मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

निवडुंग.

निवडुंग या काटेरी, झुडुप प्रकारच्या वनस्पतीशी माझ्या काही बालपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत. धारदार बोथट मणके असलेल्या निवडुंगाच्या चांगल्या गलेलठ्ठ फांदीचे एक सारखे उभे तुकडे करून, त्याचे सुरेख दिवे आई बनवायची. त्यात तेल वात रुजवायची. आणि चांदीच्या ताटात ते पेटवलेले दिवे लावून दिवाळीच्या धनतेरसच्या दिवशी धनाची पूजा करायची. इतका देखणा देखावा असायचा तो!

आजी म्हणायची प्रत्येक वनस्पतीचा सन्मान ठेवणे ही आपली संस्कृती आहे.

याच निवडुंगाशी माझी एक कडवट आठवणही आहे. आमच्या बागेत सदाफुली, मोगरा, जास्वंदी, जाई आणि जुई सोबत एका कुंडीत कोरफड लावलेलं होतं. काटेरी धारदार गुळगुळीत, मऊ, हिरवागार कोरफडीचा वाढलेला गुच्छ छानच दिसायचा. पण मला खोकला झाला की आजी, या कोरफडीची फणी कापून त्यातला गुळगुळीत गराचा रस करून प्यायला लावायची. खोकला पळायचा पण मनात रुतलेला त्याचा कडवटपणा मात्र नकोसा वाटायचा.

कधी कधी आजी तो गर केसांनाही चोपडायची. माझे कुरळे दाट केस पाहून मैत्रिणी म्हणायच्या,

“इतके कसे ग दाट तुझे केस?” मी त्यांना सांगायची, “कोरफडाचा चीक लावा”. तेव्हां त्या नाकं मुरडायच्या.

ठाण्याला शहराचे स्वरूप गेल्या काही वीस पंचवीस वर्षापासून आलं असेल. पण त्याआधी ठाण्याच्या आसपास खूप जंगलं होती. काटेरी, वेडी वाकडी, मोकाट वाढलेली. प्रामुख्याने तिथे निवडुंगाची झाडे आढळायची. आणि त्या वयात निवडुंग या वनस्पतीविषयी कधी आकर्षण वाटलंच नाही. नजर खिळवून ठेवावी असं कधी झालं नाही.

नंतर कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्राचा अभ्यास करताना या निवडुंगाची पुन्हा वेगळी शास्त्रीय ओळख झाली. कॅक्टेसी, फॅमिली झीरोफाइट्स(xerophytes) अंतर्गत येणाऱ्या या निवडुंगाचे अनेक प्रकार हाताळले. पाहिले. कितीतरी वेगवेगळे प्रकार, वेगवेगळी नावे. वई निवडुंग, त्रिधारी निवडुंग, फड्या निवडुंग, बिनकाट्याचा निवडुंग, पंचकोनी निवडुंग, वेली निवडुंग, लाल चुटूक फळं येणारी काही गोंडस निवडुंगं, काही काटेरी चेंडू सारखे दिसणारे..असे कितीतरी प्रकार अभ्यासले. वाळवंटातही हिरवगार राहण्याची क्षमता असलेलं हे काटेरी झाड, फांद्यांमधे कसं पाणी साचवून ठेवतं आणि स्वतःला टिकवतं, याचा वनस्पतीशास्त्राच्या पुस्तकातून भरपूर अभ्यास केला. त्याचे पर्यावरणीय आणि वैद्यकीय फायदे जाणून घेतले. पुढील आयुष्यात तर या निवडुंगाच्या छोट्या कुंड्यांनी घरही सुशोभित केलं. एक काळ असा होता की घरात विशिष्ट प्रकारचं कॅक्टस असणं हे स्टेटस झालं होतं! आजकाल तर एलोवेरा जेल, एलोवेरा क्रीम, ऑइल यांनी तर घराघरात ठाण मांडलेआहे. एलोवेरा म्हणजे तेच ना आजीचं कोरफड?

आता माझ्या अंगणात एका कोपऱ्यात, आई ज्याचे दिवे बनवायची ते चौधारी निवडुंग खूप वाढले आहे. कधी कधी ते उपटून टाकावं का असेही माझ्या मनात येतं. पण उन्हाळ्यात जेव्हा काही झाडं सुकून मरगळतात तेव्हा हे हिरवंगार निवडुंगाचं झुडुप मला काहीतरी सांगतं. शिकवण देतं. माझा गुरू बनतं. मला ते काटेरी झाड स्वयंपूर्ण वाटतं. स्वतःची शस्त्रं सांभाळत स्वतःचं रक्षण करणारं सक्षम जैविक वाटतं. वाळवंटातही हिरवेपण जपणारं एक कणखर व्यक्तिमत्त्वाच्या रूपात ते माझ्यासमोर येतं. आणि मनात सहज येतं, आपणही असेच निवडुंग होऊन जावे. जीवनाच्या वाळवंटी, विराण वाटेवरही हिरवेगार राहावे. काटे सुद्धा दिमाखाने मिरवावेत…

आणि जमलं तर आईच्या पूजेच्या ताटातला दिवाच होऊन जावे..

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ओरडणारी, किंचाळणारी आई…’ – लेखक : डॉ. अनिल मोकाशी  ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले  ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ओरडणारी, किंचाळणारी आई…‘ – लेखक : डॉ. अनिल मोकाशी  ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

ओरडणारी, किंचाळणारी आई…

(‘घरोघरी मातीच्याच चुली’ की हो !)

बाईपण दे गा देवा. ओ के आहे. पण आईपणाचा बोजा नको रे बाप्पा! ऐसे कैसे चलेगा! मान्य आहे, सोपं नाही आहे ते. पण घेतला वसा तर निभावायलाच हवा ना. आनंदाने, सुख, समाधानाने संसार तर करायलाच हवा.

१. आईचे ताणतणाव

आईचे व्यक्तिमत्त्व आणि तिच्या वागणुकीचा मुलांच्या मानसिकतेवर आणि भावनिक विकासावर फार मोठा परिणाम होतो. आई जर वारंवार ओरडणारी, किंचाळणारी असेल तर मुलांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

२. मुलांमध्ये तणाव आणि चिंता

मुलांना आईकडून हवे असते प्रेम आणि सुरक्षितता. लहान सहान चुकांवर ओरडणारी आई मुलांमध्ये तणाव आणि चिंता निर्माण करू शकते. त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का देऊ शकते.

३. आत्म-संयम, वर्तणूक आणि सामाजिक कौशल्ये:

आईच्या ओरडण्यामुळे मुलं घाबरु शकतात. भेदरू शकतात. स्तब्ध, होऊ शकतात. कॉम्प्युटर हँग होतो तशी. वर्तणुकीत समस्या निर्माण होतात. आईच्या ओरडण्याला उत्तर म्हणून मुलं उलट उत्तर, आक्रमकता, विरोध किंवा विद्रोह करू शकतात. हे साद प्रतिसादाचे प्रकरण आहे. त्यांचे चुकीचे वागणे त्यांच्या सामाजिक कौशल्यांना बाधा पोचवू शकते. आईने संयम बाळगून वर्तणूक केली तर मुलेही संयम बाळगून वर्तणूक करायला शिकतील.

४. भावनिक विकास:

आईच्या ओरडण्यामुळे मुलांच्या भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मुलं त्यांच्या भावना व्यक्त करण्यात कमी पडू शकतात. त्यांची भावनिक बुद्धिमत्ता कमी होऊ शकते. त्यांना आपल्या भावना दडपून ठेवायला शिकायला लागतं. त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

५. आत्मसन्मान:

वारंवार ओरडण्यामुळे मुलांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो. त्यांनी स्वतःबद्दल निगेटिव्ह भावना बाळगायला सुरुवात केली तर त्यांचा आत्मविश्वास खालावतो. “तू तर बॅड बॉयच आहे” हे त्याला वारंवार सांगून पटवून देण्याने काय साधणार? मुलांचा स्वतःचा स्वतःवरच विश्वास नसेल तर शैक्षणिक, सामाजिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.

६. आईचे मानसशास्त्र:

आईचे वर्तनही तिच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते. ताण, चिंता, कौटुंबिक, आर्थिक, वैवाहिक समस्यांमुळे आईचा मूड बिघडू शकतो. आईनी स्वतःची मानसिकता सुधारली तर मुलांचे वर्तणूक सुधारते. मन पावन, पवित्र वातावरणात ठेवा. प्रसन्नतेने मिळवा, परम सुखाचा मेवा. बघायला गेलं तर, यादी मोठी समस्यांची. आवाक्याबाहेरची काळजी कशाला उद्याची. आईचे ताणतणाव पोखरती, तिच्या स्वतःच्या, व मुलाच्या मनाला आणि शरीराला. मनात नकोच जागा, त्यांच्यासाठी उरायला. आईने कायम चिंताग्रस्त राहून, काय साधणार. सशक्त मन, कधीच नाही कोलमडणार.

७. संवाद आणि सामंजस्य:

आई-मुलांमधील संवाद आणि सामंजस्य वाढवणे हे महत्वपूर्ण आहे. आईने आपल्या मुलांशी प्रेमळ, आदराने आणि सहनशीलतेने वागायला शिकायला हवं. जर मुलं चुका करतात, तर त्या चुका सुधारण्यासाठी प्रेमळ मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. कणभर चुकीला मणभर रागवायला नको. जुन्या चुका आठवून, आठवून रागवायला नको. केल्या चुकीला लगेच रागवायला तर हवेच. पण ते एक दोन वाक्यात असावे. पानभर रागवायला नको.

८. सकारात्मक पालनपोषण:

पॉजिटिव्ह पॅरेंटिंग हवे. प्रेम, आदर, आणि सहनशीलता हवी. मुलांना शिस्त लावण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन हवा. मुलं आत्मविश्वासाने, स्वावलंबी आणि सामर्थ्यवान बनू शकतात.

निष्कर्ष:

ओरडणारी, किंचाळणारी आई मुलांच्या मानसिकतेवर आणि भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम करू शकते. आईने सकारात्मक पद्धतीने मुलांचे पालनपोषण करणे आवश्यक आहे. त्यानी मुलं सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि भावनिकदृष्ट्या स्थिर बनतील. आईने आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही लक्ष देणे आवश्यक आहे, ज्यामुळे तिच्या वर्तनात सकारात्मक बदल होऊ शकतात. कंट्रोल मॅडम, कंट्रोल.

लेखक : विद्यावाचस्पती डॉ. अनिल मोकाशी

बाल कल्याण केंद्र, मतीमंद, मूकबधिर, पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा. जामदार रोड, काराभारीनगर, कसबा, बारामती, ४१३१०२,

९८२२३०२१३१ —- dranilmokashi@gmail. com

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अवघाचि संसार सुखाचा करीन… – संत ज्ञानेश्वर ☆ रसग्रहण.. सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? काव्यानंद ?

☆ अवघाचि संसार सुखाचा करीन… – संत ज्ञानेश्वर ☆ रसग्रहण.. सौ. वृंदा गंभीर 

अवघाचि संसार….

अवघाचि संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक || १ ||

*

जाईन गे माये तया पंढरपुरा |

भेटण माहेरा आपुलिया || २ ||

*

सर्व सुकृताचे फळ मी लाहिन |

क्षेम मी देईन पांडुरंगा || ३ ||

*

बापरखुमादेवी वरु विठ्ठलाची भेटी |

आपुल्या सवंसाठी करुनि ठेला || ४ ||

*

अवघाची संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक ||1||

अवघाची संसार म्हणजे सगळा संसार सुखाचा करिन संसार खूप अवघड आहे तो सोपा नाही वादळ वारे संकट झेलत सावरत संसार करावा लागतो,,,,,,,,

कुटुंबाची मर्यादा पाळत सगळ्यांची मनं सांभाळून हातोटीने संसार करावा लागतो नव्हे नव्हे करावाच लागतो.

“आनंदे भरीन तिन्ही लोक “

आनंदाने, समाधाने राहून तिन्ही लोकांना आनंद देईल,,,,

तिन्ही लोक,,, स्वर्ग, पाताळ, पृथ्वी या तिन्ही लोकांत आनंद परमेश्वराच्या नामस्मरणाने देणार आहे.

परमार्थ करून प्रपंच करणं म्हणजे संसार सुखाचा होणं आहे.

संसार अवघड आहे तितकाच परमार्थ सोपा आहे पण, आपण सांसाराच्या मागे धावत परमार्थ अवघड करून ठेवतो.

वय झाल्यावर देवाची आठवण येते तेंव्हा लक्षात येत आपण आयुष्यभर विनाकारण पळालो ज्याने आपल्याला या जगात आणलं त्यालाच विसरलो.

तेंव्हा जाणीव होते आणि देवाचा धावा सुरु होतो. भक्ती कशी निस्वार्थी हवी. देव “दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू ” आहे आपल्या भक्तीचं फळ तो लगेच देतो.

संसार करत आनंद देण्याचा प्रयत्न करावा आनंद वाटत राहावा.

जाईन गे माये तया पंढरपूरा* भेटेन माहेरा आपुलिया

संसार करत परमार्थ करायचा आहे पांडुरंगा चरणी लिन व्हायचं आहे..

पंढरपूर माहेर आहे तिथे विठ्ठल रुख्मिणी माय बाप कर कटावर ठेऊन उभे आहेत…..

पंढरपूला माझ्या माहेरी जाऊन भेटून येणार आहे माझ्या माय माऊली, माझ्या मात्या पित्याला डोळेभरून बघणार आहे त्याचं ते सकुमार रूप डोळ्यात साठवणार आहे.

“सावळा तो श्रीहरी, सावळा तो विठ्ठल

रूप त्याचे मनोहर, पाहुनी होई मन समाधान “

सुंदर असे रूप पाहून देहभान हरपून जाते,,,

“पिवळा पितांबर, गळ्यात तुळशीमाळा

भाळी चंदनाचा टिळा, कटेवरी हात उभा वेटेवर”

असा तो पांडुरंग डोळ्यात साठवून मनाला शांती मिळते म्हणून माझ्या माहेरी मला जायचं भेटून यायचं आहे.

सर्व सुकृताचे फळ मी लाहीन

क्षेम मी देईन पांडुरंगा

जे मी सत्कर्म केल जे पुण्य मी मिळवलं त्याचं फळ मला मिळेल किंवा मी ते घेऊन येईल मी पांडुरंगाची क्षमा मागेल,,,

रोजचे कर्म करत असताना चूक होतेच अशी काही चूक झाली तर पांडुरंगाची क्षमा मागून प्रायश्चित घेईल,,,

मी विठुराया चरणी नतमस्तक होईल,,,, विठुरायाला अलिंगन देऊन त्याच्या चरणी जागा दे ही विनवानी करेल त्याची दासी होऊन राहीन.

बापरखुमादेवी वरू विठ्ठलाच्या भेटी

आपुल्या संवसाठी करुनी ठेला

विठ्ठल रुख्मिणी आई वडील आहेत.

माता पित्याची भेट हे विठ्ठलाच दर्शन म्हणजे एक वरदान आहे…

आपल्या साठी तो विटेवर उभा आहे.

आपल्या रक्षणासाठी उभा आहे.

एक आषाढीची वारी निमित्य आहे आई बापाच्या भेटीचं संतांचा मेळा भरतो. संत संगत मिळते आणि आयुष्य बदलून जातं.

” दुमदूमली पंढरी, गजर कीर्तनाचा “

” मुखी नाम विठुरायाचे, सोहळा हरीनामाचा “

जय हरी माऊली 🙏🙏

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रोखून धरलेली नजर… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

रोखून धरलेली नजर ☆ प्रा. भरत खैरकर 

हे कधी लक्षात आलाय कां काही लोक नेहमी तुमच्या मर्यादा, कमतरता, सीमा दाखवायला, तपासायलाच बसलेले असतात! ते कधीही तुमच्याशी धड बोलत नाहीत. सारखा अपमान करण्याच्या स्थितीमध्ये किंवा तुम्हांला कमीपणा दाखवण्याच्या नादात असतात. तुम्हांला तुच्छ लेखण्यासाठी ते सतत खूप उत्सुक असतात.

त्यांच्या अशा वागण्याला आपण हसून देतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. पण अशाने ते थांबत नाहीत! अशावेळी काय करायचं? जे तुमचा सतत अनादर करतात. तुम्हांला हीन पद्धतीने वागवतात तर मग तुम्ही एक गोष्ट करा. अशा माणसाकडे एकदम डोळ्यात रोखून बघा! काही बोलूच नका!!

अशी माणसं तुम्हांला त्यांच्या नाटकामध्ये, तमाशामध्ये सामील करू इच्छितात. त्यासाठी तुमची प्रतिक्रिया, तुमचं घाबरलेपण, अळखळलेपणा, उत्तर देणं किंवा उलट उत्तर देणं त्यांना हवं असतं. जेणेकरून तुम्ही त्यात ओढले जाल. असं करून ते तुमचा आत्मविश्वास तोडू इच्छितात किंवा तुम्हांला हीन दाखवितात.

मात्र तुम्ही जेव्हा शांत राहून त्यांच्या नुसतं नजरेला नजर भिडवता तेव्हा मात्र त्यांचे सगळे पवित्रे फेल गेलेले असतात.. संपलेले असतात. आणि तुमच्या कोणत्याही प्रकारच्या न मिळालेल्या प्रतिसादामुळे सगळा खेळच उलटफेर होतो. कारण समोरच्या व्यक्तीला हवी असलेली प्रतिक्रिया आपण न केल्याने त्याचा ‘ पोपट’ होतो. आणि तो व्यक्ती आतल्याआत तडफडायला लागतो. ज्यावेळी तुम्ही स्थिर आणि रोखून अशी एक नजर टाकता. तेव्हा तुम्ही कुठलाही शब्द न वापरता स्पष्टपणे सांगत असतात की ‘तुझ्या नाटकात मी सामील होणार नाही!’. किंवा ‘तुला हवा आहे तसं मी वागणारच नाही’.. त्यामुळे समोरच्याचा भ्रमनिराश होतो.

ही अशी एक पद्धत आहे ज्यामुळे तुम्ही काहीही न करता समोरच्याला चितपट करू शकता. बऱ्याच वेळा स्थिर नजर आणि शांत राहणे ह्याच गोष्टी ‘कारीगर’ ठरतात.

हा उपाय रोजच्या आयुष्यात कसा उपयोगी पडतो हे बघायचे असेल तर हे ऐका.. मीटिंगमध्ये नेहमी एक व्यक्ती सारखी सारखी माझ्या मतावर प्रतिक्रिया द्यायची.. उलटसुलट रिएक्शन द्यायची. जसं काही त्याचं काहीतरी अडतयं किंवा त्याचा काहीतरी त्यात हेतू आहे.. स्वार्थ आहे.. त्याहीपेक्षा त्याला मला खालीच दाखवायचं होतं.. त्यासाठी तो चढ्या आवाजात बोलायचा.. आणि स्वतःलाच इतरांपेक्षा शहाणा समजायचा.. इतरांपेक्षा मलाच अक्कल आहे.. किंवा ‘मीच हे सर्व घडवून आणलं. ‘ हे दाखवण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असायचा.. त्यावेळी मी माझे म्हणणे अत्यंत नम्रपणे किंवा कोणालाही न दुखवता, इतरांचा आदर करत मांडायचो. तरीही त्याचा अट्टाहास काही जात नव्हता. ग्रामीण भाषेत ‘माझीच लाल’ असं बोलल्या जातं. तसा काहीसा तो व्यक्ती होता. त्यामुळे तो प्रत्येक वेळी मलाच नव्हे तर इतरांना सुद्धा मीटिंगमध्ये मधेमधे करून रोखून धरायचा.. व आपण किती हुशार आहोत हेच सांगायचा त्याचा रोख असायचा.. आता हे मात्र अती झालं होतं..

