक हे केरोपंतांचे शिष्य; त्याचप्रमाणे ते गणित, संस्कृत आणि पौर्वात्य विज्ञानाचे अभ्यासक व जाणकार. त्यांनी त्या सुधारणा पंचांगात झाल्याच पाहिजेत आणि ‘आमची पंचांगे फ्रेंच नाविक पंचांगांच्या तोडीची असलीच पाहिजेत’ असा आग्रह धरला व तशा  प्रेरणेने पंचांग सुधारणा घडवून आणल्या. त्या सुधारणा करणे हे सांगली येथे लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली 1920 मध्ये झालेल्या परिषदेत सर्वमान्य झाले.

पुढील काळात पंचांग गणित हे आधुनिक साधने वापरून केले जाऊ लागले. गेली काही वर्षे तर संपूर्ण पंचांग हे संगणकाच्या मदतीने मांडले जाते. त्यासाठी लागणारे खगोलीय स्थिरांक आणि गणितीय पद्धती भारत सरकारतर्फे कोलकाता येथील ‘पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी’ ही संस्था प्रकाशित करते. त्यामुळे सर्व पंचांगांत एकवाक्यता आढळते. या सगळ्या सुधारणा पंचांगकर्ते हळुहळू स्वीकारू लागले आहेत आणि सर्व पंचांगे गणितीय व खगोलीय दृष्ट्या अचूक आहेत. लोकमान्यांचे ते स्वप्न सत्यात उतरले आहे. त्या अर्थाने प्रसिद्ध होणारी सर्वच पंचांगे ही एका अर्थी ‘टिळक पंचांगे’ आहेत. पंचांगात दर्शवलेल्या तिथी, नक्षत्र, ग्रहांच्या स्थिती, गती; तसेच, सूर्य-चंद्र ग्रहणांच्या वेळा या वास्तविक असून त्यात कोणताही फरक राहिलेला नाही.

मग प्रश्न असा उरतो, की केरोपंत छत्रे यांनी सुचवलेल्या सर्व सुधारणा अंमलात आल्या पण नक्षत्र चक्र आरंभ हा रेवती नक्षत्रातील झीटा ताऱ्यापासून करावा ही सूचना काही सर्वमान्य झाली नाही. लोकमान्य असतानादेखील त्या सूचनेस लोकांचा विरोध होता आणि तो पुढे तसाच राहिला. त्याचे कारण म्हणजे त्या सूचनेचा स्वीकार केला असता तर, ‘अधिक’ महिने मोजण्याच्या पद्धतीत फरक येईल आणि त्यामुळे लोक नवीन कोणत्याच सुधारणा पंचांगात स्वीकारणार नाहीत. त्यामुळे सर्वजण ती सूचना वगळून बाकी सुधारणा करण्यास तयार झाले. त्यांतील अग्रणी म्हणजे व्यंकटेश बापुजी केतकर.

व्यंकटेश बापुजी केतकर यांनी एक आकाशीय बिंदू कल्पिला. तो बिंदू जुन्या सूर्य सिद्धांत नक्षत्र चक्र आरंभाजवळ आहे. चित्रा नक्षत्रातील स्पायका ताऱ्यापासून 180 अंशांवर येतो. त्यामुळे त्या पद्धतीला चित्रा पक्ष असे म्हणतात. त्यामुळे व्यवहारात कोणताच नजरेत भरणारा फरक पडणार नव्हता, त्यामुळेच ती पद्धत सर्वांना मान्य झाली. पुढील काळात रेवती पक्ष आणि चित्रा पक्ष या दोन्ही पक्षांच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या पक्षांच्या समर्थनार्थ अनेक पुरावे सादर केले. त्यांचा मुख्य उद्देश पूर्वी झालेल्या वराहमिहीर, आर्यभट्ट; तसेच, इतर सिद्धांत ग्रंथकारांना कोणता नक्षत्र चक्र आरंभ अपेक्षित होता हे सांगणे. परंतु ते पुरावे नि:संदिग्ध नसल्याने कोणताच दावा पूर्णपणे मान्य होऊ शकला नाही. शेवटी, भारत सरकारने स्थापन केलेल्या कॅलेंडर रिफॉर्म कमिटीने चित्रा पक्षास मान्यता देऊन त्या वादावर पडदा टाकला.

असे असूनसुद्धा रेवती पक्षाचे अभिमानी त्यावर आधारित टिळक पंचांग वापरतात. त्या पंचांगानुसार ‘अधिक’ मास, ‘क्षय’ मास यात फरक पडतो आणि त्यामुळे सर्वच नाही पण काही वर्षांत टिळक पंचांगाच्या आणि चित्रा पक्ष पंचांगांच्या सणांच्या तारखांमध्ये फरक पडतो. तो फरक अधिक महिन्याच्या गणनेमुळे पडतो. त्यामुळे काही वर्षी (उदा. सन 2012) टिळक पंचांगानुसार गणपती ऑगस्ट मध्ये बसले आणि दाते पंचांगानुसार सप्टेंबरमध्ये ! तोच प्रकार दिवाळीच्या बाबतीत घडताना दिसतो. मग स्वाभाविक प्रश्‍न हा पडतो की नक्‍की खरे पंचांग कोणते, टिळक की दाते? वास्तविक, दोन्ही योग्यच. आपण मोजण्यास सुरुवात कोठून करतो यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे गणितीय दृष्टिकोनातून पाहता दोघांत फरक काही नाही. पण पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. त्यामुळे त्या दृष्टीने अशा विसंगती लोकांमध्ये भ्रम निर्माण करतात. तेव्हा वाद विसरून सर्वांनी एकच प्रमाण मानून धार्मिक आचरण करणे योग्य.

– समाप्त

लेखक : श्री मंदार दातार 

मो. नं.  9422615876

मो  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-2 ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-2 ☆ सुश्री त्रिशला शहा 

(बालकामगार निषेध दिन (12जून) त्यानिमीत्त)

यामधे अगदी थोडीच मुले शिक्षणाकरिता हातभार म्हणून मजूरी करतात.पण बऱ्याचवेळेला शिक्षणाची आवड नसणारे, शाळेत न जाता चैनी करण्यासाठी मजूरी करुन पैसे मिळवतात.फँक्टरी मालक,हाँटेलमालक सुध्दा अशा मुलांना कामावर ठेऊन घेतात. कारण या मुलांना मजूरी कमी दिली तरी चालते.म्हणून कमी पैशात अशा बालकांकडून काम करुन घेण्याचा त्यांचा मनोदय असतो.एकदा का मजूरी करुन का होईना पैसे मिळतात म्हटल्यावर ही मुले शिक्षणाला रामराम ठोकतात आणि अशा तुटपुंज्या मजूरीवर  राबत रहातात.

फैक्ट्री एक्ट १९६९ मधे अशा बालमजूरांना कामावर ठेऊन घेतल्यास फँक्टरी मालकावर गुन्हा दाखल करण्याची तरतुद आहे.यामधे मालकाला दंड व कारावासाची शिक्षा सुनावली जाते.भारतात  १९८६ ला बालकामगार विरोधी कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर १ सप्टेंबर २०१६  रोजी या कायद्यात दुरुस्ती करुन १४ वर्षाखालील मुलांना काम करण्यास कायद्याने बंदी घातली.मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून शाळेत माध्यान्ह भोजनाची तरतूद करण्यात आली.तरीसुध्दा म्हणावा तितका बालमजुरीचा प्रश्न संपुष्टात आलेला नाही.मात्र काही राज्यातून यासाठीच्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.याबाबतीत एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ओरीसा राज्यातील मयुरभंज या गावात बालमजूरी पुर्णपणे बंद आहे. इथे मुलांकडून काम करुन घेतले जात नाही.आंध्रप्रदेश मधे पण अशी पावले उचलली जात आहेत.

पं. नेहरुंना लहान मुले खूप आवडायची. आपणही या मुलांच बालपण जपण्यासाठी प्रयत्नशील राहुया.तरचं बालमजूरी आणि बालकामगार याविषयीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.आणि त्यांच्यासाठी म्हणूया.

‘प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा ‘

समाप्त

(लेख 12 जून ला प्रसिद्ध करू शकलो नाही.क्षमस्व. संपादक मंडळ)

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बंध रेशमाचे!…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆  बंध रेशमाचे!…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

“कमवता झालास, की कळेल तुला एका एका पैशाची किंमत! कमवता होत नाहीस तोपर्यंत वाचवायला शिक!,” असं आई म्हणायची. मला पटायचं नाही. शाळेत होतो, बंडखोरी नुकतीच शिकत होतो! “हा असला साबण मी वापरणार नाही, मला नवाच साबण पाहिजे!” असा इशारा द्यायचो; पण काही उपयोग व्हायचा नाही. “नको वापरूस साबण. बरंच आहे!” असा बचाव पक्षाचा बचाव असायचा.

पंडित भीमसेन जोशी यांचं कन्नडमधलं ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ कुठंही आणि कधीही ऐकलं, तरी मला बेळगाव-धारवाड रस्त्यावरचा पहाटेचा एक ढाबा आठवतो! एका जवळच्या मित्राबरोबर बेळगावहून मोटारसायकलवर आम्ही भल्या पहाटे धारवाडला निघालो होतो.

 रस्त्यात एका ठिकाणी चहासाठी थांबलो. झुंजूमुंजू झालेली होती. सगळं वातावरणच रम्य. त्या रसिक ढाबेवाल्यानं मोठ्या आवाजात कॅसेटवर “भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ लावलं. ते तसलं सुंदर वातावरण, हवेतला सुखकर गारवा, गरम चहाचा घोट आणि पहाटे-पहाटे पंडितजींचा मस्त लागलेला आवाज! कानडी येत नाही, त्यामुळे शब्द समजले नाहीत. अर्थ तर फारच दूर; पण हे काहीतरी पवित्र आहे, सुंदर आहे एवढं मात्र जाणवलं. मनाच्या पार आतवर खोल कोरलं गेलं. अधाशासारखं तीनदा परतपरत ऐकलं, तरी मन भरेना. शेवटी, कानात अतृप्तता घेऊन तिथून निघालो. इतकी वर्षं झाली, आजही हे “भजन’ ऐकलं, की दरवेळी मला माझा मित्र सुधीर आठवतो, तो प्रवास आठवतो, त्याची गाडी आठवते, तो “ढाबेवाला’ शिवा आठवतो. एवढंच काय, हे ऐकताना प्यायलेल्या आलेमिश्रित चहाची चवही आठवते! मेंदू कुठंतरी या सगळ्या गोष्टींची एकत्रित सांगड घालतो!

आजही किशोरकुमारचं, “वो शाम, कुछ अजीब थी’ ऐकलं, की कॉलेज आठवतं, “ती’ आठवते, कॉलेजचं कॅंटीन आठवतं, “ती’चं हॉस्टेल आठवतं. दिवाळीच्या सुट्टीमुळे घरी जावंच लागेल, ही तिची असहायता आठवते—- एवढं सुंदर गीत; पण आजही त्रास देऊन जातं!

आठवणींचं घटनांशी, वस्तूंशी, गंधाशी, सुरांशी अतूट असं नातं असतं. आठवणी कधी सुरांना चिकटून येतात, तर कधी वासाला. कधी एखादा विशिष्ट रंगसुद्धा तुम्हाला पुर्वायुष्यातल्या एखाद्या घटनेची “याद’ देऊन जातो. आठवणी या सगळ्यांशी कोणत्या ना कोणत्या तऱ्हेनं निगडित असतात. तोडू म्हटलं, तरी ते बंध तोडता येत नाहीत.

मुंबईत बांद्रयाला हिलरोडवर उभा होतो. अचानक सिग्नलवर गर्दी झाली. टाचा उंचावून बघितलं. सिग्नलवर फेरारी! फेरारी पाहायला, एवढी गर्दी कशाला? “काय कळत नाही का या मुंबईकरांना,’ असं म्हणणार होतो. म्हणणारच होतो, की ड्रायव्हर साईडच्या काचा खाली झाल्या, आणि समोर साक्षात गॉगलधारी “सचिन’!

नेहमीसारखा हसतमुख! “अबे, जाने दो ना..’ सगळ्यांना अशी हसतहसत विनंती करणारा! शेवटी, चार वेळा हिरवे होऊन परत लालटलेले सिग्नल, मागच्या शंभर गाड्यांचे हॉर्न, भलामोठा ट्रॅफिक जॅम आणि सहस्त्र फोटो यानंतरच तो जाऊ शकला! “फेरारी’ आणि आपला “सचिन’, हे समीकरण तेव्हापासून डोक्‍यात घट्ट झालं, नंतर त्यानं ती फेरारी विकली, हे माहिती असूनही! देशी-परदेशी फिरत असतो, हजारो प्रकारच्या गाड्या दिसतात. त्यात कधीकधी “फेरारी’ही दिसते; पण “फेरारी’ पाहिली, की आठवतो, तो आपला “तेंडल्या’च! फेरारी चालवणारा कोणी दिसलाच, तर तो चोरीची फेरारी वापरतोय, असंच जणू मनात येतं! फेरारीवर पहिला हक्क आपल्या “तेंडल्या’चाच!

दिवेआगारला गेलो होतो. सकाळी लवकर उठलो. पायीपायी हॉटेलपासून एखादा किलोमीटर आलो असेन, एका चिरपरिचित पण तत्क्षणी ओळखू न आलेल्या वासानं आसमंत व्यापून टाकला होता. ओळखताच येत नव्हता. रस्त्यातल्या चाफ्याचा, पारिजातकाचा, नारळाचा इतकंच काय, झाडांवरच्या पिकलेल्या आंब्यांचा वास, या सगळ्यांवर मात करत, हा वास नाकातून मनात शिरला. काहीतरी सुखद संवेदना होत होती. छान असं वाटत होतं; पण कशामुळे हे उमजत नव्हतं!—–

रस्त्याजवळच्या एका “वाडी’त, बाहेरच पाणी गरम करायचा एक तांब्याचा “बंब’ धडाडून पेटला होता. धूर सगळीकडे पसरवत होता. एक तर अक्षरशः इसवीसनापूर्वीचा तो बंब बघूनच मी व्याकुळ झालो! मधल्या काळ्या लोखंडी पाईपमधून टाकलेल्या शेणाच्या गोवरीच्या, लाकडाच्या ढलप्यांचा जळण्याचा वास मला भूतकाळात घेऊन गेला! शाळेत असताना सुट्टीत मोठ्या काकांकडे जायचो. त्यांच्याकडे, असाच एक “बंब’ होता. त्या धुराच्या वासानं क्षणात, कित्येक वर्षं ओलांडून, वर्तमानकाळाला फोडून भूतकाळात गेलो! त्या सुट्ट्या आठवल्या, काकांचं घर आठवलं, काकू आठवली, तिच्या पुरणपोळ्या आठवल्या. तिचं आम्हा बालबच्च्यांवर असलेलं निरपेक्ष प्रेम आठवलं. दिवेआगारच्या रम्य सकाळी धुराच्या वासानं नाशिकची प्रेमळ शालनकाकू आठवून दिली!

असंच, पिझ्झा पाहिला, की मला पुण्यातल्या जंगली महाराज रोडवरचा एक भिकारी आठवतो! रात्रीचे दहा वाजले असतील. हा माणूस छानपैकी पिझ्झा खात होता! कोणी उरलेला दिला असावा, वा कोणी दानशुरानं अख्खा न खाता दिला असावा. काहीही असो. तो माणूस “उदरम भरणमं’ या भावनेनं मन लावून तो पिझ्झा खात होता. चव वगैरे त्याच्या दृष्टीनं गौण होतं. त्याचं मन लावून ते पिझ्झा खाणं मनात त्या दोन विजोड गोष्टींची सांगड घालून गेलं! अगदी खुद्द इटलीतल्या मिलानला बावीसशे रुपयांचा पिझ्झा खातानाही, मला तो काळा-पांढरा पट्टेरी ठिगळाचा शर्ट घातलेला, तृप्ततेनं पिझ्झा खाणारा पुण्यातला गरीब माणूसच आठवला!

परवा दिल्लीला मित्राकडे मुक्कामाला होतो. त्याच्या बाथरूममध्ये नारंगी रंगाच्या साबणावर पोपटी रंगाचा साबणाचा छोटा तुकडा चिकटवलेला दिसला. हा असला विजोड साबण बघितला, अन्‌ टचकन डोळ्यात पाणी आलं. एकदम्‌ आई आठवली! साबण विरत आला, हातात येईनासा झाला, की आई नवा साबण काढायची, हा जुना तुकडा त्याला चिटकवायची. मला नाही आवडायचे.””हा काय किडेखाऊपणा?” मी चिडायचो. आमची आर्थिक परिस्थिती छानच होती. गरीबी लांबच; उच्च मध्यमवर्गीयांपेक्षाही उच्चच होतो आम्ही. हे असले प्रकार करायची काही एक गरज नसायची; पण आई ऐकायची नाही.

बादली गळायला लागली, की तिच्या बुडाला डांबर लाव. गळली बादली, की लाव डांबर, असं तिचं चालायचं. काही दिवसांनी बादलीपेक्षा डांबराचंच वजन जास्त व्हायचं! मग ती बादली बाजूनंही चिरली, की त्यात माती भरून तिची कुंडी बनव, आमच्या चपला झिजल्या, की त्या दुरुस्त करणाऱ्यांकडून त्याला ट्रकच्या टायरची टाच लाव, जुन्या कपड्यांच्या पिशव्या शिव, त्यांचाही जीव गेला, की त्याचं पायपुसणं बनव, असे माझ्या भाषेतले “उपद्‌व्याप’ आई सदैव करायची. त्याकाळी किराणा सामान कागदी पुड्यांमध्ये यायचं. त्या पुड्यांचा कागद रद्दीच्या गठ्ठ्यात आणि धागा रिळाला! मी दहावीला आलो, तेव्हा तर वाण्याच्या दुकानातल्यापेक्षा मोठा दोराचा रिळ आमच्या घरी बनला होता!

काही वर्षांपूर्वी आई गेली. जेव्हा होती, तेव्हा बऱ्याच वेळा तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं मोल केले नाही, आणि आता गेली आहे, तर तिच्या सगळ्याच गोष्टी अमोल वाटताहेत!

बाथरूममधून बाहेर आलो. डोळे लाल झाले होते. 

मित्रानं विचारलं: “”काय रे, डोळ्यात साबण गेला का?”

मी म्हणालो: “नाही रे, साबणामागची आई!”

लेखक : अज्ञात 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 1 ☆ श्री मंदार दातार ☆

श्री मंदार दातार 
? इंद्रधनुष्य ?

☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 1 ☆ श्री मंदार दातार ☆

पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे…

महाराष्ट्रात सध्या जी पंचांगे प्रामुख्याने वापरात आहेत ती म्हणजे दाते, कालनिर्णय, निर्णयसागर, महाराष्ट्र पंचांग, रूईकर, लाटकर आणि टिळक पंचांग. त्यांतील शेवटचे, टिळक पंचांग यास वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे. इतर सर्व पंचांगे एका माळेतील आहेत. ती पंचांगे त्या त्या व्यक्तीने व्यक्तिगत साहस वा उपक्रम म्हणून त्यांची प्रसिद्धी वेगवेगळ्या काळी सुरू केली. ती सर्व चित्रा पक्षीय पंचांगे आहेत. टिळक पंचांग हे एकमेव रेवती पक्षाचे पंचांग आहे. चित्रा पंचांग व रेवती पंचांग या संज्ञांची फोड लेखामध्ये पुढे येते. दाते हे प्रमुख पंचांग म्हणून चित्रा पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे पंचांग येथे नमुना म्हणून घेऊ आणि दाते व टिळक या पंचांगांत नेमका फरक काय व कशामुळे ते पाहू.

दाते आणि इतर चित्रा पक्षीय पंचांगे महाराष्ट्रात बहुतांश भागांत वापरली जातात, तर टिळक पंचांग हे प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी, आंजर्ले, कोळथरे, पंचनदी, दाभोळ या भागांत वापरले जाते. त्या गावांतील उत्सव टिळक पंचांगांप्रमाणे तिथीवार धरून साजरे केले जातात आणि तेथील ग्रामस्थ त्याचे कसोशीने पालन करतात. केळशी येथील महालक्ष्मी मंदिरातील उत्सव असो किंवा कोळथरे येथील कोळेश्वरचा उत्सव असो, ते प्रसंग टिळक पंचांगातील तिथीनुसारच होत असतात.

दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत, महाराष्ट्रातील सर्व पंचांगे किंबहुना संपूर्ण भारतातील पंचांगे ही सोळाव्या शतकात रचलेल्या ‘ग्रहलाघव’ या ग्रंथानुसार तयार केली जात. तो ग्रंथ गणेश दैवज्ञ या मराठी माणसाने रचला होता ! त्यानुसार ग्रहगणित करणे तुलनेने सोपे असल्याने तो ग्रंथ पंचांग गणितकर्त्यांमध्ये लोकप्रिय होता. गणित आणि खगोलगणित यांत अनेक क्रांतिकारक शोध सोळाव्या शतकापासून युरोपात लागले. तसेच, आकाशाचे वेध घेण्यासाठी नवनवीन दुर्बिणी उपलब्ध झाल्या. त्यामुळे युरोपातील तज्ज्ञांचे आकाशाचे गणितीय वेध अचूक नोंदले जाऊ लागले; तसेच, अनेक खगोलीय घटनांची गणितीय सिद्धता देणे शक्‍य झाले. ते ज्ञान भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी अंमलाबरोबर आले. तोपर्यंत भारतात पंचांग गणित हे प्रामुख्याने गुरु-शिष्य परंपरेने शिकवले जात असे.

सिद्धांत हा एक ग्रंथ प्रकार आहे. त्यात खगोल शास्त्र, आकाश निरीक्षणे यासाठीचे गणित, सिद्धांत लिहिणाऱ्यांचे स्वत:चे निरीक्षण या गोष्टी असतात. हा खगोलशास्त्राचा सिद्धांत प्रस्थापित करणारा ग्रंथ म्हणता येईल. या ग्रंथावरून थेट पंचांग करणे कठीण असते. त्यासाठी अशा ग्रंथातील प्रस्थापित सिद्धांतावर आधारित करण ग्रंथ करण्यात येतो. करण ग्रंथ हा केवळ पंचांग करण्यासाठी उपयुक्त गणित, खगोल यावर आधारित कोष्टके असा असतो. त्यामुळे पंचांग करणे सोपे असते. ग्रहलाघव हा एक करण ग्रंथ आहे. तो सूर्य सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ग्रहलाघव वापरुन केलेली पंचांगे एका अर्थी सूर्य सिद्धांतावर आधारलेली होती असे म्हणता येते. असेच आर्यभटचा आर्यसिद्धांत, ब्रम्हगुप्तचा ब्रम्ह स्फुटसिद्धांत, वराह मिहीर याने उल्लेख केलेले प्राचीन पाच सिद्धांत असे अनेक सिद्धांत भारतात प्रसिद्ध होते.

प्रथमच, त्या पारंपरिक ज्ञानाची तुलना आधुनिक गणिताचा अभ्यास करून आलेल्या आणि नवीन साधने वापरून प्राप्त केलेल्या निरीक्षणांशी केली जाऊ लागली. पंचांग गणित पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही पद्धतींनी शिकलेले लोक तशी तुलना करू शकत होते. त्यात प्रामुख्याने दोन व्यक्ती होत्या त्या म्हणजे प्रा.केरोपंत छत्रे आणि पं. बापू देव शास्त्री. त्या दोघांनी स्वतंत्रपणे पारंपरिक पंचांग गणित पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न आरंभले. सुरुवातीस, त्या दोघांना विरोध बराच सहन करावा लागला. पण तरुण उच्च शिक्षित जसजसे होऊ लागले तसतशा त्या सुधारणा स्वीकारल्या जाऊ लागल्या. त्या सुधारणा नेमक्‍या काय होत्या? 1. सौर वर्ष सूर्य सिद्धांतानुसार न घेता आधुनिक विज्ञानाने मोजल्याप्रमाणे घेणे (यात वास्तविक फार थोडा फरक आहे, याबद्दल सूर्य सिद्धांतकारांचे कौतुकच करण्यास हवे), 2. वसंत संपातास वार्षिक गती आहे, ती आधुनिक विज्ञानाने मोजल्याप्रमाणे 50.2 सेकंद अशी घेणे (ती सामान्यत: साठ सेकंद घेण्यात येत होती), 3. निरयन राशी चक्र आरंभ रेवती नक्षत्रातील झीटा या ग्रीक अक्षराने ओळखल्या जाणाऱ्या तारखेपासून करावा. या प्रमुख सुधारणा होत्या व त्यामुळे सण आणि उत्सव यांच्या तारखांमध्ये फरक पडणार होता !

क्रमशः…  

लेखक : श्री मंदार दातार 

मो. नं.  9422615876

मो  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्ण… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ कृष्ण…  ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

कृष्ण अंधारात जन्मला. त्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी त्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर सावधचित्त राहायला हवं.

कृष्ण खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही…!

अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच…

चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही. 

कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.

चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ”चालू” आहे असंच म्हणा हवं तर… चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो.

फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे…

तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो,” जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा…” 

अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.

श्रीकृष्ण ” न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार ” अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र ! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन…

विमोह त्यागून कर्मफलांचा, सिद्ध होई पार्था

कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था

भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था—

कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज…

अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो…

यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥

जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार…? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल…

असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगाराचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो…

रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो…कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणूत भरलो…

तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती – अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन…

म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.

कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.

श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.

श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.

आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.

कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही….!

।।जय श्रीकॄष्ण।।

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-1 ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ बालकामगार निषेध दिनानिमित्त… भाग-1☆ सुश्री त्रिशला शहा 

(बालकामगार निषेध दिन (12जून) त्यानिमीत्त)

‘बाळपणीचा काळ सुखाचा’ असं म्हटल जात,कारण या वयात कशाची चिंता,काळजी नसते.खाणे,पिणे,खेळणे आणि शाळेत जाणेएवढच काम लहान मुलांच असत.मोठ्यांना असणाऱ्या काळज्या,समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.पैसे मिळवण,घर चालवण हा त्रास मुलांना नसतो.त्यामुळेच की काय ‘ रम्य ते बालपण’ अस म्हटल जात.पण काही मुलांच्या बाबतीत हे बालपण रम्य नसते.ज्या वयात या मुलांच्या हाती वह्या,पुस्तके असायला हवीत त्या वयात या मुलांना मजूरीवर जाव लागत.

 घरातील पैशाची कमी, उपासमार, गरजेच्या वस्तू न मिळण शाळेच्या फी, पुस्तकासाठी पैसे नसणे अशा परिस्थिती मुळे मुलांना मजूरी करावी लागते. आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्यांना पालकांची मदत मिळत नाही. त्यामुळे सहाजिकच शाळेला  पूर्णविराम देऊन ही मुल, हाँटेलमधे टेबल पुसणे, भांडी घासणे, बांधकामावरच्या विटा उचलणे अशी काम करत रहातात.यालाच बालमजुरी किंवा बालकामगार असे म्हणतात, वयाची ९ वर्षे ते १६ वर्षे वयातील मुलांना बालकामगार म्हणतात.

काही वेळा पालकांना कामानिमित्त स्थलांतर करावे लागते.तसेच पालक शिक्षीत नसतील तर मुलंही शिक्षणापासून वंचित रहातात. त्यामुळे ही मुले मजूरीकडे वळतात.

बालमजूरी किंवा बालकामगार ही जागतिक समस्या आहे. पण अजूनही हा प्रश्न म्हणावा तितका सुटला नाही. भारतासारख्या संख्येने जास्त असलेल्या गरीब लोकांमधे ही समस्या अतिशय मोठ्या प्रमाणात दिसून येते. बऱ्याच गावात विशेषतः खेड्यामध्ये लहान मुलांना कामावर जावे लागते. उसतोड कामगारांची मुलं, बांधकामावर कामाला जाणाऱ्यांची मुलं बालमजूर म्हणून आई वडिलांबरोबर कामाला जातात. बरीच मुलं हाँटेल, कार्यालय, बार, वीटभट्टी, फँक्टरी अशा ठिकाणी मजूरी करताना दिसतात. फटाक्यांच्या फँक्टरीत तर असंख्य मुले काम करतात. अशा फँक्टरीमधे दुर्दैवाने काही अपघात झाला तर या मुलांना कायमचं अपंगत्व येण्याचीही शक्यता असते.

आईवडिलांचे कमी उत्पन्न,दारु पिणारे वडील, अनाथ मुले,घरातील कौटुंबिक वादविवाद, हिंसाचार अशा कारणांमुळे ही मुलं बालमजूर म्हणून काम करताना दिसतात.काही मुलं टि.व्ही.,सिनेमाच्या वेडापायी घरातून पळून जातात आणि त्यांना कुठेच आधार नाही मिळाला तर ते आपोआपचं मजूरीकडे वळतात.

क्रमशः…

(लेख 12 जून ला प्रसिद्ध करू शकलो नाही.क्षमस्व. संपादक मंडळ)

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ट्रॅफिक… एकांताशी गप्पा — ’फुगेवाला’ ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ ट्रॅफिक… एकांताशी गप्पा —फुगेवाला ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

मी नेहमीच असं गंमतीत म्हणते, ‘पुणेकर सगळं टाळू शकतील पण एक गोष्ट मात्र ते कधीच टाळू शकत नाहीत आणि ते म्हणजे ट्रॅफिक… ते जर कुणी टाळू शकत असेल किंवा आत्तापर्यंत एखाद्याला ते लागलं नसेल तर त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येच  करायला हवी’, इतकं ते आपल्या जगण्याचा भाग आहे. म्हणजे कुठंतरी आपण थांबणं आवश्यक असल्यामुळे, कुठंतरी जाम झाल्यामुळे… काहीतरी चुकतंय याची जी जाणीव आपल्याला होते ती सुधारण्याचा जो आपण प्रयत्न करतो तो फार  महत्त्वाचा असतो. म्हणून सगळ्याच गोष्टी सुरळीत होण्यापेक्षा कधी कधी अडथळे येणं हे आपल्यासाठी आवश्यक असतं, फक्त ते आपल्याला जाणता आलं पाहिजे.  

मी जेव्हा ट्रॅफिकमध्ये अडकते तेव्हा मी आजूबाजूला बघते तर जाणवतं, अरे हे नवीन ठिकाण आहे.  हे पूर्वी कधी आपण या निवांतपणे पाहिलं नव्हतं. आपण स्वतःहून कधी इकडे पाहिलंच नसतं. धावत्या गाडीतून एखादी गोष्ट बघणं आणि तिथे रेंगाळून ती गोष्ट बघणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. गाडीच्या वेगाबरोबर आपल्या मनाचा वेग इतका जबरदस्त असतो की आपण त्या क्षणी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची दखलसुद्धा घेत नाही.  पण ज्यावेळी आपल्याला तिथं थांबण्याची वेळ येते तेव्हा जे आपल्याला दिसतं…  जे अनुभवतो… ते एरवी आपण कधीच मुद्दाम पाहिलं, अनुभवलं नसतं. 

त्यादिवशी असंच ट्रॅफिक लागलं. सिग्नल काही केल्या लवकर सुटेना. बहुदा काहीतरी घोळ झाला होता. आणि सगळेजण वैतागले होते. जो तो आपापलं मन रिझवण्याचा पयत्न करत होता… कुणी मध्येच रस्त्यात उतरून हातवारे करत वाहनांना मार्गदर्शन करत होतं. कुणी फोनवर मोठ्याने बोलत होतं, कुणी हॉर्न वाजवत होतं, कुणी गाडी साईडला घ्यायला सांगतंय, कुणी फूटपाथवरून गाडी घुसवण्याचा प्रयत्न करत होतं, असे सगळेच आपापल्यापरीनं प्रयत्न करत होते. सरतेशेवटी त्यांच्या लक्षात आलं की आता मूळ  कोंडी सुटल्याशिवाय जाता येणार नाही. आणि मग सगळेच एकदम शांत झाले. मला जाणवलं की ही वेळ माझ्यासाठीचा खास निवांतपणा घेऊन येणारी आहे. डोक्यात चाललेल्या विचारांना पण या सिग्नलमुळे ब्रेक लागला होता. आणि आता काहीतरी नवीन बघायला मिळेल असं वाटत असतानाच अचानक तो दिसला…  इतक्या शांतपणे आकाशाकडे नजर लावून उभा होता की जणू काही घडलंच नाहीये. फक्त त्या त्याच्या दणकट सायकलच्या हॅन्डलवर मागेपुढे दोऱ्याने घट्ट बांधेलेले रंगीबेरंगी आणि निरनिराळ्या आकाराचे फुगे तेवढे वाऱ्यावर उडत होते.

सगळ्यांनाच सक्तीनं स्थिर व्हायला लावलेलं असताना वाऱ्यावर उडणारे ते फुगे मला फारच लक्षवेधक वाटले. मला या परिस्थितीत काहीतरी विरोधाभास… विसंगती दिसली. सुदैवाने माझी रिक्षा त्याच्या बऱ्यापैकी जवळ आली होती. त्याच्या कॅरिअरला बांधलेले फुगे माझ्या रिक्षेत डोकावून त्या वातावरणात एक हलकेपणा आणण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटलं. आणि मी नकळतच त्याच्याकडे निरखून पाहू लागले. तसा तो पाठमोरा होता. मध्यम उंचीचा, रापलेला रंग, काटकुळा… विचार आला, आजपर्यंत आपण कधी जाडजूड फुगेवाला पाहिलाय का? मी आठवू लागले पण आठवेना… पांढराच पण मळलेला शर्ट, खाली मळकी पोटरीपर्यंत दुमडलेली पँट… राकट हात, त्यांनी पकडलेल्या हॅन्डलला लटकवलेल्या पिशव्या, त्यातून बाहेर येऊ पाहणारे फुगे. एका साध्याशा पिशवीत पाण्याची बाटली दिसली आणि अजूनही त्यात काहीबाही होतं पण त्याचा मला अंदाज लावता येईना…. आणि माझं मन फुगेवालाच्या आयुष्याचं अनॅलिसिस करू लागलं.   

किती उत्पन्न असेल, त्यात सगळ्यांचं  कसं भागवत असतील… याची स्वप्नं काय असतील… तो समाधानी असेल का… रोजच्या कामात तो कसा मन रमवत असेल… इतक्यात कसलातरी आवाज आला म्हणून त्यानं मागे फुग्यांकडे वळून पाहिलं, त्यावेळी मला त्याच्या डोळ्यात फुग्यांविषयी ममत्व दिसलं. एक मन म्हणालं, छ्या! असं काही नाही. तुला तसं वाटतंय… दुसरं मन म्हणालं का नाही तसं ? अरे माणूस आहे तो… माणसं चांगली असतात. या द्वंद्वात मी सापडले असताना  पटकन काहीतरी हालचाल झाली मी दचकले. बघते तो इतक्या गोंधळात, गोंगाटात त्या फुगेवाल्याला एका लहान मुलाचा आवाज आला आणि त्यानं पटकन फुगा काढून त्याला दाखवला . मी बघू लागले याला कुठे दिसतोय मुलगा… मला काही दिसेना. आता रिक्षेवालाही बघू लागला. त्यालाही तो दिसेना. हा इकडून खाणाखुणा करून काहीतरी सांगत होता… त्याच्या चेहऱ्यावरून तरी तो फुगा विकला जाणार आहे असं वाटत होतं.  या धामधुमीत सिग्नल सुटला… सगळेजण आता पुढे सरकू लागले. आणि आम्ही पुढे निघून आलो.   

पूर्ण प्रवासभर माझ्या मनात प्रश्नच प्रश्न…

जाड फुगेवाला कुणी पाहिलाय का? 

यांची स्वप्नं काय असतात? 

फक्त फुगे विकणाऱ्याचं एखादं शानदार दुकान असू शकतं का ?….

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अन्न हे पूर्णब्रह्म‘ ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ अन्न हे पूर्णब्रह्म ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

एका लग्नाला गेलो होतो . जेवणाचा तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते . युनिफॉर्म घातलेल्या  सुंदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या . 

पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला …. हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो ….. 

तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .

सौ. ने हात खेचत म्हटले ” अहो जरा दमाने घ्या , मिळते म्हणून सर्व घेऊ नका , मग फेकून द्याल ” 

मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली . थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले ….. अधिक काही खाववेना . नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो . रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता …..

माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला—-

“सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??”

अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले . 

” ही तुमची डिश आहे ना ?? “

” होय,” मी परत उत्तरलो .

” हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ??  म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल ” 

मी चकित झालो . थोडा रागही आला . त्याच रागात बोललो, ” अहो थोडे राहिले अन्न ? काय हरकत आहे .

नाही अंदाज आला .म्हणून काय घरी न्यायचं ?? “ 

” रागावू नका ” तो गोड हसत म्हणाला .“ हे मोठ्यांच लग्न आहे . पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला . हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे . बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही . कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ . आमची 25 माणसे .  पण तरीही अन्न उरणारच . आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न !! त्याचे काय ??  राग मानू नका . पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार  दिवस आम्ही मेहनत करतोय , उत्कृष्ट प्रतीची भाजी , मसाले खरेदी केले. आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तम प्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत…. होय ,त्यासाठी आम्ही  मागू तेवढे पैसे तुम्ही  दिलेत हे मान्य आहे . पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत . आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा …..म्हणून आम्ही ही शक्कल लढवली , हॉटेलमध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता…….. का ???  कारण तुम्ही पैसे मोजलेले असता.  मग इथे का नाही ??  कारण ते दुसऱ्याने दिले म्हणून का ?? “

” आणि हो , यातील काहीही यजमानांना माहित नाही . हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका . पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा, नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा .” 

मला काही सुचेना काय बोलावे . थोडी लाजही वाटली आणि पटतही होते —-

खरेच भारतातच काय, आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकताहेत आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय …. 

इतक्यात सौ .म्हणाली  “बरोबर बोलताय भाऊ , यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे , तेव्हा करण्याला किती वेदना होतात . द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला . आता रात्रीचे जेवण होईल . मेहनत , इंधन सर्व काही वाचेल .

 थोड्या वेळाने आम्ही  वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो ….

(आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता…. 

एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच…. 

पण भूभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही )  

 

—अन्नावाचून , अन्न पिकवता आत्महत्या करतोय … 

अन्न हे पूर्णब्रम्ह  ते वाया घालवू नका.  🙏

 

संग्राहक : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print