मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठीची कमाल बघा तर.. ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ मराठीची कमाल बघा तर.. ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर ☆ 

मराठीची कमाल बघा तर—-

 

अडीच अक्षरांचा कृष्ण,अडीच अक्षरांची लक्ष्मी

अडीच अक्षरांची श्रद्धा,अडीच अक्षरांची शक्ती!

 

अडीच अक्षरांची कान्ता,अडीच अक्षरांची दुर्गा

अडीच अक्षरांची ईच्छा,नी अडीच अक्षरांचा योध्दा!

 

अडीच अक्षरांचे ध्यान,अडीच अक्षरांचा त्याग

अडीच अक्षरांचेच कर्म,नी अडीच अक्षरांचाच धर्म!

 

अडीच अक्षरांत भाग्य,अडीच अक्षरांत व्यथा

अडीच अक्षरांतच व्यर्थ,बाकी सारे मिथ्या!

 

अडीच अक्षरांत सन्त,अडीच अक्षरांचा ग्रंथ

अडीच अक्षरांचा मंत्र,नी अडीच अक्षरांचे यंत्र!

 

अडीच अक्षरांची तुष्टी,अडीच अक्षरांचीच वृत्ती

अडीच अक्षरांतच श्र्वास,नी अडीच अक्षरांतच प्राण!

 

अडीच अक्षरांचा मृत्यू,अडीच अक्षरांचाच जन्म

अडीच अक्षरांच्याच अस्थि,नी अडीच अक्षरांचाच अग्नि!

 

अडीच अक्षरांचा ध्वनी,अडीच अक्षरांचीच  श्रुती

अडीच अक्षरांचा शब्द,अडीच अक्षरांचाच अर्थ!

 

अडीच अक्षरांचा शत्रू,अडीच अक्षरांचा मित्र

अडीच अक्षरांचेच सत्य,अडीच अक्षरांचेच वित्त!

 

जन्मापासुन मृत्युपर्यंत,अडीच अक्षरांत बांधले..

आयुष्य हे मानवाचे,

नाही कुणा उमगले..!!

नाही कुणा उमगले..!!——–

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रामाचे दर्शन ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे

?इंद्रधनुष्य?

☆ रामाचे दर्शन ☆ सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

“श्री.तुलसीदासांना” एकदा एका भक्ताने विचारले की…

“महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?”

तुलसीदास म्हणाले :- “हो”

भक्त :- मला पण दर्शन घडवाल का ???

तुलसीदास :- “हो नक्की”

★ तुलसीदासांनी त्याला खूप समर्पक उत्तर दिलं, जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेल !!!

तुलसीदास म्हणाले:- “अरे हे खूप सोप्पं आहे !!!  तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील.”

प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल—-त्यासाठी मी तुला एक सूत्र श्लोक  सांगतो. त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सूत्र लागु होईल!!!

भक्त :-“कोणते सूत्र ?”

तुलसीदास :- हे ते सूत्र —–

||”नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण || 

|| तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम || “

वरील सूत्राप्रमाणे

★ आता कोणाचेही नांव घ्या, त्याची अक्षरे माेजा…

१) त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा.

२) त्यात (पंचतत्व मिलन) ५ मिळवा.

३) त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा.

४) आलेल्या संख्येला (अष्ट सो भागे) ८ ने भागा.

पुर्ण भाग जात नाही!!!

दरवेळेस बाकी २ शिल्लक राहतेच …

ते दोन म्हणजेच “राम” ही दोन अक्षर होय…

★ विश्वासच बसत नाही ना???

उदा. घेऊ… कोणाचेही नाव निवडा, अक्षर कितीही असोत !!!

★ उदा. ..निरंजन…४ अक्षरे

१) ४ ने गुणा ४x४=१६

२) ५ मिळवा १६+५=२१

३) दुप्पट करा २१×२=४२

४) ८ ने भागा ४२÷८= ५ पुर्णांक, बाकी मात्र २ !!!

बाकी नेहमी दोनच अक्षरे उरतील ती म्हणजे – “राम” !!!

विशेष म्हणजे सूत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिलं आहे!!!

1) चतुर्गुण म्हणजे ४ पुरुषार्थ :- धर्म, अर्थ, काम,मोक्ष !!!

2) पंचतत्व म्हणजे पंचमहाभौतिक :- पृथ्वी, जल, अग्नि, वायु , आकाश!!!

3) द्विगुण प्रमाण म्हणजे माया व ब्रह्म असे दोन !!!

4) अष्ट सो भागे म्हणजे आठ  दिशांनी ( चार दिशा :-पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण , चार उपदिशा – आग्नेय,नैऋत्य, वायव्य, ईशान्य,  आठ प्रकारची लक्ष्मी (आग्घ, विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग आणि योग लक्ष्मी )

★आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासून पहा …

विस्मयकारक वाटेल पण बाकी नेहमी २ च येईल…

यात तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची व अतुट रामभक्तीची ओळख पटते !!!

