मी गॅलरीत कपड्यांच्या घड्या घालत उभी होते . ऐन उन्हाळ्यातली ती दुपारची वेळ होती. आजूबाजूची झाडं उन्हाच्या काहिलीने सुकल्यासारखी होऊन स्तब्धशी उभी होती. उन्हाच्या झळा डोळ्यांनाही सहन होत नव्हत्या. जीव नुसता कासावीस झाला होता…
घरात आले तर, खिडकीतूनही झळा जाणवत होत्या. डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याने उकाडा कमी व्हायच्या ऐवजी त्यात जास्तच भर पडत होती. अन – – –
– – – तापलेल्या तना – मनाला एक हळुवार जाणीव झाली.
एक सुखद गारवा हवेत लहरला. मनानं एक मस्त गिरकी घेतली. अन् म्हटलं ….आला …आला… ‘वळीव’ आला….!
बघता- बघता ‘नभ मेघांनी आक्रमिले’ असं झालं. पिसाटलेल्या वाऱ्याने झाड बुंध्यापासून घुसळायला सुरुवात केली. झाडा खाली असलेल्या वाळलेल्या पानांचा पाचोळा अन् मातीच एक आवर्त तयार झाल. तो भोवरा वाऱ्याच्या वेगाने वाट फुटेल तसा गू॑-गू॑–आवाज करीत फिरायला लागला. अचानक आलेल्या त्या आवर्ताला चुकवणं रस्त्यावरून जाणाऱ्यांना कठीण जात होतं.
वाळून काष्ठ झालेल्या झाडांच्या लहान – लहान फांद्या कड्कड् आवाज करीत खाली पडत होत्या. दुपारची गूढ ,निस्तब्ध शांतता त्याने पळवूनच लावली. खिडक्यांचे ,दारांचे धडाधड आवाज सगळीकडे येऊ लागले. वाराही उचलून बरोबर आणलेला पालापाचोळा गॅलरीत, गॅलरीत च्या पत्र्यावर ,दारातून घरात येत सगळीकडे पसरवून देत होता सांगत होता…
… होय… तो आलाय. हव्याहव्याशा आनंदाच्या सरी घेऊन..! प्रचंड गडगडाट करीत सोनेरी कडांच्या काळया ढगांवर विजेचा एक जोरदार आसूड ओढीत तो आला ….वळिवाचा पाऊस…!
तडतड आवाज आला म्हणून मी गॅलरीत गेले अन पाहिले तर त्याने तडतडणाऱ्या ‘गारा’ही बरोबर आणल्या होत्या. क्षणातच त्याने बरोबर आणलेल्या गारांनी गॅलरीच्या पत्र्यावर, खाली अंगणात मनमोहक पावलं टाकत, गिरक्या घेत नाच आरंभला होता. प्रचंड गडगडाटातही लहान मुलं ‘गारा’ वेचत त्या नृत्यात सामील झाली. मीही गॅलरीतून हात बाहेर काढत गारा झेलायचा, पकडायचा प्रयत्न करू लागले. फारसं नाही आलं यश पण, तरी थंडगार पावसाचा पहिला स्पर्श ओंजळी घेताना, ती ओंजळ चेहऱ्यावर रिती करताना तन आणि मन सुखावून गेलं. पावसाचे शिडकावे अंगावर घेत, अनुभवत मी गॅलरीच्या कट्ट्याशी उभी राहिले.. शांतपणे त्याचा आवेग पहात..!
– – -काही वेळाचा तर हा त्याचा खेळ ! ज्या वेगानं तो आला त्याच वेगानं तो निघूनही गेला. वारा, गारा, धारांनी सारा आसमंत, परिसर बदलला. आता झाडांवरून पावसाचे टपटपणारे थेंब अन चोहीकडे दरवळणारा मृद्गंध, क्षितिजाला स्पर्श करणार सप्तरंगी इंद्रधनुष्य असं सगळं त्याने मागे खूण म्हणून ठेवलं. सगळं मन उल्हसित करणार॑..!
असा ‘वळिवाचा पाऊस’ आपल्या आयुष्यातही हवाहवासा वाटतो. आपलं वय वाढलं, आयुष्य बदललं तरी जगतानाचे ग्रीष्माचे चटके सोसण्याच॑ बळ आपल्याला मिळतं ते वळीवाच्या धारांनी ! हा ‘वळीव’ मग आपल्याला कुठेही कुणाच्याही रूपात भेटतो, भेटत राहतो. आभाळातून नाही कोसळत तो, तर मनातून डोळ्यात साठतो अन कोसळू लागतो. त्याचं हे कोसळणं सहजपणे आपल्याला चिंब करतं, अवघ मन रितं करत, सारी दुःख कटुता विसरून पुन्हा नव्याने पावले टाकण्याची उभारी देत,…. ज्याचा त्याचा ‘वळिव’ वेगळा असतो एवढं खरं…!
आदर्श मंडळी, आज लसीकरणाचा ढोस डागून घेतला. चि. मोरूच्या खटपटीने मज एकट्याला स्लॉट मिळाला. सकाळपासून अंमळ तयारी सुरू केली. सौ. काऊने सुगंधित तेलाने मालिश केले. चि. मैनेने उटणे लावले. मोरूने बळेबळे कढत पाण्याची दोन घंगाळी दिली. नाईलाजाने दोनदा स्नान करावे लागले. लसीकरण केंद्रात कोट-उपरणे काढावे लागते म्हणून दोनदा धुतलेला नवा गंजिफ्रॉक घातला. आधीचा गंजिफ्रॉक सच्छिद्र झाला होता. खरं तर त्यातून लस देणे सोपे झाले असते. पण काऊ दळभद्री लक्षणं तुमची, म्हणाली. असो. त्यानंतर नवा कोट-उपरणे परिधान केले. त्यावर मोरूने विशिष्ट सुगंधित स्राव फवारला. मी विचारले, हे काय चाललंय? मोरू उत्तरला, ‘फॉग चल रहा है’…असो. जाताना मोरूने डोळे मिचकावत सांगितले, की बाबा सवयीनुसार जेवायला बसण्याआधी जसे बनियन काढता, तशी गरज नाही. बिच्चारी परिचारिका चक्कर येऊन पडेल. बाबा, तुमच्या बलदंड देहयष्टीपुढे गुंड्याकाकाही आता फिके पडतील.’ (या मोरूस अंमळ शिंगं फुटलीत.) तद्नंतर ड्रायक्लीन्ड पुणेरी पगडी घालून, काठी घेऊन आस्मादिक निघालो. काऊने दारात चक्क ओवाळले. मैनेने दिलेली मुखपट्टिका परिधान करून अखेरीस निघालो. लसीकरण केंद्रात समस्त वैद्यकीय सेवकवृंद माझी वाट पहात होता. आल्या आल्या एका शुभ्रवस्त्रांकित सभ्य वैद्यकीय अधिकाऱ्याने मला गुलाबपुष्प दिले. नंतर शुभ्रवस्त्रांकित सुकांत (मुखपट्टीधारक) चंद्राननेेने म्हणजे सुंदर परिचारिकेने माझा हात धरून आत नेले. तेथे उपरणे-कोट उतरवून गंजिफ्रॉक माफक प्रमाणात वर केल्यावर त्या परिचारिकेने लस ढोस अलगद डागला. हात एवढा हलका, समजलेही नाही. तसाच तरंगू लागलो, तरंगत घरी कधी परतलो, स्मरत नाही. काऊ थोड्या वेळाने गदागदा हलवत होती.तेव्हा भानावर येत असताना, तिने विचारले, लस कशी होती? मी ऐकले, नर्स कशी होती? फारच सुंदर होती, तरी मुखपट्टिकेमुळे अर्धीच दिसली, असे उत्तरलो. नंतर काऊने असे काही तरी केले. डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकले. दोन दिवस आजारी होतो, असे नंतर चि. मोरू सांगत होता. असो.
वास्तव
`अहो उठा, उठा…`काऊचा कर्कश आवाज आला. ‘त्या मोऱ्याने मोठ्या खटपटीने स्लॉट मिळवलाय. तर ती कोरोनाची सुई टोचून घ्या… पसरू नका..या आधीही दोन खेटा मारून झाल्यात केंद्रावर…’ खडबडून जागा झालो. मोऱ्या मोबाईलात गुगलात गुंगला होता. त्याला विचारलं, की माझाच आणि आजचाच स्लॉट मिळवलाय ना रे. त्याने मोबाईलवरून नजर न हटवता, नुसती मान डोलावली. नंतर कसबसे अंग विसळले. सच्छिद्र गंजिफ्रॉक देऊ नको, जरा धड गंजिफ्रॉक दे, असे काऊस म्हणालो. तर म्हणते कशी, गपचूप आहे ते घाला. सच्छिद्र गंजिफ्रॉकमधून लस डागणे सोपे जाईल त्या सटवीला. मी अंमळ चमकलो. ही सटवी कोण, असे विचारता, ती लस टोचणारी नर्स, असे उत्तर मिळाले. खुंटीवरील कोट-उपरणं आण, असे मेैनेस म्हणालो. तिनं फणकाऱ्याने आणून दिले. पगडी घालण्यास झटकली तसे दोन-चार ढेकणं टपाटप पडली. असो. निघालो, तसा मोरू म्हणाला, ‘बाबा बनियन बेतानेच काढा त्या नर्ससमोर.’ ‘मी अस्वल दिसेल का तिला?’ असं विचारलं. तो म्हणाला, ‘मुंगूस दिसता बाबा तुम्ही…’ निमूट केंद्रावर पोहोचलो. तर सामाजिक-शारीरिक अंतराची ऐशीतैशी करत रांगेत धक्काबुक्की सुरू होती. कसाबसा आत पोहोचलो, तर ती गर्दीने त्रासलेली अर्धचेहरा वस्त्रांकित परिचारिका खेकसली. कपडे काढा…मी भलता लाजलो. ती म्हणाली, आजोबा लाजताय काय. निर्लज्ज कुठले. घाई घाईत कोट काढताना गंजिफ्रॉकही निघाला. नर्सताई ओरडली, ‘वेंधळे कुठले. दंड पुढे करा.’ तिनं दंडात करकचून लस टोचली. लस डागणे म्हणजे काय, हे अनुभवले…नंतर मी काठी-कोट-उपरणे-पगडी सावरोनि पुढे पळतोय अन् मागून एक सुंदर परिचारिका ‘गडे लस घ्या ना…’ म्हणून पळत आहे, सभोवती वैद्यकीय पथक टाळ्या वाजवतंय, असे दिसो लागले. ती परिचारिका मला पकडून गदागदा हलवू लागली, भानावर आलो…काऊ मला उठवत होती. ‘अहो उठा. दळभद्री लक्षण मेलं. कुठून यांना लस दिली? दोन दिवस तापाने फणफणले आहात. ‘लस लस अन् नर्स नर्स…’ असे बरळताय. ‘लसलंपट’ म्हणू की ‘नर्सलंपट’ म्हणू तुम्हाला?’ अशा तऱ्हेनं ही कोरोना प्रतिबंधक लस आमच्या अंगी लागू जाहली. असो.
मी कोणती लस घेतली, हे सांगणे खुबीने टाळले, हे चाणाक्षांच्या लक्षात आलेच असेल. गुंड्याभाऊंसाठी हा सस्पेन्स कायम ठेवतोय…
श्री अभय जोशी ( विविधा – चिमणराव लसीकरण ) मो. नाम. ९८८११४१२४४.
☆ खरी श्रीमंती…भाग 2 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
………..दुःखी माणसाचे दुःख कमी करणे, श्रीमंताने गरीबांची गरीबी कमी करणे ही श्रीमंती. चांगल्या गोष्टींची योग्य पारख ही श्रीमंती.
भाग-२
अशी श्रीमंती सर्वांना लाभावी असे क्षण आपल्या आयुष्यात यावेत. ते अनुभवायला मिळणे ही श्रीमंती. आपल्या आसपास भरपूर चांगली माणसे असावीत आणि आपण खरच श्रीमंत व्हावे. मनमोकळ हसावं बोलावं म्हणजे खरी श्रीमंती. सुंदर निरोगी आरोग्य ही श्रीमंती आणि अशा श्रीमंतीने मिळणारं समाधान हेच श्रीमंतीचं खरे दुसरे नाव होय. लहान बाळाकडे पाहील्यावर मिळणारा आनंद ही श्रीमंती कशी हे मी ते माझ्या एका कवितेत वर्णन केले आहे.
बाळ
बाळ किती छान
गोरं गोरं पान
गुलाबासारखे गाल
ओठ किती लाल
खोडकर स्वभाव
मिश्कील हसणं
निरागस डोळे हसरे छान
सर्वांना देते आनंदाचे दान
तसेच मनाच्या श्रीमंतीचे/मोठेपणाचेही वर्णन, मनाच्या विशालतेचे वर्णन अनेकांनी केले आहे. ते मीही केले आहे.
मन
मन हे अतीविशाल
त्याचा नाही ठाव
शब्दानाही शक्य नसे
सांगावया त्याचा भाव
वेग त्याचा अपार
तया नसे जराही उसंत
रुप त्याचे अरुप,स्वरूप
ते असे अनादी ,अनंत
असे तया प्रेमक्षुब्धा
परसुखाशी ते झुरते
सौंदर्य मनाचे संस्कारानीच ठरते
विशाल मन हिच खरी श्रीमंती
समाधानी व्रुत्ती हिच खरी श्रीमंती
त्याचप्रमाणे आपल्याला संकटात मदत करणारे मित्र/नातेवाईक हवे व आपल्या आनंदात/यशात त्यांनी सहभागी व्हावे व आपणही त्यांच्या उपयोगी पडावे, आनंदात दुःखात सहभागी व्हावे. मन मोकळ करायला, गावाहून आल्यावर चहा-पाणी विचारणारा, विश्वासाने किल्ली, निरोप, पत्र ठेवून घेऊन आठवणीने देणारा शेजारी मिळणे ही खरी श्रीमंती. यातही वेगळच समाधान मिळते. आपण जन्म दिलेली मुलं चांगली निघणं,शिक्षण घेऊन योग्य मार्गाला लागणे व त्यांनी आईवडिलांना म्हातारपणी नीट वागणूक देणे हीसुद्धा एक श्रीमंतीच मानायला हवी. चांगली सुन मिळणे हीसुद्धा एक श्रीमंती होय.अशा प्रकारची श्रीमंती मिळणे हे पुर्वजन्मीचे पुंण्यच होय.
☆ खरी श्रीमंती…भाग 1 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
खरी श्रीमंती म्हणजे मनाचे समाधान
श्रीमंतीचं दुसरं नाव म्हणजे समाधान होय.माझ्या मते ‘श्रीमंती’ ही फक्त बाह्यांगावरच अवलंबून नसून ती मनाच्या अंतरंगावर व मोठेपणावर जास्त अवलंबून आहे. घर,फर्निचर, भरपूर पैसा, इस्टेट, दागदागिने म्हणजे श्रीमंती का? आई-वडील, जेष्ठ मंडळींची हेडसाळ, भावंडामधे एकाच तोंड पुर्वेला तर दुसऱ्याचं पश्चिमेला अशी विरुद्ध परिस्थिती चालेल का? संस्कारहिन तरुण मंडळी चालतील का? घरात देवाची पूजा नाही,एकही सुंदर पुस्तक नाही. मग ते श्रीमंत कसे?या साऱ्या प्रश्नांची उत्तरे सुज्ञ माणूस नकारार्थीच देईल हे निश्चित. याचा अर्थ श्रीमंती ही पैशांशी निगडीत नसून ती व्यक्तीच्या मनाशी निगडीत आहे. माणूस पैशांपेक्षा मनाने/विचाराने श्रीमंत हवा त्याचे जगणे सुसंस्कारित हवे. संस्कृतीचा सन्मान करणारे हवे. घाम व श्रम यांची पुजा करणारा माणूस खरा श्रीमंत असे माझे मत आहे.
षडरिपुंना थारा नसणाऱ्या मोठ्या मनाच्या माणसाचे आचरण शुद्ध असते. तेथे व्यसनांना थारा नसतो. माणसाच्या घरात व मनात पवित्र देवघर हवे. त्याचबरोबर सुसंस्कारासाठी ग्रंथ व त्या ग्रंथाचे सार जाणणारा माणूसही घरात हवा. नुकताच अर्थ प्राप्त असून उपयोग नाही तर तसे आचरणही हवे. श्रीमंतीचं दर्शन पवित्र वाटणे ती पाहून मनाला प्रसंनता वाटणे आवश्यक आहे. जिथे माणसामाणसातले संवाद हरवत चालले आहेत तेथे पैशांची श्रीमंती काय कामाची? आजच्या काळात समर्थपणे उत्तर द्यायला मनाच्या श्रीमंतीशिवाय दुसरा पर्याय नाही हेच खरे.
घरात रोज ताजी फुले/फळं असणं म्हणजे श्रीमंती. आज अवचित पाहुणा घरी आल्यावर त्याला मी पोटभर जेवू घालू शकलो आणि तो समाधानाने जेवला तर मी श्रीमंत होय. एखादी वस्तू, गोष्ट माझ्याकडे हवी त्यावेळी नक्की मिळणार हा विश्वास म्हणजे श्रीमंती. मदतीसाठी तेवढ्या विश्वसाने मित्राचा/नातेवाईकांचा फोन येणं याचाच अर्थ ती माझी श्रीमंती. कोण अडचणीत असेल तर त्याला आपली आठवण आली तर मी श्रीमंत.
भर उन्हात घराच्या अंगणात फुललेला गुलमोहोर/गार सावलीचा डेरेदार व्रुक्ष दिसावा ही नजरेची श्रीमंती. एखाद्याच्या चांगल्या गुणांचे मनापासून कौतुक करणं, त्याला त्याची कला वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे ही उदार मनाची श्रीमंती. थंडीत अंगणभर बुचाची फुले पडावीत तर कधी प्राजक्ताच्या सड्याने अंगण व वातावरण भरून जावं ही खरी श्रीमंती.
होय मला अशीच श्रीमंती हवी.एखादी गोष्ट केल्यानंतर आठवण ठेवून एखाद्या विशिष्ठ व्यक्तिसाठी राखून ठेवणे व आठवणीने देणे ही वेगळीच श्रीमंती होय.एखादे सुंदर द्रुश्य किंवा भगवंताचे रुप पाहील्यावर त्याचे कवितेत, सुंदर शब्दात वर्णन करता येणे ही बुद्धिची श्रीमंती. यशाचा आनंद सर्वांनी एकत्र मिळून लुटणे हीसुद्धा श्रीमंतीचं. दुसऱ्याच्या आनंदात आपले दुःख बाजूला ठेवून विसरून त्यांचा आनंद द्विगुणित करणे ही श्रीमंती. दुःखी माणसाचे दुःख कमी करणे, श्रीमंताने गरीबांची गरीबी कमी करणे ही श्रीमंती. चांगल्या गोष्टींची योग्य पारख ही श्रीमंती.
☆ टुमदार व रम्य हरिपूर•• [भाग-२] ☆श्रीमती सुधा भोगले ☆
त्यामुळे जमिनीत खोलवर तळघरासारखी खोली खोदली जायची व त्यात हळदीच्या हळकुंडाचा साठा केला जायचा. अशा ठेवलेल्या हळकुंडांना कीड लागत नसे. आणि काढल्यावर वजनात त्याचा उतारा जास्त पडे. २००५ सालचे पुरात पेवात पाणी शिरले. त्याचे स्फोट बरेच दिवस होत होते. त्यामुळे बरीचशी पेवात फारशी हळद साठवली जात नसावी. पेवे नष्ट झाली. हळदीच्या वायदेबाजारही इतरस्त्र स्थलांतरीत झाली.
पूर्वीपासूनच पूराचा धोका आहे. या हरिपूर गावचे वैशिष्ट म्हणजे कितीही पूर आला तरी गावाच्या दोन्ही देशीच्या आत पाणी येत नाही. २००५ साली सगळीकडे पाणी आले होते. पण वेशीच्या आत पाणी नव्हते.आयर्विन पूल बांधताना बागेतील गणपतीच्या उंचीवरून तो बांधला गेला की त्या उंचीपर्यंत पूराचे पाणी पोहचू शकत नाही.
पूर्वी नदीकाठी खूप वाळू होती. वरून पहाता माणसे त्यात अंगठ्याएवढी दिसत. ही वाळू लोह मिश्रित होती. त्याकाळी ती दूरवर घराचे बांधकामाला, पुलाचे बांधकामाला वापरत असत.
अशा या कृष्णाकाठी संगीत शारदा नाटकाचे लिखाण, नाटककार कै.गो.ब. देवल यांनी केले. घाटाच्या पारावर बसून त्यांना या नाटकाच्या संहितेची कल्पना स्फूरली. त्याकाळी समाजात जरठ -कुमारी विवाह होत असत. अशा समाजातील अनिष्ट रूढींवर टीकात्मक असे नाटक त्यांनी लिहिले. त्याचा पहिला प्रयोग १८९८ साली झाला. त्या
प्रयोगाच्या शताब्दी वर्षात म्हणजे १९९८ रोजी संगीत शारदाचा प्रयोग त्यांचे स्मरणार्थ पुन्हा (घाटावर ) मंच उभारून जोमात केला गेला, ‘रोटरी क्लब हरिपूर या संस्थेच्या सदस्य महिलांनी कै. गो. ब. देवलांचे घर सजविले. घाटावर त्यांची स्मरणीका म्हणून शीलान्यास बसविण्यात आला. देवलांप्रमाणेच इथले काव्यविहारी, गद्रे हे काव्यासाठी प्रसिद्ध होते.
ते गद्रेच्या घरात माडीवर बसून काव्य लिहीत. त्यांच्या कविता पाठ्य पुस्तकात आम्हाला अभ्यासण्यास होत्या. अलिकडल्या पिढीतील कै. अशोकजी परांजपे हे ही प्रतिभावान लेखक इथल्या मातीतीलच होते.
अशा संपन्न हरिपूरात १९२० साली इथले वैद्य कै. गो. ग, परांजपे यांनी वाचनालयाची स्थापना केली. त्याचे उद्घाटन करण्यास कै. लोकमान्य टिळक हरिपूरात आले होते. आजतागायत हे वाचनालय हरिपूर ग्रामपंचायतीकडून मोफत वाचनालय म्हणून चालविले जाते. सद्य स्थितीत हे वाचनालय रोटरी समाजदल हरिपूर यांच्या महिला सदस्या कार्यान्वित करत आहेत. रोटरीच्या माध्यमातून गावातील कचरा उचलण्यासाठी गाड्या देण्यात आल्या आहेत. घरोघरी जाऊन कचरा उचलला जातो. त्यामळे गावात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग नसतात.
इथला निसर्ग खरोखरच रम्य आहे. इथे प्राणवायू भरपूर प्रमाणात आहे. (oxygen zone ) त्यामुळे इथली हवा स्वच्छ, शुद्ध आहे.
नदीकाठामुळे इथे निरनिराळ्या पक्ष्यांचा वावर आहे. हरिपूरच्या घाटावर संध्याकाळी गेले असता, लाखो पोपट थव्यांनी आकाशात विहार करताना दिसतात. हे दृश्य विलोभनीय दिसते. मोरांचा ही इथे वास आहे.
माझे घराचे मागे नारळाची बाग आहे. एके दिवशी एक मोर इतक्या उंच झाडावर चढून बसला होता. आम्हाला अचंबाच वाटला. मोर काही उडणार पक्षी नाही. पण निरिक्षणानंतर रोज संध्याकाळी तो मोर, खालच्या झावळ्यातून हळूहळू एक एककरत वरच्या शेंड्यावर जाऊन झोपत असे. सकाळ होताच पुन्हा उतरून शेतात विहार करी. त्याचे लांडोरी सकट सगळे कुटुंबच इथे राहत होते.
आपण सांगलीच्या शास्त्री चौकातून हरिपूरच्या रस्त्याला लागलो की दूतर्फा चिंचेची मोठी मोठी झाडे फार काळापासून इथे आहेत. दरवर्षी त्या झाडांना विपूल चिंचा लगडतात. एप्रिल मे मध्ये चिंचा पिकल्यावर त्या ठेकेदार उतरवतात. चिंच हे फळ फलधारणा झाल्यापासून पूर्ण होण्यास १० ते ११ महिन्याचा कालावधी लागतो. हे मी इथल्या वास्तव्यात निरीक्षणातून पहात आहे. पक्कफळे काढल्यानंतर एप्रिल मे नंतर पानगळ होते. नवी पालवी फूटल्यावर लगेच काही दिवसात फुलोरा येतो. हळूहळू फलधारणा होऊन जुलै, ऑगस्ट मध्ये कोवळ्या चिंचा दिसू लागतात.
तुळशी विवाहापर्यंत पूर्ण चिंच कच्च्या स्वरूपात तयार होते. पुढे फळ पक्व होण्यास होळी नंतर सुरूवात होते. असे हे फळ दिर्घकाळी आहे. त्याकाळी एवढी झाडे मुद्दाम लावली असावीत.
२००५ चे पूरात, आम्ही होडीतून ४ ऑगस्टला बाहेर पडलो. पाण्याचा जोर एवढा होता की होडी पाण्याबरोबर ढकलली जात होती.
आमच्या बरोबरच्या जिगरबाज माणसांनी कासरा चिंचेच्या झाडाला बांधत बांधत होडी गुळवणी मठापर्यंत नेली व तेथून उजवीकडे वळून कोल्हापूर रस्त्यावरील दैवज्ञभवनसमोर बाहेर काढली. म्हणजे त्यावेळी आम्हाला ३५ माणसांना दोन शेळ्या, एक कुत्रा, एक दीड महिन्याचे बाळ, एक ९० वर्षाच्या आजी, चिंचेच्या झाडांनीच वाचविले व मदत केली. ज्यांनी लावली त्या राज्यकर्त्यांचे आभारच मानावे तेवढे कमी आहेत. सद्यस्थितीत हरिपूरचे रस्त्याकडच्या दुतर्फा शेतीचे, नागरिकरण होऊन अनेक वसाहती वसत आहेत. मागील भाग अंकलीपर्यंत खूप दाट शेतीच्या हिरवळीने नटलेलाच आहे. इथली वस्ती गावा पूरती मर्यादीत न राहता हरिपूर, सांगली रोडच्या दुतर्फा वाढते आहे.
अलिकडे त्याबरोबरच काही नवीन मंदीरेही झाली आहेत. नदीकाठी वसलेले म्हादबा मंदीर, त्याचे अलिकडे लहानसे स्वामी समर्थ मंदीर त्याचे समोरील बाजूस आत गेल्यावर श्रीकृष्ण नीलयम मंदीर आहे.
गजानन कॉलनीचे आतील बाजूस गोंदवलेकर महाराजांचे ध्यान धारणा मंदीर वसलेले आहे. हरिपूर म्हणजे हरिचेच गाव सार्थ होते. इथे अध्यात्माचा सतत सर्वकडे आराधना, उपासना भक्ति,प्रवचन, किर्तन या सर्व कार्याची मांदियाळी आहे. रम्य निसर्गात चराचरातून भरून राहिलेला परमात्म्याचा इथे खरोखरच प्रत्यय येतो. भक्तांच्या दुःखी, संसारात गांजलेल्या मनाला इथे उभारी मिळते. पुन्हा प्रसन्न होऊन उमेदीने वाटचाल करण्याची! हरिपूर तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे. त्याची अंमलबजावणी पुढील काही वर्षात योग्य त-हेने विकसीत झाली तर हरिपूर गाव जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसेल.
☆ टुमदार व रम्य हरिपूर•• [भाग-१] ☆श्रीमती सुधा भोगले ☆
शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले हरिपूर, हे कृष्णा -वारणा नद्यांच्या काठी वसलेले गाव! सांगलीहून वहात आलेली कृष्णा, हरिपूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या, डाव्या अंगाने, शेताच्या पल्याड हरिपूरकडे वहात जाते. या कृष्णाकाठी, सुपीक जमिनीने, समृद्ध झालेला हा परिसर, निर्सगाच्या हिरवाईने नटल्यामुळे, प्रसन्न आणि रम्य भासतो.
१७६८ मध्ये गोविंद हरि पटवर्धन यांनी आपल्या वडिलांचे स्मारकाकरिता सांगलीची सहाशे बिघे जमिन स्वतंत्र काढून हरिपूर हे गाव वसविले. ते गाव शंभर ब्राह्मणांना (अग्नहार) दिले. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी हे गाव वसविण्यास अनुमती दिली. यानंतर हरिपूर हे क्षेत्र झाले. या टुमदार गावाची, त्यावेळी लोकसंख्या दोन हजार होती व सांगलीची लोकसंख्या मात्र एक हजार होती. त्यावेळी हरिपूर हे सांगलीपेक्षा मोठे होते.
हरिपूरची जमीन ब्राह्मणांना दान दिली होती, त्याबद्दल एक आख्यायिका आहे. ही जमीन दान दिल्यानंतरच्या काळात सांगलीकर राजे हरिपूरच्या वेशीवर पाय धुवत, हेतू असा की, दान दिलेल्या जमिनीतील माती सुध्दा, पावलासंगे परत येऊ नये. हरिपूरच्या संगमेश्वर देवालयातील घंटेवर कोण्या बाबाजी रामचंद्र गुरव याचा नामनिर्देश असून त्यावर शक १६२२ (इ.स.१७००) चा उल्लेख आहे.
हरिपूरच्या शेजारील सांगली त्यापुढील शतकात फारशी वाढलेली नव्हती. १८५० साली हरिपूर हे गाव बुधगावकर पटवर्धनांकडे गेले. कृष्णा वारणा संगमावर, पुरातनकाळापासून असलेले गमेश्वर हे शिवाचं पवित्र स्थान, हरिपूरचे आराध्य दैवत आहे. प्रभु श्री रामचंद्र दंडकारण्यात जाताना इथे थांबले होते. त्यांनी वाळूचे लिंग स्थापन करून शिवप्रतिष्ठापना पूजे स्तव केली होती अशी कथा आहे.
कालांतराने काही गुराखी गाई चरण्यासाठी घेऊन येत. एक गाय रोज वेगळी चरत थोड्या लांब जाई. हे गुराख्याच्या लक्षात आल्यावर, तो गाईच्या मागे जाऊ लागला, तर ती गाय ठराविक स्थानी जाऊन आपल्या दूधाचा अभिषेक करीत असे. त्याने ही गोष्ट आपल्या राजापर्यंत पोहचवली. मग इथे तपासाअंती उकरून पाहिल्यावर वाळूचे शिवलिंग दृष्टोत्पत्तीस पडले, तेच हे संगमेश्वर देवालयातील स्थापित शिवलिंग होय. पुढे त्याकाळी तेथे देवालय उभं राहिले.
मिरजेला मार्कडेय नावाचा राक्षस होता .तो या लिंगाची भक्ती करीत असे. गुरूचरित्राच्या अध्यायात असं म्हटले आहे, मिरजेच्या मार्कडेय नामे संगमेश्वर पूजावा! संगमेश्वराची मूळ पिंड वालुकामय आहे. आताच्या स्थितीत या वालुकामय पिंडीवर दगडाचे लिंग करून नंतर बसविलेले आहे. यापिंडीवर पाण्याची धार धरली असता,बांबूंच्या कामटीने आतवर किती पाणी गेले हे बघत असत.
अशा या संगमेश्वराच्या पवित्र वाने पुनित झालेले हरिपुर गाव अध्यात्माचे अधिष्टान आहे. याच हरिपूरच्या वेशीतून आत प्रवेश केल्यावर कृष्णाचे मंदीर डाव्याबाजूस आहे. काव्यविहारी वासुदेव गद्रे, बुधगाव सरकारकडे होते. अक्काताई भट यांनी या कृष्ण देवालयाची स्थापना केली. पुढे ते गद्रे कुटुंबीयांचे मंदीर म्हणून नावारूपाला आले. इथे कृष्णाष्टमीच्या जन्मोत्सव श्रावणात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. भजन, किर्तन, गायन ह्यांची सातदिवस उपासना व भक्ती केली जाते. अष्टमीदिवशी रात्री जन्मकाळाचे किर्तन होते. पारण्याचा नैवेद्य महाप्रसाद असतो. वर्षभर ह्या मंदिरात बरेच उपक्रम भक्ती व उपासना यावर आधारलेले चालतात. ग्रंथ वाचन पारायणे होतात. असे अध्यात्म्याचे अधिष्टान आणि परंपरा पुढील पिढीनेही अंगिकारलेली आहे.
संगमेश्वराचे मंदीराबाहेर, विष्णूमंदीर आहे. पुढे आल्यावर पंचायतन मंदीर आहे. तसेच वेशीच्या अलिकडे श्रीराममंदीर, विठ्ठलमंदीर आहे. हरिपूरच्या प्रवेशीचे बाहेरील बाजूस श्री हनुमान मंदीर आहे.
बागेतील गणपती हे गानकोकिळा लताबाई मंगेशकरांचे श्रध्दास्थान आहे. त्या सांगलीत आल्यावर इथे दर्शनास येतात. या देवालयाच्या स्थापनेची आख्यायिका अशी की, सांगलीच्या संस्थापिकाचे मूळ पटवर्धन घराणे कोकणातील कोतवड्याचे, जिथे दुर्वाचा रस प्राशन करून त्यांच्या पूर्वजातील कोणा एकाने उपासना केली. त्यांना दृष्टांत झाला. ‘तू चालत राहा, मागे वळून पहायचे नाही. तोवर मी तुझ्याबरोबरच असेन. मागे वळून पाहिलेस तर तेथेच माझी स्थापना कर!’ त्याप्रमाणे इथंवर आल्यावर मागे वळून पहाता देवाने इथे स्थापना कर असे सांगितल्याप्रमाणे नदीकाठी देव स्थापित झाला. सन १७६५ चे फाल्गून प्रतिपदा ते पंचमी या दिवसात प्रतिष्ठापना झाली असे ऐकिवात आहे.
या भक्तांची अखंड मांदियाळी आहे.संकष्टीस देवदर्शनास व रोजचेही दर्शन घेणारे भक्त आहेत. माघातील गणेश जन्म असतो. जन्मकाळ, महाप्रसाद सर्वच मोठ्या प्रमाणावर नवसाला पावणारा असा हा गणपती आहे.
श्रावण सोमवारची संगमेश्वराची जत्रा फार पुरातन काळापासून असते. माझ्या सासुबाई त्यांचे लहानपणी आणा, दोन आणे घेऊन चालत इथल्या जत्रेला जात असत. (साल साधारण १९२० ते १९२५ चे सुमारास) अशी आठवण आम्हाला सांगत असत. अजूनही इथली जत्रा मोठ्या प्रमाणावर साजरी होते. असंख्य भक्तगणांची पहाटे पासून रीघ लागलेली असते ती रात्री पर्यंत ! बाहेरील आवारात जत्रेत असतात तशी खेळणी, पुंग्या, कलाकुसरीची चित्रे आदींचे विक्रेते असतात. घाटाच्या बाजूस चक्र, मुलांसाठी चे करमणुकीची खेळणी यांची रेलचेल असते. अशी श्रावणातले सर्व सोमवारी जत्रा असते.
इथे घरोघर कार्तिक व्दादशीला तुळशीचं लग्न दारात रांगोळी, ऊसाचा मंडप घालून केले जाते. आपण त्यासुमारास फेरफटका मारला तर हे सुंदर दृश्य गावातील जवळ जवळ प्रत्येक घराच्या दारात शोभिवंत असं दिसून येते. शहरात अशी अंगणे पहायला मिळत नाहीत त्यामुळे इथे सर्व पहाण्यासारखेच असते. ही परंपरा खरोखरच सामान्य माणसांनी जपली आहे.
आमच्या घराच्या जवळ गावंदर असल्याने आम्हाला निसर्गाचा आनंद भरभरून घेता आला. पिके कापणीला आली की पक्ष्यांची गर्दी व्हायची आणि ते पक्षी आमच्या अंगणातल्या झाडाझुडावर निवांत विश्रांती घ्यायचे. बाजूलाच लगेच शेते असल्याने त्यांची घरटीही आसपासच्या झाडांवर, खोबणीतून ढोलीतून असायची. संध्याकाळी खेळून दमलो की मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यावर निवांत बसून आकाशातले पाखरांचे थवे न्याहाळत राहायचो. ढगांच्या कापसात वेगवेगळे आकार शोधायचो, कधी हरीण कधी राक्षस कधी देव तर कधी शिवाजीमहाराज दिसायचे. आकाशात तिन्हीसांजेला होणारी रंगांची उधळण आणि तांबूस, केशरी, पिवळ्या, काळ्या नानारंगी छटा पाहून हरकून जायचो; नित्यनेमाचे निसर्गातील हे बदल आमच्या जीवनाचे अविभाज्य भाग होते. आसपासचे पशुपक्षी, फुलपाखरे, झाडेझुडे, दगड धोंडे, ओढे, नाले इतकेच काय दूरवर उन्हात झळझळणारे दाट मृगजळ देखील आमचेच वाटायचे; जवळ जाऊन त्यात हात बुडवावा असं वाटायचं; हे सारे आमचे सखेसोबतीच होते. शाळेत जाताना रमत गमत जाणे येणे आणि मग निसर्गातले हे दररोजचे बदल स्वीकारत अन न्याहाळत त्याच्याशी एकरूप होत जगणे अंगी मुरले होते. शेतातली पिके काढली की मुलांना पतंग उडवायला रान मोकळेच! कितीदा सड घुसून पाय रक्तबंबाळ व्हायचे, काटे टोचून पायात मोडायचे पण आनंदाच्या त्या क्षणांपुढे कोणत्याच वेदना क्षुल्लक होत्या.
निसर्गचक्राप्रमाणे आमचे खेळही बदलत असत, म्हणजे पावसाळ्यातले खेळ वेगळे, उन्हाळ्यातले खेळ वेगळे! पावसाळ्यात चिखलात खेळणे, मातीची भांडी बनवणे असले खेळ खेळत असू पण खरी खेळाची मजा उन्हाळ्यातच यायची. सुट्टी दीर्घकाळ चालायची आणि शाळा, अभ्यास असलं काहीच नसायचं, त्यामुळं सर्व सुट्टीवर आमचाच हक्क होता.आम्हाला उन्हाळ्यात कुठल्या कलासेस अथवा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला बसवले जात नव्हते. त्यामुळं अधून मधून घरी बोलवलं की सांगितलेलं काम करायचं आणि पुन्हा खेळायचं.
जोंधळ्याचे पीक निघून कडब्याच्या गंज्या परड्यात विसावयाच्या. मजबूत टणक गणगटे काढून साठवून ठेवायचे आणि गणगटांनी खेळायचे. प्रत्येकाच्या समसमान गणगट घेऊन चौकोनी किंवा गोल रिंगणात मांडून सपाट दगडाने (याला आम्ही व्हस्टर म्हणायचो)टिपून रिंगणातून बाहेर काढायचे असाच कोईंचा आणि चिंचोक्यांचा डाव असायचा. ओढलेल्या(जिंकलेल्या)कुया अंगणात पुरून ठेवायचो त्यावर ओळखीची खूण ठेवून दुसऱ्या दिवशी पुरून ठेवलेल्या कुया काढून खेळायचो. कधीतरी रात्री अचानक पाऊस यायचा आणि पुरलेल्या कोयी मुजुन जायच्या, थोड्या दिवसांत त्या जागेत आंब्याचे कोवळे तांबूस कोंब वरती यायचे मग लक्षात यायचे, ‘इथं कोयी पुरल्या होत्या !’
(मुलेही आमच्यासोबतच खेळत, भेदाभेद मुळीच नव्हता, छेडाछेडी किंवा आतासारखं अजून पहिलीत जात नाही तोपर्यंत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असले प्रकार नव्हते.) सर्वचजण सवंगडी निर्मळ निकोप मनाचे होते. कुणाही मुलाची ओळख ‘शेजारचा’ अशी नसायची, ‘माझा भाऊ ‘ अशीच असायची. चुकलं तर मरेस्तोवर मार असायचा, मुलगी ‘मोठी’ झाली की खेळ बंद व्हायचे लगोर, काट्याकोली, विष अमृत, सुरपाट्या गट्टया, आयरे, पत्यांच्या पानाने, विटी (चिन्नी )दांडू, कबड्डीने खेळायची.
आमचे टाइम पास असायचे-एकत्र बसून गप्पा मारणे, ढगांचे आकार, आकाशाचे रंग न्याहाळणे, पक्ष्यांचे, फुलपाखरांचे, वेगवेगळ्या कीटकांचे निरीक्षण करणे, झाडांच्या पानांच्या पिपाण्या करून वाजवणे, कर्दळीच्या बिया पानांच्या सुरळ्या करून त्यावर ठेवून फुंकरीने उडवणे, चिकाडीचे तांबडे तुरे तोडून ते झाडाच्या ढोलीत खोबणीत ठेवून ‘कोंबडे झोपले’ म्हणायचे. बाभळीच्या गोल गोल शेंगा तोडून त्या पैंजण, जोडवी म्हणून पायाला बोटाला बांधून जोरजोरात पाय आपटायचे आणि शेंगा खूळ खूळ वाजवायचो. चिंचेचा कोवळा पाला, कोवळ्या चिंचा ओरबाडून खाणे किंवा त्यात मीठ टाकून दगडावर चेचून खाणे, जुन्या वहितली कोरी पाने काढून त्यांची वही शिवणे, फाटकी पुस्तके चिकटवणे हे असायचे.
तीन टाईम पोटभर जेवायचो, डाळींची किंवा वाळल्या कडधान्यांची आमटी न भाकरी, भाजी क्वचितच, दूध क्वचितच, भात फक्त संध्या काळीच तोही रेशनच्या तांदळाचा.
भाजलेली चवळी, मूग, हरभरे, फुटाणे, चुरमुरे मक्याची कणसे, भुईमुगाच्या ओल्या शेंगा, सिजन मध्ये चवळी-मुगाच्या ओल्या शेंगा, ऊस, ज्वारीचे गोड बांड( ज्वारीचे टणक ताट), ज्वारीचा हुरडा, हरभऱ्याचे डहाळे, हिरव्या -पिकल्या चिंचा हे आमचे वरचे खाऊ होते.बिस्कीट, ब्रेड, पाव असले खाऊ आमच्या आसपास ही फिरकत नव्हते, चहाबरोबर कधीतरी शिळी चपातीच कधीतरी पाच-दहा पैशांचा बटर बुडवून खायला मिळायचा.पाहुणे आले तर तेही चपाती उसळ किंवा भजी, वड्याच आणायचे त्यामुळं बेकरी वस्तुंना किंमत नव्हती. उन्हाळ्यात करवंद जांभळं, चोखून खायचे छोटे आंबे रानात -काट्याकुट्यात हिंडून खायचो.कुठल्याही विहिरीचे, हौदाचे पाणी कचरा बाजूला सारून घटाघटा प्यायचे. पाण्याची बाटली, ब्रिसलरी असलं आमच्या गावीही नव्हतं. दुधाच रिकाम पातेलं आणि तुपाची बेरी भाकरीबरोबर खायला ‘तू-मी’ व्हायचं. (आज त्याला कोण विचारत पण नाही)
☆ विविधा ☆ कुर्यात् सदा मंगलम्….भाग 1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई☆
विवाहाची सुरुवात वाँगनिश्चयाने होते. त्यावेळचे मंत्र असे आहेत. वधुपिता वरपित्याला म्हणतो,
“वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थ स्वीक्रुता त्वया।
कन्यावलोकन विधी निश्चितस्त्ंवं सुखी भव॥”
अर्थ — मी अंतःकरणपूर्वक तुम्हाला अर्पण केलेली कन्या तुम्ही मनःपूर्वक स्वीकारली आहे. तिचं यथायोग्य अवलोकन करून कोणताही दोष नाही याची खात्री करुन, सुखी व्हा.
वरपिता वधुपित्याला म्हणतो,
“वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थ स्वीक्रुत मया ।
वरावलोकनविधौ निश्चितंस्त्ंव सुखी भव ॥
ह्या मंत्रामध्येही तुम्ही वराचं अवलोकन करून तुम्ही खात्री करून घ्या व सुखी व्हा. असं वचन दिलेलं आहे. वधुवरांना समान महत्व दिलेलं इथे दिसून येतं.
कन्यादान करतानाच्या मंत्राने तर वधुपित्या वराला शब्दाने बांधून घेतलेलं आ… करुण वातावरणात थोडी हास्याची खसखस पिकावी म्हणून काही गमतीदार विधी समारंभात छान रंगत आणतात. ‘लाजाहोम’ च्या वेळी मुलीचा भाऊ मेहुण्याचा चक्क कान पिळतो. “माझ्या बहिणीला नीट संभाळ बरं, नाही तर मी आहे नि तू आहेस.” अशी तंभी देतो. वर त्याला कानपिळीचा मान देऊन शांत करतो.
लग्न वधूच्या घरी करायची जुनी प्रथा आहे. हेही विचार पूर्वक ठरविलेलं आहे. मुलगी आता कायमची परग्रही जाणार. तिच्या प्रेमाचे आप्तेष्ट, शेजारी, मैत्रिणी, गायीगुरं, झाडं वेली आणि प्रत्यक्ष ते घर तिला प्रेमाने निरोप देणार. पुन्हां पुन्हां आलिंगन, प्रेमालाप, गुजगोष्टी होणार. मायबाप तिला मिठीत घेणार, तिला ही सर्वांना भेटायचय्, स्पर्शायचय, साऱ्यांना मनात साठवायचय, ह्यासाठी मायघरातला मोकळेपणाच हवा. हा घनव्याकूळ विधी माहेरीच होणं इष्ट. सीमांत पूजन, वराकडील मंडळींना अहेर करणं ह्यातही मुलीच्या हिताचाच विचार केलेला आहे. वरमायेला जरा जास्तच मान देण्याची पध्दत आहे हे खरं आहे, पण गौरिहराच्या वेळी वरमाय वधूच्या आईची ओटी भरून तिचा सन्मान करते. पोटची पोर तिने आपल्याला दिलीय्, तिच्या पोटात दुःखाने खड्डा पडला असेल म्हणून वरमाय तिला साडी देऊन तिचं पोट झाकते नि दिलासा देते. हे किती काव्यमय आहे!
सूनमुख पहाणे ह्या विधीत वरमाय मुलगा आणि सून यांच्या मध्ये बसते. तुम्ही दोघंही मला सारखीच हा भाव त्यात असतो.सुनेच्या तोंडात साखर घालून तिचा नि स्वतःचा चेहरा ती आरशात पहाते. आपण दोघी एकरुप होऊन आनंदाने राहू असं आश्वासन त्यात आहे. ऐरणीदान ह्या विधीच्या वेळी सुपं, वेळूची डाली, दिवे असा संभार मुलीचे मातापिता सासरच्या प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवतात. “आमच्या ह्या प्राणप्रिय कन्येची जबाबदारी आता तुमच्या शिरावर बरका.” अशी भाकच घातली जाते. मग काय बिशाद तिला कोणी सासुरवास करण्याची!
सप्तपदी हा आपल्या विवाह संस्कारातला सर्वात महत्त्वाचा विधी. यामध्ये अग्नीच्या साक्षने वधुवर एकमेकांचे हात हाती घेऊन समान पावलं टाकतात. वधू अश्मारोहण करते व जोडिदाराला म्हणते, “मी ह्य दगडाप्रमाणे तुझ्या संसारात स्थीर राहीन.” तर नक्षत्रदर्शन ह्या विधीत वर वधूला ध्रुवतारा दाखवतो नि म्हणतो, “मी त्या ध्रुवाप्रमाणे स्थीरपणे तुझ्याशी संसार करीन.” दोघांच्याही मुखातून येणारा ‘नातिचरामि’ हा उद्गार म्हणजे तर दोघांनी एकमेकांना दिलेलं प्रेमाचं अभिवचन.
ब्रह्म-माया, प्रकृति-पुरुष, यांच्या अद्वैतातून विश्वाचा हा चैतन्य पसारा सतत पसरत राहिला आहे. मानव त्यातलाच एक घटक. त्याची वैचारिक पातळी इतर प्राण्यापेक्षा खूप वरची. त्याने स्वतःची एक आखिव रेखिव संस्कृती निर्माण केली. अनिवार्य अशी कामप्रव्रुत्ती त्यातून वंशसातत्य हा निसर्गाचा हेतू याचं उन्नयन त्याने विवाह संस्था रचून केलं. स्थल, काल, व्यक्ती सापेक्ष अशा वेगवेगळ्या प्रथा निर्माण झाल्या. त्यातली एक आपली हिंदु विवाह पध्दती. तिच्यातले बोचणारे सल आपण काढू शकतो.
वधू वरांच्या सहजीवनाचा आरंभ कोर्टकचेऱ्यातल्या रुक्ष वातावरणात होण्यापेक्षा आनंदी, मंगल वातावरणात होणंच चांगलं नाही का? मंगलाक्षता टाकून आपण म्हणुया. “कुर्यात सदा मंगलम्।”
☆ विविधा ☆ आजच्या विदयार्थ्यांसमोरील आदर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ☆ प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे ☆
(14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956)
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील विदयार्थी काळ हा अतिशय महत्वाचा असतो. या काळात आपण जे शिकतो जे अनुभवतो, ज्या प्रेरणा आपल्याला मिळतात त्याचा उपयोग आपल्या पुढील आयुष्यात होत असतो. अशा काळात आपल्या समोर आदर्श असणे हे आवश्यक असते. विदयार्थ्यांसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, विद्याव्यासंग, सामाजिक, राष्ट्रीय कार्य, विदवत्ता,उत्तम आदर्श आहे. जगातील सर्वच विदयार्थ्यांच्या समोर बाबासाहेब हे एक आदर्श आहेत.
१ विद्येचे महत्व
आजच्या काळात विद्येला खूप महत्व आहे. त्यावर वेळ व पैसा मोठयाप्रमाणात खर्च केला जातो. विद्येबद्दल बाबासाहेबांचे विचार हे क्रांतिकारी आहेत. बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्वाचे साधन आहे. तुम्हाला जर स्वतःला बदलायचे, समाजाला बदलवायचे असेल तर शिका. बाबासाहेब शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा असा संदेश देतात. विद्या हा मानवी जीवनाचा पाया असून ते मानवाच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे. बाबासाहेब म्हणतात मी मोठा कसा झालो असे जर मला कोणी विचारले तर मी सांगेन शिक्षणाच्या संस्काराने. बाबासाहेबानी आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्व दिलेलं आहे. त्यासाठी अपार मेहनत केलेली आहे. ज्या प्रमाणे पोटात अन्न नसेल तर व्यक्ति अशक्त होतो त्याचप्रमाणे जर शिक्षण नसेल तर व्यक्ति लाचार होतो त्याचे जीवन पशुसम होते अशा अचूक व साध्या सोप्या पद्धतीने त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले आहे. त्यामुळे विदयार्थ्यांनी ही शिक्षणाचे महत्त्व ओळखुन विद्या संपन्न करण्यासाठी झटलं पाहिजे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी ही अपार मेहनत, ध्येयनिष्ठा ठेवून विद्या मिळवली पाहिजे.
तुमच्याकडे विद्या असेल तरच तुम्हाला मान सन्मान मिळेल असा उपयोगी व विकासाचा मार्ग बाबासाहेब दाखवतात.
२ विद्येबरोबरच शील असले पाहिजे
नुसते विद्वान होऊन उपयोग नाही तर विद्ये बरोबर विदयार्थ्यांच्या अंगी शील असले पाहिजे, असे बाबासाहेब आवर्जून सांगतात.
शिकलेल्या लोकांमध्ये शील नसेल तर समाजाचा राष्ट्राचा नाश होईल मग नुसत्या शिक्षणाचा उपयोग काय? त्यामुळे विदयार्थ्यांनी विद्येबरोबरच शील ही जोपासले पाहिजे. शील म्हणजेच नीतिमत्ता चांगले वाईट समजणे, वाईटापासून दूर राहणे. आपल्या हातून चांगले कार्य कसे होईल हा विचार सदैव विदयार्थ्यांनी केला पाहिजे असा मोलाचा संदेश बाबासाहेब देतात. हा संदेश किती महत्वाचा आहे हे आपण आजूबाजूची परिस्थिती पहिली की लक्षात येते. व्यसन, वाईट संगत,अमली पदार्थ सेवन, यात काही तरुण गुरफटलेले दिसून येतात त्यामुळे विदयार्थ्यांनी वाईट कृत्यापासून दूर राहून, वाचन, लेखन,गायन, वादन, चित्रकला, नृत्य, क्रीडा, असे छंद जोपासले पाहिजेत.
शिकलो म्हणजे सर्व झाले असे नसून केवळ पदवी मिळवणे म्हणजेच शिक्षण नव्हे तर विदयार्थ्यांनी रचनात्मक कार्य केले पाहिजे.
जे तो शिकणार आहे त्याचा उपयोग केवळ आपल्यापुरता न होता समाजहितासाठी झाला पाहिजे असे ही बाबासाहेब आवर्जून सांगतात.
३ अजन्म विद्यार्थी
बाबासाहेब हे अजन्म विद्यार्थी होते. रात्रभर जागून अखंड अठरा अठरा तास ते अभ्यास करीत असत. वाचन, लेखन करीत असत. कोलंबीया विद्यापीठाने knowledge of symbol ज्ञानाचे उपासक म्हणून त्यांचा गौरव केला आहे. विदयार्थी भूमिका घेऊन सतत काहीतरी शिकत राहणे, एखाद्या विषयाचा पाठपुरावा करणे, एखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास करणे, सतत वाचन करणे, लेखन करणे हे गुण बाबासाहेबांकडून विदयार्थ्यांनी घेतले पाहिजेत. विविध विषयावर अपार मेहनत घेऊन त्यांनी विविध ग्रंथ प्रकाशित केले आहेत. काहीवेळा आपण ही अर्धवट माहिती घेतो व तिलाच खरे मानून चालतो त्यामुळे अपुरे विद्यार्जन करून काही उपयोग नाही तर योग्य शिक्षण घेऊन आपली योग्यता सिद्ध केली पाहिजे. बाबासाहेबांचा हा मोलाचा संदेश असून विद्या घेत असताना विदयार्थ्यांनी आपल्या अंगी कोणती कौशल्य आहेत याचा विचार करून आपले क्षेत्र निवडले पाहिजे व त्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले पाहिजे. आता मला शिकण्याचा उपयोग नाही असे न म्हणता सतत शिकत राहिले पाहिजे. ते शिक्षण पुस्तकीच असेल असे नाही तर बऱ्याच नवीन गोष्टी, तंत्रज्ञान येत असते ते शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.कोरोना काळात या पूर्वी कधीही ज्याचा फारसा विचार केला नाही अशी ऑनलाईन शिक्षण पद्धती आपण शिकली त्यातील तंत्रे समजून उपयोगात आणली म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याचा आपल्याला फायदाच झाला.
४ संघर्ष
बाबासाहेबाचा शैक्षणिक प्रवास हा अतिशय खडतर असा होता. गरिबी, जातीय अवहेलना अपमान, पुरेशी साधने नसणे परंतु अशा ही स्थितीत त्यानी आपली जिद्द सोडली नाही. आणि ज्या देशात त्यांना अपमानकारक वागणूक मिळाली त्याच देशाची राज्यघटना त्यांनी लिहिली. हे सर्व घडू शकले ते त्यांच्या तील प्रबळ इच्छाशक्ती, ध्येयनिष्ठा, अपार मेहनत करण्याची तयारी,चिकाटी, जिद्द धाडसीपणा, स्वाभिमान, महत्वकांक्षा, यामुळे.
अपमानाला त्यांनी मेहनतीने उत्तर दिले. आणि विविध विषयातील 32 पदव्या मिळवल्या. यातून आपल्याला एक शिकवण घेता येईल की एखाद्याकडे जिद्द असेल मेहनत करण्याची तयारी असेल तर तो आपल्या कार्यात यशस्वी होईलच. त्यामुळे आपण गरिबी, पुरेशी साधने नसणे अशा गोष्टीचा विचार न करता त्यावर मात करून मला पुढे कसे जाता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करून आपले ध्येय गाठले पाहिजे.
५ पुस्तक प्रेमी, वाचन प्रेमी
विद्यार्थीदशेत असताना पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पुस्तकांचा उपयोग करूनच अभ्यास करावा लागतो. वाचनामुळे आपल्या विचारात प्रगल्भता येते.
बाबासाहेबांचे पुस्तकांवर प्रचंड प्रेम होते. पुस्तकांसाठी बंगला बांधणारे एकमेव बाबासाहेब असतील. मुंबई दादर येथे त्यांनी राजगृह नावाने खास पुस्तकासाठी घर बांधले होते. आजही तिथे आपणास ग्रंथ पहावयास मिळतात. पुस्तक वाचण्यासाठी ते जेवायचे ही विसरून जातं असत.परदेशात असताना वेळ वाया जावू नये म्हणून ते ग्रंथालयात चोरून पावाचे तुकडे खातअसत. इतके प्रेम त्यांचे पुस्तकांवर होते.
बाबासाहेब म्हणतात ज्ञानची भूक भागावी म्हणून मी पोटाची भूक मारून अनेक ग्रंथ खरेदी केले आहेत. तुमच्याकडे जर दिन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या व एक रुपयाचे पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल आणि पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल. सहजसोप्या भाषेत बाबासाहेब आपल्याला पुस्तकांचे महत्व सांगतात.त्याचे अनुकरण आपण विद्यार्थी दशेपासूनच केले पाहिजे. जशी आपल्याला पुस्तके मिळतील तसा संग्रह केला पाहिजे.
वाढदिवसाच्या निमित्त असो, या कोणीही आपल्या भेट देणार असो अशावेळी आपण पुस्तके देण्याची विनंती केली पाहिजे. शालेय वयापासूनच वाचनाची आवड जोपासली पाहिजे व विविध विषयावरची पुस्तके वाचली पाहिजेत.वाचनालयाचे सभासद होऊन तेथील पुस्तके वाचली पाहिजेत. वाचन करीत असताना त्यातील महत्वाचे मुद्दे आपल्या वहीत उतरून घेण्याची सवय लावली पाहिजे. अशी सवय विदयार्थ्यांनी ठेवली तर पुढे तुम्हाला याचा खूप चांगला उपयोग होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बावीस हजारापेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह होता.22हुन अधिक विविध विषयावरील संशोधनपर पुस्तके बाबासाहेबानी लिहिली आहेत.लोकांनी माझी अवहेलना केली पण पुस्तकांनी मला ज्ञान दिले. अशाप्रकारे विदयार्थ्यांनी ही आपला स्वतःचा पुस्तक संग्रह करून त्याचा जास्तीजास्त उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी, समाजातील प्रश्न समजून घेण्यासाठी,विषयाचे आकलन होण्यासाठी केला पाहिजे.
अशाप्रकारे विविध गुणांची खाण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले पाहिजे. विद्या, शील, संघर्ष, सतत शिकण्याचा ध्यास वाचनप्रेम, पुस्तकांचा सहवास, विद्ववता जिद्द, चिकाटी स्वाभिमान, याचा आदर्श आपण सर्व विदयार्थ्यांनी घेतला पाहिजे. कठोर परिश्रम करून उच्च शिक्षण घेतले पाहिजे व आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या उन्नतीसाठी तसेच समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी केला पाहिजे. अशा या थोर महामानवाला कोटी कोटी प्रणाम.