मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्यक्ती तितक्या प्रकृतीही — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

व्यक्ती तितक्या प्रकृतीही — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

काही वेळा आपल्या बघण्यात येते, लोक तरी किती विविध प्रवृत्तीचे असतात ना. कोणी फक्त भविष्यात जगतात तर कोणी भूतकाळात.

वर्तमानात जगायचे, पण भविष्याची स्वप्ने बघायची,हा तर मानवी स्वभाव आहे. त्यात गैर काहीच नाही पण काही लोक असे बघण्यात येतात जे फक्त आणि फक्त भूतकाळातच रमलेले असतात.

मी डॉक्टर असल्याने आपोआपच माझा समाजाशी जास्त संबंध आला,येत असतोही. निरनिराळ्या वेळी माणसे कशी  वागतात, हेही मला चांगलेच अनुभवाला आलेले आहे.

काहीवेळा आडाखे चुकतात पण आपण बांधलेले अंदाज तंतोतंत खरे आले की मजा वाटते. माझ्या बघण्यात आलेले काही लोक खूप मजेशीर आहेत. 

माझी एक मैत्रीण आहे… ती कधीही भेटली तरी मी – माझे – मला, या पलीकडे जातच नाही. कधीही भेटली की “ अग ना, काय सांगू, आमचे हे ! इतके बिझी असतात.. इथपासून,आमची पिंकी कशी हुशार, हे आख्यान सुरू. लोकांना बोलायला मध्ये जागाच नाही. मग मी नुसती श्रोत्यांची भूमिका घेऊन “ हो का ? वावा, “ इतकेच म्हणू शकते.

दवाखान्यात  अप्पा बोडस यायचे. अतिशय सज्जन साधे मध्यमवर्गीय गृहस्थ. पण सतत भूतकाळातच रमलेले… “ काय सांगू  बाई तुम्हाला.. .काय ते वैभव होते आमचे. मोठा वाडा, पूर्वापार चालत आलेला,रोज १५-२० माणसे असत पंक्तीला. गेले ते दिवस.” .. मग मला विचारायचा मोह अनावर व्हायचा की “ अहो, मग ते राखले का नाही कोणी? तुम्ही का चाळीत रहाताय?” पण मी हे नुसते ऐकून घेते. त्यांचा विरस मी का करू? 

मग आठवतात इंदूबाई. सध्या करतात दहा घरी पोळ्या आणि स्वयंपाकाची कामे. पण आल्या की सुरूच करतात. “ काय सांगू बाई तुम्हाला ? किती श्रीमंत होतो आम्ही. काय सुरेख माझं माहेर. पण ही वेळ आली बघा. तुमच्यासारखी शिकले असते, तर हाती पोळपाट नसता आला.” .. मला हसायला येते. मी त्यांना विचारले, “ अहो,मग तेव्हा का नाही शिकलात?” .. उत्तर असे..  “ तेव्हा कंटाळाच यायचा बघा मग दिली शाळा सोडून.” — आता अशा इंदूताईंचे भविष्य सांगायला ज्योतिषी नको. पण त्या रमतात आपल्याच आठवणीत. माझा दवाखाना हे एक चावडीचे ठिकाण होते लोकांना.

निम्न वस्तीत माझा दवाखाना, त्यामुळे उच्चभ्रू लोकांचे नियम यांना लागू नाहीतच. मी जराशी रिकामी बसलेली दिसले की सरळ येऊन,  आपल्या मनीची उकल करायला सुरुवात.

लता एक कॉलेज कन्यका… बुद्धी अतिशय सामान्य, रूप बेताचेच. माना वेळावत दवाखान्यात यायची.     “ बाई,येरहोष्टेश व्हायला काय करावे लागते हो? “ मी कपाळावर हात मारून घेतला.

“लता, तो शब्द एअरहोस्टेस असा आहे. आणि अगं लता तुझे स्वप्न खूप छान आहे, पण त्याला डिग्री लागते. इंग्लिश लागते उत्तम. तू आधी बी ए तर हो, मग मी सांगते पुढचे.” 

मग कधीतरी यायचे एक कवी… “ बाई वेळ आहे का?” नसून कोणाला सांगते. पेशंट नाहीत हे बघूनच ते आलेले असत. “ बघा किती सुंदर कविता केलीय आत्ताच. तुम्हीच पहिल्या हं ऐकणाऱ्या.” – ती निसर्ग कविता,पाने फुले मुले प्रेम,– असली ती बाल कविता ऐकून मला  भयंकर वैताग यायचा. कवी आणि कविता दोन्हीही बालच..

मग आठवतात काळे आजी. या मात्र इतक्या गोड ना. “ बाई,तुमच्यासाठी ही बघा मी स्वतः पर्स विणली आहे.आवडेल का ?वापराल का? “ किती सुंदर विणायच्या त्या. पुन्हा जराही मी मी नाही. ती माझी पर्स बघून माझ्या बहिणीने त्यांना बारा पर्सेस करायची ऑर्डर दिली आणि नकळत त्यांचा तो छोटासा व्यवसाय सुरू झाला. त्यांना चांगले पैसे मिळायला लागले अगदी सहज. असेही उद्योगी लोक मला भेटले.

असेच मला काळेकाका आठवतात. आले की हातात स्मार्ट फोन आणि फेसबुक उघडून, मला त्या पोस्ट दाखवण्याची हौस ! वर,वावा किती छान म्हणावे ही अपेक्षा. सतत यांच्या पोस्ट्स फेसबुकवर. त्याही जुन्या,अगदी जपून ठेवलेल्या. हे फेसबुक प्रकरण माझ्या आकलनापलीकडले आहे.

— काय  ते  अहो रुपम् अहो ध्वनिम्… आपल्या कविता,आपल्या पाककृती लोक वेड्यासारखे टाकत असतात. बघणारे रिकामटेकडे, तयार असतातच, लाईक्स द्यायला,अंगठे वर करायला. काय हा वेळेचा अपव्यय… 

तर हेही  माझे असेच एक पेशंट !!—  मी  2000 साली गेलो होतो ना चीनला, ते बघा फोटो. ही माझी बायको. बघा,कशी दिसतेय चिनी ड्रेस घालून..  हे आम्ही,आफ्रिकेला गेलो होतो तेव्हाचे फोटो. हा माझा लेख बघा बाई..  २०११  साली आला होता .” —-  सतत जुन्या गोष्टींचा यांना नॉस्टॅल्जिया.  हे जपून तरी किती ठेवतात असले फुटकळ लेख , कोणत्यातरी  सदरात आलेले.  मग त्यांनी केलेल्या परदेशीच्या ट्रिप्स. पुन्हा,मी मी आणि मी… लोकांना काय असणार हो त्यात गम्य. नाईलाज म्हणून देतात आपले  भिडेखातर   लाईक्स. पण लोकांनी कौतुक करावे याची केवढी हो हौस. त्यातूनही  खरोखरच चांगले ध्येय  असणारे, काहीतरी करून दाखवायची जिद्द असणारे लोकही भेटले.

अशीच भेटली अबोली. अतिशय हुशार, गुणी, पण दारिद्र्य पाचवीला पुजलेले. बारावीला उत्तम मार्क्स

आणि आईवडील म्हणाले ‘ बस झालं शिक्षण.आता लग्न करून टाकू तुझं.’ बिचारी आली रडत माझ्याकडे. “ बाई,मला नाही लग्न करायचं इतक्यात. मी काय करू ते सांगा. मला पायावर उभं रहायचं आहे माझ्या.”  मी तिला ट्रॅव्हल टुरिझमचा कोर्स करायला आवडेल का ते विचारलं. पहिली फी मी भरली तिची. तिने तो कोर्स मन लावून पूर्ण केला. छान मार्क्स मिळवून पास झाली आणि तिला एका चांगल्या ट्रॅव्हल कंपनीत नोकरीही मिळाली. तिच्या ऑफिसमध्ये मी मुद्दाम तिने बोलावले म्हणून भेटायला गेले होते. सुंदर युनिफॉर्म घातलेली अबोली किती छान दिसत होती ना. मला फार कौतुक वाटलं तिचं. असेही जिद्दी लोक भेटले मला माझ्या आयुष्यात.

असाच अभय अगदी गरीब कुटुंबातला. सहज आला होता भेटायला. तेव्हा माझा  मर्चंट नेव्ही मधला भाचा काही कामासाठी दवाखान्यात आला होता. मी अभयची त्याच्याशी ओळख करून दिली. अभय म्हणाला, “ दादा,मला माहिती सांगाल का मर्चंट नेव्हीची. अभय त्याच्या घरी गेला. माझ्या भाच्याने, अभयला सगळी माहिती नीट सांगितली.अभयकडे एवढी फी भरण्याइतके पैसे नव्हते. इतके  पैसे भरण्याची ऐपतच नव्हती त्यांची. पण मग त्याने माझ्या भाच्याच्या सल्ल्याने इंडियन नेव्हीची परीक्षा दिली. तो पास झाला,आणि आज इंडियन नेव्हीमध्ये छान ऑफिसर आहे तो… त्या मुलाने, मानेवर बसलेले दारिद्र्य मोठ्या जिद्दीने झटकून टाकले. आज त्याचा मोठा फ्लॅट,  छान बायको मुले बघून मला अभिमान वाटतो.

— असेही छान जिद्दी लोक मला भेटले आणि नकळत का होईना, हातून त्यांचे भलेही झाले.

तर लोकहो, असे जुन्या वेळेत सतत भूतकाळात गोठलेले राहू नका. इंग्लिशमध्ये छान शब्द आहे,

‘फ्रोझन  इन  टाईम.’  जुन्या स्मृती खूप रम्य असतात हे मान्य. पण त्या तुमच्या पुरत्याच ठेवा, नाही तर हसू होते  त्याचे. आपला आनंद आपल्या पुरताच असतो… असावा. लोकांना त्यात अजिबात रस नसतो.

म्हणून तर आपले रामदासस्वामी  सांगून गेलेत ना…

                                             आपली आपण करी जो स्तुती,

                                                         तो येक पढत मूर्ख.

आणि केशवसुत म्हणतात …… 

                                         जुने जाऊद्या, मरणा लागुनी

                                          जाळूनी किंवा पुरुनी टाका 

                                          सडत न एक्या ठायी ठाका 

                                           सावध ! ऐका पुढल्या हाका 

— आपणही हे नक्कीच शिकू या.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Pin-drop silence — ☆ अनुवाद आणि प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ Pin-drop silence — ☆ अनुवाद आणि प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

Pin-drop silence —

तुम्ही कधी निस्तब्ध शांतता अनुभवली आहे ?

टाचणी पडली तरी ऐकायला येईल अशी शांतता ?

Pin drop silence …. याचा नेमका अर्थ सांगणाऱ्या खालील काही घटना आहेत, जेव्हा शांतता आवाजापेक्षाही मोठ्याने बोलू शकली होती.

प्रसंग 1

फील्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांच्या आयुष्यातला एक प्रसंग.

एकदा सर सॅम बहादूर माणेकशॉ एका सभेमध्ये भाषण करण्यासाठी अहमदाबादला गेले होते. सरांनी भाषणाला सुरुवात केली. ते अर्थातच इंग्रजीमधून बोलत होते.. श्रोत्यांमधे अचानक गडबड सुरू झाली… .. 

“ आपण गुजराथीत बोला. गुजराथीत बोललात तरच आम्ही आपले भाषण पुढे ऐकू.”

सर माणेकशॉ बोलायचे थांबले, त्यांनी श्रोत्यांवरून त्यांची करडी नजर फिरवली. आणि काही क्षणांत अगदी ठामपणे ते म्हणाले …. 

“  मित्रांनो, मी माझ्या प्रदीर्घ लष्करी सेवेत अनेक लढाया लढलो आहे, आणि त्या दरम्यान बऱ्याच भाषा बोलायलाही  शिकलो आहे. म्हणजे बघा ….
मी माझ्या शीख रेजिमेंटमधल्या सैनिकांकडून पंजाबी शिकलो…

मराठा रेजिमेंटच्या सैनिकांकडून मराठी शिकलो.

मद्रास सॅपर्समध्ये असणाऱ्या सैनिकांकडून तमीळ शिकलो. बेंगॉल सॅपर्सबरोबर काम करत असतांना  बंगाली शिकलो. हिंदी शिकलो ते बिहार रेजिमेंटबरोबर असतांना.  इतकंच काय, गुरखा रेजिमेंटकडून नेपाळी भाषाही शिकलो…..

… पण दुर्दैवाने …. ज्याच्याकडून मला गुजराथी भाषा शिकता आली असती असा गुजरातमधला एकही माणूस भारतीय सेनेत मला भेटला नाही .. अगदी एकही नाही.”

आणि अहमदाबादच्या त्या भल्यामोठ्या सभागृहात टाचणी पडली तरी ऐकायला येईल एवढी शांतता पसरली होती.

प्रसंग 2

स्थळ : पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ.

नुकत्याच लँड झालेल्या एका अमेरिकन विमानातून रॉबर्ट व्हायटिंग, वय ८३, हे गृहस्थ पँरिस विमानतळावर उतरले. तिथल्या फ्रेंच कस्टमस् ऑफिसपाशी गेल्यावर खिशातला पासपोर्ट काढण्यासाठी ते आपले खिसे चाचपत होते.

” महोदय, फ्रान्सला भेट देण्याची ही आपली पहिलीच वेळ आहे का ? ”  त्यांना जरासा वेळ लागल्याचे पाहून त्यांचा उपहास करण्याच्या हेतूने एका उद्धट कस्टम ऑफिसरने विचारणा केली..

आपण याआधीही फ्रान्सला येऊन गेल्याचं रॉबर्टनी सांगितलं..अजूनही ते पासपोर्टसाठी खिसे चाचपत होते पण हाताला पासपोर्ट काही लागत नव्हता.

“ मग इथे दाखवण्यासाठी तुम्ही तुमचा पासपोर्ट हातात तयार ठेवला पाहिजे हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे “

“ हो. पण मागच्या वेळी मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मला कुणालाही पासपोर्ट दाखवावा लागला नव्हता.” — तो वयस्कर अमेरिकन माणूस म्हणाला.

 “ हे शक्यच नाही. अमेरिकन माणसांना फ्रान्समध्ये उतरल्या उतरल्या आपला पासपोर्ट दाखवावाच लागतो. “ .. कस्टम ऑफिसर कुत्सितपणे म्हणाला.

त्या वृद्ध अमेरिकन माणसाने समोरच्या फ्रेंच माणसाकडे काही क्षण जराशा रागानेच रोखून पाहिलं, आणि मग शांतपणे म्हणाला .. “ नीट ऐका ..  १९४४ साली * D-Day*च्या दिवशी पहाटेच्या ४:४० ला तुमच्या ओमाहा समुद्रकिनाऱ्यावर मी आणि माझे सहकारी विमानातून उतरलो होतो …. तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून मदत करण्यासाठी आम्ही तुमच्या देशात आलो होतो ….  आणि तेव्हा माझा पासपोर्ट दाखवण्यासाठी त्या किनाऱ्यावर एकही फ्रेंच माणूस मला सापडला नव्हता. 

हे ऐकून त्या कक्षात एकदम निस्तब्ध शांतता पसरली होती. टाचणी पडली असती तरी आवाज ऐकू आला असता. 

(दुसऱ्या महायुद्धातील फ्रान्सची नामुष्की कोण विसरेल ? …. * D-Day…* ६ जून १९४४ – दुसऱ्या महायुद्धातला तो पहिला दिवस, ज्या दिवशी मित्रराष्ट्रांच्या सैन्याने नॉर्मनडीच्या समुद्रकिनाऱ्यांवर उतरून उत्तर फ्रान्सवर आक्रमण केले) 

प्रसंग 3

सन १९४७ …. 

ब्रिटिश राजवतीतून भारत मुक्त झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच देशातल्या महत्त्वाच्या पदांवर नेमणुका करण्यासाठी विचार विनिमय करणे चालू झाले होते.  याच कारणासाठी भावी अघोषित पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिन्ही सेनादलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती — भारताचे पहिले “जनरल ऑफ इंडियन आर्मी ‘ यांची निवड करण्यासाठी 

“मला असे सुचवावेसे वाटते की आपण एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करावी. कारण हे  पद सांभाळण्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा अनुभव असणारी व्यक्ती आपल्याकडे नाही.”

… ब्रिटिशांकडून जे आजपर्यंत फक्त आज्ञापालन करायलाच शिकले होते — नेतृत्व करायला नाही –  अशा सर्वांनी.. ज्यात काही प्रतिष्ठित नागरिकही होते आणि सैन्यातले गणवेशधारीही – अशा सर्वांनीच नेहरूंच्या या प्रस्तावाला माना हलवत दुजोरा दिला..

…  मात्र एक वरिष्ठ अधिकारी नथुसिंह राठोड यांनी यावर आपले वेगळे मत मांडण्याची परवानगी मागितली. त्या अधिकाऱ्याचा आपल्यापेक्षा काही वेगळा आणि स्वतंत्र विचार आहे हे नेहरूंसाठी अनपेक्षित होते, त्यांना खरं तर आश्चर्यच वाटले होते . पण तरी त्यांनी राठोड यांना त्यांचे मत मोकळेपणाने मांडायची परवानगी दिली.

“सर, असं बघा की देशाचे नेतृत्व करण्यासाठीसुद्धा पुरेसा अनुभव नाही आहे आपल्याकडे. तर मग भारताचे पहिले पंतप्रधान म्हणूनही आपण एखाद्या ब्रिटिश माणसाची नेमणूक का करू नये ? —–

आणि सभागृहात एकदम निस्तब्ध शांतता पसरली …. टाचणी पडली असती तर तो आवाजही अगदी स्पष्ट ऐकू आला असतं

.. पंडित नेहरूंनी चमकून राठोड यांचेकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले..  “ तुम्ही तयार आहात का भारताचे पहिले ‘ जनरल ऑफ आर्मी स्टाफ ?’ व्हायला ? “

हा प्रस्ताव नम्रपणे नाकारत राठोड म्हणाले, “ नाही सर, मी नाही. पण आपल्याकडे एक अतिशय बुद्धिमान असे एक लष्करी अधिकारी आहेत .. माझे वरिष्ठ.. जनरल करिअप्पा. आणि ते या पोस्टसाठी आपल्यापैकी सर्वात जास्त अनुभवी आणि सर्वात जास्त योग्य असे आहेत.”

राठोड यांचा प्रस्ताव ऐकून बैठकीत पुन्हा एकदा एक निस्तब्ध शांतता पसरली. कर्नल राठोड यांच्या सूचनेने बैठकीचा नूरच बदलला. पं. नेहरू आणि उपस्थित इतर सर्वांनीच  एकमताने जनरल करिअप्पा यांच्या नावाला संमती दिली.  

अशा रीतीने अत्यंत बुद्धिमान असणारे जनरल करिअप्पा हे भारताचे पहिले ‘जनरल ऑफ आर्मी स्टाफ‘ म्हणून नेमले गेले. आणि  भारतीय सैन्याचे सर्वात पहिले ‘लेफ्टनंट जनरल ऑफ आर्मी स्टाफ’ म्हणून नथू सिंह राठोड यांची नेमणूक झाली.

(लेफ्टनंट जनरल निरंजन मलिक, PVSM (Retd) यांच्या एका इंग्लिश लेखावरून)

अनुवाद आणि प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीराम प्रसवतांना – ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके 

पुरूष असूनही तो एके दिवशी दोन जीवांचा झाला. पण त्याचे गर्भाशय पोटाऐवजी हृदयात वसलं होतं. आई बालकाला जन्म देण्यापूर्वी पोटातल्या गर्भात वागवते. याचं मात्र बाळ त्याच्या बुद्धीत आकार घेत होतं आणि हृदयात नांदत होतं….जन्माची प्रतिक्षा करीत! त्याच्या हृदयगर्भात बालक श्रीराम वाढत होते….आणि या बालकाचं त्याच्या गर्भातलं वय होतं साधारण पाच-सहा वर्षांचं!   

मानवाला नऊ महिने आणि नऊ दिवसांचा प्रतिक्षा काल ठरवून दिला आहे निसर्गानं. पोटी देव जन्माला यायचा म्हणून दैवानं या मनुष्याला प्रतिक्षा कालावधीत मोठी सवलत दिली. 

ग.दि.माडगूळकर गीत रामायण लिहित असताना प्रत्यक्ष श्रीरामजन्माचं गाणं लिहिण्याचा प्रसंग आला. त्यांनी खूप गाणी लिहिली पण त्यातलं त्यांना एकही पसंत होईना. गाणं मनासारखं उतरलं नाही तर ते गाणं लिहिलेला कागद चुरगाळून तो मेजाशेजारी टाकून देण्याची त्यांना सवय होती. त्यांच्या पत्नी विद्या ताई हे सर्व पहात होत्या. शब्दप्रभू गदिमांच्या बाबतीत एकदा गीत लिहिलं की ते पुन्हा बदलण्याचा विषय फारसा उपस्थित होत नसे. एकदा तर त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या गडबडीत असताना, त्या ऐन लग्नाच्या दिवशी संगीतकाराला एक अत्यंत लोकप्रिय गीत लिहून दिल्याचं वाचनात आलं…लळा जिव्हाळा शब्दचि खोटे…मासा माशा खाई…कुणी कुणाचे नाही! स्वत:च्या मुलीच्या लग्नाच्या मंगलदिनीसुद्धा मानवी जीवनावर ठसठशीत भाष्य करणे गदिमांसारख्यांनाच शक्य होते! तर….रामजन्माच्या पसंतीस न उतरलेल्या गाण्यांच्या कागदांचा एवढा मोठा ढीग पाहून त्यांच्या पत्नी विद्याताई आश्चर्यचकित झाल्या…त्यावर गदिमा या अर्थाचं काहीसे म्हणाले होते….जगाचा निर्माता,प्रभु श्रीराम जन्माला यायचाय…कुणी सामान्य माणूस नव्हे!

हा माणूसही गदिमांसारखाच म्हणावा. यालाही श्रीरामच जन्माला आणायचे होते…मात्र ते कागदावर नव्हे तर पाषाणातून. ज्यादिवशी त्याला ही गोड बातमी कळाली तेंव्हापासून तो कुणाचाही उरला नाही. एखाद्या तपोनिष्ठ ऋषीसारखी त्याच्या मनाची अवस्था झाली…जागृती..स्वप्नी राममुर्ती….ऋषी-मुनी तरी कुठं वेगळं काही करतात…सतत देवाच्या नामाचा जपच! याला मात्र नाम स्मरण करण्याची आवश्यकता नव्हती. त्याची बोटं राम राम म्हणत पाषाणावर चालत होती….त्याच्या हातातल्या छिन्नीच्या रूपात. त्याच्या घराण्याची मूर्ती निर्माणाची परंपरा थोडीथोडकी नव्हे तर अगदी तीनशे वर्षांची. देव त्यांच्या रक्तातच भिनला म्हणावा. दगडांतून निर्माण होणा-या आणि अमरत्वाचं वरदान लाभलेल्या मुर्तीच त्यांचे उदरभरणाचे स्रोत झाले होते. त्यातून मिळणारा सात्विक आनंद तर त्यांना न मागताही मिळत होता. हा मूर्तिकार अगदी तरूण वयातला. त्याचे वडीलच त्याचे गुरू. त्यांच्या हाताखाली शिकत शिकत त्याने छिन्नी हातोड्याचा घाव घालून दगडाचा देव करण्याची हातोटी साधली होती. 

आपल्याला बालकरूपातील श्रीराम घडवायचे आहेत हे समजल्यापासून त्याची तहानभूक हरपली. आई जसं पोटातल्या गर्भासाठी अन्न घेते, श्वास घेते, निद्रा घेते आणि डोहाळे मिरवते तशीच याची गत. तीन शतकांच्या पिढीजात अनुभवाच्या जोरावर त्याने जगातला सर्वोत्तम पाषाण निवडला. 

पहाटे अगदी तनमनाने शुचिर्भूत होऊन राऊळात दाखल व्हायचं….आणि त्या पाषाणाकडे पहात बसायचं काहीवेळ. त्यातील मूर्तीला वंदन करायचं मनोमन. आणि मग देव सांगेल तशी हातोडी चालवायची…छिन्नीलाही काळजी होती त्या पाषाणातील गर्भाची…जराही धक्का लागता कामा नये. यातून प्रकट होणारी मूर्ती काही सामान्य नव्हती…आणि बिघडली…पुन्हा केली..असंही करून भागणार नव्हतं. आरंभ करायला लागतो तो मसत्कापासून. जावळ काढून झाल्यानंतरच्या चार-पाच वर्षांत विपुलतेने उगवलेले काळेभोर,कुरळे केश. कपाळावर रूळत वा-यावर मंद उडत असणारे जीवतंतुच जणू. केसालाही धक्का न लागू देणे याचा हा ही एक अर्थ व्हावा,अशी परिस्थिती. पण गर्भातलं बालकही या आईला पूर्ण सहकार्य करीत होतं…कारण त्यालाही घाईच होती तशी….पाचशे वर्षापासूनची प्रतिक्षा होती! 

काहीवेळा तर हे बालक मुर्तिकाराच्या छिन्नी-हातोड्यात येऊन बसायचं….आणि स्वत:लाच घडवू लागायचं! देव जग घडवतो…देव स्वत:ला घडवण्यात कशी बरे कुचराई करेल? 

मुर्तीत संपूर्ण कोमल,निर्व्याज्य बाल्य तंतोतंत उतरावे, यासाठी त्याने या वयोगटातील बालकांची हजारो छायाचित्रे न्याहाळली. त्यातील भावमुद्रा, भावछ्टा डोळ्यांत साठवून ठेवल्या आणि आपल्या मुर्तीत त्या कशा परावर्तीत करता येतील याची मनात शेकडो वेळा उजळण्या केल्या. कागदावर ते भाव रेखाटण्याचा नेम सुरू केला. मनाचं समाधान झालं तरच छिन्नी चालवायची अन्यथा नाही. 

मुर्तिकारालाही स्वत:ची मुलं होती. दीड-दोन वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची कन्या. ही आई आपल्या ह्या लेकीला त्याने पाषाणात कोरलेल्या बाळाच्या मुर्तीचा फोटो दाखवायची…आणि विचारायची….हे मूल किती वर्षांचं वाटतंय? लहान वाटतंय की मोठ्या मुलासारखं दिसतंय? जो पर्यंत मुलगी म्हणाली नाही की ..हो हे मूल खरंच चार-पाच वर्षांचं दिसतंय…तो पर्यंत मुर्तिकारानं काम सुरू ठेवलं….आणि पूर्ण होकार मिळताच त्याच्या छिन्नी हातोड्याचा वेग वाढला! 

या कामात त्याला अनेकांनी साहाय्य केलं. हो…गर्भारशीची काळजी घेतातच की घरातले. पण आता त्याचं घर तर खूप मोठं होतं. अयोध्या या घराचं नाव. काम सुरू असताना काही माकडे आतमध्ये घुसायची…आणि तयार होत असलेल्या मूर्तीकडे काही क्षण पाहून निघून जायची…कुठेही धक्का न लागू देता. त्यांचा उपद्र्व होईल या शक्यतेने त्यांनी मूर्ती घडवण्याच्या कक्षाची दारे पक्की बंद करून घेतली तर ही माकडे त्यांची पूर्ण ताकद लावून ते अडथळे दूर सारायची! लंका जाळणा-या हनुमानाचे वंशज ते….त्यांना कोण अडवणार? त्यांना कुणी तरी पाठवत असावं…हे निश्चित…अन्यथा ज्या जागी केवळ पाषाणाचे तुकडेच पडलेले आहेत..अशा जागी त्यांना येऊन काय लाभ होणार होता?

प्रसुतीकळा सुरू झाल्या! आणि शुभ घडीला शुभ मुहूर्ती या पाच वर्षीय बालकाने हृदयगर्भातून बहेर डोकावले…आणि प्रकट झाले स्वयं बाल श्रीराम! केवढंसं असतं ना अर्भक….किती वेगळं दिसत असतं. आईला जसं आहे तसं प्राणापलीकडं आवडत असतं…कुणी काहीही म्हणो. मात्र हे बालक पाहणा-याच्या मनात कोणताही किंतु आला नाही. श्रीकृष्ण नावाच्या बालकाला पाहून जसं गोकुळच्या नारींना वाटलं होतं…तसंच या बाळाला पाहून वाटलं सर्वांना….रामलल्ला पसंद हैं…प्रसन्न हैं! बाळ-बाळंतीण सुखरूप..त्यातील आईतर सर्वोपरी सुखी. सा-या भारतवर्षांचं लक्ष होतं या प्रसुतीकडे…काळजाच्या वंशाचा दिवा पुन्हा प्रज्वलीत व्हायचा होता मुर्तीरूपात…एवढं लक्ष तर असणार होतंच….याचा ताण प्रत्यक्ष आईवर किती असतो…हे फक्त बाळाला जन्म दिलेल्या माताच सांगू शकतील. बाकीचे फक्त दे कळ आणि हो मोकळी! असं म्हणू शकतात फार तर! 

ही आई आता शांत…क्लांत! कर्तव्यपूर्ती करून घेतली श्रीरामांनी. हे भाग्य म्हणजे गेल्या कित्येक पिढ्यांच्या आशीर्वादांचं फलित. कोट्यवधी डोळे ही मुर्ती पाहतील…आणि शुभाशिर्वाद मिळवतील….माझ्या हातून घडलेली ही मूर्ती…आता माझी एकट्याची राहिलेली नाही! 

या बालकाला नटवण्याची,सजवण्याची,अलंकृत करण्याची जबाबदारी आता इतर सर्वांनी घेतली…अनेक लोक होते…वस्त्रकारागीर,सुवर्णकारागीर…किती तरी लोक! देवाचं काम म्हणून अहोरात्र झटत होते…हे काम शतकानुशतकं टिकणारं आहे…ही त्यांची भावना! आपण या जगातून निघून जाऊ…हे काम राहील! 

मुर्ती घडवणारी आई हे कौतुक पहात होती…मग तिच्या लक्षात आलं….बालक आपलं रूप क्षणाक्षणाला पालटते आहे…अधिकाधिक गोजिरे दिसते आहे. संपूर्ण साजश्रुंगार झाला आणि लक्षात तिच्या लक्षात आलं…..हे मी घडवलेलं बालक नाही….मी तर फक्त पाषाणाला आकार देत होते..आता या पाषाणात चैतन्याचा प्रवेश झाला आहे! नेत्रांतले,गालांवरचे,हनुवटीवरचे भाव मी साकारलेच नव्हते…ते आता प्रत्यक्ष दिसू लागलेत…..ही माझी कला नाही…ही त्या प्रभुची किमया आहे…स्वत:लाच नटवण्याची. त्याची लीला अगाध…मी निमित्तमात्र! यशोदेसारखी! …देवकीला तरी ठाऊक होतं की अवतार जन्माला येणार आहे…पण यशोदा अनभिज्ञ होती? तिला पुत्रप्राप्तीचा आनंद पुरेसा होता! कृष्णाची आई ही उपाधीच तिचा जन्म सार्थक करणारी होती. 

जसे अवतार जन्माला येतात, तसे कलाकारही जन्माला येतात. अवतारांच्या मुर्ती साकारण्याचं भाग्य नशिबात असणारे कलाकारही जन्माला यावे लागतात…कलाकार योगी असावे लागतात…यांच्यातर कर्मातही योग आणि नावातही योग….अरूण योगिराज या कलाकाराचे नाव. यांनी रामलल्लांच्या मुर्तीचं आव्हान पेललं! सात महिने आपल्या हृदयात श्रीरामांना अक्षरश: एखाद्या गर्भार स्त्रीसारखे निगुतीने सांभाळले आणि कोट्यवधी श्रीरामभक्तांच्या ओटीत घातलं ! 

अरूण योगिराजजी…तुम्हांला सामान्यांच्या आशीर्वादांची आता खरोखरीच गरज नाही…..पण तुम्ही आम्हां सामान्यांचे धन्यवाद मात्र अवश्य स्विकारा….या निमित्ताने आमचेही नमस्कार तुम्ही साकारलेल्या रामलल्लांच्या चरणी पोहोचतील !     

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग २ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग २ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण बघितले,

‘हरी है ये जमीं कि हम तो इश्क बोते है

हमीं से हँसी सारी, हमीं पलके भिगोते है

धरा सजती मुहब्बत से, गगन सजता मुहब्बत से

मुहब्बत से ही , खुशबू, फूल, सूरज, चाँद होते है… ) आता इथून पुढे — 

कथेच्या ओघात दोन बोचरी सत्ये लेखकाने प्रगट केली आहेत. एनकाऊंटरमधे शहीद झालेल्या आपल्या परममित्राची आठवण काढता काढता, मोहितच्या मनात येतं, जोर्यंत तुम्ही शहीद होत नाही, तोपर्यंत तुम्ही बहादूर नसता. ज्या देशासाठी तुम्ही जीव गमावला, त्या देशवासीयांना क्षणभर थांबून तुमच्यासाठी दु:ख करायला वेळ नसतो. दुसरं सत्य म्हणजे,  आपण बहादूर आहात की नाही, हे दाखवण्यासाठी, आपण कुठे लढलात, ती जागा महत्वाची. दूर चीड – देवदारच्या जंगलात झालेलं राहूलचं युद्ध, दिल्ली-मुंबईच्या परिसरात झालं असतं, तर तो आत्तापर्यंत हीरो झाला असता. आता मात्र न्यूज चॅनेलच्या बातम्यांच्या खाली धावणार्‍या पट्टीपुरतं त्याचं हिरोइझम मर्यादित झालय.

‘इक तो सजन मेरे पास नही रे’ ही संग्रहातील अतिशय सुरेख, भावुक, हळवी कथा. कथेच्या सुरूवातीला एका दृश्याचं वर्णन येतं. झेलमच्या साथीने जाणारा रस्ता जिथे तिची साथ सोडतो, तिथे चिनारचा एक पुरातन वृक्ष आहे. गावाची वस्ती जिथे संपते, तिथे हा वृक्ष आहे. नियमित पेट्रोलिंगसाठी जाणार्‍या विकास पाण्डेयला नेहमी वाटतं, तिथे उभ्या असलेल्या देखण्या, चित्ताकर्षक तरुणीला त्याला काही तरी सांगायचय आणि ते खरंच असतं. एक दिवस आपली जीप थांबवून तो तिची चौकशी करतो. ती सुंदर तर आहेच. पण तिचे डोळे त्याला दल आणि वुलर सरोवराचा तळ गाठणारे वाटतात आणि तिच्या नाजूक देहातून उमटणारा आवाज अतिशय गंभीर वाटतो. वेगळीच ओढ लावणारा. व्याकूळ करणारा. त्याला पाकिस्तानी गायिका रेशमाची आठवण होते. विशेषत: तिचं गाणं,  ‘चार दिना दा प्यार ओ रब्बा बडी लंबी जुदाई.’ तिच्या डोळ्यातली तळ गाठणारी दल आणि वुलरची सरोवरं, तर कधी त्यात उसळलेलं झेलमच तूफान आणि तिचा रेशमासारखा व्याकूळ करणारा आवाज आणि रेशमाचं ते गाणं.. लंबी जुदाई… याची गुंफण कथेमधून अनेक वेळा इतकी मोहकपणे आणि मार्मिकपणे झाली आहे, की सगळी कथा प्रत्यक्ष वाचायलाच हवी.  

ती तरुणी रेहाना. तिचा प्रियकर सुहैल गेल्या महिन्यापासून गायब आहे. त्याचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती ती मेजर विकास पाण्डेयला करते. तो तिला त्याचा शोध घेण्याचं आश्वासन देतो.

सुहैलचा शोध घेतल्यावर असं लक्षात येतं की तो सरहद्दीपलीकडे जिहादी कॅम्पमधे दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलाय. सुलतान नावाचा मेंढपाळ पाच हजार रुपये आणि दोन पोती आटा, डाळ याच्या मोबदल्यात, सुहैलशी मोबाईलवर बोलणं करून देण्याचा मान्य करतो. दिल्या शाब्दाला आणि दिल्या पैशाला, आटा-डाळीला तो जागतो. विकासाचं सुहैलशी बोलणं होतं. तो जन्नत म्हणून तिकडे गेलेला असतो. प्रत्यक्षात जहन्नूमचा अनुभव घेत असतो. आपल्याला यातून बाहेर काढण्याची तो विनंती करतो. विकास त्याला ‘सरहद्द पार करून या बाजूला ये, पुढचं सगळं मी बघेन’, असं सांगतो. एका जिहादी गटाबरोबर तो इकडे यायचं ठरवतो पण…

एके दिवशी विकासच्या चौकीवर, सरहद्दीजवळ एनकाऊंटर झाल्याची बातमी येते. सरहद्द पार करून येणार्‍या एका जिहादी दहशतवादी गटाला, आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सैन्याच्या तुकडीने मारून टाकल्याची ती बातमी असते. सुलताना नावाच्या कुणा मेंढपाळाने पन्नास हजार रुपयांच्या बदल्यात, ही खबर दिलेली असते. मेलेल्यांच्या यादीत सुहैलचंही नाव असतं.

त्या रात्री सायलेंट मोडवर असलेल्या विकासच्या मोबाईलवर रेहानाचा नंबर वारंवार फ्लॅश होत होता आणि त्याच्या लॅपटॉपवर रेशमा गात होती…

‘इक तो साजण मेरे पास नाही रे

दूजे मीलन दी कोई आस नही रे

‘गर्ल फ्रेंड’ ही कथा दहशतवाद्यांशी  प्रत्यक्ष झालेल्या चकमकीचं वर्णन करते. एका मोठ्या घरात दोन अफगाण दहशतवादी लपून बसल्याची माहिती कळते. त्यांचा सफाया करण्याचा प्लॅन ठरतो. त्या प्रमाणे अंमलबजावणी होते, पण अनपेक्षितपणे चकमकीला वेगळं वळण लागतं. मेजर प्रत्यूशचा बड्डी तळघर झाकणारी पट्टी उचकटणार असतो आणि प्रत्यूश आत ग्रेनेड टाकणार असतो. मेजर सिद्धार्थ व त्याचा बड्डी त्यांना फायरिंग कव्हर देणार असतात. सिद्धार्थ म्हणतो, ‘सर, तुम्ही अनेक यशस्वी ऑपरेशन्स पार पाडलीत, यावेळी मला ग्रेनेड आत टाकू द्या. प्रत्यूश मान्य करतो आणि दोघे आपआपल्या जागा बदलतात आणि अनपेक्षितपणे अफगाणीच अंदाधुंद गोळीबार करत, पट्टी उचकटून बाहेर येतात. या गोळीबारात सिद्धार्थ आणि त्याचा बड्डी धराशायी होतात. आपल्यासाठी बाहेर पडलेली गोळी सिद्धार्थचा जीव घेणारी ठरली, या विचाराने प्रत्यूश कासावीस होतो. त्याला सतत वाटत रहातं, आपण सिद्धार्थचं म्हणणं मान्यच केलं नसतं तर…

इतक्या गंभीर कथेचा शेवट मात्र नर्म विनोदाने होतो. इथे नर्स शकुंतलाला तो सांगतो, ‘मृत्यू समोर दिसत असताना मी माझ्या गर्ल फ्रेंडचे नंबर मोबाईलवरून डीलीट करत होतो कारण मी मेल्यानंतर माझ्या सामानासकट मोबाईल माझ्या बायकोकडे जाईल आणि मी तर तिला सांगितलं होतं की आता मी कुठल्याही गर्ल फ्रेंडच्या संपर्कात नाही. तिला हे नंबर बघून काय वाटलं असतं?’

असाच नर्म विनोदी शेवट ‘हॅशटॅग’ कथेचा आहे. ही समर प्रताप सिंह या तरुणाच्या एकतर्फी विफल प्रेमाची कहाणी. या कथेत प्रामुख्याने मिल्ट्री कॅंडिडेट्सना जे कठोर प्रशिक्षण दिलं जातं, त्याची माहिती येते. ही माहिती, समर आपल्या बहिणीला मुनमूनला आपल्या दिनचर्येची माहिती देतो, त्यावरून कळते.

लॅपटॉपवरून जेव्हा त्याला कळतं त्याची प्रेयसी सगुना हिचा साखरपुडा आदित्यशी झाला आहे, तेव्हा तो कासावीस होतो. सगुनाशी प्रत्यक्ष बोललं, तर ती आपलं प्रेम मान्य करेल अशीही त्याला भाबडी आशा आहे. यावेळी त्याच्या कंपनीतली सगळी मुले एकजुटीने कसं कारस्थान रचतात आणि दोन दिवसांसाठी वरिष्ठांच्या नकळत त्याला सगुनाला भेटायला कसं पाठवतात, याचं मोठं खुसखुशीत वर्णन कथेत येतं. हे सारं प्रत्यक्षच वाचायला हवं. तो रात्री तिला  भेटतो. ती अर्थातच त्याचं बोलणं धुडकावून लावते. मग तो त्याचा रहात नाही. फळं कापायची सूरी तो तिच्या पोटात खुपसतो आणि आपल्या कॅम्पसवर निघून येतो.

नंतर त्यांची पहिली टर्म संपते. सगुना सुखरूप असल्याचे त्याला कळते. त्याला आनंद होतो. सगुणा-आदित्यचं लग्नं होतं, हे कळल्याने त्याला दु:ख होतं. घरी आल्यावर सगुनाला एकदा तरी बघावं, म्हणून तो तिच्या घराजवळ रेंगाळतो. त्याला एकदा रिक्षात ती दिसते. त्याला पहाताच ती आदित्यला अधीकच खेटून बसते. त्यावेळी तो दोन प्रतिज्ञा करतो. एक म्हणजे तो आजन्म अविवाहित राहील आणि कधी तरी आपल्या विरह-व्यथेवर एक कथा लिहील, पण त्यात सगुना आदित्यला खेटून बसणार नाही, तर त्याच्यापासून दूर सरकून बसेल. वरील दोन्ही कथांमधून कठोर कथानायकांच्या निरागसतेचं मोठं मनोज्ञ दर्शन घडतं.            

‘चिलब्लेन्स’ म्हणजे हिमदंश. या कथेत ‘दर्ददपुरा’ या कुपवाड शहरापासून सुमारे ७० की.मीटर अंतरावर असणार्‍या खेड्याची आणि त्याच्या ‘दर्द’ची म्हणजे दु:खांची कहाणी येते. गाव इतकं सुंदर, जसं काही भोवतालच्या पहाडांनी आपले बाहू पसरून स्वर्गालाच कवेत घेतलय. पण गावाची दु:खे अनेक. वीज नाही. डॉक्टर नाही. उपचारासाठी लोकांना थेट कुपवाडाला जावं लागतं. मेजर नीलाभचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असलेल्या माजीदचं हे गाव. आपल्या दोन सुंदर मुलींना, शायर नवर्‍याला, भरल्या संसाराला सोडून माजीदची बायको एका जिहादीबरोबर गेलीय. गावात घरटी एक तरी जिहादी. त्यामुळे तरुण मुले बरीचशी गारद झालेली. उपवर मुलींसाठी मुलेच नाहीत. हे दु:ख तर काश्मीर घाटीतल्या अनेक ठिकाणांचे.

माजीदच्या वडलांच्या डाव्या हाताला चार बोटे नाहीत. त्याचे कारण नीलाभने विचारले असता, त्याला कळते, हिमदंशामुळे बोटात होणार्‍या वेदानांपासून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वत:च केलेला हा उपचार आहे. बोटंच तोडण्याचा. नीलाभला वाटतं, सगळा ‘दर्ददपुरा’ आपल्याकडे बघून रडतो आहे. तो तिथून परत येताना ठरवतो, ‘हेडक्वार्टरकडे प्रस्ताव द्यायचा, की कंपनीच्या. डॉक्टरांनी आठवड्यातून दोन वेळा ‘दर्ददपुरा’ गावाला व्हिजीट द्यावी आणि त्याला वाटतं ‘दर्ददपुरा’ आता आपल्याकडे बघून हसतोय.

‘द बार इज क्लोज्ड ऑन च्युजडे. ही एक अगदी वेगळ्या प्रकारची कथा. रहस्यमय अशी ही भूतकथा तीन तुकड्यातून आपल्यापुढे येते आणि शेवट तर भन्नाटच. प्रत्यक्ष वाचायलाच हवा असा.

दुसरी शहादत, हैडलाईन, हीरो, आय लव्ह यू फ्लाय बॉय, अशा एकूण 21 कथा यात आहेत. अनेक विषयांवरच्या या सगळ्याच कथा वेधक आहेत. लेखकाची चित्रमय शैली, स्थल, व्यक्ती, घटना-प्रसंग यांचा साक्षात् अनुभव देणारी आहे. याला बिलगून आलेले काव्यात्मकतेचे तरल अस्तर, कथांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. ‘गर्ल फ्रेंड’, ‘हॅशटॅग’, ‘एक तो सजन …’ सारख्या काही कथा वाचताना वाटत राहातं, यावर उत्तम दर्जेदार चित्रपट होऊ शकतील. यातील कथांबद्दल किती आणि काय काय लिहावं? प्रत्येकाने प्रत्यक्षच वाचायला आणि अनुभवायला हवा, हिरव्या हास्याचा कोलाज.

– समाप्त – 

© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग १ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हिरव्या हास्याचा कोलाज आणि गौतम राजर्षी – क्रमश – भाग १ ☆ सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

अगदी अलीकडे एक अतिशय सुरेख असा हिन्दी कथासंग्रह वाचनात आला. पुस्तकाचं नाव ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज’ आणि त्याचे लेखक आहेत, गौतम राजऋषि. वेगळ्या वळणाचं पुस्तकाचं नाव वाचून आतील कथांविषयी कुतूहल निर्माण झालंच होतं. कथा वाचता वाचता जाणवलं, कथा सुरेख आहेत. मार्मिक आहेत पुस्तकाचं नाव सार्थ ठरवणार्‍या आहेत. पुस्तक वाचलं आणि मनात आलं, या पुस्तकाचा अनुवाद करायलाच हवा आणि ‘हिरव्या हास्याचा कोलाज या नावाने मी तो केलाही. 

कोलाज म्हणजे विविध रंगी-बेरंगी तुकड्यांची आकर्षक रचना करून निर्माण केलेली देखणी, मनोहर कलाकृती. मराठीत शीर्षकाचा अनुवाद करायचा झाला, तर ‘हिरव्या हास्याचा कोलाज’ म्हणता येईल. यातला हिरवा हा शब्द प्रतिकात्मक आहे. भारतीय सैनिकांची, फौजींची वर्दी म्हणजे गणवेश, हिरवा असतो.  या हिरवी वर्दी धारण करणार्‍या फौजींच्या जीवनावर आधारलेल्या या कथा आहेत. त्यांचे हर्ष-विषाद, विचार-भावना, त्यांच्या एकूण जगण्याचेच काही तुकडे मांडणार्‍या या कथा.  

या  कथांचे लेखक गौतम राजऋषि, भारतीय सेनेत कर्नल आहेत. त्यांचं पोस्टिंग बर्‍याच वेळा काश्मीरच्या आतंकग्रस्त इलाख्यात आणि बर्फाळ अशा उंच पहाडी भागात ‘लाईन ऑफ कंट्रोल’वर झाले आहे. शत्रूबरोबर झालेल्या अनेक चकमकींचा त्यांनी दृढपणे सामना केला आहे. एकदा तर ते गंभीरपणे जखमी झाले होते. कर्नल गौतम राजऋषि हे ‘शौर्य पदक’ आणि ‘सेना मेडल’चे मानकरी आहेत.

त्यांच्या हातातील रायफलीइतकीच त्यांच्या हातातील लेखणीही प्रभावी आहे. जेव्हा ते आपल्या ड्यूटीवर तैनात असतात, तेव्हा तिथे, जेव्हा जेव्हा वेळ होईल, तेव्हा तेव्हा ते लेखणी हाती घेतात. सैनिकी जीवनातील आव्हाने त्यांनी जवळून बघितली आहेत आणि समर्थपणे पेलली आहेत. या दरम्यान घडलेल्या अशा काही घटना आणि व्यक्ती त्यांना भेटल्या नि त्या त्यांच्या कायम स्मरणात राहिल्या. ते अनुभव आणि त्या स्मृतींच्या मग कथा झाल्या. या कथांमधून फौजी जीवनाचे जे दर्शन घडते, ते सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनापेक्षा खूप वेगळे आहे.

त्यांच्या शब्दांचे बोट धरून आपण पोचतो, सुंदर, मनोहर काश्मीर घाटीमध्ये.  भारतातील नंदनवन. काश्मीर. या सुंदर प्रदेशावर सध्या पसरून राहिलेलं आहे दहशतवादाचं अशुभ सावट …. या प्रदेशाचं आणि आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी, इथल्याच बर्फाळ पहाडांवर उभारलेली सैन्याची ठाणी…चौक्या…गस्त घालण्यासाठी नेमलेल्या सैन्याच्या तुकड्या, हिरव्या वर्दीतील सौनिकांचं कष्टमय जीवन, त्यांची सुख-दु:खे, चिंता-काळज्या, विरंगुळ्याचे, हास्या-विनोदाचे दुर्मिळ क्षण, या सार्‍यांचा सुरेख कोलाज म्हणजे ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज’.  सैनिकांचा, अधिकार्‍यांचा स्थानिक लोकांशी येणारा संबंध, त्यातून त्यांना जाणवलेले त्यांचे प्रश्न, त्यांची मानसिकता याचे चित्रमय दर्शन, म्हणजे ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज.’ हे दर्शन कधी थेट कथेतून घडते, तर कधी कथेचा बाज घेऊन आलेल्या आठवणी, प्रसंग वर्णन, वार्तांकन या स्वरुयात आपल्यापुढे येते आणि शब्दांचं बोट धरून आपण प्रत्यक्षच पाहू लागतो… ‘हरी मूस्कराहटों वाला कोलाज’

‘हरी मुस्कुराहटों वाला कोलाज’ ही यातली शीर्षक कथा. कथेचा सारांश असा- पीर-पंजालची बर्फाळ शिखरं पार करत सैनिकांना घेऊन चाललेलं विमान एका  दाट हवेच्या पोकळीत सापडून लडखडतं. मृत्यूचा त्या क्षणिक जाणीवेने सगळ्याच्या सगळ्या सैनिकांच्या तोंडून बाहेर पडणारी किंकाळी, बाहेर पडता पडता थांबते. त्या क्षणीही आपल्या वर्दीच्या प्रतिष्ठेची, गौरवाची जाणीव त्यांना होते.

  विमान श्रीनगर हवाई अड्ड्यावर सुखरूप उतरतं. यावेळी सगळ्या सैनिकांचे डोळे आपल्या घरी सोडून आलेल्या प्रियजनांच्या आठवणींचा एक मिळता जुळता कोलाज बनवत आहेत. मेजर मोहित सक्सेनाही आपल्या सव्वा वर्षाच्या मुलीच्या, खुशीच्या आठवणींचा कोलाज त्याला चिकटवू बघतो. तो यंदा दुसर्‍यांदा काश्मीर घाटीत येत आहे.

एअर पोर्टच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताना, समोर शहीद सोमनाथ शर्माचा भव्य पुतळा आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पाकिस्तानकडून येणार्‍या घूसखोरांच्या टोळ्यांनी केलेल्या गोळीबाराचा वर्षाव त्याने एकट्याने आपल्या छातीवर झेलला होता आणि एअर पोर्टचं रक्षण केलं होतं. स्वतंत्र भारताच्या परमवीर चक्राचा तो पहिला मानकरी. सगळे सैनिक त्या पुतळ्याला सॅल्यूट करून पुढे जातात.

पुढे फौजींची निवासाची सोय असलेल्या कॅंपचं वर्णन येतं. हे वर्णन इतकं प्रत्ययकारी आहे की शब्दांवरून डोळे फिरताना आपण त्या कॅंपच्या परिसरात फिरतो आहोत, असं वाटतं.

मोहितला इथे, बर्फाळ पहाडावर वसलेल्या एका छोट्या पण अतिशय महत्वाच्या पोस्टची जबाबदारी सांभाळायची आहे. एकांडी चौकी. सरहद्द पार करून येणार्‍या घुसखोरांवर नजर ठेवणे आणि पोस्टखालून जाणार्‍या महत्वाच्या रस्त्याची सुरक्षा, ही त्याची जबाबदारी.

कर्तव्यदक्ष, ड्यूटीवर जराही ढिलाई खपवून न घेणारा, कठोर मोहित इथे ‘कसाई  मोहित’ म्हणून प्रसिद्ध(?) आहे. मेजर आशीषशी बोलताना त्या मागचं कारणही उलगडतं. मोहित म्हणतो, ‘तीन वर्षापूर्वी मी जेव्हा काश्मीर घाटीत होतो, तेव्हा एकदा आत्मघाती आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात आपले दोन जवान शहीद झाले होते. मागून कळलं की ड्यूटीच्या वेळी एक जवान झोपला होता. त्याचा फायदा घेऊन हल्ला झाला होता. त्यानंतर माझा मी राहिलो नाही. ड्यूटीवर जराही ढिलाई दिसली, तरी माझ्यातला ज्वालामुखी उसळतो.’

ड्यूटीचा पहिला दिवस. प्रचंड थंडी. डोळ्यापुढे जर्मन मेड शक्तीशाली दुर्बीण घेऊन तो खालच्या रस्त्याच्या सुरक्षेसाठी उभ्या असलेल्या जवानांचं निरीक्षण करतोय. सगळे अगदी योग्य पद्धतीने उभे आहेत. रायफलवर मजबूत पकड आहे. पण एका ठिकाणी दुर्बीण थबकते. लांस नायक पूरण चंद शिथील दिसतोय. झाडाला टेकलेला. रायफलचा पट्टा ओघळलेला. त्याच्या चेहर्‍यावर एक मधुर हसू आहे. मोहित संतापतो. ड्रायव्हरला जीप काढायला सांगतो. वाटेत त्याला काळतं, तो लग्नं करून नुकताच ड्यूटीवर परत आलाय.

जीप पूरणजवळ थांबते. मोहितला वाटतं, पूरणला त्याच्या नव्या-नवेल्या बायकोच्या स्वप्नातून जागं करणं क्रूरपणाचं होईल, पण ते आवश्यकच आहे. केवळ कर्तव्यपरायणतेच्याच दृष्टीने नव्हे, तर त्याच्या बायकोच्या भविष्याच्या दृष्टीनेसुद्धा. तिचा भांग कायम भरलेला राहायला हवा. त्यासाठी पूरणला स्वप्नातून जागं करायलाच हवं. मेजरला पाहून पूरण कडक सॅल्यूट ठोकत, योग्य पोझिशनमध्ये येतो. चोरी पकडली गेल्याचे चेहर्‍यावर भाव. मोहित त्याच्या ख्याली-खुशालीची चौकशी करतो. लग्नाची मिठाई मागतो. ’ड्यूटीवर ढिलाई नको’, अशी सूचना देत मोहित निघतो. मेजर साहेबांचा हा बदलेला अवतार बघून, पूरण चकित. एक स्मितहास्य त्याच्या ओठांवर तरळतं. ड्यूटीचा आणखी एक दिवस सुरक्षित पार पडतो आणि मेजर मोहित सक्सेनाच्या कोलाजमध्ये पूरणचं हिरवं हास्य जोडलं जातं. चौकीकडे परतताना तो गुणगुणू लागतो,

हरी है ये जमीं कि हम तो इश्क बोते है

हमीं से हँसी सारी, हमीं पलके भिगोते है

धरा सजती मुहब्बत से, गगन सजता मुहब्बत से

मुहब्बत से ही , खुशबू, फूल, सूरज, चाँद होते है     

– क्रमश: भाग १

© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक ३१ ते ४२) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्‌ । 

नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ४-३१ ॥ 

*

शेष राहिले यज्ञातुन अमृत त्याचे करिता पान

परब्रह्म परमात्म्आ करीत प्राप्त योगी सनातन

विन्मुख होता यज्ञाला सौख्य नाही त्या इहलोकी

प्राप्त तयाला कसे व्हावे सौख्य कुरुश्रेष्ठा परलोकी ॥३१॥ 

*

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । 

कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥ 

*

विस्तृत करुनी कथिले प्रकार वेदवाणीने यज्ञाचे

कायागात्रमन क्रियेने जाण संपन्न तयांना करण्याचे

अनुष्ठान करावे पार्था तनमनइंद्रिये त्या यज्ञाचे

मोक्ष तयाने मिळेल तुजला मुक्ती बंधन कर्माचे ॥३२॥

*

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप । 

सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ४-३३ ॥ 

*

शत्रुतापना धनंजया जाण यज्ञज्ञान

द्रव्यमय यज्ञाहून अतिश्रेष्ठ ज्ञानयज्ञ 

समस्त कर्मे अखेर समाप्त व्हायाची

ज्ञानामध्ये ती तर विरून जायाची ॥३३॥

*

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । 

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥ 

*

तत्वदर्शी ज्ञान्याकडुनी घेईऔ ज्ञान शिकुनी

सालस सेवा त्यांची करुनी नमन तया करुनी

परमतत्वाचे अधिकारी ते महात्मे श्रेष्ठ ज्ञानी

ज्ञानोपदेश तुजला देतिल प्रसन्न मनी होउनी  ॥३४॥

*

यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव । 

येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ४-३५ ॥ 

*

जाणताच त्या ज्ञाना न जाशील पुनरपि मोहाप्रती

समस्त भूता पाहशील पांडवा तू तर माझ्याप्रती ॥३५॥

*

अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः । 

सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि ॥ ४-३६ ॥ 

*

पाप्यापेक्षा अधिक घडले पाप तुझ्या हातुन

ज्ञाननौका नेइल तुजला पापसमुद्र तरुन ॥३६॥

*

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन । 

ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ ४-३७ ॥ 

*

प्रदीप्त वन्ही जैसे करतो काष्ठांसी भस्म

समस्त कर्मा ज्ञानाग्नी तैसा करील भस्म ॥३७॥

*

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । 

तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ४-३८ ॥ 

*

ज्ञानासम नाही काही जगात या पवित्र

काळाने योगसिद्ध आत्म्यात करितो प्राप्त ॥३८॥

*

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः । 

ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ४-३९ ॥ 

*

जितेंद्रिय श्रद्धावान तत्पर साधका ज्ञान प्राप्त

ज्ञानप्राप्तिने तयास सत्वर होई परमशांती प्राप्त ॥३९॥

*

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । 

नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४-४० ॥ 

*

अज्ञ अश्रद्ध संशयात्मा खचित पावे विनाश

न इहलोक तया ना परलोक ना सौख्याचा लाभ॥४०॥

*

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम्‌ । 

आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥ ४-४१ ॥

*

कर्मे सारी अर्पण केली विनाश केला संशयाचा

अंतःकरण स्वाधीन ज्याच्या पाश नसे कर्मबंधनाचा ॥४१॥

*

तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः । 

छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४-४२ ॥ 

*

ज्ञानखड्गाने वधुनी अज्ञानसंभव तव संशया

स्थिर होऊनी कर्मयोगे युद्धसिद्ध हो धनंजया ॥४२॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥ 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी ज्ञानकर्मयोग नामे निशिकान्त भावानुवादित चतुर्थ अध्याय संपूर्ण ॥४॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वृद्धत्व आणि पाय…” – लेखक : डॉ. डी. जी. लवेकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “वृद्धत्व आणि पाय…” – लेखक : डॉ. डी. जी. लवेकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते ! पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !!

जसे वर्षे घालवतो तसे रोज म्हातारा होत असतो,पाय नेहमी सक्रिय आणि मजबूत असले पाहिजेत.

जसजसे सतत म्हातारे होत असतो/वृद्ध होत असतो,तस तसे केस राखाडी होण्याची/ त्वचा निस्तेज/ चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची भीती बाळगू नये.

दीर्घायुष्य प्रदीर्घ तंदुरुस्त आयुष्याच्या लक्षणांपैकी काही, लोकप्रिय यूएस मॅगझिन”प्रिव्हेन्शन” द्वारे सारांशित केले आहे, पायां चे मजबूत स्नायू सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक म्हणून शीर्षस्थानी सूचीबद्ध आहेत. कृपया दररोज चालत जा.

जर फक्त २ आठवडे पाय हलवले नाही तर पायाची खरी ताकद १० वर्षांनी कमी होईल.

फक्त चाला

डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की वृद्ध,तरुण २ आठवड्यांच्या निष्क्रियता दरम्यान,पायां च्या स्नायूंची ताकद एक तृतीयांश कमकुवत होऊ शकते* जे २०-३० वर्षांच्या वृद्धत्वाच्या समतुल्य आहे !!

म्हणून फक्त चाला

पायाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे नंतर पुनर्वसन व व्यायाम केले तरीही ते बरे होण्यास बराच वेळ लागेल.

म्हणून चालण्यासारखा नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे

संपूर्ण शरीराचे वजन/भार शिल्लक राहून पायांवर विश्रांती घ्या.

पाय हे १ प्रकारचे खांब आहेत,जे मानवी शरीराचे संपूर्ण भार सहन करतात.

रोज चाला.

मजेची गोष्ट म्हणजे,माणसाची ५०% हाडे, ५०% स्नायू २ पायांत असतात.चालत जा

मानवी शरीरातील सर्वात मोठे व मजबूत सांधे,हाडे देखील पायांमध्ये असतात.

10K पावले/दिवस

मजबूत हाडे,मजबूत स्नायू, लवचिक सांधे लोह त्रिकोण बनवतात जो सर्वात महत्वाचा भार वाहतो म्हणजेच मानवी शरीर”

७०% मानवी क्रियाकलाप व व्यक्तीच्या जीवनातील ऊर्जा बर्न दोन पायांनी केली जाते.

हे माहीत आहे का?जेव्हा एखादी व्यक्ती तरुण असते तेव्हा तिच्या मांडीत ८०० किलो वजनाची छोटी गाडी उचलण्याइतकी ताकद असते

पाय हे शरीराच्या हालचाली चे केंद्र आहे

दोन्ही पायांना मिळून मानवी शरीराच्या ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या आणि ५०% रक्त त्यामधून वाहत असते.

हे शरीराला जोडणारे सर्वात मोठे रक्ताभिसरण नेटवर्क आहे. म्हणून रोज चाला

फक्त जेव्हा पाय निरोगी असतात तेव्हाच रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो,त्यामुळे ज्यांच्या पायाचे स्नायू मजबूत असतात त्यांचे हृदय नक्कीच मजबूत असते.* चाला.*. 

वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते

एखादी व्यक्ती मोठी होते, मेंदू,पाय यांच्यातील सूचनांच्या प्रसारणाची अचूकता व गती कमी होते,ती व्यक्ती तरुण असताना कमी होते.कृपया चालत जा

याशिवाय,तथाकथित हाडां चे खत कॅल्शियम कालांतराने लवकर/नंतर नष्ट होते,ज्यामुळे वृद्धांना हाडे फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते.वृद्धां मध्ये हाडांचे फ्रॅक्चर सहजपणे अनेक गुंतागुंत निर्माण करू शकतात. विशेषत: मेंदूच्या थ्रोम्बोसिससारखे घातक रोग.

हे माहीत आहे का ? साधारणपणे १५% वृद्ध रूग्ण जास्तीत जास्त मरतात. १ वर्षा च्या आत मांडीचे हाड फ्रॅक्चर ! रोज न चुकता चाला

पायांचा व्यायाम,वयाच्या ६० वर्षानंतरही कधीही उशीर होत नाही

पाय कालांतराने हळूहळू म्हातारे होत असले तरी,पाय/पायांचा व्यायाम करणे हे आयुष्यभराचे काम आहे.

10,000 पावले चाला

केवळ नियमितपणे पाय बळकट केल्याने पुढील वृद्धत्व टाळता येते/कमी करता येते. ३६५ दिवस चाला

पायांना पुरेसा व्यायाम मिळावा,पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्यासाठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.

तुम्ही ही महत्त्वाची माहिती तुमच्या 40+ मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर केली पाहिजे, कारण प्रत्येकजण दररोज वृद्ध होत आहे

आयुषचे माजी महासंचालक डॉ.जी.डी.लवेकर यांनी पाठवले आहे.

लेखक : डॉ. डी. जी. लवेकर

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 2 ☆ श्री संभाजी बबन गायके 

(तब्बल दोनशे किलोमीटर्सचा हा प्रवास करायला त्यांना पाच दिवस लागले…प्रभु रामचंद्रांच्या वानरसेनेलाही श्रीलंकेपर्यंत सेतू बांधायला पाचच दिवस लागले होते.) इथून पुढे —

३० ऑक्टोबरला राम-शरद अयोध्येत दाखल झाले! अयोध्येत सुमारे तीस हजार पोलिसांचा खडा पहारा होता…हत्याबंद. माणूसच काय पण पाखरूही रामजन्मभूमी परिसरात फिरकू शकणार नाही अशी पोलादी रचना केली गेली होती. तत्कालीन प्रशासन हे न्यायव्यवस्थेच्या आदेशाचे पालन करण्यात व्यग्र होते. हाती लागलेल्या कारसेवकांना प्रशासन वाहनांमध्ये कोंबून दूरवर नेऊन सोडत होते. रामजन्मभूमीस्थळी हजारोंचा जमाव जमला होता. त्यांच्यामध्ये पोलिसांच्या पहा-याची मजबूत भिंत उभी होती. पोलिसांनी अटक केलेले कारसेवक एका वाहनात भरले…ते वाहन तेथून निघणार होते तेवढ्यात एका साधूने वाहनचालकाकडून त्या वाहनाचा ताबा मिळवला आणि ते वाहन सर्व अडथळे तोडून थेट रामजन्मभूमीस्थळी पोहोचले. हे एवढ्या वेगाने घडले की काही मिनिटे पोलिसही गोंधळून गेले. या गोंधळात तोवर त्या इमारतीच्या घुमटावर कारसेवक चढलेही होते….बारीक चणीचे आणि चपळ असलेले शरदकुमार हाती भगवा ध्वज घेऊन सर्वांत आधी घुमटावर पोहोचले…बंधू राम सोबत होतेच. आणि राजेश अग्रवालही. शरदकुमारांनी घुमटावर भगवा ध्वज फडकावला…त्या स्थळावर प्रतिकात्मक अधिकार सांगणारी ती कृती होती….त्याजागी चारशे आठ वर्षांनंतर पहिल्यांदा मूळचा ध्वज फडकत होता! यंत्रणेने या सर्वांना खाली उतरवण्यात यश मिळवले आणि त्यांची रवानगी दूरवर केली.

शरद,राम,राजेश आणि अन्य सहकारी १ नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येत परतले. अयोध्येतल्या एका मंदिरात रात्र काढली. दुस-याच दिवशी कार्तिक पौर्णिमा होती….२ नोव्हेंबर,१९९०! यादिवशी गंगा-यमुना स्नान घडले तर समस्त मनोकामना पूर्णत्वास जातात, अशी श्रद्धा आहे! या दिवशी देव दिवाळीही साजरी केली जाते.

रामजन्मभूमीसमोर जाऊन भजने म्हणत शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्याचे ठरले आणि अर्थात शरद,राम,राजेश हे यात सहभागी होणारच होते. त्यांनी भल्या पहाटे शरयूगंगेत स्नान केले. घाट चढून वर आले तर रस्त्यातल्या एका दुकानात एक वस्त्रकारागीर कारसेवकांसाठी भगव्या कपाळपट्ट्या तयार करताना दिसला. राम आणि शरद यांनी एक एक पट्टी खरेदी केली. आणि पट्टीच्या मागे पेनने लिहिले….कफन! ही कृती तशी काही आधी ठरवून केलेली नव्हती…हा कदाचित प्रारब्धाचा एक संकेतच असावा !

योजनेनुसार अयोध्येतील एका गल्लीतून एक गट नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी भजने गात निघाला. पोलिसांनी अडवले तर रस्त्यातच बसून राहायचे, अशी साधारण योजना होती. भर दुपारची वेळ. एका मठवजा इमारतीतून शरदकुमार आणि रामकुमार नुकतेच बाहेर पडले होते…शांतपणे चालत येत होते. तेवढ्यात पोलिसांनी गोळीबार करायला सुरूवात केली. एका गोळीने रामकुमारच्या मस्तकाचा वेध घेतला…क्षणार्धात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ते पाहताच शरदकुमार रामकुमारकडे धावला…लक्ष्मण रामामागे धावला तसा….शरदकुमार त्याच्यापाशी खाली बसला…आणि दुस-याच क्षणी त्याच्याही शरीराचा वेध दुस-या एका गोळीने घेतला! दोघेही जागीच गतप्राण झाले! गल्लीत प्रचंड गदारोळ उठला.

पोलिसांनी मृतदेह वाहनांमध्ये भरून नेण्यास सुरुवात केली होती….परंतू राजेश अगरवाल यांनी त्याही स्थितीत काही व्यवस्था करून राम आणि शरद यांचे मृतदेह ताब्यात घेऊन तेथून हलवले. प्रशासनाने ते मृतदेह अयोध्येतून बाहेर घेऊन जाण्याची अनुमती दिली नाही. नंतर शरयूच्या तीरावर राजेश अग्रवाल यांनी या दोघा भावांना अग्निडाग दिला…!

इकडे कोलकात्यात हीरालाल यांच्या पत्त्यावर एक पोस्टकार्ड आले होते….बाबा आम्ही वाराणसीला पोहोचतो आहोत अशा आशयाचे…काम झाल्यावर लगेच घरी यायला निघतो…जय श्रीराम! त्यानंतरच्या सलग चार दिवशी चार पत्रं आली…पोरांनी पत्र लिहित राहण्याचे वचन पाळले होते आणि प्रत्येक मुक्कामावरून एक एक पत्र धाडले होते.एकात लिहिले होते…ताईच्या लग्नासाठी लवकरच परत येऊ !

घटनेच्या दिवशीच कोलकात्यात बातमी पोहोचली होती….राम शरद आता आपल्यात नाहीत. कौसल्येचे राम आणि सुमित्रेचे लक्ष्मण रावणरूपी मृत्यूच्या जबड्यातून सुटून अयोध्येत परतू शकले होते…परंतू या सुमित्रेचे राम-शरद प्रत्यक्ष श्रीरामांच्या अयोध्येतून परतू शकले नाहीत. हीरालाल आणि सुमित्रा कोठारी यांच्यावर कोसळलेला वेदनेचा डोंगर अगदी महाकाय. आपल्या लेकरांच्या पार्थिव देहांचं अंतिम दर्शनही त्यांना घेता आले नाही. दोन महिन्यांवर लग्न आलेल्या बहिणीने,पौर्णिमाने मग आपला साखरपुडा मोडला आणि राममंदिर उभे राहीपर्यंत अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतला…एक आनंदी कुटुंब असं मोडकळीस आलं होतं. रामकुमार आणि शरदकुमार कोठारी यांचे वडील हिरालाल आज जगात नाहीत….ते २००२ मध्ये गेले. हे जग सोडताना त्यांच्या मुखात ‘राम’ नाम होते..आणि शरद नामही! त्यांचा राम जीवनात न रेंगाळता मृत्यूच्या वनात निघून गेला होता. आणि या रामाच्या लक्ष्मणाने आपल्या भावाची सावली बनून त्याच्यासह जाणे स्वीकारले ! २०१६ मध्ये ह्या राम-शरदाची सुमित्राही पुत्रविरहाचं दु:ख हृदयात घेऊन परलोकी गेली! भावपूर्ण श्रद्धांजली !

— समाप्त —

(संबंधित विषयाबद्द्ल विविध स्रोतांमध्ये वाचलेल्या माहितीवर आधारित.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सुमित्रेचे न परतलेले दोन राम ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके 

आई-वडिलांची तहान भागवण्यासाठी पाणवठ्याकाठी गेलेला श्रावणबाळ परतलाच नाही. मृगयेसाठी पाणवठ्याजवळच्या वृक्षावर अंधारात दबा धरून बसलेल्या राजा दशरथांच्या मरणबाणाला माणूस आणि जनावर यांतील भेद समजण्याचं काही कारण नव्हतं.  पाण्यात बुचकाळल्या गेलेल्या घागरीचा आवाज दशरथांना हरिणाचा आवाज भासला आणि त्यांच्या प्रत्यंचेवरून बाण निघाला….आणि थेट श्रावणाच्या काळजात घुसला तो मृत्यूचा वैशाखवणवा घेऊनच. लाडक्या पुत्राला डोळ्यांनी कधी बघूही न शकलेल्या त्या म्हाता-या काळजांनी महाराज दशरथांना पुत्रविरहाचा शाप अगदी हृदयापासून दिला. आणि मग कर्मधर्मसंयोगाने महाराज दशरथ आणि महाराणी कौसल्या यांच्या हृदयाकाशातील राम’चंद्र’ वनवासाच्या काळोखात लुप्त झाला…चौदा वर्षांसाठी….ही दीर्घ अमावस्याच म्हणावी!

महाराज दशरथ पुत्रविरहाच्या वेदनेच्या वाटेवर चालताना लवकरच थकले आणि त्यांची मृत्यूनेच सुटका केली….ईहलोकात रामनाम घेत प्राण सोडणा-यांमध्ये दशरथ सर्वप्रथम ठरले. परंतू महाराणी कौसल्या पुत्रमुख पुन्हा पाहण्यात सुदैवी ठरल्या….त्यांचे पुत्र श्रीराम परतले आणि त्यांच्या सोबतीला गेलेले राणी सुमित्रा आणि दशरथ महाराजांचे सुपुत्र लक्ष्मण सुद्धा!

पण कलियुगातील एका सुमित्रेचे राम परतलेच नाहीत….हिच्यापोटी एक नव्हे तर दोन दोन राम जन्मले होते!

रामयाणात कौसल्येचे श्री राम आणि सुमित्रेचे श्री लक्ष्मण अशी जोडी. पण या सुमित्रेच्या पोटी जणू राम-लक्ष्मण एकापाठोपाठ जन्मले. फरक इतकाच की एक राम आणि दुसरा शरद म्हणून ओळखला जात होता. त्यांना एका भविष्यवेत्त्याने सांगितले होते की तुम्हांला चार मुलगे होतील. अत्यंत भाविक असलेल्या या दांमप्त्याने त्यांच्या या होणार असलेल्या मुलग्यांची नांवे आधीच ठरवून ठेवली होती….राजा दशरथांचे चार पुत्र…..राम,लक्ष्मण,भरत आणि शत्रुघ्न! त्यांना पहिला मुलगा झाला…त्याचे नामकरण अर्थातच राम…दुसरा लक्ष्मण! पण तिसरी मुलगी झाली..पौर्णिमा!  म्हणून मग लक्ष्मणाचे नाव बदलून शरद ठेवण्यात आले.

त्रेता युगात यज्ञांना संरक्षण देण्यासाठी वशिष्ठ ऋषींनी श्रीराम आणि श्रीलक्ष्मण या दोघाही कुमारांची मागणी केली होती. कलियुगात काळाने अनेक मातां-पित्यांकडे श्रीरामाच्या सुटकेसाठी पुत्रांची मागणी केली.

वर्ष १९९0. महिना ऑक्टोबरचा. दिवाळीच्या आसपासचे दिवस. म्हणजे आजपासून साधारण तेहतीस वर्षांपूर्वीचा काळ. राजस्थानातील बिकानेरमधून कोलकात्यात व्यापारामध्ये आपले नशीब आजमावयला आलेल्या हीरालाल आणि सुमित्रा कोठारी यांच्या पोटी जन्मलेले दोन मुलगे असेच रामकार्यासाठी मागितले गेले आणि त्यांनी ते दिलेही. वीस बावीस वर्षांचे हे सुकुमार. १२ डिसेंबरला बहिणीचे लग्न होणार होते. घरात लग्नाची धामधुम सुरू असताना या सुकुमारांनी आधी लगीन अयोध्येचे असा चंग बांधला. त्यांनी आई-वडिलांची परवानगी मिळवली. कारसेवा म्हणजे अयोध्येत जाऊन श्रीराम रायाची सेवा अशीच त्या जन्मदात्यांची कल्पना होती. कारण तोवर अयोध्येत असा रक्तरंजित संघर्ष पेटेल याची कुणालाही कल्पना नव्हती. शिवाय हे कारसेवक प्रभु श्री रामचंद्र आणि श्री लक्ष्मण यांच्यासारखे हाती धनुष्यबाण घेऊन निघालेले नव्हते. यांच्या हाती असणार होते फक्त भगवे ध्वज. हजारो वर्षांपूर्वी ज्या जागी प्रभु रामचंद्रांचा जन्म झाला होता, ते पवित्र स्थळ १५२८ मध्ये परकीय आक्रमक बाबरच्या एका सरदाराने, मीर बाकीने नष्ट करून त्यावर मस्जिद उभारली होती…त्याजागी पुन्हा मूळचे राममंदिर उभारण्यासाठी सेवा करायची होती…!

प्रवासादरम्यान दररोज एक पत्र लिहाल अशी अट हीरालाल आणि सुमित्रा यांनी आपल्या या पोरांना घातली. आणि ती त्यांना मान्य करण्यात काहीच अडचण नव्हती. पोरांनी पळतच जाऊन दुकानातून पोस्ट कार्ड्स आणली आणि त्यावर पत्ते लिहिले…..प्रति,मा.श्री.हिरालालजी कोठारी….बडा बाजार…कोलकाता! काम आटोपून दहा बारा दिवसांत तर परतायचे होते.

दिवाळी संपून चार दिवस झाले होते…दिनांक २२ ऑक्टोबर,१९९०….कोलकात्यातील साथीदारांचे नेतृत्व करीत थोरले रामकुमार आणि धाकटे शरदकुमार अयोध्येकडे प्रस्थान करते झाले. संध्याकाळी सातची रेल्वेगाडी होती….उत्तर प्रदेशातील त्यावेळी मुघल सराय असे नाव असणा-या स्टेशनपर्यंत जाणारी. पण ही गाडी रद्द करण्यात आली. पण हे कारसेवक त्याच रेल्वेस्टेशनवर बसून राहिले….आणि प्रशासनाने रात्री दहा वाजता गुपचूप ती रेल्वे रवाना केली. मुलं पळतच त्या गाडीत शिरली आणि पहाटे मुघल सरायमध्ये पोहचली. तिथून त्यांना खाजगी वाहनातून अयोध्येत नेले जाणार होते.

यांच्या मस्तकात कारसेवा होती आणि मस्तकावर बांधलेल्या पट्टीवर कपाळावर शब्द दिसत होती जय श्री राम! कारसेवकांचा हा जत्था त्या दिवशी रात्री उशिरा रायबरेलीजवळच्या लालगंजपर्यंत पोहोचला. पण इथून पुढे वाहनव्यवस्था उपलब्ध नव्हती. कारण प्रशासनाने प्रवासाची सरकारी साधने रोखून धरली होती. मग एका खाजगी टॅक्सीने हे दोघे आणि त्यांचे एक सहकारी राजेश अग्रवाल आझमगडच्या फुलपूर कसब्यात पोहोचले. येथून पुढे तर रस्ताच बंद केला गेला होता. मग ही जोडगोळी २५ ऑक्टोबरला इतर कारसेवकांसोबत चक्क शेतांतून लपतछपत पायीच अयोध्येकडे निघाली…बहुतांश प्रवास रात्रीच उरकायचा…वाटेत गावकरी देतील ते अन्न स्विकारायचे असा क्रम होता. तब्बल दोनशे किलोमीटर्सचा हा प्रवास करायला त्यांना पाच दिवस लागले…प्रभु रामचंद्रांच्या वानरसेनेलाही श्रीलंकेपर्यंत सेतू बांधायला पाचच दिवस लागले होते.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चोख्याची महारी… (संत सोयराबाई) – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

चोख्याची महारी… (संत सोयराबाई) – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

एक शूद्र स्त्री ज्ञानाची आस बाळगते. त्याचा शोध घेते. स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते. देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे.वारीत पंढरीच्या वाटेनं लाखो पावलं पांडुरंगाच्या भेटीला जातात.  पंढरी जवळ येतेय तसतसा पावलांचा वेग वाढतो. टाळ मृदुंगाच्या नादामधून विठूभेटीची आस पाझरते. अभंगांचे सूर टिपेला पोहचलेले असतात. जातीपंथाचे, गरीब श्रीमंतीचे भेद गळून जातात आणि एकत्वाचं दर्शन घडवत ही पावलं निष्ठेनं चालत राहतात. गेली सात-आठशे वर्ष याच वाटेवरून ही पावलं जाताहेत. तेराव्या शतकात सतरा वर्षांच्या कोवळ्या पोरानं संस्कृत आणि ब्राह्माण्याच्या लोखंडी पडद्याआडचं ज्ञान भावार्थ दीपिकेमधून सामान्यजनांच्या भाषेत रसाळपणे मांडलं आणि तो या समतेच्या क्रांतीचा ‘माऊली’ ठरला.

समाजातल्या सगळ्या स्तरातले लोक या झेंड्याखाली गोळा झाले. ही समतेची गुढी पेलताना त्यांनी छळ सोसला, अवहेलना झेलली पण खांद्यावरची पताका खाली पडू दिली नाही. यांत नामदेव शिम्पी होता, येसोबा खेचर होता, गोरा कुंभार होता, नरहरी सोनार होता, कुणबी तुकोबा होता, सेना न्हावी होता, सावता माळी होता, दासी जनी होती, गणिका कान्होपात्रा होती…पण या सगळ्या मांदियाळीत वेगळं होतं ते चोखामेळा आणि त्याचं कुटुंब !तेराव्या शतकात मंगळवेढ्याच्या महारवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्यानं विठ्ठलाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला. जातिव्यवस्थेला चूड लावणारा हा पहिला संत. सोयराबाई त्याची बायको. निर्मळा त्याची बहीण.

बंका

बंका महार त्याचा मेहुणा आणि कर्ममेळा त्याचा मुलगा. हे अख्खं कुटुंबच जातिव्यवस्थेला प्रश्न् विचारणारं आणि पददलितांचं जगणं वेशीला टांगणारं पहिलं कुटुंब ठरलं. त्यांचं वेगळेपण असं की आपला सवतासुभा न मांडता सगळ्यांच्यासोबत राहून ते आपल्या स्थानासाठी भांडत राहिले. म्हणूनच आज शेकडो वर्षांनी चोखोबांची पालखी ज्ञानोबांच्या पालखीसोबत मानाने मिरवली जाते.आधीच महार आणि त्यात बाई, म्हणजे सोयराबाईचं जगणं आणखी एक पायरी खाली! नवऱ्याबरोबर मेलेली ढोरं गावाबाहेर ओढून नेता नेता या बाईनं सांगितलेलं जगण्याचं तत्त्वज्ञान अचंबित करतं.अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या रायाअसा नितांत सुंदर अभंग लिहिणाऱ्या सोयराबाईचं स्थान तात्कालिन संतांहून तसूभरही कमी नाही. सोयराबाईचे एकूण ९२ अभंग उपलब्ध आहेत. त्यातल्या बहुतांश अभंगांमधून ती स्वत:चा उल्लेख चोख्याची महारी असा करते.

चोखोबाची बायको

असं अभिमानानं म्हणवून घेत असली तरी तिनं स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे. सोयराबाईच्या अभंगांमधून डोकावणारं तत्त्वज्ञान सोपं आहे. त्यात जड शब्द नाहीत. भाषा साधी, सोपी आणि रसाळ आहे. अभंग आधी स्वत:साठी आणि मग जनांसाठी.. आत्मशुद्धी ते परमात्मा.. असा तिचा प्रवास आहे. शुदांच्या सावलीचाही विटाळ होऊन सवर्ण आंघोळ करून शुचिर्भूत होत तो काळ….एक शूद स्त्री ज्ञानाची आस बाळगते. स्वत:च त्याचा शोध घेते. स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते. स्वत:शी, देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत्धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे.

सातशे वर्षांपूवीर् सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना घट्ट असताना कुणी देहाच्या विटाळाबद्दल ‘ब्र’ काढायचा विचारही केला नसता पण ही बाई थेट प्रश्न्च विचारते. देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?

देहासी विटाळ म्हणती सकळ

आत्मा तो निर्मळ शुदध बुद्ध

देहीचा विटाळ देहीच जन्मला

सोवळा तो झाला कवण धर्म

सोयराबाईच्या कुटुंबाचा समाजानं भरपूर छळ केला. आयुष्यभर खालच्या जातीचे म्हणून हिणवलं गेलं. मारही खाल्ला. सोयराबाईंच्या अभंगातून ही वेदना शब्दाशब्दांमधून ठिबकत राहते…

संत सोयराबाई

हीन हीन म्हणोनी का गं मोकलिले

परी म्या धरिले पदरी तुमच्या

आता मोकलिता नव्हे नित बरी

थोरा साजे थोरी थोरपणे

विठोबाच्या दर्शनाची आस धरल्याची शिक्षा म्हणून पंढरपूरच्या बडव्यांनी चोखोबाला कोंडून मारलं. कपड्यांची लक्तरं झाली…चामडी लोळवली. हा बहाद्दर पायरीशी उभा राहून थेट विठोबाला ‘जोहर मायबाप जोहार’ म्हणत सवाल करता झाला, सोयराबाईनेही विठ्ठलाला साकडे घातले.

आमची तो दशा विपरित झाली

कोण आम्हा घाली पोटामध्ये

आमचं पालन करील बा कोण

तुजविण जाण दुजे आता

देवाला कितीही भेटावंसं वाटलं तरी महारांचे स्थान पायरीशी. परमेश्वरही ‘बहुतांचा’ ! पायी तुडवल्या जाणाऱ्यांचं सोयरसुतक त्याला कुठे? त्याला दीनांची चाड नाही. हा राग व्यक्त करीत सोयराबाई विठोबालाच खडसावते.

कां बा उदार मज केले कोण म्हणे तुम्हा भले

आम्ही बैसलोसे दारी दे दे म्हणोनी मागतो हरि

घेऊन बैसलासे बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे

ही नीत नव्हे बरी म्हणे चोखियाची महारी

सोयराबाईंच्या अभंगात जगण्यातलं वास्तव फार रोखठोकपणे येतं.

सुखात हजार वाटेकरी असतात दु:ख तुमचं एकट्याचं असतं, हे तिनं फार साजऱ्या शब्दांत सांगितलंय

अवघे दु:खाचे सांगाती दु:ख होता पळती आपोआप

आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेचि

तिच्या अभंगांमधून नाममहात्म्यही पुन्हा पुन्हा येतं. तिचे बरेचसे अभंग या भोवतीच आहेत.

सुखाचे नाम आवडीने गावे

वाचे आळवावे विठोबासी…

हा प्रसिद्ध अभंगही तिचाच.

आत्मा परमात्म्याचं नातं उलगडणारी ही विदुषी रांधणारी, घर-संसार सांभाळणारी गृहिणी आहे

अपत्यासाठी आस लावून बसणारी आई आहे

नवऱ्याची वाट पाहणारी स्त्री आहे.

साक्षात विठोबाला ती जेवायचं आवतण देते.

विदुराघरच्या कण्या आणि दौपदीच्या थाळीतलं भाजीचं पान गोड मानणारा देव गावकुसाबाहेरच्या येसकराच्या घरी जेवेल याची तिला खात्री आहे.

सोयरा- चोखोबाला बरेच दिवस मूल नव्हतं. अपत्यप्राप्तीच्या आसेनं कासावीस झालेली सोयराबाई अभंगात भेटते.

आमच्या कुळी नाही वो संतान

तेणे वाटे शीण माझ्या मना..

असं सांगताना उदास असलेली सोयराबाई कर्ममेळ्याचा जन्म झाल्यावर आनंदाने इतकी फुलून आली आहे की ती बारशासाठी विठ्ठल रुक्मिणीलाच निमंत्रण देते.                      

धन्य त्या संत सोयराबाई आणि त्यांची अमीट भक्ती … 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares