मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका कर्जाची परतफेड – भाग १– सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ एका कर्जाची परतफेड – भाग १– सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

डिसेंबरची एक थंड संध्याकाळ. हॉस्टेलमध्ये सात ते नऊ अभ्यासाची वेळ होती. वातावरणात एक सुखद शांती होती. दिवसभरच्या धबडग्यानंतर मी आरामखुर्चीत विसावले होते. पायांवर पातळशी वुलन शाल होती आणि हातात हर्मिनाब्लॅकचं`गोल्डन मून ऑफ आफ्रिका’ हे पुस्तक.

एवढ्यात वाटलं,  दरवाजात काही तरी खुस-फुस चालू आहे. पुस्तकांवरून नजर न हलवता मी म्हंटलं `येस कम इन..’

रोहिणी आणि सुजाता घाबरत घाबरत आत आल्या.

`हं! बोला!’

दोघी एकमेकींच्या तोंडाकडे पाहू लागल्या. `अग, ब! म्हणजे सकाळी मनीऑर्डर आली, ते तर नव्हेत?’

होय! तेच. मनीऑर्डर घेऊन तिने ते पैसे लगेचच डेस्कमध्ये ठेवले होते. शाळेची बस चुकेल म्हणून.

`वेडीच आहे, माझ्याजवळ द्यायचे ना! तिला म्हणावं,  नीट बघ. एखाद्या पुस्तकात ठेवले असतील.’

`संध्याकाळपासून आत्तापर्यंत सगळी पुस्तके,  सगळ्या वह्या तिने पुन्हा पुन्हा बघितल्या. बिछाना,  पेटी काही सोडलं नाही.’ सुजाता म्हणाली.

`ठीक आहे. जा तू! तिला माझ्याकडे पाठव.’ मी वैतागून म्हंटलं. इतका चांगला प्रसंग चालू होता पुस्तकात. यांनी सगळी मजाच घालवून टाकली.

दोघी जणी दरवाजापर्यंत गेल्या. रोहिणी जराशी थबकली आणिम्हणाली,     

`आम्ही तिच्या रूममध्ये राहणार्‍या मुलींवर तर संशय येणार नाही ना?’ तिचा चेहरा मोठा करुण झाला होता. स्वाभाविकच होतं. बड्या बापाची बेटी होती ती.

`ते बघू या नंतर. तुम्ही तिला इकडे पाठवा.’

त्या दोघी गेल्या. आता मी रामकुँवरची वाट पाहत होते. सकाळी मनीऑर्डर घेताना तिचा सावळा चेहरा कसा प्रफुल्लित झाला होता,  ते मी विसरले नव्हते. पुढच्या आठवड्यातच हायर सेकंडरी परीक्षेचा फॉर्म भरायचा होता. फॉर्म फीची रक्कम ४८रुपये तिचा शिपाई असलेला भाऊ एकदम पाठवू शकेल, यावर तिचा विश्वासच नव्हता. मॅडम म्हणाल्या होत्या, की फॉर्म फीची व्यवस्था होईल. नंतर हप्त्या-हप्त्याने पैसे परत देता येतील.

मला खरोखर तिचे पैसे घेणार्‍या, या नीच मनोवृत्तीच्या व्यक्तीचा भयंकर राग आला. अनुसूचित जातीतील मुलांना मिळणार्‍या  शिष्यवृत्तीच्या आधारे ती आमच्या शाळेत शिकत होती. घराकडून दर महा येणार्‍या १०-१५ रुपयांमध्ये ती तेल,  साबण, वह्या, पुस्तकांचा खर्च मोठ्या कुशलतेने भागवत असे आणि महत्वाचं म्हणजे तिच्या कपाळावर कधी आठी म्हणून नसे.

हे नुकसान मात्र खूप मोठं होतं. त्यामुळे तिच्या धैर्याचा बांध तुटून गेला होता.

१०-१५ मिनिटे झाली असतील. रामकुँवर दरवाजाशी उभी होती. साधी साडी. डोकं, हात पदराने झाकलेले. एखाद्या गाठोड्यासारखीच दिसत होती.

`तू स्वेटर नाही घातलास?’

`स्वेटर मी शाळेत जाताना घालते. रात्रंदिवस घातला, तर मळतो ना!’  तिने दबलेल्या आवाजात म्हंटलं.

हे उत्तरही नेहमीचच. पण कर्तव्य म्हणून मला कधी कधी टोकावं लागे. जास्त जोरात विचारलं असतं,  तर म्हणाली असती,  इथे चादर पांघरूनही काम भागतं, किंवा मग आमच्या गावाकडे इतकी थंडी असते,  की त्यापुढे ही काहीच नाही. तिचं एक तत्व होतं. इथे कसं का दिसेना,  शाळेतनीट-नेटकं,  व्यवस्थित दिसलं पाहीजे.

`हे रुपये हरवल्याचं काय चक्कर आहे?’  मी मूळ विषयाकडे येत विचारलं.

अश्रूंचा महापूर पुन्हा उसळला. माझ्या सांत्वनेच्या शब्दानंतर तिने पुन्हा तीच हकिकत सांगितली. मी तिच्या निष्काळजीपणाबद्दल हळुवारपणे एक उपदेशाचा डोस तिला पाजला, पण तरीही समस्या आपल्या जागी तशीच होती. प्रश्न केवळ हरवलेल्या पैशांचाच नव्हता. पैशाची पुन्हा व्यवस्था व्हायला हवी होती. मी म्हंटलं, ’ फॉर्म भरायला अजून एक आठवडा आहे. तुझ्या भावाला पत्र लिहीलंस तर पोचेल नं?’     

तिने आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहीलं. `आपण इथेही शोध घेऊच या!’  तिला आश्वस्त करत मी म्हंटलं. `पण तुझ्या भावाला वेळेवारी माहीत होणं गरजेचं आहे.’

`दीदी’,  तिने थोडं थांबून म्हंटलं,  `मी परीक्षा पुढल्या वर्षी देईन, पण घरून पुन्हा पैसे मागवण्याचा विचारही करू शकत नाही.’  आणि तीपुन्हा स्फुंदून स्फुंदून रडू लागली. ही समस्या तिच्यासाठी खरोखरच मोठी असणार, अन्यथा घराच्या बाबी ती कधी जिभेवर आणत नसे. सहनशीलता हे तिचं मोठं वैशिष्ट्य होतं. त्यामुळेच ती आपल्या मैत्रिणींमध्ये प्रिय झाली होती.

या वसतीगृहात दोन जागा आदीवासी आणि अनुसूचित जाती-जमातीच्या मुलींसाठी आरक्षित होत्या. माझ्यासाठी या मुली म्हणजे डोकेदुखीच होती. बिचार्‍या एकदम वेगळ्या वातावरणतून,  वेगळ्या संस्करातून इथे आलेल्या असायच्या. या नव्या वातावरणात काहीशा विक्षिप्तासारख्या वागायच्या. कुणी आपला वेगळा ग्रूप बनवत. कुणी अ‍ॅडजेस्ट होऊ न शकल्याने भांडखोर बनत.

रामकुँवर या सगळ्यांपेक्षा वेगळी होती. ती सहावीत असताना आमच्याकडे आली. तिने लवकरच हे नवं वातावरण आपलसं केलं. तिची भाषा बदलली. रहाणी नीट-नेटकी झाली पण तिने आपली वेशभूषा बदलली नाही. आपल्या बरोबरीच्या मुलींशी कधी ईर्षाही केली नाही. आपल्या आनंदी स्वभावामुळे ती सगळ्यांची लवकरच लाडकी बनली.

   तिला खोलीत परत पाठवून मीपुन्हा या समस्येबद्दल विचार करू लागले. सगळ्यात आधी विचार आला,  तो म्हणजे खोल्या-खोल्यात जाऊन झडती घेण्याचा. परंतु तो विचार लगेचच सोडून दिला,  कारण नोटांचे नंबर काही टिपून ठेवलेले नव्हते. मग त्याच त्या,  असं कसं ओळखणार? या शिवाय झडती घेण्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. मागच्या वर्षी राधिका त्रिवेदीचा वुलनचा बेबी सेट सापडत नव्हता. आठ दिवसानंतर शहरातून रोज शाळेत येणार्‍या तिच्या एका मैत्रिणीने तो परत केला. राधिकेने स्वत:च तो तिला दिला होता आणि ती विसरून गेली होती.

पण या गोष्टीबाबत आम्हाला अनेक पालकांच्या नाराजीच्या पत्रांशी सामना करावा लागला होता. रामकुँवरच्या खोलीत एक कलेक्टरची मुलगी होती,  तर दोघी जणी एका सुप्रसिद्ध वकिलाच्या बहिणी होत्या. त्यांच्याबाबतीत ही फारशी चिंतेची बाब नव्हती,  पण तिच्या जातीच्याच विद्यार्थिनी हे शत्रुत्व गावा-घरापर्यंत न्यायच्या.

१० -१५ रुपयांची गोष्ट असती, तर मीपण दिले असते,  पण ५०रुपये खूप मोठी रक्कम होती. माझा पगार सगळा माझा नव्हता. घरात अनेक डोळ्यांच्या जोड्या त्याची प्रतिक्षा करत.

   दुसर्‍या दिवशी मी सगळ्या नोकरांची फौज जमा करून विचारणा केली. पण सगळ्यांनी डोळ्यातून पाणी काढून आणि शपथा घेऊन अशी नाटकं  केली,  की मीच घाबरून गेले. मग मीस्वैपाकघरात सगळ्या एकत्र जमल्यावर रागावून एक भाषण दिलं. मग म्हंटलं, की चुकून किंवा चेष्टा करायची म्हणून,  किंवा दुष्ट बुद्धिने का होईना,  पण जर कुणी पैसे घेतले असतील, तर दोन दिवसातमाझ्या टेबलाव रआणून ठेवावे. याबद्दल कुणालाही काहीही कळणार नाही. माझ्यावर विश्वास नसेल,  तर गुपचुप माझ्या टेबलावर ठेवून जा. मी त्यातच समाधान मानीन. दोन दिवस मोठ्या आशेत आणि उत्कंठेत सरले. मी खोलीच्या बाहेर बाहेरच जास्त वेळ राहिले, म्हणजे चोराला पैसे ठेवण्याची संधी मिळेल. पण निराशाच पदरी पडली.

तिसर्‍या दिवशी मी प्रिन्सिपॉल मॅडमकडे गेले. त्यांचा बंगला हॉस्टेलच्या परिसरातच होता. जेव्हा माझ्यापुढे काही समस्या निर्माण होते,  तेव्हा मी त्यांच्याकडेच जाते. इतक्या मोठ्या चोरीची गोष्ट तशीही लपून राहणं शक्यच नव्हतं.

त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. मग रामकुँवरला बोलावून विचारलं की तिचं कुणाशी भांडण तर झालं नाही? किंवा कुणाला तिच्यबद्दल ईर्षा तर वाटत नाही?  पैसे ठेवताना खोलीत कोण कोण होतं,  आठवतय का?

तिने सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक दिली.  

ईर्षेबद्दल विचारलं असता ती थोडीशी हसून म्हणाली,  ‘माझ्याशी कोण ईर्षा करणार? आणि कशासाठी्?’

   ती गेल्यानंतर मॅडम म्हणाल्या, `ही चोरी आहे. विशुद्ध चोरी. पैसे परत नाही मिळणार. लिहून ठेव. आता प्रश्न असा , की पुढे काय करायला हवं?’

क्रमश: १

मूळ लेखिका – सुश्री मालती जोशी  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अखेर जमलं आमचं लेखिका – सुश्री अनिता मेहेंदळे ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? जीवनरंग ❤️

☆ अखेर जमलं आमचं लेखिका – सुश्री अनिता मेहेंदळे ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

एकदा घरात समजलं की माझे काही प्रेम बिम नाहीये.सो हिला मुलगा बघायला हरकत नाही.तेव्हा माझे नाव दोन तीन वधुवर सूचक मंडळात घातले.आईचे फोन चालू झाले तिथे ,पत्रिका शिक्षण घरची माहिती वगैरे वगैरे.त्यात एक स्थळ बरे वाटले म्हणून मग मुलाच्या घरी फोन लावला.मुलाचे वडील प्रसिद्ध नाट्य अभिनेता असल्याने त्यांचे  प्रयोग बाहेरगावी असत. सो ते असतील तेव्हा शक्यतो मुलीला बघणे कार्यक्रम करू असा तिकडून निरोप आला.

अत्यंत बोअर अशी सकाळी ८,३० ची आणि रविवारची वेळ घेतली.मी साडी नेसणार नाही या विषयावर वाद झाल्याने आई आधीच चिडली होती आणि बाबांना सांगितलं होतं की तुम्ही उगीच फार बडबड करू नका.ते खूप बोलतात कारण.आणि मुलगा आवडला तर मी रुमालाची घडी घालीन आणि नाही आवडला तर रुमाल चुर्गळून टाकीन मग तुम्ही समजाल की किती वेळ बसायचं तिथे ते.

हे सगळं ठरवून आम्ही तिघे मुलाच्या घरी पोचलो .मुलाला बघून माझी विकेट गेली होती.त्याची आई खूप प्रश्न विचारत होती आणि त्या गोंधळात माझा रुमाल कुठेतरी पडला.

आता बाबांची मात्र झाली पंचाईत त्यांना कळेना की मुलगा आवडला का नाही.मुलगा इतका शांत होता आणि मी पहिल्यांदा च भेटल्याने मी नेहमी सारखी बोलत नव्हते.मुलींनी फार बोलायचं नसतं  . शास्त्र अस्ताय ते ……  बऱ्याच साधेपणानं कार्यक्रम झाला.निघताना आम्ही काय ते कळवू असे कोणीच कोणाला म्हटले नाही.

तिथून येताना या मुलाच्या घराजवळ आमचे एक जोशी नावाचे काका ओळखीचे होते.एक म्हणजे चौकशी पण होईल आणि उद्या मुलीशी बोलून तुला सांगतो असे ठरवून त्यांच्याकडे निरोप देऊन आम्ही घरी आलो.

घरी आधी रुमालाने दगा दिला आणि म्हणून मला काहीच कळू शकले नाही म्हणून बाबा चिडले होते.आणि मुला ने काहीच प्रश्न विचारले नाहीत म्हणजे नकार असणार हे आईनी पक्कं केलं होतं. पण मला मुलगा मनापासून आवडला होता. बाबांनी त्या जोशी काका ना आमचा होकार सांगितला फोन करून.नेमके त्याच दिवशी त्यांचे वडील आजारी झाले आणि त्यामुळे जोशी त्या मुलाकडे आमचा होकार न कळवताच गावाला गेले.

मुलाकडे आम्ही काहीच निरोप न दिल्याने मुलीकडून नकार असेल असे ते समजून गेले.मध्ये ३ दिवस गेले . कोणाचा च कोणाला काही निरोप नसल्याने हा विषय थांबला.

माझा मात्र संयम सुटत चालला होता. मी ठरवले की किमान नकार तर येऊ देत म्हणून मी मुलाच्या घरी फोन केला.मुलाच्या आईने फोन घेतला.मी वेगळं नाव ,मुलीचे नाव शिक्षण सांगितले.कधी येऊ आम्ही मुलीला घेऊन असे विचारले.तर तुम्ही २ दिवसांनी या.असे त्या बोलल्या.म्हणजे आम्हाला नकार होता हे ओघाने आलेच पण प्रयत्न सोडला नाही दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी फोन केला .मुलीचे नाव मधुरा आहे. लेले आडनाव आहे. आम्हाला पत्रिका बघायची आहे.तर ऊद्या येऊ का.आणि आम्ही बाहेर गावचे आहोत.सो नकार असेल तरी लगेच सांगा.म्हणजे आम्ही इथली पुढची मुलं बघू.तरी मुलाची आई ही हो हो करत होती.आपण परवा भेटू असे सांगून मुलाच्या आईने फोन ठेवला.आता मात्र मला रडू यायला लागले.

शेवटचा प्रयत्न करून बघू म्हणून मी रात्री ८ ला फोन केला.अपेक्षा अशी होती की ,,तो,, फोन घेईल.तर पुन्हा आईसाहेब च फोन वर.मग मी उगीच तुमच्या इथले जोशी आहेत ना त्यांचे आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. मुलगी पुण्यात असते आणि आम्ही दोघे नगरला असतो.आणि काहीतरी नाव ठोकून दिलं. पण परिणाम चांगला झाला ,लगेच त्याच दिवशी मुलाच्या आईसाहेब तिथल्या जोशी काकांच्याकडे गेल्या आणि ८ वाजता जो फोन केला त्यांची तुम्हाला काय माहिती आहे.आणि ते तुमच्या कशा ओळखीचे हे विचारू लागल्या तेव्हा ते म्हणाले, की मी नाही ओळखत कोण सांगताय त्यांना.त्या आधी जे अमुक तमुक होते, ते माझ्या परिचयाचे आहेत. मग माझ्या बाबांचे नाव सांगितले,तेव्हा ते म्हणाले की  दुसऱ्या  दिवशीच ते होकार सांगून गेले होते पण मी नेमका गावाला गेलो आणि निरोप देणे राहिले.

आता सगळी चक्र फिरली मग मुलाच्या वडलांचा आमच्या घरी फोन आला की जरा निरोपाचा गोंधळ झाल्याने आम्हाला काही समजले नाही. मुलाला पण  मुलगी आवडली आहे तर एकदा भेटू.

एकदा कशाला मी तर माळ घेऊनच तयार होते.तरी शक्य तितके नम्र भाव ठेवून मी ‘तुम्ही म्हणाल तसं …’ असलं काही तरी उत्तर दिलं.

दुसऱ्याच दिवशी मुलाकडे गेलो .मला तर आपण काय भारी काम केलं याचा फील होता.पण मुलाची आई मात्र ,माझ्या आईला ,,अहो याचा की नाही जबरदस्त योग होताच लग्न ठरायचा .कित्ती फोन आले तुम्ही येऊन गेलात तेव्हापासून आणि माझ्याकडे बघत मीच सांगितलेली नावं आणि माहिती  सांगू लागल्या. मला किती हसू आणि किती नको असं झालं. पण आमच्या स्मार्ट फादरांच्या लक्षात आले.त्यांनी घरी आल्यावर विचारलं की काय आहे भानगड? मग मी सगळं खरं काय घडलं ते बाबांना आणि आईला सांगून माफीसुद्धा मागितली.

याच मुलाशी पुढे लग्न झाल्यावर त्यालासुध्दा सगळं सांगून टाकलं. त्याची तर हसून हसून पुरती वाट लागली. त्यानंतर सुद्धा सासूबाई हा किस्सा पुन्हा पुन्हा सांगत असत आणि कित्ती हो डिमांड होता तुमच्या मुलाला म्हणून मी कौतुक करत असे .आणि नंतर जाम हसत असे.  

विशेष टिप्पणी –

सून झाल्यावर काही दिवसांनी सासूबाई आणि सासरे यांना माझा हा कारभार सांगितला. सासरे खूप हसले पण सासूबाई मात्र जरा चिडल्या.( पुढे  मात्र सगळे गोष्टीत सांगतात त्या प्रमाणे आम्ही सुखाने राहू लागलो.)

लेखिका –  सुश्री अनिता मेहेंदळे

संग्राहिका –  सुश्री पार्वती नागमोती

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “सात कुलुपे आणि चावी” – श्री कमलेश भारतीय ☆ (भावानुवाद) सौ. गौरी सुभाष गाडेकर☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ सात कुलुपे आणि चावी – श्री कमलेश भारतीय ☆ (भावानुवाद) सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

श्री कमलेश भारतीय

मूळ हिंदी कथा 👉 “सात ताले और चाबी”

“ए मुली, तू कुठे आहेस?”

“सात कुलुपांत बंद.”

“काय? कुठली कुलुपं?”

“पहिलं कुलूप – आईच्या गर्भावरचं. मुश्किलीने ते तोडून जीवन मिळवलं.”

“दुसरं?”

“भावाबरोबरचं प्रेमाचं कुलूप. मुलगा लाडका. आणि मुलगी म्हणजे आईवडिलांची, कुटुंबाची विवशता.”

“तिसरं कुलूप?”

“शिक्षणाच्या दारांवरची कुलुपं -माझ्यासाठी.”

“पुढे?”

“माझ्या रंगीबेरंगी, सुंदरसुंदर कपड्यांवरही कुलुपं.हे नाही घालायचं, ते नाही नेसायचं. घरंदाज मुलींसारखी राहत जा. असे कपडे घालतात मुली?”

“आणि मग?”

“समाजाच्या नजरांचे पहारे. चालते कशी? जाते कुठे?असं का करते? तसं का करते?”

“आणखी?”

“गायीसारखं ढकलून लावलेलं लग्न. माझ्या पसंतीवर कुलुपंच कुलुपं. चुपचाप सांगतील, त्याच्याशी लग्न कर.आणि आमचा पिच्छा सोड.”

“अजून?”

“पत्नी झाल्यावरही कुलुपंच कुलुपं. हे नको करूस. ते नको करूस. माझे पंख व माझ्या स्वप्नांना कुलुपं. कोणतीही झेप घेऊ शकत नाही. बंधनंच बंधनं.”

“आता आहेस कुठे?”

“सात कुलुपात बंद.”

“ही कुलुपं लावली कोणी?”

“सांगितलं ना.ज्याला ज्याला शक्य झालं, त्याने त्याने लावली.”

“उघडणार कोण?”

“मीच उघडणार. दुसरं कोण?”

☆ ☆ ☆ ☆ ☆

मूळ हिंदी कथा – “सात ताले और चाबी” – मूळ लेखक – श्री कमलेश भारतीय  

भावानुवाद –  सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ इस्तू आणि पदर – ☆ प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके ☆

? जीवनरंग ❤️

☆ इस्तू आणि पदर – ☆ प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके ☆

“चल बास झालं गं आता!” आपल्या बारा-तेरा वर्षांच्या लेकीचे, नलिनीचे केस विंचरत बसलेल्या कांताबाईंनी म्हटलं आणि फणी बाजूला ठेवली. नलिनी उठून तोंड धुवायला मोरीपाशी गेली. स्वत:च्या केसांमधून मोजून तीन-चार वेळा घाई-घाईत फणी फिरवून कांताबाई उठल्या, दोन्ही हात खसाखसा स्वच्छ धुतले. “मी एवढं पापड देऊन येते मेसमध्ये. तोवर तू भाजी फोडणीला टाकशील का?” त्यांनी पिशवीत पापडांची चवड भरता भरता नलूला विचारलं.

“आई, येताना मेस मधूनच काहीतरी भाजी घेऊन ये की चवदार एखादी!” नलूने उत्तरासोबत पर्यायही सांगितला तशा कांताबाई म्हणाल्या, ”आज तुझ्या आवडीचा आंबट चुका असेल मेसमध्ये!” यावर नलू आराशात बघतानाच ओरडली….. “मी करते कांदा-बटाटा किंवा बटाटा-कांदा, किंवा दोन्ही मिक्स!” आणि यावर दोघी मायलेकी मनमुराद हसल्या! नलूला आंबट भाजी अजिबात आवडत नसे. आज घरी कुणी पाहुणे येणार होते, ते नलूला समजलं होतं, त्यामुळे आईने आज जरा बरी चवदार भाजी करावी, असं नलूला वाटून गेलं होतं.

एका वस्तीत राहणाऱ्या कांताबाईंचे यजमान शेजाऱ्याशी झालेल्या किरकोळ भांडणात हकनाक जीवाला मुकले. नलू त्यावेळी पाच वर्षांची होती. कुठंही जा, मुलीवर असा प्रसंग येणं हे माहेरच्यासाठी बरीचशी अडचणींची स्थिती असते. माहेरी भावजया आलेल्या असतात,आई-वडिलांच्या आर्थिक बोलण्याला कमी किंमत असते आणि भावांना त्यांचा वाढता संसार पेलायचा असतो. त्यामुळे माहेरी जाऊन राहण्याच्या विचारांचा दोरखंड कांताबाईंनी लगेचच कापून टाकला होता. 

यजमानाच्या घरी, म्हणजे कांताबाईंचे सासर, आधीच दुष्काळाच्या योगानं गाव सोडून मुंबईच्या झोपडपट्टीत जाऊन राहिलेलं, त्यामुळे दिवसा-कार्याला आलेली सासरची आणि माहेरची मंडळी, ”काही लागलं तर सांग!” एवढं म्हणण्यापेक्षा जास्त काही म्हणूही शकत नव्हती आणि देऊही शकत नव्हती. आणि कांताबाईंना कुणाकडे काही मागण्याचा सरावही नव्हता!

पंधरवडा-महिन्यातच कांताबाई आपल्या पाच वर्षांच्या नलूला घेऊन या दुसऱ्या वस्तीतल्या लहान खोपटात रहायला आल्या होत्या. खोपटं लहान म्हणून भाडंही कमी होतं, पण म्हणून वस्तीपातळीवरच्या अडचणी कमी नव्हत्या.

एवढ्याशा पोरीला कुणाच्या भरवशावर घरी टाकून बाहेर कामावर तरी कसं जाणार बाईमाणूस? म्हणून मग कांताबाईंनी पोरीला सोबत येऊ देतील अशा घरांत धुण्या-भांड्यांची कामं पत्करली. सदैव सावचित्त असलेल्या कांताबाई कामाच्या ठिकाणच्या घरांतील पुरूषांशी जेवढ्यास-तेवढ्या वागत-बोलत असत. कुणी काही म्हटलं की म्हणायच्या, “जग खूप चांगलं असेल हो खूप. पण आपल्याच वाट्याला एखादा इस्तू आला तर करायचं काय? त्यापेक्षा कुणी चढेल म्हणो, शिष्ट म्हणो… आपण आपलं खाली मान घालून कामाशी काम ठेवलेलं बरं.”

इस्तू म्हणजे विस्तव…निखारा! आणि याच वास्तवाच्या विस्तवाचा चटका कांताबाईंनी त्यांच्या सावत्रबापाकडून सोसला होता!

पुढं घरच्या घरी मसाले, पापड करून देण्याचं काम मिळालं. आता नलू दुसऱ्यांच्या नाही तर आपल्या आईच्या घरी, तिच्या नजरेसमोर राहणार होती. नलू पाटी-पेंसिल आणि पोळपाट-लाटणं या दोन्ही आयुधांमध्ये लवकरच तरबेज झाली. शाळेत जाताना मस्तपैकी चटणी-रोल तिचा ती करुन घेऊन जाई.

मेसमध्ये जाताना नलूला सायकलवर बसवून शाळेत सोडणे आणि तिला शाळेत स्वत जाऊन घेऊन येणे, हे तत्व कांताबाईंनी कितीही त्रास झाला तरी पाळले होते. कांताबाईंना सायकल फक्त एकाच प्रकारे चांगली चालवता यायची….. खाली उतरून! नंतर नलू त्यांच्यापेक्षा चांगली सायकल चालवू लागली. पण वस्तीच्या उतारावरून नलूला सायकल चालवण्याची परवानगी नव्हती.  

वस्तीतल्या इतर अनेक मुली इतर मुलींच्या पालकांच्या दुचाक्यांवर तिघी-तिघी बसून जायच्या. नंतर काहींनी रिक्षा लावल्या. पण कांताबाईंनी त्यांची सायकल सोडली नाही. थोडक्यात, वस्तीजवळच्या सोसायटीमधल्या एखादी ‘मम्मी’  आपल्या मुलीबाबतीत जेवढ्या ‘काळजीवाहू’ असेल तेवढ्याच काळजीवाहू कांताबाई सुद्धा होत्या!

अशीच आठ-नऊ वर्षे आणि कांताबाईंच्या काळजाच्या वहीतील पानेही उलटून गेली. फक्त या पानांवर काळजी तेवढी कायम होती. नलूला नेमकं किती शिकवायचं याचा हिशेब त्यांच्या मनात पक्का होता. बारावी संपेपर्यंत अठरा वर्षे पूर्ण होतात मुलांना. नलू दहावीला असतानाच नात्या-गोत्यातल्या एखादा मुलगा नजरेसमोर ठेवायचा आणि वेळप्रसंग आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील तारीख पाहून अक्षता टाकायच्या, हा त्यांचा बेत.

पण कसं कुणास ठाऊक, कांताबाईंच्या मनाच्या वाळलेल्या पाचोळ्यावर कुठूनशी ओल्या थेंबांची टपटप वाजली. तिच्या गावाकडचा गहिनी तिच्या मेसमध्ये जेवताना दिसला तिला अचानक. पापड देण्यासाठी गेलेल्या कांताबाईला त्याने पहिल्याच नजरेत ओळखलं. ‘इथंच आलोय कायमचा रहायला, एका साहेबांच्या गाडीवर ड्रायवरचं काम लागलंय, त्यांच्याच बंगल्यात रहायची सोय होणार आहे’, असं काहीबाही सांगत होता तो. मात्र सोबत कोण राहतं याबद्दल अवाक्षर नाही.

तसा गहिनी कांताबाईंच्या शाळेत एक दोन वर्षे पुढच्या वर्गात होता. होता म्हणजे फक्त शाळेत यायचा म्हणून होता म्हणायचं.

आपण कुठं राहतो हे आपण याला नाही सांगितलं तरी त्याला ते मेस मधून आज ना उद्या समजणारच होतं म्हणून कांताबाईंनी त्याला आपल्या वस्तीतला पत्ताही मोघमपणे सांगितला. दोघांचा जाण्या-येण्याचा रस्ता एक पडला. एकदा तर त्याने घाईघाईने चालत निघलेल्या कांताबाईंना चक्क त्याच्या मोटारीतून मेसपर्यंत लिफ्टही देऊ केली होती. पण कांताबाईंनी ते टाळले होते. 

एके दिवशी गहिनीने कांताबाईंना रस्त्यावर गाठून थेट लग्नाचीच मागणी घातली. कांताबाई बावरून गेल्या. त्याने पहिली बायको सोडली होती आणि त्याची चौदा वर्षांची पोरगी त्याची बायको सोबत घेऊन गेल्याचं त्यानं लपवलं नाही.

गहिनील्या शाळेत असताना आपण आवडत असू, हे त्यांना ठाऊक होतं. पण त्याला आवडणाऱ्या आपण काही एकमेव नव्हतो, हे ही त्या लहान वयात सुद्धा जाणून होत्या. आणि आता ही अवचित मागणी ऐकून सुरूवातीला गांगरलेल्या कांताबाई लगेचच सावरल्या. “एक मुलगी आहे पदरात. तिच्यासह मला स्विकारावं लागेल!” त्यांनी आपली महत्त्वाची अट सांगितली आणि गहिनी पटकन हो म्हणाला. “अगं,माझी पोरगी सुद्धा तुझ्याच मुलीच्या वयाची आहे की!”

कांताबाईंच्या एका साहेबांनी अगदी म्हातारपणी लग्नगाठ बांधल्याची आठवण कांताबाईंच्या मनात होतीच. पण हे असं मोठ्या लोकांच्यात चालतं, अशी त्यांची समजूत.

नाही म्हणायला, कांताबाईंच्या एका वयस्कर मालकीण बाईंनी ‘एकटं राहू नकोस!’ असा प्रेमाचा सल्लाही दिलेला त्यांना आठवला. त्या बाईंनी ‘पुनर्विवाह’ असा शब्द उच्चारलेला, पण कांताबाईंना तो ‘पूर्ण विवाह’ असा ऐकला होता! “हो,बाई, विवाह करायचा म्हणजे पूर्णच केला पाहिजे की!” असंही त्यांना कांताबाई म्हणून गेल्या होत्या. आणि मग चूक लक्षात आल्यावर हसल्याही होत्या.

गहिनी एका दिवशी संध्याकाळी थोडा उशीर करूनच कांताबाईंच्या घरी आला. सोबत त्याच्या नात्यातली एक बाई होती… जी कांताबाईंच्याही दूरच्या नात्यातली असावी. नलू काही आणायला गल्लीतल्या किराणा दुकानात गेलेली होती.

गहिनी आत आला. हातातली पिशवी खाली ठेवली. पिशवीत बहुदा काही खायला आणलेलं असावं. एक पातळासारखं पॅंकिंगही होतं सोबत.  गहिनी आणि सोबतची बाई, कांताबाईंनी टाकलेल्या चादरीवर बसले. त्यांची नजर घरभर भिरभिरती होती. कांताबाईच्या नवऱ्याच्या मळकट फोटोकडे गहिनीने एक ओझरती नजर टाकली.

कांताबाईंनी घरातल्या कंदिलाची वात जराशी मोठी केली. काल पासून वीज गायब होती तिच्या घरातली. तेवढ्यात नलू दुकानातून परतली आणि घरात अनोळखी माणूस पाहून दारातच थबकली.

घरातल्या कंदिलाच्या उजेडाने दारात उभ्या असलेल्या नलिनीची अंधारी बाह्य आकृतीच गहिनीला दिसत होती. त्याने त्या अंधारातूनही नलिनीकडे पाहिले आणि पहात राहिला.

कांताबाईंनी गहिनीच्या डोळ्यांकडे पाहिले आणि तिला तिच्या सावत्र वडिलांचे डोळे आठवले. “नलू, अगं परत दुकानात जा. तीन किलो जवारी दे म्हणावं भैय्याला. आणि तशीच मागच्या गिरणीत उभं राहून दळूनच आण….जा!” असं म्हणून कांताबाईंनी नलूला परत पिटाळलं! पाहुणे बहुदा आज जेवायला घरी थांबणार असा नलूने अंदाज बांधला.

“गहिनी, विचार बदललाय मी. ह्या पोरीचं नीट सगळं बयजवार झाल्याशिवाय मी काही दुसऱ्या घरोब्याचा विचार करणार नाही”

हे ऐकून गहिनी आल्यापावली निघून गेला. कांताला याही वेळी कितीही पटवलं तरी ती ऐकणार नाही याची त्याला खात्रीच होती.

अर्ध्या-पाऊण तासाने नलू परतली. घरात मघाशी आलेला पाहुणा नव्हता. “गेले होय पाहुणे?” 

“नले, तुझं लगीन झाल्यावर तु मला तुझ्या सोबत तुझ्या घरी ठेवशील का गं म्हातारपणी?” कांताबाईंनी भाकरी करायला घेता-घेता नलूला विचारलं आणि डाव्या हातानं चुलीतून एक निखारा बाहेर ओढला…जरा जास्त पेटला होता म्हणून. भाकरी करपली असती.

तिच्या बोटांना तो विस्तव थोडासा भाजला तेंव्हा ती बोटं, भाकरी मळण्यासाठी घेतलेल्या पाण्याच्या लोटीत चटकन बुडवली. “आत्ता भाजला असता बघ इस्तू! आणि पदरावर पडला असता तर मोठा भोसका पडला असता!”  

आपल्या लग्नाच्या आणि आईला घरात ठेवून घेण्याच्या प्रश्नावर नलू म्हणाली, “आई, अगं अशी काय बोलतीयेस… आपण आपला घरजावईच बघू….!”

यावर दोघीही हसल्या. कांताबाईंनी चुलीत जोरात फुंकर घातली आणि त्या प्रकाशात दोघा माय-लेकींचे चेहरे उजळून निघाले!.

लेखक – श्री संभाजी बबन गायके

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आता ती बघू शकेल. – भाग 2… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ आता ती बघू शकेल. – भाग १… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

 (मागील भागात आपण पाहिले –  प्रसादची आई म्हणाली ताई मला माहित्येय तुम्हाला काय विचारायचे आहे. मीच सांगते. तुम्हाला असं वाटतं ना प्रसाद आरती सारख्या आंधळ्या पोरीशी का लग्न केले आणि ती फोटो कसे बघू शकेल? आर्यनच्या आईनं होकारार्थी मान डोलावली. – आता इथून पुढे )

ताई, मी एका गरीब शेतमजुराची मुलगी आहे, माझ्या आई बापाने घरची थोडीफार शेती असलेल्या घरात माझे लग्न लावून दिले होते. घरची शेती काही फार जास्त नव्हती , पण खाऊन पिऊन सुखी होतो एवढंच. लग्नानंतर चार महिन्यांनी  शेजारच्या शेतकऱ्याने शेताच्या बांधावरून  भांडण उकरून काढले. भांडण एव्हढे विकोपाला गेले की शेजाऱ्यांनी रागात प्रसादच्या बाबांच्या डोळ्यात विषारी कीटक नाशक ओतले. खूप दवाखाने केले. डॉक्टर केले. पण त्यांचे डोळे गेले ते कायमचेच.’ आर्यनच्या आईच्या तोंडातून ‘आई ग , कीती निर्दयी आणि अमानुष’ असे उद्गार निघाले.

‘आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते, प्रसादच्या बाबांचे डोळे जाऊन आणि त्यांचा इलाज करण्यात दोन महिने गेले होते. लग्नानंतर सहाव्या महिन्यात मला पाळी आली तेव्हा, प्रसादचे बाबा बोलले, माझं आयुष्य तर आता अंधारात जाईल, आपल्याला मूलबाळ झालं नाही. तुला मी काडीमोड देतो, तुझे दुसरे लग्न झाले तर तू तरी सुखी राहशील. कशाला माझ्या आंधळ्या सोबत आयुष्याची नासाडी करतेस मला सांभाळत राहून?’ त्यावेळी मी ठाम राहिले त्यांनी माझ्या सुखासाठी मनापासून घेतलेल्या निर्णयाचा मला अभिमान वाटला आणि मी त्यांचा निर्णय नाकारला. घरातल्या शेतीची सगळी सूत्र मी हाती घेऊन संसार करू लागले. एक वर्षाने आम्हाला प्रसाद झाला पण वयाच्या नवव्या वर्षी त्याचा एक डोळा गेला. त्यावेळी खूप खचायला झाले पण प्रसादच्या आंधळ्या बाबांनी धीर दिला. माझे दोन डोळे गेलेत त्याचा एक तरी आहे ना, माझ्यावेळी हार नाहीं मानलीस मग आता का खचून जातेस?’

प्रसाद अभ्यासात हुशार होता, अभ्यास आणि शेती करता करता तो बँकांच्या आणि सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा देत होता. दीव्यांग कोट्यातून त्याला बँकेत चांगली नोकरी लागली. आता वर्षभरापूर्वी प्रसादचे बाबा वारले. वर्षभरात त्याचे लग्न करायचे म्हणून त्याच्यासाठी मुली बघायला लागलो. प्रसादला एक डोळा नाही म्हणून कधी मुलगी तर कधी मुलीचा बाप नकार देऊ लागला. कोणी कोणी तर मुलीच दाखवत नव्हते. जवळपास वीस एक ठिकाणी नकार आला होता.

आर्यनच्या आईने विचारले, मग आरती सोबत कसं काय लग्न जुळलं?

ही माझी सून आहे ना आरती ती आमच्याच गावातली. प्रसादच्या बाबांच्या डोळयात विषारी औषध ज्या माणसाने टाकले होते, त्याच माणसाची पोरगी आहे ही आरती. आरतीचा बाप जेल मधुन सुटून आल्यावर प्रसादच्या मागे चार वर्षांनी झाली होती त्यांना. जेव्हा त्याला कळले की त्यांची पोरगी जन्मजात आंधळी आहे, तेव्हा तो रडत रडत प्रसादच्या बाबांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायला आला. ‘दादा मी चुकलो देवाच्या काठीला आवाज नसतो मला माफ करा, देवानेच मला शिक्षा केली.’

गेल्या महिन्यात प्रसादला मुलगी बघायला आम्ही ज्या बसने तालुक्याच्या गावात चाललो होतो, त्या बस मध्ये आरती पण होती. आरतीचे देखणे आणि सुंदर रूप बघून बसमधील बाया, बाई ग, एव्हढी देखणी पोरं पण दिसत नाही तिला, कसं हीचं लग्न व्हायचं? हिला पण कोणीतरी आंधळाच मिळणार अस एकमेकींशी पुटपुटत होत्या.

तालुक्याच्या गावी ज्या मुलीला बघितलं तिने तिथेच नकार दिला, मी बिन लग्नाची राहीन पण या एक डोळ्याशी लग्न नाही करणार.’ ती म्हणाली होती.  तेव्हापासून प्रसाद ने डोळ्यावर चष्मा लावायचे सोडून दिले. बस मधील बायकांची कुजबुज त्याने पण ऐकली होती.           

घरी आल्यावर त्याने मला विचारले, आई आरतीला तुझी सून केली तर चालेल का? मी त्याला म्हणाले, माझा संसार झाला करून. तुझे तू ठरव. मी तुझ्यासोबत आहे.’

आरतीच्या  बापाला निरोप पाठवल्यावर तो पुन्हा घरी आला आणि आधीच मेलेल्याला अजून मारू नका म्हणू लागला. पण त्याला प्रसादने समजावले.

तुमची परिस्थिती नव्हती तशी आमचीसुद्धा परिस्थीती नव्हती म्हणून माझ्या बाबांना आणि तुमच्या आरतीला बघता आले नाही. पण आता मला चांगली नोकरी आहे, आज ना उद्या परिस्थीती सुधारेल. खुप लोकं नेत्रदान करतात, आपण आरतीसाठी बघू या कोणा दुसऱ्याचे डोळे मिळतात का? मला दोन डोळे असते तर माझाच एक तिला दिला असता. मीच कशाला माझ्या आईनेदेखील बाबांना दिला असता पण जग एवढं पुढे गेले हे माहितीही नव्हतं आणि माहिती असून ऐपत सुद्धा नव्हती. आता दोन महिन्यांपूर्वीच आमचे दोघांचे लग्न झाले. आम्ही गावाकडून मुंबईतल्या मोठ्या डोळ्यांच्या दवाखान्यात आलो होतो. आनंदाची गोष्ट अशी आहे की आरतीला बघता येणार आहे. दुपारपर्यंत दवाखान्यातले सगळं आटोपले म्हणून या लहानशा बोटीतून मांडवा की काय तिथं जाऊन पुन्हा याच बोटीने परत मुंबईला फिरणार. पुन्हा कधी समुद्र बघायला मिळेल की नाही म्हणून आजच साधली संधी.

हे सर्व ऐकताना आर्यनची आई अवाक झाली होती. न राहवून तिने प्रसादच्या आईला विचारले, ‘पण काकी आरतीसाठी नेत्रदान कोण करणार आहे? तिला कोणाचे डोळे लावणार आहेत? अवयव दान ही खुप खुप गुंतागुंतीची, खर्चिक आणि कायदेशीर पद्धतीने करायची प्रक्रिया आहे ना?’

प्रसादची आई म्हणाली, लग्न ठरल्या ठरल्या प्रसादने सगळी माहिती काढली होती, कोणी मृत्यूपूर्वी नेत्रदान केले असेल तर मिळतील असं काहीबाही तो सांगायचा. मी म्हटलं जिवंत असताना कोणी नाही का नेत्रदान करू शकत. मी माझा एक डोळा दिला तर नाही का चालणार? सुरवातीला तो नाही म्हणाला होता पण नंतर त्याला आणि मला डॉक्टरांनी तुम्ही म्हणताय तसे समजावले, कोणाचाही अवयव  कोणालाही सहजपणे नाही देता येत , रक्तगट , तो अवयव ज्याला द्यायचा आहे त्याचे शरीर ते स्वीकारू शकते का. अवयव दान करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य आणि वय हे अवयव दान करण्यासाठी योग्य आहे का, हे सगळे बघावे लागते.

आरतीचे बाबा पण डॉक्टर सांगत होते ते सगळं ऐकत होते. त्यांनी स्वतःहून पुढे होऊन सांगितले माझा आणि आरतीचा रक्तगट एकच आहे, तुम्हाला लागतील त्या सगळ्या चाचण्या करा पण माझाच डोळा माझ्या लेकीला द्या. माझ्या कर्माचे प्रायश्चित्त भोगल्याचे समाधान तरी मला लाभेल. डॉक्टरांनी आरतीच्या बाबांचे म्हणणे ऐकले आणि तशा चाचण्या करायला सांगितले. ते म्हणाले मी हॉस्पिटलमध्ये थांबतो तुम्ही आलाच आहात तर फिरून या कुठेतरी. या बोटीत बसण्यापूर्वी त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की चाचण्या पाहिजे तशा आलेल्या आहेत. डॉक्टरांनी कायदेशीर प्रक्रियांची तयारी करायला सांगितले आहे.

आर्यनची आई हे सर्व ऐकून निःशब्द झाली. तिला काय बोलावे हेच बराच वेळ सुचत नव्हते.

क्षुल्लक कारणावरून अमानुषपणे वागणारी आरतीच्या बापासारखी माणसं ज्यांना नंतर पश्र्चाताप सुद्धा होतो, अशा माणसांना मोठ्या मनाने माफ करणारे प्रसादचे आई बाबा , प्रसाद सारखा उच्च विचारसरणी असलेला तरुण. राहणीमानाने साधारण आणि भोळे असलेले पण मनाने सधन असणारे शेतकरी जमिनीत बियाणे रुजवून नुसते अन्नधान्यच पिकवत नाहीत तर लाखमोलाचे विचार सुद्धा समाजात रुजवतात.

– समाप्त –

लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनिअर, कोन, भिवंडी ठाणे

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आता ती बघू शकेल. – भाग १… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? जीवनरंग ❤️

☆ आता ती बघू शकेल. – भाग १… लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

गेट वे ऑफ इंडिया हून मांडव्याला जायला संध्याकाळी साडे चार वाजता लाँच निघाली होती. तीच लाँच मांडव्याहून परतीच्या मार्गाला संध्याकाळी सहा वाजता निघणार होती.   लाँच मध्ये फारशी गर्दी नव्हती, सगळे प्रवासी ऐसपैस आणि पाहिजे तिथं बसले होते. इकडून तिकडे जागा बदलत होते. पहिल्यांदा प्रवास करणारे मागे पडलेल्या मुंबईकडे बघून, नाहीतर समोर दिसणारी मोठमोठी जहाजे जसजशी जवळ येत होती तस तसे त्यांच्या प्रचंड आकारमानाकडे बघून अचंबित होत होती.

हजारो कंटेनर घेऊन जाणारे एक विशाल महाकाय जहाज जे एन पी टी मधुन निघून खोल समुद्राच्या दिशेने निघाले होते. लाँचला आडवे जाणाऱ्या जहाजाला जाऊ देण्याकरिता लाँचचा स्पीड कमी करण्यासाठी लाँच च्या सारंगा ने खाली इंजिन रुम मध्ये बांधलेल्या घंटेची दोरी वाजवून खालच्या डेकवरील खलाशाला सूचना दिली. त्याने इंजिनचा आर पी एम कमी केला आणि लाँच काही वेळ पुढे न जाता जागेवर थांबली. माचीस बॉक्स एकावर एक ठेवले जावेत तसे हजारो कंटेनर एकमेकांवर लादून ते महाकाय जहाज एखाद्या ऐरावताप्रमाणे ऐटीत समुद्राला कापत पुढल्या सफरीला निघाले होते. जहाजाच्या पाठीमागे समुद्राच्या लाटांना कापून लघुकोनात निघून दोन लाटा एकमेकांपासून दूर जात होत्या. एक लाट लाँचच्या दिशेने आली आणि लाँचला हेलकावून निघून गेली.

सारंग ने पुन्हा एकदा दोरी ओढून घंटा वाजवली आणि खलाशाने इंजिनच्या आर पी एम ला पूर्ववत करून लाँचचा स्पीड वाढवला.

सगळ्यांच्या नजरा कंटेनर घेऊन जाणाऱ्या त्या महाकाय जहाजाकडे लागल्या होत्या. काही वेळाने जसजशी मुंबई आणि मोठं मोठी जहाजे मागे गेली तसं प्रत्येकजण स्वस्थपणे बसून समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत निवांत बसले.

लाँच मध्ये एक पंचविशीतील तरुण जोडपं बसलं होतं. त्यांचं नवीनच लग्न झालेलं असावं कारण त्यांच्या अंगावरची हळद अजूनही उतरली नव्हती. त्यातल्या तरुणाला फक्त एकच डोळा होता,  त्याला दुसरा डोळाच नव्हता, खोबणीत डोळा नसल्याने खाच पडलेली होती. त्याच्या बायकोने गॉगल घातला होता आणि ती त्याला खेटूनच बसली होती. लाँच मधील जवळपास सगळ्यांचेच त्याच्याकडे लक्ष जात होते.  त्याला पण  सगळ्यांच्या त्यांच्याकडे बघणाऱ्या नजरा दिसत होत्या. बऱ्याच जणांच्या मनात आले की ह्या तरुणाने त्याच्या बायकोने  घातलाय  तसा काळा चष्मा किंवा गॉगल का नाही लावला. त्याचा नसलेला डोळा निदान गॉगलच्या आड लपला तरी असता.

समोर बसलेल्या एका आठ नऊ वर्षांच्या लहान मुलाने  तर त्याच्याकडे बघुन त्यांच्या आईला विचारत होती, आई त्या अंकलचा एक डोळा कुठे आहे. त्याच्या आईने त्याला सांगितले त्यांना एक डोळा नाहीये, पण दुसरा तर आहे ना.

तेवढ्यात तो तरुण त्या मुलाला म्हणाला बाळा तुझे नांव काय, मुलाने त्याचे नांव आर्यन सांगितले.

‘बरं आर्यन, माझा एक डोळा ना मी तुझ्याएवढा असताना एका अपघातात गेला. मी खेळताना रस्त्याच्या कडेला जमिनीत उभ्या केलेल्या लोखंडी सळई वर पडलो.  नशीब सळई डोळ्यातून आरपार जाऊन माझ्या डोक्याच्या आरपार नाही निघाली.

आर्यनने त्याला विचारले, ‘मग अंकल तुम्हाला एका डोळ्याने सगळं दिसतं का’ 

त्यावर तो म्हणाला, ‘आर्यन माझे नांव प्रसाद आहे, मला तू प्रसाद अंकल म्हणून हाक मार. मला एका डोळ्याने दिसतं पण एका डोळ्याने कसे दिसते ते बघायचे आहे का तुला?’ आर्यनने उत्सुकतेने ‘हो’ म्हटले. 

प्रसाद ने त्याला रुमाल आहे का विचारले, त्याने माझ्याकडे नाही पण आईचा आहे सांगितले आणि आईकडून रुमाल मागून प्रसादकडे दिला. प्रसादने रुमालाची घडी घालून आर्यनच्या एका डोळ्यावर असा बांधला की आर्यनला त्याच्या उघड्या असलेल्या एकाच डोळ्यातून दिसू शकेल. प्रसादने त्याला विचारले, ‘काय मग आर्यन दिसतं की नाही एका डोळ्याने?’

आर्यन म्हणाला प्रसाद अंकल दिसतंय पण दोन डोळ्यांनी जसं दिसतं तसे नाही दिसत.’

प्रसाद त्याला म्हणाला, ‘माझा अपघात झाल्यावर मलासुद्धा असेच वाटायचे पण हळूहळू सवय झाली. मला एकाच डोळ्यातून सगळं दिसतं आणि आता दोन डोळ्यांनी मला किती दिसायचे हे आठवत सुद्धा नाही.’

‘पण आर्यन तुला माहिती आहे का ही माझ्या बाजूला बसलीय ना माझी बायको तिला तर दोन्हीही डोळ्यांनी दिसत नाही. मला तर नऊ वर्षांचा होईपर्यंत दोन्हीही डोळ्यांनी दिसायचे आणि आता तर निदान एका डोळ्याने  तरी दिसतेय पण हिला तर ती जन्मल्यापासून काहीच दिसत नाही.’

प्रसाद जे सांगत होता ते ऐकून आर्यनच्या, त्याच्या आईच्या आणि आजूबाजूला बसलेल्या इतर सर्वांच्या मनात कालवाकालव झाली. प्रसाद आणि त्याच्या बायकोबद्दल सहानुभूती निर्माण झाली. आर्यन च्या बालमनाला थोडं अचंबित होण्याव्यतिरिक्त  काही प्रश्न निर्माण झाले नाहीत पण त्याच्या आईला आणि शेजारी बसलेल्या जाणत्या व्यक्तींना वाटले की, ह्याला एका डोळ्याने दिसत असूनही जन्मजात आंधळ्या मुलीसोबत याने लग्न का बरं केले असावे?

लाँच हेलकावे खात मांडवा जेट्टीपासून वीस पंचवीस मिनिटांवर आली होती. समुद्रातील सी गल पक्षी लाँच भोवती घिरट्या घालू लागले, लाँच मधील प्रवासी त्यांना वेफर आणि कुरकुरे हवेत भिरकावून खायला देऊ लागले.  सी गल पक्षी हेवेतल्या हवेत ते पकडत क्वचितच एखादा वेफर पाण्यात पडत असे. आर्यन सुद्धा मजा बघत होता, कोणी व्हिडीओ काढत होते तर कोणी फोटो.  सी गल पक्ष्यांना खायला देऊ नका,  जंक फूड त्यांचा आहार नाही अशा सूचनांचे पोस्टर असूनही बरेच प्रवासी त्यांना खायला देण्यासाठी लाँच मधूनच  कुरकुरे आणि वेफर खरेदी करत होते. प्रसादने पलीकडे हाताने इशारा करुन, आईला जवळ बोलावले. प्रसादची आई आली आणि आर्यनच्या आई शेजारी बसली. 

प्रसादच्या आईच्या कपाळावर कुंकू नव्हते, एक साधीशी नऊवारी साडी तिने नेसली होती.  तिचं व्यक्तिमत्व हसरं आणि प्रसन्न होतं. बसताना ती म्हणाली, ‘अरे प्रसाद जा की आरतीला घेऊन, तिचे फोटो काढून घे की मोबाईल मध्ये.’

प्रसाद ने आरतीच्या हाताला धरले आणि तो लाँचच्या मधल्या मोकळ्या जागेकडे जाऊ लागला.

उभं राहिल्यावर अंध आरतीच्या चेहऱ्यावर लाँच हेलकावत असल्याने जशी लाँच समुद्रात तरंगते तशी ती लाँच मध्ये नाही तर हवेत तरंगतेय असे भाव स्पष्टपणे  दिसायला लागले.  डोळेच नाही तर, समुद्र काय आणि त्याच्यावर तरंगतय काय हे कोणी सांगून कसं कळणार पण कदाचित आरती आयुष्यात पहिल्यांदाच तरंगणे अनुभवता होती. प्रसाद तिला आपुलकीने मोकळ्या जागेत हाताला धरून उभा होता.  त्याने आर्यनला बोलावून दोघांचे फोटो काढायला सांगितले.  आर्यनने आनंदाने त्यांच्या दोघांचे खुप फोटो काढले. प्रसाद आरतीला लाँचच्या रेलिंग जवळ घेऊन गेला॰ तिचे दोन्ही हात रेलिंगवर टेकवून तिला म्हणाला आता तूच अनुभव लाँचचे हेलकावणे. आरती समुद्राचा गार वारा आणि लाटांमधून बाहेर पडणारे अनंत तुषार अंगावर पडताना अनुभव होती.

आर्यन आईकडे येऊन म्हणाला की, आई प्रसाद अंकल ने एवढे फोटो काढले पण बिचारी आरती आंटी ते बघूच  नाही ना शकणार!

बाजूला बसलेल्या प्रसादच्या आईने हे ऐकले. ती म्हणाली ‘बाळा, आरती पण बघू शकेल फोटो म्हणून तर मी प्रसादला सांगितले न की फोटो काढ म्हणून. आम्ही पुन्हा समुद्रात फिरायला येऊ किंवा नाही पण इथल्या आठवणी तर राहिल्या पाहिजेत की नाही.’

आर्यनच्या आईने प्रसादच्या आईकडे बघून विचारले, ‘काकी तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का?’

प्रसादची आई म्हणाली ताई मला माहित्येय तुम्हाला काय विचारायचे आहे. मीच सांगते. तुम्हाला असं वाटतं ना प्रसाद आरती सारख्या आंधळ्या पोरीशी का लग्न केले आणि ती फोटो कसे बघू शकेल? आर्यनच्या आईनं होकारार्थी मान डोलावली.

क्रमश: – भाग १

लेखक – श्री प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनिअर, कोन, भिवंडी ठाणे

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अम्मी आणि मम्मी – भाग 3 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ अम्मी आणि मम्मी – भाग 3 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

(मागील भागात आपण पाहिले – पाकिस्तानने कॅ. अभिनंदन ना पकडलं. आता मात्र अगदी हद्द झाली! दोन्ही मुलींच्या घरच्यांनी कडक पावले उचलली. तृपित आणि तहरीमचं एकमेकींशी बोलणं बंद करून टाकलं. कडक आज्ञा दिली गेली, की आपापल्या कामाशी काम  ठेवा, सरळ घरून शाळा आणि शाळा ते घर! एकमेकींशी बोलताना दिसलात, तर तुमचं काही खरं नाही! – आता इथून पुढे)

परिस्थितीच तशी झालेली होती. केंव्हाही युद्ध सुरु होण्याची शक्यता होती. युद्ध तर युद्धच असतं. ते जरी सीमेवर चालू असलं, तरी त्याचा परिणाम त्या देशाच्या प्रत्येक नागरिकावर होत असतो, मग तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात का रहात असेना. मुलींची परिस्थिती फारच वाईट झालेली होती. वर्गात फक्त एकमेकींकडे बघता यायचं, बोलणं शक्य नव्हतं. रिकाम्या डोळ्यांनी अशा बघत असायच्या, की जणू दोघी काळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहेत! तहान भूक सगळं हरपलं होतं दोघींचं. अशा काही चिडीचूप झाल्या होत्या, जसं काही त्यांचा मनमीत त्यांच्यापासून कोणी हिराऊन घेतला होता. त्यांचं हे गुपचूप रहाणं अम्मी आणि मम्मीला व्यवस्थितपणे समजत होतं. पण त्याच्यावर काही उपाय करू शकत नव्हत्या, त्यावर एकच उपाय होता, तो हा, की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंधातील भडकलेल्या आगीवर कुठून तरी थंड पाणी पडावं.

घरांमध्येही तणाव वाढत होता. या दोन्ही देशांच्या बाहेरही, जिथे जिथे या दोन्ही देशातले लोक होते, ते सगळे टी. व्ही. ला चिकटलेले असत. कॅ. अभिनंदनची जेंव्हा पाकिस्तानातून सुटका झाली, तेंव्हा सगळ्यात जास्त आनंद झाला होता, तो मम्मीला. तिच्या स्वतःच्या मुलीच्या मैत्रीसाठी ती आनंदित झाली होती. अभिनंदनचं परत येणं जसं काही तिच्या मुलीची आणि तहरीमची मैत्री वाढवणं होतं. या परतण्याने भडकलेल्या आगीवर थंड पाण्याचा थोडाफार तरी शिडकावा झालेला होता. परंतु, आजीने अजुनही हार मानलेली नव्हती. तहरीमशी मैत्री तोडून टाकण्यासाठी मागेच लागलेली असायची. पाकिस्तान्यांच्या गोष्टी सांगत रहायची – “या लोकांनी आपल्याला असं केलं, तसं केलं.”

तृपितला मात्र समजायचंच नाही, की यात तहरीमचा काय दोष आहे! आणि तिनं स्वतः काय करायला हवं? ती तर तहरीमसाठी जीव पण देऊ शकते. मम्मीला समजायचं, की तृपितच्या मनात काय चाललंय. पण कसं समजावणार तिला, की तहरीम आणि तृपितच्या मधे, अम्मी आणि मम्मीच्या मधे, नुसता हिंदी-उर्दूचा फरक नाही, तर दोन देशांचा फरक आहे, दोन देशातील तिरस्काराचा फरक आहे! एका आईच्या दोन मुलांमधील फरक आहे, जे एकमेकांशी झगडत,लढत एकमेकांच्या जीवावर उठले आहेत.

परंतु, आता ते इथे, तिसऱ्याच देशात होते, जो या दोघांपैकी कोणाचाच नव्हता, तर सगळ्याच देशांचा होता. एक एक करून वेगळं काढलं, तर जगातले सगळेच देश एका शाळेत मिळाले असते. वेगवेगळ्या देशांच्या या स्थानाला, भारत आणि पाकिस्तानची लढाई असो, की इस्त्राईल-पॅलेस्टाईनची लढाई असो काही फरक पडत नव्हता. सगळे आपापसातील तेढ बाजुला सारून एकमेकात मिळून, मिसळून रहायचा प्रयत्न करत असत. शेजारी पाजारी भलेही एकमेकांना ओळखत नसतील, पण कोणी कोणाशी अपमानास्पद पद्धतीने वागत नसत. सगळे आपापले रस्ते निवडून चालत रहात असत.

आज परत तो दिवस आला होता, की तिरस्काराच्या नद्या वाहू लागल्या होत्या. सीमेवर तणाव होता. काकांच्या मरणाची आठवण परत जखम बनून भळभळू लागली होती. हुतात्मा झालेल्या सगळ्या सैनिकांचे मृतदेह आणले जात होते. ज्या लोकांचा दुरान्वयानेही या युद्धाशी संबंध नव्हता, अशा लोकांच्या भावनांशी खेळ चाललेला होता. मुली घाबरून चुपचाप असायच्या. त्यांच्या मैत्रीवर परत एकदा कडक पहारे बसवले गेले होते.

आणि तेंव्हाच एक मोठी दुर्घटना घडली. न्यूयॉर्क शहरातल्या फ्लशिंग हायस्कूलमधे एका माथेफिरूने गोळ्या झाडल्या होत्या. बातमी वाऱ्यासारखी फैलावली. कित्येक पालकांनी शाळेकडे धाव घेतली. आधीच असा सगळा गोंधळ चाललेला असताना तिथेच एक बॉम्बस्फोट झाला. पण तोपर्यंत शाळा रिकामी झालेली होती. पोलिसांचे कडक पहारे लागलेले होते. आपापल्या मुलांचा शोध घेण्याची परवानगी फक्त आई वडिलांनाच दिली जात होती. धावत पळत मम्मी जेंव्हा शाळेत पोचली, तेंव्हा तिथे नुसता धूरच पसरलेला दिसत होता. तो धूर एवढा दाट होता, की लोकांच्या नाका-तोंडात जाऊन लोकांचा खोकून खोकून जीव हैराण होत होता, तरीसुद्धा प्रत्येक जण आपापल्या मुलांना जीव तोडून शोधत होता. कुठून तरी तृपित दिसावी, ती मिळावी या आशेने वेडावून गेलेल्या मम्मीची नजर आपल्या मुलीची एक झलक बघण्यासाठी शोधत होती. तिचे वडीलही आजीला घेऊन तिथे आले होते. सगळं काही ठीक असल्याची एकही खूण नजरेला पडत नव्हती. जिथं बघावं तिथे निराशा पदरात पडत होती. मनात एक अनोळखी भीति होती, जी मुलीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उभे करत होती.

इतरही अनेक पालक आपापल्या मुलांना हाका मारत वेड्यासारखे सर्वत्र धावत होते. जवळ जवळ अर्धा तास मम्मी, तृपितचे वडील आणि आजी तृपितला शोधत होते. शेवटी हार मानून त्या दोघी जोरजोरात हुंदके देऊन रडायला लागल्या, तृपितच्या वडिलांच्या डोळ्यातूनही अश्रू वहायला लागले. आजी जोरजोरात किंचाळून रडत होती, इतक्या जोरात, की त्या बॉम्बस्फोट करणाऱ्यांच्या कानावरही तो आवाज जावा, की या निष्पाप मुलांनी तुमचं काय बिघडवलं होतं? आजी जोरजोरात किंचाळत होती – “माहित आहे मला, हा बॉम्ब माझ्या मुलाच्या खुन्यांनीच फोडला असणार. रक्तपिपासू आहेत हे लोक, माझ्या नातीला पण मारायचं आहे आता ह्यांना!” पण त्या कोलाहलात अश्रू गाळण्याशिवाय कोणाच्या काही लक्षात येत नव्हतं. आणि ही वेळ अशी होती, की कोणीच काही करूही शकत नव्हतं.

धूर, पोलिसांच्या सायरनचा आवाज आणि लोकांचं रडणं! जेंव्हा द्वेषाची आग हसत्या-खेळत्या लोकांचं आयुष्य आपल्या धगीने जाळून, भाजून काढते, असा हा एक अभद्र, काळा दिवस होता. तेवढ्यात समोरून आवाज येऊ लागले. धुराचे ढग थोडे विरळ झाल्याबरोबर समोरचं दृश्य दिसू लागलं. पोलिसांच्या बंदुकांच्या संरक्षणात काही लोक बाहेर येत होते. त्या येणाऱ्या लोकांच्या गर्दीत तहरीमची अम्मी दिसत होती, तिच्या एका बाजूला तहरीम तर दुसऱ्या बाजुला तृपित होती. त्या धुरात अजुनी जमीन दिसत नव्हती की आकाश दिसत नव्हतं, सगळं धूसर-धूसर होतं, सावल्या होत्या आणि दोन्ही मुलींच्या पाठीवर आईचा हात होता. त्या दोघी घाबरून, अम्मीला चिकटून चालत येत होत्या.

तो एक क्षण असा होता, की ना कोणी भारतीय होतं, की ना कोणी पाकिस्तानी, फक्त दहशत होती आणि घाबरलेले लोक होते. एक आई होती, जिचा संबंध ना कुठल्या देशाशी होता, ना कुठल्या सीमेशी! ती फक्त आणि फक्त मुलांची आई होती! एकेका बाजुला तहरीम आणि तृपित होत्या आणि त्यांच्या पाठीवर अम्मीचा हात होता. मंटो यांच्या कथेतील टोबा टेकसिंहचे ते दृश्य जसं काही परत एकदा जिवंत झालेलं होतं, जिथे जमिनीच्या त्या तुकड्यावर कुठल्याही देशाचं नाव नव्हतं. अगदी तसेच इथे अम्मीचे ते हात होते, जे ना भारताचे होते, ना पाकिस्तानचे! हे एका मातेचे हात होते, माता जी मुलांची जननी असते! आपल्या मुली सुरक्षित आहेत हे बघून आज पहिल्यांदाच अम्मी आणि मम्मी एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या. समोर उभ्या असलेल्या आजीच्या डोळ्यातही अश्रू होते, जे तिच्या मनातला द्वेष धुवून टाकण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत असावेत!                                                 

– समाप्त –

मूळ हिंदी कथा – अम्मी और मम्मी – मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अम्मी आणि मम्मी – भाग 2 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ अम्मी आणि मम्मी – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

(मागील भागात आपण पहिले – “तुला माहीत नाही का, हे खुनी आपलं आणि पाकिस्तानचं नातं कधी धड होऊ देत नाहीत ते!” आता इथून पुढे )

मम्मी पण ते सगळं ऐकून कावरी-बावरी झालेली होती, पण आधी आजीला शांत करणं गरजेचं होतं. अमेरिकेत असे फुटीरतावादी विचार घेऊन कसं रहाता येईल! आत्ता तर आलोय इथे, अजून धड जम पण बसलेला नाही. आजीच्या या विरोधाला, रागाला इथेच आळा घालणं आवश्यक होतं.

“इथे सगळ्यांचा धर्म वेगवेगळा आहे सासूबाई, सगळे मांस मटण खातात. कोणा-कोणापासून दूर राहील ही?”

“बाकी कोणापासून दूर राहो, न राहो, त्या पाकिस्तान्यांपासून मात्र दूर राहू दे हिला!”

“हे बघ, तीप्पी, तू तिथून आलीस की आंघोळ करत जा. आणखी ऐक, त्यांच्या फ्रीजमधलं काहीही खात जाऊ नको. तिथे जास्त थांबायचं पण नाही. या लोकांचं काही सांगता येत नाही, प्राणी मारून, कापून हात सुद्धा धूत नसतील हे लोक.”

आणखीही बरंच काही बोलत होती आजी, कोण जाणे काय-काय! या वयात, या अनोळखी देशात येऊन रहावं लागण्याची निराशा पण तिच्या या रागामधून बाहेर पडत असावी बहुधा! मम्मीने तृपितला खुणेनेच  तिच्या खोलीत जायला सांगितलं. तिला आजीचा हा तिरस्कार कसा काय समजणार होता? तिच्या काकाच्या मृत्युच्या वेळी ती खूपच लहान होती, आणि या आधी अशा काही गोष्टींचा उल्लेखही तिच्यासमोर कोणी केलेला नव्हता.

ती तर वर्तमानातच जगत होती. शाळेतून घरी येता-जातानाचा वेळ हा त्या दोघींसाठी दिवसातला सर्वात चांगला वेळ असायचा, तेंव्हा दोघी जणू एकमेकींची सावली बनून रहात असत. दोन्ही घरातलं वातावरण जवळ जवळ एकसारखंच होतं. सोफ्यावर टाकलेली कशिद्याची कव्हर्स सुद्धा सारखीच होती. घरात शिरल्यावर येणारा वास सुद्धा जवळजवळ सारखाच असायचा. स्वयंपाकघरातून रोटी भाजल्याचा जो सुवास यायचा, त्यामुळे ते घर आपल्या घरासारखंच वाटायचं

आजीच्या या आरड्या-ओरड्याचा त्यांच्यावर काही विशेष परिणाम झाला नाही. अम्मी आणि मम्मी दोघीही आपापल्या मुलींबरोबरच त्यांच्या मैत्रिणीवर पण तसंच प्रेम करायच्या. दोघी दिसायच्याही सारख्याच. लांब केस आणि चमकदार डोळे! अम्मी काही नोकरी वगैरे करत नसल्यामुळे कायम घरातच असायची. शाळेतून परतताना तहरीमच्या घरी गेलं, की अम्मी तृपितवर पण प्रेमाचा वर्षाव करायची. मम्मी दिवसभर कामावर जाऊन घरी आली की तहरीमची चौकशी करायची. तहरीम आणि तृपितची मैत्री त्यांना समाधान द्यायची. तहरीमशी मैत्री झाल्यापासून तृपित परत पूर्वीसारखी झाली होती. इथे आल्यापासून तिचा खोडकरपणा आणि चंचलता नाहीशीच झाली होती, ती आता परत पूर्ववत झाली होती. तृपितला आता शाळेत जाण्याचा त्रासही होत नव्हता, या गोष्टीनंही तिच्या घरच्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. मम्मीला पाकिस्तानी आंबे आणि नाजूक कशिदाकारी केलेले कपडे खूप आवडत असत. गच्च भरलेले, गडद रंगाचे, आणि गोड असे सिंध्री व चौंसा जातीचे आंबे दर आठवड्याला घरी यायचे आणि अगदी आवडीने खाल्ले जायचे. मम्मीने आजीला, हे आंबे पाकिस्तानी असल्याचं कधीच सांगितलं नाही, नाहीतर आजीनं त्या आंब्यांना हातसुद्धा लावला नसता. आजी अगदी मिटक्या मारत हे आंबे खायची, आणि वर म्हणायची – “आपल्या देशात असताना कधी असे आंबे खायला मिळाले नाहीत. हे लबाड लोक सगळ्या चांगल्या गोष्टी निर्यात करत असतात!

मम्मी हसायची. तिला माहित होतं, की आजीच्या मनात पाकिस्तानबद्दल जो तिरस्कार होता, तो काकाच्या मृत्यू नंतर अधिकच दृढ झालेला होता. सीमेवर ज्या क्रूरपणे त्याला मारलं गेलं होतं, त्यासाठी ती आजही प्रत्येक पाकिस्तानी माणसाला जबाबदार मानायची. त्यांच्या झाबुआ गावातून जी पहिली व्यक्ती सैन्यात भरती झाली, ती म्हणजे तिचा लाडका धाकटा मुलगा होता. तो दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात चांगला दिवस होता. अगदी अभिमानाने ती सगळ्या नातेवाईकांना त्याचे तिकडचे किस्से सांगत असायची. मग ती आपल्या लाडक्या लेकाच्या लग्नासाठी मुलगी शोधायला लागली तोच त्याचं पोस्टिंग सीमेवर झाल्याची खबर आली, आणि पाठोपाठ एक दिवस हाहाकार माजवणारी ती वाईट बातमी आली! शत्रूचा सामना करताना तिचा लाडका मुलगा हुतात्मा झाला! त्याचं प्रेत सुद्धा मिळालं नाही. त्या आईचं काळीज दगडाचं होऊन गेलं. अनेक दिवसांच्या मौनानंतर, कधीही पाकिस्तानचं नाव ऐकलं की शिव्याशाप सुरु होत असत, नालायक, खुनी लोक

ज्या दिवशी तहरीम पाकिस्तानी आहे हे सगळ्यांना कळलं होतं, त्याच दिवसापासून  दोन्ही मुलींच्या मैत्रीला ग्रहण लागलं होतं. सध्या तर दोन्ही देशांमध्येही तणाव सतत वाढतच चालला होता. तिरस्कार, द्वेष फैलावत चालला होता. दररोज नवीन काहीतरी समस्या निर्माण होत होती. भारताने सर्जिकल स्ट्राईक केली. पाकिस्तानने संतापून आपल्या देशाच्या आकाशातून भारताच्या विमानांना जायला बंदी घातली. त्यामुळे तिकिटाची किंमत दुप्पट झाली होती. आजीचे शिव्याशाप सुरु झाले – “या कर्मदरिद्री लोकांनी आकाशाचा रस्ता बंद करून प्रवाशांची लूट चालवली आहे. काय मिळतंय ह्यांना त्यातून? जमिनीवर कब्जा करतात ते करतात, आता आकाशावर पण कब्जा करायला लागलेत!”

तिकिटांच्या किंमती वाढल्यामुळे त्यांची भारतात जाण्याची इच्छा मनातच राहिली. भारतीय लोक तर धावून – धावून आपल्या देशात जात होते, पण पाकिस्तानी लोकांच्या मनात भीति होती, की एकदा तिकडे गेलो, तर अमेरिकन सरकार परत इकडे घुसू देणारं नाही! हां, तहरीमचे मामा सरकारी दौरा काढून यायचे, आणि येताना आपल्याबरोबर भरपूर कपडे पण आणत असत. तहरीम मोठ्या आवडीने ते कपडे घालत असे आणि कित्येक वेळा तृपित साठी पण घेऊन यायची, की तिने पण घालून बघावे. शरारा ड्रेस तर तिचा जीव की प्राण होता. या सगळ्या निर्बंधांचा तहरीम आणि तिच्या कुटुंबावर फारसा परिणाम झाला नाही. हं, झालाच तर एवढाच, की तिच्या मामांचं येणं जाणं जवळ जवळ बंदच झालं होतं. ते जेंव्हा यायचे तेंव्हा सगळ्यांसाठी ढीगभर भेटी घेऊन यायचे, ते कमीच होत गेलं.

ज्या वयात या दोघींचं इथे अमेरिकेत पालन-पोषण होत होतं, ते वय असं होतं, की त्यांना आपापल्या देशांबद्दल फारसं प्रेम राहिलं नव्हतं. नवीन देशात, नवं वातावरण आपलंसं करणं सुरु केल्यानंतर मागे वळून बघण्याचा प्रश्नच नव्हता. पण, इथल्या आपल्या घराबद्दल बोलणं होत असे. अम्मी लक्षात ठेऊन ईदच्या दिवशी शेवयांची खीर नक्कीच पाठवायची. मम्मी पण दिवाळीच्या वेळी मिठाई पाठवत असे. अशा तऱ्हेने दोघी आया आपापल्या मुलींच्या आनंदाचा विचार करत असत.

आजीला जर कळलं, की हे तहरीमच्या अम्मीनं पाठवलेलं आहे, तर ती सरळ ते उचलून कचऱ्याच्या डब्यात फेकत असे. मुलाच्या मृत्युचं ते दुःख कधी कधी तहरीमला बघून असं उसळून यायचं, की आवरताच येत नसे. त्या मुलीचा चेहरा बघितला, की आपल्या हुतात्मा झालेल्या मुलाचीच आठवण यायची तिला. आपल्या तिप्पीला हे लोक काहीतरी करतील अशी भीति तिच्या मनात होती.

आजीच्या या द्वेषाचा या दोन्ही मुलींना काही पत्ताच नव्हता. त्या दोघींच्या ज्या गप्पा चालत, त्याला काही अंतच नसायचा! तिथे देश आणि देशांच्या सीमा नसायच्या, फक्त त्या दोघींमध्ये असलेलं प्रेमाचं नातं असायचं. एकूण काय, तर त्या दोघी दोन्ही देशांच्या मिश्र संस्कृतीच्या वाहक होत्या. अम्मीचा अ, म मधे बदलून मम्मी म्हणायला तहरीमला आवडत असे, तर तृपितला अम्मी म्हणायला आवडायचं. जेंव्हा अम्मी  सलामवालेकुम म्हणत आपला हात तिच्या डोक्यावर फिरवत असे, तेंव्हा तिच्या केसांमधून हिच्या मम्मीच्या केसांसारखाच सुगंध येत असे. तेच केस हातात पकडून ही दूध पिऊन गाढ झोपी जात असे.

इथे या मुली आपल्या आयांच्या सुगंधात हरवून जात आणि तिकडे दोन्ही देशांच्या सीमांवर दारुगोळ्याचा धूर आपला वास पसरवत दाट होत जात होता. खूप काही घडत होतं. सर्जिकल स्ट्राईक नंतर जोरदार गोळीबार आणि नेत्यांच्या बोलण्याच्या उष्णतेत मानवता भाजून निघत होती. यू. एन.मधे कोलाहल, टी. व्ही. वर एकमेकांवर केलेले वार, आरोप-प्रत्यारोप हे सगळं कमी होतं, म्हणून की काय, पाकिस्तानने कॅ. अभिनंदन ना पकडलं. आता मात्र अगदी हद्द झाली! दोन्ही मुलींच्या घरच्यांनी कडक पावले उचलली. तृपित आणि तहरीमचं एकमेकींशी बोलणं बंद करून टाकलं. कडक आज्ञा दिली गेली, की आपापल्या कामाशी काम  ठेवा, सरळ घरून शाळा आणि शाळा ते घर! एकमेकींशी बोलताना दिसलात, तर तुमचं काही खरं नाही!

क्रमश: भाग २

मूळ हिंदी कथा – अम्मी और मम्मी – मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अम्मी आणि मम्मी – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? जीवनरंग ?

☆ अम्मी आणि मम्मी – भाग १ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

डॉ हंसा दीप

त्या दोघी सातवीच्या वर्गात असताना प्रथम भेटल्या एकमेकींना. दोघी आपापल्या देशातून न्यूयॉर्कच्या या फ्लशिंग हायस्कूलमधे आल्या होत्या. इथे आल्यानंतर दोघी इंग्लिश भाषेशीच नव्हे, तर बऱ्याच नव्या बदलांशी  झुंजत होत्या. नवीन देश, नवीन वातावरण आणि अनोळखी लोकांमधे सापडलेल्या दोन अजाण मुली! एक पाकिस्तानच्या लाहोर सारख्या मोठ्या शहरातून आलेली आणि एक भारताच्या झाबुआ सारख्या मागास आदिवासी प्रदेशातून. एकजण वर्गाच्या या कोपऱ्यात गुपचूप बसलेली असायची, तर दुसरी दुसऱ्या कोपऱ्यात.

एकदा जेवणाच्या सुट्टीत दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. दोघींना एकमेकींचा एकटेपणा जाणवला. दोघी एकमेकींशी बोलण्यासाठी उत्सुक झाल्या. एकमेकींशी मैत्री करण्यासाठी आतुर झाल्या. हळुहळू, इतके दिवस नाईलाजानं गप्प रहाणाऱ्या तृपितचं बोलणं सुरु झालं. तहरीम तशी अबोलच होती. लाहोरसारख्या मोठ्या  शहरातून आलेली होती, पण शहरी गोंगाटापासून दूर रहाण्याचीच सवय होती तिला. आपल्या अंतरंगातच  रमणारी होती ती. त्याविरुद्ध तृपित, झाबुआच्या केसाळ, चपळ मांजरीसारखी जहाल! एक शांत, तर एक बडबडी. दोघींची अशी काही गट्टी होत गेली, की दोघी एकमेकींना पूरक होत गेल्या.  

तहरीम आणि तृपित, त अक्षराचं फक्त यमक तेवढं जुळत होतं, बाकी दोघींच्या व्यक्तिमत्वात जमीन आसमानाचा फरक होता. तहरीमच्या ओठांवरच्या स्तब्धतेतल्या सगळ्या गोष्टी तृपितच्या ओठांवर यायच्या. एक जण गुपचूप आपलं काम करणारी होती, तर दुसरी, काम करणाऱ्यांना हसवून हसवून बेजार करणारी! तहरीमकडून तृपित तिचा गंभीरपणा घ्यायची, आणि तिच्या ओठांवरच्या हसण्यातही झळकणारा तिचा उफाळता उत्साह तिला द्यायची.

एक शांत रहाणारी तर दुसरी बडबडी अशा या दोन मुलींचं मूळ बघायला गेलं तर आणखीनच आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट होती. भारत-पाकिस्तान या देशांशी झाबुआ आणि लाहोर जोडलेलं होतं. एक भिल्लांच्या प्रदेशातून आलेली, तर दुसरी पठाणांच्या वंशातली होती. हे दोन्ही वंश म्हणजे, अव्वल दर्जाच्या लोखंडासारखे मजबूत, पण या दोघी मुलींना या शब्दांच्या अर्थाच्या गहनतेशी काय देणं-घेणं होतं? तुझं तुला लखलाभ असो! लाहोरचं लाहोरला आणि झाबुआचं झाबुआला! कारण आता त्या लाहोरमध्ये नव्हत्या, की झाबुआमधे पण नव्हत्या! “आता तर आपण न्यूयॉर्क मधे आहोत!” त्या गल्ल्या-आळ्या मागे टाकून नव्या गल्ल्यांमधे, नव्या वळणांवरुन, नव्या वाटा, नवी ध्येयं शोधत आता त्या मैत्रिणी झाल्या होत्या- एवढं त्यांना पुरेसं होतं.

हळुहळू बरोबर रहाणं, बोलणं वाढत गेलं. एकजण हिंदी बोलायची, तर दुसरी उर्दू. पण दोघींना त्यात काही फरक जाणवला नाही. दोघींना असं वाटायचं, की या दोन्ही भाषांची फक्त नावं वेगवेगळी आहेत. अगदी एकसारख्याच तर आहेत दोन्ही भाषा. ना हिला उर्दू लिहायला आवडत, ना तिला हिंदी लिहायला!  हिंदी, उर्दू लिहिणं सुटलं म्हणून दोघी खूश होत्या. पण आता इथे इंग्रजीशी झगडावं लागत होतं, रोजची डोकेफोड चाललेली होती. ESL म्हणजेच, इंग्लिश अॅज ए सेकंड लँग्वेज च्या वर्गात जाणं इथल्या हुशार मुलांच्या नजरेत भलतंच अपमानजनक मानलं जायचं, पण करणार काय? दुसरा काही इलाज नव्हता. पहिल्याच दिवशी वर्गात शिक्षिकेनं जी काय बडबड केली, ती या दोघींच्या सपशेल डोक्यावरून गेली. त्यांचे कोरे चेहरे बघून लगेचच त्यांना ESL च्या वर्गात पाठवण्यात आलं. दोन अपमानित मुली एकमेकींचा सन्मान बनल्या. कोणाला सांगाय-सवरायला वेळच मिळाला नाही, या दोघींना  A B C D माहित आहे, इंग्रजी लिहिता पण येतं, पण वर्गात ही जी बडबड चालते, ती त्यांच्या आकलनापलीकडची आहे! इतक्या वेगात कसं कोणी इंग्रजी बोलू शकतं? त्या दोघी तर आधी हिंदी-उर्दू तून विचार करणार, ते बरोबर आहे की नाही, हे तोलून बघणार मग बोलणार, तोपर्यंत तर ते बोलणं म्हणजे, मंद गतीने दिल्या जाणाऱ्या बातम्यांचा कार्यक्रम होऊन जायचा! एकमेकींशी बोलताना विचार करकरून इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करता करता मधेच केंव्हा हिंदी-उर्दू मधून बोलायला लागायच्या, ते त्यांचं त्यांनाही कळत नसे.

जेवणाच्या सुट्टीत दोघीजणी बरोबर खाण्यासाठी अशा जागी जाऊन बसायच्या, की जिथे आपापले पराठे लपवून खाण्याची गरज पडत नसे. ESL वरून तर कटकट झालीच होती, वर आणखी यांचं जेवण बघून ही कटकट अजूनच वाढली असती. तहरीमच्या आईला हिंदी सिनेमांचं फारच वेड होतं. तिने तहरीमला लाहोरला असताना कित्येक हिंदी सिनेमांच्या गाण्यांवर नाच करायला शिकवलं होतं. ती गाणी जेंव्हा केंव्हा तिच्या तोंडून यायची, तेंव्हा तृपितही तिच्या सुरात सूर मिळवत असे. दोघी मिळून ही गाणी गाताना त्यातून एक तिसरीच  भाषा जन्म घेत असे, त्यांच्या मैत्रीची भाषा, जी अनिवार्यपणे त्यांच्या जवळिकीचं कारण बनत असे. सगळं काही जणू मोजून मापून घडवलं जात होतं. नात्यांच्या मजबुतीसाठी हे मोजमाप आवश्यकच असतं. मग कोणी ते तराजू घेऊन तोलो न तोलो, मोजो व न मोजो पण सतत तराजूची एखादी तागडी वर खाली होतच असते. त्या दोघींच्या तागड्या समान तर होत नसत, पण थोड्या वर खाली होऊन, थोड्या डगमगून मग बरोबर होऊन जायच्या.

ही म्हणायची, “ठीक आहे, काही होत नाही”

ती म्हणायची, “काही प्रॉब्लेम नाही!”

तृपितला तिचे शिक्षक टपित म्हणायचे, तर तहरीमने त्याचं टप्पू करून टाकलं!

“अगं टप्पू, प्रॉब्लेमचा अर्थ एखादी बाब किंवा गोष्ट असा होतो.”

“अर्थ काहीही असू दे, काही बिघडत नाही.”

आणि मग निष्पाप अशा हसण्यात दोघी बुडून जायच्या! अभ्यासाशी या दोन्ही मुलींचा संबंध तसा कमीच होता. जास्तीत जास्त वेळ दंगामस्तीतच जायचा. वर्ग चालू असताना कसाबसा वेळ काढत असत दोघी. वर्गांची गरज तर फक्त तास चालू असताना बसण्यापुरतीच होती, त्यानंतर तर नवनवीन खोड्या काढणं, हूडपणा करणं चालू असायचं. कधी हिच्या घरी, कधी तिच्या घरी येणं जाणं तर चालूच असायचं.

एकीची अम्मी होती, तर एकीची मम्मी होती. दोघीही पास्त्याला शुद्ध तुपातली जिऱ्याची फोडणी द्यायच्या. पिझ्झा हिरव्या चटणीबरोबर खायच्या, एवढंच नाही, तर सुपाच्या वाडग्यात बुडवून बुडवून चपाती, रोटी खायच्या! दोघीही नमाज आणि पूजा करायच्या वेळी जीन्स आणि शर्ट वर ओढणी घ्यायच्या. एक चिकन, बिर्याणी सारख्या डीश बनवायची, तर दुसरी शिरा, पुरी, छोले हे बनवण्यात रमून जायची.

या दोघींच्या बिल्डींग पण जवळपासच होत्या. कोणीही तृपित कुठली आहे, किंवा तहरीम कुठली याची काही चौकशी केली नाही. तहरीमच्या घरच्यांनी विचार केला असावा, की पाकिस्तानातच कुठेतरी रहाणारी असावी, आणि तृपितच्या घरच्यांनी विचार केला असेल, की भारतातलीच असेल. असंही असू शकेल, की असा काही विचारच त्यांच्या मनात आला नसेल. या सगळ्या चौकशा करायला वेळ तरी कोणाजवळ होता? घरातला प्रत्येक जण या नव्या देशात आपली मुळं रुजवायच्या मागे लागलेला होता. आधी उदरनिर्वाह आणि मग इतर काही! घरातली मुलंही नव्या वातावरणात इंग्लिश बरोबर झगडतानाच वेगवेगळ्या प्रकारचे नवे चेहरेही आपल्या आसपास बघण्याची सवय लाऊन घेत होती.

थोड्याच दिवसात त्या दोघी अगदी घट्ट मैत्रिणी झाल्या. घरी येणं-जाणं, खाणं-पिणं सगळं काही कधी या घरी, तर कधी त्या घरी व्हायला लागलं. तृपितच्या घरी तिची आजी पण होती. आजोबा जाऊन तर खूपच वर्षं होऊन गेली होती. दोघी शाळेतून घरी यायच्या, तेंव्हा त्यांना आजीच जेवण वाढत असे. एक दिवस बोलण्या बोलण्यातून आजीला कळलं की तहरीम मुसलमान आहे. तिला धक्काच बसला. या शब्दाबद्दल विलक्षण तिटकारा होता तिला. हा शब्द बोलणं, ऐकणं हा सुद्धा जणू अपराध होता! पण या मुलीचा हळुवारपणा, नाजुकपणा खूप आवडायचा आजीला. तिनं विचार केला, जाऊ दे, ठीक आहे, मुसलमान असली तरी उत्तर प्रदेशातल्या लखनौच्या आसपासचीच असेल. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश एकमेकांचे शेजारीच आहेत. इतकी अदबीनं बोलते, की लखनवी शैलीची झाक दिसून येते!

“तहरीम, पोरी, कुठली आहेस तू? लखनौ, की त्याच्या आसपासची?”

तिचं उत्तर ऐकून आजीच्या तोंडाचा आ वासलेलाच राहिला. हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. खाली विखरून पडलेल्या काचेच्या तुकड्यांमधे तिच्या धाकट्या मुलाचा चेहरा तिला दिसू लागला. प्रत्येक टोकदार तुकडा सरळ तिच्या मनावरच हल्ला करू लागला. आजीच्या या प्रतिक्रियेकडे दोन्ही मुलींचं लक्षच नव्हतं, त्या आपापसात बोलत कशावर तरी जोरात हसत होत्या. इकडे आजी स्वतःशीच बडबडत होती, “कार्लं तर आहेच, शिवाय, वरून लिंबू पण चोळलेलं आहे. म्हणजे, आपल्या भारतातले मुसलमान नाही, तर पाकिस्तानातले मुसलमान आहेत.”

त्या दिवशी घरात वादळ तर उठणारच होतं, नशीब, आजी तहरीम तिच्या घरी जाईपर्यंत काही बोलली नाही. नाहीतर त्या बिचाऱ्या छोट्या मुलीच्या मनाला किती त्रास झाला असता! तहरीम परत गेल्याक्षणीच आजीने घरात थयथयाट सुरु केला. तृपितची मम्मी पण कामावरून तेंव्हाच घरी आलेली होती. मग काय विचारता?

“देवा, देवा, हिनं तर आपल्या वैऱ्याशी मैत्री केली आहे! सांभाळ हिला! आपला धर्म भ्रष्ट करून घेईल ही! ती कार्टी पाकिस्तानी आहे!”

“खुन्यांशी कोणी मैत्री करतं का?”

“या लोकांनी माझ्या मुलाचा जीव घेतलाय, खुनी आहेत ते!”

“मांस-मटण तर खातच असणार हे लोक, अशा घरात येणं जाणं आहे या पोरीचं!”

“तुला माहीत नाही का, हे खुनी आपलं आणि पाकिस्तानचं नातं कधी धड होऊ देत नाहीत ते!”

क्रमश: भाग १

मूळ हिंदी कथा – अम्मी और मम्मी – मूळ लेखिका – डॉ  हंसा दीप, कॅनडा

मराठी भावानुवाद  –  सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोयता… भाग – 3 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

श्री सचिन वसंत पाटील

? जीवनरंग ?

☆ कोयता… भाग – 3 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

(कुठं रात्रीच पाणटूळ भाईर आलं तर? आणि समजा व्याली यवस्थित आणि वार पडंना झाली तर? वार कुत्र्यानं वडून न्हेली तर? तिला नुसता विचार सुद्धा सहन होईना.) – इथून पुढे —

सुलीला गेल्यावर्षी सुक्यानानाची, कुत्र्यांनी फाडून खाल्लेली शेरडी आठवली. आणि तिला ऊभं वारं सुटलं.

जेवा-खायाचं सोडून सुली शेजारच्या रघूआप्पाच्या खोपीत घुसली. सुनंदा वैनीला तिनं विचारलं, 

“जेवलासा का?”

“हे न्हवं आत्ताच जेवले बग!”

“आणि तू गंऽ सुले. तू जेवलीस का?” 

“जेवले मी बी!” सुलीनं दाबून खोटंच सांगितलं. उगी लांबड लागाय नगो म्हणून.

“गाड्या काय आज लवकर येणार न्हाईत म्हणं!”

“व्हय गं, म्याबी ऐकलं मघा. अण्णाच्या गाडीची टायर फुटलीया जणू! बाकी येतील की सगळी.”

“व्हयवं, आता कवा दुरूस्ती हुतिया कुणास ठावं? कारखान्याची गाडी येणार, मग जॅक लावून दुसरा टायर घालणार. मग गाडी कारखान्यावर यिऊन खाली हुणार!”

“व्हय, रात उजडंल त्येला! झोप तू आपली बिनघोरी, का आमच्यात येतीस आजच्या रोज झोपायला?”

“आली आसती खरं, ती शेरडी एक व्याला झालीया. बाळाला आणि घेतलं पायजे. जागा पुरायची न्हाय तुमच्या खोपीतबी. झोपते आपली माजी मी!”

“झोप झोप, त्येला काय हुतंय? आणि आमी हायच की हितं. काय लागलं केलं तर कवाबी हाक मार. लगी येतो!”

“तुझ्या आईचा काय फोनबीन आल्ता काय? म्हातारीच्या तब्येतीचं कसं काय कळलं का?” 

“परवादिशी आल्ता. मुकादमाच्या मोबाईलवर. हाय बरं म्हणत्या. कवा बिगाडतंय, कवा सवंनी आसतीया. हाय तसंच म्हणायचं!”

आसंच काहीबाही दोघी बोलत बसल्या. तोवर बैलगाड्या आल्याचा आवाज आला. बैलांच्या गळ्यातील चाळ, साठ्यातला पत्रा वाजताना ऐकू येऊ लागला. “आरं शिरप्या हैऽ.. चलरंऽ..!” गाडीवानाचा आवाज लांबून येत होता.

सुली आपल्या खोपीबाहेर आली. आपला अण्णा आज येणार नाही, हे माहीत असूनही तिनं सगळ्या गाड्या नजरेनं धुंडाळल्या. त्यात तिचा अण्णा तिला कुठंच दिसत नव्हता. तिची घोर निराशा झाली.

हळूहळू सगळ्या गाड्या आपापल्या जाग्यावर गेल्या. उदास मनानं पाय ओढत ती आपल्या खोपीत आली. गाड्या आल्यामुळे तळ काही काळ जिवंत झाला. काही वेळ जनावरांना वैरणपाणी देतानाचे आवाज. पुरूष माणसं जेवताना बोलत असलेली. टोळीत काही दारूडेही होते. येताना टाकुनच आलेले. विनाकारण आपल्या बायकापोरांना शिव्या हासडीत होते.

काही वेळातच सारे चिडीचूप झाले. दमूनभागून आलेली अंगे विसावली. मेल्यागत मुरगाळून पडली. सुलीनंही पातेल्यातल्या भाताचे चार घास खावून घेतले. घास जात नव्हतं. भूकच मेली होती. भाताचं घास तसंच पाण्याच्या घोटाबरोबर गिळलं.

तळावर अंधार दाटला होता. रात्रीचे नऊ-साडेनऊ झाले असावेत. पाण्यात पडल्यागत तळ शांत झालेला. सगळं वातावरण थंडगार झालेलं. मधेच एखाद्या बैलाच्या गळ्यातील घुंगरांची किनकिन नि रातकिड्यांची किरकिर तेवढी ऐकू येत होती. बाळाच्या शेजारी पटकूर हातरून तिने पाठ टेकली. तोवर शेरडीची धडपड ऐकू आली. ‘अगं बाईऽ..! वैरण टाकायची राह्यलीच की!’ असं स्वतःशीच पुटपुटत ती पुन्हा उठली. शेरडीला बारीक-बारीक कोंबऱ्या आणि शेवरीची मूठ टाकली. शेरडी कुरूकुरू शेंडे कुरतडू लागली.

बराच वेळ ती शेळीकडे एकटक बघत अंगणात उभी राहिली. वातावरण चिडीचूप झालेलं. तिनं आभाळाकडं बघितलं. नुकतीच पौर्णिमा होऊन गेल्यामुळं टिपूर चांदणं पडलेलं. ढगाआडून चंद्राची कोर बाहेर आली. तिचा झिरपलेला पांढराशुभ्र प्रकाश खोपीवर पडला. चांदण्याच्या त्या मंद प्रकाशानं सारा तळच न्हाऊन निघालेला. खोपीवरला वाळला पाला चंद्राच्या लख्ख प्रकाशानं उजळून निघाला होता. हळूहळू खोपीच्या निर्जिव सावल्या आपले पाय पसरत चालल्या होत्या.

सुली आत आली. चुलीवरची चिमणी विझवली. अंथरुणावरती अंग टाकलं. तिला आपल्या आईची आठवण झाली. आईनं जाताना दिलेल्या सूचना तिला आठवल्या. झोपताना चिमणी बंद करायची. बाहेर कुणी बोलवलं तर जायचं नाही. ओळख असल्याशिवाय बोलायचं नाही. असं बरंच काहीबाही ती अंथरुणावर पडल्या पडल्या आठवत होती.

हळूहळू झोप येऊ लागली. डोळे पेंगुळले. तिला झापड पडली. पहाटेच्या निबिड अंधारातली अस्वलं तिला आठवू लागली. त्यांचे नख्या असणारे पंजे. तोंडावरचे काळेभोर केस. माणसांसारखी दोन पायांवर उभी राहून ती पुढे पुढे चालत येतायत… 

ती दचकून उठली. घामानं डबडबलेली. तोंड पुसलं. थोडं पाणी पिऊन घेतलं. पुन्हा अंथरुणावर पडली. तिने मन घट्ट केलं. कशाला घाबरायचं नाही, असं ठरवलं. ती पुन्हा झोपी गेली.

मध्यान रातचंच कसल्यातरी आवाजानं ती दचकली. काळजात चमक उठली. दाराबाहेर कुणीतरी खोकल्यासारखं झालं. तिने डोळे उघडले. अंधाराचा ती अंदाज घेऊ लागली. कोण असावं इतक्या रात्री? का आलं असावं? बुलटवाला मुकादम तर नसेल? असेल, तर तो का आला असेल? एवढ्या रात्री? त्याला माहीत आहे, आज अण्णा-आई घरात नाहीत. त्या संधीचा फायदा उठवायचा आहे का त्याला?

मनात प्रश्नांचं काहूर माजलं. ते झटकून ती अंथरुणावरून उठली. खिडकीपाशी गेली. तिने एक डोळा बाहेर लावला. कोणच कसं दिसेना? ती तशीच थोडावेळ थांबली… कारखान्यावरची कुणी उडाणटप्पू पोरं आली असावीत का? काय नेम सांगावा तेंचा? ती तशीच थोडावेळ कोणोसा घेत थांबली. पण, परत काहीच हालचाल नाही. तिचे डोळे मिटू लागले.

तिथनंच गुडघ्यानं रांगत-रांगत ती अंथरुणावर आली. कलंडली. तिची झोप लागली. पुन्हा थोडा वेळ गेला. दार ढकलल्यासारखा आवाज आला. पाल चमकावी तशी ती चमकली. खडबडून उठली. खच्चून जोरात ओरडली, “कोणाय तेऽ..!”

बाहेर कुणी पळून गेलेल्या पावलांचा आवाज. लांब लांब जाणारा. तिने खिडकीतनं बघितलं तर बाहेर कुणीच नव्हतं. टिपूर चांदणं तळावर पसरलेलं.

ती अंथरुणावर येऊन बसली. कोण असावं ते? मुकादम? कारखान्यावरची पोरं? की आणखी कोण? आज्जीनं काढलेला नवरा नंदू तर नसेल? काळाकुट्ट. बसलेल्या नाकाचा. अंगावर केस असणारा. अस्वलासारखा दिसणारा! तिची मती गुंग झाली. कोण असावं? एवढ्या रात्री येण्याचा त्याचा काय उद्देश असावा? पेपरला आलेल्या, टिव्हीवर सांगितलेल्या बलात्काराच्या घटना ती ऐकून होती.

ती विचार करू लागली. असं घाबरून राहिलो तर आपणही उद्या पेपरची बातमी होऊन जाऊ? आई-अण्णानं येवडी आपल्यावर जबाबदारी टाकलीया ती पार पाडली पायजे. आता इथनं पळ काडायचा न्हायी. काय हुईल त्येला सामोरं जायाचं. आल्या संकटाला धिरानं तोंड द्यायला पायजे… खरंतर तिचं पोरपण आता सरलं होतं. विचाराला बळकटी आली होती. असे अनेक प्रसंग बाईच्या जातीला निभावून न्यावे लागतात, याची बारीकशी चुणूक आज यौवनाच्या उंबरठ्यावर असताना तिच्या वाट्याला आली होती.

विचार करता-करता तिचं लक्ष कुडाला अडकवलेल्या कोयत्याकडं गेलं. आणि लख्खकन तिच्या मनात विचार आला. त्या विचारासरशी तिने कोयता उपसला. हातात घेतला. त्याची धार तपासली. अगदी पुढं येणाऱ्या हाताचं मनगट एका घावात तुटण्यासारखी कारी धार होती त्याला. आणि कोयता चालवून ऊसाचे कंडके पाडायचा अनुभवही तिच्या गाठीशी होता.

ती पुन्हा झोपली. एक हात तिने बाळाच्या अंगावर टाकला होता तर दुसर्‍या हातात तिने कोयत्याची मूठ गच्च धरली होती. आता तिला कुणाची भिती वाटत नव्हती. मुकादमाची, कारखान्यावरच्या पोरांची, नंदूची आणि त्या अंधारातल्या अस्वलांची सुद्धा!

— समाप्त — 

©  श्री सचिन वसंत पाटील

विजय भारत चौक, मु. पो. कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली.

मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print