आज मलाही वाटलं नभातून खाली उतरून यावे. तुझे चरण स्पर्शाने पवित्र व्हावे.. नेहमीच तुझ्या अवतीभवती असतो लता तरूंचा घनदाट काबिला, श्वापदांच्या पदभाराने त्या भुईवरची पिकली पानांचा नाद कुरकुरला..विविध रानफुलं नि पर्णांच्या गंधाचा परिमळाचा अत्तराचा फाया कुंद हवेत दाटून बसला..पान झावळी अंधाराच्या कनातीत सुस्त पहुडलेला असतो धुक्याचा तंबू.. गगनाला भेदणारे इथे आहेत एकापेक्षा एक उंच च्या उंच बांबू.. विहंग आळवती सूर संगिताचे आपल्या मधूर कंठातून शाखा शाखा पल्लवात दडून..दवबिंदुचे थेंब थेंब ओघळती टपटप नादाची साथ साधती त्यासंगितातून… तुझे ते वरचे शेंड्याचे टोक बघायला रोजच मिळत असते मजला.. किती उंच असशील याचा अंदाज ना बाहेरून समजला… नभ स्पर्श करण्याची तुझी ती महत्त्वकांक्षा पाहून मी देखील निश्चय केला आपणही जावे तुझ्या भेटीला आणि व्हावे नतमस्तक तुझ्या पुढे… सोनसळीच्या किरणाचे तुझ्या पायतळी घालावे सडे…अबब काय ही तुझी ताडमाड उंची..त्यावर काळाकुट्ट अंधाराची डोक्यावरची कुंची..किती थंडगार काळोखाचा अजगर वेटोळे घालूनी बसलाय तुला.अवतीभवती तुझ्या हिरव्या पिवळ्या पानांफुलाचा पडलाय पालापाचोळा.. कुठला दिवस नि कुठली रात्र याचे भान असे का तुला.जागं आणण्यासाठी रोजच यावे तुझ्या भेटीला वाटे मजला.बघ चालेल का तुला? एक नवचैतन्य लाभेल मजमुळे तुजला..? प्रसन्नतेची हिरवाई हरखेल नि हसवेल तुझ्या भवतालाला.. पिटाळून लावेल तुझ्या उदासीपणाला.. मग बघ असा मी रोजच येत जाईन चालेल का तुला?.
दूर कुठे प्रवास करायचा तर जुनी गाणी ऐकत प्रवास करायला बहुतेकांना आवडते.
तसेच मी पण लांबच्या प्रवासात गाणी ऐकताना जावेद अख्तर यांचे जगजीत सिंह यांनी गायलेले
तुमको देखा तो ये खयाल आया । जिंदगी धूप तुम घना साया।
हे गाणे लागले होते. पळणारी झाडे घरे पहात हे गाणे ऐकताना विचारांनाही चाके लागली आणि त्यात मन रंगून गेले.
खरेच आयुष्य जगायचे म्हणजे त्यामधे कोणीतरी भक्कम साथ देणारे असावेच लागते. मग ती साथ जोडीदाराची , मित्र/मैत्रिणीची, आई-वडिल, मोठ्या व्यक्तींची, हितचिंतकांची असो. पण जीवनातील सुख दु:खे आपण कोणाबरोबर तरी वाटून घेतली तर जगण्याची मजा कितीतरी पटीने वाढते ना?
अशावेळी आपल्या आयुष्यातील त्या व्यक्तीचे स्थान अनन्यसाधारण होऊन जाते. ते किती अनमोल आहेत हे सांगायलाच आपल्या जोडीदाराला उद्देशून लिहिलेले जावेद अख्तरांचे हे शब्द.
जोडीदाराबद्दल जरी लिहिलेले शब्द असले तरी आपल्या आयुष्यात असलेल्या अनन्यसाधारण महत्वाच्या कोणत्याही व्यक्तीला हे शब्द अगदी लागू पडतात.
ज्याच्यामुळे आपले आयुष्य घडते, ज्याच्यामुळे आपण संकटावर मात करू शकतो, ज्याच्यामुळे मनाला एक उमेद मिळते, त्याबद्दल असे विचार येतात. जेव्हा मन पोळलेलं असत, संकटांनी घेरलेलं असतं तेव्हा त्याला शीतलता देणारं, आशा दाखवून चांगली वाट दाखवणारं असतं तेव्हा त्या व्यक्तीबद्दलचा आदर वाढलेला असतो.
नवर्याच्या यशामागे भक्कमपणे उभी राहिलेली पत्नी, मुलांना मोठे करण्यासाठी दिवसभर राबून कौतूक करणारे आई-वडिल, होतकरू हुषार मुलाला चांगल्या शिक्षणासाठी मदत करणारे शिक्षक, संकटात सापडलेल्या मित्राला मदतीचा हात देऊन कायम त्याच्या बरोबर रहाणारा मित्र, कोणा चांगल्या मुलाला अनुभवाचे बोल सांगून त्याच्या मनाला उभारी देणार्या मोठ्या व्यक्ती, एखाद्याचे चांगले गुण ओळखून त्या गुणांना प्रोत्साहन देणारे हितचिंतक हे सगळे मग घना छाया होतात आणि ओठी शब्द येतात जिंदगी धूप तुम घना साया•••
पण याही पेक्षा मोठा अनुभवही आला. आमच्या समोरच रहाणार्या ८५ वर्षाच्या आजी. काही दिवसांपूर्वीच त्यांचे यजमान वारले. मुलगा परदेशातून येऊन काही दिवस राहिला. पण नंतर त्याला जावेच लागले. मुलगी पण सासरी गेली.
मुलगी म्हणाली चल माझ्या सोबत. मुलगा पण म्हणाला तुला तिकडे परदेशात नेतो. पण आजीचा हट्ट जो पर्यंत माझे हातपाय धड आहेत तो पर्यंत मी कुठेच येणार नाही. अगं पण तू एकटी कशी राहशील? मुलांनी काळजीपोटी ते पण विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, मी एकटी कुठे? माझ्या बरोबर तो तारणहार आहे ना . तो करेल सगळं नीट. आजपर्यंत माझे सगळे सुख दु:ख मी त्याला सांगत आले आणि कोणत्या ना कोणत्या रुपाने त्यानेच तर माझी मदत केली.
यावेळी पण तो माझ्या सोबत आहे आणि इथून पुढेही राहील.
दूर कुठे तरी तेच गाणे लागले होते तुमको देखा तो ये खयाल आया••• आणि लगेच सगळ्यात श्रेष्ठ तो परमेश्वर आहे याची खात्री पटली आणि जिंदगी धूप तुम घना साया या गाण्याची प्रार्थना झाली.
शेजारच्या सिंधूताई परवा खूप दिवसांनी भेटल्या. अमेरिकेला दोन्ही मुलांकडे गेल्या होत्या, म्हणाल्या. दोन्ही मुलांनी आणि सुनांनी अगदी व्यवस्थित आदरातिथ्य केलं. जवळपासची सगळी ठिकाणे दाखवली. अमेरिकन व इतर वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले. दर शनिवार – रविवार कुठे ना कुठे जात होत्या. कुठे काही कमी पडू दिले नाही, पण चार महिने तेथे राहिल्यावर मलाच कंटाळा आला. घरचे विचार मनात येऊ लागले. सकाळ झाली की मॅार्निंग वॅाकचा रस्ता मला बोलावू लागला. घरची साफसफाई, वाणसामान भरायचे मला डोळ्यांसमोर दिसू लागले, काही म्हणा पण आपलं घर ते आपलं!
सिंधूताईंचे बोलणे मला १००%. पटले.खरंच प्रत्येकालाआपलं घर किती प्रिय असतं! आपण ८-१० दिवस बाहेर राहिल्यावर आपल्याला लगेच कंटाळा येतो.कधी एकदा घरी जाऊ असं होतं. २-४ दिवस बाहेरचे खाल्ले की कधी एकदा वरण भात का होईना, तो घरचा खाऊ असे होऊन जातं.
घरातील प्रत्येक वस्तूवर आपलं अधिराज्य असतं .काही वस्तूंशी आपल्या आठवणी निगडीत असतात.हा इतकी वर्षं चाललेला कुकर, मला मीनामावशीने माझ्या लग्नात प्रेझेंट दिलेला.उषामामीने मंगळागौरीला पुरण यंत्र दिले होते. मला मोत्याचे दागिने आवडतात म्हणून पाडव्याची ओवाळणी म्हणून नवऱ्याने मोत्याचा तन्मणी व बांगड्या घेतलेल्या. वाचनाची आवड म्हणून साठवलेल्या पैशांतून चांगल्या कादंबऱ्या, आत्मचरित्रे आपण घेतली होती. काश्मीरहून आणलेल्या शाली,बेंगलोर सिल्क, आग्र्याहून अगदी जपून आणलेली ताजमहालाची छोटी प्रतिकृती अशा एक ना अनेक वस्तूंच्या आठवणी आपल्या मनात पिंगा घालत असतात आणि न कळत त्या वस्तू आपल्या होऊन जातात.
आपले स्टीलचे कटोरे, ताटल्या, वाट्या भांडी, पोळपाट लाटणे इतके ओळखीचे झालेले असतात व त्यांची इतकी सवय झाली असते की नवीन पोळपाटावर पोळी लाटायला त्रास होतो. बऱ्याचजणांना जागा बदलली, कॅाट बदलली की झोप लागत नाही.
आपल्या घरात आपण free bird असतो. आपल्यावर कुणाचे बंधन नसते.एखादे वेळेस बरे वाटत नसेल, तर आपण आपल्या घरात दिवसभर झोपून राहू शकतो. दुसरीकडे आपल्याला संकोच वाटेल.
प्रत्येकाला आपले घर देवाने लावून दिले आहे.पक्षीसुद्धा संध्याकाळ झाली की आपल्या घरट्याकडे परततात. गुरेढोरे, गायी वासरे आपापल्या घरी परततात. तर असं हे आपलं ते आपल्याचे महत्त्व आहे. घर कसेही असो, ते आपले असते.
लेखिका : सुश्री वीणा घाटपांडे
संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(श्रावणातला प्रत्येक दिवस हा त्या त्या देवतेची पूजा करण्याचा असतो.सणावाराला रेलचेल असणारा ऋतू !)
चौथा ऋतु शरद! स्वच्छ निरभ्र आकाश, रात्रीचं टिपूर चांदणं, ते पिण्यासाठी आतुर चकोर, काव्याच्या चांदण्याची बरसात,’ चांदणे शिंपीत जाशी’, ‘ टिपूर चांदणे धरती हसते’, ‘चांदण्यात फिरताना’ ! सण म्हणाल तर शारदीय नवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा! कोजागिरीला (शरद किंवा आश्विन पौर्णिमा असेही म्हणतात) चंद्राची पूजा करायची, त्याला ओवाळायचं , चंद्र हा मातृकारक म्हणून मातृत्वाचा पहिला पाझर अनुभवण्याचं सुख दिलेल्या ज्येष्ठ अपत्याला ही ओवाळायचं, चंद्राच्या सर्वात प्रखर अशा चांदण्याची गुण शक्ती दुधाद्वारे प्राशन करायची, आनंदा बरोबर कृतज्ञता ही व्यक्त करायची. कुठे थिल्लरपणा नाही,सारं वैचारिक, जाणिवांचं नेणतेपण जपणारे सण! आणखी कोणता सण? विचारू नका. वर्णन संपणारच नाही. मी वर्णन करणार पण नाही.फक्त डोळ्यासमोर पणत्यांची आरास, आकाशदिवे, फराळाची ताटं आणा आणि कल्पनेतल्या आनंदात बुडून जा.
अर्थात दिवाळी हा सण मराठी महिन्याप्रमाणे येत असल्यामुळे कधी शरदात तर कधी हेमंतात येतो.
पाचवा ऋतू हेमंत! गार बोचरा वारा, हुडहुडी भरणारी थंडी, गोधडीच्या उबेत शिरणारी, अगदी रविवारी तर दुपारी सुध्दा गोधडी घ्यायची, झोप लागली नाही तरी गुडूप पडण्यात मजा असते, मग उठल्यावर गरम भजी लागतेच. दारोदारी शेकोटीच्या गप्पा, गाण्यांच्या भेंड्या रंगतात.मग येतो धुंधूर मास, सूर्याचा धनू राशी प्रवेश!आरोग्य शास्त्र आणि भक्ती यांचा संगम! पहाटे विष्णू पूजन ( काकडा) मग सूर्य पूजन करून, नैवेद्य दाखवून सूर्योदयाला जेवणे महत्त्वाचे!खिचडी, बाजरीची भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा, भाज्या, गाजर हा आहार असतो. ब्राह्म मुहूर्ताला आराधना, नामस्मरण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. सूर्याचा मकर राशी प्रवेश झाला की धनुर्मास संपतो.मग संक्रांत, तिळगुळ, हळदीकुंकू, नव्या वधूचा सण, लहान बाळाचं बोरन्हाण अशा सामुदायिक सणांची रेलचेल, भाज्यांची सम्राज्ञी शाकंभरी,तिचं नवरात्र, असा हा आरोग्यदायी ऋतु!
सहावा ऋतू शिशिर! सुरवातीला हेमंतासारखा, थंडी जरा आणखी वाढवणारा! दवबिंदुंनी नटलेली सृष्टी, पण पुष्पहीन झाल्यामुळे थोडासा उदास वाटणारा! जणू हा थकलेल्या सुष्टीला निजायला सांगतो, परत नव्या उत्साहानं वसंताचं स्वागत करण्यासाठी! तरी रंगीबेरंगी पानांचा सडा, गुलमोहरा सारखं सौंदर्य मनाला मोहून टाकतंच ! पडलेल्या पानांची होळी करून परिसर स्वच्छ करायचा आणि रंगपंचमीला रंगांची उधळण करूनआनंद साजरा करायचा,कारण वसंत येणार!
ऋतूंचे वर्णन आलं म्हणजे कालिदास आठवणारच. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘ ऋतुसंहार ‘,यात सगळ्या ऋतूंचे क्रमाने वर्णन आहे. त्यांची सुरवात ग्रिष्माने तर शेवट वसंताने आहे. एकतर कालिदासाच्या सर्व रचना सुखांत आहेत म्हणून असेल किंवा अथर्ववेदाच्या सहाव्या कांडात पहिला ऋतू म्हणून ग्रीष्म आहे, त्यामुळे असेल. कालिदासाच्या या ‘ ऋतुसंहार ‘ ची अगदीच एक दोन वाक्यात ओळख करून देण्याचा हा प्रयत्न!
ग्रीष्म ऋतूत शीतल चंद्र हवासा वाटतो, पण गारवा मिळवण्यासाठी कारंजाचा उल्लेख कवीने केला आहे आणि एरवी एकमेकाच्या जीवावर उठणारे प्राणी सुध्दा आता एकदिलाने जलपान करताहेत, असे वर्णन आहे.
वर्षा ऋतू राजाप्रमाणे वाजत गाजत येतो, स्त्रिया पाण्याने भरलेले घडे त्याच्या पायावर घालत आहेत, शृंगारलेले हत्ती, चौघडे पुढे चालले आहेत, कमळे नसल्याने भुंगे भ्रमित झाले आहेत, त्यामुळे ते मोराच्या पिसाऱ्यावर भाळले आहेत.
शरद ऋतू मधे कोजागिरीच्या चांदण रात्री धरती आणि आकाश दोन्हीकडे समृद्धीची भरती आली आहे. तळ्यात राजहंस फिरू लागले आणि आकाशात चंद्रमा! कवीला निसर्गाकडे पाहून स्त्रीचा शृंगार दिसतो तर स्त्री च्या शृंगारात निसर्ग सापडतो.
हेमंत ऋतू चे वर्णन करताना कर्नाटकातील बेलूर मंदिरावर दर्पण सुंदरीचे अप्रतिम शिल्प आहे, त्याचा आधार घेऊन हेमंत ऋतूतील शृंगाराचे वर्णन केले आहे.
शिशिर ऋतू फारसा न आवडणारा असावा, कारण कवी हिमालय परिसरात राहणारा असल्यामुळे हिमवर्षाव, हिमांकित थंड रात्रीचे वर्णन आहे.शेवटच्या श्लोकात संक्रांत सणाचा उल्लेख आहे.
वसंत ऋतू खूपच आवडता!
शृंगार रसाची मनापासून आवड असल्यामुळे या ऋतूचे वर्णन फार सुंदर केले आहे. मदन जणू योद्धा बनून काम युद्ध जिंकण्यास निघाला आहे असे वर्णन केले आहे. आंब्याचे झाड, त्याचा आकार, सावली, त्याचा डौल, मोहराचा धुंद करणारा गंध, कोकिळेला फुटलेला कंठ, रस रंग व गंध यांचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असणारा आंबा यांचे रसाळ वर्णन कवीने केले आहे. वसंत म्हणजे फुलांनी नटलेली झाडे, रंगांची उधळण आहे, वसंत हा ऋतूंचा राजा त्यामुळे त्याच्या डौलाचे भरभरून वर्णन केले आहे, वसंत पौर्णिमेचा ही उल्लेख आहे.
विरोधी प्रतिमा वापरण्याची शैली, अप्रतिम कल्पना विस्तार, उपमांची खाण कवीकडे आहे, शब्द सौंदर्याच्या बाबतीत तर कालिदासांचा हात कुणीच धरू शकत नाही. कारंज्याला ते जलयंत्र संबोधतात. पक्षी, प्राणी, फुलं, झाडं यांची इतकी विविध नावं वापरली आहेत की वाचणारा संभ्रमित होतो.उदा. प्राजक्ताला शेफालिका, जाई ला मल्लिका आणि कितीतरी! आता पुष्कळ कवींनी कालिदासाच्या काव्यांचा मराठीत भावानुवाद केला आहे त्यामुळं आपणही त्या काव्यांचा रसास्वाद घेऊ शकतो.
असे हे ऋतुचक्र, त्यातले ऋतु एकामागून एक त्याच क्रमाने येणारे, कधीही न थांबणारे, म्हणून अविनाशी ठरलेले, आपल्याही आयुष्यात बदल घडवून आणणारे, त्यामुळे आपलं आयुष्य सुसह्य करणारे!
☆ “उरलो आहे दोन दिवसांपुरता…” ☆ श्री कचरू चांभारे ☆
पशूपक्षांनो एकदा भेटून जावा ..
काल फोन आला म्हणून वडाखाली थांबलो.फोन कट झाला म्हणून पुढे निघणार एवढ्यात जुनाट वटवृक्षाचा आवाज कानी आला.
“ आता माझा आसरा, विसरा. माणसाच्या विकासाचा रस्ता डोंगर सपाटीकरणातून व रस्ते रूंदीकरणातून जातो म्हणतात. रूंद दृष्टी नसलेल्या विकासकाला आधी खुपते झाडाचे अस्तित्व अन् सुरू होते झाडांची खुलेआम लंगडतोड, बेसुमार नृशंस हत्या.’
“ जंगल नावाच्या आमच्या आप्तातील जवळचे शेजारी भावकीतील लहानमोठी वड, सोयरे असलेले बाभुळ, लिंब धाराशयी झाले आहेत.यांत्रिक करवतीचे करकर आवाज माझ्या कानात घुमत आहेत. वर्षानुवर्षे वादळवारा ऊनपाऊस यांना समर्थपणे तोंड देणारे माझे भक्कम शरीर इवलुशा करवतीच्या करकरीने थरथर कापत आहे. पूर्वी कुऱ्हाडीने वृक्षतोड असल्यामुळे आमचा जीव जायला बराच वेळ लागायचा .घाव झेलत , कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणत ,दांड्याला नावं ठेवत कुऱ्हाड पात्याला व घाव घालणाऱ्या हाताला सहीसलामत सोडत मृत्यूशय्येवर काही दिवस तरी नक्कीच जायचे. आता तेजतर्रार कर्रकर्र करवतीच्या पापात दांडा म्हणून आमचा भाईबंद नाही. करवतीचा वेग व धार इतकी जलद आहे की शेकडो वर्षे लागलेलं, कमावलेलं वटलेलं आमचं शरीर क्षणात भुईसपाट होतं.करवतीच्या धारेमागे. माणसाचा वेगवान हैवानी दिमाख आहे हे कळल्यामुळे आता आम्ही आमच्या गोतास नाव ठेवत नाही व करवतीलाही दोष देत नाही. शेजारच्या मरणासन्न झाडाचं दुःख करायला सवडच नाही कारण वीज चमकण्याच्या अवकाशातच काही क्षणातच शेजारचे दुसरे झाडही लगेच धाराशयी.”
“ माझा शेंडा कॅमेरा बनून शेजारचा विध्वंस पाहतो आहे. पारंब्याला त्याने मरणाला तयार राहा म्हणून संदेश दिलाय. मृत्यूचे भय सर्वच सजीवाला असतं कारण मृत्यूचे दुसरं नाव अस्तित्व अंत आहे. वाटसरूंना ऊन्हात सावली दिली. पावसात आडोसा दिला. वादळात सहारा दिला. वाळलेल्या पानाआड किड्यामुंग्यांना घर दिले,अन्न दिले, जमिनीला कस दिला. पक्षांना घरटी दिली.अंडे पिल्ल्यांची राखण केली. भिरभिरत्या ढगांना थांबवलं.- मातीत रिचवलं .नदी ओढे तृप्त केले. पशूपक्षांनो माझे उरलेत दोनच दिवस ,या अन् भेटून जा. उगवतीवेळी व मावळतीवेळी जोरजोरात किलबिलाट करा. मला पक्षांचा आवाज ऐकत मरायचे आहे.”
“तुमच्या माणसातले महामानव क्रांतीसूर्य जोतिबा फुले म्हणायचे …
☆ चारचौघातला नवरोबा… लेखक : अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
नातेवाईक जमलेले असतात. गप्पाटप्पा , खेचाखेची करता करता कोणीतरी बहिणाबाई ‘काडी टाकते’. आपल्या बंधुराजांबाबत म्हणते,
“सुनील आमचा साधा आहे बिचारा.” हेच स्टेटमेंट मित्रमंडळी जमलेली असली तर त्या सुनीलच्या मित्राने केलेले असते.
हे किंवा याच टाईपची इतर केली जातात जी स्टेटमेंटस्, ती म्हणजे..
आमचा सुनील कसा शांत आहे,
न चिडणारा आहे,
कसल्याही खोड्या नसलेला आहे.
वगैरे वगैरे.
झालं. हे अस जर कोणी बोललं की सुनीलची बायको सरसावून बसते.
अन सुरू करते अटॅक-
“काय म्हणालात? आमचे हे अन साधे बिचारे? एकदा या घरी चार दिवस राहायला. मग कळेल.”
अन मग वहिनी पाढा वाचतात. त्यांच्या ह्यांचा.
हे आमचे कसे साधे बिचारे नाहीत,पक्के ‘हे’ आहेत,
त्यांच्या दिसण्यावर अजिबात जाऊ नका,
लांबून तसं वाटत असेल. मी रोज सोबत असते. खरं काय ते माझं मलाच माहीत,न बोलून शहाणे आहेत, आपल्याला हवं तेच करतात,जेवणाच्या बाबतीत पक्के खोड्याळ आहेत,जरा म्हणून चालवून घेणार नाहीत, हे असं हवं..म्हणजे तस्संच हवं”….अन काय काय.
वहिनी हा पाढा वाचत असतात, तेव्हा त्या नवरोबाचा चेहेरा अगदी पाहाण्यासारखा असतो, बरं का. गालातल्या गालात हसून तो बायकोच्या बोलण्याला जणू मूक संमतीच देत असतो. दुसरा पर्यायच नसतो त्याच्यापुढे. ‘बायकोदाक्षिण्य’. ते दाखवायलाच लागते.
एकूणच, “हे आमचे कसे साधेसुधे नाहीत. मी म्हणून कशी चालवून घेते”, असा टोन असतो. म्हणजे …’पहा, माझ्यावर कसे अत्याचार, जबरदस्ती,… हालाची परिस्थिती आहे’ असले काही गंभीर सांगायचं नसतं बरं का.
घरात दोघांचं छान चाललेलं असतं . खरंतर ‘तिचंच’ घरात चालत असतं . हे सगळं लटक्या रागात चालू असतं. गमतीत. अन हे युनिव्हर्सल असतं बरं का.
पण…‘नवरोबा’ म्हटला की तो असाच हवा, चारचौघांसमोर त्याचं रूप असंच ‘कडक’ असायला हवं, असंच सगळ्या बायकांना वाटत असतं. त्यासाठी ही धडपड. हे सारं ‘तिचं’ ‘त्याला’ बोलणं हे काणेकर म्हणतात त्या प्रमाणे ‘थापा’ या शब्दात मोडणारं. निरुपद्रवी. गमतीगमतीतलं.
पण हे स्वातंत्र्य नवरोबांना मात्र नसते बरं का. तो म्हणू शकतो का चारचौघात, अगदी गंमत म्हणून देखील? “ही? साधी बिचारी? चांगली पक्की आहे. घरी पहा येऊन कधी!”
चुकून म्हटलं त्याने, तर त्याचं घरी गेल्यावर काही खरं नसतं!
वेलींवर धुंद बहर यावा, निसर्गाने रंग आणि गंध यांची उधळण करावी, फुलपाखरांचे थवे पाहून नयन तृप्त व्हावेत, पक्ष्यांच्या मधुर कूजनाने आसमंत भारून जावा, हळू हळू चोचीत काड्या घेऊन पक्ष्यांचं विणकाम सुरू व्हावं, अशी जर निसर्गात आनंदाची बरसात असेल तर आपलं मन ही त्यात भिजून चिंब होतं. दिवस बदलत जातात, आणि एक दिवस पानगळ सुरू होते. पक्ष्यांचा आधारच नष्ट होतो. पण कुठे त्रागा नाही, कासाविशी नाही, फक्त वाट पहायची पुन्हा बहर येण्याची! निसर्गाची हीच शिकवण आहे, पुढे चालत रहायचं,फक्त चालत रहायचं! बोरकरांची ध्यासपंथे चालणारी ती देखणी पाऊले असतील तर, वाट कशी आहे याची काळजी करायचं कारणच नाही.
रोज उद्याची नव्यानं वाट पाहायची. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस वेगळा असणार आहे. त्यामुळेच तर जगण्यात मजा आहे. ही मजा आणखी वाढविण्यासाठी निसर्गाने ऋतु निर्माण केले असावेत. ऋ म्हणजे गती, ऋत म्हणजे क्रमाने येणारी गती, ऋतु म्हणजे क्रमशः विशिष्ट गतीने पुन्हा पुन्हा येणारे. भारतात आपण सहा ऋतू मानतो त्यांची नावे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर!प्रत्येक ऋतु सुखावह असो किंवा नसो त्या त्या वेळी वेगवेगळे सण साजरे करून आपण ते आनंदी करतो.
वसंताने आपले नववर्ष सुरू होते आणि शिशिराने संपते. जणू नव्या पालवी बरोबर नव्या आकांक्षा, नवं ध्येय, नवा उत्साह वसंत देतो, म्हणून ही नव्या वर्षाची सुरवात! आपोआपच शेवट शिशिराने होतो. जसं पालवी बहरते, पाने, फुले, फळे, शाखा यांनी झाडाची वाढ होते. ही पाने वर्षभर नको असलेल्या गोष्टी काहीही त्रागा न करता साठवतात. वर्षाच्या शेवटी हा सगळा कचरा झाडं अलगद शरीरापासून वेगळा करतात. कारण त्याला माहीत असतं, नवी पालवी फुटणार आहे. आपलं पण असंच असावं, नव्या उमेदीने वर्षाची सुरुवात करायची. जे जे दुःख पदरी पडलं असेल ते हळूच मनाच्या एखाद्या कोपऱ्यात साठवावं अगदी कचरा समजून, आणि असंच मनापासून अलगद वेगळं करून टाकावं, परत नवी उमेद भरून घेण्यासाठी!
वास्तविक कललेली पृथ्वी, तिचे सूर्याभोवती (लंबवर्तुळाकार) व स्वतःभोवती भ्रमण यामुळे जलवायुचे भिन्न भिन्न कालावधी निर्माण होतात. त्यांना ऋतू म्हणतात. भारताचं खास वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य व ईशान्य मोसमी वारे त्यामुळे पावसाळा हा स्वतंत्र ऋतु असतो. सूर्य मृग नक्षत्रात आला की पावसाळा सुरू होतो आणि हस्त नक्षत्रात आला की संपतो.अशी नऊ नक्षत्रे पावसाची असतात.असे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांचा हिशेब चार चार महिन्यांचा असतो. त्यातले बारीक फरक लक्षात घेऊन होतात सहा ऋतू, दोन दोन महिन्यांचे!
आपण जरी चैत्र,वैशाख महिन्यात वसंत आणि याप्रमाणे क्रमाने दोन दोन महिने एक एक ऋतु असं मानलं असलं तरी हे मराठी महिने अंदाजे ऋतू सांगतात कारण प्रत्यक्षात हे चांद्रमास आहेत, म्हणजे पौर्णिमा, अमावस्या यावर ठरणारे आणि ऋतु हे सूर्याभोवती च्या भ्रमणामुळे होत असल्यामुळे त्यांचा आपल्या मराठी महिन्यांशी काही संबंध नसतो. म्हणून ऋतु आपले रंग त्या मराठी महिन्यात दाखवेलच असे नाही.
आकाशातील तारका समुहावरून आपण २७ नक्षत्रे ठरवली आहेत. सव्वा दोन नक्षत्रांची एक रास होते. अशा बारा राशी आहेत. म्हणजे सूर्य प्रत्येक महिन्यात एक रास ओलांडतो. त्याला सूर्य संक्रांत म्हणतात. (उदा.मकर संक्रांत,कर्क संक्रांत) सहा ऋतु मधे शिशिर, वसंत, ग्रीष्म हे उत्तरायणात होतात .२२ डिसेंबर,पासून उत्तरायण सुरू होते ,याचदिवशी शिशिर ऋतु सुरू होतो. पृथ्वी सूर्याच्या जास्त जवळ जवळ जाऊ लागते म्हणून तापमान हळू हळू वाढत जाते. दिवस मोठे व्हायला सुरवात होते. तर वर्षा, शरद, हेमंत हे दक्षिणायनामुळे होतात. २१ जून ला दक्षिणायन सुरू होते,ह्याच दिवशी वर्षा ऋतू सुरू होतो.त्यानंतर पृथ्वी सूर्यापासून लांब जाऊ लागते, म्हणजेच दिवस लहान होऊ लागतात. तापमान हळू हळू कमी होऊ लागते. म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणे आपण ऋतूंचा अंदाज बांधू शकतो, मराठी महिन्याप्रमाणे नाही.
म्हणजे संवत्सर ( वर्ष) हा काल्पनिक पक्षी आहे, त्याचे वसंत हे शिर, ग्रीष्म हा उजवा पंख, वर्षा ही शेपूट, शरद हा डावा पंख, व हेमंत हे उदर आहे.
आपला पहिला ऋतु वसंत! आंब्याच्या मोहराचा सुगंध, कोकिळेचं मधुर कूजन, बहरलेली झाडं, वेली, रंगीबेरंगी फुलांनी नटलेली सृष्टी, किती वर्णन करावं तेवढं थोडं आहे. कविमनाला भुरळ घालणारा हा ऋतु! हा ऋतु साजरा करायला असतो चैत्र पाडवा, वसंतोत्सव,अक्षय्य तृतीया, चैत्रागौर! पन्हं,कैरीची डाळ देऊन हळदीकुंकू करायचं, चैत्रागौरीला आरास करायची, कलेला प्रोत्साहन देण्यासाठी! असं म्हणतात की, यौवन व संयम, आशा व सिध्दी, कल्पना व वास्तव, भक्ती व शक्ती यांचा समन्वय साधून जीवनात सौंदर्य, संगीत, स्नेह निर्माण करणारा तो वसंत!
दूसरा ग्रीष्म, अंगाची लाही लाही करणारा! मुलांना मनसोक्त पाण्यात डुंबण्याचं स्वर्गसुख देणारा! अगदीच सृष्टी रुक्ष वाटू नये म्हणून मोगऱ्याचा बहर देणारा! जेंव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो दिवस सर्वात उष्ण असतो. या नक्षत्रावर भात पेरणी करतात. या नक्षत्रात सूर्य नऊ दिवस असतो. जर हे नऊ दिवस तापमान वाढलेले राहिले तर भाताचे पीक चांगले येते. म्हणून रोहिणीचा पेरा अन् मोतियाचा तोरा अशी म्हण पडली आहे. ह्या नौतापात रोहिणी व्रत करतात. ह्या व्रतात चंदन व पाणी यांचे दान करतात, तसंच गरजूंना छत्री व चप्पल देणं पुण्याचं मानतात. किती विचार केला आहे नं, ह्या गोष्टी पाप पुण्याशी जोडून! बाकी हा ऋतु साजरा करण्यासाठी लागतं कैरीचं पन्हं, कलिंगड, आंब्याचा कोणताही प्रकार कोणत्याही प्रकारे स्वाहा करणं.
तिसरा ऋतु वर्षा! प्रियाविण उदास वाटे रात वाला! सृष्टी सौंदर्याचं आणि स्त्री सौंदर्याचं वर्णन करून कवी थकत नाहीत असा! प्रणयातील हुरहूर, अधीरता वाढवणारा! एकाच छत्रीतून, आधे गिले आधे सुखे वाला! चोच उघडून बसलेल्या चातकाचा! आषाढातला पाऊस आणि श्रावणातला पाऊस यांचं वर्णन मी असं करते
पण त्याशिवाय काही प्रकारचे पाऊस, त्यांची गमतीदार नावे, म्हणी सांगणार आहे.
१.पडता हत्ती, कोसळती भिंती
२.सासूचा पडेल मघा, तर चुलीपुढे बसा (सतत मारा, घराबाहेर पडताच येत नाही)
३.म्हातारा पडेल पुख(पुष्य), तर चाकरीच्या गड्याला सुख( थांबून थांबून पडतो, पाऊस थांबला म्हणून कामाला सुरवात करावी तोवर पुन्हा पडायला लागतो, त्यामुळे गड्यांना हजेरी आणि विश्रांती दोन्ही मिळतं)
४.पडतील चित्रा तर भात न खाई कुत्रा (बेभरवशाचा, अन्नाची नासाडी करतो)
५.आला अर्दोडा, झाला गर्दोडा (आर्द्रा चा पाऊस चिखल करतो)
६.पडल्या मिरगा तर टिरी कडे बघा ( मृग पडला तर शेतीची कामे खोळंबतात)
७.आली लहर, केला कहर, गेला सरसर(आश्र्लेशाचा पाऊस म्हणजे थोड्या थोड्या भागावर जोरदार सरी येऊन जातात. एकाठीकाणी मोठ्ठा पाऊस लागावा आणि थोड पुढं गेलं की सगळं कोरडं ठणठणीत)
८. पूर्वा फाल्गुन हा सुनेचा (चंचल, कामचुकार)
९.पुनर्वसु चा तरणा पाऊस( शक्तिशाली)
वर्षा ऋतू म्हणजे भक्तीचा पूर!आषाढीवारी, गुरूपौर्णिमा, नारळी पौर्णिमा(रक्षाबंधन), नागपंचमी, कृष्ण जन्म, गोपाळकाला, श्रावणातला प्रत्येक दिवस हा त्या त्या देवतेची पूजा करण्याचाच असतो. सणावारांची रेलचेल असणारा ऋतु!
इंग्लंड मुक्कामात मी एक दिवस माझी पत्नी आणि मुलीबरोबर लंडनमधील महाराष्ट्र मंडळाचा गणेशोत्सव पहायला गेलो होतो. दुपारचं जेवण आटोपल्यावर हिचीनवरून आम्ही ट्रेननं लंडनला निघालो. हवेत खूप गारठा होता. पाऊस येण्याचीही शक्यता होती. यादृष्टीने छत्री, स्वेटर, जर्कीन वगैरे
अगदी बंदोबस्तात निघालो. ऑनलाईन तिकीट काढताना पाहिलं, एका कोपर्यात एक मध्यमवयीन बाई एकटीच मोठ्याने बडबडत होती. मला ते विचित्र वाटलं. मी प्रश्नार्थक दृष्टीने मुलीकडे पाहिलं. ” ती खूप दारू पिऊन बडबडत असेल ” मुलगी म्हणाली. तिकीट काढून पुढं जाताना पत्नी म्हणाली, “काय इथल्या लोकांचं जीवन! एकाकी. कुणी बोलायला नाही ते असंच स्वतःशीच बोलत बसतात “.
काहीही असो, इथल्या गो-या लोकांच्या समाजजीवनातली एक काळी बाजू मला समजली.
आठवत नाही, कोणत्यातरी स्टेशनवर उतरून बसने लंडनमधल्या महाराष्ट्र मंडळाच्या हाॅलमध्ये पोहोचलो. इंग्लंडमध्ये रहाणारी शेकडो मराठी माणसं भेटली. काहीजण इतर देशांतूनही आले होते. अनेक पुरूष सलवार, कुर्ता तर महिला साड्या परिधान करून आल्या होत्या . सगळ्यांच्या चेहर्यावर आनंद, मनामनात उत्साह आणि सर्वत्र उत्सवाचे वातावरण भरले होते. त्यात काही जणांचे इंग्लंडमध्ये मोठमोठे उद्योग होते. कुणी नोकरी करत होते तर काही विद्यार्थी होते. काही मुलं आपल्या आईवडीलांसोबत, तर काही वयस्कर आईवडील आपल्या मुलांसोबत आले होते.
आपले भौगोलिक, उत्पन्नाचे , वयाचे आणि इतर भेद विसरून ‘ मराठी माणूस ‘ या समान मुद्द्यावर या उत्सवात सारेजण सहभागी झाले होते. एंथ्रोपोलॉजी मध्ये याला एथनिसीटी म्हणतात.
आम्ही पोहोचलो तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले होते. अनेकांनी विविध गीते, नृत्य, संगीत सादर केले. त्यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत होते. ‘ सैराट ‘चित्रपटातील झिंग झिंग झिगाट गाण्यावर सारे सभागृह बेभान होऊन नाचत राहिले. ज्यांना नाचणं जमत नव्हतं, ते टाळ्या वाजवून साथ होते.
रात्री दहाच्या सुमारास आम्ही परत जायला निघालो. एखाददुसरा माणूस सोडला तर रस्त्यावर कुणीच नव्हतं. त्यात बोचरी थंडी. काही बसचा प्रवास करून आम्ही पॅडिंग्टन स्टेशनवर पोहोचलो. एका प्लॅटफॉर्मवरून संगीताचे सुरेल सूर ऐकू येत होते. उत्सुकतेने जवळ जाऊन पाहिलं. रेल्वेचा तो बॅन्ड होता. रेल्वे स्टेशन म्हणजे, गाड्यांचा धडधडाट, इतर काही कर्णकर्कश आवाज, पॅसेंजरांच्या गोंगाटात मिसळलेल्या निवेदकांच्या सूचना, यांची सवय असलेल्या मला हा आश्चर्याचा धक्का होता.
रेल्वेने हिचीन स्टेशनवर पोहोचलो तेव्हा रात्र खूप झाली होती. कधी एकदाचं घरी पोहोचतो, आणि अंथरूणात शिरून झोपी जातो असं झालं होतं. चालता चालता वर पाहिलं. विस्तीर्ण आकाशात जिकडं पहावं तिकडं अगणित तारे आणि ग्रह. कल्पना चावलांच्या एका वाक्याची समर्पकता जाणवली ..
“आकाशात पाहिलं की,आपण एका भौगोलिक सीमेत बांधले जात नाही”.
☆ संत माळेतील मणी शेवटचा – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री आशिष बिवलकर ☆
“संत माळेतील मणी शेवटला…
आज ओघळला एकाएकी … “
...सुमित्र माडगूळकर
रिक्षावाल्याने अंगात झटका आल्यासारखी एकदम रिक्षा बाजूला घेतली,आत बसलेल्या माय – लेकराकडे बघून म्हणाला, “तुम्ही इथेच उतरा,मी या पुढे जाऊ शकत नाही “.समोर खूप गर्दी जमलेली होती.
माय – लेकराच्या तोंडावर प्रश्नचिन्ह पाहताच तो उत्तरला ” समोर पहा, ती महाकवीची अंतिम महायात्रा चालू आहे, मला त्यात सामील व्हायचे आहे, तुम्हाला माहित नाही? गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर यांचे काल निधन झाले !”.
आत बसलेल्या माय – लेकराच्या चेहऱ्यावरील राग, प्रश्नचिन्ह क्षणार्धात दूर झाले व नकळत आई उत्तरली ” चल,आपणही पाच मिनिटे का होईना या अंतयात्रेत सामील होऊ, हीच या महाकवीला आपल्याकडून शेवटची श्रद्धांजली…. “.
—-
१५ डिसेंबर १९७७ ची सकाळ. असे अनेक जण त्या अंतिम महायात्रेत सामील झाले होते… आपणहून…त्यांचे बालपण ‘नाच रे मोरा’,’झुक झुक अगीनगाडी’ म्हणत फुलले होते,तरुणपण ‘माझा होशील का?’,’हृदयी प्रीत जागते’ ने रंगविले होते,’देव देव्हाऱ्यात नाही,’इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ वर त्यांचे मन भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.आयुष्याच्या संध्याकाळी ‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी’ ने मनाला हुरहूर लावली होती,आयुष्यातील प्रत्येक दुःखाच्या क्षणी ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ सारख्या गीतरामायणातील गीतांनी आधार दिला होता.शाळेच्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकात ‘मी सिंह पाहिला होता’,’औंधाचा राजा’,’आचंद्र सूर्य नांदो’,’शशांक मंजिरी’ सारख्या धडा-कविता मनाच्या कोपऱ्यात स्थान मिळवून होत्या ,नक्कीच वाचल्या होत्या.आज ते लाडके गदिमा शेवटच्या प्रवासाला निघाले होते … कोणाला दुःख झाले नसेल त्या दिवशी ?.
— डिसेंबर च्या एका पहाटे गदिमा दरदरून घाम फुटून जागे झाले,त्यांना विचित्र स्वप्न पडले होते “माडगूळच्या दारावरील गणपती” व “पंचवटीचे तुळशी वृदांवन व त्याचा कट्टा” दुभंगलेला दिसला होता. ते खूप अस्वस्थ झाले,विद्याताईंनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणाले “तुझ्या व मुलांच्या मनाची तयारी कर. मी आता अनंताच्या प्रवासाला निघालेला प्रवासी आहे. माझ्या दिव्यातील तेल आता संपत आले आहे “. एका पहाटे त्यांना खूप थंडी वाजून आली विद्याताईंनी घाईने नुकत्याच एका खेड्यातल्या समारंभात भेट मिळालेली उबदार घोंगडी त्यांच्या अंगावर घातली,गदिमा खिन्नपणे हसून म्हणाले “अग आता नको,काही दिवसांनी ती उपयोगी येईल”.
१४ डिसेंबर १९७७,गदिमांची आई ‘बनुताई दिगंबर माडगूळकर’ यांचा आदर्श माता म्हणून सत्कार होणार होता, माडगूळहून गदिमांचे धाकटे बंधू श्यामकाका आले होते. गदिमांना रात्रभर झोप नव्हती, विद्याताईंकडे बघून नुसते केविलवाणे हासत होते… डोळ्यात कारुण्य दाटले होते … ,काहीतरी सांगायचे होते पण …
गदिमा आईला म्हणाले, “आईसाहेब,आज तुमचा सत्कार आहे. विसरू नका. लवकर आवरून ठेवा. तुम्हाला न्यायला गाडी येईल.”
आई म्हणाली “तुम्ही नाही का येणार? “,आपल्या लाडक्या लेकाला बनुताई आदराने आहो जाहोच म्हणत असत. ‘येणार तर,पण आधी तुम्हाला गेले पाहिजे,आम्ही येतोच मागोमाग’. थोड्या वेळाने गदिमा व विद्याताई नातू सुमित्रला घेऊन बकुळीच्या पारावार जाऊन बसले. तितकेच गदिमा बाललीला पाहण्यात रमून गेले होते. तसा बराच वेळ गेला .. आत आल्यावर गदिमा विद्याताईंना म्हणाले “मंदे,तू आज मला तुझ्या हाताने आंघोळ घालशील का?” ,अंगात ताप होता विद्याताईंनी अंग गरम पाण्याने पुसून घेतले. कॉटवर स्वच्छ पांढरी चादर घातली.
”मंदे,आज मस्त वांगी भात आणि साजूक तुपातला शिरा कर,तोंडाची चवच गेली आहे… “,विद्याताईंनी त्यांच्या आवडीचे जेवण केले. गदिमा मनसोक्त जेवले त्या दिवशी. संध्याकाळी कार्यक्रमाला जाण्यासाठी विद्याताईंनी सर्व कपडे तयार करून ठेवले होते, रेशमी झब्बा,जाकीट,धोतर,सेंटवाला रुमाल. गदिमा म्हणाले ” मंदे,आता उशीर करू नकोस,लवकर आटप “. विद्याताई हसून म्हणाल्या “आत्ता आवरते बघा”. गदिमा बाहेरच्या निळ्या कोचावर जाऊन बसले.थोड्या वेळाने अचानक त्यांचा मोठा आवाज आला ” मंदे,अग लवकर इकडे ये, मला बघ कसं होतंय, खूप थंडी वाजते आहे बघ .. “. विद्याताई त्यांना लगबगीने आत खोलीत घेऊन आल्या .. अंगावर दोन तीन रग घातले पण त्यांची थंडी कमी होईना. दात एकमेकांवर आपटून जोरात आवाज येत होता.
विद्याताईंनी घाईघाईने मुलांना, सुनांना बोलवून घेतले, माळीबुवाला पाठवून डॉ.मेहतांना बोलवून घेतले. डॉ.मेहता म्हणाले ” कविराज,फटकन एक इंजेक्शन घेऊन येतो, ते घ्या व मस्त कार्यक्रमाला जा “. मेहता समोरच असलेल्या दवाखान्यात निघून गेले. गदिमांना दरदरून घाम फुटला होता. इकडे छोटा सुमित्र रडवेला चेहरा करून ” पपाआजोबा बोलत का नाहीत “ म्हणून एकटक बघत राहिला होता. त्याला कळत नव्हते “सर्वजण का जमलेत ?,ताईआजी का घाबरली आहे ? डॉक्टर काय करत आहेत ? “.
इकडे गदिमांचे पाय थंड पडले होते, विद्याताई व सुना त्यांच्या पायाला ब्रँडी चोळत होत्या. गदिमा म्हणाले “मला काही करू नका”. तितक्यात डॉ.मेहता परत आले त्यांनी इंजेक्शनची तयारी सुरु केली. तितक्यात गदिमांनी गजानन महाराजांना (शिवपुरी,अक्कलकोट) जोरात हाक मारली. ” महाराज,मला आता सोडवा”. त्याचं बोलणं एकदम बंद पडले, जीभ तोंडात हलू लागली. डॉ. मेहतांनी इंजेक्शन दिले पण ते शिरेत न जाता तसेच बाहेर आले. अखेर संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास गदिमांची प्राणज्योत मालवली.
सकाळचाच प्रसंग.. बाथरूमला जाताना गदिमांनी विद्याताईंचा आधारासाठी दिलेला मदतीचा हात झिडकारून टाकला होता .. १९४२ साली प्रेमाने हातात घेतलेला त्यांचा हात आता कायमचाच सुटलेला होता … बुधवार १४ डिसेंबर १९७७ ची ती भीषण संध्याकाळ .. दोन सूर्य अस्ताला गेले. मृत्यूच्या पराभवाचा दिवस, कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह.
फर्ग्युसन रस्त्यावरील उद्योगपती बाबुराव पारखे यांच्या विद्याविलास या बंगल्यात आदर्शमाता पुरस्कार सोहळा चालू होता. बनुताइंचा प.महादेवशास्त्री जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तेव्हड्यात गदिमांची बातमी येऊन पोहचली. बनुताईनसमोर ही बातमी सांगता येत नव्हती, पण त्या महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय परत पंचवटीत जाण्यास तयार नव्हत्या, त्यासाठी अडून बसल्या. शेवटी दर्शन घेऊन त्या निघाल्या, मग कार्यक्रमात प.महादेवशास्त्री जोशी यांनी गदिमांच्या निधनाची वार्ता सांगितली, सगळीकडे शोकछाया पसरली. इकडे पंचवटीत त्या सत्काराच्या हारतुऱ्यांसकट पोहोचल्या, आपल्या लाडक्या लेकाची अवस्था पाहून त्यांचे काय झाले असेल, एकीकडे आई आदर्श माता पुरस्कार स्वीकारीत होती व एकीकडे मुलगा अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता,सगळाच दैवदुर्विलास !.
पंचवटीच्या हॉलमध्ये पांढऱ्या चादरीखाली काहीतरी झाकलेले होते, माझे लाडके आजोबा कुठेच दिसत नव्हते, अगदी त्यांच्या निळ्या कोचावर सुद्धा. घरातले सगळे रडत होते, प्रचंड माणसे जमली होती,सगळे का रडत आहेत मला काहीच कळत नव्हते. त्यांना हसवावे म्हणून मी जास्तच चेकाळलो होतो, कधी नव्हे ते वेड्यासारखा इकडून तिकडून पळत होतो. शेवटी माझी रवानगी वरच्या मजल्यावर झाली.
— माझा बालहट्ट आता पुरविला जाणार नव्हता,एक महाकवी आपल्या शेवटच्या प्रवासाला निघालेला होता,माझ्या लाडक्या आजोबांचा हात माझ्या हातातून कायमचा सुटलेला होता.
१५ डिसेंबर १९७७. प्रचंड अंतयात्रा निघाली होती,पुणे मुंबई रस्त्याने जाणारी अंतयात्रा वाकडेवाडीच्या लोकांच्या हट्टाने वाकडेवाडीतून वळविण्यात आली. जेव्हा अंतयात्रा डेक्कनवर पोहोचली तेव्हा तिचे दुसरे टोक बालगंधर्व चौकात होते.इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल. संगीतकार राम कदम “अण्णा अण्णा” म्हणत आक्रोशाने धावत होते… ,महाराष्ट्र शासनाच्या वतीने शरद पवार सामील होते. स्त्री-पुरुष,वृध्द,राजकारणी,कलावंत,अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते.
सगळ्यांच्या मुखात आज एकच ओळी होत्या ….
“विठ्ठलाच्या पायी थरारली वीट… “
“संत माळेतील मणी शेवटला… आज ओघळला एकाएकी… “
अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत, कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते. .गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून, साहित्यातून, चित्रपटातून, गीतरामायणातून मराठी रसिकांच्या हृदयात विराजमान आहेत.
चंदनी चितेत जळाला चंदन…
सुगंधे भरून मर्त्यलोक
लेखक : सुमित्र माडगूळकर
संग्राहक : श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विन्टेज – लेखक : श्री सौरभ साठे ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
माझ्या एकटेपणाच्या दुःखाने आता बाळसं धरायला सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावर खरं तर खूप काही प्लॅनिंग केलं होतं, पण आमची ही सहा महिन्यापूर्वी पुढच्या प्रवासाला निघून गेली. एकटीच.
आता मी माझं रुटीन सेट करुन घेतलंय. सकाळी जरा लवकरच उठतो. त्याचं काय आहे, मुलगा आणि सून दोघेही नोकरी करतात. यायला जरा उशीरच होतो त्यांना. म्हणून सकाळी चहाबरोबर जरा गप्पा पण होतील, असं मला वाटायचं. हो, मला वाटायचं. कारण त्यांना माझ्याशी बोलायला वेळच नाही मिळत. नाही, नाही. गैरसमज करुन घेऊ नका. सिनेमा किंवा सिरियल मध्ये दाखवतात, तसे काही माझे मुलगा किंवा सून नाहियेत. वडिलांची आणि सासर्यांची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी नक्कीच घेतात. माझी तक्रार काही नाही. पण एकदा सकाळी इतरांपेक्षा लवकर जाग आली, म्हणून चहा करायला घेतला. पण नेमकं दूध उतू गेलं. सगळा ओटा खराब झाला. सून नाराज झाली. मला काही बोलली नाही, पण तिच्या हालचालीमधून ते स्पष्ट जाणवत होतं. त्या दिवशी मुलाने लगेच फर्मान काढलं,”बाबा, उद्यापासून आमचं आवरल्यावर मी तुम्हाला चहा आणून देईन रुममध्ये.”
असाच एकदा नातवाला म्हणालो, “चल तुला स्कूल बसपर्यंत येतो सोडायला.” तर म्हणतो कसा,”आबा, मी मोठा झालोय आता. मी एकटा जाऊ शकतो. तू आलास तर बाकीच्या मुलांना वाटेल, मी घाबरतो एकटा यायला. हसतील मला सगळे.”
म्हणून सध्या उठल्यावर मी माझ्या खोलीतच असतो. बाहेरचा अंदाज घेऊनच हॉल मध्ये येतो. मला कळून चुकलंय, की मी त्यांच्या आयुष्यातला फक्त्त एक भाग आहे, कदाचित थोडासा दुर्लक्षित.
आता मी संध्याकाळी फिरायला जातो. तेवढाच माझाही वेळ जातो. रोजचा मार्ग ठरलाय माझा. Agricultural College च्या चौकातून सरळ जाऊन विद्यापीठाच्या चौकातून परत घरी. त्या मार्गावर एक दोन शोरुम आहेत चार-चाकी गाड्यांच्या. पहिल्यापासूनच गाड्यांचे आकर्षण होते. म्हणून मग येता जाता त्या शोरुममधल्या गाड्या बघत बघत जायचो. अर्थात बाहेरुनच.
पण एक दिवस त्या शोरुममध्ये एक वेगळीच गाडी दिसली.काहीशी जुनी होती, पण त्या गाडीला वेगळी जागा होती. तिला वेगळ्या पद्धतीने सजवलं होतं. कुतुहल वाटलं म्हणून आत गेलो. एक चकचकीत कपड्यातला सेल्समन आला. “Yes Sir, कुठली गाडी बघताय?”
“नाही. म्हणजे हो.बघतोय, पण विकत नाही घ्यायची मला. ही एव्हढी जुनी गाडी तुमच्या शोरुममधे कशी काय, हा विचार करतोय. “सर ही Vintage Car आहे. 1965 साली बडोद्याच्या महाराजांनी घेतली होती.”
“का हो? सगळ्या गाड्यांवर किमतीचा कागद लावला आहे. या गाडीवर मात्र तो नाही.”
“सर ही विंटेज कार आहे, हिची किंमत ठरवता येत नाही. ज्याला या गाडीचं मोल कळेल, तो कस्टमर ही गाडी घेईल. थोडक्यात ही गाडी महाग नाही तर मौल्यवान आहे.”
मी शोरुममधून बाहेर पडलो. कसला तरी विचार येत होता मनामध्ये , पण नक्की कळत नव्हतं काय ते.
असेच मध्ये काही दिवस गेले, रोज मी येता जाता ती गाडी कौतुकाने बघायचो.
गुढी पाडव्याच्या दिवशी सुट्टी असल्याने सगळे घरीच होते. ही गेल्यानंतरचा पहिलाच गुढी पाडवा. जरा उदासच होतो मी, पण नातवाशी खेळण्यात वेळ जात होता.
“आबा तुला माहितीये का आमच्या शाळेच्या समोर ना 100 पेक्षा जास्त वर्षे जुने पिंपळाचे झाड होते. रोड वायडनिंगमध्ये ते पाडणार होते. मग कुठले तरी लोक आले मोर्चा घेऊन आणि ते झाड दुसरीकडे नेऊन पुन्हा लावलं. आमच्या टीचरनी सांगितलं, ते झाड जुनं असलं तरी 24 तास ऑक्सिजन देतं,म्हणून ते महत्त्वाचं आहे.”
त्या गाड्यांच्या शोरुम मधून बाहेर पडल्यावर जसं वाटलं होतं, तसंच काहीसं वाटून गेलं.
सुनबाई म्हणाली, “बाबा, तुम्ही पूजा कराल का गुढीची? इतकी वर्षे आई करायच्या. म्हणून वाटतं, आज तुम्ही करावी.” मी पण तयार झालो.
आम्ही सगळे जेवायला बसलो. सूनबाईने छान तयारी केली होती. जेवायला तांब्याची ताटं काढली. मुलगा म्हणाला, “अगं, आज तो काचेचा सेट काढायचा ना.”
“अरे, असू दे. आईने पहिल्या दिवाळसणाला दिला होता हा तांब्याच्या सेट. त्या सेटमधली आता फक्त्त ताटंच उरली आहेत. म्हणून मुद्दाम जपून ठेवली आहेत सणासुदीसाठी, आईची आठवण म्हणून.” आणि सूनबाईने नकळत हातातले फडके खाली ठेवले आणि ती ताटं स्वतःच्या पदराने पुसली.
अचानक मला त्या शोरुममधून बाहेर पडल्यावर मनात जो विचार आला होता, त्याचा अर्थ कळायला लागला. मौल्यवान या शब्दाचा. ती विंटेज गाडी, ते पिंपळाचे झाड, काही तरी इशारा करत होते.
आता माझे मला समजले होते, मी म्हातारा असलो तरी टाकाऊ नव्हतो.
आता मुलाच्या आणि सुनेच्या रोजच्या आयुष्याचा भाग होण्याचा अट्टाहास मी सोडून दिलाय स्वखुशीने. कारण मला माहितीये, त्यांच्या आयुष्यातील माझं स्थान त्या विंटेज कारसारखं आहे. एकदम स्पेशल.
लेखक : श्री सौरभ साठे
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