मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ किंमत अन्नाची … सुश्री नीला  महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

??

☆ किंमत अन्नाची … सुश्री नीला  महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

यू  ट्युबला एका आहारतज्ञाचं भाषण ऐकण्यात आलं. त्यात त्यांनी योग्य आहार,सप्लिमेंट्स यांद्वारे  अनेक रुग्णांना विविध आजारांतून कसं बरं केलं ,ते प्रभावीरीत्या सांगितलं होतं..

काही महिन्यांपूर्वी  निघालेली B12 व D जीवनसत्त्वाची कमतरता व काही तब्येतीच्या तक्रारींमुळे मी  या 

आहारतज्ञांकडे फोन केला.फोन साहजिकच  रिसेप्शनिस्टने घेतला…. ” आमच्या मॅडम ऑन लाईन तुमच्याशी ३० ते ४० मिनिटे बोलून तुम्हाला सल्ला देतील. या सल्ल्याची फी रु. तीन हजार असेल. तुमची केस पाहून तुम्हाला आम्ही तीन महिन्यांसाठी एक डाएट प्लॅन देऊ. तो तुम्हाला फॉलो करावा लागेल.तुम्ही जर हा प्लॅन घेतलात तर 

तीन हजारमधील दोन हजार रुपये आम्ही परत करू.”

दोन हजार रुपये परत करणार म्हटल्यावर मला एकदम भारी वाटलं. डाएट प्लॅन घ्यायचाच ,असा पक्का निश्चय करून मी विचारलं, ” मॅडम, म्हणजे हा डाएट प्लॅन एक हजार रुपयात मला पडेल नं?”

” अहो मॅडम नाही नाही.डाएट प्लॅनची किंमत वेगळी पडणार.”

” किती आहे किंमत”  मी जरा नाराजीनेच विचारले.

” प्रत्येक पेशंटनुसार प्लॅन वेगळा असतो.त्यामुळे किंमतही वेगळी असते.”

” अहो पण रेंज असेल नं,कमीत कमी किंमत काय असेल ?”

“साठ हजार”. …. 

माझ्या हातातून  फोन खाली पडला. दोन दिवसांनी  माझ्या जवळच्या  मैत्रिणीच्या चित्राच्या घरी गेले होते.

तिला ही घटना ऐकवली. क्षणार्धात तिचा चेहरा रागाने लाल झाला. ती आत गेली. हातात अनेक बाटल्या,प्लास्टिकचे डबे आणि फाईल घेऊन बाहेर आली….. आठ महिन्यांपूर्वी चित्राला खूप अशक्तपणा वाटू लागला होता.काम होत नव्हते.चिडचिडेपणा आला होता.जगण्यात अर्थ वाटत नव्हता. ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला तपासले.त्यांना काही विशेष आजार वाटला नाही. जीवनसत्त्व ,लोहासारखी खनिजं यांच्या कमतरतेमुळे असं होऊ शकतं. पौष्टिक, संतुलितआहाराने बरं वाटेल, असं  त्या जुन्या जाणत्या डॉक्टरांचं मत पडलं.

लक्ष्मी पाणी  भरत असलेल्या चित्राच्या घरात अन्नाची काही  कमी नव्हती. स्वयंपाकाच्या मावशी  दोन्ही वेळेला  प्रत्येकाच्या आवडीचं जेवण रांधत होत्या. पण चित्राला दाक्षिणात्य पदार्थ आवडत .ती बरेचदा  वैशाली, वाडेश्वरमधून  इडल्या,डोसेच मागवून खाई. इतर वेळी वरणभातावरच तिचं पोट भरत असे. आईस्क्रीम मात्रं तिला रोज लागायचेच. आणि चहा हे तिचं अमृत होतं. दिवसातून सात-आठदा तरी तिचा चहा होत असे. चित्राच्या लेकीचे चायनीजशिवाय पान हलत नसे. ती मैत्रिणींबरोबर चायनीज खाऊनच घरी येत असे. शिवाय डॉमिनोज ,पिझा हट, मॅकडी  ही तिची तीर्थस्थानं होती. घरची पोळी भाजी तिला बोअर होई. भात खाणं हे तर तिला पाप वाटे. पिझा,बर्गरनी  तिच्या व्यक्तीमत्त्वाला चांगलच वजनदार  केलं होतं.. मंदार ,चित्राचे यजमान त्यांच्या धंद्याच्या निमित्ताने  बरेचदा बाहेरच असत. सामिष जेवण त्यांचा जीव की प्राण…विविध गावांतील कोणत्या हॉटेलात फिश चांगला मिळतो, कुठे बिर्याणी लाजवाब असते, हे सांगताना  सरस्वती त्यांच्या जीभेवर नाचत असे. मटन,तांबडा-पांढरा खाण्यासाठी ते मित्रांबरोबर खास  कोल्हापुरला जात असत. त्यामुळे  चित्राच्या शाकाहारी घरी जेवणासाठी ते क्वचितच  असत.

चित्रावर त्यांचं खूप प्रेम होतं. म्हणूनच चित्रा आजारी पडल्यावर त्यांनी तिला लगेच डॉक्टरांकडे  नेलं. डॉक्टरांनी जेंव्हा जीवनसत्त्व, खनिजे, लोह यांची कमतरता सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढ्या समृद्ध भरल्या घरात असं का व्हावं ते त्यांना समजेना. म्हणूनच शेवटी ते शहरातल्या  प्रसिद्ध व महागड्या आहारतज्ञांकडे चित्राला घेऊन गेले.

मी चित्राची फाईल पाहिली. फाईलमध्ये  तिच्या रक्ताच्या तपासण्यांचे रिपोर्ट्स होते. त्यात  अनेक जीवनसत्त्वे, खनिजे,लोह यांची कमतरता तिच्या रक्तात दिसत होती. त्या फाईलवर  मी चौकशी केलेल्या  क्लिनिकचेच नाव दिसत होते. निरनिराळ्या  व्हिटॅमिन्स, मिनरल्सच्या  गोळ्या असलेल्या बाटल्या  दिलेल्या होत्या. प्लॅस्टिकच्या डब्यातून  नाचणी,बाजरी वगैरेंची  कसली कसली पिठे दिसत होती. या सगळ्यांचे तिच्याकडून ऐंशी हजार रुपये घेतले होते.

दिलेल्या प्लॅननुसार  तिने  ही औषधे घेण्यास सुरुवात केली. जेवणाऐवजी  पिठे  शिजवून खाऊ लागली. दोन दिवस बरं वाटलं. तिसऱ्या दिवसापासून  जुलाब होऊ लागले. आहारतज्ञाला फोन केला. प्लॅननुसार सगळं सुरू ठेवा,असं उत्तर मिळालं. दोन  दिवसांनी  जुलाबांबरोबरच उलट्याही सुरू झाल्या. पुन्हा आहारतज्ञाला फोन गेला. मॅडम परदेशी गेल्याचं उत्तर मिळालं.

मैत्रीण उलट्या जुलाबांनी अंथरुणाला खिळली. चित्राच्या यजमानांना काय करावं ते समजेना. त्यांना  ज्या आत्यांनी  लहानाचं मोठं केलं होतं त्या आत्याला गाडी पाठवून गावाकडून  घरी आणलं. आत्यांनी वयाची ऐंशी वर्षं पार केलेली असली तरी पन्नाशीच्या चित्रापेक्षा त्या ठणठणीत दिसत होत्या. ऐंशी पावसाळे पाहिलेल्या आत्याबाईंच्या सारं लक्षात आलं….. त्यांनी आल्या दिवसापासून पदर खोचून स्वयंपाकघराचा ताबा घेतला. त्यांनी  तिच्यासाठी  लोणकढ्या तुपातले  मुगाचे,नाचणीचे, डिंकाचे  लाडू बनवले. चित्राचा चहा बंद करून  टाकला. उठल्याबरोबर कोमट पाणी, लिंबू नि मध तिला प्यायला देत असत. नाष्ट्याला  ताजा बनवलेला लाडू नि गरमागरम  भाताचे प्रकार.. गरम गरम भाताबरोबर कधी मेतकूट तूप लोणचं ,कधी कुळथाचं पिठलं, कधी लसणाची फोडणी दिलेलं मुगाचं वरण, कधी टोमॅटोचं तर कधी आमसुलाचं सार ! कधीतरी  मुगडाळीची खिचडी ,तूप ,पापड नि  मुरलेलं लिंबाचं लोणचं….. 

दुपारच्या जेवणात  गरम गरम पोळी, तूप, कधी  बाजरीची तर कधी नाचणीची भाकरी. तिच्यासोबत घरच्या ताज्या  लोण्याचा गोळा. पोळी-भाकरीसोबत  लिंबू पिळलेली, भरपूर कोथिंबीर घातलेली  रोज वेगळी कोशिंबीर, मोड आलेल्या कडधान्याची उसळ, रोज नवीन फळभाजी नि ओल्या खोबऱ्याची, कच्च्या टोमॅटोची ,कांद्याची, दोडक्याच्या किंवा दुधीच्या सालीची खमंग चटणी….. 

दुपारी  गरम गरम उपमा ,कधी पोह्याचा एखादा प्रकार ,कधी लाह्यापीठ ,कधी थालीपीठ, कधी मिश्र धान्यांचं गरमागरम  धिरडं ….. 

रात्रीच्या जेवणात मात्रं गरम गरम ज्वारीची  भाकरी, पालेभाजी नि जवस, खोबरं, कारळे, लसूण यांपैकी एकाची  चटणी. दिवसभरात  दोन मोसमी फळे  तिला खावीच  लागत..

आता  आत्याबाई  हे  एकटीला थोडच खाऊ घालणार ?

साऱ्या घराचाच हा डाएट प्लॅन झाला. आणि आत्यांना नाही म्हणण्याची किंवा विरोध करण्याची कुणाची बिशाद नव्हती.

चित्राला तिच्या न कळत  कधी  बरं वाटू  लागलं, ते कळलंच नाही. तिचा अशक्तपणा, निरुत्साह , निराशा सगळं सगळं पळालंच, पण चित्राच्या  यजमानांची रक्तातील वाढलेली साखरही पळाली. लेकीचं वाढलेलं वजन पळालं नि तिच्यामागे कॉलेजात  मुले लागू  लागली..

….. आजारपणाच्या  छायेनं वेढलेलं  घर  हसतं-खेळतं  झालं.

बाहेरून पिझा ,बर्गर, वडापाव, तेलकट चायनीज, तुपकट पंजाबी ,बेचव कॉंटिनेंटल मागवणं  बंद झालं नि पैशाची कल्पनेपलिकडे बचत होऊ लागली……. पण यासाठी  ऐंशी हजार रुपये अक्कलखाती  जमा करावे  लागले.

भाच्याच्या घरातील पोटं आणि  तब्येती मार्गी लावून आत्याबाई आपल्या गावी  निघाल्या.. चित्रा नि  तिच्या  यजमानांनी  आत्याला वाकून  नमस्कार केला . आत्याबाईंनी  डोक्यावर ठेवलेल्या आशीर्वादाचा हात हातात घेतला, नि त्या अन्नपूर्णेच्या हातात नवीन घडवून आणलेले  सोन्याचे  बिलवर चित्राने  घातले.

” अरे  पोरांनो, हे  एवढे महाग  जिन्नस  कशासाठी ?” … आत्याबाई  चक्रावून  बोलल्या..

” आत्या  तू  तुझ्या अन्नपूर्णेच्या हातांनी जे पौष्टिक अन्न आम्हाला करून वाढलंस त्यामुळे चित्रालाच काय, आम्हा सर्वांना पुनर्जन्म मिळाला. त्या अन्नाची किंमत होऊच शकत नाही. पण ही फूल ना फुलाची पाकळी. “…..

लेखिका : सुश्री नीला  महाबळ गोडबोले, सोलापूर

संग्राहिका : वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सिंधुदुर्गचे माणिकमोती … भास्कर पांडुरंग कर्णिक –  डॉ. बाळकृष्ण लळीत ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ सिंधुदुर्गचे माणिकमोती … भास्कर पांडुरंग कर्णिक –  डॉ. बाळकृष्ण लळीत ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

 कोल्हापूरहून कोकणात राधानगरीमार्गे जाताना फोंडाघाट लागतो. तो उतरल्यावर आपण फोंडा या गावी येतो. कविवर्य वसंत सावंत, वसंत आपटे, महेश केळुसकर हे याच परिसरातले…! पुढे प्रसिद्ध मराठी साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे गाव नि घर असलेले हे करूळ.

तेथील शाळा, ग्रंथालय, बॅ.नाथ पै प्रबोधनी हे सारे पहाण्यासारखे आहे. येथून पुढे कणकवलीकडे डावीकडे जाताना माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर.अंतुले यांच्या काळात कल्पकतेने साकार झालेले हुतात्मा स्मारक नजरेला पडते नि हात जोडले जातात.

     

कोण होते भास्कर पांडुरंग कर्णिक..?

– मी याविषयी माहिती घेऊ लागलो, तेव्हा माहितीच्या महाजालात त्यांच्याविषयी भरपूर माहिती उपलब्ध झाली, ती व अन्य एक दोन संदर्भ हाती आल्यावर या महान सिंधुरत्नावर संकलन-संपादन करून येथे लिहिले आहे.

     

तेव्हाच्या रत्नागिरी जिल्ह्यात करूळ या गावी भास्कर पांडुरंग कर्णिक यांचा जन्म ७ डिसेंबर १९१३ रोजी झाला.

आपल्या जिल्ह्यात जन्मलेल्या या महान भारतीय क्रांतिकारकांचे आपण सदैव स्मरण केले पाहिजे .

पुणे येथे एका दुर्दैवी क्षणी दि.३१ जानेवारी, इ.स. १९४३ रोजी त्यांनी बलिदान केले.

    

शिक्षण –

त्यांचे प्राथमिक शिक्षण करूळ गावी झाले. वयाच्या १०/१२ व्या वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी कर्नाटकातील गुलबर्गा जावे लागले .

पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी बी.एस्‌सी. पदवी प्राप्त केली आणि १९४२ साली ते पुण्याजवळच्या देहूरोड येथील ॲम्युनिशन फॅक्टरीत नोकरीस लागले.

     

मोठे धाडस — क्रांतिकारक चळवळीत भाग असलेल्या भास्करना संदेश मिळाला…

“अर्धा ट्रक बॉम्ब संपादन करा.” ….. 

देहूरोड येथील एच. डेपोमध्ये असताना भास्कर कर्णिक यांनी तेथून बॉम्ब पळवायला सुरुवात केली. बाजूला काढून ठेवलेल्या बॉम्बच्या खोक्यांतला एक बॉम्ब रोज जेवणाच्या डब्यातून बाहेर आणला जाई. या पद्धतीने कर्णिक यांच्याकडे अर्धा ट्रक भरेल एवढे बॉम्ब जमा झाले होते.”

अशी माहिती मिळते की,…. ”या बॉम्बपैकी काही बॉम्ब पुढे पुणे कॅन्टॉन्मेन्टमधील कॅपिटॉल चित्रपटगृहात टाकण्यात आले. बॉम्ब टाकण्याच्या कटात सामील असलेले बापू साळवी, बाबूराव चव्हाण, एस.टी. कुलकर्णी, रामसिंग, दत्ता जोशी आणि हरिभाऊ लिमये असे सहा जण जेलमध्ये गेले, पैकी दत्ता जोशी जेलमध्येच वारले, बाकीचे काही काळानंतर सुटले.”

     

पुणे येथील फरासखान्यात मृत्यू –

कॅपिटॉलमध्ये सापडलेल्या बॉम्बच्या अवशेषांवरून हे बॉम्ब कोठून आले? याचा पोलिसांनी शोध घेतला आणि त्यांनी भास्कर पांडुरंग कर्णिक, भालचंद्र दामोदर बेंद्रे, अनंत आगाशे, वामन कुलकर्णी आणि रामचंद्र तेलंग या पाच जणांना पकडून पुण्याच्या फरासखाना पोलीस चौकीत आणले. तेव्हा पुढील सर्व घटनाक्रम त्यांच्या लक्षात आला.

भास्करराव कर्णिक लघुशंकेच्या निमित्ताने किंचित दूर गेले आणि त्यांनी खिशातली सायनाईडची पूड खाल्ली आणि काही सेकंदात त्यांचे निधन झाले. त्यांच्या या कृत्यामुळे ‘त्यांच्याकडून मोठी माहिती मिळेल’ असे वाटणार्‍या पोलिसांची निराशा झाली. कर्णिकांच्या बलिदानामुळे मोठ्या संख्येने क्रांतिकारक वाचले.

…. असे होते हे धाडसी करूळचे सुपुत्र हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक!

पुणे येथील स्मृतीस्तंभ –

पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या अलिकडे मजूर अड्डयाजवळ हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मृतीसाठी म्हणून एक स्मृतीस्तंभ उभारला आहे. स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक हुतात्मा कर्णिक यांचा हा स्मृतीस्तंभ सध्या तसा दुर्लक्षितच आहे. या संदर्भात एका वृत्तपत्रांच्या पुरवणीत प्रसाद पवार यांनी लक्ष वेधले होते.

     

आपण सिंधुदुर्गवासियांनी दरवर्षी करूळला जाऊन मानवंदना द्यायला स्मारकावर गेले पाहिजे. शाळा, महाविद्यालय यांच्या शैक्षणिक सहली काढून त्यांच्या या असामान्य बलिदानाची यशोगाथा नव्या पिढीला विद्यार्थ्यांना सांगायला हवी.

म्हटले तर एक ‘लघुपट चित्रपट’ही काढता येईल. त्यांचे छोटेखानी चरित्र प्रसिद्ध करून जिल्हा परिषदेने शाळांमधून विद्यार्थ्यांना मोफत वाटायला हवे. दरवर्षी करूळ ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जनता येथे मानवंदना देते. त्यात आपणही सहभागी व्हायला हवे.

     

लेखक : डॉ. बाळकृष्ण लळीत  

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मन… ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ मन… ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

मन

मन म्हणजे काय हो ? ,

त्याला कोणी पाहिलं नाही ,

कसं असते ते माहीत नाही,

पण त्याला खूप मानसन्मान असतो.

कधी ते लिक्विड असतं, 

“मन भरलं नाही” असं म्हणतो आपण,

कधी ते सॉलिड असतं, “मनावर खूप ओझं आहे”

कधी ते घर होतं, “मेरे मन में रहने वाली”,

कधी ते तहानलेल असतं,  “मेरा मन तेरा प्यासा” 

कोणी त्याला मोराची उपमा देतं, “मन मोराचा कसा पिसारा फुलला”

असं हे मन आयुष्यभर आपल्याला झुलवत ठेवतं ,

कधी स्वतःच्या मनाने तर कधी दुसऱ्याच्या मनाप्रमाणे आपण वागत असतो

हे “मन” कधीच स्थिर का बरं नसतं ?

ते कधी प्रेयसीच्या तोंडातून मंदिररूप धारण करतं

आणि ती म्हणते “मन में तुझे बिठाके …”

काही जण असतात की त्याच्या “मनात”काही रहात नाही तर काही “मनकवडे” असतात. 

मन दिसत तर नाही

… पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं

तर कधी शक्ती नसताना जिंकून ही देतं.

“मनात आणलं तर काहीही होऊ शकतं ..”

जरी त्याला कोणी पाहिलेले नाही तरी ते जर चांगलं असेल तर आपण आनंदी राहतो ,

दुसऱ्याचं भलं करतो,  म्हणुन म्हटलं जातं, “मन चंगा तो ..”

कधी मन खूप डेंजर असतं ,

स्वतःकडे राग तिरस्कार साठवून ठेवतं आणि “मनातील” राग दुसऱ्याचं नुकसान करतं .

याचा वेग मोजण्याचं यंत्र अजून अस्तित्वात आलेलं नाही, 

तरी लोक म्हणतात,  “मनाचा ब्रेक , उत्तम ब्रेक”.

“मन” दिसत नसलं तरी तेच आपणाला घेऊन फिरत असतं , कधी घरी , कधी डोंगरदऱ्यांत, कधी आकाशात

पण ते निर्मळ असतं, पारदर्शक  असतं.

म्हणूनच आपण म्हणू शकतो की “मोरा मन दर्पण कहलाये.”

अशा या न  दिसणाऱ्या पण सर्वस्व असणाऱ्या  “मनाला” काबूत ठेवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात !

पण “मनाप्रमाणे” जगता आलं नाही तर

त्याला काही अर्थ आहे का ?

मग …

“मनसोक्त” जगा ! ! आणि त्यासाठी ”मनापासून” शुभेच्छा!

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जिच्या हाती … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ जिच्या हाती … ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ अशी एक म्हण आपल्या मराठी भाषेत प्रचलित आहे (म्हणजे आता होती म्हणावी लागेल.)आपल्या सुदृढ,सुसंस्कृत भारतीय समाजात ही म्हण अगदी तंतोतंत चपखल होती.जिच्या हाती पाळण्याची दोरी याचा अर्थ असा की जिला मातृत्व लाभलेय तिने आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊन त्याला सुदृढ,सशक्त,सुसंस्कारी बनवू शकते.असा सुदृढ,सशक्त,सुसंस्कारी तेजस्वी युवक पुढं राष्ट्र मजबूत बनवेल आणि आपल्या राष्ट्राचा उद्धार करेल.स्वामी विवेकानंदासारखा एखादा युवक जग सुद्धा उद्घारेल.

पूर्वी स्त्रिया अशिक्षित होत्या,कदाचित त्यावेळची ही जाहिरातही असेल किंवा देश पारतंत्र्यात असल्यामुळे देशाला अशा तेजस्वी,सुदृढ सशक्त तरुणांची आवश्यकता असेल म्हणूनही कदाचित कुणी विचारवंताने आपल्या या विचाराला समाजासमोर ठेवले असेल.तसेही हा विचार सर्वच काळासाठी लागू आहे कारण ज्या देशातील तरुण  सुदृढ,तेजस्वी,संस्कारी आणि तगडे असतील तर देश सुद्धा तितकाच बलवान व सूनसंस्कृत होईल

“बलसागर भारत होवो

विश्वात शोभूनी राहो..”

अशी प्रार्थना म्हणून तर साने गुरुजी करत असतील.

आपले मूल आपले असले तरीही तो समाजाचा एक घटक असतो न पर्यायाने तो उद्याच्या देशाचा एक सुविद्य, सुसंस्कृत नागरिक असतो आणि हीच खरी आपल्या राष्ट्राची संपत्ती असते पर्यायाने उज्वल देश.त्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या बालकाला त्या दृष्टिकोनातून घडवायचे असते आणि आपले मूल राष्ट्राला अर्पण करायचे असते.शिवरायांच्या काळात,पारतंत्र्याच्या काळात असे अनेक युवक आपल्या मातेने राष्ट्रार्पण केले म्हणूनच देश स्वतंत्र झाला,शिवरायांनी अशाच मूठभर तगड्या मावळ्यांच्या साथीने आपले स्वराज्य उभे केले.

अगदी नवजात शिशूपासून ते बालक सज्ञान होईतो ते आईच्या सहवासात जास्त असते.त्यामुळं आईच्या संस्कारांचा प्रभाव मुलावर पडत असतोच पण बालकाच्या सशक्ततेसाठी ,त्याच्या सदृढ ,संपन्न,निरोगी आरोग्य पूर्ण जीवनाची पण जबाबदारी मातेवरच येत असते,त्या दृष्टीने मुलाचा आहार विहार,खेळ,व्यायाम याकडेही तिचे जाणीवपूर्वक लक्ष असेल तरच ते बालक उद्याचा सशक्त युवक आणि सुसंस्कारी नागरिक बनेल.असे नागरिक मग देशावर प्रेम करतील, स्वच्छता व सामाजिक आरोग्य जपतील व आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करतील.देशातील कायदा सुव्यवस्थेचे पालन करतील,कर प्रणाली मजबूत करतील आणि देश प्रगतीपथावर नेतील.यासाठी प्रथम लोकसंख्या नियंत्रण हवे जेणेकरून मर्यादित लोकसंख्येमुळे आपल्याला हवे तसे सुनिश्चित आणि चांगले बदल घडवता येतील.

पण आज आपल्या देशातील युवकांची स्थिती बघता काय दिसते?कुटुंबे विभक्त झालीत,आर्थिक बाजू मजबूत करत असताना घरातील बालकांच्या आरोग्याकडे, संगोपणाकडे दुर्लक्ष होत आहे,शहरात सुशिक्षित जोडप्यांच्या मुलांचे बालपण पाळणा घरात संपत आहे.बरेचदा रविवारी सुद्धा आपल्याला विश्रांती मिळावी म्हणून काही आया मुलाला पाळणा घरात सोडतात.एका बाजूला हे चित्र आहे,दुसऱ्या बाजूला अति सजग आया थोडक्यात माता पिता पालक अगदी नर्सरी /बालवाडी पासून मुलाला करिअरच्या  चक्कीत ढकलतात की ते मूल मोकळा श्वास सुद्धा घेऊ शकत नाही.स्पर्धेचे युग आहे म्हणून त्याला तीन वर्षापासूनच स्पर्धेच्या शर्यतीत ढकलले जाते त्यामुळं ते तिशीतच थकते,म्हातारे होते.अभ्यास,वेगवेगळे क्लास ,वेगवेगळ्या स्पर्धात त्याचे बाल्य करपतेआणि तारुण्य कोमेजते,उमलायच्या,फुलायच्या वयातच त्यांचे निर्माल्य होते.

बदललेली सामाजिक स्थिती,अत्याधुनिक मनोरंजनाची साधने,मोबाईल यामुळं ७०%तरुणाई भरकटत चालली आहे म्हणलं तरी वावगे ठरणार नाही.पूर्वी घरात पाच पन्नास माणसे असत त्यामुळं मोठ्यांच्या वागण्या बोलण्यातील शिस्त,आदर्श, सुसंस्कार आपोआपच मुलांच्या अंगी येत.घरातील सर्वच स्त्रियांचे सर्व मुलांकडे लक्ष असायचं,त्यामुळं मुलं सुरक्षित वातावरणात वाढत,त्यांना आपसूकच कुटुंबाचा भक्कम आधार मिळायचा,आणि सगळे प्रेमळ पालकही.आज उलट चित्र आहे,घरा घरात कलह वाढत आहे,संयुक्त कुटुंबाकडून  विभक्ता कुटुंबाकडे आपण गेलोच आहोत पण भविष्यात आई किंवा वडील यापैकी एकच पालक मुलाला असेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे.मुले दिशाहीन होत आहेत.नैराश्य आणि गुन्हेगारी वाढत आहे,चंगळवाद फोपावल्याने सामाजिक अस्थिरता आणि विषमता वाढीस लागली आहे.

पूर्वी स्त्रिया अर्थार्जन करत नसत त्यामुळं चोवीस तास आपल्या मुलांसोबत असल्याने मुलांच्या सवयी,मुलांचे खेळ,आरोग्य,अभ्यास याकडे लक्ष देता येत असे.आज अर्थार्जन ही काळाची गरज आहे,गरज असली न नसली तरीही स्त्रिया अर्थार्जन करत आहेत आणि अर्थातच मुलांकडे दुर्लक्ष होते,बरेचदा आयुष्यात पैसा खूप असतो पण मुले बिघडलेली असतात,वाया गेलेली असतात.याउलट मध्यम आर्थिक स्थिती असणारे,किंवा ग्रामीण भागातील मुले तुलनेत जास्त समंजस आणि जबाबदार असतात.

असो, ज्यावेळी देशातील स्त्री पुरुष दोन्ही अर्थार्जनासाठी बाहेर पडतात,तेव्हा सरकारने बालकांची काळजी घेणारी व्यवस्था उभी करायला हवी असते,कामाच्या ठिकाणीच त्या त्या कम्पन्यांनी सुद्धा अशा व्यवस्था उभ्या करायला हव्यात.अण्णाभाऊ साठेंच्या एका लेखात मी वाचलं होतं की एक रशियन माता रेल्वेतून प्रवास करत आहे आणि तिचे बाळ (अर्थातच भावी रशियन नागरिक) तिथंच पाळण्यात शांतपणे झोपले आहे.)समाजातील अगदी खालच्या स्तरापासून वरच्या स्तरावरील मुलांची अशी सोय होणे गरजेचे आहे. तिथल्या सरकारने सरकारने तिथल्या रेल्वेतून अशी सोय केली आहे.असे चित्र मला आपल्या देशात कुठं दिसलं नाही,आता या चार दोन वर्षात झाली असेल सोय तर माहीत नाही.

काळाची चाके चालत राहतात कधी हळू तर कधी जलद पण फिरून पुन्हा तिथंच कधीतरी येतो त्याला बराच कालावधी लागतो पण या कालावधीत बरेच काही निसटते, हरवते. आज आपल्या देशातील कुमारांची/कुमारीची,तरुण/तरुणींची स्थिती खरेच चिंतनीय आहे.

आपली मुले प्रथम आपली संपत्ती आहे त्यानंतर समाजाची व पर्यायाने देशाची,तिची जपणूक व्यवस्थित रित्या झाली तरच एका सशक्त राष्ट्राची निर्मिती होईल असे मला तरी प्रामाणिकपणे वाटते.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सखी — ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सखी — ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

सखी… कोण सखी?                   

जिची साथ सुखावते…ती सखी?

आनंद साजरा करण्यासाठी पहिली हाक जिला जाते…ती सखी?

की दुखावलेल्या श्रांत मनासाठी जी शीतल श्रावणधारा होते……ती सखी?

रोज नियमाने GM-GN चे मेसेज किंवा डझनावारी emoji चा रतीब न  घालताही,  जी आपल्यासाठी सतत connected mode मध्ये असते…..ती सखी?

जिच्याशी बोलताना किती सांगू नि किती नको असं होतं…..ती सखी?

की जिला मौनाची भाषा अवगत आहे, अवाक्षरही न बोलता-जसा की शब्देविण संवादु-आपलं मन जी सहज वाचू शकते…..ती सखी?

प्रवासात असताना मधल्या स्टेशनवर चहा-नाश्ता (चहात आलं घालायला विसरु नकोस ग!…) घेऊन येण्यासाठी जिला हक्काने सांगता येतं, प्रत्येक वेळी प्लीज-थॅंक्यू म्हणण्याची कसरत न करता…..ती सखी?

जिच्या सहवासात असताना आपल्याला कोणताही मुखवटा चढविण्याचा व्यायाम करावा लागत नाही,आपण आरस्पानी, जेव्हा जसे आहोत तसे– नाठाळ, खट्याळ,आनंदी,उदास,

बिनधास्त,घाबरट,आग्रही..जी सहजतेने स्वीकारते…..ती सखी?

वाचाळ व्याख्यानी भाषा न वापरताही , आपल्या एखाद्या achievementचं कौतुक जिच्या नजरेतून ओसंडताना दिसतं…..ती सखी?

की हक्काने कान पकडून जी आपली चूक-उणीव दाखवून देत असतानाही आपला एरवी एवढ्या-तेवढ्याने फडा वर काढणारा ego आता अजिबात मान वर करीत नाही….ती सखी?

एखाद्या वैतागवाण्या गुंत्यात नाहक गुरफटायला होत असताना, जिच्या आश्वासक आधाराने आपण अलगद आपला पाय आणि श्वास मोकळा करून घेतो… त्याला तणावाचे व्यवस्थापन-भावनिक समुपदेशन अशी भारी भारी नावं (आणि भारी-भक्कम फी!) न देता….ती सखी?

जन्मजात आणि जुळलेल्या नात्यांच्या अपेक्षांचे कंगोरे जेव्हा कधी काचू लागतात, तेव्हा नात्याचे कोणतेही लेबल न लावता, जिच्या निरपेक्ष जवळीकीचे दार आपल्यासाठी नेहमीच खुलं असतं……ती सखी?

ठाशीव ठिपक्यांनी मांडलेल्या, रेखीव रेघांनी जोडलेल्या आणि सप्तरंगी छटांनी सजवलेल्या अंगणातील रांगोळीचे आमंत्रण जसे सुखद, तसेच जिचे व्यक्तिमत्त्व लोभस…..ती सखी?

होय,ही सगळी तर सखीची नानाविध विलोभनीय रूपे आहेतच,पण सखीत्व नेहमीच त्यापेक्षाही ओंजळभर अधिकच राहणार आहे ! कारण सखी म्हणजे केवळ व्यक्ती नसते,तर वृत्ती असते!!आणि ही वृत्ती सदाच वय,लिंग, भौगोलिक-आर्थिक-सामाजिक अंतर इ. निकषांच्या अतीत असते, स्वयंभू असते.(शक्य आहे,कदाचित् काहींना ही वृत्ती व्यक्ती ऐवजी एखाद्या पाळीव प्राण्यात,निसर्गात, पुस्तकांत सुद्धा सापडू शकेल !)

असं काही घडतं की, माणसांच्या आणि वस्तूंच्या या अपार कोलाहलात अवचित एक संवादी सूर ऐकू येऊ लागतो आणि मग त्या सुराशी असे लयदार सख्य जुळून येते की, आयुष्य म्हणजे एक जमलेली  सुरेल मैफलच होऊन जाते! निरपेक्ष ,अयाचित दान देणाऱ्या प्राजक्तासारखी परिमळणारी ! …..म्हणूनच राधा कृष्णाची सखी होऊ शकते आणि कृष्ण द्रौपदीचा सखा !!   

कविवर्य ग्रेस यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, असे सखीत्व म्हणजे

‘ सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला  !’

ज्यांना आयुष्यात असा सखीपणाचा आपापला    ‘राघव शेला  ‘ सापडला आहे, त्यांनी तो खूप निगुतीने सांभाळावा,हीच एका सखीची अपेक्षा!!

संग्राहिका – सौ. राधा पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ हसताय ना! ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ हसताय ना! ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

…. काय मंडळी हसताय ना? हसलेच पाहिजे. तुमच्या टेन्शन वरची मात्रा,  ईनोदाचे चारवार हास्याचा चौकार. चमत्कृतीचा ईनोद नि शाब्दिक कसरतीवर शारीरिक चमत्कारिक अंगविक्षेप अश्या अनेक क्लुप्त्या दाखवून हसायला लावणारे अनेक टि. व्ही. कार्यक्रम सतत चौवीस तास डोळ्याना सुखवत मुखाला हसवत असतात… दुसऱ्याच्या व्यंगावर (वर्मावर टिप्पणी करून) केलेला विनोदाला हसणे हा मनुष्याचा नैसर्गिक स्वभावच असतो नाही का? रस्त्यावरुन चालणारा अचानक पाय घसरुन पडला तर सगळया पहिले हासतो ते आपण… फजिती, विचका झाल्याचा विकृत आनंदच तो असतो आपल्या हास्यातून बाहेर पडतो.. पण ते का खरे निखळ हसणे असते..पू्र्वी सर्कस येत असत त्यात विविध जोकर उलट्या सुलट्या उड्या आणि कसरती द्वारे प्रेक्षकांना हसवत असत… मेरा नाम जोकर सिनेमा पाहिलेला तुम्हाला आठवत असेलच.. जो माणूस आतून खरोखर दुःखात बुडालेला असतो तोच चेहऱ्यावर आपलं दुख लपवून दुसऱ्याला जास्त हसवत असतो हे ही आपल्याला ठाऊक आहेच की… पण खरी गोष्ट अशी आहे की तो आपल्याला हसवत नसून तो आपल्या आतल्या दु:खावरच हसण्याचा उपाय करत असतो.. हसण्यासाठी जन्म आपुला हे वाक्य जो सतत जपत राहतो त्याच्या पुढे सगळी संकटे दु:ख चार हात लांबच राहू पाहतात. साहित्यिक हलके फुलके नर्म विनोद सगळ्या वाचकांना हसवत असतात, व्यंग चित्र, अभिनयातून साधलेले विनोद, ही सारी उदाहरणे निखळ हास्य निर्माण करतात.. ती अक्षर कलाकृती अक्षय आनंदाचं हास्य फुलवित असते. म्हणून आजही भाईंची सगळी पुस्तकं तेच हास्य देत असतात.. धीरगंभीर प्रवृत्तीच्या लोकांना  विनोदाचं वावडे असल्याने ते तर कधीच हासत नाहीत नि दुसऱ्यालाही हसवत नाहीत.. पण काही काही वेळा तीच माणसं हसण्याचा विषय होउन बसतात… मग हिच माणसं टवाळा आवडे विनोद म्हणून हाकाटी पिटत बसतात…दैनंदिन जीवनातील कंटाळवाणे, नीरस धबगडयात मनोरंजनासाठी चार हास्याचे कण मिळावेत म्हणून तर सिनेमा,नाटक, टि. व्ही. वरील कार्यक्रम  पाहिले जातात..तसं पाहिलं तर विनोदाला कुठलाच विषय वर्ज्य नाही..आदी नाही अंतही नाही… पण ताळतंत्र सुटलेला विनोद हास्य निर्माण करत नाही तर त्या विनोदाची कीव करायला लावतो… हसणं हा जन्मजात गुण मानवाला मिळालेला असून तो आबालवृद्धा़ना  तितकाच हवाहवासा असतो..स्त्रियांवर तर विनोदाला कळस गाठला जातो.तसा नवरोजीही यातून सुटलेला नसतो बरं… थोडक्यात काय विनोदाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्व स्पर्शी असल्याने ते ज्याला लुभावते तोच त्यातून हासू निर्माण करतो… स्वता हसतो नि दुसऱ्याला हसवतो..

… आताच्या काळात तो जूना शब्द प्रयोग ‘हसावे कि रडावे’ आता कुचकामी ठरला आहे.. आता फक्त हसतच राहावे असे वाटते…हल्लीचे राजकारण त्यात अग्रेसर आहे.. त्यामुळे सर्कस, सिनेमा, नाटक बंद पडली आहेत… एकापेक्षा एक धुरंधर विदूषक आपली विनामूल्य मनोरंजनातून हसवत असतात.. मेडिया त्याचं विस्ताराने प्रसिद्धी करण करत असतो, पेपर तर पहिल्या पानापासून ते शेवटच्या पाना पर्यंत विनोदाची विविधता पेरूनच असतो..

… एव्हढी सगळी साधने तुम्हा आम्हाला सतत हसत राहा म्हणून कानीकपाळी ओरडून सांगत असताना आपण हसयाचं नाही?…टिआरपी वाढण्यासाठी तरी आपल्याला हसायला हवं ना?… मग

…. काय मंडळी हसताय ना? हसलेच पाहिजे. तुमच्या टेन्शन वरची मात्रा,  ईनोदाचे चारवार हास्याचा चौकार…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कर्ण… सुश्री शोभना आगाशे ☆ रसग्रहण – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? काव्यानंद ?

☆ कर्ण… शोभना आगाशे ☆ रसग्रहण – श्रीमती उज्ज्वला केळकर

सुश्री शोभना आगाशे

अल्प परिचय  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथून एम बी बी एस व एम डी (पॅथाॅलाॅजी) या पदव्या प्राप्त. त्याच महाविद्यालयात २००७ पर्यंत शिक्षक म्हणून कार्यरत. सन १९६८-६९ मधे आकाशवाणी सांगलीच्या महाविद्यालयीन कविसंमेलनात सहभाग. ‘सावळ्या’ हा काव्यसंग्रह प्रकाशित. टागोर रचित इंग्लिश ‘गीतांजली’ चा काव्यानुवाद ‘गीतांजली जशी भावली तशी’ प्रकाशित.

☆ कर्ण… सुश्री शोभना आगाशे ☆

         हे सूर्यदेवा, तुमचं पितृत्व मी कधीच नाही नाकारलं।

         जरी कुंतीचं स्वार्थी मातृत्व मी झिडकारलं।।

         तुमच्या तेजाचा अंश मी सतत वागवला काळजात।

         त्या दिव्य तेजाने  दिपले लोक, पण मी जळत राहिलो अंतरात।।

         गुरू परशुरामांनी माझे ज्ञान मातीमोल ठरवले।

         आणि युद्धात प्रत्यंचा चढवताना माझे मंत्र विसरले।।

         हे भास्करा, तुम्हाला माझ्यावरचा अन्याय पाहून काय वाटले?

         परोपकार करताना मी धरणीमातेला अनावधानाने सतावलं।

         तर तिने युद्धाच्या वेळेस माझ्या रथाचं चाकच गिळलं।।

         हे हिरण्यगर्भा तुम्हाला हे योग्य का वाटलं?

         ‘रथहीन, शस्त्रहीन कर्णावर बाण सोडण्याचा सल्ला देताना।

         कृष्णाची जीभ का नाही अडखळली, हे जगज्जीवना?।।

         भर राजसभेत द्रौपदीनं माला सूतपुत्र म्हणून हिणवलं।

         परशुरामाचा शिष्य असूनही त्यांच्या धनुष्यापासून दूर ठेवलं।।

         हे आदित्या, त्यावेळीही माझ्या मदतीला कोणी नाही धावलं।

         मला निस्तेज करण्यासाठी इंद्राने माझी कवचकुंडलं नेली।

         पुत्रप्रेमापोटी त्याने भृंग होऊन माझी जंघा पोखरली।।

         हे पुष्कराक्षा, तुम्हाला कधीच का पुत्रप्रेमाची अनुभूती नाही आली ?

         ‘ज्या मातृप्रेमासाठी  माझी कुडी होती आसुसली।

          त्याच प्रेमाचा हवाला देण्यासाठी पांडवमाता भेटली।।

      सम्राटपदाची अन् द्रौपदीची लालूच मला दाखवली।

      द्रौपदीला वस्तु समजताना तिला लाज नाही का वाटली? ।।

      जाताना अर्जुनाच्या जीवनाचं जणु दानच घेऊन गेली।

      हे विवस्वता, त्यावेळी तुम्हालाही ती खरी का वाटली?।।   

      ब्रम्हांडाला तेजाचं दान देणारा माझा पिता।

      माझ्यासाठी काहीच का करू शकत नव्हता?।।

      प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच।

      या प्रश्नांच्या जंजाळातून मला-माझ्या

      आत्म्याला मुक्त व्हायचं आहे।।

      ‘हे कुंती, हे द्रोपदी, हे इंद्रदेवा,

      हे धरित्री, हे मधुसूदना।

      मी राधेय कर्ण आज तुम्हा सर्वांना क्षमा करत आहे।।

     आणि आज या विदेही अवस्थेमध्ये हे सूर्यादेवा ,

     हे परशुरामा क्षमा करा, पण मी तुम्हालादेखील क्षमा करत आहे।।

– सुश्री शोभना आगाशे, मो. 9850228658

☆ काव्यानंद – कर्ण….सुश्री शोभना आगाशे ☆ रसग्रहण ☆  श्रीमती उज्ज्वला केळकर☆

महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेने अनेक साहित्यिकांना भुरळ घातली आहे. आपल्याला उमजलेले कर्णाचे व्यक्तिमत्व, त्यांनी कथा, कविता, लेख, कादंबरी यातून उलगडून दाखवले आहे. शोभना आगाशे यांनाही कर्णाच्या जीवन प्रवासाने व्यथित केले आहे. ‘कर्ण’ या कवितेत त्यांनी त्याबद्दलचे विचार, चिंतन कर्णाच्या मनोगतातून प्रगट केले आहे. कर्ण तेजस्वी. पराक्रमी. दानशूर. मृत्यूपासून दूर ठेवणारी कवच-कुंडले घेऊन जन्माला आलेला. तरीही त्याला दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागतात. का? असं का? सूतपुत्र म्हणून त्याला वारंवार अपमानित व्हावं लागतं. कवितेत तो आपल्या पित्याला सूर्याला प्रश्न विचारतोय,

तो म्हणतो, ‘ हे सूर्यदेवा, तुमचं पितृत्व मी कधीच नाही नाकारलं।

जरी कुंतीचं स्वार्थी मातृत्व मी झिडकारलं।।’ कुंतीचं मातृत्व स्वार्थी होतं. मातृप्रेमासाठी त्याचा जीव आसुसलेला होता. पण ती त्याला केव्हा भेटली? तर कौरव-पांडव युद्धाच्या वेळी. आपल्या मुलांना विशेषत: अर्जुनाला त्याच्याकडून धोका प्राप्त होऊ नये म्हणून. म्हणूनच तो तिचं मातृत्व स्वार्थी आहे, असं म्हणतो. त्याला आपल्या बाजूला वळवण्यासाठी ती सम्राटपदाची, द्रौपदीची लालूच दाखवते. कर्ण म्हणतो, 

‘ज्या मातृप्रेमासाठी  माझी कुडी होती आसुसली

त्याच प्रेमाचा हवाला देण्यासाठी पांडवमाता भेटली.

सम्राटपदाची अन् द्रौपदीची लालूच मला दाखवली।

द्रौपदीला वस्तु समजताना तिला लाज नाही का वाटली? ‘

‘जाता जाता ती अर्जुनाच्या जीवनाचं जणु दानच घेऊन गेली.’ कर्णाला प्रश्न पडतो,

 ब्रम्हांडाला तेजाचं दान देणारा माझा पिता

 माझ्यासाठी काहीच का करू शकत नव्हता.?’

 इथे सूर्याची वेगवेगळी नावे प्रत्येक वेगळ्या ओळीत आली आहेत. भास्करा, हिरण्यगर्भा, आदित्या, पुष्कराक्षा, विवस्वता अशी संबोधने कवयत्रीने सूर्याबद्दल वापरली आहेत. 

 कर्ण म्हणतो, ‘गुरू परशुरामांनी माझे ज्ञान मातीमोल ठरवले

 आणि युद्धात प्रत्यंचा चढवताना माझे मंत्र विसरले.’ या ओळींमागे एक संदर्भकथा आहे. ही संदर्भकथा बहुतेकांना माहीत आहे. कर्णाला परशुरामांकडे धनुर्विद्या शिकायची होती. फक्त ब्राम्हणांनाच धनुर्विद्या देणार, हा परशुरामांचा पण. आपण ब्राम्हण आहोत, असं खोटंच सांगून कर्ण परशुरामांकडे धनुर्विद्या शिकतो. एकदा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून विश्राम करत होते. यावेळी इंद्राने भृंग होऊन कर्णाची जंघा पोखरायला सुरुवात केली. कर्णाला खूप वेदना झाल्या. मांडीतून रक्त वाहू लागले पण गुरूंच्या विश्रामात व्यत्यय नको म्हणून कर्णाने मांडी हलवली नाही. शेवटी रक्ताचा ओघळ मानेखाली जाऊन परशुरामाला जाग आली. एखादा ब्राम्हण हे सारं सहन करू शकणार नाही, याबद्दल परशुरामाची खात्री. त्याने खोदून खोदून विचारल्यावर कर्णाला आपण सूतपुत्र असल्याचे कबूल करावे लागले. परशुराम यावेळी त्याला शाप देतो, ‘ऐन युद्धात तुला शिकवलेले मंत्र आठवणार नाहीत.’ ही कथा आठवताना मनात येतं, कर्ण खोटं बोलला हे खरे? पण का? त्या मागची त्याची ज्ञाननिष्ठा परशुरामाला का नाही जाणवली? परशुरामाला जाग येऊ नये, म्हणून त्याने सोसलेल्या वेदनांचे, त्याच्या गुरुनिष्ठेचे मोल काहीच का नव्हते?

 कर्ण पुढे म्हणतो, ‘परोपकार करताना मी धारणीमातेला अनावधानाने सतावलं

 तर तिने युद्धाच्या वेळेस माझ्या रथाचं चाकच गिळलं. ‘ हा संदर्भ मात्र फारसा कुणाला माहीत नाही. एकदा कर्ण आपल्या राज्यातून फिरत असताना त्याला एक मुलगी रडताना दिसली. त्याने कारण विचारलं असता ती म्हणते की तिच्याकडून मातीचं भांडं पडलं. त्यात तूप होतं. ते आईला कळलं, तर आई रागावणार, म्हणून ती रडत होती. कर्ण म्हणाला, तुला नवीन तुपाचे भांडे घेऊन देतो, पण तिने हट्ट धरला, तिला जमिनीवर पडलेले तूपच हवे आहे. कर्णाला तिची दया आली. त्याने स्वत:च्या हाताने मातीत पडलेले तूप उचलले. ती माती हातात घेऊन, पिळून त्यातून तूप काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या हातातून एका बाईचा आवाज आला. ती धरणीमाता होती. ती म्हणाली, ‘या मुलीसाठी तू माझी पिळवणूक करीत आहेस.’ आणि तिने कर्णाला शाप दिला की युद्धाच्या वेळी ती त्याच्या रथाचे चाक पकडून ठेवेल आणि त्यामुळे शत्रू त्याच्यावर सहज हल्ला करू शकेल.

 या प्रसंगी कर्णाने दाखवलेली माणुसकी, परोपकाराची भावना धारणीमातेला नाही का जाणवली?

 कवयत्रीने इथे कुठेही तपशिलाचा फापटपसारा मांडला नाही. एक-दोन ओळी लिहून त्यातून घटिताचा संदर्भ सुचवला आहे. 

 कर्ण प्रश्न विचारतो, ‘रथहीन, शास्त्रीन कर्णावर बाण सोडण्याचा सल्ला देताना

कृष्णाची जीभ का नाही अडखळली, हे जगज्जीवना?’

असे अनेक प्रश्न कर्णाला सतावताहेत. कर्णाच्या आत्म्याला त्या प्रश्नांच्या जंजाळातून मुक्ती हवीय. कर्ण तेजस्वी, धैर्यशील, उदार, गुणसंपन्न. तरीही आयुष्यभर त्याला अपमान, अवहेलना सहन करावी लागते. त्याचा दोष नसतानाही त्याचं आयुष्य रखरखित वाळवंट होतं. अनेक व्यथा, वेदना भोगत त्याला जगावं लागतं आणि तरीही कर्ण त्यांना क्षमा करतो. शेवटी त्या लिहितात, ‘हे कुंती, हे द्रोपदी, हे इंद्रदेवा,

हे धरित्री, हे मधुसूदना

मी राधेय कर्ण आज तुम्हा सर्वांना क्षमा करत आहे.’

ब्रह्मांडाला तेज देणारा आपला पिता आपल्यासाठी काहीच का करू शकला नाही, ही खंत वागवत, अखेरीस तो त्यालाही क्षमा करून टाकतो.

आणि आज या विदेही अवस्थेमध्ये हे सूर्यादेवा ,

हे परशुरामा क्षमा करा, पण मी तुम्हालादेखील क्षमा करत आहे.’

आणि कविता एका परमोच्च बिंदूशी येऊन थांबते.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बहुता सुकृताची जोडी : वय केवळ ११७ वर्षे… श्री किशोर पौनीकर नर्मदापूरकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ बहुता सुकृताची जोडी : वय केवळ ११७ वर्षे… श्री किशोर पौनीकर नर्मदापूरकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री नितीनजी गडकरींनी नर्मदा परिक्रमा मार्गात रस्ते बांधतो म्हटल्यावर, परिक्रमा मार्ग हा पारंपरिक पद्धतीचाच असावा, असा आग्रह करणारा लेख मी लिहिला होता. तो अनेकांना आवडला व भरपूर शेअर, फाॅरवर्ड झाला. लगोलग तिसऱ्याच दिवशी नर्मदा परिक्रमा क्षेत्रातील काही परिक्रमींच्या गैरवर्तणुकीवरही लेख लिहावा लागला. हा लेख सपाटून शेअर व काॅपी पेस्ट झाला. ‘साम टीव्ही मराठी’ वर माझी मुलाखतही झाली. गेल्या चार दिवसांपासून सकाळी ८.०० ते रात्री ९.३० फोन सतत वाजतोय. व्हाॅटस् ॲपवरही कितीतरी मेसेजेस येत आहेत.

असाच एक मेसेज आला…

डाॅक्टर स्वामी केशवदास, करनाली तालुका, डभोई जिला, बड़ौदा, गुजरात

इतक्या फोन व मेसेजमध्ये या मेसेजकडे विशेष लक्ष जाणे शक्यच नव्हते. त्यांना विचारले, “आपल्याला मराठी येते का?” – तर ते म्हणाले की, ” गुजराती/हिंदी/इंग्लिश/तमिल/तेलगु/कन्नड़ भाषा अच्छी तरह जानते है। मराठी समझता हूं, पर बोल नहीं सकता !”

मी त्यांना माझे नर्मदामैय्यावरील काही हिन्दी लेख पाठवले. त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.

(सतत फोन व मेसेजमध्ये गुंतून दुर्देवाने मी कोणाशी चॅटिंग करत आहे, हे मला माहितच नव्हते.) मी त्यांना म्हणालो की, ‘ केव्हाही फोन करा.’

आज त्यांचा मेसेज आला की, ते रात्री ८.३० नंतर मला फोन करतील. फोन तेच करणार होते, त्यामुळे मला चिंता नव्हती. नर्मदाप्रेमी अलग अलग बंधुभगिनींचे फोन व मेसेज सुरूच होते.

रात्री ९.३० ला फोन वाजला. हा नंबर व्हाॅटसॲप चॅटिंगमुळे माझ्याजवळ सेव्ह होता. स्क्रीनवर नाव आले – #स्वामी_केशवदास, बडोदा, गुजरात.#- मी फोन सुरू केला. अंदाजे ६५ वर्षे वय असलेला तो आवाज वाटला. मी बोलणे सुरू केले. स्वामीजींचेही बोलणे सुरू झाले. त्यांना माझा ‘गडकरींवरील लेख’ व ‘परिक्रमाकी बेधुंद तमाशे’ हे दोन्हीही लेख फार आवडले होते. त्यांनी माझी ‘साम टीव्ही मराठी’ वरील लाईव्ह मुलाखतही बघितली होती. मुलाखत संपल्यावर लगोलगच त्यांनी मला फोन लावला होता. पण तेव्हा माझा फोन सतत बिझी असल्याने आमचे बोलणे झाले नव्हते. म्हणून त्यांनी मला मेसेज केला होता. स्वामीजींना बोलतं करावं म्हणून मी काही प्रश्न विचारले व त्या दरम्यान ते बोलत असतांना दर वाक्यागणिक थक्क होण्याची वेळ माझ्यावर आली होती.

म्हैसूरला जन्म झालेले स्वामीजी प्रख्यात डेहराडून स्कूलमध्ये शिकले व नंतर ब्रिटनमध्ये ते वयाच्या ६७ वर्षांपर्यंत प्रख्यात ‘हार्ट सर्जन’ म्हणून कार्यरत होते. अमाप पैसा कमावला. त्यांनी लाहिरी महाशयांकडून क्रियायोगाची दिक्षा घेतली आहे. 

मी सहजच त्यांना विचारले, ” स्वामीजी, आपने नर्मदा परिक्रमा कब की?”

” १९५६ में ” ते म्हणाले व मी एकदम उडालोच….

” स्वामीजी आपकी उम्र कितनी है?” मी आतुरतेने नव्हे, अधिरतेने विचारले…

” ११७ वर्ष “

“क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या????”  मी जवळपास किंचाळलोच. चौथ्या मजल्यावरच्या गॅलरीत उभा राहून बोलणारा मी, मला कोणीतरी १०० व्या मजल्यावर पॅरापेट वाॅल नसलेल्या गॅलरीत उभे केलेय, अशा चक्रावलेल्या अवस्थेत होतो.

मला, मी काहीतरी चुकीचेच ऐकत आलो, असे वाटत होते. मी पुन्हा त्यांना विचारले, “आपका जन्म वर्ष कौनसा है?”

“सन १९०५” ते उत्तरले.—- माझे वय वर्ष ५७ होत असल्याने, आता बरीच कामं कमी करावीत, अशा सर्वसामान्य मराठी विचारांचा मी, मनातल्या मनात तुटक गणित मांडू लागलो… १९०५ ते २००५ म्हणजे १०० वर्षे. २००५ ते २०२२ म्हणजे १७ वर्षे… म्हणजे ११७ वर्षे बरोब्बर होते.

गॅलरीत वाहत असलेल्या हिवाळी थंड हवेतही मला घाम आला…

तिथूनच मी नर्मदामैय्याला व मला घडवणाऱ्या वैनगंगेला नमस्कार केला…. एक साधी यःकश्चित व्यक्ती मी, ४५ वर्षे विदेशात विख्यात हार्ट सर्जन म्हणून काम केलेल्या, ११७ वर्षांच्या विभूतीने मला स्वतःहून फोन करून ‘ तुमचे व माझे विचार एकसारखे आहेत ‘, हे म्हणावे…. मी पुन्हा चक्रावलो होतो.

पण…

माझे हे चक्रावणे एवढेच असावे, असे जे वाटत होते, ते त्यांच्या दर वाक्यागणिक वाढतच होते.

मी त्यांना त्यांच्या आश्रमाबद्दल विचारू लागलो. मला वाटले की एक हाॅल व कुटी, असे काहीसे ते सांगतील…

ते म्हणाले, ” नर्मदाजीके दोनों तट मिलाकर हमारे सात आश्रम है, पर हर आश्रममें मंदिर बनानेकी जगह मैने २००, २५० काॅटके अस्पताल बनवाये है। पर इस कारण आप मुझे नास्तिक मत समझना।”

— त्यांच्या आश्रमाचे सेवाकार्य ते सांगू लागले, ” हमारे तीन आश्रममेंही नर्मदा परिक्रमावासी आते है, बाकीमें अस्पताल, क्रियायोग साधना व स्वावलंबनके कार्य चलते है। हमारे किसीभी आश्रममें दानपेटी नहीं है, न ही हमने कोई रसिदबुक छपवाये है। हमारे ट्रस्टमें जो पैसा है, उसके ब्याजपर हमारे सब कार्य चलते है।”

— मी जे ऐकत होतो, ते सर्व भव्य-दिव्य व व्यापक होते… स्वतःच्या आकलनशक्तीची संकुचितता मला कळली होती. मी हतबल होतो की दिङ्मूढ, हेच मला कळत नव्हते. काहीतरी बोलायचे म्हणून मी बोललो, “आपकी हिन्दी तो बहुत अच्छी है, आप दक्षिण भारतीय नहीं लगते।”

ते म्हणाले, ” हां, ठीक पहचाना, वैसे हम उत्तर भारतीय है। मेरे पिताजी मैसुरके महाराजाके कुलपुरोहित थे।”

अजून एक मोठा धक्का मला बसायचा बाकी आहे, हे मला माहीत नव्हते…

मी विचारले, “आपके दादाजी कौन थे?”

” पंडित मदन मोहन मालवीय ! “

“क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या?” आपण कितव्यांदा आश्चर्यचकित होत आहोत, हे मोजणे मी बंद केले होते.

“महामना पंडित मदन मोहन मालवीय?” न राहवून मी त्यांना पुन्हा विचारले.

” हां!  मेरे दादाजी बॅरिस्टर थे….” – ते महामना पंडित मदन मोहन मालवीयांबद्दल सांगू लागले.

थोड्या वेळाने त्यांनी आपली गाडी पुन्हा नर्मदा परिक्रमेकडे वळवली. म्हणाले, “आप परिक्रमाके बारेमें जो आग्रह कर रहे है, वह बहुतही सटिक है। गुरूआज्ञाके बिना नर्मदा परिक्रमा करना मात्र चहलकदमी ही है! “

मग ते मराठी परिक्रमावासी व त्यांचे वागणे, परिक्रमेत शूलपाणी झाडीतून जाण्याचा अवास्तव आग्रह, शूलपाणीतील सेवाकेंद्रांची काही गडबड, असे बोलू लागले. पुढे ते म्हणाले, ” मैं अब तक खुद होकर केवल ” राहुल बजाज ” से फोनपर बात करता था। आपके परिक्रमापरके लेख व परिक्रमा फिरसे अध्यात्मिकही हो, यह आपका प्रयास मुझे बहुत भाया। इसलिये आज मै आपसे खुद होकर फोनसे बात कर रहा हूं।”

नर्मदामैय्या अनाकलनीय चमत्कार करत असते, हे मला माहीत होते. यातले काही माझ्या वाहन परिक्रमेत मी अनुभवले होते. पण ती सामाजिक जीवनातही चमत्कार करते, हे मला या वर्षीच्या ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान कळले होते. होशंगाबादचे नामांतरण ‘ नर्मदापुरम् ‘ होण्याचे पूर्ण श्रेय तिने मला त्या भव्य मंचावर मुख्यमंत्री, खासदार व आमदारांच्या सोबत बसवून दिले होते. आणि आता राहुल बजाज यांचेशिवाय स्वतःहून कोणालाच फोन न करणारे स्वामी केशवदास, माझ्याशी स्वतःहून फोनवर बोलत होते.

मी पण नर्मदेच्या या चमत्काराचा फायदा घेतला. त्यांना म्हणालो की, ” परिक्रमेतील वाढत्या गर्दीमुळे वमलेश्वरला (विमलेश्वर) परिक्रमावासींना तीन – चार दिवस अडकून पडावे लागते. त्यांच्यासाठी विमलेश्वर गावाअगोदर अंदाजे १५०० परिक्रमावासी राहू शकतील असा आश्रम बनवायला हवा, जेणेकरून नावाडी व ट्रॅव्हल कंपन्यांच्या साट्यालोट्यांचा त्रास – पायी व छोट्या वाहनाने परिक्रमा करणाऱ्यांना होऊ नये. तसेच आज केवळ १२ नावा चालतात, त्या वाढवून किमान २५ तरी व्हाव्यात.”

स्वामीजी म्हणाले, ” अभी गुजरातमे चुनावका मौसम चल रहा है। चुनाव होनेके पंद्रह बीस दिन बाद अपन उस समयके मुख्यमंत्रीसेही सीधी बात करेंगे। विमलेश्वरमें बडा आश्रम तो हम खुदही बना देंगे।”

गेल्या दोन दिवसांपासून वमलेश्वर / विमलेश्वरच्या गर्दीमुळे मी फारच चिंतित होतो. यावर काय तोडगा निघू शकतो? म्हणून मी भरपूर जणांना फोन केले होते. आपण यावर काय करू शकतो?  हे चाचपडणे सुरू होते.

अशा वेळी नर्मदेने त्या क्षेत्रातला सुप्रीम बाॅसच माझ्याकडे पाठवून दिला. ११७ वर्षांचा हा तरुण आपल्या वयाच्या अर्ध्याहूनही लहान, नाव किशोर पण स्वतःला प्रौढ समजायला लागलेल्या मला, नर्मदाप्रेरित सामाजिक कार्यासाठी नवचैतन्य भरत होता. …… 

… नर्मदामैय्याके मनमें क्या चल रहा है, यह तो बस वहीं जानती है! 

नर्मदे हर! नर्मदे हर ! नर्मदे हर !         

– श्री किशोर पौनीकर नर्मदापूरकर, नागपूर 

संग्रहिका : सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्वतःला ओळखा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्वतःला ओळखा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट☆

कित्येक दिवसांपासून रोज मनाशी ठरवित होते,आज तरी नक्की करु करु म्हणत साचल्या गेलेली कामं करायचीच. शेवटी ह्या एक दोन दिवसात मनावर घेऊन जुन्या भाषेत पदर खोचला,कंबर कसली वगैरे वगैरे…….

शेवटी एकदाचा अत्यावश्यक कामाला मुहूर्त निघाला. कधीची दारावर नेमप्लेट नव्हती, ती अगदी फुरसत काढून करायला टाकली, छान हव्वी होती तशी मनासारखी नेमप्लेट बसवल्याने एकदम दिल खुश.

खरंच म्हंटली तर अगदी लहानशी साधीसुधी पण अत्यावश्यक गोष्ट, नेमप्लेट म्हणजे नावाची पाटी.  आपल्या घरी पहिल्यांदा येणाऱ्या व्यक्ती, कुरीयर आणणारी व्यक्ती किंवा  पोस्टमन ह्या सगळ्यांच्या आणि आपल्या सोयीसाठी हवीच असणारी  ही बाब.

नावाची पाटी बघितल्यावर एकदम मनात विचार आला,ही असते आपली ओळख. पण खरंच व्यक्तीचं नाव हीच असते का फक्त त्या व्यक्तीची ओळख ?

व्यक्ती ची ओळख ही नावामुळे तर होते पण त्याचबरोबर त्याच्या दिसण्यावरुन, वागण्याबोलण्या वरुन, त्याच्या एकूण व्यक्तीमत्वावरुन,स्वभावावरुन,कर्मावरुन पण ओळख ही ठरतेच. अगदी सुरवातीला जन्माला आल्याबरोबर आपल्याला नाव आडनाव मिळतं ही आपली पहिली ओळख. स्त्रियांना लग्नानंतर पण आडनाव बदलून अजून एकदा नावावरून ओळख मिळते.

माणसाला ओळख त्याच्या हुशारीवरुंन, कर्तबगारीवरुन,सफलतेवरुन वा यशस्वी झाल्यावर पण मिळते.

व्यक्तीला ओळख ही त्याच्या स्वभावावरुन पण मिळते. त्यामुळे व्यक्तीच्या कायम स्मरणात राहणाऱ्या गोष्टी ही त्याची ओळख बनते.

ह्या ओळखीवरच मागेही एकदा एक पोस्ट लिहीली होती.त्यातील काही भाग परत एकदा ह्यात आलायं.

मागे एकदा गौरगोपालदासजींची छान बोधपर क्लिप बघण्यात आली. त्यात त्यांनी उदाहरण देऊन समजावून सांगितले की बहुतांश लोकांची धडपड ही दुसऱ्या सारखे बनण्यासाठी सुरू असते. मान्य आहे प्रत्येकाचे कोणी ना कोणी आयडाँल म्हणजेच आदर्श असतात. ह्या आदर्शवत व्यक्तींच्या व्यक्तीमत्वा मुळे ,सदगुणांमुळे आपल्याला भुरळ पडते आणि आपण आपली सगळी ताकद, एनर्जी ही त्या आदर्शमागे धावण्यात घालवतो आणि शेवटी खरोखरच थकून जातो. आपण त्या व्यक्तीची काँपी करुन संपूर्णतः त्या व्यक्तीसारखे बनण्याच्या नादात आपले कलागुण, आपली ओळख आपली ओरिजनँलिटी घालवून बसतो. बस आपली स्वतःला घडवितांना  सगळ्यात मोठी चूक हीच असते.

एकदा असचं सहज झेरॉक्स काढताकाढता सहज लक्षात आलं मूळ प्रतीची काँपी करुन झेरॉक्स कामं तर भागलं पण मूळ प्रतीच्या क्वालिटी ची सर झेरॉक्स ला नाही.

बँकेच्या कामकाजात ग्राहकांची ओळखपत्रे घेणे,त्यांची ओळख पटवून घेणे ही नित्याचीच बाब.पण खरचं ओळखपत्रांवर अवलंबून असलेली एवढीच असते आपली ओळख?, निश्चितच नाही. आपली स्वतःची ओळख ही त्यापलीकडे पण स्वतःला तरी निश्चितच व्हायला हवी.बरेचदा अनूभवांती लक्षात येत व्यक्ती ह्या आपली स्वतःची ओळख सांगतांना आपल्या स्वतःबद्दल कमी बोलून आपली ओळख इतरांना माध्यम बनवून, त्यांचा परिचय देऊन केला जाते.

मुळात प्रत्येक व्यक्ती ही बहुआयामी असते. तिच्यामध्ये अनेक सुप्त गुण दडलेले असतात. फक्त गुणांवर,कौशल्यावर थोडी राख बसलेली असते, ती राख प्रयत्नपूर्वक एकदा का झटकली तर तुमच्यातील कलागुण, वैशिष्ट्य ही ठळकपणे जाणवायला लागतात. स्वतःची ओळख तयार करणं हे फारस कठीण नसतं, फक्त आपण त्याचा इंन्फेरीअर काँम्प्लेक्समुळे बाऊ करतो. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल,स्वतः मधील स्व ला प्राधान्य, महत्त्व द्याल.

मला विचाराल तर मी ठामपणे सांगेन मी माझ्या लेखनामुळे फार काही मोठी लेखिका नाही बनू शकणार, पण एक निश्चित मी माझी निराळी आगळीवेगळी लेखनशैली तर निर्माण करूच शकते.

थोडक्यात काय तर तुम्ही इतरांना स्पेस आवर्जून द्या पण त्याचबरोबर स्वतःमधील स्व ला सुद्धा प्राधान्य द्या.तुम्ही जर स्वतः वर प्रेम केलतं तरच जग पण तुम्हाला मान देईल महत्त्व देईल हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

18/12/2022

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नात्यांची “स्माईलिंग फोडणी!”… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ नात्यांची “स्माईलिंग फोडणी!”… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

आमटीला फोडणी घातली की कसा चर्र असा आवाज येतो, आणि घरभर घमघमाट सुटतो. तेल, मोहरी, जिरं, हिंग, मेथी, कढीपत्ता, मिरची, हळद यांचा स्वतःचा गंध आणि त्यांच्या एकत्रित झालेल्या सुवासानं सगळ्यांच्या नाकाचा ताबा घेतला जातो!!

 ही अशी स्वैपाकातली फोडणी, मग ती भाजीची असो वा आमटीची, सगळ्यांचीच भूक चाळवते, भुरळ घालते, एकत्र आणते आणि तृप्त करते. 

नाती पण अशीच हवीत ना !! सगळ्यांना जवळ आणणारी, एकत्र ठेवणारी, हवीहवीशी वाटणारी, तृप्त करणारी !!

— फक्त “अंदाज” बरोबर यायला हवा. प्रत्येक घटक अंदाजानेच, पण प्रमाणात पडायला हवा. नाही समजलं?? अहो, समजा फोडणीत मोहरी, जिरंच जास्तं पडलं, तर भाताशी, पोळीशी खाताना किंवा अगदी पिताना, जिरं मोहरी सारखं दाताखाली आलं तर वैतागायलाच होतं, म्हणून ते प्रमाणातच घालायला हवं. नात्यातही तसंच असतं. कुठल्या नात्यात किती इंटरफिअर करायचं (नाक खुपसायचं) हे समजलं की कोणतंच नातं खुपत नाही.

हिंग कितीही औषधी असला तरीही जास्त पडला की तोंड वाकडं करुन डोळे मिटले जातात आणि राग येतो !!! आपणही कधीतरी प्रमाणाबाहेर बोलतो, पद्धत सोडून बोलतो, तीव्र बोलतो आणि मग ते बोलणं कितीही समोरच्याच्या भल्यासाठी असलं तरी, नात्यांमधे वितुष्ट यायला वेळ लागत नाही.

मेथी जराजरी जास्त पडली, तर जेवणात कडवटपणाच येतो. आपणही कधी कधी राग आला की अगदी टाकून बोलतो, टोकाचं बोलतो, इतरांच्या मनाचा विचार करत नाही. मग नात्यात अढी निर्माण होतेच ना!! अगदीच कबुल आहे, आपल्या माणसांना हक्कानं बोलावं…पण प्रमाणात. एक वेळ स्वैपाक कडवट झाला तरी चालेल, पण नाती नको!! 

कढीपत्ता हा सुगंध येईल इतकाच घालावा, नाहीतर जेवण उग्र होतं. माणूस हा कायमच प्रेमात पडत असतो, कधी व्यक्तींच्या, तर कधी वस्तूंच्या !! एकमेकांवर अतोनात प्रेम करणं वेगळं आणि प्रेमात गुदमरायला लावणं वेगळं !! स्वतःला आणि इतरांना झेपेल इतकंच प्रेम करावं, नाहीतर नात्यातला सुगंध हरवून जातो.

हळदीचा रंग मोहक, अगदी प्रमाणात घातली की तिच्या गुणांबरोबर तिचं अस्तित्वही प्रेमात पाडतं. गरज असेल तेव्हा मदत जरुर करावी, पण समोरच्याला “स्पेस” ही द्यावी. आपण आहोत, आपलं अस्तित्त्वं आहे, इतकं जरी समोरच्याला जाणवलं ना, की मग सगळंच सोप्पं होतं.

तेलही आवश्यक इतकंच !! भसाभसा ओतून किंवा अगदी थेंबभर घातलं की फोडणी बिघडलीच म्हणून समजा !!  जास्त तेल पडलं तर मूळ पदार्थापेक्षा तेलाचीच चव जिभेवर रेंगाळेल, आणि कमी पडलं तर ते इतर घटकांना सामावून कसं घेणार?? नात्यात ओशटपणा नको. आपल्यात इतरांना सामावून घेण्याइतका मोठेपणा असावा, पण आपण किती महान आणि किती चांगले हे त्यांना न जाणवता, कसलाच दिखावा न करता !! तरच मनं एकमेकांत सामावली जातील.

आपल्या स्वैपाकात मिरचीचं प्रमाण कसं आणि किती असावं ?  तसंच मुळमुळीत नाती नकोशी होतात अन तिखटपणा, जहालपणा नात्याला सुरुंग लावतो. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आच !! फोडणी फक्कड तेव्हाच जमते, जेव्हा भांड्याखालची आच योग्य प्रमाणात असते अन भांडं योग्य प्रमाणात तापतं तेव्हा !! जर आच प्रमाणापेक्षा कमी असेल, तर फोडणी कच्चीच राहील आणि सगळ्या स्वैपाकाची मजाच जाईल. जर आच प्रमाणापेक्षा जास्त असेल तर रागाप्रमाणे त्यातला प्रत्येक घटक तडतडून अंगावर उडेल, इजा होईल, मोहक हळद काळी पडेल आणि फोडणी जळेल. 

—आपल्या नात्यातही आच योग्यच हवी.—-  नाती कच्चीही रहायला नकोत अन जळायलाही नकोत. 

— तरच नात्यांची फोडणी अचूक जमली, असं म्हणता येईल.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares