मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिबेटी लोककथा – समुद्र खारा नव्हता तेव्हा ☆ डॉ. मंजुषा देशपांडे ☆

☆ जीवनरंग ☆ तिबेटी लोककथा – समुद्र खारा नव्हता तेव्हा ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

खूप वर्षांपूर्वी…जेव्हा समुद्र खारट नव्हता.  पृथ्वीचा बराचसा भाग घनदाट जंगलाने व्यापला होता.  त्यावेळी एका जंगलाने वेढलेल्या विस्तीर्ण डोंगर पठारावर  सूर्य देवाचे राज्य होते. राजा प्रजेचा आवडता होता. राजाची प्रजा शहाणी होती.  मंत्रीमंडळ राजाची आज्ञा मोडत नव्हते. कोणीही बंडखोर अजून पैदा झाला नव्हता.

बायको एकच होती. सोन्यासारख्या दोन राजकन्या होत्या आणि एकापेक्षा एक बुध्दीमान आणि धाडसी तीन राजपुत्र होते. वेळेवर पाऊस पडे.  शेती पिके.  फळाफूलांचे हंगाम भरपूर असत. लोक उत्सवप्रिय होते.  राज्यातला प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कलेत निपुण होता. त्यामुळे गाणे,  बजावणे,  नाच, नाटके यासारख्या कार्यक्रमांनी रात्री उजळलेल्या असत.

अर्थातच लोक आरोग्याने मुसमुसलेले आणि अतिशय आनंदी होते. सगळं कसं हवं तसं.  देखणं आणि रेखीव.

एका संध्याकाळी एक देवदूत आणि त्याची पत्नी आकाशातून विहरत चाललेले होते. त्या दिवशीही गावात कसलासा उत्सव होणार होता. सगळीकडे मोगरा आणि गुलाबाच्या माळा लावल्या होत्या. गरमागरम मिष्टान्नांचा घमघमाट सुटलेला होता.  रंगीबेरंगी कपडे आणि फूलांच्या माळांनी सजलेले लहान थोर लगबगीने उत्सवाच्या ठिकाणी निघाले होते.

आज राजदरबार आणि गावातील मुले विविध प्रकारे मनोरंजनाचे कला प्रकार सादर करणार होते.  ती मुले संगीत, वादन,  नर्तन आणि नाटक या सर्वातच प्रवीण होती.  दरवर्षी हा उत्सव अभिनव पध्दतीने सादर करण्याची त्या गावातली प्रथा असल्याने, सर्वजण अतिशय उत्सुकतेने कार्यक्रमाची वाट पहात होते.

राजा राणीचे आगमन होताच कार्यक्रमाला सुरूवात झाली. पहिल्याच नांदीला लोकांनी माना डोलावल्या.

……तर त्या आकाशातल्या देवदूताची पत्नी त्या गावातला आनंद पाहून स्वतःही खुदुखुदू हसू लागली आणि ते विमान गदागदा हलायला लागलं.  देवदूताला फारच राग आला, तो तिरसटल्या स्वरात म्हणाला, “गप बस ग ए.. विमान पडेल तुझ्या हसण्याने… पृथ्वीवर कोणताही आनंद फार काळ टिकत  नाही, लक्षात आहे ना!”  त्यावर ती पत्नी ठासून म्हणाली,  “काळ बदलतो.  माणसंही बदलतात.” त्यावर देवदूताने एक सुस्कारा सोडून विमान आणखी उंचावर नेत म्हटले, ” माणसे आहे त्यात समाधानी नसतात आणि त्यांना नेहमीच अधिकचे काहीतरी हवे असते.  त्यामुळेच ते स्वतःबरोबर

दुस-यांचाही नाश ओढवून घेतात.”

मी म्हणतोय त्याचा प्रत्यय तुला लवकरच येईल.” देवदूत काहीशा विषादाने म्हणाला.

कदाचित केवळ त्यामुळेच त्या उत्सवानंतर मधल्या रिकाम्या काळात त्या राणीला एक व्रत करायची बुध्दी झाली असावी.  ते व्रत म्हणे राज्य हजार वर्ष पर्यन्त टिकण्यासाठी होते.  प्रथम राजाने ती कल्पना हसण्यावारी नेली.  तो म्हणाला,  ” आपण शंभर वर्षापुढे जगणार नाही,  आपली मुले,  नातवंडे,  पंतवंडेही हजार वर्षापर्यन्त जगत नाहीत. आपल्यानंतर आपला वंश हजार वर्षापर्यंत टिकतो का नाही याची आपल्याला कशाला चिंता!

राणीला ते मुळीच आवडले नाही. ती अगदी हट्टालाच पेटली.  ते 15 दिवसाचे आणि अगदी सोपे व्रत होते.

रात्रीला दिवस मानायचा आणि दिवसाची कामे रात्री करायची आणि रात्रीची कामे दिवसा.  असे 15 दिवस केले की संध्याकाळी देवीची पूजा करून लोकांना मेजवानी द्यायची.

रात्री जागरण करायचे. यज्ञ करायचा. देवीला संतुष्ट करायचे.. ..

आणि सोळाव्या दिवसापासून परत सगळे पूर्वीसारखे…

राजा काही त्याला तयार नव्हता.

राणी सतत राजाच्या मागे भुणभुण करी आणि राजा तिला उडवून लावी.

मग राणीने ही कल्पना प्रधान आणि सेनापती यांच्या बायकांसमोर बोलून दाखवली.

त्या राज्यात सेनापतीला युध्दाचा पोशाख घालून आपल्या शिपायांसह रस्त्यावरून मिरवत जाण्याव्यतिरिक्त काही काम नसे. त्यामुळे सेनापती आणि त्याची बायको सतत सोंगट्यांचा खेळ मांडून हास्य विनोद करत बसलेली असत.

सेनापतीण बाईंनी या व्रताची गोष्ट  नव-याच्या कानावर घातली. सेनापतीलाही थोडे विचित्रच वाटले…’असले कसले व्रत… ते सुध्दा वंश 1000 वर्षे राज्यावर असावा… म्हणून..’

पण बाईंनी बसता उठता त्याच्या डोक्याशी कटकट केल्यामुळे तो राजाशी त्याबद्दल बोलायला तयार झाला.  इकडे प्रधानाचेही तेच झाले.

सेनापती आणि प्रधानजी दोघांनीही राजाकडे त्या व्रताचा विषय काढला आणि मुत्सद्दीपणे त्यांनी राजाचे मन त्यासाठी  वळवले.

राजा म्हणाला.. ” त्या व्रतामध्ये रोज देवीची पूजा करावी लागेल. ” हे माहिती आहे ना.. रोजच्या पूजेसाठी डोंगरापलिकडच्या राजाच्या तळ्यातली 100 कमलपुष्पे आणायची आहेत,  ती देखील त्यांच्या नकळत!

हे मात्र सेनापतीला भारी आवडलं.  सेनापती म्हणाला.. “अहो रोज नव्या दमाच्या शिपायांची तुकडी पाठवेन आणि कमळं आणवेन. ” लेकाच्यांना काहीच काम नसल्याने सोदे झालेत नुसते…..

खरे तर त्या तिघांनाही त्या व्रतात ना दम वाटत होता ना रस!

पण असो… व्रताची तयारी जोरात सुरू झाली.  विणकर, सोनार आणि माळी भराभर कामाला लागले.  चहूबाजूंनी मंडप घातले. पताका लावल्या.

देवीचे देऊळ रंगवले.  रांगोळ्या काढल्या. या व्रतामध्ये दिवसाची कामे रात्री करायची होती आणि सूर्य उगवल्याबरोबर झोपायचे होते. सूर्य मावळायच्या सुमाराला उठून प्रथम देवीची पूजा करून नित्य कामांना सुरुवात करायची होती.  मध्यरात्री आरती झाली की जेवून पुन्हा पहाटे शेजारती करून घरी जाऊन झोपायचे..

कसलं हे विचित्र व्रत!  प्रजाजन म्हणाले.  पण त्यांचा राजावर विश्वास.  त्यामुळे कोणी काही उघड बोलले नाही. अखेरीस व्रताच्या रात्रीचा दिवस उजाडला. शिपायाची एक तुकडी डोंगरापलिकडे आदल्या दिवशीच रवाना झाली होती.

तिथल्या एका सुंदर तळ्यात असंख्य कमळे फूलली होती.  शिपायांनी भराभर शंभर कमळे तोडली आणि परतायला निघाले.  शंभर कमळावर एका फूलाला हात लावायचा नाही अशी त्यांना सक्त ताकीद होती.

पहिल्या रात्री कमळांसकट सांग्रसंगीत पूजा झाली पण मध्यरात्री कुणाला जेवण जाईना.  अंधार असल्यामुळे दिवसाची कामेही होईनात.

पहाटे पटापट लोक अंथरूणात शिरले.  दुपार नंतर जागे झाले तर बहुतेकांचे पोट बिघडलेले. डोकेही दुखत होते.  कसेतरी सगळेजण देवळातल्या सायंपूजेला गेले उत्साह तर नव्हताच.

त्या दिवशीही मध्यरात्रीचे जेवण जवळ जवळ वायाच गेले.  खुद्द राणीला झोप आवरेना पण आपल्या वंशाचे राज्य हजार वर्षे टिकणार…या आशेने… तिने मनाला ढळू दिले नव्हते.

आता शिपायांनी कमळे आणली खरी… पण त्या राजाच्या शिपायांना चोरीचा पत्ता लागल्याने त्यांची आणि या शिपायांची चकमक झाली.

त्यात यांचे दोघे आणि त्यांचे तिघे जखमी झाले. पण ती ही रात्र पार पडली.  रात्री झोप न झाल्याने लोक चीडचीड करायला लागले.  एकमेकांवर डाफरू लागले.

राजा तर भयंकर वैतागला होता. पूजेच्या वेळी त्याने राणीचा हात जोरात हिसडला.. राणीच्या डोळ्यात पाणीच आले.

तिस-या दिवशी दुपारी  या गावातले सगळे गाढ झोपेत आणि पहा-यावरील शिपाई पेंगत असताना त्या राज्यातले काही सैनिक त्यांच्या सेनापतीसह या राज्यात आले त्यांनी त्या पेंगुळलेल्या शिपायांच्या मुसक्या आवळल्या आणि ते राजाच्या गुलाबाच्या बागेत शिरले.  फूले तर सगळी तोडलीच वर बागेची नासधूसही करून ठेवली.

प्रमुख  माळ्याला बांधून ठेवले माळीणबाई राजाकडे पळत सुटल्या.  त्यांना पळण्याच्या शर्यतीत मिळालेली बक्षिसे अशी कामी आली.

राजा डोळे चोळत उठला.  भूपाळी नाही तरीही भाटही जागे झाले.

यांचे सेनापती लगबगीने शिपायांना घेऊन निघाले.  अगोदरचे आळशी बनलेले शिपाई आणि त्यात झोपाळलेले.

त्यांच्या नव्या दमाच्या शिपायांना अगदी सहज यांच्या सेनापतीलाच कैद करता आले.  राजा तसा चतुर होता.  त्याने त्यांच्या सेनापतीला बोलणी करण्याचे निमंत्रण दिले.  त्या वेळेला फारशा लढाया होत नसत. त्यामुळे तो सेनापतीही फार तंदुरुस्त नव्हता. शिवाय डोंगरावरून दौडत आल्याने त्याला तहान भूकही जबरीची लागली होती.

त्याने यांच्या सेनापतीला काटेरी बुंध्याला बांधून ठेवले आणि तो त्याच्या शिपायांसकट राज्याकडे गेला.

इकडे सेनापतीच्या बायकोने तिच्या नव-यावर पहारा करणा-या दहा शिपायांना जेवायला बसवून तिच्या मैत्रिणींना आग्रह करायला लावला आणि स्वतः जाऊन

नव-याला सोडवले. त्याला ठिकठिकाणी काटे टोचल्यामुळे त्याचे शौर्य जागे झाले त्याने एकट्याने त्या जेऊन ढेकर देत असलेल्या शिपायांना असे धोपटले म्हणता की राजवाड्यात चर्चेसाठी गेलेल्या त्यांच्या सेनापतीच्या कानावर त्यांच्या किंकाळ्या पोचल्या.

तो सेनापती त्याच्या शिपायासह या सेनापतीशी लढायला लागला.  राजा डोके धरून बसला आणि राणीवर कावायला लागला.  ते शिपाई आणि सेनापती पळून गेले खरे पण सापाच्या शेपटीवर पाय पडलाच होता.

एवढे होईपर्यंत संध्याकाळ झाली.  आज लोकांना दिवसाही जागरण झालं.

पर-राज्यातून कमळे तर आली पण पूजेसाठी कोणाची मनःस्थिती असणार.. पहा! सगळं चांगलं चाललं असताना राणीला खुळचट व्रत करायची दुर्बुध्दी सुचली.

साध्या कमळावरून शेजारच्या राजाशी वैर घ्यावं लागलं.  शेवटी ते वैर संपावं म्हणून त्या राजाच्या दोन बावळट राजपुत्रांशी राजाला त्याच्या गोड राजकन्यांचा विवाह करावा लागला.  पण कायम कुरबुरी… वैर धुमसतच राहिलं.  सतत चकमकी,  असुरक्षित आयुष्य…त्यामुळे लोक चिडचिडे बनले.  बायका पोरांच्या रडण्यामुळे समुद्र खारट बनला.

परत काही वर्षानंतर जेव्हा देवदूत …आकाशात त्याच्या बायकोबरोबर फिरत होता तेव्हा डोंगर बोडके झाले होते आणि जंगले उजाड,  माणसे चिडचिडी आणि राजा राणी वैतागलेले… कुठे निषेधाच्या घोषणा… कुठे कसल्या तरी फालतू कारणामुळे सत्कार… असे सगळे अराजक माजलेले होते…

देवदूत म्हणाला… पहा!  सगळे सुरळीत चाललेले असताना राणीला वंश हजार वर्षे टिकवावासा वाटला.. इकडे स्वतःचे आयुष्य किती ते माहिती नाही.

माणसाच्या क्षुधांना अंतही नाही आणि पारावार नाही… देवदूताच्या पत्नीने खिन्नपणे मान हलवली.

आणखी काय करणार!

 

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆  हतबल ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆  हतबल ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

चपला काढून जवळजवळ पळतच रेखा स्वयंपाकघरात  आली. ” काकू– काकू ऐका ना”….मी वळून पाहिलं आणि पहातच राहिले. नवी कोरी झुळझुळीत साडी नेसलेली, व्यवस्थित वेणी घातलेली आणि गोड हसत उभी असलेली रेखा आज खूप आनंदात दिसत होती. ” कशी आहे माझी साडी ?”…. “मस्तच. अगदी खुलते आहे तुझ्यावर “.. मी मनापासून म्हणाले. पण तिच्यापेक्षा तिच्या चेहेऱ्यावरचा

आनंदच जास्त सुंदर वाटत होता मला….” मिश्टरांनी आणलीये माझ्यासाठी. आणून रात्री गुपचूप कपाटात ठेवली होती”… तिला इतकी खुशीत असलेली मी आजपर्यंत कधीच पाहिली नव्हती. मी पूजेसाठी ठेवलेला गजरा नकळत तिला दिला. घाईघाईने तो केसात माळून, आरशासमोर उभी राहून, ती वेगवेगळ्या कोनातून स्वतःकडे हसत पहात होती. नंतर काम करतानाही गुणगुणत होती, स्वतःशीच हसत होती.

रेखा….२१-२२ वर्षांची असेल. सुंदर नसली तरी नीटस होती. नीटनेटकी राहायची. चेहरा शांत पण डोळे मात्र बोलके होते. दोन वर्षांपूर्वी पासून आमच्याकडे घरकामाला  येते आहे. सुरुवातीला सतत बावरलेली, घाबरलेली वाटायची, हळूहळू रुळली. नवरा वयाने बराच मोठा असावा. आईच्या हट्टामुळे हिच्याशी नाईलाजाने लग्न केल्याचं सारखं तिला ऐकवायचा म्हणे. पण हिच्या बोलण्यात कधीच कुठली तक्रार जाणवायची नाही. फारसं न बोलता, शांतपणे काम करायची. हळूहळू मला ती आवडायला लागली होती. पण ही आजची रेखा, याआधी मला कधीच दिसली नव्हती. आज तिच्या अंगोपांगी फुललेला तो निर्मळ आनंद पहाताना मलाच खूप छान वाटत होतं …..

पटापट काम संपवून ती निघूनही गेली …… आणि आज आता मी सकाळपासूनच तिची वाट पहात होते. दोनच माणसांच्या आमच्या घरात, काल तिच्यामुळे एक वेगळाच आनंद दरवळला होता … त्या आनंदाची मी वाट पहात होते. …‘ अजून का नाही आली ही ?‘.. मी अस्वस्थ व्हायला लागले होते.

—- बेल वाजली. मी घाईघाईने दार उघडलं… माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. रेखाच आली होती….. पण ही अशी ?….. लालबुंद डोळे… विस्कटलेला, सुजलेला चेहरा… अंगावर ठळक दिसणाऱ्या मारल्याच्या खुणा….. खूप खूप केविलवाणी दिसत होती. आत आली,आणि ‘ आई ‘….म्हणत

एकदम गळ्यात पडून रडायलाच लागली. ‘आई‘ ?……माझ्या मनात प्रचंड कालवाकालव होत होती. त्या क्षणी तिला आईच्या मायेची किती तीव्र गरज होती हे मला जाणवत होतं. मी कसं -तरी तिला खुर्चीत बसवलं. पाणी दिलं. आणि नुसतीच तिच्या डोक्यावर, पाठीवर हात फिरवत राहिले.

जरा वेळाने तिचं रडणं थांबलं, आणि तिने आदल्या रात्री घडलेला सगळा प्रकार मला सांगितलं …….. तिने कौतुकाने, हौसेने दिवसभर मिरवलेली साडी नवऱ्याने तिच्यासाठी नाही, तर त्याच्या ‘ मानलेल्या‘ बायकोसाठी आणली होती म्हणे. आणि हिने ती नेसलेली पहाताच नवरा प्रचंड भडकला होता. कसलाही विचार न करता त्याने तिला गुरासारखे मारले होते. शिव्यांचा भडीमार करत तुडवले होते. आणि तिच्या अंगावरची साडी फराफरा ओढून, फाडून टाकून घरातून निघून गेला होता. ही पार कोलमडून गेली होती. उपाशीपोटी रात्रभर रडत बसली होती. सकाळी नाईलाजाने उठून लटपटतच घरातली कामं तर उरकली होती. पण तिला घरात थांबावं असं वाटत नव्हतं. नवऱ्याची खूप भीती वाटत होती. त्याला आवरू शकेल आणि हिला सावरू शकेल असं हिच्या आयुष्यात कुणीच नव्हतं. म्हणून मग कामाला आली होती. माझ्यात तिच्या आईला शोधत होती. … फार फार हत- बल होऊन गेली होती….

आणि मी ?….मला तिच्यापेक्षा जास्त हतबल झाल्यासारखं वाटत होतं. जनरीतीनुसार आज ना उद्या ती नाईलाजाने वास्तव स्वीकारेलही. पण मी प्रत्यक्षात काय करू शकणार होते तिच्यासाठी? मला आई म्हणण्याची परवानगी तेवढी देणार होते का शहाजोगपणाने?….प्रत्यक्षात तिची आई होणं झेपणार होतं का मला खरंच? मलाच खूप हतबल झाल्यासारखं वाटतं होतं. फार फार अगतिक वाटतं होतं …….

 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

पत्ता : ४, श्रीयश सोसायटी, ५७१/५७२, केंजळे नगर, पुणे  ४११०३७.

मोबाईल: ९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लघुकथा – विचार … भावानुवाद ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग : लघुकथा – विचार … भावानुवाद ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

गीताताई मला मोठ्या बहिणीसारखी होती. तिचे यजमान वारले तेव्हा मी परदेशात होतो. पुढचं एक वर्षही मी स्वदेशी येऊ शकलो नाही. आता मात्र आल्याबरोबर मी तिला भेटण्यासाठी सरळ तिच्या घरी गेलो. ती घरी नव्हती. ती शाळेत गेली आहे असं कळलं तेव्हां मी शाळेत गेलो. ताईच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. उलट तिने माझं हसतमुखाने स्वागत केलं, आणि माझी समजूत घातली. “हेबघ, आपण कितीही रडलो तरी तुझे जिजाजी परत येणार नाहीत. मला दुःखी बघून इतरांना वाईटच वाटेल. म्हणून मी स्वतःला गुंतवून घेऊन आनंदी रहाण्याचा प्रयत्न करते. शाळेची प्रगती करण्याचं ध्येय्य मी ठरवलं आहे. मला स्वतः ला मूल नाही, शाळेतल्या विद्यार्थ्यांनाच मी माझी मुलं मानीन आणि शिक्षकपणाचा धर्म प्रत्यक्षात आणीन.

मूळ हिंदी लघुकथा-‘सोच’ – लेखक – डॉ. नरेंद्र नाथ लाहा

मूळ लेखकाचा पत्ता—२७,ललितपुर कॉलोनी, डॉ. पी. एन. लाहा मार्ग, ग्वालियर—म.प्र.-  ४७४००९ मो.९७५३६९८२४०.

मराठी अनुवाद – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणूसकीची हार..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ माणूसकीची हार ..अनुवादित कथा.. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆

चौधरी सगळ्यांना मदत करायचे,  हे सगळ्या कॉलनीत माहीत होतं. मानवता,  सत्य,  ईमानदारी यांची ते जणू प्रतिमूर्तीच होते. त्यांचं घर कोपर्‍यावर होतं. घर दोन्ही बाजूंनी उघडायचं. घराला दोन दरवाजे होते. मागचा दरवाजा आणि एक खिडकी कायम बंद असायची.

ते सुट्टीचे दिवस होते. त्यांची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. सकाळी सकाळी चौधरी म्हशीचं दूध काढून घरात शिरणार, एवढ्यात एक तरुण तिथे धावत धावत आला आणि म्हणाला,  `भाऊसाहेब मला वाचवा. माझ्यामागे चार गुंड लागलेत. मी हात जोडतो. आपले उपकार मी कधीच विसरणार नाही. कृपया मला कुठे तरी लपवून ठेवा.’

`आपण कोण?  कुठून आलात?   प्रकरण काय आहे? ‘

तरुण म्हणाला. मी ड्रायव्हर आहे. त्यांची गाडी एकदम मधे आली. थोडासा अ‍ॅक्सिडेंट झाला.!  बस!’ चौधरींची माणुसकी उफाळून आली. त्यांनी मागे-पुढे काही बघितलं नाही. त्याला घरात लपून बसायला सांगितलं आणि स्वत: दरवाजात उभे राहिले.

थोड्याच वेळात चार गुंड धावत आले. त्यांनी चौधरींना विचारलं, `कुणी तरुण इथे धावत आला होता का? ‘

चौधरी म्हणाले, `इथे कुणीच आलं नाही. सकाळपासून मी इथेच बसलोय. काय झालं?’ तो माणूस अ‍ॅक्सिडेंट करून इथे पळून आलाय. ‘  चौधरींनी माणुसकीची बाजू घेत त्यांना समजावण्याचा बराच वेळ प्रयत्न केला. `याचे परिणाम वाईट होतील.’  चारी गुंड त्यांना ताकीद देऊन हसत हसत पुढे गेले.

चौधरींनी कुलुप उघडलं आणि ते आत गेले. बघतात तो काय?  गोदरेजचे कपाट,  पेट्या सगळ्यांनी कुलुपे तोडलेली होती. कपडे पसरलेले होते. दागिने, रोख रक्कम गायब झालेली होती. मागचा दरवाजा उघडलेला होता. त्यांनी आपलं डोकं  बडवून घेत म्हंटल,  `हा माणुसकी दाखवल्याचा परिणाम.  काय करणार?  ते पाचही जण एकमेकांना मिळालेले होते. त्यांच्या योजनेपुढे माझी माणुसकी हरली.

 

मूळ कथा – इंसानियत हार गई  मूळ लेखक – शिवचरण सेन शिवा

 

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

 

ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लोककथा – पिसाची करामत ☆ डॉ.  मंजुषा देशपांडे

☆ जीवनरंग ☆ लोककथा – पिसाची करामत ☆ डॉ.  मंजुषा देशपांडे ☆

एका जंगलात एक आजी आणि तिचा नातू रहात असे.  आजी दिवसभर फिरुन रानातून फळे,  बिया, मूळ्या गोळा करी  आणि थोडे घरासाठी ठेवून बाकीचे जवळच्या गावात विकून टाकी.  तिचा माल शेलका असल्याने लवकर विकला जाई.

तिचा नातू मात्र भयंकर आळशी होता. सूर्य डोक्यावर येईपर्यंत लोळत पडे आणि फारतर जवळपासच्या काटक्या वेचून आणी. दिवसभरही तो उगीचच इकडे तिकडे करी.  जेवायची वेळ झाली की तो आजीला लाडीगोडी लावी.

आजीच काय पण आसपास रहाणारेही त्याला समजावत. त्याने आता कामधंदा केला पाहिजे म्हणून बजावत.

या आजीचे एक छोटेसे शेत होते,  डोंगराच्या पलिकडे आणि ओढ्याळ ओढ्याकाठी… तिथे ती धान आणि कुटकी, डाळी लावे.  तिथे जायचे म्हटलं की मात्र नातवाला उत्साह येई.  त्या दिवशी मात्र तो लवकर उठे आणि लवकर आवरूनही बसे.

तो तिथेही काही कामे करत नसेच पण तिथे त्याची मैत्रीण होती जीवा.  जीवा  अगदी त्याच्या विरूध्द …शहाणी आणि कामसू..

हा नातू लंब्या चवड्या बाता मारी,  तो म्हणायचा.. ‘तो काही हलकीसलकी कामे नाही करणार तर म्हणे तो एकच काम असे करेल की.. ‘ ..मग तो जीवासाठी काळा अबलख घोडा आणेल.  पाटलाच्या वाड्यापेक्षा टोलेजंग घर बांधेल.. जरीकाठी मुंडासे बांधून घुंगराच्या माळा घातलेल्या पांढ-या शुभ्र बैलजोडीच्या गाडीत बसेल.. आणि शेजारी लाडूचे मोठे ताट..असेल.. . मनात येईल तेवढे लाडू खाईल.

एकट्या जीवाचा त्याच्या या असल्या बोलण्यावर विश्वास होता..

बाकी सगळेजण त्याचे बोलणे करमणूकीसाठी ऐकत आणि टाळ्या वाजवून हसत.  त्याला लोक हसतात ते पाहून आजीला वाईट वाटे.

एक दिवस त्याची आजी त्याला खूपच रागवली,  तिने त्याला कामधंदा शोधण्यासाठी घरातून जवळ जवळ हाकलूनच काढले.

नातू हिरमुसून चालायला लागला,  खिशात बोरं होती..  एकेक बोरं खात खात जंगलात निघाला…असं फिरता फिरता उन्हं डोक्यावर आली.  पोटात भूक जाणवायला लागली.

तो थकून एका झाडाखाली मोठ्या दगडावर बसला तितक्यात त्याला..तिथे जवळच एका दुसऱ्या झाडाखाली त्याला एक मोठे निळ्या रंगाचे पीस दिसले.  हात लांबवून त्याने हातात घेतले तर काय… पीस त्याला म्हणाले… “आज दिवसभर चालून कसं वाटतंय तुला, रोज नुसता लोळत पडतोस ते… ” नातू त्याला म्हणाला… ‘एवढी बोलण्याची अक्कल आहे तर मला खायला घेऊन ये काहीतरी.. पीस म्हणाले, काय हवयं सांग,  लगेच आणतो.. नातू म्हणाला, “चार रोट्या आण आणि भाजी आण बरबटीची.”  लगेच ताट हजर.. वर पाण्याचा गडू पण.. नातवाने आजूबाजूला पाहिलं.

मग तो पिसाला म्हणाला… “लाडू आण बरं.”!. थोडे का चांगले ताटभर लाडू आले.

एवढे खाऊन आणि गटागट पाणी पिऊन नातवाला गाढ झोप लागली.

त्याला स्वप्नात त्या पिसाने त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या दिसल्या.  त्याला जाग आली तेव्हा चांगलीच संध्याकाळ झाली होती.

त्याच्या आजूबाजूला मात्र आणखी  काही निळीभोर पिसे पडली होती. त्याला एकदा वाटले, उचलावी सगळीच.. पण तो आळशी असला तरी लालची नव्हता.. पण त्याचे पीस कसे शोधावे… सगळी पिसे एकसारखीच होती.

मग त्याने त्यातल्या त्यात आठवून एक पीस उचलले आणि भराभर.. जवळ जवळ पळतच घरी पोचला.  घरी आजी काळजी करत होती,  त्याला म्हणाली, “हात पाय धुवून ये गरम भाकरी खायला..”.

तो म्हणाला,  भाकरी!  अगं लाडू,  पुरणपोळी काय हवं ते सांग.

हा नातू गोष्टी मोठ्या छान सांगे.

आजीने काही एक न बोलता एका थाळीत भाकरी आणि भाजी वाढली.  इकडे नातवाने पिसाला सांगितले.. पुरणपोळी,  लाडू आणि पाण्याचा गडू.. एक नाही दोन नाही.. काहीही आले नाही.

तो अगदी रडकुंडीला आला.

आजी म्हणाली, ” अरे तू ते जादूचे पीस समजून दुसरेच पीस घेऊन आला असशील.

त्या रात्री नातवाला कशीतरी झोप लागली. अगदी पहाटे उठून तो परत जंगलात गेला. सगळीकडे फिरूनही पिस काही दिसेना, शेवटी  आदल्या दिवसासारखेच एका झाडाखाली थकून बसल्यावर त्याला ते निळे पिस दिसले.

त्याने त्या पिसाला सगळी कहाणी सांगितली. तो पिसाला म्हणाला, “आता मी तुला माझ्या जवळच ठेवतो बघ.

पीस म्हणाले,” असं नाही चालत! “मला कुणीच पकडून ठेवू शकत नाही. “बाकीच्या पिसातून तुला मला शोधून काढावं लागेल” पण त्या दिवसाचे त्याला जेवण मात्र मिळाले. पण घरी नेण्यासाठी लाडू घ्यावे म्हटले तर ते पिसाबरोबर गायब.

त्याही  संध्याकाळी परत तसेच .झाले.. बघता बघता महिना उलटला.  हा मुलगा महिनाभर रोज पहाटे उठून जंगलात जाई,  मग जाता जाता फळे,  फूले,  बिया गोळा करी,  एकदा तर भलं थोरलं मधमाशांचे पोळेही घेऊन आला. जंगल एवढे देखणे आहे हे त्याला प्रथमच कळले. किती झाडे… किती फळे …किती पक्षी,..  किती प्राणी!

प्रत्येकाच्या नाना त-हा…हळूहळू त्याला प्रत्येक फूला फळाचे उपयोग कळू लागले. रोज दुपारी झोप येईनाशी झाली.  कोणत्या झाडाखाली ते पीस होते हे ही तो विसरून गेला.

आजी मात्र खूश होती.  आळशी नातू सुधारला.

एक दिवस  जंगलातून त्या गावचा राजा चालला होता.  राजाला जंगलात सुंदर फूले दिसली.  राजा स्वतः घोड्यावरून उतरला.

हया मुलाने डोंगरावरून पाहिले..तो ओरडला.. “अहो ती विषारी फूले आहेत…

पण त्याचा आवाज राजाला ऐकायलाच आला नाही. राजाने एक फूल तोडले आणि तो बेशुद्ध  पडला.  राजाबरोबर त्याचे सगळे मंत्रीमंडळ होते पण नेमके राजवैद्य त्या दिवशी आले नव्हते.

हा बाकीच्यांना म्हणाला.. घाबरु नका… त्याने राजाला थोड्या सपाट जागेवर वाळल्या औषधी पानांच्या गादीवर झोपवले. त्याने कसलासा पाला,  मुंगुसाच्या लाळेत मिसळून वाटला आणि त्याचा रस राजाच्या नाकात थेंब थेंब असे सोडत राहिला.

दोन दिवसानंतर राजाला शुध्द आली तोपर्यंत राजवैद्यही तिथे पोचले होते.

सर्वांनी या मुलाचे कौतुक केले.  राजाने मोठे बक्षीस दिलेच आणि राजवैद्यानी तर त्याला त्यांचे सगळे ज्ञान देऊन त्यांचा वारसच ठरवले.

आता तो आळशी राहिला नव्हता. राजवैद्य म्हणून  त्याचा मोठा लौकीक झाला होता.  त्याची सगळी स्वप्ने खरी झाली.

पण अजूनही कधी तो एकटा जंगलात जातो.  तो त्या झाडाखाली बसला की पीस येतेच. पण घरी मात्र जाताना नेमके पीस सापडत नाही..

खरे तर आता तो मुलगा नाही चांगला उंच निंच माणूस आहे.  त्याला आणि जीवाला चार गोड मुले आहेत.. असे एकट्याने उठून जंगलात भटकणे त्याला आता शोभत नाही. पण त्या पिसाचे कुतुहल मात्र त्याला आजही तिथे घेऊन जाते.

पण बहुतेक आजी आणि जीवाला त्याबद्दल माहिती आहे कारण पिसाबद्दल,  तो जेव्हा कळकळीने बोलतो तेव्हा त्या दोघी आपसात डोळे मिचकावून हसतात.

(एका नाॅर्वेजियन लोककथेचा स्वैर अनुवाद)

© डॉ. मंजुषा देशपांडे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सामाजिक दूरी (अंतर) ☆ डॉ. वसुधा गाडगीळ 

डॉ. वसुधा गाडगीळ 

☆ जीवनरंग  ☆ सामाजिक दूरी (अंतर) ☆ डॉ. वसुधा गाडगीळ  ☆

”  वर्तमानपत्रातही आले आहे  , आता सामाजिक रीत्या सर्वांना एकमेकांपासून दूर राहावेच लागणार आहे. कुठेही येणे नको जाणे नको ! आम्हाला सर्वांना घरात कोंडूनच राहावे लागणार. समजलात का ! कसली नातीगोती  आणि कसलेकाय ! ” दिलीपने अख्या कुटुंबाला ही बातमी वाचवून दाखवली आणि तणावाने म्हणाला

” केवढा कठीण काळ आला आहे ! ”

” अगदी सोपे आहे दिलीप ! तुम्ही सगळेजण  एकमेकांबरोबर बसून जेवणखाण करता ना….. मी तर कित्येक वर्षांपासून बाजूच्या पड़वीत एकटा… ”

वडिलांच्या तोंडून सामाजिक दूरीचे उदाहरण ऐकून दिलीप अचंबितच झाला !

 

© डॉ. वसुधा गाडगीळ 

संपर्क –  डॉ. वसुधा गाडगिल  , वैभव अपार्टमेंट जी – १ , उत्कर्ष बगीचे के पास , ६९ , लोकमान्य नगर , इंदौर – ४५२००९. मध्य प्रदेश.

मोबाईल  – 9406852480

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ सुनमुख (भावानुवाद) ☆ सुश्री माया सुरेश महाजन

श्रीमती माया सुरेश महाजन

परिचय 

एम. ए – इंग्रजी, एम. ए. अर्थशास्त्र बी.एड.

हायस्कूल क्लासेस अध्यापिका, कोचिंग क्लासेसमध्ये इंग्लिश बरोबरच कॉर्मसचेही अध्यापन.

वाचन, लेखन, गायन, वत्तृत्व, अभिनय या क्षेत्रांत आवड व सहभाग ज्यासाठी अनेक बक्षिसे.

आकाशवाणी दिल्ली, पणजी (गोवा) औरंगाबाद येथे विविध कार्यक्रमात सहभाग, अयोजन, लेखन, सादरीकरण, ‘साहित्य संपदा’ कार्यक्रमात काव्यवाचन व मुलाखत.

गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र लेखनाबरोबरच अनुवाद क्षेत्रात कार्यरत दै. वर्तमानपत्रे आणि मासिकांमधून ललित लेखन, प्रासंगिक, व्यक्ति परिचय, पुस्तक परिचय, कविता प्रकाशित.

स्वलिखित कविता व लेखांवर आधारित कार्यक्रम ‘शब्द सूरांच्या गाठीभेटी’ चे पंधरावर प्रयोग.

‘मंगळागौरीचा जागर’ या कार्यक्रमासाठी सूत्र संचालन व लेखन 150 वर प्रयोग, स्टार-प्रवाह वाहिनीतर्फे कार्यक्रमास प्रथम क्रमांक व इतर ठिकाणीही बक्षिसे.

पहिल्या ‘मराठवाडा लेखिका साहित्य सम्मेलनात’ काव्यवाचन.

उस्मानाबाद येथे मराठवाडा लेखिका साहित्य सम्मेलनात सन्मान.

पहिल्याच अनुवादित पुस्तकाला (माध्यम) केंद्रिय हिंदी निदेशालयाचा उत्कृष्ट अनुवादाचा  (रु. एक लाख) पुरस्कार ज्यासाठी सह्याद्री वाहिनी (मुंबई) व औरंगाबाद दुरदर्शनवर मुलाखत.

☆ जीवनरंग  ☆ सुनमुख श्रीमती माया सुरेश महाजन 

मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. दुसर्‍या दिवशी लक्ष्मीपूजन आणि सुनमुख पहाण्याचा कार्यक्रम होणार होता. सगळ्या नातेवाईकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. की सासूबाई सुनमुख पाहाण्यासाठी आपल्या सुनेला काय देतील?

सुनबाई जेव्हा तयार होऊन आली आणि सासूबाईंच्या पाया पडली, तेव्हा सासूबाईंनी मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला; नंतर विचारले, ‘‘सुनबाई, तुला काय हवे?’’

‘‘सुनबाई, आज तर तुझा हक्काचा दिवस आहे. चांगले छान जडावाचे तोडे मागून घे.’’ एका नातेवाईकाने सुचविले.

‘‘अरे नाही, हिर्‍याचे नेकलेस मागून घे.’’ दुसर्‍याने सांगितले, थट्टा मस्करी सुरू झाली. तिसर्‍याने म्हटले, स्वत:साठी गाडी मागून घ्या. नवरीदेखील इतरांबरोबर मंद स्मित करत होती आणि सासूसुद्धा पण सासूच्या मनात मात्र धडधड सुरू झाली की नातेवाईकांच्या सांगण्यावरून सून खरोखरीच एखादी अशी मागणी न करो जी आपल्याला पूर्ण करता येणार नाही. मग सासुने म्हटले, ‘‘हं सुनबाई, बोल, काय हवं तुला?’’

‘सासुबाई नव्हे आई! मी खूप लहान असतानाच माझे वडील वारले. वडिलांचे प्रेम काय असते ते कधी अनुभवलेच नाही. आईनेच आम्हा दोघी बहिणींचे पालन-पोषण केले, मोठे केले. माझी अशी इच्छा आहे की, तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासोबतच मला मामंजीचे नव्हे,  बाबांचेही प्रेम मिळावे, जेणेकरुन मला वडिलांच्या प्रेमाची अनुभूती येईल. आणखी काही नको मला!’ सुनेनं मोठ्या विनम्रतेने म्हटले. सगळ्या नातेवाईकांच्या नजरेत सुनेबद्दल स्तुतीचे भाव दिसू लागले. सासुने सुनेच्या डोक्यावरून हात फिरवला, तिच्या मस्तकाचे चुंबन घेतले आणि तिला आपल्या मिठीत घेतले.

 

मूळ हिंदी कथा – मुंह दिखाई  – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ धोका ☆ श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

श्री भगवान वैद्य प्रखर

☆ जीवनरंग : लघुकथा : धोका –  श्री भगवान वैद्य ‘प्रखर’☆

मोबाइल वाजला. घरात पोछा लावित असलेल्या बाईनी मोबाइल उचलला आणि घाई-घाईत चालत जाऊन बाहेर झाडांना पाणी देत असलेल्या वयस्क गृहस्थांना म्हणाली, ‘‘बाबूजी…फोन…!’’

वयस्क गृहस्थ अलजाइमरनी आजारी.  थरथरत्या हातात फोन घेऊन नांव बघू लागले. नंतर संयमी स्वरांत बोलू लागले, ‘‘हैलो…हैलो…हैलो…आवाज येत नाही आहे…।’’

तिकडून पुन्हा आवाज आला, ‘‘हैलो…हैलो…बाबा…! तुम्ही लोकं घरी आहात काय बाबा…! हैलो…हैलो…बाबा…माझी घरी यायची इच्छा आहे बाबा…’’ उत्तराखातर वयस्क गृहस्थ फक्त हैलो…हैलो…हैलो करीत राहीले. ‘‘हैलो…हैलो…मला कांहीच ऐकायला येत नाही आहे…हैलो…!’’ आणि वयस्क   गहस्थानी मोबाइल बंद करुन टाकला.

थोड्या वेळानी पुन्हा बेल वाजली. वयस्क व्यक्तिने नाव वाचले आणि स्वत: बंद होईपर्यंत बेल वाजू दिली.

‘‘आवाज तर येत होता. स्पीकर सुरु होता न! मी ऐकला. अनुरागचाच आवाज होता. तो घरी येतो म्हणतो. तिथे कोणत्या परिस्थितीत आहे आपला मुलगा कोण जाणे? …तुम्ही असं कां बरं केलं?’’ शेजारी मनी-प्लांट सावरत असलेली वयस्क स्त्री जवळ येऊन उभी झाली होती.

‘‘गौरी…पंचायतीनं कालच निर्णय घेतला आहे की जो पर्यंत हे कोरोना वायरस संपत नाही तोवर बाहेरुन कोणालाच गावांत येऊ दिलं जाणार नाही. आपला मुलगा ज्या शहरात आहे तिथे सर्वात जास्त केसेस पॉजिटिव निघालेल्या आहेत. अशा स्थितित त्याचे इथे येणे संपूर्ण गावाकरिता धोक्याचे ठरू शकते. ’’

‘‘आणि त्याचे तिथेच राहणे..?’’ थरथरत्या आवाजात एक प्रश्न हवेत गुंजारव करित राहीला.

वयस्क गृहस्थानी ऐकले खरे पण कांहीच उत्तर दिले नाही. बंडी च्या खिशातून एक रुमाल काढला आणि बाहेर आलेल्या अश्रुंना वाट मोकळी करुन देत पुन: झाडांकडे वळले.

© श्री भगवान वैद्य ‘प्रखर’

संपर्क : मो. 9422856767, 8971063051  * E-mail[email protected] *  web-sitehttp://sites.google.com/view/bhagwan-vaidya

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गणपतीबाप्पा,उंदीर आणि चांदोबा.. ☆ सौ. दीपलक्ष्मी नारायण पुजारी

सौ. दीपलक्ष्मी नारायण पुजारी

शिक्षण:M.Sc.B.ed.

अनुभव: २० वर्षे ज्युनिअर कॉलेज ला अध्यापक, मेडिकल एन्ट्रन्स परीक्षा कोचिंग

वाचन व लिखाणाची आवड, दिवाळी अंकात प्रसिद्ध

कोल्हापूर आकाशवाणी वर प्रसारित

☆ जीवनरंग : गणपती बाप्पा , उंदीर आणि चांदोबा सौ. दीपलक्ष्मी नारायण पुजारी

आजी गोष्ट सांगत होती. अमेय समरसून ती ऐकत होता.

‘एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून फिरायाला निघाले होते. त्यांना पाहून च्ंद्राला हसू आवरेना….’ इटुकल्या पिटुकल्या उंदरावर बसलेले तुंदीलतनु गणपती बाप्पा डोळ्यापुढे येताच अमेयही हसू लागला.

‘दात काढू नकोस. चंद्राने दात काढले, म्हणून गणपती बाप्पा त्याला रागावले आणि शाप दिला’ आजी पुढे गोष्ट सांगू लागली.

गोष्ट ऐकता ऐकता त्याला एकदम आठवलं, आई म्हणते, गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता. सकळ जगाचं ज्ञान त्यांच्या ठायी आहे.

बाबा म्हणतात, कॉम्प्युटरच्या मेमरीत सर्व जगाच्या ज्ञानाचा साठा आहे. माऊसच्या एका क्लिकवर तो आपल्याला खुला होतो.

अमेय विचार करू लागला. म्हणजे… म्हणजे… जगातले सगळे कॉम्प्युटर म्हणजे गणपती बाप्पाच झाले की! आणि त्यांना चालवणारे माऊस म्हणजे उंदीरच. मग इतके सगळे गणपती बाप्पा पाहून चांदोबा कुणाकुणाला हसेल? इतक हसला तर त्याचं पोट नाही दुखणार? आणि हसून हसून दात नुसते दुखणारच नाहीत, तर सैल होऊन खाली पडतील. मग तो तूप रोटी कशी खाईल? मग कोजागिरीच्या दुधावरच त्याला संतुष्ट व्हावं लागेल!‘  या सगळ्या आपल्या कल्पनेचं त्याचं त्यालाच हसू आलं.

‘अरे, झालं काय तुला हसायला?’ आजी विचारात होती, पण आपली कल्पना आईला सांगायला अमेय स्वैपाकघरात पळालादेखील.

 

© सौ. दीपलक्ष्मी नारायण पुजारी

मो. – 9665669148

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नकारानंतरची किंमत …अनुवाद… ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

सुश्री मीनाक्षी सरदेसाई

☆ जीवनरंग : नकारानंतरची किंमत …अनुवाद… ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

रामलाल वर्माना विद्यार्थीदशेतच साहित्याची आवड होती. सरकारी कार्यालयातून मोठ्या ऑफिसरच्या पदावरून ते निव्रुत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या बँगा उघडून पाहिल्या. त्यात साहित्यविषयक मासिकं, नामवंत लेखक, कवी यांची पुस्तकं होती. जरी त्यांनी ती पूर्वी वाचलेली होती, तरीही त्यांनी ती पुन्हां चाळायला, वाचायला सुरुवात केली. स्वतः ही काही लेख, कथा त्यांनी लिहिल्या. त्यातलं काही साहित्य त्यांच्या नावाने प्रसिद्ध झालं. आकाशवाणीवरही त्यांनी कथावाचन केलं. त्यांना मिळणारं मानधन आणि अर्धीमूर्धी पेंशन ते पुस्तकं खरिदण्यात खर्च करीत. ह्या वयात पुस्तकी किडा होण आणि सतत साहित्यात मग्न रहाणं हे त्यांच्या पत्नीला व सुनेला मुळीच आवडत नव्हतं. सुनेचं म्हणणं होतं की त्या जुन्या पुस्तकांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.

तरीही वर्मा निव्रुत्तीनंतर पंधरा वर्षं जगले. नि लेखन, वाचन करीत राहिले. त्यांना पान, तंबाखू, सिगारेट असं कोणतंही व्यसन नव्हतं. त्यांच्या मरणानंतर घरच्यांनी, हळूहळू त्यांची पुस्तकं, डायऱ्या, रद्दीत घालून टाकलं. त्यानंतर पाच वर्षांनी, विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट संशोधनाच्या कामासाठी त्याघरी आला. त्यातला एक विद्यार्थी म्हणाला, “आम्ही स्व. रामलाल वर्मांच्या साहित्यावर संशोधन करीत आहोत. त्याची पुस्तकं, हस्तलिखितं जे तुमच्याकडे असेल ते आम्हाला द्या. त्यांची योग्य ती किंमत द्यायला आम्ही तयार आहोत.” घरातली माणसं एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिली.

मूळ हिंदी लघुकथा – नकारात्मक ऊर्जा

लेखक  –  श्री केदारनाथ ‘सविता ‘

लेखकांचा पत्ता –  पुलिस चौकी रोड, लालडिग्गी, सिंहगड गली, चिकाने टोला, मीरजापुर, २३१००१  (उ.प्र.) मो. ९९३५६८५०६८.

मराठी अनुवाद मीनाक्षी सरदेसाई मो.8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print