मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गुंफण नात्यांची – भाग 1 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

सौ अंजली दिलीप गोखले

? जीवनरंग ❤️

☆ गुंफण नात्यांची – भाग 1 ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

या दिवशी जागतिक महिला दिन जरा जास्तच दणक्यात साजरा झाला. अर्थातच कारण होत तसं. यावर्षी सगळ्या प्रमुख पदावर स्त्रियांचाच राज्य होतं. देशाचे राष्ट्रपती अर्थात राष्ट्रपत्नी महिला, पंतप्रधान महिला उपराष्ट्रपती, सभापत्नी सगळ्या खात्यांचे मंत्रिपदे महिला भूषवीत होत्या. सर्व ऑफिसेस मधून अधिकारी म्हणून महिलाच.. विद्यापीठाच्या कुलगुरू महिला, सर्व प्राध्यापक वर्ग महिला, पोलीस प्रमुख पदी ही महिलाच, जिकडे पाहावे तिकडे महिला राज्य..

सगळीकडे आनंदोत्सव साजरा होत होता. सगळ्या प्रमुख इमारती फुलांच्या माळांनी सुशोभित केल्या होत्या. झगमगत्या दिव्यांची रोषणाई केली होती. रात्री फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम निश्चित झाला होता. साठ-सत्तर वर्षांपूर्वी असणारे चित्र आता पार पालटून गेले होते. त्यावेळची अबला आता खऱ्या अर्थाने सबला बनली होती. यात सहलेने अवघ्या पुरुष वर्गाला नामोहरम केले होते. समाजात मान वर करून ताठ मानेने हिंडण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. पुरुष प्रधान संस्कृती पूर्णतः लोप पावली होती. संपूर्ण समाज बदलून गेला होता. पूर्वीची जातिव्यवस्था संपून गेली होती. फक्त दोनच जातींची दखल घेतली जात होती; ती म्हणजे स्त्री जात आणि दुसरी पुरुष जात. विशेष म्हणजे या दोन्ही पैकी स्त्री वर्गाचे सगळीकडे वर्चस्व होते. अर्थात हे तिला सहजासहजी मिळाले नव्हते. हा बदल, हे परिवर्तन घडवण्यासाठी अनेक पिढ्यांनी निकराची झुंज दिली होती. यामुळेच हा जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणावर साजरा होत होता.

या उलथापालथीमध्ये राज्यांच्या नावावर पण हल्ला झाला होता. महाराष्ट्राचे नामकरण ‘माय-मराठी’ असे झाले होते. मुंबई मुंबईच राहिली होती. ते पुणे बदलून ती ‘पुण्यनगरी’ झाली होती. सोलापूरचे सोलापूर नाव हद्दपार होऊन त्याऐवजी ‘साली सिटी’ अशी नवी ओळख झाली होती. सांगलीचे नाव बदलायची जरूर नव्हती. आई जगदंबेचे कोल्हापूर; ते ही तसेच राहिले होते. काही महिला संघटनांना कोल्हापूर हेच नाव बरोबर वाटत होत तर काहींच्या मते ‘ते कोल्हापूर’ असा उच्चार होत असल्याने ते योग्य वाटत नव्हते. महिलांच्या बहुमताप्रमाणे ‘करवीरनगरी’ असेच नाव त्यांना हवे होते. त्यांच्यामते जेथे करवीर निवासिनी राहते, वसते ती; हो हो: ती करवीर नगरी! हो-ना करता करता अखेर ‘करवीर नगरी’ या नावावर शिक्कामोर्तब झाले. अजूनही कराड, सातारा, नागपूर, चंद्रपूर अशा अनेक गावांचा नावांच्या नावांचा बदल करण्याचा विचार सुरू होता. दूरचित्रवाणीच्या अनेक महिला चॅनल वर यासंदर्भात चर्चा सुरू होती. पुण्यनगरी मध्ये रस्त्यांची नावे सुद्धा बदलली होती. प्रसिद्ध बाजीराव रस्ता आता मस्तानी रस्ता झाला होता. ऐतिहासिक सदाशिव पेठ आता सदाशिव पेठ राहिली नव्हती. ती पार्वती पेठ झाली होती. जिथेजिथे स्त्रीवर्गाचा झेंडा फडकणे शक्य होते तिथे तिथे तो फडकत होता.

सगळा समाज ढवळून निघाला होता. महिलाराज असल्यामुळे खून, दरोडे, चोऱ्या यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली होती. पण साध्या साध्या गोष्टींवरुन भांडणे, रुसवेफुगवे यांना ऊत आला होता. राज्यसभेत साड्याचे, हेअर स्टाईल असे विषयही भांडणांना पुरेसे ठरत होते. सगळ्या आमदाराणींना चारचाकी गाड्या मिळाल्या होत्या. सगळ्यांनी आपापल्या गाडीवर आपल्याच पतिराजांना चालक पदावर नेमले होते. वरवर सगळे सुस्थितीत चालले असले तरी ते काही खरे नव्हते. पुरुष वर्गाची विलक्षण कुचंबणा होत होती. त्यांच्या अस्तित्वाला काही महत्त्वच उरले नव्हते. विज्ञान तंत्रज्ञान आणि मेडिकल सायन्स इतके पराकोटीचे पुढारलेले होते की गर्भधारणा होण्यासाठी सुद्धा पुरुषाची गरज स्त्रीला भासत नव्हती. बायोटेक्नॉलॉजी च्या नवनवीन शोधांमुळे टिशू कल्चर, स्टेम सेल्स यांच्या वापरामुळे मिलना शिवाय जीव तयार करण्याचे तंत्र विकसित झाले होते. बहुतांश स्त्रियांना हाच पर्याय सोपा वाटत होता.

 

© सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर ८४८२९३९०११

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रेम – भाग ३ ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ प्रेम – भाग ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(श्रीधरने नोकरी सोडली .गावी आलो….आता पुढे)

एक दिवस आईनं आपणहून बोलावलं. तेलपीठ लावून न्हाऊ घातलं. पायात सोन्याची जोडवी चढवली. खीर पुरणाचा स्वयंपाक केला. या मायेनं शरीर कातरलं. मन भरलं. थोपवलेले अश्रु वाह्यले.

आण्णा काही बोलले नाहीत पण नमस्कारासाठी वाकले तेव्हां त्यांचा थरथरता हात पाठीवरुन फिरला. .

श्रीधरने अनेक ऊद्योग केले.

शेतीचे प्रयोग झाले. अनेक व्यापारी एजन्सीज घेतल्या.

कारखाना ऊभारण्याची स्वप्नं पाहिली . मित्राबरोबर भागीदारीत कंत्राटदारी केली. पण अपुरा अनुभव आणि अपुरं भांडवल . . यामुळे हाती धुपाटणंच आलं. .

निवडणुका आल्या तेव्हां अनेक ऊठाठेवी करून ऊमेदवारी मिळवली. पण जातीयवादाने ऊचल खाल्ली अन् हाथी  खुळखुळाच आला. .

आणि या सार्‍यात मी कुठेच नव्हते. मला त्याने कधीच विचारले नाही.

वेळोवेळी एव्हढच म्हणायचा,

“एकदा मला यात यश मिळू दे.. तुला सोन्याने मढवेन. मग आण्णा पाहतील.. !!”

मला त्याची दयाही यायची. त्याला सांगावसं वाटायचं”अरे आण्णा तसे नाहीत. तू धरसोडपणा सोड. खरंच  काहीतरी करून दाखव, आण्णा स्वत: तुला जवळ करतील. “एकीकडे आण्णांनाही सांगावसं वाटायचं,”

“श्रीधर महत्वाकांक्षी आहे. पण तुम्ही कोणीतरी त्याच्या पाठीशी ऊभे राह्यलात तर त्याला यश मिळेलही..”

पण मी ना इथली ना तिथली. प्रेमापायी चाललेली ही ओढाताण… त्यात तुटलेली माझी स्वप्नं.. आणि हरवलेली मी….

मी माझ्याच विचारांत हरवले. कितीतरी वेळ.. खोल खोल बुडाले.. नीरजने मागुन येऊन गळ्यात हात टाकले, तेव्हां भानावर आले.

“आई आज्जी आली….”

अगबाई!!

मी पटापट पदरानच तोंड पुसलं. केस गुंडाळले अन् आईला हसतमुखाने सामोरी गेले.

“काय ग आई..? येना. बैस. तू कशाला आलीस इतके जीने चढून..?

मी आईला बसायला पाट दिला. पण आई काॅटवरच बसली.

“बाळ, रागावलीस माझ्यावर? दोन दिवस पाहतेय् तोंड फिरवून आहेस!.”

“नाही ग आई.. तुला ऊगीच असं वाटतंय्.. तुझ्यावर कशाला रागावू? हे बघ मी आता निघालेच होते. आला का हलवाई..?”

“ते राहू दे! हे बघ बैस मजजवळ..”

मला क्षणभर काहीच सुचेना. मनात काहुर माजलं.

काआली आई..?

“हे बघ. काल माझं आण्णांशी खूप भांडण झालं. मी त्यांना म्हटलं, जे झालं ते झालं. शेवटी आपलीच पोर आहे. तिची ही ओढाताण तुम्हाला कशी पाहवते? जन्मभर ही अशी काठीच घेऊन बसणार आहात का तिच्यासाठी?.. बाळ. आण्णांना तु ओळखत नाहीस का? किती माया आहे त्यांची तुझ्यावर…? शिस्तीचे करडे, व्यवहाराला पक्के असले तरी माया मऊ असते.. मी खूप बोल लावले तेव्हां त्यांनी मला सगळी कागद पत्रे दाखवली.”

“अग! सारं काही देणार आहेत तुला! सुरेखाला दिलं नाही त्याहुन तुला देणार आहेत. पण त्यांना ऊतावळेपणा आवडत नाही तू श्रीधरला……”

मग मी आईला थांबवले.

“नको आई. मला काहीच नको. मी कधी मागितलं का..? तो अधिकार मी केव्हांच गमावलाय्. . आणि तुम्हाला वाटतं तसं नाहीय्. . मी सुखी आहे. मला पैसे नको. मालमत्ता नको. तुझी माया आशिर्वाद हेच माझ्यासाठी मोलाचे. . आण्णांनाही हेच सांग. . मी त्यांचीच मुलगी आहे. त्यांचेच संस्कार आहेत मजवर.. माझं मन का इतकं कच्चं आहे..?”

मग मीच आईला समजावले.  नकळत माझ्या दु:खावर वेदनेवर आघात करणारी, काटे टोचणारी आई.. अन् माझ्याचसाठी आण्णांशी भांडणारी माझी आई..

मी नीरजला पटकन् कडेवर घेतलं. त्याचे खूप पापे घेतले.

मी खूप आनंदले. हरवलेलं खूप काहीतरी गवसलं होतं…

“आई तू हो पुढे. मी आलेच. तू आज काहीच करु नकोस. मी सगळ्यांचा डबा घेउन तुझ्याकडेच येते. आण्णांच्या आवडीच्या सुरळीच्या वड्या केल्या आहेत.. छान जमल्यात..”

नीरजला कडेवर ऊचलून काळोख्या जीन्यातून सावकाश पायर्‍या ऊतरणारी, माझी ती वय होत चाललेली आई…

माझ्या डोळ्यातले मोती पटापट ओघळले……

समाप्त

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रेम – भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ प्रेम – भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

 (घरच्यांचा विरोधाला न जुमानता  आम्ही लग्न केले… आता पुढे..) 

आमचा संसार सुरू झाला.

मजा हुरहुर  …चॅलेंजिंग वाटायचं.

श्रीधर कामावर जायचा. घरी मी एकटीच.

मला आमचा दुमजली वाडा आठवायचा.

अंगणातल्या वृंदावनापाशी दिवा लावणारी आई, बैठकीत हिशोब लिहीत बसलेले आण्णा, सुरेखा आठवायचे..

त्यांच्या लहानशा जीवनात आपण केव्हढं वादळ निर्माण केलं….??

श्रीधरला कधी म्हटलं, “घरी लवकर येत जा की…”

तो म्हणायचा, “तु ओळखी वाढव..मंडळात जा कुठल्या तरी..”

त्याच्या शब्दातला कोरडेपणा बोचायचा..

याच्यासाठी का मी सगळ्यांना सोडून आले…??

नीरजचा जन्म वर्षातच झाला..

श्रीधरच्या आणि माझ्या नात्यांत वेळोवेळी पोकळ्याच निर्माण होत गेल्या.

आण्णा अजुनही कणखरच होते..

नीरजच्या जन्मानंतर आई औपचारिकपणे येउन गेली.

माझा एका खोलीतला बेताचा संसार बघून डोळे गाळले…

 

क्रमश:——

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रेम – भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ प्रेम – भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सकाळपासून आईचा हा तिसरा निरोप.

“आज हलवाई येणार आहे ,लाडु बांधायला जरा मदतीला ये..”

सुरेखाचं लग्न आहे .आता काय, पाच सहा दिवसच ऊरले आहेत.सुरेखाचं लग्न ठरल्यापासुन आईची धांदल ऊडाली आहे. लग्नाची खरेदी, मानकरणींच्या याद्या, आमंत्रण पत्रिका, एक ना अनेक. मी समोरच रहात असल्यामुळे माझ्याकडुन हरघडी मदतीची अपेक्षा करणं हे आईच्या दृष्टीने स्वाभाविकच आहे..

आईचा ऊत्साह अगदी ऊतु चालला आहे.येणार्‍या जाणार्‍यांना सुरेखाचं अन् सुरेखाच्या भावी पतीचं कौतुक किती करू न किती नको असं झालय् तिला!?

माणसं अगदी हौशी आणि प्रेमळ आहेत..सुधारलेल्या मतांची आहेत.जावईबापूंचा स्वभावही अगदी मोकळा, खेळकर आहे. नशीब काढलं लेकीनं.

तिच्या या कौतुक करण्यावर माझा आक्षेप मुळीच नाही. सुरेखा तर माझी लाडकी बहीण. तिच्या सुखात मलाही तितकाच आनंद आहे, पण त्या दिवशी, देशमुख काकू आल्या होत्या. आईच्या त्या खास जवळच्या… बोलता बोलता आई त्यांना म्हणाली,

“खरं म्हणजे सुमनच्या लग्नाची माझी सगळी हौस बाकी राहिली. पोरीनं ऐकलच नाही. आता पश्चात्ताप करून काय ऊपयोग? आण्णा तर नुसते विषण्ण झाले होते. त्यांच्या प्रकृतीवरही तेव्हांपासुन किती परिणाम झाला.. पण आता हे लग्न ठरल्यापासून मनावरचं सावट जरा दूर झालंय्…”

आईनं कमीत कमी ,मी तिथेच असताना,मला काय वाटेल याचा विचार करायचा होता… तेव्हढंही भान तिने ठेऊ नये…??

आईकडून संध्याकाळी घरी परतले ती एक वेदना घेऊनच.हजारवेळा मनाला बजावलं,

“आईचं बोलणं ते…इतकं काय मनावर घ्यायचं?

शिवाय आपल्या आईचा स्वभावच आहे तो!

बोल बोल बोलण्याचा.मागाहून तिलाच वाईट वाटेल.. पण नाहीच. त्यादिवशी मनावर घावच बसला होता.

आणि कळत नकळत हे सतत जाणवत होतं की सुरेखाचं लग्न जमल्यापासून आपल्या मनाचा कुणीच विचार करत नाहीय् .आपण स्वत:चं म्हणून जे काही जपत असतो त्यावरच प्रहार होताहेत्….

मी श्रीधरशी लग्न केलं ते आईवडीलांच्या कडक विरोधाला डावलून.. विरोधाला विवीध कारणे होती.

जातीचं कारण दुय्यम असलं तरी रुढीप्रिय मनाला खटकणारं होतच.

श्रीधरची कौटुंबिक पार्श्वभूमी. श्रीधरच्या वडीलांविषयी आण्णांच्या मनात खोलवर रुजलेला अनादर, आकस होता. श्रीधरच्या वडीलांची गावात, एक चमत्कारिक लहरी व्यक्ती म्हणून ख्याती होती. या माणसाने आयुष्यभर नुसत्या बढाया केल्या. वाडवडीलांच्या इस्टेटीवर रूबाब केला.. त्यांच्या ऐदीपणावर आण्णांचा राग होता आणि तशा घरात मी सून म्हणून जावं हे मूळातच त्यांना पसंत नव्हतं… पण श्रीधर आणि मी तारुण्यसुलभ प्रीतीने बांधले गेलो होतो.

माझ्यात आणि श्रीधरच्यात दुरावा निर्माण व्हावा म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले.. धाकदपटशा.. घराबाहेर पडायची बंदी .. वगेरे अनेक.. पण एक दिवस संधी साधून श्रीधरने मला सांगितले,

“आहे त्या स्थितीत, जशी असशील तशी, माझ्याबरोबर येण्याची तयारी असेल तर चल. आपण लग्न करु. मी तुला अंतर देणार नाही……”

श्रीधरच आणि माझं एक भावविश्व होतं संसाराचे मनोरे आम्ही बांधले होते.

आम्ही वेळ, संकेतस्थळ ठरवून कुणाला नसांगता घराबाहेर पडून लग्न केलं… शिस्तीत संस्कारात वाढलेली मी… कसं केलं हे धाडस…

श्रीधरच्या नोकरीच्या गावी एका खोलीत संसार थाटला.. श्रीधरने आई आण्णांना एक जुजबी पत्र टाकलं.

आशिर्वाद मागण्यासाठी. पण माघारी ऊत्तर आले नाही.. आमचा संसार सुरू झाला.

 

क्रमश:——

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभुलैय्या…. भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ रंगभुलैय्या…. भाग – ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र-……”माणसांचे वरवर दिसणारे रंग पक्के असतातच असे नाही.ते विरुनही जाऊ शकतात.तुला अनोळखी असला तरी आपल्या इंडस्ट्रीत हा ‘रंगभुलैया’ थोडा अधिकच फसवा आहे.”

अभिशी बोलून गुंता सुटेल असं तिला वाटलं होतं पण गुंता अधिकच वाढला.)

” मे आय कम इन सर?”

“ये अश्विनी.हॅव अ सीट”

“सर,तुम्ही बोलावलं होतंत?”

“हो.हे तुझं ऑफर लेटर. ही अॅकनॉलेजमेंट कॉपी साईन कर प्लीज”

सही करतानाही अश्विनी अस्वस्थच होती.

“तुला आनंद नाही झाला?”

“नाही तसं नाही सर पण ही असाइनमेंट स्वीकारावी की नाही याचा मी विचार करतेय.”

“का? काही प्रॉब्लेम?”

अश्विनी क्षणभर विचारात पडली. मग कसेबसे शब्द जुळवू लागली.

“सर, मला वाटतं, अगदी मनापासून वाटतं की समीर इस द राईट पर्सन फोर धीस पोस्ट.नॉट आय.”

“या पोस्टला कोण योग्य आहे हे ठरवायचा अधिकार माझा आहे अश्विनी. आणि ऑफर स्वीकारायची की नाही हे ठरवण्याचा तुझा. पण एक गोष्ट मीच सांगायला हवी म्हणून सांगतो.नीट लक्ष देऊन ऐक. या क्षणी तू कुणासाठी तरी सॅक्रिफाइस करण्याच्या विचारात आहेस.जरूर कर.पण ज्याच्यासाठी तू हा सॅक्रिफाइस करणार आहेस त्यासाठी ती व्यक्ती योग्य आहे कां हेही एकदा तपासून बघ. तुझा एक्सेप्टन्स द्यायला तीन दिवसांची मुदत आहे.तेव्हा विचारपूर्वक निर्णय घे”

सौरभ खरा कोणता हेच अश्विनीला समजेना. हा समोरचा की अभी,समीरच्या मनातला? आणि समीर तरी ? मित्र आहे तो आपला. इतकी वर्षे आपण त्याला ओळखतो. आणि तरीही सरांनी त्याच्याबद्दल असा संशय का बरं व्यक्त करावा?

समीर, अभी आणि सौरभ ! वेगवेगळे मुखवटे घातलेला तिघांचा चेहरा आपल्याला सारखाच का भासतोय अश्विनीला समजेचना.आणि तिला संभ्रमातही  रहायचं नव्हतं. विचारांच्या गुंत्यात अडकून पडायला तिच्याकडे वेळ होताच कुठे ? ‘बोलले तर आत्ताच, नाही तर कधीच नाही.’ तिने विचार केला.

“थँक्स सर.माझा निर्णय तुम्हाला योग्य वेळेत मी नक्कीच कळवेन.पण त्यापूर्वी केवळ उत्सुकता म्हणून स्वतःच्या समाधानासाठी एक गोष्ट मला तुमच्याकडून जाणून घ्यायचीय”

“कोणती गोष्ट?”

” या पोस्टसाठी समीर माझ्याइतकाच कॉंम्पिटंट असताना तुम्ही मलाच कां प्रेफर केलंत?”अश्विनीच्या नजरेला आणि शब्दांनाही विलक्षण धार होती.सौरभने चमकून तिच्याकडे पाहिलं.

“तुला काय वाटतं? मी तुला कां प्रेफर केलं असेल?”  त्याने गंभीरपणे विचारलं.

“तेच तर मी तुम्हाला विचारतेय सर”

आता उत्तर देण्यावाचून गत्यंतर नाही हे सौरभला जाणवलं. त्याने आपली नजरेची, शब्दांची सगळीच शस्त्रे म्यान केली. तो स्वतःशीच हसला.

“आय एम अॅन्सरेबल टू माय बॉस आय नो .आय ॲम अॅन्सरेबल टू माय सबॉर्डिनेटस् आॅल्सो आय डिडन्ट नो. तुला कदाचित माहीत नसेल, पण हाच प्रश्न काल मला समीरनेही विचारला होता.”

“समीरने..?” तिने अविश्वासाने विचारलं.

“हो. आई आजारी असूनही समीर काल इतक्या तातडीने इकडे कां आला होता असं तुला वाटतं?”

“कां म्हणजे? नेक्स्ट वीक तुम्ही स्टेटस् ला जाणार आहात म्हणून भेटायला आला होता तो तुम्हाला “

“इज इट?” सौरभ तिची किंव केल्यासारखा हसला. “तो आला होता तुझं प्रमोशन थोपवायची मला गळ घालायला. “

“सर..?” अश्विनी अविश्वासाने पहातच राहिली.

“हे प्रमोशन त्यालाच मिळणार हे त्याने गृहीतच धरलं होतं. त्याचा मित्र म्हणून त्याने मलाही गृहीत धरलं असावं. तुझ्या प्रमोशनची न्यूज त्याला समजली आणि तो बिथरला. खूप गळ घातली त्याने मला. बट अॅज अ चेअरपर्सन आय स्टीक्ड् अप टू माय डिसिजन “

संतापातिरेकाने अश्विनीचे डोळे भरून आले.

“रहाता राहिला प्रश्न मी तुला प्रेफर कां केलं हा.आज तू हा प्रश्न शांतपणे विचारलास. काल समीरने हाच प्रश्न मला चिडून-संतापून विचारला होता. तुला इम्प्रेस करायला मी त्याला डावललं असा त्याने माझ्यावर आरोप केलान. ‘ओपन सेशनमध्ये हाच आरोप तू माझ्यावर कर, मी तिथं सर्वांसमक्षच या आरोपाला उत्तर देईन ‘ असं बजावून मी त्याला इथून हाकलून दिलं. माझा स्वतःवरचा ताबाच गेला होता. पण आज तसं होणार नाही. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे अश्विनी. समीर माझा मित्र आहे.तो मला आवडायचा. मित्र म्हणून आणि हुशार न्  सिन्सिअर म्हणूनही. तो खरंच बेस्ट परफॉर्मर होता. पण तुझा परफॉर्मन्सही कमी प्रतीचा नव्हता. तूही हुशार होतीस. तू सुद्धा त्याच्या इतकीच सिन्सिअर होतीस. प्रमोशनचा विचार करायचा तर तुम्ही दोघेही समान पातळीवर होतात. बैठकीतला मित्र म्हणून कोणीही समीरलाच वेटेज दिलं असतं,बट आय डिडण्ट डू दॅट.मी ते वेटेज तुला दिलं. समीरचा आरोप आहे की एक स्त्री म्हणून तुला इंप्रेस करण्यासाठी मी हे केलं.असं कुणाला इम्प्रेस करायला अशा कुबड्यांची मला गरज नाही. पण तरीही एक स्त्री म्हणून मी तुला प्रेफर केलं हे मात्र खरं आहे. कारण एक स्त्री असूनही तू स्पर्धेत कुठेही कमी पडलेली नाहीयस.तू त्याच्याच तोडीचा परफॉर्मन्स रेकॉर्ड केलायस हे मला मोलाचं वाटलं. तुला त्यासाठी माझ्यासारख्या बाॅसवर इंप्रेशन मारायची गरज वाटली नाही. स्त्रीत्त्वाच्या बुरख्याआड लपून तू कधी माझ्याकडून कसली कन्सेशन्स उकळली नाहीस. समीरला फक्त ऑफिसमधे वर्कलोड होतं आणि तुला मात्र ऑफिस आणि घर या दोन्ही आघाड्यांवर.ती सगळी शारीरिक, मानसिक,भावनिक कुतरओढ मॅनेज करून तू त्याच्या तोडीचा परफॉर्मन्स रेकॉर्ड केलास त्याचा एक ग्रेस मार्क मी तुला दिला. बस्स..बाकी कांही नाही.एक रिस्पॉन्सिबल टीम लीडर म्हणून मी हेच करायला हवं होतं ना अश्विनी ?” अश्विनी थक्क होऊन ऐकत राहिली. ‘सौरभ सरांचा हा असा ऍप्रोच खूप रेअर आहे आणि माझ्यासाठी एंकरेजींग सुद्धा.’ तिला मनापासून वाटलं.तिला सौरभसर या क्षणी खूप मोठे वाटले.

“हे सगळं माझं शहाणपण नाहीये अश्विनी.मी माझ्या आईकडे पाहून हे शिकलो.शी वाॅज विडो अॅंड वर्किंग वुमन टू. जिद्दीनं करियर करणाऱ्या मुलींना पाहिलं की मला तेव्हाची ती आणि तिची घुसमट आठवते. म्हणून असेल माझे निर्णय कधीच चुकत नाहीत.” तो स्वतःतच हरवला….!

“थँक्स सर. अॅंड साॅरी फाॅर एवरीथिंग”

“आणखी एक. बोललो, ते स्वतःजवळच ठेव.त्याची चर्चा नको. आणखी एक. समीरला झटकून टाकू नकोस प्लीज.जस्ट फरगीव अॅंड एंकरेज हिम. या मनस्थितीत त्याला तुझ्या सॅक्रिफाईसची नाही तर सपोर्टची गरज आहे “

ती विचारात पडली. पण विचार करायला तिला वेळच मिळाला नाही. कारण केबिनबाहेर समीर तिचीच वाट पहात उभा होता. त्याला पाहिलं आणि एक विलक्षण कोरडेपण अश्विनीच्या मनात भरून राहिलं.पण तिनं जाणीवपूर्वक स्वतःला सावरलं.

“हाय समीर” ती हसली.

” हाय ” समीरच्या जीव भांड्यात पडला.

” चल, चहा घेऊया.” ती आग्रहाने म्हणाली. त्याला तेच हवं होतं.

“आज आलं अरे प्रमोशन लेटर. सौरभसरांनी त्यासाठीच तर बोलावलं होतं.” ती उसन्या उत्साहाने सांगू लागली.

“तू काल बोललीस अभिशी?”

” हो”

“काय म्हणाला तो?”

” हा तुझा प्रश्न आहे.तो तू सोडव असं म्हणाला.तू माझ्यासारखी आणि समीरसारखी अॅंबिशिअस असशील तर प्रमोशन घे आणि नसशील तर सोडून दे असं म्हणाला “

” मग? तू काय ठरवलंयस”

“मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं ठरवलंय”

“थँक्स अश्विनी.”

“हो, पण ते माझ्या पद्धतीने “

” म्हणजे?”

“सांगते.पण त्या आधी नीट विचार करुन तू मला अगदी खरं सांग.तुझ्या समोरचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?”

“काल मी सगळं सविस्तर सांगितलंय ना तुला?”

” तेवढंच की आणखीही काही?” तो गप्प. मग थोडी वाट पाहून तीच बोलू लागली,

“आईच्या ट्रीटमेंटचा अवाढव्य खर्च..एवढंच ना?”

“हो”

“देन डोन्ट वरी. समीर, तुझी आई मलाही कुणी परकी नाहीये. आय ऑल्सो ओ समथिंग टू हर फाॅर लव्हिंग ट्रीटमेंट शी गेव्ह मी इन अवर कॉलेज डेज.सोs मी माझा शब्द नक्की पाळेन.त्यांच्या संपूर्ण ट्रीटमेंटचा सगळा खर्च मी करेन. आय प्रॉमिस”

“भिक घालणारायस मला?  भिकारी आहे कां मी ? ” समीर संतापाने बेभान होत ओरडला. अश्विनी शांतपणे त्याला न्याहाळत राहिली.

“समीर,प्लीज. शांत हो. तू तुझा म्हणून जो प्रॉब्लेम सांगितलायस तो सोडवायचा हाच एक योग्य मार्ग आहे असं मला वाटतं. खरा प्रॉब्लेम आणखी काही वेगळा असेल तर मोकळेपणाने बोल माझ्याशी.मी तोही सोडवेन. तू आईच्या आजारानं खचलायस कीं अपेक्षेप्रमाणे तुला प्रमोशन न मिळता ते मला मिळालं म्हणून दुखावलायस? तुझं ते दुःख हलकं करायला माझं प्रमोशन रिफ्यूज करून ते मी तुला मिळवून द्यावं अशी अपेक्षा आहे का तुझी? तसं असेल तर आज तुझ्याऐवजी अभि माझ्याशी असं वागला असता तर मी त्याला जे सांगितलं असतं तेच तुला सांगते. होs,मी तुझ्यासाठी प्रमोशन रिफ्यूज करेन. तुझं दुःख तुला हवं त्या पद्धतीने हलकं करेन.पण एका  अटीवर.अटच म्हणशील तर अगदी साधी आहे. माझ्या फक्त एका प्रश्नाचं मला पटेल असं उत्तर तुला द्यावं लागेल. प्रश्नही अगदी साधा आहे. समीर, तुझी अॅंबिशन आणि माझी अॅंबिशन अशी तफावत कां करावीशी वाटली  तुला? विचार करून अगदी खरं सांग. तुला स्वत्त्वातला ‘स्व’ जपायचाय की स्वार्थातला ‘स्व’ हे तरी समजू दे मला.सौरभसरांनी निर्णयासाठी मला तीन दिवस दिलेत. मी  वाट पाहीन मी विचारलेल्या प्रश्नाच्या तुझ्या खऱ्या उत्तराची!”

समीर दिङमूढ होऊन ऐकत होता. हव्यासाच्या निसरड्या वाटेवर हरवू पहाणारा त्याचा ‘आतला आवाज’ क्षीणपणे कण्हतोय असं जाणवताच तो दचकून भानावर आला. पण… अश्विनी तिथे नव्हतीच. ती केव्हाच निघून गेली होती..!!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभुलैय्या…. भाग-2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ रंगभुलैय्या…. भाग – २ ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

(पूर्वसूत्र-इथे सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियरची पोस्ट क्रिएट होणाराय हे सौरभनं मला पूर्वीच सांगितलेलं होतं. आपल्या संपूर्ण टीममधे आपल्या दोघांचेच परफॉर्मन्स आणि म्हणूनच ॲपरेझल्स चांगले होते.टीमलिडर म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विचार करता प्रमोशन मलाच मिळणार हे मी गृहित धरलेलं होतं. ते तुला मिळालं याचा आनंद आहेच अश्विनी.पण फरक पडला आहे तो माझ्या आईच्या कॅन्सर डिटेक्शनमुळे…” बोलता-बोलता समीरचा आवाज आणि डोळे भरून आले. तो बोलायचा थांबला. अश्विनी तो सावरायची वाट पाहत राहिली.)

“….. तुला माहित आहे अश्विनी, माझ्या दादा-वहिनीनी स्वतः काटकसरीत राहून माझं शिक्षण केलेय. बाबा हयात नसल्याची उणीव दोघांनीही मला कधीच भासून दिली नव्हती.पण मग माझं म्हणून कांही कर्तव्य आहेच ना? अगं,इथं आग्रहानं मला माझ्यासाठी फ्लॅट बुक करायला लावताना सुरुवातीच्या रकमेची मदत दादाने स्वतः कर्ज काढून केलीय. स्वतः मात्र अजून ते सर्वजण भाड्याच्या तुटपुंज्या घरातच रहात आहेत. या अशा परिस्थितीत आईच्या ट्रीटमेंटचा खर्च ते कुठून करणार ? कांहीही झालं तरी तो मीच करायला हवा ना? या क्षणी तू मघाशी म्हणालीस तसं ‘ हे प्रमोशन इज अ रुटीन मॅटर फाॅर यू. ‘ पण माझ्यासाठी ते तसं नाहीय.ती आज माझी निकडीची गरज आहे. प्रमोशन नंतरच्या हायर पॅकेजमधून मी आईच्या ट्रीटमेंटचा खर्च भागवू शकेन. आणि म्हणूनच खूप आॅकवर्ड वाटत असूनही मी तुला ही रिक्वेस्ट करतोय.आणि तसंही माझ्या प्रमोशननंतर तू माझ्या टीममधेच असशील आणि त्यामुळे तुमच्या संसारातल्या अडचणींसाठी तुला लागणारी कन्सेशनस् मी तुला सहजपणे देऊ शकेन.सो इट्स अ प्रॅक्टिकल डील फाॅर यू ऑल्सो..”

समीरचं सगळंच बोलणं कन्व्हिन्सिंग होतं पण शेवटच्या ‘डील’ या शब्दातली लालूच अश्विनीला रूचणारी नव्हती.

“तू हे सौरभसरांना बोललायस सगळं?”

“त्याचा काय संबंध?” समीर उखडलाच.”प्रमोशन स्वीकारणारी किंवा नाकारणारी तूच आहेस ना? सौरभला विचारण्याचा प्रश्न येतोच कुठं? सेकंड प्रायाॅरिटीवर माझंच नांव आहे हे सौरभनंच मला सांगितलंय. सो यू नीड नाॅट वरी फाॅर दॅट..”

समीरचं बोलणं खटकलं तरी अश्विनी शांत राहिली.या परिस्थितीत समीरच्या मन:स्थितीचा विचार करता त्याला सगळं माफ होतं तिच्या दृष्टीनं.ती गप्प बसलेली पाहून समीर बावचळला.

“अश्विनी,माझ्या या व्यक्तिगत अडचणीत तू आणि अभिखेरीज मला कुणाचेही उपकार नकोयत. होय. अगदी सौरभचेसुद्धा.ही इज एक बीग फ्रॉड…!”

” शट अप समीर. तू काय बोलतोयस समजतंय कां तुला?”

“होs मी खरं तेच बोलतोय. मी चांगलाच ओळखून आहे त्याला. तू एरवी दाद देत नाहीस ना म्हणून तुला पटवायला हे प्रमोशनचं गाजर त्यानं तुझ्या पारड्यात टाकलंय. तू सरळ स्वभावाची आहेस गं, पण सगळं जग तसं नसतं हे लक्षात ठेव..”

“बास समीर. इनफ. सौरभ सर काय विचार करत असतील ते त्यांचं त्यांच्याबरोबर. पण निदान हे मला ऐकवताना तरी तू दहादा विचार करायला हवा होतास. हे सगळं बोलून तू माझाही अपमान केलायस समीर..” अश्विनीचे डोळे भरूनच आले एकदम.

“हे बघ अश्विनी, तू शांत हो. माझी गरज म्हणून मी तुला प्रमोशन नाकारायची गळ घातली होती. मला गरज नसती तरीही सौरभबद्दल मी हे तुला सांगितलंच असतं. एक मित्र म्हणून तुला जागं करणं हे माझं कर्तव्यच होतं. प्रमोशन नाकारणं किंवा स्वीकारणं हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल अश्विनी. आणि तो मला मान्य करावाच लागेल. तुझं सहकार्य असो किंवा नसो यापुढची माझी लढाई मलाच लढावी लागेल आणि मी ती अखेरपर्यंत लढेन. मी हार मानणार नाही हे नक्की.”

तो बोलला आणि ताडकन् उठून निघून गेला. अश्विनी सून्न होऊन बसून राहिली कितीतरी वेळ.तिला कुणाचा तरी आधार हवा होता… आणि त्यासाठी तिचं वेड मन अर्थातच अभिकडे धाव घेत होतं…..!

————

“अभिs…”

” हं “

“ऐक ना. आज समीर म्हणत होता….”

टीव्हीवरुन लक्ष काढून घेत अभि तिच्याकडे पहात राहिला.

“काय म्हणालीस?”

“तू टीव्ही म्यूट कर बघू आधी. मला शांतपणाने बोलायचंय तुझ्याशी.”

“ठीक आहे.बोल.”

“मी काय करू रे प्रमोशनचं?”

“कमाल आहे. हे तू मला का विचारतेस? तुला झेपणार नाही असं वाटतंय कां? तसं असेल तर घेऊ नकोस ना..”

अश्विनी उघडलीच एकदम.

“न झोपायला काय झालं? पण…समीर..”

“समीरचं काय?”

“त्याने त्याच्या फिनान्शियल प्रॉब्लेमसाठी मला प्रमोशन रिफ्यूज करायची गळ घातलीय. आणि…”

“आय नो.समीर बोललाय माझ्याशी”

“तुझ्याशी ? कधी ?”

“दुपारी तुमचं बोलणं झालं त्यानंतर लगेच त्याचा फोन आला होता”

अश्विनी सावध झाली.

“आणखी काय सांगितलंय त्यानं ?”

” आणखी काहीच नाही. हे एवढंच. खरंतर मीही तेव्हा खूप बिझी होतो. तसं त्याला सांगितलं तर म्हणाला,अश्विनी तुझ्याशी बोलेल सगळं. आणि तिने प्रमोशन रिफ्यूज नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही दोघं माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका असं म्हणाला.”

“अभि, मला खरंच वाटतंय, त्यानंं कधी नव्हे ते माझ्याकडे कांही मागितलं आणि मी नाही म्हंटलं असं नको ना व्हायला ?अभि, माझ्या जागी तू असतास तर तू काय केलं असतंस?”

अभि हसलाच एकदम. आणि एकाएकी गंभीर झाला.

“तुझ्या जागी मी असतो तर समीरनं मला हे असं विचारलंच नसतं “

“कां?”

“कां काय? कारण त्याच्या इतकाच मीही अॅंबिशिअस आहे हे त्याला ठाऊक आहे”

“आणि मी ? मी नाहीये?”

“आहेस ना? मग विचारात कां पडलीयस? निर्णय घे आणि मोकळी हो.”

“हो.मला निर्णय घ्यावाच लागेल. पण तूही त्यासाठी मदत कर ना मला. तू या प्रश्नापासून इतका अलिप्त कां रहातोयस?”

अश्विनी काकुळतीनं म्हणाली. अभिने तिला थोपटलं. तिने मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहिलं.

“अश्विनी, हा प्रश्न तुझा आहे. तो तूच सोडवायला हवा “

“अभि…?तू..तू बोलतोयस हे? अरे, आपल्या संसारात असा एखादा प्रश्न फक्त माझा किंवा तुझा असूच कसा शकतो? तो आपलाच असायला हवा ना ? “

अभि स्वतःशीच हसला.

“बरोबर आहे तुझं. पण हा प्रश्न आपल्या संसारातला नाहीये. तो तुझ्या ऑफिसमधला आणि फक्त तुझ्याशीच संबंधित आहे. आणि म्हणूनच त्याचे उत्तरही तूच शोधायला हवं असं मला वाटतं”

त्या एका क्षणापुरतं का होईना तिला वाटलं,अभिनं आपल्याला एकटं सोडलंय. दुसर्‍याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. ती जागची उठली.

“अश्विनी..”ती थबकली. तिचे डोळे भरून आले एकदम.

“बैस अशी” तो गंभीर होता. अलगद डोळे पुसत ती अंग चोरून बसली.

“तू कधी विचार केलायस?…म्हणजे या प्रमोशनसाठी सौरभने तुलाच एवढं स्ट्राॅंग रेकमेंड का केलं असावं याचा?”

“हे असे प्रश्न तुला आणि समीरलाच पडू शकतात.मला नाही. कारण माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे‌”

“प्रश्न विश्वासाचा नाहीये. विश्वास तर माझाही तुझ्यावर आहेच. पण मला सांग, समीर तुझ्याइतकाच कॉंम्पिटंट असताना आणि तो सौरभचा खास मित्र असतानाही समीरला डावलून त्यानं तुलाच रेकमेंड करावं याचं आश्चर्य नाही वाटत तुला?”

“तुला नेमकं काय म्हणायचंय अभि?”

“मला काहीच म्हणायचं नाहीये.तुझ्या समोरच्या प्रश्‍नाचा तू एकांगी विचार करतेयस. म्हणून प्रत्येक प्रश्नाला इतरही अनेक कंगोरे असू शकतात हे फक्त तुला सुचवावं असं वाटतं.”

“सौरभ सर तसे नाहीयेत अभि.इतके दिवस मी त्यांच्याबरोबर काम करतेय. ही बीहेव्ज व्हेरी डीसेंटली”

“मे बी यू आर ट्रू. कॅन बी अदरवाइज आॅल्सो. डिसेन्सी ही एखाद्याची बिव्हेविंग-स्ट्रॅटेजीही असू शकते. माणसांचे वरवर दिसणारे रंग पक्के असतातच असे नाही. ते विरूनही जाऊ शकतात. तुला अनोळखी असला तरी आपल्या इंडस्ट्रीत हा ‘रंगभुलैया’ थोडा अधिकच फसवा आहे. तेव्हा तुझी गृहितं तू एकदा नीट तपासून बघ. तरच पुढची गणितं बरोबर येतील.”

अभिशी बोलून गुंता सुटेल असं तिला वाटलं होतं. पण गुंता अधिकच वाढला. 

क्रमशः……

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रंगभुलैय्या…. भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ?

☆ रंगभुलैय्या…. भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

अभि, समीर आणि अश्विनी कॉलेजपासूनचे खास मित्र. कॅम्पसमधून तिघेही कॅंम्बेमधे सिलेक्ट झाले आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या करियर मधे त्यांनी पहिले पाऊल टाकले.

अभि आणि अश्विनी मनानं खूप जवळ असल्याचं परस्परांना जाणवत होतंच पण त्यांच्या ‘आणाभाका’ झाल्या त्या पुण्यात ते एकाच कंपनीत जॉईन झाल्यानंतरच.

सौरभ हा या सर्वांचा कॅंम्बे मधला बॉस. त्यांच्यापेक्षा वयाने थोडासाच सीनियर पण तसा बरोबरीचाच. हसरा, तरतरीत, मनमोकळा आणि प्रसन्न ! सौरभ म्हणजे सुगंध. त्याच्या नावातच जसा सुगंध होता तसा तो त्याच्या व्यक्तिमत्त्वातही भरून राहिलेला होता.समीरचा तो खास मित्र झाला. पण अभिला मात्र तो फ्लर्ट वाटायचा. ऑफिसमधे मुलींबरोबरची त्याची उठबस अभिला वेगळी वाटायची. पण स्वतःचं हे मत त्याने कुठंच व्यक्त केलेलं नव्हतं. अश्विनी मात्र या सगळ्यापासून चार हात दूरच असायची.

समीर अजून सडाफटिंगच होता आणि कदाचित त्यामुळेच होमसिकसुद्धा.सौरभ बरोबरच्या ड्रिंक पार्टीजचा अपवाद वगळता बहुतेक विकेंडसना तो घरी पळायचाच.

अभि-अश्विनीचं लग्न ठरलं आणि अभिने कॅम्बेतून एक्झिट घेऊन बेटर प्राॅस्पेक्ट्स् साठी कॉग्निझंट जॉईन केली. त्यावेळी समीर,अश्विनीलाही तो ऑप्शन होताच पण अश्विनी धरसोड वृत्तीची नव्हती. त्यामुळे ती तिथेच राहिली.समीरची मात्र थोडी चलबिचल सुरू होती. पण अखेर ‘कॅम्बे सोडण्यापेक्षा सौरभला सोडून येणं माझ्या जीवावर येतंय यार..’ असं म्हणत तोही तिथेच राहिला. आणि ते खरंही होतं. त्याची आणि सौरभची छान मैत्री जमली होती. आणि प्रोजेक्टस् डेव्हलपमेंटच्या दरम्यान त्यांचं ट्युनिंगही चांगलं जमायचं.

एका वीकेंडला गावी गेलेला समीर सोमवारी नेहमीसारखं परत येणं अपेक्षित होतं. पण ऑफिसला निघण्याच्या तयारीच्या गडबडीत असताना अश्विनीला त्याचा मेसेज आला.

‘डिटेन्ट फॉर इमर्जन्सी मॅटर. कमींग ऑन वेनस्डे.प्लीज इन्फाॅर्म सौरभ’ हा त्याचा निरोप द्यायला अश्विनी सौरभच्या केबिनमधे गेली तेव्हा सौरभला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या क्षणी तो तिलाच बोलवून घ्यायचा विचार करीत होता. नेहमीप्रमाणे प्रसन्न हसत त्याने अश्विनीला हे सांगितलं तेव्हा अश्विनीही गोंधळून गेली क्षणभर.

“का? काही महत्त्वाची असाइनमेंट आहे कां?” तिने विचारलं.

“नाही “तो म्हणाला,” पण एक खास गुड न्यूज आहे तुझ्यासाठी.या स्टेजला स्ट्रीक्टली कॉन्फिडन्शीअल पण लवकरच ऑफिशियल डिक्लेअर होईल.”

न्यूज तिच्या प्रमोशनची होती ! ऐकताच क्षणी अश्विनीला आनंदाश्‍चर्याचा सुखद धक्का बसला खरा पण सौरभसमोर मात्र अश्विनीने तो क्षण खूप शांतपणे स्वीकारला. घरी आली ते या आनंदलहरींवर तरंगतच. इतका वेळ हा आनंद अभिशी शेअर करायचा मोह तिने आवरला होता. पण आता मात्र तिला रहावेना. पर्समधून गडबडीने ती मोबाईल काढणार एवढ्यात डायल टोन सुरू झाला. हा अभिचाच असणार असं मनाशी म्हणत तिने उत्साहाने नंबर पाहिला तर तो अभिचा नव्हता. समीरचा होता. तरीही तिचा विरस झाला नाही कारण ही गुड न्यूज आवर्जून शेअर करावी एवढा समीर खास मित्र होताच की.

“हाय समीर” ती म्हणाली. पण तिकडून मिळालेला समीरचा रिस्पॉन्स तिला कांहीसा गंभीर वाटला. त्याचा आवाज थोडा भरून आल्यासारखा जाणवला.

“समीर, काय झालं रे? तब्येत बरी आहे ना ?”

“हो.माझी बरी आहे.. पण आई… ” त्याला पुढे बोलवेचना.

“आईचं काय ? काय झालंय त्यांना.. बोल ना समीर “

तो कसंबसं बोलू लागला पण त्याने सांगितलं ते ऐकता ऐकता अश्विनीच अस्वस्थ झाली. तिच्या घशाशी हुंदका दाटून आला. तिने तो महत्प्रयासाने आवरला. स्वतःला सावरलं. पण समीरला मात्र आपला भावनावेग थोपवता येईना.

” समीर, हे काय लहान मुलासारखं ?सावर स्वतःला.हे बघ आईंना सांभाळ.त्यांना तू धीर देशील की स्वतःच खचून जाशील ? होईल अरे सगळं व्यवस्थित. आणखी एक.रहावत नाहीय म्हणून सांगते. अभि आणि मी दोघेही आहोत तुझ्याबरोबर. कसलीही मदत लागली तर कळव नक्की.तू खचून जाऊ नकोस. ओके? अरे,प्रोजेक्टची कसली काळजी करतोस? आम्ही सर्वजण मिळून करू मॅनेज.डोन्ट वरी. टेक केअर.”

सगळं ऐकलं आणि अश्विनीचा मूडच गेला एकदम. क्षणापूर्वीचा मनातला आनंद पाऱ्यासारखा उडून गेला.तिला कॉलेजचे दिवस आठवले. मोकळ्या वेळेत कॉलेजपासून जवळचं घर म्हणून सर्वांचा राबता समीरच्या घरीच असायचा.तिला तेव्हाची समीरची आई आठवली.या साऱ्यांची ऊठबस ती किती उत्साहाने करायची. त्यांच्या वयाची होऊन त्यांच्या हास्यविनोदात रमून जायची. आणि आज हे असं अचानक?

अभिलाही ही बातमी ऐकून धक्काच बसला. त्याने लगोलग समीरला फोन केला.कितीतरी वेळ त्याच्याशी बोलत त्याला धीर देत राहिला. पण स्वतः मात्र स्वतःचीच आई संकटात असल्यासारखा हळवा होऊन गेला..!

तो आनंदाचं शिंपण करीत उगवलेला दिवस आनंद करपून गेल्यासारखा असा मावळला..!

दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलेल्या अश्विनीनं लिफ्टमधे पाऊल ठेवलं तर समोर समीर..!

” समीर,.. तू ? ” तो कसनुसा हसला.”  तू इथे कसा?आई कशा आहेत? ”  तो गंभीरच झाला एकदम.पण लगेच त्याने स्वतःला सावरलं आणि शेकहॅंडसाठी हात पुढे केला.

“अश्विनी, काँग्रॅटस् “

“कशाबद्दल?”

मनाच्या या अस्वस्थतेत कालची गुड न्यूज ती पार विसरूनच गेली होती..!

” फाॅर गेटिंग प्रमोशन.यू डिझर्व इट अश्विनी”

अश्विनीला काय बोलावं समजेचना.तिला खरंतर हा विषय नकोसाच वाटू लागला.

“समीर,त्याचं काय एवढं?इटस् स्टील अ रूमर. मे बी रॉंग ऑल्सो.आणि तसंही इट् वोण्ट मेक एनी डिफरन्स फॉर मी”

” का?तुला नकोय प्रमोशन?”

“सहज मिळेल ते मला सगळं  हवंय.अट्टाहासाने कांहीच नकोय.एकच सांगते. या विषयाचा मला आत्ता त्रास होतोय. आत्ता या क्षणी आय ॲम वरीड फाॅर यू. आई कशा आहेत? डॉक्टर काय म्हणतायत?”

“टेस्ट रिपोर्टस् आज संध्याकाळी येतील. मगच लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरेल.”

“हो पण मग तू कां आलायस इथं? प्रोजेक्टची काळजी करू नको असं म्हटलं होतं ना मी?

“हो पण नेक्स्ट वीक सौरभ स्टेटस् ला चाललाय. पुन्हा लवकर भेटायचा नाही.म्हणून मग..”

“म्हणून आलायस इथं?डोकं ठिकाणावर आहे का तुझं? तू.. तू जा बघू परत.”

“खरं सांगू अश्विनी? मी तिथं नाही थांबू शकत. म्हणून आलोय. आई काय गं.. शी इज ब्रेव्ह इनफ. बट आय अॅम नॉट. शिवाय तिथं दादा-वहिनी आहेतच. आईची ट्रीटमेंट मार्गी लागेपर्यंत मी इथंच कम्फर्टेबल असेन.” बोलला आणि तडक सौरभच्या केबिनच्या दिशेने निघून गेला. अश्विनीचे मग कामात लक्षच लागेना.

                  ————

” अश्विनी,चल.चहा घेऊ “

“आत्ता? इतक्या लवकर?”

” मला बोलायचंय तुझ्याशी‌. प्लीज “

त्याला नाही म्हणणं तिच्या जीवावर आलं. काही न बोलता ती जागची उठली.

समोरच्या वाफाळलेल्या चहाकडे समीरचं लक्षच नव्हतं. तो शून्यात नजर लावून कुठेतरी हरवून गेलेला होता.

” समीर…समीsर “

“अं ?..काय?” तो दचकून भानावर आला.

“बोल. काय झालं? काय म्हणाले सौरभ सर?”

“कशाबद्दल?”

“कशाबद्दल काय? त्यांना भेटायला गेला होतास ना तू? मग? काय म्हणाले ते? तुझ्या  रजेबद्दल त्यांना प्रॉब्लेम नाहीये ना कांही?”

“प्रॉब्लेम त्याला कां असेल?प्राॅब्लेम मलाच आहे.पर्सनल.”

“कसला प्रॉब्लेम?”

“अश्विनी, रागावणार नसशील तर एक विचारु?” 

“रागवायचं काय त्यात? विचार.”

“एक फेवर करशील माझ्यावर?”

“फेवर काय रे? वेडा आहेस का तू? मी करू शकेन असं कांहीही सांग. मी नक्की करेन “

“तू माझ्यासाठी तुझं प्रमोशन रिफ्यूज करशील?”

“त्याचं आत्ताच काय?”

“कां? मनात आणलं तर तूच करू शकशील असं नाहीये कां हे?”

“अरे, पण जे अजून ऑफरच झालेलं नाहीय ते रिफ्यूज करण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि हे असं अचानक कसं काय आलं तुझ्या डोक्यांत?”

समीरला वाटलं होतं ती पटकन् हो म्हणेल. पण तसं झालं नव्हतं.आता हिला कां ते सांगायलाच हवं. तो कसेबसे शब्द जुळवत राहिला.

“तुला मी पूर्वी कधी बोललो नव्हतो अश्विनी.पण आज सांगतो. नवीन सुरू होणाऱ्या प्रोजेक्टस्साठी इथे ‘सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर’ ची पोस्ट क्रिएट होणाराय हे मला सौरभनं पूर्वीच सांगितलेलं होतं. आपल्या संपूर्ण टीममधे आपल्या दोघांचेच परफॉर्मन्स आणि म्हणूनच ॲपरेझल्स् चांगले होते. टीम लीडर म्हणून पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विचार करता प्रमोशन मलाच मिळणार हे मी गृहीत धरलेलं होतं. ते तुला मिळालं याचा आनंद आहेच अश्विनी. पण फरक पडला आहे तो माझ्या आईच्या कॅन्सर डिटेक्शनमुळं……”

बोलता-बोलता समीरचा आवाज आणि डोळे भरून आले. तो बोलायचा थांबला. अश्विनी तो सावरायची वाट पहात राहिली…

क्रमशः……

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जमीन…! (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ जमीन…! (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

शहरातून जेव्हा जेव्हा नातवाचं पत्र येतं, तेव्हा आजी ते दाखवत गवभर फिरते. मग कधी तरी गुपचुप पोस्टात जाऊन मनीऑर्डर करून येते. तिला आपल्या नातवाबद्दल खूप गर्व आहे आणि का असाणार नाही? गावातून डॉक्टर होण्यासाठी शिकायला गेलेला तो एकमेव मुलगा होता.

मुलगा एम.बी.बी.एस. होईपर्यंत आजीची तीस एकर जमीन विकली गेली. ’आजी मी डॉक्टर झालो’ अशी चिठ्ठी जेव्हा आली. तेव्हा आजीला जसे पंख फुटले.  घरोघरी फिरत ती सांगत राहिली, ‘आता माझा नातू कधीही येईल आणि माला शहरात घेऊन जाईल.’ पण नातवाऐवजी, पोस्टमनच एक दिवस, एक पत्र घेऊन आला. ‘आपला नातू लग्न करतोय. त्यासाठी त्याने पैसे मागवले आहेत.’ पोस्टमनने पत्रातला मजकूर सांगितला. पत्राच्या उत्तरादाखल आजीने आपले घर विकून टाकले आणि ती धर्मशाळेत शिफ्ट झाली. म्हणू लागली ‘आता बायकोला घेऊन येईलच आणि मला गाठोड्यासारखं उचलून घेऊन जाईल.

नातू काही आला नाही, मात्र एक दिवस पुन्हा एक पत्र आलं. लिहीलं होतं, ’परदेशात जायचं आहे. त्यासाठी पैसे पाहिजेत. प्रत्येक चिठ्ठीचं उत्तर मानीऑर्डरने देणार्‍या आजीने, यावेळी पहिल्यांदाच पोस्टमनकडून लिहून पाठवलं, बेटा, सगळं विकून झालंय. आता विकण्यासारखा बाकी काही उरलेलं नाही.’ ती चिठ्ठी आणि आजचा दिवस यात दहा वर्षाचं अंतर आहे. लोक आजीला विचारतात, ‘आजी, नतवाची काही चिठ्ठी…’

आजी उत्तर देते, ‘नाही बेटा, नाही आली.’

‘का काय झालं?’

‘काही नाही रे, माझी जमीन कमी पडली!’

 

मूळ हिंदी  कथा – ‘जमीन ’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिंदी आणि मी— भाग दुसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ हिंदी आणि मी— भाग दुसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(आपल्या विचारांवर नव्हे तर उत्तरावर मी खूष झाले होते.) इथून पुढे —–

घराचं कुलूप काढत होते तेवढ्यात समोरच्या श्रीवास्तवभाभी ने टोकले .(श्रीवास्तव हे त्यांचे आडनाव मी नेमप्लेटवर वाचलेले होते.) “कहाँ होके आई?”- “घर मालिक के यहाँ.!”  माझ्या उत्तरावर ती खुदुखुदू हसू लागली. म्हणाली, “घरमालिक मतलब तुम्हारा हजबंड ! मकान मालिक कहो.”

अशा तऱ्हेने माझ्या बोलण्यातील गमती जमती दोन-तीन महिने तरी इतरांचे मनोरंजन करीत राहिल्या…. आणि मला कळलं की माझी ‘हिंदी’ पुस्तकी आहे… शब्द संख्या खूप मर्यादित आहे… त्यामुळे मला हिंदीवर खूप अभ्यास करावा लागेल.

हिंदीतलं वर्तमानपत्र (अखबार )वाचायला सुरुवात केली. मासिकं ,साप्ताहिकं यांचं वाचन सुरू झालं. पण खूपसे शब्द डोक्यावरूनच जायचे. बोलीभाषा तर मला चक्रावून टाकायची. एकदा तर जमादारनी (सफाई कर्मचारी) तिचा काहीतरी गैरसमज झाल्यानं माझ्याशी दबंगाई करून,  खेडवळ हिंदीत भांडू लागली. शेजारीपाजारी कोणीच दिसले नाही .भांडण आणि तेसुद्धा हिंदीतनं…बापरे मला काहीच सुचेना .बावीस वर्षाचं लहान वय. कधी अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागलं नव्हतं… मी घाबरून रडायलाच सुरुवात केली. नवऱ्याला साफ सांगून टाकलं.”इथं नाही राहणार मी. ह्या हिंदी लोकांपुढे माझा नाही टिकाव लागणार.”

हे शक्य नाही हे मलाही माहीत होतं. त्यामुळे मी हिंदीवर थोडं वर्चस्व मिळवायचा प्रयत्न करु लागले…आणि दोन महिन्यानंतर जेव्हा आमचा मुंबईला जाण्याचा योग आला, तेव्हा मी हिंदीतून मराठी आणि मराठीतून हिंदी असे शब्दकोष विकत घेतले. (ते अजूनही माझ्याकडे आहेत.)

माझं हिंदी वाचन जोरात सुरू झालं. दिल्ली पब्लिक लायब्ररीत नाव घातलं अन् तूर्तास नोकरी करणार नसल्याने मी घरची पी.आर्.ओ. व्हायचं ठरवलं ….आणि ओळखी-पाळखी वाढवायला सुरुवात केली. (रिझर्व रहाणं तसंही मला आवडायचं नाही.) शेजारीपाजारी , पार्कमध्ये, वाचनालयात सगळीकडेच. व मग संक्रांतीच्या हळदी कुंकवा साठी खूप जणींना बोलावून घेतलं … त्यामुळे हळूहळू सगळ्यांशी माझ्या गप्पा -शप्पा सुरू झाल्या. आणि मी ‘पुस्तकी’ हिंदी वरून ‘बोलचाल की हिन्दी’ वर पोहोचले. अन् मला हळूहळू पंजाबी, हरियाणवी ,राजस्थानी, बिहारी हिंदी सुद्धा समजू लागली. स्वतःला हम आणि समोरच्याला (आप नही) तुम म्हणत बोलणाऱ्या यूपीवाल्यांचा नखरा पण समजला.

त्या ‘आप’वरून एक मजेदार प्रसंगच घडला. वरच्या मजल्यावर राहणारी मिसेस कपूर मला तिच्या घराची किल्ली देऊन गेली होती. अर्ध्या तासात तिचा नवरा आल्यावर त्याला ती द्यायची होती. त्याप्रमाणे मिस्टर कपूर आले. “मिसेज़ गॅडरे, चाबी.” ते म्हणाले. मी किल्ली त्यांना दिली. आणि त्यांच्याशी हिंदीत थोडं बोलले. परत जायला निघालेले ते एकदम थांबले.

” एक बात बताऊ..” असं म्हणत ते एकदम नाराजीच्या स्वरात बोलू लागले,” मैं आपसे इतना बडा हूँ, फिर भी आप से आप कहके बात कर रहा हूँ… और आप हैं कि मुझे ‘तुम’ कह रही है.” बापरे… म्हणजे झालीच पुन्हा चूक!  मग मी माझी बाजू सावरून घेतली. ” सॉरी… थोडा लैंग्वेज प्रोब्लेम…. बुरा मत मानना….अंग्रेजी में जैसे you–तू , तुम, आप सब कव्हर करता है, वैसे थोडासा मराठी में भी है. तुम्ही में तुम और आप दोनो आते है..” आणखी पण असंच काहीसं सांगितलं. मग जेव्हा त्यांची समजूत पटली, तेव्हा लगेहात मी त्यांना हेही सांगायला विसरले नाही, “भाईसाब नॉट गॅडरे…गद्रे है हमारा सरनेम… लैंग्वेज प्रॉब्लेम… आपके साथ  भी…”. ते हसले आणि निघून गेले. पण त्यानंतर मी तुम आणि आप च्या बाबतीत खूप सजग झाले.

हिंदी उच्चारांची पद्धत पण मी आत्मसात केली. मैं, है, ऐसा, वैसा, औरत, और म्हणताना मॅ, हॅ, ॲसा, वॅसा, ऑरत, ऑर–आणि बरीच वेगळी उच्चार पद्धती मला जमू लागली. अन् मग सगळे सोपे झाले. हिंदीभाषिकांकडून  “आपकी हिंदी बहूत अच्छी है” असे अभिप्राय जेव्हा मला मिळू लागले तेव्हा मला एक मोठी लढाई जिंकल्याचा आनंद झाला.

क्रमशः—-

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ इव्हेंट.. ☆ सुश्री स्वप्ना मुळे

? जीवनरंग ?

☆ इव्हेंट.. ☆ सुश्री स्वप्ना मुळे  

“नले काय कमाल झाली ग तुझी?? ह्या वयात तू ही त्या पोरांसोबत खुशाल गाण्यावर थिरकली काय,.. परवा त्या मेहंदीच्या कार्यक्रमात हाताभर मेंदी काढलीस,..शोभत का आपल्याला ह्या वयात आणि काल तर नातू म्हणतोय आजी अशी पोज दे तर लगेच त्याच्या मैत्रिणींसोबत काढलास तसा तोंड माकडासारखे करून फोटो कमाल आहे हं तुझी,म्हणत सुशीने नेहमी प्रमाणे नलीला सुनावलंच,..पण या वेळी नेहमी प्रमाणे नली गप्प नव्हती,..तिने सुशीला हात धरत कालच्या टेरेसवर नेलं,….जिथं काल मेंदी प्रोग्रॅम रंगला होता,..तिथं नलीने बनवलेल्या लोकरीपासून बनवलेले लटकन सगळीकडे वाऱ्यावर डोलत होते,..त्यात अडकवलेल्या बारीक घंटा वाऱ्याने किणकिण करत होत्या,….नलीच्या माहेरचं ताब्यांच जड घंगाळ लक्ख करून त्यात दिवे सोडलेले होते पाण्यावरचे,..भोवती मोगऱ्याची टपोरी फुल त्या मिणमिणत्या प्रकाशासोबत मंद सुगंध पसरवत होती,..नलीने सुशीला त्या घंगाळजवळ बसवलं आपला थरथरता हात त्यावर फिरवत म्हणाली,..”तुला आठवतं हे आईने हट्ट करून मला रुखवंतात दिलं होतं,..काही दिवस ते सासरी मिरवलं हळूहळू काळवंडायला लागलं,.. तसं सासुबाई त्याला घासण्यासाठी माझ्या मागे लागायच्या,..सगळ्यांच्या अंघोळी झाल्या की एक दिवस त्याला तासभर घासत बसावं लागायचं,.. जीव चिडायचा वाटायचं कशाला दिलं आईने हे त्रासदायक घंगाळ मला,..??पुढं लेकरं बाळ आयुष्यात आली,.. हळूहळू त्या घंगाळाला माळ्यावर टाकलं कधी तरी डोळ्यासमोर दिसलं की वाटायचं मोडीत घालू मग परत आई आठवायची हट्टाने ते घेणारी,..मग स्टील, प्लास्टिक असं काय काय येत राहिलं,..तरी त्याच महत्व मनात होतं कायम पण त्याच्या स्वछतेपायी त्याला दूरच ठेवलं,..सुनबाई म्हणाली,” नकोच त्या हमाल्या..” म्हंटल नको तर राहू दे आपल्यालाच नाही जमलं तर ह्यांना कुठे बळजबरी करता,..

नलीला मध्येच अडवत सुशी म्हणाली,”अग मी तुला दोन दिवसांपासून तू इतकी ह्या पिढीसोबत मोकळी ढाकळी वागलीस त्याबद्दल विचारलं तर तू हे काय इतिहास सांगत आहेस मला,..?”

नली हसून म्हणाली,”अग तेच सांगते,….वर्षानुवर्षे माळ्यावर अडगळ होऊन पडलेलं घंगाळ ती इव्हेंट मॅनेजमेंट वाली पोरगी घेऊ का? म्हणून मला विचारायला आली,.. मी हो म्हणताच ते खाली काढून तिने त्याला स्वच्छ करून नकली फुलांची माळ गुंडाळली त्यात पाणी सोडलं आणि हे कमळाचे दिवे हि मोगऱ्याची फुलं,.. मला म्हणाली,”आजी जून असलं तरी नव्याने त्याला जगू देऊ या,..माझ्या टेबलावर पडलेल्या लोकरीच्या फुलांची माळ तिने ह्या रिकाम्या कागदाच्या ग्लासात अडकवली,..मला म्हणाली,” जगणं तेच फक्त त्याला लूक नवा दयायचा म्हणजे आंनद मिळतो..मी सहज ते सगळे लटकन बघितले तर खरंच माझीच लोकरीची फुलं इतक्या दिवसांपासून त्या कोपऱ्यात पडून राहिलेली आज मस्त वाऱ्यावर डुलत होती जणू मोकळा श्वासच घेत होती,..हे हल्ली इव्हेंट इव्हेंट म्हणतात ते फार काही दुसरं नाही ग तर आहे तो कार्यक्रम आनंदाने साजरा करणं त्यासाठी हि सजावट पडीत वस्तूतूनही किती छान करता येते हे त्या मॅनेजमेंट वालीने दाखवलं आणि मग मनात वाटलं,..आपण सुद्धा आयुष्याचा इव्हेंट करायला हवा,..आनंदी मॅनेजमेंटने,..आपण नाही वापरलं ते घंगाळ,.. ती फुलं तशीच तशीच तर पडून आहेत,….मनातल्या उत्साहाची फुलं देखील तशीच पडू दिली आपण नाही वाऱ्यावर डोललो कधी,..मोकळेपणाने आणि अजूनही नाही तर मग कधी?आयुष्य तर असंच गंजून जाईल त्या माळ्यावर पडलेल्या घंगाळा सारखं कोणी येईल आणि लक्ख करेल ही वाट कशाला बघायची ?आपल्या आयुष्याचा इव्हेंट मॅनेज आपणच करावा,..हे नाही आलं आजपर्यंत लक्षात पण हि पिढी शिकवतीये ना मग घेऊ या शिकून,..त्याक्षणी जगून घेणं,..तो क्षण आठवणीत राहील असा साजरा करणं,..

सुशे तुलाआपले लग्नकार्य भांडण आणि रुसण्याशिवाय काय आठवतं ग?? ह्या उलट काल आमच्या मेंदीत लेक आणि सून मला मध्ये घेऊन फोटोसाठी उभे राहिले तेंव्हा नातू म्हणाला ,” आजीला जवळ घ्या बाबा,.. आणि लेकांन मला जवळ घेतलं तेंव्हा काय सांगू काय भरून आलं ग एरवी आपल्याला बोलायला वेळ नसणारी माणसं ह्या इव्हेंट ने एकमेकांना स्पर्श करताहेत ग,..सुनेनी नातवानी जवळ घेऊन भरपूर फोटो काढले तेंव्हा वाटलं आपणही कधीच आपल्या सासूला असा हात लावला नव्हता,..लेकीने तरी कुठे ग असे गळ्यात प्रेमाने हात टाकले,..फक्त आदर आदर ह्याच्या नावाखाली हे एकमेकांना प्रेमानं जवळ घेणं आपण विसरायला लागलो ते ह्या इव्हेंट मध्ये सापडलं ग मला ह्या लख्ख झालेल्या घंगाळा सारखं आणि मग मनातही मोगरा फुलला,..क्षण जगून घ्यावा हा विचार आतमध्ये ह्या कमळाच्या पाकळ्यांसारखा उमलत गेला,..म्हणून मी आता ठरवलं आयुष्य इव्हेंट करून जगायचं अगदी सुंदर आणि आंनदी..”

सुशी नुसतीच हसली कारण नलीच्या वाक्यावर वरची लटकणारी फुलच डोलत आपल्या किणकिण घंट्या वाजवत ह्या सगळ्या बोलण्याला दुजोरा देत होती?

 

©️ स्वप्ना मुळे (मायी)

औरंगाबाद

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print