मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पूर्वीचे तंत्रज्ञ… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पूर्वीचे तंत्रज्ञ… ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

पूर्वीचे तंत्रज्ञ (Technicians) 

पूर्वी एखाद्या वस्तू मध्ये थोडासा बिघाड झाला तर ती वस्तू दुरुस्ती करून घेऊन वापरण्याकडे लोकांचा कल होता. त्याचे कारण म्हणजे घरबसल्या लोकांना या वस्तू दुरुस्त करून मिळायच्या.

पूर्वी तांबे-पितळेची भांडी लोक वापरत असत. कधी कधी जास्त वापर झाला की भांडी गळायला लागत. मला आठवतंय माझी आजी माझ्या आईला सांगायची, “जा ग, जरा पातेल्याला ‘चाती’ बसवून आण.” लहानपणी ते काही कळायचे नाही. पण मला आठवतेय पूर्वी दारावर अशा दुरुस्त्या करणारी माणसे यायची. त्यांच्या ठराविक आरोळ्या असत. बहुतेक दुपारच्या वेळात हे लोक यायचे. ‘बंबाला, पिंपाला  डाग देणार, फुटकी भांडी नीट करणार.’ 

ही माणसे घरी येऊन म्हणजे वाड्यातच गळणारे बंब, पिंप, गळणारी पातेली, तपेली सगळ्यांना डाग देऊन किंवा चाती बसवून दुरुस्त करायचे. त्यांच्या जवळ दुरुस्तीचे सगळे सामान असायचे.

अजून एक म्हणजे, ‘डबे बनवणार, झाकणे बनवणार, चाळणी बनवणार’ असे ओरडत काही लोक यायचे. पूर्वी ‘डालडा’चे डबे मिळायचे. त्याला खूप लोक झाकणे बनवून वापरायचे. किंवा तेलाचे मोठे डबे मिळत. त्याचेही गोल डबे किंवा त्यालाच पत्र्याची झाकणे बनवून घेत. 

त्या माणसाच्या खांद्यावर एक लोखंडी पेटी असे, त्यात पत्रा कापण्याची मोठ्या दांड्याची कात्री व अन्य बरेच काय-काय सामान असे. आणि ते डबे, झाकणे बनवताना बघायला खूप मजा वाटायची. मग वाड्यातल्या सगळ्या लहान मुलांचा तेवढा वेळ तिथेच त्याच्या भोवती मुक्काम असायचा. अगदी थोड्या वेळात सफाईदारपणे डबे, डब्यांची झाकणे अंगणात बसून तयार व्हायची. त्याच्या जवळ पत्रा पण असायचा, जरुरी प्रमाणे त्याचाही वापर करायचा व हे सारे थोडक्या पैश्यातच व्हायचे.

‘छत्री दुरुस्ती’, छत्रीच्या काड्या बदलणे, छत्रीचे कापड नीट करणे इत्यादी दुरुस्त्या करणारे कारागीर यायचे. मोडक्या छत्र्या थोडक्या पैश्यात घरी दुरुस्त करून मिळायच्या. त्याच्या खांद्यावर एक पिशवी व त्यात एक चपटा चौकोनी लोखंडी डबा असायचा त्यात दुरुस्तीला लागणारे खूप सारे सामान असायचे. पिशवीत छत्रीच्या काड्याही असायच्या.

‘नांव घालायची, भांड्यावर नांव.’ अशी एक आरोळी देत धोतर, शर्ट व टोपी घातलेला माणूस यायचा. त्याच्या कानावर नांव घालण्याचे  साधन-पंच ठेवलेले असे व एका कानावर हात ठेवून तो आरोळी द्यायचा. ते ‘नांव’ असं म्हणण्याच्या ऐवजी, ‘नामु घालायची नामू’, असेच काहीसे ऐकू यायचे. 

घरी येऊन त्याच्या जवळच्या लहानशा हातोडी आणि High Carbon Steel पंचने ठोकून, तो भांड्यांवर सुबक नांवे घालून द्यायचा. हल्ली मशीनने नांव घालतात. अगदी डझनाच्या हिशोबाने भांडी असायची. दुपारी  पाठीवर पोते घेऊन तांबे, पितळेची मोड घेणारा माणूससुध्दा दारावर यायचा. पूर्वी पितळी Stove वापरायचे खूप लोक. ते सुध्दा दुरुस्त करणारा माणूस दारावर यायचा. 

तसेच, तांबे पितळेच्या भांड्यांना ‘कल्हई’ करणारी माणसे तर ‘कल्हईची भांडी कल्हई’ अशीही आरोळी असायची. पितळी ताटे, वाट्या, पातेली अशा सगळ्या भांड्यांना कल्हई करत, लगेच त्यांचे रुप एकदम पालटत असे. भांड्यांना कल्हई म्हणजे एक मोठा कार्यक्रमच असायचा घरी ! कल्हई करताना बघताना खूप मजा वाटायची. एक वेगळाच वास यायचा – नवसागराच्या धुराचा. नवीन कल्हई केलेल्या भांड्यात जेवताना खुप छान वाटायचे. हे सगळे करत असताना माझी आजी व आई त्यांच्याशी पैसे ठरवताना घासाघीस पण करायच्या.

फार पूर्वी पिंजारी देखील दारोदारी येत. त्यांच्या खांद्यावर भलेमोठे धनुष्य-सदृश्य – तुणतुणे वाटेल – असे अवजार असे. कापसाच्या जुन्या गाद्यांमध्ये वापराने गोळे पुंजके होत. पिंजारी तो जुना कापूस पिंजून झकास reconditioned उशा-गाद्या बनवून देई.

सुया फणी पोत असे म्हणून डोक्यावर भली मोठी दुर्डी घेऊन दारोदारी हिंडून ह्या गोष्टी विकणारी जमात मात्र आजही अस्तित्वात आहे..

तर असे होते हे दारावर येणारे तंत्रज्ञ ! अगदी घरीच थोड्या वेळात, थोड्या पैश्यात अगदी डोळ्यासमोर दुरुस्ती व्हायची. कुठे हेलपाटे नाहीत, धावपळ नाही, की काही नाही. लहानपणी हे घराच्या अंगणात बसून बघताना खूप मजा वाटायची. हळूहळू सगळे बदलले व या कसबी जमाती गायब झाल्या. नामशेष झाल्या.

‘कालाय तस्मै नम:….

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माळ गुंफिताना…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

माळ गुंफितांना स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ माळ गुंफितांना स्व. वि. दा. सावरकर ☆

माळ गुंफितांना । ऐका कवनाला । गुंफी कोण कशी माला ॥

घाली जगदंबा । त्रिगुणातीताला । त्रिगुणी बिल्वदली माला ॥

प्रकृतीदेवी गुंफी ।  देव विराटासी । नव नव सूर्यमालिकांसी ॥

प्रलयंकर काली । गुंफी महाकाला । ती नरमुंडचंड माला  ॥

उद्भवा घाली । घाली उद्भवाला । सृष्टी भूकंपांची माला ॥

गुंफी सत्यभामा । श्रीहरीला साची । माला पारिजातकांची ॥

माळ मोत्यांची । गुंफी रुचिरा ती । राणी राजाच्यासाठी ॥

फुलांची माला । माला ओवी रती ॥ आलिंगि त्या अनंगा ती ॥

विरहिणी परि ती ।  प्रिय स्मरण काला । ओवी अश्रूंची माला ॥

कवी – वि. दा. सावरकर

रसग्रहण

सावरकरांनी ही कविता १९२६ साली म्हणजेच ते रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना लिहिली आहे. या कवितेमध्ये मांडलीय एक साधी गोष्ट- माला गुंफणे व ती आपल्या आराध्याला अर्पण करणे. पण या साध्या गोष्टीला सावरकर जी अध्यात्मिक  उंची व भावनिक  खोली देतात ती पाहून अचंबित व्हायला होतं.  त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची भरारी सामान्य विरहिणी पासून प्रकृतीदेवीपर्यंत झेप घेते व त्यांची अफाट कवीकल्पना, फुलांपासून ते भूकंपांपर्यंत व सूर्यमालेपासून अश्रुंपर्यंतच्या माला गुंफते. सूर्यमालेची माला, भूकंपांची माला या कल्पनांची कल्पनासुद्धा करणं अन्य कोणाला अशक्य आहे.

जगन्माता जगदंबा त्रिगुणातीताला म्हणजेच शंकराला बेलाच्या पानांची माला घालते. बेलपत्र हे पार्वतीचं रूप आहे. मंदराचल पर्वतावर एकदा पार्वतीच्या घामाचे थेंब पडले व त्यातूनच बेलाचा वृक्ष निर्माण झाला अशी मान्यता आहे. या वृक्षाच्या मुळांत ती गिरिजा रूपात, बुंध्यात माहेश्वरी रूपात, फांद्यात दाक्षायणीच्या, पानांत पार्वतीच्या, फुलांत गौरीच्या व फळांत कात्यायनीच्या रूपात  वास करते असं मानलं जातं.

प्रकृती व पुरुष यांनी ब्रम्हदेवाच्या आज्ञेवरून, ब्रम्हांड निर्मिती केली. म्हणून सावरकर म्हणतात प्रकृतीदेवी, विराटासाठी म्हणजेच ब्रम्हासाठी नवग्रहांच्या नवनवीन

सूर्यमाला गुंफित आहे.

कालीमाता हे दुर्गेचे रौद्र रूप आहे. ती स्मशानात राहते व मुंडमाला धारण करते. तसेच  महाकाल हे शंकराचे रौद्र रूप आहे तो देखिल स्मशानात राहतो व मुंडमाला धारण करतो. कालीने  शुंभ, निशुंभ तसेच चंड व मुंड या असुरांना ठार करून ती मुंडमाला शंकराला अर्पण केली  अशी कथा आहे.

सृष्टीदेवी तिच्या निर्मिकाला घालण्यासाठी भूकंपांची मालिका निर्माण करते. कवी येथे हे सत्य अधोरेखित करतात की, निर्मिती व नाश यांचं खूप जवळचं नातं आहे किंवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

सत्यभामेसाठी श्रीकृष्णांनी स्वर्गातून पारिजातक आणला असं मानलं जातं. त्यामुळे सत्यभामा श्रीहरींसाठी पारिजातकाची माला गुंफते आहे.

सुंदर, आकर्षक अशी राणी, वैभवाचे प्रतीक असलेली मोत्यांची माळ आपल्या पतीसाठी म्हणजेच राजासाठी ओवते आहे.

शृंगाराचं प्रतीक असणारी फुलांची माला, साक्षात् शृंगार असलेल्या अनंगासाठी म्हणजेच कामदेव मदनासाठी त्याची पत्नी रती ओवते आहे. रती व मदन यांनी शृंगारिक अविर्भावांनी शंकराचा तपोभंग केल्यावर, क्रोधित शंकरांनी मदनाची जाळून राख केली मात्र नंतर  उःशाप म्हणून त्याला शरीरविरहित (अनंग) अवस्थेत कुणाच्याही शरीरात शिरण्याची मुभा दिली; म्हणूनच मदनाला अनंग म्हणतात.

विरहात झुरणारी प्रेमिका मात्र आपल्या प्रियासाठी अश्रूंची माळ ओवते आहे म्हणजेच अश्रु ढाळते आहे. प्रदीर्घ कारावासामुळे सावरकर व त्यांच्या पत्नी माई यांनी विरहयातनांची झळ चांगलीच अनुभवली होती. त्या आठवणींची मालाच ते या ओळीतून गुंफित असतील काय?

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावली… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ सावली…  ☆ सौ.मंजिरी येडूरकर

निसर्ग हा एक जादुगार आहे. त्याच्या कला त्याच्या लीला अगाध आहेत. फक्त पाहण्याची दृष्टी हवी. रोज उगवणारा सूर्य, त्याची रोज पृथ्वीवर येणारी किरणे! या किरणांच्या मार्गात एखादी वस्तू आली की, किरण थटतात त्यामुळे त्या वस्तूंची सावली पडलेली दिसते. एका साध्या सोप्या शास्त्रीय आधाराने स्पष्ट करण्याजोगी घटना त्यामुळे कधीच त्याचं कुतूहल वाटलं नाही.

पण ह्याच सावलीचं निरीक्षण केलं तर त्यात आश्चर्य  वाटण्याजोगी विविधता आढळते. प्रत्येक वस्तूची सावली निराळया प्रकारची असते. नारळाची सावली पाहिली की आईच्या पायाला घट्ट धरून मिठी मारणा-या बाळाची आठवण होते. असं वाटतं की ही सावली नारळाचे पाय घट्ट पकडते आहे. नारळानं तिला कितीही दूर ढकलंल तरी ती पाय सोडत नाही.

वेलीची सावली पाहिली की वाटतं जणू वेलीनं सावलीला अभयदान दिलं आहे. त्यामुळे हे निरागस बाळ खाली स्वच्छंदपणे नाचतयं बागडतंय. पण त्याचं वेलीपासून फार लांब जायचं धाडस होत नाही. त्यामुळे वेलीच्या आसपास खेळतंय. आंब्याची सावली निवांत पहुडलेली असते. सर्वांना सामावून घेणारी, शांत असते. हिच्या सावलीत शिरलं की इतकं सुरक्षित वाटतं की, आपल्याला आपल्या सावलीचंही भय रहात नाही. चिंचेची सावली कशी भेदरलेली, घाबरलेली आहे असं वाटतं. तिचं अस्तित्व इतकं अस्पष्ट असतं की वाटतं ती पळून जाण्यासाठी मार्ग षोधतेय पण तिला मार्ग सापडत नाहीय. तिला मोठयांदा ओरडावं असं वाटतयं पण आवाज फुटत नाहीय. एखाद्या झुडपाची सावली कशी अस्तित्वच हरवल्यासारखी, असून नसल्यासारखी!

माणसाची सावली मात्र दिवसभरात निरनिराळी रूपं घेऊन येते. सकाळी उगवत्या सूर्याबरोबर नव्या आशा, नवा उत्साह घेऊन येते. त्यावेळी सावली किती तजेलदार दिसते. आपली सोबत करते, दिलासा देते. पण दुपारच्या भयाण शांततेत कुणाची तरी सोबत हवी असं खूप वाटत असतं, त्यावेळी नेमकी गायब होते. आपल्याला एकटं सोडून! संध्याकाळी थकलेल्या निराश झालेल्या मनाला दिलासा द्यायचा सोडून लांब निघून जाते भरकटत, त्या मनासारखीच! आणि उदास करून जाते. काळोख्या रात्री घाबरलेलं मन नकळतच आसपासच्या आवाजांचा, हालचालींचा कानोसा घेत असतं, आणि त्यांना अचूक टिपण्याचा प्रयत्न करत असतं. त्यावेळी ही नको असणारी सावली हळूच येते आणि भिती दाखवून जाते. एकटेपणाची जाणीव कुठेतरी खोल रुतवून जाते.

अशी ही सावली तिचे अनेक आकार, अनेक रूपं. कांही मनाला भावणारी, तर कांही मनाचा थरकाप करणारी! सांगून, पाहून, वर्णन करून न संपणारी!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिचे माहेरपण आणि… भाग – २ ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆

श्री मयुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

☆ तिचे माहेरपण आणि… भाग – २ ☆ श्री मयुरेश देशपांडे

(राधाक्काच्या चेहऱ्यावर काळजी आणि प्रेम एकाच वेळी दिसून येत होते. “आणि हो डबा मी बनवते खाली. तू त्याला तयार करून खाली घेऊन ये.”) – इथून पुढे. 

राधाक्काविषयी काय सांगणार…  तरूण वयात आई वडिलांशी भांडून शहरवजा तालुक्याच्या ठिकाणी आली. वाट शोधता शोधता वाट चुकली. अध्यात्माची कास धरलेल्या माझ्या बाबांनी तिला वाट दाखवली. आमचीच खालची खोली राहायला दिली. माझ्यापेक्षा थोडी मोठीच पण माझ्या पिढीतली म्हणावे इतकी जवळची. आई बाबांच्या पाठीमागे तिचा आधार राहिला. हिला ना सासूचे रितेपण जाणवू दिले ना आईची आठवण. एवढे असूनही अट्टाहासाने तिने तिची चूल वेगळीच ठेवली. आणि त्या चुलीवर पुढचे चार दिवस आम्ही ताव मारणार होतो.

बाबा ही नाही ती वही, हे नाही ते पुस्तक, हा नाही तो शर्ट आणि ही नाही ती पॅन्ट…. . त्याच्यासाठी सगळेच अवघड होते पण कसेबसे जमवले आणि मुलाला घेऊन तो खाली आला. राधाक्काने दिलेला डबा घेऊन मुलगा शाळेच्या बसमध्ये बसला. मी सुटकेचा श्वास सोडू पाहात होतो, इतक्यात राधाक्काचा मागून आवाज आला, “अजून लेकीचे बघायचे बाकी आहे.” माझा हात कपाळाला जायच्या आधीच ती म्हणाली,

“ बस बस, तुझ्यासाठी चहा आणते.”

जरावेळ वर्तमानपत्र वाचून झाले तसे मी माझ्या पद्धतीने पोहे बनवायला घेतले. त्याचा खमंग वास बहुधा नाकात शिरला असावा, लेक जागी झाली. “आई काय बनवतीयेस ” अंथरूणातूनच आवाज आला. “आई नाही बाबा ” …

” हो पण पुढचे चार दिवस आमच्यासाठी आईच.” … 

” हे बघ तू माझीच फिरकी …” … 

” झाले का बाप लेकीचे सुरू?” खालून राधाक्काचा आवाज. 

” काही नाही प्रेमाचे भांडण “, त्याचे प्रत्युत्तर.

“ येऊ का मी वरती?” राधाक्काने वरचा सा लावताच…  ” नाही नाही, मी चाललीये आंघोळीला.” लेक कधी पळाली कळालेच नाही. नाष्टा झाला, आवराआवर झाली. ती तिच्या अभ्यासाला बसली. तो मध्येच तिच्या खोलीत डोकावला.

“बाबा, एव्हाना आईची परीक्षा सुरू झाली असेल ना?”

“माझी तर सकाळीच सुरू झालीये.”

“काय म्हणालास?”

“काही नाही, झाली असेल परीक्षा सुरू. तुझे आजोबा जाणार होते म्हणे परीक्षा केंद्रावर. परीक्षा संपली की करेल फोन नव्या सूचना द्यायला.”

लेक थोडी शहाणी होती, तिचे दप्तर तिनेच भरले. ” मी वेणी घालून देऊ का? “, त्याने विचारले. 

“नाही नाही, आई असती तरी हे काम राधाक्काचेच आहे.”, असे म्हणत ती खाली पळालीसुद्धा. 

“तिला थोडी मदत पण कर हो”, त्याने मागून सूचना दिली, पण ती ऐकायच्या आधीच लेक राधाक्काकडे पोहचली होती.

तिचाही डबा राधाक्का देणार होती. तेव्हा तो बाकीचे आवरण्यात गुंतला. लेक शहाणी असली तरी पसारा करण्यात मात्र अगदी त्याच्यावर गेली होती. त्याने तिची खोली आवरली आणि पंख्याखाली खूर्ची टाकून बसला. “आपल्या मागे घरात काय काय चाललेले असते ते आपल्याला काहीच माहित नसते.”, तो स्वतःशीच हसला.

मुलगी शाळेला गेली आणि पाठोपाठ मुलगा शाळेतून परत आला. म्हणजे आराम करायची उसंत नाहीच. 

“कपडे बदलून, हात पाय धुवून खाली ये रे. तुझे आणि बाबाचे पान एकत्रच वाढते.” मुलगा जिने चढत असतानाच राधाक्काची आज्ञा आली. आज गरमागरम आणि तेही राधाक्काच्या हातचे जेवायला मिळणार म्हणून मी आणि तोही खूश होता.

” त्याला वर गेल्या गेल्या झोपायला लाव रे. चार वाजता शेजारी शिकवणीला पाठवायचे असते.” वर येता येता आठवण वजा आज्ञा आली. त्याने मुलाकडे आणि मुलाने त्याच्याकडे पाहिले. एकूण काय, आई घरी नसली तरी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार कोणालाच करता येणार नव्हता.

मुलगा शिकवणीला गेला तसा आपणही जरा पडावे असा त्याने विचार केला. जरा डोळा लागतोय न लागतोय तोच मुलगी शाळेतून आली. “आज लवकर?” त्याने विचारले. 

“हो आज शाळेत शिक्षकांचा काही कार्यक्रम होता म्हणून लवकर सोडली.”, तिने तिच्या खोलीत जाता जाता माहिती पुरवली.

 “तू सकाळी आजचे वेळापत्रक बघितले नव्हतेस का?” वर त्यालाच प्रश्न. “अच्छा तेही आम्ही पालकांनीच पाहायचे का?” त्याचे आजच्या दिवसातील आणखी एक स्वगत. 

“बाबा मला जाम भूक लागली आहे, काहीतरी खायला बनव “, लेकीची आज्ञा आली. तो राधाक्काने आवाज द्यायची वाट पाहात होता. पण यावेळी राधाक्का वामकुक्षी घेत असते अशी आणखी एक माहिती मुलीकडून मिळाली.

“बाबा, छानपैकी नूडल्स बनव की.”

“हे बघ नुडल्स आरोग्यासाठी चांगले नसतात आणि म्हणून आईने पण सामानात ते भरले नाहीयेत.”

“कोण म्हणाले तुला? त्या सगळ्यात वरच्या फडताळात तो मोठ्ठा डबा आहे ना, त्यात एकदम खाली पाकीटं असतात. आईने जाण्यापूर्वीच आणून ठेवलेली. फक्त मला सांगून गेली की, भूक लागली आणि बाबा घरी नसला तर तुझ्यासाठी  आणि भावासाठी बनवून घे.”

“हो पण मग मी आहे ना घरी. छान उपमा बनवतो, भाऊपण येईल इतक्यात.”

भावाप्रमाणे तिचाही स्वैराचाराचा प्रयत्न साफ फसला.

संध्याकाळी तिचा फोन आला तोवर मुले खाली खेळायला गेली होती. तिची परिक्षा चांगली गेल्याचे कळाल्याने त्याला आनंद झाला, तर घरी सगळे व्यवस्थित असल्याचे कळल्याने तिला आनंद झाला. रात्री मुलांशी फोन जोडून देतो असे तो म्हटला खरे पण मुले खेळून आल्यावर जेवून कधी झोपी गेली त्यालाच कळलं नाही. आज त्यालाही खूप छान झोप लागली.

दुसरा दिवस असाच गेला. त्याने मोडकातोडका नाष्टा बनवला तर जेवणाचे मात्र राधाक्कावरच सोडले. तिसऱ्या दिवशी मुले चित्रपट पाहायला जायचे व बाहेरच खायचे म्हणून मागे लागली. बाहेर जाणे हा काही फार अवघड विषय नव्हता, तिला कळल्यावर तीही काही म्हटली नसती, पण दोघांना एकट्याने नेणे हे मोठे दिव्यच होते. मुलगा तसा अजून लहान असल्याने त्याचा हात सोडणे शक्य नव्हते आणि मुलीचे आपले हे घेऊ ते घेऊ चालले होते. अधूनमधून त्यांची भांडणे चालू होती ती वेगळीच. आता मात्र त्याला तिची उणीव भासू लागली. तिचा तरी पाय कुठे माहेरी टिकतोय, चौथ्या दिवशी पहाटेच्याच गाडीने परतली. ती येणार असल्याचा मागमूसही त्याला नव्हता. मुलगी दप्तर भरत असताना आवाज आला, ” थांब मी भरते दप्तर. तू तोवर खाली राधाक्काकडे जाऊन वेणी बांधून घे. आणि हो राधाक्काला सांग, आज मी पण आयते जेवायला येतीये.” दोघी मनमुराद हसल्या. मुलगी थोड्यावेळ आईला बिलगली आणि खाली पळाली.

आता आईला बिलगायची पाळी बाबांची होती एवढे कळण्याइतपत ती मोठी झाली होती.

समाप्त  

लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९  https://www.facebook.com/majhyaoli/

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अंतिम पर्वाच्या स्मितरेषा-…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “अंतिम पर्वाच्या स्मितरेषा…” ☆ श्री सुनील देशपांडे

आयुष्याचा ७३ वर्षाचा प्रवास संपवून आज ७४ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. बरंच आयुष्य जगून झालेलं आहे. बाकी आयुष्य फार थोडं उरलेलं आहे याचे जाणीव आहेच. खरं तर या दिवसाला वाढदिवस का म्हणतात हे समजत नाही. आयुष्यातलं एक वर्ष कमी होतं. वाढतो फक्त एक आकडा. जगलेल्या आयुष्याचा.  त्या वाढलेल्या आकडेवारीमुळे  लोकांना या माणसाने काहीतरी केलं असेल असं वाटत असावं.

तसं पाहायला गेलं तर करण्याच्या इच्छा प्रचंड असतात. साऱ्या इच्छा पूर्ण होतातच असे नाही. अर्थात अपूर्ण इच्छाच जास्त असतात. पण तरीही  आयुष्यात समाधान बाळगावं अशा गोष्टी घडल्यास जाताना तरी चेहऱ्यावर स्मितरेषा उमटेल.

बाळ कोल्हटकर यांच्या एका नाटकातील कवितेच्या ओळी आठवतात ….. 

आयुष्याचा माग मिळेना, गुन्हा कळेना जगदीशा ।

कुठे कधी अस्पष्ट हसावी एखादी तरी स्मितरेषा।।

आयुष्यामध्ये चेहऱ्यावर स्मितरेषा उमटण्यासारख्या घटना तशा कमीच असतात.

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे।

परंतु आयुष्याच्या शेवटाकडे असताना सिंहावलोकन करताना काही समाधानाच्या स्मितरेषा नक्कीच चेहऱ्यावर असणार आहेत.

मुले कर्तृत्ववान आणि आई-वडिलांची काळजी घेणारी असावीत हा सगळ्यात मोठा कौटुंबिक समाधानाचा ठेवा. त्याची एक स्मितरेषा !

आपल्या देशात अवयवदान आणि देहदान या सर्व महादानाचे प्रमाण वाढते आहे ही एक सामाजिक स्मितरेषा !!

साहित्य विश्वात छोटीशी लुडबुड करून स्वतःच्या मनाचे समाधान करून घेता आले ही मानसिक समाधानाची अजून एक स्मितरेषा!!!

रोटरी मार्फत समाजाच्या उपयोगाचे काही उपक्रम करता आले त्याची एक आंतरराष्ट्रीय सामाजिक स्मितरेषा!!!!

आपल्या देशाचा झेंडा वैज्ञानिकांनी चंद्रावर फडकवला आणि आता मंगळ पदाक्रांत करून शुक्रापासून सूर्यापर्यंत लक्ष्यांचा पाठपुरावा चालू ठेवला आहे ही राष्ट्रीय स्मितरेषा !!!!!

पत्नीची साथ शेवटपर्यंत (कुणाच्या ? ते माहित नाही) असेलच ४६ वर्षांचा सहवास ही आणखी एक स्मितरेषा !!!!!!

काही मित्रमंडळी, काही नातेवाईक, समाजकार्यातील सहकारी या सर्वांच्या आठवणीमध्ये माझी एखादी तरी स्मृती नक्की असेल याचे समाधान ही एक स्मितरेषा !!!!!!!

अशा अनेक स्मितरेषा या जगातून एक्झिट घेताना चेहऱ्यावर असतील आणि ही समाधानाची लकेर घेऊन या जगातून एक्झिट मिळेल हा आनंदाचा भाग.

(आयुष्याचे शेवटचे पर्व हे पुण्यात घालवता येणे हे, पुण्याचे (?) असले तरी त्यामध्ये आयुष्यभर गमावलेले पुण्य खर्ची पडेल काय ? ही सुद्धा भीती आहेच.)  

आयुष्याच्या शेवटच्या पर्वात आनंदाचे डोही आनंद तरंग या अवस्थेत असणे हे सगळ्यात मोठे भाग्य माझ्या वाट्याला आले याचे समाधान खूप मोठे आहे.

शेवटी माझ्याच एका जुन्या कवितेच्या  ओळी …… 

‘शेवटचे मिटताना डोळे, चेहऱ्यावरती स्मित  विलसावे !’ 

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सोंड नसलेला गणपती… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

सोंड नसलेला गणपती !…  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते.

गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही.

मात्र, दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासून जवळ तिलतर्पणपुरी इथे हे मंदिर आहे. 

आदी विनायक असे या मंदिराचे नाव आहे. 

गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती संबोधले जाते. याला “ नरमुख विनायक “ असेही म्हटले जाते. 

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अलिप्त होण्यातलं सुख… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ अलिप्त होण्यातलं सुख…  ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे. ‘माझी परडी’, ‘माझी फुलं’ ह्या’ मी’ पणाचा भारी अभिमान वाटे.

एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, ‘माझी फुलं’ रहात नसून ‘त्याची फुलं’ होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून रहात. फुलांद्वारे ‘मी पणा’ देखील नकळत देवाला अर्पण होत असे.

खरंच, किती क्षणिक असते, मी पणाचे सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानाने म्हणत असेल, ‘माझ्या कळ्या’ , ‘माझी फुलं’. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त!

आयुष्य देखील असंच असतं. ह्या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझे दागिने, हे किती काळ आपण मिरवणार असतो? एकदा का आपला नश्वर देह अनंतात विलीन झाला की ह्या माझेपणावर आपला काहीही हक्क उरत नाही. हे सगळं तत्त्वज्ञान माहीत असूनही आयुष्यात माझेपणाच्या मिठीतून केवळ वस्तूंनाच नव्हे, तर व्यक्तिंनादेखील सोडणं जमत नाही.

मुलाचं लग्न झालं, तरी आईला स्वतःला मुलापासून अलिप्त करता येत नाही. ‘तिचं घर’, ‘तिचा मुलगा’, ‘तिचा संसार’ सुनेच्या ताब्यात सोपवणं तिच्या ‘पझेसिव्ह’ स्वभावाला जमत नाही. सुनेचं स्वतःच्या वेळेनुसार उठणं, स्वतःच्या वेळेनुसार घर आवरणं सासूला बघवत नाही. सासूचा जीव स्वतःच्या संसारात गुंतलेला असतो. सासरच्या पद्धतीच नवीन सुनेने अंगीकाराव्यात अशी तिची मनोमन इच्छा असते.

वडील जेव्हा आपल्या व्यवसायात मुलाला सामावून घेतात, तेव्हा त्यांच्या पद्धतीनेच मुलाने व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलाला त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करु देण्याइतकं अलिप्त त्यांना होता येत नाही.

आयुष्य जसं जसं पुढे जातं, तसा माणूस त्यात अधिकाधिक गुंतत जातो. गुंतण्यामुळेच कलह निर्माण होतात. सासू सुनेचं पटत नाही, बाप लेकात मतभेद होतात, आई मुलांत वाद होतात. आणि ह्या सर्व संघर्षांचं मूळ कारण असतं, ‘गुंतणं’.

आयुष्यात ‘सोडणं ‘जमलं पाहिजे. केवळ वस्तू अन् व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणी सुद्धा सोडता आल्या पाहिजेत. फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याची फुलं होतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रितं होता आलं पाहिजे. 

आयुष्य सुखदुःखाची झोळी आहे. दुःखं गाळता आली पाहिजेत. दुःखांना ‘डिलीट’ करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लोभ, मोह टाळता यायला हवेत. आशेपासून दूर रहाता आलं, तर निराशेचं दुःख पदरी पडत नाही.

साध्या साध्या गोष्टीतून देखील मोह सुटत नाही. माझ्या फेसबुक पोस्टला ‘लाइक’ केलं पाहिजे. ‘व्हाॅट्स अॅप पोस्टवर कॉमेंट टाकली पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली पाहिजे असा हट्ट, माझ्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे हा आग्रह, मी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे अशी इच्छा, अशा सगळ्या अपेक्षांना जेव्हा पूर्णविराम देता येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीने अलिप्त होता आलं, असा त्याचा अर्थ होईल.

अलिप्त होण्याचा प्रयत्न करुन तरी बघा. मनातील सारं मळभ निघून जाईल. कोसळून मोकळ्या झालेल्या निरभ्र आकाशासारखं  मनदेखील स्वच्छ, सुंदर होईल, ज्यात दुःखद आठवणींचे काळे ढगही नसतील किंवा मोहमयी पांढरे ढग देखील नसतील. 

रिक्त होण्यातही सुख आहे. आपलं जीवन कोणाच्या तरी उपयोगी पडतंय, ही भावनाच खूप सुखावह आहे. पारिजातकाचं झाड तेच तर सुचवतंय. अगणित फुलांचं दान अर्पित करून, परत नव्याने बहरण्यासाठी सज्ज होतोच की बापडा… अगदी रोज… कोणत्याही पाशात न अडकता… अलिप्तपणेच !

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 171 ⇒ पितृ पक्ष और पितृ दोष… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “पितृ पक्ष और पितृ दोष”।)

?अभी अभी # 171 ⇒ पितृ पक्ष और पितृ दोष? श्री प्रदीप शर्मा  ?

आत्मा तो खैर अमर है, हम तो जीवात्मा हैं, क्योंकि हमारा शरीर तो नश्वर है, इसे एक रोज मिट्टी में मिलना है। संसार माया है, जगत मिथ्या है, फिर भी हमने देवताओं को दुर्लभ यह मनुष्य जन्म पाया है।

अजीब दुविधा है, फिर भी, जीना इसी का नाम है।

सूक्ष्म जगत में अगर आत्मा और परमात्मा की बात होती है, तो इस स्थूल जगत में दुष्टात्मा और पापात्मा का भी वास होता है। ये कोई प्रेतात्मा नहीं, जीते जागते हाड़ मांस के ही लोग होते हैं, जो संत पुरुषों और सज्जनों का जीना हराम कर देते हैं। कई अवतार हो गए, कितनी बार पापियों और दुष्टों का सफाया हुआ, लेकिन परिणाम वही, दिन भर चले अढ़ाई कोस। इन अवतारों से तो हमारा अवतारी भला, और नतीजा, स्वच्छ भारत अभियान। ।

अच्छाई और बुराई ही सत्ता पक्ष और विपक्ष है।

पितृ पक्ष इन सबसे परे है।

जब हमारे शुद्ध चित्त पर माया का पर्दा पड़ जाता है, तो हम विकारों के अधीन हो जाते हैं। हमारा सरल स्वभाव काम, क्रोध, लोभ, भय और मत्सर के वशीभूत हो जाता है। रोग और बीमारी हमें घेर लेती है, वैसे ही कहां कम थे दुख जमाने में, जिंदगी गुजर गई कमाने में, और कमाया क्या, हर जगह स्वार्थ और पक्षपात। नतीजा पक्षाघात और हृदयाघात। सोचिए, क्या हालत हो गई होगी हमारी आत्मा की, और शुद्ध चित्त की। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं। इस जीवन से तो मौत ही भली।

तो क्या मरकर आप मुक्त हो जाओगे। अस्मिता, आसक्ति और अहंकार तो मरने के बाद भी किसी का पीछा नहीं छोड़ते। सबसे बदले लेते रहोगे मरने के बाद भी। परिवार वाले अलग परेशान ! बोल गए थे जाने से पहले, सबसे चुन चुन के बदला लूंगा। वाकई बड़े परेशान थे। अच्छा हुआ, मुक्ति पा गए। ।

कितना अच्छा हो, जीव को मुक्तिधाम पहुंचते ही मुक्ति मिल जाए। चित्रगुप्त मुक्ति प्रमाण पत्र जारी कर दे। इनका शरीर शांत हो गया और इनकी आत्मा परमात्मा में विलीन हो गई। प्रमाणित आज की तिथि व वार सहित। लेकिन ऐसा होता कहां है। न जीवन इतना आसान और ना ही मुक्ति इतनी आसान। इसीलिए जो मरने के बाद भी कहीं अटके हुए हैं, भटके हुए हैं, कुछ अतृप्त हैं तो कुछ व्यथित, चिंतित, उनकी आत्मा की शांति के लिए कुछ श्रद्धा सुमन अर्पित कर दिए जाएं तो क्या बुरा है।

इसी जगत में कुछ आत्माएं पवित्र और शुद्ध भी होती हैं। जो संत स्वभाव के होते हैं, जिनका चित्त शुद्ध होता है, अनासक्त कर्म करते हुए अन्य लोगों के लिए भी वे एक आदर्श प्रस्तुत करते हैं। कर भला सो हो भला। सबको अच्छे संस्कारों का पाठ पढ़ाते हुए जब ऐसी पुण्य आत्माएं हमसे बिछड़ती हैं, तो हमारे मन को बड़ा कष्ट होता है।।

उनकी स्मृति कभी मन से जाती ही नहीं। रह रहकर उनकी याद आती है और उनके साथ बिताए स्वर्णिम पल भुलाए नहीं भूलते। जिनका स्मरण मात्र ही मन को पवित्र कर देता है, पितृ पक्ष उनके पुण्य स्मरण का ही तो पल है, जब हम उन्हें अपनी श्रद्धा के पुष्प अर्पित करते हैं। श्रद्धा से बड़ा कोई श्राद्ध नहीं। भाव ही श्रद्धा है और अभाव ही अश्रद्धा।

मनुष्य का सबसे बड़ा धन ऋण मुक्त होना है। सबसे बड़ा ऋण तो हम पर हमारे पितरों का है। अच्छे संस्कारों की जो वसीयत हमें मिली है, उससे ऋण मुक्त इस जीवन में तो नहीं हुआ जा सकता लेकिन उस ओर प्रयास अवश्य किया जा सकता है। उनका श्रद्धापूर्वक आभार और स्मरण। ।

अपने तो खैर अपने ही हैं, इस जगत में कोई पराया नहीं। प्रत्यक्ष और परोक्ष, सभी अपने परायों के कल्याण और मुक्ति की प्रार्थना ही सच्चा पितृ पक्ष है। सर्वे सन्तु निरामया में जीव जन्तु भी शामिल होना चाहिए। श्रद्धा से किया कर्म ही तो कर्म कांड कहलाता है, फिर चाहे वह तर्पण हो अथवा अर्पण ..!!

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – ४” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – ४” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आज सोनमर्ग स्थलदर्शन होते. श्रीनगरहून सकाळी लवकरच निघालो. तिथून सोनमर्ग पर्यंतचे अंतर ८६ किलोमीटर होते. पण संपूर्ण रस्ता घाटाचा, वळणावळणाचा आणि तुलनेने बराच लहान होता. त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. सावकाश जावे लागत होते. या रस्त्यावर मिलिटरीच्या वाहनांची खूपच वर्दळ होती. त्यांची वाहने आली की इतरांना सरळ बाजूला थांबावे लागत होते. एकेका कॉनव्हाॅय म्हणजे ताफ्यात शेकडोनी वाहने असतात. पण अतिशय शिस्तबद्ध रीतीने जातात. एवढ्या प्रतिकूल वातावरणातले त्यांचे हे झोकून देऊन काम करणे पाहून त्यांचे खूपच कौतुक आणि अभिमान वाटला. आमच्या सॅल्युटला ते पण कडक  सॅल्युटने उत्तर देत होते.

सोनमर्गला जायला जवळजवळ चार-पाच तास लागले. पण प्रवासात वेळ कसा गेला कळलेच नाही. सर्वांच्या गप्पा, गाण्याच्या भेंड्या सुरू होत्याच. पण बाजूचा निसर्ग कितीही पाहिला तरी समाधान होत नव्हते.

एका बाजूला उंच पहाड आणि दुसऱ्या बाजूला दरी होती. दरीच्या पलीकडे बर्फाच्छादित उंच पर्वत, मध्येच हिरवीगार कुरणे, मधे मधे स्वच्छ सुंदर सरोवरेही दिसत होती. जिकडे बघावे तिथले दृश्य म्हणजे एक एक चितारलेला कॅनव्हासच वाटत होता. सोनमर्ग इथल्या निसर्ग संपदेसाठी प्रसिद्ध आहे. सोनमर्ग म्हणजे ‘सोन्याची कुरणे’. इथे हिरवळीची मैदानी कुरणे मोठ्या प्रमाणावर आहेत. बर्फाच्या टोप्या घातलेली पर्वत शिखरे आणि हिरवीगार कुरणे ही सोनमर्गची वैशिष्ट्ये आहेत. सोनमर्गला ‘सरोवरांची नगरी’ पण म्हणतात. इथे लहान मोठी असंख्य सरोवरे आहेत. त्यातले ‘विशनसर’ सरोवर तर खूप प्रेक्षणीय आहे. नितळ निळेशार पाणी, सभोवती हिरवीगार कुरणे यामुळे अतिशय सुंदर दिसणारे हे मोठे सरोवर सर्वांना आकर्षित करते. वसंत ऋतूत तर इथे रंगीबेरंगी फुलांनी जागोजागी चादर पसरलेली असते.

असा आजूबाजूचा निसर्ग पहात, प्रवासाचा आनंद घेत आम्ही सोनमर्गला पोहोचलो. इथे ‘बबलू’ या मराठी रेस्टॉरंटमधे  आम्हाला चक्क पिठलं भाकरीचे महाराष्ट्रीयन जेवण मिळाले.

इथून वेगवेगळ्या चार पाच पॉईंटना छोट्या वाहनाने जाता येते. आम्ही तिथल्याच मोठ्या पठारावरून थोड्या अंतरावरील शिखरावर चढून गेलो. तिथून थाजीवास ग्लेशियर दिसते. ते संपूर्ण दृश्य अप्रतिम दिसत होते. त्याच्या समोरच्या उंच शिखरावर बर्फाने घातलेली टोपी म्हणजे जणू हिऱ्याचा मुकुट शोभून दिसत होता. सूर्योदयाच्या वेळी पहिल्या सूर्यकिरणात हा बर्फ पिवळा दिसतो तेव्हा जणू सोन्याचा मुकुट वाटतो. पण तो नजारा आम्हाला त्यावेळी बघणे शक्य नव्हते.

शुभ्र हिमाच्या शिखरावरती

 सहस्त्ररश्मी तळपला

 सुवर्णवर्खी शाल ओढूनी

 सुवर्णहिम झळकला ||

बाजूच्या उतारावर मेंढ्या चरत होत्या. एखाद्या सुंदर चित्रावरच आपण उभे असल्याचा भास होत होता. सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. हाच निसर्ग संध्याकाळी वेगळाच दिसत होता. तो अनुभवत आम्ही परत निघालो.

एकूणच सोनमर्ग इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळेच ते ट्रेकर्सचे सुद्धा आवडते ठिकाण आहे. ट्रेकिंग साठी इथे असंख्य ठिकाणे आहेत. इथले ट्रेकिंग, रिव्हर राफ्टींग प्रसिद्ध आहे. इथेच अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प पण आहे.

सोनमर्गच्या असंख्य नितळ पाण्याची सरोवरे, हिरवीगार कुरणे, रंगीत फुलांचे गालिचे, दऱ्या, बर्फाच्छादित डोंगर अशा नयनरम्य निसर्ग सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली होती. त्याच्या मधूनच जाणाऱ्या नागमोडी घाटाने आम्ही परत आलो.

श्रीनगर, गुलमर्ग, पहेलगाम, सोनमर्ग अशा काश्मिरच्या प्रसिद्ध ठिकाणांच्या दर्शनाने मन भरून आणि भारूनही गेले. खरोखरीच हे नंदनवन भारताचे भूषण आहे. आधुनिकीकरणासाठी इथल्या निसर्गाला कसलीही हानी पोहोचवलेली नाही. म्हणूनच हे अनाघ्रात सौंदर्य आहे तसेच  बावनकशी राहिलेले आहे. हे सर्व पाहून मन तृप्त समाधानाने भरले होते. आमची ही नंदनवनाची सफर आता खरोखरच आनंदाचा ठेवा बनवून राहील.

 – समाप्त –

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुसरी बाजू… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ दुसरी बाजू… ☆ श्री सतीश मोघे

‘प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते ‘, हा वाक्प्रयोग आपण लहानपणापासून वाचलेला, ऐकलेला आणि बऱ्याच प्रसंगी आपली बाजू मांडतांना उपयोगात आणलेला आहे. पहिल्याच भेटीत किंवा एखाद्या प्रसंगी  समोरच्या व्यक्तीने केवळ एखादी कृती करणे, न करणे किंवा एखादे वाक्य बोलणे, न बोलणे यावरून समोरच्याविषयी आपले कायमचे मत न बनविता, काही काळ त्याच्या सहवासात राहून तो ज्या विचाराने चालतो आहे ते विचार, ज्या भावनांचा आदर करतो त्या भावना, त्याच्या व्यथा, वेदना जाणून घेऊन या सर्व जाणीवांच्या संदर्भाने त्याच्या कृती अथवा उक्तीचा अर्थ लावावा, त्याच्याविषयीचे मत तयार करावे, असा या वाक्प्रयोगाचा मतितार्थ आहे.

कोणत्याही नात्यात नाण्याची समोर येणारी बाजू ,ही त्या व्यक्तीने पहिल्याच भेटीत अपेक्षित असलेली केलेली कृती किंवा उक्ती असते, अपेक्षित नसलेली केलेली कृती किंवा उक्ती असते किंवा अपेक्षा असतांनाही न केलेली कृती किंवा उक्ती असते. ही बाजू पूर्णत: त्या व्यक्तीच्या हातात असते. मात्र दुसरी बाजू समजून घेणे, हे त्या व्यक्तीच्या हातात नसून आपल्या हातात असते. आपल्याला अपेक्षित असलेली कृती तिने केली,  आपल्याला अपेक्षित असलेली उक्ती, म्हणजे यथास्थिती प्रेमाचे,कौतुकाचे, आधाराचे, उत्साहवर्धक बोल ती बोलली तर तिची दुसरी बाजू आपल्याला उजळ वाटून ती आपल्याला खूप प्रिय होते, थेट काळजात जाऊन बसते. तेच तद् विरुद्ध  बोलली, वागली किंवा अपेक्षित असे वागलीच नाही, बोललीच नाही तर तिची दुसरी बाजू काळी वाटून ती व्यक्ती अप्रिय होते. अशा पहिल्याच भेटीतल्या भाळण्याच्या किंवा पहिल्याच भेटीतल्या तिरस्काराच्या धावणाऱ्या भावनेला, ‘नाण्याला दुसरी बाजूही असते’ हा विचार वेग कमी करण्याचे स्पीड ब्रेकरचे काम करतो. भावनेला विचारांची जोड देतो.

काहींचे मन मोठे असते. पण हा मनाचा मोठेपणा योग्यवेळी, योग्य कृतीतून, वाणीतून व्यक्त करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नसते किंवा ‘मनाचा मोठेपणा’ ही प्रदर्शन करण्याची वस्तू नाही, असाही त्यांचा अंतरीच भाव असतो. तर काहीचे मन अजिबात मोठे नसते, ते कोतेच असते. पण त्यांचे वागण्याचे,बोलण्याचे कौशल्य  असे काही असते की आपल्याला ते व्यापक हदयाचे, हितचिंतक वाटू लागतात. अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींसमवेत काही काळ राहून, संवाद साधत राहिलो तरच त्यांची दुसरी बाजू, समोर येते. या व्यक्ती अशा का वागतात? याची उत्तरे समजतात. चांगल्या व्यक्तींना न गमावण्यासाठी आणि चुकीच्या व्यक्तींच्या मोहपाशात न अडकण्यासाठी काही काळ जाऊ देणे आणि दुसरी बाजू समजून घेऊन मग निर्णय घेणे केव्हाही चांगले.

अर्थात अशी दूसरी बाजू समजून घेणे अशाच व्यक्तींच्या बाबतीत घडते, ज्या व्यक्ती आपल्याला जीवनात हव्याशा वाटतात. पहिल्याच भेटीत एखादी व्यक्ती आवडली नाही आणि भविष्यात त्या व्यक्तीची आपल्या आयुष्यात निकड नसेल किंवा अन्य कारणांमुळे ती नको असेल तर त्या व्यक्तीची दुसरी बाजू समजून घेण्याची आवश्यकता राहत नाही. मात्र अशावेळी कुठेही बोलतांना त्या व्यक्तिविषयी नकारात्मक, टिकात्मक बोलणे टाळले पाहिजे. कारण त्या व्यक्तीची दुसरी बाजू आपण पुरती समजून घेतलेली नसते. 

दुसऱ्या व्यक्तीची ‘दुसरी बाजू’ समजून न घेता अनेकांजवळ जर तिच्याविषयी आपण नकारात्मक बोललो तर ऐकणाऱ्यांसमोर नकळत आपल्या व्यक्तीमत्वाची नकारात्मक, अंधारलेली बाजू प्रदर्शित होते आणि आपण त्या क्षणी प्रियता गमावतो, आपले मूल्य कमी होते, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. काही प्रसंगात आपलीही दुसरी बाजू असते, दुसऱ्याचीही दुसरी बाजू असते. सकृतदर्शनी दोन्हीही बाजू खऱ्या असतात. अशावेळी आपली दुसरी बाजू बाजूला सारुन, दुसऱ्याचीच दुसरी बाजू समजून घेणे हे आवश्यक असते. हेच मनाचा मोठेपणा दाखविणारे असल्याने जनमानसात तुमची उंची वाढविणारे असते.

एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ज्यांनी त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली होती, त्या प्रसिद्ध लेखकांचा नामोल्लेख पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाकडून त्याच्या भाषणात करावयाचा राहून गेला. प्रस्तावना लिहिणाऱ्या लेखकांनी त्यांच्या भाषणात याविषयी जाहिर नाराजी व्यक्त केली. यात दोघांच्याही ‘दुसऱ्या बाजू’सकृतदर्शनी खऱ्या होत्या. ‘अनेक व्यवधानात नजरचुकीने नामोल्लेख राहिला’, ही लेखकाची दुसरी बाजू. तर ‘मी रात्रभर जागुन, अल्पकालावधीत विनंती आली असतांना, प्रस्तावना लिहिली. लेखकाने भाषणात अनेकांचे उल्लेख केले, आभार मानले. आपलाही उल्लेख आवश्यक होता’, ही प्रस्तावनाकार लेखकमहोदयांची दुसरी बाजू .दोन्हाही बाजू  सकृतदर्शनी खऱ्या. पण मोठ्या माणसानेच मोठे मन दाखवून छोट्याची दुसरी बाजू समजून घ्यायची असते, या प्रस्थापित मूल्याला त्यांच्या कृतीने धक्का बसला आणि त्यामुळे जनमानसात  त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला. उच्च पदावर पोहचलेल्या व्यक्तींवर समाजात वावरताना, व्यक्त होतांना,आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना काय अपेक्षित आहे? ही चाहत्यांची दुसरी बाजू समजून घेऊन कृती होणेही आवश्यक असते.

कोणत्याही नातेसंबंधात आणि त्यातही कौटुंबिक किंवा मैत्रीच्या नातेसंबंधात ‘समोरच्याची बाजू ऐकून घेणे’ याहीपेक्षा ‘ त्या व्यक्तीला समजून घेणे’ अधिक अपेक्षित असते. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी मानवजीवनाची व्याख्या करताना असे म्हटले  आहे की, “माणसात देव आणि दानव दोघांचे अस्तित्व आहे. देवाची प्राणप्रतिष्ठा आणि दानवांचा नाश करण्याकरिता होणारा संघर्ष म्हणजेच मानवजीवन आहे.” प्रत्येकाच्या ठिकाणी चांगल्या-वाईट वृत्ती असतात, गुण-दोष असतात. पण त्याची वाटचाल ही जर अधिक चांगले होण्याकडे, देवत्वाकडे असेल तर अशा व्यक्तीला समजून घेणे गरजेचे ठरते. मानवी जीवनाची ही दुसरी बाजू समजून घेतली,म्हणजे स्वीकारली की समोरच्या व्यक्तीला समजून घेणे सोपे जाते. दोषांचे, अवगुणांचे पाढे न वाचता गुण-दोषांची बेरीज वजाबाकी केली जाते.त्यात गुण अधिक असल्याचे दिसले तर ही अधिक गुणांची ‘दुसरी बाजू’ समजून घेऊन दोषांसह त्या व्यक्तीला  स्वीकारले जाते. बेरीज- वजाबाकीत दोष अधिक असल्याचे दिसले, तर त्या व्यक्तींचा आपण त्याग करतो किंवा दोष अधिक असूनही त्याग करण्याचे धैर्य नसेल किंवा असलेल्या नाजूक नात्यामुळे त्याग करण्याची मनाची तयारी नसेल, तर आहे त्या गुणांवर समाधानी राहून त्या व्यक्तीशी असलेले नाते आपण कायम ठेवतो. दुसरी बाजू  आणि त्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याची प्रक्रिया, आपल्याला नाते  टिकविण्याची  असलेली गरज, आपल्या अंगी असलेले धैर्य, मनाची तयारी, समाजाच्या टिकेचे भय अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. कौटुंबिक नातेसंबंधात दुसरी बाजू समजून घेणे हे बऱ्याचदा आपल्याच सहनशीलतेची परिक्षा असते.

काळाच्या ओघात नात्यांची वीण घट्ट होते. नात्यात आपलेपणा येतो, ओलावा येते. नाते परिपक्व होते. अशा परिपक्व नात्यात समोरच्याची बाजू त्याने न सांगता, न मांडताच ऐकू येते, समजते.ती समजून वागणे घडते. जवळच्या औषधाच्या दुकानात न मिळणारी आयुर्वेदिक औषधे आणायला बाबा मला सांगायचे. ऑफिसमधून निघाल्यावर कामाचा थकवा, ट्रॅफिक या सर्वात बऱ्याचदा लक्षात असूनही मी कंटाळा करायचो. घरी आल्यावर बाबा कधीही ‘औषध का आणले नाही?’ याचा जाब विचारत नसत. दुसऱ्यादिवशी ते फक्त एव्हढेच म्हणायचे ‘आज जमले तर आण.’ दुसऱ्याला जाब विचारून, त्याची दुसरी बाजू ऐकून मग आपले समाधान करून घ्यायचे, अशी लांबची प्रक्रियाच तिथे नव्हती. समोरचा, ‘तसेच योग्य कारण असल्याशिवाय  असे वागणार नाही, बोलणार नाही’, हा समंजस भाव व्यापक असला की,दुसरी बाजू न सांगताही समजते आणि समोरच्यालाही, झालीच चूक, तरीही आपली बाजू मांडण्याचे अवघड काम करण्याची आवश्यकता राहत नाही.नाती अधिक आरामदायी, सुखदायी, समृद्ध होतात. 

बऱ्याचदा ज्या व्यक्तीशी आपला कधीही प्रत्यक्ष संबंध आलेला नाही आणि आपण केवळ एक नामांकित, मोठी व्यक्ती म्हणून तिला ओळखत असतो अशा व्यक्तीच्या जीवनात जर एखादी  घटना घडली तर अशा घटनांबाबत सत्याची एक तिसरी बाजूही असते हेही लक्षात ठेवावे. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, प्रसिद्ध अभिनेते जर रविंद्र महाजनी यांचा मृत्यू ही याची उदाहरणे देता येतील. त्यांच्या निधनाची आलेली बातमी ही  त्या घटनेची पहिली बाजू होती. माध्यमांनी माहिती मिळवून मांडलेली बाजू दूसरी बाजू होती. पण सत्याची तिसरी बाजू  गेलेली व्यक्ती आणि त्यांच्या नातलगांनाच माहिती होती. तेव्हा अशा प्रसंगात दुसरी बाजू माहीत झाली तरी तिसरी बाजू ज्ञात नसल्याने दुसऱ्या बाजूच्या आधारे कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे उचित नसते.

असं म्हणतात की, चंद्रावर पोहचल्यावर चांद्र यानाला असे जाणवले की, ‘चंद्र माणसासारखाच आहे. त्यालाही दुसरी, काळी.. अंधारलेली बाजू आहे. पण तो, प्रकाशित बाजूच नेहमी सर्वांसमोर ठेवून आपला प्रभाव पाडत असतो.’ बऱ्याचदा ही दुसरी  काळी ,अंधारी बाजू ‘हे असेच असायचे’ याची खूणगाठ बांधून, त्याकडे दुर्लक्ष करून, उजळ बाजूकडे बघत ,आहे ते नाते टिकविण्यासाठी,  त्यात आनंद घेण्यासाठीच जाणून घ्यायची असते.

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares