मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

लग्न पहावं करून-

जोगेश्वरी परिसर म्हणजे अगदी मोक्याची जागा. आत्ताचा गजबजलेला लक्ष्मी रोड तेव्हां अस्तित्वातच नव्हता. तो रस्ता नागमोडी आणि कच्चा होता. काही अंतराने फक्त चार-पाच देवळे होती. गणपतीची मिरवणूक, लग्नाची वरात, भिक्षावळ, पालखी श्रीजोगेश्वरी रस्त्यावरून पुढे जायची ही वर्दळीची जागा म्हणून जोगेश्वरी जवळच श्री. शंकर राव कुलकर्णी ह्यांनी गाळा विकत घेतला होता. त्यामुळे छकडा किंवा बैलगाडीतून सायकली दुरुस्त करायला आणायला त्यांना सोईचं पडायच. मंदिरात ओटा आणि दगडी फरशी होती. शुभ कार्य निघाले की जोगेश्वरी परिसरात शिरल्यावर लग्न कार्यवाहक, सगळीच काम करून समाधानाचा निश्वास सोडून अगदी निर्धास्तपणे तिथून बाहेर पडायचे. कारण सगळ्या वस्तू जोगेश्वरी परिसरांतच मिळायच्या. ‘घर पहाव बांधून आणि लग्न पहावं करून ‘ इतकं शुभ कार्य करणे अवघड होत. वधूपिता प्रथम वळायचा पत्रिकेच्या कारखान्यात. शामसिंग रामसिंग परदेशी उत्तम पत्रिका छापायचे. त्यांची इतकी तत्पर सेवा होती की ‘शाम प्रिंटिंग प्रेस’ मध्ये पन्नास हजार पत्रिका तयार असायच्या, सगळा मसुदा एकदम रेडी. श्रीगणेश प्रसन्न. श्रीजोगेश्वरी प्र. वधू वर, वडील मंडळी, वधू-वर पिता सगळे छापलेले रकाने अगदी तयार असायचे. नंतर फक्त नांव विचारून फायनल करून प्रिंट करायची. की झालं काम. चला! महत्वाचं शुभमुहूर्ताचे पहिलं कार्य असं पार पडून पत्रिकांचे गठ्ठे 2 तासात लग्न घरी वेळेवर व्यवस्थित पोहोचायचे. अशा तऱ्हेने कार्याचा पहिला आणि महत्त्वाचा गड, ‘सर’ केला जायचा. काही हौशी पुणेकर पत्रिकेवर वधूवरांचे फोटो छापून घ्यायचे. आत्ताच्या अवजड, भरभरून, डेकोरेट केलेल्या अल्बम पत्रिका, वाचतानाच वाचणारा वाकतो. पण काही म्हणा हं!त्या वेळच्या ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीची सर नाही येणार आत्ताच्या लग्न पत्रिकेला. मंडळी कार्याला वाजंत्री, सनई, चौघडा हवाच हो नां? ती चौकडी पण याच परिसरांत भेटायची. दूध भट्टी गॅस बत्तीवाले, दारू गोळे, भुईनळे वाले आमंत्रणाची वाटच बघत बसलेले असायचे. राजीवडेकरांच्या प्रसिद्ध दुकानात धोतर, कोटटोपी जॅकीट, पगडी घेऊन हौशी पुरुष मंडळी बाहेर पडायची, तर शालूकरांच्या दुकानातून शालू घ्यायला बायका अधिर व्हायच्या. मनासारखा शालू मिळाल्यावर नवरीची कळी खुलायची. देण्या घेण्यासाठी हलकी, भारी नऊवारी निवडायला वडीलधाऱ्या बायका खण आळीकडे लगबगीने वळायच्या. वाटेत अचारी अड्डा लागल्यावर अनुभवी वडीलधारी, मजुरी, मेनू, माणसांची संख्या सारं काही भाव कमी जास्त करून, व्यवहार पक्का करून मोकळी व्हायची. चला! जेवणावळीचं मुख्य काम संपलss. ढोल, ताशा, मिरवणूक, वाजंत्री ई. व्यवहार खुंटा बळकट करून पक्का झाला. आता राह्यला अत्यंत आवडीचा, हौसेचा व्यवहार म्हणजे सोननाणं, दागिने खरेदीचा, त्यावेळी रु. 250 /- तोळा सोन्याचा भाव होता. गरीबा घरचे वधू पिते मणी मंगळसूत्र, जोडवी विरोदी, खरेदी करायचे तर हौशी श्रीमंत वधूपिते लाडक्या लेकीसाठी पेशवाई थाटाचे दागिने सोनाराला काढायला लावून, पसंत करायचे, घोंगडे आळीतल्या घोंगड्यांची पण तेव्हां चलती होती. सगळ्या साईजच्या घोंगड्यांनी शरीराला मस्त उब मिळायची. ज्ञानविलास प्रसिद्ध कारखाना पण इथेचं होता. लग्नात नवरा सायकल, घड्याळ्या साठी आणि भारी शूज करता रुसून बसायला नको, म्हणून ओरिएंटल मध्ये लेटेस्ट बुटाची खरेदी व्हायची. नवी कोरी सायकल घ्यायला कुलकर्णी अँड सन्स तिथे सज्ज होतेच, आणि हो अजुनही आहेत बरं का! मिलन, कला विकास फोटो स्टुडिओ पण सेवेला हजर असायचे. सारं काही श्रीजोगेश्वरीच्या सानिध्यातच, मिळाल्यामुळे वरमायपिता वधूमायपिता धन्य धन्य होऊन मानाच्या कसबा गणपतीला पान सुपारी, अक्षत, विडा, शकुनाचे पांच लाडू आणि पत्रिका द्यायला नटून थटून बाहेर पडायचे.  आणि म्हणायचे ‘गणेशा आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे रे देवा ‘

– क्रमशः…  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अशी पाखरे येती…” ☆ सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

??

☆ “अशी पाखरे येती…” सौ. प्रतिभा कुळकर्णी 

खरं तर मला म्हणायचं आहे अशी परदेशी पाखरे येती…..

फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी हिवाळ्यामध्ये सायबेरिया आणि युरोपातील इतर थंड प्रदेशांमधून काही काळासाठी भारतातील अनेक ठिकाणी येतात. कारण या काळामध्ये त्या देशांपेक्षा भारतातील वातावरण जास्त उबदार असते.

अशीच असंख्य पाखरे दरवर्षी भारतातील आपल्या उबदार कुटुंबात काही काळासाठी येऊन विसावतात. आपल्या कुटुंबातील ही पाखरं आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये गेलेली असतात. ही पाखरं म्हणजे आपली मुलं आणि मुली.

आज मला हे आठवायचे कारण म्हणजे सकाळी च माझ्या सिंधू ताई चा आलेला फोन. तिला माझी चकल्यांची रेसिपी हवी होती. परवा तिचा लाडका लेक संदीप, सून सारिका आणि नातू सौमिल सह दोन आठवडय़ांसाठी भारतात येणार होता. तसा तो अगदी 

दरवर्षी नाही जमलं तरी २/३ वर्षातून एकदा आपल्या सारिकाआणि सौमिल ला कुटुंबाची ऊब मिळावी म्हणून धडपडत येतोच…..

मग काय… ह्या दिवसात सिंधू ताई कडे “मुलेबाळे येती घरा तोचि दिवाळी दसरा” असेच वातावरण असते.

ही पाखरे इथे Land होण्याच्या आधीच त्यांच्या मिनीटामिनिटाचा कार्यक्रम ठरलेला असतो. पहिले काही तास, फार तर एक दिवस jet lag घालवण्यात जातो. मग त्यांना जास्तीत जास्त सगळ्याच नातेवाईकांना भेटायचं असतं.

शाळा-काॅलेजातील मित्रमंडळींना तर भेटलच पाहिजे याऽऽऽर…. इति संदिप आणि सारिकाही…

मधे च दोघांना ही आठवतात नव्वदी पार केलेल्या कुसुममामी आणि सुशाआज्जी… ह्याना तर भेटलच पाहिजे…. ना जाणो पुढच्या वेळी येऊ तेव्हा……

त्यातच येतात दोन लग्न समारंभ… त्या निमित्ताने सगळे च एकत्र भेटतील…. धम्माल येईल….

अरे पण….

मुंबईत आल्यावर रस्त्यावर उभं राहून गाडीवरचा वडापाव, कांदाभजी खायलाच पाहिजे. आणि भैयाने हाताने कालवलेली तिखट ओली भेळ, झालंच तर मडक्यात हात घालून काढलेली पाणीपुरी व्हायलाच हवी. ताजीताजी गरम जिलेबीने मग तोंडाचा तिखटपणा घालवायचा. हे सारे आधीच ठरलेलं आहे हं…. सौमिलचा हट्ट..

यातलं कांहीही राहिलं तर शेवटच्या दिवशी रात्री २ वाजता विमानात बसताना चुटपुट लागते. “पुढच्या वेळेस नक्की” असं स्वतःचं स्वतःच समाधान करून घ्यायचं……. हे ही ठरल्यासारखेच..

मराठी नाटक हा मराठी माणसाचा weak point. परदेशात मराठी नाटकवाले दौरे करतात. पण इथे येऊन शिवाजी मंदिर अथवा रविंद्र ला नाटक न बघता परत जाणं म्हणजे पंढरीला जाऊन विठोबाचं दर्शन न घेता परत येणं. किंवा शिर्डीला जाऊन साईबांबांचं दर्शन न घेता……

… अरे हो, ह्यावेळी ताईच्या मनात होते सगळ्याना घेऊन शिर्डीला जाऊन यायचे आणि मग तिथून येवला किती लांब राहिलं? सुनेला एक छानशी तिच्या गोर्यापान रंगाला खुलून दिसेलशी

पैठणी घ्यायची. परदेशात असली तरी सारे सणवार अगदी हौसेने करते ती… तेव्हा तीला उपयोगी पडेल ती.

सर्वांनी भारताबाहेरील अनेक देश बघितलेले असतात. पण आपल्या मुलांना ताजमहाल, उदयपूर, जयपूरचे महाल दाखवणं हा अभिमानाचा भाग. किंवा ताडोबा अभयारण्य, जिम काॅर्बेट जमलं तर पर्वणीच. गेला बाजार खंडाळा लोणावळा तर पाहिजेच. हे सगळे संदीप – सायली ने केलेले बेत मनातले मांडे च ठरतात.

काही साध्यासुध्या गोष्टींची खरेदी, जसं बूट, नाईट ड्रेस वगैरे, ही दिवसाचे महत्त्वाचे कार्यक्रम झाल्यावर करण्याची गोष्ट. पण must या यादीतील असते.

मुलांना आवडणा-या पदार्थांची यादी ताई अधूनमधून परत परत बघतच असते. राहिलेले पदार्थ कधी करूया याचं planning ही चालू असतं तीचं. सारिका ला आवडणारा शेपू मिळतंच नाही. संदीप ला आवडणारं माझ्या हातचं वालाचं बिरढं कधी करूया? 

तळलेले बोंबील, चिंबोरीचं कालवण यात सोमवार गुरुवार वगैरे वार आडवे आलेत…. सोम्याच्या आवडीचे अहळीवाचे लाडू आणि भाजाणीची चकली राहिलीच की….. ताई सतत ह्या गहन विचारात…  

आणि एक गोष्ट राहिलीच की. ह्या मुलांना अगदी पूर्ण सक्तीची विश्रांती घ्यायला लावायची. तिकडे अठरा अठरा तास कामात बुडलेली असतात..

पण अजून काही ते साध्य झालेलं नाही…. थोडीशी विश्रांती घेणं…. अर्थात त्यांच्या लेखी ते काही must नसतं. “ते विमानात करू” असं मनानं ठरलवलेलंच असतं त्यांनी… इथल्या प्रत्येक क्षणी आपले आईबाबा आणि बहीण भाऊ यांचा सहवास मिळावा ही सुप्त इच्छा मनात दबलेली/ दडलेली असतेच.

समुला फक्त आजी आजोबा हवे असतात. परदेशी रहात असून ही तो इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा अस्खलित बोलतो इतकच नव्हे तर त्याने रामरक्षा / अथर्वशीर्ष ही फारच सुंदर म्हटलं….. ह्याचे क्रेडिट मात्र संदिप सारिका च्या संस्कारांना च जातं… इति ताई- भावजी 

हळूहळू परतण्याचा दिवस उजाडतो. दमलेली शरीरं. ताटातुटीच्या कल्पनेने दु:खी मनं.

घरची गाडी असली तरी नेहमीची भाड्याची गाडी ठरवली जाते. कितीला निघायचं ही गणितं होतात. “तासभर लवकरच निघा”. ताई भावोजींचा भरून येणारे डोळे पुसत सल्ला….

मग ती वेळ तो क्षण येतो. डोळे ओले होऊ देणं हल्लीच्या संस्कृतीत बसत नाही. पण मनं व्याकुळ असतात….

“६ महिन्यांनी तुम्ही तिकडे या” “नक्की ” असा करार होऊन गाडी हलते.

पाखरं परत आपल्या अभयारण्यात पोचतात.

तिथलं आणि इथलं चाकोरीतलं जीवन पूर्वीसारख सुरू होतं.

“पुढच्या वर्षी येतील नं तेंव्हा…. ” मनातल्या मनात योजना आकार घेऊ लागतात. आणि मनाला उभारी देऊ लागतात.

वर्षानुवर्षे चाललेलं हे चक्र आणखी एक फेरी घ्यायला सुरूवात करतं.

© सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘चो-ला’ ची चकमक… – लेखक : जयंत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘चो-ला’ ची चकमक… – लेखक : जयंत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆

सिक्कीममधे १९६५ सालातील सप्टेंबर महिन्यात ७/११ ग्रेनेडियर्स (गुरखा रायफल्स) च्या बटालियनला हुश्शार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. कारण होते चिनी सैन्याने आपल्या काही भूभागावर हक्क सांगून तेथील चौक्या हटवायचा निर्वाणीचा दिलेला इशारा.

७/११ ग्रे. आणि १० जम्मू-काश्मिर रायफल्सच्या एका बटालियनने ४७२० मीटर उंचीवर मोर्चा संभाळला होता. दोन वर्षे असेच चालले होते. किरकोळ कुरबूरींशिवाय काही घडले नाही.

अचानक ११ सप्टेंबर १९६७ रोजी नथूला खिंडीचे प्रकरण झाले. गंगटोकच्या रस्त्यांचे संरक्षण करण्यासाठी ७/११ ने रातोरात योग्य जागा बघून आपल्या चौक्या उभ्या केल्या. नथूलाच्या चकमकी थांबल्या आणि ७/११ च्या वाढदिवसानिमीत्त त्यांची जागा १० जे-के रायफल्सला देण्याचे आदेश आले.

२८ तारखेला आपली संदेशवहनाची सामूग्री, तोफा इ. घेऊन १०-जेके ने आपली जागा सोडली व आघाडीचा रस्ता पकडला. संदेशवहनाची यंत्रणा, चो खिंडीच्या पश्चिम-दक्षिण दिशेला दोन झोपड्या होत्या, त्या ठिकाणी उभी करायची योजना होती.

चो खिंडीत एक तोफ, तर दोन पलटणींनी १५१८१ नंबर ची चौकी गाठायची आणि तेथील ११-ग्रेनेडस् च्या सैनिकांना परत पाठवायचे, असे ठरले होते.

डी. कंपनीच्या दोन पलटणींनी १५४५० नंबरची चौकी, जी पश्चिमेला होती, तेथे संरक्षणाची जबाबदारी स्विकारली होती. उरलेल्या दोन पलटणींपैकी एक रायगाप येथे, तर एक ताम्झेच्या पिछाडीला अशी कामाची वाटणी झाली. या पलटणीबरोबर एक उखळी तोफांची तुकडी ठेवण्यात आली.

एक दिवस अगोदर १० जेकेच्या काही शिख जवानांची चिनी सैनिकांशी एका छोट्या जमिनीच्या तुकड्यावरून बाचाबाची झाली होती. किती मोठा तुकडा असेल हा ? फक्त अंदाजे ५ मीटर लांबीचा हा तुकडा होता.

सीमेवर वातावरण हे असे असते आणि ते तसेच ठेवावे लागते. ‘अरे’ ला ‘कारे’ विचारल्याशिवाय शत्रूही आपला आब राखत नाही. ते जगच वेगळे असते. आपल्याला येथे वाचून त्याची खरीखुरी कल्पना यायची नाही.

तर या तुकड्यावर एक खडक होता आणि त्यावरून त्यांची जुंपली होती. हा तुकडा ना त्यांच्या हद्दीत होता ना आपल्या. या तुकड्याच्या मध्यभागी एक पांढरी रेषा अस्पष्टशी दिसत होती.

या खडकाच्या दोन्ही बाजूला दोन्ही देशाचे तीन तीन सैनिक पहारा देत उभे रहात असत. या सैनिकांमध्ये साधारणत: दोन एक मीटर अंतर राखले जाते. कारण नुसता एकामेकांचा धक्का जरी चुकून लागला तरी १०-१५ जणांचे प्राण सहज जाऊ शकतात. विस्तवाशीच खेळ ! कारण बंदूकीच्या चापावर कायमच बोट आवळलेले असते.

या भांडणात जी वादावादी झाली त्यात एका चिनी सैनिकाला मारण्यात आले आणि त्याच्या कोटाचे बटण तुटले. हे झाल्यावर ते चिनी सैनिक परत गेले आणि दैनंदिन कार्यक्रम परत चालू झाला.

हे झाले पण याची खबरबात मेजर जोशी, जे या कंपनीचे प्रमुख होते, त्यांना फार उशिरा कळवण्यात आली. ३० सप्टेंबरला त्या दोन झोपड्यांच्या तळावर पोहोचल्यावर मेजर जोशींनी त्यांच्या दोन कंपन्यांनी आघाडीवर चौक्या प्रस्थापित केल्या आणि ते १५४५० कडे निघाले.

लेफ्टनंट राठोड यांना त्यांनी तशी कल्पना दिली की ते साधारणत: दुसर्‍या दिवशी, म्हणजे १ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊला तेथे पोहोचतील.

मेजर जोशी मधे वाटेत लागणार्‍या राईगापला पोहोचले. या येथून १५५४० ची चौकी दिसत होती. वरून त्या दिशेला पहात असताना त्यांना दिसले की चिनी सैनिकांच्य़ा एका तुकडीने त्या चौकीला घेरण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत आणि एक तुकडी डी कंपनी जेथे तैनात होती, त्या दिशेला जाताना दिसली.

मेजर जोशींनी लेफ्टनंट राठोड यांना त्वरित त्यांनी जे बघितले त्याची माहिती दिली. लेफ्टनंट राठोड यांनी लगेचच ‘त्या खडकावर चिनी अधिकारी हक्क सांगत आहेत व त्यांच्या बरोबर त्यांचा एक राजकीय अधिकारीही आला आहे’ ही माहीती दिली व काय झाले ते सांगितले.

नायब सुभेदार ग्यान बहादूर लिंबू हे चिनी सैनिकांशी वाद घालत होते आणि वादावादीच्या दरम्यान त्या खडकावर त्यांनी आपला उजवा पाय ठेवला. त्याबरोबर एका चिनी सैनिकाने त्यांच्या पायाला लाथ मारली आणि तो त्या खडकावरून बाजूला सारला ‘आमच्या हद्दीत पाय ठेवायचा नाही इ. इ…. ‘

सुभेदारांनी आपला तोच पाय परत त्याच ठिकाणी ठेवला आणि त्या सैनिकांना आव्हान दिले. वातावरण फारच तापत चालले होते.

हे होत असताना उरलेल्या चिनी सैनिकांनी पटापट त्यांच्या जागा घेतल्या आणि आपल्या बंदूका सरसावल्या. बहुदा हे प्रकरण चिघळवायचे हे त्यांचे अगोदरच ठरलेले असावे.

इकडे त्या चिनी सैनिकाने आपली संगीन सुभेदारांवर चालवली. त्याचा घाव बसला त्यांच्या हातावर.

पुढे काय झाले ते सिनेमातल्या सारखे होते. ज्या सैनिकांने हा हल्ला केला त्याचे दोन्ही हात कुकरीने धडावेगळे झालेले त्यालाच कळले नाही.

हे बघताच जागा घेतलेल्या चिनी सैनिकांनी बंदूका चालवायला सुरुवात केली. दोन्ही बाजूने गोळीबार चालू झाला आणि लान्स नाईक कृष्णा बहादूर यांनी आपले सैनिक घेऊन हल्ल्यासाठी एकत्रीत होणार्‍या चिन्यांवर हल्ला चढवला.

त्यांच्या मागेच “आयो गुरखाली” ही युद्ध गर्जना देत देवी प्रसाद हा जवान त्वेषाने चिन्यांवर तुटून पडला. पहिल्याच झटक्यात त्याने आपल्या कुकरीने पाच चिन्यांची डोकी उडवली.

सुभेदार लिंबू यांना छातीत लागलेल्या एका गोळीने वीरगती प्राप्त झाली. त्यांना, या दाखवलेल्या धैर्याबद्दल आणि पराक्रमाबद्दल मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले.

लान्स नाईक कृष्ण बहादूर यांचे शव नंतर चिनी सैनिकांनी लष्करी इतमामाने परत केले. ते परत करायला जो चिनी अधिकारी आला होता त्याला इंग्रजी येत होते आणि त्याने कबूली दिली की “भारतीय सैनिक वाघांसारखे लढले.”

या घटनेचे महत्व १९६२ सालच्या युद्धात झालेल्या मानहानी नंतर प्रचंड होते. चिनी सैनिकांच्या मनातल्या भारतीय सैनिकांबद्दलच्या कल्पनांना जोरदार धक्का बसला.

इकडे नं १५४० वर लेफ्टनंट राठोड यांना गोळी लागून ते जखमी झाले.

हालचाल दिसताच चिनी सैनिकांनी आकाशात प्रकाश फेकणारे फ्लेअर्स उडवले तेव्हा त्यांना उमगले की त्यांच्या तिन्ही बाजूला गुरखा सैनिक आहेत आणि पुढून हल्ला होणार आहे. त्यांनी एकही गोळी न उडवता सन्मानाने माघार घेतली.

त्याच संध्याकाळी ज्या खडकावरून हे सगळे घडले त्या खडकावर मेजर जोशींनी परत आपला बूट ठेवला आणि त्यांना कोणीही हटकले नाही………….

वाचकहो, त्या निर्जन भागात त्या पाच मिटर जमिनीच्या तुकड्यावर असलेल्या त्या खडकाची किंमत काय, हे तहात जे हरतात, किंवा जे आपल्या ताब्यातला भुभाग शत्रूला सहज देऊन टाकतात, त्यांना कशी कळावी….?

या आणि नथू खिंडीत झालेल्या चकमकींमुळे चिनी सैन्याचा जो दबदबा उगिचच आपल्या सामान्य सैनिकांमधे पसरला होता तो कायमचा नष्ट झाला……… त्याचे उदा. आपण आत्ताच पाहिले.

 

लेखक : श्री जयंत कुलकर्णी

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तर्री… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ तर्री… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

विदर्भातील व्यक्ती बेशुद्ध पडल्यास त्याला चमचाभर तर्रीचा वास दिला तरी तो तात्काळ शुध्दीवर येतो अशी आख्यायिका आहे. तर्रीचा कर्ता, करविता आणि चाहता व्हायचं असेल तर जन्म विदर्भातच व्हायला हवा. वैदर्भिय माणसाचे रक्त लाल असण्यामागे केवळ हिमोग्लोबिन नसून लाल आणि तिखट तर्रीही तितकीच जबाबदार आहे. कानातून घाम निघणे हेच तर्री पावल्याचे जीवंत लक्षण आहे. तर्री हा तरल स्थितीतील पदार्थ असुन याचा रंग लालच असतो. एक लालसर रंगाचा चमकणारा आणि खव्वैय्याला खुणावणारा पातळसा तैलीय पदार्थ हाच तर्रीचा आत्मा आहे. तर्रीचा जन्म जरी पोह्याचा स्वाद वाढवण्याकरता झाला असला तरी कोणत्याही तीखट पदार्थाबरोबर जुळवुन घेण्याची नवरदेवी कला याला अवगत असते. पोह्यावर तर्री पडताच, आपसूक पोह्यात विलीन होते, मग उगाच तर्रीतील दोन चार हरभरे, ‘आपण नाही बुवा त्यातले’ सांगुन पोह्यावर उभे राहुन आपलं वेगळेपण सिद्ध करायचा प्रयत्न करतात.

तर्री हा पदार्थ कालच खाल्ला याची आठवण ठेवायची अजिबात आवश्यकता नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी तर्री स्वत:, तर्री खाल्लयाची आठवण करून देते, आणि आठवण करून न दिल्यास हा पुन्हा दुसऱ्या दिवशी तर्री खाण्यास मोकळा.

व्यवस्थित तर्री बनवणं हे काही खायचं काम नाही, जरी बनवलेली तर्री हे खायचं काम असेल तरी. ज्याप्रमाणे कुशल गाडीवानच गाडी उत्तम रितीने चालवु शकतो त्याचप्रमाणे तर्री छान बनवायला कुशल तर्रीवानच हवा. एकदा का यांच्या तर्रीने अंघोळ करून पदार्थ शुचिर्भूत झाला की कोणीही पदार्थाची मूळ चव काय? हा प्रश्न उपस्थित करत नाही. अगदी गंगास्नान झाल्यावर जसा माणूस पापमुक्त होतो त्याचप्रमाणे तर्रीस्नान झाल्यावर मूळ पदार्थ हा चवमुक्त होतो आणि मग चर्चा उरते ती केवळ तर्रीची. तर्रीबाज पदार्थ खाणारा तर्रीबाज नव्हे तर “थोडी तर्री और डालो” म्हणणाराच पट्टीचा तर्रीबाज.

एखाद्या तर्रीबाजाने आठ पंधरा दिवस तर्री न खाता काढलेच तर त्या तर्रीपरायण व्यक्तीच्या मेंदुला तर्रीचे दर्शन व पुरवठा न झाल्याने तरतरी कमी होऊ शकते.

तर्री कशाची आहे (मटर की हरभरा) हे महत्त्वाचे नाही. तर्री हे स्वत:च एक परिपूर्ण पॅकेज आहे. वांग्याच्या भाजीवर असलेल्या तेलाच्या तवंगाला तर्री म्हणून, तर्रीचा अपमान करू नये. अस्सल तर्रीबाज हे फुलपाखराप्रमाणे तर्रीच्या सुगंधाकडे ओढले जातात. केवडा, मोगरा गुलाब या सारख्या सुगंधी अत्तराच्या बाटल्या आल्यात पण अजून तरी कोणीही हा तर्रीगंध बाटलीबंद स्वरूपात आणला नाही. आणल्यास, साध्या पाण्यात मिसळून परदेशस्थ भाऊबंदांना तर्रीचा आनंद मिळु शकतो. काही लोक, तर्रीला तेलाचा तवंग एवढंच समजतात, अशा लोकांना तर्री खाल्ल्यावर विशेष त्रास होण्याची शक्यता असते.

कोकणातील माणसाने तर्री करण्याचा प्रयत्न केला तर त्यात चिंच, गुळ, ओले खोबरे घातल्याने, तसेच दक्षिण महाराष्ट्रीय माणसाने शेंगदाणे घातल्याने, तर्रीची धार बोथट होते. त्यामुळे उगीच काहीतरी, तर्री म्हणून खाण्याऐवजी अस्सल ठसकेबाज तर्री खाण्यातच धन्यता बाळगावी. इतरांना पाण्यात पाहण्याऐवजी, तर्रीत पहायचा प्रयत्न केला तरी माणसाचे जीवन सुसह्य होईल यात शंका नाही.

सर्व तर्रीखाॅऺं साहेबांना हा तर्रीतराणा समर्पित.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- इथं कोल्हापूरात लहान वयाच्या पेशंटना देवधर डागतरकडंच आणत्यात समदी. माज्या रिक्षाच्या तर रोज चार-पाच फेऱ्या हुत्यात. म्हनून तर सवयीनं त्येंच्या दवाखान्याम्होरंच थांबलो बगा.. ” तो चूक कबूल करत म्हणाला. पण…. ?

 पण ती त्याची अनवधानानं झालेली चूक म्हणजे पुढील अरिष्टापासून समीरबाळाला वाचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न होता हे सगळं हातातून्या निसटून गेल्यानंतर आमच्या लक्षात येणार होतं… !!)

डॉ. जोशींच्या हॉस्पिटलमधे गेलो त्याआधीच आपलं काम आवरून रिसेप्शनिस्ट घरी गेलेली होती. हॉस्पिटलमधे एक स्टाफ नर्स होती. तिने ‘डॉक्टर अर्जंट मीटिंगसाठी राऊंड संपवून थोड्याच वेळापूर्वी गेलेत, आता उद्याच येतील’ असे सांगितले. आम्ही इथे तातडीने येण्याचे प्रयोजन तिला सांगताच तिने आम्हाला एका रूममधे बसवले. लगबगीने बाहेर गेली. ती परत येईपर्यंतची पाच दहा मिनिटेही आमचं दडपण वाढवणारी ठरत होती. ती येताच तिने बाळाला अॅडमिट करून घ्यायच्या फॉर्मलिटीज पूर्ण केल्या.

“डॉक्टर कधी येतायत?”

मी उतावीळपणे विचारले.

डॉक्टर सपत्निक केशवराव भोसले नाट्यगृहात नाटक पहायला गेले होते हे नर्सला असिस्टंट डॉक्टरशी बोलल्यावर समजले होते. समीरच्या केसबद्दल त्याच्याशी डॉक्टरांची जुजबी चर्चा झालेली होती. त्यानुसार त्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे नर्सने तातडीने समीरबाळाला सलाईन लावायची व्यवस्था केली.

डाॅ. जोशी दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे राऊंडला आले. समीरला तपासताना असिस्टंट डॉक्टरही सोबत होते. आम्हाला औषधांचं प्रिस्क्रिप्शन त्यांनी लिहून दिलं.

“दोन दिवस सलाईन लावावं लागेल. या औषधाने नक्कीच फरक पडेल. डोण्ट वरी. “

आम्हाला धीर देऊन डाॅक्टर दुसऱ्या पेशंटकडे गेले. योग्य निर्णय तातडीने घेतल्याचं ‌त्या क्षणी आम्हाला मिळालेलं समाधान कसं भ्रामक होतं हे आमच्या लक्षात यायला पुढे आठ दिवस जावे लागले. दोन दिवसांपुरतं लावलेलं सलाईन चार दिवसानंतरही सुरू ठेवल्याचं पाहून आमच्या मनात कुशंकेची पाल चुकचुकली खरी पण त्यातलं गांभीर्य तत्क्षणी जाणवलं मात्र नव्हतं. अलिकडच्या काळात सलाईन लावताना एकदा शीर सापडली की त्या शीरेत ट्रीटमेंट संपेपर्यंत कायमच एक सुई टोचून ठेवलेली असते. त्यामुळे सलाईन बदलताना प्रत्येकवेळी नव्याने शीर शोधताना होणारा त्रास टाळला जातो. पण त्याकाळी ही सोय नसे. त्या चार दिवसात प्रत्येक वेळी सलाईन बदलायच्या वेळी शीर शोधताना द्याव्या लागणाऱ्या टोचण्यांमुळे असह्य वेदना होऊन समीरबाळ कर्कश्श रडू लागे. त्याचं ते केविलवाणेपण बघणंही आमच्यासाठी असह्य वेदनादायी असायचं. बॅंकेत मित्रांसमोर मन मोकळं केलं तेव्हा झालेल्या चर्चेत तातडीने सेकंड ओपिनियन घ्यायची निकड अधोरेखित झाली. डाॅ. देवधर हाच योग्य पर्यायही पुढे आला पण ते काॅन्फरन्सच्या निमित्ताने परगावी गेले होते. सुदैवाने आमच्या एका स्टाफमेंबरच्या बहिणीने नुकतीच पेडिट्रेशियन डिग्री मिळाल्यावर डाॅ. देवधर यांच्याच मार्गदर्शनाखाली राजारामपुरीत स्वत:चं क्लिनिक सुरु केल्याचं समजलं. मी तिला जाऊन भेटलो. माझ्याजवळची फाईल चाळतानाच तिचा चेहरा गंभीर झाल्याचे जाणवले.

” मी डाॅ. देवधर यांच्याशी संपर्क साधते. ही वुईल गाईड अस प्राॅपरली. “

पुढे हे प्रोसेस पूर्ण होईपर्यंत एक दिवस निघून गेला. आम्ही डिस्चार्जसाठी डाॅ. जोशीना विनंती केली तेव्हा ते कांहीसे नाराज झाल्याचे जाणवले.

“तुम्ही ट्रीटमेंट पूर्ण होण्याआधीच डिस्चार्ज घेणार असाल तर स्वतःच्या जबाबदारीवर घेणार आहात कां? तसे लिहून द्या आणि पेशंटला घेऊन जावा. पुढे घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीला मी जबाबदार रहाणार नाही” त्यांनी बजावले.

पुढे डॉ. देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ट्रीटमेंट चालू झाली तरी आधीच डॉ. जोशींमुळे स्पाॅईल झालेली समीरची केस त्याचा शेवट होऊनच फाईलबंद झाली. केस स्पाॅईल कां आणि कशी झाली होती ते आठवणं आजही आम्हाला क्लेशकारक वाटतं. समीरच्या अखेरच्या दिवसांत देवधर डॉक्टरांच्याच सल्ल्याने त्याला पुढील उपचारांसाठी पुण्याला केईएम हॉस्पिटलमधे रातोरात शिफ्ट केल्यानंतर त्याचं ठरलेलं ऑपरेशन होण्यापूर्वीच त्याने शेवटचा श्वास घेतला होता!!

घरी आम्हा सर्वांसाठीच तो अडीच तीन महिन्यांचा काळ म्हणजे एक यातनापर्वच होतं!

पण या सर्व घटनाक्रमामधे लपलेले अघटिताचे धागेदोरे अलगद उलगडून पाहिले की आश्चर्याने थक्क व्हायला होतं!माझे बाबा १९७३ साली गेले ते इस्लामपूरहून पुण्यात शिफ्ट केल्यानंतर तिथल्या हाॅस्पिटलमधेच. २६सप्टे. च्या पहाटे. तिथी होती सर्वपित्री अमावस्या. समीरचा मृत्यू झाला तोही त्याला रातोरात पुण्याला शिफ्ट केल्यानंतर तिथल्या हाॅस्पिटलमधेच. तोही २६सप्टें. च्या पहाटेच. आणि त्या दिवशीची तिथी होती तीही सर्वपित्री अमावस्याच! हे थक्क करणारे साम्य एक अतर्क्य योगायोग असेच आम्ही गृहित धरले होते. शिवाय घरी आम्ही सर्वचजण विचित्र दडपण आणि प्रचंड दु:खाने इतके घायाळ झालेलो होतो की त्या योगायोगाचा विचार करण्याच्या मनस्थितीत आम्ही नव्हतोही. पण त्याची उकल झाली ती अतिशय आश्चर्यकारकरित्या आणि तीही त्यानंतर जवळजवळ पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आणि तेही अशाच एका चमत्कार वाटावा अशा घटनाक्रमामुळे. ते सर्व लिहिण्याच्या ओघात पुढे येईलच.

समीरच्या आजारपणाचा हा तीन महिन्यांमधला आमचा आर्थिक, भावनिक, मानसिक आणि शारीरिक अस्वास्थ्य अशा सर्वच पातळ्यांवरचा आमचा संघर्ष आम्ही अथकपणे निभावू शकलो ते आम्हा सर्व कुटु़बियांच्या ‘त्या’च्यावरील दृढ श्रध्दा आणि निष्ठा यामुळेच! ‘तो’ बुध्दी देईल तसे निर्णय घेत राहिलो, या संघर्षात लौकिकार्थाने अपयश आल्यासारखे वाटत असले तरी तोल जाऊ न देता समतोल विचारांची कास कधी सोडली नाही. त्यामुळेच कदाचित आमच्या दु:खावर ‘त्या’नेच हळुवार फुंकर घातली तीही अगदी ध्यानीमनी नसताना आणि त्यासाठी ‘त्या’ने खास निवड केली होती ती लिलाताईचीच! तो क्षण हा ‘तो’ आणि ‘मी’ यांच्यातील अनोख्या नात्यातला एक तेजस्वी पैलू अधोरेखित करणारा ठरला आणि म्हणूनच कायम लक्षात रहाणाराही!

समीर जाऊन पंधरा दिवस होऊन गेले होते. आरतीची मॅटर्निटी लिव्ह संपल्यानंतर त्यालाच जोडून बाळाच्या आजारपणासाठी तिने घेतलेली रजाही तो गेल्यानंतर आठवड्याभरात संपणार होती. पण आरती पूर्णपणे सावरली नसल्याने घराबाहेरही पडली नव्हती. रजा संपताच ती बँकेत जायला लागावी तरच ती वातावरण बदल होऊन थोडी तरी सावरली जाईल असं मलाही वाटत होतं पण ती तिची उमेदच हरवून बसली होती. मीही माझं रुटीन सुरू केलं होतं ते केवळ कर्तव्याचा भाग म्हणूनच. कारण या सर्व धावपळीत माझं बॅंकेतल्या जबाबदाऱ्यांकडे आधीच खूप दुर्लक्ष झालं होतं. स्वतःचं दुःख मनात कोंडून ठेवून ड्युटीवर हजर होण्याशिवाय मला पर्यायही नव्हताच. रोज घरून निघतानाही पूत्रवियोगाच्या दुःखात रुतून बसलेल्या आरतीच्या काळजीने मी व्याकुळ व्हायचो. त्यामुळे मनावरही प्रचंड दडपण असायचं आणि अनुत्साहही.. !

अशा वातावरणातला तो शनिवार. हाफ डे. मी कामं आवरुन घरी आलो. दार लोटलेलंच होतं. दार ढकलून पाहिलं तर आरती सोफ्यावर बसून होती आणि दारात पोस्टमनने शटरमधून आत टाकलेलं एक इनलॅंडलेटर. ते उचलून पाहिलं तर पाठवणाऱ्याचं नाव आणि पत्ता… सौ. लिला बिडकर, कुरुंदवाड!

ते नाव वाचलं आणि मनातली अस्वस्थता क्षणार्धात विरूनच गेली. एरवी तिचं पत्र कधीच यायचं नाही. तसं कारणही कांही नसायचं. मी नृसि़हवाडीला जाईन तेव्हा क्वचित कधीतरी होणाऱ्या भेटीच फक्त. जी काही ख्यालीखुशाली विचारणं, गप्पा सगळंं व्हायचं ते त्या भेटीदरम्यानच व्हायचं. म्हणूनच तिचं पत्र आल्याचा आनंद झाला तसं आश्चर्यही वाटलं. मुख्य म्हणजे माझा घरचा हा एवढा संपूर्ण पत्ता तिला दिला कुणी हेच समजेना.

मी घाईघाईने ते पत्र फोडलं. वाचलं. त्यातला शब्द न् शब्द आम्हा उभयतांचं सांत्वन करणारा तर होताच आणि आम्हाला सावरणाराही. त्या पत्रातलं एक वाक्य मात्र मला मुळापासून हादरवणारं होतं!

‘समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला असल्याने तो बरा होण्यासाठी देवाघरी गेलाय आणि तो पूर्ण बरा होऊन परत येणाराय या गोष्टीवर तू पूर्ण विश्वास ठेव. आरतीलाही सांग. आणि मनातलं दुःख विसरून जा. सगळं ठीक होणाराय. ‘

समीरच्या संपूर्ण आजारपणात मी घरच्या इतरांपासूनच नव्हे तर आरती पासूनही लपवून ठेवलेली एकच गोष्ट होती आणि ती सुद्धा त्यांनी उध्वस्त होऊ नये म्हणून. समीर जिवंत राहिला तरी कधीच बरा होणार नव्हता. हे कां ते डॉ. देवधर यांनी मला अतिशय सौम्यपणे समजून सांगितलेलं होतं आणि त्या प्रसंगी एकमेव साक्षीदार होते त्यादिवशी डॉक्टरांच्या केबिनमधे माझ्यासोबत असणारे माझे ब्रॅंच मॅनेजर घोरपडेसाहेब! ‘समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला होता’ ही तिसऱ्या कुणालाही माहित नसलेली गोष्ट लिलाताईपर्यंत पोचलीच कशी याचा उलगडा तिला समक्ष भेटल्यानंतरच होणार होता आणि ‘समीर बरा होऊन परत येणाराय’ या तिच्या भविष्यवाणीत लपलेल्या रहस्याचाही! पण तिला समक्ष जाऊन भेटण्याची गरजच पडली नाही. तिच्या पत्रात लपलेल्या गूढ अतर्क्याची चाहूल लागली ती त्याच दिवशी आणि तेही अकल्पितपणे!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हळदी कुंकू…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “हळदी कुंकू …” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

हळदी कुंकवाला घरी बोलावणे ही एक सुंदर प्रथा आपल्या धर्मात आहे. त्यानिमित्ताने आवर्जून एकमेकांच्या घरी जाणे होते. स्नेहबंध राहतो. नाती दृढ होतात.. टिकून राहतात. एकमेकांच्या घरी गेल्याने पुढच्या पिढीची ओळख.. जवळीक होते. ही नात्यांची साखळी पुढे पुढे जात राहते.

 

 माझ्या लहानपणी हळदीकुंकवाचे आमंत्रण देणे याची फार गंमत असायची. लांब राहणाऱ्या लोकांचे आमंत्रण वडील सायकलवरून जाऊन देत असत. भाऊ मोठा झाला की हे काम तो करायला लागला. जवळ राहणाऱ्या आईच्या आणि आमच्या मैत्रिणींकडे आमंत्रण आम्ही दोघी बहिणी करायला जात असू. त्याची आम्हाला फार मज्जा वाटायची. शाळेतून आलो की आम्ही निघत असू. त्यांचा क्रमही ठरलेला असायचा.

 

पहिलं घर होतं आईच्या मैत्रिणीचं भडभडे मावशीच… एकदा काय गंमत झाली…

मावशीकडे गेलो. ती बसा. म्हणाली तिने आम्हाला दोघींना खोबऱ्याच्या वड्या खायला दिल्या. आम्ही खात होतो. त्यांच्याकडे पाहुणे आलेले आजोबा समोर बसलेले होते. त्यांनी आमची नावं विचारली. मग म्हणाले,

” पाढे पाठ आहेत का ?ते पाठ करा हिशोब घालताना आयुष्यभर त्यांचा उपयोग होतो. “

” हो आम्ही पाढे पाठ केलेले आहेत ” बहीण म्हणाली.

” मग म्हण बघू एकोणतीसचा पाढा “.. आजोबा म्हणाले.

मावशी म्हणाली….

“अहो पोरींची परीक्षा कसली घेताय? “

 

पण बहिणीने सहजपणे एकोणतीसचा पाढा म्हणून दाखवला. आजोबा एकदम खुश झाले.

म्हणाले, ” पोरगी फार हुशार आहे धीटुकली आहे. त्यांना अजून एक एक वडी दे. “

 

आजोबांचं भविष्य खरं झालं. आक्का हुशारच होती. मोठी झाल्यावर तिने स्वतःचा क्लास काढला आणि हजारो मुलांना शहाणं केलं, शिकवलं.

 

आईच्या बागडे या मैत्रिणीकडे गेलो होतो. ती गप्पीष्ट होती. गंमत जंमत करायची. म्हणून ती आम्हाला फार आवडायची.

ती म्हणाली, ” तुम्हाला च ची भाषा येते का?”

“हो येते की. “.. तेव्हा ती सगळ्यांनाच यायची.

संदीप खरेनी त्या च च्या भाषेत ” चम्हाला तु चंगतो सा… “.. अगदी वेगळीच अशी कविता पण केली आहे.

 

 

मावशी म्हणाली, ” तुम्हाला अजून एक भाषा सांगते. मुंडा रूप्याची “

” मावशी ही कुठली भाषा “?

मग तिने आम्हाला नीट समजावून सांगितलं.

 

प्रथम व म्हणायचं मग त्या अक्षराचा पहिला शब्द सोडून बाकीचे पुढचे सगळे शब्द म्हणायचे नंतर मुंडा म्हणायच नंतर पहिला शब्द म्हणून रूप्या म्हणायचं.. तुला म्हणताना वला मुंडा तू रुप्या म्हणायचं.. काहीतरी म्हणताना वहीतरी मुंडा का रुप्या म्हणायचं… “

मावशीने हे निराळच शिकवलं.

त्याची फार गंमत वाटायला लागली. आम्ही ती भाषा लगेच शिकलो. माझ्या भावाला पण ती भाषा यायला लागली. पुढे आमचे आम्हाला काही प्रायव्हेट बोलायचं असलं की आम्ही त्या भाषेत बोलत असू. अजूनही आमची ती मजा चालू असते.

 

आम्ही दोघी बहिणी हातात हात घेऊन… गप्पा मारत जात असलेला तो रस्ता आठवणीने सुद्धा जीवाला सुखावतो…

आईच्या मैत्रिणी, वाड्यात राहणाऱ्या काकू, आसपास राहणारे, स्मरणात आहेत. आईच्या गुजराती, मारवाडी मैत्रिणी सुंदर साड्या दागिने घालून हळदी कुंकवाला यायच्या. कसेही करून वेळात वेळ काढून, ऊशीर झाला तरी बायका हळदी कुंकवाला यायच्याच…

अत्तरदाणी, गुलाबदाणी बाहेर काढायची. वडील त्यासाठी गुलाब पाण्याची बाटली आणून द्यायचे.

चैत्रगौरीला हातावर कैरीची डाळ दिली जायची. काही हुशार बायका डबा घेऊन यायच्या. मोठ्या पातेल्यात पन्हे करायचे. पाणी प्यायच्या भांड्यात ते द्यायचे. ओल्या हरभऱ्यानी ओटी भरली जायची. आम्हा मुलींना पण मूठ मूठ हरबरे दिले जायचे. त्याचे आम्हाला फार कौतुक वाटायचे. आई त्याचे चटपट चणे, मिक्स भाजी, उसळ असे पदार्थ करायची. हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्या ऋतूला साजेसे आणि पोटाला योग्य असे हे पदार्थ केले जायचे आणि आरोग्य सांभाळले जायचे.

 

या हळदी कुंकवाच्या आमंत्रणाची जी. ए. कुलकर्णी यांची “चैत्र” ही नितांत सुंदर कथा आहे.

श्रावण शुक्रवारच हळदीकुंकू छोट्या प्रमाणात असायचं. वाड्यात आणि जवळ राहणाऱ्या बायका यायच्या.

गरम मसाला दूध आणि फुटाणे दिले जायचे. पावसाळ्यात फुटाणे खाल्ले की खोकला होत नाही अस आजी सांगायची.

“शुक्रवारचे फुटाणे “….

असं म्हणून ओरडत सकाळीच फुटाणेवाला यायचा. त्याची पण आज आठवण आली.

 

गणपती नंतर गौरी यायच्या. पण त्याचं आमंत्रण घरोघरी जाऊन द्यायचं नसायचं. जिला जसा वेळ होईल तसं ती येऊन जायची कारण त्यावेळेस प्रत्येकजण गडबडीत असायची. त्या हळदीकुंकवाला

“गौरीचे दर्शन ” महत्त्वाचे असायचे. प्रसाद म्हणून हातावर अगदी साखर खोबरे सुद्धा दिले जायचे.

 

संक्रांतीला तिळाची वडी, लाडू असायचा. आईच्या गुजराथी मैत्रिणीने तिला नुसत्या साखरेची कॅरमल सारखा पाक करून लाटून करायची वडी शिकवली होती. ती खुसखुशीत वडी सगळ्यांना आवडायची. आम्हाला मात्र कोणी काय लुटलं याचीच उत्सुकता असायची. प्लास्टिकचे डबे, छोट्या वाट्या, गाळणी, कुंकू, दोऱ्याचे रीळ, आरसे, रुमाल असं काही काही असायचं.

 

एकदा आईच्या मैत्रिणीनी.. अघोरकर मावशींनी सगळ्यांना शंभर पानी वही दिली होती. त्यावर रोज एका पानावर “श्रीराम जय राम जय जय राम” लिहायचं असं तिने सांगितलं होतं.

किती गोड कल्पना.. काही दिवस आपोआप नामस्मरण होत गेलं.

 

हळदीकुंकवाला बायका यायच्या. गप्पा व्हायच्या. नव्या नवरीला नाव घे म्हटलं की ती लाजत लाजत नाव घ्यायची….

त्या दिवशी घरी घूम चालायची…. वडील मित्राकडे जायचे किंवा नातेवाईकांकडे जायचे. चार पासून ते रात्री आठपर्यंत गडबड असायची. दिवसभर आई खुश असायची.

किती छान दिवस होते ते…. आताही आठवले तरी मन हरखून जाते.

आपली ही हिंदू संस्कृतीची परंपरा आपण अशीच चालू ठेऊ या…

संक्रांतीच्या हळदीकुंकवाची तुमची तयारी झाली का? यावर्षी काय लुटणार आहात?

बऱ्याच बऱ्याच गोष्टी आतापर्यंत लुटून झालेल्या आहेत. यावेळेस काहीतरी वेगळं लुटू या का? 

 

करा बरं विचार……

 तुम्हालाही काहीतरी नवीन सुचेल. जरा वेगळं असं काही मिळालं की मजा येईल…

माझ्या मनात एक विचार आला..

 

यावर्षी ” वेळ ” लुटायची कल्पना कशी वाटते तुम्हाला ?

कोणाला तरी तुमचा वेळ द्या. आनंदाने प्रेमाने त्याच्याशी बोला. प्रत्यक्ष भेटा… फोन करा…

” तिळगुळ घ्या गोड गोड बोला ” 

असं नुसतं म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष बोललात तर जास्ती आनंद होईल……

 यावर्षी असा आनंदच लुटला तर….

तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही साजरा करा. तुम्ही आणलेलं वाण सगळ्यांना जरूर द्या…

 

हा आनंद लुटायचा सण आहे.

कोणाचा आनंद कशात आहे हे तुम्हाला माहीत आहे…

तो मात्र त्याला जरूर द्या.

संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “उसळ-चपातीचे ऋण…!!”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “उसळ-चपातीचे ऋण…!!”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

एकदा भीमसेन जोशी (अण्णा) गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.

तेवढ्यात अण्णा म्हणाले, “आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या.. !”

रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली.

अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा.. ! 

अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं.. अण्णा म्हणाले, ‘काय, कसं काय? ओळखलंत का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही..’ अण्णा कानडीतनं बोलत होते.

रामण्णाही ओळखीचं हसले.. थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं.. आणि त्यांचा निरोप घेतला..

साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला –

“इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.

स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली”.

“उसळ-चपाती पाहिजे काय?”, असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.

रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार.. !”

“घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!”

“जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही.

रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची ?”

रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती.. साथीदार मंडळी गप्प होती.. गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते..

रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.

हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर असलेला माणूस…..

स्वरभास्कर “

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नयन जादूगार… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

☆ नयन जादूगार…  ☆ सौ शालिनी जोशी

डोळे हे कवी मनाचा आवडता विषय. अनेक अजरामर काव्यातून डोळ्यांविषयी गोड संवेदना व्यक्त झाल्या. कोणी म्हणतात ‘डोळे हे जुलमीगडे‘, तर कोण म्हणते ‘डोळ्यात वाच माझ्या ‘, क्षणभर उघड नयन’, हे नयन बोलले काहीतरी, नयन तुझे जादूगार, जे स्वप्न भाव वेडे नयनी मूर्त होते, रूप पाहता लोचनी, डोळे मोडीत राधा चाले, ही आणि यासारखी अनेक गाणी भावभावना व्यक्त करण्यासाठी डोळ्यांचा उपयोग करतात. म्हणजे नुसते बघणे एवढाच डोळ्यांचा उपयोग नसून मनातील भाव व्यक्त करण्याचे ते साधन. मनाचा आरसाच ! कधी प्रेम कधी ममता, माया, भक्ती, निरागसता, डोळ्यातून व्यक्त होते. असे शब्दविण संवाद साधणारे हे डोळे राग, लोभ, द्वेष, मोह, मत्सरही व्यक्त करतात. कुतूहलाने टकमक बघतात. रागाने वटारतात. क्रोधाने लाल होतात. आश्चर्याने मोठे होतात. नुसत्या नजरेने हात न उचलता एखाद्याकडे संकेत करता येतो. हेच डोळे कधी मादक, कधी लाजरे, कधी प्रेमळ, कधी निष्टुर, कधी लबाड तर कधी पाणीदार, सतेज, निष्पाप असतात.

असे हे विविध ढंगी डोळे तसे त्याचे रंग आणि आकार ही विविध. कोणाचे घारे तर कुणाचे काळे, निळसर किंवा तपकिरी. डोळ्याच्या रंगानुसार माणसाचा स्वभाव बदलतो. म्हणून घाऱ्या डोळ्याची माणसे लबाड असतात. प्रदेशानुसारही डोळ्यांचा आकार व ठेवण बदलते. तिबेटी लोकांचे डोळे बारीक असतात तर काही लोकांचे डोळे गोल, काहींचे बटबटीत, तर काहींचे लांबट असतात. डोळ्याला निरनिराळे प्रतिशब्द ही आहेत चक्षु, नयन, अक्ष, लोचन.

तसेच डोळा हा नुसता शरीराचा अवयव नाही. तर सौंदर्याचा मापदंड. म्हणून कमलाक्षी, कमलनयना, मृगनयना, मृगाक्षी असे याचे वर्णन करतात. नृत्यांमध्येही शरीराच्या हालचाली इतकेच डोळ्यांच्या हालचालीला महत्त्व आहे. डोळ्यांच्या नजरेच्या स्थितीवरून ध्यानाचेही प्रकार होतात खेचरी, भूचरि, साचरी, आणि अगोचरी. नाक, कान आपल्याला बंद करता येत नाही पण डोळे स्वच्छेने पापण्यांच्या संपुटात बंद होतात आणि मग माणूस बाह्य जगापासून अलिप्त होतो त्यामुळे एकांतात मनाशी व परमेश्वराची ऐक्य साधता येते.

डोळ्यावरून तयार झालेले कितीतरी म्हणी व वाक्प्रचार आपण वापरतो. उदाहरणार्थ – आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन, डोळ्यात अंजन घालणे, डोळ्यात तेल घालून बघणे, डोळ्यात प्राण आणणे, डोळे झाक करणे, डोळे भरून पाहणे, डोळे पांढरे होणे इत्यादी.

असे हे डोळे ज्याच्यामुळे आपण साऱ्या जगाच्या सौंदर्याचा, आनंदाचा, दुःखाचा, ज्ञानाचा अनुभव घेतो पण ज्याला डोळेच नसतात किंवा कार्य करण्यास सक्षम नसतात ते या सर्वाला मुकतात. बाह्य जगाशी संपर्क डोळ्याकडून तुटला तरी त्यांचे मनोधैर्य त्यांना मार्ग दाखवते. त्यांचे अंतःचक्षु इतके प्रखर असतात की डोळसालाही लाजवेल असे ज्ञान त्यांना प्राप्त होते. उदाहरणार्थ प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. आता नेत्रदानामुळे अंधानाही दृष्टी येणे शक्य झाले आहे. ब्रेल लिपीमुळे शिक्षणाचे द्वार त्यांच्यासाठी खुले झाले आहे. एकंदरीत दृष्टी तेथे सृष्टी मग ती बाह्य असो अंतर असो.

सर्व भावना आपल्या पोतडीत लपवणारे व प्रसंगानुरू व्यक्त करणारे जादूगारच हे डोळे म्हणूनच म्हणतात, ‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे’.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गाणं आपलं आपल्यासाठी…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

??

☆ “गाणं आपलं आपल्यासाठी…” ☆ श्री आशिष मुळे ☆

(एक वेगळचं गाणं आणि त्यामागचा वेगळाच दृष्टीकोन अगदी त्याच्या पार्श्वभूमीसह, काही प्रतिमांसह…)

न मन बेहूदा गिरदे…

शब्द माणसाला बनवतात का माणूस शब्दांना बनवतो? या प्रश्नाचे ठाम उत्तर मी तरी देऊ शकणार नाही पण इतक मात्र नक्की की शब्द तुमच्या भावनांना आकार देतात, त्यांना तुमच्या आवाक्यात आणतात… आणि जश्या जश्या या भावना अधिक तरल, अस्तित्वाच्या जवळ जाणाऱ्या आणि कुठेतरी जीवनाचा अर्थ शोधण्याच्या जवळ जातात तेव्हा त्या भावना कवितेत आणि त्यापुढे गीतात मांडणे हे अत्यंत कठीण होऊन जाते …आणि येथेच आपल्याला भेटतात जगात झालेले अनेक महान कवी, गायक आणि गीतकार … आणि जेव्हा तुमच्यात या भावना उत्पन्न होतात आणि त्यांना आकार देणारे एखादे गाणे कानावर पडते तेव्हा ते गाणे तुमच्या जणू डीएनए चा एक भाग बनून जाते…आणि जेव्हा जेव्हा त्या भावना ट्रिगर होतील तेव्हा तेव्हा ते गाणे तुमच्या मनात तितक्याच ताकदीने वाजल्याशिवाय राहणार नाही…

अशीच एक गोष्ट माझ्या मनात कोरल्या गेलेल्या एका गाण्याची…जे खरेतर माझ्या मातृभाषेत नसून फारसी भाषेतील आहे व गाण्याचे शब्द हे ८०० वर्षांपूर्वी लिहिले गेले आहेत..

ऑगस्टचा महिना होता… एका फोटोग्राफी एक्सपीडिशन साठी माझ्या भावाच्या ग्रुप बरोबर लेह लडाख ला गेलो होतो. तसा मी एखाद्या ग्रुप बरोबर जाण्याचा प्रसंग खूप वर्षांनी आला म्हणजे कॉलेज नंतरच… आता चाळीशी जवळपास आली होती. अनुभवांचे गाठोडे काठोकाठ भरत आले होते… त्यातून लेह लडाख ची अगदी प्रिहिस्टोरिक वाटावी अशी टेरेन… उंचच उंच पण खडकाळ असे सुळके तर कुठे वाळवंट… थंड आणि रखरखीत कोरडे… पण मधूनच वाहत जाणारी एक महान नदी… जिच्यावरून आपल्या अख्या देशाच्या अस्तित्वाची ओळख पडली ती म्हणजे सिंधू नदी… हा सगळा नजरा कुठेतरी आयुष्याशी मेळ खात होता… उंचच उंच ध्येय आणि त्या कडे जाणाऱ्या रखरखीत खडकाळ वाटा. आणि या साऱ्यात आपल्या सोबत राहते ती म्हणजे युगानुयुगे वाहणारी अनेकांच्या लेखणीतून वाहिलेली मानवतेच्या महान तत्त्वांची एक विचारधारा… आपल्यातले माणूसपण जिवंत ठेवणारी… जणू ती सिंधू नदीच…

अश्या सगळ्या विचारांचा कल्लोळ मनात लाटेसारखा उचंबळत होता आणि होता होता शेवटचा दिवस आला. शेवटचा दिवस हा लेह चा जुना पुराणा बाजार बघायचा होता पण हे ग्रुपने जायचे नसून एकट्याने जायचे होते. मी ठरवले की कॅमेरा आज बाजूला ठेवायचा आणि फक्त जनसागरात डुबून जायचे. आणि बाजारात पाय ठेवताच सगळ्या भावना जणू एका बिंदूत एकत्र झाल्या आणि कानात आपोआप घुमू लागले, रुमी नि लिहिलेले आणि जगप्रसिद्ध कव्वाली गायक नुसरत फतेह अली खान यांनी गायलेले…

“न मन बेहूदा गिरदे कुचाओ बाजार मी गर्दम…”

… याचा अर्थ “ मी या बाजाराच्या गल्ली बोळात निरर्थक फिरत नाहिये…”

या गाण्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे- “रुमीचा सद्गुरू शम्स हा रुमीला ज्ञान दिल्यानंतर अचानक एक दिवस गायब झाला काहिजण म्हणतात त्याचा खून झाला पण नक्की इतिहासाला माहीत नाही.. शम्सच्या विरहात रुमी अत्यंत दुःखी होता आणि असाच एक दिवस वेड्यासारखा तो त्याला शोधायला बाजारात गेला असता तिथे त्याच्या कानावर सोनाराच्या दुकानातून सोन्यावर ठोकल्याचे लयबद्ध आवाज आले आणि तिथे त्याला ही कविता स्फुरली व तो बेभान होवून नाचू लागला. “

आपणही असंच काहीतरी शोधतोय का आयुष्यात.. अगदी हाच विचार त्या वेळी माझ्या मनात दाटला आणि मनात हे गाणे वाजू लागले… किती फिरलोय आपण आयुष्यात, कुठे कुठे गेलोय किती माणस आयुष्यात आली आणि निघूनही गेली… काही काही मागे सोडून गेली…या सगळ्यांचा दुआ जोडू पाहतोय का… या सगळ्या अनुभवातून कोणी आपल्याला शिकवले… त्याला मी शोधतोय का?त्या प्रियकराला त्या प्रेयसीला मी शोधतोय का?… जी मला कधीच सोडून गेली नाही… वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या लोकात भेटतच राहिली… शिकवतच राहिली… जाणवतच राहिली तिची उपस्थितीही आणि अनुपस्थितीही…” मजाके आशिकी दारम पये दिदार मी गर्दम…” (एखाद्या आशिक सारखा मी त्याला शोधतोय)

…. आणि मीही बेभान होऊन त्या लेहच्या बाजारात त्या अनोळखी डोळ्यात ओळख शोधत फिरू लागलो…

शेवटी पाय थकले आणि डोळ्यात दोन अश्रुंचे थेंब जमा झाले,

… … एक रुमीसाठी आणि एक माझ्यासाठी…

आणि मनात गुंजली ती आर्त ओळ..

“बया जाना जानेजाना, बया जाना जानेजाना…”

 ये ना जानेजाना कुठे आहेस…. ये ना ….

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य  ☆ — वाऱ्याचे शहर — शिकागो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

सुश्री प्रज्ञा मिरासदार

? इंद्रधनुष्य ?

☆ — वाऱ्याचे शहर — शिकागो… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

सहा वेळा अमेरिकेत जाऊन मी बरीच शहरे पाहिली. तशी या वर्षांत देखील पाहिली. संपूर्ण कॅलिफोर्निया पाहिला. पण मनात भरले ते फक्त शिकागो शहर !! विंडी सिटी म्हणजे वाऱ्याचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर मिशिगन राज्यात मिशिगन लेक या समुद्रासारख्या मोठ्या सरोवराकाठी वसले आहे. खूप वर्षांपासून मला ते सुंदर शहर पहायचे होते. यावर्षी तो योग आला.

हे शहर पाहण्याचे मुख्य कारण केवळ स्वामी विवेकानंद हे होय. शिकागोमध्ये झालेली सर्व धर्म परिषद, फक्त गाजली ती स्वामीजींनी केलेल्या भाषणामुळेच !!!! प्रत्येक भारतीयाला या गोष्टीचा प्रचंड अभिमानच आहे.

The Art Institute of Chicago या नावाने प्रसिद्ध असलेल्या बिल्डिंगमध्ये स्वामीजींनी सर्व धर्म परिषदेत जे व्याख्यान दिले, ते जगप्रसिद्ध आहे. जगभरात खूप सर्वधर्म परिषद झालेल्या आहेत. पण ही सर्वधर्म परिषद आजतागायत सर्वांच्या स्मरणात आहे– ते फक्त स्वामी विवेकानंद यांच्यामुळेच!!!!

या परिषदेस हिंदू धर्माच्या एकाही प्रतिनिधीला निमंत्रण नव्हते. या आधीच्या कुठल्याही सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचा एकही प्रतिनिधी नसे. पण स्वामीजी या परिषदेसाठी भारतातून कसेबसे शिकागोला पोहोचले. खूप प्रयत्न करून, असंख्य लोकांना भेटून शेवटी त्यांनी या सर्व धर्म परिषदेत प्रवेश मिळविला. आर्थिक मदत मिळविली आणि बोटीत बसून दोन महिन्यांनी ते शिकागोत पोहोचले. अर्धपोटी व प्रसंगी उपाशी राहून त्यांनी दिवस काढले.

सर्वात शेवटी पाच मिनिटे भाषण करण्याची त्यांना परवानगी कशीबशी मिळाली. त्यांनी आपला धर्मग्रंथ म्हणून श्रीमद् भगवद्गीता नेलेली होती. तीही आयोजकांनी सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवली. सर्वांची व्याख्याने झाल्यावर स्वामीजी बोलायला उभे राहिले. इतर सर्वजण सुटा बुटात होते. एकटे स्वामीजी भगव्या वस्त्रात होते.

त्यांनी सुरुवातीलाच शब्द उच्चारले “माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका” !!!!!

आणि जो टाळ्यांचा कडकडाट झाला, तो अडीच मिनिटे त्या भल्या मोठ्या सभागृहात निनादत होता. पुढे पाच मिनिटांचे भाषण दीड तास लांबले. पूर्ण सभागृह दीड तास मंत्रमुग्ध झाले होते. स्वामीजींनी इतिहास रचला होता. त्यात त्यांनी हिंदू धर्माविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आणि हिंदू धर्माविषयी इतरांच्या मनातील गैरसमज दूर केले. जगात हिंदू धर्माला मानाचे स्थान स्वामीजींनी मिळवून दिले. शेवटी त्यांनी सांगितले की, “हा माझा धर्मग्रंथ– सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवला आहे. याचे कारणच असे आहे की, जगातील सर्व धर्मांचे व धर्मग्रंथांचे तत्वज्ञान याचे मूळच या भगवद्गीते मध्ये आहे. “

याच कारणाने ही सर्व धर्म परिषद गाजली. ती जिथे झाली ती इमारत आम्ही पाहिली. तिथे एका रूम मध्ये स्वामीजींविषयी, त्या परिषदेविषयी सर्व पुस्तके आहेत. स्वामीजींची छोटी मूर्ती तिथे ठेवलेली आहे. बाहेर हमरस्ता जो आहे, त्यावर “स्वामी विवेकानंद पथ” अशी इंग्रजीतली ठळक निशाणी आहे. ती पाहून अभिमानाने ऊर भरून आला.

शिकागो जवळच्याच नेपरविले या गावाकडे जाताना वाटेवरच स्वामी विवेकानंदांच्या स्मृती जपणारा “विवेकानंद वेदांत सोसायटी” नावाचा आश्रम आहे. आजूबाजूस संपूर्ण जंगल भोवती असून, मध्ये हा आश्रम होता. आश्रमात पोहोचेपर्यंत रस्ता चांगला असूनही, कुठेही माणूसच काय, पण गाडीही दिसत नव्हती.

आम्ही बाहेर गाडी पार्क केली आणि बंद दार उघडून आत गेलो. तिथे मात्र दोघे तिघेजण होते. त्यांनी आम्हाला तेथील मोठी लायब्ररी, स्वयंपाक घर डायनिंग हॉल सगळं दाखवलं.

लिफ्टने वरच्या मजल्यावर गेलो. तिथे एक ध्यानमंदिर आहे. ते एक मोठे सभागृह आहे. 100 जण बसतील एवढ्या खुर्च्या तिथे आहेत. एखाद्या देवघरात बसल्यानंतर शांत वाटावे तसे इथे वाटते. देवघरासारख्या या ध्यानमंदिरात आम्ही काही वेळ शांत बसलो. तिथे — विवेकानंद सर्व धर्मामधील काहीतरी चांगली तत्त्वज्ञाने आहेत– असे मानत होते. त्यामुळे अनेक धर्मांची प्रतीके तिथे लावलेली आहेत.

बाहेरच्या हॉलमध्ये स्वामी विवेकानंदांचे पूर्ण चरित्र, काही चित्रे, फोटो आणि माहिती या स्वरूपात भिंतीवर लावलेले आहे. त्यामध्ये स्वामीजी अमेरिकेत कसे आले, त्या सर्वधर्म परिषदेत भाषण देण्यासाठी ते कुणाकुणाला भेटले, कोणी त्यांना मदत केली तर कोणी झिडकारून लावले. शेवटी कशीबशी परवानगी स्वामींना मिळाली. ही सर्व माहिती व फोटो आम्ही वाचले, आम्ही पाहिले. तिथेच आम्हाला स्वामीजींच्या विषयी खूप माहिती मिळाली आणि अभिमान वाटला.

अजून एक The Hindu Temple of Greater Chicago या नावाने प्रसिद्ध असलेले मंदिर आहे. इथे अनेक देवतांचे छोटे छोटे गाभारे आहेत. अमेरिकेत जी जी हिंदू मंदिरे पाहिली तिथे असेच स्वरूप दिसते. या ग्रेटर शिकागो मंदिरात मुख्य गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती आहेत. हिंदू धर्म प्रसाराचे हे एक मोठे केंद्र आहे. खूपच मोठा विस्तार आहे या मंदिराचा!!! 

मंदिर जरा चढावर आहे. येण्याच्या वाटेवर खूप सुंदर परिसर आहे. एके ठिकाणी उजव्या हाताला एक मोठी व रेखीव सुंदर मेघडंबरी आहे. त्यात स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तो पाहून खूप आनंद आणि समाधान झाले.

परक्या देशातही आपल्या सनातन धर्माची ध्वजा स्वामीजींनी आजही फडकवत ठेवली आहे. आणि त्या देशाने या स्मृती खूप चांगल्या रीतीने जपल्या आहेत. याचा आम्हास नितांत गर्व आहे.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares