मराठी साहित्य – विविधा ☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

🌳 विविधा 🌳

☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(कारण कुटुंब, समाज आणि राष्ट्र आपल्या प्रत्येक घटक जनांचे संरक्षण, पालन आणि पोषण करत असते. असा मोठा फायदा असल्याने या संकल्पना जगात आज खोलवर रुजल्या आहेत.) – इथून पुढे 

सद्य परिस्थितीत राष्ट्र ही सर्वात मोठी व्यवहारी संकल्पना आहे. देशाच्या अंतर्गत समाजकंटकांपासून न्यायप्रिय लोकांचे रक्षण करण्यासाठी पोलिस व न्याययंत्रणा असतात. राष्ट्राचे शत्रूराष्ट्राच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी सीमेवर सेनादले कार्यरत असतात.  

दुसऱ्याच्या कष्टाचे ओरबडण्याला चोरी वा लुट असे म्हणतात. राष्ट्र सुद्धा चोऱ्यामाऱ्यांचा शॉर्टकट घेवून मोठे होण्याचा प्रयत्न करतात. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करून तेथील साधनसंपत्तीची लुटालुटली केल्याची अगणित उदाहरणे इतिहासात सापडतील. 

भारताने मात्र आजवर कुठल्याही राष्ट्रावर असा अन्याय केला नाही. पण भारतीयांच्या या सभ्यपणाला कदाचित भारताची कमजोरी समजली गेली. त्यामुळे खैबर खिंडीतून भारतावर आजवर अनेक आक्रमणे आली. 

एक हजार वर्षांपुर्वी भारताची अर्थव्यवस्था इतकी मजबुत होती की जगाच्या GDP च्या 37% वाटा एकट्या भारताचा होता. इतकी आर्थिक सुबत्ता असुनही सैन्यदले कमकुवत ठेवण्याची चुक आपल्या पुर्वजांनी केली. परिणामी एक हजार वर्षांची गुलामगिरी आणि प्रचंड आर्थिक शोषणाला भारत बळी पडला. 

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची GDP जगाच्या GDP च्या केवळ 3% इतकीच शिल्लक राहिली होती. कधी काळी सोन्याचा धुर निघणारा संपन्न देश स्वतंत्र होईपर्यंत पार उघड्या-नागड्या लोकांचा देश झाला होता.

सीमेवर सेना सज्ज असेल तर देशाअंतर्गतही शांतता आणि स्थैर्य राहते. देशाअंतर्गत शांतता आणि स्थैर्य असेल तर देशात शेती, व्यवसाय आणि व्यापार वाढतो. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की शेती, व्यापार आणि उद्योगधंदे बसतात. परकीय गुंतवणूक निघून जाते. म्हणून देशांच्या सीमेवर शांतता राहणे महत्वाचे असते. 

सीमेवर पराक्रमी सेना पहारा करत असेल तर देशामध्येही कायद्याचे राज्य येते. शांत आणि स्थिर वातावरणात शेती, व्यवसाय आणि व्यापार वाढतो. परकीय गुंतवणूक वाढते. तंत्रज्ञानाचा विकास होतो. आर्थिक सुबत्ता येते. या आर्थिक सुबत्तेतून सेना सक्षम होते. सक्षम सेनेच्या फक्त धाकाने शत्रू आक्रमणाची हिंम्मत करत नाही. त्यातून देशात अजून स्थिरता आणि स्थैर्य येते. अशा प्रकारे सेनेच्या रक्षणातून शेती-व्यापार-व्यवसाय वाढतात. तसेच शेती-व्यापार-व्यवसाय वृद्धीतून सेना सुदृढ होते. या सकारात्मक चक्रातून राष्ट्र बलवान आणि संपन्न होत जाते. 

देशाची सेना मजबुत करण्याची जबाबदारी फक्त एकट्या सरकारची नसून राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची असते. सेनेसाठी नागरिक जेव्हा तण-मन-धन अर्पण करतात तेव्हा सेना बलवान होते. सेनेवर नागरिक तण-मन-धन अर्पण करत असतील तर सेनेचे मनोबल वाढते. शेवटी प्रत्येक सैनिकाला ‘मी कुणासाठी जीव धोक्यात घालून लढतोय’ हा प्रश्न पडतोच की! 

पायाजवळचा स्वार्थ पाहणे सोडून सेना संवर्धनाचा दुरचा विचार करणारे सुज्ञ नागरिक ज्या देशात राहतात त्या देशाची सेनादले मजबूत होतात. ते जीव तोडून देशाचे रक्षण करतात. तिथेच प्रगती होते. हेच देश आज विकसित म्हणून गणले जातात. 

कठीण परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्यदलांचे आपण देणे लागतो का? असा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडायलाच हवा. कुणी असे म्हणू शकते की इतके मोठे सैन्यदल! मी एकटा अशी किती मदत करू शकतो? पण सामान्य भारतीयांकडे अशी एक शक्ती आहे जी कुठलाही बदल घडवून आणू शकतो. ती शक्ती आहे संख्याबळ!  

140 कोटींचा देश! प्रत्येकाने 100 रुपये दिले तरी 14000 कोटी जमतील. देशातील लोकांच्या एक वेळच्या चहा-नाष्ट्याच्या पैशात संपुर्ण सैन्याला बुलेटप्रुफ जॕकेट मिळाले असते. पण तरी जवानांना इतकी वर्षे वाट पहावी लागली. 

जर लोकांनी पैसे जमा केले तर हा सगळा पैसा योग्य मार्गाने जाणेही आवश्यक असते. नाहीतर अशा पैशांना वेगवेगळ्या वाटा फुटून तो पैसा ठगांच्या खिशात जातो. इंटरनेटवर थोडे पाहिल्यावर कळाले की सैन्यदलांनी त्यासाठी छान व्यवस्था करून ठेवलेली आहे.

National Defence Fund !   

1962 च्या युद्धात सामान्य जनतेने यथाशक्ति मदत केली व कोट्यावधी रुपये सैन्याला दिले. या पैशाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी National Defence Fund ची स्थापना झाली. या फंडात आपण नेट बँकींगने आॕनलाईन पैसे पाठवू शकतो. 

2016 सालच्या उरी हल्ल्यानंतर मी हादरून गेलो होतो. त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकने मला रोमांचित केले होते. पण 2019 च्या जानेवारीत उरी चित्रपट पाहिल्यावर मी सर्जिकल स्ट्राईक मधील खरा थरार अनुभवला. त्यात डोणज्याच्या दवाखान्यात मला दाखवायला BSF चा हा जवान आला होता. त्याची गोष्ट ऐकली आणि अंगावर काटा आला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून हा जवान वाचला होता. त्याचा मित्र आणि सहकारी मात्र इतके नशीबवान नव्हते. सैन्यदलासाठी आपणही काहीतरी करावे हा विचार मनातून काही केल्या जाईना.

प्रत्येक वर्षी एका सैनिकाला लागणारे बॕटल गिअर खरेदी करता येतील इतके पैसे National Defence Fund मध्ये द्यावेत यावर मी विचार करू लागलो. मग नेटवर सैन्यदलांच्या सौद्यांविषयीच्या जुन्या बातम्या शोधल्या. सैन्यातील मित्रांना विचारले. थोडी माहिती मिळाली. 

Bullet proof jacket- कंपनी SMPP Pvt Ltd- किंमत प्रतिनग 35000 रुपये 

Assalt rifle- कंपनी SIG SAURE / कंपनी AK203- किंमत प्रतिनग साधारण 80000 रुपये 

Helmet- कंपनी Kanpur-based defence firm MKU- किंमत प्रतिनग 10800 रुपये 

Helmet mounted Night vision camera – कंपनी PVS 7 Gen 3 Night Vision Goggles- किंमत  65000 रुपये.

एकूण 35000 + 80000 + 10800 + 65000 = 190800 म्हणजे वर्षाला 200000 /- रुपये. 

हा सर्व विचार चालू असतानाच 14 फेब्रुवारी 2019 ची पुलवामाच्या आत्मघाती स्फोटाची बातमी आली. एक दहशदवादी स्वतःबरोबर चाळीस चाळीस जवान उडवून देतो. मन विषन्न झाले. देशाच्या शत्रूंची विद्ध्वंसक मानसिकता यातून पुन्हा जाणवली. दर वर्षी सैन्य दलाला दोन लाख रूपये द्यायचा मी तात्काळ निश्चय केला. 

खरे तर दोन लाख ही रक्कम माझ्या कमाईचा मोठा भाग होता. पण माझा निर्णय पक्का झाला होता. आता मागे फिरण्याचा विचारही शक्य नव्हता. माझ्या दवाखान्याशिवाय मी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे आॕपरेशन करायला जातो. त्याचे जे पैसे मिळतात ते या कामासाठी वापरायचे असे मी ठरवले. बायकोला बेत सांगितला. ती तर माझ्यापेक्षा जास्त खुष झाली.  “नक्की करा आणि घरखर्चाची चिंता करू नका. या कामात काही मदत लागली तर मलाही सांगा” असं ती म्हणाली. आणखी हुरूप वाढला.

पहिले इंटरनेट बँकींग ॲक्टिव्हेट करून घेतले. पहिले दोन लाख नॕशनल डिफेंस फंडाला पाठवले. काही मिळाले की आनंद मिळतो याचा अनुभव आजवर होता. देण्यातही खुप आनंद असतो याची मला प्रथमच प्रचीती आली. 

– क्रमशः भाग दुसरा 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कोसळणारा पाऊस…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

स्वपरिचय

शिक्षण –B A, MSW, PGDPC

  • व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक म्हणून सामाजिक क्षेत्रात गेली 25 वर्षे काम करीत आहे.
  • वाचन आणि लेखनाची आवड. विविध नामवंत वर्तमान पत्रामध्ये सामाजिक प्रकल्पा विषयी लेखन प्रसिद्ध तसेच सामाजिक आशय असलेल्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
  • २०१६ मध्ये मे महिन्याच्या एका रविवारी पहिल्यांदा संडे डिश या नावाने लघुकथा लिहिली. ती व्हॉटसपवर पाठवली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आजतागायत सलग 373 रविवार विविध विषयांवरच्या लघुकथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
  • संडे डिश या रजिस्टर ब्रॅंड नावाने दर रविवारी सकाळी प्रसिद्ध होणारी लघुकथा वाचणं हा अनेक रसिकांसाठी रविवारचं नवं रुटीन झालयं.
  • अभिवाचन,ऑडिओ,व्हिडीओ,पुस्तक या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध वाचकांपर्यंत पोहचलेल्या संडे डिशचं पुस्तकही प्रसिद्ध झालंय.

? मनमंजुषेतून ?

☆ “कोसळणारा पाऊस…” ☆ श्री मंगेश मधुकर

साल १९८६…

पावसाळ्याचे दिवस,मी सातवीत असतानाची गोष्ट.संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी न जाता ग्राऊंडवर खेळत होतो. ढग दाटून आल्याचं खेळण्याच्या नादात लक्षातच आलं नाही. शिपाईमामा ओरडल्यावर निघालो. काही वेळातच धो धो पावसाला सुरवात झाली. एका दुकानाच्या शेडमध्ये उभा राहिलो. दोन तीन लोक आधीपासून होतेच. पावसाचं आक्राळविक्राळ रूप पहिल्यांदाच बघत होतो. सुरुवातीला भारी वाटलं परंतु वीजांचा कडकडाट,लाईट गेलेले,सगळीकडे अंधार झाल्यावर घाबरलो. बराच वेळ झाला तरी पाऊस पडतच होता. मनातल्या मनात देवाचा धावा सुरू केला. खूप रडू येत होतं पण कसबसं आवरलं, कारण आजूबाजूला सगळे अनोळखी. रस्त्यावरसुद्धा फार गर्दी नव्हती. धीर सुटत चाललेला.

’काय व्हायचं ते होऊ दे, पण थांबण्यापेक्षा भिजत जाऊ ’ असं सारखं वाटायचं पण हिंमत होत नव्हती. सडकून भूक लागलेली. शेवटी कसंबसं रोखून धरलेलं रडू फुटलंच. हमसून हमसून रडायला लागलो तेव्हा सोबतच्या लोकांनी पाठीवरून हात फिरवत धीर दिला. इतक्यात…………

……. माझ्या नावाची नेहमीची हाक ऐकायला आली. कान टवकारले तर आवाज ओळखीचा वाटला. शर्टाच्या बाहीनं डोळे पुसून अंधारात आवाजाच्या दिशेने पाहिलं, तर समोर गुडघ्यापर्यंत दुमडलेली पॅन्ट, शर्ट, एका हातात जुनी छत्री अन दुसऱ्या हातात स्टीलची मोठी बॅटरीच्या प्रकाशात आडोशाला थांबलेल्या प्रत्येकाकडं कावऱ्याबावऱ्या नजरेनं पाहणारे ‘नाना’ दिसले. जीव भांड्यात पडणं ही शाळेत शिकवलेली ‘म्हण’ पुरेपूर अनुभवली. “ नाना,नाना ” मोठयानं ओरडत पावसाची पर्वा न करता नानांच्या दिशेने धावत गेलो आणि घट्ट बिलगून जोरजोरात हमसून हमसून रडायला लागलो. नानांनी उचलून कवटाळलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. 

“ नाना,तुम्ही रडताय ”

“ नाही रे.पावसाचं पाणी तोंडवर उडलयं ”.. नानांनी तोंड फिरवून डोळे पुसलेले पाहिलं पण गप्प बसलो. घरी जाताना पाऊस होताच परंतु आता भीती वाटत नव्हती, कारण खांद्यावर दफ्तर एका हातात छत्री, बॅटरी असलेला हात मी घट्ट पकडलेला..  असे ‘नाना’ सोबत होते. हिमालयासारखा भक्कम आधार असल्यानं काही वेळापूर्वी भीतीदायक वाटणारा पाऊस आता भारी वाटत होता.

—- 

साल २०२3 

पावसाळ्याचे  दिवस … संध्याकाळी पाच वाजताच आभाळ भरून आल्यानं लवकर अंधारलं. घाईघाईत ऑफीसमधून निघालो, तितक्यात धो धो कोसळायला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासोबत पावसाचा जोर वाढत होता. लगेच ट्राफिक जाम,जागोजागी पाणी साठलं मग नेहमीप्रमाणे …. ..चीड, संताप, वैताग, हतबलता अशा भावना मनात येऊन नंतर सवयीनं शांत झालो. इंच इंच गाडी दामटत तब्बल दीड तासानं घरी पोचलो. सगळीकडे अंधार होता. अंगात रेनसुट असूनही ओला झालोच. मला  पाहून बायको प्रसन्न हसली.

“देवाची कृपा !! सुखरूप आलात”

“काय भयानक पाऊस आहे. ”

“हो ना.तुम्ही येईपर्यंत जीवात जीव नव्हता. पाऊस अन त्यात हा अंधार,फार भीती वाटत होती.”

“नाना आणि चिरंजीव कुठयंत ”

“नाना रोजच्याप्रमाणे फिरायला गेलेत आणि लेकाचा फोन आला होता दहा मिनिटात घरी येतोय.”

“एवढ्या पावसात फिरायला??”

“ते बाहेर पडले तेव्हा पाऊस नव्हता. सारखा फोन करतेय पण उचलत नाहीत.”

“छत्री??”

“नाही नेली. मी सांगितलं,जाऊ नका, तरीही बाहेर पडले.” 

“त्यांना घेऊन येतो. छत्री दे”

“आधी घरात या. कपडे बदला तोपर्यंत मी चहा करते.  मग जा”

“नको.जवळच कुठेतरी असतील आधी त्यांना घेऊन येतो मग निवांत चहा !!!” 

अंगात रेनकोट असूनही छत्री घेऊन चालतच बाहेर पडलो. सोसायटीत,रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य होतं…..   ‘ काही गरज नव्हती.एक दिवस घरात बसले असते तर काही बिघडलं नसतं पण ऐकायचं नाही ’ स्वतःशीच चडफडलो.

मोबाईल टॉर्चमध्ये आडोशाला थांबलेल्यामध्ये शोधत होतो पण नाना  दिसले नाहीत. फोन केला तर उचलला नाही. चक्क कॉल कनेक्ट झाला.

“ नाना,नाना मी बोलतोय.कुठे आहात ”..  काहीच प्रतिसाद नाही. मी ‘हॅलो,हॅलो’ करत असतानाच फोन कट झाला. पुन्हा कॉल केला. नुसतीच रिंग वाजत होती. काहीवेळानं उभा असलेला प्रत्येक माणूस नानांसारखाच वाटायला लागला. जवळ जाऊन पहायचं, खात्री पटली की पुढे जायचं, असं करत करत घरापासून दोन चौक पुढे आलो पण…. मनातली धाकधूक वाढली. सत्तरी पार केलेले नाना कुठं असतील, कसे असतील, काय करत असतील, ..  ‘मन चिंती ते वैरी ना चिंती’ हेच खरं.

पुढे असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये चारपाच जण उभे होते. जवळ जाऊन पाहीलं पण पुन्हा निराशा. पुढे निघालो. पुन्हा  फोन केला अन मागे असलेल्या दुकानाच्या बाजूनं ओळखीची  रिंगटोन ऐकायला आली. जोरजोरात “नाना,नाना” अशा हाका मारायला लागलो. तेव्हा तिथल्या माणसांमध्ये हालचाल जाणवली. सर्वात मागे उभे असलेले नाना सावकाश पावलं टाकत पुढे आले. भीतीमुळे हात थरथरत होते. डोळे किलकिले करून ते अंदाज घेत होते. अंधारामुळे मला ओळखलं नाही. त्यांना सुखरूप पाहून अतिप्रचंड आनंद झाला. 

“नाना !!!” म्हणत मिठी मारली तेव्हा त्यांनी घट्ट पकडलं. त्यावरून मन:स्थितीचा अंदाज आला. खांद्यावर डोकं ठेवल्यावर दिलेले हुंदके जाणवले, तेव्हा मीसुद्धा डोळ्यातलं पाणी रोखू शकलो नाही.

“चला” पुढे केलेला हात त्यांनी घट्ट पकडला आणि काठी टेकवत चालू लागले.

“मी आहे काळजी नको” 

“आजकाही खरं नव्हतं. मी तर आशा सोडली होती.वाटलं की आता……” कापऱ्या आवाजात नाना म्हणाले.

“नका टेंशन घेऊ. फोन का घेतला नाही”

“कसा घेणार, गडबडीत चष्मा फुटला. नीट दिसत नव्हतं. त्यात अंधार, एकदोनदा घेतला तर आवाज आला नाही म्हणून.. खरं सांगू खूप घाबरलो होतो. देवासारखा धावून आलास.”

“आठवतं… माझ्यासाठी तुम्हीपण असंच शोधत आला होता.” नाना फक्त हसले….. 

… घरी जाताना मोबाईल वाजायला लागला मी दुर्लक्ष केलं. एका हातात छत्री अन दुसरा हात नानांनी पकडलेला.

काळासोबत आम्हां बापलेकाच्या आयुष्यातल्या जागा, भूमिका आणि जबाबदाऱ्या सगळं सगळं बदललं.  फक्त एक गोष्ट कायम होती ती म्हणजे कोसळणारा पाऊस. आमच्या बदलत्या नात्याचा साक्षीदार …..

सोसायटीत पोचलो तेव्हा समोरून छत्री घेऊन येणारे चिरंजीव भेटले…. 

“बाबा,फोन का रिसिव्ह करत नाही”

“पाऊस होता म्हणून…”

“आईनं सगळा प्रकार सांगितला. तुम्ही दोघंही बाहेर, त्यात फोन उचलत नाही, मग शोधायला निघालो” . 

नाना आणि मी एकमेकांकडे पाहून हसलो तेव्हाच लाईट आले. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला त्यात कोसळणारा पाऊस फारच सुंदर दिसत होता.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा १७ ते २२ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा १७ ते २२— म राठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)

देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा – ऋषी – शुनःशेप आजीगर्ति

 ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या  सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या  सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस  या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या  ऋचा उषा देवातेला  आवाहन करतात.

या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी अश्विनीकुमार देवतांना उद्देशून रचलेल्या सतरा ते एकोणीस या ऋचा आणि उषादेवतेला उद्देशून रचलेल्या वीस ते बावीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

आश्वि॑ना॒वश्वा॑वत्ये॒षा या॑तं॒ शवी॑रया । गोम॑द्दस्रा॒ हिर॑ण्यवत् ॥ १७ ॥

 अश्वधनुंच्या संगे घेउनी पशुधनाला या

सुंदरशा हे अश्विन देवा आम्हा आशिष द्या

प्रसन्न होऊनी अमुच्यावरती दान आम्हा द्यावे

वैभवात त्या सुवर्ण धेनू भरभरुनी द्यावे ||१७||

स॒मा॒नयो॑जनो॒ हि वां॒ रथो॑ दस्रा॒वम॑र्त्यः । स॒मु॒द्रे अ॑श्वि॒नेय॑ते ॥ १८ ॥

 देवा अश्विनी उभयता तुम्ही राजबिंडे

अविनाशी तुमच्या शकटाला दिव्य असे घोडे

तुम्हा रथाचे सामर्थ्य असे अतीव बलवान

सहजी करितो सागरातही तुमच्यासाठी गमन ||१८||

न्य१घ्न्यस्य॑ मू॒र्धनि॑ च॒क्रं रथ॑स्य येमथुः । परि॒ द्याम॒न्यदी॑यते ॥ १९ ॥

 अजस्त्र अतुल्य ऐशी कीर्ति तुमच्या शकटाची

व्याप्ती त्याची त्रय लोकांना व्यापुनि टाकायाची

अभेद्य नग शिखरावरती चक्र एक भिडविले

द्युलोकाच्या भवती दुसऱ्या चक्राला फिरविले ||१९||

कस्त॑ उषः कधप्रिये भु॒जे मर्तो॑ अमर्त्ये । कं न॑क्षसे विभावरि ॥ २० ॥

 स्तुतिप्रिये हे अमर देवते सौंदर्याची खाण

उषादेवते  सर्वप्रिये तू देदीप्यमान 

कथन करी गे कोणासाठी तुझे आगमन

भाग्य कुणाच्या भाळी लिहिले तुझे बाहुबंधन ||२०||

 व॒यं हि ते॒ अम॑न्म॒ह्यान्ता॒दा प॑रा॒कात् । अश्वे॒ न चि॑त्रे अरुषि ॥ २१ ॥

 विविधरंगी वारू सम तू शोभायमान

तेजाने झळकिशी उषादेवी प्रकाशमान

सन्निध अथवा दूर असो तुझे आम्हा ध्यान

येई झडकरी आम्हासाठी होऊनिया प्रसन्न ||२१||

 त्वं त्येभि॒रा ग॑हि॒ वाजे॑भिर्दुहितर्दिवः । अ॒स्मे र॒यिं नि धा॑रय ॥ २२ ॥

 सामर्थ्याने सर्व आपुल्या ये करि आगमन

उषादेवते आकाशाच्या कन्ये आवाहन

संगे अपुल्या घेउनी येई वैभवपूर्ण धन

दान देई गे होऊनिया आमुच्यावरी प्रसन्न ||२२||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/ifGvMF3OiTs

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 17 to 22

Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 17 to 22

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरेदी…” – ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरेदी…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

“तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर आहे?”

“होय आहे.”

“कधी घेतलात?”

“झाली की १५-२० वर्षे.”

“व्वा! शेवटचा कधी बाहेर काढला वापरायला, आठवतो का?”

“झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता  बहुतेक.”

“आता कुठे असतो.”

“माळ्यावर असेल बहुधा . हिला माहीत आहे.”

“मग नेहमी लागत नाही घर व्हॅक्युम करायला?”

“अहो, तो वापरणं फार कटकट आहे हो!”

“पण मग घेतला कशाला?”

“अहो, एक वर्ष दिवाळीत हिला पाडव्याची ओवाळणी म्हणून घातला.

चार महिने आधी हिच्या बहिणीकडे घेतला होता. तिनेच तो सेल्समन आमच्याकडे पाठवला होता. मेव्हणी म्हणाली- जाळ्या, जळमटे फार छान निघतात.”

“काय सांगता! मग नसतील जाळ्या, जळमटे तुमच्या घरात?”

“नाही हो . कोणीही तो वापरायला नको म्हणतात. फार उस्तवार करावी लागते त्याची. सुरुवातीला मुलं भांडायची तो वापरायला. ..मग उत्साह गेला. आता हीच मला म्हणते कधीतरी, ‘अहो, तो व्हॅक्युम क्लिनर लावून जाळ्या काढून द्या ना.’

मी म्हणतो,’तिला तूच कर.’ तर म्हणते कशी… ‘हे पुरुषांचं काम आहे.’ “

“म्हणजे तुमच्याच अंगावर पडलं म्हणायचं.”

“मी नाही म्हणतो. त्यापेक्षा कुंचा  आणि स्टूल घेऊन सोयीचं होतं.”

“मेव्हणी वापरते का?”

“नाही विचारलं कधी…. तिला काही विचारायची सोय नाही. …तिने काहीतरी नवीन घेतलेलं असतं आणि इकडे वाटतं आपल्याकडेही असावी ती वस्तू.”

 

“बरं… आता ते जाऊन द्यात. ही व्यायामाची सायकल दिसते आहे तुमच्याकडे. रोज करता की नाही व्यायाम?”

“नाही हो… टॉवेल वाळत घालतो तिच्यावर.”

“काढूयात का त्यावरचा टॉवेल?… अरेच्या! टॉवेलच्या ओलीमुळे गंजून गेली आहे हो सायकल…

“अहो, मुलांसाठी आणली, पण १५ दिवसांनंतर वापरतील तर शपथ.”

“बरं आणली तेव्हा मुलगा किती वर्षांचा होता?”

“होता ५-६ वर्षांचा. अहो, तेव्हा मीच वापरणार होतो. हीपण म्हणाली होती की मी पण करीन व्यायाम. पण राहूनच गेले.”

“आता वापरून बघू यात का?”

“अहो, तिची चेनपण तुटलीय. ती बसवलीच नाही.”

 

“बरं ते जाऊ द्यात. हे काय आहे?”

“रोनाॅल्डचा फूड प्रोसेसर.”

“त्याचं काय करता?”

“यात कणिक मळली जाते, काकडी गाजराचे काप होतात. अजून काय काय बरंच होतं.”

“अरे व्वा! वहिनींचा त्रास कमी झाला असेल नाही.”

“ नाही अहो, आम्ही फक्त दाण्याचा कूट करतो त्यात. ही सुरुवातीला वापरायची. पण पुढे म्हणायला लागली तो धुवायचा कंटाळा येतो. त्यापेक्षा परातीत कणीक भिजवणे सुटसुटीत होते. थोडे हात दुखतात हिचे, पण मिक्सरचे भांडे आणि ब्लेड धुण्यापेक्षा बरे पडते.”

“मग घेताना लक्षात आले नाही?”

“अहो, तो सेल्समन हिच्या मैत्रिणीने पाठवला. तिने फार कौतुक केले. मग आम्हीपण घेतला.”

“ती मैत्रीण वापरते का?”

“काय की बुवा?… हे बघा, ही म्हणाली आणा. आपलं काम पैसे देणं आहे. मी विचारत नाही- का? कशाला?”

 

“बरं ते जाऊन द्या. तुमचा लग्नातला सूट आहे?”

“हो. आहे ना.”

“शेवटचा कधी घातलात?”

“आमच्या लग्नात.”

“म्हणजे किती वर्षे झाली.”

“दहा.पंधरा”

“मधे कधी घालून बघितलात?”

“पाच वर्षांपूर्वी मेव्हणीच्या लग्नात. पण बसला नाही.”

“म्हणजे तुमच्या लग्नाच्या दिवशी फक्त घातला.”

“नाही. नंतर एकदा कंपनीत सेमिनारला घातला. बस इतकाच.”

“काय किंमत होती?”

“त्या काळात दहा हजार असेल.”

“मग वहिनींचा लग्नातला शालू त्या अजून वापरतात?”

“नाही. तो शालू प्रत्येक वेळी घातला तर लोक काय म्हणतील? म्हणून प्रत्येक लग्नात नवी साडी घेते.”

“म्हणजे शालू एकदाच वापरला. होय ना?”

“ हो ! म्हणजे वापरला, पण ज्या लग्नात नवीन माणसे असतात तेव्हाच वापरते. ते काय आहे ना, दर वेळी तोच तोच शालू वापरला, तर इतर बायका हसतील, असे तिला वाटते.”

“शालू आणि कोट कुठे आहेत?”

“वॉर्डरोब मध्ये. जागा अडवतायत.”

“बरं ते जाऊ द्यात. हा क्रोकरी सेट छान आहे. कधी घेतला?”

“फार वर्षे झाली.”

“कधी वापरला जातो?”

“एकदाच वापरला. मोलकरणीने त्यातला एक बाउल फोडला. ३६ पीस होता. आता ३५ पीस राहिलेत.”   

“मग दुसरा बाउल आणायचा ना!”

“अहो, तसाच मिळत नाही ना… मग ही म्हणाली, मोलकरणींच्या राज्यात नकोच वापरायला.”

“मग कुणाच्या राज्यात वापरणार?”

“हो ना. तो प्रश्नच आहे. ही म्हणते, क्रोकरी वापरली की धुवायचे काम हिलाच करावे लागते. मोलकरणीचा भरवसा नाही, कधी फोडतील ती. मग ही म्हणते नकोच वापरायला. आठ हजाराचा सेट पडून आहे.”

“शोकेसमध्ये छान दिसतो पण.”

“हो ना. आलेल्या पाहुण्यांना फार आवडतो. सगळे म्हणतात छान आहे. पण बाउल फुटल्यापासून हिचे मनच उडाले आहे.”

“बरं, अजून काय काय आहे जे वापरात नाही असे.”

“ बरेच !…खूप आहे की . राईस कुकर, कॉफी मशीन, शिवणाचं मशीन आणि अजूनही बरंच काही.”

उगाच हसू नका. तुमच्या घरात काही वेगळे नाही. तुम्हांला विचारले तर तुमची उत्तरेदेखील अशीच, हीच असणार.

पण तुम्हांला सांगतो तुम्ही फार बरे. काही काही जण तर अक्खी कार घेऊन ठेवतात आणि महिन्यातून एकदा काढतात battery चार्ज करण्यासाठी. काही लोक सेकंड होमदेखील असेच उगाच नाशिक , पुना, मुंबई,तळेगावला घेतात. काही लोक फार्म हाउस घेतात कोकणात आणि पाच वर्षांत एकदाच जातात,तर रस्ताच विसरलेले असतात. प्लॉट शोधत बसतात आणि पाच वर्षांपूर्वीच्या खुणा शोधत बसतात.

 तुम्ही फार बरे आहात. थोडक्यात आहे अजून.

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गावलं का ताक ?… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? प्रतिमेच्या पलिकडले ?

गावलं का ताक ?… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

😃

बामणिन् ग्येली खय् व्हती उनाची?

अगो बायो जाणार कुठे! लुगड्याला आखोटा लागून फाटलं होतं वीतभर. शेजारच्या वच्छिनं दिलेन् टांके घालून्. मला आता दिसत नाय गो नेढ्यात दोरा ओवायला.

व्हय् व्हय्. तां पन् खरां.

गो बाय् , तुज्याकडं  ताक गावल् काय गो लोटाभर?

आता कुठचं ताक उरायला! आणि बघितलंस्? मी दिसले रे दिसले, की मागामागीला सुरुवात!

तसां नाय् गो. आता पोरां येतिल नाय् सालंतून? तापून येतंत गो उनाची! त्यानला कोप कोप पिल्यावर वाइंच बरा वाटता. पन् ऱ्हावंदे. नको आता. बरां ता बरां. जाव मी आता घरी?

पाहीलंस्? ताक नसेल म्हटल्यावर चालली तशीच घरी! पोरांची काही काळजी आहे की नाही? चल माझ्याबरोबर. थोडं ताक शिल्लक असेलसं वाटतंय् दगडीत! असलं तर देते.

🌴

पूर्वीच्या काळी गांवा-खेडेगांवात बामणी-कुणबी बायका कुठे भेटल्या तर त्यांच्यात असे आपुलकीचे संवाद घडायचे. आपापल्या मराठीत. सहकार्य शब्दाचा केवळ जप न करता आचरण सहकाराचे होते.

🌴

😃

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

परिचय

शिक्षण : MBBS, DGO, DNB from BJ Medical College Pune

डॉ गोपालकृष्ण गावडे हे पुणे येथील सिंहगड रोड वरील प्रसिद्ध City Fertility Center या टेस्ट ट्युब बेबी सेंटरचे डायरेक्टर आणि IVF consultants म्हणून कार्यरत आहेत, तसेच सिंहगड रोड वरील Gurudatta Diagnostic Centre & Annual Heath Check Up Clinic चे डायरेक्टर म्हणून ते कार्यभार बघतात.

डॉ गावडे पुण्यातील अनेक मोठ्या रूग्नालयांमध्ये स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ञ म्हणून सेवा पुरवतात. सामाजिक बांधिलकी जपत ते सरदार वल्लभाई पटेल cantonment हॉस्पिटल पुणे येथे गेल्या आठ वर्षांपासून मानद सेवा पुरवत आहेत.

आजवर त्यांनी पाच हजारापेक्षा (५,०००) जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनी एका सैनिकाला आवश्यक असणारे बॕटल गिअर म्हणजे असॉल्ट रायफल, बुलेटप्रूफ जॅकेट (bullet Proof Jacket), हेल्मेट(helmet), नाईट विजन गोगल्स (Night Vision Goggles) आणि इतर सामुग्री यांच्या साठी लागणारी रक्कम (दोन लाख) सैन्य दलास भेट देतात. तसेच 2019 पासून हे अभियान इतरांनी चालवावे यासाठी जनजागृती सुद्धा डॉक्टर करत असतात.

डॉ गावडेंनी दोन पुस्तके लिहली आहेत.

  1. असामान्य यश मिळवणारे मन नक्की कसा विचार करते याचा शोध घेणारे स्मार्टर सेल्फिश हे पुस्तक आणि
  2. वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये डॉ गावडेंना आलेल्या हृदयदस्पर्शी अनुभवांचे संकलन असलेले पुस्तक अनुभुति अशा दोन पुस्तकाचे ते लेखक आहेत.

🌳 विविधा 🌳

☆ राष्ट्र मजबुतीचा संकल्प… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

तेव्हा मी सिंहगडाच्या पायथ्याला डोणजे गावात छोटे हॉस्पिटल चालवत होतो. 2019 साल चालू होते. पानशेत धरणाच्या खाली BSF चा मोठा कँप आहे. तेथील जवानांना मी मोफत वैद्यकीय सेवा देत असे. आधून मधून BSF चे जवान मला दाखवायला येत. असाच एका दुपारी पस्तिशीच्या आसपासचा एक जवान दाखवायला आला. 

“डाक्टर साहब, बुखार से शरीर तप रहा है. थंड भी लग रही है.” त्याने त्याच्या उत्तर भारतीय हिंदी टोनमध्ये आपला त्रास सांगितला. 

“लघवीको आग हो रही है क्या? आग मतलब जलन.” मी आपल्या गुलाबी हिंदीत त्याला विचारले.

“नही डाक्टर साब” 

“घसा दुखता है क्या?” 

“ना” 

“संडास पतला हो रहा है? पेट दर्द वगैरा?”

“नही. बाकी कुछ भी तखलिफ नही. सिर्फ थंडी-बुखार है.” 

“अच्छा, बेड पर लेटो. जरा BP वगैरा जांच कर लेता हुँ.” 

तो जवान उठला आणि बुट काढुन एक्झामिनेशन बेड वर झोपला.

मी त्याच्या उजव्या हाताला बी पी कप बांधू लागलो. फोर आर्मवर एका जखमेचा वेडावाकडा व्रण मला दिसला. “इधर क्या हुआ था?”

“गोली लगी थी साहब.”

मी उडालोच, “यह गोली का जखम है?” 

“एक नही साहब, छह लगी थी. यहाँ से यहाँ तक ब्रश फायर लगा था.” त्याने आपला डाव्या हाताच्या तर्जनीने उजवा हात, उजवा खांदा, उजवी छाती आणि शेवटी डाव्या खांद्यापर्यंत निर्देश केला. 

“बाप रे, फिर बचे कैसे? आप सनी देओल हो क्या?” 

“काहे का सनी देओल साहब! इतना खुन बहा था की मुझे मरा समजके छोड दिया था. मेरा नसीब अच्छा था की खुन की बडी नली फटी नही. वक्त पर फस्ट एड मिला. हॉस्पिटल के लिए एअर लिफ्ट मिली इसलिए वक्त पर सर्जरी हो पाई. नही तो उस दिन मै खत्म हुआ था.”

“यह सब कहाँ हुआ था?”

“व्हॕलीमे साहब, कश्मीर व्हॕली में.”

मी त्याला तपासले. आम्ही दोघे परत आपापल्या जागांवर स्थानपन्न झालो. मी त्याला हिमोग्राम, युरीन, डेंगू, मलेरिया, टामफॉईड अशा दोन तीन तपासण्या करायला सांगितल्या. औषधे लिहून दिली. कशी घ्यायची ते समजावून सांगितले. आराम, हायड्रेशन वगैरे काही पथ्य सांगितली. पण त्याची पुर्ण स्टोरी ऐकायची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली होती.

“तो व्हॕलीमे क्या हुआ था उस दिन? यह सब कैसे हुआ था?” 

“कुछ नही साहब, हमको इंटिलिजंस मिला की एक गाँवमे एक घरमें टेररिस्ट छुपे है. तो हमने गाँवका कॉर्डन कर लिया. काॕर्डन कर लिया मतलब गाँव को घेर लिया. रात का वक्त था. लाईट भी नही थी. टेररीस्ट किस घर में छुपा है पता नही था. तो हर घर की तलाशी शुरू हुई.

हम चार लोक एक घर में घुसे. एक जेसीओ और हम तीन जवान थे. घर मे पुरा अंधेरा था. जेसीओ साहबने जैसेही टॉर्च लगाया तो कोनेसे ब्रस्ट फायर आया. सामनेवाले तीनोंको गोली लगी और हम गिर पडे. पिछे वाले चौथे जवानने टेररीस्ट के गन के मझल फ्लॕशके ओर अंदाजेसे गोलीयाँ चला कर उसे मार डाला. 

जेसिओ साहब और मेरे सबसे अच्छे दोस्तने जगहपरही दम तोड दिया. मै मरते मरते बचा. बस मेरा वक्त नही आया था उस दिन.” मित्राच्या आठवणीने त्याचा आवाज कातर झाला होता. कंसल्टिंगमध्ये काही क्षण शांतता होती. 

“आपने नाईट व्हिजन गॉगल्स या बुलेटप्रुफ जॕकेट नही पहने थे?” मी आश्चर्याने विचारले. 

“कहाँ साहब? दस-बारा साल पुरानी बात है. तब यह सब चिजें कहा मिलती थी? नाईट व्हिजन गॉगल्स तो आज भी सिर्फ स्पेशल फोर्सेके पास होते है. आज भी बहुत सारे जवानोंके पास पुरानी इंसास राइफल होती है. वह AK के मुकाबले उतनी कारगर नही है.” मी अवाक होऊन ऐकत होतो. 

“चलो साहब, निकलता हुँ. खुन जाँच कराके रिपोर्ट दिखाने आता हुँ. तब तक गोली चालू करू न?” तो उठला.

“हाँ हाँ. चालू करीए. व्हायरल ही लग रहा है. ठिक हो जाओंगे. लेकिन आजकल डेंगू और मलेरिया के पेशंट भी मिल रहे है. इसलिए जांच जरूरी है.” 

“ठिक है साब.” असे म्हणत तो केबीनच्या बाहेर पडला. मी मात्र विचारांमध्ये गढून गेलो.

आपली सेनादले आज किती खराब परिस्थितीत लढत आहेत! ही परिस्थिती सध्या हळूहळू सुधारते आहे. तरी पण ही परिस्थिती पटकन सुधारण्यासाठी माझ्यासारखे सामान्य नागरीक काही करु शकतो का?     

2004 सालापासून सैन्य बुलेटप्रुफ जोकेटची मागणी करत आहे. पण ती अंशतः पुर्ण व्हायला 2016 उलटला. भारताचा शत्रू AK 47रायफल ने लढतो आणि आमचा सैनिक मात्र त्याचा सामना इन्सास सारख्या निकृष्ट रायफलने करतो. आपल्यावर वेळ आली तर अशा विषम परिस्थितीत लढून आपण आपला जीव धोक्यात घालू का? टेररिस्ट असल्याचा संशय असलेल्या आंधाऱ्या खोलीत आपण असे नाईट व्हिजन गॉगल्सशिवाय शिरण्याचे धाडस करण्याचा विचार तरी करू का? आणि ते ही बुलेटप्रुफ जॅकेटशिवाय?  

दरम्यान मधल्या सरकारने उद्योजक आणि शेतकऱ्यांचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. लाख लाख कोटींचे अनेक घोटाळे झाले. पण सैन्याच्या बुलेटप्रुफ जॕकेट वा आधुनिक रायफल सारख्या मुलभुत गरजा मात्र पुर्ण झाल्या नाहीत. 

या काळात कितीतरी जवानांनी निधड्या छातीवर गोळ्या झेलल्या असतील. कितीतरी स्रिया विधवा झाल्या आणि कितीतरी मुलं अनाथ झाली असतील. घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर त्यांच्या वाट्याला सहानुभूती आणि बंदुकीच्या तीन फैरींची सलामी सोडल्यास फार काही पडले नसेल. 

वायुसेनेला अजूनही सत्तर वर्षांपुर्वीची जुनी मिग 21 विमाने वापरावी लागत आहेत. नेव्हीची एकमेव विमान वाहक नौका आणि बहुतेक लढावू जहाजे सेकंड हँड आहेत. कुणासाठी मी माझा जीव धोक्यात घालतोय हा प्रश्न प्रत्येक सैनिकाला पडत नसेल? कमी पगार, कुटुंबापासूनचा अनेक महिन्यांचा दुरावा, अपुऱ्या साधनसामुग्रीने शत्रूचा सामना, सतत जीवावरचे संकट, अशा परिस्थितीत काम करूनही भारतीय सैनिकांचे मनोबल आणि राष्ट्रभक्ती टिकून आहे. ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. 

प्रत्येक जन आपल्या हितांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपले हित नक्की कशात आहे हे कळण्याचा स्मार्टनेस सर्वांमध्ये असतोच असे नाही. कुटुंबाचे रक्षण झाले तर कुटुंब आपले रक्षण करते. राष्ट्राच्या सीमांचे रक्षण झाले तरच राष्ट्र आपले रक्षण करते. कुटुंब, समाज वा राष्ट्र यासारख्या संकल्पना जपण्यात घटक जनांचा दुरोगामी स्वार्थ असतो. कारण कुटुंब, समाज आणि राष्ट्र आपल्या प्रत्येक घटक जनांचे संरक्षण, पालन आणि पोषण करत असते. असा मोठा फायदा असल्याने या संकल्पना जगात आज खोलवर रुजल्या आहेत. 

— क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तोच चंद्रमा नभात… श्री मनोज मेहता ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ तोच चंद्रमा नभात… श्री मनोज मेहता ☆ श्री मेघ:श्याम सोनावणे

कधीकाळी बाबूजींची अन् माझी ओळख तरी होईल का, हेच माहीत नव्हतं, मैत्री तर दूरच ! आणि अचानक डॉ. पुणतांबेकर यांनी १८ एप्रिल २००० रोजी, फर्मान सोडलं, “मनोज, बाबूजींची छायाचित्रं तूच काढायचीत, आपल्याला उद्या त्यांच्या घरी जायचे आहे.” आणि त्याप्रमाणे आम्ही सकाळी १० वाजता बाबूजींच्या घरी पोचलो. सोसायटीच्या नामफलकावर एकच नाव मराठीत होतं, ते म्हणजे………… ‘सुधीर फडके’.

डॉक्टरांच्या मागून मी जरा घाबरतच घरात प्रवेश केला आणि, ज्यांनी करोडो मराठी रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले, त्यांचे मला साक्षात  दर्शन  झाले. लेंगा – झब्बा, बुटकी मूर्ती, प्रसन्न चेहरा! मी  भारावून काही क्षण पहातच राहिलो. त्यांनी “पाणी घ्या”, असं म्हटल्यावर, मी भानावर आलो.

डॉक्टर आणि बाबूजींचं बोलणं सुरू झालं. आणि माझं काम झपाझप सुरू झालं. आत्ताच्या भाषेत कँडीड छायाचित्रं… पूर्ण रोल संपला. त्यांच्या गप्पा संपल्या व डॉ. पुणतांबेकर म्हणाले, “मनोज आता आमची छायाचित्रे काढ”. 

मी लगेच म्हणालो, “माझी छायाचित्रे काढून झालीत”. 

मी असं म्हणताच डॉक्टर अचंबित होणे स्वाभाविक होते, पण बाबूजींनाही कुतूहल वाटले. गप्पांच्या ओघात त्यांचे माझ्या हालचालींकडे लक्षच नव्हते. आम्ही मग चहा घेऊन डोंबिवलीत परतलो. 

दुसऱ्या दिवशी मी रंगीत छायाचित्रे घरीच डेव्हलप केले आणि डॉक्टरांना फोन करून बाबूजींचा क्रमांक घेतला. बाबूजींशी दूरध्वनीवर बोललो. ते म्हणाले, “अहो, मीच तुमचा क्रमांक मागणार होतो. बरं झालं तुम्हीच दूरध्वनी केला. उद्या येताय का माझ्या घरी, वेळ आहे का तुम्हाला?”

“अहो बाबूजी, मी यासाठीच फोन केला होता, येतो नक्की”, असे सांगून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दादरला त्यांच्या घरी पोहचलो. त्यांना नमस्कार केला, तेव्हा ते म्हणाले, “नमस्कार आई-बाबांना करायचा”.

छायाचित्रे हातात दिल्यावर, कधी एकदा ते उघडुन पाहू, अशी एखाद्या लहान मुलासारखी उत्सुकता दर्शवणारी बाबूजींची गंमत मी पाहिली. सगळी छायाचित्रे पाहून झाल्यावर मला म्हणाले, “इकडे या हो”. 

मी त्यांच्याजवळ गेल्यावर, त्यांनी दोन्ही हात माझ्या खांद्याला पकडून, माझ्या दोन्ही गालांचे गालगुच्चे घेतले. त्या क्षणाला मला माझा ‘सर्वोच्च बहुमान’ झाला असे वाटले. ते म्हणाले, “अहो, इतकी वर्ष कुठे होतात?”

त्यानंतर डोंबिवलीचे शिवसेनेचे धड़ाडीचे कार्यकर्ते नितिन मटंगे ह्यांनीही, ‘मला बाबूजींच्या गाण्यांच्या सूचीचे पुस्तक करायचे आहे, तूच बाबूजींची छायाचित्रे काढायचे’, असे म्हणून मला त्यांच्या घरी नेले. मला पाहताक्षणी बाबूजी नितिनला म्हणाले, “तुमच्या पुस्तकात माझे झक्कास छायाचित्र येणार”. असे बाबूजींनी म्हणताच, नितिन व वसंतराव वाळुंजकर हे उडालेच ! 

तद्नंतर वारंवार बाबूजींचा आणि माझा कधी प्रत्यक्ष, कधी दूरध्वनीवरून संवाद होणे तर कधी त्यांच्या घरी गप्पांचा फड कसा रंगत गेला हे कळलेच नाही. असे आमचे मैत्रीचे धागे जुळत गेले. 

डोंबिवलीचे बाबूजी, म्हणजे विनायक जोशी, यांचा दिल्लीत महाराष्ट्र मंडळातर्फे कार्यक्रम होता. विनायकचा हट्ट होता छायाचित्रे मनोजनेच काढावीत. हा हट्ट विनायकचा काल, आज व उद्याही असणारच. त्याने इतके अचानकच ठरवले आणि बाबूजींनाही तिथे पुरस्कार दिला जाणार होता.

बाबूजींबरोबर जाण्यास, श्रीधरजींना वेळ नव्हता, म्हणून त्यांनी मला विचारले, “मनोज, तुम्ही याल का माझ्याबरोबर दिल्लीला?” त्यांना मी छायाचित्रे काढायला तिथे येणार हे माहीत नव्हते. माझा तर आनंदच गगनात मावेना! आणि दिल्लीत त्या संपूर्ण सोहळ्यात मी एकटाच छायाचित्रकार ! 

महाराष्ट्र मंडळाचे मुख्य संयोजक श्री. हेजिब यांनी ७ केंद्रीय मंत्र्यांसमोर, श्री. लालकृष्ण आडवाणी ह्यांच्या हस्ते माझा सत्कार केला, तेव्हा बाबूजी म्हणाले, “मनोज, कॅमेरा द्या, मी तुमचं छायाचित्र काढतो.” केवढा हा माझा सन्मान. मला तर गगणाला गवसणी घातल्यासारखे वाटू लागले.

लगेच दोन महिन्यांनी बाबूजींना कलकत्ता येथे पुरस्कार समारंभासाठी जायचे होते. तेव्हाही बाबूजींनी आग्रहाने मला बरोबर नेले. तेव्हा मी बाबूजींना म्हटलं, “बाबूजी, तुमच्यामुळे हा योग आला.” तेव्हा लगेच ते म्हणाले, “तुमचे काम छान आहे, म्हणून सगळे तुम्हालाच बोलवतात.” कुठेही ते स्वतःला मोठेपणा घेत नसत. अशा दिलखुलास, सदाबहार, प्रेमळ पितृतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

माझी व शंना नवरे काकांची ४५ वर्षांची मैत्री असूनही, शंना काकांनाही असूया वाटली. गमतीने म्हणाले, “मनोज, तुझी बाबूजींशी इतकी कशी रे मैत्री झाली ?”

बाबूजींना नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते,

“सूर गेले दूर आता, शब्द मागे राहीला, चंद्र होता साक्षीला… चंद्र होता साक्षीला….”

लेखक – श्री मनोज मेहता

डोंबिवली. मो. ९२२३४९५०४४ 

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हरवलेल्या इतिहासाचे आश्चर्यकारक तपशील – झाशीची राणी लक्ष्मीबाई” – लेखक – श्री योगेश अरुण ☆ प्रस्तुती – श्री सदानंद  कवीश्वर☆

श्री सदानंद  कवीश्वर

? इंद्रधनुष्य ?

☆ “हरवलेल्या इतिहासाचे आश्चर्यकारक तपशील – झाशीची राणी लक्ष्मीबाई” – लेखक – श्री योगेश अरुण ☆ प्रस्तुती – श्री सदानंद  कवीश्वर

राणी लक्ष्मीबाईचा ८ वर्षांचा मुलगा दामोदरराव यांच्या पाठीवर कापड बांधून घोड्यावर स्वार होऊन ब्रिटीशांशी लढतानाची राणीची प्रतिमा प्रत्येकाच्या मनात कोरलेली आहे.

दाची गोष्ट म्हणजे, स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला नाही, की ‘ लक्ष्मीबाईंच्या हौतात्म्यानंतर झाशीच्या अल्पवयीन राजपुत्राचे काय झाले ?’

राणीचा मुलगा दामोदरराव आणि त्याच्या पुढच्या ५ पिढ्या इंदूरमध्ये निनावी जीवन जगल्या, ते अहिल्या नगरी राहिले, हे केवळ मोजक्याच लोकांना माहीत आहे.

कोणतीही सरकारी किंवा सार्वजनिक मदत न मिळाल्याने, राणीच्या वंशजांच्या पहिल्या दोन पिढ्यांनी आपले जीवन अत्यंत गरिबीत आणि भाड्याच्या घरात घालवले.   त्यांना शोधण्यासाठी कधीही, कोणीही प्रयत्न केले नाहीत.

खरेतर, राणीचे वंशज २०२१ पर्यंत शहरात राहिले होते. नंतर ते नागपुरात स्थलांतरित झाले, जिथे सहाव्या पिढीतील वंशज आता एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात आणि निनावी जीवन जगणे पसंत करतात.  झांशीवाले हे बिरूद त्यांच्या नावावर जोडून त्यांनी झाशीशी असलेला संबंध आजही जिवंत ठेवला आहे.

लेखक : सॉफ्टवेअर अभियंता योगेश अरुण

प्रस्तुती : सदानंद कवीश्वर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

१६ ऑगस्ट….  भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी …. त्यानिमित्ताने …….. 

अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातलं एक निर्मळ आणि शुद्ध व्यक्तिमत्व. धर्म, जातपात, भाषा आदींच्या पलीकडे खऱ्या अर्थाने जाऊन अटलजींनी काम केले. राजकारणात ४५ वर्षे घालवून सुद्धा त्यांचे विरोधक देखील एकही आरोप त्यांच्यावर करू शकले नाहीत….. 

मेणाहूनि मऊ आम्ही विष्णुदास, 

कठीण वज्रास भेदू ऐसे. 

भले तरी देऊ कासेची लंगोटी, 

नाठाळाचे माथी हाणू काठी. 

… या तुकाराम महाराजांच्या उक्ती अटलजींच्या व्यक्तिमत्वाचं सार्थ वर्णन करतात. त्यांच्या या स्वभावाचे आणि निष्कलंक चारित्र्याचे मूळ त्यांच्यावर बालपणी झालेल्या सुसंस्कारात आहे. ग्वाल्हेर येथे त्यांचे शिक्षण झाले असले तरी उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे त्यांचे मूळ गाव. याच ठिकाणी त्यांचे आजोबा आणि पणजोबा राहत होते. त्यांचे आजोबा आणि पणजोबा हे अत्यंत विद्वान आणि धार्मिक होते. त्याच संस्कारात अटलजींचे वडील कृष्णबिहारी वाढले.अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. कवी, लेखक, पत्रकार, राजकीय नेते असंअष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अटलजींचा एका छोट्या राजकीय कार्यकर्त्यापासून ते पंतप्रधानपदापर्यंतचा झालेला प्रवास  थक्क करणारा आहे. कृष्णबिहारी संस्कृत,हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांचे उत्तम जाणकार तर होतेच, पण ते प्रख्यात कवीही होते. त्यांचेच काव्यगुण जणू वारशाच्या रूपाने अटलजींमध्ये उतरले. कृष्णबिहारी हे व्यवसायाने शिक्षक होते. त्यांच्या करड्या नजरेखाली अटलजींचे बालपण गेले. 

अटलजींच्या कवितांचं जेव्हा जेव्हा कौतुक केलं जाई, तेव्हा तेव्हा ते त्याचं सारं श्रेय आपल्या वडलांना देत असत. त्यांच्यापुढे मी काहीच नाही असे ते म्हणायचे. अटलजींचं नावही मोठं अर्थपूर्ण आहे. अटलबिहारी या नावातच विरोधाभास आहे. अटल म्हणजे न ढळणारा आणि बिहारी म्हणजे स्थिर नसलेला किंवा भ्रमण करणारा. राजकारणाच्या क्षेत्रातला हा अढळ तारा होता, आणि साहित्याच्या प्रातांत सतत मुशाफिरी करणारे हे व्यक्तिमत्व होते. अटलजींच्या बालपणीच्या आठवणी या त्यांच्या निसर्गरम्य आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या छोट्याशा बटेश्वर गावाशी निगडित आहेत. आपल्या बालपणीच्या आठवणी जागवताना ते तेथील वातावरणाचा अतिशय रम्य उल्लेख करतात. ‘आओ मनकी गाठे खोले’ या कवितेत ते म्हणतात, 

यमुना तट, टिले रेतीले 

घास फूस का घर डाँडे पर,

गोबर से लीपे आँगन मे, 

तुलसी का बिरवा, घंटी स्वर 

माँ के मुहसे रामायणके दोहे- चौपाई रस घोले !

आओ मनकी गाठे खोले !

अटलजींच्या कवितेत तेथील वातावरण खऱ्या अर्थाने जिवंत होते. वडिलांच्या काव्यगुणांचा वारसा अशा रीतीने त्यांच्याकडे आला. अटलजींना तीन भाऊ आणि तीन बहिणी. त्यांची आई अत्यंत धार्मिक वृत्तीची आणि साध्या स्वभावाची गृहिणी होती. मात्र ती सुगरणही होती. आईच्या हातचे पदार्थ खायला अटलजींना अतिशय आवडत. अटलजी निरनिराळया खाद्यपदार्थांचे चाहते होते. पण तरीही आईच्या हाताची चव त्यांना सगळ्यात जास्त आवडणारी होती. अटलजींचे पुढील शिक्षण ग्वाल्हेरला झाले. ग्वाल्हेरच्या बारा गोरखी येथील गोरखी गावी सरकारी उच्चमाध्यमिक शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्यानंतरचे शिक्षण घेण्याकरीता ग्वाल्हेर  मधील व्हिक्टोरिया काॅलेज (आताचे लक्ष्मीबाई काॅलेज) मधे प्रवेश घेतला. हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत विषयांमधे विशेष प्राविण्याने ते उत्तीर्ण झाले.याच सुमारास समर्पित संघ प्रचारक नारायणराव तरटे यांच्या संपर्कात ते आले आणि त्यांच्या प्रेरणेतून अटलजी संघकार्याशी जोडले गेले ते कायमचेच. नारायणराव तरटे हे अटलजींपेक्षा वयाने फार मोठे नव्हते. पण तरीही या दोघांचे गुरुशिष्याचे नाते अलौकिक असे होते. अटलजी त्यांना मामू म्हणत. याच नारायणरावांना अटलजी एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील असा विश्वास होता. 

नारायणराव यांना अटलजी यांनी षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्ताने एक पत्र पाठवले होते. अतिशय सुंदर अशा या पत्रात अटलजींनी आपले जीवन कसे असावे याचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात ‘ बम्बई से प्रकाशित नवनीत ने दिवाली अंक के लिये पूछा था की मेरी मनोकामना क्या है ! पता नही आपके बौद्धिक वर्ग के भाव मुझे कैसे स्मरण आ  गये और मैने कह दिया : हसते हसते मरना और मरते मरते हसना यही मेरी मनोकामना है. ‘

य दरम्यान अटलजींवरील संघकार्याच्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या होत्या. ते एक उत्तम वक्ता आणि कवी म्हणून देखील नावारूपास येत होते.  याच कालावधीत त्यांनी लिहिलेली ‘ हिंदू तनमन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय ‘ ही कविता सगळ्या संघ स्वयंसेवकांना इतकी स्फूर्तिदायक वाटली की ती सर्वत्र म्हटली जाऊ लागली. ते जिथे जात तिथे त्यांना ही कविता म्हणण्याचा आग्रह होऊ लागला. बरेचदा अटलजी संघ कार्यासाठी कॉलेजचे तास बुडवून जात. हे जेव्हा त्यांच्या वडिलांना कळे तेव्हा वडील रागावत. अटलजी त्यांना म्हणत तुम्ही माझे मार्क्स बघा, मग बोला. आणि खरंच अटलजी संघ कार्यासाठी वेळ देऊनही अभ्यासात कुठेही मागे पडत नसत. 

(त्यांच्यावरील हा लेख माझ्या अष्टदीप या पुस्तकातून. या पुस्तकाला तितिक्षा इंटरनॅशनल या संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच मिळाला आहे.)

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आधिपत्य…”  ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “आधिपत्य…”  ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

दोघेही खूप दिवसांनी जोडीने मॉलमध्ये गेले होते, एरवी मुलं बसमधून शाळेत गेली, की तो ऑफिसमध्ये जाई आणि ती घरातलं काम आवरे.सासू, सासऱ्यांना वेळेवर नाष्टा आणि जेवण देण्यासाठी भराभर कामं आटोपण्याच्या मागे ती लागे. पण आजचा दिवस खूप वेगळा होता तिच्यासाठी.मुलांची बस येणार नव्हती.सासू सासरे एका लग्नासाठी दोन दिवस गावी गेलेले आणि त्याला सुट्टी होती.तो म्हणाला, “सकाळी लवकर आटोपून घे, मुलांना शाळेत सोडू आणि तसंच फिरायला जाऊ परस्पर, येताना मुलांना घेऊन येऊ.”

नेहमीच्या रुटीनपेक्षा वेगळा दिवस म्हटल्यावर तिला चुकल्या चुकल्यासारखं झालं. लग्नानंतर फिरायला गेलेले दोघे.त्यानंतर बहुधा पहिल्यांदाच दोघे बाहेर जात होते.एरवी जात, पण लग्न समारंभात किंवा वाढदिवसालाच फक्त… नाहीतर सासू सासरे सोबत असताना.

तिने छानपैकी तयारी केली.  दोघेही निघाले. मुलांना शाळेत सोडलं. तिला खूप वेगळं वाटत होतं.स्वयंपाकाला उशीर होईल, घरातली कामं बाकी आहेत याची हुरहूर लागली , पण मग सासू सासरे घरात नाहीत,असं आठवलं नि परत निर्धास्त झाली.

त्याने मॉलकडे गाडी वळवली. मॉलमधले मोठमोठे शॉप्स बघत दोघे चालत होते.ती तिथल्या बायकाही बघत होती.

वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टस, वनपीस.मेकप मध्ये असलेल्या तिच्याहून अधिक वयाच्या बायका. एकदम मॉडर्न.अन तिला उगाच वाटत होतं की आज तिनेच छान तयारी केली होती.जग खूप पुढे गेलेलं, स्त्रिया खूप बदलल्या होत्या, पण ती अजूनही तशीच होती. पंजाबी ड्रेस, अंगभर ओढणी, साईडच्या दोन लट मध्ये घेऊन लावलेलं क्लचर…

एका दुकानापाशी थांबली.होम डेकोरचं साहित्य होतं तिथे. ती हात लावून एकेक बघत असताना तो म्हणाला, “साधं प्लास्टिक आहे हे. काही कामाचं नाही. चल इथून.” दुसरीकडे प्लॅस्टिक नसून एक चांगल्या क्वालिटीचं  मटेरियल होतं, “हे मटेरियल वेगळं वाटतंय ना जरा?”

“काही वेगळं नाही, तुला नाही समजत त्यातलं.तू चल इथून.”

ती निघाली,

पुढे एका भांडयांच्या दुकानात ती थांबली,

चांगल्या धातूच्या सुंदर कढया बघू लागली,

पोहे करायला एक कढई लहान व्हायची तिला, आणि भाजीला दुसरी कढई मोठी व्हायची, ही कढई अगदी परफेक्ट दिसतेय, तिला आनंद झाला.

तो म्हणाला, “जड आहे खूप.”

“चांगल्या धातूची दिसतेय म्हणून.”

“असं काही नसतं.तुला नाही कळत त्यातलं.चल.”

तिने कढई तिथेच ठेवली आणि पुढे निघाली.

नाष्टा करण्यासाठी ते टेबलापाशी बसले.

ती म्हणाली, ” मी मुलं खातात, तसा पिझ्झा खाणार.”

तो म्हणाला, “मी ऑर्डर देऊन येतो.”

“मी जाऊ का? तुम्ही बसा.”

तो हसला,”तुला नाही जमणार.मॉल मध्ये आहोत आपण.कोपऱ्यावरच्या साई वडापाववाल्याकडे नाही.”

तीही हसली.तिनेही आपलं ‘न जमणं’ मान्यच केलेलं.

तो काउंटर वर गेला.गर्दी होती तिथे.

ती आजूबाजूला बघू लागली.

एका ठिकाणी एक कार्यक्रम चालू होता.

मॉलमध्ये त्या फ्लोरच्या मधोमध एक छोटासा स्टेज होता. आजूबाजूला बरीच गर्दी होती.माईकवरुन आवाज येत होता.

काय असेल? तिला कुतूहल वाटलं.

नवरा लाईनमध्ये उभा होता. त्याला वेळ लागेल हे लक्षात येताच ती स्टेजजवळ गेली.

“Now next contestant? Please step forward.”

तिथे वेगवेगळे खेळ खेळले जात होते. सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न बायका हिरिरीने भाग घेत होत्या. ती बघायला पुढे गेली आणि स्पर्धकांमध्ये केव्हा लोटली गेली, तिला नाही.तिथल्या मुलांनी ती आणि तिच्या बाजूच्या चार बायकांना पुढे यायला सांगितलं तसा तिला घाम फुटला.

अरे देवा, हे कुठलं संकट…!

ती मागे फिरू बघत होती, पण तो मुलगा ओरडला,

“ओह मॅडम, तिकडे कुठे? इकडे या.”

ते ऐकून ती अजूनच घाबरली.

स्टेजवर जाऊन आपल्या नवऱ्याला शोधू लागली. तो अजून लाईनमध्येच होता आणि त्याचं लक्षही नव्हतं.

त्या पाच बायकांना एक खेळ खेळायचा होता.

 

इंग्रजीमधले अवघड स्पेलिंग त्यांना बोर्डवर लिहायला लावणार होते. ज्याचं चुकलं तो आऊट होणार होता.

तिला दरदरून घाम फुटला.

सगळ्या बायका शिकलेल्या, इंग्रजी बोलणाऱ्या, तिला कुठे काय येत होतं?

त्यांना पहिला शब्द दिला-

लेफ्टनंट.

सगळ्या बायकांनी बोर्डवर लिहिलं.

तिला आठवलं,

सासऱ्यांचा एक मित्र लेफ्टनंट होता.त्याची बातमी इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेली.तिने ती बातमी आणि नाव खूप वेळा वाचून काढलेलं.

तिने बरोबर स्पेलिंग लिहिलं.

बाकीच्या 2 जणी आऊट झाल्या, 3 उरल्या,

पुढचं स्पेलिंग- बुके.

तिला आठवलं, मुलांचे तपासलेले पेपर घरी आलेले, तेव्हा मुलाने हे स्पेलिंग चुकवलं होतं. टीचरने करेक्ट स्पेलिंग लिहून दिलं.ते तिच्या लक्षात होतं.

एक बाई आऊट झाली.

आता फक्त ती आणि दुसरी एक बाई उरली.

पुढचं स्पेलिंग- रेस्टरन्ट.

तिच्या डोक्याला मुंग्या आल्या.सगळं गरगर फिरायला लागलं, तिला हे काही येत नव्हतं.डोळ्यात पाणी जमू लागलं.

नवीन लग्न झालं तेव्हा सासरचा जाच ती आईकडे बोलून दाखवायची, तेव्हा आई बोलायची ते वाक्य आठवलं, “उत्तरं आपल्या आजूबाजूलाच असतात.

फक्त नजर तीक्ष्ण हवी.”

तिला येईना. तिने आजूबाजूला पाहिलं.

लक्षात आलं, नवरा जिथून ऑर्डर घेत होता तिथेच वर लिहिलं होतं,

“कॉंटिनेंटल रेस्टोरेंट.”

तिने ते वाचलं, बोर्डवर लिहिलं.

दुसऱ्या स्त्रीने चुकवलं होतं,

ती जिंकली.

सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

तिकडे नवरा ट्रे घेऊन बायकोला शोधत होता,

माईकवर तिचं नाव ऐकलं, तसा तो ट्रे टेबलवर ठेवून तिकडे पळाला.

त्याला सगळं समजलं. तो हैराण झाला.

सर्वांनी तिचं अभिनंदन केलं.सोबतच्या मॉडर्न आणि इंग्रजी बोलणाऱ्या बायकांना ही साधी स्पेलिंग जमली नव्हती. मॉडर्न कोणाला म्हणावं मग? तिला प्रश्न पडला…

ती आनंदाने त्याच्यापाशी आली,”तू आणि इंग्रजी स्पेलिंग खेळात जिंकलीस? पहिली दुसरीतली स्पेलिंग विचारलेली की काय? हा हा हा.” तो या गोष्टीकडे गंमत  म्हणून बघून हसत होता.

“अशी स्पेलिंग होती, जी तुम्हालाही जमली नसती.”

“मग तुला कशी जमली?”

“कसं आहे ना,

आजवर तुला काही जमणार नाही, तुला काही समजत नाही, तुला काही येत नाही, हेच ऐकत होते. आणि त्यावर माझाही विश्वास बसलेला.तुम्ही सोबत होतात तेव्हा याच गैरसमजात असायचे मी.पण आज तुमच्यापासून काही काळ दूर गेले आणि मी स्वतःला गवसले.कदाचित, उशिराच…”

तो खजील झाला, त्याच्या नजरेत ते दिसू लागलं..

नजर चुकवत तो पिझ्झा खाऊ लागला.सोबत आलेलं सॉस चं छोटं पॅकेट फोडायचा प्रयत्न करू लागला. काही जमेना..

तिने त्याच्या हातातून ते घेतलं आणि म्हणाली,

“सोडा, तुम्हाला नाही जमणार.”

जोडीदाराचा प्रयत्न असला पाहिजे की माझ्याइतकाच माझा जोडीदार सक्षम व्हायला हवा, प्रत्येक ठिकाणी जोडीदाराला कमी समजून स्वतः पुढे होणं याला संसार नाही, आधिपत्य गाजवणं म्हणतात.

प्रस्तुती : सौ.शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares