सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “पर्यटन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

पर्यटन हा बहुतेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मात्र पर्यटन ह्या विषयाकडे वळतांना प्रत्येक जण वेगवेगळ्या अँगलने विचार करुन त्याची दिशा ठरवितात. काही व्यक्ती निसर्गसौंदर्याचा विचार करुन तशी स्थळं निवडतात.  तर काही द-याख़ो-या,गड किल्ले ह्यामध्ये रमतात. काही देवदर्शनासाठी नवसाला पावणा-या सुप्रसिद्ध देवस्थानांची निवड करतात, तर काही आपापल्या गावी असलेल्या कुलदेवतांकडे आपला मोर्चा वळवितात.

पर्यटनाला कुठेही जावं पण जेथे जाऊ तिथली इत्यंभूत माहिती, तिथला इतिहास, हवामान, भौगोलिक परिस्थिती, त्या स्थानाचे वैशिष्ट्य हे सगळं माहितीपूर्ण अभ्यासून घ्यावं… खेदाची बाब अशी की हल्ली त्या फ़ोटो व सेल्फी ह्यांच्या अतिरेकी आवडीने आपण त्या निसर्गसौंदर्याचे, त्या स्थानाचे महत्त्व ना धड डोळ्याने टिपत, ना मनावर बिंबवत, ना मेंदूत ठसवत…  आपल्या इंद्रियांना निकामी करुन फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून असण्याची ही सवय तशी घातकच.

ह्या बाबतीत आम्ही उभयता दोघेही आणि आमचा लेक आधी सगळे डोळ्या़ंनी बघणार, हिंडून सगळं अभ्यासणार, संपूर्ण माहिती गोळा करणार आणि मग जसा वेळ उरेल तसे फोटो काढणार. आजकाल सर्रास एखाद्या स्थळी लोक पोहोचल्या पोहोचल्या आधी सेल्फी व फोटोसेशन नी मग लगेच त्या फोटोंचे सोशल मिडियावर अपलोडींग. आजकाल सोशल मीडियावर कुटुंबाचे वा मित्रमैत्रीणींचे फोटो टाकले तरच प्रेम वा मैत्री असं नसतं, कारण सोशल मीडियावरील फेसबुक, व्हाँटसअप हे सगळं आभासी जग असतं. असो

पण एक नक्की ..  अभ्यासपूर्ण पर्यटन करायचे असेल तर त्यासाठी आपलं जाणतं वयं, आधी करुन ठेवलेला माहितीपूर्ण अभ्यास, एक व्यवस्थित खरीखुरी माहिती देणारा गाईड, ह्या बाबी अत्यावश्यक. मला आठवतं माझी शाळेत असतांना ट्रीप गेलेली. शैक्षणिक सहल नाव तिचं. अजिंठा, वेरूळ. पण ना त्या ट्रीप बरोबर त्याचा अभ्यास ,आवड असलेले शिक्षक ना कुणी चांगले गाईड. ह्यामुळे अशा सहलींना शैक्षणिक सहल नाव जरी असलं तरी त्यापासून कुठलेही आऊटपुट मिळत नाही हे नक्की.

खूप व्यक्तींमध्ये खूप सारे सद्गुण एकवटलेले असतात. त्यापैकी काही सुप्त रुपात तर काही प्रकट रुपात दिसतात. शनिवारी चतुरंगच्या पुरवणीत सुप्रिया सुळे यांनी कलावंतांचे आनंद पर्यटन ह्या सदरात लिहिलेला ” दगडांच्या आणि फुलांच्याही देशा ” हा एक छान लेख वाचनात आला. सुप्रिया सुळे ह्यांना राजकारणात सक्रिय असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखत असलो तरी एक अभ्यासपूर्ण लेखन करणारी त्यांच्यातील व्यक्ती मला प्रथमच दिसली. ह्या लेखातील अंजिठा, वेरूळ येथील लेण्यांची माहिती, देवगिरी किल्ला, ताडोबा अभयारण्य वाचल्यानंतर एकदा ह्या स्थळांना आवर्जून भेट देण्याचा मोह हा होतोच.

असेच काहीसे माहितीपूर्ण लेख वाचनात आल्यानंतर काहीसं आगळंवेगळं समाधान हे मिळतंच.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments