मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “रंगात रंगुनी साऱ्या…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “रंगात रंगुनी साऱ्या…” ☆ श्री आशिष मुळे ☆

रंगात रंगुनी साऱ्या

रंग माझा वेगळा

गर्दीत या अस्मितांच्या

भास माझा एकला

*

असुनी नसते शुद्ध मला

वेगळाच असे हा प्याला

पिऊनी जीवन तहानलेला

तो मी मृदगंधाचा भुकेला

*

ती रात्र बनून आली नाही

मला झुकायचा तिटकारा

तिचा उजेड तिच्यापाशी

रस्ता माझा वेगळा

*

स्पर्धा माझी माझ्याशी

खेळ मी एकटा खेळला

नसो रात्र वा असो दिवस

दीप मी चंद्राचाच लावला

*

रंगात रंगुनी साऱ्या

रंग माझा वेगळा

भिजूनी पावसात खाऱ्या

गोडवा शोधून आणला

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘शृंगार मराठीचा’… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘शृंगार मराठीचा’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

अनुस्वारी शुभकुंकुम ते 

भाळी सौदामिनी |

*

प्रश्नचिन्ही डुलती झुमके 

सुंदर तव कानी |

*

नाकावरती स्वल्पविरामी

शोभे तव नथनी |

*

काना-काना गुंफुनी माला 

खुलवी तुज मानिनी |

*

_वेलांटी_चा पदर शोभे

तुझीया माथ्याला |

 

_मात्रां_चा मग सूवर्णचाफा

वेणीवर माळला |

*

_उद्गारा_चा तो गे छल्ला

लटके कमरेला |

*

_अवतरणां_च्या बटा 

मनोहर भावती चेहर्‍याला |

*

_उ_काराचे पैंजण झुमझुम

पदकमलांच्यावरी |

*

पूर्णविरामी तिलोत्तम तो 

शोभे गालावरी ॥

*

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

कवी : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – अदलाबदल – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – अदलाबदल – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

आई मूल नाते गोड 

माय जगे बाळासाठी 

साऱ्या विश्वाच्या सौख्याला 

बांधी त्याच्या मनगटी ||

*

ठेच लागता बाळास 

कळ माऊलीच्या उरी 

नाही आईच्या मायेस 

कशाचीही बरोबरी ||

*

तिचा काळीज तुकडा

येई ग नावारूपाला 

लेक कर्तृत्वसंपन्न 

नेई जपून आईला ||

*

आई मुलाच्या नात्याची 

अदलाबदल होते 

एका पिढीचे असे हे 

आवर्तन पूर्ण होते ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 262 ☆ सहचर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 262 ?

☆ सहचर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मी केली नाही कधीच….

खास तुझ्यासाठी कविता !

अधून मधून,

डोकवायचे तुझे संदर्भ….

कधी चांगुलपणाचे,

कधी कडवटपणाचे!

 खरंतर किती साधं असतं आयुष्य,

आपणच बनवतो अवघड!

नाहीच भरता आले रंग,

एकत्र,

आयुष्याच्या रांगोळीत!

समांतर रेषांसारखे,

जगत राहिलो,

आता सांजसावल्या,

झेलत असताना,

तू जास्त थकलेला दिसतोस,

भर उन्हातही….

ताठ कण्याने उभा होतास,

मावळतीची उन्हंही,

तशीच झेलत रहा….

सहचरा…..

नाहीच देता आलं काही,

जन्मभर!

स्वर्गात बांधलेल्या गाठी मात्र

 निभावल्या गेल्या आपसूकच,

स्वर्गस्थ ईश्वरानंच करावा न्याय,

देता आलंच काही,

तर सहचरा—

देईन तुला उरल्या आयुष्याचं दान!

दयाघना तू आहेसच ना,

इतका महान!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शेवटचा निरोप… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ शेवटचा निरोपसौ. वृंदा गंभीर

एकत्र शिकलो एकत्र वाढलो

सुख दुःखात एकत्र सामील झालो

नोकरीच्या निमित्ताने गेलो निघून

मित्रा शेवटचा निरोप द्यायला

येशील ना रे धावून

 

घराट्या तील पाखरं उडून गेली

आनंदी वस्तू आता सुनी सुनी झाली

थकलो रे फार एकटा धीर धरून

मित्रा शेवटचा निरोप द्यायला येशील

ना रे धावून

 

वय होतं चाललं अशा नाही उरली

आयुष्याची गणितं जुळवता वेळ सरली

डोळे झाले लाल वाट तुझी पाहून

मित्रा शेवटचा निरोप द्यायला येशील

ना रे धावून

 

या बाल मनाला साथ हवी तुमची

बोलता बोलता सत्तरी आली आमची

ध्यास धरला मित्रांचा वेड्या मनानं

मित्रा शेवटचा निरोप द्यायला येशील

ना रे धावून

मित्रा शेवटचा निरोप द्यायला येशील

ना रे धावून

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #274 ☆ यमराजाशी लढले… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 274 ?

यमराजाशी लढले… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

नावेत तुझ्या चढले मी

प्रेमात तुझ्या पडले मी

*

होतास गुरू तू माझा

प्रेमात तुझ्या घडले मी

*

ओढले मला तू वरती

अन डोंगरही चढले मी

*

पहाड होता तो माझा

पाठीमागे दडले मी

*

सावित्रीच्या बाण्याने

यमराजाशी लढले मी

*

होता सोबत तू माझ्या

नाहीच कधी अडले मी

*

नाग समोरी दिसला अन

त्यालाच इथे नडले मी

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रभात प्रतिक्षा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रभात प्रतिक्षा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

पिवळ्या जर्द अबीराला

कुसूम लाली कुणी फासली

पश्चिम नगरी फुलता

अजनी उदासशी हसली.

*

काळा बुक्का घेऊन सांज

नाचू लागेल रंग पुसूनी

तारांकित शाल पांघर

शीतल शशी गगन लेणी.

*

सरोवर भासे लोचन

प्रतिबींब न्याहाळती जळी

अंतरंगी उठे लहर

वायू हुंगीत प्रहर कळी.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – महादेव शिवशंकर… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? महादेव शिवशंकर... ? श्री आशिष  बिवलकर ☆

सर्व देवांच्यात सर्वश्रेष्ठ,

असती हर हर महादेव!

सृष्टीचा तारणहार,

शिवस्तुती करावी सदैव!….. १

*

पत्नी पार्वती,

पुत्र कार्तिकेय -गणपती ! 

पुत्री अशोक सुंदरी,

भक्तांच्या हाकेला धावती!…. २

*

शिरी चंद्रकोर धारण,

हातात त्रिशूल डमरू! 

नंदीवर होई स्वार,

भोलेनाथ बाबा अवतरू!….. 3

*

जटातून वाहे गंगा,

म्हणती कुणी गंगाधर!

कंठात हलाहल केले प्राशन,

नीळकंठ परमेश्वर !….. ४

*

चिताभस्म नित्य लावे,

कंठाभोवती वासुकी नाग!

व्याघ्र चर्मावर बैसे,

त्रिकाळाची असे जाग!….. ५

*

त्रिनेत्र सामर्थ्य शिवाचे,

पाही भूत, भविष्य, वर्तमान!

तांडव नृत्य करून,

नृत्यात नटराज सामर्थ्यवान!….. ६

*
त्रिदल बेल वाहता,

होई भोलेनाथ प्रसन्न!

मनोप्सित वर देऊन,

भक्तांना करी धन्य!….. ७

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सवाल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ सवाल ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

सामान्य माणसाचा साधा सवाल आहे

हा राजकारणी का जळता हिलाल आहे?

 *

सत्तांध होत कोणी सेवा कशी विसरतो

इतके कसे कळेना तुमची कमाल आहे

 *

जनता तुम्हास भजते आदर्श भावनेने

पण का तुम्हीच येथे झाला दलाल आहे

 *

विसरू नका कुणी ही साधी सुधी विधाने

हा काळ माणसांचा वैरी कराल आहे

 *

कर्तव्य लाभकारी तुमच्या कडून व्हावे

तुमचीच आज येथे ख्याती विशाल आहे

 *

जपण्यास या प्रजेला व्हा सावधान आता

उधळायचा सुखाचा आता गुलाल आहे

नेते बनून तुम्ही सुखरूप वाट शोधा

तुमच्या समर्थ हाती आता मशाल आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’… कवि – कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? काव्यानंद ?

☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’… कवि – कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

#विशेष कविता रसग्रहण उपक्रम#

…आज मी तात्यांची म्हणजेच कवि कुसुमाग्रज अर्थात वि.वा शिरवाडकरांची, आगगाडी व जमीन ही कवितेच रसग्रहण करत आहे. 

सन 1942 साली पहिला प्रसिध्द झालेल्या विशाखा या कविता संग्रहातील ही कविता आहे. कवितेच्या शेवटी कविता लेखनाचा काल 1938 नि स्थल पुणे अस दिलेल आहेत.

तात्यांनी अहि-नकुल,हा काठोकाठ कटाह भरा, जा जरा पूर्वेकडे, गुलाम, शेवटचे पान ,आव्हान,कुतूहल, भक्तिभाव, बालकवी ,आणि आगगाडी व जमीन या सारख्या कविता लिहिल्या…त्यांच्या विशाखा या कविता संग्रहाला भाऊसाहेब तथा वि.स.खांडेकरांनी अर्ध्यदान स्वरुपात प्रस्तावाना लिहली आहे .ते म्हणतात त्यांची  प्रतिमा ही लुकलुक करणारी चांदणी नाही,ती चमचम करणारी बिजली आहे,आपली कविता ही मुरली नाही,ती तरवार आहे याची योग्य  जाणीव त्यांना आहे.या तरवारीला कल्पकतेच्या सुंदर आणि बळकट मुठीची जोडही सुदैवाने मिळालेली आहे,त्यामुळे अनुभूतीच्या कुठल्याही प्रदेशात त्यांची प्रतिभा रणरागिणीच होईल. आणि भविष्यवाणी पुढे तंतोतंत खरी ठरलेली आपण पाहिलीच आहे…

☆ ‘आगगाडी’ व ‘जमीन’ ☆

नको गं ! नको गं ! आक्रंदे जमीन

पायाशी लोळत विनवी नमून-   2

 *

धावसी मजेत वेगात वरून

आणिक खाली मी चालले चुरुन !

 *

छातीत पाडसी कितीक खिंडारे

कितीक ढाळसी वरून निखारे !   2

 *

नको गं ! नको गं ! आक्रंदे जमीन

जाळीत जाऊ तू बेहोष होऊन.

 *

ढगात धुराचा फवारा सोडून

गर्जत गाडी ती बोलली माजुन- 2

 *

दुर्बळ ! अशीच खुशाल ओरड

जगावे जगात कशाला भेकड !

 *

पोलादी टाचा या छातीत रोवून

अशीच चेंद्त धावेन ! धावेन ! 2

 *

चला रे चक्रानों,फिरत गरारा

गर्जत पुकारा आपुला दरारा !

 *

शीळ अन कर्कश गर्वात फुंकून

पोटात जळते इंधन घालून ! 2

 *

शिरली घाटात अफाट वेगात

मैलांचे अंतर घोटात गिळीत !

 *

उद्दाम गाडीचे ऐकून वचन

क्रोधात इकडे थरारे जमीन ! 2

 *

“दुर्बळ भेकड !”त्वेषाने पुकारी

घुमले पहाड घुमल्या कपारी !

 *

हवेत पेटला सूडाचा धुमारा

कोसळे दरीत पुलाचा डोलारा ! 2

 *

उठला क्षणार्ध भयाण आक्रोश

हादरे जंगल कापले आकाश

 *

उलटी पालटी होऊन गाडी ती

हजार शकले पडली खालती ! 2

या कवितेचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे सरल सरल दोन भाग पडलेले दिसतात. पूर्वार्धात जमीन आगगाडीची विनवणी करताना दिसतेय.. तू अशी धाड धाड दाण दाण करत तूही पोलादी चाक माझ्या अंगावरुन नेऊ नकोस त्याने माझ्या मातीचा ,आजूबाजूच्या परिसरसराची धूळधाण होते.शिवाय तू अशी जोशात जातेस तेव्हा ते जळते लालभडक निखार्‍यानीं अंग अंग पोळून निघते. तूला जायाला मज्जाव करत नाही पण तुझ्याइतकी सशक्त नाही.तेव्हा माझा तू सहानुभूतीने विचार कर.माझं अस्तित्व टिकल तरच तुझ्या असण्याला फिरण्याला अर्थ आहे. या ठिकाणी जमीन ही शोषित वर्गाच्या प्रतींनिधीचे प्रतीक दाखवले आहे. मजुरांची कामगारांची मालकवर्गाने काळजी घेतली तर मालकांचा व्यवसाय अव्यहात टिकेल अन्यथा…

तर उत्तरार्धात आगगाडी जमिनीच्या विणविणीची अवहेलना करते. दुर्बल भेकड म्हणून तिचा अवमान करते.पायाची वाहाण पायीच बरी असते. आपल्या उद्दाम, सहानुभूतीशून्य वागण्याने जमिनीला चेंदून टाकण्यास तयार होते. प्रचंड वेगाने आगीचे लोळ फुत्कारत घाटाला गिळत पुढे पुढे निघते. मालक वर्ग कामगार वर्गाची एनकेण प्रकारे पिळवणूक करत राहतो. कामगरांच्या सुख्दुखाशी त्याच काहीएक देण घेण नसत.

आणि शेवटी अन्यायाने,अपमानाने,कष्टाने त्रस्त झालेली जमीन सूडाचा बदला म्हणून आगगाडीच्या वाटेवरचा खींडितला पूल जेव्हा पाडून टाकते तेव्हा गुरमीत असलेलली पण बेसावध आगागडीचा अपघात होतो.मोठी जीविहहाणी बरोबर साधनसंपत्तीचा सर्वनाश होतो. कामगार जेव्हा पेटून उठतो तेव्हा संप,दंगल,क्रांतीचा,बंड करून उठतो आणि मालकाला दे धरणीमाय करून सोडतो. भांडवलशाही विरूध्द समाजवादाची लढाईच चित्रचं या कवितेत दाखवलेले दिसते.

कुसुमाग्रज हे मानवतेचे कवि आहेत.आजच्या सामाजिक असंतोषाचा ज्वालामुखी त्यांच्या कवितेतून इतर काव्यांप्रमाणे नुसता धुमसत नाही ,तो अग्निरसाचा वर्षाव करीत सुटतो.विषमता,पिळवणूक,गांजणूक आणि अन्याय यांच्याविषयीची बहुजनसमाजाची चीड कुसुमाग्रजांनी अत्यंत उत्कट आणि सुंदर स्वरुपात आपल्या काव्यातून व्यक्त केली आहे.

आगगाडी व जमीन  या कवितेत कवीची कल्पकता व त्याची प्रेरकता यांच्यामध्ये जणूकाही शर्यतच लागली आहे !दलितवर्गावर होणार्‍या जुलूमाचे आणि त्याच्या प्रतिक्रियेचे या कवितेतील चित्रण अत्यंत प्रभावी आहे.क्षणाक्षणाने आणि कणाकणाने सुधारणा होऊन मानव जात सुखी होईल हा भोळा आशावाद दुर्बल ठरतो आणि क्रांतीचे निशाण हातात घेतलेल्या समतादेवीकडे समाजाचे डोळे लागतात. ‘हा काठोकाठ कटाह भरा, जा जरा पूर्वेकडे, गुलाम,बंदी आणि आगगाडी व जमीन  या तेजस्वी कवनांतून कुसुमाग्रजांनी क्रांतीच्या दर्शनाचा मानवजातीला लागलेला ध्यास मोठ्या तन्मयतेने वर्णन केला आहे.त्यांची कल्पकता प्रत्येक वेळी नव्या नव्या सुंदर रूपकांचा आश्रय करून या ध्यासाचे चित्रण करते, अश्याप्रकारच्या सर्व कवितांतून  कुसुमाग्रज एकच तुतारी फुंकत आहेत असेच मला वाटत राहते…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares