मराठी साहित्य – विविधा ☆ आजच्या विदयार्थ्यांसमोरील आदर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ☆ प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

☆ विविधा ☆ आजच्या विदयार्थ्यांसमोरील आदर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ☆ प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे ☆ 

(14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956)

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील विदयार्थी काळ हा अतिशय महत्वाचा असतो. या काळात आपण जे शिकतो जे अनुभवतो, ज्या प्रेरणा आपल्याला मिळतात त्याचा उपयोग आपल्या पुढील आयुष्यात  होत असतो. अशा  काळात आपल्या समोर आदर्श असणे हे आवश्यक असते. विदयार्थ्यांसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, विद्याव्यासंग, सामाजिक, राष्ट्रीय कार्य, विदवत्ता,उत्तम आदर्श आहे. जगातील सर्वच विदयार्थ्यांच्या  समोर बाबासाहेब हे एक आदर्श आहेत.

१  विद्येचे महत्व

आजच्या काळात विद्येला  खूप महत्व आहे. त्यावर वेळ व पैसा मोठयाप्रमाणात खर्च केला जातो. विद्येबद्दल बाबासाहेबांचे  विचार हे क्रांतिकारी आहेत. बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्वाचे  साधन आहे. तुम्हाला जर  स्वतःला बदलायचे, समाजाला बदलवायचे असेल तर शिका. बाबासाहेब शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा असा संदेश देतात. विद्या हा मानवी जीवनाचा  पाया असून ते मानवाच्या सर्वांगीण विकासाचे  साधन आहे. बाबासाहेब म्हणतात  मी मोठा कसा झालो  असे जर मला कोणी विचारले तर मी सांगेन शिक्षणाच्या संस्काराने.  बाबासाहेबानी आपल्या  जीवनात शिक्षणाला  खूप महत्व  दिलेलं आहे. त्यासाठी अपार  मेहनत केलेली  आहे. ज्या प्रमाणे पोटात  अन्न नसेल तर व्यक्ति अशक्त होतो त्याचप्रमाणे जर शिक्षण  नसेल तर व्यक्ति लाचार होतो त्याचे जीवन पशुसम होते अशा अचूक व साध्या  सोप्या पद्धतीने त्यांनी शिक्षणाचे महत्व  पटवून दिले आहे. त्यामुळे  विदयार्थ्यांनी ही शिक्षणाचे महत्त्व ओळखुन  विद्या संपन्न करण्यासाठी झटलं पाहिजे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी ही अपार मेहनत, ध्येयनिष्ठा ठेवून विद्या मिळवली पाहिजे.

तुमच्याकडे विद्या असेल तरच तुम्हाला मान सन्मान मिळेल असा उपयोगी व विकासाचा मार्ग बाबासाहेब दाखवतात.

२ विद्येबरोबरच शील असले पाहिजे

नुसते विद्वान  होऊन उपयोग नाही तर विद्ये बरोबर विदयार्थ्यांच्या  अंगी शील असले पाहिजे, असे बाबासाहेब आवर्जून सांगतात.

शिकलेल्या लोकांमध्ये शील नसेल तर समाजाचा राष्ट्राचा नाश होईल मग नुसत्या शिक्षणाचा उपयोग काय? त्यामुळे विदयार्थ्यांनी विद्येबरोबरच शील ही जोपासले पाहिजे. शील म्हणजेच नीतिमत्ता चांगले वाईट समजणे, वाईटापासून  दूर राहणे. आपल्या  हातून चांगले कार्य कसे होईल हा विचार सदैव विदयार्थ्यांनी केला पाहिजे असा मोलाचा संदेश बाबासाहेब देतात. हा संदेश किती महत्वाचा आहे हे आपण आजूबाजूची  परिस्थिती पहिली की लक्षात  येते. व्यसन, वाईट संगत,अमली पदार्थ  सेवन, यात काही तरुण गुरफटलेले दिसून येतात त्यामुळे विदयार्थ्यांनी वाईट कृत्यापासून दूर राहून, वाचन, लेखन,गायन, वादन, चित्रकला, नृत्य,  क्रीडा, असे छंद जोपासले पाहिजेत.

शिकलो म्हणजे सर्व झाले असे नसून केवळ पदवी मिळवणे म्हणजेच शिक्षण  नव्हे तर विदयार्थ्यांनी रचनात्मक कार्य केले पाहिजे.

जे तो शिकणार  आहे त्याचा उपयोग केवळ आपल्यापुरता न होता  समाजहितासाठी  झाला पाहिजे असे ही बाबासाहेब  आवर्जून सांगतात.

३ अजन्म विद्यार्थी

बाबासाहेब हे अजन्म विद्यार्थी होते. रात्रभर जागून अखंड अठरा अठरा  तास ते अभ्यास  करीत असत. वाचन, लेखन  करीत असत. कोलंबीया विद्यापीठाने  knowledge of symbol ज्ञानाचे उपासक  म्हणून  त्यांचा गौरव केला आहे. विदयार्थी  भूमिका घेऊन सतत काहीतरी शिकत राहणे, एखाद्या विषयाचा  पाठपुरावा करणे, एखाद्या विषयाचा  खोलवर अभ्यास करणे, सतत वाचन करणे, लेखन करणे हे गुण बाबासाहेबांकडून  विदयार्थ्यांनी घेतले  पाहिजेत. विविध विषयावर अपार मेहनत घेऊन त्यांनी विविध ग्रंथ प्रकाशित केले आहेत. काहीवेळा आपण ही अर्धवट माहिती घेतो व तिलाच खरे मानून चालतो त्यामुळे अपुरे विद्यार्जन करून काही उपयोग नाही तर योग्य शिक्षण घेऊन आपली योग्यता सिद्ध केली पाहिजे. बाबासाहेबांचा हा मोलाचा संदेश  असून विद्या घेत असताना विदयार्थ्यांनी आपल्या अंगी कोणती कौशल्य आहेत याचा विचार करून आपले क्षेत्र  निवडले पाहिजे व त्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले पाहिजे. आता मला शिकण्याचा उपयोग नाही असे न म्हणता सतत शिकत राहिले पाहिजे. ते शिक्षण पुस्तकीच असेल असे नाही तर बऱ्याच नवीन गोष्टी, तंत्रज्ञान येत असते ते शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.कोरोना काळात या पूर्वी कधीही ज्याचा फारसा विचार केला नाही अशी ऑनलाईन शिक्षण पद्धती आपण शिकली त्यातील तंत्रे समजून उपयोगात आणली म्हणजे काहीतरी नवीन शिकण्याचा आपल्याला फायदाच झाला.

४  संघर्ष

बाबासाहेबाचा शैक्षणिक  प्रवास हा अतिशय खडतर असा होता. गरिबी, जातीय अवहेलना  अपमान, पुरेशी साधने  नसणे  परंतु अशा ही स्थितीत त्यानी आपली जिद्द सोडली नाही. आणि ज्या देशात त्यांना  अपमानकारक  वागणूक मिळाली त्याच  देशाची राज्यघटना  त्यांनी  लिहिली. हे सर्व घडू शकले  ते त्यांच्या  तील प्रबळ इच्छाशक्ती, ध्येयनिष्ठा, अपार  मेहनत करण्याची तयारी,चिकाटी, जिद्द  धाडसीपणा, स्वाभिमान, महत्वकांक्षा, यामुळे.

अपमानाला त्यांनी  मेहनतीने  उत्तर दिले. आणि विविध विषयातील 32  पदव्या मिळवल्या. यातून आपल्याला एक शिकवण  घेता येईल की एखाद्याकडे जिद्द असेल मेहनत  करण्याची तयारी असेल तर तो आपल्या कार्यात यशस्वी  होईलच. त्यामुळे आपण गरिबी, पुरेशी साधने नसणे अशा  गोष्टीचा विचार न करता त्यावर मात करून मला पुढे कसे जाता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करून आपले ध्येय गाठले पाहिजे.

५  पुस्तक प्रेमी, वाचन प्रेमी

विद्यार्थीदशेत असताना पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण आहे. पुस्तकांचा  उपयोग करूनच अभ्यास  करावा लागतो. वाचनामुळे आपल्या विचारात प्रगल्भता येते.

बाबासाहेबांचे पुस्तकांवर  प्रचंड  प्रेम  होते. पुस्तकांसाठी बंगला  बांधणारे एकमेव बाबासाहेब असतील. मुंबई दादर येथे त्यांनी राजगृह  नावाने खास पुस्तकासाठी घर बांधले होते. आजही तिथे आपणास ग्रंथ पहावयास  मिळतात. पुस्तक वाचण्यासाठी ते जेवायचे ही विसरून जातं असत.परदेशात  असताना वेळ वाया जावू नये म्हणून ते ग्रंथालयात चोरून पावाचे तुकडे खातअसत. इतके प्रेम त्यांचे पुस्तकांवर होते.

बाबासाहेब म्हणतात ज्ञानची भूक भागावी म्हणून  मी पोटाची भूक मारून अनेक ग्रंथ खरेदी केले आहेत. तुमच्याकडे जर दिन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या व एक रुपयाचे पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल आणि पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल. सहजसोप्या भाषेत बाबासाहेब आपल्याला पुस्तकांचे महत्व  सांगतात.त्याचे अनुकरण  आपण विद्यार्थी दशेपासूनच केले पाहिजे. जशी आपल्याला पुस्तके मिळतील तसा  संग्रह केला पाहिजे.

वाढदिवसाच्या निमित्त असो, या कोणीही आपल्या भेट देणार असो  अशावेळी  आपण पुस्तके देण्याची विनंती  केली पाहिजे. शालेय वयापासूनच वाचनाची  आवड जोपासली  पाहिजे व विविध  विषयावरची  पुस्तके वाचली पाहिजेत.वाचनालयाचे  सभासद  होऊन तेथील  पुस्तके वाचली पाहिजेत. वाचन करीत असताना  त्यातील महत्वाचे  मुद्दे आपल्या  वहीत उतरून घेण्याची सवय लावली पाहिजे. अशी सवय विदयार्थ्यांनी ठेवली तर पुढे तुम्हाला  याचा खूप चांगला उपयोग होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बावीस हजारापेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह होता.22हुन अधिक विविध विषयावरील संशोधनपर पुस्तके बाबासाहेबानी लिहिली आहेत.लोकांनी माझी अवहेलना  केली पण पुस्तकांनी मला ज्ञान  दिले. अशाप्रकारे विदयार्थ्यांनी ही आपला स्वतःचा  पुस्तक संग्रह करून त्याचा जास्तीजास्त उपयोग ज्ञान  मिळवण्यासाठी, समाजातील प्रश्न समजून घेण्यासाठी,विषयाचे  आकलन होण्यासाठी केला पाहिजे.

अशाप्रकारे विविध गुणांची खाण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले पाहिजे. विद्या, शील, संघर्ष, सतत शिकण्याचा ध्यास  वाचनप्रेम, पुस्तकांचा सहवास, विद्ववता जिद्द, चिकाटी स्वाभिमान, याचा आदर्श  आपण सर्व विदयार्थ्यांनी घेतला पाहिजे. कठोर परिश्रम करून उच्च शिक्षण घेतले पाहिजे व आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या उन्नतीसाठी तसेच समाजाच्या व राष्ट्राच्या  उन्नतीसाठी  केला पाहिजे. अशा या थोर महामानवाला कोटी कोटी प्रणाम.

ज्ञानवंत प्रज्ञासुर्य

करितों वंदन तुम्हा

उज्वल होवोत  दिशा

आदर्श तुमचा आम्हा

© प्रा. प्रदीप महादेव कासुर्डे

नवी मुंबई

7738436449

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चैत्र गुढीपाडवा ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

 ☆ विविधा ☆ चैत्र गुढीपाडवा ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

सोनपिवळ्या किरणांनी

आले नवीन वर्षे

नवं वर्षाचा हर्ष

मनोमनी दाटे. .!!

निसर्गाचा आदर करण्यासाठी मराठी महिन्यातला पहिला महिना

चैत्र — चैत्र महिना

चैत्र पाडवा… म्हणजेच गुढीपाडवा. मराठी नवीन वर्षातला पहिला सण. हिंदू कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात.. नवीन वर्ष, नवीन संकल्प. … चैत्र महिना म्हटला की आपल्या  डोळ्यासमोर येते ती झाडांना फुटलेली पालवी… गुढीपाडव्यापासून सुरु होणारे सण, चैत्र गौरीचे आगमन त्यासाठी अंगणामध्ये रेखाटलेलं सुंदर चैत्रांगण, राम नवमी, अक्षय्य तृतीया… दारावरती लावलेलं झेंडूच्या फुलांचं आंब्याच्या पानांचे तोरण, नवीन खरेदी, घरोघरी उभारलेली गुढी…  एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता वातावरणात असते.

तिच्या स्वागतासाठी अंगणात काढलेली रांगोळी चित्रे म्हणजेच चैत्रांगण..

फाल्गुनाचा निरोप घेत अलगद येऊ घातलेल्या चैत्राचं निर्सगाने केलेलं एक सुंदरस खुलं असं स्वागत. . निसर्गच नाही तर अवघं चराचर चैत्राचं स्वागत करायला उत्सुक असतं.

गीष्मऋतूतही वाळलेल्या झाडाला कोवळा कोंब फुटतो व बघता बघता हिरवाई सळसळते. कोवळ्या पालवीने भारावलेली झाडे वार्‍याचे बोट पकडून डोलू लागतात. रंगीबेरंगी फुले आनंदाने नाचू लागतात. पक्षांचा किलबिलाट सुरू होतो व तो आपल्या कानांना तृप्तीचे काही क्षण देऊन जातो. सृष्टीचा हा नवनिर्मितीचा काळ. .या नवनिर्मितीचे वसंतोत्सवात आगमन होते व सर्वत्र आनंदाची हर्षाची गुढी उभारली जाते..

चित्रा या नक्षत्रावरून वर्षातल्या या पहिल्या महिन्याला चैत्र असं संबोधलं जातं. हिंदू या पंचांगानुसार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. . अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो. या चैत्रापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतलं मानाचं पानं. म्हणजेच ही गुढी. .!!

ब्रम्हदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. गुढीपाडवा हे संकल्प शक्तीचे गुढत्व दर्शविते. “आमचे प्रत्येक पाऊल आमच्या समृद्धी करता आता पुढेच पडत राहील ”

असे प्रतिपदा सांगते म्हणून या दिवशी शुभसंकल्प केल्यास तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. याकरिताच सत्य संकल्पाची गुढीची मुहूर्तमेढ रोवायची असते. गुढी म्हणजे नावीन्य, स्वागतशीलता नवनिर्मितीची प्रेरणा उत्साह आनंद. …!!

चैत्र महिन्यांत जर आपण सभोवतालच्या सृष्टीचे अवलोकन केले तर असे लक्षात येत की, शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ, निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव पालवीने फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल ही कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सु-स्वराने लागलेली असते. निसर्गातल्या परिवर्तनाचा, नवे चैतन्याचे, नवे सृष्टीचे स्वागत दारी गुढी लावून करायचे हा पण त्या मागचा एक उद्देश आहे.

सुगंधी फुले जसं वातावरण सुगंधीत प्रफुल्लित करतात तसं प्रत्येकाच्याही आयुष्यात प्रेमाचा सुगंध मायेचा सुगंध असाच दरवळावा असं यातून सुचित होत असतं. .म्हणून नववर्षाच्या निमित्ताने आपण सर्वांनी नवकल्पनांच्या, नवविचारांच्या उत्तुंग अश्या गुढ्या उभारूया व मंगलमय संस्कृतीचं तोरण बांधूया. ..!

संस्कृतीच्या क्षितीजावर

उजळून आली

नवी पहाट. .!

क्षण मोलाचे

घेऊन आली

पुन्हा नव्याने आयुष्यात..!

क्षण ते सारे

वेचून घेऊ

नववर्षे आनंदे

साजरे करू. ..!!!

दरवर्षी आपण नव्या वर्षाचे स्वागत करतो. नव्या संकल्पना करतो. यंदा निसर्गाशी प्रतारणा न करता पर्यावरणपूरक वागण्याचा संकल्प करूया… निसर्ग प्राणी संपदा यांचे रक्षण केले तरच मानवजातीची आरोग्यदायी गुढी उभी करू शकू…

निसर्गातील बदल सुखावहपणे मानवाच्या समोर आल्हादकपणे ठेवणारा यंदाचा गुढीपाडवा सर्वांनाच आरोग्यसंपदेचं दान देणारा ठरो हीच मनोकामना… !!

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बसंत की बहार आई ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ बसंत की बहार आई ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

संक्रांत आली. तीळगूळ देता-घेता आणि गुळाची पोळी खाता खाता अंगात ऊब येत गेली. सक्रांत आली,  म्हणता म्हणता रथतसप्तमीही जवळ आली. रथसप्तमी येते पौष शुद्ध सप्तमीला. ही तिथी सूर्यपूजेची तिथी. माझ्या लहानपणी आजी,  आई, मामी अंगणात तीन दगडांची चूल करायच्या. चुलीवर मातीचं बुडकुलं ठेवायचं. त्यात भरून दूध घालायचं. खाली काटक्यांचा जाळ करायचा. मग ते दूध उतू जाऊ द्यायचं. तो सूर्याला दाखवलेला नैवेद्य असे. सजीव सृष्टी साकारण्यासाठी सूर्य हा महत्वाचा घटक. आता सूर्यदेव अधीक प्रखरतेने तापणार आणि थंडीला दूर पळवणार म्हणून हा त्याला नैवेद्य. अंगणात सूर्याचा रथ,  त्याचे सात घोडे वगैरे रांगोळीही काढली जायची.

लहानपणी पाठ केलेलं होतं,  वर्षाचे महिने बारा. चैत्र, वैशाख….. ते  माघ, फाल्गुन आणि वर्षाचे ऋतु सहा. वसंत,  ग्रीष्म,  वर्षा,  शरद,  हेमंत,  शिशीर. या पाठांतरात प्रत्येक ऋतुला दोन दोन महिने दिलेले. त्यात मार्गशीर्ष, पौष हे महिने हेमंताचे. हा ऋतू पानगळीचा. पुढचे माघ, फाल्गून हे महिने शिशिराचे. तोही थंडीचाच ऋतू मानला जायचा. ऊब आणि उष्णता वसंताबरोबर येणार. त्याचे आगमन चैत्र पाडव्याला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. आता हे सारं जितक्या काटेकोरपणे पाठ केलेलं होतं,  तितका काटेकोरपणा काही सृष्टीत घडताना प्रत्यक्षात दिसत नाही. साधारण रथसप्तमी सरली की थंडी कमी होऊ लागते. शिवरात्रीला ती आणखी कमी होते आणि होळीबरोबर तर ती पळूनच जाते. ‘होळी आली थंडी पळाली’, असंच लोक म्हणायचे. थंडी पळते पण त्याच्या आगे-मागे सृष्टीतही स्थित्यंतर घडू लागते.

साधारण माघापासूनच पानगळीने खराटा झालेल्या झाडांवर आधी हिरवी लव, नंतर कोवळी पालवी हसू,  खेळू,  नाचू लागते. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्यातून, गुजराथ,  मध्य प्रदेश,  राजस्थान इ. ठिकाणी लोक माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात आणि त्यांच्या दृष्टीने वसंताचे आगमनही तेव्हाच होते. ऋतूंचा सांधा जणू या महिन्यात बदलतो.

  ‘मिठी मातीला मारून    पाने ढाळितात आसू

   वर हासतात फुले     शाश्वताचं दिव्य हसू’

तेव्हापासूनच उमटणार्‍या वसंताच्या पाउलखुणा पुढे ठळक होत जातात. फाल्गुनात हे पुष्पवैभव परम उत्कर्षाला जाऊन पोचते. पळस,  पांगारा,  शेवरी फुलफुलून  येतात. त्यांच्या तजेलदार केशरी,  नारिंगी, लाल – गुलाबी रंगामुळे त्यांना जंगलातील अग्निशीखा असं म्हणतात. काही निष्पर्ण,  तर काही सपर्ण झाडांवरचा हा रंगोत्सव डोळ्यांवर जादू करतो. मग माणसेही रंगात न्हाऊन निघतात. त्यासाठीच तर संस्कृतीने होळी-रंगपंचमी यासारखे सण योजलेत. उत्तरेकडे पूर्वी पळसापासून रंग तयार करायचे. हे नैसर्गिक रंग पक्के पण हानीकारक मुळीच नसायचे. हे रंग एकमेकांवर उडवायचे. अनंद, उल्हासात निसर्गाच्या रंगोत्सवात सामील व्हायचं. उत्तरेकडे म्हंटली जाणारी फागू (फाल्गून) गीते वसंताचं स्वागत करणारी. सृष्टीने धारण केलेल्या नव्या रुपाची वर्णनं करणारी.

महाराष्ट्रात असं रंगात रंगणं होतं रंगपंचमीला. होळीत जुना कचरा जाळून परिसर स्वच्छ करायचा आणि रंगपंचमीला रंगात रंगून जायचं.

चैत्रात वसंत ऋतू एखाद्या सम्राटासारखा चराचरावर अधिराज्य गाजवतो. आता ऊन कडक होतं. वरून आग ओतली जातेय की काय असं वाटू लागतं. अशा वेळी पळस फुलांकडे पाहताना वाटतं,

`वणवा पेटला पेटला   पळसफुलांनी   पाकळ्यांवर झेलला.’

याच दिवसात जाई,  जुई,  मोगरा,  चमेली,  सायलीसारखी नाजूक फुले वेलींवर, झुडुपांवर ऊतऊतून येतात. वाटतं,

‘किती आवेग फुलांचे    वेल हरखून जाते.

काया कोमल तरीही     उभ्या उन्हात जाळते.’

या काळात उन्हाच्या झळांनी देह-मनाची काहिली काहिली होते पण वार्‍याच्या झुळुकीबरोबर येणारी सुगंधी लकेर सारं निववून, शांतवून जाते. वर्षभर दुर्लक्षित असलेला बहावा आपल्या अंगावर सोनमाळा धारण करत,  येणार्‍या-जाणार्‍याचे लक्ष वेधून घेतो.

‘किती कशा भाजतात    उन्हाळ्याच्या उष्ण झळा

परि झुलतात संथ      बहाव्याच्या फुलमाळा’

बघता बघता वैशाख सरत येतो. आपले पुष्पवैभव आवरून आणि सृष्टीचे आधिराज्य ग्रिष्माकडे सोपवून वसंत निघून जातो. फुले मातीत मिसळली आहेत खरी,  पण त्यांचं शाश्वताचं हासू काही लोपलेलं नाही. ते फळांच्या रसातून हसतेच आहे.

टीप – यातील कवितांच्या ओळी माझ्या स्वत:च्या आहेत. – उज्ज्वला केळकर

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझा वाटेवरचा प्रवास… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ माझा वाटेवरचा प्रवास… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

प्रत्येकाचं प्रवासाचं डेस्टिनेशन निराळं असत. व्यक्तिपरत्वे ते बदलतं. गड- किल्ल्यापासून ते परदेशगमनापर्यंत…. प्रत्येकाच्या वाटा निराळ्या,प्रत्येकाचे पहाड वेगळे,दगड वेगळे!

जन्माला आल्यापासून आपला प्रवास सुरू होतो, तो आपल्या निर्वाणा पर्यंत अविरत चालू असतो. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर प्रत्येकाचे वेगवेगळं! सुरुवातीचा बिंदू ठळक…. तिथी, वार, पळ, घटका दाखवणारा स्पष्ट असा!! दुसरा बिंदू धूसर अस्पष्ट अनाकलनीय तरीही निश्चित म्हणावा असा!!!

जगात येताना आपण एकटे येतो.जातानाही एकटेच जातो. ‘In between’ आपल्याला मॅनेज करावं लागतं. Adjust करावं लागतं. यासाठी सगे सोयरे मित्र-मैत्रिणी, आणि थोरा मोठ्यांचे हात हातात माळावे लागतात आणि प्रवास सुखकर सुरम्य करावा लागतो.

अहो! मी हे काय बोलते आहे तुमच्याशी? मी तुम्हाला माझ्या एका सुंदर प्रवासवर्णनाविषयी सांगणार होते ना? वाट चुकले कि काय ?….

आहेच ही वाट थोडी वळणावळणाची पण डेस्टिनेशनला म्हणजेच, त्या दुसऱ्या बिंदूपर्यंत नक्की पोचवणारी…

या वाटेने प्रवासात मला खूप काही दिले. नागमोडी, वळणा वळणाची खडतर, धुळीची, ओबडधोबड, जन्म आणि मृत्यू हे दोन बिंदू परस्पर जोडणारी ही वाट!! या वाटेवरचा हा मजेशीर प्रवास!!!

प्रवासावर निघायच्या आधीची तयारी आठवत नाही.निघाल्यापासूनच धूसर आठवतयं. किंबहुना सगळ्या नातेवाईकांनी माझ्या जन्माची चित्रफीत माझ्या मनावर बिंबवली आहे.

आईच्या उबदार कुशीतून सुरू झालेला हा सुरुवातीचा प्रवास आईच्या दुधासारखा गोड आणि दुधावरच्या सायी सारखा अलवार…..

आईला ‘आईपण’ देऊन मी तिचे आभार मानले. नैसर्गिक आनंदाचा क्षण बहाल केल्याने आई सुद्धा झोकात होती, असं बाबा म्हणतात. बाबांच्या मोठ्या हातात माझं इवलसं बोट होतं.

चाल चाल मोते,पायमोडी काटे

पायाच्या वाटेनं, हम्मा भेटे.

असे म्हणून आईने मला सावकाश मांडीवरून खाली उतरवलं.संभाव्य अडचणींची जणू कल्पना दिली. त्याचबरोबर ‘हम्मा’ भेटेल असं आमिषही दाखवलं.

हळूहळू दोघांनी मला स्वावलम्बन शिकवलं. आईच्या मांडीवर उतरून मी माझी वाट धरली.

बाबांनी बोट सोडलं पण आधार नाही! माझ्या हातात पांगुळगाडा होता आणि पायात छुम छुम! मी हॉर्न देत स्वतःला सांभाळत वाटेतल्या अनावश्यक गोष्टी दूर सारत मार्गाक्रमण करु लागले. आई-बाबांचं पडलं सवरलं तर सावरणं होतच…..

माझ्या या प्रवासातील वाटेवर इंद्रधनुष्य सांडलं होतं. या रंगीबेरंगी प्रवासात मला माझ्या प्रियजनांची भाषा समजू लागली. तसेच पशुपक्षांची भाषाही मला अवगत झाली. काऊ, चिऊ, माऊ, भू भू माझे मित्र झाले. अंगणातील जाई जुई, चाफा, गुलाब सगळे माझे गणगोत झाले. निसर्गही माझ्याशी बोलू लागला. निंबोणीच्या झाडामागे चांदोमामा लपायचा. लपाछपी खेळता खेळता पापण्या अलगद मिटायच्या.

आत्मचिंतन,आत्मपरीक्षण करत, प्रवासातले स्पीड ब्रेकर संभाळत माझी पावले चालत होती.माझी वाट ही माझ्याबरोबर वयात येत होती.माझ्या प्रवासातील गोडी वाढत होती.

बालपण,तारुण्य,वार्धक्य असा निसर्गाने दादरा ताल पकडला होता.त्यानेच मला ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा’ असे भावगीत गुणगुणायला लावले आणि मी स्वप्नातला राजकुमार शोधू लागले.

संततीच्या रूपाने तारुण्य बालपण पुन्हा अनुभवलं. संसारात पडल्यावर ‘वाटेवर काटे वेचीत चाललो’ असे कधी कधी जबाबदार्‍याना कंटाळून म्हणावेसे वाटले. हा प्रवास अकल्पित वळणांचा, फसव्या नागमोडीचा, अनिश्चिततेच्या लयीचाअसा होता. कधी चढ तर कधी उतार….. या प्रवासात बऱ्याच वेळा ठेचकाळले पडले. माझ्या सावलीने मात्र माझी साथ कधीच सोडली नाही.

या प्रवासात मला खूप काही गवसलं. या वाटेनं मला खूप काही दिलं. हाताची ओंजळ करून मी चालले पण ती पुरेना… मग झोळी धरली….ती भरून ओसंडून वाहू लागली.वाईट गोष्टींसोबत काही चांगल्या गोष्टी सांडून गेल्या.’ओल्या बरोबर सुके जळते’म्हणतात ना! तसं काहीतरी….

या प्रवासाच्या वाटेवर सद्भावनांच्या कमानी दुतर्फा उभारल्या गेल्या.विचारांनी रांगोळी काढली.मैत्रीचं अत्तर शिंपलं गेलं.गप्पांच्या तुतार्‍या वाजल्या. गुरुजनांची सावली मिळाली. या सर्वांची उतराई व्हावे म्हणून सर्वांना काही देण्याऐवजी मी त्यांच्याकडूनच मागत सुटले. ‘देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ असं काहीसं झालं माझं!

कोरी पानं घेऊन जन्माला आलेली मी; प्रत्येक पानागणिक विचारांचा एक प्राजक्त फुलवायचा आणि सुगंधाची लयलूट करायचा प्रयत्न करू लागले.

या प्रवासातील माझ्याबरोबर मोठे झालेले वृक्ष माझ्या सुखदुःखाचे साक्षीदार!! त्यांनादेखील कित्येक वेळा मी बहरताना आणि पानझडी होताना ‘याची देही याची डोळा’ पाहिलेलं आहे. मूळ घट्ट मातीत रुजवायचं त्यांनीच मला शिकवलं. वडाने पारंब्यांवर हिंदोळे घेताना मैत्रीचा संदेश दिला.’सुखदुःखे समेकृत्वा’ असे म्हणून मी वाटचाल करू लागले.

या प्रवासात काही शॉर्टकट्स आणि काही चोरवाटा सापडल्या.काही गोष्टी मोहमयी होत्या. त्यांनी मला अडवले पण मी त्यांच्या कचाट्यातून सुटून पुढे चालू लागले.

या वाटेवरच्या प्रवासात मी सारं जग बघितलं….. नव्हे डोळ्यात साठवलं पण मी हरवले नाही.माझी वाट पुन्हा माझ्या माऊली कडे घेऊन आली.

या प्रवासातील काही ठिकाणं मला खूप आवडली. त्या ठिकाणी माघारी जायची वाट मात्र सापडली नाही. त्यामुळे प्रवासातील त्या आवडलेल्या ठिकाणांना पुन्हा भेट देता आली नाही.

रियाज करावा तसं मी पुन्हा पुन्हा ते क्षण मात्र आठवू लागले आणि आनंद लुटू लागले. संपूर्ण प्रवास भर अर्जुनासारखी संभ्रमावस्था होतीच! भावनाप्रधान, संवेदनशील अशा व्यक्ती भेटत गेल्या आणि त्यांनी ह्या अवस्थेतून मला बाहेर खेचून काढले.माझ्या वाटेवर संस्काराचे गालिचे घातले. तारतम्यानं वागायला शिकवलं.

या वाटेवरच्या प्रवासात मला खजिना सापडला. त्या खजिन्यातील हिरे,माणके, रत्ने, जड जवाहिरे मी अंगावर लेऊन बसले.सदिच्छा,शाब्बासकी,प्रेम, सद्भावना,सन्मान,आशीर्वाद,अनुभव, पारितोषिक, प्रशस्तीपत्रक, सुवर्णपदक,संवेदना,ज्ञान, भक्ती…… बापरे बाप….’ देता किती घेशील दो    कराने ‘अशी माझी अवस्था झाली.

आयुष्यभर पुरेल इतकं बोधामृत या प्रवासाने मला दिलं.पुरेल इतकं शहाणपण, चतुराई, ज्ञान सगळं सगळं… साठ वर्षापासूनची ही पायाखालची वाट आणि त्यावरचा माझा हा अविरत चालणारा प्रवास!

या प्रवासाने मला समृद्ध केलं. सुखाचा शोध घेता घेता दुःख आडवी आली. दुःखाची झालर असल्याशिवाय सुख उठून दिसत नाही ना? पुढे…’वाट इथे स्वप्नातील संपली जणू’ म्हणून परतीचा प्रवास सुरू झाल्याची शंकाही मनाला भेडसावू लागली आहे.

आकाशातील नक्षत्र पाहता-पाहता नभाची खोली, उंची,भव्यता नजरेत साठवत गेले.आता उंच-उंच जायचंय तिथून खाली बघायचयं आणि मग माझ्या या प्रवासासाठी मी ज्या वाटेवरून चालले त्या वाटेचा उगम पाहून म्हणायचंय, ‘हे तर नक्षत्रांचं देणं!’

माझा जीवन प्रवास म्हणजे माझं आनंद निधान!! तो आनंददायी आणि अनुभव समृद्ध व्हावा हा प्रयत्न करणारे माझे सर्व हितचिंतक माझ्या वाटेवर दीपस्तंभासारखे उभे राहिले. त्यांची मी कशी उतराई होऊ?

आयुष्यभर कितीही मिळवलं,कितीही मिळालं तरी जाताना ते सगळं इथेच सोडून जायचं असतं हा अलिखित करार आहे.

तद्वतच सगळं इथंच सोडून ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ असं म्हणून देवाघरची वाट शोधायची आणि एका वेगळ्या प्रवासाला निघायची ही नांदी तर नाही ना?……

 

माझी वाट माझा प्रवास

तिचा माझा सतत सहवास

 

एकटीचीच ही माझी वाट

काय वर्णावा तिचा थाट?

 

वळणावळणाचा तिचा प्रवास

त्यात नात्यांना जागा खास

 

मिळता मला त्यांचा सहवास

प्राजक्त फुलला दरवळून वास

 

मोठ्यांचा आशीर्वाद हा श्वास

बाकी सगळे आभासी आभास

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक रस्ता  आ s हा, आ s हा ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ एक रस्ता  आ s हा , आ s हा  ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मंडळी  नमस्कार ?

आज एक वेगळा विषय मांडतोय.( जरा निवडणूक रणधुमाळीतून थोडासा बदल समजा.)

‘प्रवास’  हा  अनेकांचा आवडता विषय असतो. अनेक जण अनेक प्रकारे प्रवास करतात. कुणी रस्त्याने , कुणी रेल्वेने तर कुणी हवाई प्रवास करतात. पण असे काही मार्ग असतात की त्या खास मार्गावरून जायला प्रत्येकाला कधीच कंटाळा येत नाही.  रोजच्या कामाच्या ठिकाणी वगैरे जायचा हा मार्ग नाही बरं का ! ( तिथे तर मनात असो नसो जावंच लागतं.)

असा मार्ग, जो केव्हाही जा, कधी ही जा फक्त आनंदच देतो.

तर मंडळी, माझ्यासाठी  सारखा सारखा प्रवास करावासा वाटणारा, कधीही कंटाळवाणा न वाटणारा एक रस्ता आहे .  माझ्या घरा पासून ते मुक्कामाचे ठिकाण असा हा मार्ग साधारण १३० किमीचा आहे. आणि दोन एक महिन्यातून एकदा तरी या मार्गावरून  गेल्या शिवाय मला चैनच पडत नाही.?

हा मार्ग चार टप्य्यात मी विभागलाय .  माणसाच्या कशा साधारण चार अवस्था असतात १)बाल २) कुमार ३) तारुण्य आणि ४) वार्ध्यक्य

(धर्म, अर्थ, काम, मोक्ष)

तशाच माझ्या मार्गाच्या ही ? ?या चार अवस्था आहेत.

साधारण ३०- ३५ किमीचे  प्रत्येक टप्पे . प्रत्येक टप्पा पार करायला लागणारा वेळ ३० मिनिटे. असा हा दोन तासाचा प्रवास.

तर घरातून निघालो की पहिला टप्पा, बाल्य: जशी लहानपणी आपली बालसुलभ भावना असते , एक आनंद , उत्साह , थोडीशी हुरहूर प्रवास कसा होईल याबाबत थोडी भिती. असा हा पहिला टप्पा.

पहिल्या टप्प्याचा काही कि.मी. शिल्लक असताना  लागणारे दोन बोगदे जणू  वडीलधारी पालक. जाणीव करून देतात की  आता लहान नाहीस, खेळ बास , मजा बास थोडा सिरिअस हो,अभ्यास वाढणार आहे , लक्ष असू दे,

मग  दुसरा टप्पा सुरु –  कुमार . थोडी जबाबदारीची जाणीव , झालेल्या चूकाातून शिकणे . गाडीच्या वेगावर नियंत्रण , ब्रेक न दाबता समोरून आरामात चालना-या गाडयांना ओलांडून पुढे कसे जायचे , मागून येऊन किरकिर कारणा-या गाडयांना पुढे सोडणे , योग्य वेळी योग्य गियर , असे करत करत  , थोडासा अॅरोगंटपणा पण वाढत्या जबाबदारीच्या जाणीवेने हा २५-३० किमीचा  अवघड वळणाचा , घाटाचा टप्पा पार करत क्षणभर विश्रांती साठी थांबणे. हा टप्पा पार करे पर्यत अनेकांच्या डोक्याला झिणझिण्या येऊन  अगदी अमृतांजन लावावे असे वाटण्यासारखी परिस्थिती.

चहा नाश्टा करून मग तिस-या टप्प्याला सुरवात करायची .

त्यामानाने हा टप्पा जास्त  सुखकारक  रस्ता,  परिसर, गाडी यावर अगदी व्यवस्थित कंट्रोल आलेला असतो. जणू जीवनात आता रुटीन सेट झाले आहे. मस्त पैकी पाचवा गिअर टाकून एका वेगात गाडी जात आहे . फक्त आपल्या समोरच्या लेन मधून हळू जाणा-या गाडयांना शिताफने चुकवून, न कळत , अलगद , न दुखावता, हाँर्नचा आवाज न करता त्यांना ओलांडून पुढे जाऊन परत आपल्या मूळ लेन मध्ये लागणे, अतिशय घाई असणा-यांना आपला वेग कमी न करता पुढे जाऊ देणे.

बस “गोल्डन टाइम ” हाच

चौथा आणि शेवटचा टप्पा  मुक्कामाचे ठिकाण घेऊन जाणारा. नाही म्हणले तरी एक दिड तासाच्या प्रवासाने थोडासा कंटाळा आलेला असतो. मुक्कामाच्या ठिकाणी पोचण्या आधी पुढे किती ट्रॅफिक जाम असेल याची चिंता  लागते, कसं होणार ? केव्हा पोहोचणार ? या विचाराने मनात काहूर माजलेले असते. जणू हा वृद्धत्व / निवृत्ती असा हा टप्पा . जे जे होईल ते ते पहावे अशी नकळत विचारसरणी करून देणारा हा टप्पा .

अंमल उदासीनपणे , वाट बघ बघत , ज्या नियोजित वेळेला पोहोचू असे वाटत असते त्या वेळे पेक्षा थोडा उशीर करून शेवटी आपण मुक्कामाला पोहोचतो

मंडळी  असा माझा हा प्रवासाचा आवडता  रस्ता आणि चार टप्पे.  कसा वाटला?

अरे हो  आता तो रस्ता कुठंला हे सांगणे ही एक फॉर्मेलीटी. कारण हा कुठला रस्ता हे

ब-याचजणांनी ओळखलं असेलच.

ज्यांनी ओळखलं नाही त्यांना सांगतो,

हा माझा आवडता रस्ता  आहे तो # मुंबई- पुणे मेगा हायवे . आणि प्रवासाचा मार्ग  बेलापूर ते कोथरूड

पहिला टप्पा-   घर ते – खालापूर टोल नाका

दुसरा टप्पा- खालापूर टोल नाका ते  – लोणावळा .

तिसरा टप्पा – लोणावळा  ते तळेगाव टोल नाका

चौथा टप्पा – तळेगाव टोल-कात्रज बाय पास – ते -कोथरूड

मंडळी पण ही मजा फक्त मुंबई – पुणेच बरं का ! परतीची

पुणे – मुंबई अशी मजा नाही. कारण एक तर पुण्याहून आम्हाला निघायलाच नको वाटतं आणि मगाशी जे बाल, कुमार,तारुण्य , वार्धक्य या अवस्था किंवा धर्म , अर्थ , काम , मोक्ष असं जे म्हणलं तो मोक्ष आम्हाला परत येताना  पुण्यातील मित्रांनी दिलेल्या  बाकरवडी आणि आंबा बर्फीने केव्हाच मिळालेला असतो.

त्यामुळे आम्ही परतीचे राहिलेलोच नसतो?

मेगा हायवेवर अखंड पणे

राबणा-या  परिचित अपरिचित सर्वांना सदर लेखन समर्पित

©  श्री अमोल अनंत केळकर

०९.०४.२०१९

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ परब्रह्म ☆ डाॕ संगीता गोडबोले

डाॕ संगीता गोडबोले

परिचय 

डाॕ संगीता गोडबोले, बालरोगतज्ञ कल्याण येथे तीस वर्षे प्रॕक्टिस.

  • कोरोना काळात रुक्मिणीबाई रुग्णालयात मार्च २०२० ते आॕगस्ट २०२० पर्यंत कल्याण डाॕक्टर आर्मीतर्फे काम केले.
  • गेल्याच वर्षी ‘मनस्पर्शी’ हे ललितबंधांचे इ बुक इ साहित्यने प्रकाशित केले. सकाळ, कुबेर, आहुती, कल्याण नागरिक दिवाळीअंकात लेखन. कविता लेखन. त्यांच्या एका कवितेचे गाणे आशुतोष कुलकर्णी या संगीतकारांनी केलेय.
  • संगीतकारांवरील ‘सृजन परंपरे’चा एक वर्षाचा प्रवास यावर असलेल्या डॉक्युमेंटरीचे संहितालेखन त्यांनी केले आहे.
  • लोकमत मध्ये लेखन, ‘ख्याल’ या पारनेरकर ट्र्स्टच्या संगीत व कलाविषयक त्रैमासिकासाठी लेखन.
  • नव्या वर्षात दर रविवारी महाराष्ट्र टाईम्स ठाणे पुरवणीत ‘मी शब्दसखी’ या नावाने लेखमाला येतेय.
  • पहिला लेख तीन जानेवारीला आलाय. ही मालिका वर्षभर चालेल.
  • शास्त्रीय संगीताची आणि नाट्याभिनयाचीही आवड आहे. सोलापूर येथे राज्यनाट्य स्पर्धेत १९८७ – ८८ साली उत्कृष्ट अभिनयासाठीचे पारितोषिक मिळाले होते.
  • आॕल इंडिया रेडिओ अस्मिता वाहिनीवर ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात स्वलिखित ललितबंधांचे सातवेळा वाचन.

 ☆ विविधा ☆ परब्रह्म ☆ डाॕ संगीता गोडबोले ☆ 

परब्रम्ह म्हणजे काय गं आई???

५/६ वर्षाची असताना आईला विचारलं होतं ..

क्षणभर ती चमकली होती या अनपेक्षित प्रश्नानं ..पण नेहेमीप्रमाणे जरी माझ्या आकलनापलीकडे असले तरी मला समजणाऱ्या भाषेत तिने समजावले होते..

म्हणाली डोळे मीट आणि मला देव दिसतोय असा विचार कर. काही दिसले??

नाही गं आई …काहीच नाही…..

मग आता दत्तगुरु दिसताहेत असा विचार कर….

ब्रम्हा विष्णू महेशाची सगुण साकार देवघरातली दत्तगुरुंची मूर्ती आली मनःचक्षूपुढे ..अगदी त्यांच्या  चार श्वान आणि गाईसकट…

मग म्हणाली आता श्रीकृष्ण आहे समज.. काही दिसतय??

अधरावर बासरी घेतलेला, शिरी मोरपीस धारण केलेला सुंदर शामल कृष्ण दिसला ..रांगणारा बाळकृष्ण दिसला नि अर्जुनाला गीता सांगणारा त्याच्या रथाचा सारथी श्रीकृष्ण दिसला..

रोज अठरा अध्याय मुखोद्गत म्हणणाऱ्या आजोबांनी भगवद्गीतेवरच्या श्रीकृष्णाची ओळख फार लवकर करुन दिल्याने ते रुप फार जवळचं नि ओळखीचं होतं.

मग म्हणाली ,आता पुन्हा प्रयत्न कर परब्रम्ह पहाण्याचा…अन् काय आश्चर्य …

कधी दत्तगुरु कधी कृष्ण येत राहिले डोळ्यापुढे…

आतून खोलवर काही गवसल्याचा आनंद…

म्हटल आई परब्रम्ह म्हणजे देव का गं?

म्हणाली, परब्रम्ह म्हणजे श्रद्धास्थान… ते कोणत्या रुपात आपण पहातो तसे दिसते. मूर्तीकडून अमूर्ताकडचा प्रवास …

मोठी झालीस की कळेल हळूहळू सारं… पण त्याच्या शोधात रहा…

८/९ वर्षांच्या अर्धवट वयात स्वामी स्वरूपानंदांच्या प्राणशिष्याने, वासुदेवानंद सरस्वतींनी  लावलेली समाधी पाहिली होती. कुंडलिनी जागृत करतात म्हणे.. दोन भुवयांच्या मधोमध पडलेला खड्डा दिसला होता मला. अत्यंत तेजःपुंज अशी त्याची छबी आजही स्पष्ट आठवतेय. दोन तास पूर्ण समाधिस्त अवस्था… मग बाहेर येताना कोणी मालकंस गा रे म्हटल्यावर मालकंस शोधण्यासाठी झालेली यजमानांची धावपळ… एक वेगळीच अनुभूती …

काय जाणवले ते सांगता येत नाही .पण फार छान वाटले होते. शांत वाटले होते. आजही त्याचे स्पष्टीकरण देता येणार नाही पण त्या  क्षणी  गवसलं होतं ते परब्रम्ह होतं का?

९वीत असताना स्वामी पुरुषोत्तमानंद सरस्वतींच्या तोंडून गीतेच्या १५ व्या अध्यायाचे निरुपण ऐकले होते तेव्हाही असंच शांत आणि काही गवसल्याचं समाधान होतं… ते परब्रम्ह  होतं का?

माझ्या उदरातून जन्म घेतलेल्या पिल्लांनी पहिल्यांदा आई म्हणून संबोधलं तेव्हा उचंबळून आलेल्या मनाला परब्रम्ह भेटलं होतं का???

वडीलांनी मृत्यूचे भय नं बाळगता अत्यंत समाधानाने अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांना परब्रम्ह भेटलं होतं का?

मृत्यूच्या दाढेतून ओढून काढलेला एखादा पेशंट आपल्या पायांनी घरी चालत जातो तेव्हा मिळालेला आनंद म्हणजे परब्रम्ह भेटीचा आनंद का?

आज काहीसं वाटतय ..

अत्युच्च आनंदाची परिसीमा गाठणारी, परमेश्वराच्या जवळ नेणारी, अद्भूत शांती देणारी मनाची अवस्था म्हणजेच परब्रम्ह असावं …

त्याच्या शोधात जंगलात जाऊन अथवा हिमालयाच्या टोकावर समाधी लावून बसल्यावरच ते सापडेल असे नाही….

दैनंदिन जीवनातही परब्रम्ह भेटण्याचे अनंत प्रसंग येतात ..

फक्त ते शोधण्याचं कसब अंगी बाणवलं की परब्रम्हाशी भेट फार दूर रहाणार नाही….

शब्दसखी

© डॉ  संगीता गोडबोले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हे चित्र आणि ते चित्र ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ विविधा ☆ हे चित्र आणि ते चित्र ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

रेखा, अजय, त्यांची छोटी रितू, आई बाबा छान छोटंसं सुखी कुंटुंब. तसे कुटुंब मोठं होतं. अजयचा एक भाऊ दोन बहिणी. पण ते आपापल्या घरी. अजय मोठा म्हणून तो आईबाबांकडेच रहायचा. बहिणीची लग्नं झाली. त्या आपल्या घरी सुखांत नांदत होत्या. धाकटा विजय नोकरीच्या निमित्ताने बॅगलोरला त्यामुळे लग्नानंतर तो बॅगलोरलाच रहात होता.

एकंदरीत काय आईवडिलांबरोबर अजयचे कुटुंब रहात होते. आईवडील रितूला छान सांभाळत होते. शाळा, क्लास सगळं आजोबा सांभाळत होते. आजी बाकी तिची वेणीफणी, जेवणखाणं त्यामुळे रेखा अजय बिनधास्त. पण पण ते आईवडिलांना गृहीत धरुन. केलं तर झालं काय?  घरांत तर असतात दोघही रिकामटेकडे.

हळूहळू वयोपरत्वे त्या दोघांना कामं होईनाशी झाली. मग ख-या कुरबुरी सुरु झाल्या. नंदीबैल, अजय रेखाच्या सांगण्यावरून त्यांना सांगू लागला. तुम्ही चार महिने विजूकडे जा. कधीतरी ताई माईकडे जा. तुम्हाला पण थोडी हवापालट, बदल. कधीतरी आपल्या गावाकडच्या घरावर नजर टाकून या. रितू काय आता मोठी झाली आहे. ट्यूशनच्याच बाईंकडे राहील. रेखा येता येता आणेल घरी तिला. घरं वडिलांचे, बरं त्यांची पेन्शन होती म्हणजे अजयवर अवलंबून दोघंही नव्हती. वरुन विजय, दोघी बहिणी दर महिन्याला त्यांना पैसे देत होत्या ते वेगळेच. त्यामुळे खरंतर अजय रेखाचा पगार बॅकेत सेफ. रेखाची नोकरी कसली नावापुरती. पण घरची कामं टाळायला, सासू सास-या बरोबर अख्खा दिवस राहण्यापेक्षा बरी. सकाळी एकदा जेवण उकडवून ठेवलं की रान उंडारायला मोकळे. रोज कोण बघायला येतं? वर मी नोकरी सांभाळून सासूसास-याचे करते.

पण प्रत्यक्षात ना कधी त्याचं पथ्यपाणी पाळलं ना कधी त्याच्याशी प्रेमाने वागली नाही. डायाबिटीस, ब्लडप्रेशरची दोघं म्हातारी तरी. घरी बटाटेवडे, कधी रितूसाठी गुलाबजामुन ते पण बाहेरून आणून. चपात्या बनवायचा आळस म्हणून तिन्हीत्रिकाळ भात नाहीतर पाव. शेवटी आजारी दोघंही पडली. तरीही नोकरीच्या निमित्ताने त्यांना  बघितलं पण नाही.

बाकीची भावंडे आळीपाळीने येऊन बघायची. कधीतरी बहिणी ने चारच दिवस रहायचं म्हटलं  पण ही बया त्याना येऊ पण राहू द्यायची नाही आणि स्वतः पण रजा घेऊन घरी रहायची नाही. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना. अजय तर बुगु बुगु नंदीबैल. त्या दोघांना  भिती वाटत असावी भावंडांनी आई बाबांची सेवा करून त्यांनाच आईबाबांनी जागा, सोनंनाणं दिलं तर! शेवटी काही म्हाता-याना खायची इच्छा झाली तर खालून मागवून खायचे बिच्चारे.

झालं दोघंही पिकली पानं गळाली. आता रेखानी नोकरी सोडली. वर बुगु बुगुला पढवलं. पोपट बोलला, “आईबाबा गेले. रितुकडे लक्ष द्यायला घरचं माणूस नाही म्हणून रेखाला मनाविरुद्ध नोकरी सोडावी लागली. म्हणजे वर्ष भर आधी एकट्याच्या पगारात भागणार नाही म्हणून आजारी म्हाता-या सासूसास-यांना ठेवून जाणारी रेखा. तेव्हा घरची माणसं असून रितुला ट्यूशनवालीकडे ठेवायची तयारी होती. आणि आता सगळं व्यवस्थित असताना नोकरी सोडली. व्वा व्वा!

झालं आता रेखाच्या आईवडिलांची पाळी. डोबिंवलीला रेखाचं माहेर. वडिल अचानक हार्ट अटॅकनी गेले. त्या धक्यानी आईनी अंथरुण धरले. रेखाची वहिनी चांगली गृहिणी होती. सासूसासरे, आले गेले व्यवस्थित सांभाळायची. परत हसतमुख. रेखा स्वभावानुसार सतत तिच्या  कागळ्या करे. “ती हेच करत नाही. माझ्या आईला काय लागते? सकाळ संध्याकाळ दोन दोन चार चपात्या  त्या पण तिला बनवायचा आळस. आम्ही नाही का सकाळी नाश्ता,दोन वेळा ताजा स्वयंपाक करत.” रेखा तेव्हा सासूसास-याच्या काळात स्वतः काय वागायची ते सोईस्कर विसरली. बुगु बुगु पण माझ्या बायकोने नोकरी सोडली ते फार बरं केल. सकाळी नाश्ता रोज वेगवेगळा बनवते. वेगवेगळे पराठे काय. जेवणात पण किती त-हा?”

अरे बाबा, आता बनवते तिच्या मुलीसाठीं आणि नव-यासाठीं. एक वर्षं आधी हे केलं असतं तर तुझ्याचं आईबाबांनी आणखी चार वर्षे आनंदात काढली नसती का?

.आता बोलून काय फायदा?

रेखाची आई सारखी आजारी पडू लागली. आता रेखा सांताक्रूझहून डोंबिवलीला दोन दोन गाड्या बदलून, पाऊसपाण्याची सुध्दा रोज जाऊ लागली. ज्या बाईला एका घरांत राहून करता येत नव्हते ती अशी कसरत रोजची करु लागली. कारण शेवटी ती तिची आई होती ना रक्ताची. जाताना तिच्या आवडीचे बनवून घेऊन जायची. प्रेमाने गोड गोड बोलून दोन घास तिच्या पोटात घालायची. तिचे स्पंजिंग करायची. ज्या बाईला आजारी सासूसास-याची बाजूला फिरायची घाणं वाटायची. आईला जुनीजुनी गाणी ऐकवायची. गोष्टी वाचून दाखवायची. रात्री उशीरा घरी येऊन पण गुपचूप स्वयंपाक करायची. नव-याने काही बोलू नये म्हणून. तो म्हणा काय बोलणार बिशादच काय होती. नाहीतर येतानाच त्याच्या आणि रितूच्या आवडीचे हाॅटेलमधून काही आणले की आवाज बंद. अशी दोन वेगळी चित्र बरेच ठिकाणी असतात. ज्याच्या त्याच्या अकलेनी, संस्कारानी, बुद्धीने वागणारे चित्रकार चित्र रेखाटतात.

मी मात्र नशीबवान. नशीब अपना अपना किंवा पेराल तसं उगवेल त्या प्रमाणे सांगायला अजून तरी अभिमान वाटतो. एका प्रेमळ, कर्तव्यदक्ष, उद्योगी सुनेची मी सासू आहे. आम्ही दोघी गुण्यागोविंदाने एकत्र सात वर्षे मजेत राहतो. मुलगा आणि आमचे हे म्हणतात. कि दोघीही एकमेकाचे नंदीबैल आहात चालेल. तसे  दोन माणसं म्हटली की मतभेद होतात. पण आम्ही दोघीही एकमेकाला समजून घेतो. अर्थात आम्ही अगदी अति पाघळत पण नाही अट्टाहास पण करत नाही. सून ही मुली सारखी आणि सासूमध्ये आई बघायचं. पण तरी आमचे नातं एकदम घट्ट आहे आणि ते असंच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ?

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ टार्गेट १००% ☆ श्री चंद्रकांत बर्वे

श्री चंद्रकांत बर्वे

☆ विविधा ☆ टार्गेट १००% ☆ श्री चंद्रकांत बर्वे ☆ 

मी एक आपला साधासुधा सिनिअर सिटीझन आहे. माझे तरुण मुलांशी इंग्रजीत बोलताना कधी कधी लई वांदे होतात. म्हणजे माझं इंग्रजी वाईट नाहीये पण बऱ्याच इंग्रजी शब्दांचे आम्ही त्यांचे मुळ शिकलेले अर्थ बदलले आहेत म्हणे. आता आम्ही लहानपणी तर्खडकरांची डिक्शनरी हाताशी घेऊन इंग्रजी पुस्तकं वाचायचो पण त्यात कधी कधी कॅब किंवा कॉप असे शब्द यायचे पण तो शब्दच आम्हाला त्या डिक्शनरीमध्ये मिळायचा नाही, तो slang म्हणजे बोलीभाषेतला आहे म्हणे मग अर्थ काय कळणार! मग इतर संदर्भ लक्षात घेऊन कॅबचा ड्रायव्हर असतो म्हणजे कॅब हे वाहन दिसतय किंवा कॉप पासून व्हिलन दूर पळायचा प्रयत्न करतोय त्या अर्थी कॉपचा अर्थ पोलीस असावा वगैरे आम्ही ओळखले. ठीक आहे आम्हाला अर्थ समजायला वेळ लागला पण त्यामुळे काही अनर्थ नाही झाला. पण हल्ली आम्हाला माहित असलेल्या शब्दांचे मूळ अर्थ बदलले आहेत, आता बघाना लाख रुपये कोटी रुपये वगैरे आम्हाला माहित आहेत. एक मिनिट, गैरसमज नको म्हणून सांगतो की अनेक वर्षे इमाने इतबारे नोकरी करून, खर्चात काटकसर करून वगैरे हे पैसे आम्ही साठवले पण नवीन जागा बुक करायला म्हणून चौकशी केली तेव्हा ती एजंट आणि बिल्डर मंडळी पेटी, खोका वगैरे शब्द वापरत होते, त्यावेळी मनात म्हटलं आपल्याकडे पेट्या, खोकी काही कमी नाहीयेत मुंबईत कुठेही आपण जागा बुक करू शकतो. सरतेशेवटी मला समजले की पेटी म्हणजे कॅश एक लाख रुपये आणि खोका म्हणजे कोटी रुपये. आता लाख रुपये पूर्वी कोणी तरी एका पेटीतून दिले असतील आणि कोटी रुपये एखाद्या भल्या मोठ्या खोक्यातून दिले असतील त्यामुळे हे शब्द तयार झाले असावेत असा आपला माझा कयास आहे. चुकभूल द्यावी घ्यावी.

काही शब्दांनी तर सरड्याने रंग बदलावा किंवा राजकीय नेत्याने पक्ष बदलावा त्याप्रमाणे नवीन अर्थ घेतलेले आहेत. त्यातला एक एकदम डेंजरस शब्द म्हणजे ‘गे’ (जीएवाय) या शब्दाचा आनंदी असा अर्थ आम्ही लहानपणी शिकलो होतो पण आता त्याचा अर्थ होमोसेक्शुअल म्हणजेच समलैंगिक पुरुष असा होतो म्हणे. असे बरेच साधेसुदे शब्द कुणा लिंगपिसाट लोकांनी वेगळ्या अर्थाने वापरायला सुरुवात केली हे आम्हाला समजतय त्यामुळे हल्ली तरुण मंडळींशी बोलताना आम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागतीये.

आता ‘लाच’ हा प्रकार आणि शब्द आपणा सगळ्यांनाच माहित आहे. हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. (संस्कृती रक्षकहो मला माफ करा!) पण देवाला नवस बोलणे ही एक प्रकारे त्याला लाच ऑफर करण्याचा प्रकार आहे. देवा मला परीक्षेत पास कर मी दोन किलो पेढे प्रसाद म्हणून वाटीन किंवा मी निवडणूक जिंकलो की या मंदिराला चांदीची मूर्ती दान करीन, सिनेमा हिट झाल्यास या पिराला चादर चढवीन, असे झाल्यास देवीला हिऱ्याची नथ देईन वगैरे वगैरे. पण एक चांगली गोष्ट आहे की नवस, प्रसाद, तीर्थ वगैरे अध्यात्मिक शब्द प्रचलित लाचेसाठी वापरले जात नाहीत. नाही तर बातम्या ऐकू आल्या असत्या की व्हिस्कीचा तीर्थ दिल्याशिवाय तो ऑफिसर भेटत नाही, इतका प्रसाद फाईलवर ठेवल्याशिवाय तो एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर फाईल पुढे सरकवत नाही, अमुक अमुक माणसाला पोलीस इन्स्पेक्टरचा नवस फेडताना अटक, किंवा निवडणुकीत १०० व्हिस्की बाटल्यांच्या तीर्थाचा अभिषेक केल्यावरच ती जिंकता येते वगैरे.

हां पण आता एक नवीन शब्द एन्ट्री घेत आहे. त्याला वेळीच आडवले पाहिजे. तसं लहानपणी माझं गणित चांगलं होतं तेव्हा आमचे गुरुजी मला १०० गुणांचे टार्गेट द्यायचे (ते टार्गेट साध्य झाले नाही ही गोष्ट वेगळी) मी सरकारी नोकरीत होतो. आम्हाला नोकरीत असताना काही टार्गेट दिलं जायचं, इतकेच नाही तर आम्हाला वार्षिक अहवालात देखील टार्गेट किती पूर्ण झाले वगैरे लेखी द्यावं लागायचं. त्यामुळे आपलं टार्गेट लक्षात घेऊन काम करण्याची आम्हाला जुनी सवय आहे. आता आपण क्रिकेट बघतो त्यावेळेस शेवटच्या काही ओव्हर शिल्लक असताना सतत टार्गेट वर समालोचक बोलत असतो. जसे सामना जिंकायला १७ चेंडू बाकी २६ धावांचे टार्गेट वगैरे. सचिनला तर कायम १०० चे टार्गेट असायचे आणि तरी त्याने १०० वेळा आपले टार्गेट पूर्ण केले ही गोष्ट वेगळी, हां तर असा ‘टार्गेट’ हा दिशादर्शक चांगला शब्द आहे.

पण काही टार्गट लाचखोर मंडळींनी हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत घेतलेला आहे, हे एकदम भीषण आहे. आपण बाकी साध्या सरळ मार्गी लोकांनी याचा वेळीच निषेध केला पाहिजे. त्यांनी लाच, हप्ता, चिरीमिरी, काळा पैसा, बेहिशेबी पैसे, मांडवली, तोड, तोडपाणी, व्हिटामिन R (रिश्वत), G फॉर्म, घूस, बेटिंग वगैरे शब्दातून स्वतःचे नवीन शब्द बनवावेत. आपल्यातील भाषाप्रभू मंडळींनी त्यांना या बाबत मदत करावी ही विनंती. पण आमच्या ‘टार्गेट’ या लोकप्रिय शब्दाला हात लावता कामा नये. हे सगळं मला सुचायचं कारण म्हणजे आता मी आजोबा झालेलो आहे. नातवांना आता यापुढे मी अभ्यासाची, खेळाची वगैरे टार्गेट्स देणार आहे आणि आयुष्याच्या या शेवटच्या दिवसात मला कोणीही भल्त सल्त बोललेलं चालणार नाही.

 

©  श्री चंद्रकांत बर्वे

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बंधन आणि बांधिलकी ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆बंधन आणि बांधिलकी ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

‘बंदिस्त’मधला ‘बंद’ कांहीतरी हिरावून घेतलं गेल्याचं ध्वनित करतो. त्यामुळे बंदिस्त म्हणजे एकप्रकारचं बंधन, मर्यादा, निर्बंधित असंच ठळकपणे मनावर कोरलं गेलंय. पण बंदिस्त  या शब्दात सकारात्मकता ही मुरलेली आहेच. बंदिस्त म्हणजे संयमित, नियमित, प्रमाणबद्ध  सुरक्षित,सुव्यवस्थित असंही सगळं असू शकतं. पण या सगळ्या अर्थशब्दातली शिस्त, व्यवस्थितपणा हे सगळं बंदिस्तच्या नकारात्मक अर्थाच्या गडद सावल्यांमुळे कांहीसं दुर्लक्षित झाल्यासारखं वाटतं.

एखाद्या कथेची,संरचना (प्लॉट कन्स्ट्रक्शन) अतिशय व्यवस्थित, प्रमाणबद्ध,पकड घेणारी अशी जमून आली तर ती कथा खूप छान, बंदिस्त आणि त्यामुळे परिणामकारक आहे असं म्हंटलं जातं. हे जसं कथेबाबतीत तसंच एकांकिका, नाटक यांनाही आवश्यक असतंच. एकांकिका, नाटक याची संहिता पाल्हाळीक, पसरट असेल तर ती पकड घेऊ शकत नाही.ती  बंदिस्त असणे त्या संहितेची गुणात्मकता वाढवण्यासाठी आवश्यकच असते.

चार भिंती आणि छपरामुळे घरालाही एक प्रकारचा बंदिस्तपणा येतोच. तोही आवश्यक असाच. या बंदिस्तपणातच त्या घराची आवश्यक सुरक्षाच नाही फक्त तर  घरपणही आकाराला येते.

हे चार भिंतीतलं घरपण बंधनासारखं जाचक नसतं तर ते स्वखुशीने आणि मनापासून स्वीकारलेल्या बांधीलकीसारखं समाधान देणार असतं.

या घरपणातही सगळेजणच जर बांधिलकी मानणारे असतील तर त्या घरातलं सहजीवन आनंददायी, निरामय असतं. पण ही बांधिलकी जर एकतर्फीच असेल तर त्यात गृहित धरणं येतंच. आणि त्यामुळे निर्माण होणारी अपरिहार्य घुसमट घरपण विरुन जाचक बंधनांसारखी वाटू लागते.

म्हणूनच घरपण जपायचं तर तिथे एखाद्याला गृहित धरणं नसावं. देवाणघेवाण असावी. परस्परांना समजून घेणं असावं.

असं असणाऱ्या किंवा नसणाऱ्याही प्रत्येक घराला त्या त्या घराची अशी एक गोष्ट असते.त्या गोष्टींतली पात्रे, प्रसंग वेगवेगळी असली तरी आशय एकच असतो. हा आशय बंधनांचं, बंदिस्तपणाचं महत्त्व सांगणारा जसा, तसाच कधीकधी त्याच्या अभावामुळे येणारं एकारलेपण, घुसमट अधोरेखित करणाराही असतो. बंधनांचं रुपांतर बांधिलकीत होण्याची गरज घुसमट निर्माण होण्यापूर्वीच जाणवणं हे महत्त्वाचं..!

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ साराची भूतदया☆ श्री गौतम कांबळे

(सारा व तिची ताई)

☆विविधा ? साराची भूतदया ? श्री गौतम कांबळे ☆

एक पाच वर्षाची खूप प्रेमळ गोंडस मुलगी. तिचं बोलणं ऐकत राहावं असं. कल्याणमधील खडकपाडा येथे वसंत व्हिला रस्त्यावर वृंदावन पॅराडाइज या आलिशान वस्तीत राहते. तिच्यासाठी आणलेला खाऊ; मग ते साधे चॅाकलेट असूदे, प्रत्येकाला हवं का? म्हणून विचारल्याशिवाय खात नाही. गंमत म्हणून कुणी हवं म्हणालं तर त्याला देण्यात तिला आनंदच वाटतो.

खेळत असतानाही तिचं सगळीकडं बारीक लक्ष असतं. घरात आजी, आजोबा, आई वडील व मोठी बहीण सुहानी असं छोटं कुटुंब. सारा आजोबाना आप्पा म्हणते. एका अपघातात आप्पांच्या लहान मेंदूला इजा झालेली. त्यामुळे त्यांचा शरीरावर ताबा राहत नाही. आधाराशिवाय उठले तर तोल जाऊन पडण्याचा धोका असतो.  चुकून आप्पा उठलेच तर सगळ्यात अगोदर लक्ष असतं ते साराचंच. मग काय, आप्पा उठले, आप्पा उठले असा दंगा करून सगळ्याना सावध करते.

वृंदावन पॅराडाइजमध्ये तीन विंग्ज आहेत. मध्ये मोठे ग्राउंड आहे. बाजूला क्लब हाऊस व छोटासा स्विमिंग टॅंक आहे. त्या ठिकाणी एखादा छोटा कार्यक्रम असला की समोरच्या ग्राउंडवर मंडप घालून केला जातो. असाच एक कार्यक्रम होता. मंडपवाले मंडप घालण्यात व्यस्त होते. सारा, सुहानी आणि त्यांचे दोन मित्र तेथे खेळत होते.

त्याच इमारतीवर जिथं जागा मिळेल तिथं काही कबुतरेही आहेत. त्यातील एक कबुतर मंडपाच्या आधारासाठी लावलेल्या बा़ंबूवर येऊन बसले. आजारी असल्यासारखे दिसत होते. थकलेलं वाटत होतं. खेळत असलेल्या साराचं लक्ष त्याच्याकडं गेलं.

तिथंच साराच्या वडीलांचे मामा व आणखी दोघे खुर्च्या टाकून बसले होते. सारानंच आणून दिलेले पाणी पीत होते.

“मामा, त्या कबुतरालाही तहान लागलीय. त्याला पाणी हवंय.” कबुतराला पाहून सारा म्हणाली.

“मग दे ना आणून.” असं मामा म्हणाले आणि सगळ्यानी हसण्यावारी नेलं.

साराही खेळण्यात दंग झाली असं सर्वांना वाटलं. पण तीचं लक्ष त्या कबुतराकडं होतं.

अचानक सारा “ओ सिक्युरिटी काका, ओ सिक्यूरिटी काका इकडे या” अशा हाका मारू लागली. तिला कुणी काहीतरी काम सांगीतलं असेल असं वाटून बसलेल्यानी ऐकून सोडून दिलं. सारा स्विमिंग टॅंक कडं गेली. सिक्युरिटी काका पण गेटवरून हलले नाही.

पुन्हा तशीच हाका मारत सारा आली. आता मात्र ती चिडलेली दिसत होती.

“सिक्यूरिटी काका लवकर या ना. तुम्ही काय कबुतराला मरून देणार आहात काय?” असं सारा वैतागून म्हणताच सिक्यूरिटी काका धावत गेले तर त्याना ते कबुतर स्विमिंग टॅंकमध्ये पडलेले दिसले. कोरोनामुळे कोणी पोहत नसल्याने त्यात पाणी थोडे कमी होते. तहानेनं व्याकुळ झालेल्या त्या जीवाने पाण्यासाठी टॅंकमध्ये झेप घेतली होती पण बाहेर यायला त्याला किनारा सापडत नव्हता. आणि त्याला पायऱ्याही नव्हत्या.

सिक्यूरिटी काकानी कचरा काढण्याच्या जाळीने कबुतराला अलगद बाहेर काढले आणि साराच्या चेहऱ्यावर हसू खुलले. एका पक्ष्याचा जीव वाचवल्याचे समाधान तिच्या डोळ्यात दिसत होतं.

©  श्री गौतम कांबळे

सांगली

९४२१२२२८३४

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print