मराठी साहित्य – विविधा ☆ “संत निवृत्तीनाथ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “संत  निवृत्तीनाथ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एखादी व्यक्ती घडते तेव्हा ती घडतांना अनेक नानाविध गोष्टींचा, व्यक्तीमत्वांचा तिच्यावर कळत नकळत प्रभाव पडतो आणि मग तिच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण होते. ह्यालाच आपण संस्कार असही म्हणतो. ह्यामधूनच त्या व्यक्तीचे कर्तृत्व बहरते,तिचा विकास होतो आणि काही वेळा तिच्याकडून अतुलनीय कामगिरी घडून एक अद्भुत, अद्वितीय व्यक्तिमत्त्व आकारास येतं आणि पुढे वर्षानुवर्षे आपण कित्येक पिढ्यानपिढ्या त्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो.

ह्याचप्रकारे आपल्यासगळ्यांच्या माऊली म्हणवल्या गेलेल्या अद्वितीय अविष्कार म्हणून घडलेल्या ज्ञानेश्वर माऊलींना घडविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या निवृत्तीनाथांची आज प्रकर्षाने आठवण होते. संपूर्ण वारकरी मंडळींची साक्षात माऊली असलेल्या ज्ञानोबांना घडविण्याची किमया वा ताकद ही निवृत्तीनाथां कडे होती. माणसाच्या जडणघडणीत अनेक गोष्टींचा सहभाग असतो.त्यात जर ती व्यक्ती आपल्या सगळ्यांसाठी आदर्श व्यक्ती असेल तर आपण नकळत तीला घडविणा-या गोष्टींचा अभ्यास करतो.त्या गोष्टी लक्षात आल्यावर आपापल्या परीने त्याचे अनुकरण करायचा प्रयत्न करतो. अशा अनेक श्रध्दास्थानी आदरणीय व्यक्तींपैकी प्रामुख्याने निवृत्तीनाथांचे नाव अ्ग्रक्रमी राहील. नुकतीच  निवृत्तीनाथांची जयंती झाली.त्यांना कोटी कोटी प्रणाम.

भारतभूमी ही अनेक संताच्या सहवासाने पावन झाल्यामुळे खूप पवित्र, वैविध्यपूर्ण आणि संस्कृती ने परिपूर्ण झालेली आहे.अनेक संत,महात्मे येथे जन्मले आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना घडविले सुद्धा.त्यांच्या शिकवणी पैकी काही अंश जरी आपल्या कडून आचरणात आणल्या गेले तर जीवन धन्य होईल.

निवृत्तीनाथांचं अवघं 23 वर्षांचं आयुर्मान. पण ह्या अवघ्या 23 वर्षात अख्ख ब्रम्हांडाचं ज्ञान त्यांनी जगाला दिलं. त्यांची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी आपल्या ज्ञानोबारायांना घडविलं,वाढविलं. ज्ञानेश्वर माऊलींचे पालक,थोरले बंधू,गुरू, मार्गदर्शक, असं सर्व काही म्हणजे निवृत्तीनाथ जणू.त्यांनी आपलं मोठेपणं,वडीलपणं ह्या लहान भावंडांना आदर्श घडवून सार्थक केलं.

निवृत्तीनाथ,ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताई ह्या भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे सगळ्यात थोरले.जणू ह्या कुटूंबाचे पालकच.आईवडीलां- च्या पश्चात पालकांच्या जबाबदारीची भुमिका  निवृत्तीनाथांच्या वाट्याला आली.

भागवत संप्रदायाचे आद्यपीठ ज्ञानेश्वर माऊलींचे सकलतीर्थ,विश्वकल्याणासाठी पसायदानातील श्री विश्वेश्वरावो,आद्यगुरू, आदिनाथ ह्या उपाध्या लागलेल्या निवृत्तीनाथां च्या शिकवणींची आज परत ह्या निमीत्ताने मनोमन उजळणी होते.आईवडीलांबरोबर निवृत्तीनाथ एका जंगलात गेले होते.तेव्हा एका वाघाने त्यांना उचलून एका गुहेत नेले.त्या गुहेत त्यांना एका तेजःपुंज साधूने बहुमोल ज्ञान दिले. हेच ते त्यांचे गुरू, नाथपंथातील गहिनीनाथ होत अशी आख्यायिका आहे.

निवृत्तीनाथांनी एक हरीपाठ व तिनचारशे अभंग रचले आहेत.त्यांनी ज्ञानेश्वरांना सामान्य लोकांना समजेल, उमजेल अशा भाषेत गीता लिहावयास सांगितली, तीच ही भावार्थ दिपीका ज्ञानेश्वरी होय.

ज्ञानेश्वर, सोपानदेव ह्यांनी समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाईंनी अन्नपाणी त्यागून देह ठेवला.त्यानंतरच निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. खरचं ज्ञानेश्वर माऊलींसारख्या व्यक्ती घडविणारे निवृत्तीनाथ अलौकिक शक्ती चे प्रतीक. त्यांना परत एकदा कोटीकोटी प्रणाम

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सुखाची किल्ली…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “सुखाची किल्ली…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

बरेचदा मनात विचार येतो, माणसाला नेमकं काय हवं असतं ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला जाणं म्हणजे ते समुद्रातील पाणबुडे वा गोताखोर लोकं समुद्राचा तळ ढुंढाळायचा प्रयत्न करतात, तसं काहीसं वाटलं. सुख, आनंद ह्या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलत जातात. तरीही ढोबळमानाने सुखी होण्यासाठी काही बेसिक गोष्टींना अग्रक्रमाने स्थान मिळतं.

ह्या बेसिक गोष्टींपैकी पहिलं स्थान आपलं आणि कुटूंबियांच आरोग्य.”सर सलामत तो पगडी पचास” ह्या म्हणीनुसार आपलं निरामय आरोग्य आपल्याला खूपसारं मनस्वास्थ्य देतं. आपल्या वा आजुबाजुच्या अनुभवाने आपल्या लक्षात येतं आपला प्रत्येक अवयव हा तितकाच महत्त्वाचा असतो. आपल्याला जेव्हा एखाद्या अवयवाला ईजा होते तेव्हा नेमकं आपल्या मनात हटकून येतं,दुसरा कुठलाही अवयव एकवेळ परवडला पण ह्या अवयवाचं दुखणं नको रे बाबा.

दुसरं स्थान आपलं मानसिक आरोग्याचं. काही कारणाने आपली मनस्थिती जर ताळ्यावर नसेल तर त्याक्षणी प्रकर्षाने जाणवतं. एकवेळ शारिरीक आजारपण असलं तर दिसतं तरी पण काळजी,विवंचना ह्याने हरवलेलं मनस्वास्थ्य मात्र दाखवताही येत नाही अन लपवताही येत नाही.

तिसरी अवघडलेली अवस्था म्हणजे आर्थिक विवंचना. ह्या स्थितीतील व्यक्तींना वाटतं आरोग्यावर पैशाने इलाज तरी करता येतो. फक्त पैसा,सुबत्ता हवी मग काळजी आसपास ही फिरकतही नाही.

वस्तुस्थिती अशी असते की आपल्याला ह्या कुठल्याही प्रकारची चिंता नसली वा व्यक्ती जवळ जबरीची सहनशीलता असली तरी हा भवसागर तारुन जायला मदतच होते.

म्हणूनच संतांनी म्हंटलच आहे “सदा सर्व सुखी असा कोण आहे ?” . त्यामुळे सुखी होण्याची किल्ली ही आपलीच आपल्याजवळ असते हे खरं

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुटुंब, सेवा आणि  नोकरी, वगैरे… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

?  विविधा ?

☆ कुटुंब, सेवा आणि  नोकरी, वगैरे… ☆ श्री राहूल लाळे ☆

नववर्ष आलं आणि मागच्या वर्षाचा आढावा घेऊन पुढच्या वर्षात काय करायचं याचं प्लॅनिंग सुरू झालं. वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात वडील आजारी पडले. तसं मागचं वर्ष संपतानाच थोड्या तक्रारी चालू होत्याच, पण आता तीव्रता वाढली होती. अचानक ऑफिसमध्ये फोन आला की चक्कर येऊन पडले आणि लगेच निघालो. रस्त्यातूनच अँब्युलन्स घरी बोलवली आणि वडिलांना घेऊन दीनानाथ हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीत आणलं . परिस्थिती अवघड आहे आणि क्रिटिकल आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आणि आयसीयूमध्ये ऍडमिट केलं.

कोणतंही आजारपण, हे ते भोगणाऱ्याला जाणवतं आणि जवळच्या नातेवाईकांना, त्यांच्याशी संबंधितांना, हॉस्पिटलमध्ये काम करत असणारे डॉक्टर्स, नर्सेस, तिथले मामा-मामी आणि इतर सर्व सपोर्ट स्टाफना ही त्याची जाणीव होते…पण प्रत्येकाची त्याकडे पहायची दृष्टी वेगळी. डॉक्टर्स-नर्सेस-मदतीचा स्टाफ यांच्यासाठी जरी रुग्णांची सेवा करणं ही ड्युटी -कामाचा भाग असला तरी ती मनापासूनच करायला लागते – रुग्णाचा आजार त्याचं निदान करून दूर करायचा असला तरी भावनिक गुंतवणूक  न करता हे करणं महा कौशल्याचं काम. व्यक्ती तशा प्रकृती तसंच जेवढे रुग्ण तेवढे वेगवेगळे आजार व त्यांचे स्वरूप. यावर इलाज करताना अनेक नाजूक – अवघड आणि अनेकदा कसोटीचे प्रसंग येतात- त्यातून यशस्वी होऊन बाहेर पडणं सोपं काम नाही ! गेले काही आठवडे हॉस्पिटलमध्ये राहून अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. सुरवातीला वडलांना  इमर्जन्सीत आणल्यावर तिथल्या स्टाफने केलेली धावपळ – नंतर रात्रभर ICU मध्ये तिथे चाललेली लगबग – सकाळी बाबांना शुद्ध आल्यावर त्या अर्धवट  स्थितीत त्यांच्या  ” माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही” अशा काही तक्रारीही स्मितमुद्रा  धारण करून  डॉक्टर व इतर स्टाफचं त्यांचं काम करत राहणं म्हणजे त्यांना अशा किरकिऱ्या तर कधी अनेक सोशिक रुग्णांना एकाच वेळी अटेंड करणं यासाठी वैद्यकीय ज्ञान आणि प्रॅक्टिस याबरोबरच किती कौशल्याचं आणि धीराचं काम आहे हे नंतरही दोन-तीन आठवडे  जवळून पाहायला मिळालं.

जीवनदानाचं आणि रुग्णसेवेचं काम करणाऱ्या या सर्वांना अनेकदा दुवा मिळतात पण  काही विपरित प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याच्या प्रोफेशनल हॅझार्डना समोर जायला लागतं.  हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सेस , मामा-मामी आणि सिक्युरिटी  स्टाफ यांची  ( यात अनेक स्त्रियाच ) परिस्थिती काही वेगळी नाही – कधी रेग्युलर शिफ्ट म्हणून तर कधी ओव्हरटाईम म्हणून बारा बारा तास वेगवेगळ्या वेळेची ड्युटी करणं – अनेक रुग्ण – त्यांना भेटायला येणारे नातेवाईक- मित्रपरिवार यांना सांभाळून घेत सतत बारा महिने चोवीस तास हॉस्पिटलमध्ये  रुग्ण – त्यांच्या आणि नातेवाईकांच्या तक्रारी आणि दडपणग्रस्त  मनस्थितीत राहणं सोपं नाहीच.

सलग तीन आठवड्यांहून अधिक काळ लहानपणानंतर  वडिलांना आधी कधी  दिला होता  हे आठवायलाच लागेल. सुरुवातीचा पूर्ण  आठवडाभर पूर्ण वेळ  हॉस्पिलमध्येच होतो – ऑफिसला जाऊ शकलो नाही . नंतर इथं अनेक दिवस जाणार आहे हे कळाल्यावर आई – बायको – बहीण यांनी दिवसाचा वेळ वाटून घेतला आणि ऑफिसला जाणं  सुरु केलं.  संध्याकाळी ऑफिसमधून परस्पर हॉस्पिटलमध्ये जायचं आवरून  वडलांना जेवण भरवायचं – थोडावेळ बोलायचं – अनेक तक्रारी ऐकायच्या – समजावणूक काढायची सकाळचा चहा नाश्ता त्यांचा आणि माझा करून घरी जाऊन आवरून ऑफिसला जायचं असं टाईट शेड्युल सुरु झालं. ऑफिसला जायला थोडा उशीर होतोय पण सहकारी सांभाळून घेतायत. गेले तीन चार आठवडे हॉस्पिटलमध्ये अनेक चांगले वाईट अनुभव आले – चांगले प्रसंग डॉक्टर- हॉस्पिटल स्टाफ व इतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून तर वाईट म्हणजे  एवढ्या कालावधीत ओळखीचे झालेले काही रुग्ण डोळ्यासमोर  दगावताना  पाहणं आणि उगाचंच मनात गिल्टी कॉन्शस व्हायला होणं (ऍक्च्युअली त्यांचे नातेवाईक जास्त ओळखीचे झालेले – एकमेकांची दुःखं  शेअर करून ती हलकी होतात – ते अनुभवलं -). या ४ आठवड्यात काही समदुःखी मित्रमंडळी  भेटली, जी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या उपचारासाठी आली होती. त्यातली काही नेहमी भेटणारी तर काही अगदी वीस पंचवीस वर्षांनी भेटली. वडिलांवर उपचार करणारी डॉक्टर तर लहानपणीची मैत्रीण.. उपचाराबरोबरच तिचे आधाराचे बोल होतेच.. इतरही डॉक्टर मित्र मंडळी भेटली.

आणखी एक  गोष्ट म्हणजे कुटुंब एकत्र आलं – नातेवाईक -मित्रमंडळींचे  फोन किंवा येऊन भेटणं झालं.

 – हे भेटणं- बोलणं एरवीही  वेळोवेळी व्हायला हवं असं वाटू लागलं आणि भेटायला येणारे  किंवा आधाराचे शब्द देणारे आपले कोण आणि फक्त  आपले म्हणणारे कोण हेही स्पष्ट झालं. असो प्रत्येकाला आपापले व्याप असतात. बापूंशी (वडील) बरंच   जवळचं  बोलणं – त्यांचं ऐकून घेणं अनेक दिवसांनी झालं – बाहेरचे सगळे कार्यक्रम – काही लग्नं – बाहेरगावच्या व्हिझिट्स – रोटरीचे कार्यक्रम सगळं बंद – मात्र वाचन – मोबाईलवर काही क्लिप्स बघणं – थोडंफार लिहिणं चालू ठेवलं.

हे आजारपण, दुखणं-खुपणं आपल्या प्लॅनिंगमध्ये कधीच नसतं , नाही का?  आजारी माणूस वृध्द असेल तर तो आजारी पडू शकतो याची मनाची तयारी असते, तरुण किंवा कोणत्याही वयातला धडधाकट माणूस आजारी पडला तर  मात्र ते काळजीचं  कारण होऊन बसतं. आजार, आजारपण आणि त्याबरोबरच येणारे वैद्यकीय उपचार व खर्च याचं आपण कसं नियोजन करतो याचा खरोखरंच विचार करायला हवा, हे अनेकदा आपल्याला किंवा जवळच्या व्यक्तीच्या आजारपणात आपल्याला जाणवतं. तब्बेतीची आणि जीवाची काळजी असली तरी सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर एकवेळ निभावून येता येतं हे आता अनुभवायला मिळालं.

पण ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी काय करायचं ? तेही विदारक दृश्य सामोरं यायचं –  ती पाहतानाच दवाखान्यातच  एक पुस्तक वाचताना  ” लता भगवान करे ” या सत्य घटनेवर आधारित सिनेमाबद्दल वाचलं –  लता करे या पासष्टीच्या महिला आणि त्यांचे पती बुलढाण्याचे रहिवासी –  जमीनदाराच्या शेतात काम राबून आयुष्य काढलेले – आयुष्यभराची कमाई तीन मुलींच्या लग्नात खर्च होऊनही एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास सांभाळून सुखानं  जगणारं  जोडपं. सुख  हे बाह्य संपन्नतेवर अवलंबून नसून मनीच्या समाधानावर आहे हे दाखवणारं जोडपं. अचानक बाईंच्या पतीला गंभीर आजार होतो व तपासण्या करायला शहरात मोठ्या दवाखान्यात जायचा प्रसंग ओढवतो. आसपासच्या लोकांकडून पैसे गोळा करून लताबाई नवऱ्याला घेऊन शहरात मोठ्या दवाखान्यात जातात पण तिथल्या तपासण्या, डॉक्टरांच्या फिया , राहण्या खाण्याचा खर्च कळल्यावर त्या हबकून जातात. हॉटेल मध्ये खायला पैसे नाहीत म्हणल्यावर बाहेर दोन सामोसे घेऊन खाताना सामोसाच्या  पुडक्यावर बाई ” बारामती मॅरेथॉन मध्ये बक्षिसाची भव्य रक्कम” ही जाहिरात पाहतात आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला जाऊन संयोजकांच्या हातापाया पडून   नववारी साडीत – अनवाणी पायानी शर्यतीत सामील होतात – आणि आश्चर्य म्हणजे फक्त नवऱ्याचे प्राण वाचवायचे या एकमेव उद्देशाने – जिवाच्या आकांताने पळून  महागाचे शूज घातलेल्या स्पर्धकांना हरवून मॅरेथॉन जिंकतात व पायांना झालेल्या जखमा विसरून बक्षिसाच्या पैशाने नवऱ्यावरचे उपचार चालू करतात. प्रेम सर्वात श्रेष्ठ हे प्रूव्ह करून दाखवणं यापेक्षा वेगळं काय असतं ? – ही स्पर्धा लताबाईंनी पुढची दोन वर्षही जिंकली एवढं मात्र कळलं की हा नि:स्वार्थीपणा आपल्या माणसाच्या – कुटुंबाच्या प्रेमातून येतो – आपल्या माणसासाठी छोटा मोठा त्याग करायची भावना याच प्रेमातून -निस्वार्थीपणातून निर्माण होते – नाते संबंध पुन्हा जुळण्यासाठी ते पक्के होण्यासाठीही याचा हातभार लागतो – लताबाईंसारखं मॅरेथॉन पळणं सर्वांना शक्य नाही – त्याची गरजही नाही – पण भौतिक सुखाच्या सर्व गोष्टी जवळ असताना – त्या सर्व गोष्टीतून – रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून आपल्या माणसासाठी फक्त आजारपणातच नाही इतरवेळी ही भावना का जोपासू नये ? आणि या पलीकडे जाऊन आपलं क्षितिज थोडंसं  वाढवून – प्रेम- आत्मीयता- ममत्व बाळगून कुटुंबाबाहेरही इतरांना जेवढी जमेल तेवढी मदत करायला काय हरकत आहे ?   त्यात किती सुख समाधान मिळेल याची कल्पना ही गोष्ट वाचून आणि ४ आठवडे दवाखान्यात राहून मिळाली – योगायोगानं हेच ” जीवन समजून घेताना ” या गौर गोपाल दास यांच्या पुस्तकात या दिवसांत वाचायला मिळालं . आपलं कुटुंब आपण निवडू शकत नसतो पण आपल्या रूपातून आपल्या कुटुंबाला आणि कुटुंबही आपल्याला मिळालेली एक सुंदर भेटच नसते का ?

गेले तीन चार आठवडे असे गेले तरी या सक्तीच्या पण आता काहीश्या भावून गेलेल्या सेवेमुळे एक आंतरिक समाधान मिळाले हे नक्की पाहूया – आमच्या सर्वांच्या प्रयत्नांनी – डॉक्टर व नर्सेसच्या उपचारांनी – बापूंना  लवकर बरं वाटू दे – आणि आमचं सहजीवन असंच आंतरिक बहरू दे –  आणि इतर सर्व रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाइकांसाठीही  हीच भावना व्यक्त करण्यापलीकडे माझ्या हातात आज काय आहे ?

© श्री राहुल लाळे

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “व्यक्तिमत्व – चवदार,ठसकेदार…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

अल्प परिचय 

पती – कर्नल. डॉ.प्रकाश बेडेकर.

शिक्षण – बी. एस सी, एम.एड

सम्प्रति –  

  • २० वर्षे अध्यापनात कार्यरत
  • १० वर्षे दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेत सिनिअर समुपदेशक म्हणून काम केले
  • ललित लेखन करते.

दोन पुस्तके – १. सहजच – मनातलं शब्दात २. मला काही बोलायचय – ही प्रकाशित झालेली आहेत.

? विविधा ?

☆ “व्यक्तिमत्व – चवदार,ठसकेदार…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

आज दादा वहिनीला श्री.श्रीधर    कुलकर्णी यांचेकडे लग्नाचे  आमंत्रण आहे. कुलकर्णी काका  म्हणजे   आमचे चुलत घराणे.  खूप श्रीमंत.पैशाचा धबधबा पडतो की काय त्यांच्या घरी  ?? असं वाटतं.त्यातच  मुलांचीही बिझनेस मधे  मदत झाली.••• म्हणतात ना,•••• “पैसा पैशाला ओढतो.”••••

ते  काकांकडे बघून पटत. ••••

म्हंटल तर मुलं खूप शिकलेली नाही.पण पिढी  दर पिढी चालत आलेला बिझनेस मात्र उत्तम सांभाळतात. सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन  जन्माला आलेली ही मुलं, आपल्या बिझनेस मधे चोख आहेत.सरस्वती खूप प्रसन्न नसली तरी लक्ष्मीने मात्र आपला वरदहस्त  त्यांच्यावर छान  ठेवलेला आहे.•••••

श्रीमंतीची सर्व लक्षणे दिसतात. मोठा बंगला, दारासमोर चार गाड्या,घरात नोकर माणसे,म्हणजे घरच्या बायकांना  साधारण बायकांसारखे काम करायची गरज पडत नाही. उठणे बसणे पण अशाच लोकांबरोबर. ••••••

पैशाचा माज  चढला आहे, असं म्हणता येणार नाही. कदाचित ते सहज बोलत असावेत, वागत असावेत. पण ते  आपल्या सारख्या सामान्य  माणसांना कुठे तरी खटकत.,मनाला  लागत. असे  आमच्या दादाचे  नेहमी म्हणणे असते. वहिनीला काही ते पटत नाही व आवडत तर त्याहुनही नाही.  ••••

मागे  दादाच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला दादा वहिनी त्यांच्या घरी गेले असताना, त्यांना मिळालेली वागणूक वहिनी  अजूनही  विसरलेली नाही. प्रत्त्येक भेटीची   वहीनीची काही तरी खास आठवण आहेच.  नातं असलं तरी सांपत्तिक परिस्थिती मधे तफावत आहे.   तरीही काही महत्वाच्या  कार्यक्रमात दादा वहिनी जातातच.आपलं नातं टिकवण्यासाठी, कसलाही विचार न करता हजेरी  लावतात.•••••

तेंव्हा अनघा लहान होती,ती पण आई बाबांबरोबर जायची. काही प्रसंग तिच्या बालमनावर चांगले कोरले गेले होते. घरी अलमारी भरून क्रोकरी असताना,आम्हा तिघांना वेगवेगळ्या आकाराच्या स्टील प्लेट, वाटी मधे  चिवडा दिल्याचा प्रसंग तिला आठवतो. दुर्लक्ष केलेले ही आठवते. त्यानंतरची आईची कुरकुर,वाईट वाटणे,कधी कधी  आईचे रडणे,तिच्या चांगले लक्षात होते. एकदा पूजेला गेले असताना, पूजेचे महत्व कमी व श्रीमंत लोकांचा कौतुक समारंभच  जास्त वाटत होता.वहीनी खूप खुशीने तेथे कधीच गेली नाही. ••• 

दादा ची परिस्थिती सामान्य होती. येथे लक्ष्मी नाही,पण  सरस्वती मात्र खूप प्रसन्न होती.दादाची  मुल शिक्षणात हुशार होती,म्हणून त्यांच्या शिक्षणाकरिता दादा वहिनीने  कधी काही कमी पडू दिले नाही.•••

अनघा ने ग्रॅज्युएशन नंतर  स्टेट लेवल, नॅशनल लेवल च्या परीक्षा दिल्या.’ UPSC ‘ पास केली.आज ती पोलीस खात्यात उच्च अधिकारी आहे.••••

आज कुलकर्णी काकांकडे लग्नाला जायचे आहे.अनघा म्हणाली मी पण येईन. ती अशा एका दिवसाची वाट बघतच होती.••••

अचानक तिच्या समोर फ्लॅश बॅक सुरू झाला. आईच्या डोळ्यातील अश्रु आठवले.

 “आपण नेहमी चांगले वागायचे”. असा  बाबांचा  नियम आहे. त्यामुळे नाइलाजाने आई,बाबांबरोबर जात असे.•••

अनघा रंगाने सावळी व जेमतेम उंची, म्हणून तिच्या वर तेथे  कटाक्ष व्हायचे.कसं होईल हिचे ???  ही काळजी  तिच्या आई बाबांपेक्षा त्यांनाच  जास्त होती. त्यांच्या घरी  आई बाबांकडे दुर्लक्ष करतात. ही गोष्ट तिच्या मनात घर करून बसली होती. काही दुःख सारख आपलं डोकं वर काढतात.व तुम्हाला त्याची सतत आठवण करून देत राहतात. व प्रत्त्येक आठवणीबरोबर ती सल वाढतच जाते.••••

आई बाबा  लग्नाला जायला निघाले.अनघा आॅफिस मधून  सरळ हॉलवर येणार होती.•••

तसं  अनघाला सहज सुट्टी घेता आली असती, व छान तयार होऊन लग्नाला जाता आले असते. पण  तिला काळया सावळ्या अनघाचा  ‘रूबाब ‘ दाखवायचा होता. खरं तर हे असे  वागणे तिच्या स्वभावात बसत नव्हते. पण जुन्या प्रसंगाची आठवण व आई बाबांना मिळालेली वागणूकही  ती विसरली नव्हती. आज  आई बाबांना खासकरून आईला तिची  प्रतिष्ठा मिळवून द्यायची   होती. त्यांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. ••••

पोलिस अधिकारी च्या युनिफॉर्म मधे अनघा हॉलवर पोचली. मस्त कडक युनिफॉर्म  त्यावर   ACP rank चे लागलेले  स्टार्स, डोक्यावर लावलेली cap,हातात स्टीक, चकचकीत बूट,  कमरेवर बेल्ट.डोळयांवर काळा चष्मा. तिला आॅफिसकडून मिळालेल्या  गाडीतून अनघा आली.लगेच ड्रायव्हर ने  कारचा दरवाजा   उघडला. अदबीने बाजूला उभे राहून, एक कडक सॅलूट मारला.•••

”  व्वा !!!काय शान होती अनघाची.”

तेथील सर्व लोक बघतच राहिले. लहान मुले तर जवळ येऊन बघू लागली.अनघाचा मोबाईल कारमधेच राहिला होता, तेंव्हा ड्रायव्हर ने तो तिला आणून दिला व पुन्हा एकदा  तसाच कडक सॅलूट मारला.•••

हाॅलमधील सुंदर महागड्या पैठणी निसून, दागिन्यांनी लदलेल्या, ब्युटी पार्लर मधून सरळ हॉलवर आलेल्या so called smart, श्रीमंत बायका बघतच राहिल्या. आता आकर्षणाचा केंद्रबिंदू  पोलिस अधिकारी ‘अनघा ‘ होती.••••

श्रीधर काकां काकू,व त्यांच्या घरचे इतरही  सर्व, अनघाच्या स्वागतासाठी लगेच आले. ••••

अनघाने वेळ कमी असल्यामुळे मी सरळ आॅफिसमधूनच आले व लगेच मला जावे लागेल.  असे सांगितले.••••आज सर्वांशी भेट  होईल,  म्हणून मी आले.••••पुर्वी लहान असताना मी आई बाबांबरोबर येत असे. •••पण  या मधल्या काळात मला येणे जमलेच नाही.•••तिने सर्वांची विचारपूस केली.••• सर्वांना आनंदाने भेटली. वर वधू ला भेटली. फोटोग्राफर ने तिचे आवर्जून बरेच फोटो काढले. आपल्यामुळे वर वधू कडे दुर्लक्ष व्हायला नको, म्हणून तिने लगेच निघायचे  ठरविले •••••

लगेच अनघाच्या जेवणाची सोय झाली. तिच्या ड्रायव्हरला ही  आदराने जेवण दिल्या गेले..आई बाबा हे सर्व डोळे भरून बघत होते.आजही आईच्या डोळ्यात अश्रू आलेच. पण ते  मुलीचे कौतुक बघून, तिचा होणारा मानसन्मान बघून.••••

अनघाच्या  आई-बाबांना लग्न घरात सर्वांसमोर मान मिळाला. आईच्या मनातील सल दूर झाली होती.अनघाचा उद्देश्य पूर्ण झाला  होता,तो ही बाबांचा नियम सांभाळून,”आपण नेहमी चांगले वागावे”.  ••••

निघताना   अनघा आई बाबांना म्हणाली,••••आई-बाबा जास्त उशीर करू नका. अंधाराच्या आत घरी पोहचा. ••••

श्रीधर काकांची पंधरा वर्षांची नात ‘ राधा’ अनघा जवळ येऊन म्हणाली,ताई मला पण तुझ्या सारखे पोलिस अधिकारी बनायचे आहे. बाबा,माझा ताई बरोबर फोटो काढा ना.तो मी माझ्या स्टडी टेबल वर ठेवेन.••••

अनघा म्हणाली,••• हो का  ??

मग छान अभ्यास कर.मी तुला वेळोवेळी guidance देईन. ••••

एकंदरीत अनघाचा प्रभाव जबरदस्त होता.•••

“वक्त वक्त की बात हैं।

 वो भी एक  वक्त था ।

आज भी एक वक्त हैं।”••••

आज कुलकर्णी काकांच्या ड्रायव्हर ने आई-बाबांना घरी पोहचविले.••••

म्हणतात ना,•••

“Your greatest test is how you handle people who have mishandled you.” ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चप्पल…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “चप्पल…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नवीन घरं लावतांना अनेक जुन्या गोष्टी बाद करुन त्याची जागा नवीन वस्तू घेतात. काही वेळी खरोखरच जुन्या वस्तू ह्या बाद झाल्याच्या सिमारेषेवरच असतात फक्त आपल्या भावना त्यात अडकल्याने त्या अजून हद्दपार झालेल्या नसतात.

परंतु आपल्या वस्तुंबाबत त्याच भावना नेक्स्ट जनरेशन वा दुसऱ्या व्यक्तीच्या नसल्याने त्या वस्तू बदलायला आपण सोडून बाकी सगळे जणू सरसावून तयारच असतात.

ह्या सगळ्या गोष्टींमध्ये “शू रँक” बदलायची ठरली. आजकाल संपूर्णपणे झाकल्या जातील अशा ” शू रँक ” आँनलाईन पण भरपूर मिळतात. पूर्वी अगदी छोटासा चप्पलस्टँड सहज पुरून जायचा. कारण सहसा घरी जितकी मंडळी तितके चपलांचे जोड असं साधं सोप्प समीकरण होतं.

आता मात्र सगऴ गणित, समीकरण जणू पालटूनच गेलयं.  एकाच व्यक्तीचे किमान चार पाच जोडं हे पादत्राणांचे असतातच असतात. अर्थातच हे सरासरी गणित हं. बाहेर घालायच्या चप्पल,वाँकसाठी सँडल्स वा शूज, घरात घालायच्या स्लीपर्स, आणि एखादा नवाकोरा एक्स्ट्रा जोड.असो. काळ खूप बदललायं हे खरं. आपल्या दोन पिढ्या आधी सरसकट सर्वांना कायम चप्पल मिळायच्याच असं नाही. बराच काळ ते अनवाणी काढायचे.आता अनवाणी हा शब्द कुणाच्याही डिक्शनरीतच नाही. आपल्या आधीच्या पिढीला एक जोड मिळायचा तो वर्षभर म्हणा वा अगदी झिजून झिजून तुटेपर्यंत वापरावा लागायचा.आपल्या पिढीला एक नेहमीचा आणि एक एक्स्ट्रा जोड मिळायचा शिवाय हरवल्या तर मार न बसता नुसती शाब्दिक बोलणी खावी लागायची. आताच्या पिढीला तर काही बोलूच नये.त्यांच्या पादत्राणांचा स्टाँक बघितला तर आपले फक्त डोळे विस्फारल्या जातात, शब्द मात्र फुटत नाही. असो.

ह्या चप्पल वरुन आठवलं, “चप्पल”नावाची  एक मस्त मराठी शाँर्टफिल्म मी नुकतीच बघितली. फिल्म बघतांना आपोआपच डोळे पाणवतात हेच त्या फिल्मचे यश. सोबत लिंक देतेयं.वेळ मिळाल्यास बघून घ्या. ह्या फिल्ममध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. शेवटी माणसं,नाती हीच आपली खरी इस्टेट. त्यांना जपलं,त्यांच मनं ओळखलं, त्यांच्यासाठी जे काही आपण करु त्याच्या दुप्पट कधी ना कधी आपल्याकडे रिबाँड येईलच.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प, भाग –५४ – उत्तरार्ध – मत्सराचा अग्नी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

विचार–पुष्प, भाग –५४ – उत्तरार्ध – मत्सराचा अग्नी डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प’.

हुश्श! स्वामी विवेकानंद यांना स्लेटन लायसियम लेक्चर ब्यूरो शी केलेला व्याख्यानांचा करार आता संपला होता. तरीही त्यांची व्याख्याने सतत होत होती आणि अनेकजण त्यांच्या विचारांकडे आकृष्ट होत होते. ही संख्या वाढतच होती. त्यामुळे यातून आपले खरे अंतरंगशिष्य त्यांना शोधायचे होते. तिथल्या सामाजिक कामाची पाहणी केल्यावर त्यांना आपल्या कामासाठी संघटना किंवा संस्था उभी करावी हे मनोमन पटले होतेच. असे त्यांनी एकदा मिसेस लायन यांना बोलून दाखवले होते. म्हणजेच त्यांच्या मनात अशी संघटना कोणाची करायची? त्याचे उद्दिष्ट्य काय असेल? कार्यपद्धती कशी असेल याचे विचारमंथन सुरू होते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, शब्दात आणि मनात देशभक्तीच होती.त्यांचे ध्येय फार मोठे होते. त्यांना भारताचे पुनरुत्थान घडवायचे होते. हे घडवून आणण्यासाठी आत्म्याला जाग आणणे महत्वाचे होते,ती जाग आणण्यासाठी चे अध्यात्म ज्ञान आवश्यक आणि त्यांच्या दृष्टीने हे अध्यात्म ज्ञान फक्त भारतच सार्‍या जगाला देऊ शकत होता.म्हणून ही जाग सर्वांमध्ये निर्माण करणे हेच स्वामीजींचे ध्येय होते.

तिथे अमेरिकेत त्यांच्या व्याख्यानांशिवाय असे काही प्रसंगही घडत होते घटना घडत होत्या.

एकदा घडलेली घटना आहे. अमेरिकेत श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्या तुलनेत स्वामीजी कृष्णवर्णीय वाटत असत. एका गावात ते स्थानकावर उतरले आणि त्यावेळी काही समिति सदस्य त्यांना घ्यायला आले होते. हे तिथल्या एका निग्रोने पाहिले. त्याच्या दृष्टीने हा माणूस आपल्यापैकी एक कृष्णवर्णीयच होता.मग आपल्या पैकी एका बांधवाचा गौरवर्णीय लोक एव्हढा आदर करताहेत हे पाहून तो मोहरून गेला. तो खर तर एक हमाल होता. तो स्वामीजींजवळ येऊन म्हणाला, “मला तुमच्याशी हस्तांदोलन करण्याची ईच्छा आहे. मी भारतीय आहे असे काहीही न सांगता स्वामीजींनी त्याचा हात प्रेमभराने हातात घेतला आणि त्याला म्हणाले, “ धन्यवाद माझे बंधो, धन्यवाद! तो निग्रो खूप भारावून गेला होता.  स्वत:चे देशबांधव प्रेम आणि अखिल मानवजातीचे वाटणारे प्रेम एकाच ठिकाणी ? तर या उलट काही ठिकाणी स्वामीजींना निग्रो समजून केशकर्तनालयात बाहेर काढून अपमान केल्याचाही प्रसंग घडला.

अमेरिकेत आता स्वामीजींना न्यूयॉर्क मध्ये जाण्याचे आमंत्रण मिळाले होते. तत्वज्ञानाच्या अभ्यासात गोडी असणार्‍या काही जणांचा हा गट होता, त्यांनी बोलवले होते.त्यात डॉ.एगबर्ट ग्युएर्न्सि,मिसेस स्मिथ,मिस हेलन गौल्ड हे लोक  होते, ग्युएर्न्सि यांच्या कडे स्वामीजी राहायला होते. हेल आणि बॅगले यांच्या प्रमाणेच ग्युएर्न्सि पतिपत्नी यांचे स्वामीजींशी घरगुती संबंध तयार झाले.ग्युएर्न्सि व्यवसायाने डॉक्टर होते. लेखक, नियतकालिकाचे संपादक होते. ब्रुकलीन डेली टाईम्स आणि न्यू यॉर्क मेडिकल न्यूज टाईम्स याचे संस्थापक पण होते. वय एक्काहत्तर ,विवेकानंदां च्याच वयाचा त्यांचा तरुण मुलगा नुकताच स्वर्गवासी झालेला. त्या धक्क्यातून ते अद्याप सावरले नव्हतेच,मिस गौल्ड सुद्धा अफाट श्रीमंत होत्या त्यांच्याकडेही स्वामीजी राहण्यास गेले. अशा या न्यूयॉर्कच्या मुक्कामात त्यांचा अनेक मोठमोठ्या लोकांशी सबंध येत होता. बोलवले की जात व्याख्याने देत, भेटत, चर्चा करत. शिवाय तिथल्या महत्वाच्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. सहा-सात दिवस भुररर्कन  निघून गेले, आता ते बोस्टनला आले होते. तिथे अठवडाभरात महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समोर विचार व्यक्त केले, त्यावेळी मार्था ब्राऊन फिंके महाविद्यालयात शिकत होती. तिथे पहिल्यांदा विवेकानंद यांना तिने पहिले. विचार समजण्याचे वय नव्हते पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव आपल्यावर पडला असे तिने आठवणीत लिहून ठेवले आहे. एव्हढे श्रेष्ठ असूनही ते आम्हा विद्यार्थ्यात मिळून मिसळून वागले हे तिला विशेष वाटले होते. पुन्हा न्यूयॉर्क, परत बोस्टन व जवळपास फिरणे चालू होते.

प्रा राइट यांच्या निमंत्रणावरून स्वामीजी बोस्टनला पुन्हा आले होते. हार्वर्ड आणि बोस्टन इथे त्यांची व्याख्याने झाली होती. इथे बोस्टनला मिसेस ओली बुल यांची पहिली भेट झाली होती. ज्या पुढील कार्यात सहभागी झाल्या आहेत.तसेच इथे त्यांना कर्नल थॉमस वेंटवर्थ हिगिनसन्स जे सर्वधर्म परिषदेत पण भेटले होते ते भेटले. विमेन्स क्लब मध्ये मिसेस ज्युलिया वॉर्ड होवे यांनी स्वामीजींचे व्याख्यान ठेवले होते. त्याही भेटल्या. असे दौरे चालू होते स्वामीजी फार थकून गेले. नंतर हेल यांच्या कडे ते विश्रांतीसाठी थांबले.

इझाबेला मॅककिंडले हिने स्वामीजींना भारतातून आलेला सर्व पत्रव्यवहार पाठवला. यात होती भारतात झालेली वृत्तपत्रीय प्रसिद्धीची कात्रणे .काहींमध्ये अमेरिकेतला गौरव होता. ते ठीक होते , पण भारतात आपल्याबद्दल जो विरोधी प्रचार चालला होता त्याचीही कात्रणे त्यात होती.ती वाचून स्वामी विवेकानंद यांना फार फार वाईट वाटले. त्यांनी इझाबेलाला कळवले की, “माझ्याविषयी माझ्याच देशातील लोक काय म्हणतील याची मी फार फिकीर करीत नाही. पण एक गोष्ट मात्र आहे की, माझी आई वृद्ध आहे, सार्‍या आयुष्यभर तिने कष्ट उपसले आहेत.असे सारे असूनही जिच्या सार्‍या अशा ज्याच्यावर केन्द्रित झाल्या होत्या असा आपला मुलगा ईश्वराच्या आणि मानवाच्या सेवेसाठी देऊन टाकण्याचा भार तिने सहन केला. पण मजूमदार कलकत्त्यात सर्वत्र सांगत आहेत, त्याप्रमाणे दूर परदेशात कोठेतरी गेलेला हा आपला मुलगा तेथे पशुसारखे जीवन घालवत आहे ,अनीतिमान झाला आहे, हे जर का तिच्या कानावर गेलं,तर त्या धक्क्याने ती प्राण सोडेल, पण परमेश्वर दयाघन आहे. त्याच्या मुलांना कोणीही अपाय करू शकत नाही”. हे प्रतापचंद्र मजूमदार यांचे कलकत्त्यातले प्रताप वाचून स्वामीजी, आईच्या आठवणीने बेचैन झाले. खरे तर ते स्वत:  शांतपणे या सर्वांना अजूनही तोंड देत होते.

प्रतापचंद्र मजुमदार कलकत्त्यात आपल्याबद्दल एव्हढे भयानक सांगत आहेत . या वृत्तपत्राचे संपादक मजुमदारांचा चुलत भाऊ आहे.ज्याने याआधी आपले एव्हढे कौतुक केले ते आता?

याचा पहिला धक्का स्वामीजींना परिषदेच्या वेळी बसला होताच . ज्या प्रतापचंद्र मजुमदारांनी ब्राहमो समाजात उपासना संगीत गाणारा नरेंद्र पाहिला होता ,एव्हढ्या लांबच्या देशात त्यांना नरेंद्र पुन्हा भेटल्यानंतर आपल्याला जणू घरातले वडीलधारी भेटल्याचा आनंद नरेंदला झाला होता पण घडलं होतं उलटच . पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते नरेंद्रशी अगत्याने बोलले होते.पण जेंव्हा सर्व माणसे प्रचंड संख्येने नरेंद्र भोवती गोळा होऊ लागली तसतसे मजुमदार यांना मत्सर वाटू लागला ,परिषदेतल्या मिशनर्‍यांजवळ त्यांनी स्वामीजींची निंदा करणं सुरू केलं. नरेंद्र हा तसा कोणीच नाही तो एक लुच्चा आणि ठक आहे येथे येऊन संन्यासी असल्याचे ढोंग करीत आहे. असे सांगून त्यांची माने कलुषित केली.त्यात ते यशस्वी झाले. या सगळ्यावर मात करून स्वामीजी पुढे निघून गेले होते.

विवेकानंद यांचे विचार, त्यांचे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व यामुळे तिथले सगळेजण भारले गेले होते तसे , मत्सराची दुसरी वाईट बाजुही त्याला होती. विरुद्ध प्रचार. आता मात्र विवेकानंद यांनी या वृत्तपत्रांकडे लक्षच द्यायचे नाही असे ठरवले होते.काहीही छापून आल तर ते मनावर घेत नसत. त्यातून आता भारतात सुद्धा हा अपप्रचार चालू आहे आणि हे सर्व प्रतापचंद्र करीत आहेत हे कळल्यापासून तर त्यांना खरे विश्वासच बसत नव्हता. प्रतापचंद्र या पातळीला जातील हे स्वप्नातही वाटले नाही. खेटरीचे राजेसाहेब आपल्या पाठीशी उभे आहेत म्हणून आपण निश्चिंत पाने इथे आलो. पण आता? आपण दूर्वर्तनी आहोत शिलभ्रष्ट आहोत असे प्रतापचंद्र सर्वत्र सांगत आहेत. हे ऐकून आपल्या आईला काय वाटेल? ही वेदना त्यांना सतावत होती.

मत्सर भावनेतून चक्क चारित्र्य हनन सुरू होते. सुरूवातीला फक्त विरोध मग विरोधाचे तीव्र स्वरूप, मग प्रचार आणि किर्ति जशीजशी वाढली तशी विरोधासाठी पद्धतशीर मोहिमच सुरू झाली होती.मग सुरू झाला छुपा खोटा प्रचार. विवेकानंद यांचे चारित्र्य शुद्ध नाही. ते तरुण सुंदर मुलींना फूस लावून आपल्या जाळ्यात ओढतात वगैरे सांगू लागले. यात मिशनरी, ब्राह्मसमाजी आणि थिओसोफिस्ट आघाडीवर होते. हे अमेरिकेत सुरू होते पण प्रतापचंद्र भारतात काही दिवसांनी परत आल्यावर भारतात सुद्धा ही मोहीम त्यांनी सुरू ठेवली होती. ब्राह्म समजाच्या मुखपत्रात विवेकानंद यांच्या विरोधात लेख येत असत. इतर नियतकालिकात सुद्धा असे लेख येत होते आणि हे सर्व लेख अमेरिकेत पाठवले जात, तिथेही ते प्रसिद्ध करत.अशा प्रकारे मत्सराचा अग्नि पेटला होता. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भारताचा प्रजासत्ताक दिन व महत्व… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? विविधा ?

☆ भारताचा प्रजासत्ताक दिन व महत्व… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

आला आला दिन सोनियांचा

प्रजासत्ताक दिन बहुमोलाचा

खरेच भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिन हा दिन म्हणजे भारतीय इतिहासाचे एक सुवर्ण दालन.

दिडशे वर्षांच्या गुलामगिरी नंतर आमच्या भारत मातेच्या पायातील परदास्याच्या श्रुखंला देशभक्तांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन तोडल्या.भारत मातेच्या म्लान मुखावर चे करूण अश्रू त्यांना पाहवले गेले नाही. ते देशभक्त भारत मातेला म्हणाले.  कुसुमाग्रजांच्या शब्दात

“कशास आई भिजविली डोळे

उजळ तुझे भाल

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल”

खरोखरच देशभक्तांच्या अविरत व भगिरथ प्रयत्नांनी 15 आगस्ट 1947 ला भारतमाता स्वतंत्र झाली. स्वातंत्र्याच्या तेजाने तिचे मुख मंडल उजळले.

बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार केली. व  26 जानेवारी जा 1950 पासून तिची अंमलबजावणी झाली. 26  जानेवारी हाच आपला प्रजासत्ताक दिन होय. हयाला गणराज्य दिन व इंग्रजीत  Republic day असे म्हणतात. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता.

एकाधिकार नाही, हुकूमशाही नाही, राजेशाही नाही. हा दिन स्वतंत्र भारताचा मानबिंदू तर आहेच पण राष्ट्रीय सण आहे. मोठया उत्साहाने, जोमाने, दिव्यांची रोषणाई  करण्यात येते. तिरंगा मोठ्या दिमाखात डोलत असतो. प्रेसिडेंटचे भारत वासियांना उद्येशून भाषण होते.देशभक्तीपर गीतांनी आसमंत भारावला जातो.

स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन आज 74वर्षाचा झाला आहे. आजपर्यंत च्या कालावधीचा विचार केल्यास, सिंहावलोकन केल्यास आपल्या ला कळेल खरेच आपला देश प्रगत देशात का समर्थ नाही?

देशापुढै आज निरनिराळ्या समस्या मगरी सारख्या मागे लागल्या आहे. अंतस्थ व बाह्य शत्रूंची चुरस लागली आहे.देशाची एकता भंग पावली जणू. स्वार्थ, भ्रष्टाचार, देशद्रोही वृत्ती सतत वाढत आहे.

भौतिक समस्या, नैसर्गिक समस्या, वैज्ञानिक समस्या, आरोग्यविषयक समस्यांचे डोंगर वाढत आहे.

पूर्वजांनी कमावलेल्या स्वातंत्र्याची व देशभक्तांची जाण असणे हे स्वतंत्र भारताच्या नागरिकांचे व मतदारांचे मुख्य कर्तव्य आहे. घटनेने आपल्याला हक्क दिले म्हणजे कर्तव्य आलीच.

प्रो.लाॉस्की यांच्या मताप्रमाणे हक्क व कर्तव्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

आजचे तरुण हे उद्याचे देश निर्माते आहेत. प्रकर्षाने त्यांनी प्रजासत्ताक दिनाचा मतितार्थ समजून वागल्यास पुढला अनर्थ टळला जाईल. मला देशाने काय दिले हे म्हणण्यापेक्षा मी देशाला काय दिले हे महत्त्वाचे नव्हे काय?

प्रजासत्ताक दिन योग्य अर्थाने साजरा करायचा असेल तर मतदार व सुजाण नागरिकांनी देशहिताचा विचार केला पाहिजे. poverty in the land of plenty हे अजुनहीआहे‌. याचा विचार केला पाहिजे. सेतू बांधायला एक एक दगड लागला.

दुसऱ्या महायुध्दात हिरोशिमा व नागासाकी ह्यांची काय गत झाली हे सर्व श्रृत आहे.हा देशभक्तीचा विजय आहे.

भारताचे प्रजासत्ताक यशस्वी होण्यासाठी जाज्वल्य देशाभिमान जागृत असण्याची गरज आहे.

“साथी हाथ बढाना” या गीताची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

सरतेशेवटी

चमका बनकर अमन का तारा

प्रेम की धरती देश हमारा

जय जय हिंदुस्थान, जय जय गणराज्य दिन

स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून शुभेच्छा व्यक्त करते प्रजासत्ताक दिन चिरायू होवो या अपेक्षेत लिखाणाला विराम देते.🌷

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भारत एक सार्वभौम राष्ट्र आणि नवे शैक्षणिक धोरण … ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ?

☆ भारत एक सार्वभौम राष्ट्र आणि नवे शैक्षणिक धोरण ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

२६ जानेवारी हा ७४ वा प्रजासता दिन साजरा करत असताना आत्मनिर्भर भारत व नवनिर्मित भारताच्या विकासासाठी शैक्षणिक धोरणातील क्रांतिकारक बदल नव्या सार्वभौम भारतासाठी नव्या वाटा घेऊन येत आहे हे निश्चितच नव्या भारतासाठी सदृढ वातावरण आहे असे वाटते .

आजचे युग हे स्पर्धांचे युग आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिणारा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हे तितकेच खरे आहे. आजचे आधुनिक युग डिजिटल युग म्हणूनही ओळखले जातेय . या युगात प्रत्येक सुविधा डिजिटल होत जाताहेत . जुन्या काळी साक्षर आणि निरक्षर संकल्पनेतून सामाजिक राष्ट्रीय स्तर ठरवला जायचा .आता डिजिटल साक्षर व डिजिटल निरक्षर संकल्पना मोठ्या प्रमाणात विचारात घेतली जातेय . त्यातून शिक्षणाबरोबर शिक्षण प्रक्रिया अधिक गतिमान होणेसाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले जातेय .शालेय शिक्षणात नर्सरी -बालवाडी – प्राथमिक – माध्यमिक – उच्च माध्यमिक – महाविद्यालयाच्या जडण घडणीत सध्या डिजिटल शैक्षणिक धोरणाचा वेगवान बदल विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षक व सामाजिक बदलावर होताना दिसून येतोय . पुढची पिढी सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणाकडे पाहिले जातेय . युवा पिढी व त्यांच्या आकांक्षा व सामाजिक हित व सरकारी व खाजगी शिक्षण पद्धती व त्यांची अंमलबजावणी शैक्षणिक क्षेत्राला नव्या योग्य दिशेला घेऊन जाताना आढळतेय .समाजातील शैक्षणिक , आर्थिक , सामाजिक विषमता यामुळे दूर होण्याच्या आशा निर्माण होत आहे .

बदलत्या काळानुसार शाळांमध्ये ही बदल होणे अपेक्षित आहे .

आज लोक सहभागातून चांगल्या सुविधा मिळविण्यासाठी शिक्षक व शैक्षणिक व्यवस्था झटत आहेत . त्यातून मॉडेल स्कूल विकसित होत आहेत .

इ-लर्निंग सारख्या सुविधा खेडोपाडी उपलब्ध होत आहेत .शिक्षण तज्ञ योगी अरविंद म्हणतात की – “प्रत्येक गोष्ट शिकवता येणे शक्य नाही. मात्र प्रत्येक गोष्ट शिकता येणे शक्य आहे .” – त्यामुळे कोणतीही मुले शिक्षणापासून वंचित होऊ नयेत याविषयी शिकता येणे गरजेचे वाटते .त्यासाठी टॅब  ,स्मार्टफोन इ . माध्यमे शिक्षणाची समीकरणे बदलण्यासाठी  पूरक ठरली आहेत . स्मार्ट अभ्यासिका घरोघरी पोहोचणे आवश्यक आहे . विविध नवोपक्रमाव्दारे शिक्षक अपडेट होणे आवश्यक आहे .

नवे शैक्षणिक धोरण :

१९८६ च्या शैक्षणिक धोरणातील अनेक मुद्दे मागील ३४ वर्षात राबविले गेले. त्याचे  पूर्वावलोकन महत्वपूर्ण वाटते . त्यातून सुधारण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणात २०३५ पर्यंत प्राथमिक ,माध्यमिक शिक्षणाच्या बरोबरीने उच्च शिक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत वाढवण्याचे उदिष्ट दिसून येते.महिला, बालवाडी व व्यवसायिक शिक्षणाकडे नवीन शैक्षणिक धोरणात जादा लक्ष देण्यात आल्याची बाब चांगली आहे .गरिब व श्रीमंत यांच्यातील शैक्षणिक विषमता मिटवणे,सरकारी व खाजगी शाळेत शिक्षणाची समानता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल यातून उचलले गेले आहे .

देशातील युवा पिढीच्या आकांक्षा त्यांची स्वप्ने आणि हित लक्षात घेऊन लक्ष केंद्रित केले आहे . जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे वेगाने होणारे बदल होत आहेत आणि भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास येत असल्यामुळे भविष्यकालीन योजना राबविणे आवश्यक आहे . राष्ट्रीय शैक्षीणक धोरण – 2020 अंतर्गत शिक्षणावर ६ टक्के खर्च व्हावा हे अपेक्षित आहे . भारताच्या भविष्यावर होणारे क्रांतिकारक बदल व शिक्षणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बदल निश्चितच देशाच्या विकासात क्रांती घडवेल असे वाटते .

बालवाडी आणि अंगणवाडी किंवा १ ली ते दुसरी पर्यंतच्या इंग्रजी शाळांचे जाळे विस्तारत असताना शालेय शिक्षण प्रशासनामार्फत नवीन बदल स्विकारून नव्या शैक्षणिक रचना तयार करण्यात येत आहेत. बहुशाखीय शिक्षण हे महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षणाचे वैशिष्ट बनत आहे .यामुळे संशोधन, शिक्षण व सर्वसाधारण अभ्यासक्रम राबविले जातील .

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्यावर या नव्या राष्ट्रीय धोरणात भर देण्याचा विचार करण्यात आला आहे . मातृभाषा, इंग्रजी व प्रादेशिक भाषा असे त्रिभाषीय सूत्र बनविले आहे .

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्याला कशाचेच बंधन नाही .आयुष्यभर मनुष्यप्राणी विद्यार्थीच असतो . तो प्रत्येक अनुभवातून नवनवीन बाबी शिकत असतो . प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगावर विचार करून मार्ग काढत पुढे जात असतो.वर्षानुवर्षे सुरु असणाऱ्या पारंपारिक शिक्षण पद्धतीला छेद देत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण पद्धतीत समग्र बदल होत आहेत. ग.दि.मा. यांच्या कवितेत –

 ” बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु ” असे व्यक्त होतात .

हे नवे शैक्षणिक धोरण जाहीर झाल्याच्या वर्षापूर्तीनिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असे म्हणाले की – ‘आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षात आहोत.एका प्रकारे नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हा आता अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे. नवीन भारत आणि भविष्यासाठी तयार युवा पिढी घडवण्याच्या दृष्टीने हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ‘

हे २१ शतकातील सर्वात दूरदर्शी धोरण आहे – असे मत शिक्षणमंत्री धरमेन्द्र प्रधान यांनी मांडले आहे. याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतांचा योग्य वापर,शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, क्षमता विकास आणि शिक्षणाच्या माध्यमांमध्ये परिवर्तन घडून येणार आहे.

नवे शैक्षणिक धोरण 2020 हा नक्कीच एक मार्गदर्शक दस्तऐवज आहे. नव्या युगातील नवी आव्हाने लक्षात घेता विविध शैक्षणिक गरजा,संरचनात्मक असमानता आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्यामध्ये येणार्‍या समस्यांचे निराकरण हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या राष्ट्रात शिक्षण क्रांती निर्माण होणार आहे. \ सोबतच शिक्षण व्यवस्थेतील अनेक संकटांना तोंड देण्याचे सर्वात आव्हानात्मक कार्यही या धोरणाद्वारे पूर्ण करायचे आहे.

भारताच्या अफाट लोकसंख्येला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्याद्वारे असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या धोरणाच्या अंमलबजावणीवर ठरणार आहे. कोविड महामारीच्या काळात जलद पावले उचलून अवघड निर्णय घेऊन ते पूर्तीस नेण्याचे कौशल्य आपल्या भारताने  दाखवून दिले आहे. याच कौशल्याचा फायदा शिक्षण क्षेत्रातही होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी काही राज्यांनी केली आहे तर काही राज्ये त्या प्रक्रियेतून जात आहेत. तरीही अजून लांबचा पल्ला गाठायचा बाकी आहे. याच बरोबर भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जनता संविधान साक्षर व्हावी यासाठी संपूर्ण भारतामध्ये संविधान साक्षर अभियान राबविणे गरजेचे आहे असे वाटते. भारत हे संपूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आज विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निश्चितच नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपला भारत नवीन क्रांती घडवेल यात तिळमात्र शंका नाही असे वाटते.

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन नवनव्या संकल्पनानी साजरा करताना सर्व भारतीय एक आहेत ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजविणे आवश्यक आहे. तरच देशप्रेमाने तिरंगा अभिमानाने लहरत राहील असे मनोमन वाटते .

नव क्रांतीची मशाल हाती

उजळू अंधार अज्ञानाचा

 नवनिर्मितीने मार्ग शोधूया

 शिक्षणाचा सज्ञानाचा

               प्रजासत्ताक हे राष्ट्र आपुले

               चला उभारू देश नवा

विकसित करू राष्ट्र आपुले

शिक्षणाचा ध्यास हवा …!

जय भारत…

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समर्थांनी केलेले गणेश स्तवन…  ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले  ☆

? विविधा ?

☆ समर्थांनी केलेले गणेश स्तवन…  ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

समर्थानी दासबोधाची रचना लोकविलक्षण पद्धतीने केली आहे. सामान्यपणे विघ्नहर्त्याला नमन करून ग्रंथारंभ केला जातो. परंतु समर्थानी असे न करता दासबोधात नक्की काय आहे ?  समर्थाना नक्की काय सांगायचे आहे, याचे सूतोवाच त्यांनी प्रथम समासात केले आहे. दुसऱ्या समासात मात्र समर्थ जनरीतीप्रमाणे विघ्नहर्त्या गजाननाचे यथार्थ गुणवर्णन करतात, स्तवन करतात. स्तवन करणे म्हणजे फक्त स्तुती करणे नव्हे, तर कृतज्ञता व्यक्त करणे.

श्री गणेश ही आपली आद्यदेवता आहे. कोणत्याही मंगलकार्याची सुरुवात आपण गणेशपूजनानेच करतो. श्री गणेश ओंकारस्वरूप आहे. सृष्टीची उत्पत्ती ओंकारातून झाली असे मानतात. म्हणून कोणत्याही कार्याच्या आरंभी गणपतीस आद्यपूजेचा मान दिला जातो. गणपतीची पूजा करून कार्य केल्यास संकटे येत नाहीत अशी भक्तांची श्रद्धा आहे. समर्थानी इथे आधी गणपतीतत्वाचे, अर्थात निर्गुण रूपाचे आणि पुढे  पौराणिक सगुण गणेशरूपाचे गुणवर्णन केले आहे.

श्री गणपती चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी आहे. सर्वसिद्धी प्राप्त करून देणारा, अज्ञान दूर करणारा, ओंकाररूप असणाऱ्या गणपतीस समर्थ  सर्वप्रथम वंदन करतात. सर्व चराचर सृष्टीचे मूळ असलेल्या गणपतीस ब्रह्मा, विष्णू आणि महेश सुद्धा वंदन करतात. गणपतीची कृपा असेल तर सर्व सिद्धी प्राप्त होतातच आणि काळसुद्धा आपला गुलाम बनतो. तसेच  इतर संकटे गणपतीच्या नुसत्या नामस्मरणाने दूर पळून जातात. समर्थ पुढे अशी प्रार्थना करतात की “ अध्यात्मशास्त्राचा हा ग्रंथ लिहिण्याचा मी संकल्प केला आहे, म्हणून देवा! तुम्ही माझ्या अंतःकरणात नित्य वास करावा, जेणेकरून मला ग्रंथ लिहिणे सुलभ होईल.” या जगात जे जे उत्तम आहे त्याचे भांडार म्हणजे 

श्रीगणेश आहे. विघ्नहर्त्याचे स्मरण करून कोणतेही कर्म केल्यास मनुष्य त्यात नक्कीच यशस्वी होतो.

वक्रतुंड महाकाय कोटीसूर्यसमप्रभ ।

निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

गणपती आपली आद्यदेवता असल्यामुळे त्याचे गुणवर्णन याआधीही प्रत्येकाने आपापल्या प्रतिभेनुसार केले आहे. गणपतीच्या नुसत्या चिंतनानेदेखील आपल्याला समाधान प्राप्त होते. गणपतीचे रूप अत्यंत मनोहर आहे. गणपतीचे नृत्य पाहताना सर्व देव मंत्रमुग्ध होऊन जातात. हा गणपती सदा मदमस्त असतो, परमानंदाने सदा डुलत असतो. त्याचे वदन नेहमीच प्रसन्न असते. ते प्रसन्न वदन पाहून आपण सुद्धा आनंदित होतो. गणपती धिप्पाड आणि सर्वशक्तीमान आहे. त्याचे भाळ विशाल असून त्यावर शेंदूर लावलेला आहे. त्याची सोंड खूप मोठी असून ती सतत हलत असते. ” थबथबां गळती गंडस्थळे।…..” (दासबोध 1.1.11) गणपतीच्या गंडस्थळातून जो ‘मद’ पाझरतो तो ‘ज्ञाना’चा असतो आणि त्याभोवती ‘ज्ञानार्थी भुंगे’ गुंजारव घालत असतात, असा अनेक अधिकारी साधकांचा अनुभव आहे.

गणपतीचे डोळे अतिशय लहान असून तो त्याची सतत उघडझाप करीत असतो. त्याचे कान विशाल आहेत. मस्तकी रत्नजडीत मुकुट आहे , कानात कुंडले धारण केली आहेत आणि त्यातील निलमण्याचा प्रकाश विशेष आकर्षित करीत असतो. गणपतीने नाना अलंकार धारण केलेले आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये सर्व देव आणि देवता ह्या शस्त्रधारी आहेत. गणपती चतुर्भुज असून  त्याने एका हातात परशु आणि दुसऱ्या हातात अंकुश अशी दोन शस्त्रे धारण केली आहेत. तसेच तिसऱ्या हातात कमळ आणि चौथ्या हातात मोदक आहे. आपल्याकडे अहिंसा परमधर्म मानला गेला आहे, पण ही अहिंसा बलवानाची आहे. दुर्बल मनुष्याच्या अहिंसेला काहीही किंमत नसते. बेगडी अहिंसा आपल्याच सर्वनाशाला कारणीभूत ठरते, आणि याचे दुष्परिणाम आपण आज सुद्धा भोगत आहोत. गणपतीने गळ्यात नाना प्रकारचे सुवर्ण अलंकार धारण केलेले आहेत. कंबरेला जिवंत नागाचा वेढा आहे. पितांबर नेसलेला गणपती खूप सुंदर दिसत आहे. टाळ मृदुंगाच्या तालावर गणपती अत्यंत कुशलतेने नृत्य करतो. त्याचे नृत्य पाहणे हा अनुपम्य सोहळा असतो. तसा गणपती शरीराने स्थूल आहे, त्याचे पोट मोठे आहे. पण तरीही तो अत्यंत चपल आहे. तो चालत असताना त्याच्या पायातील पैंजणांची रुणझुण कानाला गोड वाटते. गणपती जिथे जिथे जातो तेथे त्याच्या उपस्थितीमुळे, त्याच्या दिव्य, भरजरी वस्त्रांमुळे त्या सभेला,  जागेला विशेष शोभा प्राप्त होत असते. असा हा गणपती सर्वांगसुंदर आहे. त्याला समर्थ साष्टांग नमस्कार करतात. 

गणपतीच्या सगुण रुपाला विशेष अर्थ आहे असे जाणवते. गणपतीचे  बारीक डोळे मनुष्याला सूक्ष्म अवलोकन करायला सुचवितात. विशाल  कर्ण जास्तीत जास्त ऐकायला शिकवितात. मोठे पोट मानापमान पोटात घ्यायला शिकविते. गणपतीचे मुख हे हत्तीचे आहे. त्यामागे विविध कथा सांगितल्या जातात. एक तर त्याकाळी विज्ञान प्रगत होते असे म्हणता येईल आणि दुसरे म्हणजे एखाद्याला उपजत सौंदर्य नसेल किंवा पुढे अपघाताने ‘विद्रूपता’ प्राप्त झाली, तरी मनुष्य स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर श्रेष्ठत्व प्राप्त करू शकतो, किर्ती मिळवू शकतो. गणपतीच्या  हातातील शस्त्र भक्ताने  शस्त्रसज्ज असावे आणि अखंड  सावधान असावे असे सुचवितात. कारण तो सेनानायक आहे. पायातील पैंजण मनुष्याच्या अंगी नाना कला (‘कळा’ नव्हे) ) असाव्यात असे सूचित करतात. दैनंदिन व्यवहारात कधी कोणती कला उपयोगी पडेल याचा नेम नाही म्हणून जे जे शक्य ते मनुष्याने शिकले पाहिजे. महाभारतात महापराक्रमी अर्जुनाला ‘बृहन्नडा’ व्हावे लागले होते. गणपती चपळ आहे कारण युद्धात चपळता जास्त कामी येते. गणपतीला मोदक आवडतो. मोदकात असलेले नारळ, गुळ आणि भात हे शरीरासाठी पोषक आहेत, तसेच ते इथल्या मातीत पिकणारे आहे. असे विविध गुण आपण गणपतीच्या सगुणरूपातून आत्मसात करू शकतो. पूर्वी शाळेत सुद्धा सर्वप्रथम “श्री गणेशाय नमः” असेच शिकवत असत.

गणपती शब्द दोन शब्दांचा समूह आहे. गण आणि पती. गण म्हणजे समूह आणि पती याचा अर्थ नेता किंवा सांभाळणारा, संचालन करणारा. म्हणून ज्याला ‘गणपती’ व्हायचे असेल म्हणजे ज्याला समूहाचे, समाजाचे नेतृत्व करायचे असेल त्याने गणपतीची उपासना करावी. समर्थांचा महंत असाच ‘गण’पती आहे. ज्याची बुद्धी मंद असेल त्याने गणपतीची उपासना करावी. गणपती सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि सर्व संकटांचे हरण करणारा आहे.

आजची देशकाल परिस्थिती बघितली तर स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, फक्त एकाच देवीची अर्थात भारतमातेची पूजा करण्याची गरज आहे. भारतमातेची पूजा करणे म्हणजे किमान एका सामाजिक उपक्रमात सहभागी होणे. समाजाचे काम करायचे असेल , नेतृत्व करायचे असेल तर गण-पती व्हावे लागेल. किमान गणातील एक ‘ आदर्श सदस्य’ होण्याचा तरी आपण यथाशक्ती प्रयत्न करूया. उत्तम समूहसदस्यच पुढे उत्कृष्ट नेता (गणपती) होऊ शकतो.

जय जय रघुवीर समर्थ।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला फक्त मज्जा हवीय… लेखक – अनामिक ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ मला फक्त मज्जा हवीय… लेखक – अनामिक ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(अतिशय गंभीर चिंतनीय पोस्ट!)

“मला फक्त मज्जा हवीये” (Todays Goal of Every Youth)

तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे?

प्राचीन काळी “ज्ञानप्राप्ती आणि परमार्थसाधना” हे उदात्त उत्तर मिळत असे.

अर्वाचीन काळी “प्रापंचिक सुख” हे व्यवहारात बसेल इतपत उत्तर देत असत.

आत्ता काल-परवा “पैसा, समाधान, शांती” हे शब्द ऐकू यायचे.

हल्ली थेट विकेट पडते –

“मला फक्त मज्जा करायचीये”.

विषय संपला.

“मज्जा केलीच पाहीजे” ही बळजबरी माणसं एकमेकांच्या ऊरावर पांघरू लागलीयेत.

इथे “मज्जा” ही निवडीची गोष्ट राहीली नाहीये; ती “निकड” झालीये; केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही; ती समाजातल्या “मॉडर्न” शहाण्यांनी (!) आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी.

तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. म्हणजे पहा –

“बर्थडे सेलिब्रेशन घरात? शी…”

“पार्टी नाही? शी…”

“फ्रायडे नाईट, आणि तू घरी आहेस? शी… पथेटिक…”

तुम्ही घरी स्वयंपाक वगैरे करून खाता विकेंडला!? फारच बोरिंग ….

“तू आजवर कधी पब मध्ये गेलीच नाहीस? काय काकूबाई आहेस गं…”

“वेलेन्टाईन डे; आणि नो रोजेस? शी, बोअर…”

“डेटवर चाललायस? आणि हातात नो गिफ्ट्स? So sad…”

“वीकेन्ड घरच्यांबरोबर? नो फ्रेन्ड्स? नो आऊटिंग? शी…”

यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले.

तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे या भोगवादात सापडावेत, यासाठी (त्यातल्या त्यात।पाश्चात्य) कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच.

TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला.

न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून “आजचं बघा” हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रितीचं झालं.

सी सी डी अन् बरिस्तामधल्या दोनशे रुपयाच्या कॉफ्या आम्हाला स्वस्त वाटू लागल्या.

“अनलिमिटेड बुफे” च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे “त्यात काय एवढं?” असं झालं.

जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन “लिनन”च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं.

एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं “big fat पंजाबी वेडिंग” झालं; घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले “इवेन्ट्स” झाले.

मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती. आमचं Grand Live life kingsize उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा.

तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या “प्रेमाचं” मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल.

कमवा; आणि उडवा.

तुम्ही तुमच्या नवाबज़ाद्यांकडे पाहा बघू. लिव Macho !!

भले तुम्ही स्टायपेन्डवाले ट्रेनी इंजिनिअर असा.

विषय इतपत येऊन थांबलेला नाही. दारू नि सिगरेटचं उदात्तीकरण तर आता जुनं झालं. आता त्याच्यापुढे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय पोरांच्या तोंडीही “वीड”, “ग्रास” हे शब्द येऊ लागलेत.

यांचे अर्थ माहितीयेत? गांजासारख्या भयानक नशील्या पदार्थांची अमेरिकेतून उचललेली बोली भाषेतली नावं आहेत ही.

या घाणीची जाहिरात थेट करता येत नाही; पण त्यासाठी आमचे नव्याने पैदास झालेले “रॉकस्टार्स” आणि “rap singers” आहेत ना! त्यांच्या गाण्यांतून या अमली विकृतीची भलावण रोजच्या रोज होतेय. “मनाली ट्रान्स” म्हणे. शोधा गुगलवर लिरिक्स. शब्दांना जोड दृश्यांची. दृश्यांत ठासून भरलेला सेक्स. अनिर्बंध, अमर्याद आणि मुद्दाम चाळवणऱ्या अनैतिक नात्यांचा, अगदी घरच्या अंतर्गत नात्यातही तो  मुक्तहस्ते सपोर्ट करणारा !!! एकेक वेब सिरिज मनोरंजन कमी, आणि पोर्नोग्राफी जास्त  इतपत मज्जेच्या डेफिनेशन्स गेलेल्या !!! तरुणांना नाद लावायला तेवढं पुरतं.

चील… एंजॉय… पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग.

मग मेलात तरी चालेल.

आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय आपल्या?

चंगळवाद हा एक कॉर्पोरेटधार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे. “आम्ही कित्ती आनंदात आहोत”, “आमचं कित्ती मस्त चालू आहे”, “आम्ही कित्ती एंजॉय करतोय”, हे दुसऱ्याला दाखवणं, हा चंगळवादाचा अट्टहास असतो.

ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो.

मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती “cool” आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं ना;  त्यात बऱ्याच जणांचा श्वास कोंडला जातो.

तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं.

मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने “सो पथेटिक” म्हणून नकारात्मकतेने पाहीलं जातं; त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होतात.

गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात.

त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं. म्हणूनच मग “तुम्ही दारू पिऊन पार्ट्या करत नाही, म्हणजे आयुष्य कसं एंजॉय करायचं ते तुम्हाला माहीतच नाही”, अशी बिनडोक तर्कटं मांडली जातात; जी हास्यास्पद ठरतात.

हेअर जेल, मेक अप आणि ब्रांडेड कपड्यातली बिनधास्त आहोत हे दाखवत राहण्याची केविलवाणी धडपड नजरेत लपत नसते. ब्रांडेड आयुष्यातल्या पोकळ्या वेडावतातच.

जागे होऊया रे.

स्वत्व नको विकूया आपण.

दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहीजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत !! 

उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंतकाळ चमकतो.

आपण सूर्य निवडू या.

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print