मराठी साहित्य – विविधा ☆ – पाऊस…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – पाऊस…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

पाऊस सगळीकडे सारखाच पडतो.. बालपणात कोसळणाऱ्या पाऊस धारा कागदी होडी करून अंगणातल्या पाण्यात सोडणारा हा पाऊस, कसलीच कोणतीच तमा न बाळगणारा चिंब भिजून आनंदाने उड्या मारणारा हा पाऊस.. नकळत आपलं बालपण डोळ्यासमोर आणतो.. . आपलं लेकरू पावसात भिजून आजारी पडेल म्हणून काळजी करणाऱ्या आई कडे दुर्लक्ष करून हे बालिश बालपण ये आई मला पावसात जाऊदे! एकदाच ग  भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे .. म्हणत पावसाचा आनंद घेत उड्या मारत राहतं.. पावसात चिंब भिजून कुडकुडत आईच्या पदराची  ऊब मिळताच मात्र समाधानाने आईच्या कुशीत शिरतो तो अल्लड बालिश पाऊस.. . आईचा लाडिक ओरडा आणि सोबत मायेने भरलेला उन उन दुधाचा पेला पिवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पावसात भिजण्याची स्वप्न बघत मायेच्या कुशीत शिरणारा बालिश पाऊस वेगळ्याच दुनियेची सफर घडवतो.. . कॉलेज च्या खिडकीतून कोसळणाऱ्या पाऊस धारा पाहून नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली तरुण पोरं पोरी प्यार हुवा इकरार हुआ म्हणत एकच छत्रीत आपल्या प्रियकर/ प्रेयसी सोबत नव जीवनाची स्वप्न पाहणारा हा पाऊस रोमँटिक होऊन जातो.. गुलाबी प्रेमाची बरसात करणाऱ्या ह्या पावसाच्या सरी मोगऱ्याचा गंध घेऊन येतात.. नुकतीच लग्न बंधनात बांधली गेलेली जोडपी त्यांच्यासाठी हा पाऊस वेगळचं गोड स्वप्न घेऊन येतो.. खिडकीतून बरसणाऱ्या जलधारा पाहताना आपल्या सख्याची वाट बघणारा स्वप्नाळू पाऊस, दमून भागून आलेला आपल्या सख्याची एक प्रेम भरली नजर पडताच ह्या प्रेम सरीत चिंब भिजून जाते.. पाऊस किती स्वप्न, किती नव्या आशा घेऊन येतो.. हाच पाऊस म्हातारपणात मात्र जून्या आठवणींना उजाळा देत कानटोपी आणि शाल शोधत बसतो.. पावसाची चाहूल लागताच छत्री, रेनकोट यांची तजवीज करू पाहणारा पाऊस आपलं वय वाढलंय ह्याची जाणीव करून देतो.. शेतकरी राजासाठी तर पाऊस म्हणजे निसर्गाचं वरदान च जणू.. पावसाच्या प्रतिक्षेत काळ्या मातीची मशागत करू लागतो.. पावसाची पहिली सर कोसळताच पेरणीसाठी लगबग करवणारा हा पाऊस.. नवीन आशा, नवीन स्वप्नं घेऊन येतो.. कधी ह्याचं रौद्र रूप अनेकांना रडवतं, अनेक संसार उध्वस्त करतं, कधी  किती तरी सप्नांची राखरांगोळी होते.. मृत्यूचा खेळ असा काही रंगतो की अश्रुंच्या सरी वर सरी बरसु लागतात.. पाऊस काय किंवा नैसर्गिक कोणतीही आपत्ती काय? ह्या सगळ्या आपत्तीसाठी कुठे तरी आपण मनुष्य च कारणीभूत आहे हे मात्र सोयीस्कररीत्या विसरतो.. पावसाळा आला की अनेक पर्यावरणप्रेमी मंडळी वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम घेतात.. एकदा झाडं लावून फोटो काढले आणि स्टेटस ठेवलं की मग वर्षभर मोकळे.. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच.. बाकी काहीही असलं तरी पाऊस आणि माणसाचं नातं मात्र अबाधित राहत.. काही वेळा कडू आठवणींसोबत तर बऱ्याच वेळा गोड, गुलाबी आठवणींची बरसात करणारा हा पाऊस आयुष्य जगण्यासाठी नवी प्रेरणा घेऊन येतो हे मात्र नक्की..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली एक सुंदर स्त्री !! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली एक सुंदर स्त्री !! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एका संध्याकाळी सगळी कामं आटोपून मंदिराबाहेरील एका आडबाजूच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती.  घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणून मोबाईल काढला…. बघतो तो हँग झालेला… बापरे..  बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे  करायचे? मोबाईल चालू करण्याचा खटाटोप चालू झाला… वैताग आला… मोबाईल काही सुरु होईना …. 

काय करावं या विचारांच्या  तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगऱ्या आवाजात कुणीतरी विचारलं, ‘ कोण हाय …? ‘ मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघून भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी…. 

आधी घाबरलो पण नंतर चिडून विचारलं , “ काय बाई ही काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येऊन अशी अंगावर हात ठेवतेस … घाबरलो ना मी…! “

तशी म्हणाली, “ आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती. या टायमाला मी हितंच बसून भाकर खाती… मापी करा, मी जाती दुसरीकडं … “ मी ओशाळलो, म्हटलं, “ नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे… “

तिला बघून अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो “ डोळे कशानं गेले?”  म्हणाली,” लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं. लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली. नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, १७ वर्साची व्हते मी तवा…. “

“ अरेरे ! तुमच्या आईबापाच्या  आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे. आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर ही वेळ नसती आली… बेअक्कल असतात लोकं…”  मी सहज बोलुन गेलो. 

यावर मला वाटलं माझ्याच सुरात सूर मिसळून ती आता त्यांना शिव्या शाप देईल. पण नाही..  ती म्हणाली, “ नाय वो, कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं… खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटून आपटून माजा बाप गेला …त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं… डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्यापेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया … “ ती हसत म्हणाली…

…. वाईटातून सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती ही बाई ?

तरी मी म्हणालो, “ मग भगताचं काय … ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ? “

म्हणाली, “ आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त … माज्या नशीबाचे भोग हुते ते … त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई… कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई… ! डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणूनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात… आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल…?” 

‘ Intention is important behind every action ‘ .. 

.. या वाक्याचं सार या बाईने किती सहज सांगितले …!!!

“ पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहीही न बघता कशा राहू शकला? “

म्हणाली, “ न बघता? काय बघायचं राहिलंय … आवो सगळं बगुन मनात साटवलंय …. वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय,  पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय …. तुमी काय बगीतलं ह्यातलं …? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ? “

…… तिच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे ! 

“ आज्जी तुमचं लग्न ….? “ मी चाचरत विचारलं… आज्जी म्हणाली, “ झालं हुतं की,  त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला …. पदरात एक पोरगी टाकली. त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती … म्हणलं चला चांगलं दिवस आलं … पन त्योबी दोन वर्षातच गेला…… बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला…. ! “  

“ आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? “  आज्जी भकास हसली, म्हणाली,” तिच्या विसाव्या वर्षी ती गेली तिच्या बापामागं त्याला शोधायला … आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील …. स्वर्गात म्हणं नाच-गाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा…..”  असं म्हणून आज्जी हसायला लागली… 

…. पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना…. इतकं सगळं भोगूनही ही इतकी निर्विकार ! 

“ आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा पण ? “

“ कुणाचाच न्हाई. परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला… आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ… भाकर मिळाली तर म्हणायचं .. आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु….दोष कुनाला द्यायचा न्हाई… वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काही कारणच नाही…” 

“ ते कसं आज्जी ? मला नाही समजलं …”

“ ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन… आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी  बोलता येतंय ना मला ??? “

.. .. काय बोलावं मलाच कळेना. या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? ‘वयामुळं हा पोक्तपणा आला असेल, की भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ?’ …. 

…… कारण काहीही असो ..  एवढ्या सुंदर विचारांची, वाईटातून चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी ती आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!!  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदकंद ऐसा… भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदकंद ऐसा… भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

१८५७ पूर्वीचा भारत

(मागील भागात आपण पाहिले की फॅनी पार्कस् हिला भारतासंबंधी कुतूहल होते. भारतात अनुभवलेल्या विविध विषयांचे सचित्र वर्णन तिने केले आहे. आता त्या पुढील भाग…)

हिंदुस्थानातल्या अनेक प्रकारच्या झाडांची माहिती, त्यांचे उपयोग, धनुष्य बनविण्याची पद्धत, सतार कशी बनविली जाते, स्थानिक भाषेतील म्हणी व वाक्प्रचार असे अनेक विषय फॅनीच्या लिखाणात येतात. वन्य प्राणी, कीटक, जीवजंतू यांचीही ती अभ्यासक होती.

फॅनीने लिहिले आहे की, ‘कंपनी सरकार नेटिवांच्या अंधश्रद्धेचा फायदा उकळते. प्रयागला संगमावर स्नान करण्यासाठी प्रत्येकी एक रुपया कर द्यावा लागतो. एक रुपयात एक माणूस महिनाभर सहज जेवू शकतो हे लक्षात घेतले तर हा कर भयंकर आहे.’

सुरुवातीला आलेल्या काही इंग्रजांनी मुगल राजघराण्यात विवाह केले होते आणि त्यांच्यासारखे ऐश्वर्य उपभोगत होते. अशा अँग्लो- इंडियन्सना व्हाईट मुघल्स म्हटले जाई.

बर्मा वॉरवर गेलेल्या काही परिचितांकडून फॅनीला हिंदू ,बौद्ध देवदेवतांच्या मूर्ती भेट मिळाल्या होत्या. त्यातील एक सोन्याची, काही चांदीच्या आणि बाकी ब्रांझ आणि संगमरवराच्या होत्या. अनेकांनी अशा मूर्ती फोडून त्यांच्या डोळ्यांच्या जागी बसविलेले हिरे काढून घेतले. काही मूर्तींच्या तर डोक्यात हिरे साठवलेले होते. फॅनीने आठवण म्हणून मिळालेल्या मूर्ती तशाच ठेवल्या.

प्रचंड टोळधाडीमुळे फॅनी उदास झाली. त्यावेळेच्या भीषण दुष्काळाचे वर्णन वाचताना अंगावर काटा येतो. आई- वडील धान्यासाठी, पैशासाठी आपली मुलेही विकत होती.

महादजी शिंदे यांचा दत्तक मुलगा दौलतराव यांची विधवा पत्नी बायजाबाई शिंदे यांची व फॅनीची चांगली मैत्री झाली होती.

हिंदू धर्माप्रमाणेच फॅनीने मोहरमचा सण, त्या मागची कथा, प्रेषितांच्या कुटुंबाची माहिती,शिया आणि सुन्नी यामधील फरक या सगळ्याविषयी लिहिले आहे. वाघाच्या शिकारीच्या अनेक कहाण्या तिने लिहिल्या आहेत. उच्च स्तरातील इंग्रजांची आयुष्यं सुखाची होती. त्यांच्याकडे सगळ्या कामांसाठी नोकर- चाकरांची फौज होती. संस्थानिकांकडून त्यांना किमती हिरे माणके  अशा भेटींनी भरलेली ताटे मिळत असत. इंग्रज परके आहेत, शत्रू आहेत ही जाणीव भारतीय नेणीवेत उरली नव्हती.

तीव्र उन्हाळ्यामुळे आजारी पडून फॅनी मसूरीजवळच्या थंड हवेच्या ठिकाणी जवळपास सहा महिने राहिली. तिथेही तिने पहाडात फिरुन, माहिती गोळा करून तिथल्या आजूबाजूच्या प्रदेशाचा आणि हवामानाचा दस्तऐवज करून ठेवला आहे. पहाडातला पाऊस, दरडी कोसळणे भूकंपाचे हलके धक्के, तिथली माणसे, झाडे, इतर वनस्पती, पक्षी, फुलपाखरे या सगळ्यांची निरीक्षणे नोंदविली आहेत. पहाडी बायकांचे जिणे फार कष्टप्रद असते असेही लिहिले आहे.

फॅनी स्वतंत्र बुद्धिमत्तेची आणि भारताविषयी प्रेम असणारी होती. हा भारत तिचा तिने शोधलेला होता. तीव्र निरीक्षण शक्ती आणि रसाळ लेखणी यामुळे तिचे लेखन आजही टवटवीत वाटते. घोड्यावर बसून फिरणारी, सतार वाजवणारी, उर्दू बोलणारी, सिगरेट ओढणारी, देवळांमध्ये, घाटांवर, बाजारात फिरणारी, गलबत घेऊन एकटीच प्रवासाला जाणारी ही मेम हे भारतीयांसाठीही एक आश्चर्यच होते.

अभ्यासू लेखिका सुनंदा भोसेकर यांचा ऋतुरंगमधील फॅनीने पाहिलेल्या भारतावरील लेख मी वाचला होता. आवडलेल्या लेखांच्या झेरॉक्स प्रति   जमविण्याची मला आवड होती. करोनाच्या कंटाळवाण्या काळात कपाट आवरताना निराश मनःस्थितीत यातील बहुतेक सर्व लेखांना मुक्ती मिळाली .सुनंदाताईंना या लेखासाठी जेव्हा मी मेल केली तेव्हा अगदी तत्परतेने त्यांचे उत्तर आले. हा लेख माझ्या अजून लक्षात आहे याचेच कौतुक करून त्यांनी मला ऋतुरंग आणि शब्द रुची मधील त्यांच्या लेखांची पीडीएफ लगेच पाठविली. त्यांनी असेही कळविले की, फॅनीने पाहिलेल्या भारताचे लेख समाविष्ट असलेले त्यांचे पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. भारतात येऊन गेलेल्या परदेशी प्रवाशांविषयी त्यांच्या स्वतःच्या प्रवास वर्णनावर आधारित लेखमाला या पुस्तकात असेल चंद्रगुप्ताच्या दरबारात आलेल्या  मेगास्थेनिसपासून जहांगीराच्या दरबारात आलेल्या थॉमस रो पर्यंतचे लेख या पुस्तकात असणार आहेत. आपण या पुस्तकाची वाट पाहूया.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ म्हण बदलायची वेळ आली ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

🌸 विविधा 🌸 

😅 म्हण बदलायची वेळ आली ? 🌧️🤣 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“गर्जेल तो पडेल काय ?” ही दरवर्षी पावसाळ्यात कानावर पडणारी म्हण, यावर्षीपासून इतिहास जमा होणार की काय, अशी मला पावसात न भिजताच ओली भीती वाटायला लागली आहे मंडळी ! असं वाटायच कारण म्हणजे यंदा पाऊस आला पण नेहमीसारखं त्याचं आगमन सुरवातीला विशेष जाणवलं नाही. नंतर नंतर त्यानं अनेक राज्यात हैदोस घातला ही बाब आलाहिदा, पण यंदा त्याच आगमन जणू निसर्गाने ढगाला सायलेंसर लावला आहे अशा स्वरूपातच होतंय, हे आपण पावसात न भिजताच मान्य कराल याची मला कांदा भजी खाता खाता खात्री आहे !  या मागची वैज्ञानिक कारण काय आहेत यावर हवामान खाते विजेसारखा प्रकाश टाकेल न टाकेल, पण आपल्या सारख्या सुज्ञ लोकांच्या, पावसात ओल्या झालेल्या सुपीक डोक्यातून याच काय उत्तर असेल ते आपण म्या पामराला लवकरात लवकर कळवले तर बरं होईल. नाहीतर काय होईल, आत्ता कांदा भजी खायला कितीही कुरकुरीत लागत असली तरी एखाद्याच्या ओल्या डोक्यातून आलेलं एखादं या मागच भन्नाट कारण माझ्या जिभेची चव बीघडवायला पुरेसं आहे, होय की नाही ? आणि ती व्यक्ती माझ्यासारखा कांद्या भज्या बरोबर गरमा गरम आल्याचा चहा न घेता इतर काही “अमृततुल्य पेय” पीत असेल तर मग माझं रक्षण धो धो पडणाऱ्या पावसात वरचा छत्रीधारी सुद्धा करू शकणार नाही, याची मला बालंबाल खात्री आहे !

हे ढगांच असं मूकं राहणं, विजांच न कडकडणं मला अजिबातच आवडलेलं नाही मंडळी.  त्यामुळे होत काय, खरखुरा पावसाळा यंदा आला आहे असं वाटतच नाही माझ्या सारख्या सामान्य माणसाला. मग पावसाळी पिकनिक ठरवायचा मूडच जातो माझा !

मंडळी मी जेंव्हा माझ्या नसलेल्या डोक्याला थोडा ताण दिला तेंव्हा याच एक उत्तर माझ्या डोक्यात चमकून गेलं, बघा तुम्हांला पटतंय का !  सध्या सर्वपक्षीय नेत्यांचा, या नां त्या कारणाने जो घोषणारुपी गडगडाट चालला आहे त्याला घाबरून मेघांचा घसा तर बसला नसेल ना? हे माझं कारण मलाच पटलं आणि मी डोक्यावर पांघरूण घेऊन झोपी गेलो !

जाता जाता सुज्ञ वाचकांना एक इशारा – कुठल्याही निसर्ग कोपाला लागू असलेलं “हा ग्लोबलवार्मिंगचा परिणाम आहे” हे घासून गुळगुळीत झालेलं उत्तर देवून माझ्या डोक्याची आणखी शकलं करू नयेत ! कारण हा निसर्ग कोप नक्कीच नाही !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमची सरोजखान… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

 

? मनमंजुषेतून ?

☆ आमची सरोजखान…! ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

 

Is fat really the worst thing a human being can be ? लठ्ठ असणं हाच माणसाचा सगळ्यात मोठा दोष असू शकतो का ? हॅरी पॉटर पुस्तकमालेच्या प्रख्यात लेखिका जे के राऊलिंग यांना पडलेला प्रश्न.

आणि या प्रश्नाची आठवण होण्याचं कारण होती शाळेतली आमच्या नववीच्या वर्गात असलेली मोहिनी. ती शब्दशः खात्यापित्या घरची होती, मस्त गुबगुबीत, गोलू गोलू होती. आम्ही सगळे तिला मोहिनी नव्हे तर गोलिनीच म्हणायचो.

वर्गातली, शाळेतली सगळीच मुलं तिला वेगवेगळ्या टोपणनावांनी चिडवायची. एवढंच काय, कधी कधी तर वर्गात शिक्षकही तिच्या वाढत्या वजनाची टिंगल करायचे. 

या सगळ्याचा परिणाम म्हणून ती कोशात जात गेली, कोणाशी मिसळत नसे, कोणत्या ॲक्टिविटीत सहभागी होत नसे, ना स्पर्धक म्हणून ना प्रेक्षक म्हणून. 

पण यंदा नववीचे वर्ष होते, बहुधा पुढच्या वर्षी मान मोडून अभ्यास करायचा म्हणून असेल, या वर्षी स्नेहसंमेलनात तिनं चक्क वैयक्तिक नृत्य (सोलो डान्स) सादर करणार म्हणून नाव नोंदवलं.

मी स्वतः निवेदक असणार होतो, त्यामुळे सरावापासून ते प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत मला सगळ्याच गोष्टी जवळून न्याहाळता येणार होत्या. 

ज्यांना ज्यांना मोहिनी डान्स करणार आहे हे कळलं ते सगळेच तिने सरावासाठी नोंदवलेल्या वेळी, सगळं कामधाम टाकून तिथे उपस्थित होते. 

स्टेजवर लाईट होता, बाकी प्रेक्षागृहात अंधार होता. स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारेच प्रेक्षागृहात आपल्या सरावाची पाळी येण्याची वाट पाहत बसले होते.

मोहिनी स्टेजवर आली, त्या प्रखर प्रकाशाला ती adjust होत होती तोवरच अंधारातून आवाज आला, “स्टेजचा विमा उतरवला आहे ना रे ? आज तुटणार ते.”

ती गोरीमोरी झाली. 

“नाही रे, त्याच्या आधी ही जाडी अम्माच फुटेल.”

मोहिनीला या कुचेष्टा सहन झाल्या नाहीत, ओक्साबोक्शी रडत, चेहरा ओंजळीत लपवत ती तिथून जी पळून गेली ती परत सरावाला आलीच नाही. 

माझ्या दृष्टीने तिच्या सहभागाचा तो the end होता. 

प्रत्यक्ष स्नेहसंमेलन आमच्या शहरातील प्रख्यात नाट्यगृहात होते. अगदी बाल्कनीसुद्धा खचाखच भरली होती. विद्यार्थी – पालक सगळेच आले होते. कार्यक्रम सुरू झाले. हशा, टाळ्या, हुर्रे, हुर्यो – सगळं पूर्ण जोशात होतं. आणि माझं लक्ष कार्यक्रम पत्रिकेतील पुढच्या नावाकडे गेलं. चक्क मोहिनीचं नाव होतं. मी चक्रावलो, सरांना म्हटलं, ” सर, ती नंतर कधीच सरावाला आली नाही. ती आज तयारी न करता स्टेजवर आली, तर फार फजिती होईल तिची, सर.”

सर काही उत्तर देणार एवढ्यात चालू असलेला कार्यक्रम संपला आणि दुसऱ्या निवेदकानं मोहिनीचं नाव घोषितसुद्धा केलं.

आणि सरावाच्या वेळचीच पुनरावृत्ती झाली. मोहिनी स्टेजवर येताच प्रेक्षकांत एकच खसखस पिकली. काहींनी उपहासाने टाळ्या वाजवायला सुरुवात केली, हुर्यो उडवायला सुरुवात केली. 

मी बारकाईने मोहिनीचं निरीक्षण करत होतो. हे सगळं सुरू झाल्यावर, आजही सुरुवातीला क्षणभर तिचा चेहरा पडला. पण आज ती बावरली नाही, ठामपणे जागेवर उभी राहिली. 

लोकांना जेव्हा हे लक्षात आलं की ही पळ काढत नाहीये, तेव्हा आश्चर्याने – अचंब्याने क्षणभर शांतता पसरली, आणि मोहिनीने तोच क्षण नेमका पकडला आणि तिच्या नृत्याला सुरुवात केली. 

उडत्या चालीचं एक लोकप्रिय हिंदी गाणं होतं ते, लोकांनी त्यांच्याही नकळत ठेका धरला. मोहिनी लयबद्ध नृत्य करत होती. तिच्या शरीरयष्टीमुळे तो डान्स ती वेगळ्या प्रकारे सादर करत होती पण अतिशय आत्मविश्वासाने पेश होत होती. 

सुरुवातीला टर उडवण्यासाठी वाजवल्या गेलेल्या टाळ्यांचं रुपांतर कौतुकाच्या टाळ्यांमध्ये कधी झालं हे प्रेक्षकांनाही कळलं नाही. 

Veni, Vidi,Vici – मोठ्ठे युद्ध जिंकल्यावर ज्युलियस सीझर म्हणाला होता, तेच आज मोहिनी म्हणू शकत होती. 

ती आली, तिनं पाहिलं आणि ती जिंकली.

आणि हे सोपं नव्हतं. सगळे तिची टर उडवायला टपून बसले आहेत हे तिला ठाऊक होतं. तिलाही आतून भीती वाटत असेलच. तिनं कसून मेहनत घेतली होती आणि खमकेपणाने, खंबीरपणाने सगळ्यांच्या समोर उभी राहिली होती.

तिला इतरांच्या प्रशस्तीपत्रकांची, प्रमाणपत्रांची गरज नव्हती, पण तिचं तिलाच सिद्ध करायचं होतं की आपण हे करू शकतो. 

आपल्याच प्रश्नाचं उत्तर देताना जे. के. राऊलिंग म्हणतात, ‘ Is fat worse than being vindictive, jealous, shallow, vain, evil or cruel?’ ..  सूडवृत्ती, मत्सर, उथळपणा, गर्विष्ठपणा, दुष्टपणा, क्रूरता – हे सगळे तर लठ्ठपणापेक्षा कितीतरी वाईट आहेत. 

आता आमच्या मोहिनीला कोणी गोलिनी म्हणत नाही. आम्ही आता तिला आमची सरोज खान म्हणतो. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदकंद ऐसा… भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदकंद ऐसा… भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

१८५७ पूर्वीचा भारत

इ.स.१८२२. फॅनी  पार्कस् आणि चार्ल्स क्रॉफर्ड पार्कस् हे दांपत्य पाच महिने बोटीने प्रवास करून इंग्लंडहून कोलकत्याला उतरले. फॅनीचा नवरा चार्लस् ईस्ट इंडिया कंपनीत कारकून होता.फॅनी चांगली चित्रकार होती. प्रवास आणि घोडदौड हे तिचे छंद होते . इथले लोकजीवन, धर्म, राजकारण, इतिहास, भूगोल हे सर्व  जाणून घेण्यात तिला रस होता . ती नेहमी स्वतःजवळ डायरी आणि स्केच बुक बाळगत असे. भारतात २४ वर्षे राहून ती लंडनला परत गेली. त्यानंतर  तिच्या डायऱ्या व अनुभव यावर आधारित तिने  पुस्तक लिहिले आहे. ते दोन खंडांमध्ये आहे.या पुस्तकातील बहुतेक सगळी रेखाचित्रे तिची स्वतःची आहेत.  पुस्तकावरील फॅनी पार्कस्  हे नाव आणि  सगळ्या चित्रांखाली तिची सही उर्दूमध्ये आहे. पुस्तकाच्या पहिल्या पानावर ‘श्री गणेश’ असं देवनागरीत लिहून त्याच्याखाली एखाद्या हिंदू घरातला सर्व देवदेवता असलेला देव्हारा असावा तसे चित्र आहे. शंख, घंटा, पळी पंचपात्र, ताम्हन यांचीही चित्रे आहेत. ती गणपतीला सलाम करते.  ‘ही गणपतीसारखी  लिहिते’ असे म्हटले जाऊ दे!’ असा आशीर्वाद ती गणपतीकडे मागते.

फॅनीने लिहिले आहे की, कोलकत्यामध्ये कॉलरा, देवी,एंन्फ्लूएंझा  असे साथीचे रोग होते.   घरात, बागेत सर्रास साप- विंचू सापडत होते.

नंतर चार्लसची बदली अलाहाबादला झाली. बोटीने ८०० मैल आणि घोड्यावरून ५०० मैल असा प्रदीर्घ प्रवास त्यांनी वाटेतल्या डाकबंगल्यांमध्ये मुक्काम करत केला . वाराणसीमध्ये ती हिंदू देवळांमध्ये गेली. तिने लिहिले आहे की हिंदूंचे सगळ्यात पवित्र शहर अंधश्रद्धेने भरलेले आहे. भोळसटपणा हा एक वाढीव अवयव हिंदूंमध्ये आहे.

अलाहाबादला पोहोचल्यावर त्यांनी यमुना नदीच्या किनाऱ्यावर  घर घेतले. फॅनी लिहिते की अंधाऱ्या,  धुक्याने काळवंडलेल्या लंडनमध्ये राहणारे लोक या उत्साही, आनंदी हवामानाची कल्पनाही करू शकणार नाहीत.

लखनौचा एक  इंग्रज सरदार अवधच्या नबाबाला भेटणार होता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी फॅनीला तिच्या लखनौच्या मैत्रिणीने आमंत्रण दिले.  नबाबी थाटाचे जेवणाचे समारंभ,नाच- गाणे, जनावरांच्या झुंजी झाल्या. इंग्रज पाहुणी म्हणून फॅनीला अनेक काश्मिरी शाली, भारतीय मलमलीचा आणि किनखाबाचा एकेक तागा , मोत्याच्या माळा, किमती खड्यांच्या बांगड्या, इतर दागिने भेट मिळाले.

अलाहाबादला  राहत असताना तिने सती जाण्याचा प्रसंग पाहिला. त्याचे हृदयद्रावक वर्णन आपण वाचू शकत नाही.

 १८३० मध्ये तिच्या नवऱ्याची बदली कानपूरला हंगामी कलेक्टर म्हणून झाली.दीडशे मैलांचा हा प्रवास पालखीतून सशस्त्र पोलीस बंदोबस्तात झाला.  या काळात उत्तर हिंदुस्थानात ठगांच्या टोळ्यांनी  धुमाकूळ घातला होता.हे ठग  प्रवाशांना लुटून, मारून त्यांची प्रेते विहिरीत फेकून देत. फॅनीने ठगांच्या कार्यपद्धतीची माहिती मिळवून त्याचे सचित्र वर्णन केले आहे.

कानपूरमध्ये चामड्याच्या वस्तूंचा धंदा जोरात होता. चामड्यासाठी विष घालून जनावरे मारण्याचा प्रकारही सर्रास होत असे.

२६ जुलै १८३१ ला फॅनीच्या डायरीत नोंद आहे की गव्हर्नर जनरलने आग्र्याची प्रसिद्ध मोती मस्जिद रुपये १,२५,००० या रकमेला विकली. ती पाडून तिचे संगमरवर विकण्यात येणार आहे. ताजमहालही विकण्यात येणार आहे असे जाहीर झाले आहे.  फॅनीने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ती लिहिते की गव्हर्नरजनरलला ताजमहाल विकण्याचा काय अधिकार आहे? पैशासाठी असे करणे अशोभनीय आहे. पुढे पार्लमेंटमध्ये गदारोळ झाल्यामुळे हा प्रस्ताव बारगळला आणि ताजमहाल वाचला.

१८३४   मध्ये फॅनीने एक लहान गलबत खरेदी केले .  खलाशांना घेऊन ती एकटीच प्रवासाला निघाली.तिने ताजमहालचे अगदी बारकाईने वर्णन केले  आहे. आग्र्याच्या किल्ल्यातील संगमरवरी नक्षीकाम केलेले आणि रत्नमाणकं जडविलेले बाथटब काढून गव्हर्नरजनरलने ते इंग्लंडच्या राजाला पाठविल्याचे तिने लिहिले आहे. तसेच तिथल्या गुप्तपणे फाशी देण्याच्या अंधाऱकोठडीबद्दलही लिहिले आहे.

१८५७ पूर्वीचा भारत— भाग एक समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझा कॅन्सर… भाग-२ – सुश्री मंगला नारळीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ माझा कॅन्सर… भाग-२ – सुश्री मंगला नारळीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(पाश्चात्य वैद्यकीय पद्धतीला त्यावर पूर्ण यश मिळवता येत नसेल, तर आपल्याला पटणाऱ्या इतर औषधांचाही प्रयोग करावा, या मतावर मी आले.) इथून पुढे —- 

आता मला अधिक जोरदार केमो दिली गेली. यावेळी ती इंजेक्शने घ्यायला ‘टीएमएच’मध्ये जाण्याचे ठरले. सुहास माझ्याबरोबर येत असे. प्रत्येक इंजेक्शननंतर चोवीस तास सतत उलट्या होत, मग पूर्ण थांबत. अशक्तपणा खूप असे. या वेळी मी दोन दिवस माहेरी राहून विश्रांती घेत असे. दुसऱ्या इंजेक्शननंतर खूप केस गळले, तिसऱ्यानंतर सगळेच केस गेले. एक लांब केसांचा टोप किंवा विग माझ्या भावाने कुणाकडून तरी करून आणला. एवढा मोठा विग मला फार जड होता, त्याने भारी उकडत असे. मग त्या विगचे केस कापून, आटोपशीर पोनी टेल बनवून घेतली. बाहेर जाताना मी तो लावत असे, घरात एक स्कार्फ पुरे. जानेवारी १९८९नंतर दुसरी केमो संपली, अशक्तपणा खूप होता; पण आता टामोक्सिफेनच्या गोळ्यांव्यतिरिक्त काही औषधे नव्हती. पुढे पाच-सहा महिन्यांनी बऱ्यापैकी केस आले.

आम्ही १९८९च्या जूनमध्ये पुण्यात राहायला गेलो. ‘आयुका’ची स्थापना होत होती. पुणे हे आयुर्वेद वैद्यकीचे माहेरघर. माझ्या आईचे वैद्यकीय शिक्षण आणि काम तिथेच झाले. पुण्यातील वैद्यांचे औषध घ्यावे, म्हणून मी आईचे सहकारी वैद्य भा. पु. नानल यांच्याकडे गेले. त्यांना स्पष्ट विचारले, ‘आयुर्वेदात कॅन्सरसाठी औषध दिले आहे का?’ त्यांनीही तेवढ्याच स्पष्टपणे सांगितले, की तसे औषध नाही. आयुर्वेदाची रचना झाली, तेव्हा या रोगाची आता आहे तशी माहिती नव्हती. ते म्हणाले, ‘मी कॅन्सरसाठी औषध देणार नाही; पण या रोगाचे भयावह रूप त्याच्या शरीरात इतरत्र पसरण्यात किंवा सेकंडरीजमध्ये असते. तुझ्या शरीरात अशा सेकंडरीजना थारा मिळू नये, महत्त्वाच्या अवयवांचे रक्षण व्हावे, म्हणून तुझे एकूण शरीर चांगले सुदृढ, टणक करण्याचा प्रयत्न करणार.’ मला त्यांचे म्हणणे पटले. मी त्यांची औषधे चार-पाच वर्षे घेतली, एकंदरीत प्रकृती चांगली झाली. नंतर त्यांच्या परवानगीने हळूहळू औषधे बंद केली. त्यानंतर २०२१च्या सप्टेंबरपर्यंत, म्हणजे १९८८च्या सेकंडरी प्रादुर्भावानंतर ३३ वर्षे मी निरोगी राहिले, त्याचे काही श्रेय मी स्ट्राँग केमोथेरपीला, काही आयुर्वेदिक औषधयोजनेला, काही माझ्या नैसर्गिक प्रकृतीला, तर थोडे श्रेय भाग्य या सर्वस्वी अज्ञात गोष्टीसाठी देते. कॅन्सरची प्रथम गाठ पडली, तेव्हा आणखी १५-२० वर्षे आयुष्य मिळेल तर बरे होईल, असे वाटत होते. नियती त्यापेक्षा बरीच दयाळू निघाली.

आपल्याला लवकरच मृत्यू येऊ शकतो, याची पहिल्या ऑपरेशननंतर जाणीव झाली. त्यानंतर माझ्या विचारांत आणि विविध गोष्टींचा अग्रक्रम लावण्यात फरक झाला. लोक काय म्हणतील, यापेक्षा मीच विचार करून काय अधिक महत्त्वाचे, अधिक चांगले ते ठरवू लागले. मनापासून आवडणाऱ्या गोष्टी आधी करण्याचे ठरवू लागले. आधीपासून बुद्धिवादी होतेच, आता अधिक बुद्धिवादी झाले. एखाद्या गोष्टीवर माझे मत वेगळे असले, तरी ते स्पष्टपणे मांडू लागले. इंग्रजीमधील ‘आय बेग टु डिफर’ हे विधान मला आवडते. त्याचा जास्त वेळा उपयोग करू लागले. एखाद्याने चांगली गोष्ट केली, तर वेळ न घालवता, शक्य तेवढ्या लवकर शाबासकी किंवा स्तुती पोहोचवू लागले. स्वत: बुद्धिवादी असले, तरी अनेक प्रेमाच्या माणसांच्या अंधश्रद्धांकडे जास्त सहानुभूतीने पाहू लागले. ही इतकी चांगली माणसे, अंधश्रद्धांवर विश्वास का ठेवत असतील, याचे मानसशास्त्रात उत्तर मिळते का, हे पाहू लागले. लहानशा गोष्टींचा फार बाऊ करू नये, असे वाटू लागले. पूर्वीपासून मी सूर्यनमस्कार व काही योगासने करीत होते, आता हे व्यायाम अधिक नियमित करू लागले; त्यामुळे शरीर लवचिक व निरोगी राहण्यास मदत झाली.

कॅन्सरच्या पहिल्या प्रादुर्भावानंतर ३५ वर्षांची मोठी लीज मिळाली, असे मी मानते. मागे वळून पाहताना, ती चांगली वापरली गेली याचे समाधान वाटते.

तिन्ही मुलींना मोठ्या होताना, जबाबदार नागरिक म्हणून काम करताना, आपापले संसार समर्थपणे सांभाळताना पाहिले. आता नातवंडांची प्रगती पाहत आहे. जयंतच्या आई-वडिलांना त्यांच्या वृद्धपणात आम्ही आधार देऊ शकलो. जयंतचे वडील त्यांच्या आयुष्याची अखेरची १८, तर आई २४ वर्षे आमच्या घरी निवास करीत होते. घरातील जबाबदाऱ्या कमी झाल्यावर मी जयंतबरोबर अनेक देशांचा प्रवास केला, तेथील संस्कृती पाहिल्या; त्यामुळे माझे जीवन अधिक समृद्ध, श्रीमंत झाले. विविध देशांच्या अनुभवावर लहानसे पुस्तक लिहिले. माझा आवडता विषय गणित, तो जमेल तेव्हा वेगवेगळ्या स्तरातील विद्यार्थ्यांना शिकवला. लोकांमध्ये त्याची आवड निर्माण व्हावी, निदान भीती कमी व्हावी, म्हणून लेखन केले. पुढे ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकांवर काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा शाळेतील मुलांना गणित सोपे व रोचक वाटेल असा प्रयत्न केला. ही सगळी कामे आनंद आणि समाधान देणारी होती, म्हणून मिळालेली लीज चांगली वापरली गेली असे वाटते.

आता २०२१मध्ये दुसऱ्या स्तनातही लहानशी गाठ आली, बायोप्सीमध्ये ती कॅन्सरची निघाली. मग दुसऱ्या बाजूची मास्टॅक्टोमी ३५ वर्षांनी करावी लागली. त्या वेळी पेटस्कॅनमध्ये इतरत्र कॅन्सरचा प्रादुर्भाव नाही, असे समजले होते; पण २०२२च्या जूनमध्ये सतत बारीक ताप का येतो यासाठी चिकित्सा करताना, फुप्फुसाचा कॅन्सर दिसला. त्यासाठी अर्थात केमो चालू केली. एकूण पाच इंजेक्शने दिली. सुदैवाची गोष्ट म्हणजे, १३ डिसेंबरला केलेल्या पेट स्कॅनमध्ये, आता कॅन्सरचा शरीरात प्रादुर्भाव दिसत नाही, असा अभिप्राय आला. म्हणजे पुन्हा एकदा लीज मिळाली आहे. किती मोठी, हे माहीत नाही; पण हा रोग फसवा आहे, केव्हाही परत हल्ला करू शकतो, हे माहीत आहे. आयुष्य जेवढे आहे, तेवढे त्यातल्या त्यात सुखाचे, शांतीचे असावे, असा प्रयत्न करते. पुन्हा एकदा अग्रक्रम पाहते आहे. खरोखर काय जास्त महत्त्वाचे, ते ठरवते आहे.

आयुष्यात नेहमी काही ना काही आनंद वेचता येतो, आपल्याला आशा आणि उमेद देतो, असा माझा विश्वास आहे. मंगेश पाडगावकर यांची ‘कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी’ ही कविता आठवावी. निसर्गातील अनेक लहान लहान गोष्टींत कवीला ईश्वराची खूण दिसते, मला त्यातला जीवनानंद दिसतो. कधी कधी एखाद्या परिस्थितीत अनपेक्षित विनोद दिसतो, तो टिपला पाहिजे. विनोद हे ताण कमी करण्याचे, हसून आनंदी राहण्याचे चांगले साधन आहे. कोणी सजीव अमर नसतोच. अखेरच्या वेळी मला किंवा माझ्या जवळच्या लोकांना फार त्रास होऊ नये, ही मनापासून इच्छा आहे. माझ्या देहाचे काही भाग कुणा व्यक्तीचे जीवन सुखाचे करणार असतील, तर तसे जरूर व्हावे, मला त्यात आनंद आहे.

— समाप्त — 

लेखिका : सुश्री मंगला नारळीकर

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वप्न… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

स्वप्न? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

स्वप्न नुसता शब्द जरी वाचला तरी कितीतरी विचार मनात रुंजी घालायला लागतात. कारण प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असतेच आणि ते कोणी बोलून दाखवले नाही तरी ते पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू असते.

स्वप्नांची सुरुवात जन्मल्यापासूनच होते. लहानपणी पाळण्यात बाळ झोपलेले असताना झोपेत बाळ गोड हसते किंवा झोपेतच दचकून एकदम रडायला लागते तेव्हा आजी किंवा घरातील मोठ्या व्यक्ती म्हणतात स्वप्न पाहिलं असेल. सटवाई बाळांना स्वप्न दाखवते.

नंतर मुल जसजसे मोठमोठे होऊ लागते तसतशी त्याची स्वप्ने पण बदलत जातात. आणि शक्यतो बदललेली स्वप्ने ही त्या त्या काळानुरूप त्याला योग्य वाटतील अशी असतात आणि लहान वयातील स्वप्ने बहुतांशी पूर्ण झालेली असतात म्हणून मग त्या आत्मविश्वासाने मोठी स्वप्ने पाहिली जातात.

अब्दुलजी कलाम यांनी म्हटलय छोटी स्वप्ने पाहणे हा अपराध आहे. स्वप्ने मोठी पहा त्याचा पाठपुरावा करा आपोआप ती पूर्ण होतील.

या बाबत ते असेही म्हणतात की स्वप्ने अशी नसावीत की जी झोपेत पाहिली जातात स्वप्ने अशी असावीत की जी झोपूच देत नाहीत.

साधारणपणे मुली ज्या असतात त्या बहुतांशी आपल्या सुखी संसाराचे असे एकच स्वप्न पहातात. त्यासाठी त्या झटत असतात. आणि अगदी १००% नाही तरी काही अंशी त्या त्यामधे यशस्वी होतात. पण मुलांची स्वप्ने मात्र वेगवेगळी असतात.

पण नेमके स्वप्न म्हणजे काय? तर स्वप्न म्हणजे ध्येय म्हणता येईल. जे गाठण्यासाठी ज्याची त्याची धडपड चालू असते. हीच गोष्ट त्याच्या जगण्याचे कारण बनते .लहानपणी आई वडिल किंवा मोठे सांगतात ते पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे वाटून पाहिलेले स्वप्न नंतर महत्व पटल्यावर चांगला अभ्यास करण्याचे स्वप्न नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या नोकरीचे स्वप्न नंतर आपले संसार करण्याचे स्वप्न आणि मग संसारतील व्यक्तींना सुख देण्याचे स्वप्न या स्वप्नचक्रात माणूस अडकलेला असतो.

काहीजण कला जोपासण्याचे त्यात नाव कमावण्याचे स्वप्न पाहतात . किंवा काही जण वेगळे काही करून दाखवण्याच्या ईर्षेने पेटलेले दिसतात.

पण म्हणून सगळ्यांनाच महत्व प्राप्त होत नाही. स्वप्ने जी इतरांपेक्षा वेगळी असतात त्यात इतरांचेही हित सामावलेले असते जे सोपे नसते हे सगळ्यांना माहित असते पण असे स्वप्न जेव्हा कोणी पाहतो आणि ते पूर्ण करतो तेव्हा त्याचे नाव झालेले आपण पाहतो.

तर अशी ही स्वप्ने. पण यातूनही स्वप्नाचा खरा अर्थ समजत नाहीच. आपल्याला आश्चर्य वाटेल  पण स्वप्नाचा आणि अध्यात्माचा जवळचा संबंध आहे.

कसा? अध्यात्म सांगते मी पणा सोडा. सगळे चांगले होईल. तसेच हे स्वप्न••• स्व पणा नसलेल••• पहा एखादे स्वप्न पूर्ण करणारा स्वत:ची तहान भूक विसरून किंवा बाकीचे जग विसरून अर्जूनाच्या लक्ष्याप्रमाणे फक्त स्वप्नाच्या पाठीमागे असतात. यामधे कुठेही स्व पणा अर्थात मी पण पर्यायाने अहं नसतो म्हणून ते स्वप्न.

सगळ्यांची स्वप्ने ही मी पणाशी निगडीत असतात म्हणून त्याला महत्व प्राप्त होत नाही. पण मोठी स्वप्ने ज्यामधे इतरांचेही हित सामावलेले असते अशी स्वप्ने पाहणारी माणसे वेगळीच असतात त्यामुळे अशी स्वप्ने पाहणार्‍याचे नाव होते आणि त्याचे अप्रुप वाटू लागते.

म्हणूनच चला मी पणा सोडून देऊ. सर्व सामावेशतकतेचे स्वप्न पाहू आणि घर शहर देश नव्हे सर्व जग सुखी करण्याचे स्वप्न पाहू

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्तित्व… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ अस्तित्व… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

आजचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गाव. महाभारतातील कौरव पांडवांच्या काळातील एकचक्र नगरी. एके काळची जुनी बाजारपेठ. ऐतिहासिक गाव. या इतिहासाच्या खुणा आज भग्नावस्थेत का होईना पण एके काळच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. वेगवेगळे जुने ऐतिहासिक दरवाजे, वाडे, बुरुज, बारव आजही गतवैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर मिरवत आहेत. गावात प्राचीन मंदिरे आहेत. राम मंदिर, केशवराज मंदिर, गणेश मंदिर, शिव मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. जवळच पद्मालय म्हणून एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी श्री गणेशाचे जागृत असे देवस्थान आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे एकाच ठिकाणी उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा अशा दोन गणेश मूर्ती आहेत. मंदिराबाहेर ४४० किलो वजन असलेली एक पंचधातूची प्रचंड मोठी घंटा आहे. तिचा आवाज अनेक किमी पर्यंत दूर ऐकू जातो असे म्हणतात. मंदिरासमोर असलेल्या तळ्यात सुंदर कमळे उमललेली असतात. म्हणूनच पद्मालय असे सार्थ नाव या पवित्र ठिकाणाला आहे. श्री गणरायाला रोज कमलपुष्पे अर्पण केली जातात. येथे अंगारकी, संकष्टी चतुर्थी आणि सुट्यांच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते. येथून जवळच भीमाने बकासुराचा वध ज्या ठिकाणी केला ती जागा आहे. 

एकचक्रनगरी या नावाव्यतिरिक्त एरंडोल शहराची अरुणावती आणि ऐरणवेल अशीही नावे असल्याचे सांगितले जाते. कदाचित ऐरणवेल या नावाचा अपभ्रंश होऊन एरंडोल हे नाव पडले असावे. अशा या गावात पांडव अज्ञातवासात असताना राहिले होते. ते या ठिकाणी ज्या वाड्यात राहिले होते, त्या वाड्याला पांडववाडा असे नाव पडले आहे. आजही हा वाडा या पौराणिक घटनेची साक्ष देत उभा आहे. या वाड्याच्या प्रवेशद्वारावर कमळफुलांची नक्षी आहे. आत प्रवेश केल्यावर भरपूर मोकळी आणि प्रशस्त जागा, रुंद आणि अनेक खिडक्या असलेल्या भिंती आहेत. त्यांच्यावर नक्षीकाम आहे. आज मात्र या पांडववाड्याकडे बघवत नाही. तिथे जामा मशीद उभी आहे. वास्तू कडीकुलुपात बंदिस्त आहे. या पांडव वाड्याजवळच एक धर्मशाळा आहे. एक मोठे वडाचे झाड आहे. तिथे पारावर एका बाजूला गणपती आणि देवीचं मंदिर आहे. 

याच पांडव वाड्याच्या उजव्या बाजूला एक ऐतिहासिक केशवराजाचं मंदिर उभं आहे. मंदिरात काळ्या पाषाणापासून तयार झालेली केशवाची देखणी आणि रेखीव मूर्ती आहे. या मंदिराची देखभाल आणि मालकी मैराळ परिवाराकडे गेल्या सात ते आठ पिढ्यांपासून आहे. काही भाविकांचे हे कुलदैवतही आहे. याच मंदिरात ज्यांचं वास्तव्य होतं असे प्रकाशराव मैराळ हे माझे नात्याने साडू आणि माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ. पण साडू किंवा मेहुणे यापेक्षाही आमच्या नात्याला मैत्रीच्या नात्याची किनारच जास्त ! 

लग्नानंतर आमचं खूपदा एरंडोलला जाणं येणं व्हायचं. मंदिरात पाऊल ठेवताच प्रकाशराव हसतमुखाने आमचं तत्परतेनं स्वागत करायचे. साधारण पाच फूट उंची पण सुबक ठेंगणी अशी त्यांची मूर्ती. पिळदार आणि गोटीबंद शरीर. चेहऱ्यावर सदैव हास्य विराजमान. प्रकाशराव म्हणजे उत्साहमूर्ती ! त्यांचा दिवस सकाळी पाच वाजताच सुरु व्हायचा. मंदिराच्या बाजूला असलेल्या विहिरीचं पाणी सकाळी रहाटाने काढून सगळ्यांसाठी भरून ठेवणार. त्याच पाण्याने स्तोत्र म्हणत त्यांचं स्नान व्हायचं. मग केशवराजाची यथासांग पूजा असायची. मंत्र, आरती सगळं काही शुद्ध आणि खणखणीत आवाजात. प्रकाशराव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. त्यांच्या विविध गावी बदल्या व्हायच्या. पण कुरकुर, तक्रारीचा सूर कधीच ऐकू यायचा नाही. देवाची पूजा झाली की ही वामन मूर्ती सायकलवर बसून आपल्या शाळेत वेळेवर हजर असायची. गावकरी, शिक्षक, अधिकारी आणि विद्यार्थी साऱ्यांनाच हवेहवेसे वाटणारे आणि आपल्या कर्तव्यात कधीही कसूर न करणारे हे व्यक्तिमत्व होते. 

देव काही काही माणसांना प्रचंड ऊर्जा देतो. तसंच प्रकाशरावांच्या या उत्साहाचं मला नेहमी कौतुक वाटायचं. देवपूजा, घरातील कामं हे सगळं आटोपून वेळ मिळाला की स्वारी सायकलला टांग मारून शेतावर जायची. त्यांची पत्नी म्हणजेच माझ्या सौभाग्यवतीची तीन नंबरची बहीण सुद्धा प्रचंड कष्टाळू . खरं तर ती स्टेनो झालेली होती. शहरात उत्तम पगाराची नोकरी तिला त्या काळात कुठेही सहज मिळाली असती. पण तिने प्रकाशरावांचा संसार प्रकाशमान केला. स्वतःला त्यात विलीन करून टाकले. आपल्या दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा यांना शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार प्रकाशराव आणि बेबीताईंनी दिले. 

दोघांनीही केशवराजाच्या सेवेत कधी कसूर केली नाही. सगळे सण, उत्सव ते मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने करीत राहिले. चातुर्मासात प्रकाशराव मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी भागवताचे वाचन करीत. एरंडोल गावातील गावकऱ्यांसाठी प्रकाशराव आणि बेबीताई दोघेही आदराचे स्थान. केशवराजा या दोघांची कसून परीक्षा घेत होता. पण हे दोघेही त्यात कुठेही कमी पडले नाहीत. त्याचे फळ केशवराजाने पदरात घातले. दोन्ही जुळ्या मुली प्रेरणा आणि प्रतिमा यांना उत्तम स्थळे मिळून त्यांचा विवाह झाला. मुलगा श्रीपाद एम फार्म होऊन मुंबईला कंपनीत रुजू झाला. यथावकाश त्याचेही लग्न झाले. केशवराजाच्या कृपेने उच्चशिक्षित, सद्गुणी अशी प्राजक्ता सून म्हणून घरात आली. प्राजक्ता आणि श्रीपादच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या. एक मुलगा आणि एक मुलगी. 

असं सगळं सुखात चाललं होतं. प्रकाशराव आपला सेवाकाल पूर्ण करून निवृत्त झाले होते. आता खरे तर त्यांचे सुखाचे आणि आरामाचे दिवस होते. पण माणसाच्या नशिबी असलेले भोग काही चुकत नाहीत. मुखात अखंड गोपाळकृष्णाचे नाव असलेल्या या उत्साही, आनंदी आणि तत्पर माणसाला संधी मिळताच आजारांनी ग्रासले. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा विकार लागला. पुढे पुढे तर मेंदूचे शरीरावर असणारे नियंत्रण कमी कमी होत गेले. जवळपास अकरा ते बारा वर्षे प्रकाशरावांना जळगाव येथील मेंदूरोग तज्ज्ञांचे उपचार सुरु होते. कधी थोडीफार सुधारणा दिसायची. पण पुन्हा सगळ्यांना त्यांची काळजी लागून राहायची. या सगळ्या कालावधीत बेबीताई पदर खोचून धीराने उभ्या राहिल्या. जवळ कोणी नसताना गाडी करून त्यांना जळगावला उपचारासाठी त्या घेऊन जायच्या. शनिवार रविवार श्रीपाद मुंबईहून येऊन आईला मदत करायचा. प्राजक्ताही आपल्या दोन लहानग्यांना सांभाळून सासू सासऱ्यांच्या सेवेत तत्पर असायची. 

अशा परिस्थितीही बेबीताईंनी केशवराजाकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष होणार नाही याची भक्तिभावाने आणि प्रेमाने काळजी घेतली. चातुर्मासात प्रकाशरावांचा भागवत सांगण्याचा वारसा त्यांनी घेतला. आम्ही अधूनमधून एरंडोलला जायचो. आम्ही गेलो की यापूर्वी सदैव उत्साही असणाऱ्या असणाऱ्या  प्रकाशरावांना असं परावलंबी होऊन अंथरुणावर पडलेलं पाहताना गलबलून यायचं. शेवटी शेवटी तर फिट्स यायला सुरुवात झाली. बेबीताई आणि मुलांनी उपचारात कसूर ठेवली नाही. पण फार काही सुधारणा होत नव्हती. प्रकाशरावांच्या मुखातून गोपाळकृष्णाचे नाव मात्र ऐकू येई. आपल्या केशवराजावर त्यांचं अतोनात प्रेम आणि श्रद्धा. 

आधी गावभर, मंदिरभर, घरभर असणारे प्रकाशरावांचे अस्तित्व आता अंथरुणावर होते. गेल्या महिन्यात परिस्थिती आणखी बिघडली. प्रकाशरावांना जळगावला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. पण सुधारणा होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. त्यांना शेवटी कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला. डॉक्टरांनी सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर त्यांना घरी नेण्यास सांगितले. घरी आणल्यानंतर तीन साडेतीन तासात केशवराजाच्या साक्षीने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. एक प्रकाश दुसऱ्या प्रकाशात विलीन झाला होता. एक उत्साहमूर्ती शांत झाली होती. निर्जीव देहाच्या रूपात आता त्यांचं अस्तित्व उरलं होतं. काही तासांनी तेही अस्तित्व लोप पावलं. तिसऱ्या दिवशी केवळ अस्थींच्या स्वरूपात हे अस्तित्व उरलं. काही दिवसांपूर्वी आपल्याशी हसून खेळून बोलणाऱ्या व्यक्तीचं अस्तित्व आपल्यासमोरच कसं हळूहळू नष्ट होत जातं याचा विषण्ण अनुभव मी घेत होतो. यथावकाश त्या अस्थीही नर्मदेत विसर्जित करण्यात आल्या. रक्षा नदीत सोडून देण्यात आली. आता त्यांच्या अस्तित्वाच्या त्याही खुणा नष्ट झाल्या होत्या. 

प्रकाशराव गेल्यावर गावातील लोक हळहळले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी स्त्री पुरुषांनी गर्दी केली. श्रीपादच्या मित्रांनी अंत्यविधीची सगळी व्यवस्था केली. नगराध्यक्षांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या घरी तीन दिवस जेवण आणि चहाची व्यवस्था गावातील लोकांनीच केली. ग्रामीण भागातील लोकांचे प्रेम आणि माणुसकी अजून टिकून आहे याचे दर्शन या निमित्ताने घडले.

आता मंदिरात होती त्यांची प्रतिमा हार घातलेली. आता त्यांचं अस्तित्व फोटोतच असं म्हणायचं का ? त्यांनी मुलांना दिलेले संस्कार, आपल्या ज्ञानदानाने घडवलेले विद्यार्थी, गावातील लोकांना दिलेलं प्रेम या सगळ्यांच्या रूपात त्यांचं अस्तित्व आहेच ! तुकाराम महाराज म्हणतात 

तुका म्हणे एका मरणेची सरे । उत्तमची उरे कीर्ती मागे ।।

हा देह नाशिवंत आहे. हाताने नित्य सत्कर्म करावे आणि मुखाने परमेश्वराचे नाम घ्यावे. त्यातच जीवनाचे सार्थक आहे. मरावे परी कीर्तिरूपे उरावे असेच तुकोबाराय सांगतात. एरंडोल नगरीत महाभारतकालीन पांडववाडा, विविध मंदिरे, दरवाजे आदींचे अस्तित्व उरले आहे. त्या काळातील कीर्ती त्या वास्तू गात राहतील. प्रकाशरावही स्मृती रूपाने आपले अस्तित्व मागे ठेऊन गेले आहेत. 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – माझी दंत कथा… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

अल्प परिचय 

सिव्हिल हॉस्पिटल, सांगली येथे  23 वर्षापासून कार्यरत. वाचन,संगीत, विविध कला जोपासणे कविता, ललित लेखन यात विशेष रस. हसणे आणि हसवणे मनापासून आवडत असल्याने विनोदी लेखनाची आवड.

? मनमंजुषेतून ?

☆ – माझी दंत कथा… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

आता तुम्ही म्हणाल ही कसली कथा? दंतकथा म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या कथा ना ! मग तुझी कसली ही कथा ?….  अहो दंतकथा म्हणजे माझ्या दाताची – मी गमावलेल्या अक्कलदाढेची कथा.

तर काय सांगत होते मी ….  आटपाट नगरामध्ये एका स्त्रीचे आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. पण अशा या सुरळीत आयुष्यात या स्त्रीच्या म्हणजे माझ्याच हो, दातामध्ये किडीचा प्रादुर्भाव झाला आणि ही दंतकथा उदयास आली. तर झालं असं, रात्री अपरात्री माझ्या दाताने त्याचे अस्तित्व अधोरेखित करायचा चंगच बांधला. एकदा ठणका सुरु झाला की झोपेचं खोबरंच. स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करत असून देखील इन जनरल कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढायची नाही अशा गैरसमजुतीमुळे मी घरीच दुखऱ्या दाता जवळ मीठ- हळद दाबुन ठेवणे, लंवग धरणे, असे काही-बाही घरगुती उपाय केले. त्याने थोडे दिवस बरे वाटले. पण हे दुखणे काही हटेना. शेवटी खूप सारं मानसिक बळ एकवटून आमची स्वारी दाताच्या दवाखान्याकडे वळली. थोडे दिवस औषधांचा मारा करून मग अक्कलदाढ काढायची असे डॉक्टरांनी सांगितले.

ठरलेल्या दिवशी उसने अवसान आणून मी दवाखान्यात जाऊन बसले. आणि माझा नंबर येण्यासाठी वाट पाहू लागले. हल्ली पूर्वीसारखं वाट पाहणं फार काही बोरिंग असे होत नाही ते मोबाईलबाबांच्या कृपेमुळे. थोडा वेळ मोबाइल चेक केला. पर्समध्ये सुधा मुर्तींचे वाइज अँड अदरवाइज पुस्तक होते. ते थोडे वाचले. पण चैन काही पडेना. शेजारी एक बाई त्यांच्या लहान मुलाला घेऊन बसल्या होता. ते बाळ देखिल एका ठिकाणी बसून कंटाळलं होतं. दिसेल ती वस्तू- गाडीची चावी, आईची ओढणी सर्व काही ते बाळ तोंडात घालत होते आणि त्याची आई शीsss हे तोंडात घालू नको ते तोंडात घालू नको असे उपदेश देत होती. मधूनच ते बाळ माझ्याकडे प्राणीसंग्रहालयामध्ये असलेल्या एखाद्या प्राण्याकडे पहावे तसे पाहत होते. मग मी पण त्याला चुटकी वाजवून खेळवायचा प्रयत्न करू लागले. त्याचे आईच्या अंगावर, सोफ्यावर उड्या मारणे सतत चालू होते. थोड्या वेळाने त्या गोंडस बाळाला झोप आली. म्हणून त्याच्या आईने त्याला झोपवण्यासाठी  थोपटणे सुरू केले. आणि आपण लहान मुलांना झोपवताना गुणगुणतो तसे आsss आss गाणे  सुरू केले. तसे ते बाळ सुध्दा जोरजोरात आsss आsss असा सूर लावू लागले. नेमके त्याच वेळी माझे लक्ष दुसरीकडे असल्याने त्याच्या त्या मोठ-मोठ्याने आsss आsssकरण्यामुळे मी एकदम दचकून पाहिले. त्या माय-लेकराचं दोघांचं आsss आsss सुरु होते. खरेतर हे पाहून मला खूप हसू फुटले. मी विचारात पडले. नक्की कोण कोणाला झोपवत आहे. मी त्या बापड्या आईला तसे विचारले देखिल. ती पण खुप हसत होती. शेवटी एकदा त्या बाळाला निद्रादेवी प्रसन्न झाली. आणि लेकरू झोपी गेलं. आणि त्याच्या आईने मोठा सुस्कारा सोडला. त्याला झोप आल्यावर तो असेच मोठ-मोठ्याने आsss  आsss असं गाणं म्हणतोअसे सांगू लागली.असो काही का असेना त्यामुळे माझा वेळ कसा गेला मला कळालंच नाही.

थोड्या वेळाने त्या बाळाची मोठी बहीण म्हणजे ७-८ वर्षाची गोड मुलगी डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आली. तेव्हा मीच मनाला समजावलं बघ एवढीशी मुलगी देखिल हसत हसत बाहेर आली आहे, मग तू कशाला घाबरतेस. मग झाशीच्या राणीप्रमाणे उत्साहाची वीज अंगात सळसळली आणि मी डॉक्टरांच्या केबिनकडे प्रस्थान केले. डॉक्टर दूरचे का असेनात पण  नात्यातीलच असल्यामुळे एक दिलासा होता. थोडफार बोलणे झाल्यानंतर मदतनीसांनी मला त्या खुर्चीत बसायला सांगितले. खरेतर ती खुर्ची इतकी सुंदर आणि आरामदायी होती की त्यावर क्षणात झोप लागावी. पण दुखणाऱ्या दाढेमळे ते आसन म्हणजे अदृश्य काट्याकुट्यांनी व्यापलेलं एखाद्या राज्याचे सिंहासन असल्याचा भास झाला. थोड्या वेळाने डॉक्टर आले. त्यांनी  माझ्या दाढेवर लक्ष केंद्रीत केले आणि माझ्या दाढेजवळ स्प्रे, इंजेक्शन वगैरे उपाय योजना सुरू केल्या. इंजेक्शन देताना मात्र कसा कुणास ठाउक मी एकदम हात हलवला. डॉक्टरांनी त्यावेळी मला सौम्य भाषेतच पण सुई टोचेल तुम्ही हलू नका असे सांगीतले. डॉक्टर म्हणाले “ तुम्हाला जेव्हा जडपणा, बधिरपणा जाणवतो तेव्हा सांगा. काही गडबड नाही मात्र आजिबात हलू नका.” मी तशातच मान डोलावली आणि थोड्या वेळाने मी तयार आहे असे सांगीतले. आता मात्र मी माझे दोन्ही हात त्या चेअरच्या आर्म रेस्टवर असे काही घट्ट पकडले की मला घोरपडीची कथाच आठवली.

माझ्याकडून अनुमोदन मिळताच डॉक्टर त्यांच्या चेअरमधून अशा  आविर्भावात उठले की आता आर या पार. पांढरी वस्त्र धारण केलेला योध्दा आक्रमणsss म्हणून आता लढायला सज्ज झाल्याचा भास झाला. आतून पुरती भेदरलेली मी माझी हाताची पकड आर्मरेस्टवर आणखीनच घट्ट केली. डॉक्टर म्हणाले,’ शांत रहा आणि उलट्या क्रमाने मनात आकडे मोजा.’ मी आपली मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ चा जप सुरू केला. आणि माझ्या तोंडात तुंबळ युद्ध सुरू झाले, पण खरी कमाल तर मला भूलीच्या इंजेक्शनची वाटली. हा सारा प्रकार त्या भूलीच्या इंजेक्शनमुळे आपल्याच तोंडात सुरू आहे. असे वाटतच नव्हते. जणू काही माझ्या शेजारी जे बसलेत त्यांचीच दाढ काढणे सुरू आहे.आणि मी ते बघत आहे. मनोमन मी त्या भूलीच्या इंजेक्शनचा शोध लावणाऱ्या  थोर विभूतीला साष्टांग दंडवतच घातलं. आणि ति-हाईताप्रमाणे डोळे झाकून या  युध्दाची साक्षीदार व्हायचा प्रयत्न करू लागले.

एवढ्यावेळ चुळबुळ करणारी मी शांत आहे त्यामुळे मला झोप लागली की काय असे डॉक्टरांना वाटले असावे. म्हणून की काय, डोळे उघडा- डोळे उघडा असे ते म्हणून लागले. म्हणून डोळे उघडून पाहते तो काय डॉक्टरांनी विजयी मुद्रेने युद्ध समाप्त झाल्याची घोषणा केली व सांगितले.. ‘ झालं. झालं,काढला दात.’ आणि असे म्हणून त्यांनी दाढ काढलेल्या पोकळीमध्ये औषधात भिजवलेला बोळा दाबला आणि तोंड बंद करून बसायला सांगितले. तो कापसाचा बोळा तासभर तसाच तिथे राहू दे आणि तासभर अजिबात बोलू नका असे सांगितले. खरेतर तो कापसाचा बोळा हलू नये म्हणून त्यांनी मला तासभर बोलू नका असा सल्ला दिला हे समजले. पण आज दिवसभर जास्त बोलू नका असे म्हणाल्यावर स्त्री स्वभावधर्मानुसार मी डॉक्टरांबरोबर खूप बोलत होते आणि त्यातून डॉक्टर माझ्या मिस्टरांच्याकडून नात्यातले असल्यामुळे यांनीच डॉक्टरांना हिला दोन दिवस गप्प बसायला सांगा असे सांगितले असावे असा दाट संशय आला. मनात शंकेची पाल चुकचुकली आणि मनातले एसीपी प्रद्युम्न म्हणाले ‘ कुछ तो गडबड है दया..’

जरी आतून किडीने पोखरली होती  तरी ती बाहेरून पूर्ण गोलमटोल दिसत होती. माझीच दाढ ती माझ्यासारखीच चांगली बाळसेदार होती. हल्ली काय करतील याचा नेम नाही. आठवण म्हणून नेत असावेत दाढ घरी. म्हणूनच की काय डॉक्टरांनी मला विचारले. ती दाढ हवी आहे का? एवढी दुखरी आठवण कशाला जपा ..  म्हणून मी नको म्हणून सांगितले.

मग बऱ्याच सूचनांचं सत्र झाल्यावर मी जाण्यासाठी उठले. त्या दाढेचा एखादा फोटोतरी घ्यावा का म्हणून त्या मदतनीसाना मोबाइल दाखवला आणि विचारले दाठ कुठे आहे? फोटो काढून घेते  पण तोपर्यंत त्या निर्विकार चेहऱ्याच्या मदतनिसांनी त्या दाढेला केराची टोपली दाखवली होती.

— अशा रितीने माझी दंत कथा समाप्त झाली.

शेवटी काय कितीही कोपऱ्यात, हिरड्यांच्या कुंपणात लपून का  बसलेले असेनात,  प्रत्येक दातावर आणि दाढेवर व्यवस्थितपणे दोन वेळा ब्रश फिरवायलाच पाहीजे ही अक्कल मला आली…

अक्कल आली हो पण अक्कलदाढ मात्र गेली…

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares