मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिवरात्र आणि ऊसाचा रस – सुश्री विनीता क्षीरसागर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ शिवरात्र आणि ऊसाचा रस – सुश्री विनीता क्षीरसागर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

पूर्वी शिवरात्र आणि उसाचा रस हे जणू समीकरणच ठरलेले होते. म्हणून लहानपणी आम्ही अगदी वाट बघत बसायचो, शिवरात्रीची….!                     

पूर्वी उपवासाचे पदार्थ अगदी पोटभर असे मोठी एकादशी, शिवरात्र, अशा मोठ्या उपवासालाच मिळायचे………….! नाहीतर एरवी मोठ्या माणसांना फराळासाठी केले की एकेक घास हातावर मिळायचा…….! आता कसे आपण एरवी सुध्दा साबुदाणा खिचडी करतो..! किंवा बाहेर हॉटेलमध्येसुध्दा खिचडी, साबुदाणा वडे इ… सगळे काही मिळते……! पूर्वी अगदी आई, आजी राजगिऱ्याच्या लाह्या सुध्दा घरी फोडायच्या……!                                                                        

शिवरात्रीला आजीबरोबर  सगळ्यांनी रामेश्वर मंदिरात जायचे….. आल्यावर साबुदाण्याची खिचडी, बटाटा भाजी, कवठाची पाट्यावर वाटलेली चटणी, घरी केलेल्या तळलेल्या पापड्या, खाडिलकरांकडून विकत आणलेले ताक, रताळयाचे गुळाच्या पाकातले काप ह्यावर अगदी पंगत मांडून यथेच्छ ताव मारायचा एवढेच होते…!

नंतर दुपारी सगळी मोठी मंडळी डाराडूर पंढरपूर म्हणून झोपून जायची………..! घरातली लहान मुले मात्र केव्हांच एकदाचे साडे चार  वाजून जातायत  ह्याची वाट बघत घड्याळ बघत बसायची……! कारण  दुपारी पाच वाजून गेले की घरी उसाचा रस आणायचाच हे शिवरात्रीला ठरले असायचे…..! तोही एक कार्यक्रम च असायचा….! स्टीलची एखादी मोठी लोटी घेऊन गुऱ्हाळात जायचे, जाताना बर्फासाठी एखादा मोठा कापडी रूमाल किंवा पिशवी घेऊन जायची……!  त्या वेळी आमच्या घराच्या जवळ म्हणजे धर्म चैतन्याच्या कोपर्‍यावर एक गुऱ्हाळ सुरू झालेले असायचे. तट्टे ठोकून केलेल्या भिंतभर रंगीबेरंगी कॅलेंडर्स, देवांची चित्रे लावलेल्या त्या गुऱ्हाळात जायला खूप छान वाटायचे……..! आई त्याला गेल्या बरोबर “ताजा काढून देरे बाबा रस” म्हणून बजावायची….. तसेच न विसरता त्यात आले लिंबू टाकायला सांगायची……….! त्याचा रस चक्रातून काढणे……., भुश्श्यातला तरटात गुंडाळलेला बर्फ फोडणे हे जवळून बघायला खूप मजा वाटायची…..!  त्या वेळी फ्रीज नव्हते म्हणून बर्फ बाहेरून च विकत घ्यावा लागे……………! गुऱ्हाळात सुध्दा बर्फाचे वेगळे पैसे द्यावे लागत……! … असे सगळे करून एकदाचा रस घरी यायचा……….!                                 घरातले चहाचे कप रसासाठी सज्ज असायचे….! बर्फ पाण्याने स्वच्छ धुवून फोडून झाला की रसाचे कप भरून सगळयांना रसाचा वाटप व्हायचा……!..

….. रस पिऊन मन तृप्त व्हायचे व आता खरी शिवरात्र साजरी झाली असे वाटायचे………! दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर “काल आमच्या कडे उसाचा रस आणला होता.” हे न चुकता सांगण्यात एक धन्यता वाटायची…………! कारण पूर्वी उसाचा रस पिणे ही सुध्दा एक चैनच वाटायची……..! बैलाच्या चरकावरचा रस पिण्यासाठी आम्ही सगळे… घरातले लोक  लक्ष्मी रोड जवळच्या इलेक्ट्रिक आॉफीसजवळच्या गुऱ्हाळात जायचो…….! ते सुध्दा सगळ्यांच्या वार्षिक परीक्षा झाल्यावर बरं का………!

लेखिका : सुश्री विनीता क्षीरसागर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ? — कवी रमण रणदिवे ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ? ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆  

भोजनाचा मनावर काय परिणाम होतो ?

यावर आपण एक उदाहरण बघू. तीन महिन्यांसाठी एक प्रयोग करून बघा. सात्त्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो. कारण जसे अन्न, तसे मन होते. सात्त्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही, तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते.

जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल, तर त्यास सात्त्विक अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक  करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात, उदास, नाराज होऊन स्वयंपाक करू नये. (जेवण बनवू नये. अन्न शिजवू नये.)

तसेच स्वयंपाक करत असताना कधीही आईला, बहिणीला, पत्नीला (जे कोणी स्वयंपाक करत असतील, त्यांना) ओरडू नये, रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना, त्या पदार्थांत त्याच प्रकारची (सर्व रागाची) स्पंदने जातात आणि तेच आपण खाणार असतो. ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

आणि म्हणूनच पूर्वी सोवळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती.

भोजन तीन प्रकारचे असते.

(१) जे आपण हॉटेलमध्ये खातो,

(२) जे घरात आई, पत्नी बनवते आणि

(३) जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो, ते भोजन.

तिन्ही भोजनांत वेगवेगळी स्पंदने असतात.

(१) हॉटेलमध्ये पदार्थ बनवतात, ते विकत घेऊन खावे लागते. ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत. त्यामुळे कधी कधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो. ते पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याचा भाव कोणता आहे, ते सगळं त्या अन्नात उतरतं, तेच संस्कार त्या अन्नावर होतात. तोच भाव आपल्यात उतरतो.

(२) घरात आई, पत्नी जे पदार्थ करते, ती फार प्रेमाने करत असते. म्हणून त्या पदार्थांत सात्त्विक स्पंदने असतात, ती आपणास समाधानी बनवतात. 

परंतु हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात. त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत.

घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल, की मला अजून एक पोळी वाढ. तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो. ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते. त्यात तिचे प्रेम असतं, आनंद असतो. पण हेच आपण स्वयंपाक्याकडे मागितले, तर तो वाढेल; पण त्यात प्रेम असेलच, असे नाही. असे जेवण अंगी लागत नाही.

(३) मंदिरात अन्नकोटात आपण जे खातो, तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो. ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते.

आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत, असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा किंवा नामस्मरण करत स्वयंपाक करावा म्हणजे रोज प्रसादच भक्षण होईल.

स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल, तर त्यावर हा एक उपाय आहे. ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा.

परमेश्वरास प्रार्थना करावी, की हे अन्न खाणाऱ्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम , वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे. त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता, तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा.

अन्नात जादू आहे आणि त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्कारांचाही परिणाम होतो. स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे भाजी असो, कुकर असो, काही असो, त्या पात्राला हात लावून कृष्णार्पणमस्तु म्हणून नमस्कार करा. मग बघा, काय जादू होते.. 

सगळी आसपासची सूक्ष्म स्पंदनं संपून जातील आणि उरेल किंवा तयार होईल प्रसाद !

संग्रहिका : माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्योती कलश छलक… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ ज्योती कलश छलक… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

पूर्वी दूरदर्शनवर राष्ट्रीय साक्षरता मिशन या कार्यक्रमाच्या प्रचारार्थ एक गाणं दाखवलं जायचं. मला ते फार आवडायचं. ते गाणं होतं ‘ पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा , जागी हर दिशा दिशा , जागा जग सारा. ‘ त्या गाण्यात सकाळच्या सूर्याचा सोनेरी प्रकाश,छोट्या मुलांचं पाटीवर मुळाक्षरं गिरवणं , त्या वृद्ध आजोबांचा हसतमुख चेहरा, त्यांचं दाढी करताना साबणाचा फेस त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्याला लावणं, नंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवणं, त्या मुलाचा विलक्षण हास्याने उजळलेला चेहरा, त्याचं निरागस हास्य या गोष्टी मनाला खूपच स्पर्शून जात होत्या. काही काही गोष्टी अशा चिरकाल स्मरणात राहून जातात. तसेच ते ‘ मिले सूर मेरा तुम्हारा ‘ हे गाणं . भारतातील विविध भाषा, विविध भागातील प्रादेशिक प्रथितयश कलाकार आणि गायक आणि विविध नयनरम्य दृश्ये यामुळे ते गाणं अमर झालं आहे. भारतातील विविधतेतील एकतेच दर्शन घडवण्यात त्या गाण्याचा दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.

तसेच ज्योती कलश छलके हे गाणं . सूर्य उगवल्यानंतरच्या दृश्याचं मनोरम वर्णन त्या गाण्यात आहे. अशी खूप गाणी आहेत. जी सकाळची वेळ दाखवतात. सूर्य उगवला आहे, आणि त्याबरोबर सारी सृष्टी कशी चैतन्यात न्हाऊन निघाली आहे हे बहुतेक गाण्यातून दाखवले आहे. अशी मन प्रसन्न करणारी भक्तिगीते तर भरपूर आहेत. गणपतीला भूपाळी म्हणताना ‘ तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्वदिशी फडकती, अरुण उगवला, प्रभात झाली , उठ महागणपती. ‘ किती सुंदर वर्णन हे ..! शब्दातलं सौंदर्य बघा. गणपतीचा वर्ण लाल, आरक्त. तशीच पूर्व दिशा सकाळच्या वेळी लाल, आरक्त झाली आहे. जणू रक्त पताका म्हणजे लाल रंगाच्या पताका पूर्व दिशेला सूर्यदेवाच्या आगमनाने फडकत आहेत.

तर दुसऱ्या एका अवीट गोडीच्या भक्तिगीतात श्रीरामाला जागवताना, ‘ उठी श्रीरामा, पहाट झाली, पूर्वदिशा उजळली, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली ..’ त्याच गाण्यात पुढे ‘ चराचराला जिंकून घेण्या अरुणप्रभा उगवली.. ‘ असे शब्द आहेत. खरोखर सूर्योदय झाला की त्याची प्रभा, प्रकाश जणू चराचर जिंकून घेतो. चराचरात चैतन्य आणतो. धरतीवरच निद्रिस्त जीवन जागृत होतं . फुलं उमलतात, पक्षी गाऊ लागतात. देवळातल्या घंटा निनादू लागतात. काही काळापूर्वी सगळीकडे पसरलेलं अंधाराचं साम्राज्य कुठे नाहीस होत ते कळत नाही. ‘ फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..’ दरीखोऱ्यात मग सगळीकडे प्रकाशच प्रकाश भरून राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे तो सोबत येतांना नव्या दिवसाबरोबर नव्या आशा घेऊन येतो. नव्या आशा, नव्या दिशा आणि जीवनाचे नवे गाणे.

वसंतराव देशपांडेंनी गायलेलं ‘ तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज..’ हे गाणं मनाला स्पर्शून जातं .  कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे पद पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलं आणि त्याला संगीतसाज चढवला आहे जितेंद्र अभिषेकी बुवांनी. ललत पंचम रागातील हे गीत कधीही ऐकलं तरी आनंद देणारं . हा तेजोनिधी एकदा आकाशात प्रकटला की अवघे भुवन म्हणजे जग त्याच्या दिव्य स्पर्शाने झगमगून जातं .

आपण भारतीय किती भाग्यवान आहोत, याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. जगातील अनेक देशात फार कमी मिळणारा सूर्यप्रकाश आमच्या देशात जवळपास बारा महिने  मुबलक उपलब्ध आहे. हे आमचे केवढे भाग्य आहे. आणि आता तर उन्हाळा सुरु झाला आहे.  आम्ही सूर्योपासनेच्या बळावर कोरेनासारख्या  संकटाचा यशस्वी मुकाबला करू शकलो. सूर्यनमस्कारासारखा व्यायाम आम्हाला शक्ती देईल. आमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल. कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरायला जाणे आमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल.

 सूर्य हा अनंत काळापासून आपला शक्तीदाता आहे, बुद्धिदाता आहे, आरोग्यदाता आहे. तो आहे तर पृथ्वीवर जीवन आहे. म्हणूनच तो खऱ्या अर्थाने ‘ मित्र ‘ आहे. सकाळी उठल्यावर प्रकाशमान, चैतन्यदायी असं काही आपल्याला दिसत असेल, तर ते म्हणजे पूर्वेला उगवलेला सूर्य. केवढ्या तेजानं ती पूर्व दिशा उजळली असते..! अशा वेळी आपणही त्या तेजाचं दर्शन घ्यावं. त्या तेजात न्हाऊन घ्यावं. त्याला थोडी प्रार्थनाही करावी. की बाबा, या तुझ्या विलक्षण तेजातला काही अंश तरी आम्हाला दे. आमचेही अंतर असेच उजळू दे. त्यातील अमंगल, वाईट विचार, निराशा यांचा अंध:कार तुझ्या तेजात नष्ट होऊ दे. आम्हाला आरोग्य प्रदान कर. रोगराई नष्ट होऊ दे. सर्वांचं मंगल कर, सर्वांचं कल्याण कर.

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

 ©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मला भावलेलं इंग्लंड” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “मला भावलेलं इंग्लंड” ☆ श्री मोहन निमोणकर ☆

मागच्या वर्षी मी आणि बायको संजीवनीची इंग्लंडला जायची तिसरी वेळ होती. मुलगा आशिष फिजिओथेरपीमध्ये एम.एस. करून तिथं नोकरी करतोय, तर सून निवेदिताही तिथंच वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करते. दोघांनी तिथं नवीन संसार सुरु केल्यानं त्यांचं कौतुक करायला आणि चिरंजीव अभिनवला भेटायला आम्ही इंग्लंड गाठलं.

इंग्लंडमध्ये भौगोलिकदृष्ट्या पाहण्यासाठी ब-याच गोष्टी आहेत. पण यंदा आम्हाला तिथल्या सामाजिक आणि सार्वजनिक गोष्टी खूपच भावल्या. किंबहुना याच तिथलं वेगळेपण सिध्द करायला पुरेशा ठरल्या. एखाद्या देशाची ठरलेली जीवनशैली आणि स्वभाव असतो, यामध्ये इंग्लंड खरंच चारचौघांपेक्षा भिन्न ठरतो.

इंग्लंडमध्ये ढोबळमानानं चार ऋतू आहेत. समर, ऑटम, विंटर आणि स्प्रिंग. समरमध्ये पहाटे पाच वाजताच उजाडतं आणि रात्री १० वाजता अंधार पडतो. ऑटम, विंटर आणि स्प्रिंगमध्ये उशीरा उजाडतं आणि अंधारही लवकर म्हणजे दुपारी चार वाजताच पडतो. विंटरमध्ये तापमान सर्वात जास्त म्हणजे पाच ते सहा अंश तसंच कमी म्हणजे उणे असतं. इंग्लंड उत्तरध्रुवाजवळ असल्यानं तिथं खूप थंडी असते. समरमध्ये मात्र तापमान १८ अंश झालं, तरी लोकांना उष्णतेची लाट आल्यासारखं वाटतं. आम्हाला इथं एक गोष्ट नवीन वाटली. ती म्हणजे, दिवस लवकर वा उशीरा उजाडण्याचा, मावळण्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून वर्षातून दोनदा घड्याळ ऍडजस्ट केलं जातं. मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारी घड्याळ एक तास मागं करतात. सार्वजनिक बागांमध्येही बागा उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा उजेडानुसार बदलतात. तशा प्रत्येक महिन्याच्या वेळांचा बोर्ड आगाऊच लावलेला असतो. वर्षभरात पाऊस कधीही येतो; परंतु वेगळा असा पावसाळा हा ऋतू इथं नाही.

इंग्लंडची वाहतूक व्यवस्था जगातील उत्तम व्यवस्था म्हणावी लागेल. महाग आहे; पण अतिशय उत्तम. रेल्वेचं नेटवर्क हे खाजगी कंपन्यांकडे सोपवलंय. त्या कंपन्या म्हणजे सदर्न रेल, साउथ इस्टर्न रेल्वे, नॉर्दन रेल, ग्रेट वेस्टर्न रेल्वे आणि व्हर्जिन रेल्वे. या पाच खाजगी कंपन्या सर्व युकेचा रेल्वेचा प्रवास सांभाळतात. रेल्वे डब्यांची स्थिती अतिशय उत्तम. दारं आपोआप उघड-बंद होतात. त्यामुळे पळत येऊन गाडीला लटकत गाडी पकडणं हा प्रकार नवीन नाही. याव्यतिरिक्त लंडन ट्यूब रेल्वेही म्हणजे ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ इतर कंपन्यांचा भार हलका करते. ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ ही खाजगी कंपनी इंग्लंडमधील बसवाहतूक सांभाळते. बसमध्ये लहान मुलांच्या बाबा गाड्यांनाही प्रवेश प्राधान्यानं असतो. चढण्या-उतरण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, शिवाय उतरण्याचा आपला स्टॉप येण्यापूर्वी आपल्या सीटजवळील बटण दाबलं, की ड्रायव्हरला मेसेज जातो आणि तो बस स्टॉपवर थांबवतो. ड्रायव्हरच तिकिटं पाहतो आणि काढतोही.

रेल्वे आणि बसच्या तिकिटांचे दर हे वेळेनुसार (गर्दीच्या) कमी-जास्त असतात. तसंच, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी कमी असतात. एखादी ट्रेन रद्द झाली आणि रात्रीनंतर ट्रेन नसेल, तर पर्यायी व्यवस्था स्टेशनबाहेर केलेली असते. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत वा-यावर सोडलं जात नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये पादचा-यांना फार महत्त्व दिलं आहे. रस्ता क्रॉस करण्यासाठी ‘सेल्फ ऑपरेटेड सिग्नल्स’ आहेत. या गोष्टी आम्हाला खूपच भावल्या. एखाद्याला कार रिव्हर्स घ्यायची असेल आणि तो रस्ता कितीही वाहता असेल, तरी त्याचं रिव्हर्स घेणं पूर्ण होईपर्यंत सर्व गाड्या थांबतात आणि कुणीही हॉर्न वाजवत नाहीत, हे विशेष. रस्ते आपल्याएवढेच, तरीही लहान-मोठी वाहनं बिनबोभाट जा-ये करत होती. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कठीण अशा परीक्षेला सामोरं जावं लागतं. पहिल्या फटक्यात लायसन्स मिळणारा अगदी विरळाच.

आपल्या घराबाहेर रस्त्यावर गाडी पार्क करायलाही वर्षाला ४० पौंड द्यावे लागतात. ठिकठिकाणी पार्किंगच्या सोयी केल्या आहेत. गर्दीच्या वेळी पैसे आणि एरवी फुकट! वीज आणि गॅस वापरण्यासाठी बिलिंगची पध्दत नाही, तर एक प्रीपेड कार्ड असतं आणि त्यात जेवढा टॉप अप तुम्ही केला असेल तेवढीच वीज आणि गॅस तुम्हाला वापरता येतो. केंटमधल्या ग्रेव्हज् एंड इथं आमचं वास्तव्य होतं. लंडनपासून रेल्वेनं एक ते दीड तासाच्या अंतरावर दक्षिणेला हे ठिकाण आहे. त्या शहरात कचरा संकलनाची अतिशय उत्तम सोय आहे. प्रत्येक भागासाठी आठवड्यातून एक ठराविक वार कचरा संकलनासाठी ठरवलेला असतो. दोन मोठ्या पेट्या त्यासाठी कौन्सिलतर्फे पुरवल्या जातात. एकात रिसायकल होणारा आणि दुस-यात रिसायकल न होणारा असं एकआड एक दर आठवड्यानं असं कचरा संकलन केलं जातं. रिसायकल होणा-या गोष्टींची आणि न होणा-या गोष्टींची यादी कौन्सिलतर्फे वेळोवेळी प्रसिध्द केली जाते.

इथं दैनंदिन जीवनातल्या ब-याच गोष्टी स्वत:च्या स्वत:ला कराव्या लागतात. नोकर-चाकर, मोलकरीण कुणी ठेवत नाहीत. कुणी ठेवलीच, तर त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्यामुळे भांडी घासणं, घराला रंग देणं, सायकलचं पंक्चर काढणं, सायकल आणि कारमध्ये हवा भरणं इत्यादी गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. एवढंच काय, तर पेट्रोल पंपावर पेट्रोलही आपल्यालाच भरायला लागतं. नंतर बिल दुकानात नेऊन द्यायचं. आशिषनं कार खरेदी केल्यावर दुस-याच दिवशी तो आणि निवेदिता पंपावर जाऊन पेट्रोल कसं भरायचं हे शिकून आले होते. घरात पाहुणे आल्यावर, आपल्याला जेवणानंतर भांडी घासताना पाहून तेही पहिल्या दिवसानंतर आपल्याला आपोआप मदत करू  लागतात.

इंग्लंडमधील अशा ब-याच गोष्टी आपल्याला भावतात. त्यांचं अप्रुप आपल्याला वाटतं. तरीही अखेर आपलं आपल्या मातीशी असलेलं घट्ट नातंच वरचढ ठरतं. तीन महिन्यातच आपल्याला मायदेशातील घराची आठवण येते आणि सहा महिने काढायचे असले, तरी काऊंटडाऊन तेव्हाच सुरु होतं, परतण्यासाठी ..…

         

 ©️ श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-3 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-3 ☆ श्री राजीव गजानन पुजारी

(मी रांगेत जाऊन मसाला डोसा घेतला व एका टेबलावर येऊन खायला सुरुवात केली.) इथून पुढे —-

माझ्या शेजारीच शार मध्ये काम करणारे एक गृहस्थ, त्यांची पत्नी व त्यांची छोटी मुलगी येऊन बसले. आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. त्यांचे नाव संग्राम असून ते मूळ ओरिसाचे आहेत. त्यांना उत्तम हिंदी येते. ते SHAR मध्ये VAB(vehicle assembly building) मध्ये कामाला आहे व इस्त्रो क्वार्टर्स मध्ये राहतात. मी महाराष्ट्रातील सांगलीहून निव्वळ लाँच बघायला आलोय याचे त्यांना फार कौतुक वाटले. मी एकटाच आलोय म्हटल्यावर त्यांच्या पत्नीने ‘परत आला तर पत्नीला घेऊन या व आमच्याच घरी उतरा’ असे सांगितले. ओळख पाळख नसतांना एवढे अगत्यपूर्ण आमंत्रण ओरिसातील माणसेच करू जाणोत. ओरिसाच्या आदरतिथ्याचा अनुभव मी कासबहाल येथे ट्रेनिंगला गेलो असताना अनुभवला होता. त्यावेळी ट्रेनिंग दरम्यान दिवाळी आली होती व आमच्या एका प्रोफेसरनी आम्हा सर्वांना त्यांच्या घरी अगत्याने फराळाला बोलावले होते. असो. मसाला डोसा खात असताना स्वयंपाक घरातील एक डिलिव्हरी देणारा माणूस मला हुडकत आला व माझ्यासमोर आणखीन एक मसाला डोसा ठेवून गेला. तो काय बोलला ते मला कळलं नाही. पण संग्राम म्हणाले, ” तुम्ही दोन रोटींची ऑर्डर दिली होती. ती कॅन्सल केल्यावर आणखी दहा रुपयांचे कुपन तुम्हाला दिले. एक मसाला डोसा पन्नास रुपयांना मिळतो. तुम्ही एकच डोसा घेऊन आलात म्हणून हा माणूस दुसरा डोसा घेऊन आला आहे. मला हसावे कि रडावे ते कळेना. नाईलाजास्तव दुसरा डोसा पण खावा लागला. मसाला डोशाची भाजी आपल्याकडे असते तशी सुक्की नसते तर आपण कांदा बटाटा रस्सा करतो तशी पण जरा घट्ट अशी असते. संग्राम यांच्याशी बोलल्यावर कळलं की तुम्हाला फक्त रोटी किंवा चपातीचे कुपन मिळते, त्याचे बरोबर भाजी व आमटी मिळतेच. कुपनावर त्याचा उल्लेख नसतो. शेजारच्या टेबलावर एक मुलगा भाजीबरोबर चपाती खात होता. बघतो तर आपण घरी करतो तशीच चपाती होती. असो. त्या दिवशी दोन मसाला डोसा खाण्याचा योग होता हेच खरे. जेवून उठताना श्री संग्राम यांनी आवर्जून माझा फोन नंबर घेतला व त्यांचा मला दिला. ती छोकरी पण ‘बाय अंकल’ म्हणाली. जेवण करून रूमवर आलो थोडा वेळ टी.व्ही. बघून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी माझी ट्रेन होती (पिनाकिनी एक्स्प्रेस) मी साडेनऊ वाजता लॉज सोडले व रिक्षाने स्टेशनला आलो. वेळ होता म्हणून फिरत फिरत तेथून जवळच असलेल्या एस्. टी. स्टॅन्डला गेलो व शारला जायला इथून एस्. टी. ची सोय असते का याची चौकशी केली; तर तशी कांही सोय नसते व आपणास रिक्षाने जावे लागते असे कळले. परत स्टेशनवर आलो. गाडी पाऊणतास लेट होती. ती बाराला आली. गाडीत एक आय.टी. इंजिनियर व त्यांचा आठ वर्षाचा मुलगा असे माझ्यासमोरील सीटवर बसले होते. माणूस आय.टी. इंजिनियर असूनही विजयवाडा येथे कॉलेजमध्ये शिकविण्याचे काम करत होता. ती त्यांची आवड होती. ते दोघे शेगांव येथे एका लग्नासाठी चालले होते. घरी लहान बाळ असल्याने पत्नी घरीच थांबली होती. मी त्यांना गजानन महाराजांच्या समाधी विषयी माहित आहे का असे विचारले. त्यांना त्या भागाची काहीच माहिती नव्हती. मग मी त्यांना गजानन महाराजांविषयी माहिती सांगितली व समाधी मंदिराचे नक्की दर्शन घ्या असे सांगितले. शेगांव कचोरी पण आवर्जून टेस्ट करा असेही सांगितले.   झालेला बराचसा उशीर गाडीने भरून काढला व एकच्या ऐवजी सव्वाला गाडी चेन्नई सेंट्रलला पोहोचली. माझे पुढची ट्रेन शताब्दी एक्सप्रेस संध्याकाळी साडेपाचला होती चेन्नई सेंट्रलला एक सोय चांगली आहे ती म्हणजे सर्व प्लॅटफॉर्म्स समपातळीत आहेत, त्यामुळे जिने चढउतार करावे लागत नाहीत. मी वेटिंग हॉलमध्ये ‘इंडिया टुडे’ चाळत असतांना एक युवक माझ्या शेजारी येऊन बसला व मला विचारले ‘तुम्ही केरळचे का?’  मी म्हटलं, ‘नाही, पण आपण असे का विचारत आहात?’ तो म्हणाला, ‘तुम्ही केरळी दिसता म्हणून विचारलं.’ चला, मला माझ्याविषयी एक नवीनच माहिती मिळाली. नंतर मी त्याला त्याची माहिती विचारली. तो केरळचा असून त्याने गेल्याच वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते व तो नोकरीच्या शोधात होता. अनेक ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा त्याला नोकरी मिळत नव्हती. मी त्याला त्याची आवड विचारली. तो म्हणाला, ‘ मला फॅब्रिकेशन विषयी आवड आहे.’ मी त्याला सुचवलं, ‘मग तू एखादे फॅब्रिकेशन शॉप का सुरू करत नाहीस? तसंही कोरोनानंतर बांधकाम व्यवसायात तेजी आली आहे, आणि बांधकाम म्हटलं कि, ग्रील, खिडक्या वगैरे आलंच.’ तो म्हणाला,’भांडवलाचं काय?’ मी म्हटलं, ‘हल्ली बँकांच्या कर्जपुरवठ्याच्या चांगल्या योजना आल्या आहेत. तू पण चौकशी कर.’ त्याचा चेहरा उजळलेला दिसला. मला पण बरं वाटलं. नंतर मी लंचसाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूला

‘ए टू बी म्हणून लंच हाउस होते तेथे गेलो. तेथे रांग होती. रांगेत उभेराहून चपाती,भाजी व शिरा यांचे कुपन घेतले. ऑर्डर सर्व्ह करणाऱ्याने एका डिस्पोजिबल प्लेटमध्ये सर्व वाढून दिले. बाजूला कट्ट्यावर ताट ठेवून उभेराहून खायचं. खरंतर मला हे असे उभेराहून वचा वचा खाणे आवडत नाही. खाणे कसे व्यवस्थित बसून असावे. पण साउथ मध्ये जास्त करून अशा पद्धतीने खायची पद्धत आहे. ‘व्हेन इन रोम वन मस्ट डू ॲज द रोमन्स डू’ असे म्हणून मी समाधान मानले व सव्वा पाचला ट्रेनमध्ये जाऊन बसलो. ट्रेनमध्ये  बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी होत्या. ते सर्व बेंगलोरला उतरून पुढे पुण्याला जाणार होते. ती सर्व मुले VIT कॉलेज वेल्लूरची होती. त्यांच्या टीवल्या बावल्या चालल्या होत्या, ते अनुभवण्यात वेळ छान गेला. साडेदहाला बेंगलोर आले. ईशा व योगेश स्टेशनवर आले होते. गाडीत भरपेट नाश्ता झाल्याने दूध पिऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला ईशाने उप्पीट केले होते. जेवायला पोळी भाजी व जिरा राईस होते. बऱ्याच दिवसांनी पोळी भाजी खाल्ल्याने बरे वाटले. रात्री आठच्या कोंडुस्कर स्लीपरचे रिझर्वेशन होते. ईशा व योगेश सोडायला आले होते. सकाळी साडेआठला सांगलीला पोहोचलो. एका स्वप्नाची इथे कर्तव्यता झाली.

नोंद :- 

१)श्रीहरीकोट्याला जाण्यासाठी मी मला सोयीचे म्हणून बेंगलोरला जाऊन चेन्नईला गेलो होतो.  काहीजणांना थेट चेन्नईला जाणे सोयीचे असेल तर तसं करायला हरकत नाही.

२) सुलुरूपेटा लॉजचा पत्ता – श्री लक्ष्मी पॅलेस, c/o लक्ष्मी थिएटर, शार रोड, सुलुरूपेटा -५२४१२१। जिल्हा -तिरुपती (आंध्र प्रदेश) प्रोप्रायटर – श्री दोराबाबू , फोन – 9985038339.

— समाप्त — 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पंगत आणि पार्टी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ पंगत आणि पार्टी… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

पंगत म्हणजे डिसीप्लीन- शिस्त.

पार्टी म्हणजे धांगडधिंगा… 

 

पंगत म्हणजे सहभोजन.

पार्टी म्हणजे स्वभोजन… 

 

पंगत म्हणजे बैठक ठोकून जेवावे.

पार्टी म्हणजे उभ्याउभ्यानेच हादडावे… 

 

पंगत म्हणजे शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक साजशृंगार

पार्टी म्हणजे सामाजिक दिखाऊपणाचा अधिभार… 

 

पंगत म्हणजे हवं तेवढं जेवा.

पार्टी म्हणजे हवंतर जेवा… 

 

पंगत म्हणजे उदबत्यांचा घमघमाट.

पार्टी म्हणजे बाटल्यांचा खणखणाट…

 

पंगत म्हणजे श्लोक म्हणायची घाई

पार्टी म्हणजे मोठ्या आवाजाची महागाई … 

 

पंगत म्हणजे एका रेषेत ताटे वाढलेली

पार्टी म्हणजे रांग लावून अन्न घेतलेली … 

 

पंगत म्हणजे ताटाला काढलेली रांगोळी

पार्टी म्हणजे रिकाम्या वाट्यांची रोषणाई … 

 

पंगत म्हणजे मिळते पावती तृप्तीची 

पार्टी म्हणजे गोष्ट कोल्हा करकोच्याची

कोल्ह्याला बाटलीतून दिलेल्या खिरीची…

 

पंगत म्हणजे हर हर महादेवा !

पार्टी म्हणजे डान्सचा जलवा… 

 

पंगत म्हणजे जय जय रघुवीर समर्थ !

पार्टी म्हणजे डीजे ,नाय तर सगळं व्यर्थ… 

 

पंगत म्हणजे निकोप स्पर्धा खाण्याची,

पार्टी म्हणजे भीती उपाशी राहण्याची… 

 

पंगत म्हणजे सत्व रजाची आरास..

पार्टी म्हणजे रज तमाची नुसती रास…

 

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ काटा रूते कुणाला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ काटा रूते कुणाला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. अग थांब चारूलते! तो मनोहारी भ्रमर ते कुमुदाचे कुसुम खुडताना उडून गेला पण माझं लक्ष विचलित करून गेला. त्याकडे पाहता पाहता नकळत माझं पाऊल बाभळीच्या कंटकावर की गं पडले… आणि तो कंटक पायी रूतला.. एक हस्त तुझ्या स्कंधावरी ठेवून पायीचा रूतलेला कंटक चिमटीने काढू पाहतेय.. पण तो कसला निघतोय! अगदी खोलवर रुतून बसलाय.. वेदनेने मी हैराण झाले आहे बघ… चित्त थाऱ्यावर राहिना… आणि मला पुढे पाऊल टाकणे होईना.. गडे वासंतिका, तू तर मला मदत करतेस का?..फुलं पत्री खुडून जाहली आणि आश्रमी परतण्याच्या मार्गिकेवर हा शुल टोचल्याने विलंब होणारसे दिसतेय… तात पूजाविधी करण्यासाठी खोळंबले असतील..

.. गडे चारुलते! अगं तरंगिनीच्या पायी शुल रुतूनी बसला.. तो जोवरी बाहेर निघून जात नाही तोवरी तिच्या जिवास चैन पडणार कशी?.. अगं तो भ्रमर असा रोजचं तिचं लक्ष भुलवत असतो.. आणि आज बरोबर त्यानं डावं साधला बघ… हा साधा सुधा भ्रमर नव्हे बरं. हा आहे मदन भ्रमर . तो तरंगिनीच्या रूपावरी लुब्ध झालाय आणि आपल्या तरंगिनीच्या हृदयात तोच रुतलाय समजलीस… हा पायी रूतलेला शुल पायीचा नाही तर हृदयातील आहे… यास तू अथवा मी कसा बाहेर काढणार? त्याकरिता तो ऋषी कुमार, भ्रमरच यायला हवा तेव्हा कुठे शुल आणि त्याची वेदना शमेल बरं… आता वेळीच तरंगिनीच्या तातानां हि गोष्ट कानी घालायला हवी…आश्रम प्रथेनुसार त्या ऋषी कुमारास गृहस्थाश्रम स्वीकारायला सांगणे आले नाही तर तरंगिनीचे हरण झालेच म्हणून समजा. 

गडे तंरगिनी! हा तुला रूतलेला मदन शुल आहे बरं तू कितीही आढेवेढे घेतलेस तरी आम्हा संख्यांच्या लक्षात आलयं बरं.. तो तुझ्या हृदय मंदिरी रुतून बसलेला तो ऋषी कुमार रुपी भ्रमराने तुला मोहविले आहे आणि तुझे चित्त हरण केलयं… हि हृदय वेदना आता थोडे दिवस सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही.. पाणिग्रहण नंतरच हा दाह शांत होईल.. तो पर्यंत ज्याचा त्यालाच हा दाह सहन करावा लागतो.. 

.. चला तुम्हाला चेष्टा सुचतेय नि मला जीव रडकुंडीला आलाय… अश्या चेष्टेने मी तुमच्याशी अबोला धरेन बरं.. 

हो हो तर आताच बरं आमच्याशी अबोला धरशील नाहीतर काय.. त्या भ्रमराची देखील चेष्टा आम्ही करु म्हणून तूला भीती वाटली असणारं… आता काय आम्ही सख्खा परक्या आणि तो परका ऋषी कुमार सखा झालायं ना.. मग आमच्याशी बोलणचं बंद होणार… 

.. चला पुरे करा कि गं ती थट्टा..आश्रमाकडे निघायचं पाहताय की बसताय इथंच . .. 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संविधान – लोकशाहीतील शक्तीमान शब्द ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ संविधान – लोकशाहीतील शक्तीमान शब्द ☆ श्री उमेश सूर्यवंशी

एखाद्या शब्दात किती अभूतपूर्व ऊर्जा सामावलेली असते याची प्रचिती मोठी आश्चर्यकारक असते. तो शब्द ..केवळ शब्द नसून तमाम मोठया समूहाचे स्वप्न असते , काटेकोर नियमावली देखील असते. तो एक शब्द असंख्य मोठ्या समूहाला आपल्या जगण्याची हमी पुरवू शकतो. तो एक शब्द राष्ट्र नावाच्या रचनेतून एकदा वगळून टाकण्याची कल्पना केली तरी त्याक्षणी त्या राष्ट्र नावाच्या रचनेचे शतशः तुकडे होत असल्याची व्यापक जाणीव पसरते. तो एक शब्द जेव्हा मोठमोठया समूहांना ऊर्जेबरोबरच हमी व विश्वास पुरवू लागतो तेव्हा तो शब्द त्या लोकसमूहाच्या दृष्टीने अगदी पवित्र होऊन जातो. इतका महत्त्वाचा असा तो शब्द …त्याची नेमकी जाणीव मात्र बहुतांशी समाजमनाला योग्यरित्या नसते ही एक शोकांतिकाच आहे. एका महान वारश्याला लागलेला तो एक अभूतपूर्व असाच शाप आहे.

संविधान….म्हणजे लोकशाही रचनेतील व्यापक लोकसमूहाला जगण्याची हमी पुरवणारा शब्द आहे. संविधान हे एका दृष्टीने त्या लोकशाही राष्ट्रांतील लोकसमूहावर टाकलेली जबाबदारी देखील असते. संविधान नावाचा शब्द जेव्हा व्यापक लोकसमूहाला ऊर्जा , हमी व विश्वास पुरवतो तेव्हा त्या संविधान नावाच्या रचनेला तोलून धरण्याचे , सतत योग्य रितीने कार्यान्वित ठेवण्याचे आणि त्याच्या पवित्रपणाला बाधा येऊ न देण्याची जबाबदारी मात्र त्याच लोकसमूहाला उचलायची असते. संविधान जिवंत आहे तोवर प्रत्येक जनसमूह प्रचंड आत्मविश्वास राखून आपल्या राष्ट्रांप्रती जागरुकता ठेवून एका विशिष्ट पण विधायक नियमावलींना प्रमाण मानून खुशाल जगू शकतो. संविधान जिवंत असते तोवर आपल्या अवतीभवती कितीही वेगवेगळ्या विषमतेच्या रचना उभारल्या जात असल्या तरीही आपल्या जगण्याची हमी देणारी संविधान नावाची रचना उपलब्ध आहे ही भावनाच सर्व अल्पसंख्य समूहाला आश्वस्त करत असते. संविधान जिवंत आहे तोवरच आपल्या राष्ट्रांच्या प्रगतीत सर्वसामान्य माणूस आपला वाटा उचलण्याची उमेद बाळगून जगत असतो. संविधान जिवंत आहे तोवरच आपल्या मतांना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध असते याची जाणीव होणे आवश्यक आहे. संविधान हा नुसताच शब्द राहत नसतो तर तमाम लोकसमूहाची जगण्याची व जगवण्याची हमी घेऊन उभारलेली पेटती मशाल असते. या मशालीला जिवंत राखण्यासाठी मात्र लोकसमूहाला जागरुकता नावाचे तेल अखंड पुरवत रहावे लागते. ही जागरुकता जेव्हा नष्ट होईल तेव्हा संविधान नावाची पेटती मशाल थंडावत जाईल अन् नष्ट होईल. संविधान नावाचा एक शब्द किती मोठ्या क्रांती प्रतिक्रांतीला जन्माला घालू शकतो आणि मिटवू देखील शकतो याची उदाहरणे जगभर पसरलेली आहेत….” संविधान बचाव ” ही आरोळी एकाचवेळी ” राष्ट्रबचाव व कॉमन मॕन बचाव ” या अर्थाची होऊन जाते ती याकरीताच….

संविधानविना कोणत्याही लोकशाही राष्ट्रांचा गाडा पुढे जाऊ शकत नाही . तो कोणत्या दिशेला घेऊन जायचा आहे याची खबरबात लोकांना लागत नाही . राष्ट्रांच्या जडणघडणीत सर्वाधिक प्रभावशाली भुमिका संविधान नावाचा शब्द अर्थात रचनाच बजावू शकते. संविधान याचकरीता एखाद्या भविष्यकालीन स्वप्नांची मूर्ती बनून समोर उभी असते. त्या पवित्र मूर्तीला कोणतेही कर्मकांड करण्याची जरुरी नसते…आवश्यकता असते ती लोकसमूहाच्या अखंड जागरुकतेची , विधायक जाणीवेची.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “केसरीया” ☆ प्रस्तुती – कौस्तुभ केळकर नगरवाला

? मनमंजुषेतून ?

☆ केसरीया☆ प्रस्तुती – कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

नेने आजी आणि नेने आजोबा… अख्खी गल्ली त्यांना याच नावाने ओळखते.

दोघंच दोघं. एक दुजे के लिये…

 

मी… मी कोण ? मी शामलाल मिठाईवाला. गेली चाळीस वर्ष मी या दोघांना ओळखतो..

बिल्डींगच्या खाली माझं दुकान. वरच्या मजल्यावर नेन्यांचा फ्लॅट. बिल्डींगच्या जन्मापासूनचे आम्ही सोबती.

कुणी विचारलं तर मी बिनदिक्कत सांगतो… नेने माझे नातेवाईक आहेत म्हणून. आमचं नातं अगदी जवळचंय.

 

काय सांगत होतो ?—- आमच्याकडची जिलेबी पुण्यात नं.1. चाखून बघाच एकदा.

नेन्यांकडचा प्रत्येक ‘आनंद’ आमच्याकडच्या जिलेबीच्या साथीनं सेलीब्रेट झालाय.

नेन्यांच्या शर्वरीचा जन्म… शर्वरीचा दहावीचा रिझल्ट… ती सी. ए. झाल्याचं सेलीब्रेशन… तिला लागलेली पहिली नोकरी… तिचं लग्न… नेने ‘आजोबा’ झाल्याची गोड बातमी.

आमच्याकडच्या जिलबीनंच गोड झालाय .. प्रत्येक आनंदसोहळा.

 

गंमत सांगू ?

मला मुलगा झाला तेव्हाची गोष्ट. माझ्याकडचीच जिलबी विकत घेऊन, नेन्यांनी माझंच तोंड गोड केलंय.

आता बोला ?—- शरूचं सासर तिकडे इंदूरला.. ती इथं आली की ती घरी जायच्या आधी इथली गरमागरम जिलेबी घरी पोचायची.

 

मागच्या वर्षीची गोष्ट. नेने घाईघाईने आले… ” शामलाल, सुटलास तू लेका. जिलेबीचे दोन घाणे कमी काढ उद्यापासून… हा काय ताजा ताजा रिपोर्ट घेऊन आलोय. तो डाॅक्टर गोडबोल्या बोंबलतोय. मधुमेह झालाय या नेन्याला….. पोरकी झाली रे जिलेबी तुझी…”

 

काय सांगू ? खरंच पोरकी झालीय जिलेबी आमच्याकडची. नेन्यांनी गोड बंद केलंय… बंद म्हणजे बंद…

एक कण सुद्धा नाही… नेन्या पक्का गोडखाशी. आमच्याकडची जिलेबी त्याचा जीव की प्राण.

खरं सांगू ? आमचा जीव नेन्यात अडकलेला. किलोकिलोने जिलेबी खपते रोज….. तरीही…गोड नाही लागत आम्हाला. नेन्यानं कसं काय कंट्रोल केलं कुणास ठाऊक ?

 

सांगतो…… 

सोप्पय एकदम. नेन्याला डायबेटिस निघाला आणि… त्या दिवसापासनं वहिनींनी गोड खाणं बंद केलं.

नेन्याचा जीव वहिनींमधे अडकलेला. आपोआप गोड बंद झाला. आता शरू आली तरी…इंदूरचा गजक आमच्याघरी पोचतो. आमच्याकडची जिलबी मात्र….खरंच आमच्याकडच्या जिलबीला वाली राहिला नाहीये…

 

मागच्या फेब्रुवारीतली गोष्ट… नेनेवहिनी कितीतरी दिवसांनी दुकानी आलेल्या. फरसाण, ढोकळा वगैरे ‘अगोड’ खरेदी… इतक्यात डाॅ. गोडबोले आले तिथं… डाॅ. गोडबोल्यांचं क्लिनिक पलिकडच्या गल्लीत.

तेही आमचं घरचं गिराईक.. .डाॅ.मोतीचूराचे लाडू घ्यायला आलेले….. 

“डाॅ., वर्ष झालंय. यांनी गोडाला हात नाही लावलाय. आज एखादी जिलबी खाल्ली तर चालेल काय ?

शरूचा वाढदिवस आहे हो आज”

“चालतंय की. फक्त एकच अलाऊडंय.” डाॅक्टर ऊवाच.

‘वहिनी, तुम्ही डाॅक्टरांना घेऊन वर जा. मी गरमागरम जिलबी घेऊन आलोच.’.. भारी मजा आली.

वहिनींनी नेन्यांना जिलबीचा घास भरवला. आणि नेन्यांनी वहिनींना… अगदी लग्नात भरवतात तसा.

डोळे भरून मी हा सोहळा बघितला. राम जाने कैसे…माझ्याच डोळ्यांचा नळ सुरू झाला.

शरू तिकडे इंदूरला…. .मी, डाॅक्टर, नेने आणि वहिनी. आम्ही तिचा वाढदिवस इथे सेलीब्रेटला.

सच्ची बात कहता हूँ.. आमच्याकडची जिलबी…. आजच्या इतकी गोड कधी लागलीच नव्हती.

तोच गोडवा जिभेवर घोळवत, मी आणि डाॅक्टर खाली आलो.

‘श्यामलाल तुझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे ?”

“हो.. आहे तर..”

‘मग सांग बरं , प्रेमाचा रंग कुठला असतो ?’

…. पागल झालाय हा डाॅक्टर साला. काहीही बोलतोय.

” प्रेमाचा खरा रंग केसरीया… तुझ्याकडच्या जिलेबीसारखा..’

.. मला काही कळेना.

“तुला या नेन्याचं सिक्रेट सांगतो. डायबेटीस नेन्याला नाही, वहिनींना झालाय. वहिनींना ठाऊक नाहीये हे.

दोघांनी गोड सोडलंय, तरीही संसार ‘गोडाचा’ झालाय…. “

डाॅक्टर ओल्या डोळ्यांनी हसत हसत निघून गेला.

 

पटलं….

प्यार का रंग कौनसा ?

केसरीया….

या व्हॅलेन्टाईनला याच तुम्ही….. वहिनींसाठी आमच्याकडची केसरीया जिलेबी न्यायला. वाट बघतोय…

 

प्रस्तुती –  कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-2 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ SSLV-D2 प्रक्षेपणाचा आँखो देखा हाल – भाग-2 ☆ श्री राजीव गजानन पुजारी

(मी विचारले, “किती चालावे लागेल?” ते म्हणाले, “साधारण दोन मैल” मी चालायला सुरुवात केली.) इथून पुढे —- 

वाटेत अनेक ठिकाणी गणवेशधारी जवान होते. मला वाटतं मी दोन मैलांपेक्षा नक्कीच जास्त चाललो असेन. पुढे गेल्यावर डावीकडे काही जवान होते त्यांना मी व्ह्यूईंग गॅलरीला कसं जायचं असे विचारल्यावर असंच पुढे जावा म्हणून सांगितलं. त्यांनी परत माझ्याकडील आधार कार्ड व पास तपासला. बरेच पुढे गेल्यावर इस्त्रोचा लोगो शिरावर धारण केलेली एक इमारत दिसली. त्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढून घेण्याचा मोह झाला. पण न जाणो फोटो काढले तर काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना, असे वाटले व परतताना फोटो काढायचे ठरवले. माझ्या पास वरील क्यूआर कोड स्कॅन करून मला जाऊ देण्यात आले. उजवीकडे वर जाण्यासाठी मार्ग आहे. वर जाऊन एका दरवाज्यातून आत गेल्यावर आपण व्ह्यूईंग गॅलरीत प्रवेश करतो. व्ह्यूईंग गॅलरीला स्टेडियमच्या प्रेक्षागाराला असतात तशा एका विस्तीर्ण अर्धवर्तुळाकारात अनेक पायऱ्या आहेत. एकूण प्रेक्षक क्षमता पाच हजार एव्हढी आहे. गॅलरीची रचना अशी आहे की कोणत्याही लाँच पॅड वरून केलेले लॉन्च सहजपणे पाहता यावे.  मी ज्यावेळी गेलो त्यावेळी मोजके लोक आले होते. समोर एका टेंट मध्ये इस्त्रोच्या पीएसएलव्ही, जीएसएलव्ही व जीएसएलव्ही मार्क तीन या तीनही प्रक्षेपकांची मॉडेल्स ठेवली होती. बरेच लोक त्यांच्याबरोबर फोटो काढून घेत होते. जवळच नाश्ता व चहाची सोय होती. मी इडली वडा खाऊन घेतला. हळूहळू गर्दी वाढू लागली. मी अगदी वरच्या बाजूला मोक्याची जागा पाहून बसलो. अनेक शाळांच्या ट्रिप्स आल्या होत्या. त्यातल्या पिवळी जर्किन्स व मागे ‘आझादी सॅट क्रू’ असे लिहिलेल्या एका टीमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती टीम म्हणजे देशभरातल्या शाळातून आलेल्या सुमारे ७५ ते ८० मुली होत्या. त्यांनी सर्वांनी मिळून ‘आझादी सॅट’ हा उपग्रह बनविला होता व SSLV-D2 च्या तीन पेलोड्स पैकी हा उपग्रह एक होता. तो देखील आज अंतराळात सोडण्यात येणार होता. त्या अत्यंत उत्साहात होत्या. त्यांचे बरोबर त्यांचे शिक्षक होते. इस्त्रोतील ज्या तंत्रज्ञानी तो बनविण्यास मदत केली होती तेही त्यांच्या बरोबर होते. सूत्रसंचालकांची एक टीम होती. ते प्रेक्षकांना चिअरअप करण्यास सांगत  होते. ‘थ्री चिअर्स फॉर इस्त्रो’ वगैरे घोषणांनी स्टेडियम दुमदुमत होते. विविध चॅनेल्स व वृत्तपत्रांचे बातमीदार प्रेक्षकांतील काहींच्या व त्या आझादी सॅट क्रू मधल्या मुलींच्या मुलाखती घेत होते. सूत्रसंचालकांनी त्या मुलींपैकी काहींना खाली बोलावून त्यांचे मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. किती लहान मुली त्या!वय वर्षे आठ ते बाराच्या दरम्यानच्या!! त्यांनी धीटपणे त्यांचे मनोगत व्यक्त केले व ही संधी दिल्याबद्दल इस्रोचे आभार मानले. देशभरातील विविध सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सातशे पन्नास शाळकरी मुलींकडून उपग्रह बनवून घेणे ही कल्पना ‘स्पेस किड्झ इंडिया’ या चेन्नई स्थित खाजगी अंतरीक्ष नवउद्योगाची (space start-up)आहे. या कंपनीने देशभरातील विविध शाळांमध्ये जाऊन – त्यातील कांही शाळा तर दुर्गम भागातील आहेत- त्यांना उपग्रहाचे विविध भाग बनविण्यासाठी मार्गदर्शन केले व अशा रीतीने AzaadiSat-2 या उपग्रहाचे निर्मिती करण्यात आली. हे स्टेडियम तीन भागात विभागले आहे. सूत्रधार मॅडमनी सर्व प्रेक्षकांना मधल्या भागात यायला सांगितले, जेणेकरून प्रक्षेपण व्यवस्थित बघता येईल. सर्व मिळून साधारण तीन हजार च्या दरम्यान प्रेक्षक होते. हळूहळू घड्याळाचा काटा पुढे सरकू लागला. दहा मिनिटे.. पाच मिनिटे..दोन मिनिटे.. एक मिनिट… नंतर उलट मोजणी दहा.. नऊ.. आठ.. सात.. सहा.. पाच.. चार.. तीन.. दोन.. एक.. अँड गो… पण अजून समोर कांहीच दिसत नव्हते. पण नंतर क्षणातच समोरच्या गर्द झाडीतून SSLV-D2 प्रक्षेपक त्याच्या पिवळ्या धमक्क ज्वाळांसहित वर आला आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. मी डोळ्यांची पापणीही न लाववीता(अनिमिष नेत्रांनी) ते अद्भुत दृश्य पाहू लागलो. बरेच वर गेल्यावर क्षितिजाशी दीर्घलघुकोन करून यान झपाट्याने पुढे सरकू लागले. आम्हाला माना उजवीकडे वर कराव्या लागल्या. आमच्या पुढील क्षितिज व मागील क्षितिज असे १८०° धरले तर साधारण १००° गेल्यावर यान दिसेनासे झाले. मागे राहिला पांढऱ्याशुभ्र धुराचा लोळ. हवेमुळे तो ही विरळ होत गेला. आमच्या गॅलरी समोर दोन प्रचंड मोठे स्क्रीन्स लावले होते. त्यावर कंट्रोल रूम मधील दृश्य दिसत होती. एकही प्रेक्षक जागेवरून हालला नव्हता. साधारण तेरा मिनिटांनी EOS-07 उपग्रह यानापासून वेगळा होऊन त्याच्या ठरलेल्या कक्षेत प्रस्थापित केला गेला, साडे चौदा मिनिटांनी Janus-1 वेगळा झाला, पंधरा मिनिटांनी AzaadiSat-2 वेगळा होऊन त्याच्या कक्षात प्रस्थापित केला गेला असे जाहीर करण्यात आले. त्यावेळी AzaadiSat crew ने जो जल्लोष केला तो बघून डोळे भरून आले. खरोखर देशातल्या विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानात रस निर्माण व्हावा म्हणून  इस्रो जे कार्य करीत आहे ते कौतुकास्पद आहे. हळूहळू गर्दी पांगु लागली. लोक खाली येऊ लागले. येताना स्पेस म्युझियम लागते, तेथे भारताने अंतरिक्षात प्रस्थापित केलेले विविध उपग्रह तसेच प्रक्षेपकांची मॉडेल्स ठेवली आहेत. त्यांजवळ उभारून लोक फोटो काढून घेत होते. मी अहमदाबाद येथील VSSE म्युझियम बघितलेले असल्याने फक्त एक फेरफटका मारून बाहेर पडलो. जवळच एक ऑडिटरियम आहे ते बंद होते. बाहेर पडल्यावर त्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर आवर्जून एक फोटो काढून घेतला. आता परत अडीच तीन मैल चालावे लागणार अशी भीती वाटत होती, तोवर इस्त्रोचा एक इलेक्ट्रिकल विभागात काम करणारा माणूस भेटला, तो म्हणाला लॉन्च बघून परतणाऱ्यांसाठी इस्त्रोने आंध्र प्रदेश स्टेट कॉर्पोरेशनच्या बसेसची सुलुरूपेटा पर्यंत व्यवस्था केली आहे. थोडे चालल्यावर हे बस दिसली. त्यात बसून मी सुलुरूपेटा येथे आलो.

इथे आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की श्रीहरीकोट्याला येताना स्वतःचे वाहन असणे केव्हाही चांगले. स्वतःचे वाहन असले की थेट व्ह्यूईंग गॅलरीच्या इमारतीपर्यंत जाता येते. तेथे पार्किंगची व्यवस्था आहे. त्यामुळे तीन चार मैलांची पायपीट वाचते. तसेच लॉन्च बघून परततांना ज्यांनी यापूर्वी स्पेस म्युझियम बघितले नसेल त्यांना आरामात त्याचा आस्वाद घेता येतो. येथे रॉकेट गार्डन म्हणून एक उद्यान आहे तेथे आपल्या सर्व प्रक्षेपकांच्या पूर्णाकार प्रतिकृती ठेवल्या आहेत आणि काही सुंदर असे वास्तुकलेचे नमुने आहेत, तेथे पण जाता येते. निव्वळ स्वतःचे वाहन घेऊन न गेल्याने मला रॉकेट गार्डन बघता आले नाही.

सकाळी खूप चालल्यामुळे दमायला झाले होते, त्यामुळे काल आणलेला ब्रेड बटर खाऊन ताणून दिली ते रात्री साडेआठलाच उठलो. उठून काउंटरवर जाऊन जवळ कोठे शाकाहारी जेवणाचे हॉटेल आहे का याची चौकशी केली. त्यावेळी मार्केटमध्ये कोमला निवास म्हणून हॉटेल आहे असे कळले. रिक्षाने हॉटेलमध्ये गेलो. खवय्यांची रांग लागली होती. सर्व व्यवहार तेलगूत चालू होते. माझा नंबर आल्यावर मी प्रथम हिंदीत व नंतर इंग्रजीत राईस प्लेटची चौकशी केली. काऊंटरवरील माणसास हिंदी अजिबात येत नव्हते व इंग्रजीही अगदी मोडकेतोडके येत होते. राईस प्लेट उपलब्ध नसते असे कळले. कोण कोणते पदार्थ उपलब्ध आहेत याची चौकशी केल्यावर मसाला डोसा, रोटी, चपाती वगैरे उपलब्ध असल्याचे कळले. ‘आंध्रात चपाती कशी असेल कोण जाणे’ असा विचार करून दोन रोटी व ग्रेव्ही असे सांगितले. त्याने नव्वद रुपये म्हणून सांगितले. मी पैसे दिले. त्याने कुपन दिले. पण कुपनावर फक्त दोन रोटीच दिसले. मी याबरोबर काय असे इंग्रजीत विचारले. त्याला नीट कळले नाही. नुस्ती रोटी कशी खाणार असा विचार करून मी मसाला डोसा सांगितला. काउंटरवरील माणसाने जरा रागाने बघून त्या कुपनवर पेनने काही लिहिले व माझ्याकडे दहा रुपये मागितले व त्याचे वेगळे कुपन दिले. मला वाटलं डोसा शंभर रुपयांना मिळत असावा. मी रांगेत जाऊन मसाला डोसा घेतला व एका टेबलावर येऊन खायला सुरुवात केली.

— क्रमशः भाग दुसरा

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares