मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ नाते लडाखशी… सौ. अरुंधती प्रवीण दीक्षित ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर☆

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ नाते लडाखशी… सौ. अरुंधती प्रवीण दीक्षित ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तकाचे नाव – नाते लडाखशी

लेखिका – सौ. अरुंधती प्रवीण दीक्षित

प्रकाशक – राजहंस प्रकाशन प्रा. ली.

मूल्य – १६० रु.

अमेज़न लिंक >> नाते लडाखशी – सौ. अरुंधती प्रवीण दीक्षित

नाते लडाखशी  (एक आस्वादन)

अरुंधती दीक्षित या लडाख इथे दोन वर्षं वास्तव्यास होत्या. तिथली वेगळी भौगोलिक परिस्थिती, त्यातून निर्माण झालेली वेगळी जीवनशैली , तिथले वेगळे अनुभव, याचं यथातथ्य मनोज्ञ दर्शन म्हणजे त्यांनी लिहिलेलं पुस्तक नाते लडाखशी.

प्रवीण दीक्षित हे भारतीय पोलीस सेवेत ऑफिसर आहेत. लडाखला निवडणुका घ्यायचे निष्चित झाल्यावर त्यांची लडाखला बदली झाली आणि ते सपरिवार लडाखला दाखल झाले.

हा काळ ८९- ९० च. त्या काळात, इंटरनेट, गुगल सर्च, सेल फोन, मोबाईल, कॉम्प्युटर, इ मेल हे शब्दही ऐकिवात नव्हते. त्यांचं आधीचं वास्तव्य मुंबईतलं. अरुंधती म्हणते, ‘मुंबई आणि लडाख यात जमीन आस्मानाचं अंतर आहे, हे अनुभवायला मिळालं.’ ( यापुढे लेखामधे लेखिका असा शब्द न वापरता, अरुंधती हे तिचे नावच वापरेन. )

चंदिगडहून विमान लेहला पोचलं. विमानाची चाके जमिनीला टेकली आणि आतील प्रवाशांनी आनंदोत्सव साजरा करत टाळ्या वाजवल्या. यात एवढं आनंदीत होण्यासारखं काय आहे, अरुंधतीला प्रश्न पडला. शेजारचा म्हणाला, ‘मॅडम, ले (लेह) का मोसम बंबईकी फॅशन . सुबह एक शाम को चेंज!’ नंतर कळलं, गेले पंध्रा दिवस वाईट हवामानामुळे इथे विमान उतरूच शकले नाही. स्वत:ला नशीबवान समजत सगळे बाहेर आले. बाहेर येताक्षणी अरुंधतीला लडाखचं पहिलं दर्शन झालं, ते असं – ‘विस्तीर्ण पिवळं पठार…. वर निळं… निळंशार आकाश… आभाळाशी स्पर्धा करणारे, बर्फामधे डोकी बुचकाळून आलेले अती अती उंच उंच डोंगर!… चमचमणारा सोन्याचा सूर्य. अंगाला जाणवणारा सुखद गारवा.’

लडाख हे  ९८००० स्क्वे. कि. मी. क्षेत्र असलेले विस्तीर्ण पठार आहे. याचे दोन जिल्हे. कारागील आणि लेह. लेह जिल्ह्यातील लेह गावात त्यांचे वास्तव्य असणार होतं. हे अतिशय उंचीवरचं थंड गाव.  पण तिथे लेह न म्हणता त्याला ‘ले’ म्हणतात. ले म्हणजे लडाखी भाषेत खिंडींनीयुक्त. तिथे खरडुंगला , झोजीला, तगलाकला, चांगला अशा अनेक खिंडी आहेत. पुढे लडाखचं सौंदर्य, भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण याचे वर्णन करणारे, ‘लडाख: मुगुटातील हिरकणी’ असं एक स्वतंत्र प्रकरणही आहे.

हळू हळू मंडळी ‘ले’ला रुळू लागली आणि बघता बघता त्यांची ‘ले’ शी दोस्तीही झाली. सकाळी सकाळी पाणीतुकडा बाहेरून आत आणायचा. पाणीतुकडा म्हणजे बाहेरच्या हौदातला बर्फाचा खडा आत आणायचा. तो स्टोवर वितळवून पाणी तयार करायचं, मग स्वैपाकाला सुरुवात. मिळणार्या  आर्मी रेशनमधून चविष्ट जेवण बनवण्याची कला अरुंधतीला त्यांच्या कुकनेच शिकवली. बहुतेक भाज्या डबाबंद यायच्या. गजराच्या भाजीचं तिखट, मीठ, मसाला पाण्यानं धुवून त्यात साखर आणि मिल्क पावडर मिसळली, वर सुकामेवा पसरला की झाला गाजर हलवा तयार. अंड्याच्या पांढर्याा भागात मिल्कपावडर मिसळून त्याचे छोटे, छोटे, गोळे तयार करून वाफवले आणि मिल्कमेडमध्ये घातले की झाली तयार रसमलाई. आशा किती तरी युक्त्या ती कुककडून शिकली. जेवणानंतर बडीशेपेसह सी व्हिटॅमीन आणि मल्टी व्हीटॅमीनच्या गोळ्या आवश्यकच. सार्याक व्हिटॅमीनची कमतरता भरून काढण्यासाठी त्या घ्याव्या लागतातच. इथला प्रसिद्ध गुरगुर नमकीन चहा भरपूर अमूल बटर घालून पण साखर आणि दुधाशिवाय केला जातो.

लडाखमध्ये पेपर नाही पण रेडिओ केंद्र आहे. त्यावरच्या बातम्या, एवढाच बाहेरच्या जगाशी संपर्क. फौजी जवानांसासाठी यावरून गाणी सादर केली जात. इथे भिकारी नाही, याचीही आवर्जून नोंद केलेली आहे. इथे ‘जुले जुले’ म्हणत अभिवादन करायची पद्धत आहे. ‘जुले’ म्हणजे नमस्कार.

मिल्ट्री ऑफिसरपैकी अनेकांची कुटुंबे त्यांच्या त्यांच्या गावी होती. ते सगळे ऑफिसर हळू हळू यांच्या परिवारात सामील झाले आणि यांचा परिवार वाढला.

लेहयेथील थंडीत आलेल्या अनुभवाचे मोठे खुमासदार वर्णन अरुंधतीने केले आहे. पुस्तकांची बाईंडिंग निघून ती खिळखिळी होतात. टिच् आवाज करत ग्लास, बोनचायनाच्या  प्लेट्स तडकतात. दुधाच्या पातेल्याला स्कार्फ गुंडाळून ठेवला नाही, तर सकाळी त्यात शंकराची पिंड तयार होते. एक दिवस कपडे आत आणायचे राहिले, तर सूर्यास्त झाल्यावर त्यांची पाठ आणि पोट चिकटून त्याचं बर्फ तयार झालं होतं. अशीच एक भाकरीची गमतीदार आठवण दिली आहे. त्यांच्या दोस्ताच्या फर्माईशीवरून भाकरी-भाजीचा बेत ठरला. भाकरीचं पीठ आणि वांगी येऊन पडली. १५-२० जण तरी जेवायला येणार. ४० भाकरी तरी हव्या होत्या. मग लक्षात आलं, तूप लोणी काहीच सांगितलं नाही. तशी तिने ठरवलं, अमूल बटर वितळवून भाकरी झाली की लगेच लावून ठेवायचं. त्याप्रमाणे ४० भाकर्यां ची अमूल बटर लावून थप्पी रचली. जेवताना डबा उघडला, तर काय भाकरीच्या थप्पीचा दगड झालेला. भाकरीला लावलेलं बटर घट्ट झालेलं होतं. छिन्नी-पटाशीच्या मदतीने जमतील तसे भाकर्यां चे तुकडे करून ते  मग ओव्हनमध्ये गरम केले. तर असा तिथला हिवाळा.

‘ले’च्या थंडीप्रमाणेच इथल्या वसंत ऋतूचेही मोठे मोहक वर्णन अरुंधतीने केले आहे. हिवाळ्यात गोठलेल्या मृतप्राय जीवनावर, वसंत ऋतू चैतन्याची फुंकर घालतो आणि आळोखे पिळोखे देत  सृष्टी जागी होऊ लागते. अरुंधती लिहिते, ‘ ‘ले’च्या ध्यानस्थ बसलेल्या, निसर्गगरूप शंकराला महापराक्रमी मदनानं फुलांचा सुवासिक बाण मारून ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’ म्हणत खडबडून जागं केलं. इथली पानं, फुलं, जर्दाळू, सफरचंदसारखी फळं  या सार्यानचंच मोठं समरसून वर्णन केलय. हाच सीझन पाहुण्यांनी ‘ले’ल भेट देण्याचा. आपल्या ५० पाहुण्यांची व्यवस्था आपण कशी केली, याचीही गमतीदार हकीकत ती सांगते.  

अरुंधती ‘ले’ला आल्यावर तिथल्या लॅमडॉनयेथील शाळेत शिकवायला जायला लागली. ‘मॅडमले जुले’ म्हणत नमस्कार करणारी तिथली, लाल, गुलाबी गालाची, गुलाबाचे ताटवेच आहेत, असे वाटणारी मुले, त्यांचा उत्साह, त्यांचं वागणं, शाळेची ट्रीप, ट्रीपमधील गमती-जमती, यांचं मोठं मनोज्ञ वर्णन तिने केलं आहे. त्याचबरोबर तिथं शिकवताना येणार्याा अडचणींचंही वर्णन केलं आहे. कधीच न पाहिलेल्या, समुद्र आणि जहाज याबद्दल मुलांना कसं सांगायचं? न पाहिलेल्या, झुरळ, बेडूक, साप यांची शरीर रचना कशी समजून द्यायची? असे अनेक प्रश्न तिला पडत. आपल्याला वाचतानाही प्रश्न पडतो, तिने हे आव्हान कसे पेलले असेल?

सियाचीनयेथील सर्वात उंचीवरचे ‘कैद’ हे ठाणे जिंकून ‘गड आला आणि सिंहही परत आला’, असा हा सिंह, परमवीरचक्राचा मानकरी बाणासिंह, याची स्फूर्तिप्रद, प्रेरणादायी कहाणी यात येते. तशीच मेजर सैतानसिंहाचीही येते. खबीर नेतृत्वगुण असलेला आणि रिझांगलाच्या कुशीत आपला देह ठेवणार्याा, मरणोत्तर परमवीरचक्र लाभलेल्या मेजर सैतानसिंहाच्या पराक्रमाचे प्रत्यक्षदर्शी वर्णन तिने केले आहे.

‘लडाखच्या अंतरंगात’मध्ये तिथली भौगोलिक स्थिती, जमीन, वातावरण, पर्वतरांगा, कडेकपारी, डोंगरवाटा, खिंडी, घळया, वन्यजीवन, पशू- पक्षी इ. चं सविस्तर वर्णन येतं. एके ठिकाणी तिने एक लक्षणीय अनुभव दिलाय. तलावाच्या, पाण्याच्या बिलोरी आरशात, मागच्या पिवळट, मातकट पर्वतांचं असं काही प्रतिबिंब पडलं होतं की तो तलाव न वाटता जमीनच वाटत होती. पर्यटकांना दाखवल्या जाणार्याह ठिकाणांचंही वर्णन इथे येतं. हेमीस, आल्या, मूनलॅंड आणी लामायूरू, हे गोंपा (मठ), ‘शे’चा राजवाडा इ च्या वर्णनाबरोबरच हॉल ऑफ फेम ( जिथे तेथील युद्धासंबंधीची माहिती व फोटो जतन केलेले आहेत त्याबद्दल), तसेच सुप्रसिद्ध बोफोर्स तोफ पाहून कसं धन्य झालं, तेही तिने संगीतलय.

होता होता ‘ले’चं वास्तव्य संपलं. शाळेचे मुख्याध्यापक,  सहाशिक्षिका आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी केलेल्या निरोप समारंभाचे आतिषय हृद्य आणि काव्यमय वर्णन अरुंधतीने केले आहे. ती म्हणते की आता मनाच्या पुस्तकात इथल्या आठवणींचे मोरपीस ती ठेवेल आणि अधून मधून ते उघडून ती तिथल्या आठवणीत रमून जाईल.                                                                                                                                

लडाखशी नाते जोडत, त्या उंचीवर, थंड हवेत, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत, विरळ, प्राणवायू असलेल्या जागी लोक राहातात, कसे रहातात, आनंदाने कसे राहतात, हे जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवे, ‘नाते लडाखशी’ आणि आपणही  शब्दातून जोडायला हवे, ‘नाते लडाखशी’

परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ निशिगंध – डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – सौ. जयमंगला पेशवा ☆

डाॅ.निशिकांत श्रोत्री

? पुस्तकावर बोलू काही?

☆ निशिगंध – डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – सौ. जयमंगला पेशवा 

पुस्तकाचे नाव: निशिगंध 

साहित्य प्रकार : भावगीत संग्रह

लेखक : डाॅ. निशिकान्त श्रोत्री

प्रकाशक : नीलकंठ प्रकाशन

पृष्ठसंख्या : २१२     मूल्य रु. २००

निशिगंध -विविध भावतरंग                                                        

प्रत्येकाच्या मनात कवी दडलेला असतो असे म्हणतात.  कधी त्याचे प्रखर तेज प्रकट होते ,तर कधी तो काजव्यासारखा रात्रीच्या अंधारात फक्त लुकलुकताना दिसतो. डॉ . निशिकांत  श्रोत्री यांचा “निशिगंध” हाती आला आणि  प्रथम पान उघडण्यापूर्वी शेवटच्या पानाने लक्ष वेधून घेतले . स्वतः निष्णात  सर्जन असणारा  माणूस साहित्याच्या  वेगवेगळ्या क्षेत्रात आपली लेखणीही तितक्याच सामर्थ्याने  व कौशल्याने  चालवू  शकतो हे  वाचून मी स्तिमित झाले. अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, काव्यसंग्रह त्यांनी लिहिले आहेतच, पण वैद्यकीय साहित्यदेखील त्यांनी समाजापुढे आणले आहे. इतक्या निरनिराळया प्रांतात ते सहजपणे  वावरत आहेत . 

“निशिगंध” मध्ये  त्यांनी केलेले विषयाचे वर्गीकरण ही फार चांगली गोष्ट आहे. भक्तीपर  काव्यांचा  आस्वाद घेत असताना पुढचे  पान जर शृंगाररसाच्या शब्दांनी नटलेले आले तर ते आपलं मन सहज स्वीकारू शकत नाही; किंवा प्रेमाच्या अनोख्या सुरेख रंगांचा आनंद घेत असताना पुढच्या कवितेतला समाजातील असूर आपल्याला त्रास देतो.

डॉ . श्रोत्रींचा  ईश्वरावर, त्या अनाम तेजावर पूर्ण विश्वास आहे .गणेश, दत्तगुरु, किंवा कृष्ण त्यांना सारखीच भुरळ घालतात. साईबाबांचे तर ते परम भक्त  आहेत. त्या दैवी सामर्थ्यांची आपल्याला अनुभूति यावी ही इच्छा मनात दडलेली आहेच आणि ते कधीतरी प्रत्यक्षात येईल अशी आशाही आहे. त्या तेजस्वी प्रकाशाच्या दर्शनास आपण अजून योग्य झालो नाही याची खंत मनात आहे .त्या तेजाला आवाहन करतानाही ते तेज व आपण यात अमर्याद अंतर आहे ही खंत आहे. आपल्यासाठी ईश्वरापर्यंतचा पल्ला फार दूरचा आहे अस वाटत असताना, “तो” प्रेमळ आहे, आपल्यातील कमतरतेसहित तो कधी तरी आपल्याला स्वीकारेल हा विश्वास सुद्धा आहे,

भवपाशाच्या मोहामधुनी सोडव रे मजला —

किंवा

अहंकार हा व्यर्थ जाहला, दीन जाहली प्रज्ञा

तुझ्या कृपेने सार्थ होउनी मुक्ती मिळावी अज्ञा —–या शब्दातून प्रभूची विनवणी करत असतांनाच  “कार्य समर्पित फला न आशा ” असेही ते म्हणतात. प्रभूकडे आशीर्वाद मागतांना केवळ त्यांच्या चरणी समर्पण हीच इच्छा दर्शवतात. कवींच्या शब्दात किंचित निराशा डोकावते तरीही, तो सर्वज्ञ आपल्याला एक न एक दिवस निश्चित जवळ करेल असे “चिंतन” अखंड होते आहे. मनात प्रभूभेटीची आस आहे, हुरहूर आहे- त्यातून कवीमन कधी तरी हळूच बाहेर पडते आणि किंचित निराशेतून एक कोमल, सुंदर, सुरेख रंगांनी नटलेला प्रेमाचा कोंब हसतहसत डोकावतो. चांदण्याच्या सौंदर्यात रातराणीचा घमघमाट हलकेच मिसळतो. प्रीतीचे अबोल सूर हृदयाला जाऊन भिडतात; प्रेमातील अभंगत्व, मांगल्य जाणवते. हे धुंद करणारे गुपित वाऱ्याने कुणाला सांगू नये वाटते, त्याचवेळी आपली प्रेयसी आपल्याकडे पाठ तर फिरवणारनाही ना अशी भीती वाटते आहे आणि — “नको सोडूनी जाऊ” अशी विनवणी होते आहे .

मयूरपिसांच्या डोळ्यातून प्रियकराच्या स्वप्नात जाण्याचे आणि प्रेमाच्या विविध रंगाने दिपून जाऊन इंद्रधनूनेही नतमस्तक व्हावे असे प्रेयसीचे चित्र कवी मानसपटावर रेखाटत आहेत. प्रेमाचा ठेवा जपून ठेवावा, उधळून टाकू नये असे त्यांना वाटते. जरुरीनुसार प्रेमकवितात शारीरिक जवळीक आहे, पण कुठेही किंचितही  वासनेची दुर्गंधी नाही. स्वच्छ नितळ विचार आहेत. जगण्याला प्रेमाचा आधार आवश्यक आहे हीच भावना आहे —

“ जे जगायला हवे ते क्षण मला देऊन जा ” —-

किंवा

“ दाटून मनीचे भाव आणले ,धुंडाळूनीया शब्द

प्रतिक्षेमध्ये सप्तसुरांच्या ते ही मुग्ध नि स्तब्ध “ — असे म्हणत असता एक हळुवार आणि आशेचा अलवार स्पर्श अनुभवावा असे कवीला वाटते .

एकतर्फी  प्रेमाची भावना व्यक्त होताना दोघांनीही हातात हात घालून जीवनाचीही वाटचाल करावी ही इच्छा आहे “युगुल” मध्ये एकमेकांशिवाय जीवन व्यर्थ आहे, असे त्याला व तिलाही जाणवतांना दिसते. साथ कधी सुटू नये ही इच्छा आणि  ती कधीही सुटणार नाही हा विश्वास आहे. अंतराय  किंवा दुरावा नको हीच भावना आहे. 

असे असतांनाही परिस्थितीपुढे कधी कधी मानव हतबल होतो . निळ्याभोर आकाशात सूर्याची केशरी किरणे  बागडत असतानाच अभ्र दाटून यावे असे, ताटातुटीचे, विरहाचे क्षण येऊन ठेपतात आणि—-

“ फुलती स्वप्ने सुकून गेली विरून जायला ” —असे निराशेचे सूर हृदयी दाटून येतात. प्रीतीचा फुलोरा कोमेजून गेला असे वाटू लागते आणि मग —- “ भावना गोठून गेल्या , शब्द झाले पोरके ” अशी अवस्था  अनुभवावी लागते; कशातच गोडी  वाटत नाही. जोडीदाराशिवाय चांदणे, रोहिणी, रातराणीचा गंध काहीच मनाला मोहवू  शकत नाही, जीवनातला आनंद, सौंदर्य सर्व संपल्यासारखे वाटते . भेट किंवा एकत्र जीवन प्रत्यक्षात न येणारे आहे हे शल्य उरी असतानाच निदान एकमेकांचे दर्शन तरी घडावे ही आस हृदयाला पोखरत राहते. एकांत हवासा वाटतो; इतरेजनांची जवळीक नकोशी  वाटते.  परंतु सुदैवाने एकमेकांची साथ मिळाली तर जीवन उमलून येते . स्पर्शातील कोवळी ओढ शब्दाशिवाय खूप काही सांगून जाते, एक तृप्तता जाणवू लागते .जीवन परिपूर्ण होते. धुंद क्षण सुखावून जातात. 

विविध नात्यांनीही आयुष्याला परिपूर्णता लाभते. नात्यांचे  निरनिराळे रंग कवीने दर्शवले आहेत. माता, पत्नी, अपत्ये, सखे-सोबती, सर्वांचे रंग निरनिराळया रंगछटांचे  आहेत, एक तऱ्हेची तृप्ती देणारे आहेत.

स्त्री जीवन किती खडतर आहे याचीही जाणीव कवीला आहे . डॉक्टर म्हणून येणारे काही अनुभव त्यांच्या नजरेतून निसटले नाहीत .समाजातील राक्षसी वृतीच्या लोकांचा सामना समाजानेच एकजुटीने करायला हवा असे त्यांना वाटतेच, पण स्त्री जन्माच्या विरुद्ध उभ्या राहणाऱ्या माणसाबद्दलचा राग त्यांच्या शब्दातून जाणवतो— “ माणूस तुझाच वैरी झाला ” यामध्ये त्यांची असहाय्यता खूप काही सांगून जाते व डॉक्टर म्हणून त्यांच्या सुसंस्कृत व सुशील मनाची एक घट्ट वीण  जाणवते; मायेच्या नात्याची साक्ष आहे असे वाटते . 

प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात. डॉ. श्रोत्रींसारख्या यशस्वी सर्जन असून साहित्याच्या प्रांतात मनमुराद विहार करणाऱ्या पतीला खंबीर साथ देणाऱ्या डॉ .अपर्णा यांचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. आपल्या मताशी ठाम असणाऱ्या अपर्णा कोणत्याही प्रसंगाशी सडेतोड सामना करणाऱ्या आहेत . त्या नात्यातला हळुवारपणा, मैत्रीतले रेशमी धागे नेहमीच जपतात. वेळप्रसंगी कठोर वागावे-बोलावे लागले तरी शब्दांनी  सभ्यतेची पायरी कधीच ओलांडली नाही. दुसऱ्याच्या जिव्हारी लागेल असे त्या कधीच बोलल्या नाहीत. त्या डॉ. निशिकांतच्या पाठीशी सदैव कोणत्याही परिस्तितीत ठामपणे उभ्या राहिल्या. डॉ अपर्णाविषयी निशिकांतच्या मनात प्रेम आहेच आहे परंतु त्यापेक्षा जास्त आधाराची भावना आहे— “ नाही मला जगायचेही जीवन तुझियाविना ” असे त्यांना वाटले तर त्यात आश्चर्य काय ? ही कविता वाचताना छान तर वाटेलच. सर्व जीवन अपर्णामय असल्याची कबुली ते देतात —-“ तुला न ठाऊक सामर्थ्य तुझे,जाणून घेई अपर्णा ”– अपर्णाशिवाय सर्व शून्य आहे.

“निशिगंध” काव्यसंग्रह वेगवेगळ्या सुवासिक फुलांचा गुच्छ असावा तसे डॉ. निशिकांत यांच्या मनातील विविध भावनांच्या लाटा-तरंग यांचे एकत्रीकरण आहे; त्यांच्या भावनांचा गंध आहे.  सर्व सुरेख म्हणत असताना काही कमतरता नाहीत का, असे वाचकांच्या मनात येईल. पण काव्य हा प्रत्येकाचा व्यक्तिगत आविष्कार असल्याने त्या कमतरतेचा विचार नसावा..

आकाशवाणी व दूरदर्शन या दोन्ही माध्यमात डॉक्टरांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे . त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा !  त्यांना पुढच्या आयुष्यात खूप वेगवेगळ्या संधी मिळोत,अपर्णाची साथ सदैव लाभून पुढील जीवनही समृद्ध व्हावे!

त्यांच्यासारख्या सिद्धहस्त व प्रतिभावान लेखकाच्या शब्दांवर लिहावे इतकी पात्रता नसतानाही त्यांच्या शब्दांची भुरळ पडल्याने लिहायचे धाडस केले !  डॉक्टर तुमच्या आगामी “झुळूक” ची आम्ही मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहोत .

परिचय :  सौ. जयमंगला पेशवा 

संपर्क – “रघुनाथ”  पुणे, मोबाईल नं :९६५७५३९६७० फोन : २५६७६५७० 

(ई-अभिव्यक्तीच्या वाचकांना हा संग्रह ५०% सवलतीच्या दरात मिळू शकेल. पाठवण्याचा खर्च वेगळा.)




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पुण्यभूमी नृसिंहवाडी ☆ परिचय -श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? पुस्तकावर बोलू काही?

☆ पुण्यभूमी नृसिंहवाडी ☆ परिचय – श्री राजीव ग पुजारी 

पुस्तकाचे नाव :- पुण्यभूमी नृसिंहवाडी 

लेखक:- डॉ. बाळकृष्ण महादेव जमदग्नी व डॉ. सौ. मृणालिनी बाळकृष्ण जमदग्नी

प्रकाशक : श्री वामनराज प्रकाशन 

पृष्ठसंख्या : ८१६ 

किंमत : रु. ७०० /- 

मागील पंधरा दिवसांत बाळकृष्ण महादेव जमदग्नी व त्यांच्या सुविद्य पत्नी  डॉ. सौ. मृणालिनी बाळकृष्ण जमदग्नी लिखित ” पुण्यभूमी नृसिंहवाडी “ हे पुस्तक वाचले. खरोखर हे पुस्तक म्हणजे तीर्थक्षेत्र नृसिंहवाडीचा विश्वकोश किंवा ज्ञानकोषच आहे. महाभारताविषयी असे म्हंटले जाते की, महाभारतात जे आहे ते जगात सर्वत्र आहे व महाभारतात जे नाही ते जगात कोठेही असू शकत नाही. तद्वतच मी असे म्हणेन कि, नृसिंहवाडीविषयी जी माहिती या पुस्तकात आहे ती इतरत्र कोठेही असू शकणार नाही.

पहिल्यांदा लक्ष वेधून घेते ते पुस्तकाचे मुखपृष्ठ. श्री नृसिंहसरस्वती स्वामीमहाराजांच्या गंधलिंपित मनोहर पादुका व पार्श्वभूमीवर श्री नृसिंहसरस्वती स्वामीमहाराज आशिर्वचन मुद्रेत विराजमान झालेले– बघूनच मन प्रसन्न होते. नंतर लक्ष जाते ते पुस्तकाची बांधणी व मुद्रणाकडे. हे पुस्तक हार्ड बाउंड प्रकारात उपलब्ध असून मुद्रणाची गुणवत्ता उच्चदर्जाची आहे. संपूर्ण पुस्तकात एकही मुद्रणदोष आढळून येत नाही. याचे श्रेय श्रीवामनराज प्रकाशनाला नक्कीच जाते. पुस्तकामध्ये प्रसंगानुरूप कृष्णधवल छायाचित्रे आहेतच, तसेच पुस्तकाच्या शेवटी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीशी निगडीत एकेचाळीस रंगीत चित्रांचा संच आहे. लेखकद्वयीने संदर्भासाठी वापरलेल्या ग्रंथांची सूची – जी विभाग सातवा : परिशिष्ठ्ये म्हणून अंतर्भूत आहे – त्यावर फक्त नजर टाकली तरी ऊर दडपून जातो, व लेखकांनी घेतलेल्या मेहनतीची कल्पना येते. 

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी हे मूळ वाडीचेच. ते कृषीतज्ञ असून, कृषी या विषयात त्यांनी डॉक्टरेट केली आहे. त्यांच्या पत्नी डॉ. सौ. मृणालिनी या देखील हिंदी विषयात डॉक्टरेट आहेत. दोघांचाही अध्यात्माकडे अत्याधिक ओढा असल्यामुळेच श्री दत्तगुरूंनी त्यांच्याहातून हे कार्य करवून घेतले असे म्हणावे लागेल.

पुस्तक एकूण सहा विभागांत आहे. पहिल्या विभागात दोन भाग आहेत. पहिल्या भागात वाडीमध्ये दैनंदिन केल्या जाणाऱ्या नित्य सेवेची विस्तृत माहिती आहे. अगदी पहाटे म्हणजे साडेतीन चार वाजता ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा मंत्रजागर करत सर्व गल्ल्यांमधून फेरी काढणारे दत्तभक्त (वाडीमध्ये याला ‘दिगंबरा आला’ असे म्हणतात), पहाटेची काकड आरती, पंचामृत अभिषेक पूजा, महन्मंगल महापूजा, पवमान पंचसुक्त, सायंकालीन धुपारती, रम्य पालखी सोहळा, भक्तीसुमनांची शेजारती आदींची अगदी सविस्तर माहिती आहे.

पहिल्या विभागातील दुसऱ्या भागात वाडीमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या संवत्सर सोहळ्यांची विस्तृत माहिती आहे. प्रत्येक महिन्यात वाडीत वेगवेगळी अनुष्ठाने व सोहळे साजरे केले जातात. जसे की, चैत्रात संततधार अनुष्ठान व प. प. श्री. नारायणस्वामी पुण्यतिथी उत्सव, वैशाखात भगवान श्री नृसिंह जयंती व प. प. श्री. गोपाळ स्वामी महाराज पुण्यतिथी, जेष्ठ महिन्यात प. पू . श्री. रामचंद्र योगी महाराजांचे पुण्यस्मरण, आषाढ महिन्यात प. प. श्री. टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवातील समाराधना, श्रावण महिन्यातील दक्षिणद्वार स्नान, भाद्रपद महिन्यातील भगवान श्री. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती, अश्विन महिन्यातील दसरा व श्री गुरुद्वादशी, कार्तिक महिन्यातील तुलसीविवाह व त्रिपुरारी पौर्णिमा, मार्गशीर्ष महिन्यातील भगवान श्री दत्तात्रेय जयंती, पौष महिन्यातील भगवान श्रीमन् नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जयंती, माघ महिन्यातील कृष्णावेणी उत्सव व श्री गुरुप्रतिपदा आणि फाल्गुन महिन्यातील रंगपंचमी आणि प. प. श्री. काशीकर स्वामी पुण्यतिथी. ही सर्व माहिती इतकी काटेकोर व भावगम्य आहे की  जणू आपण दैनंदिन सेवा व संवत्सर सोहळ्यांसाठी वाडीतच उपस्थित आहोत असे वाटते.

पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात वाडीतील आराध्य देवतांविषयीची माहिती आहे. यामध्ये अत्रिनंदन दत्तात्रेय, दत्त महाराजांचे प्रथम अवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ व दुसरे अवतार श्री नृसिंहसरस्वती यांचेविषयी अतिशय सविस्तरपणे लिहिले आहे. दत्त संप्रदायामध्ये ज्याला पाचवा वेद म्हंटले जाते, त्या गुरुचरित्रातील अनेक कथा व घटनांचा यात समावेश आहे.

पुस्तकाच्या तिसऱ्या विभागात गुरुचरित्रात वर्णिलेल्या घटनांपैकी ज्या घटना नृसिंहवाडी परिसरात घडल्या त्यांच्या कथा आहेत. यात श्रीक्षेत्र औदुंबर येथे घडलेली मूढ द्विजपुत्र उद्धाराची कथा, श्री क्षेत्र अमरापूर ( सध्याचे औरवाड ) येथे घडलेली घेवड्यांच्या शेंगांची कथा, गंगानुज नावाड्यावर झालेला कृपानुग्रह व त्याला घडवलेली त्रिस्थळी यात्रा, शिरोळचे दत्त भोजनपात्र, शिरोळच्या गंगाधर ब्राह्मणाचे मृत बालक सजीव करणे आदि कथा आहेत.

पुस्तकाच्या चौथ्या विभागात नृसिंहवाडीक्षेत्री जे महामहिम होऊन गेले त्यांचेविषयी अत्यंत सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये श्री रामचंद्र योगी महाराज, सद्गुरू श्री ब्रह्मानंद यतिराज, श्रीमद् गोपाळस्वामी महाराज, प. प. श्रीमन्नारायण स्वामी महाराज, श्री कृष्णानंद स्वामी महाराज उर्फ श्री काशीकर स्वामी, श्रीमद् मौनी स्वामी महाराज, श्री शांताश्रम स्वामी महाराज, प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे ) स्वामी महाराज, प. प. श्री. नृसिंह सरस्वती (दीक्षित ) स्वामी महाराज, सद्गुरू श्री सीताराम महाराज टेंबे, श्री शांतानंद स्वामी महाराज, प. पू. सद्गुरू योगीराज श्री वामनराव गुळवणी महाराज, श्री शंकर स्वामी महाराज (पातकर ) आदि महापुरुषांसंबंधी साद्यंत माहिती आहे. वरील सर्व महापुरुषांना वाडीमध्ये ‘सनकादिक’ म्हणतात व त्यांची पूजाअर्चा श्रीमन्नृसिंहसरस्वती स्वामींच्या पादुकांच्या बरोबरीने होते; यावरून त्यांची अध्यात्मिक क्षेत्रातील थोरवी लक्षात यावी. वरील सर्व महापुरुषांविषयी लेखकांनी अगदी सविस्तर माहिती दिली आहे. म्हणजे त्यांचे मूळ गांव,त्यांची जन्मतारीख,त्यांचे पूर्वज, त्यांचे गोत्र, त्यांचे शिक्षण, त्यांचे गुरु, त्यांनी केलेली गुरुसेवा, त्यांनी केलेल्या यात्रा, त्यांना आलेली दैवी अनुभूती वगैरे. हे सर्व वाचून,  लेखकांनी ही माहिती गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले असतील याची जाणीव होते. आपण वाडीला गेल्यावर वरीलपैकी काही महात्म्यांच्या समाधी पाहतो व त्यांना सवयीने नमस्कार करतो. पण सदरचे पुस्तक वाचल्यावर त्या महात्म्यांची थोरवी कळते व आपण त्यांना आदरपूर्वक नमन करतो. यातच या पुस्तकाचे यश दडले आहे.

पुस्तकाच्या पाचव्या विभागात श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतील विशेष कथा दिल्या आहेत. त्यात वाडीतील पुजारी घराण्याचे मूळपुरुष श्री. भैरंभट जेरे, दत्तभक्त रामभटांना मिळालेली सोन्याची लेखणी व श्रीमन्नारायण स्वामी महाराज यांच्या कृपेने ‘गुरुभक्त’ उपाधी प्राप्त झालेले श्री विठ्ठल ढोबळे यांच्या कथा आहेत. भैरंभट जेरे यांना श्रीमन्नृसिंहसरस्वती स्वामींच्या कृपेने उतारवयात पुत्ररत्न झाले, त्या मुलाला पुढे चार पुत्र झाले, त्या चार पुरुषांचे वंशज म्हणजेच वाडीतील पुजारी परिवार होय.

पुस्तकाच्या सहाव्या विभागात  नृसिंहवाडीचे क्षेत्रमहात्म्य वर्णिले आहे. त्यात श्रींच्या मनोहर पादुका व पादुकांवरील शुभचिन्हे, कृष्णवेणीमाता व दक्षिणद्वार सोहळा, कृष्णाघाट, ब्रह्मानंद मठ, पालखी सोहळा, सानकादिक महात्मे, औदुंबर वृक्ष, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील अष्टतीर्थे, कन्यागत महापर्वकाळ, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ‘ या अष्टदशाक्षरी मंत्राचा गूढार्थ, ‘ घोरकष्टोध्दरण ‘ स्तोत्राचा सरलार्थ व भावार्थ, प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे ) स्वामी महाराजांची ‘प्रश्नावली’ व नृसिंहवाडीतील पुजारीजनांची थोरवी आदि विषयांचा विस्तृत परिचय करून देण्यात आला आहे.

सर्वार्थाने हे पुस्तक अत्यंत वाचनीय व संग्राह्य आहे.

||श्री गुरुदेव दत्त||

परिचयकर्ता : श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ फिन्द्री… सुश्री सुनीता बोर्डे ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? पुस्तकावर बोलू काही?

☆ फिन्द्री… सुश्री सुनीता बोर्डे ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

कादंबरी – फिन्द्री

लेखिका – सुनीता बोर्डे

प्रकाशक – मनोविकास प्रकाशन

किंमत – ३५० रू.

पृष्ठ संख्या – ३०३

…मला ही कादंबरी अशी भावली…वंदना अशोक हुळबत्ते

“फिन्द्री” या नावाचे आकर्षण वाटलं होतं.कोणता विषय,कसा मांडला असेल या कादंबरीत? या उत्सुकते पोटी मी ही कादंबरी वाचायला घेतली.कादंबरी वाचताना मी वेगळ्या विश्वात गेले.जे कथानक कादंबरीत वाचत होते ते सारे कल्पनेच्या पलीकडेचे होते. असं काही आपल्या आसपास घडत असते, ते ही विसाव्या शतकात हे ही पचण्यासारखे नव्हते.

संगीता ही या कादंबरीची नायिका.ही कादांबरी सत्य कथेवर आधारित असावी असे वाटते.तसा कुठे उल्लेख कादंबरीच्या प्रस्तावनेत वा मनोगतात नाही.पण कादंबरीत आलेले वर्णन आणि दाखले या वरून ती कथा सत्य असावी असे वाटते. स्त्री शिक्षणासाठी अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रात, शाहु,फुले, आंबेडकराची परंपरा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी नायिकेला किती संघर्ष करावा लागला हे या कादंबरीतून अधोरेखित होते.गावाकुसा बाहेरील दलित वस्तीचे,समाज जीवनाचे, जातपातीचे, तिथल्या विचारसरणचे,तिथल्या राहणीमानाचे,तिथली बोली भाषाचे आणि तिथल्या शिव्याचे देखिल यथोचित वर्णन लेखिकेने  केलं आहे.

या कादंबरीतील नायिकेचा बाप,हाच खरा या कादंबरीचा खलनायक आहे.मुले आईबापांच्या छत्रछायेत सुरक्षित असतात.मुलाच्या यशात आई-बाप सुख मानतात.मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे,उज्ज्वल यश मिळवावे असे प्रत्येक आई-बापाला वाटत असते. पण या कादंबरीतील बाप, मुलांना प्रेमच देत नाही.उलट मुलीचा जन्म नाकारतो‌.तिला नकुशी ठरवतो,तिचा दुष्वास करतो,तिच्या शिक्षणात काटे पेरतो,तिचे शिक्षण थांबवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करतो.एखादा सुखाचा क्षण कुटूंबात येतोय असे वाटत असतानाच बापच त्यांची माती कशी करतो.त्यांच्या उमेदीवर पाणी कसे फिरवतो.हे सारे प्रसंग लेखिकेने अतिशय ताकदीने मांडले आहे.हे प्रसंग वाचताना समोर घटना घडत आहेत असे वाटते. स्वत:ला घराचा कर्ता पुरुष समजणारा बाप मात्र कोणतेच कर्तव्य पार पाडत नाही. बायको म्हणजे आपली हक्काची वस्तू,रोज तिला दिवस रात्र राबवून घेतो आणि सकारण, विनाकारण रोज बडवतो.हाच त्याचा पुरूषार्थ.ती ही मार निमुट पणे सहन करते तेव्हा तिचा राग ही येतो. बायको आणि जनावर यात त्याला भेद वाटत नाही. इतके हाल करतो तिचे. तिच्या जीवाची पर्वा नाही त्याला. मुले बापाला भितात. भिऊन सश्या सारखी आईच्या पाठीमागे लपतात. तेव्हा बापाच्या माराचा प्रसाद त्यांना ही मिळतो.मुलीच्या शिक्षणात अडथळे आणतो. संगीताने बारावीची परीक्षा देऊ नये म्हणून हा दारूडा बाप तिची पुस्तके विहिरीत टाकतो.तरी ती काॅलेज मध्ये पहिली येते तेव्हा तो तिला मारतो तेव्हा त्या बापाच्या विचारसरणी ची कीव करावीशी वाटते.  अशा बापा कडून मुलांनी प्रेमाची काय अपेक्षा ठेवावी.

मुलीच्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत पुरूष प्रधान संस्कृतीतील नवऱ्याशी दोन हात केलेल्या एका आईची ही कहाणी आहे.लढा आहे.आपल्या आई विषयी नायिकेला आदर आहे.तीआईला गुरू मानते.आईची शिकवण सांगताना लेखिकेने खुप चांगले विचार मांडले आहेत.ती आईच्या भाषेत म्हणते “कढीपत्याचे झाड बी बाईच्या जातीवाणीच! किती बी छाटा,लगीच धुमारे फुटात्यात त्याला,गरजे पेक्षा ज्यादा वाढायला लागला का फांद्या छाटल्याच म्हणून समजा!निऱ्हे चोखायचं,फेकायचं.खर तर तिच्या शिवाय सवसाराला चव नुसतीच पण तरी तिलाच साम्द्यात आधी फेकायला तयार असतात सारे.”स्त्री जाती विषयीचे एक तत्वज्ञान च सांगितले आहे

“आईच्या डोक्यावरच्या चुंबळी पेक्षा खरे तर तिच्या मनाची चुंबळ जास्त पक्की होती, म्हणूनच आई एकाच वेळी इतकी सारीओझी पेलू शकत असावी.” आई विषयी चे हे निरिक्षण सर्व  स्त्री वर्गाला लागू होते.

लेखिकेने प्रत्येक प्रकरण विचार पुर्वक लिहिले आहे.प्रत्येक प्रकरणातून एक विचार दिला आहे.गोधडी,बाभळीच्या काटा,दात काढणे,हे आणि या सारखे विषय एकेका प्रकरणातून सुंदर मांडले आहेत कुठे ही ओढाताण दिसत नाही. विषय सहज आला आहे.प्रत्येक प्रकरणातून कथानक पुढे जात राहते.वाचताना कंटाळा येत नाही.बोली भाषेतील किती तरी नव्या  शब्दाचा परिचय होतो.

आपण ज्या परिस्थितीत राहून नवराचा अन्याय सहन केला ती वेळ आपल्या मुलीवर येऊ नये म्हणून एका आईने जीवाचे रान कलेली ही कादंबरी आहे.याच कादंबरीत लेखिका म्हणते “खरंच,भाकरी हा असा गुरू आहे.जो धडा शिकवायला ,माणसाला शहाणं करायला त्याचं वय पहात नाही. भुकेची तीव्रता अन् भाकरीची कमतरता या दोन निकषांवर कोणत्याही वयाचा विद्यार्थी भाकरीच्या  विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ शकतो.”

समाज व्यवस्थेवर,जातीपातीवर विचार करायला लावणारी,पुरूष प्रधान संस्कृती झुगारून देण्यास प्रवृत्त करणारी ही कादंबरी अनेक प्रश्न मनात निर्माण करते. अज्ञान आणि अन्याय हाच विकासातील मोठा अडसर आहे.तो दूर केला पाहिजे हा विचार देणारी ही कादंबरी आहे.दलित समाजातील मुलीच्या शिक्षणाच्या प्रश्नला या कादंबरीतून वाचा फोडली म्हणून मी लेखिका सौ.सुनीता बोर्डे यांचे हार्दिक अभिनंदन करते.सर्वानी ही कादंबरी वाचावी अशी अपेक्षा करते.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “पाचा ऊत्तरी सफल  संपूर्ण” – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“पाचा ऊत्तरी सफल  संपूर्ण” – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव: पाचा ऊत्तरी सफल  संपूर्ण

लेखिका:उज्ज्वला केळकर 

प्रकाशक:अरिहंत पब्लीकेशन

प्रथम आवृत्ती: १२जानेवारी २०२०

पृष्ठे:१९१

किंमत: रु २९०/—

पाचा उत्तरी सफल संपूर्ण..

उज्ज्वला केळकर यांचं पुस्तक हाती पडलं की ते कधी वाचते असेच होऊन जाते. पाचा ऊत्तरी सफल संपूर्ण हा कथासंग्रह वाचला आणि त्यावर भाष्यही करावेसे वाटले म्हणूनच हा लेखन  प्रपंच!!

या कथा संग्रहात एकूण १४कथा आहेत. विविध विषय त्यांनी या कथांतून हाताळले आहेत. काही हलक्या फुलक्या विनोदी कथाही यात आहेत. हसवता हसवता त्याही विचार करायला लावतात. सामान्य माणसाचे मन, विचार, जीवन याभोवती गुंफलेल्या या कथा खूप जवळच्या वाटतात.

त्यापैकी काही कथांविषयी… 

१. पाचा उत्तरी सफल संपूर्ण.. ही संपूर्ण कथा फ्लॅश बॅक मधे आहे. माई या या कथेच्या नायिका आहेत. मुले, सुना नातवंडं असा सुखाने एकत्र नांदणारा त्यांचा परिवार आहे. एक सुखवस्तु, कष्टकरी सधन सुखी परिवार. माईंना नुकताच, त्यांच्या समाजसेवेची दखल घेणारा प्रेरणा हा पुरस्कार मिळाला आहे. आणि त्या निमीत्ताने त्या गतकाळात, आठवणीत रमत त्यांच्या घटनात्मक आयुष्याचा आढावा घेत ही कहाणी उलगडत जाते.

बालपण, विवाह, सांसारिक जबाबदार्‍या, मुले, शिक्षणं, व्यावसायिक प्रगती अशा साचेबंद आयुष्यात घडणार्‍या अपघात, पतीनिधन, फसवणुकीसारख्या नकारात्मक घटनांचंही निवेदन आहे. आणि या सर्व पार्श्वभूभीवरचे माईंचे कणखर, सकारात्मक, प्रभावी व्यक्तीमत्व .. आणि त्याची ही बांधेसूद, सूत्रबद्ध कथा. सुख आले दारी हे सांगणारी साठा उत्तराची,पाचा उत्तरी सफल संपूर्ण झालेली कहाणी,वाचकाला आनंदच देते…

२.  जन्म पुनर्जन्म..  मरणाला भोज्जा करताना होणारी मानसिक अंदोलने ,उज्ज्वलाताईंनी या कथेत अनुभवायला लावली. जन्म आणि मरण यातले अंतर, त्यांचं नैसर्गिक नातं, ती भोगणारी व्यक्ती आणि भवताल याचं  संतुलन, अत्यंत प्रभावीपणे कथीत केलं आहे. पुनर्जन्माची एक वेगळी वास्तव कल्पना आहे ही. बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्मच.. त्याविषयीची ही वेगळीच कथा.

३. तृप्त मी कृतार्थ मी.. शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या पती पत्नींची ही कथा सुखद आहे.बाल कीर्तनकाराच्या रुपात नातु आपल्या आजी आजोबांची जीवनकथा त्यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने कथन करतो.हा या कथेचा साचा. त्यातून सरकत जाणारी कथा वाचकाला गुंतून ठेवते. कथेचा विषय निराळा नसला तरी  मनाला सकारात्मक उर्जा देते..

४. मधु.. कथा तशी लहान पण सकारात्मक. नशीबाचे अनंत फेरे सोसल्यानंतर अखेर चांगले दिवस येतात. मधुचा झालेला कायापालट या कथेत लेखिकेने सुरेख पद्धतीने मांडला आहे.

५. कृष्णस्पर्श.. अतिशय सुंदर कथा. माई— कुसुम यांची ही कथा. कीर्तन हा माईंच्या एकाकी जीवनाचा आधार. अचानक कुसुमसारखी कुरुप वेंधळी बावळट, शून्य आत्मविश्वास असलेली व्यक्ती त्यांच्या नि:संग जीवनात येते. दिव्यत्वाचा साक्षात्कार देणारा सूर मात्र कुसुमच्या गळ्यात असतो. माईंना ती कीर्तनात ती साथ देउ लागते. आणि एक दिवस कृष्ण कुब्जेच्या कथेचं निरुपण करत असताना ही कुरुप कुस्मी संगीताचा स्वर्गीय, दिव्यभक्तीचा असा काही अविष्कार दाखवते की स्वत: माईंनाही कृष्णस्पर्शच झाल्याचे जाणवते. आणि त्या दिवसापासून माईंचे आणि तिचे नातेच बदलते. अतिशय सुरेख, तल्लीन करणारी भावस्पर्शी कथा.

६. हसीना.. काहीशी मनोविश्लेषणात्मक, मनाला चटका लावणारी कथा. हसीना नावाच्या एका रुपवान तरुण मुलीची ही कथा. तिचे बालपण, तिच्या आयुष्यात येणारे पुरुष आणि त्यांच्याभोवती गुंतलेलं तिचं भावविश्व हे वाचकाच्या  मनाला कधी सुखावतं. कधी टोचतं.  हसीनाच्या मनातील अंदोलने लेखिकेने चपखल टिपली आहेत.

७.  सुखं आली दारी.. ही कथा वाचल्यानंतर पटकन् मनात येतं असंही होऊ शकतं. ही कथा मनाला आनंद देते. शिवाय या कथेत जसे योगायोग आहेत तसा एक छुपा संदेशही आहे.

जीवन प्रत्येक टप्प्यावर बदलत असते. सुखी होण्याचे अनेक पर्यायही असतात. अशा पर्यायांचा विचार केला,स्वीकार केला तर आयुष्यातल्या, उणीवा, खड्डे भरुन काढता येतात. विकतचं शहाणपण, स्वर्गलोकात ईलेक्शन, एक (अ)विस्मरणीय प्रकाशन समारंभ या तीनही विनोदी कथा आहेत. थोडी विसंगती, कल्पकता, विडंबन, काहीशी  अवास्तविकता या तीनही कथातल्या वेगवेगळ्या घटनांमधून वाचताना हंसु तर येतेच पण सामान्य माणसाच्या आयुष्यात अनुभवायला येणार्‍या दुनियादारीने धक्केही बसतात.

अशा वेगवेगळ्या रस, रंग भावांच्या या कथा. सुंदर लेखन. हलक्या फुलक्या पण विचार देणार्‍या. सर्वच कथा वाचनीय आहेत. त्यापैकी काही कथांचाच मी या लेखात आढावा घेतला.

सर्वांनी हा पाचा उत्तरी सफल संपूर्ण हा कथासंग्रह जरुर वाचावा आणि दर्जेदार साहित्याचा अनुभव घ्यावा.

उज्ज्वलाताईंचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या साहित्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ साईड इफेक्ट्स… सुश्री नीलम माणगावे ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

?पुस्तकावर बोलू काही?

☆ साईड इफेक्ट्स… सुश्री नीलम माणगावे ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

साईड इफेक्ट्स-Side Effects by Nilam Mangave ...

पुस्तक परिचय 

पुस्तक–“साईड इफेक्ट्स”

लेखिका — सुश्री नीलम माणगावे 

प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन

पृष्ठे – २९८

किंमत – ३५० रू

“साईड इफेक्ट्स” ही कादंबरी मला अशी भावली……वंदना अशोक हुळबत्ते

नीलम माणगावे यांची ” साईड इफेक्ट्स” ही कादंबरी दोन दिवसात वाचून झाली.एकदा कादंबरी हातात घेतली ती वाचूनच खाली ठेवली.ही ‌कादंबरी एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. कादंबरी वाचताना आपण कादंबरीतील व्यक्तिरेखेचे बोट धरून चालू लागतो.त्यांच्या सुखदुःखात एकरूप होतो.आपण कादंबरी वाचत आहोत हे विसरतो.आपण एक चित्रपट बघत आहोत असा भास निर्माण होतो.कादंबरीच्या प्रस्तावनेत लेखिका सांगतात साधारण १५-२० वर्षांपूर्वी वर्तमान पत्रातून आलेल्या वेगवेगळ्या गावात घडलेल्या दोन बातम्यांनी मी हादरले त्याच वेळी या कथेचे बीज मला सापडले.या कादंबरीशी त्या बातम्यांचा संबंध फक्त निमित्तमात्र आहे. बाकी व्यक्तिरेखा काल्पनिक आहे.पण कादंबरी वाचताना कुठेही या   व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत असे वाटत नाही.स्त्रियांची होणारी कुचंबणा शहरात काय खेड्यात काय सगळीकडे सारखीच.तिच्या भावनांना, तिच्या मताला, तिच्या म्हणण्याला किंमत असतेच कुठे? ती किती ही  शिकली,तिने नोकरी केली,ती स्वतंत्र असली तरी, तिला पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही.तिचा पाय संसारात, घरात मुलांच्यात, रुढी परंपरेत अडकलेला असतो. स्त्रिया कधी आपलं मत स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. खेड्यात तर तिला घराबाहेर पडताना ही सासू, सासरे ,नवरा ,दीर ,मुले ,यांना विचारावे लागते. स्त्रियांच्या साध्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर अशावेळी लैंगिक सुखाच्या तिच्या कल्पना ती कुणा समोर बोलणार? तिची तळमळ कुणाला समजणार? तिच्या मनाचा, समाधानाचा, विचार कोण करतो ?

सुश्री नीलम माणगावे

या कादंबरीत जयराम या एका पुरूषा सोबत अनेक स्त्रिया राजीखुशीने कशा काय संबंध ठेवतात? हे कृत्य करण्यासाठी त्या का तयार होतात? कश्या तयार होतात? हे लेखिकेने अतिशय ओघवत्या शैलीत  मांडले आहे.

परपुरषाशी विवाहबाह्य संबंध. हा विषय अतिशय संवेदनशील. या बद्दल तोंड उघडून बोलण्याची हिम्मत होत नाही. चार चौघात बोलतानासुद्धा आपल्याला कोणी ऐकत नाही ना? बघत नाही ना ? ऐकले तर काय म्हणतील ? यांची काळजी घेतली जाते अशावेळी या विषयावर उघड उघड कादंबरी लिहिणे म्हणजे शिवधनुष्य पलण्यासारखे होते. सिद्धहस्त लेखिका नीलम माणगावे यांनी हे शिवधनुष्य पेलले. कादंबरीचा विषय बंडखोर आहे.विषय वाचून हा विषय कसा मांडला असेल या बद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

स्त्री मनाची होणारी घुसमट,तिचा एकटेपणा, शारीरिक संबंधांचे आकर्षक, शारीरिक झळ,विवाहबाह्य शरीरिक संबंध हे कादंबरीतील व्यक्तिरेखेच्या मांडणीतून, संवादातून उलगडत जाते. स्त्री मनाची दाहकता समाजासमोर हळुवार पद्धतीने मांडण्यात लेखिकेला यश मिळाले आहे.

गावातील सगळ्या बायका मिळून जयरामला ठेचून मारतात. तेव्हा गावात एकच वादळ उठते. अनेक स्त्रियांचे जयरामशी  संबंध होते हे जेव्हा कुटूंबा समोर आले, समाजा समोर आले.तेव्हा कुटुंबे उध्वस्त झाली. स्त्रियांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले, माणसे कोलमडून पडली, मुलींची ठरलेली लग्ने मोडली, प्रत्येकजण आपल्या घरातील स्त्रीला संशयाने बघू लागला. एका घटनेचे गावात झालेले हे साईड इफेक्ट्स वाचकाला हादरून सोडतात.हे का झाले? कसे झाले? पुढे काय ? यात वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या लेखणीत दिसून येते.

कादंबरीत कुठेही अतताई पण दिसत नाही, कुठे ही आक्रोश दिसत नाही, कुठे ही बंड दिसत नाही. तरी ही सकारात्मक विचार करण्यास ही कादंबरी भाग पाडते लग्न झालेल्या पुरुषांनी अनेक स्त्रियांबरोबर संबंध ठेवले तर त्यात समाजाला काही  वावगे वाटत नाही आणि त्या पुरूषाला माझे काही चूकले आहे,हे लाजिरवाणी जीवन संपवले पाहिजे, मी आत्महत्या केली पाहिजे असे काही वाटत नाही. समाज या गोष्ट स्विकारतो. पण हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत घडली तर  मात्र नवऱ्यापासून समाजापर्यंत सगळे तिला कुल्टा समजतात, तिच्या जगण्याचा अधिकार नाकारता, तिला शब्दांनी टोचून टोचून घायाळ करतात, तिचे जीवन नरक बनवतात,अश्यावेळी आत्महत्ये शिवाय तिच्या पुढे  कोणताच पर्यायच शिल्लक राहत नाही. समाजात पुरुषांना आणि स्त्रियांना वेगळा न्याय का ?

विवाहबाह्य संबंध चांगले नाहीत त्याचे समर्थन लेखिका ही करत नाही पण “आज्ञत्महत्या करण्याएवढी ही मोठी गोष्ट नाही मोठी गोष्ट नाही”हे समजून घेतले पाहिजे. तिला समजून घेतले पाहिजे,तिचा संसार वाचला पाहिजे,ती जगली पाहिजे. हा विचार लेखिकेने कादंबरीत प्रकर्षाने मांडला आहे.यासाठी लोकप्रबोधन  सर्वात महत्त्वाचे आहे.

एखादी  घटना घडली तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात त्याचे परिणाम जास्त परिणामकारक दिसतात.गावाचे जनजीवन ढवळून निघते.सारा गाव कसा होरपळून निघतो. हे लेखिकेने कादंबरीत दाखवले आहे.

नीलम माणगावे यांचे मी अभिनंदन करते इतका गंभीर विषय किती सहजतेने सोप्या पद्धतीने कादंबरीत मांडला आहे या कादंबरीतील व्यक्तिरेखा, त्यांची भाषा, त्यांचं वावरणं, सारे एका मर्यादेत आहे कुठेही बीभत्सपणा आढळत नाही, प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याचे सामर्थ्य लेखणीत आहे म्हणून कादंबरी सलग वाचली जाते पुढे काय होईल, पुढे काय होईल, ती अशी का वागली, तिचे पुढे काय होणार, हे प्रश्न पडतात आणि ते सोडवण्यासाठी आपण पुढे वाचत राहतो.

प्रिया आणि प्रतिभा ही प्रकरणे या कादंबरीचा गाभा आहे. कोलमडलेले गाव आणि उध्वस्त झालेली मने पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड महत्वाची आहे. जीव अनमोल आहे. जीव वाचला पाहिजे. जगणं महत्त्वाचं आहे हेच या कादंबरीचे सारं आहे असे मला वाटते.

एक वाचक म्हणून मला ही कादंबरी जशी भावली तसे मी माझे मत मांडले.साईड इफेक्ट्स ही कादंबरी ग्रामीण जीवन अधोरेखित करणारी आहे. विवाहबाह्य संबंधा बाबत ग्रामीण महिला कसा विचार करतात हे ही कादंबरीतून स्पष्ट होते. स्त्री माणूस आहे. ती चुकू शकते. तिने नकळत चूक केली तर चूक सुधारण्याची संधी तिला ही मिळाली पाहिजे. हे समाजाने, पुरूष वर्गाने समजून घ्यावे ही प्रांजळ इच्छा लेखिकेने कादंबरीतून मांडली आहे.

ह्या कादंबरी वर चांगला चित्रपट तयार होईल. ही कादंबरी समाजाला एक नवा विचार देईल असे वाटते. तो विचार पचविण्याची ताकद वाचकांच्या असावी म्हणजे झालं.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘शिदोरी’ – सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘शिदोरी’ – सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

पुस्तकाचे नाव :शिदोरी

लेखिका: सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे

किंमत रू.240/-

संपर्क:9423029985

☆ शिदोरी – भावनांच्या मंजि-यांनी बहरलेली काव्य वृंदा – सुहास रघुनाथ पंडित ☆

सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे यांचे ‘शिदोरी’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात बत्तीस ललित लेख व पन्नास कविता आहेत. पहिला विभाग हा लेखांचा आहे व दुसरा विभाग हा कवितांचा काव्य मंजिरी या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. आज आपण काव्य मंजिरी तील कवितां विषयी जाणून घेऊ.

काव्य-मंजिरी हा  काव्यसंग्रह येण्यापूर्वी त्यांनी गद्य व पद्य लेखन केलेले आहे. त्यामुळे लेखनकला ही काही त्यांच्यासाठी नवीन नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छितात. त्यामुळे मनात जसे तरंग उठतील तसे त्यांना शब्दरूप देऊन त्या लेखन करू शकतात. मनाची संवेदनशीलता त्यांना काव्य लिहिण्यास उद्युक्त करते. हे मन एके ठिकाणी स्थिर न राहता सर्वत्र भिरभिरत असते आणि सारे काही टिपून घेते.  मग त्यांच्या कवितेतून निसर्ग फुलतो, कधी भक्तीचे दर्शन होते,कधी कुटुंबवत्सलता दिसून येते, कधी जीवनविषयक दृष्टिकोन व्यक्त करते, कधी चिंतनशील मनाला मोकळे करते, तर कधी वर्तमानाची दखल घेते.एखाद्या कॅनव्हासवर वेगवेगळे रंग उधळावेत आणि त्याच्या मिश्रणातून एक आकर्षक कलाकृती तयार व्हावी त्याप्रमाणेच या काव्य तुलसीच्या शब्द मंजि-या फुलून आल्या आहेत.

या काव्यसंग्रहात आपल्याला विविध विषयांवरील कविता वाचायला मिळतात. देशभक्ती बरोबरच ईश्वरावरील श्रद्धाही दिसून येते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात लिहीलेली ‘स्वातंत्र्यदिनी स्मरण’ ही कविता किंवा तिरंगा, स्व. सावरकर या कविता मनातील देशप्रेमाची साक्ष देतात. तर गणपती, विठूमाऊली यांच्याबरोबरच सांगलीजवळील बागेतील गणपती मंदिराचे त्यांनी केलेले वर्णन डोळ्यासमोर चित्र उभे करणारे आहे. ‘कृष्ण वेडी’ ही कविता तर भक्तीमय प्रेमकाव्याचा सुंदर नमुनाच आहे.  

वर्तमानात घडणा-या घटनांची नोंदही त्यांनी घेतली आहे. कोरोनाग्रस्त काळामध्ये सहन कराव्या लागणा-या परिस्थितीचे, समस्यांचे यथार्थ वर्णन करून त्यातून बाहेर पडण्याचा आशावादही त्या व्यक्त करतात.

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

कवयित्री या जीवनाविषयी आशावादीच आहेत. मनावरची उदासीनतेची काजळी निघून जाईल असा विश्वास त्यांना वाटतो. उगवतीच्या सूर्याकडे पाहून, ठप्प झालेल्या समाजजीवनाला संयम सोडू नकोस असा धीर त्या देतात. श्रावणाची चाहूल लागताच त्यांना खात्री वाटते की ‘एक दिवस नक्की येईल, पूर्ववत होता तसा’. मृत्यूच्या छायेखाली गुदमरणारा श्रावण अनुभवताना त्यांना बालकवींचा श्रावणही आठवतो हे त्यांच्या जीवनावरील श्रद्धेचे प्रतिक आहे.

कवयित्रीच्या हातून स्त्रीसुलभ कुटुंबवत्सलता स्त्रवली नाही तरच नवल! नात्यांच्या रेशीमधाग्यात शब्द गुंफून सजलेल्या त्यांच्या कविता आजी होण्याचा आनंद व्यक्त करतात, आजी आणि नात यांच्या नात्यातील भावविश्व दाखवतात आणि नव्या पिढीबरोबर जुळवून घेण्याची तयारीही दाखवतात. मग ही कविता तीन पिढ्यांची होऊन जाते.

जीवन विषयक भाष्य करणा-या त्यांच्या कविताही वाचनीय आहेत. मनाच्या भोव-याला दैवाची गती मिळत असते. त्यामुळे जगत असताना पराधिनता ही असतेच असे सुचवणारी ‘भोवरा’ कविता असो किंवा ‘माती असशी, मातीत मिसळशी’ या उक्तीची आठवण करून देणारी ‘आयुष्याची उतरंड’ ही कविता असो, जीवनावर केलेले भाष्य हे सात्विक आस्तिकतेतूनच आले आहे हे जाणवते. ‘पिंपळ’ या कवितेतही मनाला दिलेली पिंपळाची उपमा किंवा आठवणींची घरटी या कल्पना नाविन्यपूर्ण वाटतात. याच कवितेतील

आसक्तीची मुळं इतकी

घट्ट रूजली आहेत भूमीत

की त्यांना जाणीव नाहीये

अस्तित्व धोक्यात आल्याची

या काव्यपंक्तीतून मानवी मनाची नेमकी अवस्था त्यांनी सांगितली आहे. ‘भरजरी शालू’ या कवितेतून तर त्यांनी आयुष्याचा आलेखच मांडला आहे.

आत्ममग्नता,चिंतनशिलता हा तर कविचा उपजत गुणधर्म. याच चिंतनशिलतेतून, असं असलं तरी, मन क्षेत्र, विसाव्याचे क्षण, मन तळं यासारख्या कविता जन्माला आल्या आहेत.विचारांच्या मंडलात मती गुंग होत असताना नेमके शब्द सापडले की कविता कशी जन्माला येते हे ही त्यांनी ‘कवितेचा जन्म’ या कवितेतून सांगितले आहे.

रसिक मनाला खुणावणारा,चारी बाजूला पसरलेला निसर्ग कविमनाला स्वस्थ बसू देईल का? अनेक सुंदर निसर्ग कवितांची निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे. केवळ निसर्ग वर्णन न करता त्यांनी काही ठिकाणी त्याचा संबंध मनाशी जोडला आहे. मनरूपी तुळशीला येणा-या विचाररूपी मंजि-या या त्यांच्या भावुक मनाचे प्रतिकच आहेत. ‘ॠतुंची फुलमाला’ ही एक नितांत सुंदर निसर्ग कविता आहे. निसर्गात बहरणारा प्रत्येक ऋतू मनही बहरवून टाकतो हे प्रसन्न मनाचे द्योतक आहे.एकीकडे सागराची साद ऐकताना त्याना समोर साहित्य सागरही दिसू लागतो. साहित्याच्या अथांगतेची जाण असणे म्हणजेच भविष्यकाळात या साहित्य सागरातील मोत्यांचा त्यांना शोध घ्यायचा आहे याची कल्पना येते. उनझळा, पावसास, रंगपंचमी या निसर्ग कविताही सुंदर दर्शन घडवतात. शब्दझरे या कवितेतून निसर्गातील सौंदर्य शब्दातून खुलवून शब्दांचे मोती बनवण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद वाटतो.

काव्याचा असा रसास्वाद घेताना, सौ. सहस्त्रबुद्धे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी यापूर्वी कविता लेखन केले आहे. आता काव्यसंग्रह काढून पुढचे पाऊल टाकले आहे.संवेदनशीलता आणि भावनाशीलता याबरोबरच त्यांनी काव्याकडे अधिक अभ्यासू वृत्तीने पाहिल्यास त्यांच्याकडून वृत्तबद्ध कविताही लिहून होतील असा विश्वास वाटतो. विषयांची आणि काव्यप्रकारांची विविधता त्यांच्या काव्यलतेला बहर आणत आहे. यापुढील काव्यसंग्रहात त्यांनी नवीन वाटा धुंडाळल्या आहेत याचा अनुभव वाचकांना यावा अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या साहित्य प्रवासास शुभेच्छा!!.

© सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ सैनिक हिमालयाचा… कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त) ☆ परिचय – सुश्री अलकनंदा घुगे आंधळे ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ सैनिक हिमालयाचा… कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त) ☆ परिचय – सुश्री अलकनंदा घुगे आंधळे ☆

No photo description available.

कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त)

पुस्तकाचे नाव : “सैनिक हिमालयाचा “

लेखक : कर्नल शरदचंद्र पाटील ( निवृत्त ) 

प्रकाशक : अनुकेशर प्रकाशन 

पृष्ठसंख्या : २२८ 

किंमत :    रु. ३५०/-

(या पुस्तकातून मिळणारा सर्व नफा लेखक,  “आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड” निधीला प्रदान करणार आहेत, तेव्हा हे पुस्तक खरेदी करून आपण फूल न फुलाची पाकळी या निधीसाठी मदतच करणार आहोत..एक प्रकारे देशसेवाच  आपल्या हातून घडणार आहे. तेव्हा कृपया सर्वांनी पुस्तक खरेदी करून वाचावे..ही विनंती ..)

तरुणपणी अक्षय कुमारचा सैनिक नावाचा चित्रपट पाहिला होता. त्यानंतर बॉर्डर..चित्रपटांमधून सैनिक फक्त गरजेनुसार दाखवला जातो; खरी थीम तर लवस्टोरीच असते.. अलीकडे आलेले सत्य घटनेवरील काही चित्रपट याला अपवाद आहेत. या चित्रपटातून सैनिक मला जितका समजला नाही, तितका परवाच वाचलेल्या एका पुस्तकातून समजला. पुस्तकाचे नाव आहे, ‘सैनिक हिमालयाचा’.. आणि लेखक आहेत निवृत्त कर्नल शरदचंद्र पाटील..

चित्रपट पाहताना एक गोष्ट माईंडमधे सेट असते की, समोरचा सैनिक हा सैनिक नसून फक्त एक्टिंग करतोय. अनेक रिटेक घेऊन त्याने प्रत्येक सीन शूट केलेला असतो. मात्र वास्तवात सैनिकांच्या आयुष्यात त्यांना प्रत्येक सीन एकदाच, एका शॉटमधे ओके आणि सक्सेसफुल करायचा असतो. हाच फरक आहे चित्रपटातून सैनिक बघण्यात आणि प्रत्यक्ष पुस्तकातून सैनिक समजण्यात..

अलीकडेच प्रकाशित झालेले हे पुस्तक नुसते पुस्तक नसून, एका सैनिकाचे आत्मवृत्त आहे. एका सैनिकाने वाचक आणि भारतीय जनतेशी साधलेला संवादच आहे. २६ – २७ वर्षाच्या सैनिकी आयुष्यात लेखकाने दहा अकरा वर्षे हिमालयात घालवली. आजही लेखकाला हिमालय साद घालतो. आणि खरं सांगू का? पुस्तक वाचताना मी ही कित्येक वेळा मनोमन हिमालयात जाऊन आले. इतका जिवंतपणा लेखनातून जाणवला. प्रसंग चांदण्या रात्रीचे असोत, अंधाऱ्या रात्रीचे असोत, हिमवृष्टीचे असोत किंवा हिमस्खलनाचे असोत.. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जसाचा तसा उभा करण्यात लेखकाने कमालीचे यश मिळवले आहे. बर्फाच्या गुहेत अडकलेला प्रसंग असो किंवा राहत्या बंकरवर कोसळलेल्या महाकाय शिळेचा प्रसंग असो; केवळ नशीब बलवत्तर म्हणून लेखक जिवंत राहतात.. हे वाचून मन विषण्ण होते. कसे राहत असतील हे सैनिक जीवावर उदार होऊन..? सियाचीन हिमनदीसारख्या मृत्यूच्या जबड्यात जाऊन देशसेवा करण्याचे धैर्य या सैनिकांच्या अंगी कुठून येत असेल देव जाणे ..! तीन महिने दाढी न करता, केस न कापता,अंघोळ न करता? बर्फात 24 तास थंडी आणि  हिमवृष्टीशी युद्ध तर चालू असते या सैनिकांचे..!  मी तर आत्तापर्यंत समजत होते, सियाचीन हे नाव चीनच्या नावावरून पडले असेल, पण तसे नाही..तिबेटी भाषेत ‘सिया’ म्हणजे ‘गुलाब’ आणि ‘चेन’ म्हणजे ‘मुबलक’..सियाचेन म्हणजे ‘मुबलक गुलाबांची जागा’.. हे या पुस्तकातूनच उलगडले.. ऑफिसर्स मेस म्हणजे सामान्य जनतेच्या दृष्टीने चैनीची जागा, पण तसे नाही..हवामानाशी जुळवून घेण्याची कला म्हणजे अॕक्लमटायझेशन..अशा कित्येक सैनिकी संकल्पना जाणून घ्यायच्या असल्यास पुस्तक वाचावे..आतापर्यंत दोन दंश माझ्या परिचयाचे होते. एक म्हणजे सर्पदंश आणि दुसरा म्हणजे विंचूदंश.. पण हिमदंश पण असतो हे पुस्तक वाचून कळले.. हाताच्या बोटाचा सतत बर्फाशी संपर्क येऊन बोटांची संवेदनाच निघून जाते. प्रसंगी बोटे कापावीही लागतात. बोटावर निभावले तर ठीक, नाही तर मृत्यूही येऊ शकतो..इतका कठीण असतो हा हिमदंश.. खरेच या आणि अशा कित्येक गोष्टी लेखकाने या पुस्तकात जीव ओतून लिहिल्या आहेत.

कॅप्टन कपूर यांच्या जीवावर बेतलेला हिमस्खलनाचा, त्यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेला प्रत्यक्ष अनुभव वाचून तर अंगावर काटा उभा राहतो.सिक्कीमच्या जंगलातील जळवांचा हल्ला असो वा हिमालयातील प्रत्येक ठाण्यावर पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत असो; या सैनिकांच्या जिद्द, चिकाटी आणि धैर्याला सलाम करावासा वाटतो..

कश्मीर फाईल्स जर समजून घ्यायची असेल तर एका सैनिकाइतकी ती कोणीच मांडू शकत नाही. त्यासाठी तरी हे पुस्तक अवश्य वाचावे, असे मी म्हणेन..जागोजागी वापरलेली कृष्णधवल आणि रंगीत छायाचित्रे पुस्तकाच्या आशय-विषयाचे सौंदर्य वाढवतात. दारूगोळ्याची साफसफाई, हिमनदी, सफरचंदाच्या बागांची चित्रे खरोखर पाहण्यालायक आहेत..मधेमधे प्रसंगानुरूप लिहिलेल्या गज़ला लेखकाच्या साहित्यिक प्रतिभेची ओळख करून देतात.. खरे तर अशी पुस्तके सैनिकाकडून लिहिणे जाणे आवश्यक आहे, जेणेकरून सैनिकांविषयी सामान्य जनतेच्या मनात आदर निर्माण होईल आणि तरुण वर्ग सैनिक होण्याकडे प्रवृत्त होईल..सैनिक कोणत्या हालअपेष्टातून जातात, ते ही सर्वांना कळेल..आपण विकेंडला मौजमजा करतो, सण,समारंभ साजरे करतो, जन्मदिवस साजरे करतो..तेव्हा हे सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर कुठे तरी सीमेवर देशाचे रक्षण करत असतात.. अशा प्रत्येक सैनिकाला मानाचा मुजरा !

या लेखातून सर्वांना विनंती ..चला थोडे सैनिकांनाही प्रसिद्ध करूया.. कारण खरे हिरो तेच आहेत, चित्रपटातले नव्हे.. लेखकाने पुस्तकात लिहिलेली काही वाक्ये, खूप काही सांगून जातात.. जसे की,

“…संपूर्ण सैनिकी आयुष्यात फाजील आत्मविश्वास चालत नाही. आत्मविश्वास असावा. धाडस असावे, पण नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच ! तसे केले नाही तर कधी मृत्यू झडप घालेल ते सांगता येत नाही ..”

आणखी एका प्रसंगी लेखक म्हणतात, ” पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवरचे ज्ञान यात जमीन-अस्मानाचा फरक असतो..” आणि उपसंहारमधे लिहिलेली कविता, ‘त्रिवार वंदन’ तर लाजबाव आहे.

या पुस्तकातून मिळणारा सर्व नफा लेखक,  “आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड” निधीला प्रदान करणार आहेत, तेव्हा हे पुस्तक खरेदी करून आपण फूल न फुलाची पाकळी या निधीसाठी मदतच करणार आहोत..एक प्रकारे देशसेवाच  आपल्या हातून घडणार आहे. तेव्हा कृपया सर्वांनी पुस्तक खरेदी करून वाचावे..ही विनंती ..

परीक्षण : अलकनंदा घुगे आंधळे

औरंगाबाद

मोबाईलः ९४२२२४३१५९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/सौ. सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ दोन चाकं झपाटलेली… सुमेध वडावाला (रिसबूड) ☆ परिचय – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ दोन चाकं झपाटलेली… सुमेध वडावाला (रिसबूड)☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तकाचे नाव- दोन चाकं झपाटलेली

शब्दांकन- सुमेध वडावाला (रिसबूड)

अनुभव कथन – सतीश आंबरेकर

प्रकाशक- नवता बुक वर्ल्ड

मूल्य -350रु.

‘दोन चाकं झपाटलेली’  ही आहे भ्रमणगाथा 3 सायकस्वारांची. साहसवीरांची. ‘ग्लोबल सायकल एक्स्पीडिशन’ या मोहिमेअंतर्गत प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा, भारताच्या वतीने जगाला संदेश देत त्यांनी ही मोहीम पार पाडली. हे तीन वीर म्हणजे सतीश आंबरेकर, महेंद्र आणि मख्खन. त्यांनी ३५,००० की.मी. अंतर सायकलने कापले. ३२० दिवसात २४ देश सायकलक्रांत केले. केलेल्या नियोजनाप्रमाणे त्यांनी काटेकोर प्रवास केला. नियोजनाप्रमाणे त्यांना इरॅक, इराण, अफगाणीस्तान आणि पाकिस्तान इथे मात्र जाता आले नाही. कारण त्यावेळी सद्दाम हुसेनने कुवेतवर आक्रमण केले होते व अमेरिका कुवेतच्या मदतीला धावून आल्याने, महायुद्धाची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांना तुर्कस्तानातूनच परतावे लागले. बाकी सारा प्रवास मात्र त्यांनी नियोजनाप्रमाणे पार पाडला.

या मोहिमेचं नियोजन ४३ महीने चालू होतं.  (डिसेंबर ८५ ते १९ मे १९८९नोहेंबर) व्हिसाची गुंतागुंत, खर्चाचं टेबल, न्यायच्या सामानाची यादी, कामाची यादी…. आशा किती तरी गोष्टींचं नियोजन करावं लागलं होतं. जेसीजचे राजकुमार यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने ही मोहीम स्पॉन्सर केली आणि मोठाच प्रश्न सुटला.

या भ्रमणात आलेल्या अडचणी, मोहिमेतल्या गमती जमाती, आव्हानं, अविस्मरणीय प्रसंग यांची स्मरणगाथा म्हणजे ‘दोन चाकं झपाटलेली’ हे प्रवासवर्णन.  हे प्रवासवर्णन खरे पण अन्य प्रवासवर्णनापेक्षा हे प्रवासवर्णन वेगळे आहे. अन्य प्रवासवर्णनात स्थलवर्णनाला जास्त महत्व असते. इथेही स्थलवर्णन आहेच पण त्यापेक्षा जास्त महत्व आहे अनुभव कथनाला. हे अनुभव कथन केले आहे, सतीश आंबरेकर यांनी आणि शब्दबद्ध केलेत सुमेध वडावाला यांनी. पुस्तक वाचताना वाचकाला वाटतं, आपणही त्या तिघांच्या मागोमाग सायकलवरून जातोय. त्यांच्याबरोबर तेच अनुभव आपणही घेतोय. यातच या पुस्तकाचे यश सामावले आहे. 

२५ नोहेंबर १९८९ला ते कलकत्त्याहून थायलंडला विमानाने निघाले. ९०मधे त्यांची मोहीम पूर्ण झाली. आणि पुस्तक निघाले ३० मार्च २०१४ला. म्हणजे मोहीम पार पडल्यानंतर तब्बल २४ वर्षांनी. पण मोहिमेच्या वेळी सतीश आंबरेकरांनी सतत टिपणे काढली होती. त्यामुळे अनुभव कथन करताना काही अडचणी आल्या नाहीत.

मलेशियात त्यांच्या लक्षात राहिला तो जगातला सगळ्यात उंच ध्वजस्तंभ आणि त्याच्या साक्षीने होणार्यात मोटरसायकलच्या बेकायदेशीर शर्यती. या शर्यतीत बेटिंग होतं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. स्पर्धा संपल्यावर  पोलीस कायदेशीर कारवाई करतात आणि मोटरसायकलस्वारांना नियम मोडला म्हणून पकडतात. स्पर्धेचे संयोजक जामीन भरून त्यांना सोडवतात,

त्यानंतर पुढे विमानाने ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर, तिथे प्रचंड तापमान, उकाडा आणि उलट दिशेने वाहणारे वारे यामुळे या सहसवीरांची चांगलीच दमछाक झाली. तिथे टोनी विंबरा या मेयरमुळे त्यांची सिडनी टाईम्सला, मोहिमेचा हेतू, स्वरूप, अनुभव याबद्दल मुलाखत प्रसिद्ध झाली. रेडिओवर त्यांच्याबद्दल स्पेशल अनाऊन्समेंट झाली आणि ती ऐकून एका हॉटेल मालकिणीने जेवणाचे बील घ्यायचे नाकारले. भारतीय एंबसीतील मुख्य अधिकारी दुगेसाहेब यांच्या स्वागताशील आतिथ्यामुळे त्यांचं ऑस्ट्रेलियातील वास्तव्य व पर्यटन सुखावह झालं.

ऑस्ट्रेलियातून १४ तासांच्या विमान प्रवासानंतर अमेरिकेत लॉस एंजेलीसला पोचले, तेव्हा हवामान अगदी विरुद्ध होतं. इथे प्रचंड थंडी होती. उणे तापमानात सायकलिंग करावं लागलं. त्यापूर्वी लॉस एंजेलीस ते अल्बुकर्की हा प्रवास डोंगराळ प्रदेश आणि स्नो फॉल यामुळे रेल्वेने करावा लागला. स्नो फॉलमुळे अल्बुकर्कीत दोन दिवस अडकून पडावं लागलं. तिथे त्यांनी एक म्युझियम पाहिलं. त्यातली वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आशी की तिथे काही प्राण्या-पक्षांचे मुखवटे होते. त्या मुखवट्याला तांत्रिक कृत्रीम डोळे बसवले होते. त्या त्या प्राण्या-पक्षाला, माणसासह सारं, भावताल कसं दिसतं , ते त्या कृत्रीम डोळ्यातून बघता येत होतं. सतीशने मधमाशीचा मुखवटा घातला. त्याला दिसलं, तिला प्रत्येक वस्तूच्या 9 प्रतिमा दिसतात. त्यातल्या मधल्या भागावर ती सोंड लावून फुलातला मध शोषून घेते किंवा डंख करते. दुसर्यािच्या शरीरात काटा टोचून ती डंख कशी करते, हेही त्याला कळलं.

ऑक्लोहोम येथील ‘ वेस्टर्न ‘ मोटेलचे मालक कांती आणि तारा पटेल यांनी त्यांचं मनापासून स्वागत आणि आतिथ्य केलं. दरात सूट दिली. सायकल स्वारांना त्यांनी आपली जीवन कहाणी ऐकवली. रेकॉर्ड प्लेअर आणि हिन्दी गाण्याच्या कॅसेट्स ऐकायला दिल्या. प्रत्येक मुक्कामात तुम्ही डॉलर्सचा हिशेब करत असणार, असं म्हणत त्यांचे आंघोळीचे कपडेही धुवून दिले. त्यांच्या मार्गावरील ठिकाणे विचारून भारतीय मोटेल मालकांचे पत्ते वं फोन नंबरही दिले. अशाच आतिथ्यशील आणि सहकार्य करणार्याे अनेक व्यक्ती त्यांना पुढेही भेटत गेल्या. क्वचित कुठे कटू अनुभवही आले.

अमेरिकेच्या आडीच महिन्याच्या प्रवासाबद्दल ते म्हणतात, ‘या प्रवासात आम्ही जणू आमच्या अंगावर चिलखते चढवली होती. पण हवामानाने त्याची पत्रास बाळगली नाही. या सगळ्या प्रवासात त्यांनी तीनही ऋतु अनुभवले. मलेशियात धो धो पाऊस, ऑस्ट्रेल्यात प्रचंड उन्हाळा आणि अमेरिकेत जीवघेणी थंडी.

भ्रमंती कटकसरीनेच करायची होती, त्यामुळे बहुतेक सगळे मुक्काम, जेसीजच्या युथ हॉस्टेल, मोटेल किंवा तंबू ठोकून करावे लागले. या भ्रमंतीतं त्यांनी निसर्गनिर्मित वा मानव निर्मित चमत्काराबरोबरच आणखीही काही अनवट गोष्टी पाहिल्या. सायकल दुरुस्तीला क्लिफोर्ड यांच्या दुकानात गेले असता त्यांच्या खापर पणजोबांच्या, खापर पणजोबांची आदिम सायकल पाहिली. तिचं पुढचं चाक पुरुषभर उंचीचं होतं, तर मागचं चाक मुलांच्या सायकलइतकं लहान होतं. त्यांनी ती सायकल चालवूनही दाखवली. १८६७साली तयार झालेली ही सायकल होती.

शतकापूर्वी मातीत सोन्याचा अंश सापडल्याने सुवर्णभूमी ठरलेली आणि आता तिच्यातील सुवर्णाचा अंश संपल्याने आता ओसाड झालेली ‘भूतनगरी’ पाहिली. न्यूड बीचवरचं नग्नविश्व पहिलं. हंगेरीत झाडा-फुलांचं सुरेख उद्यान, नशाबाजांसाठी राखीव ठेवल्यामुळे तिथे सुयांच्या खचामुळे उद्यानाचा नीडल पार्क झालेला पहिला. दुसर्यां नी टाकून दिलेल्या उष्ट्या ताटात जेवण्याइतकं दारिद्र्य असलेली माणसं पाहिली.

हॉलंडच्या गुरुद्वारात खलिस्तानी पासपोर्ट, व्हिसा, खलिस्तानी चलनाच्या प्रतिकृती पाहिल्या आणि त्यांचे मन संताप आणि शोक अशा संमिश्र भावनेने विषण्ण झाले.

त्यांनी आपल्या या प्रवासात काय काय आणि किती किती पाहिलं, हे समजून घेण्यासाठी मूळ पुस्तकंच वाचायला हवं.

पुस्तकात आनेक ठिकाणी साध्या वाक्यांऐवजी संमिश्र आणि संयुक्त वाक्याचा  उपयोग झालाय. तसेच नवनवीन सामासिक शब्द घडवण्याचा सोसही दिसतो. या दोन्हीमुळे पुस्तक थोडं बोजड झालय. वाचताना गतीमानता उणावते. त्याचप्रमाणे सर्व आशय सलगपणे आलेला आहे. त्याऐवजी प्रत्येक देशाचे स्वतंत्र प्रकरण केले असते, तर आशय अधिक आकलनसुलभ झाला असता. पण एवढं सोडलं, तर पुस्तक वाचनीय आहे. अनुभवविश्व समृद्ध करणारं आहे.

शब्दांकन- सुमेध वडावाला (रिसबूड)

अनुभव कथन – सतीश आंबरेकर

परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆‘अनादिसिद्धा’ – सुश्री भूपाली निसळ ☆ परिचय – श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अनादिसिद्धा’ – सुश्री भूपाली निसळ ☆ परिचय – श्री आनंदहरी  ☆ 

अनादिसिद्धा

लेखिका : भूपाली निसळ

प्रकाशक : इंकिंग इनोव्हेशन्स, मुंबई

पृष्ठे : १३२  किंमत : ₹ ३२०/-

‘अनादिसिद्धा ‘ भूपाली निसळ यांची अनादि वेगळेपण जपणारी सर्वांगसुंदर, लक्षवेधी कादंबरी*

अहमदनगर येथील युवा लेखिका भूपाली निसळ यांच्या ‘कल्लोळतीर्थ’ या पहिल्या कादंबरीचे प्रकाशन ८ मार्च २०२० ला झाले आणि अल्पकाळातच ती उच्चांकी विक्री असणारी कादंबरी ठरली. अपेक्षेप्रमाणे ‘ कल्लोळतीर्थ ‘ या कादंबरीची दुसरी आवृत्ती वर्षाच्या आत प्रकाशीतही झाली. ही घटना मराठी साहित्यविश्वातील आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद अशीच घटना म्हणावी लागेल. वाचकच नाहीत असे म्हटले जात असताना ‘ कल्लोळतीर्थ ‘ ला मिळालेल्या या यशाचे जाणवलेले कारण एकच ‘कल्लोळतीर्थ ‘ च्या विषयाचे वेगळेपण आणि दर्जेदारपणा.  याचा अर्थ एकच ‘साहित्यात आपण काहीतरी वेगळे दिले, वेगळ्या विषयावरील दिले तर त्याचे उत्स्फूर्त स्वागत हे होतेच.’ हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.

कल्लोळतीर्थ ही  ‘शिल्पकलेवरील’ मराठीतील अपवादात्मक ( कदाचित एकमेव ) कादंबरी. ‘कल्लोळतीर्थ ‘ नंतर लेखिका भूपाली निसळ यांच्याकडून वाचकांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची पूर्ती करणारी आणि लेखिकेकडून आणखी अपेक्षा निर्माण करणारी ‘अनादिसिद्धा ‘ ही दुसरी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे.

खरेतर आपल्याला सर्वच कलांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. त्यातही लेणी आणि शिल्पांचा तर खूप प्राचीन काळापासून वारसा लाभला आहे पण काही ठराविक लेणी आणि शिल्पे वगळता याची माहिती आणि  अभ्यासक वगळता फारच अल्प लोकांना आहे असे खेदाने म्हणावे लागते. लेणी-शिल्पकला केंद्रस्थानी ठेवून मराठी ललितसाहित्यात म्हणावे असे लेखन झालेले नाही, ते वाचकांपर्यंत आलेले नाही असे म्हणले तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. अशा पार्श्वभूमीवर भूपाली निसळ ही युवती लेण्यांचा, शिल्पांचा अभ्यास करते, त्यावर मराठीत कादंबरी लिहिते हे खूपच कौतुकास्पद आहे.

चालुक्यकालीन वातापी येथील लेण्यांच्या, शिल्पांच्या निर्मितीचा अभ्यासपूर्ण मागोवा घेऊन लेखिका भूपाली निसळ यांनी ‘अनादिसिद्धा ‘ही कादंबरी लिहिली आहे. एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन म्हणले की ते बोजड शब्दांतील, कंटाळवाणे असते किंवा असणार हा सर्वसामान्य वाचकांचा असणारा समज लेखिकेच्या ‘कल्लोळतीर्थ ‘ आणि ‘अनादिसिद्धा ‘ या दोन्ही कादंबरींनी खोडून काढला आहे.

‘अनादिसिद्धा ‘ चा काळ आहे तो साधारण सोळाशे वर्षांपूर्वीचा, साधारण सहाव्या शतकातील. आजच्या बदामी आणि तत्कालीन चालुक्यशासीत प्रदेशातील लेण्यांच्या निर्मितीवरील या कादंबरीत आज रूढ नसणारे काही शब्द येतात पण त्या शब्दांचा अर्थ तळटीप लिहून देण्यात आला आहे हे याचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ठ्य आहे, कादंबरीची सुरवात होते तीच मुळी नाटकासारखी पात्र परिचयाने आणि तिथूनच रसिक वाचक कादंबरीशी जोडला जातो.

तो जसजसा कादंबरी वाचत जातो तसतसा तो वाचक न उरता त्यातील घटनांचा साक्षी बनत जातो, दर्शक बनत जातो.. आणि हे लेखिकेचे शब्दसामर्थ्य आहे.

बदामी परिसरात चालुक्यसाम्राट राजा कीर्तिवर्मा याच्या राजवटीत अनेक मंदिरे, लेणी – गुंफा यांची निर्मिती झाली. त्यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेऊन लेखिकेने ही कादंबरी लिहिली आहे. सम्राटाचा अनुज, सेनापती,   वास्तुविशारद, प्रमुख शिल्पी ( शिल्पकार ), शिल्पी या मंदिरे आणि शिल्प निर्मितीत योगदान असणाऱ्या काही पात्रांबरोबर रेवती, हरिदत्त यांसारखी काही काल्पनिक पात्रेही या कादंबरीत येतात पण वास्तव आणि काल्पनिक यांचे अतिशय सुरेख, मनभावक अद्वैत साधण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

समर्पितता, आदर, आस्था, प्रेम, अहंकार, द्वेष इत्यादी मानवी भावभावनांचे आणि श्रेयवादाचे कादंबरीतील चित्रण कुठेही बटबटीतपणा येऊ न देता अतिशय संयत रूपात या कादंबरीत येते आणि ते वाचताना कादंबरी वाचकाला त्या काळात घेऊन तर जातेच पण त्याचबरोबर ती समकालाशीही  जोडत राहते हे या कादंबरीचे आणि लेखिकेचे अपूर्व यश म्हणावे लागेल.

कादंबरी वाचकांच्या मनाची पकड घेते ती तिच्या आरंभापासूनच .. अगदी कादंबरीच्या अर्पणपत्रिकेपासूनच ! कादंबरी तीन प्रकरणात विभागली असून प्रत्येक प्रकरणाला अतिशय सार्थ, सुंदर, मनभावक आणि चिंतनीय अशी  वेगळी चिंतनीय अर्पणपत्रिका आहे हे ‘अनादिसिद्धा ‘ चे आणखी एक वेगळे वैशिष्ठय आहे.

कादंबरी वाचताना ‘ स्थिरता निर्माणाची स्वप्ने देते, उत्तुंगता देते. ‘ अशी वैश्विकसत्य सांगणारी, जीवनार्थ सांगणारी सुंदर वाक्ये अगदी सहजतेने ,ओघात येतात आणि क्षणभर वाचकाला थबकवतात. काही वाचकांना ती, कादंबरीचे स्वतःचे वेगळेपण अधोरेखित आणि अबाधित ठेवूनही वि.स.खांडेकरांचे आणि त्यांच्या साहित्यातील जीवनचिंतनाचे स्मरण करून देतात. हे लेखिकेच्या लेखनशैलीचे आणि ‘अनादिसिद्धा’ चे वैशिष्ठय म्हणावे लागेल.

‘अनादिसिद्धा ‘ कादंबरीत प्रारंभी दिलेला बदामी परिसरातील शिल्पस्थळांचा नकाशा तसेच संजय दळवी यांचे मुखपृष्ठ छायाचित्र व प्राजक्ता खैरनार यांच्या शिल्पांच्या छायाचित्रे लेखिकेच्या अभ्यासाची ग्वाही देतात आणि वाचकाला वाचनप्रवासात सहाय्यभूत ठरतात,भावूनही जातात.

‘अनादिसिद्धा ‘ ही लेणी-शिल्प निर्मितीवरील, वेगळ्या भवतालाचा वेध घेणारी मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरावी अशी सर्वांगसुंदर कादंबरी आहे हे निश्चित !

पुन्हा पुन्हा वाचण्यास प्रवृत्त करणाऱ्या ‘अनादिसिद्धा कादंबरीने लेखिका भूपाली निसळ यांच्या साहित्यलेखनाबाबतच्या अपेक्षा आणखी उंचावून ठेवल्या आहेत.’अनादिसिद्धा’ कादंबरी साठी आणि पुढील साहित्यलेखनासाठी भूपाली निसळ यांना खूप खूप शुभेच्छा !

प्रस्तुति – श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