जय श्रीराम

संग्रहिका – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दया.. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य?

☆ दया.. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित ☆ 

भाजीवाली रोजच्या सारखी दुपारी दारात आली आणि ओरडून विचारले, “भाजी घ्यायची का मावशी?”

आई आतून नेहमी सारखी ओरडली, “काय आहे भाजीला?”

“गवार हाय, तंबाटी, पालक,….” एवढे बोलताच आई म्हणाली, “थांब आले”

दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, “पालक कसा?”

“रुपयाची गड्डी” – भाजीवाली

“पन्नास पैशाला दे, चार घेते” – आई

“नाय जमणार मावशी “- भाजीवाली

“मग राहू दे”  – आई

भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. “बारा आण्याला दीन” – भाजीवाली

“नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते” – आई

“नाय जमणार” – भाजीवाली

.. आणि पुन्हा गेली

थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तिला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून परिक्षण करुन चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले. भाजीवाली भारा उचलायला लागताच तिला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, “जेवली का नाही?”

“नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेऊन , मग सैपाक, मग जेवण” – भाजीवाली. 

“थांब जरा. बस इथं. मी आले” म्हणत, आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात तिला आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळं दिले. पाणी पिऊन भाजीवाली गेली.

मला राहवलं नाही. मी आईला विचारले, “तू  एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केली पण नंतर जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तिला खायला दिले.”*

आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले…

—-“ व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये”…. 

 

संग्राहक : स्मिता पंडित 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फक्त प्रेम करा ! ☆ संग्राहक – सुश्री माधुरी परांजपे

? इंद्रधनुष्य ? 

☆ फक्त प्रेम करा ! ☆ संग्राहक – सुश्री माधुरी परांजपे ☆

 

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण

सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी 

नेमकं काय असतं हे ” सख्ख प्रकरण ? ” 

सख्खा म्हणजे आपला 

सख्खा म्हणजे सखा

सखा म्हणजे जवळचा

जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केंव्हाही, काहीही सांगू शकतो 

त्याला आपलं म्हणावं, त्याला सख्ख म्हणावं !

 

ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो  

मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदु स्फुंदु रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

 

ज्याच्याकडे गेल्यानंतर 

आपलं स्वागत होणारच असतं 

आपल्याला पाहून त्याला हसू

येणारच असतं

अपमानाची तर गोष्टच नसते 

फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !

 

पंढरपूरला गेल्यावर 

विठ्ठल म्हणतो का…..

या या फार बरं झालं !

 

माहूर वरून रेणुका मातेचा 

किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ?

या म्हणून !

मग आपण का जातो ?

 

कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते….म्हणून !

हा ही एक प्रकारचा ” आपलेपणाच !”

 

लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ? 

किंवा आपण नेलेले तो काय घेतो ?

काहीच नाही.

 

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का, 

किती रोड झालीस ? कशी आहेस ? 

सुकलेला दिसतोस, काय झालं ? 

नाही म्हणत.

 

मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं ?

पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?

प्रेम, माया, आपुलकी, विश्वास

म्हणजेच ” आपलेपणा !”

हा आपलेपणा काय असतो ?

 

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ

भेटल्या नंतर बोलण्याची ओढ 

बोलल्या नंतर ऐकण्याची ओढ

निरोप घेण्या आधीच पुन्हा

भेटण्याची ओढ !

 

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं 

त्याला आपलं म्हणावं 

आणि चुलत, मावस असलं तरी

सख्ख म्हणावं !

 

मी त्याचा आहे आणि तो माझा

आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे…..

म्हणजे ” आपलेपणा ! “

 

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पहिल्या डोळे भरून येतात 

आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात 

तो आपला असतो, 

” तो सख्खा असतो !”

 

लक्षात ठेवा, 

 

ज्याला दुसऱ्या साठी ” सख्ख ” होता येतं

त्यालाच कुणीतरी सख्ख असतं, 

बाकी फक्त परिचितांची यादी असते 

नको असलेल्या माणसांची गर्दी असते !

 

तुम्हीच सांगा…..

 

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?

ज्याला तुमच्या दुख्खाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का ? 

 

आता एक काम करा 

 

करा यादी तुम्हाला असणाऱ्या

सख्ख्या नातेवाईकांची 

झालं न धस्सकन 

होतयं न धडधड 

नको वाटतंय न यादी करायला….

रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी 

आणि मानायला लागा सर्वांना आपलं 

कोणी कितीही झिडकारलं तरी 

कारण…….

राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही 

जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं 

म्हणून फक्त प्रेम करा 

फक्त प्रेम करा !!

 

संग्राहक : सुश्री माधुरी परांजपे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातील पहिल्या 100 श्रीमंतात एक शिक्षक सुध्दा !! ☆ संग्राहक – श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ भारतातील पहिल्या 100 श्रीमंतात एक शिक्षक सुध्दा !! ☆ संग्राहक – श्री विनय माधव गोखले ☆ 

फोर्ब्स’ने भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची नुकतीच एक यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये एकेकाळी ट्युशन्स घेणार्‍या एका शिक्षकाचाही समावेश केला आहे. ‘फोर्ब्स’ च्या म्हणण्यानुसार त्याची सध्याची संपत्ती १.८ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

एका शिक्षकाकडे असलेली इतकी रक्कम वाचून कदाचित आपणांस आश्चर्य वाटत असेल. पण, इतकी संपत्ती मिळविण्यामागे संघर्षही मोठाच आहे.

कोण हा शिक्षक ? काय आहे त्याचा संघर्ष ?

केरळ मधील कन्नूर जिल्ह्यातील अझिकोड या ठिकाणी एका शिक्षक दांपत्याच्या पोटी १९८० सालच्या दरम्यान त्याचा जन्म झाला. घरच्या शैक्षणिक वातावरणामुळे त्याच्यावर उत्तम संस्कार झाले. त्यामुळेच त्याने मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आणि तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करू लागला.

सुट्टीच्या निमित्ताने काही दिवस तो बेंगलोर ला गेला. तेथे त्याचे काही मित्र CAT परीक्षेची तयारी करत होते. त्या मित्रांना त्याने गणित विषयासाठी मार्गदर्शन केले. त्याचे ते सर्वच मित्र त्या परीक्षेत यशस्वी झाले.

त्या मित्रांनी त्याला ट्युशन सुरू करण्याविषयी आग्रह धरला. मित्रांच्या आग्रहाचा सकारात्मक विचार केला.

नोकरी सोडली आणि आपले संपूर्ण लक्ष ट्युशन देण्यावर केंद्रित केले.

त्याच्या शिकविण्याच्या पद्धतीने अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. त्याचा क्लास छोट्याशा खोलीतून हॉलमध्ये गेला. हॉल मधून ऑडीटोरियममध्ये आणि तेथून थेट स्टेडियममध्ये गेला. एकाच वेळी तब्बल २५००० विद्यार्थ्यांची त्याने ट्युशन घेतली. इतका तो प्रचंड प्रसिद्ध झाला.

प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शहरात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याने पैसा, वेळ आणि श्रम तिन्हींचा अपव्यय होऊ लागला. एकाच वेळी, एकाच ठिकाणाहून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. असे साधन निर्माण करण्याचा विचार त्याच्या मनात डोकावू लागला आणि त्याला एक कल्पना सुचली. त्याने एक ऑनलाईन शिकवणी घेणारी ‘Think and Learn Private Ltd.’ ही कंपनी सुरू केली. त्याच्या माध्यमातून एक वेबसाईट सुरू केली. त्यावर अनेक व्हिडिओ अपलोड केले. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होऊ लागला. ती साईट ही लोकप्रिय झाली.

मग त्याने एक ऍप तयार केले. या ऍपच्या माध्यमातून ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्याना सोप्या भाषेत सर्व विषयांचे शिक्षण, अगदी घरबसल्या मिळू लागले. अल्पावधीतच या ऍपने पालकांचे, विद्यार्थ्यांचे लक्ष आकर्षित केलेच शिवाय अनेक गुंतवणूक दारांचे ही लक्ष आकर्षित केले. आणि त्याला यशाच्या शिखरावर पोहचविले.

ते ऍप म्हणजेच BYJU’s आणि त्याचा संस्थापक बायजू रविंद्रन होय.

BYJU’s ही भारतातील नव्हे तर जगातील सर्वोत्तम एडटेक कंपनी आहे. एका खोलीत सुरू झालेल्या ट्युशन चा पसारा साऱ्या जगभर पसरला आहे. यासाठी बायजू रविंद्रनचे कष्ट, कामावरील श्रद्धा आणि स्वतःवरील विश्वास या गोष्टी कारणीभूत आहेत.

प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील सर्वोत्तम गुणाची जाण असणे फार गरजेचे आहे. एखादी गोष्ट अतिशय सोपी करून सांगणे हा सर्वोत्तम गुण बायजू यांच्याकडे होता.

त्याचा त्यांना शोध लागला. त्यामुळेच ते यशाच्या शिखरावर पोहोचू शकले.

आज भारतातील सर्वाधिक १०० श्रीमंतांच्या यादीत “बायजू रविंद्रन” यांचा समावेश आहे.

 

संग्राहक : श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डिग्निटी ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?इंद्रधनुष्य? 

☆ डिग्निटी ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

चितळे काका म्हणजे आमच्या बिल्डिंगची शान होते. सत्तरीच्या आसपास वय… पण गडी अजूनही फुल्ल टू एनर्जेटीक होता. 

कलप लावून केलेले काळे केस… टिपिकल कोब्रा गोरा रंग, आणि पिढीजात घारे डोळे. 

रोज नेमाने योगा करुन मेंटेन्ड अशी सडपातळ, उंच शरिरयष्टी. आणि हसल्यावर आपल्या उजव्या गालावर कातिलाना खळी पडते हे जाणून असल्याने, प्रयत्नपुर्वक हसरा ठेवलेला चेहरा. 

घरात शाॅर्ट्स आणि मलमलचे शुभ्र कुर्ते… तर बाहेर म्हणजे अगदी थाटच… जिन्सची पँट, त्यावर लीवाईज्, यू.एस. पोलो, रोडस्टर पैकी कुठलासा ब्रँडेड टी-शर्ट, पायात रेड टेपचे शूज, डोळ्यांना रे-बॅनचा गाॅगल…

असे हे चितळे काका कोपर्‍यावरुन मिरच्या-कोथिंबीर आणायलाही, इतक्याच तामझामात बाहेर पडायचे… ते ही त्यांची पल्सर काढत. 

खरंच पण… त्यांना हे असं पल्सरवरुन कुठे जातांना पाहिलं की, आम्हा मुलांना वेस्टर्न मुव्हीजमध्ये घोडा दौडवत येणारा क्लिंट ईस्टवुडच आठवे. 

प्रकरण एकंदर रंगीन तर होतंच पण… विशेषतः आम्हा तरुण, बिन लग्नाच्या मुलांत उठ-बस करण्याची क्रेझ फार होती त्यांना. कदाचीत आमच्याकडून मिळणार्‍या वाईब्ज, हेच त्यांच्या सदैव चिरतरुण रहाण्याचं टाॅनिक असावं. 

पण एवढं असूनही चितळेकाका मुली वा बायकांबाबतीत प्रचंड सोवळे होते. कधीही कुठलीही वात्रट कमेंट वगैरे पास केली नव्हती त्यांनी. आणि त्यामुळेच कदाचित आम्ही मुलं-मुली, खूप कन्फर्टेबल होत असू काकांबरोबर…

तर अशा ह्या आमच्या सदाबहार चितळे काकांची अर्धांगीनी… म्हणजेच चितळे काकू. काकांच्या अगदीच विरुद्धार्थी व्यक्तिमत्व. पासष्टीच्या असाव्यात काकू. एकन् एक पिकलेला केस… त्या पिकल्या तरिही दाट अशा केसांचा, सैलसर बांधलेला शेपटा. 

त्या माहेरच्या गोगटे… त्यामुळे त्याही तुकतुकीत गोर्‍या नी घार्‍याही. कपाळावर चार आण्याच्या आकाराचं ठसठशीत कुंकू. घरी व बाहेर पण. अंगावर एक साधीशी काॅटनची साडी. 

फरक इतकाच की बाहेर असतांना पदर दोन्ही खांद्यांवरुन घट्ट गुंडाळून घेत, त्याचं टोक एका हाताने पकडलेलं. पायात साध्याशा चपला… आणि एका हातात कायम मोठाली पिशवी… जातांना रिकामी, तर येतांना टम्म फुगलेली. 

आम्ही मुलांनी काकूंना कधी, काकांच्या मागे बाईकवर बसलेलंही पाहिलं नव्हतं. काकू फार कोणांत मिसळतही नसत. अगदी तीन-चार त्यांच्याच वयाच्या आसपास असलेल्या, बिल्डिंगमधल्या बायका. त्यात एक माझी आई असल्याने, माझ्याशी येता जाता फक्त हसत… बस्स. 

एकूणच आम्हा मुलांचच काय पण बिल्डिंगमधल्या प्रत्येकाचंच हे मत होतं की, काकांना अगदीच म्हातारी बायको मिळाली. घरातून बाहेर पडलं की मठात, नी तिथून परत घरात… हे एवढंच विश्व होतं काकूंचं. 

पण हे असं अरसिक प्रकरण गळ्यात पडलं असूनही काकांना मात्र आम्ही कधीच काकूंबद्दल, एका शब्दानेही खंत व्यक्त करतांना पाहिलं नव्हतं. चार खोल्यांतून त्या दोघांचा संसार, नेटाने चालू होता. काका कायमच ‘जाॅली गुड फेलो’ वाटत आलेले आम्हाला. 

तर एकदा आमच्या सातव्या फ्लोअरवरच्या रेफ्युजी एरियात रात्रीची आम्हा मुलांची पार्टी चालू होती. बिल्डिंगमधल्याच एका मुलाची एंगेजमेंट ठरल्याची पार्टी होती ती. आम्ही जवळ जवळ वीसेक मुलं-मुली होतो… आणि होते अर्थातच एकमेव चितळे काका. 

पिझ्झा, पावभाजीचा बेत होता… साॅफ्ट ड्रिंक्स होती… आम्हा चार-पाच जणांसाठी, बिअरचा एक क्रेटही होता. थोडक्यात धमाल चाललेली… मजा, मस्ती चाललेली. 

किशोर कुमारची दोनेक गाणी ऐकवून, वाहवा मिळवून काका पावभाजीची प्लेट हातात घेऊन खुर्चीवर बसले होते. आणि… 

…आणि अचानक काका खाली कोसळले! छातीला हात लावत कळवळत होते ते. आम्हा मुलांचं अक्षरशः धाबं दणाणलं. कोणीतरी जाऊन चितळे काकूंना कळवलं. 

दोन्ही खांद्याभोवती पदर गुंडाळलेल्या काकू, गडबडीतच वर आल्या. एव्हाना चितळे काकांची हालचाल पूर्ण बंद झाली होती. आणि पुढे जे काही आम्ही मुलांनी पाहिलं, ते निव्वळ अविश्वसनीय होतं…

काकांच्या मानेखाली हात घालत त्यांना, काकूंनी सरळ रेषेत झोपवलं. खाली गुडघ्यांवर बसत त्यांनी दोन्ही हातांनी काकांच्या ब्रँडेड शर्टची बटणं अक्षरशः तोडली आणि स्वतःची बोटं ईंटरलाॅक्ड करत काकांना चेस्ट कम्प्रेशन द्यायला सुरुवात केली. 

तीस कम्प्रेशन्सचा एक सेट दिल्यावर, काकूंनी त्यांना रेस्क्यू ब्रिदिंग दिलं. पुढच्या तीसच्या सेटकडे त्या वळणार तोच… अचानक काका एक दिर्घ श्वास घेत, शुद्धीवर आले. 

काकूंनी पटकन उभं रहात, गुंडाळलेल्या पदराने तोंडावरचा घाम पुसला. माझ्याकडे बघून मला विचारलं… 

“गाडी काढशील?” 

मी आधीच बेदम घाबरलेलो… माझे पायच थरथरू लागले. काकूंनी माझी अवस्था ओळखत, माझ्याकडे गाडीची किल्ली मागितली. मी थरथरत्या हातांनी खिशातून काढत अवाक्षरही न बोलता ती काकूंसमोर धरली. 

काकूंनी खांद्याभोवती गुंडाळलेला पदर खाली घेत, कंबरेला खोचला. केसांचा सैलसर शेपटा सोडत केस दोन्ही हातांनी एकत्र आणत, घट्ट शेपटा बांधला. आणि बोलल्या एकदम आॕथिरीटीने… 

“Lets move…”

आम्ही पाच-सहा जणांनी काकांना उठवून धरत धरत लिफ्टमधून खाली नेत माझ्या गाडीत मागच्या सीटवर झोपवलं. एक मुलगा काकांचं डोक मांडीवर घेऊन मागे बसला. 

मी काकूंकडे पाहिलं… त्यांनी डोळ्यांनीच मला खूण केली ‘रिलॅक्स’ अशी… आणि डोळ्यांनीच सांगितलं “बाजूला बस.”

ड्रायव्हींग सीटवर स्वतः काकू बसल्या… अतिशय स्मुथली, लिलया गाडी चालवत त्या गाडी हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. वाटेत एका हाताने स्टेअरींग सांभाळत त्यांनी हाॅस्पिटलमध्ये फोन करत, स्ट्रेचर रेडी ठेवायला सांगितलं. त्यांच्या फॅमिली डाॅक्टरलाही फोन करत त्यांनी हाॅस्पिटलमध्ये बोलावून घेतलं…

गाडी पार्किंग लाॅटमध्ये पर्फेक्टली पार्क करत त्यांनी काकांना ताबडतोब अॕडमीट करवून घेतलं. आणि तातडीने त्यांच्यावर उपचारही सुरु करवले. 

सगळं मार्गी लागल्यावर काकू, लाॅबीमध्ये आम्ही दोघं बसलेलो तिथे आल्या. माझ्याकडे गाडीची चावी देत, माझ्या डोक्यावरुन त्यांनी हात फिरवला. आम्हा दोघांच्याही गालांना दोन्ही हातांनी टॅप करत, मंदशा हसल्या आमच्याकडे बघत नी म्हणाल्या… 

“Doctor said he is out of danger now… thank you so much for all your support… तुम्ही निघा आता… मी आहे इथे…” 

मघा कंबरेला खोचलेला पदर काढत, त्यांनी तो पुन्हा दोन्ही खांद्यांभोवती गुंडाळला. केसांचा चाप सोडत, ते पुन्हा सैलसर बांधले. आणि पाठ करुन आमच्याकडे, त्या चालू पडल्या काकांच्या रुमकडे. 

अगदी त्या क्षणी चितळे काकूंचं पिकलेपण… मला चितळे काकांच्या स्वतःला न पिकू देण्याच्या अट्टाहासासमोर, प्रचंड मोठं भासलं होतं. 

तारुण्य तर सगळेच गोंजारतात आपापलं, अगदी चितळे काकांसारखे म्हातारेही. पण असं एखादंच कोणी असतं चितळे काकूंसारखं… जे आपलं म्हातारपणही ‘डिग्निटी’ने मिरवू शकतं, कुठलाही उसना आव न आणता! 

काकू चालत चालत दिसेनाशा झाल्या… नी अचानक मला जाणवलं की, मी चितळे काकांना पहिल्यांदाच ‘म्हातारा’ म्हणालो होतो.

– अनामिक  

संग्राहक : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुलना ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ तुलना ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर ☆ 

तुलना(Comparison) 

श्वेताने एका तासात १० किमी अंतर कापले. आकाशने तेच अंतर दीड तासात पूर्ण केले. 

दोघांपैकी तंदुरुस्त कोण? किंवा कोणाचा फिटनेस चांगला? 

अर्थात सर्वांचे उत्तर श्वेता असेल. 

श्वेताने हे अंतर तयार केलेल्या ट्रॅकवर पूर्ण केले तर आकाशाने दगड-मातीच्या वाटेने चालत असे म्हटले तर ???

मग सर्वांचे उत्तर आकाश असेल. 

पण जेव्हा आम्हाला कळले की श्वेता ५० वर्षांची आहे तर आकाश २५ वर्षांचा आहे ?? 

मग सर्वांचे उत्तर पुन्हा श्वेता असेल. 

पण आम्हाला हे देखील कळले की आकाशचे वजन तब्बल १४० किलो आहे तर श्वेताचे वजन ६५ किलो आहे. 

पुन्हा सर्वांचे उत्तर आकाश असेल 

जसे आपण आकाश आणि श्वेताबद्दल अधिकाधीक माहिती मिळवतो, तसे तसे कोण चांगले आहे याबद्दल आपली मते भिन्न होतात आणि निर्णय बदलतात.

जीवनाचे वास्तवही असेच आहे. आपण प्रत्येकाबद्दल खूप वरवर आणि घाईने आपले मतं तयार करतो, ज्यामुळे आपण स्वतःला आणि इतरांना न्याय देऊ शकत नाही. 

प्रत्येकाला वेगवेगळ्या संधी मिळतात. 

प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे. 

प्रत्येकाची साधन-संपत्ती भिन्न आहे. 

प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. 

प्रत्येकाचे उपाय वेगवेगळे आहेत. 

प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे.

म्हणूनच आपल्या आरोग्याची, संपत्तीची, परिस्थितीची अथवा जीवनाची श्रेष्ठता कोणाशी तुलना करण्यात नाही तर स्वतःची परीक्षा घेण्यामध्ये आहे. तुम्ही सर्वोत्तम आहात,  एकमेकाशी वादविवाद व तुलना करणं टाळा तुम्ही जसे आहात तसेच रहा आणि तुमच्या परिस्थितीनुसार सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करत रहा. निरोगी रहा, समाधानी रहा, हसत रहा, भगवंताच्या भक्तीत राहा, प्रामाणिक प्रयत्न करत रहा.

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृतज्ञता…. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ कृतज्ञता…. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

एका वाळवंटात एक चिमणी रहात होती. ती खूप आजारी होती, तिला पंख नव्हते, तिच्याकडे खाण्यापिण्यासाठी पण काहीच नव्हते आणि रहायला घरही नव्हतं. 

एके दिवशी एक कबूतर तेथून जात होतं. चिमणीने त्या कबुतराला थांबवलं व विचारलं, “तू कुठे जात आहेस?” कबूतराने उत्तर दिलं, “मी स्वर्गात जात आहे.”

ती आजारी चिमणी म्हणाली, “कृपा करून माझा त्रास कधी संपणार या बद्दल माहिती मिळवशील का?” कबूतर म्हणालं, “नक्कीच, मी तपास करेन.” आणि कबुतराने त्या आजारी चिमणीचा निरोप घेतला.

कबुतर स्वर्गात पोहोचलं आणि प्रवेश द्वारावरील देवदूताला आजारी चिमणीचा निरोप सांगितला. 

देवदूत म्हणाला, “तिच्या जीवनातील पुढील सात वर्षे तिला असाच त्रास सहन करावा लागेल व तिच्या आयुष्यात कोणताच आनंद नसेल.”

कबूतर म्हणालं, “हे ऐकून तर ती आजारी चिमणी अजूनच निराश होईल. यावर तुम्ही काही उपाय सांगू शकता का?”

देवदूत म्हणाला, “मी सांगतो तसा तिला जप करायला सांग – परमेश्वरा, तू मला जे काही दिलं आहेस, त्याबद्दल मी तुझी आभारी आहे, धन्यवाद.”

कबूतराने आजारी चिमणीला भेटून देवदूताने पाठविलेला निरोप सांगितला.

सात दिवसानंतर जेव्हा कबुतर तिथून जात होतं तेव्हा त्याने बघितलं की ती चिमणी खूप आनंदी आहे. तिच्या शरीरावर पंख फुटले होते, वाळवंटात एक लहानसे झाड उगवले होते, जवळंच पाण्याचा तलावसुद्धा तयार झाला होता आणि ती चिमणी आनंदाने गात होती, नाचत होती.

हे सर्वं पाहून कबूतर आश्चर्यचकित झालं. कारण देवदूताने सांगितलं होतं की पुढील सात वर्षे त्या चिमणीच्या आयुष्यात कोणताच आनंद नसेल. ह्या  कुतूहलाने कबूतर परत स्वर्गाच्या दरवाजावर असलेल्या देवदूताला भेटयला गेलं.

कबुतराने त्याचे कुतूहल देवदूताला सांगितलं. देवदूताने उत्तर दिलं,  “होय, हे सत्य आहे की पुढील सात वर्षे त्या चिमणीच्या आयुष्यात कोणताच आनंद नव्हता. परंतु प्रत्येक क्षणी चिमणी, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते”, हा जप करीत होती. म्हणून तीचं जीवन बदलून गेलं. 

ती जेव्हा गरम वाळूवर पडत असे, तेव्हा म्हणत असे, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते.”

जेव्हा ती उडू शकत नसे तेव्हा ती म्हणत असे, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते.”

जेव्हा तिला तहान लागत असे आणि आजुबाजूला पाण्याचा थेंब सुद्धा नसे तेव्हा सुद्धा ती हेच म्हणत असे की, “देवा, तू मला जे काही दिलं आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते.”

परिस्थिती कोणतीही असो चिमणी हाच जप आळवित असे म्हणून तिची त्रासदायक सात वर्षे, सात दिवसात बदलून गेली.”

जर आपण लक्षपूर्वक पहिलं तर, आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे आपल्याला सापडतील जेव्हा कृतज्ञतेच्या भावनेने परिस्थितीला पूर्णपणे बदलून टाकले, इतकेच काय एखाद्याचे संपूर्ण जीवन देखील. 

जर का आपणसुद्धा प्रत्येक प्रसंगी, “हे देवा, तू मला जे काही दिले आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो”, हा जप करु शकलो तर त्यात आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे.

ही गोष्ट आपला दृष्टिकोन, आपल्या जवळ काय नाही पासून आपल्या जवळ काय आहे पर्यंत बदलण्यास मदत करते. 

उदाहरणादाखल आपले डोके दुखत असताना जर आपल्या उर्वरित आरोग्याबद्दल आपण देवाचे आभार मानले की, “माझे बाकीचे शरीर पूर्णपणे निरोगी ठेवल्याबद्दल तुमचे आभार” तर आपली डोकेदुखी सुद्धा फारशी त्रास देत नाही.

चला तर मग मिळालेल्या सर्वं आशीर्वादांबद्दल परमेश्वराचे आभार मानूया.. त्यामुळे आपल्या जीवनात नक्कीच सुखद बदल घडून येईल.

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ग्रूपचं नातं ☆ संग्राहक – सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

ग्रूपचं नातं ☆ संग्राहक – सुश्री प्रभा हर्षे ☆

पायचं नातं म्हणून,

निर्माण केला ग्रुप..

सगळेच आपले म्हणून,

भावना जपा खूप..

 

कोणी दिला रिप्लाय,

म्हणून हुरळून जायचं नाही..

आणि नाही दिला रिप्लाय,

म्हणून खंत मानायची नाही..

 

सर्वांची मतं कायम,

एकसारखी असतील कशी..

नकारार्थी, सकारार्थी,

प्रत्येकाची वेगळी अशी..

 

राखायची असेल अबाधित,

एकमेकांची साथ..

तर द्यावाच लागतो सर्वांना,

प्रेमाचा हात..

 

प्रत्येकाचं मत,

वेगळं असायलाच हवं..

तरच घडेल इथे,

रोज काहीतरी नवं..

 

काय बरं होईल,

नावडत्या जोकवर हसलं तर..

मनातल्या भावना झाकून,

थोडसं फसलं तर..

 

फक्त एकच करा मित्रांनो,

वेळ काढा थोडा..

प्रत्येक जण असावा,

दुसऱ्यासाठी वेडा..

 

कधी गडबड, कधी बडबड,

कधी बरीच शांतता..

दाखवून द्या ना एकदा,

अंतरंगातील एकात्मता..

 

दुरावलेल्या दोन मनांत,

एक पूल बांधणारा..

एखादा असतोच ना,

निखळणारे दुवे सांधणारा..

 

ग्रुप असो नात्यांचा,

वा असो तो मित्रांचा..

आपल्या हजेरीने बनवा,

स्वप्नांमधल्या चित्रांचा..

 

©  सुश्री प्रभा हर्षे 

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातील पहिली महिला वैमानिक – सुश्री सरला ठकराल ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतातील पहिली महिला वैमानिक –  सुश्री सरला ठकराल ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

वयाच्या १६ व्या वर्षी तिचं लग्न झालं. लग्नानंतर तिला एक मुलगीही झाली तरी ती वयाच्या २१ व्या वर्षी भारतातील पहिली महिला वैमानिक झाली. वयाच्या २४ व्या वर्षी ती विधवा झाली तरी खचली नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात तिने आपल्या कर्तुत्वाचा ठसा शेवटपर्यंत उमटवलाचं. कोण होती ही महिला ?

” लग्नानंतर माझ्या करिअरचं काय होणार ? ” असा प्रश्न पडलेल्या फेसबुकवरील हजारो महिलांना आज हा लेख सादर समर्पण.

१९३० चा तो काळ होता. मुलगी १६ वर्षाची झाली म्हणजे ती थोराड झाली असा सार्वत्रिक समज होता. साहजिकच सरलाच्या आई वडिलांनीही तिचं लग्न वयाच्या १६ व्या वर्षीच लावून दिलं आणि ती सरला शर्मा झाली. अखंड भारतातील लाहोरमध्ये ती राहत होती. तिचा नवरा पायलट होता. शिवाय घराण्यातील एकूण ९ माणसे पायलट झाली होती. त्यामुळेच असेल कदाचित तिने एक भव्य स्वप्न पाहिलं- आपणही एक दिवस पायलट व्हायचं. ज्या काळात स्त्रिया कारही चालवत नव्हत्या त्या काळात विमान चालवायचं स्वप्न पाहणं म्हणजे अशक्य कोटीतली गोष्टच होती. त्यात ती एका मुलीची आई झाली होती. आता तिचं ते स्वप्न पूर्ण होणं केवळ अशक्यच होतं. परंतु ज्यांच्याकडे भव्य स्वप्न असतात ते लोक कुठल्याही अडचणींनी कधीच खचून जात नाहीत. उलट त्यांच्यातील इर्ष्या त्यांना अधिक प्रेरित करत राहते. सरला शर्मासुद्धा आपल्या निश्चित ध्येयापासून मुळीच ढळली नाही. नवऱ्याचं प्रोत्साहन होतंच पण त्याहीपेक्षा तिच्या सासऱ्यांनी दिलेलं प्रोत्साहन तिला लाख मोलाचं वाटलं.

जेव्हा ती वयाच्या २१ व्या वर्षी देशातील पहिली महिला वैमानिक झाली तेव्हा तिची मुलगी ४ वर्षाची होती आणि त्यावेळी तिने साडी नेसून विमान चालवलं होतं. त्यामुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तब्बल एक हजार तासाचा विमान उड्डाणाचा अनुभव तिच्या पाठीशी होता. त्यामुळे साहजिकच तिला ग्रुप ‘ए’ परवाना मिळाला. प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळवण्यासाठी ग्रुप ‘बी’ परवाना मिळवणं आवश्यक होतं. तिने त्याचीही तयारी सुरु केली. दुर्दैवाने त्याचवेळी तिच्यावर आभाळच कोसळलं. एका अपघातामध्ये तिच्या पतिचं निधन झालं. तरीही ती आपल्या ध्येयापासून ढळली नाही. आपण कमर्शिअल पायलट व्हायचच हे तिचं स्वप्न होतं. पण त्याच वेळी दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला आणि तिचं स्वप्न त्या वणव्यात जळून खाक झालं. युद्धामुळे ट्रेनिंग देणारी ती संस्थाच बंद पडली. दोन मुलींना घेऊन ती लाहोरहून दिल्लीला आली आणि तिने दुसरं लग्न केलं. सरला शर्माची सरला ठकराल झाली.

स्वप्न भंग झालं तरी नाउमेद न होता ती पेंटिंग शिकली. फाईन आर्ट मध्ये तिने डिप्लोमा मिळवला. ती ज्वेलरी डिजाईन आणि कपडे डिजाईनचा व्यवसाय करू लागली. त्यातही तिने नेत्रदीपक यश मिळवलं.ज्या काळात महिलांना शिक्षण घेणंही कठीण होतं त्या काळात सरला आपल्या करिअरचा विचार करायची. वयाच्या अखेरच्या घटकेपर्यंत त्या आपल्या व्यवसायात मग्न राहिल्या. वयाच्या ९५ व्या वर्षी २००९ मध्ये त्यांचं निधन झालं. वयाच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत राहिल्या.

सरला ठकरालनी देशातील लाखो महिलांना एक नवी वाट दाखवली. त्या काळात फक्त चूल आणि मुल म्हणजेच संसार समजणाऱ्या देशातील महिलांनी आज वैमानिक क्षेत्रात देशाचा झेंडा अटकेपार नेऊन फडकावालय. गेल्या ५ वर्षात परवाना मिळालेल्या ४२६७ वैमानिकांपैकी तब्बल ६२८ महिला वैमानिक आहेत. महिलांची जागतिक टक्केवारी केवळ ३ टक्के असताना भारतीय महिलांनी १४.७ टक्केची मजल गाठून सरला ठकराल यांच्या कर्तुत्वाला एक प्रकारे सलामच केल्याचे म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या सौदामिनी देशमुख या देशातील तिस-या महिला वैमानिक ठरल्या. त्यांनी बोईंग ७३७ आणि एअर बस ३२० चालवून देशातील महिलांची मान गर्वाने ताठ केली.

मित्रानो, आज हा लेख आपल्या घरातील महिलांना आवर्जून वाचायला द्या. कदाचित तुमच्या घराण्याचं नाव काढणारी उद्याची सरला ठकराल किंवा सौदामिनी देशमुख तुमच्या घरातही असू शकेल.

संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print