मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #237 ☆ मातृदिनानिमित्त – अमृत सिंचन… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 237 ?

☆ मातृदिनानिमित्त – अमृत सिंचन ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आई म्हणजे माझ्यासाठी झिजणारे ते चंदन आहे

स्तुतिसुमनांना गंध आणण्या करतो मीही चिंतन आहे

*

देव पुजेचा मुहूर्त माझा कधी कधीतर टळून जातो

रोज सकाळी उठल्यावरती माते चरणी वंदन आहे

*

झुंजायाला तयार असते भट्टीसोबत तीही कायम

राख तिची तर झाली नाही जळून होते कुंदन आहे

*

डोळ्यांमधल्या वाचत असते चुका वेदना सारे काही

कधी घालते नेत्री माझ्या जळजळीत ती अंजन आहे

*

मशागतीची सवय लावली मनास माझ्या तिनेच आहे

बीज पेरुनी मग ती करते भरपुर अमृत सिंचन आहे

*

लोक म्हणाया मला लागले अता टोणगा नसे काळजी

ती तर म्हणते तिचा लाडका मी छोटासा नंदन आहे

*

सागरात मी मेरू पर्वत घेउन आलो रवी सारखा

चौदा रत्ने यावी वरती मनात चालू मंथन आहे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातृदिनानिमित्त – बाईपण भारी देवा ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मातृदिनानिमित्त – बाईपण भारी देवा ☆ सौ. गौरी गाडेकर

(This is how the mother feels 🙂

मी आई आहे म्हणुनी

पिल्लांवर छाया धरते

ती मोठी झाली तरीही

मी चिंता त्यांची करते.

*

मी आई आहे म्हणुनी

अस्तित्व हरवले माझे

मज कधी वाटते भीती

पिल्लांवर माझे ओझे.

*

मी आई आहे म्हणुनी

माझी सारी पुण्याई

बछड्यांच्या कामी यावी

ही विनवणी देवापायी

*

मी आई झाले म्हणुनी

लाभला मला नव जन्म

आईपण मिरवत गेले

मम धन्य जाहला जन्म.

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीरामांच्या वंशातील लढवय्या राजपुत्र !! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

श्रीरामांच्या वंशातील लढवय्या राजपुत्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

श्री.भवानी सिंग (महावीर चक्र विजेते)

महर्षी विश्वामित्र अयोध्येत राजा दशरथांच्या दरबारात पोहोचले. आणि त्यांनी दशरथांकडे एकच मागणी केली….ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा! यज्ञात विघ्न निर्माण करणा-या राक्षसांचा नि:पात करण्यास आणि माझ्या यज्ञाचे रक्षण करण्यास हाच सर्वथा योग्य आहे! आणि राजस सुकुमार राजपुत्र श्रीराम धनुष्य-बाण धारण करून सज्ज होऊन भ्राता लक्ष्मणासह निघाले सुद्धा! 

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आला आणि लगोलग शत्रूंनी घेरलाही गेला. या राष्ट्ररूपी यज्ञाचे रक्षण करण्यास अशाच श्रीरामांची आवश्यकता होती. स्वातंत्र्यापूर्वी हिंदुस्थानात कित्येक स्वतंत्र राज्ये होती. त्यांचे राजे आणि राजकुमार आणि सैन्यही होते. या सर्वांमधून स्वतंत्र भारताच्या सैन्यात सैन्याधिकारी म्हणून सर्वप्रथम प्रत्यक्षात सामील होण्याची हिंमत दाखवली ती प्रभु श्रीरामचंद्रांचे सुपुत्र कुश यांचे तीनशे सातवे वंशज श्री.भवानी सिंग (महावीर चक्र विजेते) यांनी! वयाच्या अवघ्या एकवीसाव्या वर्षी राजपुत्र भवानी सिंग भारतीय सेनेच्या पायदळात थर्ड कॅवलरी रेजिमेंट मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. पुढच्या तीनच वर्षांत भवानी सिंग साहेबांची महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या अंगरक्षक दलात नेमणूक झाली. तब्बल नऊ वर्षे ते या दलाचा भाग होते. यानंतर साहेब ५०,पॅरा ब्रिगेडमध्ये सामील झाले. १९६४ ते १९६७ या तीन वर्षात त्यांनी देहराडून मिलिट्री अ‍ॅकॅडमी मध्ये ‘अ‍ॅज्युटंट’ म्हणून सेवा केली. १९६७ मध्ये त्यांनी स्वेच्छेने पॅरा कमांडो युनिट मध्ये प्रवेश केला आणि मग त्यांना पुढच्याच वर्षी या युनिटचे कमांडींग ऑफिसर म्हणून जबाबदारी मिळाली. केवळ नामधारी असलेल्या राज्याचा राजपुत्र आता खरोखरीच्या रणांगणावर देशसेवा करण्यासाठी सज्ज होता. 

पुढील तीनेक वर्षातच भारत-पाकिस्तान दरम्यान सशस्त्र संघर्षाची पार्श्वभूमी तयार झाली. योद्ध्यांना आता मर्दुमकी दाखवण्याची संधी मिळणार होती…ज्याची सैनिक वाट पहात असतात. पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी सैन्याने चालवलेल्या अत्याचारांचा परिपाक म्हणून तेथील नागरीकांचा उद्रेक होणं आणि त्यातून एका स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती होण्याची प्रक्रिया नियतीने सुरू केली होती. तेथील स्वातंत्र्यसैनिकांच्या मुक्तीवाहिनी दलाला सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या कामात भवानी सिंग साहेब सहभागी झाले. 

पाकिस्तान भारतात पश्चिमेच्या बाजूने पॅटन रणगाड्यांच्या भरवशावर आक्रमण करणार असा अचूक अंदाज फिल्ड मार्शल सॅम बहादूर मानेकशॉ साहेबांनी बांधला आणि हे आक्रमण थोपवण्याच्या दृष्टीने पाच-सहा महिने आधीच सराव सुरू केला…त्याची जबाबदारी लेफ़्टनंट कर्नल भवानी सिंग साहेबांकडे आली आणि त्यांनी ती निभावली सुद्धा….अगदी प्रभावीपणाने! 

या धामधुमीत तिकडे जयपूर मध्ये वडिलांच्या अचानक झालेल्या देहावसानामुळे राजपुत्र भवानी सिंग साहेबांना महाराज म्हणून गादीवर बसण्याचा सन्मान प्राप्त झाला होता…आता एक राजपुत्र नव्हे तर एक महाराजा युद्ध लढणार होते. 

माणेकशा साहेबांचा अंदाज अचूक ठरला आणि पाकिस्तानने पश्चिम बाजूने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. ही बाजी त्यांच्यावर उलटवण्यासाठी बाडमेर पासून सुमारे ७०-८० किलोमीटर्सवर भवानी सिंग साहेब आपल्या जवानांसह सुसज्ज होते. दिल्लीत घुसु पाहणा-या पाकिस्तानला भारताने पाकिस्तानात घुसून चोख प्रत्युत्तर दिले. यात आघाडीवर होते भवानी सिंग साहेब आणि त्यांची १० पॅरा रेजिमेंट. 

     सलग चार दिवस आणि चार रात्री अथक चढाई करीत करीत भवानी सिंग साहेबांनी पाकिस्तानच्या सैन्याला मागे रेटीत नेले. सुमारे पाचशेच्यावर गावे भारतीय सैन्याच्या ताब्यात आली होती. या प्रचंड मा-यामुळे पाकिस्तानी सेना प्रचंड गोंधळून आणि घाबरूनही गेली होती. भवानी सिंग साहेबांच्या नजरेसमोर आता लाहौर दिसत होते…अगदी काही तासांतच लाहौर वर तिरंगा फडकताना दिसू शकला असता….लाहौर…भवानी सिंग साहेबांचे पूर्वज कुश यांचे बंधू लव यांची नगरी….! पण हा योग जुळून आला नाही! 

     इस्लामकोट,नगर पारकर, वीरावाह या पाकिस्तानी ठाण्यांवर तिरंग फडकला होता…लुनियावर ध्वज फडकावून लाहौरकडे कूच करायचा मनसुबा असतानाच वरीष्ठांच्या आदेशानुसार भवानी सिंग माघारी फिरले. त्यांच्या नेतृत्वात भारतीय जवानांनी ३६ पाकिस्तान्यांना यमसदनी धाडले आणि २२ पाकिस्तानी सैनिक युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले होते. या अतुलनीय पराक्रमासाठी या महाराज महावीरास महावीर चक्र न मिळते तरच नवल! 

विजयी होऊन लेफ़्तनंट कर्नल महाराजा भवानी सिंग साहेब जेंव्हा जयपूरला पोहोचले तेंव्हा त्यांच्या अभिनंदनासाठी संपूर्ण जयपूर लोटले होते….विमानतळ ते आमेर किल्ला हे वीस किलोमीटर्सचे अंतर पार करायला विजय मिरवणुकीला दहा तास लागले होते…राजपुत्र म्हणून सैन्यात गेलेले सुपुत्र महाराजा म्हणून युद्ध जिंकून आले होते! युद्ध संपल्यावर काहीच दिवसांत सरकारने ‘राजा’ ‘महाराजां’चे अधिकार संपुष्टात आणले. पण जनतेच्या मनातील महाराजा भवानी सिंग यांचेबद्दलचा आदर किंचितही संपुष्टात आला नाही, हे खरेच! 

१९७४ मध्ये महाराजांनी सेनेतून स्वेच्छानिवृत्ती स्विकारली. पण भारतीय सेनेच्या श्रीलंकेतील शांतिसेना अभियानादरम्यान भवानी सिंग साहेबांवर फारच मोठी जबाबदारी दिली गेली. श्रीलंकेतील एल.टी.टी.ई. (लिबरेशन टायगर्स ऑफ तमील ईलम)च्या बंडखोरांनी काहीशा बेसावधपणे श्रीलंकेत उतरलेल्या सैन्यावर तुफान हल्ला चढवून खूप मोठे नुकसान केले. एका घटनेत तर आपल्या काही कमांडो सैनिकांचे अपहरण करून त्यांना नृशंसपणे ठार मारले होते. याचा फार मोठा परिणाम सैनिकांच्या मनोधैर्यावर होणे अगदी स्वाभाविक होते. या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी सरकारने लेफ्टनंट कर्नल भवानी सिंग (सेवानिवृत्त) यांना श्रीलंकेत खास कामगिरीवर धाडले. आणि या जातीवंत लढवय्याने सैनिकांमध्ये नवा उत्साह भरला आणि सैनिक पुन्हा लढण्यास सज्ज झाले. रामायणातही जेंव्हा वानरसेना हतोत्साहीत झाली असेल तेंव्हा प्रभु रामचंद्रांनी असाच त्यांचा उत्साह वाढवला असेल ! 

(महाराजा भवानी सिंग साहेबांना या कामगिरीबद्द्ल १९९१ मध्ये मानद ब्रिगेडीअर पदाने गौरवण्यात  करण्यात आले. यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे १६ एप्रिल १९११ रोजी रात्री उशिरा महाराजांनी इहलोकाचा निरोप घेतला. १६ एप्रिल हा भवानी सिंग साहेबांच्या निधनाचा दिवस. केवळ एका शूर सैनिकाचे स्मरण म्हणूनच या लेखाकडे पाहिले जावे आणि केवळ याच विचाराने आलेल्या प्रतिक्रिया दिल्या जाव्यात, अशी आशा श्रीरामकृपेने करतो.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बायको असतेच जरा सर्किट… – अनुवाद : सॅबी परेरा ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ बायको असतेच जरा सर्किट… – अनुवाद : सॅबी परेरा ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

[डॉक्टर ज्योत्स्ना मिश्रा ह्यांच्या  ‘औरतें अजीब होती है’ ह्या हिंदी कवितेचा मुक्तानुवाद]

बायको असतेच जरा सर्किट

रात्रभर झोपत नाही धड

पापण्यांची सुरूच असते फडफड

झोपेच्या दऊतीत बुडवून पापण्या

दिवसभराची डायरी लिहीत असते

दरवाजाची कडी, पोरांचं पांघरूण, नव-याचं मन

पुन:पुन्हा चाचपडून बघत असते

*

बायको असतेच जरा सर्किट

धड उठतही नाही सकाळी

झोपेतच सुरू होते कर्तव्याची दिवसपाळी

टिफीनमधे घेऊन कविता 

कुंडीतल्या आशेला देऊन पाणी 

ओठांवर गुणगुणत गाणी

नव्या दिवसाच्या नव्या आव्हानाला

भिडत जाते झाशीची राणी

जुळवून घेते सा-यांशी सूर

सर्वांच्या जवळ राहता-राहता

जाते स्वत:पासूनच दूर

*

बायको असतेच जरा सर्किट

स्वप्नंही धड पूर्ण पाहत नाही

अर्धवट स्वप्नं वा-यावर सोडून

पाहू लागते …

चुलीवरचं ऊतू जाणारं दूध

दोरीवरचे उडू पाहणारे कपडे

गॅलरीच्या कडेपर्यंत रांगत गेलेलं बाळ

अजूनही शाळेतून न परतलेली लेक

अडखळत पाय-या चढणारा नवरा…

*

बायको असतेच जरा सर्किट

कुठलंच काम धड करीत नाही

मधेच सोडून शोधू लागते

पोरांचे मोजे, पेन्सिली, पुस्तकं

स्वत:च्या काॅलेजच्या पुस्तकातलं मोरपिस, 

स्कर्टच्या खिशातली बोरं, करवंदं

लपाछपीतल्या लपायच्या जागा

मैत्रिणींचे चुकलेले, चुकवलेले हिशेब

उघडझाप करणा-या खिडक्या

पितळेच्या डब्यातल्या चवल्या, पावल्या, दिडक्या

*

बायको असतेच जरा सर्किट

भेटत राहते, दिवसाचे चोवीस तास

वेगवेगळ्या रूपात, अवतारात

कधी नाक्यावर काॅंन्स्टेबल

कधी ब्युटीकमधे ब्यूटीशियन

कधी बसमधे कंडक्टर

कधी आॅफीसात सहकारी

ती वहिणी, ती लेक, ती ताई

ती नर्स, ती दाई, ती आई

चपलेचा तुटलेला पट्टा

साडीच्या फाॅलपाठी लपवणारी

शाळेतली ती शिस्तप्रिय बाई

काॅरीडाॅरमधे झपझप चालत

नखातला आटा झटकणारी

सकाळी घाईत अंघोळ आटोपून आलेली

ती डाॅक्टरीन बाई

*

बायको असतेच जरा सर्किट

ओढत-ढकलत कसाबसा, दिवस पार करते मात्र

क्रूस घेऊन समोर, उभी असते रात्र

दिवसाइतक्याच सहजतेने रात्रीलाही भिडते

लेकरांसाठी भुतांना पिडते

सत्यवानासाठी देवालाही नडते

*

बायको असतेच जरा सर्किट

दुष्काळात पावसासाठी आसवं ढाळते

हाताच्या ओंजळीत फुलपाखरं पाळते

सरसरून वाहू लागतो वारा

भरभरून बरसू लागतात धारा

धरतीला येते ज्वानीची भरती

ती धावत सुटते … वाचवायला

दोरीवर वाळणारे कपडे, 

अंगणातले पापड, मसाले

छतावरील लोणचं, खारवलेले मासे …

*

बायको असतेच जरा सर्किट

सुखाच्या तीन-दगडी आश्वासनावर

अवघ्या आयुष्याचं आंधण ठेवते

हरेक डोंगरातून रस्ता खोदते

हरेक दरीवर पूल बांधते

कळीसारखी उमलत राहते

वा-यासारखी वाहत राहते

अंगणात पडलेला चांदण्यांचा सडा

वेणीत गुंफून केसात माळते

दिनरात डोळ्यांतून पाझरत राहते

आसवांच्या नदीत वाहत जाते

समुद्रात मिळतानाही आपला गोडवा जपते

*

बायको असतेच जरा सर्किट

डोक्याचं काम खुशाल सोपवते ह्रदयाकडे

कपाळाच्या क्षितिजावर मावळला सूर्य जरी

पहात राहते आशेने उदयाकडे

कारण…

बायको असते दुष्काळातली बरकत

बायको असते गाण्यातली हरकत

बायको असते तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं तर्कट !- 

अनुवाद : सॅबी परेरा

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आठवणी दाटतात… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– आठवणी दाटतात – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

गुंतलेल्या रेखांचं भावविश्व माझं,

त्यात मी जगत आहे |

गुंता जरी किती असला जीवनी,

माझा मी सोडवत आहे |

*

सुखाच्या रेशांनी,

कधी हुरळून जात नाही |

दुःखाच्या रेघोट्यानी,

कधी पळून जात नाही |

*

अपेक्षाभंग जरी आला नशिबी,

निराशेची चादर ओढत नाही |

क्षणिक सुख दुःखाच्या पेल्यात,

सहजासहजी बुडत नाही |

*

वादळे किती जरी आली,

झेलण्याची जिद्द आहे उरात |

आभाळ जरी कोसळलं,

पाय रोवून संकटांच्या दारात |

*

अमृत कुंभाचा मोह नाही,

हलाहल कंठात साठवतो |

मृत्यू असो वा अमरत्व,

जटा भस्मात गोठवतो |

*

खडतर जीवन वाटेवर,

माझ्या पावलांचे ठसे उमटतात |

मागे वळून पाहताना,

संघर्षाच्या आठवणी दाटतात |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 173 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 173 ? 

अभंग☆ महंत कवी राज शास्त्री ☆

भाव सुमनांची, गुंफुनिया माळ

भजनात काळ, घालवावा.!!

*

नका देऊ काही, अन्य भगवंता

कर्ता करविता, तोचि आहे.!!

*

त्यासी नचं लगे, द्रव्य प्रलोभन

त्यानेच निर्माण, केले सर्व.!!

*

स्वतःला ओळखा, स्वतःला पारखा

आखा लेखाजोखा, आयुष्याचा.!!

*

कवी राज म्हणे, भक्तीची आखणी

देईल पर्वणी, मुचण्याची.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साठमारी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ साठमारी☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आजच्या राजकारणापेक्षा

पूर्वीची साठमारी बरी होती

मैदानावर जीव खाऊन पळता येत होतं

अंगावर घेत पिसाळलेला हत्ती….

*

हरलो तर त्याच्या पायाखाली चिरडून एकदाच मरून मुक्त होता येत होतं

मिटत होत्या कायमच्या यातना

पण आत्ताच्या या मग्रूर सांडांच्या लढाईत

धडपणे मरताही आणि जगताही येत नाही माणसाला

नरकवासातील यातना भोगत जिवंत राहून करायचं तरी काय ?

*

जिथे परंपरागतांच्या तोंडचा मालकीहक्काचा घासच हिरावून घेतला जात आहे

त्यांनीच निवडून दिलेल्या दानवाकडून

त्याना शासनतरी करणार कोण ?

*

मायभूमीवर किड्यामुंग्यांचा नाही

माणसांचा रहीवास आहे

हेच विसरलेत शासनकर्ते

*

एकामेकांची उणीदुणी काढत ही गिधाडं सामान्यांचे लचके तोडत

आपलं अस्तित्व शाबूत ठेवून आरामात जगण्यात मश्गूल

राहून

आमचीच दिशाभूल करत आहेत

*

सामान्यानो जागे व्हा हीच ती नेमकी वेळ आहे.

देशाला सावरण्याची आणि मातलेल्या पुंडपाळेगाराना आवरण्याची

*

वणव्यात जळून मरण्यापेक्षा

तो विझवण्यासाठी प्रयत्न करुया

एकजूटीने आपल्या

जागते रहा रात्र वै-याची आहे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “मतदान करू…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “मतदान करू” ☆ श्री सुनील देशपांडे

चला चला मतदान करू

लोकराज्य मजबूत करू

*

लोकशाहीची फळे मधुर हो

मतदानास्तव तुम्ही चतुर हो

योग्य तया मतदान करू

लोकराज्य मजबूत करू

*

लोकशाही मजबूत हवी जर

पाऊस थंडी गर्मी जरी वर

केंद्रावरती गर्दी करू

लोकराज्य मजबूत करू

*

लोकशाहीचा उत्सव करूया

सुट्टी पिकनिक नंतर करूया

चला घरा बाहेर पडू

लोकराज्य मजबूत करू

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जा ही र ना मा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ 🕺 जा ही र ना मा ! 🤣 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

जा हीरनामा सर्वच पक्षांचा

असतो एक पोकळ मनोरा,

अशक्यप्राय अशा वचनांनी

उभा करती सारा डोलारा !

*

हि तगुज करती मतदार राजाशी

त्याच्या चंद्रमौळी घरात,

भाकर तुकडा “फोटोसाठी”

खाती त्याच्याच ताटात !

*

र स्तोरस्ती काढून मिरवणूका

लोकांचा करती खोळंबा उगाच,

कर्णकर्कश्य आवाजाने होतो

फुका ध्वनी प्रदूषणाचा जाच !

*

ना ही आठवत वचननामे त्यांना

एकदा निवडून आल्यावर,

 चार हात दुरून करती नमस्कार

 जे आधी असायचे खांद्यावर !

*

मा मा बनतो भोळा मतदार

 मतदान इमाने इतबारे करतो,

 न झाल्याने वचनांची पूर्ती

 पुन्हा पाच वर्षे मनी झुरतो !

 पुन्हा पाच वर्षे मनी झुरतो !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ज्याचे त्याचे श्रद्धास्थान… – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशीष ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ज्याचे त्याचे श्रद्धास्थान… – चित्र एक काव्ये दोन ? सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर 

सुश्री नीलांबरी शिर्के

( १ )

ज्याचे त्याचे श्रद्धास्थान

ज्याला त्याला प्रिय असते

दारूची बाटली म्हणूनच

दारुड्याला प्रिय असते

*

रिकामी  झाली तरीही

तिनेच नभात उंच नेले

दिवसाढवळ्या मनाला

एक वेगळे जग दिले

*

अशी ही रिक्त बाटली

त्याचे श्रद्धास्थान बनते

भक्तिभावे म्हणून तिची

मनोभावे पूजा होते

*

दारूच्या बाटली बाई

नेहमीच तू प्रसन्न रहा

वेगवेगळ्या रूपामधे

मला तू भेटत रहा

*

नित्य तुझी पुजा करीन

भरलेली असो वा रिकामी

सेवेत खंड पडणार नाही

शपथ घेऊन देतो हमी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

( २ )

श्री आशिष बिवलकर

चषक मदिरेचे रिचवून,

रिक्त केली बाटली |

श्रद्धेने फुल पान अर्पून,

श्रद्धा मनात दाटली |

*

 नशा दारूत असती,

तर ती ही नाचली असती |

नशेबाज माणूस असतो,

उगाच बदनाम झालीय ती |

*

भरलेली असताना,

तळीरामांना खुणावत असते |

अप्सराही फिकी वाटावी,

इतकी ती मादक भासते |

*

कृतघ्नतेच्या दुनियेत,

दुर्मिळ एक श्रद्धावान असतो |

पान फूल वाहून,

मिळाल्या तृप्तीला जागतो |

*

छोटा रिचार्ज, क्वार्टर , खंबा,

तिची विविध परिमाण आहेत |

ज्याची त्याची रिचवायची ताकद,

आरोग्यावर तिचे परिणाम आहेत |

*

कितीही समाजवा त्याला,

दारू ही सर्वात वाईट आहे |

फरक नाही पडत त्याला,

तळीराम मोहात टाईट आहे |

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares