मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 23 – १. केल्याने देशाटण .. ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 23 – परिव्राजक –१. केल्याने देशाटण .. ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

तीर्थंभ्रमणाला निघायच्या आधी पण नरेंद्रनाथ आंटपूर, वैद्यनाथ, शिमूलतला इथे कित्येकदा आले होते. उजाडल्यानंतर सूर्य किरणे सर्व दिशांना पसरतात हे सांगायची गरज नसते. तसे स्वामीजी जिथे जिथे जातील तिथे तिथे प्रभाव पाडत असत. असाच अनुभव ते फिरलेल्या प्रत्येक प्रांतात दिसतो. बिहार प्रांत फिरत फिरत ते हिंदू भारतभूमीचं हृदय समजल्या जाणार्‍या काशीला आले. इथे ते संस्कृत भाषेचे पंडित आणि साहित्य व वेदांत पारंगत असलेले सद्गृहस्थ श्री प्रमदादास मित्र यांच्याकडे राहिले. स्वामीजींना त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदरभाव वाटू लागला. पुढे पुढे तर ते वैदिक धर्म आणि तत्वज्ञान याबद्दल काही शंका असली की ते प्रमदादास यांना पत्र लिहून विचारात असत. आपले आजोबा दुर्गाप्रसाद हे संन्यास घेतल्यावर काशीत आले होते. श्रीरामकृष्ण पण इथे येऊन गेले होते. तिथे मद्रासी, पंजाबी, बंगाली, गुजराथी, मराठी हिंदुस्तानी अशी प्रभृती सर्वजण, आचारांची भिन्नता असूनही एकाच उद्देशाने विश्वेश्वराच्या मंदिरात एकत्र येत असत. यात नरेंद्रनाथांना या विविध लोकांमधला ऐक्याचा विशेष गुण भावला. म्हणूनच त्यांना सगळीकडे फिरून भारत जाणून घ्यावसा वाटला होता.

शिवाय इंग्रजांची सत्ता, गुलामी असताना वर्तमान अवस्थेत, देशातील आध्यात्मिक संस्कृती कशी आहे, सामान्य लोक कसे जगताहेत? शिक्षणाची काय परिस्थिति आहे? सनातन धर्म सगळीकडे कसा आहे? याची सगळीकडे हिंडून माहिती करून घ्यावीशी वाटली. त्यासाठी ते इथून निघून कन्याकुमारी पर्यन्त शहरे, खेडी, विविध लोक, शेतकरी, गरीब, दीन दुबळे, राजे रजवाडे, संस्थानिक आणि जे जे आवश्यक त्यांच्या भेटी घेत अवलोकन करता करता भ्रमण करत होते.

उत्तरेत फिरून झाल्यावर ते शरयू तीरावरच्या अयोध्येला येऊन पोहोचले. काशी आणि अयोध्या ही धर्मक्षेत्र होती. त्यामुळे स्वामीजींचे आध्यात्मिक मन तिथे रमले. ‘अयोध्या’ जिच्या मातीशी सूर्यवंशी राजांच्या गौरवाची स्मृती जोडलेली आहे. शरयू नदीच्या तीरावरून आणि घाटावरील विविध मंदिरातून फिरतांना त्यांच्या डोळ्यासमोर प्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्रच उभे राहिले. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भाऊ, अशा प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्येत आल्याबरोबरच त्यांना लहानपणची रामसीतेची भक्ती, रामायण प्रेम, वीरभक्त श्री हनुमानवरची गाढ श्रद्धा आणि आईच्या तोंडून ऐकलेल्या रामाच्या कथा सारे सारे आठवले असणारच. काही दिवस इथे त्यांनी रामायत संन्याशांच्या समवेत श्रीरामनामसंकीर्तनात घालवून पुढे ते ऑगस्ट१८८८ मध्ये लखनौ- आगरा मार्गाने पायी पायी चालत वृंदावनच्या दिशेने निघाले.    

लखनौला त्यांनी बागा, मशिदी, नबाबाचे प्रासाद बघितले. आग्र्याला आल्यावर तिथल्या शिल्प सौंदर्याचा जगप्रसिद्ध नमुना ‘ताजमहाल’ मोगलकालीन इमारती, किल्ले पहिले.  मोगल साम्राज्याचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. लखनौ आणि आग्रा या ऐतिहासिक स्थळं सुद्धा  त्यांच्या मनात भरली. कारण ती भारताच्या इतिहासाच्या पर्वाची महत्वाची खूण होती आणि स्वामीजी त्याबद्दल पण जागरूक होते. म्हणून एक वैभवशाली साम्राज्याची स्मृती म्हणून ते पाहत होते.

शिवाची काशी पाहिली, श्रीरामची अयोध्या पाहिली आता भगवान श्री कृष्णाच्या वृंदावनला स्वामीजी  पोहोचले. राधा कृष्णाची लीलाभूमी असलेल्या वृंदावनात, मर्यादित परिसरात असलेले विविध प्रकारचे, भिन्न काळात बांधले गेलेले वास्तूकलेचे, अनेक मंदिरांचे नमुने त्यांना पाहायला मिळाले. वृंदावनला ते बलराम बसुंच्या पूर्वजांनी बांधलेल्या कुंजामध्ये राहिले. तिथे यमुनेच्या वळवंटात असो की भोवताल च्या परीसरात असो सगळीकडेच, श्रीकृष्णाच्या बासरीचा मधुर ध्वनी येतोय असे वाटावे अशा काव्यात्मक आणि भक्तिपूर्ण वातावरण त्यांनी अनुभवले. गोवर्धन पर्वताला त्यांनी प्रदक्षिणा घातली. तेंव्हाच त्यांनी मनाशी संकल्प केला की, कोणाकडेही भिक्षा मागायची नाही. कोणी आपणहून आणून दिले तरच त्या अन्नाचा स्वीकार करायचा. हे बिकट व्रत त्यांनी घेतले. एकदा तर त्यांना पाच दिवस उपाशी राहावे लागले होते. पण इथे त्यांनी दोन वेळा परमेश्वर भक्तीचा ईश्वरी अनुभव घेतला आणि श्रीकृष्णाची भक्ती आणखीनच दृढ झाली.

पुढे ते हरिद्वारला गेले. वाटेत जाता जाता ते हाथरस च्या स्थानकावर बसले असताना, त्यांना थकलेल्या अवस्थेत स्थानकाचे उपप्रमुख असलेले शरदचंद्र गुप्त यांनी पाहिले. आणि, “स्वामीजी आपल्याला भूक लागलेली दिसते आपण माझ्या घरी चलावे” अशी विनंती केली. स्वामीजींनी लगेच हो म्हटले आणि त्यांच्या घरी गेले. स्वामीजींचे व्यक्तिमत्व बघून शरदचंद्र गुप्त आकर्षित झाले होते , त्यांनी स्वामीजींना काही दिवस इथे राहावे असा आग्रह केल्याने ते खरच तिथे राहिले. सर्व बंगाली लोक संध्याकाळी एकत्र जमत. आपला धर्म आणि समाज यावरील सद्यस्थितीबद्दल  स्वामीजी बोलत. आपल्या मधुर आवाजात गीतं म्हणत. येणारे सर्व बंगाली मोहित होऊन जात. त्यांच्यातील भांडणे जाऊन एकोपा निर्माण झाला. 

एकदा चिंतेत असताना शरदचंद्रांनी स्वामीजींना पाहिलं आणि विचारलं, “आपण एव्हढे कसल्या विचारात आहात?” स्वामीजी म्हणाले, “मला खूप काम करायचं आहे. पण माझी शक्ती कमी. काम मोठं आहे. मातृभूमीचं पुनरुत्थान घडवून आणायच आहे. तीचं आध्यात्मिक सामर्थ्य क्षीण झालं आहे. सगळा समाज भुकेकंगाल आहे. भारत चैतन्यशाली झाला पाहिजे. अध्यात्मिकतेच्या बळावर त्यानं सारं जग जिंकलं पाहिजे”. अशा प्रकारचे संवाद होत होते. चर्चा होत होत्या. काही दिवसांनी  स्वामीजी तिथून निघतो म्हटल्यावर, शरदचंद्र जाऊ नका म्हणून विनवणी करू लागले आणि ‘मला आपला शिष्य करून घ्या’ असेही म्हणू लागले. तुम्ही जिथं जाल तिथं मी तुमच्या मागोमाग येईन हा त्यांचा दृढ निश्चय ऐकून, “शेवटी तुम्ही माझ्याबरोबर येण्याचा आग्रहच धरता आहात तर घ्या हे भिक्षा पात्र आणि स्थानकातले जे हमाल आहेत त्यांच्या दरात जाऊन भिक्षा मागून आणा” असे स्वामीजी म्हटल्याबरोबर, शरदचंद्र तडक उठले आणि भिक्षा पात्र घेऊन सर्वांकडून भिक्षा मागून आणली. स्वामीजी अत्यंत खुश झाले. त्यांनी शरदचंद्रांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. असे शरदचंद्र गुप्त हे स्वामीजींचे पहिले शिष्य झाले, आणि मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन, नोकरीचा राजीनामा देऊन, स्वामीजीं बरोबर ते हाथरस सोडून हृषीकेशला आले. त्यांचे नाव स्वामी सदानंद असे ठेवण्यात आले. असा सुरू होता स्वामीजींचा प्रवास .

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 2 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 2 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे

हा दिवस जाहीर झाल्यापासून प्रत्येक वर्षी आम्ही हा दिवस याचना करणाऱ्या लोकांसाठी आयोजित करत आहोत… ! 

डॉ मनीषा सोनवणे ही खरंतर योगाची मास्टर ट्रेनर…. मास्टर ट्रेनर म्हणजे शिक्षकांचा शिक्षक…. !

मागील तीन वर्षांपूर्वी एका पत्रकाराने मनीषाला म्हटले होते, ‘अहो तुम्ही मास्टर ट्रेनर आहात…. सेलिब्रिटींचे योगासन घेण्याऐवजी, भीक मागणाऱ्या लोकांची योगासने काय घेत बसले आहात ?

मनीषा म्हणाली होती, ‘भीक मागणाऱ्या लोकांनाच आम्हाला सेलिब्रिटी बनवायचं आहे … ‘ 

—तर… आजच्या दिवशी आम्ही आमच्या वृद्ध आई-वडिलांना, ज्यांना भीक मागावी लागते अशांना, लालमहाल परिसर आणि शनिवार वाड्यावर घेऊन आलो… तिथे योगाचे धडे दिले…. नाचलो…. विठ्ठल नामाचा गजर केला….!

माझे बंधुतुल्य मित्र श्री धनंजय देशपांडे उर्फ डीडी हे हा कार्यक्रम लाईव्ह करत होते…. हा माणूस म्हणजे हरहुन्नरी… ! या माणसाला शब्दात कसा पकडू ??? इथे शब्द थिटे होतात…

त्यांनी मला विचारलं हाच एरिया का निवडला ? —लाल महाल आणि शनिवार वाडा ही इतिहासाच्या हृदयातली दोन स्थाने आहेत…. 

तशीच आई आणि बाप ही  आपल्या प्रत्येकाच्याच हृदयातली दोन स्थानं आहेत… 

आई बापाचा सन्मान करायचा…. तर याहून दुसरे श्रेष्ठ स्थान नाही, म्हणून हा एरिया निवडला…. !

—यावर डिडीनी मला घट्ट मिठी मारली…. ! 

कृष्ण सुदाम्याची ती भेट होती… मला या निमित्ताने आज कृष्ण भेटला…. ! 

श्री नितीन शिंदे, मधु तारा सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष…. अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग…. हा माणूस सध्या कोट्याधीश आहे…. पैशाने आणि मनानेसुद्धा !

हा माणूस रिक्षा पंचायतीचा पुणे जिल्हाप्रमुख आहे ! 

यांना कोणी विचारले, तुम्ही काय करता ?  तर हे बेधडक सांगतात, ‘काय नाय ओ…. मी रिक्षा चालवतो… !’ 

यावरून एखाद्याला वाटतं हे  “रिक्षावाले काका” आहेत…

नाही… , कोट्याधीश असून हा माणूस दिवसभर स्वतः रिक्षा चालवतो…. आणि रस्त्यात अडल्या नडल्या, अंध-अपंग यांना दवाखान्यात स्वखर्चाने ॲडमिट करतो,  कोणताही कॅन्सर पेशंट असेल तर त्याला ऍडमिट करून त्याच्या ट्रीटमेंटचा खर्च ते स्वतः करतात… 

आज वाटण्यासाठी किराणा मालाची पोती आम्ही आणली होती… 

या वेड्या माणसाने शंभर शंभर किलोंची ही पोती स्वतःच्या पाठीवर वाहून आणली…. 

मी जरा रागावून माझ्या या मित्राला म्हणालो, ‘तुम्ही कशाला त्रास घेतला ? वेडे आहात का ? 

ते म्हणाले…., ‘बास्स का राव डॉक्टर …. माझे पूर्वीचे निम्मे आयुष्य हमाली करण्यात गेले…’ 

“धन्याचा तो माल…. मी भारवाही हमाल …. “

या “येड्या” माणसाच्या मी पायाशी झुकलो आणि त्याने मला उठवून हृदयाशी लावलं …. !

ही आणि अशीच अनेक “वेडी” माणसं आम्हाला आज भेटून गेली… पाठीवर हात ठेवले….

श्री प्रभाकर पाटील सर, सौ विजयाताई जोशी, श्री जुगल राठी सर, डॉ बजाज सर,  सौ गौरीताई पेंडसे, श्री बंकटलाल मुंदडा,  सौ आरोही दिवेकर…. आणखी किती नावे लिहू? 

यातील प्रत्येक व्यक्ती हे एक स्वतंत्र पुस्तक आहे…. 

या प्रत्येक व्यक्तिमत्वास शब्दात बांधण्यास मी असमर्थ आहे…. !

आजच्या योग दिनानिमित्त आलेले सर्व माझे आईबाप हे मला “वारकरी” दिसत होते…

आमच्याकडे तुळशीमाळ नव्हती…. म्हणून आम्ही त्यांच्या गळ्याभोवती हात गुंफले….

टाळ सुध्दा नव्हते आमच्याकडे… मग आम्ही टाळ्या वाजवल्या…. 

याचना करणाऱ्या या आई बापाच्या पायाखालची माती अबीर बुक्का म्हणून आम्ही आज कपाळाला लावली….

सर्व भेटलेल्या आईंनी डोक्यावरून हात फिरवून कडाकडा बोटे मोडली आणि तिथे मृदंग वाजत असल्याचा भास झाला….. आम्ही फुगड्या घातल्या नाहीत…. परंतु रिंगण करून खेळलो….  जणू…  

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई I

नाचती वैष्णव “आई” रे II

मनीषाच्या डोईवर “तुळशी वृंदावन” नव्हते म्हणूनच की काय …. कित्येक आईंनी तिच्या डोईवर पदर धरला….

शेवटी अल्पोपहार करवून… सर्वांना शिधा दिला ! 

सर्व आईंना नमस्कार करण्यासाठी आम्ही त्यांच्या पायाशी झुकलो….  त्यांनी खांदे धरून उठवत आम्हाला पदरात घेतलं…. जणू “माऊली” भेटली… ! 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, “भिक्षेकरी आणि गावकरी” ही दोन विरुद्ध टोक आम्ही यानिमित्ताने जोडण्याचा प्रयत्न केला…! 

लाचारीची आहुती वाहून, स्वाभिमानाचा यज्ञ पेटवण्याचा प्रयत्न केला…. 

“Humanity” म्हणजे काय ? हे आम्हाला कळत नाही….  पण माणूस म्हणून जगण्या – जगवण्याचा आम्ही प्रयत्न केला….. या वृद्ध आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचे, समाधानाचे हसू आज पाहिले आणि आम्हाला इथेच अख्खं पंढरपुर दिसू लागलं… 

सरतेशेवटी गर्दीच्या गोंगाटात…. भरधाव वाहनांमधून वाट काढत, त्यांच्या हाताला धरून आम्ही त्यांना रस्ता क्रॉस करून दिला… 

जाताना त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहून सहज मनात विचार आला…. खरंच रस्ता कोणी कोणाला क्रॉस करून दिला ? 

प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईने आमचा हात धरून आम्हालाच गर्दीचा हा रस्ता क्रॉस करवून दिला होता…. 

परतीच्या प्रवासाला चाललेली ती पाऊले पाहून….विठ्ठल-रखुमाईच्या चरणांचा साक्षात्कार झाला…. 

आम्ही मग इथे नतमस्तक जाहलो… ! 

— समाप्त —  

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

२१ जून २०२२

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फणसकिंग… श्री प्रदीप कोळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे – जोशी ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ फणसकिंग… श्री प्रदीप कोळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे – जोशी

हरिश्चंद्र देसाई यांच्या ‘झापडे’ येथील बागेला दिलेल्या भेटीत उलगडला गेला तो एका अवलीयाचा “शासकीय कर्मचारी (एक्सरे टेक्निशियन) ते फणसकिंग” असा थक्क करणारा प्रवास.

 एक शेतकरी वयाच्या 55 व्या वर्षी फणस लागवडीचा निर्णय घेतो. खरं तर हे निवृत्तीचे वेध लागणारे आणि नातवंडाच्यात रमण्याचे वय. पण हा माणूस या वयात देश-विदेशातील फणसाच्या जातीचा अभ्यास करतो, त्या बहुतांश फणसाच्या जातीची रोपे मिळवतो..अश्या 70 ते 80 प्रकारच्या फणसाच्या जातीची, 3000 हजार फणसाची झाडे आपल्या झापडे येथील 13 एकर जागेत लावतो.

बरं, एवढं करून एखादा माणूस फणसाच्या फळाची, त्याच्यापासून मिळणा-या  उत्पन्नाची वाट पहात कोकणी शेतक-यासारखा निवांत राहील ना! पण, हा वेडा माणूस आपल्या IAS ची परिक्षा देत असलेल्या मुलाला चक्क नोकरीचा नाद सोड सांगतो. त्याला जॅकफ्रूट इंटरनॅशनल परिषदेला घेऊन जातो. मुलाचे मन परिवर्तन करण्यात यशस्वी होतो आणि मुलाच्या साथीने महाराष्ट्रातील “जॅकफ्रूटकिंग” म्हणून आपले आणि कोकणचे नाव जगाच्या नकाशावर आणतो.

बरं, हा फणसाच्या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस – मग जगाला फणस लागवडीचे पर्यावरणविषयक आरोग्यविषयक फायदे पटवून देतो. उभ्या महाराष्ट्रात फणस लागवड शेतक-यानी करावी म्हणून फणसाची रोपे तयार करतो. अशी हजारो रोपे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला पुरवतो.                                                          

आता यंदा ह्या माणसाने साठी पार केली. तुम्ही म्हणाल, आता शेतकरी म्हणून याने क्षितीज गाठलंय, आता स्वतःला सिद्ध करायचे काय बाकी राहिलं आहे ? —- पण, संतुष्ट रहाणे म्हणजे जणू शरीराला जडलेली व्याधी असा ह्या माणसाचा पक्का समज असावा—–

म्हणून हा हिमाचल प्रदेशला जातो. तेथील दर्जेदार सफरचंदाची रोपे आणतो आणि आपल्या नर्सरीत लावतो. मशागत करतो. आपल्या 900 काजू झाडांच्यामधे सफरचंदाची यशस्वी लागवड करून दाखवेन, असे छातीठोकपणे सांगतो. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि देहबोलीतला आत्मविश्वास आपली खात्री पटवतो . 

शेतीत अभिनव प्रयोग करणे आणि ते यशस्वी करून दाखवण्याचा छंद जडलेली ही वल्ली. हा एक दिवस जंगल साफ करायला घेतो आणि ठरवतो यातील एकही जंगली झाड मी तोडणार नाही, पण यातून उत्पन्नही मिळवेन.

हा याचा आणखीन एक संकल्प..! ‘या झाडांवर (नैसर्गिक स्टीक’वर) मी काळीमिरीच्या (ब्लॅकपेपर) वेली सोडेन, मी येथे कृषी-पर्यटन सुरू करेन.’ हे त्यांचे आत्मविश्वासपूर्वक बोलणे ऐकल्यावर, जिद्दीला सलाम करणे एवढे एकच काम आपलं रहातं.

फणस हेच भविष्यात माणसाचे अन्न असेल असे तत्वज्ञान सांगून हा माणूस थांबत नाही, तर पिकलेल्या फणसापेक्षा कच्चा फणस माणसाची भूक भागवेल.. असा सिद्धांत मांडत, आपल्या बागेत  फणासापासून कुरकुरित चिप्स बनवायचा प्लॅन्ट टाकतो. फणसापासून बिर्याणी ते कबाब, पकोडा ते डोसा आणि आईस्क्रीम ते मिठाई आणि असेच अन्य खाद्यपदार्थ कसे बनवता येतील याचा ध्यास घेऊन माहिती घेत रहातो…

“पुरूषाचे नशीब पाते-यात” अशी एक जुनी म्हण आहे. ती म्हण हा माणूस सिद्ध करण्यासाठी जणू इरेला पेटला आहे की काय? हे यांच्या शेतीतील कारवाया ऐकून/पाहून वाटते…. चक्क फणसाची हिरवी पाने हा माणूस टनच्या टन विकतो.

आंतरराष्ट्रीय कंपनीची चालून आलेली पार्टनरशीप.. बघू नंतर म्हणून टाळतो. तर दुसरीकडे.. काजूच्या झाडांचा पालापातेरा, जो कधीच कुजत नाही, त्याचे हा खत म्हणून तयार करायच्या मागे लागतो… ही खतनिर्मीती भविष्यात फक्त हाच माणूस करू शकेल. कारण हा शेतीमधला ‘एडिसन’ आहे.  

‘कल्पवृक्ष कन्येसाठी’च्या ऐवजी हा सासू-सास-यांना फणस द्या म्हणतो आणि फणस देखील कसा बहुगुणी आहे सांगत  सासुरवाडीकडून आणलेल्या फणसाच्या जातीपासून “देसाई कप्पा” नावाची फणसाची नवी जात विकसित करतो आणि थेट कल्पवृक्षांच्या माहेरघरात केरळात जाऊन विकतो. 

समस्या, अडचण हे शब्द या माणसाला कुठल्याही शिक्षकाने शिकवले नसावेत किंवा हा त्या दिवशी वर्गात गैरहजर असावा, यावर मी ठाम आहे. अहो, माकडांचा बंदोबस्त असो, गवा – रेड्यांचा उच्छाद असो, या माणसाकडे जालीम (रामबाण नको, संवेदनशील आहे) उपाय या माणसाकडून जाणून घ्यावा.

बरं, तांत्रिक समस्या म्हणाल तर त्यात हा टेक्निशियनचा बाप. हजारो मीटर विद्युतवहन विनाघट कसे करावे, हे प्रात्यक्षिकासह तुम्हाला दाखवून देतो..

एवढ्याने स्तंभित होऊन जाऊ नका, तुम्हाला हा माणूस फणासाची पिकलेली पिवळी पाने विकत घ्यायला लावणार आहे…. अठळा बदामच्या भावात विकणार आहे आणि फणसाचा समानार्थी शब्द हरिश्चंद्र देसाई असा तुमच्या शब्दकोषात बदल करायला भाग पाडणार आहे.

खरं सांगतो, एखाद्या फळझाडावर वेड्यासारखं प्रेम करणारी अशी व्यक्ती उभ्या आयुष्यात, @57 मी पाहिलेली नाही. या साठ वर्षाच्या तरुणाला तारूण्य, उर्जा, जिद्द, आत्मविश्वास ईश्वर मुक्तहस्ते प्रदान करेल यात शंका नाही. कारण, फणसाशी इमान राखणारा हा “फणस-राजा” हरिश्चंद्र या वरदानास पात्र आहे. 

लेखक  – प्रदीप कोळेकर, संस्थापक – माय राजापूर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुम्ही श्रीमंत आहात की गरीब? ☆ मेघःशाम सोनवणे ☆

? विविधा ? 

☆  तुम्ही श्रीमंत आहात की गरीब? ☆ मेघःशाम सोनवणे ☆ 

तुम्ही श्रीमंत आहात की गरीब!

माझी मुलगी गरीब माणसाशी लग्न का करू शकत नाही? -एलोन मस्क.

एलोन मस्क सांगतात की त्यांची मुलगी गरीब माणसाशी लग्न का करू शकत नाही.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेत ‘वित्त आणि गुंतवणूक’ या विषयावर एक परिषद झाली होती. वक्त्यांपैकी एक होते एलोन मस्क आणि प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की सर्वजण हसले. प्रश्न होता, “तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात, तुमच्या मुलीने गरीब किंवा शामळू पुरुषाशी लग्न केले तर तुम्ही ते मान्य कराल का?.”

त्यांनी दिलेले उत्तर आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी बदल घडवू शकते.

एलोन मस्क म्हणाले, “सर्वप्रथम हे समजून घ्या की, ‘संपत्ती’ म्हणजे आपल्या बँकेच्या खात्यात खूप पैसे असणे नव्हे. संपत्ती ही प्रामुख्याने संपत्ती निर्माण करण्याचे एक साधन असते.

उदाहरणार्थ लॉटरी किंवा जुगार जिंकणारी व्यक्ती. जरी त्याने शंभर कोटी जिंकले तरी तो श्रीमंत माणूस होत नाही: तो खूप पैसा असलेला गरीब माणूस आहे. कारण लॉटरी चे बक्षीस मिळाल्याने करोडपती झालेले नव्वद टक्के लोक पाच वर्षांनंतर पुन्हा गरीब झालेले आढळून आले आहे.

आपल्याकडे पैसे नसूनही श्रीमंत असलेल्या अनेक व्यक्तीही आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर बहुतेक उद्योजकांचे देता येईल. त्यांच्याकडे पैसा नसतानाही ते संपत्तीच्या मार्गावर अग्रेसर आहेत, कारण ते त्यांची आर्थिक बुद्धिमत्ता विकसित करत आहेत आणि ती म्हणजे संपत्ती होय.

श्रीमंत आणि गरीब कसे वेगळे आहेत? सोप्या भाषेत सांगायचे तर: श्रीमंत अजून श्रीमंत होण्यासाठी मरतात, तर गरीब हे श्रीमंत होण्यासाठी मारू शकतात.

जर तुम्हाला एखादी तरुण व्यक्ती प्रशिक्षण घेण्याचा, नवीन गोष्टी शिकण्याचा निर्णय घेतांना, जो सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, तर समजून घ्या की तो/ती एक श्रीमंत व्यक्ती आहे.

जर तुम्ही एखादी तरुण व्यक्ती बघाल जी सतत सरकार ला दोष देते, आणि श्रीमंत असलेले सगळे चोर आहेत असे समजणारा आणि सतत टीका करत रहाणारा तरुण दिसला तर तो गरीब माणूस आहे हे समजून चला.

श्रीमंतांना खात्री आहे की त्यांना उड्डाण भरण्यासाठी फक्त माहिती आणि प्रशिक्षण आवश्यक आहे, गरीबांना वाटते की प्रगती साधण्यासाठी इतरांनी त्यांना पैसे दिले पाहिजेत.

शेवटी, जेव्हा मी म्हणतो की माझी मुलगी गरीब माणसाशी लग्न करणार नाही, तेव्हा मी पैशांबद्दल बोलत नाही. मी त्या माणसामधील संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेबद्दल बोलत आहे.

हे बोलल्याबद्दल मला माफ करा, पण बहुतेक गुन्हेगार हे गरीब लोक असतात. जेव्हा त्यांना समोर पैसे दिसतात तेव्हा त्यांचे डोके फिरते, म्हणूनच ते लुटतात, चोरी वगैरे करतात … ते याच्याकडे एक संधी म्हणून बघतात कारण ते स्वतःहून पैसे कसे कमवू शकतील हे त्यांना माहित नसते.

एके दिवशी एका बँकेच्या सुरक्षा रक्षकाला (गार्ड) पैशांनी भरलेली बॅग सापडली, ती बॅग घेऊन तो बँक मॅनेजरकडे द्यायला गेला.

लोक या माणसाला मूर्खशिरोमणी म्हणाले, पण प्रत्यक्षात हा स्वतःकडे पैसे नसलेला असा एक श्रीमंत माणूस होता.

एका वर्षानंतर, बँकेने त्याला स्वागतकक्षात रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीची संधी दिली, तीन वर्षांनंतर तो ग्राहक व्यवस्थापक (कस्टमर मॅनेजर) झाला होता आणि दहा वर्षांनंतर तो या बँकेचा प्रादेशिक व्यवस्थापक (रिजनल मॅनेजर) म्हणून काम पहात आहे. त्याच्या हाताखाली शेकडो कर्मचारी आहेत आणि ती सापडलेली बॅग त्याने चोरली असती तर त्यातील रकमेपेक्षा त्याच्या वार्षिक बोनसची रक्कम जास्त आहे.

‘संपत्ती’ ही सर्वप्रथम मनाची एक अवस्था मात्र असते!

तर…  तुम्ही श्रीमंत आहात की गरीब? स्वतःच ठरवा.

मुळ इंग्रजी लेखाचा स्वैर मराठी अनुवाद करून मी हा लेख तयार केला आहे. आवडल्यास शेअर करतांना लेखात बदल न करता नावासह शेअर करा ही विनंती.

-मेघःशाम सोनवणे

इंग्रजी लेखाचे लेखक – अनामिक.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 1 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 1 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे

नमस्कार.  मी डॉक्टर मनीषा अभिजीत सोनवणे…. 

रस्त्यावर नाईलाजाने भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचा आम्ही प्रयत्न करत आहोत…. Doctor for Beggars म्हणून…. 

दरवर्षी आम्ही आमच्या भीक मागणाऱ्या लोकांसमवेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतच असतो…. 

यावेळीही आम्हाला प्रश्न विचारला, यंदा भीक मागणाऱ्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार का ? 

होय …. नक्कीच करणार आणि आमच्या भीक मागणाऱ्या लोकांच्या समवेतच तो साजरा करणार…. 

यावर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे “Yoga for Humanity”—-

हल्लीच्या महागाईच्या काळात ह्युमॅनिटी…. “माणुसकी” सुद्धा खूप महाग झाली आहे. 

तुम्ही ज्यांना भिकारी म्हणता ते असतात तरी कोण…? आपल्याकडे युज अँड थ्रो ची पद्धत आहे…. म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर करून झाला की ती फेकून द्यायची…. मुलं बाळं, सुना नातवंडं, हे सुद्धा आपल्या आई बापाचा, आजी आजोबाचा ‘Use’ करून झाला की त्यांना ‘Throw करतात… ` It’s a new fashion….Yoooo !!! `

आई बापाला कुष्ठरोग, टीबी यासारखे रोग झाले की, हे रोग आमच्या ‘Kids’ ना होवू नयेत यासाठी सध्याचे  जागरूक Mom and Dad आपल्या आई बाप आणि आजी-आजोबांना रस्त्यावर फेकून देतात— अक्षरशः तुटलेल्या चपलेगत…. 

आणि मग जगण्यासाठी या आई बाप आणि आजी-आजोबांना नाईलाजाने भीक मागावी लागते… 

अशा नाईलाजाने भीक मागणाऱ्या…लोकांनी टाकलेल्या आईबाबांसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहोत…पोरांनी टाकून दिलेल्या …. तुटलेल्या या चपला “पादुका” म्हणून आम्ही डोक्यावर घेणार आहोत…. 

`योग` हा शब्द मूळ संस्कृतातील  “ युज “ या धातूपासून तयार झाला आहे. आणि याचा अर्थ “जोडणे….” 

येणारा हा आंतरराष्ट्रीय दिन भीक मागणाऱ्या लोकांसमवेत साजरा करून, गावकरी आणि भिक्षेकरी ही समाजातली iदोन टोकं जोडण्याचा प्रयत्न  आम्ही यानिमित्ताने करणार आहोत…. 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने…” आई बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात..” हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत…. 

चितेवर जाण्याआधी त्यांच्यात चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करणार आहोत…. 

नळ दुरुस्त करणारा कारागीर कितीही कुशल असला तरीसुद्धा डोळ्यातलं पाणी थांबवायला आपल्या माणसाचीच  गरज असते…. 

 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने…. “युज अँड थ्रो” केलेल्या या आई-बाबांचा हात हातात घेऊन…..  त्यांचं “आपलं माणूस” होण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करणार आहोत….. 

Yoga for humanity…. ! 

ह्युमॅनिटी चा अर्थ जर “ माणुसकी “ असा असेल तर त्यातला एक अंश आम्ही जगण्याचा प्रयत्न करणार आहोत…. 

21 तारखेला शनिवारवाड्याशेजारील फुटपाथवर आम्ही हा सोहळा सकाळी ११ वाजता आयोजित करत आहोत…. 

आमच्या या सोहळ्यामध्ये कसलाही डामडौल नसेल …येथे कोणी सेलिब्रिटी नसतील…

इथे फक्त असतील समाजाने फेकलेले…थकलेले ….आयुष्याच्या अंताला लागलेले आई आणि बाप !

आमच्या या सोहळ्यात आपणही सहभागी झालात तर त्यांना आणि आम्हाला नक्कीच आनंद होईल…. 

या निमित्ताने आपण उद्या  गोरगरिबांना शिधा देत आहोत…. !!! 

या शिध्याने त्यांचं ८ दिवसच पोट भरेल…. पण आम्ही मात्र कायमचे तृप्त होवू….! 

निसर्गाची किमयाच अशी की ….घेऊन मिळतो तो “आनंद” आणि देऊन मिळतं ते “समाधान“…! 

—क्रमशः भाग पहिला 

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेडगावचे शहाणे… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ पेडगावचे शहाणे… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे. असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का ? की पेडगावच का ?  दुसरे कुठले गाव का नाही ? पाहू या तर मग :-            

६ जून १६७४ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ? त्याची ही गमतीशीर हकीकत आणि गनिमी काव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-        

अहमदनगर जिल्ह्यात ‘पेडगाव’ नावाचं एक गाव आहे. तिथे बहादूरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट लुटून आणेल (बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे). 

कोणास ठाऊक कशी पण खानाला ही बातमी समजली , तेव्हा तो माजोरडा चेष्टेने हसत  म्हणाला, ” सिर्फ २००० मराठा मावळे ! उनके लिये तो किलेके दरवाजे खोल दो. अंदर आतेही खदेड देंगे,काट देंगे.”

तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादूरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे त्यांच्या लक्षात आले.  धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तसा लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षितपणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागे फिरले. पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली–खूप जवळ आली– तशी त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागे धूम ठोकली. बहादूरखान स्वतः त्यांच्या समाचारासाठी मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली.  कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूरखानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले, संपूर्ण २०००ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे !

खानाच्या फौजेत  एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावणे हे काही छोटे काम नाहीच.` शिवबांची फौज हरली, पळ काढला ! ` ही जीत औरंगजेबास कळल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल ? ह्या आनंदात बहादूरखान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादूरगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, “अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?”  “कोई नही जहापन्हा. आपकाही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढ़ाई करनी है “. आता किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा त्यांना अंदाज  आला.  आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं. आणि त्यांची भीती खरी ठरली. एक घोडेस्वार दौडत आला, आणि , “हुज़ूर, गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २०००  मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओंने हमला करके  सब लूट लेके चले गए हुज़ूर !”.                            

अशा प्रकारे  राज्याभिषेकाचा खर्च एक कोटीही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात— आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही न सांडता.                       

आता लक्षात आलं का ? की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणून,

 पेडगावचे शहाणे

 आणि                             

वेड पांघरून पेडगावला जाणे

हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले.

 

छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

 

माहिती संग्राहक : माधव केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एकवीस जून… ☆ सौ अश्विनी संजीव कुलकर्णी ☆

? विविधा ? 

☆ एकवीस जून… ☆ सौ अश्विनी संजीव कुलकर्णी ☆ 

एकवीस जून च्या निमित्ताने

21 जून—-वर्षातील सर्वात मोठा दिवस…जवळपास 14 तासांचा दिवस आज…आज सूर्यास्त जरा उशिराच होतो…आजच्या दिवसाला सोल्सटाइस (Solstice)असहि म्हणतात.

सर्वानाच माहीत आहे कि, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे दिवस मोठा असतो.पृथ्वीच्या अक्षाच्या सूर्याशी असलेल्या कोनानुसार , संपूर्ण उत्तर गोलार्धात 21 जून हा वर्षातील मोठा नी दक्षिण गोलार्धात सगळ्यात लहान दिवस असतो.

उत्तरायणात,सूर्याचा हळूहळू उत्तरेकडे प्रवास सुरु होतो…तो उत्तरेकडे सरकत असता,दिवसाचा कालावधी वाढतो. उत्तरेकडच्या सूर्याचा हा प्रवास 21 जून पर्यंत चालतो. सूर्य या दिवशी विश्वववृत्ताच्या जास्त उत्तरेकडे असतो म्हणून ह्या दिवसाचा कालावधी अधिक असतो.

आता योग:-

योग माझ्या गुरूंनी सांगितलेला…माझ्या  वाचनातला,आचरणातला आणि जाणिवेतला!!!

योग हि साधना आहे…हे शास्त्र आहे…हा अभ्यास आहे! भगवान श्रीकृष्णांनी शिकवलेला मूळ योग आहे. हा श्रद्धेचा सर्वोच्च दिव्य मार्ग आहे.शास्त्रीय,नियमित आणि भावनापूर्ण परमेश्वर ध्यानाचा मार्ग आहे.

मानवाला अज्ञानातून मुक्त करून, शारीरिक,मानसिक नी अध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी महत्वपूर्ण असा हा योग!!!💐

योग साधनेत, त्यातील अभ्यासाच्या प्रकारांमध्ये योग किंवा योगा प्रकार करणेअसाच विचार माणसाना येतो. किंवा तसाच विचार लोक करतातही.

पण नुसत्याच व्यायाम प्रकारांनी आपल्या शरीरात ऊर्जा हवी तेवढी निर्माण होत नाही. ते प्रकार शास्त्र शुद्ध हवेत.शरीराला प्राण शक्तीची गरज असते.

शरीराच्या पेशींना,अधिकाधिक क्रियाशील बनवण्यासाठी सुर्यप्रकाश,शुद्ध हवा, सात्विक व शुद्ध तरल पदार्थ,पाणी आणि फळाची आवश्यकता असते.

शरीरातील स्नायू,पेशी,हाडं, मज्जासंस्था, रक्त या सर्वांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. हि ऊर्जा दैनंदिन जीवनात सतत वापरली जाते,पण अशीच आणि अधिकाधिक ऊर्जा आपण आपल्या इच्छाशक्तीच्या वापराने व्यायामाच्या शास्त्र शुद्ध पद्धतीतून साधनेतून निर्माण जर शकतो.आणि आपली प्राणशक्ती अधिकाधिक चैतन्यमय बनवू शकतो.

हा योग म्हणजे आपल्याला वाटणारा नुसताच शरीराचा व्यायाम नसून, त्याद्वारे आपल्या देहात,अंतरात प्राणशक्ती निर्माण करणे आणि शरीर हे प्रत्यक्ष ऊर्जेचे स्रोत बनवणे .

यातील विशिष्ट व्यायाम, प्राणायाम,श्वासावर नियंत्रण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीरात निर्माण होणारी शक्ती(ऊर्जा) आणि त्याद्वारे राखले जाणारे शारीरिक,मानसिक संतुलन!!!

यात ध्यान साधना खूप महत्वाची आहे.ध्यानाने मन शांत होते. चंचल मन एकाग्र होते. ध्यानाचेही शुद्ध शास्त्र आहे. ध्यानाचा शास्त्रोक्त अभ्यास करणे महत्वाचे आहे. ध्यान म्हणजे आपल्या प्राणशक्तीला – इच्छा शक्तीच्या अधिन आणणारी शक्ती!

ध्यानाच्या विज्ञानाला राजयोग म्हणूनही ओळखले जाते.. म्हणजेच ईश्वर प्राप्तीचा राजमार्ग!!!💐

आजचा 21 जून सर्वात मोठा दिवस,  हा भौगोलिक दृष्ट्या आहे. आणि आपले पंतप्रधान मोदीजींनी 21 जून 2015 मध्ये जाहीर केलेला व तेव्हा पासून सुरु असलेला, योग दिवस याचा तसा काही सबंध नाही…

पण आजच्या योग दिवसाचा व सर्वात मोठ्या दिवसाचा योगायोग म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग म्हणावयास हरकत नाही. आणि हे लक्षात घेता मला आलेले विचार….

नेहमीच सूर्योदयाच्या नव्या किरणांना आकर्षित होणारी मी… नव्या दिवसाचे नवे स्वप्न उराशी बाळगणारी मी…नव्या अरुणोदयला साक्ष ठेऊन इच्छा आकांक्षा नी आव्हानांना सामोरी जाणारी मी…आज खूप आनंदाने आपण सर्वाना ह्या मोठ्या दिवसाच्या शुभेच्छा देते!💐

नेहमीपेक्षा आज मोठा दिवस, म्हणचे जास्त वेळ प्रकाश,तेज,सूर्याच्या किरणांचा तेजाचा जास्त वेळ संपर्क!

वेळ तीच, घड्याळहि तेज,रोजचे दैनंदिन कामकाजहि तेच! पण तो सूर्य संपूर्ण त्रिलोक्याला तेजाळणारा… आज सूर्योदय नवी कांती देणारा… नुसते आपल्यालाच नव्हे, तर पर्वताना, नद्यांना,झाडांना,पक्षांना,प्राण्यांना,साऱ्या चराचराला एका दिव्या प्रमाणे मिळालेले तेज… दिवसभरात अगदी सूर्यास्तापर्यंत विविध रंगांनी, ढंगानी मिळेल… सकाळ, दुपार व संध्याकाळच्या विविधरंगी छटा सर्वाना सुखी करोत… दिवसभरातील विविध रंगी छटांनी केलेले नृत्य प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट करून, नव दिशा दाखवू देत…

सूर्याचा हा प्रकाश…हे तेज…नी तेजाळणे सर्वांचे रक्षण करो!💐👍

आज धकाधकीच्या , धावपळीच्या योगात आपल्याला आपल्या मनाकडे लक्ष द्यायला अजिबात फुरसत नसते…पण आजच्या दिवशी मनाकडे आवर्जून लक्ष द्यावं… आणि ते सुदृढ व्हावं यासाठी करावा योग!!💐

योग दिवसाच्या व सर्वात मोठ्या दिवसाच्या सानिध्यात ध्यानस्थ होऊन सूर्याच्या सोनेरी किरणांच्या स्नानाने, आपल्या मनातील राग, लोभ, मोह, मत्सर, असूया, घृणा, भेदभाव, जातीयवाद यांचा नाश होवो. तन मन निरामय होऊन अंतःकरण व चित्त शुद्धी होवो ….सायंकाळच्या ध्यानाच्या  तेजाने म्हणजेच संधिप्रकाशाची लाली जणू  गुलाल उधळलाय असे वाटावे… 

आजच्या दिवशी सुर्याचे तेज जास्त असणार! त्यामुळे दिवसभरात त्या तेजाचे , कुटस्थाकडे (दोन भुवयांमधील स्थान) न पाहताही ‘अद्वितीय चक्षु’ म्हणून सतत दर्शन होणार… त्याचे दर्शन किती घ्यायचे हे आपली हाती आहे!👍💐

आजचा योग  दिवस नी  मोठा  दिवस म्हणून हि योग साधना!  हि रोजचीच का होऊ नये??  हा योग दिवस सर्वांचाच रोजचा असावा… कारण रोजच्या नियमित  योगाने, रोजच्या ध्यानाने आपल्या अंतरातील तेज वाढून, आपल्याला एक अनामिक आत्मिक आनंद मिळणार आहे, मग तो दिवस मोठा असो किंवा लहान…आपल्याच कुटस्थातील तेज, शांती, आणि ब्रह्मानंद 🙏🏻 … काय वर्णावा!!!!👍💐 

© सौ अश्विनी संजीव कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हयातीचा दाखला… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ हयातीचा दाखला.. ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

ज्यांना दरमहा पेन्शन मिळते, त्यांना प्रत्येक वर्षअखेरीस ‘हयातीचा दाखला’ सादर करावा लागतो.. जेणेकरून त्यांना आपण जिवंत असून, पेन्शन बंद न करता चालू रहावी हे संबंधित खात्याला लक्षात आणून द्यावं लागतं..

काळ बदलला.. आता मात्र आपण ‘हयात’ आहोत, हे आपल्या फेसबुकवरील आप्तस्वकीयांना समजण्यासाठी, त्यावर कार्यरत रहावं लागतं…  

आता एखाद्या मित्राचा शोध घेणं फेसबुकमुळे, सहज शक्य आहे.. त्याचं नाव ‘सर्च’ करायला टाकल्यानंतर त्याने जर आपला फोटो टाकलेला असेल तर तो लगेच सापडू शकतो.. 

गेले दहा वर्षे मी फेसबुकवर आहे.. या कालावधीत कित्येक फेसबुकफ्रेण्ड, फेसबुकवर आले आणि गेले.. सुरुवातीला माझ्याकडून फेसबुकचा वापर जास्त प्रमाणात नव्हता.. कोरोना सुरु झाला आणि गेल्या दोन वर्षांत माझी फेसबुक फ्रेण्ड्सची संख्या शेकड्यांमध्ये वाढली.. 

मला त्या दोन वर्षांत घरी बसून राहिल्याने, लेखन करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला.. मी रोजच वेगवेगळ्या विषयांवर लिहित राहिलो.. ते लेख वाचून असंख्य वाचक माझे मित्र झाले.. कधी आवर्जून ते फोन करुन बोलू लागले.. मित्र परिवार वाढत गेला. 

आता जर मी कधी कामाच्या गडबडीत काही दिवस पोस्ट टाकू शकलो नाही तर, मला काहीजण विचारतात.. ‘बरेच दिवस झाले, आपण पोस्ट टाकलेली नाही..’ ‘काय सुट्टी घेतली का!’ ‘बाहेरगावी गेला होता का?’ इत्यादी..

याला कारण म्हणजे, फेसबुकवर रोजच भेटायची आपल्याला सवय लागलेली असते.‌. जर ती व्यक्ती दोन चार दिवस, फेसबुकवर दिसली नाही तर मनात नाही नाही त्या शंका येतात.. काळजी वाटू लागते.. अलीकडे कामाशिवाय कोणीही कुणाला फोन करीत नाही.. काही विचारायचं असेल तर व्हाॅटसअपवर विचारलं जातं.. ती व्यक्ती रोजच व्हाॅटसअप पहात असेल तर उत्तर लगेच मिळू शकतं. काहीजण आवर्जून सांगतात की, ‘मला व्हाॅटसअप केलं की फोन करुन सांगत जा.. मी ‘व्हाॅटसअपवेडा’ नाहीये..’ असे ‘सेलिब्रिटी’ फेसबुकवर मात्र सतत कार्यरत असतात.. 

माझे एक मित्र आहेत, ते रोजच माहितीपूर्ण अशा पोस्ट नेहमी टाकत असतात. त्यांच्या पोस्ट वाचण्याची मला सवय लागलेली आहे.. कधी चार दिवस ते फेसबुकवर दिसले नाहीत तर मी त्यांना फोन करतो. मग समजतं, की ते आजारी होते..

फेसबुकच्या या आभासी जीवनात जगताना आपण, कळत नकळत त्यात सहभागी झालेलो असतो.. विविध छंद, कला, साहित्य, मनोरंजन क्षेत्रातील मोठी माणसं आपल्या संपर्कात असतात.. आपण त्यांना कधी प्रत्यक्ष भेटलेलो नसलो तरी त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर व आपुलकी असते.. कधी त्यांची पोस्ट आवडल्याचे त्यांना लिहिल्यास, मैत्री अधिक दृढ होते.. त्यांच्या मनोगतातून, फेसबुक वाॅलवरुन त्यांचा जीवनप्रवास कळतो.. त्यांच्या जीवन संघर्षापुढे आपले प्रश्न अगदी सामान्य वाटू लागतात.. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन, जगण्यासाठी उमेद मिळते.. 

आताच्या जमान्यात पत्रव्यवहार, हा लुप्त झालेला आहे. कुणासाठी दोन ओळी लिहून, आठ दिवस उत्तराची वाट पहाण्यापेक्षा व्हाॅटसअप किंवा मेसेंजरवर त्वरीत संपर्क साधता येतो.. 

पाच हजारांची फ्रेण्डलिस्ट असणाराही, फेसबुकवर एकटा पडू शकतो.. तो फेसबुकवर कसा व्यक्त होतो, हे महत्त्वाचे असते.. काहीजण सतत टिका करीत असतात.. काहीजण एखाद्या पक्षाचे समन्वयक म्हणून कार्यरत असतात.. काही उपदेशाचे ‘रेडिमेड’ डोस पाजत असतात.. इथं जर तुम्ही जसे आहात तसेच राहिलात, तर अधिक लोकमान्यता मिळते.. 

मला माझं फेसबुक समृद्ध असल्याचा सार्थ अभिमान आहे.. कारण माझ्याकडे दिग्गज कवी, लेखक, चित्रकार, सिने-नाट्य कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, प्रकाशक, प्रिंटर्स इत्यादी क्षेत्रातील असंख्य स्त्री-पुरुष संपर्कात आहेत.. त्यातील कित्येकांनी साहित्य व कला प्रांतातील उच्चतम पुरस्कार मिळविलेले आहेत..

मी तर फेसबुकवर कार्यरत आहेच, माझेही हे सर्व मित्र असेच ‘हयात’ असल्याची जाणीव करुन देत कार्यरत रहावेत, एवढंच माझं परमेश्वराकडे ‘मागणं’ आहे!!

© सुरेश नावडकर

१२-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तक्रारी थांबव कर्णा! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ तक्रारी थांबव कर्णा! ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

कर्ण कृष्णाला विचारतो – “माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती?

मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो.

परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईन . कारण मी क्षत्रिय नव्हतो!

एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला.

द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.

कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले.

मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.—-तर मग मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?”

कृष्णाने उत्तर दिले:

“कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला.

जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता.

रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले.

तुम्ही तलवारी, रथ, घोडे, धनुष्यबाण, यांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात.

मला गौशाला, शेणमाती मिळाली.  आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले.

ना कोणती सेना, ना शिक्षण.

मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे.

तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही.

सांदिपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो.

तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या.

मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले.—–मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.

जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल… फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.

एक गोष्ट लक्षात घे कर्णा…

प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत. 

आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही. 

दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण.

परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते…

कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या,

कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला, 

कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले,

तरीही—

त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे.

तक्रारी थांबव कर्णा!

आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.

म्हणून, तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगीदेखील तुम्ही चांगलाच विचार करा, भगवंताचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद…!

—— पायातून काटा निघाला की चालायला मजा येते, तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते…

जय श्रीकृष्ण   

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्गायन – खेड्यामधले घर कौलारू ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

? विविधा ?

☆ निसर्गायन – खेड्यामधले घर कौलारू ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

निसर्ग जेवढा आपल्या डोळ्यांनी आपल्याला बाहेर दिसतो, तेवढाच तो मनामनात खोलवर रुजलेला असतो. आपलं बालपण  गेलं, त्या ठिकाणच्या आठवणी या बहुतांशी निसर्गाशी निगडित असतात. कोणाला आपल्या गावातली नदी आठवते, कोणाला आपली शेत, त्या शेतातली झाडं , त्या झाडांशी निगडित असलेल्या अनेक आठवणी असं हे निसर्गचित्र तुमच्या आमच्या मनात पक्कं रुजलेलं असतं . ती  झाडं , ते पशुपक्षी तुमच्या आमच्या मनाच्या आठवणींचा एक कप्पा व्यापून असतात. आपल्याकडे निरनिराळ्या समारंभाचे फोटो काढलेले असतात. त्याचे विविध अल्बम आपण आठवणी म्हणून जपून ठेवतो. पण कधी कधी या फोटोंमधले रंग फिके होऊ लागतात. चित्र धूसर होतात. पण मनामधला निसर्ग मात्र पक्का असतो. त्याचे रंग कधीही फिके होत नाहीत. उलट जसजसे वय वाढत जाते,  तसतसे ते रंग गडद, अधिक गहिरे होत जातात. त्याचा हिरवा रंग मनाला मोहवीत असतो. 

तुम्ही कामानिमित्त शहरात राहायला गेलेले असा, लॉकडाऊन मुळे घरात अडकलेले असा, तुमचा फ्लॅट, तुमचं घर छोटं असो की मोठं, तुमच्या मनात बालपणाचा तो निसर्ग ठाण मांडून बसलेला असतो. कोकणातून मुंबईत कामानिमित्त येणारे चाकरमानी, खेड्यापाड्यातून कामानिमित्त मुंबई पुण्याला स्थायिक झालेली माणसं ही सगळी वर्षातून एकदा तरी आपल्या गावी जायला मिळावं म्हणून केवढी आसुसलेली असतात. त्यांचं गाव, त्या गावातला निसर्ग त्यांना बोलावत असतो. त्याची ओढ असते. आणि तिथे गेल्यावर काय होतं  ? जणू जादू होते. शहरामध्ये दररोजच्या कामाने त्रासलेला तो जीव, तिथे गेल्यानंतर ताजातवाना होतो. जणू जादूची कांडी फिरते. काय विशेष असते त्या गावात असे ? पण ते विशेष त्यालाच माहिती असते, ज्याने तिथे आपले बालपण घालवलेले असते.   कवी अनिल भारती यांची ‘ खेड्यामधले घर कौलारू ..’ ही रचना पहा. किती साधे आणि सोपे शब्द.. ! पण त्यातला गोडवा किती कमालीचा…! मालती पांडे यांनी गायीलेलं हे गीत आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलंही असेल. 

आज अचानक एकाएकी 

मानस तेथे लागे विहरू 

खेड्यामधले घर कौलारू. 

पूर्व दिशेला नदी वाहते 

त्यात बालपण वाहत येते 

उंबरठ्याशी येऊन मिळते 

यौवन लागे उगा बावरू 

माहेरची प्रेमळ माती 

त्या मातीतून पिकते प्रीती 

कणसावरची माणिक मोती 

तिथे भिरभिरे स्मृती पाखरू 

आयुष्याच्या पाऊलवाटा 

किती तुडविल्या येता-जाता 

परि आईची आठवण येता 

मनी वादळे होती सुरु. 

अगदी साधे सोपे शब्द. पण त्या शब्दात ताकद केवढी ! जणू तुम्हाला त्या वातावरणात घेऊन जातात ते शब्द.

शब्द आपल्याला वाटतात तेवढे साधे नसतात. त्यांना आठवणींचा गंध असतो. पहिल्या पावसाने माती ओली होते. एक अनामिक पण हवाहवासा वाटणारा गंध आपल्यापर्यंत पोहचवते. जसं आपण म्हणतो, फुलाला सुगंध मातीचा, तसाच मातीलाही स्वतःचा एक सुगंध असतो. तो सुगंध आणतात त्या पावसाच्या धारा. जसा मातीला गंध असतो, तसाच शब्दांनाही गंध असतो. आणि तो गंध अनेक आठवणी आपल्यासोबत घेऊन येतो. 

वरच्या कवितेतलं दुसरं कडवं नदीशी संबंधित आहे. कुणीतरी असं म्हटलंय की ज्याच्या गावात नदी असते, त्याचं बालपण समृद्ध असतं . आणि ते खरंच आहे. नद्यांना केवढं मोठं स्थान आपल्या जीवनात आहे ! प्रत्येकाच्या गावातली नदी छोटी असेल किंवा मोठी, पण तिच्याशी त्याच्या अनेक आठवणी निगडित असतात. गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांची नुसती नावं घेतली तरी त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. कुठेतरी लग्नात गुरुजींनी म्हटलेले मंगलाष्टक आठवते. कुठे अलाहाबादचा त्रिवेणी संगम आठवतो. तसंही ज्याच्या त्याच्या गावातली नदी ही त्याच्यासाठी गंगेसारखीच पवित्र असते. जेव्हा लोक नासिकला जातात आणि गोदावरीत स्नान करतात, किंवा तिथे जाऊन येतात, तेव्हा मी गोदावरीवर गेलो होतो असं म्हणत नाहीत. मी गंगेवर गेलो होतो असंच म्हटलं जातं . 

या कवितेचं तिसरं कडवं बघा. गावाकडची ओढ का असते लोकांना ? तर ‘ माहेरची प्रेमळ माती..’ ही माती केवळ अन्नधान्य पिकवीत नाही. त्या मातीतून प्रीती म्हणजेच प्रेमही पिकतं. शेतातल्या कणसांना जे दाणे लागतात, ते माणिक मोत्यांसारखे मौल्यवान आहेत. आणि त्याच्याशी कवीच्या स्मृती निगडित आहेत. स्मृतींचं पाखरू जणू तिथं घिरट्या घालत असतं . आणि शेवटचं कडवं तर अप्रतिमच. आयुष्यात आपण सुख दुःखाच्या, संकटांच्या अनेक पाऊलवाटा तुडवतो. पण त्याचं फार काही वाटत नाही आपल्याला. पण जेव्हा आईची आठवण होते, मग ती आपली आई असो वा काळी आई म्हणजे शेती, तिची आठवण आली की मनात वादळे सुरु होतात. मन तिच्या आठवणीने आणि ओढीने बेचैन होते. 

असा हा निसर्ग आपल्याला समृद्ध करीत असतो. त्याच्यात आणि आपल्यात एक अतूट नातं असतं . खरं म्हणजे आपणही निसर्गाचाच एक भाग असतो. पण आपलं अलीकडंच जीवनच असं काही झालं आहे, की ते नातं तुटायची वेळ जणू काही येते. आणि माणसाच्या जीवनातून निसर्ग वजा केला तर, काहीच शिल्लक राहणार नाही.

मला कधी कधी भीती वाटते ती पुढच्या पिढीची. जी शहरातून राहते आहे. आणि निसर्गाच्या या सुंदर वातावरणाला आणि अनुभवाला पारखी होते आहे. याचा बराचसा दोष आमच्याकडेही जातो. आम्ही लहानपणी जी नदी पाहिली , अनुभवली ती आता आम्ही आमच्या मुलांना, भावी पिढीला अनुभवायला देऊ शकू का ? आम्हाला जसा निसर्गाचा लळा लागला, तसा त्यांना लावता येईल का ? त्यांच्या चार भिंतीच्या पुस्तकी शिक्षणात निसर्ग शिक्षणाला स्थान असेल का ? पुस्तकातल्या माहितीवर जशी आम्ही त्यांची परीक्षा घेतो, तशी त्यांना निसर्गज्ञान, निसर्ग अनुभव देऊन घेता येईल का ? त्यांना जंगलं , प्राणी, पक्षी हे अनुभवायला देता येतील का ?  मोबाईल, टीव्ही, सिनेमे, पुस्तके यांच्यापलीकडेही एक वेगळे जग अस्तित्वात आहे याची जाणीव आम्हाला त्यांना करून देता येईल का ? सध्या तरी या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. त्यासाठी वेगळे स्वतंत्र प्रयत्न करावे लागतील. अन्यथा पर्यावरण दिवस, वसुंधरा दिन इ साजरे करून आपण आपल्या मनाचे समाधान फक्त करून घेऊ. 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print