असेच एकदा मिटिंगमध्ये मी खुर्ची थोडीशी मागे केली.. रेलून बसलो.. आणि एकसारखा टक लावून त्याच्याकडे बघत गेलो.. मी शब्दही काढला नाही. माझे दोन्ही हात मी छातीशी बांधून घेतले आणि साधारण तीस-पस्तीस सेकंदापर्यंत त्या व्यक्तीला सारखा न्याहाळत राहिलो. नव्हे त्याला रोखूनच बघत राहिलो.. त्यामुळे हळूहळू मीटिंग मधील वातावरण एकदम ‘गरम’ झाले.. इतरही लोक मला फॉलो करू लागले.. तेही त्याच्याकडे टक लावून बघायला लागले.. कोणीच काही बोलत नव्हतं.. आणि आता सगळे त्याच्या रिॲक्शनची वाट बघत होते तो काय करतो किंवा काय करेल ही उत्सुकता सर्वांना लागली होती.

तो अचानक घाबरायला लागला.. त्याच्या आवाजाला कंप सुटला.. त्याचे शब्द अडखडायला लागले.. तो ततपप करायला लागला.. तो इकडे तिकडे बघायला लागला.. नजरेला नजर मिळवण्याची हिंमत करत नव्हता.. त्यानंतर झालेल्या कित्येक मीटिंगमध्ये त्याने मला मधे टोकलं नाही की रोखलं नाही. एवढंच नाही तर तिथून पुढे तो माझ्याशी इज्जतीत वागायला लागला.. आदर द्यायला लागला.. त्याला हे लक्षात आलं की मी तो व्यक्ती नाही ज्याला तो दाबू शकतो.. त्याच्या इशाऱ्यावर नाचवू शकतो.

बऱ्याच वेळा लोकांना हे दाखविण्यासाठी की तुम्ही नेमके कोण आहात हा पवित्र आजमावला पाहिजे!जेव्हा तुम्ही वरील पद्धत अवलंबता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगत असता की मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालणारा व्यक्ती नाही. तुझ्या हातातली कठपुतली नाही. माझे धागेदोरे माझ्याच हातात आहे. ते तुला देऊन तुझ्या तमाशाचा मी भाग बनू इच्छित नाही. माझ्या भावभावनांशी खेळण्याचा तुला अधिकार मी देणारच नाही. आणि माझी मूल्ये काय आहे, हे तुझ्यासारख्या कडून सर्टिफाईड करून घेण्याची गरज नाही.

खूपदा आपला जेव्हा कोणी अपमान करतो किंवा बदनामी करतो तेव्हा आपण स्वतःला डिफेन्स करण्याचा पवित्रा आजमावतो.. आणि समोरच्या व्यक्तीला एक प्रकारे वाव देत असतो.. आपण आपली सफाई.. आपली बाजू मांडत असतो.. जेणेकरून कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये किंवा भांडण होऊ नये. मात्र समोरचा त्या सगळ्या गोष्टींचं ‘पोतरं’ करतो.

अशावेळी तुम्ही रोखून धरलेली नजर ही काही आक्रमक कृती नाही. ती एक सौम्य पण रामबाण अशी कृती आहे! यामधून तुम्ही शांत आणि मजबुतीने उभे आहात खंबीर आहात हे समोरच्याला दिसतं.. तुमचे पाय जमिनीवर आहेत. तुम्ही उडो उडो करत नाही.. किंवा कुठलाही प्रकारचा दाखवेपणा तुम्हांला नको आहे. तुमचं काम आणि तुम्ही हे सांगण्याचा तुमचा रोख ह्यातून दिसतो. तुम्ही जिम्मेदार व्यक्ती आहात. हा सुद्धा संदेश या कृतीतून जातो.

जे लोक इतरांची बेईज्जत किंवा अपमान करत असतात त्यांना आजवर कोणीही रोखलेलं किंवा उलट बोललेलं नसतं. त्यामुळे हे लोक शेफारलेले असतात.

आपली उणीव झाकण्यासाठी असे लोक इतरांचा वापर करत असतात. त्यांना हे कोणी सांगितलं नसतं की तुमच्या अशा वागण्याने समोरच्याच व्यक्तिमत्व किंवा त्याचे सद्गुण दबून जातात.. पण जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला शांत आणि रोखून धरलेल्या नजरेने बघता तेव्हा ती कृती एका आरशासारखे काम करते.. तो आरसा.. ती नजर.. त्या व्यक्तीला त्याचं प्रतिबिंब दाखवितं. तुम्ही त्याला काही सांगत नसता फक्त त्याला ‘दाखवत’ असता.

पण विश्वास ठेवा की अशा प्रकारचे लोक या पद्धतीने स्वतःला कधीही बघू इच्छित नाही किंवा त्यांनी तसं स्वतःला कधी बघितलेच नसते.. स्वतःचं असं भयानक रूप जेव्हा ते त्या आरशात बघतात.. तेव्हा ते खजील होतात.. त्यांना त्यांच्या कृतीबद्दल शरम वाटते.. लाज वाटते. त्यामुळे रोखून पाहण्याची ही त-हा.. पद्धत खूप उपयुक्त आणि परिपूर्ण आहे. चला तर मग बघूया रोखून आपला अपमान करणाऱ्याकडे! ज्यामुळे समोरचा व्यक्ती थोडा माघारी जाईल आणि आपण आतल्या आत मजबूत होवू !!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती… मूळ इंग्रजी लेखक : ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (Retd) ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? मनमंजुषेतून ?

महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती… मूळ इंग्रजी लेखक : ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (Retd) ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

महाकुंभपर्वामध्ये गंगास्नान करण्यासाठी मी अजूनही गेलेलो नाही हे ऐकताच तो म्हणाला, “इतक्या मोठ्या स्तरावर हा महाकुंभमेळा आयोजित करणे म्हणजे पैशांचा आणि संसाधनांचा निव्वळ अपव्यय आहे, दुसरं काय?” तो स्वतः नास्तिक असल्याचे त्याने मला आधीच सांगितले होते.

मी हसतमुखानेच त्याला म्हणालो, “तुझ्या चष्म्यातून तुला सर्व धर्मांमधल्या केवळ वाईट गोष्टीच दिसत राहणार यात काही नवल नाही. पण एका सैनिकाच्या दृष्टिकोनातून मला तरी असे दिसते की, भारताने आपले शत्रू आणि मित्र या दोघांनाही या कुंभमेळ्याद्वारे एक अतिशय स्पष्ट इशारा दिलेला आहे.”

माझे बोलणे ऐकताच त्याने भुवया उंचावून म्हटले, “सैनिकी दृष्टिकोन? पण धर्म आणि सैन्यदलांचा काय संबंध?” 

“अगदी घनिष्ठ संबंध आहे. आता असं पाहा, कोट्यवधी लोक लांबलांबून येऊन प्रयागतीर्थी एकत्र जमले, इथे राहिले आणि सर्वांनी एका सामायिक श्रद्धेने गंगेमध्ये स्नान केले. यामधून किमान चार गोष्टी स्पष्ट होतात: –

  1. कोट्यवधी भारतीयांना अशा प्रकारे एकसंध समूहात एकवटता येणे शक्य आहे.
  2. अभूतपूर्व अशा प्रकारचा हा सोहळा घडवून आणण्यासाठी लागणारी योजनक्षमता आपल्यामध्ये आहे.
  3. एखाद्या सांघिक ध्येयावर जर अढळ विश्वास असेल, तर ते उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी, वैयक्तिक स्तरावर अपार कष्ट आणि गैरसोय सहन करण्याचा सोशिकपणा भारतीयांमध्ये आहे.
  4. आपल्या देशाचे नेतृत्व अत्यंत सक्षम आणि कणखर आहे.

अरे, अवकाशात भ्रमण करणाऱ्या उपग्रहांनाही दिसू शकेल इतका भव्य सोहळा आपल्या देशात आयोजित होतोय ही गोष्ट तुला अभिमानास्पद वाटत नाहीये का? मी तुला सांगतो, आपले शत्रूदेखील या सोहळ्याकडे आज अचंबित होऊनच, पण अतिशय सावधपणे पाहत असतील!”

त्याने नुसतेच खांदे उडवले आणि म्हणाला, “असेलही. पण माझा प्रश्न पुन्हा तोच आहे. सैनिकी दृष्टीकोनाचा इथे काय संबंध?” 

जरासा पुढे झुकत मी म्हणालो, “कल्पना करून बघ, एखाद्या युद्धाच्या प्रसंगी अशा तऱ्हेने संपूर्ण जनसमूह एकवटून जर देशाच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहिला तर युद्धावर किती जबरदस्त प्रभाव पडेल? पाकव्याप्त काश्मीर किंवा तिबेटला शत्रूच्या जोखडातून मुक्त करायचे ठरवून जर असा जनसमूह उद्या एकवटला तर? देशावर ओढवलेल्या एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी जर जनता अशा तऱ्हेने एकत्र आली आणि त्यांनी यथाशक्ती दान केले तर केवढी प्रचंड संपत्ती उपलब्ध होऊ शकेल माहितीये? हे बघ, कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यातून एक गोष्ट ठळकपणे सिद्ध होते – भारताची युद्धक्षमता केवळ सैन्यदलांचे शौर्य आणि त्यांच्या शस्त्रसामर्थ्यावर अवलंबून नव्हे, तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या जनतेच्या इच्छाशक्तीमध्ये आहे. जगातला कोणीही युद्धनीतिज्ञ माझे हे म्हणणे मान्य करेल.”

आता त्याच्या चेहऱ्यावर काहीसे कडवट आणि कठोर भाव दिसू लागले, “या मेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत कित्येक निरपराध लोकांना प्राण गमवावे लागलेत, आणि तू इथे बसून खुशाल राष्ट्रीय शक्तिप्रदर्शनाच्या पोकळ गप्पा मारतोयस? तुझं हे बोलणं तुला विचित्र नाही का वाटत?”

एक सुस्कारा सोडत मी उत्तरलो, “अरे, जरासा व्यापक विचार करून पाहा. ती दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथे जाणाऱ्या लोकांची संख्या कमी तर झालीच नाही – उलट वाढलीच. शिवाय, प्रशासनानेही तेथील व्यवस्था अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला. आपली जनता आणि प्रशासन या दोघांचाही निर्धारच यातून ठळकपणे दिसतो. चीनमध्ये जर अशी चेंगराचेंगरीची घटना घडली असती तर काय झालं असतं माहितीये? एकतर त्यांनी हा सोहळाच तातडीने गुंडाळून टाकला असता, किंवा मग गर्दी नियंत्रित करण्यासाठी राक्षसी ताकद वापरली असती – जे त्यांनी कोव्हिडकाळात केलंच होतं. त्यांच्या सैनिकांच्या गोळ्यांनी त्यांचेच नागरिक मृत्युमुखी पडतानाचे व्हिडिओ नाही का पाहिलेस तू?”

आता मात्र तो उपहासाने हसत म्हणाला, “मग काय? इतकं सगळं झालं तरी आपण आपला आनंदसोहळा साजरा करत राहायचं, असं तुझं म्हणणं आहे का?”

“सोहळा तर साजरा करायचाच. पण ही वेळ अंतर्मुख होऊन गंभीर विचार करण्याचीदेखील आहे.” 

“कसला गंभीर विचार?” तो जरा चिडखोरपणेच बोलला.

मी पुन्हा पुढे झुकत म्हणालो, “अरे, आईचं दूध प्यायलेला कोणीही शत्रू अशा वेळी आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील, आणि आपण जर गाफील राहिलो तर तो यशस्वी होईलही. “

माझी परीक्षा पाहत असल्याच्या अविर्भावात तो म्हणाला, “शत्रू आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील? ते कसं काय बुवा?”

त्याचा उपहास मला कळत होता, पण माझा प्रयत्न मी सोडला नाही. “हे बघ, कुंभमेळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे लोकांची आस्था, आणि दुसरं, आपलं कार्यक्षम नेतृत्व. आपला शत्रू एकतर लोकांची आस्था डळमळीत करण्याचा प्रयत्न करील, किंवा आपल्या डोक्यावर कमकुवत नेते बसवण्याचा प्रयत्न करेल. भारतातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल प्रभावित करण्यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला गेल्याबद्दल तू वाचलं नाहीस का?”

तो कुत्सितपणे उद्गारला, “ओहहो! आता मला माझ्यासमोर बसलेला ‘अंधभक्त’ स्पष्ट दिसायला लागला !”

मी नुसतीच मान हलवली. कारण, मुद्देसूद चर्चा सोडून आता तो वैयक्तिक टीका करू लागला होता. स्वतःमधल्या नकारात्मकतेमुळे आंधळा झालेला असूनही, तो मलाच विनाकारण ‘अंधभक्त’ ठरवू पाहत होता. मी मनातून पुरता चडफडलो होतो. पण शक्य तितक्या शांत स्वरात मी म्हणालो, “माझं दुर्दैव इतकंच की अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन असलेला, माझ्यातला एक सच्चा देशभक्त तुला दिसत तरी नाहीये, किंवा तू पाहूच इच्छित नाहीस. असो. “

याउप्पर त्याच्याशी कोणतीच सयुक्तिक चर्चा शक्य नसल्याने, मी तिथून निघून जाणेच श्रेयस्कर होते.

‘गुरुवाणी’ मधला एक श्लोक जाता-जाता सहजच माझ्या मनात उमटला, “हम नाहीं चंगे, बुरा नाहीं कोये, प्रणवथ नानक, तारे सोये।” म्हणजेच, “मी चांगला आहे असे नाही, इतर लोक वाईट आहेत असेही नाही, नानक प्रार्थना करतो, तोच (देव) आमचा तारणहार आहे!”

मूळ इंग्रजी लेखक : ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (सेवानिवृत्त)

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’… माहिती संग्राहक : संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’… माहिती संग्राहक : संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’…  सुश्री अचला जोशी… जन्म. १९ मार्च १९३८

अचला जोशी या वाइन बनविणाऱ्या राज्यातील या पहिल्या महिला उद्योजिका असल्या तरी आजही त्याच उमेद, प्रामाणिक व पारदर्शकपणे मद्याच्या या दुनियेत ‘वाइनलेडी’ म्हणून काम करत आहेत. वाइन म्हणजे दारू नव्हे आणि ही वाइन महिलांनीच प्यायची असे काही नाही, तसेच ती कोणीही सहजरीत्या घरीही बनवू शकतं. वाइनबाबतीत अशी ठळक वाइनशास्त्र सांगणारी आणि वाइन बनविण्याचा हा व्यवसाय ऋतुमानावर अवलंबून असल्याने त्याला जोडधंदा म्हणून आवळ्याचे ‘च्यवनप्राश’ आणि ‘तळोजा क्वील्ट’ या नावाने सुरू केलेल्या व्यवसायाला लंडनच्या बाजारात पोहोचवणाऱ्या श्रीमती अचला फडके-जोशी यांनी पनवेलमधील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना एक आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली आहे.

अचला जोशी या माहेरच्या अचला फडके. दादर हिंदू कॉलनीतील कॉलनी नर्सिंग होमचे डॉ. जी. एम. फडके हे त्यांचे पिता, तर मूत्रपिंड-तज्ज्ञे डॉ. अजित फडके हे त्यांचे सख्खे भाऊ होत.

त्या वेळच्या मुंबईतील माटुंग्यासारख्या ठिकाणी डॉक्टर फडकेंचे ते प्रशस्त घर म्हणजे साहित्य संघातील दिग्गजांचा हे मुक्त वावराचे ठिकाण. साहित्य व सांस्कृतिक वातावरण अचला यांची जडणघडण झाली असली तरी स्वत:ची हौस पुर्ण करत करत त्यांनी बीए व एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबत शिवणकाम व साहित्यप्रेम हेसुद्धा कायम ठेवले. शिक्षणानंतर काही वर्षांनी १९६० साली टाटा कंपनीमधील एका अभियंत्यांसोबत सुधाकर जोशी यांच्यासोबत विवाह झाला. नवरा आणि कळायला लागलेली दोन मुले जसजशी मोठी झाली त्याच वेळी संसाराच्या पटलावरील गृहिणीचे पात्र सोडून शिक्षणाचा अजूनही काही लाभ घ्यावा अशीही सल मनात कुरकुर करू लागल्याने एका वर्तमानपत्रातील जाहिरातीवरून त्यांनी इंडियन काऊंसिलच्या प्रदर्शनात भारताच्या शिष्टमंडळात समन्वयकाची जबाबदारी मिळवली. याच जबाबदारीतील पहिला सोहळा पार पडताना स्वत:च्या कार्यपद्धतीवर अमेरिकन अधिकाऱ्यांचे मन कामातून जिंकणाऱ्या या शिष्टमंडळाला थेट एका पंचतारांकित हॉटेलमधील पार्टीचे निमंत्रण मिळाले. याच पार्टीतील रेडवाइनच्या पहिल्या घोटातील चवीने तिने मायदेशी हीच वाइन बनविण्याची जिद्द उराशी बाळगली आणि अमेरिका वारीहून भारतात परतताना अचला यांनी वाइनइस्ट सोबत घेऊन भारतामध्ये प्रवेश केला. प्रवासादरम्यान वाइन कशी बनवितात, त्याचे फायदे-तोटे याविषयी पुस्तकी ज्ञान घेतल्यानंतर मुंबईतील एका रविवारच्या दुपारी अचला या माहेरी गेल्या असताना डॉक्टर भावाला आलेल्या भेट वस्तू मधील पाच किलो द्राक्षाच्या पेटीवर अचला यांची नजर गेली. द्राक्षपेटीतून पहिले द्राक्ष जिभेवर विरघळल्यानंतर अचला यांना अमेरिकेतील त्या रेडवाइनशी जुळत्या चवीचा अंदाज आला. माहेरवाशीण आई घरची ही द्राक्षपेटी स्वत:च्या घरात त्या घेऊन गेल्यावर त्यांच्या पतीने तेवढय़ाच तडफेने द्राक्षाची वाइन बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. लगेचच मोहम्मद अली रोडवरून सात लिटर काचेचा कार्गो, एअर लॉक अशा सामग्रीची खरेदी करण्यात आली. घरातील या आईच्या वाइन बनविण्याच्या पहिल्यावहिल्या प्रयोगात लहानग्यांनी पाच किलो द्राक्ष धुण्यापासून इतर कामांची मदत केली. बघता बघता जोशींच्या घरातील एका बाजूला द्राक्ष धुऊन त्यामध्ये इस्ट टाकून ते बनविण्याची प्रक्रिया पार पडली. तब्बल दोन महिन्यांनी म्हणजेच १९७० सालच्या सप्टेंबर महिन्यातील सुटीच्या दिवशी अचला यांचा भाऊ व पती सुधाकर यांच्या उपस्थितीमध्ये वाइन झाली का याची उत्सुकता म्हणून हा कार्गो उघडून पाहण्यात आला. ५ किलो द्राक्षाची त्या वेळी सुमारे ४ ते साडेचार लिटर वाइन जोशींच्या घरातील एका कोपऱ्यातील कार्गोमधून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आली. चव घेण्यासाठी त्या वेळी अचला यांचा भाऊ यांनी पुढाकार घेतला. पहिल्यावहिल्या घरातील वाइनचा हा प्रयोग अगदी छान पद्धतीने यशस्वी पार पडल्याचे पहिले रिमार्क अचलाबाईंना त्यांच्या घरातून मिळाले. त्यानंतर अचलाबाईंचा हा प्रवास सुरूच राहिला. लिकर बनविणारे पाच हजार लिटर क्षमतेपेक्षा मोठे कारखाने मुंबईबाहेर ठेवण्याच्या नियमातून अचलाबाईंच्या प्रवासाची वाट तळोजा औद्योगिक क्षेत्राकडे १९७९ साली वळली. आजही अचलाबाई इन व्हॉगेस क्रिएशन या कंपनीच्या माध्यमातून प्रिन्सेस ही रेड, व्हाइट, पोर्ट व हनी वाइन बनवितात. सुमारे दीड लाख लिटर वाइनची उत्पादन काढताना एका बॅचमध्ये साचून ठेवलेले द्राक्षाचे अर्क गाळून वाइन तयार केली जाते.

घराच्या एका कोपऱ्यात स्वत:च्या कुटुंबासाठी बनविलेल्या वाइनला आज देशभरात मोठी मागणी होत आहे. १९७३ ते २०१६ या काळात आंध्र प्रदेश, केरळ सहित सैनिक कॅन्टिनमध्ये अचला जोशींची प्रिन्सेस रेडपोर्ट वाइन ठेवली जाते.

ऋतुवारीवर विसंबणाऱ्या वाइनच्या या व्यवसायामुळे कामगारांवर गदा न येण्यासाठी त्यांनी तळोजा क्वील्ट या नावाने मिलमधून विकत आणलेल्या संपूर्ण कॉटनच्या कपडय़ाच्या साह्य़ाने आणि विविध रंगसंगतीचा आधार घेऊन ऊबदार गोधडय़ा शिवल्या जातात. अमेरिकेसह लंडनमध्ये मोठय़ा कंपन्या गोधडय़ांचे प्रदर्शन मांडतात.

१९८३ साली अचला जोशी यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट उद्योजकतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अचला जोशी या ‘द फर्स्ट वाईन लेडी’ सोबतच लेखिका असून An Amazing Grace, आश्रम नावाचे घर, हरी नारायण आपटे (चरित्र), ज्ञानतपस्वी रुद्र (न. र. फाटक यांचे चरित्र), चंद्रमे जे अलांछन : अचला जोशी यांचे बंधू डॉ. अजित फडके यांचे चरित्र अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

नोव्हेंबर २०१३ मध्ये सावंतवाडी येथे झालेल्या कोमसापच्या ४ थ्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अचला जोशी होत्या..

अचला जोशी या मुंबईच्या माटुंग्यामधील श्रद्धानंद आश्रमाच्या अध्यक्ष म्हणून काम करतात. या महिलाश्रमाशी त्या चार दशकांहून अधिक काळ जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी या आश्रमातील महिलांच्या रोजगारनिर्मितीसाठी रजया, मसाले बनवून त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ शोधली. तसेच त्या दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी आहेत.

माहिती संकलन : श्री संजीव वेलणकर

(संदर्भ : इंटरनेट/ श्री संतोष सावंत.) 

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

एकदा जपानमध्ये एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करताना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा पोकळी असते.

तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय चिणला गेला आहे.

त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतूहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षांपूर्वी हे घर नवीन बांधलं तेव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पो­कळीत हालचाल न करता ती पाल जिवंत

राहिली? हे जवळ जवळ अशक्य होतं.

त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलंच आणि तो त्या पालीवर लक्ष ठेवून बसला, की ती आता कशी, काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की तेथे दुसरीही पाल आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!

हे पाहून तो माणूस अवाक झाला, गहिवरला.

.

.

.

कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता !

पालीसारखा एक नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडून न जाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यापासून काहीतरी नक्कीच शिकू शकतो.

तेव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला (आई- वडील, पत्नी, पती, भाऊ, बहीण, मित्र) नेहमी आधार द्या. जेव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते, तेव्हा “तुम्ही” म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण जग असू शकता. कोणतीही गोष्ट (नातं, विश्वास.. ) तुटण्यासाठी एक क्षणाचं दुर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ऋतूनाम कुसुमाकरः…” ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “ऋतूनाम कुसुमाकरः…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

वसंत हा निसर्गाचा उत्सव आहे. सतत सुन्दर भासणारा निसर्ग वसन्त ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसन्त असेल तर वसन्त हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मीकींनी रामायणात वसन्त ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ’ ऋतूनाम्‌ कुसुमाकरः’ असे म्हणून ऋतुराज वसन्ताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसन्त ऋतूमध्ये जणू पुन्हा रुजून येतो.

कात टाकणारे साप, धुळीची, किरणात नाचणारी बाळे, संध्याकाळी कौलांवर रेंगाळणारे कवडसे आणि खडकात फुलणारा चाफा हे सारे आजूबाजूला दिसू लागले की कळते आता बसंत आने को है.. अन् मन सावरीच्या कापसासारखं अलवार होऊन वाऱ्याच्या झुळकी होतं… या सगळ्या वसंताच्या आगमनाच्या सुचना आहेत हे वयपरत्वे कळत गेले…

फुलांचा संभार सांभाळत उभा असलेला चाफा बघणं मला आवडतं… असं वाटतं, रात्रीच्या वेळी त्याच्या फुलांमधून चांदण्यांचे झरे झिरपतात आणि मुरतात त्याच्या सालीमध्ये.. वाटतं जणू चाफा म्हणजे चांदण्यांचं घरच आहे की काय? तर कधी वाटतं, एखादी सोनपरी आपले इवले पंख पांघरून येईल कुठूनशी आणि चाफ्याच्या फुलावर मोठ्या डौलात बसून झोके घेत राहील… देवघरात झुल्यावर बसवलेल्या गोैरीसारखी…

खरंच हा वसंत एकटा येत नाही कधी. तो घेवून येतो नवीन पालवीची जादू… जी तो पखरत जातो कोमेजलेल्या फांद्यांपासून कोमेजलेल्या मनांपर्यंत… आणि उत्फुल्ल करून टाकतो सारा आसमंत… आपल्या पेटार्‍यातल्या रंगबिरंगी चिजा काढून रंगवून टाकतो सारा राखाडी बाज आपल्या रंगांच्या पंचमीत… चाफा, मोगरा, अमलताश, पलाश, बहावा सारेच त्याचे साथी आणि गुलमोहर तर प्राणप्रिय सखा-वाटायचं हा वसंत जसाकाही कान्हा आणि ही सृष्टी जणू राधिका; जी कान्हाच्या स्वागतासाठी सारी मरगळ झटकून साजशृंगार करते आहे. पाखरांच्या गळ्यातून तिच्या कान्हाजीचे स्वागत करते आहे, म्हणते आहे…

ऋतू वसंत तुम

अपनेही रंग सो

पी ढुंढन मै

निकसी घर सो

ऋतू बसंत तुम..

जणू काही कित्येक काळाच्या तितिक्षेनंतर विरहिणीला तिचा प्राणसखा भेटावा आणि तिने म्हणावे…

सजण दारी उभा… काय आता करू? घर कसे आवरू? मज कसे सावरू? हाच तो क्षण बहाव्यानं आपल्या सोनसळी फुलांनी सजण्याचा आणि पलाश, पांंगार आणि गुलमोहराने बहरण्याचा.

वसन्ताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसन्ताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो. वसन्त म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. जीवन व वसन्त ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती सन्त म्हणते. ज्याच्या जीवनात वसन्त फुलतो तो सन्त!

आकाश हेच घर असणाऱ्या तेजाने सगळीकडचा अंधार, उदासिनता दूर सारून प्रकाशानं आसमंत उजळून टाकावा आणि या तेजाचे काही कण पिऊन समस्त सृष्टीने नवा जन्म घ्यावा.. असंच काहीसं वाटतं वसंताच्या येण्यानं.. जणू फुलणाऱ्या प्रत्येक कळीतून नवीन जीवन जन्माला यावे आणि त्याने आपल्या रंग, गंध, रसातून उधळून द्यावे जीवनासक्तीचे तुषार जे शिशिराच्या वृद्ध उदास पानगळीलाही जगण्याचा मोह पाडतील.. हीच तर वसंताची जादू आहे.. वसंत म्हणजे सकारात्मकता. वसंत म्हणजे उत्साह. वसंत म्हणजे यौवन.. वसंत येतो, दवांत न्हातो. दर्वळ दर्वळ होतो. जणू एखाद्या लाजऱ्या पानसखीचे

मंथर गाणे गातो.. कधी फुलात हसतो, वनी लगडतो

झऱ्यांत झुळझुळ वाहतो.. तर कधी गंध कोवळा माखून घेऊन आभाळात पसरतो.. कधी वाऱ्यावर लहरत सूर सोहळा होतो तर कधी तृणांच्या मखमालीवर गवतफुलाबरोबर उमलताना सोनसावळा होऊन खुलतो.. एखाद्या आमराईत सहज वाऱ्याच्या हिंदोळ्यावर

आंबवती झुलताना कोकीळाच्या गळ्यातील पंचम तान होतो असा हा ऋतूनाम् कुसुमाकरः वसंत येतो अन् आपल्या ऋतूवैभवाने चिंब भिजवतो.. मला, तुम्हाला आणि साऱ्या चराचराला.. तेव्हा आठवतं

गगन सदन तेजोमय..

तेव्हा नक्कीच स्वागत करूया या ऋतूराजाचं जीवनातल्या नवीन बहरासाठी..

 © सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पालवी ते पानगळ… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ पालवी ते पानगळ… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रीराम जयराम जयजयराम……

श्रीराम जन्मोत्सवाच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

सध्या रामजन्मोत्सव होय रामजन्मोत्सवच, जयंती नव्हे, साजरा करताना अधिक आनंद होतोय. कारण प्रभू आपल्या मंदिरात विराजमान झाले आहेत. तसेच मंडळी मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतेय. न्यू इयर साठी नाही. हॅपी न्यू इयर म्हणून हाय करणे ही संस्कृती आपली नव्हे. तर तो केवळ उपचार आहे. मोठ्यांना नमस्कार करून शुभेच्छा देणे आणि लहानांना आशीर्वाद देणे. वाकून मोठ्यांचा पदस्पर्श करणे यातही शास्त्र आहे. विज्ञान आहे. अशा तऱ्हेने शुभेच्छा दिल्या घेतल्या जातात. हा संस्कार आहे. संस्कृती आहे. यातही शास्त्र आहेच ना? गुढीपाडवा कसा साजरा करायचा वगैरे सर्व गोष्टी प्रत्येकाच्या घरातली वडील माणसं सांगतातच. पण खरंच चैत्र महिनाच वर्षाचा प्रथम महिना का ?

शिशिर ऋतूत झडलेली पानं आपण बघतो ! झाडांना चैत्रात नवी पालवी फुटायला लागते. मानवी जीवनातली निसर्गाने सांगितलेली ही फार मोठी गोष्ट आहे तत्वज्ञान आहे. यातच येतो गुढी पाडवा. श्री राम जन्मोत्सव, हनुमान जन्मोत्सव ! चैत्रगौर ! आंब्याची डाळ, पन्हं घेऊन !

दिवसा सूर्य अतिउच्च शिखरावरून टळटळू लागतो. पृथ्वीवरील पाणी, जेवढे शक्य असेल तेवढे वाफेच्या रूपात घेऊन जातो. तशातही टेम्भरे, करवंद, चारोळी, जांभूळ ही फळं निसर्गामध्ये देतच असतो. हा वर्षाचा प्रथम मास लवकर संपून न जावा असं वाटत असतानाच वैशाख येतो. कैरी जाते. तो आंबा घेऊन येतो. ऊन असतं पण फणस, आंबा, कोकम हवेहवेसे वाटतात ना? लगेच आगमन होतं जेष्ठाचं !

कडक ऊन. आणि मोसमी पूर्व थोडासा पाऊस. सृष्टी भाजून निघते. आणि पावसाची वाट बघणं सुरू होतं.

ढगांच्या गडगडासह, विजेच्या रोषनाईत नंतर आगमन होतं ते आषाढाचं. आर्द्रा नक्षत्र आपलं अक्राळ विक्राळ रूप दाखवू लागतं. पावसानं मस्त जोर धरलेला असतो. कारण हे सर्व पाणी जमिनीत मुरायला हवं असतं. झाडांना वर्षभर पुरायला हवं असतं. नदी नाले तलाव भरून ओसंडून वाहू लागतात. बळीराजा आनंदून जातो. लहानखुऱ्या पावसात त्याने पिकाची सुरुवात केलेली असते. आता यथेच्छ पाणी पिऊन पिकं मोठी होऊ लागतात.

माणसानंही असंच वागायला हवं. आपल्या योग्य वयात म्हणजे वयाची सोळा वर्ष पूर्ण करताच आपली ध्येये ठरवायला हवीत. पंधरा ते पंचेचाळीस हा खरा कालावधी शिक्षणाचा आणि हवं ते मिळविण्याचा. झपाटून अभ्यास, कष्ट करण्याचा. हे वय साध्य नव्हे तर, विद्यार्थी मित्रांनो साधन आहे. आषाढासारखं.

अतिपावसाचा कंटाळा आला असं म्हणावं लागू नये म्हणून की, काय लगेचच हिरव्या ऋतूचं आगमन होतं. अर्थातच श्रावणाचं. हिरवागार शालू नेसून एखादी नववधू विवाहासाठी तयार होऊन बसावी, तसा हा वर्षातला पाचवा महिना ! अधूनमधून पावसाची सर, मधेच पडणारं पिवळंधम्म उन्ह, आकाशाला तोरण बांधणारं इंद्रधनुष्य. सणांची रेलचेल !सर्वांना हवाहवासा वाटणारा श्रावणमास !

श्रावणातल्या धरणीचं लग्न लागलेलं असतं. तसं आषाढातच. भाद्रपदात झाडं, वेली वाढू लागतात. हळूहळू वेलींना फुलं येऊ लागतात. फळं लगडतात. सारा निसर्गच लेकुरवाळा होऊन जातो. ही लहान लहान लेकरं निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळू लागताच लगेच किंचितशी थंडीची चाहूल लागते.

खरंच की ! थंडीची चाहूल म्हणजेच आश्विनाची सुरुवात. अंगा खांद्यावर फिरणारी पिल्लं शाळेत जाऊ लागावीत. तरूण नवरा – बायकोने आपल्या सुखी संसाराची तजवीज करावी, असा वयाच्या तीस – पस्तीशीतला दृष्टीकोन ठेवणारा अश्विन महिना. पिकं डोलू लागतात. ती खराब होऊ नयेत म्हणून, शेतकरी आई होऊन काळजी घेऊ लागतो. पिकातली कीड काढून टाकून शेत निकोप कसं होईल याची काळजी घेतो. किती समजूतदार आहे नाही निसर्ग ?

माणसाची चाळीशी येते. संसार बऱ्यापैकी स्थिरावलेला असतो. मुलांना वाट दाखवायची असते. घरदार, जमापुंजी हळूहळू वाढायला लागते. अगदी असंच रूप धारण करुन कार्तिक महिना येतो. पस्तीशीतल्या जाणत्या देखण्या स्त्रीसारखा. आश्विन अमावसेला लक्ष्मीपूजन करून वेगवेगळे संकल्प करण्यासाठी येते ती बलिप्रतिपदा. हे व्यापऱ्यांचं नवीन वर्ष असतं बरं का?

नंतर हळूच आगमन होतं ते मार्गशीर्षाचं ! थंडीनं कळस गाठलेला असतो. तुम्ही आता स्थिरावलात. म्हणून सूर्य दाक्षिणेची काळजी घ्यायला दक्षिणायनात दाखल झालेला असतो. तब्येतीला आता जरासं जपायचं असतं. निसर्गही सारं जपू लागतो. धान्याच्या राशी घरात येतात. चार पैसे हातात खुळखुळू लागतात. गरज आणि सुखाची कल्पना संपून, मन चैनीकडे झुकावं, तसा हा वर्षातला ” शीर्ष महिना ” पुढल्या जन्मासाठी काही ठेव करून ठेवावी असं सांगणारा.

शेतकरी नाही का, पीक निघताच त्यातलं निखळ असं धान्य दुसऱ्या वर्षाच्या बीजाई साठी काढून ठेवतो ? अगदी तसाच. आमच्या वयाची साठीची अटकळ बांधणारा आणि सांधणारा हा मार्गशीर्ष सरता सरताच आगमन होतं ते पौषाचं.

पौषाचा पूर्वार्ध कडाक्याच्या थंडीचा. पण थोडंसं ऊन जाणवणारा. साठीच्या पुढल्या किंचितशा तब्येतीच्या कुरबुरी सुरु असाव्यात अगदी तसाच. तीळसंक्रांतीला तीळ गुळ, गाजर, बोरं, ऊस खाऊ घालणारा. सुखी असा !

आम्ही सत्तरीकडे झुकतो. तसा निसर्गात दाखल होतो माघ महिना. संपन्न पण जरासा काळजीचा. आमचीही मुलं आता संसारात रमणारी, मोठी झालेली असतात. आमच्या वानप्रस्थाच्या गोष्टी सुरु झालेल्या असतात. पण पैशाची ऊब आणि बऱ्यापैकी तब्येत एवढ्यातच वानप्रस्थ स्विकारू देत नाही. म्हणून कानटोपी घालून का होईना, आमचा मॉर्निंग वॉक सुरु असतोच. पण माणसाने तग धरायची तरी किती ? शेवटी शरीरच ते !

 कुणाच्या आयुष्याचा शिशिर माघातच सुरु होतो. गळू लागतात काही पानं ! हळूच आणि नकळत फाल्गुन आयुष्यात प्रवेशतो. होळीच्या रूपाने आयुष्यातली किल्मिषं, कटूपणा, वाईटपणा, जाळून टाकणारा हा महिना. यावेळी मला माझ्या तिसऱ्या वर्गातल्या कवितेचं एक कडवं आठवतं.

“उदासवाणा शिशिर ऋतू ये पाने पिवळी पडतात

सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झरझर झरझर गळतात

झडून पाने झाडे सगळी केविलवाणी दिसतात

दिसे तयांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास “

नवीन पालवीला जागा देण्यासाठी जुन्यांना गळावं लागतंच. शेवटी निसर्गच तो.

असा आमचा निसर्ग आणि हे बारा महिने / सहा ऋतू ! आयुष्यात खूप काही शिकवून जातात. कधी ते जीवन शिक्षण असतं ! कधी तत्वज्ञान । कधी रसग्रहण । तर कधी संगीत, ताल, लय, नृत्य । कधी रंग, कधी चित्रकला । भांडार आहे नुसतं ज्ञानाचं ! अगदी प्रतिपदा ते अमावस्या किंवा पौर्णिमा या पंधरा तिथ्यांना सुद्धा कुठलातरी सण आहे. पुढे कधीतरी तेही बोलूच.

पण आम्ही सध्या इकडेच पाठ फिरवतोय. दरवाजाच्या बाहेर पडून डोंगर /पर्वत कसे दिसतात ते आम्ही बघत नाही. म्हणून तर आमची मुलं आज रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरलाच पर्वत समजाहेत. निसर्गात शुद्ध हवा आहे हे एसीत जगणाऱ्यांना कळतच नाही. रेनकोट घालून पाऊस अनुभवता येत नाही आणि बूट घालून, हिरवे गालीचे समजत नाहीत. सिमेंटच्या छतातून चांदण्यांचं आकाश दिसत नाही.

तर असे हे चैत्रादी बारा महिने. यांचा इथे केवळ वरवर धांडोळा घेतलाय. या वर्षातला प्रत्येक दिवस आमचा गुरू आहे. काहीतरी शिकवणारा आहे, आणि याच गुरूला आम्ही आज पारखे झालो आहोत.

अर्थात याला कुणी खुळेपणाही म्हणतील. पण मंडळी स्वतःच्या आईला कुणी मावशी म्हणतं का? नाही ना ? असे आत्या, मामी, काकी, मावशी साऱ्यांचा आदरसत्कार जरूर करायला हवा. पण आपले महिने, आपलं वर्ष, आपल्या तिथ्या, संस्कृती, भाषा याचा आदर करायला आधी शिका ! कारण ती आपली आई आहे.

आता शिशिराचा शेवट आलाय. एखादं पान शंभरी पार करून नव्या पालवीसोबत दिसेलही. पण खरंच ही गळकी पानंही नव्यांना जागा करून देतात. स्वतः गळून पडतात. पण ती पिवळी पानंही आनंदाने गिरकी घेत घेत खाली येतात, तसंच माणसांनही रडत कुढत शेवट जवळ करण्यापेक्षा हसत करायला हवा. कारण हे निसर्गाचं चक्र आहे. नववर्ष आलंय.

” सहा ऋतूंचे चाक फिरतसे शिशिर ऋतूही जाईल हा

वसंत सांगे हळूच मीही येतो मागोमाग पहा “

वसंत ऋतू सुरू झालाय. त्याच्याच हातात हात घालून चैत्राचं आगमन झालंय. या चैत्रप्रतिपदेला ब्रह्मध्वजा उभारून ते साजरं करा. काही दृढ संकल्प करा. पुढल्या आश्विन, कार्तिक, मार्गशीर्षात आनंदोत्सव साजरे करायचे असतील, तर त्याची तजवीज आतापासूनच करा. कुणाला ” हॅपी न्यू इयर ” न म्हणता वर्षप्रतिपदेच्या शुभेच्छा द्या ! म्हणा – – – –

गुढीपाडवा : आनंद वाढवा इथून पुढे वर्षभर आपले सर्व सण आनंदाने साजरे करू या !

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रश्न सामाजिक स्वास्थ्याचा… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ प्रश्न सामाजिक स्वास्थ्याचा… ☆ श्री संदीप काळे ☆

छत्रपती संभाजीनगर जवळ घृष्णेश्वर मंदिर आहे. मी आणि माझा मित्र किशोर गुंजाळ दर्शनासाठी तिथे गेलो होतो. मंदिराच्या एका कोपऱ्यात एक स्त्री आणि एक पुरुष एकमेकांचे हात हातात घेऊन रडताना दिसले. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघालो.

थोड्यावेळाने माझे लक्ष झाडाखाली बसलेल्या काही लोकांकडे गेले. त्याच लोकांमध्ये ते दोघेही होते, ज्यांना मी मंदिरात रडताना पाहिले होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अजूनही थांबले नव्हते. बाजूला बसलेली काही मंडळी त्यांना शांत होण्याचा सल्ला देत होती.

आम्ही थोडे पुढे गेल्यावर एका ठिकाणी जेवायला बसलो. त्या हॉटेलमधील एक माणूस दुसऱ्याला सांगत होता, “त्या झाडाखाली बसलेले जोडपे आहे ना, त्यांनी पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांची मुलं परदेशात शिकत आहेत. पैसा, संपत्ती, सगळं काही आहे, पण समाधान नसल्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. ” हे ऐकून मी गडबडीने किशोरचा हात पकडला आणि त्या माणसांमध्ये जाऊन बसलो.

‘जर त्या त्या वेळी कोणीतरी मार्गदर्शन करणारे असते, तर माझ्याकडून चुकीचे काम झाले नसते’, असे ठामपणे सांगणारे अनेक जण मी पाहिले आहेत. मात्र, येथे मी ते प्रत्यक्ष अनुभवत होतो.

ते जोडपे, ते कुटुंब आणि त्या सर्व माणसांशी मी संवाद साधला. त्या संभाषणानंतर मी इतका थक्क झालो की, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. मी ज्यांच्याशी बोलत होतो, त्यांची नावे अर्चना देशमुख आणि सतीश देशमुख.

अर्चना देशमुख या मूळच्या यवतमाळच्या, पूर्वाश्रमीच्या अर्चना पाटील. त्या मराठवाड्यात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. सतीश देशमुख हे मराठवाड्यातील एक मोठे उद्योजक आहेत. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. त्यांना दोन अपत्ये झाली. मात्र, काही वर्षांतच सतीश आणि अर्चना यांच्यातील मतभेद टोकाला पोहोचले आणि अखेर त्यांनी घटस्फोट घेतला.

सतीश आणि अर्चना यांचा मुलगा संकेत हा अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) क्षेत्रात कार्यरत आहे, तर त्यांची मुलगी सत्यभामा ही परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. घटस्फोटानंतरही सतीश यांच्या आई-वडिलांपासून अर्चनाच्या आई-वडिलांपर्यंत, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांपर्यंत सर्वांचे नाते घट्ट राहिले. मात्र, सतीश आणि अर्चनाचे नाते मात्र तितकेच ताणले गेले होते.

दोघांचेही स्वभाव अतिशय टोकाचे होते. दोघेही प्रतिष्ठित आणि उच्च सामाजिक स्थान असलेले व्यक्ती असल्यामुळे त्यांना मन मोकळे करणे सहज शक्य नव्हते. पण खोलवर विचारल्यानंतर, ते दोघे हळूहळू व्यक्त होऊ लागले.

अर्चना सांगत होत्या, “आम्ही दोघेही आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी एवढे झटत होतो की, त्यात आमचे व्यक्तिगत आयुष्यच हरवून गेले. वैयक्तिक, मानसिक आणि शारीरिक गरजा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी कधी कधी एक पाऊल पुढे टाकावे लागते, तर कधी एक पाऊल मागेही घ्यावे लागते. कधी नवऱ्याने समजून घ्यावे लागते, तर कधी बायकोने. मात्र, हे सगळे आम्ही दोघेच विसरलो होतो. त्यामुळे आमच्या नात्यात इतकी दरी निर्माण झाली की, अखेर घटस्फोट झाला. ”

पुढे त्या म्हणाल्या, “खरं तर सामाजिक आणि शारीरिक गरजा कुठेतरी पूर्ण होतील, या विचाराने आम्ही विभक्त झालो. मात्र, घटस्फोटानंतर आम्हाला मानसिक शांती मिळाली नाही. अखेरीस आम्ही समुपदेशनासाठी गेलो, आणि तिथेच आम्हाला सत्याचा साक्षात्कार झाला. मग आम्ही निर्णय घेतला की, आपल्याला एकत्र राहिले पाहिजे. त्यातूनच आम्ही पुन्हा एकत्र आलो. ”

सतीश आणि अर्चनांच्या नातेवाईकांमध्ये संजू पाटील नावाचे एक वकील होते. ते म्हणाले, “हे दोघेजण पुन्हा एकत्र आल्यावर, त्यांच्या आई-वडिलांनी ठरवलं की आपण ज्या घृष्णेश्वराला मानतो, त्याच्या समोर जाऊन नतमस्तक व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळेजण आज घृष्णेश्वर ला आलो. ”

संजू एकेक विषय मांडत होते, आणि मी त्यांना प्रश्न विचारत होतो. अर्चना आणि सतीश हे दोघे विभक्त का झाले, याची कारणे उघडपणे सांगणे सोपे नव्हते. पण हा प्रश्न केवळ त्यांच्यापुरता मर्यादित राहिला नव्हता, तो आता संपूर्ण समाजाच्या मानसिक आरोग्याशी निगडित झाला होता. संजू वकील आणि त्यांच्यासोबत असलेल्या मंडळींनी यावर माझ्याशी चर्चा केली.

मी अर्चना आणि सतीश दोघांनाही विनंती केली, “तुम्ही आज अनेक भांडणाऱ्या आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून नाती तोडणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी एक आदर्श आहात. ”

अर्चना माझ्याकडे पाहत शांतपणे म्हणाल्या, “आम्ही काही उदाहरण वगैरे नाही आहोत. जर उदाहरण असायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला खूप वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. स्त्री आणि पुरुष निसर्गाने वेगळे बनवले आहेत, पण अनेकदा दोघेही ते वेगळेपण स्वीकारत नाहीत. त्यामुळे वाद होतात. ”

डॉ. विजय दहिफळे

सतीश म्हणाले, “तेरा दिवसांपूर्वीच मी संभाजीनगरमध्ये डॉ. विजय दहिफळे (93560 33230) यांच्या ‘सामाजिक स्वास्थ्य’ कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यांना मी याआधी टीव्हीवर पाहिले होते, पण त्या दिवशी प्रत्यक्ष ऐकले आणि मनावर जबरदस्त परिणाम झाला. त्याच कार्यक्रमातून मी माझ्या बायकोला फोन केला. रडत रडत तिने तो फोन उचलला आणि म्हणाली, ‘हा एवढासा फोन करायला तुला पंधरा वर्षे लागली?’”

 मी तिला उत्तर दिलं, “आता मला एकही मिनिट तुझ्यापासून दूर राहायचं नाही. तू जिथे कुठे आहेस, मला सांग, मी तुला भेटायला येतो. ” अर्चना संभाजीनगरपासून १५० किमी दूर होती, पण त्या क्षणी मी थेट तिच्याकडे पोहोचलो.

 मी तिला पाहिलं आणि जाणवलं—ती अजूनही तशीच होती. माझी वाट पाहत बसलेली, माझी काळजी करणारी. तिला फक्त माझ्याकडून प्रेमाची, आपुलकीची, सुरक्षिततेची जाणीव हवी होती.

 मी मात्र तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. तिला काय हवं आहे, कधी हवं आहे, हे समजण्याइतका मी सजग नव्हतो. पण ही डोळस समज आणि खऱ्या अर्थाने ‘पुरुष’ असण्याची अनुभूती मला डॉ. विजय दहिफळे यांच्या सहवासात आल्यावरच मिळाली. आम्ही दोघेही त्यांच्या क्लिनिक मध्ये जाऊन त्यांना भेटलो. त्यांनी आमचं गैरसमजुतींचं जडलेलं आवरण दूर करून सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र दिला.

 सतीश पुढे म्हणाले, “आमच्या घटस्फोटामुळे आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला. आमच्या मुलांना मानसिक वनवास भोगावा लागला. आम्ही दोघेही आमच्या वैयक्तिक आयुष्यात सुखी नव्हतो. अशा कित्येक समस्या या एका निर्णयामुळे उभ्या राहिल्या होत्या. ”

मी आणि किशोर दोघेही हे ऐकून थक्क झालो.

 डॉ. विजय दहिफळे यांचा संपर्क आणि पत्ता घेऊन आम्ही त्यांना भेटायचं ठरवलं. संभाजीनगरमध्ये न्यायालयाजवळच त्यांचा दवाखाना होता. सायंकाळची वेळ होती, आणि त्या वेळीही डॉक्टरांना हार-तुरे घेऊन भेटायला आलेल्यांची संख्या मोठी होती. आम्हीही भेटण्याच्या रांगेत उभे राहिलो.

 तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी बोलत असताना लक्षात आलं की, बहुतांश लोक शारीरिक आणि मानसिक त्रासांतून बाहेर पडून आता सुखी जीवन जगत होते. माझ्या मनात एकच विचार घोळत होता– आपलं सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अशा डॉक्टरांची समाजाला नितांत गरज आहे. सतीश आणि अर्चना यांच्यासारख्या शेकडो जोडप्यांनी नव्याने आयुष्य सुरू केलं होतं, आणि त्यासाठी डॉ. दहिफळे यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरलं होतं.

 सुख, मग ते शारीरिक असो की मानसिक, ते उपभोगण्यासाठी आपला जन्म कसा आहे? आपण कसे वागले पाहिजे? याबाबत समुपदेशन करणे, आणि गरज पडल्यास स्वतः विकसित केलेली औषधे लोकांना देणे यामध्ये डॉ. दहिफळे यांचा कमालीचा हातखंडा होता.

 मी डॉक्टरांनी जे काही उभं केलं होतं, ते बारकाईनं निरीक्षण करत होतो. तुटलेली लग्न आणि मनं पुन्हा जोडण्याच्या कार्यात डॉक्टरांनी जागतिक पातळीवर विक्रम केले होते. एक-दोन नव्हे, तर अडीच लाखाहून अधिक जोडप्यांना सामाजिक स्वास्थ्याचं महत्त्व पटवून देऊन त्यांनी त्यांना एकत्र आणलं होतं.

 मी स्त्रीरोगतज्ञांविषयी अनेक ठिकाणी वाचलं होतं, पण इथं डॉक्टर पुरुषरोगतज्ञ होते.

 डॉक्टर बाहेर आले. त्यांनी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधला. सर्वांशी बोलून झाल्यावर शेवटी आम्ही दोघेच उरलो. डॉक्टर आमच्याशी अगदी आत्मीयतेने बोलले. आम्ही अर्चना आणि सतीश यांचा दाखला देत डॉक्टरांशी संवाद सुरू केला.

 अत्यंत हुशार, प्रचंड हजरजबाबी आणि अनेक वर्षांचा सामाजिक स्वास्थ्याचा अनुभव असलेले डॉक्टर आमच्या प्रत्येक प्रश्नाला सखोल उत्तर देत होते. आम्ही अडीच तास डॉक्टरांशी गप्पा मारल्या, पण तरीही आमचे समाधान झाले नाही.

 मी डॉक्टरांना अनेक वेळा टीव्हीवर ‘कामशास्त्र’ या विषयावर मनमोकळेपणाने बोलताना पाहिले होते. आज समाजात, घरात, शाळा- कॉलेजांमध्ये सेक्स संदर्भात उघडपणे बोललं जात नाही. त्यामुळेच संपूर्ण पिढी गोंधळलेल्या विचारसरणीकडे आणि अज्ञानाकडे झुकत आहे, हे डॉक्टर आम्हाला समजावून सांगत होते.

 डॉक्टर म्हणत होते, “हे सत्य आहे की, सेक्स या विषयावर घरात, शाळेत, कॉलेजमध्ये आणि समाजात उघडपणे चर्चा केली जात नाही. त्यामुळेच तरुणाई दिशाहीन होत आहे. ”

 डॉक्टरांनी राज्यभरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समुपदेशन मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेमुळे दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.

डॉक्टरांनी त्यांच्या कामाचे पुरावे—बातम्या, छायाचित्रे आणि संशोधन दाखवत आम्हाला समजावले की, आपल्या भारतीय संस्कृतीने ‘कामसूत्र’ या महत्त्वाच्या ग्रंथाकडेही दुर्लक्ष केले आहे.

 ज्या डॉक्टरांनी पाच लाखांहून अधिक संसार वाचवले, दहा लाखांहून अधिक युवकांना शारीरिक जाणीव आणि समज दिली, त्या क्षेत्रात कदाचित राज्यात कुणीच इतकं मोठं कार्य केलं नसेल.

भविष्यात पुढील चारशे वर्षे डॉक्टरांचे ज्ञान पुढील पिढ्यांच्या उपयोगी यावे, यासाठी डॉक्टरांनी आधीच तयारी करून ठेवली आहे.

काही माणसं समाजासाठी पूर्णतः झपाटलेली असतात आणि ते केवळ समाजाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात. हीच भावना डॉक्टरांच्या कार्यातून प्रकर्षाने जाणवत होती.

सेक्स, कामसूत्र, स्त्री-पुरुष संबंध यांसारखे शब्द ऐकताच पुढे काय बोलावे हे कळत नाही. मात्र, डॉक्टर या प्रश्नांकडे थेट आणि डोळसपणे पाहतात.

मूळचे अंबाजोगाईचे असलेले डॉ. दहिफळे हे “माझ्या घडणीत वडील सोपानराव आणि आई पार्वती यांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे, ” असे आवर्जून सांगत होते.

डॉक्टर अनेक लोकांशी संवाद साधत होते, कुणाला समुपदेशन करत होते, कुणाला औषधे देत होते. पण हे सर्व करत असताना तिथे पैशाची अजिबात विचारणा नव्हती.

मी डॉक्टरांना विचारले, “डॉक्टर, समाजसेवा ठीक आहे, पण हे सगळं चालवायचं कसं?”

डॉक्टरांनी वर पाहत हात जोडले आणि उत्तर दिले, “त्याची सगळी काळजी घेतली आहे. ”

एखाद्या मंदिराबाहेर जशी मोठी गर्दी आणि प्रदीर्घ रांग असते, तशीच रांग डॉक्टरांना भेटण्यासाठीही होती. लोक हार-तुरे घेऊन त्यांना भेटण्यासाठी उभे होते.

मी आणि किशोर परतीच्या मार्गाला लागलो. आम्ही दोघेही चर्चा करत होतो की, मानसिक आणि शारीरिक आरोग्य समाजासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी डॉक्टर दहिफळे जे महान कार्य करत आहेत, ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं होतं.

डॉ. दहिफळे थेटपणे कार्य करतात आणि आता हे कार्य आपण सर्वांनी हाती घेण्याची गरज आहे.

 

तुम्ही डॉक्टर नसाल, तरीही तुम्ही चांगले समुपदेशक बनून भरकटलेल्या पिढीला योग्य मार्ग दाखवू शकता.

हेही तेवढेच सत्य आहे, बरोबर ना?

— डॉ. विजय दहिफळे 

© श्री संदीप काळे

संस्थापक, व्हाईस ऑफ मेडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares