मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आठवणींचा पट…” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आठवणींचा पट…” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नवीन वर्षाचा पहिला महिना…

एक वर्ष आणखी सरलं…

जन्मल्यापासूनचा आयुष्य पट कधी कधी आपोआप समोर ठाकतो.

मनात असो का नसो…. ! 

आयुष्यात केलेल्या भल्या बुऱ्या गोष्टी, नाठाळपणा, अवखळपणा, अजाणतेपणे केलेल्या अनेक चुका आठवतात….

कधी हसू येतं… कधी रडायला होतं… ! 

सारं काही पुस्तकात मांडलंय…

पण पुस्तकाने तरी माझ्या किती गोष्टी झेलायच्या आणि सहन करायच्या ? 

मला आठवतं, मी लहान होतो….

अंगात भरपूर “कळा” होत्या, पण एकही “कला” नाही… ! 

शाळेत गॅदरिंग असायचं…

माझ्या शाळेतली मुलं मुली याप्रसंगी विविध गुणांचे प्रदर्शन करायची…

यावेळी गॅदरिंग चा फायदा घेऊन मी सुद्धा “गुन” उधळायचो… ! 

गॅदरिंग च्या शेवटच्या दिवशी, बक्षीस समारंभ असायचा….. स्टेजवर खुर्च्या लावण्याची तयारी सुरू असायची… त्यात प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या खुर्च्या असायच्या.

जमिनीवर उकिडवे बसावे….

तसा मी चप्पल घालून या खुर्च्यांवर बसायचो… आणि काम करणाऱ्या बिचाऱ्या माझ्याच वयाच्या मुलांच्या चुका काढत राहायचो.

एकदा मुख्याध्यापकांनी हे पाहिलं, काही न बोलता त्यांनी हातातल्या पट्टीने मला फोडून काढलं.

तरीही, स्स हा…. स्स… म्हणत मी सरांना विचारलं होतं, सर नुस्ता खुर्चीत बसलो होतो, इतकं का मारताय ? 

‘नालायका, तुला माहित आहे का ? या खुर्च्या कोणाच्या आहेत ?’ 

‘हा सर, आपल्या शाळेच्या आहेत, म्हणून तर बसलो ना… ‘

‘कळली तुझी अक्कल बावळटा, आपले आजचे प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आणि आपल्या महाराष्ट्राचे वैभव जे आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत…

या खुर्च्या त्यांच्यासाठी मांडल्या आहेत… ‘

‘हा मं… ते यायच्या आधी मी बसलो तं काय झालं मं… ‘ मी तक्रारीच्या सुरात, पायाच्या अंगठ्याने जमीन टोकरत बोललो….

सोबत माझं स्स… हा… चालूच होतं.

त्यांना माझा धीटपणा आवडला ? 

की माझी निरागसता ?

माहित नाही….

परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचा राग निवळला…

ते मला म्हणाले बाळा, ‘प्रत्येक खुर्ची ही खुर्चीच असते… पण त्यावर कोण बसतो; यावर त्या खुर्चीची किंमत ठरते. ‘

‘खुडचीची किंमत काय आसंल सर… ?’ माझा भाबडा मध्यमवर्गीय प्रश्न.

आभाळाकडे पहात ते म्हणाले, ‘आपलं आयुष्य जो दुसऱ्यासाठी खर्ची घालतो, त्या प्रत्येकाला अशा खुर्च्या सन्मानाने मिळतात बाळा… याची किंमत पैशात नाही रे… ‘

‘मला पण पायजे अशी खुडची’ जेवताना मीठ मागावं, तितक्या सहजतेने सरांना मी बोलून गेलो.

‘तुझे एकूण गुण पाहता, हि खुर्ची तुझ्या नशिबात नाही… या खुर्चीत तुला बसायचं असेल तर अंगात काहीतरी पात्रता निर्माण कर… लायक हो… नालायका… !’

हे शब्द आहेत साताऱ्यामधल्या माझ्या शाळेचे, माझ्या वेळेचे मुख्याध्यापक सर यांचे… !

माझ्या याच शाळेने आणि माजी विद्यार्थ्यांनी मला पाच वर्षांपूर्वी जीवन गौरव पुरस्कार दिला….

शाळा तीच… प्रांगण तेच… स्टेज तेच…

मी बदललो होतो… ! 

मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले होते.

मी अट घातली होती, कार्यक्रमाला आदरणीय मुख्याध्यापक सरच हवेत…

स्टेजवर मी सन्माननीय म्हणून लिहिलेल्या खुर्चीवर आखडून बसलो होतो… पण यावेळी पाय खुर्चीवर नाही, जमिनीवर होते…

संयोजकांना मी विनंती केली होती, जे काही मला द्याल ते मुख्याध्यापक सरांच्या हातूनच मला द्यावं…. ! 

सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं.

माझ्या विनंतीनुसार, मुख्याध्यापक सरांनी मला ते मानपत्र दिलं…

सरांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांना म्हणालो, ‘सर मला ओळखलं का ?’

त्यांनी चष्मा वर खाली करून मला ओळखण्याचा प्रयत्न केला… पण नाही… ! 

मी सर्वसामान्य माणूस….

किती विद्यार्थी त्यांच्या हातून गेले असतील… ? 

ते मला इतक्या वर्षानंतर कसं ओळखतील ? आणि मी तरी असे काय दिवे लावले होते त्यांनी मला ओळखायला ? 

देवाला तरी सगळ्याच लोकांचे चेहरे कुठे आठवत असतात… ???

मग मी त्यांना शाळेतल्या दोन-चार आठवणी सांगितल्या…

आत्ता सरांना आठवले….

‘अरे गधड्या… नालायका… मूर्खा… बावळटा… तुच आहेस होय तो DOCTOR FOR BEGGARS?’

मी खाली मान घालून हो म्हणालो… ! 

यावर अत्यानंदाने त्यांनी मला मिठी मारली… ‘

यानंतर सरांचे वृद्ध डोळे चकमक चकमक…. चकाकत होते… ! 

कष्टाने वाढवलेल्या, जगवलेल्या झाडाला पहिलं फळ येतं, तेव्हा शेतकरी ज्या कौतुकाने त्या झाडाकडे बघेल… त्याच नजरेने सर माझ्याकडे बघत होते.

‘मी तुझ्या कामात काय मदत करू ? मी तुला आता काय देऊ ?

ती वृद्ध माऊली, इकडे तिकडे पहात, जुन्या सफारीच्या खिशात भांबावून उगीचच इकडे तिकडे हात घालत बोलली… ‘

जुन्या सफारीची विण उसवली होती…

हे माझ्या नजरेतून सुटलं नाही…

मी खिशात जाणारे त्यांचे दोन्ही हात पकडून बोललो… ‘सर, काही द्यायचं असेल तर हातावर एक छडी द्या… माझी तितकीच पात्रता आणि लायकी आहे सर…. ‘ 

यावर लहान मुलासारखे ओठ मुडपून त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला…

तो हसण्याचा प्रयत्न होता की रडू आवरण्याचा… ? मला कळलं नाही… ! 

ते म्हणाले… ‘गधड्या…. नालायका… मला वाटलं आता तरी तू सुधारला असशील…

पण तू अजून सुधारला नाहीस रे…. ‘ असं म्हणत माझ्या नावाच्या खुर्चीवर सरांनी मला हाताला धरून बसवलं…. ! 

आता ओठ मुडपून, हसणं आवरण्याची आणि रडणं सावरण्याची माझी कसरत सुरू झाली…

जाताना कानात म्हणाले, ‘आता या खुर्चीवर मांडी घालून किंवा पाय वर ठेवून बसलास तरी चालेल, मी तुला ओरडणार नाही… हि खुर्ची तु कमावली आहेस बाळा… ‘ 

यानंतर ते स्टेजच्या मागे निघून गेले….

यानंतर माझ्या कौतुकाची भाषणांवर भाषणे झाली….

मला यातलं काहीही ऐकू आलं नाही….

मला फक्त ऐकू आले…. ते माझ्या मास्तरचे हुंदके… !!!

———+++++++++———–++++++++

साताऱ्यात त्यावेळी खूप साहित्य संमेलनं व्हायची…

आम्ही दोन चार मित्र या संमेलनाला जायचो…

व्हीआयपी लोकांसाठी तिथे एक कॉर्नर केला होता… त्यावेळी एसी नव्हते, पण कुलर होते…

वर्गात उकडतंय, म्हणून या कुलरचं वारं घेण्यासाठी आम्ही येत होतो, अन्यथा साहित्यातलं आम्हाला काय ढेकळं कळतंय… ? 

निर्लज्जपणे आम्ही खुर्च्यांवर पाय ठेवून कुलरचं वारं घेत बसायचो…

संयोजक मंडळी येऊन मग आम्हाला कुत्रं हाकलल्यागत हाकलून द्यायचे…

——++++++—+++++——+++–+++

एखाद्या कार्यक्रमात पहिल्या तीन रांगा व्हीआयपी साठी असतात… आम्ही पोरं पहिल्या रांगेमध्ये बसायचो… इथूनही संयोजक आम्हाला कानाला धरून उठवायचे… ! 

मागून शब्द कानावर पडायचे… लायकी आहे का तुमची पहिल्या रांगेत बसायची ? 

या सर्व जुन्या बाबी मी अजून विसरलो नाही.

आज किती वेळा मी प्रमुख पाहुणा झालो असेन, अध्यक्ष झालो असेन, वक्ता झालो असेन… पण त्या खुर्चीत बसलो की अजूनही मला भीती वाटते…

मुख्याध्यापक सर येतील पट्टी घेऊन….

आज कित्येक मोठ्या मोठ्या साहित्यिकांमध्ये, अनेक मोठ्या मोठ्या लोकांमध्ये उठबस होते… व्हीआयपी लाउंज मध्ये बसवलं जातं… पण आजही भीती वाटते आपल्याला इथून कोणी उठ म्हटलं तर… ? 

हाताला धरून आज पहिल्या रांगेमध्ये बसवलं जातं…. तरीही माझ्या नजरेत धाकधूक असते… आपल्याला इथून कोणी उठवलं तर… ?

पूर्वी एखाद्या कार्यक्रमांमध्ये माईक चालू असायचा….

कोणाचं लक्ष नाही असं पाहून, मी माईक हातात घ्यायचो… उं… ऐं… खर्र… खिस्स…. फीस्स… असे आवाज काढून बघायचो… माइक वर आपला आवाज कसा येतो ते बघायचो… मीच गालातल्या गालात हसायचो.

तेवढ्यात पाठीमागून शाळेतल्या शिक्षिका यायच्या, आणि पट्टीचे फटके मारून स्टेजवरून खाली उतरवायच्या.

– क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महाकुंभ : भक्त, सेवक आणि साधना… लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

💥 मनमंजुषेतून 💥

☆ महाकुंभ : भक्त, सेवक आणि साधना… लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

प्रयागराज येथील महाकुंभ सोहळ्यात तीन दिवस घालवल्यानंतर, तिथल्या त्रिवेणी संगमावर लोटलेला मानवतेचा महासागर पाहिल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे महाकुंभ प्रामुख्याने फक्त दोनच प्रकारच्या लोकांचा आहे, भाविकांचा आणि सेवकांचा! 

खरे भाविक, जे कुणीही न बोलावता श्रद्धेने भरलेले हृदय घेऊन प्रयागराजला येतात मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी आपली सामानाची गाठोडी डोक्यावर ठेवून मैलोनमैल चालत येतात ते भाविक, जे संगम स्नानासाठी तासचे तास शांतपणे वाट पाहतात, जे गंगाजल भरण्यासाठी आठ दहा मोठे कॅन घेऊन येतात आणि ते भरलेले, जड कॅन मोठ्या कष्टाने वाहून त्यांच्या त्यांच्या गावी नेतात, त्यांच्या स्वतःसाठी नव्हे, तर नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, सुहृदांना देण्यासाठी. जे रात्री झोपायला खोली मिळाली नाही तर शांतपणे पथारी पसरून नदीच्या काठावर वाळवंटात झोपतात, कसल्याच सुविधा नसल्या तरी ते तक्रार करत नाहीत.

पवित्र संगमात स्नान करताना त्यांच्या मिटलेल्या डोळ्यातून आपसूक पाणी वाहते. गंगेच्या थंडगार प्रवाहाच्या कुशीत ते अश्या निःशंकपणे शिरतात जणू त्यांना पूर्ण खात्री असते की त्या क्षणी गंगामाई त्यांना आपल्या निळसर सावळ्या प्रवाहात अशी अलगद सामावून घेईल जशी एक आई आपल्या बाळाला गर्भात सांभाळते. पाण्यात डुबकी घेऊन जेव्हां ते वर येतात तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावरची तृप्तीच सांगत असते की त्यांना पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या आत्म्यावर साचलेल्या कर्मरूपी धुळीची पुटे त्या स्नानाने वाहून गेली आहेत. गुडघाभर पाण्यात उभे राहून जेव्हा ते सूर्याला अर्घ्य देतात तेव्हां सोनेरी उन्हाने झळाळून निघालेल्या त्यांच्या चेहेऱ्यावरचे संपूर्ण समर्पण भाव पाहण्यासारखे असतात. कुंभ खऱ्या अर्थाने त्यांचा असतो.

परमार्थ निकेतनच्या साध्वी भगवती सरस्वती यांनी म्हटल्याप्रमाणे, खरे भक्त हे फक्त आस्थेसाठी, भक्तीसाठी येतात. त्यांचे पूर्वजही कधीकाळी असेच आले असतील प्रयागला, इथल्याच मऊ वाळूत उभे राहून त्यांनी असेच सूर्योदय पहिले असतील. इथल्याच थंडगार पाण्यात असेच स्नान करताना त्या लोकांनी ज्या प्राचीन मंत्रांचा उच्चार केला होता, त्याच मंत्रांचे, त्याच भाषेतले उच्चार त्यांचे वंशज आजही करतात. गंगेचा शांत, प्रेमळ प्रवाह मात्र तेव्हाही असाच अविरत वाहात होता, आजही तसाच वाहात आहे. बाहेरच्या जगाला महाकुंभ म्हणजे काय हे माहिती नव्हते तेव्हांही हे सच्चे भाविक संगमस्नानासाठी प्रयागला येत होते आणि भविष्यात जग महाकुंभ विसरले तरीही ते इथे येतच राहतील. कारण हा महाकुंभ त्यांच्या भक्तीचा महाकुंभ आहे.

मानवतेचा महासागर हे कुंभमेळ्याचे वर्णन काही आजचे नाहीये. ह्युएन त्संग (Xuanzang) हा प्रसिद्ध चीनी बौद्ध भिक्षू सातव्या शतकात भारतात आला होता. त्याने Great Tang Records on the Western Regions या प्रवासवृत्तांतात भारतातील अनेक ठिकाणांचे, संस्कृतीचे आणि धार्मिक परंपरांचे वर्णन केले आहे. कनौजचा सम्राट हर्षवर्धन याच्या राज्यकाळात प्रयागराज येथे भरलेल्या कुंभमेळ्याचे वर्णन करताना तो म्हणतो की या मेळ्यात हजारो लोक भारताच्या वेगवेगळ्या भागांतून एकत्र आले होते ज्यात हिंदू साधू तर होतेच, पण जैन मुनि, बौद्ध भिक्षू, विद्वान आणि सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मेळ्यात धार्मिक प्रवचने, ग्रंथांचे वाचन, आणि विद्वानांचे वादविवाद (शास्त्रार्थ) चालत असत. लोक येथे मानसिक शांती आणि चित्तशुद्धीसाठी येत असत असे ह्युएन त्संग म्हणतो, जे आजही खरे आहे. वरची आवरणे, पेहनावा जरी बदलला असला तरी कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची आतली भक्ती तीच आहे आणि म्हणूनच महाकुंभ सर्वप्रथम त्यांचाच आहे.

महाकुंभ त्यांचाही आहे, जे इथे काही देण्यासाठी येतात, घेण्यासाठी नाही.

१५, ००० सफाई कर्मचारी, जे दिवसातून चार वेळा नदीकाठ झाडून इथल्या लाखो पाऊलखुणा मिटवून टाकतात, नव्या दिवसाची सुरुवात नव्या पावलांच्या खुणांनी व्हावी म्हणून. १२५, ००० पोलिस, जे प्रयागमध्ये जमलेल्या मानवतेच्या महासागराच्या लाटा अंगावर झेलण्याचे अवघड काम करतात, कधी मार्गदर्शन करतात, कधी संरक्षण देतात, तर कधी शांतता आणि शिस्त राखण्यासाठी ओरडतातही. बचाव पथकातील हजारो स्वयंसेवक, जे नेहमी दक्ष असतात, त्यांच्या कौशल्याची कधीच गरज पडू नये अशी त्यांची आशा असते, पण दुर्दैवाने अशी गरज पडलीच तर ते त्यासाठी सदैव सज्ज असतात. इथल्या ५५० शटल बसचे चालक, जे अखंड फेऱ्या मारून यात्रेकरूंना संगमापर्यंत पोहोचवतात. अनेक मठ, मंदिर, धार्मिक संस्थांचे स्वयंसेवक जे उपाशी लोकांसाठी रात्रंदिवस खपून जेवण बनवतात. थकलेल्या यात्रेकरूंच्या पायांना मालिश करणारे सेवाभावी लोक, धार्मिक संस्थांच्या दवाखान्यांत सेवा देणारे डॉक्टर, पडद्याआड असलेले अदृश्य सरकारी अधिकारी जे अठरा अठरा तास काम करून इथली व्यवस्था सांभाळण्याचे आपले कर्तव्य बजावतात. कुंभ जितका भाविकांचा आहे तितकाच त्यांचाही आहे. सेवकांचा. जे निरपेक्ष भावनेने सेवा देतात त्यांचाही आणि जे कर्तव्य म्हणून सेवा देतात त्यांचाही.

बाकी आपण बहुतेक सारे – कुतूहलापोटी आलेलो असतो. महाकुंभाचा थक्क करणारा आवाका पाहून आपण भारावून जातो. इथली मैलोनमैल पसरलेली तंबूंची नगरे, अशक्यप्राय वाटणाऱ्या ठिकाणी बांधलेली स्वच्छतागृहे, आकाशात घिरट्या घालणारे ड्रोन, नदीकाठी उभारलेली तात्पुरती शहरे, रस्ते, हेलिपॅड वगैरे सुविधा पाहून आपण अचंबित होतो, आपण स्नानही करतो, कदाचित आपल्यापैकी काही जणांना गंगेच्या पाण्याच्या स्पर्शाने भक्तीचा परिसस्पर्शही होतो.

पण मुळात आपण न निखळ श्रद्धावान भक्त असतो, ना निःस्वार्थ सेवा देणारे सेवक.

आपण आहोत घटकाभर थबकून इतिहासाच्या खिडकीतून कुतूहलाने ह्या श्रद्धा आणि भक्तीच्या सोहळ्याकडे डोकावून पाहणारे प्रवासी. आपण उद्या इथून निघून गेल्यावरही महाकुंभ सुरूच राहील, गंगेच्या प्रवाहात छोटा खडा फेकल्यावर उठणारा क्षणिक तरंग आहोत आपण फक्त.

महाकुंभ फक्त एक ‘इव्हेंट’ नाही, तर तो भारताच्या नाडीचा दर बारा वर्षांनी निनादणारा एक ठोका आहे, जो खऱ्या भक्तांना आपसूक ऐकू येतो आणि सेवाभावनेने कार्य करणाऱ्या लोकांना आवाहन करतो.

होय, तुम्ही, मी, आपण बहुतेक जण केवळ पर्यटक आहोत. कुंभ खरा फक्त अश्याच लोकांचा आहे, जे एकतर पूर्ण श्रद्धेने भक्ती करतात किंवा संपूर्ण समर्पण भावाने सेवा देतात!

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

☆ संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा… ☆  श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

२५ जानेवारीची संध्याकाळ. आधीच शनिवार-रविवार आणि त्यात पुन्हा राष्ट्रीय सुट्टी आलेली. आजूबाजूची सगळी शोरुम्स आणि मॉल्स गर्दीनं खचाखच भरुन वाहत होते. कुणाला तरी भेटायला गेलो होतो आणि तिथं आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून जवळच्या एका मॉलमध्ये आम्ही पोट भरण्यासाठी गेलो. पण तिथल्या कॅफेटेरियाचे दर बघून आमचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. पंधरा-वीस स्टॉल्स होते खरे. पण किंमती अवाढव्य होत्या. ८० रुपयांची पाणीपुरी, २०० रुपयांचं सँडविच, १८० रुपयांपासून पुढे सुरु होणारी चाट हे खिशापेक्षा मनालाच परवडत नव्हतं.

मी त्यांना म्हटलं, “जाऊ द्या. आपण टपरीवर चहा घेऊ. ” 

ते म्हणाले, “जीबीएस कसा भडकला आहे, बघतोयस ना. उघड्यावरचं काही नको रे बाबा. ” आम्हीं पंधरा वीस मिनिटं तिथं होतो आणि शेवटी काहीही न खाता पिता तिथून निघालो. पण त्या मॉल मध्ये जे दृश्य होतं, ते बघून मला धक्का बसला.

तरुण मुलामुलींची तर गर्दी होतीच, शिवाय शेकड्यांनी परिवारसुध्दा होते. तिथं पाणीसुद्धा विकत घेऊन प्यावं लागत होतं. चार-पाच जणांचं बिल एक हजाराच्या वर सहजच जात असेल. कितीतरी लहान लहान मुलं त्या कॅफेटेरिया मध्ये जंक फूड मनसोक्त खात होती. कॉलेजवयीन मुलामुलींच्या जोड्या होत्या. ५०० रुपयाचं सिझलर घेऊन टेबलावर गप्पा मारत बसलेलं एक युगुल दहा मिनिटांनी ती डिश तिथंच तशीच टाकून उठून निघून गेलं. कितीतरी लोक खाणं अर्धवट टाकून उठून निघून जात होते. छोले भटुरे मागवलेल्या एका ग्रुपनं तर निम्मे भटुरे तसेच टाकले. विकत घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा अर्धवट टाकून निघून गेलेले लोक मी बघत होतो.

बरं, असला “टाकून माजण्याचा” मस्तवालपणा करणारी जी जनता होती, ती काही मर्सिडीज क्लास नव्हती. सगळेच्या सगळे मध्यमवर्गीयच होते. “पेट्रोल २५ पैशांनी महागले अन् जनतेचे कंबरडे मोडले” किंवा “कोथिंबीर कडाडली, लोकांनी खायचं काय?” असले मथळे लिहिणाऱ्यांनी मॉलमधले हे मध्यमवर्गीय बघितलेले असतात का? असा प्रश्न मला पडला.

मेसचे डबे लावून जेवणाऱ्या मुलांचं आणि मुलींचं मी अनेकदा निरीक्षण केलंय. आठवड्यातून तीनदा तरी डब्यातलं अन्न जसंच्या तसं कचऱ्यात गेलेलं असतं. घराघरांतून गोळा केला जाणारा ओला कचरा तुम्ही अवश्य पहा. चांगल्या प्रतीचं ब्रँडेड अन्न कचऱ्यात फेकून दिलेलं तुम्हाला दिसेल. हॉटेलमध्ये सँडविचच्या डिशमध्ये कोबी किसून डेकोरेट करुन सर्व्ह करतात. तो कच्चा कोबी कितीजण खातात? मोठमोठ्या कॉफी शॉप्स मध्ये मी पाहतो, मला फार वाईट वाटतं. पाचशे-सातशे रुपये किंमतीची कॉफी अर्धवट टाकून लोक निघून जातात. पाचशे रुपयांतले तीनशे रुपये आपण कचऱ्यात ओतले, याचं त्यांना भानही नसतं आणि त्याचं त्यांना वाईटही वाटत नाही.

एकदा सोलापूरहून पुण्याला येत असताना एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये आम्ही ब्रेक घेतला. शेजारच्या टेबलावर सात आठ जण बसले होते. आठ जणांनी आठ वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. इतके स्टार्टर्स, इतक्या डिशेस.. टेबल अख्खं भरलं होतं. पण खाल्लं किती? जितकं मागवलं होतं त्यातलं निम्मंसुद्धा नाही.. ! बिल भरुन माणसं निघूनही गेली.

याला आपण नेमकं काय नाव द्यावं? ‘महागाई किती वाढलीय’ असं ओरडणारी अगदी साधी साधी माणसंसुद्धा वडापाव घेताना पाच सात मिरच्या घेतात आणि त्यातली एखादीच खाऊन बाकीच्या चक्क कचऱ्यात टाकतात.. ! पराक्रम दाखवण्याच्या नादात एकस्ट्रा तिखट मिसळ मागवतात आणि चार घासातच त्यांचा धीर गळून पडतो. अन्न वाया.. ! सँडविचची हिरवी चटणी जास्तीची घेतात आणि टाकून देतात.. ! एखाद्या सँडविचवाल्याची किलोभर हिरवी चटणी दररोज सहजच उकिरड्यावर जात असेल..

गुरुवारी – शनिवारी देवळाबाहेर हात पसरुन बसलेली माणसं सुद्धा आता रुपया-दोन रुपयांचं नाणं, पार्ले बिस्कीट पुडा, एखादा वडापाव असलं काही दिलं तरी तोंड वेंगाडतात. त्यांना दहा रुपयांचं नाणं हवं असतं. ताजी पोळी-भाजी दिली तरी टाकून देणारे सुद्धा भिकारी मी पाहिलेत. मग भीक मागण्यामागची त्यांची नेमकी भावना तरी काय? आपल्याला आपल्या पात्रतेनुसार किंवा पात्रतेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मिळतंय, याची जाणीव इथेही दिसत नाही.

न कमावणारे, कमी कमावणारे, भरपूर कमावणारे, आपकमाईवाले, बापकमाईवाले सगळे सगळे या एकाच बोटीत बसलेले आहेत. काहीजणांची ही वृत्तीच आहे आणि काहीजणांना आपलं काहीतरी चुकतंय याची लांबलांबपर्यंत जाणीवच नाही. आणि दुसरं कुणी ह्यांना ही जाणीव करुन द्यायला तयार नाही.

महिन्यातले पंधरा दिवस मेसचा अख्खा डबा कचऱ्यात टाकणारे विद्यार्थी आणि मुलांच्या हट्टापायी भारंभार पदार्थ मागवून त्यातलं निम्म्याहून जास्त अन्न टाकणारे सुशिक्षित पालक दोघेही समाजाचे दोषी नाहीत का ? 

महागाई वाढल्याचं ढोंग करणारी माणसं त्यांची जीवनशैली जराही बदलायला तयार नाहीत. बापकमाईवर घेतलेला ब्रँडेड कपडा जास्तीत जास्त चार पाच वेळा घालून कपाटात कोंबणारे अन् पुढच्या महिन्यात पुन्हा नवे कपडे घेणारे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याचा नेमका कसा विचार करत असतील? त्यांचे आईवडील त्यांना दर महिन्याला पैसै पाठवताना काय विचार करत असतील? कॉलेजच्या ऑफिसात फी माफीचे अर्ज करुन घेणारी मुलं मला जेव्हां त्यांच्या परमप्रिय मैत्रिणीसोबत फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपयांचा उत्तप्पा खाताना दिसतात, तेव्हां त्यांची गरिबी नेमकी कोणती? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण कॉलेजची फी खोटं कारण दाखवून माफ करुन घेऊन हॉटेलात एकावेळी पाचशे रुपयांची नोट खर्च करणं हे प्रामाणिक माणसाचं लक्षण नाही.

आमच्या आजूबाजूच्या परिसरात रात्री बारा वाजता पंधरा वीस बुलेट बाइक्स मोठाला आवाज करत गेल्या आणि अर्धा तास हवेत तीन चार हजार रुपयांची फटाक्यांची आतषबाजी होत राहिली की, आपण ओळखावं – आज कुठल्यातरी बेरोजगार दिवट्याचा वाढदिवस आहे आणि चार घरी धुणीभांडी करुन घराचा गाडा ओढणाऱ्या आपल्या आईच्या कमाईवर फुकट मजा मारणारं पोरगं आज एक वर्षानं मोठं झालं आहे. . ! रेशनचं अन्न आणून जगणाऱ्या घरच्या पोरांचे वाढदिवस रात्री बारा वाजता भर रस्त्यावर दोन-दोन केक आणून कसे होतात? सर्वच स्तरांमध्ये माणसांच्या जगण्याच्या व्याख्या बदलतायत आणि त्या अमिबासारख्या आकार उकार बदलत चालल्या आहेत, हे स्पष्ट दिसतं. याचा विचार कुणी एकट्यानं नव्हे तर, संपूर्ण समाजव्यवस्थेनं केला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीरपणे केला पाहिजे.

लोकांच्या खिशात पैसा उदंड झालाय? जास्तीचे पर्याय सहज उपलब्ध झालेत? मोकळीक अन् स्वातंत्र्य वाढलंय? की माणसाला कशाचीच किंमत राहिली नाहीय? जाणिवांचं श्राद्ध घालून कुठल्याशा पोकळ धुंदीत वागण्याची ही रित समाजातल्या सर्वच स्तरांमध्ये जाणवण्याइतपत वाढतेय, हे प्रगतीचं अन् शहाणपणाचं लक्षण मानणाऱ्यांपैकी मी तरी नाही.

खरोखरचं सुजाण पालकत्व आणि आपण सुजाण पालक होण्यासाठी करत असलेला अनाठायी खर्च या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत का? संवेदनाशून्य सजीवांच्या फौजा निर्माण करुन आपण काय मिळवतो आहोत, याचा हिशोब कधीतरी कुणीतरी लावला पाहिजे की नको? 

नादारीचा मुखवटा घालून आतून काजू-बदामावर ताव मारणं हे माणसांच्या खोटारडेपणाचं स्वच्छ लक्षण आहे.

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ,

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रोजच्या व्यवहारातला दासबोध…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “रोजच्या व्यवहारातला दासबोध…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

त्या दिवशी दासबोध वाचत होते……

” अंतरासी लागेल ढका

ऐसी वर्तणूक करू नका

जिथे तेथे विवेका

प्रगट करी…. “

हे वाचताना अचानक जोशी बाईंची आठवण आली.

मी पाचवीत असतानाची गोष्ट. शाळा नुकतीच सुरू झाली होती बाई वर्गात आल्या आणि म्हणाल्या..

” मी काय सांगते ते नीट ऐका. उद्या आपल्या वर्गात मीनल नावाची नवीन मुलगी येणार आहे. तिच्या वडिलांची इथे बदली झाली आहे. तिला आई बद्दल काहीही विचारू नका….

कारण काही दिवसांपूर्वी तिची आई देवाघरी गेली आहे. “

सगळ्या वर्गात एकदम शांतता पसरली… स्तब्धच झालो…

गरीब.. बिचारी… बापरे. तीच्यावर किती मोठं संकट आलं आहे…

एखादीला आई नाही हे केवढे दुःख….. कारण त्या वयात आई हे मुलींच सर्वस्व असतं…

किती… किती विचार आमच्या मनात आले.. बाईंच्या ते लक्षात आले.

त्या म्हणाल्या,

” मीनलला तुमच्यात सामील करून घ्या. ईथे कोणी तिच्या ओळखीचं नाही. तुम्ही तिच्याशी गप्पा मारा. तिला मदत करा… “

सुट्टीत बोलायला तोच विषय होता.

आई नाही तर तिच्या घरी स्वयंपाक कोण करत असेल, घरं कोण आवरत असेल, तिची वेणी कोण घालत असेल हा सुध्दा प्रश्न आम्हाला पडला…

दुसरे दिवशी मीनलची आम्ही वाट पहात होतो. बाईंनी तिला मध्यभागी बसवलं. त्यामुळे आम्ही तिच्या जवळ होतो. दिवसभर आम्ही तिच्या मागेमागे होतो. डब्यातला खाऊ तिला दिला. शाळा दाखवली. जे शिकवून झाले होते ते दोघींनी तर तिच्या वहीत लिहूनही दिले… काय काय केलं….

तिचे वडील तिला न्यायला आले. ती त्यांना खुशीत म्हणाली,

” बाबा मला शाळा, बाई फार आवडल्या. आज मला नव्या मैत्रिणी मिळाल्या. “

नंतर हळूहळू ती सहजपणे रुळली…

आज समजतं त्या दिवशी बाईंनी आम्हाला केवढा मोठा धडा शिकवला होता.

एखाद्याचे दुःख समजून घ्यावं.. त्याला होईल ती मदत करावी, चारचौघात त्याला त्याविषयी विचारून कानकोंडं करू नये…. मुख्य म्हणजे त्याला आपल्यात सामील करून घेऊन देता येईल तो आनंद द्यावा.

आजही जोशीबाई आणि तो वर्ग आठवतो. बाईंनी शिकवलेलं अजून लक्षात आहे.

अंतःकरण न दुखावता विवेकानी वागायचा प्रयत्न सुरू ठेवू…

रामदास स्वामी आहेत शिकवायला…

त्यांनी त्यांच्या ग्रंथातून हेच तर सांगितलेले आहे. म्हणून ग्रंथ वाचताना समजून उमजूनच वाचावा.

आज दासबोध वाचायला घेतला तेव्हा हे सर्व आठवले…

रामदास नवमी जवळ आलेली आहे तर या ओव्या पण वाचा…

” आपणांस चिमोटा घेतला

 तेणे जीव कासावीस झाला

 आपणा वरून दुसऱ्याला

 पारखीत जावे”

*

” विचार न करता जे जे केले 

ते ते वाऊगे व्यर्थ गेले

 म्हणून विचारी प्रवर्तले

 पाहिजे आधी”

*

“उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा

 शब्द निवडून बोलावा

 सावधपणे करीत जावा

 संसार आपला”

*

नरदेहाचे उचित 

काही करावे आत्महित 

यथानुशक्त्या चित्तवित्त

सर्वोत्तमी लावावे”

*

आपल्या दृष्टीने सर्वोत्तम कुठले आहे हे आपले आपण ठरवायचे आहे. तिथे आपले सर्वस्व पणाला लावून स्वतःची ऊन्नती करून घ्यायची आहे.

सरळ सोप्या भाषेत रामदासांनी अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत.

रामदास स्वामींचे शब्दचं इतके बोलके आहेत की वाचता क्षणी त्याचा अर्थ लागतो. मनाला भावतो.. पटतो.. खूप क्लिष्ट नसल्याने आपण तो सहज अमलात आणू शकतो…..

 हळूहळू आपली प्रगती निश्चित होईल ही खात्री आहे.

आता हे पण लक्षात येत आहे की पोथी, ग्रंथ हे नुसते वाचायचे नसतात. त्यातला अर्थ, भावार्थ, गुढार्थ, समजून घ्यायचा असतो. त्यातले गुह्य काय आहे हे ओळखायचे जाणुन घ्यायचे असते.

संतांनी अपार तत्त्वज्ञान अभंग, ओव्या, भारूड, ग्रंथ, पोथ्या यातून सांगितलेले आहे.

त्यातले काही थोडे तरी.. आपल्याला घेता आले पाहिजे. ते नुसते घेऊन थांबून चालणार नाही…

तशी वागणुक करून ते आपल्या प्रत्यक्ष कृतीतून, वाणीतुन दिसले पाहिजे. तरच त्या वाचण्याला अर्थ आहे….. यातूनच आपल्या मनाची शक्ती वाढणार आहे. मनाचे श्लोक वाचताना याचे प्रत्यंतर येतेच…

आपण जसजसे वाचू लागतो तसतसे कळत जाते की वरवर दिसतो तितका हा मार्ग सोपा नाही. त्यासाठी सातत्य, प्रयत्न, निष्ठा, प्रेम, अभ्यास आणि मनापासून बदलायची तयारी हवी तरच हे जमेल.

समर्थांनी दासबोधात हे कसे करायचे ते पण सांगितले आहे.

” आलस्य अवघाची दवडावा 

यत्न उदंडची करावा

 शब्द मत्सर न करावा 

कोणा एकाचा”

साधक होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे….

” अवगुण त्यागी दिवसंदिवस

 करी उत्तम गुणांचा अभ्यास

 स्वरूपी लावी निजध्यास

 या नाव साधक”

समर्थांनी सांगितलेले शब्द लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागूयात. त्यातील आवडलेल्या ओव्या लिहून ठेवू. कधीही काढून तेवढ्याच वाचता येतील… त्यातील सखोल अर्थ मनात झिरपत राहील… त्यातून हळूहळू प्रगती निश्चित होईल. मार्ग दाखवायला आपला दासबोध आहेच..

जय जय रघुवीर समर्थ.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१८ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

बाळसेदार पुणे..

रोज सकाळी सुस्नात होऊन, तुळशीपुढे दिवा लावून, सुबकशी रांगोळी काढून, हातात हळदी कुंकवाची कुयरी सांवरत सुवासिनी, श्री जोगेश्वरी दर्शन घेऊन मगच स्वयंपाकाला पदर बांधायच्या. वारांप्रमाणे वेळ काढून एखादी उत्साही गृहिणी समोरच्या बोळातून बेलबागेकडे प्रस्थान ठेवायची. आमच्या हातात आईच्या पदराचे टोक असायचं. आई भगवान विष्णूच दर्शन घ्यायला सभा मंडपात शिरली की आईच्या पदराचं टोक सोडून आमचा मोर्चा मोराकडे कडे वळायचा. खिडकी वजा जागेत दोन मोर पिसारा फुलवित दिमाखात फिरायचे.

आम्ही मोरपिसांचे मोहक रंग आणि पिसाऱ्यावरची पिसं मोजत असतांना मोर आपला पिसांचा पसारा आवरता घ्यायचा. आणि मग मनांत खट्टू होऊन आम्ही मागे वळायचो, तर काय! आनंदाने आणि सुगंधान वेडच लागायचं. पानोपान फुलांनी डंवरलेल्या झाडांनी, बकुळीचा सडा शिंपलेला असायचा. अगदी ‘अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशिल दोहो कराने, ‘अशी स्थिती व्हायची आमची. इवल्याश्या सुवासिक, मोहक बकुळ फुलांचा गजरा मग लांब सडक वेणीवर रुळायचा. अलगद पावलं टाकली तरी नाजूक फुलं पायाखाली चिरडली जायचीचं. अग बाई! नाजूक फुलांना आपण दुखावलं तर नाही ना?असं बाल मनात यायचं. बिच्चारी फुलं ! रडता रडता हसून म्हणायची, “अगं चुकून तू आमच्यावर पाय दिलास, तरी मी तुझ्या पायांना सुगंधचं देईन हो! देवळाच्या पायरीवर बसलेल्या आईला आम्ही विचारलं, ” आई इथे मोर आहेत म्हणून या देवळाला मोरबाग का नाही गं म्हणत? बेलबाग काय नाव दिलंय.? आई बेल बागेचं गुपित सांगायची, ” हे भगवान श्री विष्णूंचं मंदिर आहे. इथे पूर्वी बेलाचं बन होत. फडणवीसांचं आहे हे मंदिर. इथे शंकराची पिंड असून खंडोबाचे नवरात्र पेशवे काळातही साजरं व्हायचं. तुळशीबागेत पूर्वी खूप तुळशी म्हणून ती तुळशीबाग. हल्लीचं एरंडवणा पार्क आहे ना! तिथे खूप म्हणजे खूपच एरंडाची झाड होती अगदी सूर्यकिरणांनाही जमिनीवर प्रवेश नव्हता. एरंडबन म्हणून त्याचं नाव अपभ्रंश होऊन पडलं एरंडवणा पार्क. रस्त्यानें येताना ही नावांची गंमत सांगून आई आम्हांला हंसवायची. प्रवचन कीर्तन असेल तर ते ऐकायला ति. नानांबरोबर ( माझेवडील )आम्ही पंत सचिव पिछाडीने रामेश्वर चौकातून, बाहुलीच्या हौदा कडून, भाऊ महाराज बोळ ओलांडून, गणपती चौकातून नू. म. वि. हायस्कूल वरून श्री जोगेश्वरी कडे यायचो. ऐकून दमलात ना पण चालतांना आम्ही मुळीचं दमत नव्हतो बरं का!गुरुवारी प्रसादा साठी हमखास, घोडक्यांची सातारी कंदी पेढ्याची पुडी घेतली जायची. तिथल्याच ‘काका कुवा’ मेन्शन ह्या विचित्र नावांनी आम्ही बुचकळ्यात पडायचो. वाटेत गणपती चौकाकडून घरी येताना सितळा देवीचा छोटासा पार लागायचा. कधीकधी बाळाला देवीपुढे ठेवून एखादी बाळंतीण बारावीची पूजा करताना दिसायची. तेला तुपानी मॉलिश केलेल्या न्हांहूनमाखून सतेज झालेल्या बाळंतपणाला माहेरी आलेल्या माझ्या बहिणी, बाळांना, माझ्या भाच्यांना देवीच्या ओटीत घालून बाराविची पूजा करायच्या, तेव्हां त्या अगदी तुकतुकीत, छान दिसायच्या. नवलाईची गोष्ट म्हणजे घरी मऊशार गुबगुबित गादीवर दुपट्यात गुंडाळलेली, पाळण्यात घातल्यावर किंचाळून किंचाळून रडणारी आमची ‘भाचरं ‘सितळा देवीच्या पायाशी, नुसत्या पातळ दुपट्यावर इतकी शांत कशी काय झोपतात? हा प्रश्न आम्हाला पडायचा. अगदी नवलच होतं बाई ते एक ! कदाचित सितळा आईचा आशीर्वादाचा हात, बाळांच्या अंगावरून फिरत असावा. गोवर कांजीण्यांची साथ आली की नंतर उतारा म्हणून दही भाताच्या, सितळा देवी पुढे मुदी वर मुदी पडायचा. तिथली व्यवस्था बघणाऱ्या आजी अगदी गोल गरगरीत होत्या. इतक्या की त्यांना उठता बसता मुश्किल व्हायचं, एकीनी आगाऊपणा करून त्यांना विचारलं होतं “आजी हा सगळा दहीभात तुम्ही खाता का? आयांनी हाताला काढलेला चिमटा आणि वटारलेले डोळे पाहून आम्ही तिथून पळ काढायचो ‘आगाऊ ते बालपण ‘ दुसरं काय! पाराच्या शेजारी वि. वि. बोकील प्रसिद्ध लेखक राह्यचे. त्यांच्याकडे बघतांना आमच्या डोळ्यात कमालीचा आदर आणि कुतूहल असायचं. त्यांच्या मुलीला चंचलाला आम्ही पुन्हां पुन्हां नवलाईने विचारत होतो”, ए तुझे बाबा ग्रेट आहेत गं, एवढं सगळं कधी लिहितात ? दिवसा की रात्री? शाई पेननी, की बोरुनी? ( बांबू पासून टोकदार केलेल लाकडी पेनच म्हणावं लागेल त्याला) एवढं सगळं कसं बाई सुचतं तुझ्या बाबांना? साधा पेपर लिहीतांना मानपाठ एक होते आमची. शेवटी शेवटी तर कोंबडीचे पाय बदकाला आणि बदकाचे पाय कोंबडीला असे अक्षर वाचताना सर चरफडत गोल गोल भोपळा देतात. कारण पेपर लिहितानाअक्षरांचा कशाचा कशाला मेळच नसायचा, त्यामुळे सतत लिहीणारे वि. वि. बोकील आम्हाला जगातले एकमेव महान लेखक वाटायचे. आमची भाचे कंपनी, मोठी होत होती. विश्रामबाग वाड्या जवळच्या सेवा सदनच्या भिंतीवर( हल्लीच चितळे बंधू दुकान, )सध्या इथली मिठाई, करंजी, समोसे, वडा खाऊन गिऱ्हाईक गोलमटोल होतात, पण तेव्हां त्या भिंतीवर किती तरी दिवस डोंगरे बालामृतची गुटगुटीत बाळाची जाहिरात झळकली होती. ती जाहिरात बघून प्रत्येक आईला वाटायच माझं बाळ अगदी अस्स अस्सच बाळसेदार व्हायला हवं ग बाई, ‘ मग काय मोहिमेवर निघाल्या सारखी डोंगरे बालामृतची बघता बघता भरपूर खरेदी व्हायची. सगळी बाळ गोंडस, गोपाळकृष्णचं दिसायची. आणि मग काय!सगळं पुणचं बाळसेदार व्हायचं. बरं का मंडळी म्हणूनच त्यावेळची पिढी अजूनही भक्कम आहे. आणि हो हेच आहे त्या पिढीच्या आरोग्याचे गमक. जोडीला गाईच्या दुधातून पाजलेली जायफळ मायफळ मुरडशिंग हळकुंड इत्यादी नैसर्गिक संपत्तीची अगदी मोजून वेढे दिलेली बाळगुटी असायचीच. मग ते गोजिरवाणं गोंडस पुणं आणखीनच बाळसेदार दिसायचं.

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनसुमने – नृत्यांगना शिल्पाची -> मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

🪷 मनमंजुषेतून 🪷 

☆ मनसुमने – नृत्यांगना शिल्पाची ☆ मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सौ.अंजली दिलीप गोखले 

साल 2025 सुरू झाले आणि माझ्या आयुष्यातील सुवर्णकाल सुरू झाला आहे याची अनुभूती मला यायला लागली. समाजरूपी देवतेने माझ्या कर्तृत्वाचे स्मरण ठेवून मानाचा शिरपेच माझ्या मस्तकात खोवला. आपल्याच सांगली मिरज या भागातील लोकमत सखी मंच या अतिशय प्रतिष्ठित असणाऱ्या सामाजिक संस्थेने लोकमत सखी हा सन्मान देऊन मला पुरस्कृत केलं.

सुश्री शिल्पा मैंदर्गी

माझा स्वयं चा प्रवास – 

स्वयम टॉक्स म्हणजे मोबाईल वरील एक लोकप्रिय ॲप ज्याच्याबद्दल मला फारसे माहीत नव्हते. मिरज मधील प्रतिष्ठित व्यक्ती महेश जी आपटे यांच्यामार्फत माझा स्वयं टॉक या संस्थेशी संपर्क झाला. स्वयं टॉक या संस्थेचे सर्वेसर्वा श्री नवीन काळे सर यांचा मला फोन आला आणि त्यांनी माझा व माझ्या गुरु सौ धनश्री ताई आपटे यांचा 25 वर्षांचा नृत्य प्रवास त्यांना स्वयं टॉक्सच्या मंचावर आणायचा आहे यासाठी तुम्ही तयार आहात का याची विचारणा केली.

अशाप्रकारे आयुष्य समृद्ध करणाऱ्या आणि एक आनंददायी अनुभव देणाऱ्या स्वयं टॉक्स या संस्थेशी मी जोडले गेले.

स्वयं टॉक्स च्या मंचावर माझी व माझ्या नृत्य गुरु सौ. धनश्रीताई आपटे यांची मुलाखत व माझ्या नृत्याचे प्रात्यक्षिक दाखवायचे ठरले आणि याची पूर्वतयारी जवळ जवळ वर्षभर सुरू होती.

आता आपल्याला स्वयं टॉक्स च्या मंचावर आपल्या नृत्याचे सादरीकरण करायचे आहे म्हटल्यावर माझा नृत्याचा सराव सुरू झाला. नृत्यासाठी कोणती रचना निवडावी त्या गीतास कशा प्रकारचे संगीत असावे याबाबत आम्हा दोघींची चर्चा सुरू झाली. 64 कलांचा अधिपती असणारा श्री गणेश याचे स्तवन आपल्या नृत्यातून सादर करावे यावर शिक्कामोर्तब झाले. दररोज दोन ते तीन तास ताई माझ्याकडून नृत्याचा सराव करून घेत होत्या. हा सराव सुरू असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या परंतु त्यावरही मात करून आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवले.

12 जानेवारी हा दिवस सगळीकडे युवा दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी स्वयं टॉक्स च्या मंचावर आमचा कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले. आम्ही 11 जानेवारीलाच मुंबईमध्ये दाखल झालो आमची राहण्याची व्यवस्था स्वयं टीमने केलेलीच होती. मुंबईत गेल्यापासून आमच्याशी वेळोवेळी फोनवरून संपर्क करून स्वयं टीमने आम्हाला खूप सहकार्य केले. हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा मुंबई येथे होता. या कार्यक्रमासाठी आमच्या व्यतिरिक्त अजूनही सहा वक्त्यांच्या मुलाखती होत्या. आमची सर्वांशी एकमेकांशी ओळख व्हावी आणि मुख्य कार्यक्रमाची रंगीत तालीम व्हावी या दृष्टीने कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्हा सर्वांना एकत्र बोलवले होते. मी प्रत्यक्ष पाहू शकत नसल्यामुळे मला जिथे नृत्य करायचे होते त्या रंगमंचाचा अंदाज येण्यासाठी प्रत्यक्ष रंगमंचावर नेऊन तेथील लांबी रुंदीची कल्पना मला देण्यात आली. तिथे आलेल्या सर्वच वक्त्यानी एकमेकांशी ओळख करून घेतली एकमेकांची मनापासून चौकशी केली आणि असे करता करता जणू त्या रंगमंचाशी आमचे एक मैत्रीचा नातं जुळून आले.

१२ जानेवारी हा मुख्य कार्यक्रमाचा दिवस उजाडला आम्ही सकाळी साडेआठ वाजताच बालगंधर्व रंगमंदिर वांद्रे येथे उपस्थित झालो.

स्वयंंच्या सर्व टीमने आमचे सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले आमची मुलाखत घेणारे सुप्रसिद्ध सुसंवादक डॉक्टर उदय जी निरगुडकर आमच्या आधीच तिथे उपस्थित होते. रंगमंचाचा पडदा उघडण्यापूर्वी उदयजींनी आम्हा सर्वांची अगदी प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी केली आणि ओळख करून घेतली. आणि रंगमंचावरती एक खेळीमेळीचे वातावरण तयार झाले आमची मुलाखतीची भीती त्याचवेळी निघून गेली.

बरोबर दहा वाजता पहिले वक्ते श्री. हेरंब कुलकर्णी यांच्या मुलाखतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यांच्यानंतर श्री. गणेश कुलकर्णी, धनश्री करमरकर, कियारा, सौरभ तापकीर, आनंदसागर शिराळकर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती झाल्या. या सर्वांचेच अनुभव त्यांना असणारे ज्ञान ऐकून सर्वच प्रेक्षक अगदी भारावून गेले.

संध्याकाळी बरोबर पाच वाजता माझी आणि धनश्रीताईंची मुलाखत सुरू झाली. दृष्टीहीन नृत्यांगना शिल्पा मैंदर्गी आणि तिला स्पर्शाच्या सहाय्याने भरतनाट्यम नृत्य शिकवणाऱ्या तिच्या गुरु सौ. धनश्रीताई आपटे या दोघींची मुलाखत ऐकण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर झाले होते. एखादी दृष्टीहीन मुलगी भरतनाट्यम विशारद कशी होऊ शकते याबाबत सर्वांच्याच मनामध्ये प्रचंड कुतूहल होते आणि हा गुरु शिष्याचा 25 वर्षांचा प्रवास जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

डॉक्टर उदय निरगुडकर आम्हा दोघींना कोणते प्रश्न विचारणार आहेत याची आम्हाला तसूभर ही कल्पना नव्हती. उदय जी यांनी आमची मुलाखत इतक्या कौशल्यपूर्ण रीतीने घेतली की त्यामधून आमचे गुरु शिष्याचे नाते अगदी अलगदपणे उलगडत गेले. आणि आणि गेले 25 वर्षाची आमची तपश्चर्या फळाला आली.

मुलाखतीच्या शेवटी माझ्या नृत्याचे सादरीकरण होते. श्री गणेशाचे स्मरण करून मी ही रचना सादर करायला सुरुवात केली. प्रेक्षक अगदी तन्मयतेने माझी ही रचना पहात होते. त्यांना एक दृष्टीहीन मुलगी भरतनाट्यम सादर करते आहे ही गोष्टच अद्भुत वाटत होती. आणि it’s a miracle, कमाल कमाल कमाल, अद्भुत, it’s impossible, unbeliveable अशा प्रकारच्या उद्गारांनी रसिक प्रेक्षकांनी माझ्या नृत्याला दाद दिली. माझे नृत्य संपल्यानंतर प्रेक्षक जवळजवळ पाच मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवत होते रंगमंदिर टाळ्यांच्या कडकडाटाने भारून गेले होते. मला टाळ्या ऐकू येत होत्या प्रेक्षक उभे राहून माझ्या नृत्याला ताईंच्या अथक परिश्रमाला दात देत होते हे माझ्या बहिणीने सांगितल्यावर मला समजले त्यावेळी मला माझ्या आई बाबांची खूप आठवण आली. त्यांच्याही जीवनाचे सार्थक झाले अशी भावना मनात निर्माण झाली. माझे आई बाबा, माझ्या दोन बहिणी, एक भाऊ यांनी मी दृष्टिहीन असूनही लहानपणापासूनच माझ्या प्रत्येक गोष्टीत मला प्रोत्साहन दिले त्यांचेही सहकार्य मला आज मनापासून आठवते. तसेच माझ्या आयुष्यात आजपर्यंत आलेल्या माझ्या अनेक मैत्रिणी यामध्ये विशेष उल्लेख करावा वाटतो त्या म्हणजे गोखले काकू, अनिता खाडिलकर, कानिटकर मॅडम यांचाही मला सतत आधार वाटत आला आहे. या नृत्यकलेमुळेच माझा हा सन्मान आहे.

अशाप्रकारे माझी आणि ताईंची मुलाखत show stopper ठरली. प्रत्येक जण आम्हा दोघींना भेटण्यास उत्सुक झाला होता. प्रत्येकाने आमच्या जवळ येऊन हातात हातात हात घेऊन आमचे अभिनंदन करून शुभेच्छा देऊन आमच्या दोघींच्या प्रयत्नांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भारतीय संस्कृती आणि भरतनाट्यम नृत्य कलेची जोपासना करणाऱ्या आमच्यासारख्या गुरु शिष्यांच्या मुलाखतीच्या गोड आठवणी मनामध्ये साठवून ठेवून प्रेक्षक रंग मंदिरातून बाहेर पडले.

आपली ही भारतीय संस्कृती भरतनाट्यम कला अशीच उत्तुंग नेण्याची माझी इच्छा आहे हे बळ माझ्या मध्ये देण्याची मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते आहे.

पुन्हा एक वार स्वयं टॉक्स च्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद ! 

मनोगत : सुश्री शिल्पा मुकुंद मैंदर्गी

मिरज

दूरभाष ०२३३ २२२५२७५

शब्दांकन : सौ. अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

(🙏🙏 शिल्पाने दिलेले हे मनोगत खूप बोलके आहे.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “’पाठ’ पुराण…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “’पाठ’ पुराण…” ☆ श्री जगदीश काबरे

शरीराच्या ‘पाठी’चा कणा ताठ असतो जेव्हा, मनाचा व्यवहार सुरळीत चालतो तेव्हा. खरे तर आपण म्हणजे ‘पाठ’च असतो. ‘पाठी’च्या कण्यावरच तर आपली शारीरिक, नैतिक आणि मानसिक भिस्त असते. त्या कण्याच्या जोरावरच आपले शरीर उभे रहाते. आणि त्याच्या ताठपणावरच आपले भावविश्व कधी झुकते, कधी खचते तर कधी उंच उभारी घेते.

शाबासकीची थाप ‘पाठी’वरच पडते. धपाटा वा रट्टाही ‘पाठी’वरच मिळतो. तसंच सहानुभूतीचा हात ‘पाठी’वरूनच फिरतो. आपल्याला उभारी देणारा अश्वासक हातही ‘पाठी’वरच ठेवला जातो. कघी संधीकडे, कधी आयुष्याकडे, तर कधी मोहाकडे माणसे ‘पाठ’ फिरवतात. कधीकधी वाऱ्याला ‘पाठ’ देत देत संकटाना तोंड देतात. ‘पाठी’ला ‘पाठ’ लावून आलेली भावंडे एकमेकांच्या ‘पाठी’त खंजीर खुपसतात. तर कधी मित्र म्हणवणारी माणसे ‘पाठी’शी खंबीरपणे उभी रहातात.

एखाद्या ध्येयाचा, प्रश्नाचा जन्मभर ‘पाठ’पुरावा करत माणसे चळवळी उभारतात आणि पोटात माया असलेली माणसे आसऱ्याला आलेल्यांची ‘पाठ’राखण करताना मिळणारी दूषणे ‘पाठी’वरच झेलतात. राजकारणी माणसे कधी एखाद्याला शिताफीने ‘पाठी’शी घालतात, तर कधी एखाद्याच्या ‘पाठी’मागे लपतात.

घोड्याच्या ‘पाठी’वर स्वार होतात तर गाढवाच्या ‘पाठी’वर ओझे लादले जाते. परिस्थितीवशात सुसरीबाईच्या खरखरीत ‘पाठी’लाही मऊ म्हटले जाते. आणि खारीच्या ‘पाठी’वर रामाची बोटेही दिसतात.

‘पाठी’चा कणा हा सर्वार्थाने आपल्या जगण्याचा आधार असतो. म्हणूनच शरीराचा अन मनाचा व्यवहार सुरळीत चालू रहातो. कसे?

©  श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नदी आणि मी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

☆ नदी आणि मी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

अनादी अनंत तुझे ते अव्याहत वाहत जाणे ! तुझे कार्यच तसे, वाहणे ! काळाच्या कसोटीवर तुला, अनेकदा पाहिलं.. तुझं काम चोखच ! किती जणांची पापे तू धुतलीस ते तुलाच माहीत ! तुझ्या किनारी कितीतरी पिढ्यानपिढ्या गाणी गायली ! त्यांची सर्व दुःख वेदना पोटात घेऊन, तू परत स्वच्छच राहिलीस ! 

तुझ्या पोटातील घाण वेळोवेळी कचऱ्यासारखी बाहेर पण टाकलीस ! तो कचरा पण प्रवाहापासून अलग होऊन, दोन्ही किनार्ऱ्यांना बाजूला झाला ! 

तोच कचरा परत काही कालानी परत वेदना घेऊन तुझ्याच जवळ आला ! पापक्षालनासाठी ! असं अव्याहत वर्तुळ तू पूर्ण करण्यासाठीच तुझा जन्म झाला का ? 

नियतीने तुला त्यासाठीच जन्माला घातले का ? तुझ्याजवळ आला तरी तो पापी पुण्यच पदरी घेऊन गेला ! तू मात्र आहे तशीच राहिलीस ! तुझ्यात यत्किंचितही बदल झाला नाही ! हेच तुझे वैशिष्ट्य जगाला दिलेस ! तुझ्याशिवाय जन्मच हा अपुरा वाटतो, व ते तेवढंच सत्य आहे ! काळाच्या पडद्याआड कितीतरी गोष्टी लपल्या ! पण ते उघड गुपित … ते गुपितच ठेवून तुझा हा अखंड प्रवास चालूच आहे !

आजन्म तृषार्ताला तू नाही म्हटलं नाहीस ! प्रत्येकाची तृष्णा तू भागवून दमली नाहीस ! तुझे हे रूप चिरतरुणच राहिले ते तुझ्या स्वभावामुळे !

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – २९  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

पत्रिका

ताई आणि संध्या दोघीही कला शाखेत पदवीधर झाल्या. दोघींनी वेगवेगळ्या विषयात पदव्युत्तर शिक्षणही घेतले. संध्याला मुंबई विद्यापीठाची फेलोशिपही मिळाली. माझ्या आठवणीनुसार ताईने एम. ए. ला सोशिऑलॉजी हा विषय घेतला होता आणि त्यानंतर तिला सचिवालयात चांगली हुद्देवाली नोकरी मिळाली. त्याचवेळी उपवर कन्या ही सुद्धा जोड पदवी दोघींना प्राप्त झाली होती. परिणामी आमच्या जातीतल्याच काही इच्छुक आणि एलिजिबल बॅचलर्सच्या कुटुंबीयांकडून दोघींसाठी सतत विचारणा होऊ लागली. काय असेल ते असो पण ताई मात्र याबाबतीत फारशी उत्सुक वाटत नव्हती. काही विचारलं तर उडवाउडवीची उत्तर द्यायची शिवाय आमचं कुटुंब हे व्यक्ती स्वातंत्र्य जपणारं असल्यामुळे आमचे आई पप्पा याबाबतीत तसे शांतच होते. मात्र संध्याचे वडील ज्यांना आम्ही बंधू म्हणायचो ते मात्र “संध्याचे लग्न” याबाबतीत फारच टोकाचे बेचैन आणि अस्वस्थ होते. “ यावर्षी संध्याचं लग्न जमलंच पाहिजे. ” या विचारांनी त्यांना पुरेपूर घेरलं होतं. संध्याचं लग्न जमण्याबाबत काहीच नकारात्मक नव्हतं. सुंदर, सुसंस्कारित, सुविचारी, सुशिक्षित आणखी अनेक “सु” तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती दिमाखदारपणे जुळले होते. प्रश्न होता तो तिच्याकडून होणाऱ्या योग्य निवडीचाच. अशातच कोल्हापूरच्या नामवंत “मुळे” परिवारातर्फे संध्या आणि अरुणा या दोघींसाठी लग्नाचा प्रस्ताव आला. घरंदाज कुटुंबातील, अमेरिकेहून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला, भरगच्च अकॅडॅमिक्स असलेला, कलकत्ता स्थित, “युनियन कार्बाइड” मध्ये उच्च पदावर मोठ्या पगाराची नोकरी असणाऱ्या “अविनाश मुळे” या योग्य वराची लग्नासाठी विचारणा करणारा प्रस्ताव आल्यामुळे सारेच अतिशय आनंदित झाले.

रितसर कांदेपोहे कार्यक्रम भाईंकडेच (आजोबांकडे) संपन्न झाला. मुलगा, मुलाकडची माणसं मनमोकळी आणि तोलामोलाची होती. विवाह जमवताना “तोलामोलाचं असणं” हे खरोखरच फार महत्त्वाचं असावं आणि अर्थात ते तसं त्यावेळी होतं हे विशेष.

आतल्या खोलीत बंधूंनी पप्पांना सांगितलं की, ” मुलाच्या उंचीचा विचार केला तर या मुलासाठी संध्याच योग्य ठरते नाही का जना?” 

पप्पा काय समजायचं ते समजलेच होते. शिवाय त्यांना मूळातच अशा रेसमध्ये भाग घ्यायचा नव्हता. ते दिलखुलासपणे बंधूंना म्हणाले, ” अगदी बरोबर आहे, आपण संध्यासाठीच या मुलाचा विचार करूया आणि तसेही अरुला एवढ्यात लग्न करायचेही नाहीय. ”

बघण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर, आनंदात, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. न बोलताच होकारात्मक संकेत मिळालेही होते. तरीही पत्रिका जमवण्याचा विषय निघाला. वराच्या माननीय आईने दोघींच्याही पत्रिका मागितल्या आणि या “पत्रिकेमधील कोणती जुळेल त्यावर आपण पुढची बोलणी करूया. ” असं त्या म्हणाल्या.

बंधूंचा चेहरा जरा उतरलाच असावा. पपांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. न बोलताच स्पर्शातूनच सांगितले, “काळजी करू नका. होईल सगळं तुमच्या मनासारखं. ”

मी त्यावेळी प्रतिक्रिया देणे हा कदाचित उद्धटपणा ठरलाच असेल पण तरीही मी म्हणालेच, ” इतकी वर्षं अमेरिकेत राहणारा मुलगाही पत्रिकेत कसा काय बांधला जाऊ शकतो किंवा आईच्या विरोधात जाण्याचं टाळत असेल का ? निर्णय क्षमतेत जरा कमीच वाटतोय मला. ” परंतु “अविनाश मुळे” हा मुलगा सर्वांनाच खूप आवडला. माझ्या त्यावेळच्या शंकेचंही निरसन कालांतराने झालंच. बाबासाहेब.. ज्यांना आम्ही संध्याच्या लग्नानंतर हे संबोधन दिले.. ते अतिशय उच्च प्रकारचं व्यक्तीमत्त्व होतं. त्यांचं आदरणीय स्थान माझ्या मनात कायमस्वरुपी आहे.

संध्याच्या चेहऱ्यावरचे त्यावेळचे अस्फुट, संदिग्ध भावही तिची पसंतीच सांगत होते. त्या काही दिवसांपुरता तरी “या सम हाच” हेच वातावरण आमच्या समस्त परिवारात होते. त्याच दरम्यान ताईने संध्याजवळ हळूच म्हटलेलं मी ऐकलंही, “तुझीच पत्रिका जुळूदे बाई! म्हणजे प्रश्नच मिटला. ”

पत्रिका संध्याचीच जुळली आणि घरात सगळा आनंदी आनंद झाला. लग्न कसं करायचं, कुठे करायचं, कपडे दागिने, खरेदी, जेवणाचा मेनु, पाहुण्यांचे स्वागत.. उत्साहाला उधाण आले होते. दरम्यान अविनाश दोन-तीन वेळा येऊन संध्याला वैयक्तिकपणे भेटलेही. एकंदर सूर आणि गुण दोन्ही छान जुळले. ताई मात्र प्रचंड आनंदात होती. नकारातही दडलेला हा तिचा खुला आनंद मला मात्र जरा विचार करायला लावणारा वाटला पण सध्या तो विषय नको. “संध्याचं लग्न” हाच आघाडीचा प्रमुख विषय नाही का? 

अवर्णनीय असा संध्याच्या लग्नाचा सोहळा होता तो! सनईच्या मंगल सुरांसोबत संध्या मनोभावे गौरीहर पूजत होती. बाहेर दोन्ही वर्‍हाडी मंडळीत गप्पागोष्टी, खानपान मजेत चालू होतं भेटीगाठी घडत होत्या, जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता, नव्याने काही नात्यांचं पुनर्मिलन होत होतं. करवल्या मिरवत होत्या. पैठण्या शालू नेसलेल्या, पारंपरिक दागिने घालून महिला ठुमकत होत्या. नवी वस्त्रं, नवी नाती, नवे हितसंबंध, नव्या भावना. याचवेळी पप्पा हळूच गौरीहर पुजणाऱ्या सौभाग्यकांक्षिणी संध्याजवळ प्रेमाने गेले. संध्या आमची सहावी बहीणच. “मावस” हे नुसतं नावाला. लेक चालली सासुरा या भावनेने पप्पांना दाटून आलं होतं. डोळे पाणावले होते. संध्याने पप्पांकडे साश्रू नयनाने पाहिले. तिच्या नजरेत, ” काय पप्पा?” हा प्रश्न होता.

“ बाबी! या डबीत एक ताईत आहे लग्नानंतर तू तो सतत जवळ ठेव, नाहीतर गळ्यात घाल. तुझ्या सौभाग्याचं हा ताईत सदैव रक्षण करेल. ”

त्या क्षणी संध्याच्या मनातला गोंधळ पप्पांना जाणवत होता. “ पप्पा तुम्ही हे सांगताय? हा प्रश्न तिच्या ओठावर आलाही असणार. पप्पा एव्हढंच म्हणाले, ” बाबी! नंतर बोलु. तुझ्या वैवाहिक जीवनासाठी या बापाचे खूप आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. ”

संध्याचा पपांवर निस्सीम विश्वास होता.

तर्काच्या पलिकडच्या असतात काही गोष्टी खरं म्हणजे! पप्पांचा ज्योतिष शास्त्रावरचा सखोल अभ्यास होता. ते स्वतःही जन्मपत्रिका मांडत. आमच्या, आमच्या मुलांच्या ही पत्रिका त्यांनीच अचूक मांडल्यात पण तरीही भविष्य सांगण्यावर आणि मानण्यावर त्यांचा कधीच भर नव्हता. एकाच वेळी ते “ज्योतिष” या शास्त्राला मानत असले तरी ते त्यावर विसंबून राहण्याबाबत फार विरोधात होते. पत्रिका जुळवून लग्न जमवणे, कुंडलीतले ग्रहयोग, त्यावरून ठोकताळ्याचं चांगलं -वाईट भविष्य अथवा चांगल्यासाठीची व्रत वैकल्यं, वाईट टळावं म्हणून शांती वगैरे संकल्पनांवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. Rule your stars.. असेच ते कुणालाही सांगायचे. मग अशा व्यक्तीकडून संध्याबाबतच्या या छोट्याशा घटनेचं कसं समर्थन करायचं? काय अर्थ लावायचा? 

त्याचं असं झालं.. डोंबिवलीच्या एका ज्योतिषांकडे( मला आता त्यांचं नाव आठवत नाही) “अविनाश मुळे” यांच्या पत्रिकेशी जुळतात का हे तपासण्यासाठी संध्या आणि अरुणाच्या पत्रिका आल्या होत्या. त्यांनी काही निर्णय देण्याआधीच बंधू त्यांना भेटले होते. गंमत अशी की हे डोंबिवलीचे सद् गृहस्थ आणि पप्पा बऱ्याच वेळा एकाच लोकल ट्रेनने व्ही. टी. पर्यंतचा आणि व्ही. टी. पासून चा (आताचे शिवाजी छत्रपती टर्मीनस) प्रवास करत. दोघांची चांगलीच मैत्री होती. त्या दिवशी पप्पांना गाडीत चढताना पाहून या सद्गृहस्थांनी पप्पांना जोरात हाक मारली, “ढगेसाहेब! या इकडे, इथे बसा. ” त्यांनी शेजारच्या सहप्रवाशाला चक्क उठवले आणि तिथे पप्पांना बसायला सांगितले.

“हं! बोला महाशय काय हुकूम?” पपांनी पुढचा संवाद सुरू केला.

“ अहो! हुकूम कसला? एक गुपित सांगायचंय. बरे झाले तुम्ही भेटलात. ”

मग त्यांनी विषयालाच हात घातला. “अविनाश मुळे” यांच्या पत्रिकेशी कुठलीच पत्रिका नाही जुळत हो! अरुणाची सहा गुण आणि संध्याची केवळ पाच गुण. पण श्रीयुत निर्गुडेंमुळे(बंधु) थोडा नाईलाज झाला. गृहस्थ फारच नाराज झाले होते. ”काहीतरी कराच” म्हणाले.

“ काय पंडितजी तुम्ही सुद्धा ? तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. बरं मग पुढे काय आता. ?”

“निर्गुड्यांना मी काहीच सांगितलेले नाही. हे बघा. पत्रिकेत मृत्यूयोग आहे. लग्न झाल्यावर आठ वर्षानंतर काहीतरी भयानक घडणार आहे पण ही पनवती, हे गंडांतर जर टळले तर मात्र उभयतांचा पुढच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत आनंददायी आहे हे निश्चित. ”

“ म्हणजे सत्यवान सावित्रीची कलियुगातील कथा असेच म्हणूया का आपण?”

पप्पांना गंभीर प्रसंगी विनोद कसे सुचत?

“ ढगे साहेब हसण्यावारी नेऊ नका. माझं ऐका. मी एक ताईत तुम्हाला देतो. तेवढा कन्या जेव्हा गौरीहर पुजायला बसेल ना तेव्हा तिच्या हाती सुपूर्द करा किंवा तिच्या गळ्यात तुम्ही स्वत: घाला. उद्या आपण याच संध्याकाळच्या सहा पाचच्या लोकलमध्ये नक्की भेटू. ?”

पप्पांनी फक्त त्या सद् गृहस्थांच म्हणणं ऐकलं आणि एका महत्त्वाच्या माध्यमाची भूमिका पार पाडली होती. त्यात त्यांची अंधश्रद्धा मुळीच नव्हती. होतं ते संध्यावरचं लेकी सारखं प्रेम आणि केवळ तिच्या सुखाचाच विचार. त्यात ते गुंतलेले नसले तरी कुठेतरी सतत एका अधांतरी भविष्याचा वेध मात्र ते घेत असावेत. बौद्धिक तर्काच्या रेषेपलिकडे जेव्हा काही घडतं ना तेव्हा त्यावर वाद आणि चर्चा करण्यापेक्षा त्या घटनांकडे तटस्थपणे पहावे नाही तर त्या जशाच्या तशा स्वीकाराव्यात हेच योग्य. फार तर “आयुष्यात आलेला असा एक अतिंद्रिय अनुभव “या सदरात समाविष्ट करावे.

संध्याचे लग्न झाले. बंगालच्या भूमीत एक महाराष्ट्रीयन संसार आनंदाने बहरू लागला. दिवस, महिने, वर्षं उलटत होती. आणि ते पनवतीचं आठवं वर्षं उगवलं. खरं म्हणजे पपांशिवाय कुणाच्याच मनात कसलीच भीती नव्हती. कारण सारेच अनभिज्ञ होते. पण आठव्या वर्षीच आमच्या परिवाराला प्रचंड दडपण देणारे ते घडलेच. बाबासाहेबांना अपघात झाला होता. संध्याचाच भाईंना फोन आला होता. तशी ती धीर गंभीर होती पण एकटी आणि घाबरलेली होती. ताबडतोब कलकत्त्याला जाण्याची तयारी झाली. प्रत्यक्ष भेटीनंतर बराच तणाव हलका णझाला. कारण

श्री. अविनाश मुळे हे केवळ योगायोगाने किंवा दैवी चमत्काराने किंवा पूर्व नियोजित अथवा पूर्व संचितामुळेच एका भयानक प्राणघातक अपघातातून सही सलामत वाचले. जणू काही त्यांचा पुनर्जन्मच झाला. आता तुम्ही काही म्हणा.

“ काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ”

अथवा 

“आयुष्याची दोरी बळकट किंवा देव तारी त्याला कोण मारी.

पण यानंतरची पप्पांची प्रतिक्रिया फक्त मला आठवते. ओंजळभर प्राजक्ताची फुले त्यांनी देव्हाऱ्यातल्या कृष्णाच्या मूर्तीवर भक्तीभावाने वाहिली आणि ते म्हणाले,

 हे जगन्नाथा! कर्ताकरविता तुज नमो।

अजूनही माझ्या मनात एक प्रश्न आहे. डोंबीवलीच्या त्या होरापंडितांनी त्यावेळीचं गुपित बंधुंनाच का सांगितलं नाही आणि पपांनाच का सांगितलं? या मागचं गुपित काय असेल?

जाउदे! काही प्रश्नांची उत्तरं न मिळण्यातच आयुष्याची जडणघडण असते हेच खरं!

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, तो आणि व्हॅलेंटाईन… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ मी, तो आणि व्हॅलेंटाईन… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सुप्त ज्वालामुखी अचानक जागृत होऊन त्यातून लाव्हा उसळावा, तशी अचानक त्याची आठवण आली.

तशी लहानच होते मी. सहावी-सातवीत असावे बहुधा. शाळा मुलामुलींची असली, तरी मुलं-मुलं, मुली-मुली असेच ग्रूप असायचे. मी तर अगदीच लाजाळू होते. ग्रूपबाहेरच्या मुलींशीही बोलायचे नाही मी. मग मुलांची तर बातच सोडा.

फेब्रुवारीचा मध्य असावा. अचानक तो समोर आला. आमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा. नेहमी पहिला नंबर यायचा त्याचा. मी कितीही अभ्यास केला, तरी मी दुसरीच यायचे.

तर तो अचानक समोर आला. कोणाचं लक्ष नाहीसं बघून त्याने माझ्या हातात एक कागद दिला, ” माझ्या वडिलांची बदली झालीय. हे शहर सोडून चाललोय आम्ही. यात माझा नवीन पत्ता आहे. पत्र लिही मला. नक्की. “

त्याचे डोळे अगदी काठोकाठ भरले होते. कोणत्याही क्षणी तो रडायला लागेल, असं वाटत होतं.

कागदावर त्याच्या रेखीव अक्षरात त्याचा पत्ता होता. आणि बाजूला लाल पेनने रेखाटलेला गुलाब.

मी पटकन तो कागद दप्तरात टाकला. पुन्हा समोर बघितलं, तर तो नव्हता. तो गेला होता. नंतर दिसलाच नाही.

पण तो शाळा सोडून चाललाय, म्हटल्यावर मला आनंदच झाला. आता वार्षिक परीक्षेत आणि नंतरही माझाच पहिला नंबर येणार होता.

घरी गेल्यावर दप्तर जागेवर ठेवलं. कपडे बदलून, खाऊन मी खेळायला गेले.

नंतरही त्या कागदाचं माझ्या डोक्यातूनच गेलं.

पुढे ते चिटोरं कुठे गेलं, कोणास ठाऊक! तोही डोक्यातून निघून गेला.

तेव्हा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ वगैरे संकल्पना तर सोडाच, पण तो शब्दही आम्हाला माहीत नव्हता.

पण आता त्याची आठवण झाल्यावर वाटलं, की तो माझा ‘व्हॅलेंटाईन’ असेल का? किंवा नेमकं सांगायचं झालं, तर मी त्याला त्याची व्हॅलेंटाईन वाटत होते का? कल्पना नाही.

त्या दिवशी तो गेला, तो माझ्या आयुष्यातूनच गेला. नंतर तो कधीच भेटला नाही. आता भेटला, तर मी बहुधा त्याला ओळखणारही नाही. पण मी कोणाला तरी आपली व्हॅलेंटाईन वाटले, याची मला गंमत वाटली. गंमत! हो. फक्त गंमतच.

©  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares