मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वृक्षवल्ली आम्हा…! ☆ श्री पंकज कोटलवार

?इंद्रधनुष्य? 

☆ वृक्षवल्ली आम्हा…! ☆ श्री पंकज कोटलवार ☆

वृक्षवल्ली आम्हा ‘डॉक्टरे’!..

आशिया खंडातील सर्वात पहिले आणि सर्वात मोठे मानसोपचार रुग्णालय चेन्नईमध्ये आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ’ अशा नावाने भारतात सूप्रसिद्ध असलेल्या या संस्थेला आता सव्वादोनशे वर्ष पूर्ण होतील.

गेल्या दहा वर्षांपासून या इस्पितळात वेगवेगळ्या मानसिक विकारांमूळे त्रस्त असणाऱ्या रूग्णांवर एक अनोखा प्रयोग केला जात आहे, आणि ह्या उपचारप्रणालीला प्रचंड यश मिळल्याने ती झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या उपचारांना ‘ग्रीन थेरपी’ म्हणजे ‘हरित उपचार’ असे म्हणतात.

यामध्ये मनोविकारांशी लढा देणाऱ्या व्यक्ती आपला संपूर्ण दिवस इस्पिळाच्या विस्तीर्ण आणि हिरव्यागार बागेमध्ये काम करण्यास सांगितले जाते.

असे मनोविकाररूग्ण जे वर्षानूवर्ष कधी कोणाशीही बोलले नाहीत, हसले नाहीत, ज्यांच्या सर्व भावना आटून गेल्या होत्या, ज्यांची जगण्याची इच्छाच मरून गेली होती, असे वेगवेगळ्या प्रकारचे रूग्ण जेव्हा हिरवीगार पाने, रंगबेरंगी फूले आणि कोमल हिरवळीच्या देखभालीमध्ये आपला दिवस घालवतात, त्यांच्यात आश्चर्यकारक बदल पहायला मिळतो.

निसर्गाची जादू अशी की उदासिनता, निराशा आणि गंभीर डिप्रेशन यासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असणाऱ्या व्यक्तीदेखील निसर्गाच्या सानिध्यात आपली दूःखे विसरू लागतात.

त्यांच्या चित्तवृत्ती प्रफूल्लित होतात. त्यांच्यात काम करण्याचा उत्साह आणि जोम येतो. भूतकाळात त्यांच्या मनावर झालेल्या खोल जखमा देखील हळूहळू वेगाने भरू लागतात, काही महिन्यांनी तर त्या जखमांचे व्रणही शिल्लक राहत नाहीत. जणू काही त्या व्यक्तीचा नवा जन्मच होतो.

ही निसर्गाची अद्भूत किमयाच म्हणावी लागेल की, केवळ काही महिने दररोज बागकाम केल्यामूळे माणसाच्या वाईट आठवणी पूसल्या जाऊन त्या रूग्णांमध्ये आनंदाचा झरा निर्माण होतो.

ज्यांनी वर्षानूवर्ष आपल्या मनोविकारांसाठी गोळ्या औषधे घेतली पण म्हणावा तसा फायदा झाला नाही, अशा रूग्णांचा देखील हरित उपचारांमूळे कायापालट झाल्याची अनेक उदाहरणे इथे पहायला मिळतात.

या संस्थेच्या संचालिका पूर्णा चंद्रिका सांगतात की मनोविकार रूग्णांनी ग्रीन थेरपीनूसार ठरवून दिल्याप्रमाणे नियमित बागकाम केल्यामूळे त्यांच्यातली एकाग्रता वाढल्याचे दिसून आले, फूप्फूसांना शूद्ध हवा मिळते, मेंदूला चांगल्या प्रमाणात ऑक्सीजन मिळतो. बागकामामूळे मनामध्ये आणि शरीरामध्ये उर्जेचा संचार झाल्याचा अनूभव येतो. त्यांचा मूड छान राहतो. चिडचिड, रागराग, कटू आठवणी, द्वेषभावना, संताप कूठल्याकूठे गडप होतात, न्युनगंड, भयगंड विरघळून जातात. निराशा, डिप्रेशन पळून जातात. रूग्णांनी सकारात्मक प्रतिसाद द्यायला सूरूवात केली की गोळ्याऔषधे देखील प्रभावीपणे आपले काम बजावतात आणि जलदगतीने रूग्ण बरा होण्यात यश मिळते.

बागकाम करून मनोविकारांना बरे करण्याची संकल्पना निजहल शोभा नावाच्या एका ट्रस्टमूळे इथे रुजली. २००७ मध्ये निजहल शोभा या संस्थेच्या प्रमूख शोभा मेनन सांगतात की हिरव्या हिरव्या वृक्षांमध्ये, त्यांच्या कोवळ्या पानांमध्ये, इथल्या रंगबेरंगी फूलांमध्ये आणि या चवदार फळांमध्ये निश्चितच मनाला प्रसन्न करण्याची जादू लपलेली आहे. फक्त मनोरूग्णांनीच नाही तर आनंदी जीवनाची आस असलेल्या प्रत्येक व्यक्तीने दररोज आपला काही वेळ अशा बागेमध्ये व्यतित केला पाहिजे. दिवसातून काही वेळ बागकाम करणे हे एक प्रकारे मनाच्या बॅटरीला रिचार्ज केल्यासारखे आहे. यातून मनाला सूखद गारवा मिळतो. आत्म्याला थंडावा मिळतो. निसर्ग आपल्याला एका अनामिक तृप्ततेची जाणीव करून देतो. एका आंतरिक शांततेची अनूभूती देतो. हा आनंद शब्दात वर्णन करण्यापलिकडचा आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला या ग्रीन थेरपीची गरज आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून निजहल चेन्नईमधील सार्वजनिक हरितपट्ट्यांचे जतन आणि संवर्धन करत आहे. हरित उपचारांचे महत्व पटल्यामूळे निजहलसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांची वर्षागणिक वाढत गेली. आज मोठ्या संख्येने लोक वृक्षारोपणासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी एकत्र येतात. आधी त्यांना वाटायचे की आपण सामाजिक काम करत आहोत, पण आता ग्रीन थेरपी हा मनाला प्रसन्न करणारा उपचार असल्याचा अनूभव आला आहे.

आजकाल डॉक्टर आणि हॉस्पिटल म्हणलं की आपल्या पोटात गोळाच येतो, एखाद्या थ्री स्टार हॉटेलला लाजवतील, अशा अलिशान इमारती, तिथलं चकचकीत फर्निचर, लॉजसारख्या अलिशान खोल्या, तिथल्या सूखसूविधा, आवाक्याबाहेरचे उपचार, डोळे पांढरे होतील इतकी महाग औषधे, पांढरे कोट घालून सेवाभावाच्या गोंडस पांघरणाखाली पेशंटला मनसोक्त लूटणारी टोळी, एवढेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

इंजेक्शन आणि सलाईनच्या सूया खूपसून हॉस्पीटलच्या पलंगावर लोळत पडणे, आणि भरमसाठ गोळ्या औषधांचा मारा सहन करणे हीच आज सर्वात मोठी मानसिक, शारिरीक आणि आर्थिक शिक्षा झाली आहे. जो स्वतःच्या शरीराची, प्रकृतीची हेळसांड करतो, त्या प्रत्येकाला भविष्यात त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते.

त्यापेक्षा सजग राहून स्वतःच्या आरोग्याची आणि पर्यायाने स्वतःच्या मनाची निगा राखणे हाच पर्याय आपण निवडायला हवा.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असे आपले साधूसंत सांगून गेले, पण हे वृक्षवल्ली नूसतेच सोयरे नाही तर किती चांगले डॉक्टर आहेत हे अनूभवण्यासाठी तरी आपण दिवसातून थोडा वेळ का होईना, बागकामामध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजे.

 

©️ पंकज कोटलवार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बेअरफुट काॅलेज : सुशिक्षितांच्या अहंकाराला दिलेली चपराक..… ☆ संग्राहक – श्री सतिश वि  पालकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ बेअरफुट काॅलेज:सुशिक्षितांच्या अहंकाराला दिलेली चपराक..… ☆ संग्राहक – श्री सतिश वि  पालकर ☆

जयपूरपासून १०० किमी अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं गाव आहे. बंकर रॉय नावाच्या एका अवलियाने तिथे ‘बेअरफुट कॉलेज’ नावाच्या एका जादुई वास्तूची स्थापना केली आहे. त्याविषयीच तुम्हाला थोडक्यात सांगायच आहे –

दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले.

‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं.

जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे.

यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा.

१९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.

संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं.

मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘women empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘women empowerment’ म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.

दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो.

येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात.

याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला फक्त चक्कर यायची बाकी असते.

या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात.

ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात. एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती.

शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले.

मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…

मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’

त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली,

‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं.

नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण.

इंग्रजी आलं पाहिजे ते शेक्सपिअर वाचायला नव्हे, तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं द्यायला.

विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला.

संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते

जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो?

शिकण्याला आत्मविश्वासाचे व रोकड्या व्यवहाराचे पंख फुटले की काय चमत्कार घडू शकतो हे सांगणारं बेअरफुट कॉलेजचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

‘बेअरफुट कॉलेज’ला जाण्यापूर्वी त्याविषयी अधिक जाणून घ्यायला मी ‘राजस्थान पर्यटन’ कचेरीत गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यांकडे या जागेविषयी चौकशी केली.

त्यांना कुणालाच ‘बेअरफुट कॉलेज’ माहित नव्हतं. त्यांनी माझ्यासमोर जयपूर येथील आपल्या स्वतःच्या मुख्यालयाला फोन लावला.

त्यांनाही कुणाला स्वतःच्याच राज्यातील ‘तिलोनिया’ किंवा बेअरफुट कॉलेजविषयी काहीही माहिती नव्हती. या देशात काही भलं काम करायचं असेल तर कुठून सुरुवात करावी लागणार आहे, याची ही एक झलक होती.

‘बेअरफुट कॉलेज’च्या गेटमधून बाहेर पडलो तेव्हाच मनाशी पक्क ठरवलं – यापुढे या वास्तूचा प्रसार आणि प्रचार जमेल तसा आणि जमेल तिथे, आपण स्वतः करायचा. गेलं वर्षभर मी ते करतोय.

संग्राहक : श्री सतिश वि  पालकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अंधारातून प्रकाशाकडे..… ☆ संग्राहक – सुश्री माधुरी परांजपे

? इंद्रधनुष्य ? 

☆ अंधारातून प्रकाशाकडे..… ☆ संग्राहक – सुश्री माधुरी परांजपे ☆

खूप वर्षापूर्वी `रिडर्स डायजेस्ट’ मध्ये  वाचलेली ही कथा. ती मनाच्या कुपीत कायमची वसली.

तेरा-चौदा वर्षाचा अंध मुलगा डेव्हिड हार्टमन,  आपल्या बाबांना मोठ्या उमेदीने विचारतो, `बाबा… अगदी मनापासून सांगा हं… मी डॉक्टर होऊ शकेन?’

स्वभावाने प्रॅक्टिकल आणि व्यवसायाने बँकर असलेले त्याचे बाबा आतून हलतात. एकदम गप्प होतात. गहन विचारात गढून जातात. `काय सांगायचं या अंध मुलाला? पण या अति उत्साही आणि उमद्यामुलाचा तेजोभंग तरी कसा करायचा?’

ते म्हणतात, `डॉक्टर? बेटा, तू प्रयत्न केल्याशिवाय तुला कसं कळेल? तू प्रयत्न करशील ना?’

जन्मताच डोळ्याच्या लेन्समध्ये प्रॉब्लेम घेऊन आलेला डेव्हिड, आठ वर्षाचा झाला आणि त्याला पूर्ण अंधत्व आलं. तेव्हापासून तो आपल्या बाबांना, `मी हे करू शकतो का?.. ते करू शकतो का?…’ असं सतत विचारायचा.

दहा वर्षाचा असताना त्याने बाबांना विचारले, `बाबा, मीबेसबॉल खूळू शकेन?’

`वेल, चल! प्रयत्न करूया.’ त्याचे बाबा म्हणाले. त्या दोघांनी मग त्यावर विचार करून मार्ग शोधला. बाबांनी तो बॉल जमिनीवरून सरपटत त्याच्या दिशेने सोडायला सुरुवात केली. डेव्हिड हळूहळू बॉलच्या गतीचा आवाज ओळखून बॉल पकडायला शिकला. नंतर तो बॅटिंग शिकला. गवतातून फिरत येणार्‍या बॉलचा आवाज एकदम आतून ऐवकून तो बॉल कॅच करायला शिकला. काही काळाने त्याने यात प्राविण्य मिळवले.

Realm of possibility . काही अशक्यप्राय गोष्टी शक्य होतात… या तत्वानुसार डेव्हिडच्या कुटुंबाने दृढ निश्चय केला आणि त्याला कठोरपणे स्वावलंबी बनवायला सुरुवात केली. काही वेळा काहीच न दिसल्यामुळे तो रडायला लागायचा आणि म्हणायचा, `ममा, मी काहीच करू शकत नाही.’ मग त्याची आई त्याला कुशीत घेऊन म्हणायची, `माहीत आहे रे…’  डेव्हिडची बहीण बार्बरा मात्र कठोर होती. अर्थात त्याच्या भल्यासाठीच. आपलं ब्रेलचं घड्याळ जर पहिल्या मजल्यावर विसरला, तर डेव्हिड तिला आणून द्यायला सांगायचा. बार्बारा म्हणायची, `तुझा तू जा आणि आण. तुला काायवाटतं, कायम तुझ्यादिमतीलाकुणी ना कुणीअसणारआहे?’

तर असा डेव्हिड मोठा होऊ लागला. त्याला नक्की कळलं, की अंधत्व ही ट्रॅजिडी नाहीये. आपण काहीही करू शकतो. त्याचा हा आत्मविश्वास दिवसेंदिवस बळावत गेला.  तेराव्या वर्षी त्याने आपल्या आई-बाबांना आणि बहिणीला सांगून टाकलं, की त्याला डॉक्टर व्हायचय….

डेव्हिडने शिक्षणाचा मार्ग नक्की केला आणि त्या नवीन करिअरचा अभ्यास सुरू केला. त्याने अंध मुलांसाठी असलेली स्थानिक शाळा सोडली आणि त्याने आपलं नाव `हारटाउन्स हायस्कूल’ मध्ये घातलं. सगळ्यांना Realm of possibility चं.. तत्व मान्य होतं, तरीही… मनोदोषचिकित्सक होणं, त्या Realm of possibilityच्या  नक्कीच बाहेरचं होतं. त्यांना वाटत होतं, डेव्हिडची महत्वाकांक्षा मूर्खपणाची आहे. कॉलेजमध्ये त्याच्या शिक्षकांनीदेखील त्याला समजावायचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, `तुझ्या आवाक्यातले इतर विषय का निवडत नाहीस?  म्हणजे इतिहास वगैरे…’  

डेव्हिड म्हणाला, `मी काही इतर माणसांपेक्षा वेगळा नाहीये. `मला दिसत नाही, हे खरय, पण प्रत्येक माणसात काही ना काही अपंगत्व असतंच! मला वाटतं,  जे कुणी काही विशेष किंवा आव्हानात्मक गोष्टी करत नाहीत,  ते खरं तर अपंग आहेत. मी Psychiatrist  व्हायचं ठरवलय, कारण माझा माझ्यावर ठाम विश्वास आहे. मी डॉक्टर झाल्यावर माझ्यासारख्या दृष्टी नसलेल्या असंख्य माणसांना नक्की मदत करू शकेन.’

कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात त्याची भेट, मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या चेरील वॉकरशी झाली. हिरवे डोळे असलेली ही चेरील वॉकर अतिशय हुशार होती. नंतर त्यांच्या मैत्रिचं रुपांतर त्यांच्या प्रेमात झालं. १९७२ मध्ये कॉलेजमध्ये असताना त्याला सगळ्यात जास्त मार्क  मिळाले.

डेव्हिडने दहा मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज केले. त्यापैकी आठ कॉलेजेसनी त्याला प्रवेश द्यायला नकार दिला. २७ एप्रीलच्या दुपारी त्याला नवव्या कॉलेजमधूनही नकाराचं पत्र मिळालं. त्याला वाटत होतं, की हे कॉलेज तरी त्याला प्रवेश देईल. पण इथेही नकारच आला.  डेव्हिड मनातून एकदम खचला. हताश झाला.

फिलाडील्फियामधलं दहावं कॉलेज, टेंपल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन… त्याचे असिस्टंट डीन आणि प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख होते, डॉ. एम. प्रिन्सब्रिगहॅम. त्यांनी डेव्हिडच्या अर्जाचं जोरदार समर्थन केलं. त्यांनी सांगितलं, `जर आपण ऑलिम्पिकच्या समीतीत असतो, आणि शंभर मीटरच्या शर्यतीत एक पाय नसलेला स्पर्धक आला असता,  तर आपण त्याला धावू दिलं असतं ना!…  डेव्हिडने आधीच अनेक अशक्यप्राय गोष्टी यशस्वीरित्या करून स्वत:ला सिद्ध केलंआहे. आपण त्याला प्रवेश देऊया आणि बघूया, तो कुठपर्यंत जातो.’

दुसर्‍या दिवशी डेव्हिडला त्याच्याआईचा फोन आला,  तीम्हणाली, `तू खूप दिवस ज्याची वाट पाहात होतास, ते पत्र तुला आलय. ‘ त्याच्या आईचा आवज दाटून आला. तिला पुढे फोनवर बोलणं अशक्य झालं. बार्बाराने फोन घेतला आणि म्हणाली, `यू हॅव डन इट….’ तिलादेखील अश्रू आवरले नाहीत. `तुला  टेंपल युनिव्हर्सिटीने स्वीकारलय. ‘ आणि डेव्हिड ध्येयाच्या वाटेवर चालू लागला.

वाट बिकट होती. डेव्हिडला त्याची कल्पनाही होती. पण त्याला डोंगरमाथा आणि तिथूनदिसणा रंनिसर्गाचं दिव्य रूप… त्याचं ध्येय दिसत होतं.

सुरुवातीलाच त्याला अ‍ॅनाटॉमीच्या इंट्रोडक्टरी कोर्सेसच्या वेळीच अनेक अडचणी यायला लागल्या. हातात रबराचे ग्लोव्हज घालून, अनेक मोठे अवयव  तो चाचपून ओळखायला लागला. पण लहान अवयव विशेषत: nerve plexuses ओळखायला त्याला  ग्लोव्हज काढावे लागले. त्याची बोटं formaldehyde preservative मुळे बधीर होत. हे सगळं चालू असताना डेव्हिडने या विषयांना अनुसरून असलेली असंख्य पुस्तके विकत घेतली. या विषयाच्या अनेक ध्वनिमुद्रिकाही विकत घेतल्या.

मेडिकलच्या पहिल्या वर्षात डेव्हिड आणि चेरीने लग्न केले. तिसर्‍या  वर्षात असताना खरं आव्हान सुरू झालं. युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये रोग्यांना तपासणं, त्यांना ट्रीटमेंट देणं सुरू झालं. त्याला x-ray बघता येत नसल्याने,  तो कान,  डोळे, तोंड आपल्या सहकार्यांच्या वाचून तपासू शकत नसे. x-ray चं वर्णन त्याला त्याचे सहकारी किंवा नर्स सांगतील, त्याप्रमाणे त्याला उपचार करावे लागत. त्या बाबतीत तो त्यांच्यावर अवलंबून होता, पण पुढे त्यानेस्टेथॉस्कोप आणि स्पर्शज्ञान खूप विकसित केलं.

२७मे १९७६ला त्यालामेडिकलची डिग्री मिळाली. त्याने एक गोष्ट नक्कीच सिद्ध केली, की तो इतरांपेक्षा वेगळा नाही. त्याला अगोदर नकार देणा प्रोपफेसरही पदवीदान समारंभाला आले होते. ते म्हणाले, ` David is not normal… he is super normal…’

अमेरिकेतला तो पहिला अंध डॉक्टर. त्यानंतर त्याच्यासाठी एक मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. अनेक लोक त्याच्या जिद्दीवर, अथक परिश्रमावर, दिगंत आत्मविश्वासावर भरभरून बोलले. RFB चे प्रेसिडेंट जॉन कॅसल, त्याचं कौतुक करताना म्हणाले, माणसाच्या अत्युच्च तेजाचं हे दर्शन आहे.’ भाषण संपवताना ते म्हणाले, `डेव्हिडच्या या उदाहरणाने, आपल्याला एक नवीन विश्वास मिळालाय, तो म्हणजे,  माणसाला काहीही मिळवणं शक्य आहे.’     

सभागृहातील सगळे जण त्याला मानवंदना द्यायला उभे राहिले.

डेव्हिडने या सगळ्याला शेवटी दोनच वाक्यात उत्तर दिलं,  `माझ्या बाबांचं बरोबर होतं. ते म्हणायचे, प्रयत्न केल्याशिवाय तुला कसं कळेल, तू काय करू शकशील ते?’

आपण आपल्याकडे सगळं आणि भरभरून असलं, तरी `हे नाही, ते नाही’, म्हणून रडगाणं गातो. डेव्हिडचं आभाळाएवढं कर्तृत्व आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल.

 

संग्राहक : सुश्री माधुरी परांजपे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चक्री वादळ… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

? इंद्रधनुष्य ? 

☆ चक्री वादळ… ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

चक्रीवादळाच्या नावांचा रंजक इतिहास  – कॅटरिना, नर्गिस, नीलम, निलोफर अन् लैला… संकलन – श्री साहेबराव माने. पुणे.

कॅटरिना, नर्गिस, निलोफर, लैला ही नावे आहेत चक्रीवादळाची. या चक्रीवादळांना अनेक मजेशीर नावे असून, त्यांचा इतिहासही रंजक आहे. किनारपट्टीवरच्या लोकांना वादळाचा धोका कळावा म्हणून अशी नावे देण्याचा ट्रेंड सुरू झाला. बंगालच्या उपसागरात येणार्‍या वादळाचे बारसे घालण्याचे काम पूर्वी आठ देश करीत असत; पण आता एकूण 14 देश करतात. आता आलेल्या  चक्रीवादळाला तोक्ते हे नाव म्यानमार देशाने दिले आहे.

हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील नावे ठरविण्याचा अधिकार भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड या आठ देशांना जागतिक हवामान संघटनेने बहाल केला.  भारताने अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू अशी मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेतील नावे दिली, तर पाकिस्तानने नर्गिस, निलोफर, नीलम, लैला अशी अभिनेत्रींची नावे दिली. कॅटरिना हे नाव अमेरिकेने दिले आहे.

आठ देशांनी दिली 64 नावे ः  भारत : अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू. बांगलादेश : ओनिल, ओग्नी, निशा, गिरी, हेलन, चंपाला, ओखी, फनी. मालदीव : हिब्रू, गोनू, ऐला, कैला, मादी, रोनू, मेकुनू, हिक्का. म्यानमार : प्यार, येमयीन, फॅन, ठाणे, नौक, कँट, दाय, कायर, तोक्ते.ओमान : बाझ, सीदर, वर्ड, मृजन, हुडहुड, नाडा, लुबन, महा. पाकिस्तान : पुनूस, नर्गिस,  लैला, नीलम, निलोफर, वरध, तितली, बुलबुल. श्रीलंका : माला, रश्मी, बंडू, वियारू, अशोबा, मरूथा, गज, पवन. थायलंड : मुकदा, खाई-मूक, फेट, फायलीन, कोमेन, मोरा, फेथाई, आंफन  बंगालच्या उपसागरात गतवर्षी आलेल्या आंफन महाचक्रीवादळाला  थायलंड देशाने नाव दिले. 20 वर्षांतील हे सर्वात मोठे हे वादळ होते. जी वादळं प्रचंड नुकसान करून जातात, त्यांची नावे यादीतून कायमची काढली जातात. 2005 साली अमेरिकेतील न्यू एरोलिना प्रांतात आलेल्या ‘कॅटरिना’ वादळाने प्रचंड नुकसान केले, त्यामुळे ते नाव यादीतून काढले आहे. भारताने गती, तेज, मुरासू, आग, व्योम, जहर, प्रोबाहो, नीर, प्रभंजन, गुरूनी, अंबुद, जलाधी, वेग अशी 13 नवी नावे दिली आहेत.

तोक्ते म्हणजे सुरेल आवाजाचा सरडा..

यंदाच्या हंगामाची सुरुवात तोक्ते नावाच्या चक्रीवादळाने होत आहे. हे नाव म्यानमार देशाने दिले आहे. तेथे तोक्ते नावाचा सरडा सुरेल आवाज काढतो. त्यावरून हे नाव दिले आहे. या वादळाचा वेग ताशी 160 ते 175 कि. मी. राहू शकतो.

संकलन – श्री साहेबराव माने. पुणे.

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ – देसाई गढी – ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

? इंद्रधनुष्य ? 

☆ – देसाई गढी – ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले …. लढाई सुरू झाली… एक  छोटीशी घडी… मावळे लढतायेत…पण गढी काही मिळेना… एक दिवस गेला …आठ दिवस गेले … पंधरा दिवस….तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला… आणि जिंकली…. कोण होते त्या गढीत… कोण लढल एवढे चिवटपणे….. ती होती साविञी देसाई ….

ही लढवत होती ती गढी….

गढी ताब्यात आली… सावित्री कैद झाली …. राजे गढीत गेले .. गादीवर स्थानापन्न झाले… आणि सावित्रीला समोर आणले गेले … ती घाबरलेली.. गांगरलेली…आता माझ कस होणार …. तिला एक लहान मुल होत . त्याची काळजी लागली. मला शिवाजी मारणार . माझ बाळ अनाथ होणार . आता मी काय करू. राज्यांच्या समोर रडायला लागली …

महाराज मला मारा …

ठार मारा… पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या .

हे तीचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला… तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली … बाळ आणले … राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीच काळीज धडधडत होते .. आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार .. काय करावे.

तेवढयात राजांनी आज्ञा दिली. सावित्री ला बंधमुक्त केले. ती धावत राज्यांच्या पायावर झुकली. माझ्या लेकराला मारू नका……..

 

आणि या शञूच्या बाईसाठी..

शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.

ताई………….

ताई  … कोण म्हटले मी तुम्हाला मारणार … या बाळाला मारणार … मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला.

आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय… काही तरी दिले पाहिजे ना…

 

ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय… आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..

अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.

राजा.. मी तुला शञू समजले..

मी वैरी समजले..

पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला…

धन्य शिवाजी राजा..

धन्य त्याचे माता पिता..

 

ही कथा इथच संपत नाही

शिवाजी निघुन गेले. पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले.

यात गादीवर शिवाजी बसले आहेत..लहान मुल मांडीवर आहे. राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. अस शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पहायला मिळते.

 

हेच शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे…

 

किती महान माझा शिवाजी राजा होता हो..

 

शिवरायांना सख्खी बहिण नव्हती

पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .

आणि तुम्हाला सांगायची गरज नाही

काय नात आहे हे भाऊ बहिणीचे…

आणि काय नात आहे शिवाजी राजाच.

माझा शिवाजी भाऊ बहिणीच प्रेम शिकवून गेला .

 

किती बर होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर…

वादाच्या पलिकडले शिवाजी …

बहिणीचा भाऊ शिवाजी …

 

माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर …

कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .

निर्भया सारखी प्रकरणे होणार नाहीत .

कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तीचा शिवभक्त भाऊ उभा असेल .

 

मध्यरात्री कामावरून सुटणारी तरूणी बिनधास्त असेल

कारण तिला विश्वास असेल

हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.

शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे.

माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे

 

प्रत्येक भावाने प्रत्येक गृपवर पाठवावा

हि विनंती ..

जय श्रीराम.

? ?

आहारात ‘सत्व’,

वागण्यात ‘तत्व’,

आणि

बोलण्यात ‘ममत्व’

असेल

तरच जीवनाला ‘महत्त्व’ येते.

?? ??

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ थोडक्यात..पण महत्त्वाचे ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ इंद्रधनुष्य ☆ थोडक्यात..पण महत्त्वाचे ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

एका वर्षाचे महत्त्व अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला विचारावे, एका महिन्याचे महत्त्व मातृत्वाच्या वाटेवर असलेल्या महिलेला विचारावे, एका सप्ताहाचे महत्त्व साप्ताहिकाच्या संपादकास विचारावे,एका दिवसाचे  महत्त्व मजुरी न मिळालेल्या मजुरास विचारावे, एका तासाचे महत्त्व आपले अर्धे राज्य देऊन एक तास मृत्यू लांबविण्याचा आग्रह धरणाऱ्या सिकंदराला विचारावे, एका मिनिटाचे महत्त्व वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळण्याच्या एक मिनिट आधी सुरक्षितपणे बाहेर पडणाऱ्या भाग्यवंताला विचारावे आणि एका सेकंदाचे महत्त्व केवळ एका सेकंदामुळे सुवर्णपदक न मिळू शकलेल्या ऑलिंपिकमधील धाव स्पर्धकाला विचारावे.

 

संग्राहक – श्रीमती अनुराधा फाटक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इन्द्रधनुष्य ☆ जागतिक कविता दिन-21 मार्च ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ इन्द्रधनुष्य ☆ जागतिक कविता दिन-21 मार्च ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित☆ 

शब्दांच्याही पल्याड असते माझी कविता

केवळ रसिकालाही दिसते माझी कविता

दिसते म्हणजे तशीच असते असेही नाही

आभासाच्या  गावी वसते माझी कविता.

?  ?  ?  ?

मी शब्दांसंगे अविरत भांडत असतो

अन् अर्थांचा मी काथ्या कांडत असतो

जे मुशीतुनी तावून सुलाखून निघते

ते कांचन मी बाजारी मांडत असतो.

               –  इलाही जमादार  

अशी असावी कविता, फिरून

तशी नसावी कविता, म्हणून

सांगावया कोण तुम्ही, कवीला

आहात मोठे ?–पुसतो तुम्हाला.

      – कवी   केशवसुत.

असे कितीतरी नामवंत कवी आणि त्यांच्या कवितांचा उल्लेख करता येईल.

‘Poetry is the spontaneous overflow of powerful feelings’ हे William Wordsworth यांचे सुप्रसिद्ध  विधानही आपणा सर्वांना माहित आहे. या सर्वांचा उल्लेख आज करण्याचे कारण म्हणजे आज जागतिक कविता दिन साजरा होत आहे.

साहित्यातील काव्यप्रकाराचा सन्मान करण्याचा आजचा दिवस ! युनेस्कोच्या पॅरिस येथे झालेल्या परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आणि 21/03/1999 पासून दरवर्षी 21 मार्च जागतिक कविता दिन म्हणून साजरा होऊ लागला. “कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते” असे युनेस्कोच्या महासचिवानी म्हटले आहे. भाषिक विविधतेला समर्थन आणि लुप्त झालेल्या भाषा ऐकण्याची  संधी  उपलब्ध करून देणे हा ही यामागचा उद्देश आहे. युनेस्कोने आपल्या जाहीरनाम्यात “to give fresh recognition and impetus to National, Regional and International poetry movements” असे म्हटले आहे.

आजचा दिवस म्हणजे जगातील  सर्व कवी, कवयित्री आणि काव्यप्रेमी रसिक यांच्या सन्मानाचा दिवस! चला,आपण सर्वजण त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काव्यरसाच हा मधुघट काठोकाठ भरून ठेवूया.

संकलन 

श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोंगरे  सदन ☆ संग्राहक – सुश्री मानसी आपटे

 ☆ इंद्रधनुष्य ☆ डोंगरे  सदन ☆ संग्राहक – सुश्री मानसी आपटे ☆ 

शंभर वर्षांपूर्वी चिनी सुतारांकडून बांधलेलं घर…

नगर शहरातील बुरूडगल्लीतील ‘डोंगरे सदन’ ही शंभरी ओलांडलेली वास्तू प्रख्यात विदुषी पंडिता रमाबाई यांचे चुलतभाऊ कृष्णराव वासुदेव डोंगरे यांनी बांधली आहे. विशेष म्हणजे या घराचं लाकूडकाम चिनी सुतारांनी केलं आहे आणि हे वैभव कृष्णरावांच्या नात कांचन चांदोरकर आणि त्यांच्या कुटुंबानं सुरेख सांभाळलं आहे.

आपल्या आजोबांच्या आठवणी सांगताना कांचन चांदोरकर म्हणाल्या, कृष्णराव मूळचे कर्नाटकातील गंगामूळचे. गावी होणाऱ्या जाचामुळे त्यांना रमाबाईंनी पुण्याजवळच्या केडगाव येथे मुक्ती मिशनमध्ये बोलवलं. तेथील अनेक इमारतींचं बांधकाम कृष्णरावांच्या देखरेखीखाली झालं. पुढे ते नगरला स्थायिक झाले. नगरमधील अनेक इमारतींचे काम त्यांनी केलं. क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूलची कौलारू वास्तू त्यांनीच बांधली. सध्या धरती चौक म्हणून अोळखला जाणारा भाग सव्वाशे वर्षांपूर्वी बाभळींनी व्यापलेला होता. साहेबराव निसळांकडून जागा विकत घेऊन कृष्णरावांनी तिथं १९१८ ते २० दरम्यान घर बांधलं. तेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं. अनेक देशातील युद्धबंदी नगरच्या किल्ल्यातील लष्करी छावणीत होते. त्यातील चांगली वर्तणूक असलेल्यांना दिवसभर बाहेर काम करण्याची मुभा ब्रिटिश सरकारनं दिली होती. त्यात काही चिनी सुतार होते. त्यांचं कौशल्य हेरून कृष्णरावांनी त्यांच्याकडून मलबारी सागवानी लाकडात आपल्या घराचं बांधकाम करून घेतलं. चुन्यातील अतिशय सुबक आणि आखीव-रेखीव काम अजूनही जसंच्या तसं आहे.

चांदोरकर कुटुंबानं काळानुसार या धाब्याच्या घरात थोड्या सुधारणा केल्या. मधले काही लाकडी खांब काढून फरशी बदलण्यात आली. धुळीचा त्रास टाळण्यासाठी खिडक्यांना काचा लावण्यात आल्या, गॅलरी बंदिस्त करण्यात आली. तथापि, हाॅलमधील लाकडी खण तसेच ठेवण्यात आले आहेत.

नामवंतांच्या मैफली

प्रसिद्ध गायक-अभिनेते पंडितराव नगरकर, पंडित वालावलकर यांच्यासह अनेक नामवंत गायकांच्या मैफली ‘डोंगरे सदन’मध्ये झाल्या आहेत. कांचन यांच्या वडिलांना संगीताबरोबरच फोटोग्राफी व यंत्रांच्या दुरूस्तीची आवड होती. वाद्ये तर ते लीलया दुरूस्त करत. त्यांच्याकडे मोठा आॅर्गनही होती. चांदोरकर कुटुुंबाकडे आकाराने सर्वात छोट्या बायबलची प्रत आहे.

सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जगात सर्वात सिनिअर बनण्याचा मान भारताचे यष्टीरक्षक रघुनाथ चांदोरकर यांना मिळाला आहे. ‘डोंगरेसदन’ मध्ये राहणारे नगरचे रणजीपटू बाबा चांदोरकर यांचे ते थोरले भाऊ. दोघेही भाऊ रणजी खेळले. कर्जतला जन्मलेल्या व सध्या डोंबिवलीला राहणाऱ्या रघुनाथरावांनी मागील वर्षी शंभरी अोलांडली. न्यूझीलंडचे अॅलन बर्जेस यांच्या निधनानंतर ते सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू बनले आहेत.

संग्राहक – सुश्री मानसी आपटे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लस कशी तयार झाली ☆ संग्राहक – विमल माळी

 ☆ इंद्रधनुष्य ☆ लस कशी तयार झाली ☆ संग्राहक – विमल माळी ☆ 

१७८८ सालची एका तरुणाची ही गोष्ट. इंग्लंडमधल्या ग्लुस्टरशायरला एका साथीनं घेरलं. ती साथ आली की माणसं त्यावेळी मृत्युपत्राची वगैरे भाषा सुरू करायची. सगळे दु:खात, फक्त एक जमात गवळी. त्या तरुणाच्या घरी जो गवळी यायचा, त्याला या आजाराची कसलीही चिंता वाटत नव्हती. त्या तरुणाला आश्चर्य वाटलं. तो त्या गवळ्याकडे गेला. त्याचं घर आणि गोठा बघायला. यांना ही बाधा का होत नसावी. तिथं त्याला थेट उत्तर काही मिळालं नाही. पण शक्यता दिसली. त्या गवळ्याच्या गाईंना तोच आजार झाला होता. अंगावर फोड. ते पिकणं. पू वगैरे सगळं माणसांसारखंच.

त्या तरुणाला लक्षात आलं. या गाईंना झालेल्या रोगाच्या संपर्कात आल्यामुळे गवळ्यांच्या शरीरांत या रोगाबाबत प्रतिकारशक्ती तयार होत असावी. पण हे सिद्ध करायचं म्हणजे गाईंच्या अंगावरच्या फोडांचे जंतु माणसांच्या अंगात सोडायचे. त्यासाठी तयार कोण होणार?अखेर बऱ्याच परिश्रमांनंतर १४ मे १७९६ या दिवशी अशी एक संधी त्याच्यापुढे चालून आली. त्याच्या गावचा एक शेतकरी तयार झाला. सारा या त्याच्या गवळ्याच्या तरुण मुलीच्या अंगावर त्याच्या गाईप्रमाणे फोड आलेले होते. आणि त्यातले काही पिकलेही होते. तो तरुण तिच्याकडे गेला. लाकडाची एक छोटी ढलपी घेतली. तिच्या अंगावरचे पिकलेले फोड उकरून त्यातला पू त्यानं त्यावर गोळा केला. तिचा भाऊ जेम्स याच्या पायावर धारदार चाकूनं छोटीशी जखम त्यानं केली. रक्त आल्यावर साराच्या जखमेतला पू त्याच्या जखमेत भरला आणि वरनं मलमपट्टी केली. शेतकऱ्याला बजावलं. याच्यावर लक्ष ठेव. काही झालं तर मला सांगायला ये.

दोनच दिवसांनी शेतकरी त्याच्याकडे आला. मुलाच्या अंगात ताप होता. तो तरुण खुश झाला. सुरुवात तरी त्याच्या मनासारखी झाली. आणखी दोन दिवसांनी जेम्सच्या तोंडाची चव गेली. खूप अशक्तपणा जाणवायला लागला. पण पुढच्या दोन दिवसांत ही सर्व लक्षणं दूर झाली आणि जेम्स बरा झाला.

त्या तरुणाच्या प्रयोगाचा महत्त्वाचा टप्पा आता सुरू झाला. आता त्याला जेम्सच्या शरीरात खरेखुरे आजार जंतू सोडायचे होते. हा प्रयोग यशस्वी झाला तर तुझा मुलगाच काय सारी मानवजातच या साथीच्या विळख्यातून सुटेल. शेतकऱ्यानं विचारलं, ‘आणि अपयश आलं तर?’ तो तरुण शांतपणे म्हणाला, ‘खुनाच्या आरोपाखाली मला शिक्षा होईल.’

त्या तरुणानं मरणासन्न रुग्णाच्या फोडांमधला पू तशाच पद्धतीनं जेम्सच्या शरीरात घुसवला. पुढचे आठवडाभर तो आणि शेतकरी त्या पोरावर डोळ्यात लक्ष ठेवून होते. दोन दिवसांनी त्याला परत ताप आला. अंगावर पुरळ आलं. काळजी वाढली. पण दोन दिवसांनी तापात उतार पडला. त्या तरुणाच्या लक्षात आलं की अशा पद्धतीनं या आजाराबाबत लोकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार करता येते.

आपल्या या प्रयोगाचे निष्कर्ष त्यानं रॉयल सोसायटीला कळवले. त्यांनी लक्षच दिलं नाही सुरुवातीला. पण तो तरुण प्रयोग करत राहीला. आणखी २३ जणांवर त्यानं याच पद्धतीनं प्रयोग केले. सगळ्यांचे निष्कर्ष असेच होते. एका बाजूला तो हे सगळं रॉयल सोसायटीला कळवत गेला. पण दुसरीकडे त्यानं स्वत: हे सगळं छापायचं ठरवलं. लॅटिन भाषेत गाईच्या त्या आजाराचं नाव वॅक्सिनिया. त्यानं नवा शब्द तयार केला “वॅक्सिन” म्हणजे लस.

नंतर तो तरुण आयुष्यभर लसींसाठीच जगला. पैसे नाही फार कमावले त्यानं. पण नाव मात्र मिळवलं. घर बांधलं. अंगणात स्वतसाठी एक झोपडं उभारलं. नाव दिलं लसगृह. तिथं गरीबांना तो मोफत लस टोचायचा. पुढे त्याच्या या तंत्राचा लौकिक लवकरच सर्वदूर पसरला. अनेक ठिकाणी युरोपात लोकं स्वत:मधे जिवंत विषाणू टोचून घ्यायला लागले. १८०० साली त्यानं ही सगळी माहिती आणि सोबत एक लशीचा नमुना आपले मित्र प्रा. बेंजामीन वॉटरहाउस यांना पाठवला. प्रा. बेंजामीन अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवायचे. त्यांनी हे तंत्र आपल्या न्यू इंग्लंड परगण्यात वापरून बघितलं. न्यूयॉर्कच्या जवळ असलेल्या या परगण्यात ती साथ होती. हे तंत्र तिथं कामी आलं. प्रा. बेंजामीन यांनी आख्ख्या कुटुंबाला या तंत्रानं वाचवलं.

हे जमतंय असं लक्षात आल्यावर त्यांनी याची माहिती दिली थेट थॉमस जेफर्सन यांना. हे जेफर्सन म्हणजे अमेरिकेचे नंतर अध्यक्ष झाले ते. त्यांनी कसलाही विचार न करता आपल्या मुलाबाळांसकट सगळ्यांवर हा प्रयोग करून पाहिला. तो अर्थातच यशस्वी झाला. तेव्हा त्याचं महत्त्व जाणणाऱ्या या द्रष्टय़ा नेत्यानं त्या तरुणाला अत्यंत उत्कट पत्र लिहिलं. इथे या भूतलावर हा असाध्य रोग होता, तो तुझ्या प्रयत्नामुळे हद्दपार झाला. पुढच्या पिढय़ा तुझ्या ऋणी राहतील. जेफर्सन यांचे शब्द खरे झाले. त्यांच्या पत्रानंतर साधारण दोन शतकांनी, १९८० साली पृथ्वीवरनं या आजाराचं  पूर्ण उच्चाटन झालं.

हा आजार म्हणजे देवी. आणि त्या तरुणाचं नाव एडवर्ड जेन्नर.

आत्ता त्याची ही गोष्ट आठवायचं काही एक कारण आहे. ते म्हणजे ऑक्सफर्ड इथल्या एडवर्ड जेन्नर संशोधन केंद्रात सध्या जगाला ग्रासून राहिलेल्या करोना आजारावरच्या संभाव्य लशीच्या मानवी चाचण्या सुरू होतायत. आजच तिथे पहिल्यांदा कोणी तरी आपल्या शरीरात कोविड-१९ चा विषाणू टोचून घेईल. त्यातून लस तयार होईलही.

हे श्रेय त्या एडवर्ड जेन्नर याच असेल.

संग्राहक – विमल माळी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-1 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

 ☆ इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-1 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

छत्रपती शाहू महाराजांकडे जवळपास अडीचशे हत्ती होते. पैकी “गजराज मोती” हा महाराजांचा विशेष आवडता हत्ती होता. शिवाय तो अत्यंत भव्य व रुबाबदार होता, त्याचे शुभ्र वळणार दात दिलखेचक होते त्यामुळे तो छत्रपतींचा मानाच्या अंबारीचा हत्ती होता. गजराज मोती माजात आलेला असल्यामुळे राधानगरी येथे त्याला साठमारीच्या मैदानात उतरविण्यात आले. साठमारांनी व्यूहरचना केली व मोतीचा माज उतरविण्यासाठी ते पुढे सरसावले. खुद्द महाराज हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते. साठमार रुमाल नाचवित मदमस्त मोतीला छेडू लागले. मोती प्रचंड चवताळला व एका साठमाराला हेरुन भयानक चित्कार करीत त्याच्या मागे धावू लागला. उपस्थितांच्या पोटात भितीने गोळा उठला. काहीतरी विपरीत घडणार असे महाराजांसह सर्वांनाच वाटू लागले. साठमार वायुवेगाने पुढे पळत होता व जोराचा चित्कार करीत चवताळलेला मोती त्याच्या मागे धावत होता. “मोतीने साठमाराला सोंडेत पकडले. गरगर फिरवून त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली एक तंगडी धरुन सोंडेने दुसरी तंगडी फासकटली.” असे भेसूर चित्र उपस्थितांच्या मनपटलावर तरळले तोच साठमार चपळाईने समोरच्या दिंडीत घुसला. त्याचा मागून वायुवेगाने धावत येणारा मोती जोराने बुरुजावर आदळला त्यासरशी कडाड् कड असा मोठा आवाज झाला. त्यातच काळीज चिरुन जाणारा मोतीचा आर्त चित्कार पाठोपाठ उमटला. मोतीच्या तोंडातून रक्ताचा लोट वाहत होता. मोतीचा एक दात मोडला होता. दाताच्या आतील मांसल गोळा लोंबकळत होता. ते भयानक दृश्य पाहवत नव्हते. तोच गगनभेदी टाहो फुटला, “महाराज घात झाला. माझ्या मोतीचा दात तुटला.” असा आक्रोश करीत अंबादास माहूत मैदानात धावला. पिसाळलेल्या हत्तीसमोर जात असलेला भावनाविवश अंबादास पाहून महाराजांना धोक्याची जाणीव झाली. “अंबादास थांब. मोती पिसाळलाय, त्याच्यासमोर जाऊ नकोस.” असे म्हणतच महाराजांनीही मैदानात उडी ठोकली. तोपर्यंत अंबादास मोतीच्या सोंडेला बिलगून अश्रू ढाळीत उभा होता. प्रचंड पिसाळलेला तो भव्य गजराज मोतीसुद्धा सोंडेने अंबादासला वेढा घालून अश्रू ढाळीत शांतपणे उभा होता. तशाही स्थितीत हत्ती-माहूताचे प्रेम पाहून व आपल्या आवडत्या मोतीची भेसूर जखम पाहून महाराजांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. पण हत्ती पिसाळलेला होता. या स्थितीत तो काहीही करु शकतो हे जाणून महाराजांनी अंबादासला बाजूला घेतले व हत्तीला चिमटे लावून ठाणबंद केले. त्याच्या जखमेवर प्राथमिक उपचार केल्यानंतरच महाराजांनी मैदान सोडले.

दुसऱ्या दिवशी पहाटे महाराज व्हेटर्नरी सर्जन सावर्डेकर यांना घेऊन हत्तीठाणावर आले. डॉ. सावर्डेकरांनी मोतीला तपासले. तुटक्या दाताच्या पोकळीतील लोंबकळणारे मांस त्यांनी कापून टाकले. “तुटक्या दाताची वाढ होते काय?” महाराजांनी विचारले.

“नाही” डॉक्टरांनी सांगितले.

“दुसरा काही मार्ग?”

“दुसरा कुठलाच मार्ग नाही. दात मोडल्यामुळे दात्र्या पडल्या आहेत. त्या भारी खूपत असणार. तोंडातील जखम व खुपणाऱ्या दात्र्यांमुळे हत्ती सदा विव्हळत राहणार.”

“मग त्या दात्र्या तरी काढून टाका.” महाराज म्हणाले. त्यावर त्या काढता येणार नाहीत शिवाय यापुढे हत्तीवर इलाज करता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले.

क्रमशः…

संग्राहक – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print