श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ “पालकांना भावनिक शहाणपण कसं येणार?” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास २५ छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या ३५० हून अधिक विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याचा योग आला. साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या भेटी झाल्या, अजूनही हा ओघ सुरूच आहे. या सर्वच्या सर्व मुलांकडून “मला पुण्यातच जायचंय” या तीन शब्दांखेरीज दुसरा शब्द मी ऐकला नाही आणि विशेष म्हणजे पालकांचाही याला पाठिंबा आहे.

“मला जे जे मिळालं नाही ते ते सगळं मी माझ्या मुलांना देणार” असा बहुतेक सर्व पालकांचा दृष्टीकोन दिसतो आहे. आणि या सगळ्या “जे जे – ते ते” मध्ये ज्या गोष्टींची काडीमात्र आवश्यकता नाही, त्या सगळ्या गोष्टी पालकांनी दिलेल्या मला आढळल्या. मी ज्या ज्या मुलांना भेटलो त्यातल्या सर्वच्या सर्व मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोली आहे आणि निम्म्याहून अधिक मुलांच्या खोलीमध्ये एसी आहे. एकूणएक मुलांकडे स्मार्टफोन्स आहेत. अनेक मुलं-मुली तर आठवीपासूनच स्वत:चा स्वतंत्र स्मार्टफोन वापरतायत. साधारण ७५% मुलांच्या घरी वायफाय आहे. या मुलांपैकी बहुतांश मुलांना सातवी-आठवीपासूनच स्वतंत्र टू-व्हिलर हातात मिळाली आहे. यांच्यात असा कोणीही नाही, जो सायकल वापरतो आहे. यांच्यापैकी अनेकांनी दहावीच्या वर्षात पर्सनल ट्यूशन्स लावलेल्या होत्या, ज्यांच्या फी चा आकडा लाखाच्या घरातला आहे.

‘दहावीच्या नंतर मी पुण्यातच येणार आहे कारण आमच्या गावात शिक्षण घेण्यात काहीही अर्थच नाहीय’ असं या मुलांनी स्पष्टपणे म्हणावं असा नेमका कुठला अनुभव यांनी घेतला आहे? पुणे आणि मुंबई वगळता महाराष्ट्रातल्या अन्य शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या गावी दहावीनंतरच्या शिक्षणाची इतकी दयनीय अवस्था आहे का? महाराष्ट्रात छोट्या शहरांमध्ये शिक्षणाला पूरक असं सकारात्मक वातावरणच नाहीय का? आणि हे वातावरण केवळ पुण्यातच आहे का? या प्रश्नांवर पालकांचं मतसुद्धा फारच चमत्कारिक आहे. अगदी ५०% गुण मिळालेल्या विद्यार्थ्यापासून ते ९९% गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांच्याच शैक्षणिक रडारवर फक्त पुणंच कसं काय? असा प्रश्नच मला पडतो.

“आमच्या गावात काय ठेवलंय हो? मुलांना इथं ठेवलं तर त्यांच्या आयुष्याची माती होईल” असं अनेक आया मला अगदी स्पष्टपणे म्हणतात.

अनेक पालकांनी दहावीनंतर मुलाला पुण्यातच ठेवायचं, या इच्छेपोटी ५० ते ६० लाख ₹ किंमतीचे फ्लॅट्स घेऊन ठेवले आहेत. शहरांमधल्या चकचकाटाचा आणि वरवर दिसणाऱ्या सुखवस्तू जीवनशैलीचा मोह फक्त विद्यार्थ्यांनाच आहे की पालकांनाच तशी खरी सुप्त इच्छा आहे ? याचं उत्तर स्पष्ट समोर दिसतं आहे. आपण आपल्या डोळ्यावर अशी पट्टी का बांधून घेतली आहे, यावर पालकांनी शांतपणे विचार केला पाहिजे.

छोट्या शहरांमध्ये शिकलेल्या मुलांचं नुकसान होतं का? त्यांची प्रगती होत नाही का? त्यांना ‘स्कोप’ मिळत नाही का? त्यांच्या आयुष्याचं खरोखरच वाटोळं होतं का? याची खरीखुरी उत्तरं पालक का बरं शोधत नाहीत? 

अनेक पालक तर मी असेही पाहिले आहेत की, ज्यांनी हैदराबाद किंवा कोटा इथंच मुलाला दोन वर्षांसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तिथं गेल्याशिवाय एन्ट्रन्स मध्ये स्कोअरच होणार नाही’ असं पालकांचं मत असतं. मुलगा किंवा मुलगी कोट्याला आणि बारावीची ॲडमिशन मात्र आपल्या जवळच्या काॅलेजात ! असा यांचा कारभार असतो. ‘काॅलेजला जाण्याची किंवा प्रॅक्टीकल्स करण्याची काही आवश्यकता नाही, क्लासमध्येच सगळं करून घेणार आहेत’ असं हे पालक इतक्या आत्मविश्वासानं सांगतात, की हा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्यात येतोच कुठून, हेच माझ्यासाठी विस्मयकारक आहे.

बारावीनंतरच्या एन्ट्रन्सेस मध्ये आपल्या मुलांची पार पिसं निघेपर्यंत धुलाई झाली की, यांची विमानं दाणकन् जमिनीवर आदळतात. काहींची आशा अजूनही मावळलेली नसते. बारावीत जेमतेम ५०% मार्क मिळालेले असले आणि एन्ट्रन्समध्ये मोठ्या कष्टानं ३०-३५ गुण मिळालेले असले तरीही ‘आमचा मुलगा/मुलगी इंजिनिअरींग करूच शकणार नाही का हो?’ असं अगदी काकुळतीला येऊन विचारणाऱ्या आया पाहिल्या की माझ्याच पोटात काळजीनं खड्डा पडतो.

स्वत:च्या क्षमता आणि स्वत:च्या मर्यादा या दोन्ही गोष्टींची व्यवस्थित जाणीव असली की निर्णय घेण्यातला आततायीपणा टाळता येतो. राष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. त्याकरिता खूप तयारीची आवश्यकता असते. आपण मनात ठरवणं ही गोष्ट वेगळी आणि मनात ठरवलेल्या गोष्टीकरिता जीव तोडून मेहनत करणं ही गोष्ट वेगळी. अभ्यासाची प्रेरणा आतूनच असणं महत्वाचं आहे. ही प्रेरणा असेल तर आपल्याला आपला स्वतंत्र ‘स्कोप’ निर्माण करता येणं शक्य असतं. पण, ही प्रेरणाच नसेल तर बाहेरून मलमपट्टी किती करणार? त्या वरवरच्या अभ्यासानं यश मिळत नाही आणि जरी मिळालंच तरी ते टिकतंच असंही नाही.

मग आपले कष्ट, इच्छाशक्ती, नियमित अभ्यास कमी पडल्याचं खापर आपल्या गावावर किंवा गावातल्या शिक्षणव्यवस्थेवर फोडून काय मिळणार आहे? याचा थोडासा विचार पालकांनी करावा, असं मनापासून वाटतं.

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments