मराठी साहित्य – विविधा ☆ सुखी निवृत्त जीवनाचा कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ 

श्री उद्धव भयवाळ

संक्षिप्त परिचय 

सेवानिवृत्त बँक अधिकारी

  • विनोदी कथा, एकांकिका, बालकथा , बालकवितेपासून लावणी प्रकारापर्यंत लिखाण .
  • “इंद्रधनू” हा कवितासंग्रह आणि “हसरी फुले” हा बालकवितासंग्रह  “तारांबळ” हा विनोदी कथासंग्रह प्रकाशित झाला आहे.
  • “हसरी फुले” या बालकवितासंग्रहास  “अंकुर वाड्मय पुरस्कार-२००८” प्राप्त.
  • “सुभद्रा प्रतिष्ठान” सेलू (जि. परभणी) यांचा कवितेसाठीचा प्रतिष्ठेचा “गौरव पुरस्कार” .
  • नाशिक येथील “कलाकुंज”  प्रकाशनाच्या वतीने साहित्यसेवेबद्दल नाशिक येथे सत्कार.
  • भारतीय नरहरी सेना {महाराष्ट्र प्रदेश} यांचा ‘नवरत्न’ पुरस्कारांपैकी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार.
  • ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे मी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या “साने गुरुजींच्या छान छान गोष्टी” या पुस्तकाचा समावेश.
  • अ.भा.सानेगुरुजी कथामाला,जालना यांच्या बालकुमार कविसंमेलन अध्यक्षपद.
  • “सलिला साहित्यरत्न सन्मान” प्रदान.”अहिंदी भाषी क्षेत्रामध्ये हिंदी भाषेतील साहित्य निर्मिती” यासाठी हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान.

☆ विविधा ☆ सुखी निवृत्त जीवनाचा कानमंत्र ☆ श्री उद्धव भयवाळ 

एका पाहणीनुसार भारतामध्ये साठ वर्षांवरील जनसंख्या आठ कोटी आहे. याचा अर्थ आज घडीला भारतातील सात टक्के लोक ‘ज्येष्ठ नागरिक’ या व्याख्येत येतात. आणि दरवर्षी वेगवेगळ्या आस्थापनांमधून साधारणपणे सात लाख लोक निवृत्त होत आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेदिवस वाढत जाणार हे निश्चित. यावरून कुणाचा असा समज होऊ शकतो की, या ज्येष्ठ नागरिकांपुढे जगण्यासाठीच्या खूप समस्या असणार आहेत. काही प्रमाणात ते खरे असेलही. पण निवृत्तीनंतरचे जीवन सुखी, आनंदी आणि चैतन्यमय कसे करायचे ते आपल्या हातात आहे.

निवृत्त जीवन आनंदाने जगण्यासाठी प्रामुख्याने तीन गोष्टींची आवश्यकता आहे.

१. आर्थिक स्थैर्य  २. आरोग्य   ३. प्रेमाची माणसं  (आप्तेष्ट, मित्र इत्यादि )

त्यापैकी आर्थिक स्थैर्य हवे असण्यासाठी निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्नाची हमी पाहिजे. दरमहा मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त बँकेमधील ठेवीवर मिळणारे मासिक व्याज हासुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो. आपण कष्टाने कमावलेल्या पुंजीचा आपल्याला निवृत्तीनंतर चांगला उपयोग व्हावा म्हणून जास्तीत जास्त परतावा मिळेल अशा ठिकाणी पैसा गुंतवावा. मात्र त्या गुंतवणुकीत कमीत कमी जोखीम असावी. कारण जसजसे वय वाढत जाते, तसतशी जोखीम घेण्याची मानसिकता कमी होत जाते. त्याचप्रमाणे अचानक उद्भवणाऱ्या आजारपणासारख्या गोष्टींसाठी थोडे पैसे बाजूला काढून ठेवावेत म्हणजे ऐनवेळी त्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आरोग्य. ते चांगले राहण्यासाठी आपणास झेपेल तसा नियमित व्यायाम करणे, खाण्यापिण्याच्या बाबतीत योग्य ती काळजी घेणे आणि स्वत:ला कशात तरी गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. जसे की, नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकामध्ये आपले काही छंद जोपासायचे राहून गेले असतील तर आता ते आपण करू शकतो. कारण अशा गोष्टींमुळे आपला मेंदू तरतरीत राहतो. त्याचप्रमाणे स्वत:चा आणि जोडीदाराचा आरोग्यविमा आपण नोकरीमध्ये असतांनाच काढून ठेवणे हेसुद्धा आवश्यक आहे.

सुखी निवृत्त जीवनासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेमाची माणसे. यामध्ये ज्याप्रमाणे आपले कुटुंबीय आहेत, त्याचप्रमाणे नातेवाईक आणि मित्रही आहेत. या सर्वांना आपल्याविषयी प्रेम आणि काळजी वाटत असतेच. पण ते प्रेम वृद्धिंगत कसे होईल हे पाहणे आपल्याच हातात आहे. यासाठी आधी काही पथ्ये आपण पाळणे आवश्यक आहे. एक म्हणजे घरामध्ये कुणालाही अनाहूत सल्ला देण्याचे टाळावे. मुलांना त्यांचा संसार त्यांच्या मनाप्रमाणे करू द्यावा. त्यात अनावश्यक ढवळाढवळ नको. घरातील मुले, सुना, नोकरीस असतील तर नातवंडांची काळजी घेणे हे आपणास जमू शकते. त्याचप्रमाणे विजेचे किंवा टेलिफोनचे बील भरणे इत्यादी छोटी छोटी कामे आपण करू शकतो. त्यामुळे कुटुंबियांना आपली मदतच होते. दुसरे म्हणजे नोकरीमध्ये व्यस्त असतांना आपण जास्तीत जास्त वेळ नोकरीच्या ठिकाणी  घालवलेला असतो. कुटुंबियांना देण्यासाठी तेव्हा वेळच नसतो. आता निवृत्तीनंतर मात्र आपण जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसाठी द्यायला हवा. कुटुंबियांसोबत पर्यटनाला जाणे, सर्वांनी एकत्र बसून नाटक, सिनेमा पाहणे हे आपण करू शकतो. आपल्या जोडीदाराच्याही काही इच्छा, आकांक्षा आपल्या नोकरीच्या व्यग्रतेमुळे पूर्ण करायच्या राहून गेल्या असतील तर आता त्या पूर्ण करण्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण प्रेम दिल्याने प्रेम वाढत असते ही गोष्ट सदैव ध्यानी असू द्यावी.

त्याचप्रमाणे सामाजिक कार्यासाठीसुद्धा थोडा वेळ आपल्या दिनक्रमातून काढला पाहिजे. कारण ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचेही आपण देणे लागत असतो. तसेच नवनवीन मित्र मिळविणे, एखाद्या सामाजिक संस्थेशी स्वत:ला जोडून घेणे, सदैव उत्साही राहण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी नक्कीच आपले निवृत्त जीवन सुखी बनवितील यात शंका नाही.

© श्री उद्धव भयवाळ

औरंगाबाद

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा  ☆ मी मला भेटले  ☆ सौ. मानसी काणे

सौ. मानसी काणे

संक्षिप्त परिचय  

शिक्षण –  एम ए.

दूरसंचारमधे ३० वर्षे नोकरी. अनेक मासिकात कथा लेखन. अनुवाद. वर्तमानपत्रात सदर लेखन.

☆ विविधा  ☆ मी मला भेटले  ☆ सौ. मानसी काणे ☆

आयुष्याच्या भर मध्यान्हीत मी स्वेच्छानिवृत्ती घेतली.  कितीही विचारपूर्वक घेतलेला निर्णय असला तरी एकदम आलेल रिकामपण अंगावर आल. मुल मार्गी लागलेली. घरापासून दूर रहाणारी,नवरा नोकरीत आणि मी अशी एकटी रिकामी घरात. मग घरात साफसफाई कर,पंखे पूस,खिडययांच्या जाळया साफ कर अशी सटरफटर काम काढली. वाचून वाचून वाचणार तरी किती? कथाकीर्तन आणि अध्यात्माचा ओढा मला कधीच नव्हता. सामाजिक कार्यात झोकून देण्याची वृत्ती नव्हती. मी ऐहिक सुखात रमणारी साधी बाई. मग करायच तरी काय? अशाच एका संध्याकाळी मावळतीच्या सोनेरी किरणासारखी ती मला भेटली. रिकामपण अंगावर घेऊन संथ बसलेल्या मला तिन हलवून जाग केल. म्हणाली,‘‘काय ग,चांगली आनंदी असायचीस की नेहमी. मग आता का अशी सैरभैर झालीस? चल ऊठ. शिवणकाम,भरतकाम किती सुंदर करायचीस. मला नातू झाला आहे. नव्यान सुरुवात कर छान झबली टोपडी शिवायला. भरतकाम करून दुपटी शीव.  पॅचवर्क कर. आणि लिहायच का बंद केलस ग? किती छान लिहायचीस तू कॅालेजमधे,ऑफिसच्या मॅगझिनमधे. कधी पेपरमधे. अस कर एक कथाच लिहून टाक झकासपैकी किंवा प्रवासवर्णन लिही  आणि दे दिवाळी अंकात आणि इतर मासिकात  पाठवून. दारात मस्त रांगोळी काढचांगली मोराची काढ. तुझी स्पेशालिटी होती ती. पानफुल आणि विविध प्रकारचे मोर. प्रत्येक मैत्रीणीच्या वाढदिवसाला छानशी पर्स किंवा पिशवी द्यायचीस भेट म्हणून स्वत: शिवलेली. त्यावर नाजुक मोर भरलेला असायचा. कुठ गेल ग ते सगळ? आणि पेंटिंग करायच का सोडलस?. ’’तुझ्या जुन्या घरातल्या बिंतींवर किती छान वेलबुट्टी काढलेली होती. आणि इथ साध स्वस्तीक नाही?

‘‘अग हो, हो किती बोलशील धबधब्यासारखी? कशी देवासारखी भेटलीस बघ.  मी हे सगळ विसरुनच गेले होते. ’’मी म्हणाले. ‘‘हे भेटीचे क्षण घट्ट पकडून ठेवायचे. आनंदी रहायच अन आनंद वाटायचा विसरू नकोस. विनोदी बोलून सर्वाना हसवणे हे तर तुझ शस्त्र होत. ते नको म्यान करूस. बर निघू मी? उशीर झाला. ’’आली तशी वार्‍याच्या झुळुकीसारखी ती निघून गेली. तिन सांगितलेल सगळच तर माझ्याकड होत. मग मी हा मिळालेला वेळ का बर वाया घालवते आहे.  मी झडझडून उठले. सुई , दोरा, रेशीम, कापड सगळ जमवल. शिवणाच मशीन स्वच्छ करून त्याला तेलपाणी केल आणि सुरु केल दणययात काम. सुंदर झबली टोपडी शिवली. जरीच्या कुंचीला मोती लावले. दुपट्यावर इटुकली पिटुकली कार्टून पॅच केली. वेगवेगळ्या रंगांचे तुकडे जोडून मऊमऊ गोधडी शिवली. एक मस्त पिशवी शिवली. हे सगळ पहात असताना मला हे कपडे घालून दुडदुडणार गोंडस बाळ दिसू लागल.

मी हातात पेन घेतल आणि सुरू केल लिहायला. मनातल्या भावना शब्दरूप घेऊन झरझर कागदावर उतरू लागल्या. काय लिहू आणि किती लिहू अस मला झाल. सकाळी रांगोळी हातात घेतली आणि तुळशीसमोर एक मोर पिसारा फुलवून उभा राहिला. माझ्या मनात नाचू लागला. आता मला वेळ पुरेना. इतकी आनंदात तर मी यापूर्वीही नव्हते. मला अचानक भेटलेली कोण ही जादुगारीण? माझच आस्तित्व मला पुन्हा मिळवून देणारी कोण होती बर ती? आणि एका क्षणी मला लख्ख समजल की ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्या आतली मीच होते. माझे माझ्याशीच ऋणानुबंध जुळले होते. जिवाशिवाची भेट झाली होती. ‘‘भेटीत तुष्टता मोठी’’ हे अगदी खर होत. मी नव्यान आनंदाला सामोरी जात होते. आनंद लुटत होते. नव्यान स्वत:ला भेटत होते.

© सौ. मानसी काणे

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कप्पा  ☆ श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

☆ विविधा ☆ कप्पा  ☆ श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

जन्म: कोल्हापुर ९ ऑगस्ट १९६१.

शिक्षण: पदवीधर: शास्त्रशाखा, पदव्युतर : मनुष्यबळ संसाधन विकास.

वेगवेगळ्या औषधनिर्माण आस्थापनांमधे मनुष्यबळ  संसाधन विकास अधिकारी म्हणून ३४वर्षाचा अनुभव.

सध्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था मधे जाऊन  व्यक्तीमत्व विकास, वेळेचे नियोजन, मुलाखतीचे तंत्र, आयुष्यात  सुरक्षिततेचे महत्व इ.विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

शाळा- कॉलेजमध्ये सांस्कृतिक क्षेत्रात विशेषतः नाट्याभिनयामधे प्रावीण्य.  सध्या  बदलापूरमधे वास्तव्य. बदलापूर कलासंगम ह्या स्वतःच्या संस्थेमार्फत बालकलाकारांना भारतीय अभिजात कलामधे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मराठी साहित्यात विशेष अभिरूची.

☆ विविधा ☆ कप्पा  ☆ श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण

शाळेत कॉलेजमधे असताना वह्या,पुस्तके,प्रयोगवह्या, dissection box…खास डायरी हे सारं एकत्र ठेवणारा कपाटातली एक कप्पा….रोज हव्या त्याच विषयाची वही,पुस्तक  घेऊन शाळेत वा  कॉलेजला नेणे..बाकी सारं त्या कप्प्यात एकदम सुरक्षित…दोन तीन महिन्यातून एकदा तो विस्कळीत कप्पा पुन्हा आवरला जायचा….. एकाच कपाटात खाली-वरती असे एकमेकांचे कप्पे असले तरी खरंतर आपला कप्पा विस्कळीत करण्याचं काम ही आपलंच असायचं.

मोठी बहीण ग्रॅजूएट झाली….एक कप्पा रिकामा झाला. पण ती जागा तिच्या वाचनाच्या इतर पुस्तकांनी घेतली. दुसरी बहीण ही ग्रॅजूएट झाली पण पी.जी.च्या reference books नी ती जागा व्यापली. अस्मादिकांनी पदवी गळ्यात पाडून घेतली नि शिक्षणापासून सुटका करून घेतली नि कप्पा रिकामा करून टाकला आणि त्यात माझ्यासाठी अशा मराठी मधील वेगवेगळ्या नाटकांच्या संहितानी स्थान पटकावलं.

बंधूराजांचा कप्पा नेहमीच ड्रॉईंग पेपर, वेगवेगळ्या शिसपेन्सीली, खडूच्या रंगपेट्या, वॉटर कलर, कॅनवास पेंट,ऑईल पेंट… असल्या काहीच्या काही..मला अनाकलनीय गोष्टींनी खच्च भरलेला….तो काही कधी रिकामा झाला नाही.

मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर मराठी साहित्याचा संभाळ करण्याची जबाबदारी आम्हाला घ्यावी लागली. त्यात केशवसुत, बालकवी, वि.दा.करंदीकर,वसंत बापट,मंगेश पाडगावकर, पु.लं. देशपांडे, प्र.के.अत्रे, वि.स.खांडेकर कुसुमाग्रज, बा.भ.बोरकर, दुर्गाबाई भागवत या आणि बर्याच मराठी सारस्वतांच्या ओजस्वी लेखणीतून साकारलेल्या साहित्याचा सहभाग होता.

मी जरी सायन्स ग्रॅजूएट झालो तरी घरात असलेल्या या  अथांग मराठी साहित्य सागरात आजही  डूंबत राहिलो आहे. मूळातच, जीवशास्त्रात, प्रचंड गोडी असल्याने दूसर्या बहिणीच्या, किटकशास्त्राचेही खूप आकर्षण राहिले.

घरच्या अध्यात्मिक वातावरणामुळे सार्थ दासबोध,अभंग ज्ञानेश्वरी, इतर संतमहात्म्यांचे साहित्य तर वडिलांची वैद्यकीय क्षेत्रातील वाग्भट,चरकसंहिता, धूतपापेश्वर, medical dictionary अशी बरीच साहित्य संपदा होती (आजही जपली आहे.)

माझ्या नोकरीच्या निमित्ताने human resources वरील कित्येक संदर्भपुस्तकांची माझ्या कप्प्यात भर पडली. आज  माझ्या मुलाच्या आवडीनूसार नी व्यवसायानूसार हिंदी, इंग्रजी, मराठीतील नाट्य,चित्रपट, वगैरे संबंधीत,तसेच त्याच्या खास आवडीच्या उर्दू गझला, उमर खय्याम, गालिबसाहब, कैफी आझमी साहब यांच्या सह मराठी गझलकार कवी सुरेश भटांच्या साहित्याचा समावेश आहे.

थोडक्यात काय तर तीन पिढ्यांच्या वेगवेगळ्या साहित्यसंपदेने कपाटातील कप्पे आजही सजलेले आहेत .

कपाटातले कप्पे जसे भिन्न भिन्न पुस्तकांनी  भरलेले … तसेच मनातले,हृदयांतील कप्पेही आयुष्यात वेगवेगळ्या मार्गांवर,वळणावर भेटलेल्या व्यक्ती आणि वल्लीनी भरलेलंही आहे नि भारलेलं ही आहे..जन्मांला आल्यापासून अगदी बालक मंदीर, प्राथमीक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कॉलेज , नुकत्याच सरलेल्या क्षणापर्यंत जे जे कोणी मित्र,मैत्रिणी,सगे,सोयरे,हितचिंतक, काही प्रमाणात दुरावलेलेही हे सारे मनाच्या,हृदयाच्या कप्प्यात विसावलेले असतात.

जशी काही पुस्तकं आपल्याला आवडत नाहीत तरीही ती आपण कप्प्यात ठेऊन देतो तशा काही व्यक्ती आवडत नसल्या तरीही मनाच्या कप्प्यात एका कोपर्यातली जागा  पकडून बसतात. कालांतराने अशीच एखादी दुरावलेली  व्यक्ती पुनः आपल्या आयुष्यात येते नि दोघांचंही परिपक्व झालेलं मन एकमेकांना वाचतं नि मग आपण समजतो …

अरे त्यां पुस्तकासारखंच झालं…पूर्वी वाचलं तेव्हा कळलं नाही नि आता नीट कळलं?..म्हणजे फरक वाचण्यात होता  कि  समजण्यात??

कपाटातली कप्प्यातली विस्कळीत झालेली पुस्तकं व्यवस्थित करता येतात पण विस्कळीत झालेली नाती व्यवस्थित करणं मात्र खूप अवघडच!!!!

काही पुस्तकातील चांगल्या ओळी,विचार आपण आवडल्या नंतर लिहूनही ठेवतो नि स्मरणातही…तसंच चांगल्या व्यक्ती बद्दल आपण आपल्या मनात कोरून ठेवतो.

पुस्तकं खूप झाली.. तर एक कप्पा भरला कि दूसरा….एक कपाट भरलं कि दुसरं…..

आपले खूप मित्र,सवंगडी झाले अगदी…..अगणित झाले तरी मनाचा,हृदयाचा कप्पा तेवढाच असतो. तरीही सारे जण त्यात सामावतात. तिथं कधीच दाटीवाटीनी सारे बसत नाहीत मुंबईच्या लोकलच्या गर्दीसारखे…….

सगळीच पुस्तक सतत आपल्या बरोबर नसतात………

मिळवलेला पैसा तो ही कायमच आपल्या सोबत असतो असं नाही….थोडा घरी…थोडा बॅंकेत….थोडा खिशात…..पण मनात नि हृदयांतील सखे पावलोपावली आपल्या सोबत असतात…..म्हणूनच….कपाट किती मोठं असावं,खिसा किंवा बॅंक किती मोठी असावी याला मर्यादा आहेत, पण मन आणि  हृदय किती मोठं असावं याला मात्र मर्यादा नाही.

 

© राजीव पुरुषोत्तम दिवाण

बदलापूर(ठाणे)

फोन:९६१९४२५१५१

वॉट्स ऍप :८२०८५६७०४०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बकुळ ☆ सौ.दीपा पुजारी

ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन’?

 

☆ विविधा ☆ बकुळ ☆ सौ.दीपा पुजारी 

ते एक बकुळीचे झाड.

लहानपणीचं

छे! झाड कसलं? तो तर आमचा कल्पवृक्ष!!

किती आठवणी,किती रेशीमबंध विसावलेत   याच्या सावलीत.

अल्लड बालपण,खेळकर किशोरपण आणि हो  चैतन्यानं भारलेलं तरुण मनही यानंच जाणलं.

किती आनंद दिला या बकुळीनं!

किती गोष्टी शिकवल्या त्या गर्द हिरव्या पानपिसार्‍यानं.

रोज संध्याकाळी आई आम्हांला घेऊन बकुळीखाली जायची.माझ्या हातात सुईत ओवलेला दोरा असायचा. खाली पडलेली बकुळीची फुलं दोर्‍यात ओवली जायची.फुलाच्या सूक्ष्म छिद्रातून सुई ओवणं हे त्या वयात खूपच आव्हानात्मक होतं. एकाग्रता,कोऑर्डिनेशन, संयम आणि इतर अनेक.

या झाडानं कायकाय नाही शिकवलं?किंबहुना

बकुळीच्या रुपात आईनं शिकवलं. फारसं न बोलता, सुवासाची मुक्त उधळण करत बोलणार्‍या बकुळीनं मुग्ध संवाद शिकवला. नाजूक रेघांसारख्या पाकळ्यांनी संयोजनातून नियोजन करण्याचं कसब सांगितलं. वर्षभर हिरवी सावली देताना सोबत्यांना सावली  देणारं  शांतचित्त दिलं . वार्‍याच्या झोताबरोबर सलगी करून नागमोडी कड असलेल्या पानांनी सळसळणारी हास्यलहर चेहर्‍यावर आणण्याचं कौशल्य दिलं.

एवढंसं चिमुरडं,सावळंस,नाजूक  रुप.कुठलाही आकर्षकपणा नसतांनाही सगळ्यांना वेड लावण्याचं सामर्थ्य त्याच्याकडं आहे . सुकलेली बकुळही आपला सुहास उधळतच राहते. या एव्हढ्याश्या फुलात एव्हढं सामर्थ्य कुठून येतं? जगण्याची सहज सुंदर अभिव्यक्ती आली कुठून?

केवळ स्वत:जगणं नाही तर;आनंदकंदाची उधळण करत जगणं,जगण्याचाही सोहळा व्हावा  असं जगणं !!! निसर्गानं आपल्या अवतींभोवती खूप गोष्टी पेरून ठेवल्या आहेत.आपण  यातून काय व किती घेतो यावर आपलं आयुष्य अवलंबून आहे. या सिमेंटचे जंगल निर्माण करण्याचा अट्टाहास असाच सुरु राहिला तर?मुलांना बागेत हुंदडण्याचा,मातीत खेळण्यातला आनंद कसा मिळणार ? मित्रांबरोबर खेळण्याची संधी मिळणार नाही का?ऑनलाइन शाळेत खडू फळ्याशी गट्टी कशी होणार ? खिडकितून दाखवायला चिमण्याच नाही राहिल्या तर काऊचिऊची गोष्ट कशी सांगावी या चिमुरड्यांना? मित्रांबरोबर पतंग उडवताना वार्‍यावर डोलणारं गवतफुलात भान विसरेल अशा रंगकळा असतात; त्या कशा दिसतील या बालचमूला? वार्‍याची पावरी वाजवणारं बांबूच बन कसं दाखवायचं या नव्या पिढीला?

डोंगर दर्‍या काय फक्त टी. व्ही वरच बघायच्या या मावळ्यांनी?

आज आलेला  कोरोनाचा रोना थांबेलही. आकाश स्वच्छ होइल ही!तरीही आपण खडबडून जागं होणं अत्यंत गरजेच आहे. जुन्याच विचारांची

नव्यानं पेरणी करायला हवी. निसर्गात रमण्याचं,निसर्गात खेळण्याचं, निसर्गासवे वाढण्याचं शिक्षण घ्यायला हवं . नाहीतर . . . .

“घनदाट इमारतींच्या

अल्याड वा पल्याड

थकलेल्या चांदोबाला

मिळेल का कडुलिंबाच झाड?”

या ओळींचा प्रत्यय यायला वेळ लागणार नाही. चांदोमामाच्या गोष्टी शिवायच ही पिढी मोठी झाली तर? ही मुलं स्मार्ट असतील,बुध्दिमान असतील पण सिमेंटचे जंगल यांना भावना देईल का? आजूबाजूला निसर्गाच्या ऐवजी गॅझेटस् असतील तर माणुसकी संपूनच जाईल.म्हणूनच

अंगण आणि तुळशी वृंदावनाशी असलेलं नातं जपलं पाहिजे .सावळी बकुळ गंधीत होऊन बहरली पाहिजे .

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  बंद दरवाजा ☆ डाॅ.मेधा फणसळकर

डाॅ. मेधा फणसळकर

संक्षिप्त परिचय 

माणगाव, सिंधुदुर्ग येथे वास्तव्य आणि वैद्यकीय व्यवसाय.

लेखन व वाचनाची आवड. अनेक नियतकालिके, मासिके, दिवाळीअंक यामधून वेगवेगळ्या विषयांवर लेखन! ललीतलेखन हा अधिक आवडता लेखनप्रकार! विनोदी लेखनाची आवड! काही कविता, कथा आणि व्यक्तीचित्रणे वेगवेगळ्या अंकातून, इ- अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत.

☆ विविधा ☆  बंद दरवाजा ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆

दोन दिवस या माझ्या स्मार्ट भ्रमणध्वनीने हैराण केले बाई !मी आपली सारखी उचलून उचलून त्याला अंजारुन गोंजारुन इंटरनेटशी सख्य करायला सांगत होते, तो बिचारा माझा सोनूला पण  दहा दहा वेळा विनवणी करुन त्याला आपल्या कवेत घ्यायला विनवत होता.पण आज भारत संचार निगमच्या नेटमहाराजानी संप पुकारला होता.बाकीचे नेटकर पण जरा तोऱ्यात असल्याने आखडून दाखवत होते. त्यामुळे माझे कायप्पा (WAP) आणि मुखपुस्तक (fb) पण बिचारे हवालदिल झाले होते. त्यांचे सर्वच दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून मैत्रिणींबरोबर चिवचिवाट, हळूच एकमेकींना private मेसेज टाकून दुसऱ्या एखादीबद्दल गॉसिप करायला न मिळाल्याने आणि सख्यांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला न मिळाल्याने माझ्या जीवाची नुसती घालमेल होत होती. रोज सकाळी पुन्हा पुन्हा मी त्या भारत संचार ची विनवणी करत होते, पण पठ्ठ्या काही दाद देत नव्हता. शेवटी मनावर दगड ठेवून त्या माझ्या भ्रमणसोन्याला हातातून बाजूला ठेवले आणि ‛आलीया भोगासी’ असे म्हणून कणिक तिंबायला घेतली. सगळा राग तिच्यावर असा काढला की प्रत्येक पोळी तव्यावर टम्म फुगली. त्यावर मुलांचे बाबा म्हणतात कसे, “ चला रे मुलांनो, पट्कन जेवायला बसा. आज आपल्यावर कायप्पा आणि मुखपुस्तकाने कृपा केलीय. गरगरीत पोळी आणि झणझणीत रस्सा खाऊन टाका बरे! परत कधी नशिबात असेल सांगता येणार नाही. ”मला जरा रागच आला. त्याच रागात दणादणा भांडी घासली, खसाखसा ओटा पुसला आणि लख्ख केला. ती टमटमीत पोळी आणि झणझणीत रस्सा रागारागाने गिळला. मग बराच वेळ एकट्या पडलेल्या त्या माझ्या भ्रमणसोन्याला पुन्हा प्रेमाने हातात घेतले. चांगले अंजारले-गोंजारले आणि नेटमहाराजांची आराधना करायला सुरुवात केली .

श्वास रोखून बघत राहिले तर काय आश्चर्य? चक्क नेटमहाराज प्रसन्न झाले आणि  सर्व बंद दरवाजे उघडले गेले आणि कायप्पा धबधब्यासारखा कोसळू लागला. मुखपुस्तकाच्या संदेशानी इनबॉक्स भरुन गेला आणि त्या वर्षावात मी चिंबचिंब भिजून गेले.

 

©  डाॅ. मेधा फणसळकर

9423019961

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  गारवा ☆ सौ. अंजली गोखले

☆ विविधा ☆  गारवा ☆ सौ. अंजली गोखले ☆

रण रण त ऊन! मे महिन्याचा रखरखीत उन्हाळा! धरती तप्त ! उन्हामध्ये आंबा घाटामध्ये, एक पांढरी शुभ्र आली शान गाडी थांबली. गाडी मधून सहा सात बहिण भाऊ उतरले अन् त्यांची मनं जणू काही फुलपाखरं बनली . घाटामधल्या वृक्षांनी आपली सळसळ करून त्यांचं स्वागत केलं . हिरवी काळी टपोरी करवंदं म्हणाली,” या रेया ‘ बाळांनो, आम्ही तुमचीच वाट पहात होतो . तुमच्याच साठी आम्ही या उन्हातही आमच्या तला गोड रस टिकवून ठेवलाय”.

बऱ्याच वर्षांनी एकत्र आलेल्या या बहिण – भावंडांना खूप आनंद झाला होता . आंबा घाटातला हिरवागार निसर्गही त्यांच्याच साठी फुलला होता . सगळीकडे रखरखत ऊन असलं, तरी झाडाच्या मुळांनी खोलवर जाऊन आपल्या खोडासाठी, पानां साठी, पाणी आणलं होतं . पानाचा रसरशीतपणा, तजेलदार पणा टिकवून ठेवला होता . मध्येच एखाद्या झाडाला, नाजूक नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचे झुबके लागले होते . वाऱ्या बरोबर डोलत डोलत, ते झुबके यांचे स्वागत करत होते . अंतरा अंतरावर लाल चुटुक गुलमोहोर बहरला होता .

अशा या रम्य आणि अवखळ निसर्गाच्या सानिध्यात ही भावंडं आपली वय विसरली, आपल्या कामाचा ताण विसरली, ऑफीस मधल्या कामाचे डोंगर विसरली, पैशाचे व्यवहार विसरली आणि आपल्या मुलांच्या वयाएवढी पुनः एकदा लहान झाली . आपल्या बालपणात रमली.

अधून मधून एखाद्याचा मोबाईल वास्तवा मध्ये आणण्याचा प्रयत्न करत होता पण आज मोबाईल वरुनही मस्ती तच उत्तर जात होते . उन्हामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आनंदाचं चांदणं बरसत होतं . आपल्या नाजूक, रंगबेरंगी फुलपाखरी पंखांनी हे सगळे घाटातमध्ये इकडून तिकडे, तिकडून इकडे छानपैकी फिरत होते मधूनच एखादा क्षण कॅमेऱ्यात टिपला जात होता .

आज कुणाला कुणाकडून का S ही नको होत . निखळ आनंदाचा पाऊसच जणूकाही बरसत होता.

आंबा घाटाचा हा अविस्मरणीय दौरा, पन्हाळ्यावर झेललेलं गार गार वारं, हेच यांना उरलेले वर्षातले दिवस मजेत घालवायला पुरणार होतं . आनंदाचा हा ठेवा, सगळ्यांनी भरभरून मनातल्या कुपीमध्ये जपून ठेवला.

खरच, भाऊ बहिणीचं प्रेम किती निखळ, निरागस आणि पवित्र असतं. साठीनंतर भेटले तरी सगळे बालपणात रमतात. त्या गोड आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलतात.” तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा” म्हणत डुलतात . त्यांच्याकडे आठवणींच्या रेशमाच्या मऊमऊ लडी असतात, शिंपल्यातल्या मोत्यांप्रमाणे दुर्मिळ प्रेमाचे क्षण असतात , रमणीय सुखांचे तुषार असतात आणि धो धो पावसा प्रमाणे धोधो प्रसंग असतात. कधीतरी अशी मैफल जमली की आनंदाचा शिडकावा होत असतो, हास्यांची बहार फुलत असते . या स्मृतिगंधाच्या फुलांमुळेच बहिण भावाचे नाते पक्के विणले जाते आणि किती जरी एकमेकांपासून दूर गेले तरी या रेशिम गाठी घट्ट च रहातात . त्याचमुळे उन्हाळ्यातही त्या सर्वाना प्रेमाचा गारवा अनुभवता येतो आणि आपुलकीची ऊब ही मिळते.

 

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वृक्षसखी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

संक्षिप्त परिचय

शिक्षण- बी. एस सी. (जियोलॉजी)

साहित्य – ‘अकल्पित’ कथासंग्रह आणि ‘श्रावणसर’ कविता संग्रह प्रकाशित.

विजयन्त, विपुलश्री,दै.केसरी, सत्यवेध, उत्तमकथा, ऋतुपर्ण, आभाळमाया यासारख्या मासिके, दिवाळी अंकात,पेपरमधून कथा, कविता, विविध लेख प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्र सेविका समितीच्या हस्तलिखितात ६-७ वर्षे कथा , कविता लेखन समाविष्ट. अनेक आनलाईन संमेलनात कविता वाचन केले.

सांगली आकाशवाणी वरून अनेक कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण.

‘ओवी ते अंगाई’ या सांस्कृतिक कार्यक्रमास लेखन सहाय्य व सादरीकरण.अंदाजे ७५ प्रयोग केले.

satsangdhara.net  या आध्यत्मिक साईटसाठी श्रीमत भागवत पुराण आणि श्रीदेवी भागवत या ग्रंथाचे भावार्थ वाचन केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात(सांगली) कविता सादरीकरण आणि संमेलनाच्या कथासंग्रहात कथा प्रकाशित.

साहित्य भूषण (कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक), साहित्य भूषण(नाशिक) चा ‘गोदामाता’ पुरस्कार’ , कथालेखन,कथावाचन, चारोळी पुरस्कार.

विविधा: वृक्षसखी – सौ.ज्योत्स्ना तानवडे ?

“वसुधा, खूप छान वाटलं बघ तुला अशी पारावर निवांत बसलेली पाहून.अशीच आनंदात रहा. अग,तुझ्यामुळेच माझे आजचे हे रूप आहे. वसुधाने चमकून वर पाहिले. तिच्या डोक्यावरचा गुलमोहर बोलत होता.

“अगदी खरे आहे हे वसुधा,” शेजारचा बहावा बोलला.वसुधा त्याला निरखू लागली. पिवळ्या घोसांनी पूर्ण लगडला होता.ती नाजूक झुंबरे वाऱ्यावर डोलत होती.

तो म्हणत होता,”आमच्या दोघांचे सुरवातीचे रूप आठवते ना? मोठ्या धुमधडाक्यात या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण झाले. या दोन खड्ड्यात माझी आणि या गुलमोहराची स्थापना झाली. हार-तुरे- फोटो- भाषणे- गर्दी सगळे सोपस्कार झाले.पण पुढे काय? पुढे कोणी आमच्याकडे फिरकले सुध्दा नाही.आमच्या बाजूच्या रोपांनी सुकून माना टाकल्या. अधून-मधून पडणाऱ्या पावसाने आम्ही कशीबशी तग धरून होतो. तेव्हा तू आमच्या मदतीला धावलीस. आमची किती काळजी घेतलीस. म्हणूनच आज आम्हाला दोघांनाही हे देखणे रूप प्राप्त झाले आहे.”

वसुधाला सर्व आठवत होते. मुळातच वसुधा म्हणजे झाडाझुडपांची, फळाफुलांची प्रचंड आवड असणारी एक निसर्ग वेडी होती. तिने आपल्या बंगल्याच्या दारापुढची बाग लहान मुलाला जपावे तशी सांभाळलेली होती. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे,फळझाडे नीट आखणी करून लावली होती. योग्य खत-पाणी, वेळच्यावेळी छाटणी करून त्यांना छान आकार दिला होता. ती बागेला खूप जपत असे. त्यातच वृक्षारोपणात गेटजवळ लावलेल्या दोन रोपांनी तिचे लक्ष वेधून घेतले. त्यांची परवड बघून तिला खूप वाईट वाटले.ती त्या रोपांची पण आता नीट काळजी घेऊ लागली. हळूहळू जोम धरून त्यांनाही बाळसे येऊ लागले.

वसुधाने घरावरील छतावर पडून वाहणारे पावसाचे पाणी एका मोठ्या टाकीत साठवायला सुरुवात केली.त्यातून वाहणारे जास्तीचे पाणी बोअर जवळ पाझरखड्डा  करून त्यात  सोडले.बागेच्या पाण्याची सोय झाली. बागेच्या एका कोपर्‍यात खड्डा काढून त्यात घरातला ओला कचरा, बागेतले गवत, पालापाचोळा टाकायला सुरुवात केली. छान खत तयार होऊ लागले. घरचे खतपाणी मिळाल्याने झाडे फुलाफळांनी लगडली. दारापुढची गुलमोहर बहवा जोडी सुद्धा लाल पिवळ्या फुलांनी बहरून रंगांची उधळण करू लागली. वसुधाने या दोन्ही झाडांना छोटे-छोटे पार बांधले. येणारे-जाणारे त्यावर विसावू लागले.वसुधाच्या बागेत वेगवेगळे पक्षी, फुलपाखरे भिरभिरू लागली.

वसुधाला निसर्गाची खूप ओढ होती.त्यामुळे वायु प्रदूषण, जल प्रदूषण, वृक्षतोड, लागणारे वणवे यांच्या बातम्यांनी तिला खूप वाईट वाटे. निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो मग आपण त्याची तितकीच जपणूक केली पाहिजे. प्रत्येकाने घराबरोबरच  घराबाहेरचा परिसर स्वच्छ राखला पाहिजे. आपल्या मुला-बाळां प्रमाणेच झाडांची, नदी-नाल्यांची, प्राणिमात्रांची काळजी घेतली पाहिजे. ते सुद्धा आपले जिवलग आहेत अशी तिची भावना होती. तिच्या घरा पुढील रस्ता वृक्षतोडीमुळे उघडा बोडका रूक्ष झाला होता.त्यामुळेच तिच्या घरापुढची सुंदर फुललेली बाग एखाद्या ‘ओअॅसिस’ सारखी होती. येणाऱ्या-जाणाऱ्याचे पाय आपोआप तिथे रेंगाळत. कौतुकाने बाग न्याहाळत. लाल-पिवळ्या वैभवाने बहरलेली दारापुढची जोडगोळी तर रस्त्याचे आकर्षण बनून गेली होती.

अशी ही वृक्षवेडी वसुधा.बागेत छान रमायची. आपले प्रत्येक सुखदुःख त्या झाडांशी बोलायची. त्यांचा सहवास तिला मोठी सोबत वाटायची.’ वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हे प्रत्यक्षात जगणाऱ्या वसुधाचा ध्यास प्रत्येकाला लागायला हवा. आता तर पाऊसही पडतो आहे. ओली माती नवीन रोपांच्या प्रतीक्षेत आहे. मग काय मंडळी,  कामाला लागू या ना !

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पंख ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ पंख ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर ☆

माझ्या मनात एक विचार आला असे वाटले की आज मला जर पंख असते तर?? मी छान नभाची सैर करून आले असते. तोडल्या असत्या ह्या सगळया साखळ्या आणि उंच भरारी घेतली असती आकाशात.

ह्या माझ्या विचारांना खिजवायला की काय कोण जाणे माझ्या समोरून एक मस्त फुलपाखरू उडत गेल, आपल्याच दुनियेत जणू हरवले होते . रंगबिरंगी त्यांचे रंगीत पंख बघून अगदी हेवाच वाटला मला त्यांचा. असे वाटू लागते की आपल्याला पण हवे होते असे नाजूक सुंदर पंख. मग आपण ही जाऊ शकलो असतो कुठे ही क्षणभरात. मस्त फुलांच्या परागांवर बसुन मध चाखला असता आणि मनसोक्त बागडलो ही असतो हा विचार मनातून जात नाही तोवर,

पक्ष्यांचा थवा उंच नभात उडताना पहिला. अगदी छान आपल्याच धुंदीत मस्त उडत होते सारे. मग मला वाटले जर आपण पक्षी झालो असतो तर कित्ती छान झाले असते. आसमंतात निळ्या आकाशात उंच भरारी घेतली असती. वरती जाऊन हिरव्यागार शालू मधे, नटलेली धरती पहिली असती. मस्त डोंगरावर बसुन वाऱ्याशी हितगुज केले असते.छान झाडाच्या फांदी वर बसुन उंच झोके घेतले असते.

मनानी झोके घेतच होते की तो वर एकदम जोरात आवाज ऐकू आला, वर पाहिले तर भव्य वीमान दिसले. ते तर जवळ जवळ गगनाला भिडले होते. अस वाटले की हातच लावते आहे आकाशाला.

मग काय माझ्या मनात आले, आपण विमानच झालो असतो तर?? मनात येईल तेव्हा रात्रीच्या वेळी चंद्र चांदण्यांनांची भेट घेता येईल.

आता मात्र स्वतः वरच हसू आले असे वाटले की पंख नसताना पण आपले मन किती ठिकाणी उंच भरारी घेऊन आले.

फुलपाखरू होऊन फुलांमधला मध चाखला, तर पक्षी बनुन झाडावर बसुन उंच झोके घेतले, विमान बनून आकाशातले तारे ही तोडले.

आता मला सांगा नक्की उंच भरारी घेतली तरी कोणी??

फुलपाखरांनी, पक्ष्यांनी, विमानांनी, की माणसाच्या मनानी.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सुश्री श्रेया सुनील दिवेकर 

मो – 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवनदान ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

☆ विविधा ☆ जीवनदान ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

कुठून आली, कशी आली आहे कोण जाणे, पण एक चांगली मोठी झालेली मांजरी घरात आली.सगळ्यांच्या मागे मागे करायला लागली.जणू काय ते आमच्याच घरातली आहे की काय असे वाटावे.रुपाने अगदी सुंदर.वा वा म्हणण्यासारखी.पिवळा, पांढरा, काळा सगळे रंग तिच्यामध्ये आलेले होते.तिचं नामकरण झालं “सुंदरी”.

आता ती आमच्या घरातली झाली.आठ-दहा दिवसात तिचं पोट मोठे दिसायला लागलं.आता हिला पिल्लू होणार याची खात्री झाली.यथावकाश एके सकाळी माळ्यावरील अडगळीतून खाली आली.पोट दिसत नव्हते.वरती धुळीत पिल्ले असणार हे पक्क.सुंदरी साठी एक मोठ्या खोक्यात अगदी मऊ अंथरूण तयार केले.अडचणीतून अलगत पिल्लांना उचलून खोक्यात ठेवून तो खोका आमच्या बेडरूम मध्ये अगदी सुरक्षित ठेवला.सुंदरीची तिन्ही पिल्ले वेगवेगळ्या रंगाची नाजूक आणि छान होती.सुंदरीला खोके पसंत पडले.त्यामुळे पिलांसह त्यात ती छान राहत होती.तिच्यासाठी खोलीचे दार किलकिले ठेवत होतो.दहा दिवसांनी पिल्लांचे डोळे उघडायला लागले.आता त्यांचं रुपडं आणखीनच गोजिरवाणा दिसायला लागलं.एके दिवशी सकाळी उठून पहातो तो पिल्ले आणि सुंदरी सगळेच गायब!खोकं मोकळं पाहून धस्स झालं.दुपारी खाण्यासाठी घरात आली.परत जाताना कोठे जाते लक्ष ठेवलं.जवळच असलेल्या हॉस्पिटलच्या गॅलरी च्या बाहेर अडचणीत ती पिलांना घेऊन गेली होती.एक पिल्लू पत्र्याच्या खोल अडचणीत अडकले होते.ते अखंड ओरडत होते.आणि सुंदरी पावसात पत्र्यावर बसून आक्रोश करत होती.बाकी दोन दोन पिल्लांकडे पुन्हा पुन्हा ही जात होती.खाण्यासाठी घरी येत होती.तिच्या पत्र्या कडच्या काकुळतीच्या येरझाऱ्या आता मात्र पहावत नव्हत्या.अडकलेल्या पिलासाठी ती कासावीस झाली होती.पिल्लु ही भुकेने व्याकुळ झाली होते.राहुल आणि स्वप्नील दोघेही  पत्र्यावर चढले.खूप प्रयत्न केला पण पिलापर्यंत हात पोचत नव्हता.सुंदरीची घालमेल बघवत नव्हती डोळ्याने ती काकुळतीला येऊन जणू सांगत होती “माझ्या बाळाला लवकर काढा रेss”.रायगडावरून बाळासाठी जीव टाकलेल्या हिरकणीची ची आठवण झाली.काय करावे ते काही सुचत नव्हते संध्याकाळ व्हायला लागली.रात्र झाली तर अंधारात काहीच करता येणार नव्हते.पिलाला लवकर काढले तर ठीक नाहीतर ते मरणार असे वाटायला लागले.गडबड केली.पत्रा काढण्यासाठी डॉक्टरांची ची परवानगी घेतली.नट बोल्ट काढून पत्रा सरकवला पिल्लू बारीक झाले होते.जणू नजरेने काकुळतीने “मला माझ्या आई कडे पोचवा” म्हणत होते. सुंदरीची त्याला भेटण्याची गडबड चालू झाली.पिलाला घरात आणले.तिला आपल्या पिलाला किती चाटू आणि किती नको असे झाले होते.भुकेला जीव आईला चुपूचुपू प्यायला लागलि.एक जीव वाचवला याचा सर्वांना आनंद झाला.जीवदान मिळाले पिलाला बाकी दोन पिल्लांनाही घरात आणले.

तीनही पिल्ले सुंदरी सह मजेत आनंदात रहायला लागली.त्यांचे खेळ अगदी बघत रहावेत असे.कुस्तीचे सर्व प्रकारचे डाव जणू! दोन पिल्ले अगदी जड मनाने चांगल्या घरी दिली.जीवदान मिळालेले पिल्लू तिचे निरर्थक नाव ‘टिल्ली’.ते मात्र आमच्याच घरात सुंदरी बरोबर आणि आमच्या दोन कुत्र्यांबरोबर खेळण्यात दंग असते.मजेत आणि खुषीत आहे.त्याच्याकडे पाहताना त्याला जीवदान दिल्याचे समाधान आणि आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही.सुंदरी आणि टिल्ली दोघांचेही ही चेहरे आणि डोळे आमच्याशी बोलतात “गॉड ब्लेस यु”.

 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावर रे…! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

संक्षिप परिचय 

युनियन बॅंक ऑफ़ इंडिया मधून चीफ मॅनेजर पदावरुन निवृत्त. लेखन हा मनापासून जोपासलेला व्यासंग. कथा, नाट्य ललित लेखन. स्वत:च्या कथांचे कथाकथन.

तीन कथासंग्रह प्रकाशित.अनेक कथा कन्नडमधे भाषांतरीत.कथांना अनेक लेखनपुरस्कार.विविध एकांकिका,नाटकांना नाट्यलेखन पुरस्कार व प्रयोगाना वैयक्तिक व सांघिक पुरस्कार.

☆ विविधा ☆ सावर रे…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

सावर रे…!  अधीरता ही एक मनोवस्था.

तान्हया वयात ऐकण्यापाहण्यातून बाळ शिकत असते.सगळं शिकायची,हाताळून पहायची,परिणामांचा अंदाजच नसल्याने तेजाळ ज्योतीलाही बोट लावून पहाण्याची अस़ोशी

हे सगळं या अधीरतेपोटीच निर्माण झालेलं असतं.ती अधीरता आतुर,उत्सुक,उत्कंठित,अशा सकारात्मक अर्थछटा ल्यालेली असल्याने घरच्या मोठ्यांच्या कौतुकाचाच विषय असते.

त्या वयातले अधीरतेपोटी केले जाणारे हट्टही बालहट्ट म्हणून हौसेने पुरवले जात असतात. तसेच या अधीरतेमुळे बाळाला इजा होऊ नये म्हणून एरवी लाड करणारी घरची वडिलधारी माणसे बाळाची निगराणीही करीत असतात.

वय वाढत जातं तसं ही निगराणी स्वत:च स्वत: करणे अपेक्षित असते. कारण अधीरता ही  या वयातही एक मनोवस्था असली, तरी तिच्या अर्थछटा बदललेल्या असतात. पूर्वीची उत्सुकता आता उतावीळणा ठरायची शक्यता असते. बेचैनी,तहानलेला,भुकेला अशा अर्थछटाही त्यात मिसळलेल्या असतात.अशावेळी केवळ उत्सुकता, उतावीळपणाने घेतलेले निर्णय अडचणीत आणायला निमित्त ठरु शकतात.अधीरतेतला अविचारी उतावीळपणा कमी करण्यासाठी समतोल विचारच बालपणातल्या घरच्या मोठ्यानी केलेल्या निगराणीची जबाबदारी तेवढयाच आत्मियतेने स्विकारणारा एकमेव पर्याय असतात.एवढा समंजसपणा असेल तर मात्र मनातली अधीरता वैचारीकतेचं अधिष्ठान लाभल्यामुळे भरकटणारी नसते.हुरहूर,उत्सुकता,क्षणिक अस्वस्थता,ओढ,या सगळ्या अधीरतेच्या सावल्या मग मनाला काळवंडून टाकणार्या अंधार्या सावल्या नव्हे तर त्या त्या क्षणी हळूवार मायेने सावरणार्या सांजसावल्या होऊन सोबत करतात.अविचारी उतावीळ अधीरतेने घेतलेले निर्णय संकटांच्या गर्तेत लोटून अख्खं आयुष्य उध्वस्त करणारे ठरल्याची असंख्य उदाहरणं जशी आजुबाजूला आपण पहातो,तशीच जीवघेण्या संकटातही खंबीर राहून प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणारी धीरोदात्त माणसंही आपल्या बघण्यात असतात.

अधीरतेच्या लाटेत वहावत जायचं की अधीरतेला संयमाने भरकटण्यापासून रोखायचं हे ज्याच्या त्याच्या वैचारीक परिपक्वतेवर अवलंबून असते हे ओघाने आलेच.

© श्री अरविंद लिमये

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print