मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ हरवलेला वासुदेव – भाग-२७ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ हरवलेला वासुदेव – भाग-२७ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

हरवलेला वासुदेव..

काळाच्या पडद्याआड गेलेला वासुदेव – व्हॉट्सॲप वरचे, लेखी, फॉरवर्ड केलेले सुप्रभात, गुड मॉर्निंग शब्द त्यावेळी नव्हते. साखर झोपेत मऊशार गोधडीत गुरफटलेले आम्ही जोगेश्वरीच्या देवळातल्या घंटा नादानेच जागे व्हायचो. पाठोपाठ टाळ बासरीचे सूर कानावर पडायचे. आमच्यासाठी मग सुप्रभात काय सुदिनही सुंदर व्हायचा. ‘खंडोबाच्या नावांनी दान पावलं’ असा खणखणीत तालासुरातला आवाज ऐकल्यावर “अरे अरे! वासुदेव आला रे! उठ लवकर”असं म्हणून आम्ही बिछाना गुंडाळायचो. वासुदेव हाच आमच्यासाठी घड्याळाचा गजर होता. पहाटेपासून “अरे उठा आंता गाढवासारखे लोळताय काय! ” आईने आरडा ओरडा करून, आंजारून गोंजारूनही, न ऊठणारेआम्हीं, वासुदेवाच्या घुंगर आवाजाने, , उडी मारून खिडकी गांठत होतो. डोक्यावर मोरपिसाची टोपी, पायघोळ अंगरखा आणि आमच्या वाडवडिलांपासूनची नांवे घेत, ताला सुरात नाचणारा वासुदेव आम्हांला फार फार म्हणजे फारच आवडायचा, आमची प्रभात तो सुप्रभात सुमंगल करायचा. त्याच्या खांद्यावरच्या गव्हा तांदुळाच्या झोळ्या कधी मूठमूठ धान्याने भरायच्या तर कधी फक्त्त पसाभरचं धान्य झोळीत पडायचं. अशावेळी आधीची उत्साहाने नाचणारी त्याची पावलं जड व्हायची. त्याचा चेहरा उतरायचा. जड मनाने परत जाणारा वासुदेव आम्हाला केविलवाणा वाटायचा. तशीच कींव आम्हाला पोतराजाची यायची नावाने’पोतराज’पण परिस्थितीने रंक असा तो लांब केस राखलेला कमरेला चोळीचे खण गुंडाळणारा आणि पाठीवर आसुडाचे फटाफट आवाज काढत फिरणारा ‘पोतराज’ आम्हांला भयभीत करायचा. सारं काही पोटासाठी करणाऱ्या या लोकात, “नागोबा नरसोबा दोन पैसे, रंगीत चित्रपट दोन पैसे, “असे ओरडत जाणाऱ्या छोट्या मुलांचीही गणना असायची. तसंच श्रावणात आघाडा दुर्वा, फुलेविकणाऱ्या नऊवारीतल्या बायकांचीही वर्णी असायची. तेवढीच नवऱ्याच्या पिठाला मीठाची जोड असं म्हणून चार पैसे त्यांच्या कनवटीला लागायचे. पावसाळ्यापासून त्यांच्या मिळकतीला सुरुवात व्हायची तसेचं छत्रीवाले, ” ऐ छत्री दुरुस्तवालेsss, ” असे ओरडत गल्लोगल्ली फिरायचे. दरवर्षी नवीन छत्र्या घेणे परवडणार तरी कसं हो? मग काय! माळ्यावरच्या छत्र्या खाली उतरवल्या जायच्या. छत्रीच्या काळ्या झग्याला भोकं पडलेली असायची, तर कुठे काड्यांनी माना टाकलेल्या असायच्या. अशावेळी धाकटे, मिस्कील काका म्हणायचे, “अरे छत्र्यांच्या डॉक्टरांची हाळी ऐकली की त्याला थांबवा बरं कारे! सगळ्या छत्र्या दुरुस्त करून घ्यायच्यात. दोन पावसाळे तरी सहज जातील. ” हा छत्री डॉक्टर इतका हुशार की, कधीकधी काळ्या छत्रीवर पांढरी ठिगळं जोडायचा. बाकी पावसाळ्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांबरोबर त्याचा खिसाही नाण्यांनी भरायचा. पावसाळ्यात अशी कलाकुसरीने पॅचवर्क केलेली छत्री डोक्यावर घेऊन आम्ही शाळेत जात होतो. काळ्यावर पांढरं ठीगळं उठून दिसायचं, आणि अहो! जातांना इतकी लाज वाटायची म्हणून सांगू! पण छत्रीआड चेहरा लपवून आम्ही शाळागाठायचो. कधी कधी उसवलेल्या छत्रीतून चुकार थेंब आमच्या डोक्यावर गुलाब पाणी शिंपडायचे. डोकं भिजायचं, पण पावलं म्हणायची, ‘असुंदे तू चाल पुढे’–

आमच्या लहानपणी गॅस नव्हतेच, फरफरणारे स्टो पेटवले की एका मिनिटात दूध सरसर वर येऊनहमखास उतू जायचंच आम्हाला स्टो जवळ पहारा करायला सांगून आई आंघोळीला जायची. समुद्राच्या लाटेसारखं दूध वर वर आल्यावर इतकी त्रेधा तिरपीट उडायची की, दुधाला भरती येऊन ते सूळकन सांडून स्टो’राम’म्हणायचा. आई यायच्या आत तो पसारा आवरतांना ‘दे माय धरणी ठाव’ व्हायचं, बहिणींच्या हातून खळखळ उकळणारी आमटी खळखळून पातेल्याबाहेर उसळी मारायची. ‘स्टो’ विश्रांती गृहात जायचा. आईचा ओरडा बसायला नको म्हणून, बहिणी पसार व्हायच्या. अष्टावधानी आईच्या हातात मात्र, हे तंत्र सांभाळण्याचं अजब असं कसब होतं. मग काय! आमच्या हातून बिघडलेले स्टो, दुरुस्त करणं भागच होतं, कारण आईचं कामठप्प व्हायचं. इतक्यात ‘प्राsssयमस ‘अशी रिपेअर करणाऱ्या फेरीवाल्याची आरोळी कानावर पडली की ओरडून टाळ्या वाजवून त्याला वर बोलवलं जायचं. तो नाही आला तर दुकानातल्या स्टो दुरुस्त करणाऱ्याला आमंत्रण पत्रिका द्यावी लागायची.

आता आला दुसरा कारागीर. छत्रीला ठिगळं जोडणाऱ्या कारागिरापेक्षाही अत्यंत हुशार असा भांड्यांना डाग देणारा कल्हई वाला “भांड्यांना कलाहहीय्येsss “, अशी हाळी द्यायचा, गृहिणी लगबगीने खेळणाऱ्या पोरांना पकडून माळ्यावर चढवायच्या. मग माळ्यावरची पातेली, सतेली, तेलाची बरणी इत्यादी सामान खाली उतरायचं. माळ्यावर टाकलेली भांडी खाली आल्यानंतर या फेरीवाल्यांचा भांड्यांना डाग देणाऱ्यांचा धंदा जोरात चालायचा सोबतीला कल्हई वाले होतेच, कल्हई वाल्यांनी कोपऱ्यात भट्टी लावली रे लावली की पूर्ण वाड्यातला संसार अंगणात उतरायचाचं भांड्यांना मरण नव्हतं. दिलखुलास हंसत खुशीने शीळ घालत तो भांड तापवायचा मग त्यात नवसागर टाकून आतून कापसाचा बोळा फिरवला की पातेल्यात चंदेरी दुनिया बरसायची. बोळा फिरवताना तो चिमट्याने पातेलं बादलीत बुचकळायचा आहाहाहा! तो चर्रर्रर्रर्र आवाज अजूनही कानांत घुमतोय. नंतर मग काय! ते पितळ्याच पिवळं, कळकट मळकट पातेलं, भांड आंतून चांदीचं व्हायचं. तास दोन तास भांड्याशी लढाई खेळणाऱ्या या कारागिराची पण चांदी व्हायची कारण त्याचा खिसा पैशाने फुगलेला असायचा. तो उठला रे उठला की! आमची कामट्या घेऊन भट्टी विस्कटून नवसागराचे तयार झालेले मणी शोधण्यासाठी हाणामारी सुरू व्हायची. श्रावणात फड्या नाग घेऊन “नागोबाला दूध “असा आरोळा ठोकणारा, झाकणाच्या टोपलीतल्या नागाला टपल्या मारून फडा काढायला लावणारा गारुडी आम्हाला ग्रेट वाटायचा. ग्रहणाचे वेध लागताचं “दे दान सुटे गिऱ्हान “म्हणून आम्ही खिडकीतून टाकलेले कपडे अचूक झेलणारा वर्ग आता गायब झालाय जग पुढे गेलय, पण मन मात्र मागे वळून म्हणतेय, ‘कुठे गेले हे सारे कारागीर, तो वासुदेव आणि फेरीवाले? मैत्रिणींनो पाह्यलंत कां तुम्ही त्यांना? दिसले तर त्यांना धन्यवाद सांगा हं! कारण एके काळी त्यांनी आम्हांला लाख मोलाची मदत केली आहे. म्हणून लेखात त्यांचा आवर्जून उल्लेख करतांना मन मागे मागे जातंय.

– क्रमशः भाग २७

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हाबुराचे दही – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ हाबुराचे दही – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

जेवणात दही कोणाला आवडत नाही? मधुर आणि ताजं दही म्हणजे जेवणातलं अमृत. आमच्या घरी दुधात दोन-चार चमचे ताक किंवा एक दोन चमचे दही टाकून विरजण लावायची पद्धत आहे. तर अशा पद्धतीने विरजण लावून बरं चाललं होतं…

अशात एकदा युट्यूब बघता-बघता मला दही विरजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती दिसू लागल्या. उत्सुकता म्हणून मी त्या बघितल्या आणि मग माझे सत्याचे प्रयोग सुरू झाले.

रात्री दुधात देठासकट हिरवी मिरची टाकून झाकून ठेवलं. आता व्हिडिओतल्यासारखं मस्त घट्ट दही तयार होणार असं स्वप्न बघत झोपी गेले. सकाळी उठून पाहिलं तर त्या विरजणाच्या दुधाला घाणेरडा वास येत होता. मग ते कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं.

त्यानंतर दुधात लिंबाच्या रसाचे थेंब टाकून विरजण लावून पाहिलं तर ते दही बेचव आणि कडवट लागलं. मग कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं. तुरटी फिरवून दही लावून पाहिलं. तेही कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातलं.

त्यानंतर हस्त नक्षत्राच्या पावसाचं पाणी दुधात मिसळल्यावर फार सुंदर दही होतं असं वाचलं. मग एके दिवशी जोराचा पाऊस सुरू झाल्यानंतर मी स्टीलचं पातेलं घेऊन गच्चीत गेले. संपूर्ण भिजले पण पातेल्याच्या बुडाशी जमेल इतकं पाणी गोळा करूनच आणलं. मग हे बड्या मुश्किलीने पकडलेलं हस्तजल दुधात घातलं.

पण दूध खराब होण्यापलीकडे काहीच झालं नाही. कदाचित ते वेगळंच नक्षत्र असावं. एक तर हस्त नक्षत्र ओळखण्यात मी चुकले असेन किंवा हस्त नक्षत्राने मला हस्त हस्त फसवलं असेल. पण दही काही लागलं नाही. तेही कढीपत्त्याच्या झाडाला नेऊन घातले.

त्यानंतर कवडी दही बनविण्याची रेसिपी बघितली. संक्रांतीचं सुगड स्वच्छ धुवून दोन दिवस ते पाण्यात बुडवून ठेवलं. मग त्यात तापवून थंड केलेलं निर्जंतुक दूध आणि थोडं ताकाचं विरजण घातलं. सुगडाला “यशस्वी भव” असा आशीर्वाद देऊन झाकण लावून ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी दुधातलं पाणी झिरपून गेलं आणि उर्वरित घन पदार्थ गाडग्याला आतून चिकटून बसला. तो चमच्याने खरडून काढावा लागला.

दह्याचं आणि माझं काय वाकडं आहे कोण जाणे.. चिनी मातीच्या सटात दही चांगलं सटसटीत होतं म्हणून ते करून पाहिलं. पण सटानंसुद्धा माझी सटकवली. एकदा एक मैत्रीण म्हणाली की काचेच्या बाटलीत दही खूप चांगलं विरजतं.

मग एक लांब मानेची स्मार्ट बाटली हुडकून काढली आणि तिच्या पोटात दही लावून बाटली डायनिंग टेबलवर ठेवली. बाटलीचं प्रतिबिंब टेबलाच्या काचेत अतिशय सुंदर दिसत होतं. वेगवेगळ्या प्रकारे लाईट टाकून त्याचे दहा-बारा फोटो काढले. बाटली तर खूपच सुंदर दिसत होती. पण दही मात्र सामान्य दह्यासारखंच झालं. काचेच्या स्पर्शामुळे त्यात काहीही फरक पडला नाही.

पण बाटली धुताना मात्र फार त्रास झाला. बाटलीच्या अप्सरेसारख्या निमुळत्या मानेला आतून चिकटलेलं दही निघता निघत नव्हतं. अखेर अंगणातलं गवत उपटून काटकीला बांधलं आणि बाटलीच्या तोंडातून गवताचा बोळा आत घालून बाटलीची मान धुतली. नेहमीप्रमाणे ती दह्याची पचकवणी कढीपत्त्याला नेऊन घातली.

एकदा मी डी मार्टमधून योगर्ट आणून खाल्लं. ते कॅरमलाईज्ड योगर्ट होतं. मग तो सत्याचा प्रयोग करून झाला. यावेळी दह्याला तो विशिष्ट दुर्गंध येऊ नये म्हणून त्यात विलायचीचे दाणे पण टाकून पाहिले. पण घरचं योगर्ट काही केल्या डी-मार्टसारखं लागत नव्हतं. मग अमुल दह्याचे बुडगे आणून पाहिले.

अशी दहीशोधाची यात्रा सुरू असताना मागच्या आठवड्यात ॲमेझॉनवर नवीनच दहीपात्र सापडले. त्याला हाबूरपात्र असे म्हणतात. तर हाबूर हा दहा लाख वर्षांपूर्वी तयार झालेला ऐतिहासिक दगड आहे. त्या दगडाच्या भांड्यात लावलेलं दही उत्तम होते असे ॲमेझॉनचं म्हणणं आहे.

हा दगड म्हणे लाव्हा खडकापासून तयार झालेला असतो. त्यात भरपूर मिनरल्स वगैरे असतात. या भांड्यात दूध ठेवलं तर बिना विरजणाचे दही तयार होते असा त्यांचा ऑनलाइन दावा आहे. हे सगळं ठीक आहे…. परंतु छोट्यात छोटे हाबूरपात्र कमीत कमी दीड हजाराचं आहे.

तर हा हाबूर दगड फॉसिलचा एक प्रकार आहे. तो राजस्थानात सापडतो. मार्केटिंगवाल्या लोकांनी माझ्यासारखी दहीपात्रे शोधणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा दांडगा अभ्यास केलेला असतो. आमचा बावळटपणा म्हणजे त्यांची कमाई.

तर भरपूर हाबूर संशोधन केल्यानंतर हाबूरपात्र आपल्या खिशाला परवडणार नाही हे माझ्या लक्षात आले. मग मी गुगलवरून त्याचे भरपूर फोटो शोधून काढले आणि जिथे कुठे बांधकामाची वाळू पडली आहे तिथे जाऊन साधारणपणे हाबुराच्या रंगाशी मिळते जुळते दगड शोधायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या काळ्या दख्खनी मातीत तांबुस सोनेरी दगड कधी सापडावेत‌…

पण आजकाल यवतमाळात राजस्थानची वाळू मागवतात. तिचा रंग गुगलवर दाखवलेल्या हाबूरपात्रासारखाच दिसतो. तर कपभर दुधात थोडीशी राजस्थानी वाळू टाकून का प्रयोग करू नये असे माझ्या मनाने घेतले. मनाने घेतले की हातानेही घेतले. माझे हात मनाची आज्ञा पाळण्यासाठी सदैव तत्पर असतात. मग मूठभर वाळू आणून दहा वेळा स्वच्छ पाण्याने धुतली. त्यातली चमचाभर वाळू कपभर दुधात घातली. आणि सकाळी कप उघडून पाहिला. तर दूध जसेच्या तसेच. थोडेसे बुडबुडे येण्यापलीकडे काहीच बदल झाला नव्हता.

मग हे दूध कढीपत्त्याला नेऊन घातलं. मग मी जिथे कुठे बांधकामाची वाळू पडली आहे तिथे जाऊन हाबुर दगडाचा एखादा मोठा तुकडा सापडतोय का हे पाहू लागले. दिसला गोल्डन ब्राऊन दगड की उचल… गोल्डन ब्राऊन दगड दिसला की उचल… असे करता करता पिशवीवर गोल्डन ब्राऊन दगड जमा झाले. अखेर त्या दगडी खजिन्यात मला दोन हाबूरला समानार्थी तांबडे तुकडे सापडले. पुन्हा एकदा कपभर दुधाचा प्रयोग केला. हाबुराच्या नादात पुन्हा एकदा चमत्कारिक हाबुर दही तयार झालं. पुन्हा एकदा ते कढीपत्त्याला नेऊन घातलं.

लपलप हलणारे तारुण्याने मुसमुसलेले दही तयार करायच्या नादात कढीपत्ता मात्र चांगला पोसला गेला आहे आणि तेलाने माखलेल्या बाळाच्या जावळाप्रमाणे तुकतुकीत पानांनी डवरून लसलसत आहे. आता कढीपत्त्याचा दहीपत्ता झाला आहे‌. त्याचे पान चावून खाल्ले तरी आंबटसर लागत आहे. आता फक्त ही पाने दुधात टाकून दही विरजते काय ते पहायचे बाकी आहे….

लेखिका : सुश्री अमृता खंडेराव.

संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आनंदीबाई गोपाळराव जोशी” – लेखिका : सुश्री साधना राजहंस-टेंभेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आनंदीबाई गोपाळराव जोशी” – लेखिका : सुश्री साधना राजहंस-टेंभेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

नुकताच “आनंदी गोपाळ” या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आणि माझ्या जुन्या स्मृति पुन्हा जागृत झाल्या… वाचनाची मला लहानपणापासूनच खूपच आवड… आईदादा कुणाकडे घेऊन गेले तरी मी तिथलच कुठलंतरी पुस्तक शोधून कुठेतरी कोपर्‍यात जाऊन वाचत बसायचे.. जातांना मला शोधावं लागायचं असं आता मोठे बहीण भाऊ सांगतात…

तर या आवडीमुळे मी विपुल वाचन केलं.. त्यात श्री. ज. जोशींच्या ‘आनंदी गोपाळ’ ने अगदी कोवळ्या वयातच मी खूप भारावून गेले होते.. एवढ्या वर्षांपूर्वी केवळ नवर्‍याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याचा जहाजाचा कष्टदायक प्रवास करून सर्वस्वी अपरिचित अशा देशात अगदी एकटीने जायचं हे धाडस त्या १७ वर्षाच्या कोवळ्या मुलीने कसं केलं असेल हा माझ्यासाठी अजूनही अनुत्तरीत प्रश्न आहे.. ( मला आत्ताही एकटीला जायचं थोडं टेंशन येईलच)..! ! मुळात ज्याकाळी मुलींना शिक्षण देणं हेच दुर्मिळ होतं त्याकाळी आपल्या लहान वयाच्या बायकोला, सातासमुद्रापार पाठवून देशातली पहिली महिला डाॅ. बनवण्याचं स्वप्न बघणं हे किती क्रांतीकारी होतं. धन्य ते गोपाळराव आणि धन्य ती आनंदी..! !

पण “आनंदी गोपाळ” ही एक कादंबरी होती. त्यात लेखकाने अर्थातच कल्पनाविलासाचं स्वातंत्र्य घेतलेलं होतं… मात्र काही वर्षांनी, अपघातानेच माझ्या हातात डाॅ. अंजली कीर्तने Anjali Kirtane यांचं ‘डाॅ. आनंदीबाई, काळ आणि कर्तृत्व’ हे अप्रतिम चरित्रलेखन हाती पडलं… अत्यंत संशोधनपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि आनंदीबाईंच्या हस्ताक्षरातल्या बर्‍याच पत्रांचा सहभाग असलेलं ते पुस्तक वाचल्यावर, आनंदीबाई, आंतरबाह्य समजायला खूप मदत झाली…. त्यांच्या व्यक्तिमत्वाने झपाटूनच गेले मग मी… पुस्तकाविषयी लिहायला गेलं तर एक वेगळा लेख होईल.. पण विषय वेगळा असल्याने आवरतं घेते.. मला विशेष लक्षात राहिलं आणि आकर्षण वाटलं ते त्या पुस्तकाच्या कव्हरवर असलेल्या आनंदीबाईंच्या स्मारकाच्या (थडग्याच्या) फोटोचं आणि त्याबद्दल असलेल्या पुस्तकातल्या वर्णनाचं…!! आनंदीबाई ज्यांच्या घरी राहिल्या त्या कारपेंटर कुटुंबातल्या एका व्यक्तीला आनंदीबाईंच्या असामान्य कर्तृत्वाची जाणीव होऊन त्यांनी कारपेंटर कुटुंबातील इतर व्यक्तींच्या स्मारकाच्या बाजूलाच आनंदीबाईंचही स्मारक केलं आहे.. (त्याला थडगं म्हणायला मन धजावत नाही)…

हे पुस्तक वाचलं तेव्हाच ठरवलं जर पुढे काही कारणाने अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली तर हे स्मारक नक्की बघायचं…!! ही इच्छा त्याचवेळी मनात कोरली गेली… दैवयोगाने पुढे माझा मुलगा ईशान हा I I T graduate होऊन PHD साठी अमेरिकेला गेल्याने आम्ही तीनचारदा अमेरिकेला जाऊन आलो.. सुरुवातीला ईशानने बरच फिरवून, बरीच महत्वाची प्रेक्षणीय स्थळं दाखवलीत पण ही इच्छा मनात ठसठसत होतीच… २०१८ साली, माझ्या नणंदेच्या मुलीकडे-शील्पाकडे Shruti Pant – न्यू जर्सीला आम्ही गेलो असतांना गप्पागप्पात मी ती व्यक्त केली.. तेव्हा तिचा १८ वर्षांचा मुलगा सोहम याने लगेच गुगलवर ते ठिकाण शोधून “जवळच आहे. मी उद्या तुम्हाला घेऊन जातो” असे आश्वासन दिले.. ती रात्र संपून कधी दिवस उजाडतो असं मला झालं होतं..! !

ते ठिकाण त्यांच्या घरापासून साधारण १६० किमीवर होते… सकाळी लवकरच आम्ही तिथे जायला निघालो.. गुगल नकाशाच्या मदतीने तिथे पोचलो खरे… पण ती cemetery इतकी मोठी होती की सगळ्या थडग्यांवरची नावं वाचत शोधत बसलो असतो तर दोन तीन दिवस तिथेच गेले असते आमचे.. आपल्या डोळ्यापुढे स्मशान येतं त्याच्या अगदी विरूद्ध ही cemetery… एखाद्या मोठ्या बागेसारखी, अगदी आखीव रेखीव.. सुंदर झाडे, लाॅन्स, कारंजे यानी सजलेली… अतिशय मोठा परिसर… पण नवीन पिढी खरच हुशार… सोहमने लगेच त्या cemetery ची website शोधून आनंदीबाईंचं नाव टाकलं… एका सेकंदात त्यांच्या थडग्याचे co ordinates आम्हाला मिळाले आणि पुढच्या दोन मिनिटात आम्ही तिथे पोचलोदेखील…. त्या स्मारकाकडे बघून मनात आलेल्या भावना शब्दातीत होत्या… एका क्षणात लहानशा आनंदीने, हिंदुस्थानातील स्त्रियांच्या आरोग्यसेवेसाठी डाॅ. होण्याचे ठरवून, त्यासाठी केलेला कष्टदायक प्रवास, नवर्‍याकडून आणि देशवासियांकडून सतत सहन केलेली अवहेलना, आपली संस्कृती जपण्यासाठी प्रतिकूल हवामानातही पोशाखात बदल न केल्यामुळे झालेली प्रकृतीची हेळसांड, त्यामुळेच स्वप्नपूर्ती झाली तरी त्याची अंमलबजावणी होण्याआधीच मृत्यूने तिच्यावर घातलेला घाला… सगळं सगळं आठवलं….. त्या जागेला नमस्कार करतांना डोळ्यातून नकळत घळाघळा अश्रू वाहू लागले… ( असा अनुभव यापूर्वी फक्त अंदमानला आलेला )…! !

थोडा वेळ आनंदीबाईंच्या स्मारकापुढे स्तब्ध बसून घालवला व नंतर आम्ही परत आलो… माझी इच्छापूर्ति केल्याबद्दल मी पुन्हा पुन्हा शील्पा आणि सोहमचे आभार मानले… खरंच खूपच मोठा दिवस होता तो माझ्या आयुष्यातला….! ! अजूनही ते क्षण आठवले की खूप अलवार भावना दाटून येतात मनांत….! ! प्रत्येक भारतीयासाठी अतिशय अभिमान बाळगावा अशा या व्यक्तिचे स्मारक ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी अमेरिका वारीत नक्की बघावं अशी माझी त्यांना विनंती आहे….! ! सोबत काही फोटो पण शेअर करत आहे…! !

लेखिका : सुश्री साधना-राजहंस-टेंभेकर

कोथरूड, पुणे

प्रस्तुती :  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण…एका वाक्याने… भाग – ४१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… एका वाक्याने… – भाग – ४१  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

मुंबईस्थित *इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स*या कॉलेजमध्ये मी बीएस्सीच्या (B. SC) शेवटच्या वर्षाला होते. त्यावेळची एक मनावर ठसलेली घटना..

आमच्या कॉलेजच्या इमारतीचे रुंदीकरण चालू होते. बांधकामास लागणाऱ्या सामानाचा बराच पसारा कॉलेजभोवती अस्ताव्यस्त विखुरलेला होता. सामानाची ने आण करणारे ट्रक्स, मजूर यांची तिथे भरपूर वर्दळ होती. ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा शेवटचा तास संपवून मी कॉलेजच्या मुख्य इमारतीतून बाहेर पडून रस्त्यावर येत असताना माझ्या कानावर एक दमदार, ठाम सुरात उच्चारलेलं एका मजुराचं वाक्य सहज कानी पडलं आणि मी क्षणभर थबकले. ट्रकमधून आलेली रेती उपसत असताना तो त्याच्या सह- कामगाराला काहीसं उपहासाने आणि तावातावानेही त्याच्या बिहारी लहेजात सांगत होता, “देख भाई! हम सेठ का तो सेठ नही है लेकिन हमारे दिल का तो मालिक है ना?”

क्षणभर मी थबकले.

कष्टकरी वर्गातला, हातावर पोट सांभाळणारा, एका निरक्षर, अशिक्षित मजुराने उच्चारलेल्या त्या वाक्यात मला खरोखरच त्या क्षणी एक महान तत्त्वज्ञानच जाणवलं.

मूलभूत तत्त्वाने प्रत्येक माणूस हा स्वातंत्र्यप्रेमी असतोच. प्राप्त परिस्थितीमुळे तो भले कोणाचातरी गुलाम बनत असेल पण या गुलामगिरीचे जोखड झुगारून देण्याची दुर्दम्य इच्छा त्याच्या हृदयात सतत दडलेली असते हे निश्चित.

तो मजूर कोण होता, कुठून आला होता, कुणासाठी काम करत होता, त्याला किती रोजगार मिळत होता, त्याचं काम काय होतं याविषयी मला कसलीच कल्पना नसली तरी त्याच्या त्या एका वाक्यानं मला जाणवलं होतं की त्याच्यावर नक्कीच काहीतरी अन्याय झालेला आहे. कदाचित ठराविक कामापेक्षा अधिक काम त्याच्यावर लादलं गेलं असेल किंवा मरमरून काम करूनही योग्य तो मोबदला त्याला मिळाला नसेल अथवा ठेकेदार विनाकारण त्याला माणुसकीशून्य वृत्तीने वागवत असेल. पोटासाठी काम करणारा माणूस लाचार असतो. मिळालेल्या कामावर लाथ मारून पाठ फिरवणे त्याला परवडण्यासारखं नसतं पण म्हणून काय झालं? कुठेतरी एक मन जिवंत असतं. त्यातली विद्रोहाची ठिणगी कधीतरी पेट घेतेच आणि तेव्हाच ती व्यक्ती स्वतःचं अस्तित्व चाचपडायला लागते.

“ मी का म्हणून हे करू? ”

“ मी नाहीच करणार हे सहन. ”

“ काय वाट्टेल ते होऊ दे, आज मी माझा हक्क बजावणारच. ”

“ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.. ”

 अगदी याच तीव्र भावनांची स्फुल्लिंगं मला त्या मजुराच्या, त्या वाक्यातून फुटत आहेत असंच वाटलं.

“हमारे दिल का तो मालिक है ना हम? ”

नंतर कितीतरी दिवस माझ्या मनावर हे वाक्य रेंगाळत होतं नव्हे ते कायमच माझ्या सोबत राहिलं. त्या वाक्यानं मला सदैव एक ऊर्जा दिली आहे. विशेषतः स्त्री म्हणून जगत असताना नकळतपणे माझ्या आयुष्याची टॅगलाईनच त्या वाक्याने ठरवली जणू!

कुटुंब असो, नोकरीचे ठिकाण असो, सार्वजनिक, सामाजिक, राजकीय क्षेत्र असो, मित्र-मैत्रिणींचा परिवार असो… जिथे जिथे स्वत्व गमावण्याचे क्षण आले, स्वाभिमानाला भेगा पडत आहेत असे वाटले तेव्हा तेव्हा, ” हमारे दिल का तो मालिक है ना.. ” या शब्दांनी सतत जागवले. नैराश्यापासून दूर केले. जगताना नकारात्मकता कधीच येऊ दिली नाही.

आयुष्यभर मी गाढा अभ्यास केला, मोठमोठे ग्रंथ वाचले, तत्त्वज्ञानाचे चिंतन, मंथन केले, प्रकांड पंडितांची भाषणे ऐकली पण खरं सांगते.. तुम्हाला अवास्तव वाटेल कदाचित पण खरी साथ जर मला कोणी दिली असेल तर माझ्या अंतस्थ गाभाऱ्यात कायम घुमणाऱ्या याच शब्दांनी. “माझ्या हृदयाची मीच मालक आहे.” 

– क्रमश: भाग ४१.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पालकांना भावनिक शहाणपण कसं येणार?” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ “पालकांना भावनिक शहाणपण कसं येणार?” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास २५ छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या ३५० हून अधिक विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याचा योग आला. साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या भेटी झाल्या, अजूनही हा ओघ सुरूच आहे. या सर्वच्या सर्व मुलांकडून “मला पुण्यातच जायचंय” या तीन शब्दांखेरीज दुसरा शब्द मी ऐकला नाही आणि विशेष म्हणजे पालकांचाही याला पाठिंबा आहे.

“मला जे जे मिळालं नाही ते ते सगळं मी माझ्या मुलांना देणार” असा बहुतेक सर्व पालकांचा दृष्टीकोन दिसतो आहे. आणि या सगळ्या “जे जे – ते ते” मध्ये ज्या गोष्टींची काडीमात्र आवश्यकता नाही, त्या सगळ्या गोष्टी पालकांनी दिलेल्या मला आढळल्या. मी ज्या ज्या मुलांना भेटलो त्यातल्या सर्वच्या सर्व मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोली आहे आणि निम्म्याहून अधिक मुलांच्या खोलीमध्ये एसी आहे. एकूणएक मुलांकडे स्मार्टफोन्स आहेत. अनेक मुलं-मुली तर आठवीपासूनच स्वत:चा स्वतंत्र स्मार्टफोन वापरतायत. साधारण ७५% मुलांच्या घरी वायफाय आहे. या मुलांपैकी बहुतांश मुलांना सातवी-आठवीपासूनच स्वतंत्र टू-व्हिलर हातात मिळाली आहे. यांच्यात असा कोणीही नाही, जो सायकल वापरतो आहे. यांच्यापैकी अनेकांनी दहावीच्या वर्षात पर्सनल ट्यूशन्स लावलेल्या होत्या, ज्यांच्या फी चा आकडा लाखाच्या घरातला आहे.

‘दहावीच्या नंतर मी पुण्यातच येणार आहे कारण आमच्या गावात शिक्षण घेण्यात काहीही अर्थच नाहीय’ असं या मुलांनी स्पष्टपणे म्हणावं असा नेमका कुठला अनुभव यांनी घेतला आहे? पुणे आणि मुंबई वगळता महाराष्ट्रातल्या अन्य शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या गावी दहावीनंतरच्या शिक्षणाची इतकी दयनीय अवस्था आहे का? महाराष्ट्रात छोट्या शहरांमध्ये शिक्षणाला पूरक असं सकारात्मक वातावरणच नाहीय का? आणि हे वातावरण केवळ पुण्यातच आहे का? या प्रश्नांवर पालकांचं मतसुद्धा फारच चमत्कारिक आहे. अगदी ५०% गुण मिळालेल्या विद्यार्थ्यापासून ते ९९% गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांच्याच शैक्षणिक रडारवर फक्त पुणंच कसं काय? असा प्रश्नच मला पडतो.

“आमच्या गावात काय ठेवलंय हो? मुलांना इथं ठेवलं तर त्यांच्या आयुष्याची माती होईल” असं अनेक आया मला अगदी स्पष्टपणे म्हणतात.

अनेक पालकांनी दहावीनंतर मुलाला पुण्यातच ठेवायचं, या इच्छेपोटी ५० ते ६० लाख ₹ किंमतीचे फ्लॅट्स घेऊन ठेवले आहेत. शहरांमधल्या चकचकाटाचा आणि वरवर दिसणाऱ्या सुखवस्तू जीवनशैलीचा मोह फक्त विद्यार्थ्यांनाच आहे की पालकांनाच तशी खरी सुप्त इच्छा आहे ? याचं उत्तर स्पष्ट समोर दिसतं आहे. आपण आपल्या डोळ्यावर अशी पट्टी का बांधून घेतली आहे, यावर पालकांनी शांतपणे विचार केला पाहिजे.

छोट्या शहरांमध्ये शिकलेल्या मुलांचं नुकसान होतं का? त्यांची प्रगती होत नाही का? त्यांना ‘स्कोप’ मिळत नाही का? त्यांच्या आयुष्याचं खरोखरच वाटोळं होतं का? याची खरीखुरी उत्तरं पालक का बरं शोधत नाहीत? 

अनेक पालक तर मी असेही पाहिले आहेत की, ज्यांनी हैदराबाद किंवा कोटा इथंच मुलाला दोन वर्षांसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तिथं गेल्याशिवाय एन्ट्रन्स मध्ये स्कोअरच होणार नाही’ असं पालकांचं मत असतं. मुलगा किंवा मुलगी कोट्याला आणि बारावीची ॲडमिशन मात्र आपल्या जवळच्या काॅलेजात ! असा यांचा कारभार असतो. ‘काॅलेजला जाण्याची किंवा प्रॅक्टीकल्स करण्याची काही आवश्यकता नाही, क्लासमध्येच सगळं करून घेणार आहेत’ असं हे पालक इतक्या आत्मविश्वासानं सांगतात, की हा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्यात येतोच कुठून, हेच माझ्यासाठी विस्मयकारक आहे.

बारावीनंतरच्या एन्ट्रन्सेस मध्ये आपल्या मुलांची पार पिसं निघेपर्यंत धुलाई झाली की, यांची विमानं दाणकन् जमिनीवर आदळतात. काहींची आशा अजूनही मावळलेली नसते. बारावीत जेमतेम ५०% मार्क मिळालेले असले आणि एन्ट्रन्समध्ये मोठ्या कष्टानं ३०-३५ गुण मिळालेले असले तरीही ‘आमचा मुलगा/मुलगी इंजिनिअरींग करूच शकणार नाही का हो?’ असं अगदी काकुळतीला येऊन विचारणाऱ्या आया पाहिल्या की माझ्याच पोटात काळजीनं खड्डा पडतो.

स्वत:च्या क्षमता आणि स्वत:च्या मर्यादा या दोन्ही गोष्टींची व्यवस्थित जाणीव असली की निर्णय घेण्यातला आततायीपणा टाळता येतो. राष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. त्याकरिता खूप तयारीची आवश्यकता असते. आपण मनात ठरवणं ही गोष्ट वेगळी आणि मनात ठरवलेल्या गोष्टीकरिता जीव तोडून मेहनत करणं ही गोष्ट वेगळी. अभ्यासाची प्रेरणा आतूनच असणं महत्वाचं आहे. ही प्रेरणा असेल तर आपल्याला आपला स्वतंत्र ‘स्कोप’ निर्माण करता येणं शक्य असतं. पण, ही प्रेरणाच नसेल तर बाहेरून मलमपट्टी किती करणार? त्या वरवरच्या अभ्यासानं यश मिळत नाही आणि जरी मिळालंच तरी ते टिकतंच असंही नाही.

मग आपले कष्ट, इच्छाशक्ती, नियमित अभ्यास कमी पडल्याचं खापर आपल्या गावावर किंवा गावातल्या शिक्षणव्यवस्थेवर फोडून काय मिळणार आहे? याचा थोडासा विचार पालकांनी करावा, असं मनापासून वाटतं.

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अभावातले ऐश्वर्य…!!! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

अभावातले ऐश्वर्य…!!!  ☆ सुश्री शीला पतकी 

आज सकाळी नातीने विचारले “ आजी अभाव म्हणजे काय ग ?.. “ मला जरा कौतुकच वाटले. मराठी काही शब्द जाणून घेण्याची तिला इच्छा आहे, चांगली गोष्ट आहे.

मी तिला सांगितलं, “ अभाव म्हणजे एखादी गोष्ट नसणे.. गोष्टीची कमतरता.. त्याला अभाव म्हणतात. म्हणजे म्हणजे वाईटच की.. असं नाही ग. तुझ्यात दुर्गुणाचा अभाव आहे याचा अर्थ तुझ्याजवळ खूप चांगले गुण आहेत.. म्हणजे अभाव म्हणजे नसणे आणि त्या नसल्यामुळे खूप चांगल्या गोष्टीसुद्धा घडत असतात.. “ ती उड्या मारत निघून गेली आणि मी विचार करत राहिले….

आमच्या पिढीमध्ये तर किती अभाव होते. पण त्या अभावाने मला वाटतं आम्ही समृद्ध झालो. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन खोल्यांची घरे, त्या दोन खोल्याच्या घरामध्ये सात आठ माणसे अगदी आरामात एकत्र राहत होतो. स्वयंपाक आणि बसण्याची खोली.. तीच झोपण्याची खोली.. तीच अभ्यासाची खोली.. तेच पाहुणेरावळे येऊन बसण्याची खोली. पण त्यामुळे सर्वांमध्ये सतत संवाद राहिला. वादही झाले पण संवाद होत राहिला, त्यामुळे जवळीक वाढली. त्या संवादातून काही खूप चांगल्या गोष्टी घडल्या. आठवणी राहिल्या, प्रेम वाढलं. आठ बाय आठच्या खोलीमध्ये सहा माणसांनी झोपणं.. मग त्यासाठी केलेली ती तडजोड, सकाळी लवकर उठणे.. या सगळ्या गोष्टींनी उलट एक समृद्धी दिली. जास्त वेळ झोपण्याची मुभाच नव्हती. सकाळी अंथरूण पांघरूण काढून त्या खोल्या पुन्हा बैठकीत सजवून ठेवायचे असायचं. बेडरूमचे पुन्हा स्वयंपाक घर व्हायचे. त्यामुळे गोष्टी वेळेत होत असत. सार्वजनिक बाथरूम अंघोळी पटापट सात-साडेसातपर्यंत आटपून जात असतात त्यामुळे धुणे नऊपर्यंत काठीवर जाणे, साडेदहाला जेवायला बसणे, शाळेला जाणे, आल्यावर अभ्यास करणे, मग शुभंकरोती पर्वचा, आठपर्यंत जेवण आणि नऊला पुन्हा झोपणे … त्यामुळे सर्वांना उत्तम आरोग्य लाभले. डॉक्टरकडे जायची वेळ फारशी आलीच नाही. अभावानेच एक चांगली जीवनशैली दिली आणि त्यामुळे निरामय आरोग्याचे वरदान लाभले.. !

लहानपणी पिझ्झा बर्गर हॉटेलला जाणे ह्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या. जे काही असेल ते घरी आणि मग या घरच्या स्वच्छ खाण्याने चणे फुटाणे, शेंगदाणे वाटाणे चिंच निवडून झाल्यानंतर चिंचुके चुलीत भाजून ते खाणे, आंब्याच्या कोईमधील पांढरा भाग भाजून तो खाल्ल्यामुळे कितीतरी कार्बोहायड्रेट किंवा त्यातील उपयुक्त रसायन पोटात गेली. कैरी चिंचा बोरे ही त्या त्या काळातली सहज उपलब्ध होणारी फळे … सोलापुरात तरी फळ नावाची गोष्ट म्हणजे फक्त केळी… आजारी माणसाला द्राक्ष मोसंबी संत्र्याचे दर्शन.. कलिंगड सीजनमध्ये दोन ते तीन वेळा आणलं जायचं. मग ते कलिंगड चंद्रकोरीप्रमाणे कापून एक एक फोड प्रत्येकाला मिळायची, ती पार बुडापर्यंत खायची. आज आता ते सांगतात की त्यातला पांढरा भाग फार उपयुक्त असतो. आम्ही तेव्हा तो खात होतो. त्यानंतर उरलेल्या काळ्या पाठी.. त्या धुऊन आमची आई त्याला मीठ हळद लावून उन्हात वाळवत असे आणि ते तळून त्यावर मीठ तिखट टाकले की उन्हाळ्यात ते खायला खूप सुंदर लागायचे. कोंड्याच्या पापड्या वाफेवरच्या पापड्या, पापडाचे पीठ.. त्याचे गोळे खाणे.. त्यामुळे उडदाचे पीठ पोटात जायचे. विविध डाळींचे सांडगे भाज्या म्हणून ते खाल्ले जायचे. बटाट्याचे घरी केलेले वेफर्स, बटाट्याचा कीस हे सगळं स्वच्छ मटेरियल असायचं. पैशाचा अभाव होताच पण हॉटेलात जाण्याची पद्धत नव्हती, त्यामुळे घरी करण्याचे पदार्थ यावर भर जास्त असायचा. लोणच्याच्या बरण्या भरून तयार असायच्या.. मुरंबे लोणची गुळांबा उन्हाळ्यातील पन्हे.. सब्जा घातलेले लिंबाचे सरबत.. याने पोटाला थंडावा मिळायचा. आतासारख्या थम्सअपच्या बाटल्या आणून पिणे हे त्या काळात नव्हतंच. आजच्या तुमच्या समृद्धीचा अभाव आम्हाला बळकट करून गेला. ताजे विटामिन मिळायचे. घरच्या दह्याचे सुंदर ताक.. लोणी काढल्यावर हातावर मिळणारा लोण्याचा तो गोळा.. आतासारखे ते पिवळट कागदातले लोणी नव्हते याला तुम्ही बटर म्हणतात.. अस्सल नवनीत आम्ही खाल्ले आहे.. शेवयाचे नूडल्स करता तुम्ही किंवा न्यूडल्स आणून यात मसाला घालून खाता.. आमच्याकडे शेवयाची मस्त अटीव दुधातली खीर पौष्टिक म्हणून ती उपयोगी पडेल किंवा पडली आहे. कधीकाळी डब्यात प्रिझर्वेटिव्हसह भरलेला श्रीखंड तुम्ही विकत आणता, मनाला आलं की बॉक्स आणायचा, फोडायचा आणि ताटात श्रीखंड… श्रीखंडासाठी दूध आटवून दही लावणे.. त्याचा चक्का आणि मग केशर बदाम पिस्ता घातलेले ते उत्तम श्रीखंड.. त्याची चव अप्रतिम असायची आणि शुद्ध सात्विक.. बाजारी मिळणाऱ्या श्रीखंडाच्या अभावामुळे आम्हाला घरचे सुंदर श्रीखंड खायला मिळाले. तशीच अटीव दुधाची निर्भेळ बासुंदी.. कधीतरी वडील हलवाई गल्लीत नेऊन आम्हाला बासुंदी खाऊ घालत असत, पण पुढे त्यात टीपकागद घालतात असे कळल्यापासून ते बंद झाले. आता सर्रास भेसळीशिवाय काही मिळतच नाही… बोर चिंचा पेरू गोन्या चीगुर याने आम्हाला कुठलंही विटामिन कमी पडू दिलं नाही. उंबराच्या झाडाची उंबरे फोडून किड्यांना बाहेर जाऊ देऊन झटकून झटकून खाण्यामुळे आमची इम्युनिटी वाढली. कच्ची उंबरे खाल्ल्याने आयुष्यभर पुरेल इतके पोटॅशियम मिळाले. सांजा, पुरणपोळी, सांज्याची पोळी या प्रकाराने भरपूर प्रमाणात गुळ पोटात गेल्याने लोहाची कमतरता भासली नाही. आमच्या पिढीत 90% लोकांचे हिमोग्लोबिन 12 /13 च्या पुढेच आहे. बळकट हाडे कणखर आहेत

मुख्य म्हणजे घरात सगळ्यांनी काम करण्याची पद्धत होती. प्रत्येक कामाला बाई नव्हती. पैशाचा अभाव होताच. प्रत्येकाने आपापली कामं करायची, शिवाय घरात वाटून दिलेली कामे करायची.. त्यामध्ये अगदी लहान असणाऱ्यांना कपबशा विसळण्यापासून काम असे… मैदानात खेळायला भरपूर जायचं.. बिन पैशाचे सगळे खेळ.. कुठलेही साहित्य कधी खेळायला लागले नाही. खेळणी विकत आणणे हा प्रकारच नव्हता असल्या गोष्टीवर घालायला पैसाच नव्हता. रद्दीतला कागदसुद्धा व्यवस्थित बांधून ठेवून तो रद्दीमध्ये घालणे आणि त्याचे पैसे करून त्यातून ग्रंथालयाची फी भरणे.. कारण उन्हाळ्यात आपण वाचनालय लावले तर पैसे आपणच या पद्धतीने जमा करावे लागत. पैशाच्या अभावाने कितीतरी गोष्टी आम्हाला शिकवल्या.. त्या वाचनातून आम्ही समृद्ध झालोत. रद्दीच्या वह्या वापरल्यामुळे कागदाची किंमत कळली.. प्रदूषणाला हातभार लावला नाही आम्ही. वापरा आणि फेकून द्या हा प्रकारच आमच्या वेळेला नव्हता त्यामुळे वस्तूंचा पुनर्वापर होत राहिला. प्लॅस्टिकची पिशवी कचऱ्यात गेली नाही. पुड्याला बांधून आलेले दोरे ते लगेच बंडल बांधून घरात एका विशिष्ट ठिकाणी ठेवले जाईल तेच दोरे हार तुरे बांधायला उपयोगी पडायचे. फाटलेल्या कपड्याच्या चौकटी शिवून त्याचे घरामध्ये पुसायला कापड व्हावयाचे. टिशू पेपरच्या नावाखाली भसाभसा कागद पुसून कचऱ्यात टाकणे हे आमच्या वेळेला नव्हतं. पायपुसणी वगैरे नव्हती.. अशाच कापडांचे मिळून एक जाड पाय पुसणे तयार व्हायचे आणि ते सुती असल्याने त्याच्यामध्ये पाणी शोषून घेतले जावयाचे. सोडा साबण घालून आठवड्यातनं फरशी स्वच्छ धुवायची.. कोणतेही डिटर्जंट लागलं नाही कारण तेव्हा ते नव्हतंच. अशा या अभावाच्या जमान्यात घरचं खाण्याची समृद्धी लाभली. उत्तम वाचन झाले. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे अवलोकन झाले. नाटक कीर्तन गायन नकला मेळे हे सर्व मनोरंजनाचे प्रकार मोफत उपलब्ध होते ज्याने आमचं आयुष्य समृद्ध केले. ऑनलाइन काही नव्हतं किंवा प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करावी लागायची त्यामुळे शहाणपण आले, चतुराईने खरेदी करता आली. माणसांची संपर्क वाढला. काही जणांचा तर अगदी जन्मोजन्मीच्या ओळखी आणि दृढ संबंध निर्माण झाले.

त्या काळातल्या अभावाने सर्वार्थाने आम्हाला समृद्ध केले एवढे मात्र खरे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टीव्ही आणि मोबाईल नव्हते, ॲमेझॉन नव्हतं, ॲप नव्हते. बाप सांगेल ते मुकाट्याने ऐकायचं.. आईच्या चरणाची नतमस्तक व्हायचं.. आजी आजोबांच्या प्रेमात नाहून निघायचं.. भावंडाशी प्रसंगी भांडायचं आणि प्रेम करायचं…..

…. पैशाच्या अभावाने ही केवढी मोठी समृद्धी आम्हाला दिली.. अभावातले ऐश्वर्य लाभणारी आमची शेवटची पिढी … 

असो … ‘ कालाय तस्मैय नमः ‘

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनोरुग्णतेच्या दिशेने… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ मनोरुग्णतेच्या दिशेने… ☆ श्री संदीप काळे ☆

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारा माझा एक मित्र मराठवाड्यातील लातूर या जिल्हयात वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाला. तो मुंबईला असताना त्याची नेहमी भेट व्हायची. आता तो लातूरला गेल्यामुळे त्याची भेट दुर्लभ झाली आहे. म्हणून मी त्याला भेटण्यासाठी मुद्दाम लातूरला गेलो.

दुपारी डब्बा खात असताना तो एका व्यक्तीची ओळख करून देत मला म्हणाला, ‘हे राजीव कुलकर्णी, अमेरिकेत होते. अमेरिकेत त्यांनी भाडेतत्त्वावर जमीन घेऊन खूप वर्ष कसली. आता कुलकर्णी काही कारणास्तव लातूरमध्ये वापस आले आहेत. माझे जवळचे मित्र आहेत’.

मी कुलकर्णी यांना नमस्कार केला. बराच वेळ गप्पा मारल्यावर कुलकर्णी वरिष्ठ अधिकारी असलेल्या माझ्या मित्राला म्हणाले, ‘मी खूप अडचणींत आहे. त्यातून मार्ग कसा काढावा यासाठी मी येथे आलो आहे’.

ते वरिष्ठ अधिकारी मित्र म्हणाले, ‘बोला ना’.

माझ्याकडे बघत ते मित्र दबक्या आवाजात म्हणाले, ‘माझा मुलगा समर्थ आता आठवीला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो व्यसनाधीन झालाय. आम्ही अमेरिकेत खूप इलाज केले, पण उपयोग झाला नाही. म्हणून आम्ही अमेरिका सोडून पुन्हा गावी लातूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला’.

माझे अधिकारी मित्र त्यांना म्हणाले, ‘तो इतका व्यसनाच्या आहारी गेला, तेव्हा तुम्ही काय करत होतात?’

कुलकर्णी म्हणाले, ‘मी माझ्या शेती उपक्रमात होतो. माझी बायको यमुना नोकरी करायची. तो नाना प्रकारचे व्यसन करायचा. आम्हाला कळू न देता गोळ्या खायचा’.

कुलकर्णी त्यांच्या मुलाच्या व्यसनाधीनतेचे किस्से सांगत होते आणि आम्ही अवाक् होऊन ऐकत होतो. कुलकर्णी यांच्या आपबीतीने माझे हातपाय एकदम गळून गेले. आम्ही एकदम नि:शब्द झालो. सर्व सांगून झाल्यावर कुलकर्णी यांनी खिशातला रुमाल काढून आसवांनी डबडबलेले डोळे पुसले.

माझ्याकडे बघत माझा तो अधिकारी मित्र म्हणाला, ‘या स्वरूपाच्या तक्रारी माझ्याकडे दररोजच्या आहेत. आईवडीलांना मुलांकडे बघायलाही वेळ नाही, आणि सहज करता येतात म्हणून मुले व्यसनांचे अनेक प्रयोग करतात. ‘

अधिकारी मित्राने बेल वाजवून शिपायाला बोलवले. ते त्या शिपायाला म्हणाले, ‘जरा विजयकुमार यादव सर यांना फोन करून बोलावून घ्या’.

शिपाई गेला. कुलकर्णी यांनी सांगितले की अमेरिकेसह भारतातही पालकांच्या लाडामुळे, दुर्लक्षामुळे लहान लहान मुले खूप मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झाली आहेत. अनेक मुले व्यसनाधीनतेच्या मार्गावर आहेत. नशील्या पदार्थांच्या सेवनाबरोबर मोबाईल, टीव्हीच्या अतिवापरामुळे अनेकांचा कसा सत्यानाश झाला. आज दहावीच्या आतमधली ३० टक्के मुले व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याचे कुलकर्णी आणि वरिष्ठ अधिकारी मित्राच्या बोलण्यातून समजले.

इतक्यात यादव सर आले. यादव सरांची ओळख करून देताना अधिकारी मित्राने सांगितले, ‘हे यादव सर. यांनी आजवर तब्बल दोन पिढ्यांना व्यसनाच्या खाईत जाण्यापासून वाचवले आहे. मी अनेक वेळा त्यांच्या व्यसनमुक्ती सेंटरला जाऊन आलो. मी अनेक माणसं त्यांच्याकडे पाठवली. यादव सरांनी अनेकांचे संसार वाचवण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ‘ वरिष्ठ अधिकारी मित्र आणि कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलाची सर्व परिस्थिती यादव सरांना सांगितली.

यादव सर म्हणाले, ‘लहान मुलांच्या व्यसनाचा प्रकार खूप वाढलाय. बरं, या मुलांचे काय करायचे हा प्रश्न आहे. मोठ्या माणसांप्रमाणे त्यांना कोणत्याही व्यसनमुक्ती केंद्रात ठेवता येत नाही. लहान मुलांसाठी खूप कडक कायदे आहेत. त्यामुळे या लहान मुलांचं काहीही करता येत नाही. न्यायाधीश, जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी, पोलीस अधिकारी या सगळ्यांनाच रोज त्यांच्याकडे येणाऱ्या लहान मुलांच्या व्यसनाधीनतेवर करायचे काय हा प्रश्न पडतो आहे. ‘

वरिष्ठ अधिकारी असलेले मित्र मला म्हणाले, ‘संदीपराव, तुम्ही एकदा जाऊन यादव सर करत असलेलं काम पाहून या. तुमच्या लक्षात येईल, त्यांचं काम किती मोठे आहे!’

अधिकारी मित्र यादव सरांविषयी भरभरून बोलत होते. मलाही यादव सर यांचे काम जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. कुलकर्णी यांना यादव सरांनी त्यांच्या मुलाला व्यसनाधीनतेतून बाहेर कसे काढायचे, याबाबत योग्य तो सल्ला दिला. त्या मुलांचे समुदेशन कसे करायचे, कोणते औषध द्यायचे हे सांगितले. मुलाला वेळ देणे, मुलावर खूप प्रेम करणे, त्यांना समजून घेणे किती गरजेचे आहे, हे यादव सर यांनी समजावून सांगितले. ‘तुम्हाला जर या मुलांना खरंच व्यसनातून बाहेर काढायचे असेल तर, तुम्हाला वैयक्तिक त्यांना वेळ द्यावा लागेल. तरच ती बाहेर येतील, अन्यथा येणार नाहीत. ‘

अधिकारी मित्र आणि कुलकर्णी हे दोघे बोलत बसले. मी उठलो आणि यादव सरांसोबत त्यांच्या आंबेजोगाई रोडवर असलेल्या व्यसनमुक्ती सेंटरमध्ये जाऊन पोहोचलो. दारू, गांजा अशा अनेक व्यसनांच्या आहारी गेलेल्या शेकडो लोकांचे तिथे इलाज केले जात होते.

लातूर मधलं हे व्यसनमुक्तीचं सेंटर कसं सुरू केलं? त्या एका सेंटरचे अनेक सेंटर कसे झाले? राज्यभरातले व्यसनमुक्तीचे यादव सरांचे काम भारतभर कसे पोहोचले? आणि आज एक दोन हजार नाही तर तब्बल साठ हजारांहून अधिक लोकांना व्यसनमुक्त कसे केले, याचा खूप मोठा इतिहास यादव सरांनी माझ्यासमोर ठेवला.

प्रचंड आत्मविश्वास, प्रत्येकाचे चांगले करायची भावना आणि माझा जन्म देण्यासाठीच झाला आहे, ही उदात्त भावना, यातून यादव सरांचे काम कुठलीही प्रसिध्दी न करता देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहचले आहे.

डॉ. विजयकुमार यादव (9372346476) उच्चशिक्षित, मोठ्या घरात जन्मलेले, एका शिक्षकाचे सुपुत्र. तरुण वयामध्ये आजूबाजूला असलेली व्यसनाधीन मंडळी यामुळे व्यथित होऊन ‘मी आयुष्यभर लोकांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी कार्य करेन’, या निर्धाराने पेटून उठलेले यादव सर यांनी १९९९ला लातूरमध्ये ‘जीवनरेखा प्रतिष्ठान‘ नावाची एक संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून ‘जीवनरेखा व्यसनमुक्ती केंद्र’, ‘एकात्मिक व्यसनाधीनता पुनर्वसन केंद्र’ आणि ‘व्यसनमुक्तीचे पुनर्वसन केंद्र’ असे दोन सेंटर लातूरमध्ये सुरू केले. पैसे मिळोत वा न मिळोत, व्यसनग्रस्त माणसाला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले.

जसजसं काम वाढत गेलं, तशी काही अंशी शासनाची मदतही मिळू लागली. पण शासनाच्या तुटपुंज्या मदतीवर काही भागेना. स्वतःच्या जवळचे जे काही होते ते सरांनी अनेक वेळा विकायला काढले, पण सेंटरच्या माध्यमातून चालत असलेले काम काही थांबू दिले नाही.

दारू, गांजा आणि वेगवेगळ्या रसायनांचे सेवन करून त्याच्या आहारी गेलेले, पेट्रोलचा वास घेणारे, व्हाइटनरपासून ते चप्पल पॉलिश करण्याच्या क्रिमला व्यसनाचे साधन बनवणारे असे अनेक महाभाग त्या व्यसनमुक्ती सेंटरमध्ये होते. कोणी दारूच्या व्यसनापायी वडिलांची होती नव्हती ती सगळी शेती विकली. कोणी दारूच्या व्यसनातून अनेक ठिकाणी चोरी केली. कुणाला दारूच्या व्यसनामुळे वेगवेगळे आजार झाले होते. गांजाच्या व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य बरबाद झाले होते.

एक दोन नाही, हजार नाही, तर ६० हजार लोकांना व्यसनांच्या विळख्यातून यादव सर यांनी बाहेर काढले आहे. तिथं असणाऱ्या प्रत्येक माणसावर स्वतंत्र चारशे पानांचा ग्रंथ होऊ शकेल, इतकं व्यसनांमुळे त्यांचे आयुष्य खंगून गेले होते.

प्रत्येकाची करूण कहाणी ऐकून असं वाटत होतं की, या जगात प्रचंड आनंद आहे, पण तुम्हाला जर एखादं व्यसन जडलं तर ते व्यसन कॅन्सरपेक्षाही खतरनाक असतं, हे तिथल्या प्रत्येक माणसाच्या पाणावलेल्या डोळ्यांतील आसवांना पाहून जाणवत होते.

यादव सर त्यांच्या कामात व्यग्र झाले. एका केंद्रात असलेली एक व्यक्ती संपूर्ण ट्रीटमेंट घेऊन घरी निघाली होती. त्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी सोबतचे अनेकजण गेटपर्यंत आले होते.

मी त्या माणसाला विचारले, “काय झाले? तुम्ही कुठले? आता सुटले का व्यसन?”

तो माणूस मला म्हणाला, “मी राजीव रस्तोगी. मी ट्रक डायव्हर होतो. मित्रांच्या संगतीने दारूच्या व्यसनात बुडालो. शेवटी ज्या मित्रांची दारू यादव सर यांच्या सेंटरमुळे सुटली, त्याच मित्रांनी मला पैसे गोळा करून इकडे पाठवले. आज निर्व्यसनी बनून एक नवे आयुष्य मी सुरू केले आहे. कपाळावर टिळा आणि गळ्यात माळ हे सारे काही केंद्रात मिळणाऱ्या शिकवणीतून शक्य झाले. माणूस कितीही श्रीमंत किंवा कितीही गरीब असो, तो एकदा व्यसनाच्या आहारी गेला की त्याच्या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही. मला दोन मुली आहेत. त्या कधी मोठ्या झाल्या आणि कधी त्यांचे लग्न झाले, हे मला कळलेच नाही. दारूपायी आयुष्य कसे उध्वस्त झाले, हे समजलेच नाही”, असे म्हणत राजीव रडत होते. बाकी सर्व जण त्यांची समजूत काढत होते. राजीव गेले. त्यांना पाठवताना त्यांचे सर्व मित्र भावुक झाले होते. मी यादव सर यांच्याकडे निघालो.

यादव सर यांच्याकडे असताना एक व्यक्ती तिथल्या सर्वांना घेऊन समुपदेशनाचे धडे देत होती. त्याचे समुपदेशन ऐकत राहावे असेच होते. त्या सेंटरमध्ये औषधाशिवाय वाचन, चिंतन, मनन, कीर्तन, हे सारे काही होते.

मी यादव सर यांच्याकडे गेलो. समुपदेशन करणारे सरही तिथे आले. त्या सरांची ओळख करून देताना यादव सर म्हणाले, “हा माझा मुलगा कृष्णा यादव. सर्व कामं आता हाच पाहतो. “

अजून एका मुलीला यादव सरांनी जवळ बोलावले. तिची ओळख करून देत ते म्हणाले, “ही कान्होपात्रा नखाते. चंद्रपूरची आहे. पुण्याच्या दवाखान्यात अधिकारी आहे. आमच्याच नर्सिंग कॉलेजमध्ये शिकली आहे. नखाते यांच्यासारख्या १५० मुली दरवर्षी आमच्या कॉलेजमधून प्रशिक्षित होऊन बाहेर पडतात. आम्ही जो सेवाभाव ठेवून काम उभे केले आहे, त्या कामाला ह्या सर्व मुली हातभार लावतात. पाचवीच्या मुलांपासून ते ७५ वर्षांच्या व्यक्तीपर्यत सर्वांच्या व्यसनाचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत. “

अतिशय चिंताग्रस्त चेहरा करून यादव सर म्हणाले, “एपीजे अब्दुल कलाम यांनी देशाला महासत्तेच्या दिशेने जाण्याचा कानमंत्र दिला खरा, पण प्रचंड प्रगती आणि सहजतेने, निष्काळजीपणाने आम्ही खूप गतीने मनोरुग्णतेच्या दिशेने वाटचाल करतोय. अनेक ठिकाणी हेच चित्र आहे”. यादव सर खूप तळमळीने बोलत होते आणि मी खूप हतबल होऊन ऐकत होतो.

यादव सरांचे काम समजून घेताना रात्रीचे अकरा कधी वाजले, ते कळलेच नाही. यादव सरांचा निरोप घेऊन मी परतीच्या मार्गाला लागलो. यादव सर, त्यांचे वडील रघुनाथ यादव, सरांची आई भगीरथबाई आणि आता तिसरी पिढी, म्हणजे यादव सरांचा मुलगा कृष्णा यादव हे सर्व कुटुंबीय सुरू केलेले काम खूप नेटाने पुढे नेत आहेत. समाजात बदल घडवून आणण्यासाठी असे अनेक यादव परिवार आपल्या आसपास आहेत, ज्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे, बरोबर ना? 

© श्री संदीप काळे

संस्थापक, व्हाईस ऑफ मेडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…खवय्येगिरी, पुणेकर…’ भाग-२६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी… खवय्येगिरी, पुणेकर…’ भाग-२६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

खवय्येगिरी, पुणेकर…

गणेशोत्सव बघायला बाहेर पडल्यावर दणकून चालल्यावर सणकून भूक लागायची. अर्ध शतकापूर्वी पुणेकरांनाही बाहेरचं खाण्याचा शौक होता, पण अर्थाजनाला मर्यादा असल्यामुळे पदार्थ घेण्याला आणि खाण्यालाही निर्बंध असायचा. आप्पा बळवन्त चौकातून पुढे गेल्यावर भडभुंजाची भट्टी लागते. आतल्या बाजूला सतत भट्टी रसरसलेली असायची. 1 की. ज्वारी तांदूळ घेऊन, आई, काकू तिथून लाह्या फोडून आणायच्या. लालबुंद झालेल्या मोठ्या कढईत वाळू टाकून त्यात जोंधळे टाकले की फटाफट चांदण्यासारख्या चांदणी आकाराच्या शुभ्र लाह्या उमलून यायच्या. एरवी कंटाळा करणारे आम्ही, इथे मात्र आवर्जून जायचो कारण वाळूच्या उबेतून बाहेर पडलेले गरमागरम चणे फुटाणे, लाह्यांचे प्रकार बोकणा भरून खाता येत होते ना! म्हणून तर ही धडपड. तर अशा भडभुंज्याकडे हारीनें लावलेली आमच्या बजेटमध्ये बसणारी, कोरडी भेळ घेऊन आम्ही गणपती बघायला बाहेर पडल्यावर, पायाबरोबर तोंडही चालायचे. आमच्या मोठ्या बहिणी, जातांना बरोबर वर्तमानपत्र घ्यायच्या. नाहीनाही! वाचायला नाही हो! भेळ पसरून खायला पेपर हवा ना, अहो! तेव्हा कुठे होत्या पेपर डिश ? एखाद्या ओट्यावर ठाण मांडून कागदावरच्या कोरड्या भेळेच्या दहा मिनिटात फडशा पाडत होतो आम्ही. भेळ वाल्याकडची सणसणीत मिरची खातांना डोळे पांढरे झाले तर, बरोबर घेतलेल्या प्रवासी फिरकीच्या तांब्यातलं पाणी एका दमात रिकामं व्हायचं. तेव्हां काही आता सारखा बिसलेरीचा शोध लागला नव्हता. आमचा आपला स्वच्छ, चकचकीत घासलेला फिरकीचा तांब्याच बरा होता. पुण्यात सगळे गणपती बघायला, अगदी अख्ख पुणं पालथं घातलं जायचं. खाऊ गल्लीतली कोपऱ्यावरची हॉटेलं आम्हाला खुणवायची हो! पण बजेट ? हॉटेल बिल बसायला हवं ना त्यात! मग काय भेळेवरच भागवून आम्ही पुढे सरकायचो.

टिळक रोडवरचं जीवन, बादशाही, फडतरे चौकातले स्वीट होम, सदाशिव पेठेजवळचं पेशवाई, दत्त उपाहारगृह, आनंद विलासची मिसळ, घावन, संतोष भुवनची पुरी भाजी आणि बेडेकरांची प्रसिद्ध मिसळ हे सारं सारं काही नजरेआड करून प्रभा विश्रांती गृहाकडे आमचे पाय वळायचे. कारण तिथला बटाटेवडा स्वस्त आणि मस्त असायचा. तो वडा मात्र आम्ही दणकून हादडायचो. कारण तो चवदार आणि फ्रॉकच्या खिशाला परवडेल असा म्हणजे फक्त चार आण्याला मिळायचा. चवीला चवदार चटणी असायचीचं वाढणाऱ्याला जरा मस्का मारला की दोन चमचे चटणी जास्तच मिळायची.

श्रीमंत पोरं मात्र केसांचा कोंबडा उडवत, बापाच्या पैशावर, सिगरेटचा धूर सोडत, इम्प्रेशन पाडायला पोरींना रीगल, गुडलक कॅफे, सनराइज, पुना कॉफी हाऊस, मध्ये स्पेशल ‘च्या’प्यायला घेऊन जायची. सोळाव्या वरीसातलं धोक्याचं पाऊल, या रेस्टॉरंट मध्येच घसरायचं. म्हणजे प्रेमात पडायचं. त्यावेळी ‘मेळे’ असायचे. गजानन वाटवे, जोस्ना भोळे यांचा कार्यक्रम ऐकण्याऐवजी, ‘केला इशारा जाता जाता ‘करण्यातच प्रियकर प्रेयसींचा वेळ जायचा. तिकडे चोरून बघत कानाडोळा करुन आम्ही आप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी परिसरात यायचो. पण घरी परततांना अचरबचर न खाण्याने, मन आणि पोट शांत असायचं.

जास्तीत जास्त पाच रुपये खर्च करणारे आम्ही, आजच्या पिढीला दोन, पाच हजार खर्च करून बिल देतांना बघतो नां, तेव्हां आम्ही अचंबित होतो. बाई गं! खाण्यावर हा केवढा खर्च?त्यांचेही बरोबर आहे म्हणा खाण्याचे दिवस आहेत त्यांचे. आणि मिळवतायेत पण ते तेवढे पैसे. माझ्या भावाला शरद आप्पाला आणि बहिणीला लीलाला कुलकर्णी भेळ फार आवडायचीनु. म. वि हायस्कूल कडे जातांना आनंदाश्रमाच्या अलीकडे छोट्याशा कोपऱ्यात श्री. कुलकर्णीनी आपला भेळेचा संसार मांडला होता. वाहनं चुकवत ओल्या वेळेचे बोकणे भरतांना भेळ खाणाऱ्यांची त्रेधा तिरपीट उडायची पण ती ‘हटके’ भेळ खायला लोकं सहाच्या आत धडपडत हजेरी लावायचीचं. कुलकर्णी भेळ, गोड आणि चविष्ट बनवायचे पण त्यांच्या जिभेवर मात्र तिखट होतं. त्यांचा काटेकोर नियमच होता, सहानंतर, भेळेच दुकान बंद होणार आहे. सहाच्या पुढे काटा गेल्यावर ते स्पष्ट सांगायचे, “वेळ संपली, आता तुम्ही निघा. उद्या भेटू. ” शिष्ठ वाटणारे हे कुलकर्णी मनाने उमदे होते. दुर्दैवाने माझा भाऊ स्वर्गवासी झाला. त्याची नेहमी तिथे हजेरी असायची. माझ्या वडिलांची काही उधारी तर राह्यली नाही ना?असं विचारायला नंतर माझा भाचा हेमंत त्यांच्याकडे गेला व वडील नसल्याची दुःखद बातमी त्यांनी कुलकर्णींना सांगितल्यावर ते ताडकन उठले, हेमंतला जवळ घेऊन सगळ्यांसमोर उभं करून म्हणाले, ” ह्याला म्हणतात संस्कार. शरद माजगावकरांनी कधीच उधारी ठेवली नाही. लोक उधारी बाकी ठेवतात, पैसे बुडवतात. तोंड लपवतात पण हा त्यांचा मुलगा वडिलांच्या पश्चात त्यांची उधारी राह्यली आहे का? हे विचारायला इथे आला आहे. अशी पितृऋण फेडणारी मुलं ह्या जगांत आहेत. मग तुम्ही सांगा! कोण म्हणतं आजची पिढी बेजबाबदार आहे म्हणून. सगळे गिऱ्हाईक कुलकर्णीच्या कौतुकाने भारावले. आणि माझ्या भाच्याकडे कौतुकाने बघायला लागले. अशी होती ती सुसंस्कारित त्यावेळीची पिढी. त्यांच्या संस्काराच्या पायावर आजच्या आदर्श पिढीची इमारत उभी आहे, नाही का! भेळवाल्या कुलकर्णींना आणि वाचकहो तुम्हालाही धन्यवाद.

– क्रमशः भाग २६   

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आनंद शांततेतला…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “आनंद शांततेतला…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आम्ही मैत्रिणी दापोलीला ट्रीपला गेलो होतो. तिथे उंच सावळा तरतरीत असा शंकर आम्हाला गाईड म्हणून मदत करत होता. तो अत्यंत नम्र आणि शांत होता. तिथेच राहणारा असल्याने त्याला पूर्ण दापोली माहीत होते. दिवसभर तिथे हिंडलो. संध्याकाळी शंकरने सहजपणे विचारले,

” तुम्हाला डॉल्फिन बघायला आवडेल का?”

” इथे दिसतात?”

” हो… पण पहाटेच समुद्रात लांबवर जावे लागेल मग तुम्हाला डॉल्फिन दिसतील. “

“खरच.. का? आम्ही परत विचारले. “

“हो… मात्र अगदी सकाळी लवकरच निघूयात “

आम्ही” बरं ” म्हणालो. खुश झालो होतो.

शंकर यायच्या आत आम्ही सगळ्याजणी तयार होतो. भल्या पहाटे निघालो. तेव्हा समुद्रात मोठ्या लाटा येत होत्या. जोरात आवाज येत होता. समुद्र खवळला होता. ईतका की.. त्या आवाजाची भिती वाटत होती…

तो म्हणाला, ” जसं जसं पुढे जाऊ तसा समुद्र शांत होत जातो. काळजी करू नका. “

समुद्रात आतं आतं जायला लागलो. खरचं मग आवाज कमी कमी झाला. गाणी, गप्पा सुरू होत्या.

एका ठराविक ठिकाणी गेल्यावर त्याने बोट थांबवली. वरती निळं आभाळ आणि खाली निळाशार समुद्र… बाकी आसपास काहीही नव्हते.

तो म्हणाला…

“आता कोणी एक शब्दही बोलू नका. काही वेळातच तुम्हाला डॉल्फिन दिसायला लागतील.. “

क्षणातच शांतता पसरली एकदम निरव शांतता….

खरोखरच ती जाणवत होती अजून काही क्षण गेले…..

आसपासचे पाणी स्थीर झाले..

आणि अचानक समोरच पाण्यावर डॉल्फिन दिसायला लागले…

त्यांचा तो खेळ कितीतरी वेळ आम्ही पाहत होतो…

काहीतरी वेगळेच अनुभवायला मिळाले…

त्या अफाट समुद्रात चोहीकडे पाणी फक्त आमची बोट…..

आणि ते डॉल्फिन ते सुळकन् पाण्याच्या वर येत होते. नाचत होते. परत आत जात होते. त्याचे पाणी कारंजा सारखे ऊडत होते.

काही वेळेस शांतता असायची आणि परत त्यांचा खेळ सुरू होऊन तो रंगात यायचा…

सहज नैसर्गिक असं त्यांचं चालू असेल पण ते बघताना विलक्षण गंमत वाटत होती.

आम्ही त्यात रंगुन गेलो होतो…….

इथे डॉल्फिन बघायला मिळतील असे आम्हाला वाटलेच नव्हते. त्यामुळे अजूनच आनंद झाला होता.

“चला निघूया आता… “

असा शंकरचा आवाज आल्यावर आम्ही भानावर आलो.

कोणाला परत जावं अस वाटत नव्हतं.. पण बराच वेळ झाला होता निघणं भाग होतं..

येताना शंकरनी परत बोट थांबवली म्हणाला,

” तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो खाली बघा”

आम्ही सगळ्याजणी खाली बघायला लागलो..

तिथे समुद्राचा तळ दिसत होता.. नितळ स्वच्छ…

रंगीबेरंगी दगड, वाळू, नाजूक असे शंख शिंपले… त्यातले छोटे छोटे रंगीबेरंगी मासे ईकडे तिकडे जात होते. त्यांचा अनुपम्य खेळ चालला होता..

स्तब्धच झालो…

खाली त्यांच अस एक जग होत…

अगदी भारावून गेलो होतो…

किती तरी वेळ बघत होतो..

विलक्षण गोड निरामय आनंद देणार असं ते होतं.

त्या शांततेतला आनंद आम्ही घेतला………

निसर्ग शिकवतो आपल्याला कोलाहाला पासून दूर दूर जायचे.

नि:शब्द शांत बसायचे…

मगच आतले ते अनाकलनीय गूढगर्भी….

कधी न जाणवलेले दिसते….

स्पंदने जाणवतात…

शब्दांची आवश्यकता नसते….

आज पहाटे शंकरची आठवण आली. त्यानी दाखवले म्हणून आम्ही ते पाहू शकलो त्याचा अर्थ समजून घेऊ शकलो. असे दाखवणारा शंकर भेटला… याचाही मला आनंद झाला. निघताना आम्ही त्याचे खूप कौतुक केले… त्याला दिलेले बक्षीस तो घेत पण नव्हता.. शांतपणे हसत होता.. आम्हीच त्याला बळजबरीने ते घ्यायला लावले…

मनात आलं तो अनुभव आपल्याला परत कसा बरं मिळेल…. विचार केल्यावर एक लक्षात आलं… त्यासाठी बाहेरच जायला हव अस नाही.. घरी पण शांत बसता येईल की… म्हटलं बघू प्रयोग करून…

शांतपणे बसले. मनात आलं आज आपल्याच अंतरंगातच जरा डोकावून बघू…

हळूहळू आत जायला लागले

मन शांत करत खोलवर गेले

होतं का ते पारदर्शी?

होतं का ते स्वच्छ?

लक्षात आलं ती जबाबदारी माझी बाहेरचं जग खूप बघून झालं आता पुरे…

अर्थात हे इतकं सोपं नाही आचरणात आणणं त्यातूनही अवघड..

पण लक्षात आलं..

ही वाटचाल करताना मार्गदर्शन करायला शिकवायला आपले संत आहेतच….

रामदास स्वामींची आठवण झाली…

” बैसोनी निवांत शुद्ध करा चित्त तया सुख अंतपार नाही येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलीया”

ऋषीमुनी निसर्गाच्या एकांतात जाऊन तप का करत असतं याचा थोडासा उलगडा झाला…

प्रयत्न करत राहू…

कधी न बघितलेले डॉल्फिन आम्हाला बघायला मिळाले….

इथेही असंच काहीतरी आनंदाच गवसेल…

माहित नसलेलही काही समजेल… ही श्रद्धा ठेवूनच प्रयत्न करायचा फळ देणारा तो आहेच…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फोनकाका…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? मनमंजुषेतून ?

☆ फोनकाका…☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

” फोनकाका…. “

“ नमस्कार, बोला… “

फोनकाका कधीच ‘हॅलो’ म्हणायचे नाहीत. त्यांचं फोनवरचं बोलणं ‘ नमस्कार ‘ म्हणतच सुरू व्हायचं.

मला फार आवडायचं ते.

फोनकाकांचं खरं नाव मधूकाका दांडेकर. ते आता आठवावं लागतं. कारण, आमची आख्खी बिल्डींग,

त्यांना ‘फोनकाका’ म्हणूनच ओळखायची. ओनरशीपच्या ऊमेदीच्या काळातली आमची बिल्डींग.

अवतीभवती भरपूर रिकामी जागा. सगळी मध्यमवर्गीय घरं. कुठल्यातरी वाड्यातून नाहीतर चाळीतून इथं आलेली… इथला ‘फ्लॅट’ घेताना ‘फ्लॅट’ झालेली साधी माणसं.

आपली मूळ अघळपघळ संस्कृती न विसरलेली. खाजगीपणाचा संसर्गजन्य रोग इथं पसरला नव्हता.

सगळ्या फ्लॅट्सची दारं सताड उघडी असायची. पंचवीस तीस पोरांचा धुडगूस सतत चालायचा.

दांडेकरांचं घर तेवढं उच्चभ्रू वाटायचं. बाकी कुठल्याही फ्लॅटमधे न दिसणारी एक वस्तू… अनमोल, अलौकिक… ती मधुकाकांच्या घरी होती. काळा कुळकुळीत फोन. कोकिळेने कुहू कुहू करावं, तसा ट्रिंग ट्रिंग वाजायचा.

लहान असताना मला, श्रीमंतीची भारी भारी स्वप्न पडायची. स्वप्नात मी मोठ्ठा माणूस झालेला असायचो.

मला गाडी, बंगला काहीही दिसायचं नाही. दिसायचा तो फक्त, पुढच्या खोलीत ठेवलेला फोन.

खरंच, फोन असणं मोठेपणाचं लक्षण असायचं तेव्हा. फोनकाकांचं पेठेत मोठ्ठं किराणामालाचं दुकान.

घरी आणि दुकानात दोन्हीकडे फोन. सकाळी सकाळी फोनकाकांचे पुण्यामुंबैला ट्रंककाॅल चालायचे.

ट्रंककाॅल म्हणजे गावजेवण. भावांच्या चढऊतारानुसार फोनकाकांचा आवाज फिरायचा.

आम्ही खाली खेळत असायचो. सगळं ऐकू यायचं. आम्ही तालासुरात फोनकाकांच्या आवाजाची नक्कल करायचो.. अगदी फोनकाकांची चिलूसुद्धा. फोनकाका कधीही रागवायचे नाहीत. खिडकीतून खाली बघत आपल्या सफरचंदी गालातल्या गालात हसायचे.

एकदा गंमतच झाली. आम्ही खाली खेळत होतो. खेळता खेळता माझी फोनकाकांची नक्कल चालूच होती… 

” नमस्कार, बोला… “.. मी फाॅर्ममधे.

एकदम फोनकाकांची हाक. ” कौत्या, वर ये जरा.. “.. चिडका आवाज. माझी तंतरली. मी घाबरत घाबरत वर..

‘ बस… एक फोन येईल आता. माझ्या सासूचा. माझ्या आवाजात बोलायचं.

‘ सध्या दुकानात दिवाळीची गडबड आहे. डिसेंबरात येवू.. ‘.. असं सांगायचं.. “

मी डिट्टो फोनकाकांसारखं बोललो… फोनकाका खूष. मूठभर काजूचा प्रसाद घेवून खाली पळालो.

संध्याकाळी मातोश्रींनी पाठीचा पाटा-वरवंटा केला.

” मेल्या, काय मिळवलंस असा आवाज काढून? दीड वर्ष झालं, चिलूची आई माहेरी गेली नाहीये.

मधुभाऊजींचा आवाज काढून, नाही जमणार म्हणालास, थांब तुझ्या कानात फोनची ट्रिंग ट्रिंग वाजवते. “

नंतर खरंच चार दिवस माझ्या कानात ट्रिंग ट्रिंग ऐकू यायचं.

 

एरवी फोनकाकांचं घर म्हणजे चावडी. सतत कुणीतरी बसलेलं असायचं. स्वयंपाकघरात चहाचं आधण सदैव ठेवलेलं. कुणाचा तरी फोन आलेला. कुणाचा तरी यायचा असायचा. फोनकाकांच्या घरानं कधी तक्रार केली नाही. घरचं कार्य असल्यासारखं फोनकाका निरोप द्यायचे.

कधीतरी बाबांचा फोन यायचा. फोनकाकांची हाक ऐकू यायची.

” भार्गवा कर्दनकाळ बोलावतोय रे… “.. कर्दनकाळ म्हणजे बाबांचे बाॅस. बाबा पळत पळत फोनकाकांकडे.

 

बिल्डिंगमधील कित्येक पोरींच्या लग्नाचा होकार फोनकाकांकडनंच समजायचा.

मला अजूनही आठवतंय. वैशूताईचे बाबा फोनकाकांकडे बसलेले. रात्री आठची वेळ. ते फोनकडे डोळे लावून बसलेले. तिकडून पसंती यायची होती.

फोन वाजला. फोनकाकांनी घेतला. काही न बोलताच ठेवून दिला.

” आप्पा, योग नाहीये रे.. ” वैशूताईचे बाबा डोळे पुसत घरी गेले.

मी बिल्डींगभर सांगत सुटलो.

” मी वैशूताईच्या बाबांना रडताना बघितलंय. “

तेव्हा काही नाही वाटलं. आता आठवलं की स्वतःचीच लाज वाटते.

महिनाभरानंतरची गोष्ट. मी वैशूताईकडे बसलेलो. फोनकाका धावत धावत आले… 

” आप्पा, नशीब काढलं पोरीनं. वहिनी साखर आणा आधी. आपली वैशू पसंत आहे त्यांना. आत्ताच नवऱ्या मुलाच्या काकाचा फोन आला होता. ” एवढं बोलून फोनकाकांचे डोळे वहायला लागले.

मला कळलंच नाही… ‘ एवढी मोठी माणसं आम्हा लहान मुलांसारखी, सारखी रडतात काय ?’

एकदा रात्री पावणेबारा वाजता आमचं दार वाजलं. बाहेर फोनकाका. मी जागा झालो.

हलक्या आवाजात बाबांशी काहीतरी बोलले. बाबांच्या डोळ्यात पाणी. फोनकाकांनी बाबांच्या हातात, एक खाकी पुडकं दिलं. आई तर रडायलाच लागली. फोनकाका बाबांना घेवून स्टॅन्डवर गेले. मी तसाच झोपलो.

दुसऱ्या दिवशी कळलं. गावाकडनं फोन आला होता. माझी आजी सिरीयस होती. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायचं होतं. फोनकाकांनी दहा हजार रुपये आणून दिलेले. बाबा नको नको म्हणत होते.

फोनकाकांनी ऐकलंच नाही. फोनकाका म्हणजे, फोनबाप्पा वाटायचे आम्हाला.

हळूहळू आम्ही मोठे झालो. काॅलेजात जायला लागलो. एके दिवशी सकाळी फोनकाकांनी बोलावलं.

” कौत्या, ही पमा कोण ?” मी जीभ चावली.

” काल रात्री फोन आला होता तिचा. तुला मुद्दामहून बोलावलं नाही. तुझा बाप होता ना घरात. बस इथं फोनजवळ. साडेसातची वेळ दिलीय तिला. आवाजावरनं चांगली वाटत्येय पोर. बघ, काही जमतंय का ?”

आयुष्यात मी पहिल्यांदा लाजलो.

.. जमलं. पमाशीच जमलं माझं. आधी आमचे गुपचूप फोन. मग दोन्ही व्हीलन बापांची समजूत.

साखरपुडा… लग्न… हनीमूनला गेल्यानंतर घरी केलेला फोन… सगळी फोनकाकांची कृपा.

एवढंच काय, मृण्मयीचा जन्म झाल्याची बातमी सुद्धा पहिल्यांदा फोनकाकांनाच समजली.

मृण्मयीचा जन्म झाला त्याचवर्षी फोनकाकांच्या चिलूचं लग्न झालं. चिलूशिवाय जगणं फोनकाकांना फार जड गेलं.

याच काळात बिल्डींगीत फोनची संख्या वाढली. घरटी फोन आला. फोनकाकांचं काम संपलं.

आता तर… पंधरा वर्ष झाली बिल्डींग सोडून. मृण्मयी दहावी झाली यंदा. तिला काल नवीन सेलफोन घेवून दिला.

” बाबा, पहिला फोन मी तुला करणार. “.. गॅलरीतनं तिनं फोन लावला.

मी उचलला.

” नमस्कार, बोला…. ” एकदम जीभ चावली. कधी सवय लागली, कुणास ठाऊक ? एकदम फोनकाकांची आठवण आली.

‘ते काही नाही. उद्या रविवार आहे. भेटून येवू यात. सगळेच जाऊ यात… ‘

ठरलं तर.

फोनकाकांचा नंबर पाठ होताच. मी डायल केला. पलीकडनं कापरा आवाज आला.

” नमस्कार, बोला…. “

माझ्या डोळ्यातून पाणी.

‘ एवढी मोठी माणसं लहान मुलांसारखी रडतात कशी ? ‘

– – तेव्हा नव्हतं कळलं.

पण आता कळलं – – 

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares