मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ परफेक्ट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ परफेक्ट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

सध्या ओ टी टी मुळे सगळं जग हातात आलं आहे. मला हव्या त्या देशातील, हव्या त्या भाषेतील सिनेमे आणि सिरियल बघता येतात. आणि मला आवडतं निरनिराळ्या देशातले लोक, तिथल्या पद्धती, तिथला निसर्ग बघायला. त्यामुळे इंग्लिश मध्ये भाषांतर केलेल्या सिरीयल मी बघते.

अशीच एक सिरीयल बघत होते. त्यात आजकालच्या स्त्रियांना किती ताण असतो, घरचं सगळं करून, नोकरी करून, मुलं सांभाळून, शिवाय पुन्हा स्वतःच्या आवडीचं काही करायला कसा वेळ मिळत नाहीये यावर त्यातली पात्रं चर्चा करत होती.

मला ही चर्चा पाहताना पटकन असं वाटलं की ही गोष्ट किती ग्लोबल आहे. हाच संवाद आत्ता मुंबईत एखाद्या लोकलच्या डब्यातपण चालू असेल, जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये किंवा अमेरिकेत एखाद्या कॅफेतसुद्धा सुरू असेल.

तेवढ्यात त्या चर्चेत सहभागी नसलेली, पण शेजारच्या खोलीतून सरबत घेऊन आलेली एक आज्जी असते, तिला त्या सगळ्या जणी विचारतात की, “ए, तू कसं मॅनेज केलंस गं सगळं? तूही कॅफे चालवत होतीस, तूही घरी येऊन पुन्हा सगळं काम करत होतीस, मुलांची शाळा, अभ्यास, मोठ्यांचे आजार सगळं छान मॅनेज करत होतीस. तुला आम्ही कधीही थकलेलं पाहिलं नाही.”

यावर ती आज्जीबाई छान गोड हसते आणि म्हणते, “मी थकत असे कधीकधी, पण मला ताण मात्र कधीही आला नाही. कारण मला पर्फेक्ट व्हायची भूक नव्हती. किंबहुना आमच्या काळी असं ‘पर्फेक्ट असं काही नसतं’ असं लोकांना मान्यच होतं.

आई म्हटल्यावर ती चुरगळलेल्या ड्रेसमध्ये केस विस्कटलेली असू शकते. मुलांनी भरलेलं घर हे पसारायुक्तच असणार. चाळीशी पार केलेला मुलांचा बाबा, टक्कल असणारच त्याला. पर्फेक्ट असं काही नव्हतं आणि ते असावं असा अट्टाहाससुद्धा नव्हता. त्यामुळे सोप्पं गेलं जरा तुमच्यापेक्षा.”

पुष्कळ आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रसंग आहे हा.

का अट्टाहास करतोय आपण पर्फेक्ट असण्याचा आणि कुणासाठी?

जाहिरातीत दाखवतात तशी संध्याकाळीसुद्धा तरतरीत आणि केससुद्धा वाकडा न झालेली आई प्रत्यक्षात नसते, कारण प्रत्यक्षातल्या आईला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर गॅसजवळ उष्णतेची धग सोसत पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो. सणाच्या दिवशी 12 माणसांचा स्वयंपाक आणि आदरातिथ्य करताना मेकअप आणि भरजरी साडी नाही सांभाळू शकत सगळ्या, त्याऐवजी कुर्ता घातला असेल तर सरसर कामे करता येतात.

ऑफिसला प्रेझेंटेशन असेल त्यादिवशी घरी काम जरा बाजूला ठेवावेच लागणार आहे.मुलांच्या परीक्षा असतील तर आईनेच अभ्यास घ्यायचा असं कुठल्याही ग्रंथात सांगितलेले नाही. चित्रातल्यासारखं आवरलेलं घर हे फक्त चित्रात नाहीतर नाटक सिनेमातच असतं.

स्वतःहून अभ्यास करणारी आणि पहिले नंबर वगैरे आणणारी मुलं तर मला वाटतं बहुधा फक्त स्वप्नातच असतात. कुणाचा तरी पहिला नंबर येणार म्हणजे इतरांचा दुसरा तिसरा चवथा पाचवा येणारच. अभ्यास छान करून घ्या, पण नंबर येऊ दे की पंचविसावा. नोकरी देताना शाळेतला चवथी ब मधला नंबर कोण विचारतो?.

तब्येत सांभाळावी हे ठीक, पण पन्नाशीच्या बाईने पंचविशीतील दिसण्याचा अट्टाहास कशासाठी?वजनाचा काटा आटोक्यात असावा जे ठीक, पण ‘साइझ झिरो’ चा हट्ट कशाला? सगळ्यांना वन पीस चांगलाच दिसला पाहिजे, हा हट्ट कशासाठी ? काहींची वळणे साडीमध्ये काय सुरेख दिसतात. टाचा मोडून पडतात की काय असं वाटेपर्यंत दुखावणार्‍या हाय हील कशासाठी. टाच महत्वाची आहे की फोटो?

मुळात या पर्फेक्शनच्या व्याख्या कोण ठरवते आहे?

ऑफिसला काय घालावे, घरी काय घालावे, कसे रहावे, कसे चालावे, कसे बोलावे, कसे दिसावे, कुठे फिरायला जावे, काय आणि कधी खावे, अगदी कुठल्या गादीवर आणि कसे झोपावे, सगळं काही ठरवण्याचे हक्क आपण मिडियाला नेमके का आणि कधी दिले?

एक माणूस दुसर्‍या सारखं कधीही नसतं मग सगळ्यांना एकच व्याख्या कशी लागू होईल?

करा की मस्त भिंतीला तंगड्या लावून आराम. होऊ देत घराचं गोकुळ. अघळपघळ गप्पा मारा मुलांशी, नवर्‍याशी. मस्त मोठमोठ्याने गाणी म्हणत फिरा घरभर गबाळ्या अवतारात. आणि तेवढ्यात पाहुणा आलाच तर त्यालाही आग्रह करा गोष्ट सांगायचा. सध्या दुर्मिळ होत चाललेली कला आहे ती.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आईचा खिसा’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आईचा खिसा’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की बाबांना कसा खिसा असतो, त्यात ते पेन , सुट्टी नाणी, कधी कधी बंद्या नोटा ठेवतात,तसा आईला खिसा का नसतो?शाळेची फी भरताना बाबा कसे ऐटीत खिशातून काढून फीसाठी पैसे देतात , किंवा प्रगति पुस्तकावर खिशातलं पेन काढून ऐटीत सही करतात. तसा आई जवळ खिसा का नसतो? आणि जर असलाच खिसा तर नेमका कुठे असतो? आईला विचारलं तर ती फक्त हसायची. “तुला भूक लागली असेल ना?” असं म्हणून पदर खोचून शिऱ्यासाठी रवा भाजायला घ्यायची .  रवा भाजण्याच्या त्या वासावर भुकेशिवाय दुसरं काही सुचत नसे. एकदा खेळताना पडल्यावर पायाची जखम पुसायला कापसाचा बोळा मिळाला नाही म्हणून चक्क कॉटनच्या नव्या साडीच्या टोकाने  माझी जखम तिने पुसून काढली आणि  कपाटातील कैलास जीवन काढून त्यातलं लोण्याच्या गोळ्यासारखं मलम माझ्या जखमेवर लावलं.

मला रात्री लवकर झोप यायची, तेव्हा घरातली कामं लगबगीने आवरून ती तिच्या जुन्या साडीचा काठ घडी करून मला दिव्याच्या उजेडाने  त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांवर मांडायची आणि मला त्या साडीसारखीच अगदी तलम निद्रा यायची.

कुठे बाहेर जाताना बाबा खिशातून पैसे काढून रेल्वेची तिकीट काढायचे आणि आई मात्र खिडकीतून झो झो येणारा वारा माझ्या कानाला बसतो म्हणून माझ्या काना- केसांभोवती आपला पदर गुंडाळून घ्यायची. तेव्हाही माझं लक्ष खिडकीतल्या बाहेरच्या दृश्याबरोबर बाबांच्या खिशाकडे असायचं.

मोठा झाल्यावर मीसुद्धा बाबांसारखा खिसा शिवून घेऊन त्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवणार, हे ठरवून ठेवले होते. नेमकी तेव्हाच आई पदराच्या टोकाला गुंडाळून ठेवलेली गोळी (मला तहान लागली असताना) हळूच माझ्या जिभेवर ठेवायची. तृषा पूर्ण शांत व्हायची. कधी खेळताना सर्व मुलं बॉल आणण्यासाठी वर्गणी काढत. अशा वेळी आई तिच्या पदरात बांधलेला रुपया- दोन रुपये काढून देत असे आणि वर रुपया देऊन “उन्ह फार आहे. पेपरमिंट खा चघळायला,” म्हणून सांगत असे. मित्र म्हणत, ” तुझी आई खूप छान आहे रे!” तेव्हा कॉलर टाईट होत असे.

आईकडे खिसा नसताना बाबांपेक्षा जास्त गोष्टी तिच्याकडे कशा, हा प्रश्न मला  थोडा मोठा  होताना पडू लागला. आणि एक दिवस मला माझंच उत्तर सापडून गेलं. आईकडे खिसा असतो. आणि त्या खिशाला चौकट नसते. तो आईचा पदर असतो, जो कायम मुलांसाठी सुखं बांधून ठेवत असतो आणि तोच आईचा कधीही  रिक्त न होणारा खिसा असतो .

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हाताचे ठसे… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ हाताचे ठसे… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

बाबा भिंतीला धरून (भिंतीला हात लावून )चालत रहायचे .ते जसे जसे भिंतीला हात लावत, त्या त्या ठिकाणाचे रंग पुसट होत जात व मळकट होत.

ते पाहून माझ्या बायकोच्या  चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो .

त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं की कोण जाणे त्यांनी डोक्याला तेल लावले होते  आणि त्याच हाताने भिंतीला धरून चालत राहिल्याने  हाताचे ठसे भिंतीवर उमटले असावेत .आणि ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली .मला पण काय झालं होतं, कुणास  ठाऊक!  मी तडक  बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणलो, “बाबा, तुम्ही भिंतीला हात न लावता चालण्याचा प्रयत्नच करणार नाही का ?” माझा आवाज जरा उंचच झाल्यासारखं मला वाटलं .८०वर्षाचे  माझे बाबा. त्यांनी माझ्याकडे बघितले . एखादा लहान मुलगा आपली चूक झाली असावी, असा चेहरा करतो, तसा बाबांचा झाला होता . मान खाली घालून ते गप्प बसले .

‘छे!हे मी काय केलं?मी असं म्हणायला नको होतं,’

असं मलाच वाटायला लागलं .

माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन  झाले आणि त्यांनी भिंतीला हात लावून चालणं सोडून दिले .

पुढे दोन-चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले .आणि  त्यांनी अंथरुणच धरलं .पुढे दोन दिवसांनी त्यांनी आपली इहलोक यात्रा संपवली .

भिंतीवरच्या त्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काही तरी अडकल्यासारखं वाटत राहिलं.

दिवस ,दिवस पुढे उलटत राहिले .माझ्या बायकोला भिंती रंगवून घ्यावे, असे वाटू लागले .

रंगविणारे आलेसुद्धा.

आमच्या जितूला आपले आजोबा म्हणजे प्राण प्रिय .भिंती रंगविताना आजोबांच्या हाताच्या ठशांना सोडून रंगविण्याचा हट्टच धरला .

शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले, “सर, तुम्ही काही काळजी करू नका  त्या ठशाच्या भोवतीने गोल करून छान पैकी डिझाईन करून देतो .ते तुम्हालाही आवडेल .शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही.

पेंटरने व्यवस्थित ठसे तसेच ठेवून भोवतीने सुंदर डिझाईन करून दिलं.

पेंटरची  आयडिया सर्वांनाच आवडली .घरी येणारे पाहुणे , मित्रमंडळींना पण आवडली. ते या कल्पनेची खूप स्तुती करू लागले. आणि पुढे जेव्हा जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होत गेले, तेव्हा तेव्हा त्या हाताच्या ठशाभोवती डिझाईन बनविलं जाऊ लागलं.

सुरुवातीला मुलाच्या हट्टापायी हे जरी करत राहिलो, तरी आमचाही व्यामोह वाढत गेला .

दिवस , महिने, वर्ष पुढे सरकत चालले .जितू मोठा झाला.त्याचं लग्न झालं.  तसं मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो .बाबांच्या एवढा नसलो, तरी सत्तरीला येऊ लागलो होतो .

मलाही तेव्हा भिंतीला धरून चालावं, असं होऊ लागलं.

पण मला तेव्हाचं आठवलं. किती चिडून बोललो होतो बाबांना! म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालत राहिलो .

त्या दिवशी रूममधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार, तोच मी माझ्या मुलाच्या बाहूमध्ये असल्याचे जाणवलं.”अहो बाबा, बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना ? आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला. ” मुलाचे वाक्य कानावर पडले .

मी  जितूच्या मुखाकडे पाहत राहिलो . त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. पण द्वेष नव्हता .

तिथेच जवळच्या भिंतीत बाबांचे हात मला दिसले .

माझ्या डोळ्यांसमोर बाबांचं चित्र उभं राहिलं.

त्या दिवशी मी  ओरडून बोललो  नसतो, तर बाबा अजून जगले असते, असं वाटू लागलं .आपोआप डोळ्यात पाणी साचू लागलं.तेवढ्यात तिथेच जवळ थांबलेली 8 वर्षाची नात  श्रिया धावत आली.

“आजोबा , आजोबा, तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला,”म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली .

हॉलमधील सोफ्यावर बसलो .लगेच नातीने आपलं ड्रॉईंग बुक दाखवलं , “आजोबा, आज माझ्या क्लासमध्ये ड्रॉईंग परीक्षा झाली.मला फर्स्ट प्राईझ मिळालं.” 

“हो का ? अरे व्वा!  दाखव बघू. कोणतं ड्रॉईंग आहे ते?”म्हटल्यावर तिने ड्रॉइंगचं पेज उघडून दाखविलं.

आमच्या भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे, तसंच काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती.

आणि म्हणाली ,”टीचरनी विचारलं,हे काय आहे ? म्हणून. मी सांगितले, हे माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे.आमच्या घरच्या भिंतीवर हे चित्र कायमचं कोरून ठेवलंय .

टीचर म्हणाल्या , मुले लहान असताना असे भिंतीवर चित्र काढत असतात. भिंतभर रेघोटे,हाता पायाचे चित्र काढत राहतात .मुलांच्या आईवडलांना त्यांचं कौतुक वाटतं .त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं .टीचर आणखी म्हणाल्या आपण पण आपल्या वयस्क आई- वडिलांवर ,आजी- आजोबावर असेच प्रेम करत राहायला पाहिजे . मला व्हेरी गुड श्रिया असे म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं

असं श्रिया गोड गोड बोलत राहिली.  तेव्हा  मला माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे, असं वाटू लागलं .

मी माझ्या रूममध्ये आलो .दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटोपुढे येऊन “मला क्षमा करा. बाबा, मला क्षमा करा,” असं म्हणत मन हलकं होईपर्यंत रडून  घेतलं  आणि वरचेवर असंच रडून बाबांची क्षमा मागत राहिलो.

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थांबणे… लेखक : श्री सुभाष अवचट ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ थांबणे… लेखक : श्री सुभाष अवचट ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

कुठे..?

केव्हा..?

कसे थांबावे..?

ही एक कला आहे.

ती सर्व कलांमध्ये लागू होते..!

कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते.

माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला.

स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्ट्य तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘गड्या, जगण्याची आतून उमेद राहिली नाही…!’

विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले.

पु. ल. देशपांडे यांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले.

‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते…!,’ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.

विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वानाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘सकाळी काही घाई नाही.’ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते.

ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे, जसे त्यांचे वाड:मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली…! आता पुढे भेट शक्य नाही.’

‘परदेशी चाललाय का…?’ मी विचारले. ‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला…!’

ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवड्यात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते.

ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत…! त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत.

जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.

वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते.

कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

समतया वसुवृष्टि विसर्जनै

जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो…

हे विसर्जन…!!!

झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी  हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे.

आजकाल लोकाना कुठे थांबावे हेच समजत नाही. जीव संपला तरी हावरटपणा जात नाही. छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात मागे वळून बघत नाही. स्वत:ची पर्वा नसते का..? तर जेवढे कमवता येईल तवढे पदरात पाडून घ्यायचे पण एक दिवस सर्व असुनही सर्व संपल्यासारखे दिवस येतात तेव्हा हातात फक्त निराशा आणि अंधारच दिसतो.ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते. मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला. शेवटी हे सगळे मायाजाल न संपणारे आहेत. त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच…!!!

विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही…!!!!

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समजूतदार आग्रह… – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ समजूतदार आग्रह… – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

आपण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, ती चटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथी तृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पण आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय. अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली.

अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघड झाल्यानं शेवटी श्रीकांत अन्‌ मृदुलाला मी कळवलंच ः “येतो येत्या शनिवारी जेवायला.’

त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं “जेवायला येतोय’ म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे.

तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहा मिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, “तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेल “प्रीफर’ कराल? “स्वीकार’ गार्डन रेस्टॉरंट आहे, “अतिथी’तलं फूड मस्तच!, “सुरभि’मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा…’ 

संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं.

“हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.’

“अस्सं कस्सं? तुम्हा आमच्या घरी आलायत नं जेवायला?’

तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, “अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.’

श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, “वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!’

चला! मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. खूप आग्रह करून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क “घरचं’ जेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं – मनापासूनचं!

ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले : “हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे. व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस…’

फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची खिचडी मूग गिळून बसली! 

श्रीकांत म्हणाला, “”आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हां, इथल्या “सागर’मधलं फूड बाकी…’ 

दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न्‌ खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त “पार्सल’चं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पण ज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सलपरंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेल तर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्‍नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही “व्वा!’ म्हणावं तर लगोलग उत्तर येतं – “हे श्रेय माझं नाही. “अन्नपूर्णा’तून आणलंय!’

दिवस “पार्सल’नं सुरू होतो; “पार्सल’नं संपतो. ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून “चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजी’ पार्सल, तर रात्री घरी जाताना “आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!’ 

आजारपण, वार्धक्‍य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं “रेडीमेड पार्सल’ आणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्ट सुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टू खाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आता नव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत!

घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणार नाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी! आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल…पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!

कुणी म्हणेल; सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झाले तर घर न्‌ हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? आता गंमत म्हणून, फॉर अ चेंज म्हणून “घरी’ जेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर सुख दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन्‌ बेफाम वेगानं वाढत आहे. या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं.

जाहिरातीतले स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न्‌ घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. एखाद्‌ वेळची “सोय’ जर “कायमची व्यवस्था’ होत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील! त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल.

आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सलसंस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार! पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट!

आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न्‌ समाज नावाच्या घरात एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही. पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.

आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षण पुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर “शब्द’सुद्धा “पार्सल’मधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत. 

श्रीकांत न्‌ मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती व तंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं “मन’ व्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतो, हेही त्यांना समजायला हवं!

दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून “पार्सल’ने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा “माझ्यासाठी’ केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता!

लेखक : श्री प्रवीण दवणे.

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तरच मी लग्नाला तयार होईन…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “तरच मी लग्नाला तयार होईन…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

तरच मी लग्नाला तयार होईनअशी मागणी  ऐकून थक्क झाले

दोन दिवसांपूर्वी एक विवाह  जमवण्यासाठी उपस्थित होतो.

मी मुलाकडील बाजूने होतो.

मुलगा माझ्या मित्राचा होता.

मुलाचा माझा फारसा परिचय नव्हता.

पण मित्र नेहमीच्या परिचयातील होता.

मुलाने मुलगी पसंती कळवलेली होती.

बैठकीच्या सुरुवातीला मुलाने खालील मागण्या केल्या.

त्या ऐकल्याबरोबर वधुकडील मंडळी आश्चर्यचकीत झाली आणि मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागून घेतला.

✅ संपूर्ण विवाह वैदिक पद्धतीनुसार होईल. ✅

  1. ✅ कोणत्याही प्रकारचे विवाहपूर्व चित्रफीत अथवा छायाचित्रण होणार नाही. ✅
  2. ✅ वधु विवाहप्रसंगी घागरा न घालता महाराष्ट्रीय पद्धतीची साडी नेसेल. ✅
  3. ✅ विवाहस्थळी कसलेही कानठळ्या बसवणारे संगीत न वाजवता शांत संगीत वाजवण्यात येईल.✅
  4. ✅ विवाहप्रसंगी म्हणजे हार घालतेवेळी केवळ वधु आणि वर मंचावर असतील✅
  5. हार घालतेवेळी वधु किंवा वरास उचलणार्‍यास विवाहमंडपातून बाहेर घालवण्यात येईल. ✅
  6. ✅ गुरुजींनी विवाहविधी सुरु केल्यानंतर कोणीही त्यांना थांबवणार अथवा अडथळा आणणार नाही.✅
  7. ✅ छायाचित्रकार अथवा चित्रफीत तयार करताना गुरुजींना दिशादर्शन करणार नाही. तो लांबूनच चित्रीकरण करेल. ✅
  8. छायाचित्रकार वधुवरांना चित्रविचित्र पोजेस देण्यास सांगणार नाही. ✅
  9. वधुवरांना सर्व आमंत्रितासमोर आलिंगन देण्यास सांगणार्‍यास विवाहमंडपाचे बाहेर काढण्यात येईल.✅
  10. वधु अथवा वराकडील कोणताही पाहुणा दारु अथवा इतर विचित्र भोजन पदार्थ मागणार नाही.
  11. कानठळ्या बसवणारे संगीत बिलकुलच लावण्यात येणार नाही.
  12. भोजनामध्ये अथवा नाश्त्यामध्ये कोणतेही विचित्र पदार्थ असणार नाहीत. भोजन व नाश्ता पूर्णपणे महाराष्ट्रीयन पद्धतीचे व साधे असेल.
  13. विवाहप्रसंगी कोणतेही अचकट विचकट नाच होणार नाहीत.
  14. विवाहप्रसंगी अथवा आदल्या दिवशी संगीत रजनीच्या नावाखाली चित्रविचित्र नृत्ये होणार नाहीत.
  15. लग्नाच्या आधी प्री वेडिंग गाणे,व भेटणे फोटो काढणे  मला आवडणार नाही..
  16. कमीत कमी खर्च व धर्म व शास्त्रीयपद्धतीने विवाहअसेल तर मी   तयार होईल…
  17. आई वडील खूप कष्ट करून लहानस मोठे करतात,जीवापाड जपतातलग्न साठी कर्जबाजारी  होतात, हा  वायफळ खर्च  टाळा

 

हा संदेश,,,

आश्चर्य म्हणजे वधुकडील मंडळींनी काही वेळानंतर चर्चा करुन उपरोक्त मागण्या मान्य केल्या आणि विवाह साध्या पद्धतीने करण्य‍ाचे मान्य केले.

आजच्या काळात असा विवाह प्रस्तावित करणार्‍या या मुलाचे मी ताबडतोब अभिनंदन केले.

बघा जमतय का ?

ही काळाची  व  संस्कृती जपण्याची गरज आहे … 🚩

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “छंदश्रीमंत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “छंदश्रीमंत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

लघु कथा  – – १.

आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधांच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़ मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.

लघु कथा ..२.

शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले ; त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रूंनी शाई फुटली होती.

लघु कथा  – -३.

आजोबांच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ीन बरा… माझ्याजवळ दोन काठया असताना.

लघु कथा  – – ४.

आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवालदाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहोर आला नाही.

लघु कथा  – -५.

ऑफीसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, “ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.”

लघु कथा  – -६.

वडील गेल्यावर भावांनी सम्पत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खूप भाग्यवान, माझ्या वाट्याला तर आयुष्य आलंय.

लघु कथा  – -७.

काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .

लघु कथा  – -८.

तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये, तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच 5000 चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला. म्हणाला, लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता. माझा दोस्त बरा झाला की छानशी साडी घ्या. त्या पाकिटापुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.

लघु कथा  – -९.

आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावत-पळत घर गाठले तिने. स्वैपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन, भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.

✨ लघु कथा  – -१0.

तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाईच्या केसांत फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती. त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.

सकारात्मक रहा…

सध्या बाहेर इतके नकारात्मक विचार फैलावतायेत की लोकांचा माणसातल्या चांगुलपणा वरचा विश्वास उडत चाललाय. अश्यावेळी अश्या सकारात्मक लघुकथांची आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याची खरोखर आवश्यकता आहे !!!

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवरा आणि नारळ… – लेखक : श्री. पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ नवरा आणि नारळ… – लेखक : श्री. पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची. 

बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही. 

दोन्हीही कसेही निघाले तरी  ‘पदरी पडले, पवित्र झाले’. 

दोघांनाही देवघरात स्थान,  दोघेही पुज्य.

 

पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर मद्रासीअण्णाच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे. 

हल्ली ऑन लाईन साईटवर सगळ्या किमतीचे नवरे असेच रचून ठेवलेले असतात. 

 

नारळ म्हटलं कि मला धडधडतं . 

चांगला ओळखायचा कसा ?

मी उगाचच कानाजवळ नेऊन 

हलवून वगैरे बघत असे. 

 

अण्णाला कळायचं हे गि-हाईक  नवीन आहे. तो आपली जाड पितळी आंगठी दोन तीन नारळावर टांग टांग वाजवून हातात एक नारळ द्यायचा. 

ये, लो ! म्हणायचा. 

मी विचारायचो ‘खवट’ निकलेगा तो ? 

तो म्हणायचा ‘तुम्हारा नसीब !!’

 

आजी म्हणायची नारळ गोड निघाला तर दडपे पोहे, सोलकढी व खोब-याच्या वड्या आणि काय काय !

 

खवट निघाला तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्च तेल बाजूला घ्यायचं. घाणीवरचं असतं तसं. 

कापलं, भाजलं, ओठ फुटले, टाचाना भेगा पडल्या, केसांना लावलं, थंडीत चोळलं, दुखऱ्या कानात टाकलं, 

उत्तम घरगुती औषध. किती उपयोगी …. किती बहुगुणी !! 

 

थोडक्यात काय, 

नवरा काय ? नारळ काय ? 

गोड निघाला तर नशीब, 

खवट निघाला तर उपयोगी, 

हे कोकणी तत्त्वज्ञान. 

ह्याला जीवन ऐसे नांव !!

 

(याबाबत माझी एक विशेष सूचना…. या मध्ये “नवरा” या ठिकाणी “बायको”  लिहून ही वाचू शकता.अर्थात स्वतःच्या जबाबदारीवर…. मग खरी गंमत येईल.) 

लेखक –  श्री. पु ल देशपांडे

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माहेर मैत्रिणीचे … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माहेर मैत्रिणीचे … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

काल अगदी सकाळी एका मैत्रिणीचा फोन आला ..  ” मी आज दिवसभर तुझ्याकडे रहायला येतेय ” आणि  सकाळी 9 वाजता  ती आली.  सकाळीच डबा करायचा असतो तेंव्हाच स्वयंपाक  होऊन जातो, त्यामुळे ती आली तेव्हा माझी  बरीच कामं होऊन मी गप्पा मारायला मोकळी झाले होते.  

ती येतेय म्हणून तिला आवडणारी  गरम थालिपिठं ,लोणी, मिरचीचे लोणचे ब्रेकफास्ट साठी तयार केले . थालिपिठं 1 घास खाल्ले आणि म्हणाली “अगदी माझी आई  करायची तसेच झालेत  ग” मस्करी, बडबड करत, गाणी ऐकत  ब्रेकफास्ट केला.  मग  सध्या काय वाचन चालू आहे पासून नवीन काय खरेदी केलीस असे  विचारत आधी तुझ्या  सुंदर साड्या बघू दे  म्हणत साड्यांच्या कपाटाकडे मोर्चा वळवला  आणि  एक दिवस मी तुझ्या साड्या पळवून नेणार हे सांगून टाकलं. नातेवाईक , राजकारणी आणि राजकारण ,शिक्षण  ,सोशल मीडिया त्यावरचे  फ्रॉड  या सगळ्या वर पूर्ण अधिकार वाणी ने  तावातावाने मते मांडून झाली त्यातले कळते किती हा भाग सोडा . 

मी इंस्टावर नाही म्हणून फेसबुक वर active असते, म्हणून मला ‘तू आज के ज़माने की नहीं है “असे   नेहमीप्रमाणे चिडवून ,बघू नवीन काय लिहिले आहेस असे म्हणून फेसबुक उघडून माझ्या पोस्ट वाचत बसली तुझे बरेच पोस्ट छान असतात ग मला खूप आवडतात तुझे सर्व पोस्ट .

आज तुझ्या झाडांना मी पाणी घालते असे म्हणत पाणी घालायला घेतले आणि  म्हणाली ” काय जादू करता ग ..  माझ्या आईची पण तुझ्या सारखीच सदा फुलांनी बहरलेली बाग असायची, माझ्याकडे नाही येत अशी इतकी फुलं ”  तिची अखंड बडबड चालू असताना मला  मात्र कुठे तरी  तिचं काही तरी बिनसले आहे असे वाटत होते. 

दुपारी तिला आवडते म्हणून दलियाची खिचडी , 2/3 प्रकारची फळे होतीच घरात  मग  fruit custard  केलं  … जेवताना  मला काही तरी जाणवलं  म्हणून उठून तिच्या जवळ जाऊन  तिच्या पाठीवर हात ठेवून  म्हंटलं  “आईची आठवण येतेय ना ”  हे ऐकल  आणि मला मिठी मारून तीने इतका वेळ अडवलेल्या डोळ्यातील पाण्याला वाट करून दिली.  

शांत झाल्यावर म्हणाली ” आधी  बाबा  गेले  आणि  3 वर्ष झाली आई  गेली , दादा  अमेरिकेत .. 

1 दिवस  कुठल्याही  जबाबदारी शिवाय  लहान होऊन  जगावं  ते माहेर राहिलेच नाही ग … काल पासून अस्वस्थ होते मग  म्हंटलं  मैत्रीण आहे ना  … 

आणि बघ  आई कडे गेल्यावर आई माझ्या आवडीचे जे पदार्थ करायची  त्यातले पदार्थ केलेस  … मी  मस्त लोळून tv पाहिला  , insta  वर टाईमपास केला  ..  गाणी ऐकत गप्पा मारल्या … आणि विशेष म्हणजे मी  डिस्टर्ब आहे  आणि कशाने डिस्टर्ब आहे हे तू ओळखलेस , आणि  आता  मनातले  दुःख बोलून  मन हल्का हो गया मेरा. तुझ्याकडे मी 1 दिवसाच  माहेरपण enjoy केलं . 

एक दोन दिवस राहा बोलली तरी ऐकले नाही माझे.  खूप हट्टी अगदी लहानपणापासूनच.  

संध्याकाळी घरी जातांना मला एक घट्ट मिठी मारली आणि अश्रू नकळतपणे डोळ्यात तरंगत होते दोघीच्या ही ..  माहेरी म्हणून माझ्याकडे आलेली माझी माहेरवाशीण मैत्रिण आनंदाने घरी गेली. 

वय कितीही असू द्या,  घरी कितीही मोकळ वातावरण ,ऐश्वर्य असू द्या पण  माहेरी जो आनंद, समाधान मिळते त्याची सर कुठल्याही ऐश्वर्याला  नाही हेच खरं …. 

लेखिका : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मम्मी म्हणा, मदर म्हणा,— ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ मम्मी म्हणा, मदर म्हणा,— ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

मम्मी म्हणा, मदर म्हणा,

आई शब्दात जीव आहे.

*

पिता म्हणा, पप्पा म्हणा,

बाबा शब्दात जाणीव आहे.

*

सिस्टर म्हणा, दीदी म्हणा, 

ताई शब्दात मान आहे.

*

ब्रो म्हणा, भाई म्हणा,

दादा शब्दात वचक आहे.

*

फ्रेंड म्हणा, दोस्त म्हणा,

मित्रा शब्दात शान आहे.

*

रिलेशन म्हणा, रिश्ता म्हणा,

नातं शब्दात गोडवा आहे.

*

हाय म्हणा, हॅलो म्हणा,

हात जोडणे संस्कार आहे.

*

सर म्हणा, मॅडम म्हणा,

गुरु शब्दात अर्थ आहे.

*

ग्रँड पा,  ग्रँड मा  

या शब्दात काहीच मजा नाही,

आजोबा आणि आजी 

यासारखे सुंदर नाते जगात नाही.

*

गोष्टी सर्व सारख्याच आहेत, 

पण फरक फार अनमोल आहे.

*

‘अ’  ते  ‘ज्ञ’  शब्दात ज्ञानाचे भांडार आहे…

म्हणून मराठीत आदर जास्त आहे.

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print