मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “शह आणि काटशह” – लेखक : डॉ. राजीव जोशी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “शह आणि काटशह” – लेखक : डॉ. राजीव जोशी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : शह आणि काटशह (वैद्यकीय व्यवसायातील चुरस)

लेखक : डॉ. राजीव जोशी 

पृष्ठे : २४४

मूल्य: ४००₹ 

या पुस्तकातील एकूण ३१ प्रकरणांतून वैद्यकीय व्यवसायातील चांगल्या-वाईट घटनांची चिरफाड करण्यात आली आहे. आणि शह आणि काटशह या स्वरूपात लिहिलेली आहे, जी वाचनीय आहे. त्यातील काही भाग-

व्यवसायातील चुरस

या पुस्तकाची प्रस्तावना डॉ. सुहास नेने यांनी लिहिली आहे …. ‘कोणतीही गोष्ट अर्थार्जन करण्यासाठी करायची म्हटली की, त्यात नफ्याचा आणि तोट्याचा विचार आलाच. कोणीही जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा आणि तोही कमीत कमी तोटा सोसून असाच विचार करणार. अगदी वैद्यकीय व्यवसायातही ही गोष्ट ओघानेच आली. किंबहुना क्वचितप्रसंगी चार गुना अधिकच ! चार पैसे दुसऱ्यापेक्षा जास्त मिळवायचे म्हणजे त्यात चुरस, ईर्षाही आलीच. चुरस आली की त्यात डाव, प्रतिडाव, शह-काटशह हे पण येणे क्रमप्राप्त झाले. ‘Everything is fair in love and war. ‘ …. असे त्यात त्यांनी म्हटले आहे. शह-काटशहदेखील चुकीच्या मार्गाने द्यायचे, का नीतीच्या मानदंडांचा विचार करायचा, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न राहतो. रुग्णाच्या हितासाठी राबवलेली चुरस रुग्णाच्या नक्कीच कायम फायद्याची यात कणभरही शंका नाही.

डॉक्टर राजीव जोशी अशाच निर्हेतुक चुरशीचे स्वागत करतात आणि त्याप्रमाणे वागतात आणि म्हणून अगदी निःसंकोचपणे लिहूनही जातात……

… चुरशीच्या डावाची सुरुवात प्रतिष्ठित, आधीपासूनच एस्टॅब्लिश्ड असलेल्या डॉक्टरांच्या रुग्णालयाच्या जवळ स्वतःचे रुग्णालय सुरू करण्यापासून होते आणि एका गोष्टीतून दुसऱ्या तितक्याच उत्कंठावर्धक गोष्टीचा जन्म होतो. हा सिलसिला सुरूच राहतो आणि त्यातून वैद्यकीय विश्वातील अनेक सुरस, चमत्कारिक कथा विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने उलगडत जातात. सत्यकथा असल्याने त्यात पुण्यातील प्रतिष्ठित, नामांकित डॉक्टरांची नावेही प्रत्यक्षपणे, कधी कधी अप्रत्यक्षपणे येऊन जातात. घासाघीस करून पदरात पाडून घेणाऱ्या तडजोडी, बहाद्दर व्यावसायिकांची कहाणीपण येते. येनकेन प्रकाराने स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेणारे अगदी सीनियर सुद्धा त्यातून सुटत नाहीत. गरज नसताना आपण ज्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेले नाही; त्याची औषधे बिचाऱ्या अगतिक, अडाणी रुग्णांना देण्याचा अधिकार आहे का, हा सवाल आपोआपच येतो. बऱ्याच वेळी लोकांना साधे हवामानात बदल झाल्यामुळे होणारे व्हायरल इन्फेक्शन असते; की जे आपले आपणच औषधाविना काही दिवसांत जाणारच असते, त्यासाठी भारी भारी अँटिबायोटिकची आवश्यकता नसते. जे काम टाचणीने होणार आहे; त्यासाठी अ‍ॅटमबॉम्बचा उपयोग करणे चूकच आहे, परंतु याविषयी माहीत नसल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे केले जाते. अलंकारिक नसली, तरी ओघवत्या भाषेत असल्यामुळे प्रत्येक घटना अतिशय स्वच्छपणे डोळ्यांसमोर येते.

नुसता प्रॉब्लेम सांगून डॉक्टर राजीव थांबत नाहीत; तर त्यासाठी काय करावे, काय करू नये असा टेक-होम मेसेजही देतात. ही या लिखाणाची खासियत मी समजतो. ‘तुम लढो मैं कपडे संभालता हूँ’ सारखी बोटचेपी वृत्ती त्यांची नाही. इन्शुरन्स कंपन्यांच्या वाढत्या, गोंडस, फसव्या कारभाराबद्दल बोलताना ते परखडपणे आपली मते मांडतातच आणि ‘पती-पत्नी और वो’ यांच्यातील ‘वो’ कडेपण आता खूप लक्ष द्यायला लागणार आहे, असा संकेत देतात. कट किंवा कमिशन आणि डॉक्टर यांचा चोली दामन का साथ असतो, असे समीकरण काही लोकांच्या डोक्यात अतिशय फिट बसलेले आहे. त्यातल्या स्वतःला आलेल्या अनुभवाबद्दलही ते बोलतात; पण या वेळी डॉक्टरांची लेखणी अडखळत नाही, कारण ‘कर नाही तर डर कोणाला !’ कटची कटकट ठेवली नाही, तर डोक्याला त्रास होणारच नाही! (कट घेणारे फक्त फॅमिली डॉक्टरच असतात, असा गोड गैरसमज डॉक्टर जोशींनी करून घेतला असावा; असा माझा समज आहे ! कट घेणाऱ्याचा एक डीएनएच असतो, तो डिग्री किंवा पॅथीमध्ये नसतो !!) आयुर्वेदातील एमडी किंवा एमएससारख्या डिग्ग्रांनी रुग्णांची फसगत करणाऱ्या महाभागांना पण जाता जाता ते सहज फटकारतात. त्यांच्या डिग्रीतला फोलपणा सिद्ध करायला कचरत नाहीत. अप्रामाणिकपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या, औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या ज्ञानावर अवलंबून, त्यांच्या इशाऱ्यावर नाचून औषधे देणाऱ्यांना चिमटा काढायला सोडत नाहीत.

साठा उत्तरांची ही कहाणी सुफल संपूर्ण होताना डॉक्टर राजीवची लेखणी दुसऱ्या भागासाठी सरसावलेली दिसते. ते प्रवेश प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहात शिरतात आणि न सुधारलेल्या किंवा सुधारायचेच नाही, अशा मनोवृत्तीत राहिलेल्या न्याययंत्रणेचे वाभाडे काढतात. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात रोजनिशी लिहावी, अशा पद्धतीने उत्कंठावर्धक शैलीत मांडलेल्या या कडू सत्य घटनेत स्वतःसाठी नाही, तर वैद्यकीय प्रवेशातील अन्यायाविरुद्ध ‘जनहित याचिका’ (PIL) दाखल करून घेतानाचे स्वानुभव अतिशय रंगतदारपणे रेखाटले आहेत. सहाध्यायी, मित्र- मैत्रिणी, शिक्षक, नातेवाईक, वृत्तपत्रे, प्रशासन आणि न्यायव्यवस्था या साऱ्यांची प्रतिबिंबे या गढूळ पाण्यात आपापल्या कर्माप्रमाणे स्वच्छ पडलेली दिसतात! लाल फितीचा आब, डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेचा रुबाब, नियमांप्रमाणे चाललेल्या शिक्षणार्थीचा आक्रोश कसा दाबून टाकतो, ‘Justice delayed is Justice denied’ हेच पुनःपुन्हा कसे अधोरेखित करतो आणि रास्त हक्कासाठी सामान्यांना किती झगडावे लागते आणि हातात सत्ता असली की, मी म्हणेन तीच पूर्व दिशा असे राबवणारे कसे भेटतात, हे पटवून देतो.

प्रस्थापित न्यायव्यवस्थेविरुद्ध स्वतःसाठी नव्हे, तर अयोग्य पद्धतीने येऊ पाहिलेल्या पण चुकीच्या राजमार्गाला (!) विरोध करण्यासाठी पदरमोड करून, लष्करच्या भाकरी भाजताना करावा लागणारा मनस्ताप, घालवलेली मनःशांती या साऱ्यांचाही आढावा या दुसऱ्या भागात येतो.

चुरस, शह-काटशह यांना दृश्य स्वरूपात दाखवण्यासाठी वापरलेला बुद्धिबळाचा पट शीर्षकाची यथार्थता नक्की दाखवतो.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ मेळघाटावरील मोहर : डॉ. रविंद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे – लेखिका : सुश्री मृणालिनी चितळे ☆ प्र्स्तुती – सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ मेळघाटावरील मोहर : डॉ. रविंद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे – लेखिका : सुश्री मृणालिनी चितळे ☆ प्र्स्तुती – सुश्री त्रिशला शहा ☆ 

पुस्तक : मेळघाटावरील मोहर : डॉ. रविंद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे

लेखिका- मृणालिनी चितळे

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे 

किंमत– 300 ₹

नागपूरसारख्या शहरात डॉ. होऊनसुद्धा तिथली भरपूर पैसे मिळवून देणारी प्रॅक्टिस सोडून मेळघाटातील आदिवासी लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी बैरागड ता. धारणी जि. अमरावती या अतिदुर्गम भागात जाऊन तिथेच स्थायिक होण्याचा निश्चय डॉ. रविंद्र कोल्हे यांनी घेतला आणि लग्न करुन आपली पत्नी डॉ. स्मिता यांना घेऊन ते बैरागड इथे दाखल झाले.

भारतामधील महाराष्ट्रातील एका कुठल्यातरी कोपऱ्यातील बैरागड गाव म्हणजे आपल्या देशात जेवढे म्हणून प्रश्न आहेत ते सर्व या गावात एकवटले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अत्यंतिक गरिबी, बेरोजगारी, कुपोषण, हिंदू-मुस्लिम संघर्ष, जातीयवाद, भ्रष्ट सरकारी यंत्रणा, वनतस्करी अशा अनेक समस्यांचा सामना या बैरागडमध्ये अनुभवताना अनेक भलेबुरे प्रसंग कोल्हे पतीपत्नीवर आले. तरी याच गावात रहाण्याचा त्यांचा मनोदय वाचताना नतमस्तक झाल्याशिवाय रहावत नाही. डॉक्टर म्हणून आदिवासी लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविताना या लोकांपुढील इतर समस्या जसजशा येऊन भिडल्या तसतसा त्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी त्यांनी ‘जागल्या’ची भूमिका त्यांनी आपणहून स्वीकारली. या प्रत्येक समस्येविरुध्द आवाज उठवताना या पती-पत्नींना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. पण त्याचा बाऊ न करता ते अविरतपणे आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीतच राहिले. कित्येकवेळा जीवावर बेतण्याचे प्रसंगही उद्भवले.

… या सर्वच प्रसंगाचा लेखाजोखा लेखिकेने या पुस्तकात मांडला आहे. स्वतः डॉ. आणि कायद्याचे शिक्षणही घेतलेल्या स्मिताताईंनी तनमनधनाने बैरागडवासियांच्या समस्येवर उपाय शोधणाऱ्या आपल्या पतीला पुरेपुर साथ दिली आहे. अत्यंत तुटपुंज्या कमाईवर संसार करताना त्यांचा कस लागत होता. पण एकदा हा वसा हाती घेतलाय म्हटल्यावर त्यांनी त्याचा विचारच केला नाही. अगदी गायी म्हशी पाळून गोठ्यातील स्वच्छता, धारा काढणे, ते दूध आणि घरी पिकवलेली भाजी कोणताही कमीपणा वाटून न घेता दारोदार जाऊन त्यांनी विकली,.. हे करीत असताना स्त्रियांच्या समस्या जाणून त्याविरुद्ध लढाही देत आहेत.

डॉ. रविंद्र यांनी डॉक्टर असूनही शेतीतील नविन तंत्रज्ञान आदिवासींना समजावून देताना स्वतः शेतीही केली. रेशन दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी रेशन दुकानही चालविले. वीटभट्टीचे कंत्राट घेतले. निवडणूक लढवून आपल्या अधिकारात गोंड आणि कोरकू समाजासाठी अनेक विकासाची कामे केली. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण या कामासाठी परोपरीने सरकारला आवाहन करून आदिवासींच्या विकासासाठी कोल्हे पती-पत्नीने जीवाचे रान केले. त्याचाच परीपाक म्हणून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.

अत्यंत सुरेख पध्दतीने या दोघांच्या कार्याची माहिती लेखिकेने या पुस्तकातून दिली आहे.

‘मोहर’ म्हणजे कोणत्याही कामात, युध्दात पुढे असणारी व्यक्ती … मोहर म्हणजे सोन्याचे नाणे किंवा शिक्का,… मोहर म्हणजे तरुवरांवर येणारा फुलांचा गुच्छ …. म्हणूनच “ डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिताताई म्हणजे या मेळघाटातील मोहर “ असे लेखिकेचे म्हणणे आहे …. आणि ते सार्थच आहे.

प्रस्तुती : सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनदेखे समरांगण” – मराठी लेखक : प्रा. हेमंत सामंत – हिन्दी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव ☆ परिचय – श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनदेखे समरांगण” – मराठी लेखक : प्रा. हेमंत सामंत – हिन्दी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव ☆ परिचय – श्री विश्वास देशपांडे

पुस्तक : “भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनदेखे समरांगण”

मूळ मराठी लेखक : प्रा. हेमंत सामंत

अनुवादित लेखन (हिंदी) – डॉ. मीना श्रीवास्तव 

पृष्ठसंख्या – १५२ पाने

प्रकाशक – श्री विद्या बुक डिस्ट्रिब्युटर्स, पुणे

या महिन्यात १७ नोव्हेंबर २०२४ या दिवशी डॉ. मीना श्रीवास्तव यांनी प्रा. हेमंत सामंत यांच्या मराठी लेखांच्या केलेल्या हिंदी अनुवादाची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यातील एक होते ‘भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनदेखे समरांगण’. आपल्या वयाचे शतक पूर्ण केलेल्या मुंबईतील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ. जी. जी. परिख यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले ही विशेष आनंद आणि अभिमानाची गोष्ट. ज्येष्ठ साहित्यिक हेमन्त बावनकर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.

डाॅ. मीना श्रीवास्तव

आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण नुकताच साजरा केला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपल्या सुखावर तसेच घरादारावर तुळशीपत्र ठेवले. ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, त्यांची आठवण ठेवणे, त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आणि त्यांनी केलेल्या बलिदानाची जाणीव ठेवून आपल्या देशाप्रती आपले कर्तव्य बजावणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले असे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे नेते आणि स्वा. सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, राजगुरू यांच्यासारखे महान स्वातंत्र्य सैनिक आपल्याला परिचित असतात, परंतु आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अशा हजारो तरुणांनी बलिदान दिले आहे की ज्यांची नावेही आपल्याला माहिती नसतात.

अशाच अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांची माहिती करून देण्याचे मोलाचे कार्य या पुस्तकाने बजावले आहे. आपल्या स्वातंत्र्यवीरांनी केलेला त्याग आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक मोलाची भूमिका बजावेल यात शंकाच नाही. या पुस्तकात ३८ ज्ञात अज्ञात अशा स्वातंत्र्यसैनिकांचा परिचय थोडक्यात परंतु अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी अशा भाषेत करून देण्यात आला आहे. मूळ मराठी लेखन जरी प्रा. हेमंत सामंत यांचे असले तरी हिंदी भाषेतील हे पुस्तक अनुवादित आहे असे कुठेही जाणवत नाही हेच डॉ. मीना श्रीवास्तव यांच्या अनुवादाचे कौशल्य आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उर्मीने संपूर्ण देश जागृत झाला होता. देशांमध्ये ठिकठिकाणी स्वातंत्र्यासाठी लढा सुरू होता. अशा ठिकाणांची आणि तिथे सुरू असलेल्या लढ्यांची प्रेरणादायी ओळख ‘भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनदेखे समरांगण’ हे पुस्तक आपल्याला करून देते. जेथे स्वातंत्र्याचे धगधगते आंदोलन पेटले होते अशा ३८ ठिकाणांची माहिती हे पुस्तक आपल्याला करून देते. यामध्ये कित्तूर येथील राणी चेन्नम्मा, बराकपूर येथे मंगल पांडे यांनी केलेला विद्रोह, नरगुंड येथे भास्करराव भावे यांनी केलेला विद्रोह, मलेरकोटला येथील कुका विद्रोह, कलकत्त्यातील गुप्त बैठकींचे असलेले माणिकटोला बाग हे स्थान, त्याचप्रमाणे सॅन फ्रान्सिस्को येथील युगांतर आश्रम, चंपारण्य आंदोलन, फिजी येथील इंडियन इंपिरियल असोसिएशन, अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांड, चौरी चौरा येथील असहकार आंदोलन आदी स्वातंत्र्यासाठी झालेल्या विविध आंदोलनांचा, लढ्यांचा आणि संघर्षाचा रोमहर्षक परामर्श या पुस्तकात घेण्यात आला आहे.

या पुस्तकाच्या आपल्या प्रस्तावनेत डॉ मीना श्रीवास्तव म्हणतात की आज ज्या स्वातंत्र्याचा आपण आनंद उपभोगतो आहोत ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या प्राणांचे बलिदान दिले. यामध्ये स्त्रीपुरुष, तरुण, वृध्द, लहान मुले कोणीही मागे राहिले नाही. त्यांच्या अतुलनीय त्यागामुळेच आज भारत स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र झाले आहे. परंतु अशा स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाला आपण विसरत चाललेलो आहोत. त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो, त्या दिवशी त्यांच्यावर भाषणे करतो, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना आपण विसरून पण जातो. आपल्या भागामध्ये कोणते स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले आहेत, त्यांनी स्वातंत्र्यासाठी कोणते बलिदान दिले आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नसते अशी खंत त्या व्यक्त करतात. हे पुस्तक शाळाशाळातील मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांना स्वातंत्र्याचा हा धगधगता इतिहास माहिती झाला पाहिजे असे आपल्या मनोगतात हेमन्त बावनकर यांनी म्हटले आहे. डॉ. मीना श्रीवास्तव यांनी हे पुस्तक या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले आहे अशा क्रांतिकारकांना अर्पण केले आहे. यातून त्यांनी आपली या क्रांतिकारकांप्रती असलेली तळमळ आणि देशभक्तीचा परिचय करून दिला आहे. त्यांचे हे त्यांचे हे पुस्तक आबालवृद्धांपर्यंत पोहोचावे, विशेषतः तरुणांनी हे पुस्तक वाचून प्रेरणा घ्यावी अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो.

यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर

घडिले मानवतेचे मंदिर

परी जयांच्या दहनभूमिवर

नाहि चिरा नाही पणती । तेथे कर माझे जुळती ।।

… असे म्हणून थांबतो. या पुस्तकाच्या उपलब्धतेसाठी डॉ. मीना श्रीवास्तव यांच्याशी ९९२०१६७२११ या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा.

पुस्तक परिचय : विश्वास देशपांडे

चाळीसगाव.

 मोबाईल क्र. ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “निवडक ‘प्रखर’ कथा” – हिन्दी कथाकार : श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ – मराठी अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर / सौ. मंजुषा मुळे   ☆ परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे ☆

सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “निवडक ‘प्रखर’ कथा” – हिन्दी कथाकार : श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ – मराठी अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर / सौ. मंजुषा मुळे   ☆ परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे ☆ 

पुस्तक : “निवडक ‘प्रखर’ कथा” — (अनुवादित कथांचा संग्रह)

हिन्दी कथाकार : श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ 

मराठी अनुवाद : सौ. उज्ज्वला केळकर / सौ. मंजुषा मुळे   

श्री भगवान वैद्य प्रखर

“निवडक ‘प्रखर’ कथा “ हा उज्ज्वला केळकर आणि मंजुषा मुळे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या निवडक वीस हिंदी कथांचा अतिशय सुंदर असा कथासंग्रह. यातील कथा प्रसिद्ध हिंदी कथाकार श्री. भगवान वैद्य ‘प्रखर‘  यांच्या वेगवेगळ्या पुस्तकातील आहेत.

सौ. उज्ज्वला केळकर

कथा लहान असल्या तरी मराठी वाचकापुढे या कथांमधून अनेक विषय ठेवले आहेत. या कथांमध्ये  सामाजिक जाणीव, नातेसंबंध, गरिबी,  जातीचा प्रभाव असे मनाला भिडणारे विषय असल्याने अगदी वास्तवता आपल्यासमोर उभी राहते. सर्वच कथा वाचनीय आहेत. यातील काही कथांची  ओळख उदाहरणादाखल  इथे करून देत आहे.

सौ. मंजुषा सुनीत मुळे

साप – घरी गरिबी असल्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर रमलू प्रामाणिकपणे मालकाच्या घरी राबत असतो. आज ना उद्या शेठजी ऑफिसात काम देईल या आशेने ते लोक सांगतील ती कामं तो करत असतो. एक दिवस तो मुलाला चांगल्या शाळेत घालण्यासाठी मालकाच्या घरातील सर्वांना पैश्याची विनवणी करतो. पैसे तर मिळत नाहीतच पण बोलणी मात्र खावी लागतात. नाराज झालेला रमलू आता यांच्याकडे कामाला जायचं  नाही असा निश्चय करतो. पण तरीही एक दिवस तो जातो .. का ? ते कळण्यासाठी कथाच वाचायला हवी.

पारू – ही एक विधवा, संधिवाताने त्रस्त. तिला एक मुलगा व मुलगी आहे.जोपर्यंत कामं होत होती तोपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे तिने पंडितांच्या घरी पडेल ते काम केलेलं असतं.आता मात्र दुखण्याने जोर धरल्याने तिला बसता उठताही येत नसल्याने ती घरीच असते. मुलगी एक दिवस पार्लरमधे जाते आणि तिला मसाजचे ५०००₹ मिळतात. पारू विचारात पडते. दोन महिने राबलं तरी मला इतका पगार मिळत नाही  आणि हिला एका दिवसाचे इतके पैसे मिळाले. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकते आणि ती मुलीला  असलं काम आपल्याला नको म्हणून सांगते. तेवढ्यात पंडितांच्या घरी पारुला बोलावण्यात येतं. पंडितांचा मुलगा आणि सून दोघेही परगावी नोकरी करत असतात. त्यांना एक लहान मुलगा असतो, आणि त्याला  सांभाळायला  मुलीला पाठवण्याची विनंती ते पारूला करतात… आणि ती मुलीला पाठवण्यास साफ नकार देते. .. का ? — ते कळण्यासाठी ही कथाच वाचायला हवी.

नारायणी नमोस्तुते – एकूण चार बहिणी .. आई-वडिलांचे छत्र हरपलेले. मोठी मुलगी एका कापड दुकानात काम करत असते. एक दिवस तिच्यासोबतच नेहमी काम करणारी  मुले  तिच्यावरती बलात्कार करतात  आणि त्या चौघींना  एका रात्रीत ते शहर सोडावं लागतं. . इतर बहिणींची व स्वतःच्या सुरक्षिततेसाठी इथून पुढे ती मुलगी नारायणीची नारायण कशी होते ? .. त्या सगळ्या बहिणींचे काय होते ?

—-  ते या कथेतून समजेल.

मृत्युपत्र – दोघेही नोकरी करत असतात. दोन मुलं पराग अनुराग. मुलांची लग्न होतात सुना नातवंडे येतात. हे दोघेही सुखा समाधानाने सेवानिवृत्त होतात. मिस्टरांना देवाज्ञा होते. एक मुलगा सून दुसऱ्या शहरात राहत असतात. एक मुलगा परदेशी असतो व त्याची सून पुण्यात राहत असते. आई त्या सुनेकडे राहत असते. इथपर्यंतचा प्रवास अगदी आनंदी आनंदाचा असतो. त्यामुळे आई आपले मृत्युपत्र करते…

आणि मग पुढे काय काय घडते ते या कथेतून कळेल.. हे आहे आजचे वास्तव.

नशीब – एका हॉस्पिटलमधली ही कथा. विधी वेटिंग रूम मध्ये बसून हनुमान चालीसा वाचत असते. तिच्या शेजारीच मिसेस कपूर बसलेल्या असतात. दोघींच्याही नवऱ्यांना हृदयाचे ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये नेऊन चार पाच तास झाले आहेत. विधी वयाने लहान आहे तर मिसेस कपूर तिच्या आईच्या वयाच्या आहेत.विधी दुसऱ्या राज्यात असल्याने तिच्याजवळ नातेवाईक कुणीच नाही. त्यामुळे ती आतून घाबरली आहे. पण मिसेस कपूर तिला खूप समजावून धीर देतात आधार देतात. तेवढ्यात वॉर्ड बॉय येऊन नाव पुकारतो… उत्सुकता वाढवणारी ही कथा.

मन्नत – अनाथ बाळ शाळेच्या आवारात सोडून दिलेले… माणुसकीच्या नात्याने शिक्षक त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात… प्रश्न असतो त्या अनाथ मुलीला दत्तक कोण घेणार? एक  निपुत्रिक जोडपं ते दत्तक घेण्याची तयारी दर्शवतात पण ज्योतिषशास्त्र आडवं येतं. ज्यांना सापडलं त्यांनाही त्या मुलीला सांभाळण्याची इच्छा असते पण त्यांच्या अर्धांगिनीची नसते… पुढे काय काय घडते ? — जे अगदी अनपेक्षित असते. —

अरुंद वाट प्रेमाची – मूर्तिकारच्या हाताखाली काम करणारा मधू…  तिथेच माती तयार करण्याचे काम करणारा मंसाराम ..  याला वृद्धत्वामुळे काम झेपत नसल्याने त्याच्या जागी त्याची मुलगी मधुलिका कामावर येऊ लागते. मधू व मधुलिका दोघेही तरुण आहेत… या मध्यवर्ती सुत्रानुसार फुलत गेलेली ही एक भावनाप्रधान कथा – वाचायलच हवी अशी.

इतरही अशाच सुंदर कथा या संग्रहात आहेत.. नंदग्राम –   कुबड्या –  मी पण लहानच आहे –   चकारी –  नवी दिशा नवा मार्ग  – जिज्ञासा – . द्वारकाधीश – आणि अशाच आणखी काही कथा ज्या तुमची उत्सुकता वाढवतात … आणि सगळ्या कथा वाचण्याची आपसूक निर्माण झालेली उत्सुकता वाचकाला पुस्तक हातातून खाली ठेवू देत नाही. अतिशय सुंदर अशा सर्व कथा आहेत. ज्या ‘ कथा ‘ वाचण्याची आवड असणाऱ्यांनी  आणि नसराण्यांनीही आवर्जून वाचाव्यात अशा आहेत.

सांगायलाच हवी अशी एक विशेष बाब म्हणजे या कथा वाचत असताना त्या अनुवादित आहेत असं कुठंच वाटत नाही. मूळ मराठीतच लिहिलेल्या या कथा आहेत असंच वाटतं. हे दोन्ही अनुवादिकांच्या लेखन शैलीचे आणि अनुवाद-कौशल्याचे वैशिष्ट्य. कथा त्यांनीच स्वतः लिहिल्या आहेत असं वाटतं. सहज प्रवाही अशी त्यांची लेखनशैली आहे.

धन्यवाद उज्ज्वला व मंजुषाताई. अतिशय सुंदर असा कथासंग्रह तुम्ही वाचकासाठी दिलात.

परिचय – सुश्री सुलभा सुभाषचंद्र तांबडे

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “गंधर्वांचे देणे” – लेखक : श्री अजिंक्य कुलकर्णी – संपादन : श्री अतुल देऊळगावकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “गंधर्वांचे देणे” – लेखक : श्री अजिंक्य कुलकर्णी – संपादन : श्री अतुल देऊळगावकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : गंधर्वांचे देणे 

लेखक : अजिंक्य कुलकर्णी

संपादन – अतुल देऊळगावकर

मूल्य – ८००₹ 

पं. कुमार गंधर्व, सत्यजीत राय आणि लाॅरी बेकर यांचा तसा एकमेकांशी काही संबंध नाही. कारण या तिघांची क्षेत्रं वेगवेगळी. तरीही या तिघांत साम्य जर काही असेल तर ते म्हणजे या तिघांनाही निसर्गबदल समजला. पं. कुमार गंधर्वांनी तो आपल्या गाण्यातून, गायकीतून मांडला. पं. कुमार गंधर्व हे केवळ शास्त्रीय गायक नव्हते तर ते एक तत्वज्ञ होते. मी कोणीतरी आहे हे विसरण्यासाठी संगीत असतं अशी त्यांची धारणा होती. आपल्या चिंतन आणि मननामुळे परंपरेतून आलेल्या रागाला ते एक वेगळा आयाम द्यायचे. रागाचं अमूर्त स्वरूप दिसण्याइतकी सिद्धी त्यांना प्राप्त होती. संगीत, राग, विविध गायकी, सांगीतिक घराणे, सुर, ताल, लय, बंदिशी, तराणे, ख्याल, लोकसंगीत या आणि अशा अनेक विषयांवर पं. कुमार गंधर्वांची मुलाखत ग्रंथाली प्रकाशनाने १९८५ साली आयोजित केली होती. त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये होते मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शरच्चंद्र चिरमुले, श्रीराम पुजारी. तर प्रश्नावली तयार केली होती पं. सत्यशील देशपांडे यांनी. हा मुलाखतीचा अमोल ठेवा काही वर्षांपूर्वी सापडला आणि आता तो ग्रंथ रुपाने सर्वांसाठी खुला आहे. अतुल देऊळगावकर यांनी या पुस्तकाचे संपादन केलं आहे तर ग्रंथालीने याचं प्रकाशन.

कुमार गंधर्व हे कुणाकडूनही, कधीही, काहीही शिकायला तयार असत. जसं एका गारुड्याचं पुंगीवादन ऐकून त्यांनी ‘अहिमोहिनी’ या रागाची निर्मिती केली तर एका भिकाऱ्याकडून ऐकलेल्या भजनातून प्रेरणा घेत कुमारजींचा निर्गुणी भजनाच्या जगात प्रवेश झाला. आपली संस्कृती उदात्त होत जावी यासाठी त्यांनी आपल्या संस्कृतीच्या आधारस्तंभांचे कसून संशोधन केले. कुमारजींचं गाणं ही सतत चाललेली साधना किंवा कशाचातरी सतत चाललेला शोध वाटतो. आपल्याला आताच्यापेक्षाही जास्त चांगलं गाता आलं पाहिजे, व्यक्त होता आलं पाहिजे असं त्यांना वाटत असे. या पुस्तकात शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत यामधील फरकही कुमार फार चांगल्या प्रकारे समजावतात.

बंदिशींबद्दल कुमार म्हणतात की, “कोणतीही बंदिश त्या लयीमध्ये म्हटली तरच फार छान लागते. बंदिशीला खूप अक्षरं नको असतात. कारण तिच्यातून रागाला व्यक्त करायचं आहे. रागाकडे स्वतःला व्यक्त करण्याची खूप मोठी क्षमता असते. कोणालाही रागाचं नाव काय आहे, हे सहज कळावं यासाठी ती बंदिश असते. बंदिशीला बंधनयुक्त स्वैरपणा हवा असतो!”

शास्त्रीय संगीताबद्दल बहुतेक समाज हा उदासीन असतो कारण शास्त्रीय संगीतासाठी आमचा कानच तयार नसतो. संगीत ही जरी ऐकण्याची गोष्ट असली तरी आम्ही संगीत समजून घेण्यासाठी संगीतावरील पुस्तके वाचत नाही. उत्तम गाणारे गायक यांना ऐकणं व त्यांच्या गायकीची इतरांना ओळख करुन देणं यात कुठेतरी आपण कमी पडतो. बंदिश कशाला म्हणतात? ताल कशाला म्हणतात ? द्रुत आणि विलंबित म्हणजे काय? मुरकी, तान, ठेका, टप्पा, राग याची प्राथमिक माहिती तरी आपण गोळा करण्याचा प्रयत्न करतो का? संगीत हे व्यक्तींना, समाजाला जोडण्याचे काम करते. संगीत ही मानवी भाव-भावना व्यक्त करण्याची एक वैश्विक भाषा आहे. गरज आहे ती भाषा समजण्यासाठी कान तयार करण्याची.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “पडघवली” – लेखक : गो. नि. दांडेकर ☆ प्रस्तुती – श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “पडघवली” – लेखक : गो. नि. दांडेकर ☆ प्रस्तुती – श्री सुनील शिरवाडकर ☆

पुस्तक  : पडघवली 

लेखक : गो. नी. दांडेकर 

प्रकाशक : मौज प्रकाशन गृह 

पृष्ठे : २२२ 

गो. नी. दांडेकर. माझ्या आवडत्या लेखकांमध्ये अग्रक्रमावर असलेलं नाव. खुप पुस्तकं वाचली त्यांची. नुकतीच ‘पडघवली’ वाचली. कोकणातील एका गावातील कथानक. कादंबरी प्रकाशित झाली १९५५ मध्ये. म्हणजेच कादंबरीत असलेला काळ साधारण सत्तर वर्षापुर्वीचा. कोकणातील अगदी आत वसलेलं गाव. तेथील चालीरीती.. कुलधर्म.. परंपरा सगळं सगळं यात आलंय.

खरंतर हे एका नष्ट होऊ घातलेल्या खेड्याचं शब्दचित्र आहे. कादंबरीचं कथानक घडतंय एका गावात.. गावच्या खोताच्या घरात. पण ओघानेच येताना गावातील इतर माणसं. मग त्यात कुळवाडी आहेत.. कातकरी आहेत.. अगदी मुसलमान पण आहेत. (कादंबरीच्या भाषेत ‘मुसुनमान’). प्रत्येकाची बोली वेगळी. आहे ती मराठीच. पण खोताच्या घरातील ब्राम्हणी बोली वेगळी.. कातकऱ्यांची वेगळी.. कुळवाडी वेगळी आहे हैदरचाचाची तर त्याहुनही वेगळी.

आणि हेच तर आहे गोनीदांचं वैशिष्ट्य. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. प्रत्येक कादंबरीत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील कथानक येते. कधी विदर्भात.. तर कधी पश्चिम महाराष्ट्रात त्यांची कथा आकार घेते. प्रत्येक कादंबरीत ते त्या त्या प्रांतातील भाषेचा गोडवा.. लहेजा अगदी तंतोतंत उतरवतात.

वास्तविक गोनीदांचं बरंचसं आयुष्य पुण्याजवळील तळेगावात गेलंय. पण कादंबरी लिहीताना ते त्या त्या भागात बरंच हिंडत असणार. तेथे वास्तव्य करत असणार. तेथील चालीरीतींचा अभ्यास करत असणार. तेथील बोलीभाषा समजावून घेण्यासाठी ती कानावर पडणे तर आवश्यक असणारच.

‘पडघवली’ मध्येदेखील ही बोलीभाषा जाणवते. त्या त्या भागातील म्हणी.. वाक्प्रचार आपल्याला समजतात. कोकणातील.. किंवा खरंतर एकुणच ग्रामीण भागातील वापरात असलेल्या औषधी वनस्पतींची पण खुप माहिती मिळत जाते. कथानकाच्या ओघात ते छोट्या मोठ्या दुखण्यांवर वापरली जाणारी औषधे.. मुळ्या.. काढे यांची माहिती सहजगत्या सांगुन जातात.

गोनीदा अनेक वेळा अनेक कारणाने भारत फिरले. त्यातही त्यांनी ग्रामीण भारत अधिक अभ्यासला. ग्रामीण अर्थव्यवस्था बारा बलुतेदारांवर आधारित होती. किंबहुना बलुतेदार हा त्या व्यवस्थेचा कणा होता. यातील एक जरी बलुतेदार बाजुला काढला तरी गावगाडा विस्कळीत होऊन जात असे. आणि हे होऊ नये हीच तर गोनीदांची इच्छा होती.

कारण हा गावगाडा विस्कळीत होऊ नये.. तो न कुरकुरता चालावा म्हणून गोनीदा ‘पडघवली’ च्या सुरुवातीलाच सांगतात..

ही कादंबरी वाचल्यानंतर कोणी तिला चांगली म्हणतील.. कोणी वाईट म्हणतील. कोणी निंदाही करतील. पण मला स्तुती अथवा निंदेपेक्षा वाचकांकडून अपेक्षा आहे ती अशी..

वाचकांचे लक्ष आपल्या त्या जिर्णशिर्ण, कोसळु पाहणाऱ्या खेड्यातील घरकुलांकडे वळावे. कदाचित अपेक्षा पुरी होईल.. कदाचित होणारही नाही.

गो. नी. दांडेकरांची ही साधी अपेक्षा पुरी झाली असं आपण आज म्हणू शकतो?

लेखक : वि.वा. शिरवाडकर 

परिचय : श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “स्वामी विवेकानंद समग्र चरित्र – ३ खंड” – लेखक : प्रा. एस. एन धर – अनुवाद : डॉ. सुरुची पांडे / सौ. संगीता तपस्वी /प्रा. सुषमा कर्णिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “स्वामी विवेकानंद समग्र चरित्र – ३ खंड” – लेखक : प्रा. एस. एन धर – अनुवाद : डॉ. सुरुची पांडे / सौ. संगीता तपस्वी /प्रा. सुषमा कर्णिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

(स्वामी विवेकानंद यांचे विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या प्रकाशनाने प्रकाशित केलेलं समग्र चरित्र !)

पुस्तक : स्वामी विवेकानंद समग्र चरित्र (खंड एक, दोन आणि तीन)

(कॉम्प्रेशन बायोग्राफी ऑफ स्वामी विवेकानंद या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद.)

लेखक : प्रा. एस. एन धर

अनुवाद : डॉ. सुरुची पांडे / सौ. संगीता तपस्वी /प्रा. सुषमा कर्णिक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली

(तिन्ही ग्रंथाची एकत्रित) पृष्ठे : २११२

मूल्य : २५००₹ 

स्वामी विवेकानंद यांच्या नावाची भुरळ आजही भारतीयांच्या मनावर आहे. आणि ती तसूभरही कमी झालेली नाही. त्यांचे विचार, त्यांचा संदेश पौर्वात्य जगतातच नव्हे, तर पश्चिमात्य विश्वातही सगळ्यांना आकर्षून घेत आहे.

स्वामी विवेकानंद एक महायोगी होते. हिमनगाचा पाण्याखालील अदृश्य भाग असतो, तसे त्यांचे जीवन आपल्या मानवी जाणिवांच्या पलीकडचे होते. स्वामीजींचे जीवन आणि कार्य सर्व जगतकल्याणासाठीच होते. इतर सत्पुरुषांसारखे त्यांचे जीवन नव्हते. शिकागोमध्ये १८९३ साली भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेपासून, जगाच्या पटलावर त्यांना एक थोर ऐतिहासिक विभूती अशी ओळख मिळाली होती. आधुनिक भारताचे ते कित्येकांच्या मते एक सर्वश्रेष्ठ निर्माते होते, ज्यांचे ध्येय जागतिक होते. जगाला भौतिक प्रगती प्रदान करण्याबरोबरच, नवीन जीवनमूल्ये किंवा जुन्या जीवनमूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी ते अखंड झिजले. दुसरे म्हणजे, त्यांच्या जीवनाविषयी आणि कार्याविषयी उदंड साहित्य जमा होत गेले आणि भारताबरोबरच जगातही त्यावर खूप संशोधन सुरू आहे.

 हे पुस्तक लिहिण्यामागे स्वामी विवेकानंदाच्या जीवन आणि कार्याचा एक सरळ आणि तटस्थ आढावा घेणे हा लेखकाचा हेतू आहे. उपलब्ध असलेले सर्व प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्याचा संदर्भ घेऊन केलेले हे लेखन कुठल्याही सिद्धांताचा/ तत्त्वाचा अथवा विचारपद्धतीच्या प्रसारासाठी अथवा छापील गोष्टीचा अपभ्रंश करण्यासाठी केलेले नाही. या चरित्रातील व्यक्ती आणि प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे पारखून आणि निरखून घेतलेले आहेत. ज्यायोगे वाचकांना एक समग्र चरित्र उपलब्ध होईल. या अभ्यासात पार्श्वभूमीवरचे आणि अग्रस्थानी असलेले अनेक प्रसंग, आणि त्याकाळची सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक परिस्थिती समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच स्वामी विवेकानंदांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे श्रीरामकृष्ण यास अभ्यासात अध्याहृत आहेत.

या खंडात्रयीचा पहिला भाग १८६३ ते १८९३ हा स्वामीजींच्या आयुष्यातील पहिल्या तीस वर्षाच्या कालावधीवर आधारलेला आहे. हा टप्पा आहे त्यांचा जन्म ते भारत परिक्रमा आणि त्यानंतर अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेला त्यांनी केलेले संबोधन, या घटनाक्रमावर आधारलेला. स्वाभाविकपणेच त्यात स्वामीजींचे बालपण, शाळा – कॉलेजातील दिवस, श्रीरामकृष्णांशी झालेली भेट, गुरु म्हणून त्यांचा केलेला स्वीकार, त्यांच्याकडून घेतलेली संन्यासदीक्षा, श्रीरामकृष्णांनी घेतलेली महासमाधी, वराहनगर मठाची स्थापना आणि ध्येयमार्गाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यापूर्वी गुरू आज्ञेनुसार केलेले भारत भ्रमण, इतक्या घटनांचे विस्तृत तपशील आले आहेत. स्वामीजी जागतिक धर्म परिषदेला गेले, तिथे प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना आलेल्या अडचणी, यावर त्यांनी केलेली मात, स्वामीजींच्या अचाट व्यासंगाची अनुभूती घेतल्यानंतर या परिषदेत स्वामीजींना प्रवेश मिळावा यासाठी काही अमेरिकन नागरिकांनीच केलेले प्रयत्न आणि अखेरीस त्या महापरिषदेसमोर स्वामीजींनी केलेले उदबोधन हा सगळाच रोमांचित करणारा कालखंड पहिल्या खंडात प्रा. धार यांनी उलगडला आहे. हे लेखन रोचक आहेच, परंतु अंत:करणाला भिडणारे आहे, नितांत सुंदर वाचनानंद देणारे आहे. श्रीरामकृष्णांच्या महासमाधीनंतरही स्वामीजींना जे दैवी संकेत मिळत गेले, जे दृष्टांत घडले त्यांचे वर्णन वाचणे हा एक अनमोल आनंदाचा ठेवा ठरावा.

या खंड त्रयीचा दुसरा भाग आधारला आहे तो ११ सप्टेंबर १८९३ ते १६ डिसेंबर १८९६ या तशा तीनच वर्षांच्या कालावधीतील घटनांवर. या घटना बहुतांशी अमेरिका आणि इंग्लंडमधील आहेत. स्वामीजींनी या देशांच्या दौऱ्यात भारतीय संस्कृतीचा केवळ पायाच रचला नाही, तर त्याचे मजबुतीकरणही केले. या सर्वच घटना स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाला आंतरराष्ट्रीय महती प्राप्त करून देणाऱ्या असल्याने, त्याचे तपशील वाचकांना प्रेरणादायक असेच वाटतील यात शंका नाही. अमेरिका आणि इंग्लंडचा हा दौरा सुरू असताना आणि तिथल्या शिष्यांना स्वामीजी अधिक काळ रहावेत असे वाटत असताना, स्वामीजींना मात्र भारतात परतण्याची विलक्षण होऊ लागली होती.

स्वामीजी ३० डिसेंबर १८९६ ला परतीच्या प्रवासाला निघाले. कोलंबोपासून कोलकात्यापर्यंत ठीकठिकाणी स्वामीजींचे उत्स्फूर्त स्वागत झाले, त्याचे वर्णन मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

खंडत्रयीचा तिसरा भाग फेब्रुवारी १८९७ ते जुलै १९०२ असा सुमारे साडेपाच वर्षाचा आहे. हा कालखंड स्वामीजींच्या जीवनातील अनेक विविध प्रसंगांनी आणि घटनांनी भरलेला आहे. त्याचे शब्दांकन अंगावर रोमांच उभे करणारे ठरले आहे. २० जून १८९९ ते ९ डिसेंबर १९०१ या कालखंडातील स्वामीजींनी पुन्हा एकदा पश्चिमेचा दौरा केला; परंतु या दौऱ्याचा हेतूच प्रकृतीस उतार पडावा हा होता. काही प्रमाणात स्वामीजींची प्रकृती सुधारलीही, त्यामुळेच बेलूर मठासाठी निधीसंकलन करून पाश्चात्त्य जगात सुरु झालेल्या कार्याचं मजबुतीकरण करण्यासाठीही त्यांना वेळ काढता आला. तिथल्या कामाचा व्यवस्थापन मार्गी लावता आलं, हेही महत्त्वाचं.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामीजींची अत्यंत दुर्मिळ आणि पूर्वी कधीही प्रसिद्ध न झालेली छायाचित्रे समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ बापू, तुम्ही ग्रेटच – लेखिका : सुश्री नीलम माणगावे — परिचय : सुश्री आशा धनाले ☆ प्र्स्तुती – सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ बापू, तुम्ही ग्रेटच – लेखिका : सुश्री नीलम माणगावे — परिचय : सुश्री आशा धनाले ☆ प्र्स्तुती – सुश्री त्रिशला शहा ☆ 

पुस्तक : “ बापू, तुम्ही ग्रेटच ! “ 

लेखिका–नीलम माणगावे

प्रकाशक : शब्दशिवार प्रकाशन

पृष्ठे ११८

किंमत–रु. १५० / – 

बापू, तुम्ही ग्रेटच ‘ ….  लेखिका नीलम माणगावे यांचं हे ७५ वं पुस्तक. याचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.

ही एक दीर्घ कविता आहे. याचे लेखन एका वेगळ्याच पद्धतीने करण्यात आलं आहे. राग, लोभ, मद, मत्सर हे मानवी स्वभावाचे कंगोरे लेखिकेने बापूंच्या चरखा, चष्मा व लाठी या जवळच्या वस्तूंना बहाल करुन त्यांचा बापूंशी संवाद घडवून आणला आहे. बापूंचे जीवनकार्य व मूल्ये या तीन वस्तूंच्या तोंडून समजतातच. 

शिवाय त्यांच्या नंतरच्या काळात जे घडले आहे, घडत आहे त्या प्रसंगी बापू कसे वागले असते हेही दृग्गोचर होते. त्यावेळी त्यांना कारस्थानाने मारले. पण खरेतर ते अजूनही मरत नाहीत, अशा बापूंची वेगळी ताकद आजही विरोधकांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या मानगुटीवर बसली आहे हे लेखिकेचे म्हणणे पटते.

बापूंच्या स्मारकाला भेट देण्याच्या प्रसंगी राजकारण्यांद्वारे चरखा उलटा फिरवला गेला यावरून देश उलट्या दिशेने म्हणजे सतराव्या शतकात मनुवादात नेऊन ठेवायचा आहे की काय? अशा संभाव्य स्थितीची इथे वाच्यता करण्यात आली आहे. थोडक्यात, गांधी जयंती दिवशीसुद्धा सत्य, अहिंसा, संयम, त्याग या  गांधीमूल्यांना अडथळे निर्माण करणारे विषाणू समजून मारुन टाकले जाते. 

…. असे असले तरी बापूंचे आचारविचार संपणार नाहीत हे प्रतिपादन करताना चरखा, चष्मा, लाठी या प्रतिकात्मक पात्रांनी बापूंच्यावरचा अन्यायही इथे जोरदारपणे व्यक्त केला आहे. यावेळी त्यांच्या क्षोभाला बापूंनी आपल्या नेहमीच्या  संयमित उत्तरांनी शांत करताना ‘ वाणीतून विवेक हरवला तर ती हिंसाच ठरते ‘ हे सांगितले आहे.

अशी ही आगळीवेगळी दीर्घ कविता म्हणजे सध्याच्या सरकारी प्रणालीला दाखविलेला एक आरसाच आहे. गांधी-प्रेमींना ‘ बापू तुम्ही ग्रेटच ‘ हे पुस्तक वाचून एक वेगळी अनुभूती मिळणार हे नक्की.

परिचय : सुश्री आशा धनाले,

मो ९८६०४५३५९९

प्रस्तुती : सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ विचारवंतांचे अंतर्मन – लेखक : श्री पुरुषोत्तम सदाफुले ☆ परिचय – सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ विचारवंतांचे अंतर्मन – लेखक : श्री पुरुषोत्तम सदाफुले ☆ परिचय – सुश्री वर्षा बालगोपाल ☆ 

पुस्तक : विचारवंतांचे अंतर्मन 

लेखक : श्री पुरुषोत्तम सदाफुले 

प्रकाशक : संवेदना प्रकाशन 

पृष्ठे १४३

मूल्य रु १८०/- मात्र 

विचारवंतांचे अंतर्मन नाव वाचले आणि उत्सुकता वाटून पुस्तक हातात घेतले आणि खुल जा सिमसिम असे म्हणताच या पुस्तकाच्या गुहेत वेगवेगळ्या विचारवंतांच्या विचारांचा खजिना हाती लागला.

अतिशय वेगळ्या विषयाचे हे पुस्तक मला वाटते अशा प्रकारचे हे एकमेव पुस्तक असावे.

पुस्तकाच्या शेवटी लेखक पुरुषोत्तम सदाफुले यांच्यावरील तीन लेखांचा समावेश आहे त्यावरून लेखकाचा विस्तृत परिचय घडतो आणि मग लक्षात येते, लेखक असंख्य व्यक्तींना पुरस्कृत करीत असतात. अशा प्रसंगांच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे, अध्यक्ष यांच्या भाषणातून असंख्य मौलिक रत्ने लेखकाने वेचली आहेत आणि नुसती रत्ने वेचलीच नाहीत तर त्याला आपल्या शब्दांचे आपल्याही विचारांचे कोंदण देऊन ते अधिक आकर्षक केले आहे.

सर्वसाधारणपणे भाषणे कार्यक्रमात ऐकून तेथेच सोडून दिली जातात किंवा सभागृहाच्या बाहेर आल्यावर भाषणातील एकही शब्द आठवला जात नाही. परंतु लेखक हे स्वतः पण एक विचारवंत असल्याने अशा अनेक व्यक्तींच्या व्याख्यानातून या शब्दसागरावर आरूढ होऊन त्या लाटेच्या माध्यमातून विचारवंतांच्या काळजात शिरून तेथून ही मौलिक रत्ने गोळा करून या रत्नाचा सुंदर हार शारदामातेच्या गळ्यात घालताना असंख्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनेल अशा विचारांचे मंथन केले आहे.

अर्थातच मंथन म्हटले की उलट सुलट क्रिया होणार त्यातून नवनीत मिळणार किंवा रत्ने हाती लागणार हे सत्य आहे…… मग अशाच मंथनातून लेखकाला तब्बल ८० रत्ने हाती लागलेली आहेत. किंबहुना असंख्य रत्ने हाती लागलेली असताना त्यातील निवडक ८० रत्ने उजेडात आणली आहेत.

अर्थातच ८० आकड्यावरून सहस्रचंद्र दर्शन आठवले आणि खरोखर सहस्र चंद्राचे तेज एकत्र होईल एवढे प्रखर ज्ञान या मौलिक विचारांनी आपल्याला मिळते.

आपण जेवढे या पुस्तकाच्या अंतरंगात जाऊ तेवढे त्यातील वैशिष्टय त्याचे वेगळेपण आणि त्यातील मौलिकता मनाला भावते. हे पुस्तक वाचून हातावेगळे करावे असे नाही तर पुन्हा पुन्हा पारायण करून त्यातील एका एका विचारावर चिंतन करावे असे आहे. अर्थातच एका वाक्यात सांगायचे झाले तर छोटा पॅकेट बडा धमाका असे हे पुस्तक आहे.

अजून एक वेगळा विचार मनात आला, तो म्हणजे या पुस्तकाचा आकार चौकोनी आहे आणि मनात आले विचारवंतांच्या विचारांना एक चौकट प्राप्त करून द्यायचा हा प्रयत्न आहे.

खरेच आहे यातून ज्येष्ठ विचारवंतांचे विचार अधोरेखित तर होतातच पण त्याच विचाराच्या मथळ्यामधून त्याचे असामान्य असे महत्व पण उधृत होते.

गदीमांच्या विचारापासून सुरुवात होऊन उत्तम कांबळे यांच्या विचारसरणी पर्यंत ८० डब्यांची ही रेलगाडी असंख्य स्टेशने, असंख्य बौद्धिक खाऊ, असंख्य सौंदर्यस्थळें यांचे दर्शन घडवून आपला ज्ञानाचा प्रवास अतिशय आनंददायी, माहितीपूर्ण करते. कधीच संपू नये असे वाटणारा हा प्रवास मग शटल होऊन राहील अशी खात्री वाटते.

या पुस्तकाबद्दल लिहिताना दर खेपेला एक वेगळाच पैलू गवसतो. त्यामुळे नक्की कोणत्या पैलूवर व्यक्त व्हावे हा प्रश्न तसाच रहातो, म्हणून उत्तर स्वरूपात आपणच हे पुस्तक घेऊन वाचून बघावे आणि स्वतः अनुभवावे. या दिव्य रत्नाचे दर्शन स्वतः घेऊन खात्री करावी अशी आशा वाटते.

ते तुम्ही करालच ही खात्री पण वाटते.

तर मग… चला…

या विचारवंतांचे अंतर्मन जाणून घेऊ या…

परिचय : वर्षा बालगोपाल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “इये मराठीचिये नगरी” – लेखक : डॉ सदानंद मोरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “इये मराठीचिये नगरी” – लेखक : डॉ सदानंद मोरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  इये मराठीचिये नगरी 

लेखक: डॉ सदानंद मोरे

पृष्ठ : २२७ 

मूल्य : रु. २९९ /-

…. (अभिजात भाषा असा दर्जा मिळालेल्या आपल्या महान मराठी भाषेचा घेतलेला हा सर्वांगीण आढावा!) 

मराठी भाषेचा उगम ते भाषाधिष्ठित महाराष्ट्र राज्याची निर्मिती अशी मराठी भाषेचा इतिहास – भूगोल उलगडणारी ही कूळकथा. भाषा म्हणजे एका विशिष्ट जनसमूहाचा भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास नसतो; तर तो राजकीय सत्ताकांक्षेचा आणि सामर्थ्याचाही इतिहास असतो. समृद्ध आणि प्रसरणशील भाषा असणारा समाज नवनवीन आव्हाने स्वीकारू शकतो आणि राजकीय सामर्थ्य मिळवू शकतो, हे सिद्ध करणारे पुस्तक. या पुस्तकाचे भाषिक विचारांच्या अंगाने असलेले महत्त्व विशद करणारे डॉ. रूपाली शिंदे यांचे प्रास्ताविक, तर राजकीय विचारप्रणालीच्या दृष्टिकोनातून महत्त्व विशद करणारी डॉ. प्रकाश पवार यांचे प्रस्तावनापर विश्लेषक टिपण “मराठीचिये नागरी”च्या संदर्भमूल्यात भर घालते.

मराठीच्या नगरीच्या विस्ताराचा एक वेगळाच मार्ग ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. तो देश-धर्मांच्या सीमा ओलांडून विश्‍वाला गवसणी घालणारा आहे. हा मार्ग ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाच्या समारोपाच्या भागातल्या पसायदानात आढळून येतो. एका स्थानिक संप्रदायासाठी स्थानिकांच्या बोलीत असे विचार व्यक्त व्हावेत, हे एक आश्‍चर्य आहे. अर्थात त्यात त्या बोलीच्या सामर्थ्याचाही वाटा आहेच. पूर्वीच्या काळी धार्मिक ग्रंथाच्या अखेरीस त्या ग्रंथाच्या वाचनानं श्रोत्यांना काय मिळेल, याचा उल्लेख असे. त्याला त्या ग्रंथाची ‘फलश्रुती’ असं म्हणत. ज्ञानेश्‍वरीच्या अखेरीस अशी ‘फलश्रुती’ सांगण्याऐवजी ज्ञानेश्‍वरांनी ‘पसायदान’ मागणं पसंत केलं.

‘मराठीचिये नगरी’ हा ज्ञानेश्‍वरीमधला शब्दप्रयोग रूपकात्मक असून, ‘मराठी भाषा हीच एक नगरी आहे, ’ असं रूपक ज्ञानेश्‍वरांनी करून त्या नगरीतला व्यवहार म्हणजेच भाषिक व्यवहार कसा असावा, यासंबंधी श्रीगुरूला प्रार्थना केली आहे.

ज्ञानोबामाउलींची ही ‘रूपकाची कुसरी’ पुढं नेत तिची भौगोलिक, सामाजिक व प्रसंगी राजकीय व्याप्ती पाहिली तर ‘मराठीच्या नगरी’चा अर्थ ‘मराठी भाषा बोलणाऱ्यांचा देश’ असा होतो. हा देश म्हणजे अर्थातच ‘महाराष्ट्र या नावानं ओळखला जाणारा देश’ हे वेगळं सांगायला नको. याच देशात राहावं, असा उपदेश ज्ञानेश्‍वरांचे भाषिक-पूर्वसुरी चक्रधरस्वामी यांनी आपल्या अनुयायांना केल्याचं आपण जाणतो. चक्रधरांच्या मते महाराष्ट्र ही धर्मभूमी आहे. या भूमीत केलेल्या धर्मकृत्यांचं फळ लवकर मिळतं. ती सात्त्विक भूमी आहे. तिथली माणसंच काय; परंतु झाडं-झुडपं आणि पाषाणसुद्धा सात्त्विक आहेत.

चक्रधरांच्याही पूर्वी आठव्या- नवव्या शतकांच्या संधिकाळावर होऊन गेलेल्या कोऊहल या कवीनं ‘लीलावई’ हे खंडकाव्य ‘महरठ्ठदेसी भासा’मध्ये म्हणजेच महाराष्ट्री प्राकृतात लिहितो. या काव्यात सातवाहन राजा हाल आणि सिंहलद्वीपाची राजकन्या लीलावती यांच्या प्रणयाची आणि विवाहाची कथा सांगितली आहे. महाराष्ट्रभूमीचं वर्णन करताना कोऊहल म्हणतो ः ‘पृथ्वीला भूषणभूत असलेल्या या प्रदेशात धन-धान्यसमृद्धीमुळं शेतकरी संतुष्ट असतात. या महाराष्ट्रात नित्य कृतयुग असतं. ही भूमी म्हणजे धर्माचा आधार आहे. इथली सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाची शाळाच आहे, ही सृष्टी पाहूनच तो आपली सृष्टिरचना करतो. हा देश सुखसमूहांचं जन्मस्थान होय. सद्गुणांचं सुक्षेत्र होय. इथलं कोवळं गवत खाऊन गोधन पुष्ट झालेलं असतं व त्याच्या हंबरण्यामुळं दिशा निनादून गेलेल्या असतात. इथं सर्वत्र जलविहार करण्याजोगी तळी आहेत. या भूमीत कळिकाळ येतच नाही. इथं पाप कुणी पाहिलेलं नाही. शत्रूचा पराक्रम इथं कुणाला दिसतच नाही. ’

कोऊहलाच्या या वर्णनाचं जणू सारच असलेल्या ‘महंत राष्ट्र म्हणौनि महाराष्ट्र, महाराष्ट्र निर्दोष आन्‌ सगुण, धर्म सिद्धी जाये ते महाराष्ट्र’ या महानुभावीय वचनाशी हे वर्णन ताडून पाहिलं तर माझा मुद्दा सहज पटावा.

कोऊहलानं आपल्या काव्यात पैठणचं वर्णन केलं आहे. (राजशेखर तर पैठणला ‘महाराष्ट्रदेशावतंस’ म्हणतो); पण महाराष्ट्रभूमीच्या भौगोलिक व्याप्तीची माहिती हवी असेल तर महानुभावांकडंच जावं लागतं.

महाराष्ट्राला तेव्हा ‘महाराष्ट्रमंडळ’ असंही म्हणत असल्याची कल्पना ज्ञानेश्‍वरीमधून येते; पण या मंडळाचेही खंड अथवा भाग असल्याचं ‘आचारबंद’ या ग्रंथावरून समजतं. ‘देश म्हणजे खंडमंडळ। जैसे फलेठाणापासौनि दक्षिणसि मऱ्हाटी भाषा जितुला ठायी वर्ते ते एक मंडळ। तयासी उत्तरे बालाघाटाचा सेवट असे ऐसे एक खंडमंडळ। मग उभय गंगातीर (= गोदातीर) तेही एक खंडमंडळ। आन्‌ तयापासोनि मेघंकर घाट ते एक खंडमंडळ। तयापासोनि वराड ते एक खंडमंडळ। परी अवघे मिळौनि महाराष्ट्र बोलिजे। किंचित भाषेचा पालट भणौनि खंडमंडळे जाणावी।’’

हा स्पष्टपणे महाराष्ट्राचा भाषिक भूगोल आहे. एकच मराठी भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रमंडळाचे वेगवेगळे भाग कसे करायचे, तर मराठी भाषेतल्या अंतर्गत भेदांवरून; पण हे भाग व भेद गौण आहेत. त्यांच्यामुळं मराठी भाषेच्या एकजिनसीपणाला काही बाध येत नाही.

एकीकडं महाराष्ट्रातल्या वास्तव्यावर व मराठी भाषेच्या वापरावर भर देणाऱ्या चक्रधरांवर उत्तरायुष्यात आळ-किटाळांना सामोरं जावं लागून ‘उत्तरापंथे गमन’ करण्याची वेळ आली. आपला हा निश्‍चय अनुयायांना सांगताना त्यांनी आपल्या पुढच्या आयुष्यक्रमाची रूपरेषाही स्पष्ट केली; त्यानुसार ते म्लेंच्छांमध्ये वावरणार होते. म्लेंच्छांच्या बाजा-सुपत्यांवर निजणार होते. आणखी स्पष्टपणे सांगायची गरज नव्हती; पण त्याचा अर्थ असा होतो, की ते म्लेंच्छांना उपदेश करणार होते.

स्वामींच्या विरहाच्या कल्पनेनं त्यांचे अनुयायी व्याकुळ आणि अस्वस्थ होणं स्वाभाविकच होतं. आपली नाराजी ते लपवू शकले नाहीत. त्यावर स्वामींनी ‘त्यांना (म्लेंच्छांना) तारणारा देव वेगळा आहे का, ’ अशा अर्थाचा सवाल करून – त्यांना कोण तारणार – असं विचारत आपल्या प्रस्थानाचा उद्देश स्पष्ट केला. याचा अर्थ असाही घेता येईल, की यादवांच्या राजवटीत होणाऱ्या छळाचं निमित्त करून स्वामींनी उत्तरेकडं प्रस्थान ठेवलं. उत्तरेत तेव्हा मुस्लिम शासकांचं राज्य होतं, म्हणजेच म्लेंच्छांचा शिरकाव झाला होता. चक्रधरांना व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांचाही उद्धार करायचा होता. काही वर्षांनी संत नामदेवही उत्तरेकडच्या लोकांना धर्म सांगून त्यांचा उद्धार करायला असंच प्रस्थान ठेवणार होते.

दुर्दैवानं चक्रधरांच्या उत्तरेकडच्या वास्तव्याचे, म्लेंच्छांमध्ये वावरण्याचं व त्यांना उपदेश करून त्यांचा उद्धार करण्याच्या कार्याचे तपशील उपलब्ध नाहीत. या क्षेत्रात संशोधन करण्यास वाव आहे.

मात्र, प्रश्‍न असा उपस्थित होतो, की स्वामी म्लेंच्छांमध्ये वावरत त्यांचा उद्धार करण्यासाठी कोणत्या भाषेचा अवलंब करणार होते? ती भाषा मराठी असणं तर शक्‍यच नव्हतं. अर्थात मुळात गुजरातीभाषक असलेल्या ज्या स्वामींनी मराठी भाषा जशी सहजगत्या आत्मसात केली, तशी दुसरी कोणतीही भाषा आत्मसात करून तिच्यावर प्रभुत्व संपादन करणं त्यांना मुळीच अवघड नव्हतं.

ते काहीही असो…चक्रधरांनी आपला धर्म व आपलं तत्त्वज्ञान मुळात मराठी भाषेतूनच सांगितलं असल्यामुळं त्यांनी त्यानंतर सांगितलेले विचार हे मराठीच्या नगरीचाच विस्तार ठरणार होते; मग ते त्यांनी कोणत्याही भाषेत सांगितलेले असोत.

ज्ञानेश्‍वरांचा वारकरी संप्रदाय हा ऐतिहासिकदृष्ट्या चक्रधर, चांगदेव राऊळ, गोविंद प्रभू यांच्या महानुभव पंथाच्या अगोदरपासून अस्तित्वात होता. विठ्ठल हे दैवत आणि वारी ही उपासनापद्धती या रूपात त्याचं अस्तित्व होतं. शिवाय, ‘विठ्ठल हे द्वारकेहून पंढरीत झालेलं श्रीकृष्णाचं अवतरण’ हे समीकरणही सर्वत्र रूढ होतं; त्यामुळं कृष्णानं सांगितलेली गीता हा त्याचा प्रमाणग्रंथही ठरत होताच. तथापि, तो संस्कृत भाषेत असल्यामुळं स्त्री-शूद्रांना अगम्य होता. ज्ञानेश्‍वरांनी गीतेचा अर्थ मराठीत सांगितला, तोच ‘ज्ञानेश्‍वरी. ’ मराठमोळ्या विठ्ठल या दैवताशी सुसंगत असा मराठी भाषेतला हा ग्रंथ मराठीच्या नगरीतल्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या लोकांनी शिरोधार्य मानला यात काहीच आश्‍चर्य नाही. वारकरी संप्रदायासाठी तर तो प्रमाणभूत ग्रंथ ठरला. त्यामुळं या संप्रदायाला परिपूर्ण धर्माची प्रतिष्ठा प्राप्त होऊन त्याचा ऐतिहासिक काळ सुरू झाला. यापूर्वीचा त्याचा इतिहास म्हणजे त्याची Prehistory होय.

महानुभाव आणि वारकरी या दोन पंथांमध्ये आचार आणि विचार यांच्या स्तरावर काही भेद जरूर आहेत. तथापि, दोन्ही संप्रदाय भक्तिसंप्रदायच आहेत. श्रीकृष्ण हे दैवत दोघांनाही मान्य आहे आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेचा अभिमानपूर्वक वापर करण्याविषयीही त्यांचं मतैक्‍य आहे. भेदांची चर्चा करायचं हे स्थळ नाही.

चक्रधरांप्रमाणेच काही वर्षांनी वारकरी पंथाचे अध्वर्यू नामदेव यांनीही उत्तरापंथ पत्करून म्लेंच्छांच्या देशात म्हणजे पंजाबात वास्तव्य केल्याचा उल्लेख याआधीच केला आहे. अर्थात तोपर्यंत म्लेंच्छांचं राज्यच महाराष्ट्रापर्यंत पोचलं होतं, तरीही त्याचं केंद्र दिल्लीची सुलतानशाही म्हणजे उत्तरच होतं. महाराष्ट्रात बहामनींची स्वतंत्र सत्ता स्थापन होईपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिली.

याचा सामाजिक अर्थ असाही घेता येईल, की नव्या सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीला समर्थपणे सामोरं जाता यावं, यासाठी या दोन्ही महापुरुषांनी आपापल्या उत्तरायुष्यात उत्तर हिंदुस्थानात वास्तव्य केलं. या वास्तव्यकाळात नामदेवांनी काय केलं, याचा पुरावा शीखधर्मीयांच्या ‘गुरुग्रंथसाहेब’ या प्रमाणग्रंथातून, तसंच उत्तरेत नामदेवांविषयी रूढ असलेल्या आख्यायिकांमधून उपलब्ध होऊ शकतो. एकाच वाक्‍यात सांगायचं झाल्यास, संत नामदेव हे उत्तरेतल्या संतपरंपरेचे प्रवर्तक होत.

अगोदरच स्पष्ट केल्यानुसार, चक्रधरांच्या याच प्रकारच्या कार्याविषयी इतिहास मौन बाळगून आहे. त्यादृष्टीनं कुणी विचार केला नाही व त्या दिशेनं कुणी संशोधनही केलं नाही; पण तरीही हा सर्व प्रकार मराठीच्या नगरीचा धार्मिक-सांस्कृतिक विस्तार होता, असं आपण निःसंशयपणे म्हणू शकतो.

इथं आणखीही एका मुद्द्याचा उल्लेख करायला हवा. चक्रधरांनी ‘उत्तरापंथे गमन’ केल्यानंतर त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न न करता स्वस्थ बसणं हे त्यांच्या पंथीयांसाठी शक्‍यच नव्हतं. स्वामींचा शोध घेत काही साहसी महानुभाव उत्तरेकडं गेले. माग काढत काढत ते थेट काबूलपर्यंत पोचले. तिकडं त्यांनी मठ स्थापून धर्मप्रसार केला आणि महत्त्वाची बाब म्हणजे, त्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा वापर केला. अठराव्या शतकात मराठा सैन्यानं आपले झेंडे अटकेपार नेण्याच्या काही शतकं अगोदर महानुभावांचा धर्मध्वज अटकेपार पोचला होता! हा तर मराठीचा शब्दशः विस्तार होय.

इकडं महाराष्ट्रात काय घडत होतं, याचाही विचार करायला हवा. काही कारणांमुळं महानुभावांनी मराठी भाषेतलं आपलं ग्रंथभांडार सांकेतिक लिप्यांच्या कड्याकुलपांत बंदिस्त करून ठेवल्यानं पंथाबाहेरच्या बहुसंख्य लोकांसाठी ते अज्ञातच राहिलं; त्यामुळं मराठी भाषेच्या स्वाभाविक विकासाच्या काही वाटा आपोआप बंद झाल्या. वारकऱ्यांनी आपलं साहित्य सार्वत्रिक केल्यामुळं मराठी टिकली, तिचा विकासही होत राहिला. या साहित्यातल्या सामाजिक मूल्यांच्या प्रभावातून मराठीच्या नगरीच्या लुप्त झालेल्या राजकीय सत्तेच्या अंगाची पुनःस्थापना छत्रपती शिवरायांना करता आली. या सत्तेचा विस्तार शिवरायांच्या काळात दक्षिणेत होऊ लागला. अठराव्या शतकात तो उत्तरेकडं व पूर्वेकडंही झाली. या विस्तारामुळंच अफगाणी सत्तेची शक्‍यता कायमची संपुष्टात आली आणि ब्रिटिशांची सत्ता शे-पाऊणशे वर्षं लांबणीवर पडली. या नव्या सत्तेच्या म्हणजेच पारतंत्र्याच्या काळातही मराठीच्या नगरीतली माणसं स्वस्थ बसली नव्हती. महात्मा जोतीराव फुले यांनी सामाजिक विद्रोहाची आणि लोकमान्य टिळक यांनी राजकीय असंतोषाची भाषा घडवली.

मराठी भाषा ही अशा प्रकारे प्रसरणक्षम भाषा आहे. ती बोलणारे लोकसुद्धा तसेच असण्याचा निर्वाळा राजारामशास्त्री भागवत यांनी दिला होता व त्यांच्याकडून तशी अपेक्षा बंगाली इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी व्यक्त केली होती; पण प्रसरणशीलतेचा अर्थ आक्रमण किंवा राजकीय सत्ता असा घ्यायचं कारण नाही. ‘जो पंजाब जिंकणं ॲलेक्‍झांडरला शक्‍य झालं नव्हतं, तो नामदेवांनी प्रेमानं जिंकला’ असं विनोबा म्हणतात, त्याची इथं आठवण होते. ‘अठराव्या शतकात मराठ्यांनी हिंदुस्थान जिंकून घेतला होता, तसं आजच्या काळात करणं शक्‍य होणार नाही; पण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहून त्यासाठी हवे तितके क्‍लेश सहन करावेत, ’ असं टिळक यांनी म्हटलं होतं. हासुद्धा जिंकण्याचाच एक प्रकार मानता येईल.

मराठीच्या नगरीच्या विस्ताराचा एक वेगळाच मार्ग ज्ञानेश्‍वरांनी सांगितलेला आहे. तो देश-धर्मांच्या सीमा ओलांडून विश्‍वाला गवसणी घालणारा आहे. हा मार्ग ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाच्या समारोपाच्या भागातल्या पसायदानात आढळून येतो. एका स्थानिक संप्रदायासाठी स्थानिकांच्या बोलीत असे विचार व्यक्त व्हावेत, हे एक आश्‍चर्य आहे. अर्थात त्यात त्या बोलीच्या सामर्थ्याचाही वाटा आहेच.

पूर्वीच्या काळी धार्मिक ग्रंथाच्या अखेरीस त्या ग्रंथाच्या वाचनानं श्रोत्यांना काय मिळेल, याचा उल्लेख असे. त्याला त्या ग्रंथाची ‘फलश्रुती’ असं म्हणत. ज्ञानेश्‍वरीच्या अखेरीस अशी ‘फलश्रुती’ सांगण्याऐवजी ज्ञानेश्‍वरांनी ‘पसायदान’ मागणं पसंत केलं.

पसायदानाची काही चर्चा यापूर्वीच येऊन गेलेली असल्यामुळं तिची पुनरावृत्ती करायची गरज नाही. पसायदान ही एक प्रार्थना आहे; पण याचा अर्थ तिचा उच्चार हे एक प्रकारचं कर्मकांड बनावं, असा होता कामा नये. पसायदानाच्या माध्यमातून ज्ञानेश्‍वरांनी एका आदर्श समाजाचं स्वप्नचित्र पाहिलं आहे. अशा स्वप्नचित्राला इंग्लिश भाषेत Utopia असं म्हणतात.

असं स्वप्नचित्र वास्तवात यावं यासाठी ईश्‍वरी सत्तेचं पाठबळ हवं म्हणून प्रार्थना करायला हरकत नाही. तथापि, हे सगळं ईश्‍वरावर सोपवून आपण स्वस्थ बसणंही उचित नाही. तो जबाबदारी टाळण्याचा प्रकार ठरेल. विशेषतः ज्या मराठी भाषेत हे स्वप्नचित्र रेखाटलं गेलं आहे, ती भाषा बोलणाऱ्यांची ही जबाबदारी आहे आणि त्यातही ज्ञानेश्‍वरांच्या संप्रदायाचं अनुयायित्व सांगणाऱ्यांची तर ती अधिकच आहे.

अशा प्रकारच्या परिवर्तनासाठी राजकीय सत्तेची जितकी आवश्‍यकता असते, तितकी सत्ता संपादून तसा प्रयत्न करण्यात काही विसंगती नाही. ‘‘महाराष्ट्रात स्वाभिमानी स्वत्वावर आधारित समाज चालता-बोलता झाला पाहिजे, ’’ असं यशवंतराव चव्हाण म्हणाले होते. तेव्हा त्यांच्यासमोर ज्ञानेश्‍वरांच्या पसायदानात सापडलेली नीलप्रत असणार हे उघड आहे. ‘स्वत्वाकडून सर्वत्वाकडं’ असा हा प्रवास आहे. महाराष्ट्र हा त्यातला एक टप्पा होय.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares