मराठी साहित्य – विविधा ☆ “अंक, आकडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “अंक, आकडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

अंक किंवा आकडा यांचा व माझा प्रत्यक्ष संबंध शाळेपासून आला असला तरीही सुरुवात झाली ती मात्र जन्मापासूनच.  कशी ते शेवटी सांगेनच.

आपल्याकडे जसे काही देवांना अनेक नांवे आहेत ना तसेच अंकांचे देखील आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे वेळ या नावाने फिरत असतात.

कॅलेंडरवर ते तारीख म्हणून विराजमान असतात. तारीख म्हणून ते ठसठशीत असतात. पण या तारखेच्या चौकोनातच बाजूला कुठेतरी बारीक अक्षरात कृ. म्हणजे कृष्ण आणि शु. म्हणजे शुक्ल पक्ष असे एक ते चौदा पर्यंत असतात. तेव्हा ते तिथी या स्थितीत असतात. 

रेल्वे, विमान, बस, नाट्य आणि चित्रपट गृहात, तसेच परिक्षेच्या वर्गात ते सीट नंबर असतात. तर वर्गात रोल नंबर म्हणून परिचित असतात. 

काहीवेळा त्यांचा नंबर असा उल्लेख होतो. मग तो नंबर चष्म्याचा, फोनचा, परिक्षेचा, गाडीचा, अगदी बॅंकेचा अकाउंट नंबर ते आधार कार्ड वरचा असा कशाचाही असू शकतो. थोडक्यात आकडे आपला आधार आहेत.

परिक्षेत मिळालेले गुण असतात. तर पत्रिकेत देखील गुणच असतात. पण परिक्षेत मिळवावे लागतात आणि पत्रिकेत ते जुळावे लागतात.

कोणत्याही खरेदी केलेल्या वस्तू बद्दल कागदावर ते मांडले गेले की त्यांचे बिल होते. शींप्याने कागदावर लिहीली तर मापे, आणि  घराच्या संदर्भात देखील मापेच असतात, पण घरांच्या बाबतीत त्यांना कार्पोरेट फिल येतो आणि ते कार्पेट एरिया म्हणून ओळखले जातात.

एकाच माणसाचे वेगवेगळ्या व्यक्तींसोबत वेगवेगळे नाते आणि त्या नात्याची किंमत असते. तसेच यांनी देखील एकक, दशक, शतक असे स्थान बदलले की यांची किंमत बदलते.

हल्ली मोठे आकडे सुध्दा लहान स्वरूपात सांगतात. जसे घराची किंमत १ किंवा १.५ CR. असे. लहानपणी देखील आम्हाला CR. आणि WR. असे ठाऊक होते. पण ते सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे असेच होते. नंतर काॅलेजमध्ये CR शी संबंध आला पण पैशातील CR चा संबंध अलीकडच्या काळातील आहे.

हे आकडे सरळ आले असते तर चालले असते. पण त्यात परत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे आले. सोबत सरासरी आणि टक्केवारी देखील आणली. इथेच थांबले नाहीत. पूर्णांक, अपूर्णांक असे भाऊबंद घेऊन येतांना सम, विषम, मुळसंख्या अशा लवाजम्यासह आले.

कामाच्या बदल्यात पदरी पडलेले आकडे पगार असतात. यात देखील ते ढोबळ आणि निव्वळ असे वेगवेगळे असतात. 

शुभ, अशुभ असे आपणच यात केले आहे. तेरा अशुभ, तर एकमेकांशी पटत नसले तर छत्तीस चा आकडा हे यांच्या बाबतीत आपणच ठरवले.

हे वजन आणि उंची देखील सांगतात. वजनाने घेतलेल्या गोष्टी ग्रॅम, लिटर मध्ये तर अंतराच्या भाषेत फर्लांग, मैल, किलोमीटर मध्ये, आणि उंची फुटात, इंचात, सेंटिमीटर मध्ये सांगतात.

आकडे हे गणित घालतात. निवडणुकांमध्ये देखील हे आकड्यांचे गणित जमवावे आणि सोडवावे लागते.

नुकत्याच जाहीर झालेल्या परिक्षेच्या निकालाचे पहा. सगळे आकड्यातच होते. एकूण परिक्षेला बसलेले किती? पास झालेले किती? मुले किती? मुली किती? मुले आणि मुली यांचे प्रमाण आणि पास होण्याचे प्रमाण किती?

या शिवाय वाणिज्य, विज्ञान, कला यात किती? आणि विभागवार पुणे, कोल्हापूर, कोकण, मराठवाडा, विदर्भ इ….. सगळे एकूण आणि टक्केवारीसह पण आकड्यातच.

सगळे आकडे दिसणारे, समजणारे असतात. पण काही आकडे वेगळे असतात. हे साधारण लटकवायला किंवा विद्युत तारांवर टाकतात. आकड्यात वैध आणि अवैध आकडे आहेत का माहित नाही. पण विद्युत तारांवर टाकलेले आकडे अवैध असतात असे म्हणतात.

माझी आजी अंबाडा घालतांना आकडे वापरायची. पण त्यात मला कोणताही आकडा किंवा आकड्यासारखा आकार दिसलाच नाही.

ग्रामीण भागात काही लोकं आकडी आली असे म्हणतात. पण आकड्यांचे हे स्त्रीलिंगी रूप मला नीट समजलेले नाही.

हत्तीच्या बाबतीत जसे त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात असे म्हणतात. तसेच काही ठिकाणी कागदावरचे आणि प्रत्यक्षातले आकडे वेगळे असतात असे ऐकले आहे. पण असतात ते आकडेच.

आकड्यांची सोबत जन्मापासून झाली ते कसे हे सांगतो. माझा जन्म झाल्यावर तारीख, महिना, वर्ष इतकेच काय वेळेसह  ते नोंदले गेले तरी ते सगळे आकडेच, अंकच आहेत. आणि मी गेल्यावरही ते नोंदवले गेले तरीही आकडेच राहणार आहेत.

असे हे आकडे विमा कंपनीच्या जाहिराती सारखे “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी|” सोबत असणार आहेत.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सगळेच फुकट? का?”… लेखक – श्री अनिल शिंदे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? विविधा ?

☆ “सगळेच फुकट? का?”- लेखक – श्री अनिल शिंदे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

आज बालवाडीपासूनच फुकटचा भात, अंडी, शिरा देउन बालमनापासूनच लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण, १०० यूनिट्स मोफत, वीज फुकट, रेशन सरसकट, आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट, ऊठसूठ कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून सध्याच्या आणि पूर्वीच्याही सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणार आहेत.

देशात सध्या जवळपास ६७% लोकसंख्या तरुणांची हीच अवस्था आहे, हेच प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रात आहे.

ज्या वयात आपले भविष्य घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत, त्या वयातल्या तरुणाला महिना ६०० रुपये दिले की जेवण, मोफत वीज, सरसकट कर्जमाफी दिली जाते. अशाने त्यांची विधायक क्रयशक्ती संपून जाणार आहे.

यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे अशी की गेल्या १० वर्षापासून इ. १ ली ते ८ वी पर्यंत परिक्षाच झालेली नाहीये. ९ वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत. त्यामुळे यापुढे तरुण पिढीचा भविष्यकाळ खूप कठीण असणार आहे.

ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक, बहुतांश ठिकाणी महागड़े Mobile, Bike, तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार PM कसा चुकीचा, CM कसा चुकतो पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फोटो कोणत्या पोजमध्ये टाकायचा यासारख्या चर्चेत गुंतलेला असते….. आता हीच तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलायला सहज उपलब्ध होते….. फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता, फुकट रेशन यामुळे एक अख्खी कर्तृत्ववान पिढी बरबाद होणार आहे.

आजच्या तरुणाकडे आशिष्ठः, द्रढिष्ठाः, बलिष्ठाः ही सामर्थ्य असायला हवीत, हा तरुण धेयवादी असावा तरच तो या गोष्टींना लाथ मारील व मला फुकटचे नको असे सांगेल.

सगळेच फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा देखील राहणार.

कोणतीही गोष्ट आकाशातून फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे ५-६ टक्के करदाते आहेत ते व शेवटी ते शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपात येऊन पडते.

स्विट्झरलंडमध्ये ३-४ वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती. तेव्हा ७७% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नकों, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून याला विरोध केला. आपल्याला स्विट्झरलंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते, पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो.

आपल्याला जर खरंच स्वतःला आणि भारत देशाला संपन्न करून प्रगतिपथावर न्यायचे असेल तर ‘ सगळेच फुकट ‘ ही मानसिकता सोडा आणि अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय मी आज मनापासून करेन. सरकारनेही जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायलाच हव्यात.

अन्न फुकट पाहीजे, ते खाण्यासाठी पैसे नाहीत, ते सरकारने द्यावे. किमान आपण राहत असलेल्या आपल्या घराचे १०० Units चे लाईट बिल तरी भरायला हवे, ते भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, ते सुद्धा सरकारने भरावे, मग आपण जन्म कशासाठी घेतला आहे? आपल्यापेक्षा मग पशु-पक्षी बरे, लाॕकडाऊनमध्ये प्राणी-पक्षांना सरकारने काय मोफत दिले? तरी त्यांनी चारा शोधलाच ना! ते जीवन जगलेच ना.

आणि आपण मनुष्य जन्माला आलो आहोत कशासाठी? अशी अवस्था आज आपल्या देशात आहे, इतर देशात कुठेही नाही.

मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो…

… आणि मग यातूनच मग आपल्या संतानी म्हटल्याप्रमाणे ‘ रिकामे मन, सैतानाचे घर ‘ यानुसार दुराचार बलात्कार, व्याभिचार, लुटमार वाढतात व राष्ट्राचे प्रगतीऐवजी यातून नुकसानच जास्त होते.

*आत्ताचे आपल्या पिढीचे सोडा हो! पण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा सगळ्यांनी नक्कीच विचार करा!”

लेखक : श्री अनिल शिंदे 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग-2 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग -2 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मग रामगिरीहून, जिथे सीतेची स्नानकुंडे आहेत, अशा पवित्र ठिकाणाहून अश्रु भरलेल्या नयनांनी यक्ष मेघापाशी निरोप देतो ! मित्रांनो आता बघू या तो सुंदर श्लोक !) इथून पुढे —-

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी,

नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ: ।

आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं,

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।

— अर्थात, आपल्या प्रिय पत्नीच्या वियोगाने दग्ध झालेल्या पीडित व अत्यंत व्यथित असल्यामुळे यक्षाच्या मणिबंधातील (मनगटातील) सुवर्णकंकण, तो देहाने क्षीण झाल्यामुळे शिथिल (ढिले) होऊन भूमीवर पडल्यामुळे, त्याचे मणिबंध सुने सुने दिसत होते! आषाढाच्या प्रथम दिनी त्याच्या दृष्टीस पडला तो एक कृष्णवर्णी मेघ! तो रामगिरी पर्वताच्या शिखराला कवेत घेऊन क्रीडा करीत होता, जणू एखादा हत्ती मातीच्या ढिगाऱ्याची माती उपटण्याचा खेळ करीत असतो. 

कालिदास स्मारक, रामटेक 

प्रिय मित्रांनो, हाच तो श्लोकातील जणू काही काव्यप्रतिभेचा तीन अक्षरी बीजमंत्र “आषाढस्य प्रथम दिवसे”! या मंत्राचे प्रणेते कालिदास यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रत्येक वर्षी आपण आषाढ महिन्याच्या प्रथम दिनी (आषाढ शुक्ल प्रतिपदा) कालिदास दिन साजरा करतो. ज्या रामगिरी (आत्ताचे रामटेक) पर्वतावर कालिदासांना हे काव्य स्फुरले, त्याच कालिदासांच्या स्मारकाला लोक भेट देतात, अखिल भारतात याच दिनी कालिदासमहोत्सव साजरा केल्या जातो! मंडळी, आपल्याला अभिमान वाटेल, असे महाराष्ट्रातील प्रथम कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे स्थापन झाले. यंदा कालिदास दिन आहे १९ जूनला.

मित्रांनो, आधी सांगितल्याप्रमाणे यक्षाला आषाढाच्या प्रथम दिनी पर्वतशिखरांना लिप्त करून आलिंगन देणारा मेघ, क्रीडा करणाऱ्या प्रेक्षणीय हत्तीप्रमाणे दिसला. १२१ श्लोक (पूर्वार्ध म्हणजे पूर्वमेघ ६६ श्लोक आणि उत्तरार्ध म्हणजे उत्तरमेघ ५५ श्लोक) असलेले हे सकल खंडकाव्य फक्त आणि फक्त एकच वृत्त, मंदाक्रांता वृत्तात (ह्या वृत्ताचे प्रणेते स्वतः कालिदासच!) गेय काव्यात छंदबद्ध करणे ही प्रतिभा (आणि प्रतिमा नव्हे तर प्रत्यक्षात) केवळ आणि केवळ कालिदासांचीच!      

यक्ष आकाशातील मेघालाच आपला सखा समजून दूत बनवतो, त्याला रामगिरी ते अलकापुरीचा मार्ग सांगतो, आपल्या प्रियतमेचे विरहाने झालेले क्षतिग्रस्त शरीर इत्यादीचे वर्णन करून, मेघाला आपला संदेश त्याच्या प्रियतमेपर्यंत पोचवण्याची काकुळतेने विनंती करतो! मंडळी, यक्ष आहे जमिनीवर, पण पूर्वमेघात तो मेघाला प्रियतमेच्या अलकानगरीपर्यंत जाण्याचा मार्ग सांगतो, यात ९ प्रदेश, ६६ नगर, ८ पर्वत आणि १० नद्यांचे भौगोलिक असूनही विहंगम अन रमणीय वर्णन आले आहे. विदर्भातील रामगिरी येथून या मेघदूताचा हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अलकानगरीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास यात वर्णन केला आहे. शेवटी कैलासाच्या कुशीत वसलेल्या अलकानगरीत मेघ पोचतो. या वर्णनात मेघाची प्रियतमा विद्युल्लता आपल्याला भेटते. उत्तर मेघ हा यक्षाने प्रेयसीला दिलेला संदेश आहे. प्रियेने विरहव्याधीमुळे प्राणत्याग करू नये आणि धीर धरावा, असा संदेश तो यक्ष मेघाकरवी पाठवतो. तिला तो मेघाद्वारे संदेश देतोय “आता शाप समाप्त व्हायला अवघे चार मासच उरले आहेत, मी कार्तिक मासात येतोच आहे”. काव्याच्या अंतिम श्लोकात हा यक्ष मेघाला म्हणतो, “तुझा मात्र तुझ्या प्रिय विद्युलतेशी कधीही वियोग न घडो!” असे हे यक्षाचे विरहगान आहे.  

मित्रांनो! स्टोरी काही विशेष नाही, आपण अरसिक पत्र लिहितो तेव्हा पोस्टल ऍड्रेस लिहितो, आत ख्यालीखुशालीच्या ४ ओळी! पण ऍड्रेस बिनचूक, विस्तृत अन आतला मजकूर रोमँटिक असल्यामुळे पोस्टखात्याला भावेल असा असेल तर मग पोस्टखाते पोस्टाचे तिकीट काढून त्या लेखकाला सन्मानित करेल की नाही! खालील पोस्टाचे सुंदर तिकीट हे कालिदासांच्या ऍड्रेस लिहिण्याच्या कौशल्याला केलेला दंडवतच समजा! या काळात कालिदास असते तर, तेच निर्विवादपणे या खात्याचे Brand Ambassador  राहिले असते! कालिदासांनी आपल्या अद्वितीय दूतकाव्यात दूत म्हणून अत्यंत विचारपूर्वक आषाढातील निर्जीव पण बाष्पयुक्त धूसर वर्णाच्या मेघाची निवड केलीय, कारण हा जलयुक्त मेघसखा रामगिरी ते अलकापुरी हा दीर्घ प्रवास करू शकेल याची त्याला खात्री आहे! शरदऋतूत मेघ रिताच असतो, शिवाय आषाढ महिन्यात संदेश पाठवला तर तो त्याच्या प्रियेपर्यंत शीघ्र पोचेल असे यक्षाला वाटले असावे!

(“आषाढस्य प्रथम दिवसे”- प्रहर वोरा, आलाप देसाई “सूर वर्षा”)

मंडळी, आषाढ मासाचा प्रथम दिन आणि कृष्णवर्णी, श्यामलतनु, जलनिधीने परिपूर्ण असा मेघ होतो संदेशदूत! पत्ता सांगणे आणि संदेश पोचवणे, बस, इतकीच शॉर्ट अँड स्वीट स्टोरी, पण कालिदासांचा परीसस्पर्श लाभला व हा आषाढमेघ अमर दूत झाला! रामगिरी ते अलकानगरी, मध्ये हॉल्ट उज्जयिनी (वाट वाकडी करून, कारण उज्जयिनी ही कालिदासांची अतिप्रिय रम्य नगरी!) असा मेघाला कसा प्रवास करावा लागेल, वाटेत कुठले माईल स्टोन्स असतील, त्याची विरहव्याकूळ पत्नी (अन मेघाची भावजय बरं का, no confusion!) दुःखात विव्हळ होऊन कशी अश्रुपात करीत असेल हे तो यक्ष मेघाला उत्कट आणि भावमधूर काव्यात सांगतोय! यानंतर संस्कृत साहित्यात दूतकाव्यांची जणू फॅशनच आली (त्यातील महत्वाचे म्हणजे नल-दमयंतीचे आख्यान), पण मेघदूत हा “या सम हाच” राहिला! प्रेमभावनांचा इंद्रधनुषी आविष्कार असणारे, वाचकाला यक्षाच्या विरहव्यथेत व्याकुळ करणारेच नाही तर आपल्या काव्यप्रतिभेने मंत्रमुग्ध करणारे “मेघदूत!’ म्हणूनच आषाढ मासाच्या प्रथम दिनी या काव्याचे आणि त्याच्या निर्मात्याचे स्मरण करणे अपरिहार्यच!

प्रिय वाचकांनो, आता कालिदासांच्या महान सप्त रचनांचा अत्यल्प परिचय करून देते! या साहित्यात ऋतुसंहार, कुमारसंभवम्, रघुवंशम् व मेघदूत या चार काव्यरचना आहेत, तसेच मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय व अभिज्ञान शाकुंतलम् या संस्कृतमधील तीन नाटक-वजा-महाकाव्ये आहेत!  

आचार्य विश्वनाथ म्हणतात “वाक्यं रसात्मकं काव्यम्” अर्थात रसयुक्त वाक्य म्हणजेच काव्य!

कालिदासांच्या काव्यरचना आहेत निव्वळ चार! (संख्या मोजायला एका हाताची बोटे पुरेत! 

रघुवंशम् (महाकाव्य)

हे महाकाव्य कालिदासांची सर्वोत्कृष्ट काव्यरचना मानली जाते! यात १९ सर्ग असून सूर्यवंशी राजांच्या दैदिप्यमान वंशावलीचे यात तेजस्वी वर्णन आहे. या वंशातील अनेक राजांचे, मुख्यतः  दिलीप, रघु, अज आणि दशरथ यांचे चरित्र  या महाकाव्यात चित्रित केले गेले आहे! सूर्यवंशी राजा दिलीपपासून तर श्रीराम आणि त्यांचे वंशज असे हे या काव्यातील अनेक नायक आहेत.

कुमारसंभवम् (महाकाव्य)

हे आहे कालिदासांचे प्रसिद्ध महाकाव्य! यात शिवपार्वती विवाह, कुमार कार्तिकेयाचा जन्म आणि त्याच्या द्वारे तारकासुराचा वध या प्रमुख कथा आहेत.

मेघदूत (खंडकाव्य)

या दूतकाव्याविषयी मी आधीच लिहिले आहे. 

ऋतुसंहार (खंडकाव्य)

ही कालिदासांची सर्वप्रथम रचना आहे, या गेयकाव्यात सहा सर्ग आहेत, ज्यांत षडऋतूंचे (ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत) वर्णन आहे.

कालिदासांच्या नाट्यरचना आहेत निव्वळ तीन! (संख्या मोजायला एका हाताची बोटे पुरेत!)     

अभिज्ञानशाकुन्तलम् (नाटक)

या नाटकाविषयी काय म्हटले आहे बघा,”काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला” (कवितेच्या विविध रूपांत जर कुठले नाटक असेल, तर नाटकातील सर्वात अनुपमेय रम्य नाटक म्हणजे अभिज्ञानशाकुन्तलम्). महाकवी कालिदासांचे हे नाटक सर्वपरिचित आणि सुप्रसिद्ध आहे. महाभारताच्या आदिपर्वात वर्णित शकुंतलेच्या जीवनावर आधारित संस्कृत साहित्यातील सर्वश्रेष्ठ नाटक म्हणजे अभिज्ञानशाकुन्तलम्!

विक्रमोर्यवशियम् (नाटक)

महान कवी कालिदासांचे हे एक रोमांचक, रहस्यमय आणि चित्तथरारक कथानक असलेले ५ अंकी नाटक! यात कालिदासांनी राजा पुरुरवा आणि अप्सरा उर्वशी यांच्या प्रेमसंबंधाचे काव्यात्मक वर्णन केले आहे.

मालविकाग्निमित्र (नाटक)

कवी कालिदासांचे हे नाटक शुंगवंशाचा राजा अग्निमित्र आणि एका सेवकाची कन्या मालविका यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. ही कालिदासांची प्रथम नाट्यकृती होय!

तर मैत्रांनो, ‘कालिदास दिना’ निमित्त या महान कविराजाला माझा पुनश्च साष्टांग प्रणिपात !

प्रणाम आणि धन्यवाद !     

— समाप्त — 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

(टीप :  लेखात दिलेली माहिती लेखिकेचे आत्मानुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे.)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग-1 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग – 1 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार प्रिय मैत्रांनो !

आज १९ जून २०२३, आजची तिथी आषाढ शुद्ध प्रतिपदा, अर्थात आषाढ महिन्याचा पहिला दिवस. आजचा दिवस साहित्य प्रेमींसाठी सुवर्ण दिन, कारण या दिवशी आपण साजरा करतो ‘कालिदास दिन’. मैत्रांनो, हा त्यांचा जन्मदिन अथवा स्मृती दिन नव्हे, कारण ते दिवस आपल्याला माहीतच नाहीत. मात्र त्यांची काव्यप्रतिभा एवढी उत्तुंग आहे की, आपण हा दिवस त्यांच्याच एक अजरामर खंडकाव्यातून शोधला आहे. कालिदास, संस्कृत भाषेचे महान सर्वश्रेष्ठ कवी आणि नाटककार! दुसऱ्या-पाचव्या शताब्दीतील गुप्त साम्राज्यकाळातील अनुपमेय साहित्यकार म्हणून त्यांना गौरवान्वित केलेले आहे. त्यांच्या काव्यप्रतिभेला अनुसरून त्यांना दिलेली “कविकुलगुरु” ही उपाधी स्वतःच अलंकृत आणि धन्य झाली आहे! संस्कृत साहित्याच्या रत्नमालेत त्यांचे साहित्य या मालेच्या मध्यभागी चमकत्या कौस्तुभ मण्याप्रमाणे जाणवते! पाश्चात्य आणि भारतीय, प्राचीन आणि अर्वाचीन विद्वानांच्या मते कालिदास हे जगन्मान्य, सर्वश्रेष्ठ व एकमेवाद्वितीय असे कवी आहेत! या साक्षात सरस्वतीपुत्राच्या बहुमुखी व बहुआयामी प्रज्ञेचे, प्रतिभेचे आणि मेधावी व्यक्तिमत्वाचे किती म्हणून गोडवे गावेत? कालिदास दिनाचे औचित्य साधत या अद्वितीय महाकवीच्या चरणी माझी शब्दकुसुमांजली ! 

सुज्ञ वाचकांनी यात कालिदासांच्या प्रती असलेली माझी केवळ आणि केवळ श्रद्धाच ध्यानात असू द्यावी. मात्र माझे मर्यादित शब्दभांडार, भावविश्व आणि संस्कृत भाषेचे अज्ञान, या सर्व अडसरांना पार करीत मी हा लेख लिहिण्याचे ठरवले. मित्रांनो, संस्कृत येत नसल्याने, मी कालिदासांच्या साहित्याचे मराठीतील अनुवाद (अनुसृष्टी) वाचलेत! त्यानेच मी इतके भारावून गेले. कालिदासांच्या महान साहित्याचे मूल्यांकन करण्यास नव्हे तर एक वाचक म्हणून रसास्वाद घेण्याच्या दृष्टीनेच हा लेख लिहीत आहे!   

या कविराजांच्या अत्युच्य दर्जाच्या साहित्याचे मूल्यमापन संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक रित्याच केले पाहिजे. राष्ट्रीय चेतनेचा स्वर जागवण्याचे महान कार्य करणाऱ्या या कवीचा राष्ट्रीय नव्हे तर विश्वात्मक कवी म्हणूनच गौरव करायला हवा! अत्यंत विद्वान म्हणून गणले जाणाऱ्या त्यांच्या समकालीन साहित्यकारांनीच (उदा. बाणभट्ट) नव्हे, तर आजच्या काळातल्या जगभरातल्या साहित्यकारांनी देखील तो केलेला आहे! त्यांच्या जीवनाविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या नांवावर असलेल्या अंदाजे ३० साहित्य निर्मितींपैकी ७ साहित्यकृती निश्चित रूपाने त्यांच्याच आहेत असे मानले जाते. असे काय वैशिष्ट्य आहे कालिदासांच्या सप्तचिरंजीवी साहित्य अपत्यांमध्ये, की पाश्चात्य साहित्यिक कालिदासांचे नामकरण “भारताचा शेक्सपियर” म्हणून करतात! मला तर असे प्रकर्षाने वाटते की, यात गौरव कालिदासांचा नाहीच, कारण ते सर्वकालीन, सर्वव्यापी व सर्वगुणातीत अशा अत्युच्य गौरवशिखरावर आधीच आरूढ आहेत, यात खरा गौरव आहे शेक्सपिअरचा, त्याची तुलना केली जातेय कुणाशी, तर कालिदासांशी!

या महान रचयित्याचे जीवन जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या साहित्याचं वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्यांच्या जीवनाचे बरेच प्रसंग त्यांच्या साहित्यकृतींमध्ये उतरले आहेत, अशी मान्यता आहे. उदाहरण द्यायचे तर मेघदूत या खंडकाव्याचे, विरहाचे शाश्वत, सुंदर तथा जिवंत रूप म्हणून या काव्याकडे बघितले जाते, बरेच तज्ज्ञ मानतात की कल्पनाविलासाचे उच्चतम निकष ध्यानी धरूनही हे कल्पनातीत दूतकाव्य अनुभवाच्या अभावी रचणे केवळ अशक्य आहे. तसेच कालिदासांनी ज्या अचूकतेने विविध स्थळांचे आणि तिथल्या नगरांचे सविस्तर वर्णन केले आहे, ते ही त्यांचे त्या त्या ठिकाणी वास्तव्य असल्याशिवाय शक्य नाही. कालिदासांच्या सप्त कृतींनी संपूर्ण विश्वाला समग्र भारतदर्शन घडवले! उज्जयिनी नगरीचे वर्णन तर अगदी हुबेहूब, जणू चलचित्रासारखे! म्हणूनच बरेच विद्वान मानतात की कालिदासांचे वास्तव्य बऱ्याच कालावधीकरिता बहुतेक या ऐश्वर्यसंपन्न नगरीतच असावे! त्यांच्या रचना भारतातील पौराणिक कथा आणि दर्शनशास्त्रावर आधारित आहेत! यात तत्कालीन भारतीय जीवनाचे प्रतिबिंब दृष्टीस पडते, रघुवंशम् मध्ये इतिहास आणि भूगोल याविषयी त्यांचे प्रगाढ ज्ञान, त्यांच्या अगाध बुद्धिमत्तेचे आणि काव्यप्रतिभेचे द्योतक आहे यात शंकाच नाही. या भौगोलिक वर्णनासोबतच भारतातील पौराणिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, दार्शनिक आणि वैज्ञानिक दृष्टी व ज्ञान, तसेच सामान्य तथा विशिष्ट व्यक्तींची जीवनशैली, या सर्वांचे यथोचित दर्शन त्यांच्या रचनांमध्ये आढळते.    

त्यांच्या काव्य आणि नाटकांतील भाषा आणि काव्यसौंदर्य काय वर्णावे? भाषासुंदरी तर त्यांची जणू आज्ञाधारक दासी! निसर्गाची विविध रूपे साकारणारे ऋतुसंहार हे काव्य तर निसर्गकाव्याचे अत्युच्य शिखरच जणू! त्यांच्या इतर साहित्यात त्या त्या अनुषंगाने प्राकृतिक सौंदर्याचे बहारदार वर्णन म्हणजे जणू कांही अद्भुत इंद्रधनुषी रंगांची उधळण, आपण त्यांत रंगून जायचे, कारण हे सगळे काव्यप्रकार वृत्तांच्या चौकटीत अवचित विराजमान झालेले, ओढून ताणून बसवलेले नव्हेत! 

हे अनवट साहित्य म्हणजे अलंकारयुक्त अन नादमधुर अश्या भाषेचा सुरम्य आविष्कार! एखादी सुंदर स्त्री जेव्हा अलंकारमंडित होते, तेव्हा कधी कधी असा प्रश्न पडतो की अलंकारांचे सौंदर्य त्या सौंदर्यवतीमुळे वर्धित झालंय, की तिचे सौंदर्य अलंकारांनी सजल्यामुळे आणिक खुललय! मित्रांनो कालिदास साहित्य वाचतांना हाच भ्रम निर्माण होतो! या महान कविराजांच्या सौंदर्यदृष्टीची किती म्हणून प्रशंसा करावी! त्यात काठोकाठ भरलेल्या अमृतकलशांसम नवरस तर आहेतच, पण विशेषकरून आहे शृंगाररस! स्त्री सौंदर्याचे लोभस लावण्यमय आविष्कार तर त्यांच्या काव्यात आणि नाटकात ठिकठिकाणी आढळतात! त्यांच्या नायिकाच अशा आहेत की त्यांचे सौंदर्य वर्णनातीत असेलही कदाचित, पण कालिदासासारखा शब्दप्रभू असेल तर त्याला अशक्य ते काय? मात्र या सौंदर्यवर्णनात तत्कालीन आदर्शवादी परंपरा आणि नैतिक मूल्यांचा कुठेही ऱ्हास झालेला नाही! अलंकारांच्या गर्दीत सर्वात उठून दिसणारा अलंकार म्हणजे उपमालंकार, त्या उपमा कशा तर, इतरांसाठी अनुपमेय! मात्र जोवर या महान संस्कृत भाषेतील रचना प्राकृत प्रांतीय भाषांत सामान्य जनांपर्यंत पोचत नाहीत, तोवर या विश्वात्मक कवीचे स्थान अखिल जगात शीर्ष असूनही आपल्याच देशात मात्र अपरिचितच राहणार! अर्थात या वाङ्मयाचे कैक भारतीय भाषांमध्ये अनुवाद (अनुसृष्टी) झालेले आहेत हे ही नसे थोडके !

मेघदूत (खंडकाव्य)

खंडकाव्यांच्या रत्नपेटिकेत विराजित कौस्तुभ मणी असलेल्या मेघदूत या कालिदासांच्या रचनेचा काव्यानंद म्हणजे स्वर्गातील सुमधुर यक्षगानच होय! असे मानले जाते की, महाकवी कालिदासांनी मेघदूत हे त्यांचे प्रसिद्ध खंडकाव्य रामगिरी पर्वतावर (आत्ताचे रामटेक) आषाढ मासाच्या प्रथम दिनी लिहायला प्रारंभ केला! त्यांच्या या काव्यातील दुसऱ्याच श्लोकात तीन शब्द आलेले आहेत, ते म्हणजे “आषाढस्य प्रथम दिवसे”! आषाढाच्या प्रथम दिवशी कालिदासांनी जेव्हा आकाशात संचार करणारे कृष्णमेघ पाहिले तेव्हाच त्यांनी आपल्या अद्भुत कल्पना विलासाचे एका काव्यात रूपांतर केले, हीच ती त्यांची अनन्य कृती “मेघदूत”! यौवनातील सहजसुंदर तारुण्यसुलभ तरल भावना आणि प्रियेचा विरह या प्रकाश आणि अंधाराच्या संधिकालाचे शब्दबद्ध रूप पाहतांना आपले मन हेलावून जाते.

अलका नगरीत यक्षांचा प्रमुख, एक यक्ष कुबेराला महादेवाच्या पूजेसाठी सकाळी उमललेली ताजी कमलपुष्पे देण्याचे काम रोज करत असतो. नवपरिणीत पत्नीबरोबर वेळ मिळावा म्हणुन तो यक्ष रात्रीच कमळे तोडून ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कुबेर पूजा करत असताना त्या उमलू लागलेल्या फुलात रात्री कोंडला गेलेला भुंगा कुबेराला डंख मारतो. क्रोधायमान झालेला कुबेर यक्षाला शाप देतो. यामुळे त्या यक्षाची व त्याच्या प्रियेची ताटातूट होते. हीच शापवाणी मेघदूत या अमर खंडकाव्याची निर्माती ठरली. यक्षाला भूमीवर रामगिरी येथे १ वर्ष अलकानगरीत राहणाऱ्या आपल्या पत्नीपासून दूर राहण्याची शिक्षा मिळते. शापामुळे त्याच्या सिद्धी नाश पावल्याने तो कोणत्याही प्रकारे पत्नीला भेटू शकत नाही. त्याच विरहव्यथेचे हे “विप्रलंभ शृंगाराचे कवन” आहे. कालिदासांच्या कल्पनेची भरारी म्हणजेच हे अजरामर नितांतसुंदर असे प्रथम “दूत काव्य” म्हणून रचले गेले! मग रामगिरीहून, जिथे सीतेची स्नानकुंडे आहेत, अशा पवित्र ठिकाणाहून अश्रु भरलेल्या नयनांनी यक्ष मेघापाशी निरोप देतो! मित्रांनो आता बघू या तो सुंदर श्लोक! 

– क्रमशः भाग पहिला 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आषाढ महिन्याचा पहिला दिवस… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ आषाढ  महिन्याचा पहिला दिवस… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस… अर्थात महाकवी कालिदास दिन..

आषाढ शुद्ध प्रतिपदेला महाकवी कुलगुरू कालिदास दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो…

रणरणत्या उन्हानंतर वेध लागतात ते पावसाच्या सरींचे…या पावसाच्या सरी तन आणि मन चिंब भिजवून टाकतात. ज्येष्ठ संपून आषाढ सुरू झाला की आकाशात हळूहळू मेघांची गर्दी होऊ लागते आणि मग आठवण येते ती महाकवी कुलगुरू कालिदासाची…! 

कालिदासाच्या ‘ मेघदूत ’ या काव्यातील दुसरा श्लोक ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा अतिशय प्रसिद्ध असा श्लोक. आषाढ म्हटले की आठवतो ढगांच्या काळ्या पुंजक्यातून गडगडाट करीत बरसणारा मुसळधार पाऊस आणि कालिदासाची स्वतंत्र अभिजात साहित्य कृती..!

आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी पावसाळ्याची सुरुवात होते. आपल्या मेघदूत या महाकाव्याच्या प्रारंभी पावसाळ्याच्या सुरुवातीचे नितांत सुंदर वर्णन कालिदासांनी केले आहे… ” मेघदूत’ हे एक सर्वांगसुंदर प्रेमकाव्य आहे. हे कोणत्याही पुराणकथेवर आधारित नाही. यात कालिदासाचा स्वतंत्र निर्मितीक्षम प्रज्ञाविलास, आणि तरीही मानवी अंतःकरणातील एका सुकोमल वास्तव भावनेचाच आविष्कार करणारे कालिदासरचित “मेघदूत’ हे एक मनोज्ञ काव्य आहे..! निसर्गावर प्रेम करणारा निसर्ग प्रेमी कवी..! निसर्गाबद्दल असणारं अतोनात प्रेम त्यांच्या शब्दातून व्यक्त होतं. प्रत्येक निसर्गप्रेमींना त्यात चिंब चिंब भिजवून टाकतो..!

ग्रीष्मातील उष्मा सरला.. ढग दाटून आले की आपसूकच वातावरणातील होणारा तो बदल..सृष्टीला चढणारे नावीन्याचे रंग, सृजनाने खुललेले ते निसर्गाचे रुपडे आणि त्याला चिंब भिजवून टाकणारा आषाढ लागला की जणू हे संपूर्ण जग नव्याने जन्म घेतल्यासारखे भासू लागते…!

उपमा या अलंकाराचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून कालिदासांनी मानव आणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत…!

कवी कालिदासांचे संस्कृत कवींमधील उच्च स्थान दर्शविणारे एक सुंदर सुभाषित……

पुरा कवीनां गणना प्रसंगे ll

कनिष्ठीकाधिष्ठति कालिदास: 

अद्यापि तदतुल्य कवेर्भावादी 

अनामिका सार्थवती बभूव ll

…. याचा अर्थ असा आहे की– पूर्वीच्या काळी संस्कृत भाषेतल्या कवींची गणना करताना त्यांना मोजताना आपल्या हाताच्या करंगळीवर पहिलं नाव कवी कालिदास यांचे आले पण त्यानंतरच्या हाताच्या बोटावर कोणाचेही नाव आले नाही कारण महाकवी कालिदासांच्या इतका उच्च प्रतीचा संस्कृत कवी कोणी नव्हताच. त्यामुळे करंगळीच्या आधीच्या बोटावर कोणाचेच नाव न आल्यामुळे त्या बोटाला अनामिका असे म्हणतात..!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वैचारिक स्वावलंबन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “वैचारिक स्वावलंबन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

लोकरंग च्या पुरवणी मधील एक खूप मस्त आणि मुख्य म्हणजे खरोखरीच विचारात पाडणारा लेख शनिवारी  चतुरंग ह्या पुरवणीत वाचनात आला. हा लेख “वळणबिंदू” ह्या सदराखाली डॉ. अंजली जोशी लिखीत “वैचारिक स्वावलंबन” ह्या नावाचा.  विशेषतः पालकत्वाची सुरुवात होतांना पासून हातपाय थकल्यावर देखील तेवढ्याच सुरसुरीनं पालकत्व निभावणा-या पालकांसाठी तर खास भेटच.

“स्पून फिडींग” ,पाल्याची अतिरिक्त टोकाच्या भूमिकेतून घेतलेली काळजी पाल्यांना कुठलाही अवयव बाद न होता कसे पंगू करुन सोडते हे परखड सत्य ह्या लेखातून चटकन उमगतं, आणि मग खोलवर विचार केल्यानंतर त्यातील दाहकता जाणवते.

खरोखरीच मुलं ह्या जगातल्या तलावात पोहोचतांना त्यांना बुडू नये म्हणून पालकत्वाचं रबरी टायर न चुकता बांधून द्या व लांबून काठावरुन त्यांच्याकडे काळजीपूर्वक बघतांना त्यांचे त्यांना पोहू द्या, कधी गटांगळ्या खाऊ द्या, अगदी काही वेळा थोडं नाकातोंडात पाणी जावून जीव घाबरु द्या, पण हे होऊ  देतांना एक गोष्ट नक्की …. आपला पाल्य हा तावूनसुलाखून, अनुभव गाठीशी बांधून पैलतीर हा यशस्वीपणे गाठणारच, आणि मग तो विजयाचा आनंद  तुम्हाला आणि तुमच्या पाल्यांना कितीतरी पट सुखं देऊन सुवर्णक्षणांची अनुभूती देऊन जातो. 

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे – प्रसंगी अपत्यांच्या कुबड्या बनण्यापेक्षा त्याच्या मनाला उभारी देणारी संजीवनी पुरवा.

मी तर सांगेन हा लेख नीट विचारपूर्वक वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच स्वतः ला प्रश्न विचारायचा की … ड्रेस कुठल्या रंगाचा घालू ह्या अगदी साध्या प्रश्नापासून, ते लग्नासाठी आपल्याला नेमका जोडीदार कसा हवायं ह्या गहन प्रश्नापर्यंत, आपण आपल्या मनाने, स्वतंत्र विचारशक्तीने किती निर्णय घेतलेत ? त्यापैकी किती निर्णय तडीस नेलेत ? ह्या तडीस नेलेल्या आपल्या स्वतंत्र मतांमुळे, किंवा तडीस न नेता केवळ दुसऱ्यांच्या ओंजळीने कायम पाणी प्यायल्यामुळे, आपले नेमके नुकसान झाले की फायदा झाला ? .. आणि तो नेमका किती झाला ? …..  ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर आपल्याला नेमक्या वस्तुस्थितीची जाणीव होईल आणि मग अभ्यास वा विचारांनी बनवलेली स्वतंत्र स्वमतं, स्वकृती किती महत्त्वाची असते आणि ती आपल्या जीवनात किती चांगला आमुलाग्र बदल करते हे पण कळून येईल. 

तेव्हा डॉ अंजली जोशी ह्यांचा चतुरंग पुरवणीमधील “वैचारिक स्वावलंबन” हा लेख तुम्हाला मिळाला तर जरूर स्वतः आधी वाचा आणि मग आपल्या पाल्यांना पण वाचायला सांगा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वहीचे एक पान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “वहीचे एक पान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

काही शब्द लक्षात राहतात. ते कायम एकमेकांच्या सोबतच असतात. किंवा त्याच पध्दतीने ते म्हटले, वाचले, किंवा लिहिले जातात. जसे दिल, दोस्ती, दुनियादारी. किंवा अन्न, वस्त्र, निवारा. सत्यम, शिवम, सुंदरम्. तन, मन, धन. तसेच वही म्हटले की पुस्तक, आणि शाळा हे शब्द आपोआप डोळ्यासमोर येतात.

आपल्या शाळेतील ती पाच सहा वर्षे म्हणजे माझ्या आयुष्यातील लक्षात राहण्याचा वेधक आणि वेचक काळ.

पुस्तक हे आपल्याला शिकवते. ते आपलं जरी असलं तरी आपण शिकण्यासाठी दुसऱ्याने मेहनत घेऊन ते तयार केलेलं असतं.

पण वही ही आपली असते. या वहित दोन प्रकार असतात. एक प्रत्यक्षात असते. आणि दुसरी असते पण दिसत नाही.               

आपण काय शिकलो हे  वहीत उतरवतो. शाळेच्या वह्या यात प्रश्नोत्तराच्या, गणिताच्या, निबंधाच्या या पुढल्या वर्षी जवळपास रद्दीतच जात असत. 

पण अदृश्य वही जी अद्याप माझ्या स्मरणात आहे. आणि त्यातले अक्षर अन् अक्षर, शब्द, आणि ओळ आजही मी न अडखळता वाचु शकतो. किंवा आज तो माझा विरंगुळा आहे. माझा आनंद आहे. आणि बऱ्याच प्रमाणात माझी संपत्ती. अशी वही म्हणजे मित्रपरिवाराची वही. हि वही रद्दीत जाणे शक्यच नाही. उलट जसजशी ती जुनी होते, तसतसे तिचे मुल्य वाढत जाते. ती जीर्ण होईल पण टाकाऊ होणार नाही हा विश्वास आहे.

कोणतीही गोष्ट उतरवण्यासाठी ती अगोदर मनात असणे गरजेचे असते. मनात असलेल्या गोष्टीत आपलेपणाचा ओलावा असतो. तर नसलेल्या गोष्टी उतरवायचा प्रयत्न केल्यास त्यात कोरडेपणा असतो. आणि अशी माझी मित्रपरिवाराची वही ज्यात फक्त आपलेपणा आणि ओलावा असल्याने कायम ताजी टवटवीत जाणवते.                    

हि वही चाळतांना एक वेगळाच चाळा मनाला लागतो. हाच चाळा म्हणजे आपण सोबत एकत्र घालवलेले दिवस आठवणे.  

माझ्या या अदृश्य वहित प्रश्न नाहीत, तर आठवणींची साठवण आहे. गणिते नाहीत, तर पडलेली गणिते सोडवण्याची पद्धत आहे. शुद्धलेखनाच्या चुका नाहीत, तर चुकू नये म्हणून मैत्रीचा सल्ला आणि विश्वास देणारे आहेत. धीर देणारे आणि मदत करणारे हात आहेत. थोडक्यात जिथे उत्तर, सल्ला, विश्वास, आणि हात असतो त्यालाच आपण साथ म्हणतो. म्हणून यात आठवणींची साठवण आहे.

हे दिवस आठवले की अनेक गमती,जमती. राग, रुसवे. कट्टी, बट्टी. पास, नापास. हुशार, मठ्ठ. अभ्यास, मस्ती. अशा शब्दांच्या जोड्या तोंडातून बाहेर पडतात.

आपल्यासारखी पायी, किंवा क्वचित सायकलवर एकत्र शाळेत जायची मजा हि आजच्या स्कुलबस मध्ये कदाचित नसावी.

बऱ्याचदा मला काय मिळाले? किंवा मी काय मिळवले? असा प्रश्न पडतो. हाच प्रश्न उलट विचारला मी काय आणि कोणामुळे मिळवले? तर त्याचं उत्तर एकच आहे. ते उत्तर म्हणजे शाळा.

शाळा म्हणजे अनेक खोल्या असणारी भव्य इमारत नव्हे. तर माणूस घडवणारे मंदिर असते. यात शिक्षक नावाचा पुजारी असतो. विद्यार्थी नावाचा भक्त. आचार, विचार, आणि संस्कार यांचा प्रसाद,तर सदाचार आणि प्रामाणिक पणा यांचे तिर्थ असते. बुद्धी, शक्ती, विश्वास, आणि सामर्थ्य देणाऱ्या देवतांची पुजा होते.

असे हे माझ्या वहिचे एक पान आहे जे भगिरथ शाळा आणि १९८१ च्या १० वीच्या वर्गमित्र आणि शिक्षकांमुळेच लक्षात आहे, आणि राहिलं…

(१० वी चा वर्गमित्र ::: शाळेतील मित्रांचे झालेले गेट टुगेदर या नंतर २०२२ मध्ये लिहीलेले…) 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वप्न… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ स्वप्न… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

स्वप्न नुसता शब्द जरी वाचला तरी कितीतरी विचार मनात रुंजी घालायला लागतात. कारण प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असतेच आणि ते कोणी बोलून दाखवले नाही तरी ते पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. 

स्वप्नांची सुरुवात जन्मल्यापासूनच होते. लहानपणी पाळण्यात बाळ झोपलेले असताना झोपेत बाळ गोड हसते किंवा झोपेतच दचकून एकदम रडायला लागते तेव्हा आजी किंवा घरातील मोठ्या व्यक्ती म्हणतात स्वप्न पाहिलं असेल. सटवाई बाळांना स्वप्न दाखवते. 

नंतर मुल जसजसे मोठमोठे होऊ लागते तसतशी त्याची स्वप्ने पण बदलत जातात. आणि शक्यतो बदललेली स्वप्ने ही त्या त्या काळानुरूप त्याला योग्य वाटतील अशी असतात आणि लहान वयातील स्वप्ने बहुतांशी पूर्ण झालेली असतात म्हणून मग त्या आत्मविश्वासाने मोठी स्वप्ने पाहिली जातात.

अब्दुलजी कलाम यांनी म्हटलय छोटी स्वप्ने पाहणे हा अपराध आहे. स्वप्ने मोठी पहा त्याचा पाठपुरावा करा आपोआप ती पूर्ण होतील.

या बाबत ते असेही म्हणतात की स्वप्ने अशी नसावीत की जी झोपेत पाहिली जातात स्वप्ने अशी असावीत की जी झोपूच देत नाहीत. 

साधारणपणे मुली ज्या असतात त्या बहुतांशी आपल्या सुखी संसाराचे असे एकच स्वप्न पहातात. त्यासाठी त्या झटत असतात. आणि अगदी १००% नाही तरी काही अंशी त्या त्यामधे यशस्वी होतात. पण मुलांची स्वप्ने मात्र वेगवेगळी असतात.

पण नेमके स्वप्न म्हणजे काय? तर स्वप्न म्हणजे ध्येय म्हणता येईल. जे गाठण्यासाठी ज्याची त्याची धडपड चालू असते. हीच गोष्ट त्याच्या जगण्याचे कारण बनते .लहानपणी आई वडिल किंवा मोठे सांगतात ते पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे वाटून पाहिलेले स्वप्न नंतर महत्व पटल्यावर चांगला अभ्यास करण्याचे स्वप्न नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या नोकरीचे स्वप्न नंतर आपले संसार करण्याचे स्वप्न आणि मग संसारतील व्यक्तींना सुख देण्याचे स्वप्न या स्वप्नचक्रात माणूस अडकलेला असतो.

काहीजण कला जोपासण्याचे त्यात नाव कमावण्याचे स्वप्न पाहतात . किंवा काही जण वेगळे काही करून दाखवण्याच्या ईर्षेने पेटलेले दिसतात. 

पण म्हणून सगळ्यांनाच महत्व प्राप्त होत नाही. स्वप्ने जी इतरांपेक्षा वेगळी असतात त्यात इतरांचेही हित सामावलेले असते जे सोपे नसते हे सगळ्यांना माहित असते पण असे स्वप्न जेव्हा कोणी पाहतो आणि ते पूर्ण करतो तेव्हा त्याचे नाव झालेले आपण पाहतो.

तर अशी ही स्वप्ने. पण यातूनही स्वप्नाचा खरा अर्थ समजत नाहीच. आपल्याला आश्चर्य वाटेल  पण स्वप्नाचा आणि अध्यात्माचा जवळचा संबंध आहे. 

कसा? अध्यात्म सांगते मी पणा सोडा. सगळे चांगले होईल. तसेच हे स्वप्न••• स्व पणा नसलेल••• पहा एखादे स्वप्न पूर्ण करणारा स्वत:ची तहान भूक विसरून किंवा बाकीचे जग विसरून अर्जूनाच्या लक्ष्याप्रमाणे फक्त स्वप्नाच्या पाठीमागे असतात. यामधे कुठेही स्व पणा अर्थात मी पण पर्यायाने अहं नसतो म्हणून ते स्वप्न.

सगळ्यांची स्वप्ने ही मी पणाशी निगडीत असतात म्हणून त्याला महत्व प्राप्त होत नाही. पण मोठी स्वप्ने ज्यामधे इतरांचेही हित सामावलेले असते अशी स्वप्ने पाहणारी माणसे वेगळीच असतात त्यामुळे अशी स्वप्ने पाहणार्‍याचे नाव होते आणि त्याचे अप्रुप वाटू लागते.

म्हणूनच चला ‘मी’पणा सोडून देऊ. सर्व समावेशकतेचे स्वप्न पाहू आणि घर शहर देश नव्हे सर्व जग सुखी करण्याचे स्वप्न पाहू

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मन… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ मन… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

… दोनच अक्षरी साधा शब्द ‘ मन ‘ ! पण या शब्दाची व्याप्ती मात्र अमर्याद. त्याचा आकार तरी कसा वर्णावा बरे? तेही अवघड काम —- कधी मन खसखशीएवढंं, तर कधी त्याहून सूक्ष्म अणुरेणूएवढं सुद्धा बनतं. तर कधी अगदी त्या विशालकाय आकाशातही मावणार नाही इतकं प्रचंड रुप धारण करु शकतं.

मन इतकं लहरी असतं की कोणी त्याचा हातच धरु शकणार नाही. कधी मन स्वच्छंदीपणे विहरतं,  तर कधी हळवं होतं, कधी विचारी बनतं. कधी हेच मन घमेंडखोर बनतं नि बढायांना गोंजारु लागतं. कधी-कधी हेच मन उत्साही बनतं नि नवनिर्मिती करु पाहतं. कधी ते लाडीक बनतं, प्रेयसीला, सवंगड्यांना हाकारु पाहतं, तर काही वेळा तुसडं बनून सर्वांनाच दूर-दूर लोटू पाहतं. मन स्वप्नाळु बनतं नि दिवास्वप्न रेखाटू पाहतं. तर कधी दु:खी बनून अश्रू साठवीत राहतं.—- .असं हे बहुरंगी भावार्थ साठविणारं मन  त्याविषयी बोलावं तेवढं थोडंच. .म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामीसुद्धा करुणाष्टकात म्हणतात _

अचपळ मन माझे नावरे आवरिता

तुजविण शीण होतो,धाव‌ रे धाव आता ||

खरच हे अचपळ मन ताब्यात ठेवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत, कारण असं म्हणतात की ” मन जिंकी तो जग जिंकी |”

मनावर चांगले संस्कार होण्यासाठी आपण लहानपणापासून घरात शुभंकरोती, देवाची स्तोत्रे,परवचा म्हणत असतो. कुठलीही गोष्ट प्रथम मनात आली तरच तिचा  विचार होऊन कृती घडते. म्हणूनच आपण जर मनावर सुसंस्कारांचे धडे बिंबवले तरच या समाजात सहृदय, संवेदनशील व्यक्ती निर्माण होतील. 

एकनाथ महाराजांची एक गोष्ट सांगितली जाते—गंगेच्या पाण्याने भरुन आणलेली कावड  त्यांनी तहानलेल्या गाढवाच्या मुखी सोडली नि त्याला तृप्त केले. अशा गोष्टी जर बालपणी मुलांना सांगितल्या तर भूतदया कशी दाखवावी हे या उदाहरणावरून चांगल्या प्रकारे लक्षात येतं. त्यामुळे मन चांगल्या संस्कारानी लहानपणीच समृद्ध केलं तर भावी पिढी सुशील,सदवर्तनी नि सेवाभावी बनेल. श्री समर्थ रामदास स्वामींनी 

‘मनाचे श्लोक‘ रचले आहेत, त्यामागे मन भक्कम बनविणे हाच मुख्य हेतू आहे. म्हणूनच आपलं मन स्वच्छ,शुद्ध, पारदर्शक ठेवून योग्य विचार मनात आणले  तर आपली प्रगती योग्य  दिशेने, योग्य प्रकारे होईल यात शंकाच नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी कोणत्याही वयात मनावर योग्य नियंत्रण ठेवलं पाहिजे. सकारात्मक विचारातूनच मनाची उत्तम मशागत होते‌ नि योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो.

चला तर, प्रत्येक गोष्ट मनापासून करु या. मग ते चित्र रेखाटन असो, रांगोळी असो की परीक्षेसाठी उत्तम तयारी करणे असो. कोणतही  मोठ्ठं अवघड काम सुद्धा आपण मनावर घेतलं तर आपण निश्चितच पुरं करु शकतो.

मनमें है विश्वास, पूरा है विश्वास |

हम होंगे कामयाब एक दिन —

मनात आहे विश्वास … पूर्ण आहे विश्वास 

एक दिवस होऊ यशस्वी … आहे पूर्ण विश्वास ||

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पर्यटन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

पर्यटन हा बहुतेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मात्र पर्यटन ह्या विषयाकडे वळतांना प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगलने विचार करुन त्याची दिशा ठरवितात. काही व्यक्ती निसर्गसौंदर्याचा विचार करुन तशी स्थळं निवडतात.  तर काही द-याख़ो-या,गड किल्ले ह्यामध्ये रमतात. काही देवदर्शनासाठी नवसाला पावणा-या सुप्रसिद्ध देवस्थानांची निवड करतात, तर काही आपापल्या गावी असलेल्या कुलदेवतांकडे आपला मोर्चा वळवितात.

पर्यटनाला कुठेही जावं पण जेथे जाऊ तिथली इत्यंभूत माहिती, तिथला इतिहास, हवामान, भौगोलिक परिस्थिती, त्या स्थानाचे वैशिष्ट्य हे सगळं माहितीपूर्ण अभ्यासून घ्यावं… खेदाची बाब अशी की हल्ली त्या फ़ोटो व सेल्फी ह्यांच्या अतिरेकी आवडीने आपण त्या निसर्गसौंदर्याचे, त्या स्थानाचे महत्त्व ना धड डोळ्याने टिपत, ना मनावर बिंबवत, ना मेंदूत ठसवत…  आपल्या इंद्रियांना निकामी करुन फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून असण्याची ही सवय तशी घातकच.

ह्या बाबतीत आम्ही उभयता दोघेही आणि आमचा लेक आधी सगळे डोळ्या़ंनी बघणार, हिंडून सगळं अभ्यासणार, संपूर्ण माहिती गोळा करणार आणि मग जसा वेळ उरेल तसे फोटो काढणार. आजकाल सर्रास एखाद्या स्थळी लोक पोहोचल्या पोहोचल्या आधी सेल्फी व फोटोसेशन नी मग लगेच त्या फोटोंचे सोशल मिडियावर अपलोडींग. आजकाल सोशल मीडियावर कुटुंबाचे वा मित्रमैत्रीणींचे फोटो टाकले तरच प्रेम वा मैत्री असं नसतं, कारण सोशल मीडियावरील फेसबुक, व्हाँटसअप हे सगळं आभासी जग असतं. असो

पण एक नक्की ..  अभ्यासपूर्ण पर्यटन करायचे असेल तर त्यासाठी आपलं जाणतं वयं, आधी करुन ठेवलेला माहितीपूर्ण अभ्यास, एक व्यवस्थित खरीखुरी माहिती देणारा गाईड, ह्या बाबी अत्यावश्यक. मला आठवतं माझी शाळेत असतांना ट्रीप गेलेली. शैक्षणिक सहल नाव तिचं. अजिंठा, वेरूळ. पण ना त्या ट्रीप बरोबर त्याचा अभ्यास ,आवड असलेले शिक्षक ना कुणी चांगले गाईड. ह्यामुळे अशा सहलींना शैक्षणिक सहल नाव जरी असलं तरी त्यापासून कुठलेही आऊटपुट मिळत नाही हे नक्की.

खूप व्यक्तींमध्ये खूप सारे सद्गुण एकवटलेले असतात. त्यापैकी काही सुप्त रुपात तर काही प्रकट रुपात दिसतात. शनिवारी चतुरंगच्या पुरवणीत सुप्रिया सुळे यांनी कलावंतांचे आनंद पर्यटन ह्या सदरात लिहिलेला ” दगडांच्या आणि फुलांच्याही देशा ” हा एक छान लेख वाचनात आला. सुप्रिया सुळे ह्यांना राजकारणात सक्रिय असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखत असलो तरी एक अभ्यासपूर्ण लेखन करणारी त्यांच्यातील व्यक्ती मला प्रथमच दिसली. ह्या लेखातील अंजिठा, वेरूळ येथील लेण्यांची माहिती, देवगिरी किल्ला, ताडोबा अभयारण्य वाचल्यानंतर एकदा ह्या स्थळांना आवर्जून भेट देण्याचा मोह हा होतोच.

असेच काहीसे माहितीपूर्ण लेख वाचनात आल्यानंतर काहीसं आगळंवेगळं समाधान हे मिळतंच.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print