☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆ रसग्रहण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆
छातीत फुले फुलण्याची
वार्यावर मन झुलण्याची
ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.
डोळ्यात ऋतुंचे पाणी
मौनात मिसळले कोणी
वाळूत स्तब्ध राहताना
लाटेने गहिवरण्याची
ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.
तू वळून हसलीस जेव्हा
नक्षत्र निथळले तेव्हा
मन शहारून मिटण्याची
डोळ्यात चंद्र टिपण्याची …
ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.
ज्या चंद्र कवडशा खाली
कुणी साद घातली ओली
मग चंद्र वळून जाताना
किरणात जळून जाण्याची
ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.
पाऊस परतला जेव्हा
नभ नदीत हसले तेव्हा
कोरड्या मनाने कोणी
गावात परत येण्याची
ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.
थबकून थांबल्या गाई
की जशी शुभ्र पुण्याई
त्या जुन्याच विहिरीपाशी
आईस हाक देण्याची
ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.
गावाच्या सीमेवरती
जगण्याच्या हाका येती
त्या कौलारु स्वप्नांना
आयुष्य दान देण्याची
ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.
हे गाणे जेव्हा लिहिले
मी खूप मला आठवले
शब्दास हाक देताना
आतून रिते होण्याची
ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.
– श्री अरुण म्हात्रे
काही काही गोष्टी आपल्या समोर येण्याच्या वेळा किती अचूक असतात असं ही कविता पुन्हा पुन्हा वाचताना मला जाणवलं. वर्षाचा शेवटचा महिना मला आठवणींचा महिना वाटतो… वर्षभरातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या एखाद्या चित्रपटातल्या फ्लॅशबॅकप्रमाणे आपल्या नजरेसमोरून तरळत जात असतात. वर्ष आणि वय जसं उलटत जातं तसं भूतकाळाची वही भरायला सुरुवात होते.
या वहीतल्या प्रत्येक पानावर वर्षभरातले अनेक प्रसंग आपल्याही नकळत लिहिले जातात… गंमत म्हणजे काही प्रसंग लिहायचं ठरवलं नसलं तरीही आपसूकच लिहिले जातात. आणि एका छोट्याशा ज्योतीनं सारा आसमंत नजरेत यावा तसे ते प्रसंग कुठल्यातरी एका छोट्याशा जाणिवेतून स्मृतीतल्या एखादा दिवस, विशिष्ट प्रहर लख्ख उजळवून टाकतात.
अरुण म्हात्रे यांच्या या कवितेत या कवीच्या स्मृतिकोषात अशाच काही आठवणी बद्ध झालेल्या आहेत. ज्या साध्या दिवसांनाही ‘विशेष पण’ बहाल करून गेल्या आहेत. प्रत्येकाचा भूतकाळ हा तसा रमणीय असतो. पण कवी हा भूतकाळ ज्या पद्धतीने बघतो ती पद्धत जास्त ‘रमणीय’ असते. कारण त्याला गेलेल्या वेळेची किंमतही माहिती आहे आणि आत्ताच्या वेळेचीही जाण असते. ऋतुंप्रमाणे बदलणाऱ्या निसर्गा इतकंच सहजपणे ऐलतीरावरून पैलतीराकडे बघण्याची ताकद कवी आत्मसात करतो, किंबहुना ते त्याचं बलस्थान असतं.
आर्तता, आत्मीयता, आत्ममग्नता आणि त्याचवेळी आत्मसमर्पणता अशा सगळ्यांच भावना तो कवितांमधून मांडत जातो. इतक्या सहज की जणू सागराच्या लाटेनं जोमाने उसळुन आपलं वेगळेपण सिद्ध करावं आणि ते लक्षात येईस्तोवर समुद्रात तितक्याच वेगाने मिसळून जावं. ‘क्षणाचा जन्म’ आणि ‘क्षणाचा मृत्यू’ इतक्या सुंदर पद्धतीने कवी मांडतो की जणू कविता ही त्याची प्रेयसी असावी आणि तिचं वर्णन करण्याची शब्दांची अहमिका लागलेली असावी.
या कवितेतील ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’ या ओळीतून आपल्यालाही दोन वेळांमधला आणि दोन परिस्थिती, मनस्थिती यांतला फरक चटकन जाणवतो.
मला तर ही कविता कवितेलाच उद्देशून लिहिलीय असं वाटतं. जणू तो कवितेलाच सांगतो आहे ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’. एका टप्प्यावरती आल्यावर कवीनेच आपल्या कवितांकडे तटस्थपणे बघण्याचा आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तो याच पद्धतीने तिच्याशी बोलेल.
घटना जेव्हा वर्तमानात घडत असतात तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना अर्थ असतोच असं नाही. अनेकदा काळ उलटून गेल्यावर त्या घटनांना विशेष अर्थ प्राप्त होतो. या कवितेतल्या सगळ्या कडव्यांमधून कवीला हेच मांडायचं असावं.
येणाऱ्या नव्या वर्षाकडे आशेने पाहताना मागील वर्षातल्या अनेक बारीक बारीक गोष्टी देखील आपण आता अशाच नजरेने पाहतो आणि आपल्याला त्या तेव्हा साधा वाटलेल्या घटनाही, आता विशेष वाटतात. ही जगण्यातली गंमत कवीला खूप छान उमगलेली असते.
मला भावलेली कविता अशी आहे. तुम्हाला ती आणखीन वेगळ्या प्रकारे भावू शकते. कारण आपल्या प्रत्येकाचा भूतकाळ वेगळा आहे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही.
☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण –…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
आमचं तारुण्य ज्यांच्या कवितांवर पोसलं गेलं त्यापैकी एक म्हणजे मंगेश पाडगावकर !
आज त्यांची पुण्यतिथी
त्यानिमित्त त्यांची आठवण येतेच. परंतु माझा एक कवी मित्र दुर्दैवाने जो आज हयात नाही, किशोर पाठक! त्याचीही प्रकर्षाने आज आठवण येते. आम्ही दोघांनी काही नाशिकच्या प्रतिथयश कलावंतांना बरोबर घेऊन एक पाडगावकर स्मृती कार्यक्रम पूर्वी केला होता. त्याचप्रमाणे जनस्थान कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम ही सादर केला होता. रसिकांनी त्याचे खूप स्वागत केले होते. परंतु त्यानंतर मी अवयवदानाच्या सामाजिक कार्यामध्ये गुंतून गेलो आणि दुर्दैवाने किशोर हळूच एक्झिट घेऊन निघून गेला आणि हृदयात येऊन बसला.
आज दोघांच्याही तीव्र स्मृति एकवटून येतात आणि पाडगावकरांच्या कविता आज अपरिहार्यपणे आठवत राहतात.
पाडगावकरांची कविता आपल्या दैनंदिन आयुष्याला सरळ जाऊन भिडते म्हणून ती आपलीच वाटते आणि आपल्याला आवडते. आपल्या आयुष्यात समोर रोज घडत असलेल्या घटनांचा धांडोळा ‘मी गातोय’ या कवितेत खूप अनोख्या पद्धतीने पाडगावकरांनी घेतला आहे.
आपलं गाणं या कवितेत पाडगावकरांनी जीवन जगण्याचा गुरुमंत्र दिला आहे, तर ‘जमा-खर्च स्वातंत्र्याचा’ ही कविता कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेली परंतु दुर्दैवाने आजही परिस्थिती बदललेली नाही. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे राजकारणी आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सत्ता आपण सहन केल्या आणि राजकारण्यांनी उपभोगल्या. परंतु आज काय हा प्रश्न आणि उद्या काय हा प्रश्न आपल्याला सतावत आहेच.
परिस्थितीची भयानकता दर्शवणारी ही ‘मोरूची कविता’ मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटते. रोजच्या घटना आणि प्रसंग पण त्यातील भय अधोरेखित करून आपल्याला सतत जाणवत राहते की ‘भय इथले संपत नाही’ खरंच ते संपेल का ? तो सुदिन कधी उगवेल?
या कवितेच्या भयगंडाला पुढे नेऊन अधोरेखित करणारी आणखी एक माणसांची भययुक्त कविता :माणसांसाठीच…..’
असं असलं तरी आयुष्य जगण्याचे थांबवता तर येत नाही ? या सर्व वातावरणात आनंदाने जगण्याचा मूलमंत्र सांगणारी म्हातारपण ची कविता अफलातूनच. ती त्यांच्या स्मृतीनिमित्त सादर ….
म्हातारपणावरचं तरुण गाणं— पाडगावकरांची अप्रतीम लेखणी
“येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,
घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!
हिरवं पान
कधीतरी पिकणारच,
पिकलं पान
कधीतरी गळणारच,
गळलं पान
मातीला हे मिळणारच.
झाड कधी कण्हतं का?
कधी काही म्हणतं का?
गिरक्या गिरक्या घेत घेत
नाचत जातं पिकलं पान,
कविता पिवळी पिवळी धमक
वाचत जातं पिकलं पान!
नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण,
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारप
बोरकर एकदा म्हणाले
सिगारेटचा सोडीत धूर
“सत्तर संपली तरी माझ्या
गळ्यात तरुणताजा सूर!
तीन मजले चढून आलो
असा दम अजून श्वासात
– ओत थोडी व्हिस्की ग्लासात!”
कवितांतून
रंग रंग झरू लागले
प्रत्येक क्षण
आनंदाने भरू लागले!
घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण,
धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण!
पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस
पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत
उभा होता किती वेळ,
रंगून जाऊन बघत होता
बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ!
रस्त्यावरच उभं राहून दोघांनी
मग खाल्ली जोडीने मस्त भेळ!
मिटक्यांच्या लयीत त्यांचं भेळ खाणं,
जीभ झाली आंबटतिखटगोड गाणं!
खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण,
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण!
आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे?
नीतीमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे?
अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा?
थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा?
तुम्ही काय घ्यायचं
ते तुम्ही ठरवा,
तुम्ही काय प्यायचं
ते तुम्ही ठरवा!
त्याआधी एवढंच तुमच्या कानात सांगतो:
वय तुमचं साठ असो, सत्तर असो,
तिच्यासाठी फुलांची आणा वेणी;
मोरासारखा अंधार फुलून आल्यावर
मजा आणते थोडीशी काजूफेणी!
तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण,
रडत बसलो की करुण असतं म्हातारपण!
येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,
घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!
आणि आता शेवटी या कवीची स्मृति कायम जागती ठेवणारी पाडगावकरी धाटणीची, त्याच थाटाने आणि नेटाने लिहिलेली माझी कविता रसिकार्पण.