मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “लिंकन ऑफ लिडरशीप”…अनुवाद गौरी गाडेकर ☆ परिचय – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “लिंकन ऑन लीडरशिप” – अनुवाद गौरी गाडेकर ☆ परिचय – सौ.शशी.नाडकर्णी-नाईक  ☆ 

पुस्तकाचे नाव:  लिंकन ऑन  लीडरशिप

मूळ लेखक : डॉनल्ड टी. फिलिप्स

मराठी अनुवाद : सौ गौरी गाडेकर

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 

पृष्ठे       :160

किंमत :रु.220/-फक्त

  

सौ गौरी गाडेकर

‘लिंकन ऑन लीडरशिप’ हे पुस्तक डॉनल्ड टी.फिलिप्स यांचे असून त्याचा मराठी अनुवाद  सौ. गौरी गाडेकर यांनी आपल्या मराठी बांधवांसाठी त्यांच्या सोप्या, सुटसुटीत, मनोरंजक भाषेत केलेला आहे.

हल्लीच्या पिढीला काय वाचावं हा मोठा प्रश्न. म्हणून असं नक्की म्हणावसं वाटतं की गाडेकरांचं हे सोप्या ,सुटसुटीत मराठी भाषेतील पुस्तक म्हणजे मेजवानीच आहे. 

ह्या पुस्तकाचा विषय खूप उपयोगी, महत्वाचा पण किचकट आहे. ‘खडतर काळासाठी एक्झिक्यूटिव्ह  डावपेच ‘ म्हणजे मनोरंजनासाठी वाचण्यासारखे  हे पुस्तक आहे का?–असे कोणालाही वाटेल. पण गाडेकरांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने इतका छान अनुवाद केलेला 

आहे ! एकदा हे पुस्तक वाचायला घेतले की पुढे पुढे वाचतच रहावेसे वाटते. ज्याप्रमाणे लहान मुलांना हसत खेळत गणित, भाषा, त्याचप्रमाणे ह्या पुस्तकाचा अनुवाद वाचताना वाटते. आणि म्हणूनच लिंकन ह्यांची तत्वे आपल्याला  वाचताना पटतात. कंटाळवाणे होत नाही.

हे पुस्तक म्हणजे 1860 च्या काळातले  ‘ एक्झिक्यूटिव्ह डावपेच ‘ असले, तरी आजच्या काळात पण ते तितकेच उपयोगी,मार्गदर्शक आहेत.

लिंकन ह्यांचा नेतृत्व हा गुण खूपच वाखाणण्यासारखा होता. 1861 मध्ये त्यांचा शपथविधी झाला होता. बिघडलेल्या परिस्थितीत अल्पसंख्यांकांच्या लोकप्रिय मतांनी निवडून आलेल्या लिंकनना,   नेतृत्वाचा अनुभव नसलेला, अडाणी, खेडवळ वकील, असे त्यांचे सल्लागारच समजत होते.  तेच लिंकन पुढे आदरणीय, पूज्य राष्ट्राध्यक्ष कसे बनले, हेच ह्या पुस्तकात सांगितले आहे. एखादे राज्य, संस्था चालवायला आजच्या पिढीला हे मार्गदर्शक ठरणार आहे. सर्वाना प्रेरणादायक आहे.

वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही बाबतीत लिंकन आपल्या हाताखालच्या माणसांवर विश्वास दाखवायचे. कोण, किती, कशात प्रवीण आहे, कोणाचीआपल्या कामावर किती निष्ठा आहे,  कोण किती कार्यक्षम आहे, हे ओळखून त्याच्यावर  जबाबदारी टाकत. त्यांनी ती पूर्ण केली तर त्यांची वाहवा, योग्य मोबदला देत आणि जर तसे केले नाही तर योग्य वेळ बघून त्यांना पदावरून दूर करीत. कारण लिंकनना हाताखालची  माणसे आणि राष्ट्र दोन्ही गोष्टी सांभाळायच्या होत्या. त्यांना यशस्वीरित्या नेतृत्व करायचे होते. आपल्या बरोबरच सगळ्यांना पुढे घेऊन जायचे होते आणि  ते पण  त्यांची मने  जिंकूनच. आपली मते कोणावर लादायला त्यांना आवडत नसे. ती मते  त्यांना पटवून देण्यावर  त्यांचा भर होता. तसेच समोरच्याच्या चुका त्याला दर्शवून अपमान करण्यापेक्षा,  छोट्या उदाहरणाने, चुटक्यांनी चूक त्याच्या निदर्शनास आणीत. हुकूम सोडण्यापेक्षा विनंती करण्याचे मोल लिंकन जाणून होते.

मानवाच्या स्वभावाची उपजत जाण नसेल तर त्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. कर्मचारी ही संस्थेची मालमत्ता असते.  त्यांची मते, समस्या जाणून, त्याच्यावर थोडा वेळ, पैसा,  खर्च केला पाहिजे. यशस्वी स्नेहसंबंध निर्माण केले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं–  ‘दुभंगलेल्या पायावर घर कधीच उभे राहू शकत नाही. तसेच प्रामाणिकपणा, सचोटी नसेल तर संस्थेची इमारत कोसळू शकते.’ असे त्यांचे मत होते. 

असे नेतृत्वाला गरजेचे आणि रोजच्या दिनक्रमाला पदोपदी उपयोगी  पडणारे लिंकन यांचे मार्गदर्शक गुण या पुस्तकात वाचायला मिळतात.

अशीच बोधप्रद,मनोरंजक पुस्तके, अनुवाद करून गौरी गाडेकरांनी आमच्यापर्यंत पोचवावीत.

ह्याच आमच्याकडून त्यांना शुभेच्छा.

 

  –  सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “बारोमास” – सदानंद देशमुख ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “बारोमास” – सदानंद देशमुख ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆ 

पुस्तकाचे नाव : बारोमास 

लेखक : सदानंद देशमुख

प्रकाशक : कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे 

सदानंद देशमुखांची एक अंतर्मुख करणारी अन जीवाला चटका लावणारी कादंबरी मी २००९  ला वाचली .या पुस्तकाला साहित्य अकादमीचा प्रथम पुरस्कारही मिळालाय .

अशी ही लोकप्रिय कादंबरी सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी अन एकंदरीतच सामाजिक जीवनाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम चित्रित करणारी. शहरी जीवन, व शहरी संस्कार,  ग्रामीण जीवन व ग्रामीण संस्कारांची छापही वैयक्तिक जीवनावर कसा प्रभाव टाकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे बारोमास !

शेतकरी कुटुंबातल्या एका सुशिक्षित तरुणाची हृदयद्रावक कथा ,तसेच योग्य वेळेस निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने कादंबरी नायकाला अंतिमतः फक्त दुःख न दुःखच पदरात येते ,घोर निराशा अन अंध:कार !

एकनाथ एका शेतकरी कुटुंबातील एम. ए. झालेला विवाहित तरुण नोकरीच्या शोधात आहे.त्याची पत्नीही उच्चशिक्षित. पण ग्रामीण संस्कार खोलवर रुजलेल्या एकनाथच्या लाजाळू व बुजऱ्या स्वभावामुळं तो मनात असूनदेखील बऱ्याच गोष्टी करू शकत नाही. पत्नीकडूनच्या अपेक्षांची पूर्तता होत नाही म्हणून आतून नाराज, तर नवऱ्याच्या असल्या मिळमिळीत स्वभावावर पत्नी नाराज. शहरी संस्कार पूर्णपणे भिनलेली ती पतीला समजावते, बाहेर पडण्याची विनंती करते.  पण स्वतःवर विश्वास डळमळीत असल्याने अन कुटुंबावर प्रेम असल्याने एकनाथ तिथंही नापासच होतो .

नोकरीसाठी पैशांची गरज असते आणि हा पैसा उपलब्ध होण्यासाठी शेतजमिनीचा एक तुकडा विकून नोकरी धरावी व नोकरीच्या पैशातून पुन्हा जमीन घ्यावी अशी बिल्कुल सरळ इच्छा बाळगून सुखी जीवनाचे चित्र तो रेखाटतो ,पण घरचे प्रचंड विरोध करतात. दिवस असेच निघून जातात वय वाढू लागते .

कादंबरीची सुरुवात गावाच्या वेशीपासून होते.गावाची ओळख ,सर्रास दिसणारे ग्रामीण चित्र,  थोडे मागास- थोडे आधुनिक, आणि एकनाथच्या घराचा ठिकाणा,अगदी बोळातील रस्ता आणि आजूबाजूचा परिसर एकनाथच्या सामाजिक स्थितीची ओळख करून देतो .आई वडील व एक धाकटा बंधू अन पत्नी असे पंचकोनी कुटुंब. एकनाथ एम ए शिकलेला, विचार आचाराने सुशिक्षित नोकरीच्या शोधात आहे. नोकरीची खात्रीशीर संधी आहे, पण पैसे वशिला हवाय ,वशिला नाही पण पैशांचे काय ? कर्ज काढावे तर व्याज, शिवाय नेहमीचा दुष्काळ पाचवीला पुजलेला ! शेतीचा तुकडा विकावा का ? हा विचार मनात येताच दुसरा विचार येतो ,वडीलोपार्जीत जमीन विकण्यास कदापि पालक तयार होणार नाहीत.अतिशय सरळमार्गी मृदुभाषी एकनाथचे पात्र.  याच्या अगदी उलट भाऊ– पक्का व्यवहारज्ञानी ,समाजातील ,राजकारणातील खाचाखोचाशी ज्ञात ,गावातील टपोऱ्या पोरात ऊठबस असणारा ,आई थोडीशी धाडसी अन वडील माळकरी– अशी ही एकनाथची कौटुंबिक पार्श्वभूमी .आई -पत्नी, अशिक्षित- शिक्षित आणि जनरेशन गॅप, यामुळे खटके -धुसपूस असायचीच ! त्यातच नवरा बेरोजगार, त्यामुळं पत्नीची होणारी घुसमट दोघांतील वादात बाहेर पडायची ! स्त्रीसुलभ भावनांचा कोंडमारा ,परिस्थितीमुळं मूलही जन्माला न घालण्याची खन्त,  अन मग सतत माहेरी जाणे.  यामुळे एकनाथला सर्वच बाजूनी आलेला एकटेपणा आपलेही काळीज पिळवटून टाकतो .या सर्व स्थितीचे अतिशय सुरेख चित्रण आपल्या मनात उतरत राहते अन आपल्यात एकनाथ झिरपत रहातो. एकनाथच्या सर्व सुखदुःखात कुठेतरी सामाजिक प्रश्नांचे मूळ आपल्यालाही अस्वस्थ करत रहाते.

मध्यभागात अवकाळी पाऊस ,शेतीमालाचे नुकसान अन भाव पडणे यामुळे व्यथित- हतबल,  कर्जबाजारी शेतकरी याचे हुबेहूब चित्रण डोळ्यासमोर लेखक उभे करतो. तसेच गावातील राजकारण ,पैशामुळं मिळणारी नोकरी व ट्युशन -क्लास मुळे वाढणारे मार्क, अन पुन्हा चांगल्या मार्कांमुळे मिळणारी नोकरीची चांगली संधी– यामुळं व्यथित एकनाथ म्हणतो, ‘ पैसा हेच सर्व दुःखाचे मूळ आहे.पैसे असतील तर सर्वच गोष्टी मनासारख्या होतात आणि सतत प्रगती होते. ‘

कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यात एकनाथच्या शेतीचा तुकडा विकला जातो. यातील आपल्या हिश्श्याचे पैसे घेऊन शहरात जाऊन झेरॉक्स सेन्टर काढू व तिथेच स्थायिक होऊ असे पत्नी सुचवते.  पण एकनाथकडून तेही होत नाही. ते पैसे धाकट्या भावासाठी असतात, अन पैशांची चोरी होईल म्हणून घरदार त्या पैशांची काळजी करते आणि सर्वांची झोप उडते .

सततच्या परावलंबित्वाला अन एकनाथच्या स्वभावाला कंटाळून पत्नी माहेरी जाते .एकनाथ पत्नी वियोगात कष्टी होतो. पत्नीला सासरच्या सर्व परिस्थितीचा एवढा उबग येतो की तिच्या मानसिकतेवर परिणाम होतो. ती आतून धास्तावते की एकनाथ परत आपल्याला सासरी नेईल. म्हणून ती स्वतःस लपवू पहाते .एक प्रसंग असा वर्णिला आहे की मेहुणी अन पत्नी एकनाथला शहरात दिसतात.    चुकूनच सर्वांची दृष्टादृष्ट होते.  पण त्या दोघी रिक्षात बसतात अन एकनाथला टाळतात. या प्रसंगात खरेच मन विव्हळ झाल्याशिवाय राहत नाही, कारण शरीरापेक्षा मनाने पती- पत्नी खूप दूर गेलीत तिथून एकत्र येण्याचा कोणताच धागा वाचकास दिसत नाही. विमनस्क एकनाथ घरी येतो .

ज्यासाठी शेत विकले होते तो हेतू सफल न झाल्याने आई एकनाथला म्हणते–’ हे पैसे घे व नोकरीसाठी भर.’ या वाक्याने  आतून तुटलेला एकनाथ खूप दुखावतो. कारण नोकरीची संधी तेव्हाच गेलेली असते जेव्हा पैसे भरलेले नसतात. ती जागा भरलेली असते. पुन्हा लवकर नोकरीची आशा नसते आणि जगण्यासाठीचा आशेचा किरण संपतो. संसार कधीच मोडलेला होता अन जीवन अंधःकारमय ! दोन्ही कडून एकनाथ पिचला गेला अन अशा रीतीने एक सुशिक्षित बेरोजगाराच्या वाट्याला वैफल्यग्रस्त जीवन येते अन कादंबरी संपते. पण बऱ्याच प्रश्नांचा गुंता आपल्याभोवती सोडून जाते—

एकनाथच्या दुःखास खरे कारणीभूत कोण?आर्थिक परिस्थिती,सामाजिक ,कौटुंबिक परिस्थिती की स्वतः एकनाथचा बुजरा ,निर्णय न घेता येणार स्वभाव ? पालकांचा पाल्याच्या क्षमतेवरचा अविश्वास की स्वत:वरचा डळमळीत आत्मविश्वास ? 

” माणूस स्वतःच्या दुःखास स्वतःच कारणीभूत असतो ” हे शेक्सपिअरचे प्रसिद्ध वाक्य काही अंशी पटते ,कारण  कोणत्याही परिस्थितीत हतबल न होता परिस्थितीस शरण जाऊन स्वतःच्या क्षमतेवर विश्वास न ठेवता कोणताच ठाम निर्णय न घेता येणे, ही आजच्या सुशिक्षित तरुणांची कमजोर बाजू आहे .व्यवहारात कसे वागावे याचे धडे कुठेच न मिळालेला एकनाथसारखा प्रत्येक तरुण नात्यात अन कुटुंबात पुरता गोंधळून जातो. नात्यातील संवाद जेव्हा संपतो, तेव्हा नाती कोरडी होतात व तुटतात हे विदारक सत्य, केवळ एकनाथला भावना व व्यवहार यांची उत्तम सांगड न घालता आल्याने पचवावे लागते. एकनाथ सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरतो, असे मला तरी वाटते .

सदानंद देशमुखांच्या या कादंबरीला बक्षीस मिळाले असले तरी यात वर्णन केलेली सामाजिक,  राजकीय स्थिती अजूनही तशीच आहे. एकनाथसारखे निष्पाप जीव अजूनही भरडले जात आहेत—-

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “जन्मठेप” – गिरिजा कीर  ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “जन्मठेप” – गिरिजा कीर  ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव…..जन्मठेप

लेखिका …………गिरिजा कीर

प्रकाशन              मेहता पब्लिशिंग हाउस

पृष्ठे                     १६०

किंमत               रु. १५०/—

या पुस्तकाविषयी काही लिहिण्यापूर्वी काही सांगावसं वाटतय् .या पुस्तकाचे प्रकाशन येरवडा जेल पुणे येथे झाले. आणि त्या सोहळ्यास मी गिरिजा कीर यांच्याबरोबर गेले होते. तो प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या सोहळ्यात उपस्थिती होती कैद्यांची– असे कैदी की ज्यांच्यावर खूनाचे आरोप सिद्ध झालेत आणि जे जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. हे वातावरण अपरिचित होतं आणि मी थोडी भयभीत आणि गोंधळले होते. हे सर्व कैदी त्यावेळी मुक्त होते. कुठल्याही बेड्या त्यांच्या हातात नव्हत्या…सर्व कैद्यांनीच हा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. सूत्रसंचालनापासून ते समारोपापर्यंतचा सर्व भार कैद्यांनी उचललेला होता.. मनोगते कैद्यांचीच होती.पुस्तकाचे प्रकाशनही त्यांनीच केले. आणि  व्यासपीठावर बसलेल्या गिरिजा कीर यांना ते सर्व “आमची माउली “म्हणून संबोधत होते. हा अनुभव खूप वेगळा होता…

मुळात ‘ जन्मठेप ‘ हे पुस्तक गुन्हेगारी जगतातील सत्यं उलगडणारे आहे.

गिरिजा कीर यांचे ‘ लावण्यखुणा ‘ हे पुस्तक वाचून प्रेरित झालेल्या सुहास जोशी यांनी गजाआडून त्यांना लिहिलेल्या पत्रामुळे या पुस्तकलेखनाचा प्रारंभ झाला…

दहा वर्षे त्या जन्मठेपेच्या कैद्यांच्या संपर्कात राहिल्या. हा एक संशोधनात्मक प्रकल्प होता. कल्पना सुस्पष्ट होत्या. आराखडा तयार होता.

या पुस्तकातून गुन्हेगारी जगताशी केलेला संवाद आहे. त्यांच्या व गजाआड शिक्षा भोगणार्‍यांचा बाहेर असलेला परिवार, कुटुंबीय याच्या वेदनांना केलेला स्पर्श आहे.

गुन्ह्यांचं समर्थन नसलं, तरी त्यामागच्या कारणांचा, त्या मानसिकतेचा आपुलकीने घेतलेला शोध आहे. चिंतन आहे. गिरिजा कीर सृजनात्मक लेखिका होत्या .त्या या विषयात इतक्या गुंतल्या की त्यांच्यासाठी हा विषय केवळ संशोधनात्मक न राहता मन विस्कटून टाकणारा एक विषय ठरला. 

या पुस्तकात त्यांनी कनिष्ठ व मध्यम वर्गीय सुशिक्षित गुन्हेगारीचा गट निवडला. कारण ही मुलं पापभीरु ,चांगल्या संस्कारातली असतात. केवळ अविवेकी कृत्याने ती गुन्हेगार ठरतात.

कुठली आमिषं, कुठली आकर्षणं त्यांना प्रवृत्त करतात.?? त्यांची मनं दुबळी का होतात ?   वडीलधार्‍यांचे दडपण, कुसंगती, दहशत, पैसा, स्पर्धा ,भोवतालचा समाज, या सर्व प्रश्नांचा शोध या पुस्तकात प्रत्यक्ष संवादातून घेतलेला आहे.

या पुस्तकांतून गुन्हेगारांच्या पुनर्वसनाचा विचार नसून, ज्यांचा सूर्य मावळला आहे ,त्यांना फक्त जगण्याचे सामर्थ्य देण्याची खटपट आहे…

“कुणी नाही का म्हणता? मी आहे ना ! तुमचं एक छान जग निर्माण करा. प्रेम द्या एकमेकांना…”

असे त्या भेटीत सांगत…

या पुस्तक प्रकल्पात त्यांना अनेक अनुभव आले .कैद्यांना भेटण्यासाठी काढाव्या लागणार्‍या परवानग्या..त्यातल्या अडचणी…कायद्यातल्या त्रुटी…

काहींना गुन्हा नसतांनाही झालेल्या शिक्षा आणि विस्कटलेली उध्वस्त जीवनं…पुस्तक वाचतांना अंगावर सरसरुन काटा उभा राहतो…

मात्र हे पुस्तक एका नकारात्मक जीवनाला आशेचा आकार देते…लेखिकेच्या या प्रयत्नांतून मिळालेलं तीर्थ हेच की—अंधारातून ते प्रकाशाचा शोध घेत आहेत.  स्वत:ची दिवली घेऊन मार्ग काढत आहेत. शिक्षा भोगून तावून सुलाखून निघालेले हे तरुण मनातल्या श्रद्धांना झळ पोहचू देत नाहीत. त्यांना चांगलं व्हायचंय  —आपण फक्त आपला आश्वासक हात पुढे केला पाहिजे—-

पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर हा विचार मनात येतो..हेच या पुस्तकाचे यश, साफल्य, सार्थक —–

(प्रकाशन सोहळा संपल्यानंतर ,कैद्यांनी आमच्यासाठी रुचकर जेवण बनवले होते. त्यांनी स्वत: वाढले.आणि सर्व कार्यक्रम संपल्यानंतर आपापल्या सेलमधे निघूनही गेले. स्वत:च सेलचे भरभक्कम दार लावून घेतले..त्या अंधारात गुडुप झाले. आणि जेलरने त्यांचे सेल लाॅक केले. हे मी प्रत्यक्ष पाहिलं आणि काय माझ्या मनाची अवस्था झाली ते कसं सांगू….?? पुस्तकातल्या माणसांना मी प्रत्यक्ष पहात होते…)

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ शब्द  माझ्या सोबतीला (कविता संग्रह)… श्री. सुहास र. पंडित ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ शब्द  माझ्या सोबतीला (कविता संग्रह)… श्री. सुहास र. पंडित ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

पुस्तकाचे नाव : शब्द माझ्या सोबतीला 

कवी : श्री. सुहास र. पंडित 

प्रकाशक : प्रसाद वितरण ग्रंथदालन, सांगली.  

‘शब्द माझ्या सोबतीला’ हा सुहास पंडित यांचा पहिला कवितासंग्रह. संग्रहाचे नाव अगदी अर्थपूर्ण आहे.  शब्दाच्या माध्यमातून आशय उलगडत जातो. त्याला अर्थ प्राप्त होतो. कविता, कथा, कादंबरी, लेख, चरित्र,- आत्मचरित्र , समीक्षा,सगळ्याच वाङ्मय प्रकाराचे इमले शब्दांनीच रचले जातात. शब्दांशिवाय वाङ्मयाचे सृजन असंभव. कवीला शब्दसामर्थ्याची जाणीव आहे. पण ते शब्दांना ‘मागुते या’ असा आदेश देत नाहीत. ते अतिशय ऋजुपणे, आत्मीयतेने, कृतार्थतेने आणि काहीशा कृतज्ञतेनेही म्हणतात, ‘शब्द माझ्या सोबतीला’.

कविता साधारणपणे दोन प्रकारच्या असतात. काही कविता ‘गर्जायच्या’ आणि ‘गाजवायच्या’ असतात. त्या समूहमनाला आवाहन करतात आणि समूहाकडून टाळ्या मिळवतात. काही कविता स्वत:शीच वाचत, गुणगुणत समजून घ्यायच्या असतात. आणि वा: म्हणत त्यांना स्वत:शीच दाद द्यायची असते. सुहास पंडितांच्या कवितांची जातकुळी ही दुसर्‍या प्रकारच्या कवितांची. त्या वाचता वाचता आपोआप समजत जातात. त्यांची कविता अगदी साधी, सोपी, सुबोध आहे. विद्रोही, किंवा आक्रोशी नाही. प्रचारकी थाटाची, उपदेशपर, काही प्रबोधन करणारी अशी नाही. आपला अनुभव इतरांपर्यंत पोचावा, म्हणून त्यांनी कविता लिहिली. आपण काही वेगळं, नवीन असं कवितेतून मांडलं, असं ते म्हणतही नाहीत. सार्वजनिक अनुभव ते सांकेतिक पद्धतीनेच मांडतात. मात्र त्यांचे शब्द, कल्पना येतात, ते विशिष्ट लय घेऊन, वृत्तात बद्ध होऊन. छंद-वृत्त यावर त्यांची चांगली पकड आहे. आपला आशय मांडण्यासाठी त्यांना शब्दांची कसरत करावी लागत नाही. त्यांच्या कविता, त्यांच्या मनाचे भाव प्रकट करणारी भावगीतेच आहेत. त्यांची कविता भावगीतकार भा. रा. तांबे यांच्या जातकुळीची वाटते.

कविता संग्रहाच्या सुरुवातीलाच ते लिहितात,           

शब्द आमुचे खेळ आहे, कागदाचे अंगण 

ना वयाचे, ना दिशांचे ना कशाचे बंधन

रंगवितो खेळ आम्ही, कल्पनांच्या संगती 

हार नाही, जीत नाही, फक्त आहे अनुभूती 

हार-जीत नसली, तरी या खेळाचा आनंद आहेच. कवीला स्वत:चीच कविता वाचताना जसा आनंद होतो, तसा आनंद, कविता वाचताना वाचकांनाही व्हावा, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. 

आपल्या कविता- लेखनाला तरुण वयात सुरुवात झाली, असं ते म्हणतात. बहुतेक कवींच्या काव्यलेखनाला त्या वयातच सुरुवात होते. कॉलेजच्या रोमॅंटिक विश्वात शिरला की बहुतेकांना कवितेची बाधा होते. ही बाधा काहींना तात्पुरती होते, तर काहींच्या ती  कायमची मानगुटीला बसते.  ही बाधा सुहास पंडित यांच्या कायमची मानगुटीला बसली. 

तरुण वयात प्रेम भावनेचे प्राबल्य अधिक. अनेकदा तर प्रत्यक्ष प्रेमापेक्षा ‘प्रेमाच्या कल्पनेवर’च या बहाद्दरांचं प्रेम असतं. मग सफल-विफल प्रेमाच्या कविता लिहिल्या जातात. पंडितांच्या प्रेमकवितेतही प्रेमाच्या विविध रंगछ्टा विखुरल्या आहेत. त्यांची सखी, प्रेयसी आणि पत्नी एकच आहे. त्यामुळे त्यांच्या कविता सफल प्रेमाची गीते होऊन येतात. इथे पुन्हा एकदा भा.रा. तांबे यांची आठवण होते. 

निसर्गाच्या सहवासात त्यांचे प्रेम फुलते. चंद्र-चांदण्या, त्यांचे चांदणे, घमघमणारी चमेली,  मोगरा , रातराणी या वातावरणात त्यांच्या शृंगाराला बहर येतो. प्रेयसीशी एकरूप होण्याची उत्कट असोशी ‘आता नाही दुजेपण’ या कवितेत व्यक्त झालीय. त्यांची शब्दकळा लावण्यमयी आहेच, पण या कवितेत ती विशेष वैभवाने प्रकट झाली आहे . म्हंटलं तर यातील कल्पना, रूपके पारंपारिकच, पण त्यातून एक देखणा आविष्कार त्यांनी प्रकट केलाय. ते म्हणतात, तुझ्यासवे बोलताना कधी पहाट होऊच नये आणि पुढे लिहितात, 

गालातील गुलाबाचा  रक्तिमा फुटावा 

डाळिंबाच्या ओठातील मध हळूच टिपावा

चंद्र लपावा ढगात, मुखचंद्रमा हातात 

माझ्या गळ्यात पडावे, तुझे सोनियाचे हात 

ऋतुराजाचे वैभव सारे खुलावे कायेत

माझ्या मनाचा मयूर सुखे  नाचेल छायेत 

आणि मग चांगली कल्पना येते –

तुझ्या देहाच्या चंद्राचे माझ्या मनात चांदणे 

आता नाही दुजेपण सारे एकरूप होणे 

 स्वप्नवेल, प्रीत बरसते, सर येण्याआधी, फुलवीत आपुली प्रीत (संवाद), नातं ,प्रतीक्षा अशा अनेक सुंदर कविता इथे वाचायला मिळतात. 

पंडितांची प्रेमभावना व्यापक आहे. ती व्यक्तीपुरती मर्यादित नाही. ती निसर्ग, समाज, देश या सार्‍यांना स्पर्शून जाते. घन गर्जत आले, घन बरसला सावळा, श्रावणमास, रवी आला क्षितिजावर, च्ंद्रोत्सव, मानसमेघ, जंतर मंतर अशा कितीतरी कविता निसर्गाचे लावण्यरूप घेऊन येतात. त्यातही गरजणारा, बरसणारा, वसुंधरेच्या गात्रांमध्ये नवजीवनरस  शिंपत जाणारा, चैतन्याची पेरणी करून अवघी अवनी सजवून टाकणारा पाऊसकाळ त्यांना विशेष प्रिय दिसतो. गुलमोहरा’चे शब्दचित्रही त्यांनी अतिशय सुरेख रेखाटले आहे. 

‘हे मृत्यो’ या कवितेत ते म्हणतात, मृत्यूपूर्वी फक्त एकदाच मला हिमशिखरांच्या उत्तुंग राशी, गगनाचे इंद्रधनुष्यी तोरण, हिरवी राने, नभातील रंगपंचमी पाहू दे. निर्झर संगीत ऐकू दे. शिशिरातील पहाटवारा अंगावर घेऊ दे, चंद्राची रेशीमवस्त्रे लेवू दे. , मातीच्या कुशीत शिरून राबू दे. आणि फक्त एकदाच या सृष्टीतला ईश्वर पाहू दे. या कवितेचा शेवट मोठा मजेशीर आहे. ‘फक्त एकदा मला मरू दे इथले जिणे संपल्यावर’  

निसर्गात रमून जाणे हा कवीचा स्थायीभाव असला, तरी त्याचे सद्य: स्थितीकडे बारीक लक्ष आहे. पूर्वी सुवर्णभूमी असलेला आपला देश स्वार्थांध भ्रष्टाचार्‍यांनी आता स्मशानभूमी बनवला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी ‘घे धाव रामराया’ अशी ते आळवणी करतात.  

संग्रहात काही चांगली शब्दचित्रे आहेत. ‘माझा गाव’ वेंगरूळ ‘घर खेड्यातले’ ‘कापूर ‘( हे त्यांच्या आईचे शब्दचित्र आहे.)    

पंडित म्हणतात, हा संग्रह म्हणजे आपल्या प्रवासाची सुरुवात आहे. प्रवास काट्याकुट्याचा असला तरी पुढे ताटवा लागेल, याची त्यांना खात्री आहे. या पुढच्या प्रवासात त्यांना या मार्गावर नव्या नवलाईच्या खुणा दिसोत.. विविध अनुभवांची समृद्धी मांडणारा, या अर्थाने पुढचा प्रवास त्यांना सुखकारक होवो.  

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘एस्. आर्.’ … एक निस्पृह कामगार नेते –  सुश्री ललिता बापट ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘एस्. आर्.’ … एक निस्पृह कामगार नेते –  सुश्री ललिता बापट ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

पुस्तकाचे नाव : एस. आर.

लेखिका : ललिता बापट

प्रकाशक : बी. मोहनराव चिटणीस

प्रकाशन वर्ष : १९८७.

एस.आर…. भारतीय कामगार चळवळीतील झुंजार नेतृत्व— एक निस्पृह कामगार नेते.

श्री.एस.आर कुलकर्णी यांचे हे चरित्र लेखन म्हणजे एक प्रकारे भारतीय गोदी आणि बंदर कामगारांच्या, इतकचं काय पण कामगार चळवळीच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या कालखंडातील प्रेरणादायी प्रवास..

कामगार चळवळीला एस.आर. हे नेते लाभले तो आजवरचा महत्वपूर्ण कालखंड…अनेक वादळे, अनेक चढउतार घडामोडी यांनी भरलेला—

एस.आर. यांचे विलोभनीय व्यक्तिमत्व, त्यांचा पोलादी निर्धार यांचे एक उत्तुंग दर्शन हे पुस्तक वाचताना घडत जाते. त्याचप्रमाणे उदात्त, सुसंस्कारित, मानवतावादी व निर्भय नेतृत्वाच्या साहचर्याचा पुनःप्रत्यय देणारा, सहसंवेदना निर्माण करणारा व भारतीय कामगार चळवळीतील सुवर्ण काळाविषयीची अधिक ओढ, जिज्ञासा उत्पन्न करणारा अनुभव वाचकाला हे पुस्तक वाचताना येतो.

या पुस्तकात जन्म आणि बालपण ते राष्ट्रवादी एस.आर. असे अनेक टप्पे वाचावयास मिळतात. तसेच अनेक बोलकी छायाचित्रेही पहावयास मिळतात. या दीर्घ कालावधीत एस.आर. साहेबांनी कामगार हितासाठी केलेले आणि घडवून आणलेले करार, कामगारांना मिळवून दिलेली पगारवाढ आणि असे अनेक अभिमानाने उजळवून टाकणारे प्रसंग, घटना यांचा उल्लेख तर आहेच, आणि  त्यांच्या जीवनाला आणि त्यांच्या कामगारसेवेच्या व्रताला आकार देणा-या पी.डिमेलो यांच्या स्मृतीने भावविवश होणारे एस.आर कुलकर्णी– हेही इथे भेटतात.

“एकमेवाद्वितीय एस.आर” या लेखात तर १९७१ साली बांगलादेश मुक्तीयुद्धाचे दिवस होते. पाकिस्तानसाठी युद्धसाहित्य घेऊन आलेल्या पाच बोटींवरील शस्त्रास्त्रसाठा आणि भारत विरोधी रसद एस.आर च्या आदेशानुसार मुंबई बंदरात उतरवून घेऊन त्या बोटींवरील बांगलादेशीय खलाशांना, कर्मचा-यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्याच दरम्यान दिवाळीचा सण ..एस आर यांनी बोटींवरील ताब्यात घेतलेल्या सर्व खलाशांना, कर्मचा-यांना ताजमहल हाॅटेलमध्ये स्वतःच्या खर्चाने जेवण दिले. यावरून त्यांची कामगारांसाठी जीव ओवाळून टाकण्याची वृत्ती लक्षात येते. तसेच आणखी एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, एस.आर. आणि पी. डिमेलो आणि त्यांचे आणखी काही जिवलग सहकारी यांना ठार मारण्याचे दोनदा प्रयत्न करण्यात आले होते. पण दोन्ही प्रयत्न  निष्फळ ठरले.. फाझलच्या मनात सद्सद्विवेक बुद्धी जागृत झाली. फाझलने क्षमायाचना केल्यानंतर पी. डिमेलो यांच्या कडे एस.आर. यांनी रदबदली केली आणि क्षमा करण्यासाठी शिफारसही केली. मात्र मोरारजी देसाई यांनी त्या फाझलला मुंबईतून कायमचे तडीपार करण्याचा हुकूम दिला. आज कित्येक तपे उलटून गेल्यानंतरही कलकत्याहून फाझल प्रतिवर्षी खास सण व अन्य निमित्ताने शुभेच्छा पाठवतो, संपर्क ठेवतो.. यावरून त्यांची निर्भयता, चारित्र्य आणि कामगार हिताची प्रामाणिक तळमळ व त्यासाठी केलेले संपूर्ण समर्पण..वाचकांच्या  लक्षात येते..

“वादळी जीवनातील चढउतार” यात तर आपल्याच सहका-यांमधील, कर्मचा-यांमधील गुणीजनांचे गुण आणि नेतृत्व- विशेष ओळखून, त्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांच्यावर जबाबदारी सोपवून, नवे नेतृत्व घडविणारे त्यांच्यातले शिल्पकार दिसून येतात .तसेच ते आपल्या यशाचे वारस आपल्या सहका-यांना व सहभाग आणि साथ देणा-या कामगारांनाच मानतात.आणि  त्यांच्या यात त्यांच्या   विनम्रतेचे दर्शन वाचताना घडत जाते..

भारतीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय गोदी आणि बंदर कामगारांच्या अग्रगण्य पुढा-यांच्या मालिकेतील कौस्तुभरत्न– एकाच वेळी कामगारांच्या अनेक संघटनांच्या अध्यक्षपदी विराजमान असलेले एस.आर.— कामगारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास, कामगारांच्या हितासाठी समर्पित झालेले एस.आर.– ” समर्पित नेतृत्व “—हा लेख वाचताना त्यांच्या कार्याचा सारा तपशील न सांगताच आपल्या अंतर्मनासमोर उभा राहतो..

कामगार चळवळींची मुहूर्तमेढ, ट्रान्स्पोर्ट अँड डाॅक वर्कर्स युनियनची स्थापना, समर्पित नेतृत्व, समानधर्मा सोबती आणि स्नेही, शक्तिशाली कामगार चळवळ,  वटवृक्षाची छाया, एस.आर.– एक विश्वस्त, असे या पुस्तकातील अनेक लेख वाचनीय आणि अभिमानाने उजळवून टाकणारे—

अश्या गुणसमुच्चयाचे एस आर कुलकर्णी—-

कामगारांना प्रकाशाकडे नेण्याच्या आपल्या व्रताला साठ उन्हाळे- पावसाळे पूर्ण करून पुढे पुढे चालत जाणारे एस.आर कुलकर्णी आपल्याला इथे वाचावयास मिळतात… नकळतच आपण त्यांच्या या उत्तुंग कर्तृत्वापुढे नतमस्तक होतो.

त्यांना उद्देशून ” जीवेत शरदः शतम ” चा घोष अनेक कामगारांच्या अंतःकरणात, मनामनात निनादत आहे, हीच त्यांच्या उत्तुंग कार्याची पावती आहे..

हे पुस्तक वाचताना मला एस. आर कुलकर्णी यांच्या कुशल नेतृत्वाची ओळख परत नव्याने झाली…

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आकाशवीणा – सौ वीणा आशुतोष रारावीकर ☆ परिचय – सौ.गौरी गाडेकर

सौ.गौरी गाडेकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆  आकाशवीणा – सौ वीणा आशुतोष रारावीकर ☆ परिचय – सौ.गौरी गाडेकर ☆ 

पुस्तकाचे नाव : आकाशवीणा  

लेखिका : वीणा आशुतोष रारावीकर 

प्रकाशक :ग्रंथाली प्रकाशन 

किंमत :₹100/-

पदार्थविज्ञान, संगणक तंत्रज्ञान व व्यवस्थापन या विषयांत उच्च शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये, विविध देशांत काम करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या वीणा आशुतोष रारावीकर यांचा ‘आकाशवीणा’ हा स्फुट लेखसंग्रह आहे.

या पुस्तकाचं वैशिष्ट्य त्याच्या नावापासूनच सुरू होतं. आकाशवाणीवर वीणा यांनी साधलेला संवाद म्हणजे आकाशवीणा.   कारण खरं तर, मुळात हे लेख नसून ‘ रेडिओ विश्वास ‘ वरून प्रसारित झालेल्या ‘ वीणेचे झंकार ‘, या वीणा यांनी सादर केलेल्या भाषणमालेतील भाषणं आहेत.

यात वीणांनी  हाताळलेल्या विषयांतील वैविध्य  वाचकाला  थक्क करून टाकतं.

सौ. वीणा आशुतोष रारावीकर

‘कहानी टिफिन की’ या मातेच्या मनाला भिडणाऱ्या विषयापासून ते ‘सफर दिल्लीची’, ‘गोष्ट मुंबईची’ वगैरे त्या त्या शहराचं वैशिष्ट्य सांगणारे लेख यात आहेत.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी सुरू केलेल्या ‘चांगुलपणाच्या चळवळी’वर दोन भाग आहेतच, शिवाय चांगुलपणाशी निगडित असणारे ‘मातृदिन ‘, ‘जन्म एका विशेष मुलाचा ‘, ‘दानयज्ञ’ वगैरे इतर लेखही आहेत. त्याचप्रमाणे, ‘आरशात पाहताना’, ‘आयुष्य जगण्याचा दुसरा चान्स मिळतो तेव्हा’चे तीन भाग,’ गीत माझ्या मनीचे ‘, ‘ ‘च’ची भाषा ‘, ‘ काळजी आणि अपराध’, ‘ रागाला निरोप देताना’, ‘ न्यायाधीश’, ‘स्पेस’ वगैरे लेख ताणतणावांचं नियोजन कसं करावं, याचं उत्तम मार्गदर्शन करतात. ‘चालढकल’ सारखा टाईम मॅनेजमेंटवरील लेखही यात आहे.

काही वेळा विषय थोडक्यात आटोपल्याची चुटपुट लागते. पण मुळात हे रेडिओवरील कार्यक्रम असल्यामुळे यात शब्द आणि वेळ  यांचं उत्तम गणित अपेक्षितच आहे.

लेख छोटेखानी असल्यामुळे व भाषा सुलभ,सुंदर, संवाद साधल्यासारखी असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून होतं.

हे पुस्तक वाचनीय तर आहेच, शिवाय मनोरंजनाबरोबरच विचार करायला व त्यानुसार आचार करायला लावण्याचं सामर्थ्यही त्यात आहे. हे वाचत असताना एखाद्या गोष्टीकडे वेगळ्याच नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला मिळतो.

मोठ्यांप्रमाणेच संस्कारक्षम वयाच्या विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक आवडेल. त्यांच्या मूल्यवर्धनास या संग्रहाचा नक्कीच हातभार लागेल.

अशाच प्रकारची आणखीही पुस्तकं वीणांनी लिहावीत, या शुभेच्छा.

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ यशपुष्प….डाॅ.आशुतोष रारावीकर ☆ श्री विकास मधुसूदन भावे

श्री विकास मधुसूदन भावे

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ यशपुष्प….डाॅ.आशुतोष रारावीकर ☆ श्री विकास मधुसूदन भावे  

पुस्तकाचे नाव – यशपुष्प

लेखक — डाँ आशुतोष रारावीकर

प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन

किंमत –  २०० रुपये 

कधीकधी आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सहज गप्पा मारत बसलेले असतो त्यावेळेस कोणीतरी मित्र किंवा मैत्रिण असं काही एखादं वाक्य बोलून जातात कि लगेचच त्या वाक्याला दाद देत आपण म्हणतो “आत्ता माझ्याकडे पेन आणि कागद असता ना तर ताबडतोब तुझं हे वाक्या मी टिपून घेतलं असतं”. आपल्या बोलण्याला आणखी दोन तीन मित्रांचा दुजोरा मिळतो आणि नंतर आपण तो प्रसंग आणि ते वाक्य दोन्हीही विसरून जातो.

मित्रहो, मी जर तुम्हाला सांगितलं की आयुष्याला वळण लावणा-या, क्वचितप्रसंगी आपलं कुठे काय चुकतंय हे सांगणा-या अशा वाक्यांचा समुच्चय असलेलं पुस्तक माझ्या वाचनात आलं आहे तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. “यशस्वी जीवनासाठी विचारपुष्पांचा खजिना” असं अधोरखित केलेलं वाक्य असलेलं “यशपुष्प” हे त्या पुस्तकाचं नाव आहे. डाँ आशुतोष रारावीकर यांनी हा वाक्य समुच्चय या पुस्तकाद्वारे रसिक वाचकांच्या हाती दिला आहे.

“यशपुष्प” या पुस्तकाचे लेखक डाँ आशुतोष रारावीकर यांच्या वडिलांचं नाव यशवंत आणि आईचं माहेरचं नाव पुष्पा! या दोन नावांचा समर्पक उपयोग करून डाँ आशुतोष रारावीकर यांनी या पुस्तकाचं नाव “यशपुष्प” असं ठेवलं आहे. डाँ रारावीकर यांचे वडील ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ  होते तर आई संस्कृततज्ञ आणि साहित्यिक होती. स्वत: डाँ रारावीकर यांची शैक्षणिक पार्श्वभूमी समृध्द आहे.

या पुस्तकात समाविष्ट केलेली काहीकाही वाक्यं आपलं कुठे चुकतंय ते सांगतात. आता हेच वाक्य पहा “शर्यतीत पुढे जाण्यासाठी दुस-याला पाडायचं नसतं ….. आपण आपला वोग वाढवायचा असतो” किंवा “पुढे जाताना कधी आणि कुठे थांबायचं हेही कळायला हवं. कधीतरी दोन पावलं मागे येणं हे सुध्दा दहा पावलं पुढे जाण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग असू शकतो” आपण गंभीरपणे विचार केला तर आपल्या लक्षात येतं कि कधीकधी आपणही हे समजून न घेता बरोब्बर याच्या विरूध्द कृती आपल्याकडून केली जाते. “प्रयत्न हे आनंदाचं साधन नसून पूर्ती आहे …. ही अनुभूती .येते तेंव्हा जीवनात आनंदाशिवाय काहीच उरत नाही”. मित्रहो, हा अनुभव घेण्यासाठी प्रयत्न कधीच अर्ध्यावर सोडायचे नसतात, पण आपण नेहेमीच ते अर्ध्यावर सोडून देतो त्यामुळे या वाक्याचा अर्थ आपल्याला कधीच गवसत नाही. उदाहरणादाखल दिलेली अशी काही वाक्यं या पुस्तकात विखुरलेली आहेत. यशस्वी जीवनासाठी या पुस्तकाचा गंभीरपणे विचार होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आयुष्यात येणा-या निरनिरीळया प्रसंगी कसं वागावं किंवा कसं वागू नये हे या पुस्तकातली ही वाक्यं गंभीरपणे घेतली तर नक्कीच लक्षात येईल.

“गंध अंतरिक्षाचा, “स्मित लहरी”,  “लाँकडाऊनच्या वेळेत” आणि “पुष्पांजली परमेशाला” अशा चार भागात या पुस्तकातील विचारलहरी विखुरलेल्या आहेत.

सकाळ समूह, नाशिकचे माजी संचालक-संपादक आणि २०१० साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या पुस्तकाला लाभली असून ग्रंथाली प्रकाशनातर्फे या पुस्तकाची तिसरी विस्तारीत आवृत्ती २० सप्टेंबर २०२१ला प्रकाशित झाली आहे.

© श्री विकास मधुसूदन भावे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “गुलमोहोर” (कवितासंग्रह ) – कवी मेहबूब जमादार ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक उमराणी

 

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “गुलमोहोर” (कवितासंग्रह ) – कवी मेहबूब जमादार ☆ श्री मुबारक उमराणी  ☆ 

पुस्तक  …….     गुलमोहर ” (कवितासंग्रह )

लेखक   …….    कवी मेहबूब जमादार

प्रकाशक …..    अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर

मूल्य …..…..      ₹ १५०/-

 

” गुलमोहर ”  मेहबूब जमादार.*झाडांच्या आणि मानवी जीवनाच्या काळजाशी नाळ जोडणारा  कवी, मेहबूब जमादार. 

गुलमोहर या त्यांच्या कवितासंग्रहातील कवितांचा मागोवा घेतांना सहज अनुक्रमणिका पाहिली की या संग्रहातील विविध विषयांची कल्पना येते. या कवितासंग्रहात त्यांच्या त्रेपन्न कविता असून त्या कवितांची निसर्ग, कोरोना, दैनदिन जीवनातले प्रसंग, मानवी जीवनाविषयी भाष्य करणा-या कविता, काव्य विषयक कविता,आपली मते ठामपणे मांडणा-या कविता, निसर्ग, महापूर, भूतकाळातील मंगलमय स्वप्नजीवनात रमत वर्तमानाच्या बदललेल्या जीवनाविषयी खंत व्यक्त करणा-या कविता अशी विभागणी करता येईल. या संग्रहात विषयाची मांडणी करतांना कवितासंग्रहात विषय कप्पे न करता कवितांची मांडणी केली आहे.कवितांची भाषा सहज समजेल अशी आहे. गावबोलीतील, जीवनातील, परिसरातील, गाव, शेत, घर यांच्या कविता आहेत. परिसरातील निसर्गात त्यांचे मन रमते, तिळगंगेच्या अवतीभवती, झाडीवेलीत, हिरव्यागार खाचरात रमत कविता लेखन केल्याची स्पष्ट जाणीव कविता वाचतांना होतेच.

पिंपळाच्या फांदीचा खोपा झुलतो अप्रतिम कल्पना. सुगरणीच्या कलेपासून आपण काहीच शिकलो नसल्याची खंत मेहबूब जमादार मांडत, रानाशी संवाद साधत,  जुनेपण, लाकडी नांगर, कुळव ,कुरी, गोठ्यातील जनावरे, देशी पिक हे आठवत नाविन्याच्या हव्यासापोटी शेती कसण्यात केल्या जात असलेल्या बदलामुळे जमिनीत  मीठ फुटले अन्  त्राण गेल्याची खंत मांडत बालपणातील सुखद आठवणीत रमत, आजच्या मुलांच्या बालपणातील जीवन बालपण हरवलेले असल्याचे ते सांगत

“आज हे सारं आठवलं की

डोळे  नकळत दाटून येतात

निवांतपणी जगण्याचे ते

क्षण मनात साठून राहतात.”

  ज्या निसर्गानं मोकळी हवा, पाणी, माती, निसर्ग याची जपणूक करा असे सांगत  ‘गड्या डोळे उघडून बघ, जाळून टाक हा मोहोपाश’ असे ठणकावून सांगतो.आणि मित्रास म्हणतो,

“गड्या मिस करतो की नाही ” असं म्हणताना सारं जीवनचक्र त्यांना आठवते. शाळा, शेत, सुगी, चोरून  सायकलवरून पिक्चरला जातानाच्या रात्री, मित्रासोबत केलेले फाटक्या धडप्यातलं जेवण, गर्दीतून बस पकडत सुंदर पोरगी शेजारी येईल यांची वाट पहात असणारे क्षण, विहिरीवरची मोट, मोटेवरचं गाणं आठवत न कळत आपण काय अन् कसे “मिस “करतो, हे वाचतांना मन क्षणभर भूतकाळात रमते त्यामुळे डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्यावाचून राहत नाहीत. असे कितीतरी सहज अनुभव कवी मानवी ह्दयपटलावर लेण्यासारखे कोरून जातो. त्यांची कविता ओबडधोबड आहे पण त्यातून जीवन जगतानांचे सुखद धक्के मनाला आल्हाद देत जातात. वारंवार वाचण्याची आपोआप ओढ लागते.

मेहबूब जमादार यांच्या कविता रवंथ केल्यावरच त्यांच्या मनात असणारा जीवनानुभव कळतो. कवितांचे शब्द आपले होतात. मेहबूब जमादार  त्या कवितांचा आकार पहात नाहीत तर त्या आकारातून जीवनसत्य साकार करण्याचा त्यांचा प्रयत्न प्रत्येक कविता वाचतांना जाणवतो.

काळजात शब्दांची पेरणी करत उरातली दगदग कवी मांडतो. झेंड्याचे बदलणा-या रंगात रंगणारी माणसे मात्र तीच आहेत हे विदारक सत्य मांडून जातो. माणूसकीची पानगळ त्यांना सतावतांना दिसते.पानगळ झालेल्या झाडांना पुन्हा पालवी फुटते मात्र माणूसकी गळून पडते त्याला पुन्हा माणूसकीची पालवी फुटत नाही. देवाच्या देवा-यात देवत्व नाही तर कष्ट करणाऱ्यांच्या हातात, नांगर-खूरप्यात तो “भाकर होऊन भेटतो ,भाकरीच्या जुन्या धडप्यात ” अशी सुंदर देवत्वाची कल्पना माडणांरा कवी गावच्या ओढ्यात निसर्गाचं लेणं शोधत फिरतो. तो माणसांपेक्षा निसर्गात रमताना दिसतो.

 “शब्दांना फुलवूनी मी लिहिता राहिलो “

असा शब्दांचा भुकेला कवी येथे आपणास भेटतो. वीज आल्यावरचे जीवन कसे झाले मांडताना ते लिहितात,

“गांवी वीज आली तेव्हा

उतरलं डोळ्यांत आभाळ चांदणं

विरून गेल्या अंधार – रात्री

सरुनिया गेलं काळोख जगणं “

असं मांडत

 ‘नाती मात्र विस्कटून गेली, मनातली माणूसकीची वीजचं गेली’

अशी खंत त्यांना सतावते.

“तुझ्याचसाठी ” या कवितेत जीवन सहचारणीस म्हणतात माझे जीवन तुझेच देणं आहे,संकटाच्या उन्हात तुझ्यामुळेच चांदणं फुलले,मी आता सर्वस्वी तुझाच झालो म्हणत,

” बहरता स्पर्श तुझा तो मजसाठी अनमोल होता ”  आणि

” काहीच मजकडे नसता,

  गेलो रमून तुझ्यात

तू दिसता फुले बहरली,

केवळ तुझ्याचसाठी.”

 ही जाणीवही तो विसरत नाही.

“कोरोना “महामारीच्या काळातील कविता या वास्तव समाजाचं चित्रण करतात.

या महामारीने सारे शिकविले,लॉक डाउन मधील जीवनानुभव मांडणा-या कविता लक्ष वेधून घेतात. गर्दीचा मोह आवरावा माणसाने, कायद्याचा वचक नसल्याची जाणीव करुन कवी देतो.निवडणूकीत तुकड्यासाठी मतदारांनी भुलू नये, त्याने नीतिमत्ता,सन्मान,प्रतिष्ठा ही गावच्या वेशीवरच जळू लागली. हे ही सांगायला ते विसरत नाहीत.

जीवनाचा अर्थ, प्राजक्त , कोकणची वाट, शब्द, पूर, माझी कविता, नांगरणी, रान,

पहाटे दवात, वारी, अंगण, आयुष्या, गुलमोहर या कविता पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह होतो.

कवितेतील यमक उच्च कोटीचे असून काही कविता सहज गाता येतात. यातील प्रतिमा अन् प्रतिभा, नवकल्पनांची योजना, विषयातील विविधता, त्यातील मानवी जीवनमूल्ये, अवतीभोवतीच्या निसर्गाचे वर्णन, मनातील खंत, शल्य, बोच,

हुरहुर, मानवी जीवन बदलांचे परिणाम, रोजच्या घटनांचा वेध घेत जीवन जगतांना त्यांना जे जे वाटले ते ते आपल्या  शब्दांत मांडण्याचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.

हा कवितासंग्रह संग्रही असावा असाच असून मुखपृष्ठावरील चित्र चित्रकार अवधुत लोहार,नेसरी यांनी अप्रतिम रेखाटले आहे. कदाचित त्यांच्या गावी हायस्कूलच्या मैदानावरील डेरेदार  झाडच असावे.  मुखपृष्ठ उत्कृष्ट झाले आहे .अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर यांनी कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.

कवी मेहबूब जमादार यांनी आपल्या कवितेचे सारे हक्क, श्रेय आपल्या पत्नी सौ.मुमताज यांना देऊन आपल्या जीवनातील पत्नीचे महत्व या निमित्ताने अधोरेखित केले आहे. हे ही कौतुकास्पदच आहे.

मा.प्राचार्य विश्वास सायनाकर सर यांची प्रस्तावना म्हणजे सायनाकर सरांची शाब्बासकीची थाप आहे ती मेहबूब जमादार यांच्या साहित्यवाटेवर दीपस्तंभ ठरेल अशीच आहे. सर म्हणतात,

“मेहबूब जमादार यांचा प्रतिभेचे मनोहर इंद्रधनुष्य

असेच निरंतर आल्हाद, दिलासा, आशेचा प्रकाश देत राहो”  मीही अशीच प्रार्थना करुन या कवितासंग्रहाचे स्वागत करतो आणि कवी मेहबूब जमादार यांना पुढच्या लेखनासाठी हृदयपूर्वक शुभेच्छा देतो.

 

© श्री मुबारक उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “कृष्णस्पर्श  (कथासंग्रह)” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “कृष्णस्पर्श  (कथासंग्रह)” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक             — कृष्णस्पर्श  (कथासंग्रह) 

लेखिका…….      उज्ज्वला केळकर

प्रकाशक …..      अजब पब्लिकेशन्स   (कोल्हापूर)

पृष्ठे                        १९२

किंमत                   १९०/—

कृष्णस्पर्श “ या कथासंग्रहात एकूण १६ कथा आहेत. वेगवेगळ्या विषयांवरच्या या सर्वच कथा वाचनीय आहेत. त्या जितक्या मनोरंजक आहेत तितक्याच वेगळ्या जाणीवांची ओळख करुन देणार्‍या आहेत..उज्ज्वलाताईंच्या लेखनाची मी तर चाहतीच आहे. त्यांची भाषाशैली खूप प्रभावी आहे. घडणार्‍या साध्या घटनांचा कथांमधून मागोवा घेत असताना त्यांच्या निरीक्षणात्मक

बारकाव्यांचा अनुभव तर येतोच, शिवाय त्यांचा वैचारिक स्तर किती उंच आहे हेही जाणवते. कथेतल्या पात्रांचा मनोवेध त्या अचूक घेतात. शिवाय प्रसंगाकडे अथवा कॅरॅक्टरकडे जसंआहे तसंच बघण्याची एक तटस्थ वृत्ती त्यांच्या लेखनात जाणवते. कशाचंही उदात्तीकरण नाही,

समर्थन नाही किंवा अपारंपारीक  म्हणून विरोधही नाही. वाचकासमोर जसं आहे तसं मांडलं जातं, म्हणून या कथा अत्यंत परिणामकारक ठरतात, वास्तविक वाटतात. काही कथा धक्के देतात. काही कथा बधीर करतात. परीक्षणांत ,कथेतल्या कथानकांविषयी सांगणे म्हणजे वाचकाच्या स्वमग्न वाचनातील आनंद ,गोडवा कमी करणे असे वाटल्यामुळे, काही कथांविषयीच लिहीते.

पहिलीच शीर्षक कथा, कृष्णस्पर्श.” –या कथेत माई आणि  कुसुम नावाच्या कुरुप ओंगळ ,

आत्मविश्वास हरवलेल्या मुलीची गोष्ट आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासुन माई कीर्तन करत. अत्यंत सुरेल गायन, सुस्पष्ट निरुपण आणि प्रभावी वक्तृत्वामुळे.,श्रोते भारावून जातात. माईंच्या विस्कटलेल्या वैवाहिक जीवनामुळे कीर्तन हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनते. कालांतराने त्यांच्या आयुष्यात कुसुम नावाचं गबाळं ध्यान आश्रित म्हणून येतं. सुरवातीला माईंच्या मनात तिच्याविषयी कुठल्याच ओल्या भावना नसतात.उलट रागच असतो. पण एक दिवस त्या तिला गाताना ऐकतात आणि तिच्यातल्या कलाकाराची त्यांना ओळख होते. मग कुसुम माईंना कीर्तनात साथ देउ लागते  गाणारी कुसुम वेगळी भासते. मात्र गाण्यातून बाहेर आलेल्या कुसुमचा पुन्हापुन्हा सुरवंटच होतो. मात्र एक दिवस, कृष्ण आणि कुब्जा भेटीचं गुणगान कीर्तनात गात असतांना कुसुम बेभान होते. ती गातच राहते आणि तेव्हां माईंना जाणवतो तो कृष्णस्पर्श—-माई ठरवतात, कुसुमला पूर्ण कीर्तन शिकवायचे. तिला स्वावलंबी,स्वयंपूर्ण बनवायचं….माईंच्या विचारांनाही कृष्णस्पर्शच होतो जणु—-

आंदोलन “ या कथेतलं कथानक काहीसं अतर्क्य आहे. लहानपणी एकत्र असलेल्या दोघांचं वडीलधार्‍यांच्या इच्छेनेच लग्र होतं.  दोघांची व्यक्तिमत्व भिन्न. विचार वेगळे. तो मातीत रुजलेला शेतकरी आणि ही एक उत्तम यशस्वी डाॅक्टर. त्याच्या पत्नीविषयीच्या पारंपारिक कल्पना, आणि 

हिचं व्यावसायिक जीवन यांची सांगड बसत नाही. दोन मुलंही होतात. पण सहजीवनातला अर्थ हरवलेलाच—-करीअरच्या पाठीमागे असणार्‍यांनी मूळातच लग्नबंधनात पडूच नये–या विषयावर बोचणारे वाद होतात–मात्र एक दिवस, ब्रेन हॅमरेजसारख्या घातक दुखण्यातून बाहेर पडल्यावर या यशस्वी व्यावसायिकतेतून ती बॅकआउट होते आणि एका सामान्य गृहिणीरुपात ती उतरते–

म्हणजे थोडक्यात त्याच्या कल्पनेतली–.पण या पद्धतीने–? नको.  हे बोचरंआहे—आता त्याला ते वेदनादायी वाटतं—ही सर्व मानसिक आंदोलनं उज्ज्वलाताईंनी इतकी सहज टिपली आहेत की कथेतल्या पात्रांच्या भावनांच्या अगदी  जवळ जाउन पोहचतो आपण—-

डेथ डे  ही कथा अंगावर दरदरुन काटा फुलवते. एका वेश्येच्या, एका विकृत राजकारण्याशी असलेल्या संबंधाची ही कथा आहे. पैसा, छानछोकी, ऐट, रुबाब याच्या बदल्यात

तिला जे करावं लागतं— त्यातलं ओंगळ कारुण्य वाचताना मन मातकटून जातं..

परक्याचं पोर—ही कथाही चटका लावणारी. एका जोडप्यांनं अनाथाश्रमातून एक मुलगा दत्तक घेतलेला. पुढे त्यांना त्यांचं स्वत:चं मुल होतं. इथून खरी कथा सुरु होते. वडीलांचं दत्तक मुलगा ,पिंटुशी बदललेलं वागणं.,नातेवाईक आणि सवंगड्याकडून पिंटुला उमजणारं ,त्याच्या आईवडीलांविषयी कळलेलं सत्य , हे सगळं त्याला गोंधळात टाकत असतं. त्याचं बालमन खचत जातं. मग त्याला शिक्षणासाठी अखेर वसतीगृहात ठेवण्याचा निर्णय होतो. आणि या सर्व  घटनांमुळे होरपळलेली, पिळवटून गेलेली आईची मनोवस्था वाचकालाही काळीज फाडणारी वाटते—-. 

चोरट्या वाटेनं, विवाहानंतरही  प्रियकराची मनात केलेली जपणूक एका कथेत आहे..

काही कथांमधे प्रेमाच्या त्रिकोणातून जन्मलेला आणि दुष्कर्म करणारा मत्सर आहे, समाजाने केलेली फसवणुक आहे, दुनियादारी आहे, बलात्कारासारखीही घटना आहे…

पण कथेची इमारत बांधतांना ती सतत ओळंब्यात असलेली जाणवते…उगीच विस्तारत नाही. पसरत नाही.

काही कथा मात्र चटकन् संपल्यासारख्या वाटतात—अजुन पुढे काय, असे वाटत असतानाच संपतात—पण तरीही त्या abrupt वाटत नाहीत….

थोडक्यात इतकंच म्हणेन, एक जाणीव देणारा, कधी सौम्य, कधी उग्र वाटणारा भावाविष्कार व्यक्त करणारा, कधी अतर्क्य वाटणारा, तर कधी वस्त्रहीन वास्तव समोर मांडणारा ,विविध घटनांचा,  विविध आशयांचा एक कथास्पर्श….”.कृष्णस्पर्श!! “ 

सुंदर वाचनीय.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “न्यायदानाच्या खुर्चीवरून” – जस्टिस रमेश माधव बापट ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “न्यायदानाच्या खुर्चीवरून” – जस्टिस रमेश माधव बापट ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक ~ न्यायदानाच्या खुर्चीवरून

लेखक ~ जस्टिस रमेश माधव बापट

प्रकाशक ~ इंद्रायणी साहित्य प्रकाशन, पुणे ३०

पृष्ठसंख्या ~ २४०

मूल्य ~ ₹२००/—

~~~~~

हे पुस्तक कथा,कादंबरी किंवा चरित्र या कोणत्याच वाङ्मय प्रकारात मोडणारे नाही.

एका न्यायाधिशाने त्यांच्या चोवीस वर्षांच्या कारकिर्दीत निकाला त काढलेल्या विविधरंगी खटल्यांचे व अनुभवांचे शब्दांकित रेखाटन असे या पुस्तकाविषयी थोडक्यात म्हणता येईल.

प्रस्तूत पुस्तकाचे लेखक श्री.रमेश माधव बापट, मुळचे कर्नाटकातले, वकीलीची पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर स्वतंत्रपणे वकीली करण्यासाठी पुण्यात स्थायीक झाले. बॅरिस्टर सी. बी अगरवाल आणि एडवोकेट सी.एन्.भालेराव ह्या प्रथितयश व अनुभवी वकिलांकडे ज्यूनियर वकील म्हणून काम करत करत कायद्याचे सखोल ज्ञान प्राप्त करून यश संपादन केले. सर्वसाधारणपणे असा समज आहे की वकिली म्हणजे लबाडी, पण “सचोटी, व्यासंग आणि चारित्र्य यांच्या बळावर कोणत्याही व्यवसायात यश व प्रतिष्ठा मिळू शकते”  हे या लेखकाकडे पाहून समजते.

श्री.बापटांनी त्यांच्या या व्यवसायात,अर्थात आधी वकीली आणि नंतर न्यायदान सांभाळताना ज्ञानसाधना हा महत्वाचा घटक कटाक्षाने सांभाळला आहे. त्यामुळे कोर्टापुढील त्यांचे निवेदन अत्यंत प्रभावी, परिणामकारक व पटण्यासारखे होत असे. पुणे, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, नागपूर, परभणी, आंध्रप्रदेश अशा अनेक ठिकाणी रजिस्ट्रार,न्यायाधीश ही पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या कोर्टापुढे जे विविध खटले गाजले व त्यांनी न्यायदान केले असे अनेक खटले या पुस्तकात उद्धृत केले आहेत. त्यावरून जस्टिस बापटांचा मानवतावाद हा त्यांच्या व्यक्तित्वाचा मोठा घटक आहे असे म्हणावे लागेल. जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे गरीब व गुणी माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सगळी हुषारी पणास लावली आहे, याच्या खुणा पुस्तकात जागोजागी सापडतात. 

एका क्रिमिनल खटल्याविषयी ते लिहितात……

“खुनाची केस होती. दोन आरोपी होते. सेशन्स कोर्टात खुनाचा आरोप सिद्ध होऊन दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका आरोपीने हायकोर्टात अपील केले, परंतु दुसर्‍याने आर्थिक परिस्थिति अनुकूल नसल्याने अपील केले नाही. अपील माझ्या बेंचसमोर आले. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद व पुरावे वाचून झाल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत झालेलाच नाही.  याचाच अर्थ असा की ज्याने अपील केले नाही त्याच्यावरचाही गुन्हा सिद्ध होत नाही. केवळ आर्थिक स्थिति ठीक नाही म्हणून गुन्हा शाबीत झाला नसताना दुसर्‍या आरोपीने जन्मठेप भोगावी हे मनास पटेना. सरकारी मदत देऊन दुसर्‍या आरोपीस अपील करण्यास सांगावे अशी सूचना वकीलांनी मला दिली, परंतु अपिलाची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत दोन एक महीने तरी लागतील, तेव्हा त्याने तेवढा वेळ तरी जेलमध्ये का काढावा? त्यापेक्षा पहिल्या आरोपीच्या अपील निकालात सर्व गोष्टी नमूद करून दोन्ही आरोपींच्या सुटकेचा एकत्र हुकूम काढतो.”  अशाप्रकारे बापटसाहेबांनी दोघांनाही वाचविले.

न्यायमूर्ति बापटांचे मुंबईतील family कोर्टात पोस्टिंग झाले असता त्यांना तर्‍हतर्‍हेची विचित्र माणसे पहावयास मिळाली. या पुस्तकात घटस्फोटाच्या कित्येक नमुनेदार केसेस त्यांनी वाचकांसमोर मांडल्या आहेत. न्यायदान करताना आठवीत शिकलेला एक शेर श्री.बापटांना कसा सहाय्यभूत ठरला त्याविषयी ते लिहितात….

” एका शिक्षिकेने घटस्फोटासाठी दावा दाखल केला.दोघेही तरूण, नवर्‍याला चांगली नोकरी–

काय भूत संचारले,अचानक नोकरी सोडून नवरा घरी बसला. रिकामटेकडा वेळ घालविण्यासाठी व्यसनाची संगत—स्वतःचे पैसे संपल्यावर बायकोकडे मागणी–तिने नकार दिल्यावर मारझोड….अखेर घटस्फोटाचा निर्णय.. पुढे बायकोकडे पोटगीची मागणी—

शिकलेला धडधाकट नवरा बायकोकडे पोटगी मागतो हे मला पटेना..त्याला सरळ करण्यासाठी मी एक गोष्ट लक्षात घेतली की प्रत्येक माणसाला ईगो असतो आणि प्रत्येकाचा काहीतरी विक पाॅइंट असतो– त्याचा ईगो न दुखावता मी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. “ तू स्वतः कमव आणि स्वकमाईचे खा “– असे म्हटल्यावर “ बायकोने कमवावे आणि नवर्‍याने घरी बसून खाऊ नये असा कुठे कायदा आहे का?“ असा प्रतिप्रश्न त्याने मला केला.

तेव्हा मी  त्याला सांगितले “ ठीक आहे, मी पोटगीच्या अर्जावर सही करतो, पण एका अटीवर–उद्या येताना या लांब मिशा तू उतरवून ये. असे म्हणताच मला पाहिजे तो परिणाम झाला. त्याचा अहंकार दुखावला, त्याने पोटगीचा अर्ज मागे घेतला.”

*कर दिया कर्झन ने जन, मर्दों की सूरत देखिये,

आबरू चेहेरे की सब, फॅशन बनाकर पौंछ दी!* असा तो शेर होता—

लाॅर्ड कर्झन गव्हर्नर जनरल असताना हिंदुस्थानातील पुरूष मोठ्या मिशा ठेवीत असत, पण कर्झनने त्यांना बाई बनविले. मिशा उतरविणे म्हणजे अब्रू जाणे. फार मोठा अपमान समजला जातो. 

कोर्टात केसच्या सुनावणीच्या वेळी साक्षीदाराची साक्ष काढताना वादी आणि प्रतिवादीचे वकील जो युक्तिवाद करतात, त्याचेही बरेच नमूने ह्या पुस्तकात वाचावयास मिळतात.

श्री.बापट बॅरिस्टर अगरवालांच्या हाताखाली काम करत असतानाचा एक अनुभव त्यांनी नमूद केला आहे—बॅरिस्टरांचे एक तत्व होते.  “go along with prosecution and then take diversion”

–केस होती ‘under essential commodity act.’ पुणे जिल्ह्यात कलेक्टरनी गव्हाच्या विक्रीची किंमत २ रुपये किलो ठरवली होती. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार आरोपीने गहू २॥ रूपये किलो भावाने विकला होता. कोर्टापुढे तसे साक्षी पुरावेही त्यांनी सादर केले. साक्षीदाराकडे अगोदरच नंबर लिहून, पंचनामा करून दहा रूपयांची नोट देऊन ठेवली होती. दुकान उघडताच एक बोगस गिर्‍हाईक नोट घेऊन दुकानात शिरला व त्याने चार किलो गहू मागितले.आरोपीने गहू वजन करून दिल्यावर पोलीस व अधिकारी दुकानात शिरले आणि साक्षीदाराची झडती घेतली. उरलेले दोन रुपये त्याच्याकडे सापडले नाहीत. याचा अर्थ आरोपीने २॥रुपये भावाने त्याला ४किलो गहू दिले. आरोपीचे वकील होते श्री.बापट. त्यांनी साक्षीदारास एकच प्रश्न विचारला..”जे गहू आरोपीने विकले त्याचे वजन करून पंचनामा केला होता का ?”

उत्तर नकारात्मक मिळाले. वकिलांच्या प्रश्नाचा रोख कोणालाही कळला नव्हता. वकिलांनी आरोपीला अशी जबानी देण्यास सांगितले की,सकाळची वेळ होती,गल्ल्यात सुटे पैसे नव्हते  म्हणून ‘ ४ किलोऐवजी ५किलो गहू देतो असे सांगितले.’ त्यामुळे २ रुपये परत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मोजून ५ किलो गहू दिले, गहू २ रुपये भावानेच विकले. तेव्हा कोणताही गुन्हा केला नाही.

कोर्टाला हा बचाव मान्य करावाच लागला आणि आरोपी निर्दोष सुटला.

हे पुस्तक म्हणजे अशा मनोरंजक कहाण्यांची रेलचेल आणि त्यांतून घडणारे मानव जातीचे दर्शन! 

कायद्याच्या कक्षेत राहून अक्कलहुषारीने न्यायदान करणे हे काम सोपे नाही. 

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print