मराठी साहित्य – विविधा ☆ काव्यवेडे सावरकर – भाग-२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ काव्यवेडे सावरकर – भाग-२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

(करुण रसाला अनुकूल अशा अक्रूर वृत्तातील गीत, सागराच्या काठी बसून आपल्या हृदयाची व्यथा सांगताना त्यालाच पुन्हा परत घेऊन जाण्याची विनंती करताहेत. पण हा मूळ स्वभावच नाही, त्यामुळे त्यालाही ते धमक्या देतात, ‘अबला न माझी ही माता रे, कथिल हे अगस्तीस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ‘ आपल्या सर्वांच्या परिचयाचे अमर गीत म्हणजे ‘ जयोस्तुते ‘!)…

५० वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा झाली हे कळल्यानंतर त्यांनी महाकाव्याचा संकल्प केला व रोज दहा ते पंधरा कविता करण्याचे ठरविले. गुरु गोविंद सिंग यांच्यावर २०० आर्या लिहिल्या. महाकाव्याच्या लक्षणात दोन गोष्टी येतात. त्याची काव्यवस्तू व त्याची पद्यरचना!  सावरकरांच्या काव्यातील भावना, कल्पना इतक्या उदात्त आहेत की त्याची अभिव्यक्ती तितक्याच सुंदर पद्य रचनेतून झाली पाहिजे. महान आत्म्याच्या वस्तीसाठी कलेवरही तसेच महान हवे नं!  

प्रथम ‘सप्तर्षी ‘ या महाकव्याला सुरुवात केली. आकाशात सप्तर्षी पाहण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद झाला. व तिथे जाण्याची इच्छा झाली. यातून या काव्याचा जन्म झाला. नंतर तिथे अनुष्ठूप छंदात ‘ कमला ‘ हे दीर्घ काव्य लिहिण्याची इच्छा झाली. ऐन तारुण्यात ते मायदेशाला व संसाराला पारखे झाले. बंदिवासाची आपत्ती आली. त्यामुळे या दीर्घ काव्यात ते स्वतःचे प्रतिबिंब पाहत असतील तर त्यात नवल नाही. या काव्यात तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कमलेच्या नाजूक भावभावनांचे पापुद्रे अगदी अलगद उलगडले आहेत. स्त्री मनाचे आकलन व उकल सुंदर केली आहे.

अंदमानात प्रथम सावरकर कविता

भिंतीवर काट्यांने लिहीत व ती पाठ करून ठेवत. त्यांची खोली बदलली व तिथै येणारा कैदी महाराष्ट्रीयन असेल तर तो भिंतीवरची कविता पाठ करी. पण तुरुंगाधिकाऱ्यांना ते काय लिहितात हे न कळल्याने त्यांचे हातही पायाप्रमाणे बेडीने बांधले जाऊ लागले. मग ते कविता रचून मनात पाठ करू लागले. वीस वर्षे पोर्तुगीजांशी टक्कर दिलेल्या पेशवाईच्या काळावर काव्य लिहिण्याच्या त्यांच्या संकल्पाचा परिणाम म्हणजेच ‘ गोमंतक ‘ हे दीर्घकाव्य!  कोकणच्या राजकारणी घडामोडी विषद करण्याचा हा काव्य प्रयत्न! इतिहासाच्या पृष्ठभूमीवर कल्पनेच्या कुंचल्याने कवीने काढलेले एक चित्र आहे. या काव्याचा पूर्वार्ध निर्यमक रचना असल्याने बंदिवासात ती लक्षात ठेवणे, पाठ करणे अशक्य झाले त्यामुळे ती रचना, अंदमानातून बाहेर आल्यावर शेवटी रत्नागिरीच्या तुरुंगात कागद पेन्सिल मिळाल्यावर त्यांनी पूर्ण केली. या महाकाव्याचा उत्तरार्ध त्यांनी २० मात्रांच्या निर्यमक ‘वैनायक’ या नव्या स्वनिर्मित वृत्तात रचला.

तुरुंगात खितपत पडलेल्या एका वीर युवकाचे विरहोद्गार त्यांनी ‘विरहोच्छ्वास ‘ या काव्यात गुंफले. अक्रूर या वृत्तातील हे विरह शोकाचे उच्छ्वास मनाची पकड घेतात. विरहात आठवणऱ्या पूर्वस्मृती, म्हणजे प्रत्येक उच्छ्वास हे स्वतंत्र भावगीत आहे. अशा चाळीस भावगीतांची सुरेख गुंफण केली आहे.

एक करुणामय व एक क्रूर अशा दोन प्रकारच्या गूढ शक्ती जगात वावरत असतात हे सांगण्यासाठी त्यांनी, घटाघटा रक्त पिणाऱ्या पण पिलांना पाजणाऱ्या व्याघ्री वरून ‘मूर्ती दुजी ती ‘ ही काव्यरचना केली. अंदमानातील प्रसंगावर आधारलेल्या चांदोबा व सायंघंटा या कविता आहेत. चांदोबा दिसल्यावर बालपण, मामाचा वाडा, भावंडे या साऱ्या स्मृती दाटून येतात. दिवसाचे काम संपल्यावर कोठडीत बंद करण्यापूर्वी सायंकाळची घंटा वाजे, त्यावेळी एक दिवस संपला, ही जाणीव होई. ही कल्पना सायंघटा मधे आहे. तसेच एक दिवस मायभूमीची विजय घंटा वाजेल हा आशावाद आहे.

रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यावेळी ‘आकांक्षा ‘ नावाची अतिशय उच्च दर्जाची रूपकात्मक हृद्य रचना लिहून टागोरांना पाठविली. या कवितेत एक गोष्ट आहे. गरुडाच्या जोडप्याला शापामुळे कावळ्यांच्या संगतीत रहावे लागते. पण त्यांची मुलगी एकदा गरुड व साप यांच्यामधील युद्ध पाहते, त्यात गरुड जिंकतो. तो मला हवा हा हट्ट धरते. गरुड प्राप्तीची आकांक्षा सोडत नाही. इतकी यशाची खात्री हवी.

त्यांच्या ‘बेडी’, ‘कोठडी ‘, ‘जगन्नाथाचा रथोत्सव ‘, ‘ निद्रे ‘, ‘मरणोन्मुख शय्येवर ‘ या कविता अध्यात्मिक बैठकीच्या आहेत. अंदमानातून सुटल्यावर आधी अलीपूर नंतर रत्नागिरी तुरुंग शेवटी येरवडा तुरुंगात ठेवले होते. हिंदुस्थानात आल्यावर अंदमानात रचलेल्या काव्याचे जे तुकडे तुकडे आठवतील ते गोळा केले त्यांच्या कविता व कैद्यांनी पाठ केलेल्या कविता घेऊन त्यांनी काव्यसंग्रह पूर्ण केले. कमला व गोमंतक हे १९२३ ला प्रकाशित झाले तर रानफुले हा काव्यसंग्रह १९३४ ला प्रकाशित झाला. शेवटी रत्नागिरीत स्थानबद्ध केल्यावर त्यांनी निबंध, नाटके अशा गद्य लेखनास प्रारंभ केला. नाटकातून त्यांनी काही पद्य रचना केल्या. ‘ स्वदेशी ‘, ‘हिंदू एकता ‘, ‘अस्पृश्यता निवारण ‘, ‘ हिंदुध्वज ‘, ‘सशस्त्रता ‘या काव्यातून राष्ट्र ऊध्दारासाठीची कळकळ, तळमळ लक्षात येते. याशिवाय आर्या वृत्तातील

‘गोदावकिली ‘ मोरोपंती विशेषांनी सजली आहे, ‘बालविधवा दुःस्थिती ‘, ‘टिळक स्तवन ‘ या ही आर्या वृत्तात आहेत. ‘महाराष्ट्र भाटाचे विजय गीत ‘, ‘नाशिक येथील गोदातटाकी ‘, लेडी ऑफ लेक ‘(भाषांतर) या कवितांतून निरनिराळ्या वृत्तांचा वापर केला आहे. शिवाजी महाराजांच्या आरतीत परिलिना वृत्ताचा वापर केल्यामुळे कविता रचनेच्या दृष्टीने सौंदर्य प्रधान झाली आहे. ‘ शिववीर ‘ या गीतात परिलिना ची लय थोडी शिथिल केली आहे त्यामुळे या स्त्री गीताला शोभणारी रचना निर्माण झाली आहे. ‘अनंताची आरती’ आसावरी रागातील असून ‘हिंदू नृसिंह’ मधे भूपती रागाचा सुंदर उपयोग केला आहे. ‘ अटकेवर जरी पटका ‘ हे विजय गीत असल्याने त्याच्या आवेशाला साजेल अशा फटक्याच्या हरिभागिनी वृत्तात आहे.

प्रकाशित परंतु जप्त, प्रकाशित परंतु नाटकातून विखुरलेल्या, काही विस्मृतीत गेलेल्या, अनेक झडत्यांच्या वेळी हरवलेल्या, तुकड्यांवर लिहून पडलेल्या, जप्त होतील म्हणून प्रकाशित न केलेल्या अशा अनेक सावरकर रचित कविता आहेत.

साहित्याचार्य, वेदांततीर्थ, बाळशास्त्री हरदास म्हणतात, “आधुनिक भारताच्या महान वैतालिकात (राजदरबारातील कवी) सावरकरांचे स्थान व्यासांचे आहे, शुकाचे नाही कारण दिव्यत्वाकडे जाणाऱ्या प्राकृतिक ओघाची परागतिक वंचनेपासून मुक्तता करणे तिचे स्वरूप आहे. “

सावरकर रुपातील या अलौकिक बुद्धिमत्तेस शतशः प्रणाम!!!

– समाप्त –

(संदर्भ- वा. गो. मायदेव संपादित ‘सावरकरांची कविता ‘)

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वारकरी संप्रदायातील काही स्त्री संत… भाग-१ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ वारकरी संप्रदायातील काही स्त्री संत… भाग-१ ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

संत साहित्य हा भक्तिमार्गीयांचा शाब्द आविष्कार आहे. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक फार मोठा कालखंड भक्तिमार्गाने दुमदुमला होता. या काळात विविध धर्मपंथ, संप्रदाय होते एवढेच नाही तर उपास्यदेवताही विविध होत्या आणि उपासना मार्गही विविध होते. परंतु त्यांचे प्राणतत्व एकच होते. ते म्हणजे भक्तिभाव!

या परंपरेत दक्षिणोत्तर किंवा पूर्वपश्चिम भारताचा विचार केला तरी महाराष्ट्रात स्थापित असलेला वारकरी संप्रदाय हा खूप महत्वाचा ठरतो. इथल्या संतांची भूमिकाही महत्त्वाची आहे. सर्व भक्तिसंप्रदायांच्या या पसाऱ्यात महाराष्ट्राचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र हा भारताच्या मध्यावर आहे. भाषिकदृष्ट्या आर्यभाषिक प्रदेशांच्या सीमा आणि द्रविड भाषिक प्रदेशांच्या सीमा असलेले शेजारी चारही बाजुंनी आहेत. त्यामुळे उत्तर – दक्षिण, आर्य – द्रविड सर्वांना सामावून घेण्याचे सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र प्राचीन काळापासून करीत आला आहे. व्यापक अर्थाने महाराष्ट्र हे भारतीय संस्कृतीचे संगमतीर्थ आहे असे म्हणावेसे वाटते..

स्थूलमानाने इसवी सनाचे बारावे ते सतरावे शतक हा पाच ते सहा शतकांचा काळ भक्तिमार्गाचा कालखंड मानता येईल. स्वातंत्र्योत्तर काळात काही साहित्यप्रकारांनी जो “आवाज” दिला, तेच काम भक्तीचळवळिंनी मध्ययुगातच केले. समाजातल्या प्रस्थापितांनी धर्मक्षेत्रात जे मापदंड निर्माण केले होते ते भक्तीमार्ग यांनी झुगारून दिले. कृत्रिमता, पाखंड उघडे पाडले. न्यूनगंडातून उपेक्षितांची मुक्ती केली, त्यांचा आत्मविश्वास जागवला. आत्मप्रतिष्ठेचा मार्ग प्रशस्त केला.

वरील हेतू सिद्धीस नेण्यासाठी संत साहित्य निर्माण करावे लागले नाही, तर ते निर्माण झाले. अखिल भारतात काश्मिर ते कन्याकुमारी आणि बंगाल ते आसाम इथपर्यंत अनेक संत झाले. त्यातही स्त्रीसंतांनी सुद्धा साहित्यात खूपच मोलाची भर घातली आहे. विस्तार भयास्तव इथे सगळी नावे घेता येणार नाहीत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर जात, पात, धर्म, स्त्री, पुरुष हा भेदभाव न करता ” आम्ही आनंदे नाचू गाऊ ” म्हणणाऱ्या संतांमधे स्त्री संत अनेक झाल्या.

मुक्ताई!  ज्या कुलकर्णी भावंडांना संन्याशाची मुले म्हणून यज्ञोपवित संस्कार करण्यास नकार दिला. निवृत्तीनाथ त्यावेळी दहा वर्षांचे तर मुक्ताई फक्त चार वर्षांची. दादाच तिचे पालक आणि गुरू झाले. त्यात मुक्ताई, तिचा विवाह हे तर दूरदूरपर्यंत शक्य नव्हतं.

पण त्यामुळे मुक्ताईचे साहित्य, तिचे अभंग कम अस्सल ठरत नाहीत. त्यांची काव्यरचना ही अतिशय मौलिक आहे. त्यातही “ज्ञानदेव तुकाराम ” या मध्यमपदलोपी समासात जी वारकरी संत मंडळी आहे, त्या स्त्री संतांमधे संत मुक्ताई, संत जनाबाईचे नाव महत्वाचे आहे. निर्मळा, नागी, कान्होपात्रा, बहिणाबाई, सोयराबाई, लिंबाई, विठाबाई अशा आणखी अनेक स्त्रीसंत आहेत.

मुक्ताबाईंना अतिशय अल्प आयुष्य मिळालं. संन्याशाची मुलं म्हणून आतिशय विचित्र आयुष्य या चारही भावंडांच्या वाट्याला आलं. त्यात मुक्ताई सर्वात धाकटी असूनही सर्वांची आई झाली. समाजातली मिळणारी वागणूक बघून एक दिवस ज्ञानेश्वर महाराज अतिशय दुःखी झाले, आणि झोपडीची ताटी (दरवाजा) बंद करून घेतली. सर्व भावंडांनी त्यांना बाहेर येण्याची विनंती केली. मात्र मुक्ताईने आपल्या अभंगांमधून त्यांचे मन वळवले. तेच अभंग पुढे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध झाले.

चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

विश्व रागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ॥

शब्दशस्त्रे व्हावे क्लेष । संती मानावा उपदेश ॥

विश्वपट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

*

संत तोची जाणा जगी । दया क्षमा ज्याचे अंगी ॥

लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तोची जाणा ॥

मिथ्या कल्पना मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥

चिमुकल्या बहिणीने केलेली ही विनवणी माऊलींना टाळता आली नाही, आणि ते बाहेर आले. संत कसा असावा याचं अतिशय सुंदर विवेचन यात आहे.

याशिवायही मुक्ताईच्या अनेक अभंग रचना प्रसिद्ध आहेत.

तशीच कान्होपात्रा. ती कोण होती? काय? यावर विवेचन नको. ती फक्त विठ्ठलभक्त होती. स्त्रीसंत होती.

*

नको देवराया अंत अता पाहू

प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ॥

*

हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले

मजलागी जाहले तैसे देवा ॥

*

मोकलोनी आस जाहले उदास

घेई कान्होपात्रेस हृदयात “

*

हा तिचा अभंग सर्वश्रृत आहे.

संत बहिणाबाई. सांसारिक सुख तिला फारसं लाभलं नाही. जरठ नवऱ्याशी संसार करावा लागला. त्यांचाही अभंग बघा.

विरक्तीचे मूळ । प्रपंचाचा त्याग

पाहताचि एक । गृह शैल ॥

स्त्री ही मोक्षमार्गातली धोंड आहे ही आजवरची धारणा आहे पण घर हा परमार्थ मार्गातला स्त्रीच्या दृष्टिने फार मोठा असल्याचे ती बोलून दाखवते. अशा अनेक स्त्री संत आहेत. त्यांचं साहित्यही विपुल आहे. मात्र त्यात संत जनाबाई यांचं स्थान वेगळं आणि मोठं आहे.

ते पुढील भागात बघूया!!

क्रमशः… 

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काव्यवेडे सावरकर – भाग-१  ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ काव्यवेडे सावरकर – भाग-१  ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

२८ मे हा विनायक दामोदर सावरकर यांचा जयंती दिन! या दिवशी कांही लिहावं असं मनात आलं. पण कशावर लिहायचं? एक कवी म्हणून की एक क्रांतिकारी? एक नाटककार की वक्ता की समाज सुधारक? कुटुंबाच्या हाल अपेष्टा बघून द्रवणारा भावनाप्रधान माणूस की अंदमानात कोणत्या परिस्थितीत कवित्व जागं ठेवलं यावर लिहायचं? कां इतर कैद्यांचं प्रबोधन केलं यावर की स्थानबद्ध तेत असतानाही स्वातंत्र्यसंग्रामाला बळ देणारा म्हणून कां एक द्रष्टा राजकारणी कां एक डावलला गेलेला महानायक? जेवढं लिहावं तेवढं थोडं आहे. मी आज फक्त त्यांच्या कवितांच्या दालना मधून एक फेरफटका मारणार आहे.

वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी ‘सवाई माधवरावांचा पोवाडा’ रचला तर १६ व्या वर्षी चाफेकर व रानडे यांच्यावरही बारा चौकी, १९२ चरणांचा मोठा पोवाडेवजा फटका लिहिला. २१ व्या वर्षी

सिंहगडाचा पोवाडा तर २३ व्या वर्षी सुप्रसिद्ध बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा रचला. पोवाड्याचा हेतू वीर रसात्मक प्रसंग निवडून लोकांना स्फुरण देणे हा आहे. त्यामुळे काहीजण पोवाड्यांना वीर काव्य असेही म्हणतात. सावरकरांच्या पोवाड्यात वीररस आहेच परंतु विदग्ध कवीला शोभणारे अलंकार जास्त आहेत. सूर्याजी म्हणतो, ‘जाऊ इच्छिता काय, धरुनी आल्या दोराला, अहो षंढ, तो दोर मघाची लढूनिया मेला’ असे रूपक अलंकार प्रचुर काव्य त्यांच्या पोवाड्यातून आढळते. तानाजीच्या समाधी विषयी सांगताना ते म्हणतात, ‘ मग त्या गडाची भूमी ठेवी, तानाजीस उदरी, तेव्हापासूनि रत्नाकर बहु तिचा द्वेष करी’. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. त्यांनी १८९८ मधे रचलेला ‘स्वदेशीचा फटका’ चांगलाच गाजला.

सावरकरांना टिळक व परांजपे यांच्या प्रयत्नामुळे विलायतेला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि १९०६ साली जून मध्ये त्यांनी हिंदुस्थानचा किनारा सोडला. त्या रात्री जहाजावर त्यांनी ‘ तारकास पाहून ‘ ही कल्पना रम्य कविता केली. ‘आकाशातले तारे म्हणजे नंदनवनीच्या काजव्यांचे थवे की मायेच्या सुनील शालूवरचे लकलकणारे टिकले ‘, अशा कल्पनांवरून कवीचे कोवळेपण जाणवते. या कवितेत सागर व चांदणीचे प्रेम वर्णन केले आहे. शृंगाराचे वर्णन करताना त्यात अतिव पावित्र्य राखले आहे.

विलायतेला गेल्यावर त्यांनी जव्हारवरुन संस्थानचे अधिपती श्रीमंत राजे कृष्ण शहा यांचा गौरव करणारी पत्रात्मक कविता पाठविली. विलायतेतील साडेचार वर्षांच्या वास्तव्यात अभ्यासाबरोबरच त्यांनी ग्रंथ लेखनही केले.

सावरकरांच्या कवितेत उत्कट काव्यागुणांनीं ओथंबलेली भावगीते फारशी आढळत नाहीत. कारण त्यांचे विचार तर्कशील असल्याने भावनेने रंगता रंगता ते तार्किक प्रवचनाच्या प्रांतात कधी शिरतात हे त्यांनाच कळत नाही. ‘प्रियकर हिंदुस्थान’ मध्ये कवी म्हणतो, “तुझ्या जलाही अनंत पितरा दिले तिलांजलिदान, पुण्यभूमी तू! पितृभूमी तू! तू आमुचा अभिमान! ” तसेच ‘स्वतंत्रते चे स्तोत्र ‘, ‘ हिंद सुंदरी ती ‘ अशा विषयातून देशप्रेम दाखविणारी गीते लिहिली आहेत. मुलाच्या निधनानंतर ‘ प्रभाकरास ‘ ही कविता कोमलता, वात्सल्य, असहाय्यता अशा भावभावनांनी परिपूर्ण आहे. ‘तनुवेल ‘ हे उत्कट प्रेमगीत आहे. आर्या वृत्तात लिहिलेली ‘ बालविधवा – दुःस्थिती – कथन ‘ ही कविता म्हणजे त्या स्त्रियांची वकिली थाटात मांडलेली कैफियत आहे.

दोन्ही भावांना भारतात अटक झाली हे कळल्यावर वहिनींना उद्देशून पत्रात्मक कविता ‘सांत्वन ‘ लिहिली. या कवितेत तळमळ, जिव्हाळा ओतप्रोत भरला आहे कारण ही छांदस प्रकारातील ओवीबद्ध शिथिल रचना आहे.

१९०९ साली सावरकर बॅरिस्टरची परीक्षा पास झाले. राजद्रोह न करण्याच्या अटीवर त्यांना सनद मिळणार होती पण त्यास त्यांनी नकार दिला. लवकरच ते राजद्रोहाच्या आरोपावरून पकडले गेले व त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. ब्रिटिश कोर्टाने नंतर त्यांना हिंदुस्थानात धाडण्याचा आदेश दिला पण हिंदुस्थानात गेल्यानंतर आपल्याला अंदमानलाच धाडले जाईल ही भीती होती म्हणून त्यांनी ‘माझे मृत्युपत्र’ ही वसंततिलका वृत्तातील कविता गुप्तपणे आपल्या वहिनी कडे पाठविली. मृत्युपत्रातील त्यांची संपत्ती व तिची केलेली वाटणी आवर्जून वाचावी. भारतात येताना त्यांनी सुटण्याचा धाडसी प्रयत्न केला पण पकडले गेले. आता भारतात गेल्यानंतर आपला अमानुष छळ होणार याची खात्री असल्याने वज्रवृत्तीचे कवच निर्माण करणाऱ्या ‘ आत्मबल ‘ या काव्यात कवी म्हणतो ‘अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला ‘ हे असे अचलधारणा प्रकट करणारे गीत लिहिले.

हिंदुस्तानात खटला चालल्यावर त्यांना आजन्म काळ्यापाण्याची शिक्षा झाली. त्यावेळेसच हत्येस चिथावणी या आरोपावरून दुसरा खटला भरला गेला. त्यावेळी त्यांना खात्री होती की आता फाशी होणार. त्यावेळी ‘ पहिला हप्ता ‘ ही देशभक्तीपर कविता लिहिली. मायभूला म्हणतात, “ऋण ते फेडाया | हप्ता पहिला तप्त स्थंडिली देह अर्पितो हा.” अंदमनातील बंदिस्त जीवनाने आयुष्याचा बराच भाग व्यापल्याने त्या अनुभवातून बऱ्याच कविता निर्माण झाल्या आहेत. ‘ पायातील बेडी ‘ हे मनःशल्य असले तरी ती एखाद्या दागिन्याप्रमाणे घासून, पुसून घालावी लागे. नाहीतर ती गंजल्याने जास्तच टोचू लागे. हा विरोधाभास पाहून ते म्हणतात, ” फोडूनि, तोडूनी जी जाळावी, तीच कशी उजळावी आपण, आपुलीची रे बेडी, हौस तुझी ही वेडी ” केंव्हाही मृत्यूच्या स्वाधीन व्हावे लागेल, अशावेळी मृत्यूचा स्वीकार सुखाने करण्याची मनाची तयारी करताना म्हणतात, ” ये मृत्यो! ये तू ये! यावयाप्रती निघालाच असशील जरी ये तरी सुखे, कोमेजुनी जावया भिवोत ही फुले, ही द्राक्षे रसरशीत सुकुनि जावया, भ्यावे ते कां म्हणूनी तुजसि परी मी? ” अशाच ‘ जा झुंज ‘, मला देवाचे दर्शन घेऊ द्या ‘ या ही भावगीताचे नमुने म्हणून सांगता येतील. पण या सर्व कवितांवर राज्य करणारी कविता किंवा भावगीत म्हणजे, ‘ सागरा प्राण तळमळला ‘! आपण आपल्या प्रतिभेचे देणे देशप्रेमाच्या आविष्कारात वेचले पाहिजे, अशी सावरकरांची तळमळ होती. करुण रसाला अनुकूल अशा अक्रूर वृत्तातील गीत, सागराच्या काठी बसून आपल्या हृदयाची व्यथा सांगताना त्यालाच पुन्हा परत घेऊन जाण्याची विनंती करताहेत. पण हा मूळ स्वभावच नाही, त्यामुळे त्यालाही ते धमक्या देतात, ‘अबला न माझी ही माता रे, कथिल हे अगस्तीस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला ‘ आपल्या सर्वांच्या परिचयाचे अमर गीत म्हणजे ‘ जयोस्तुते ‘!

क्रमशः… 

(संदर्भ- वा. गो. मायदेव संपादित ‘सावरकरांची कविता ‘)

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझी जिथे घरगुती जेवणाची सोय झालेली होती ते घर आणि त्या घराशी जुळलेले माझे भावबंध हा माझ्या शेगावला जाण्याच्या उत्कट इच्छेच्या पूर्तीसाठी गजानन महाराजांनीच योजनापूर्वक निवडलेला अल्पकाळासाठीचा एक थांबा होता याची त्या क्षणी तरी मला कल्पनाही नव्हती!)

माझी अचानक अहमदनगरला बदली झाल्यानंतर योग्यवेळी आलेलं ते एक वळण होतं. हे वळण माझ्या ऋणानुबंधांचाच एक भाग होतं हे माझ्या अकल्पितपणे लक्षात आलं ती खूप नंतरची गोष्ट.

अचानक उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीत त्या काकूंनी गरजूंसाठी घरगुती जेवणाचे डबे द्यायला सुरुवात करून घराचा डोलारा हिमतीने सांभाळलेला होता ती त्यांची मुले लहान असतानाच त्यांचं सौभाग्य हरवलं होतं तेव्हाची गोष्ट! आता मुलं हाताशी आली होती, घरखर्चापुरतं कमवत होती, आईला आता दगदग करू नको, आराम कर म्हणत होती, तरीही सुरुवातीपासून जोडलेल्या चार दोन घरी जेवणाचे डबे देणं त्यांनी सुरू ठेवलेलं होतं. खरंतर ते कुटुंब कष्टातून वर येत होतं तेव्हाही घराचं घरपण टिकावं म्हणून काकूंनी घरी येऊन जेवणारे मेंबर्स कधीच स्विकारले नव्हते आणि आजतागायत तेच धोरण त्यांनी अवलंबलं होतं. त्यांनी स्वत:च ठरवून घेतलेल्या या नियमाला मी मात्र अपवाद ठरलो होतो. याला निमित्त ठरले होते ते आमच्या ब्रॅंचमधले श्री. कुलकर्णी. त्यांच्या शेजारचंच हे कुटुंब. केवळ या कुलकर्णींनी केलेल्या विनंतीला मान देऊन काकूंनी माझी जेवणाची सोय करायचं मान्य केलं होतं हे नंतर गप्पांच्या ओघात काकूंकडूनच मला समजलं.

काकू स्वयंपाक खूप रुचकर करायच्या. अगत्यानं, प्रेमानं वाढायच्या. ते घर भेटलं नसतं तर मला सगळं निभावणं खरंच खूप अवघड गेलं असतं.

अहमदनगरमधलं माझं रुटीन असं मार्गी लागलं तेव्हा इथली उर्वरित तीन वर्षे सुरळीत जाणं फारसं जिकीरीचं नसेल असं मला वाटलं खरं पण त्याच दरम्यान पडद्यामागे अशा कांही घटना घडत होत्या की त्या माझा इथला अन्नाचा शेर संपवण्याला लगेचच निमित्तही ठरल्या!

इथे येऊन मला फार तर चार महिनेच झाले असतील. मी त्या दिवशी नेहमीप्रमाणे काकूंकडे जेवण करून ब्रॅंचला जाण्याऐवजी, सकाळीच कांही महत्त्वाच्या कस्टमर्स व्हिजिट्स असल्याने उशीरा जेवायला जायचं ठरवून तसा निरोपही काकूंकडे देऊन आलो, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की हा माझा इथला अखेरचा दिवस असणार आहे. कारण त्यादिवशीच्याच इनवर्ड मेलमधे माझी तातडीने अकोला ब्रॅंचला बदली झाल्याची ऑर्डर होती! हे सगळंच अकल्पित, अनाकलनीय आणि चक्रावून टाकणारं होतं! हे सगळं कां? .. कशासाठी? .. हे प्रश्न त्या क्षणी तरी निरूत्तरीतच होते. पुढे त्याचं जे कारण समजलं तेही तसं अकस्मात निर्माण झालेलं असंच होतं. ऍडव्हर्स ऑडिट रिपोर्टमुळे अकोल्याच्या मॅनेजरची रातोरात गच्छंती झालेली होती आणि तातडीची गरज म्हणून मग तिथं कुणाला तरी पाठवायलाच हवं, म्हणून माझं हे पोस्टींग. ‘.. पण मीच कां? ‘ याला समाधानकारक उत्तर नव्हतं. ही गजानन महाराजांनी सुरू केलेली माझ्या परीक्षेची सुरूवात असावी अशी पुसटशी शंकाही तेव्हा मनात यायचं कांही कारण नव्हतं. पण लौकरच त्याची प्रचिती मात्र येणार होती आणि आश्चर्य म्हणजे याचं सूतोवाच व्हायला निमित्त ठरणार होत्या या काकूच!

खरंतर इथलं रुटीन नुकतंच सुरळीत सुरू झालं तेव्हा मला आता निदान महिन्यातून एका वीकेंडला तरी सांगलीला घरी जाता येईल हाच विचार मनात येऊन मी त्यातच समाधान मानलं होतं. आणि आता मी कधी विचारही करू शकणार नाही अशा अकोल्यासारख्या दूरच्या ब्रॅंचमधे झालेली माझी ही अशी बदली यांचा मेळ बसवायचा कसा?

माझ्यापुरता विचार करायचा तर ही बदली अकाली आणि अन्यायकारकच नव्हती फक्त तर माझ्या दैनंदिन अडचणी प्रचंड प्रमाणात वाढवणारीही ठरणार होती. ही ट्रान्स्फर आॅर्डर वाचली त्याक्षणी तरी मला ती पनिशमेंटच वाटली होती. तोवरच्या माझ्या २८ वर्षांच्या बॅंकिंग करिअरमधे सतत होत आलेलं माझं कौतुक आणि मिळत गेलेलं यश यांना परस्पर छेद देणारी अशीच ही शिक्षा आहे या विचाराने मी अस्वस्थ होतो. आता कुठल्याही क्षणी झोनल ऑफिसचा तातडीनं रिलीव्ह होण्याचा फोन येईल हा विचार मनात आला आणि आठवण झाली ते मी रोज जेवायला जात होतो त्या काकूंची. मग घाईघाईनेच ब्रँच-रूटीनची व्यवस्थित घडी बसवून दुपारी एक-दीडच्या सुमारास त्यांच्या घरी जेवायला जाण्यासाठी मी ब्रॅंचमधून बाहेर पडलो. त्यांना माझी बदली झालीय हे सांगायला तर हवंच या विचाराचंच दडपण वाटत राहिलं. ते घर आणि तिथली माणसं यांनी माझ्या नेमक्या गरजेच्या वेळी मला कसलेही आढेवेढे न घेता केलेली मदत माझ्यासाठी खूप मोलाची होती. अतिशय अतूट असे हे ऋणानुबंधच आहेत अशीच माझी भावना होती. आता इथून कायमचं निघून जावं लागणाराय हे नाईलाजाने मी स्वीकारलं, तरी तसं काकूंना सांगणं मला खूप जड जाणार होतं. आज रात्री जेवायला येऊ तेव्हा सांगूया कां असंही एकदा वाटलं पण आजच अचानक रिलीव्ह व्हायला लागलं तर? .. हा विचार मनात आला आणि मी नाईलाजाने त्यांना हे आत्ताच सांगून टाकायचं असं ठरवलं. हे सगळे उलट सुलट विचार मनात घेऊनच मी बेल वाजवली. जेवणासाठी पानं घेऊन काकू माझीच वाट पहात होत्या.

“आज खूप उशीर केलात? ” आमच्या दोघांचीही पानं वाढता वाढता त्यांनी विचारलं.

“हो ना. तुम्ही जेवला नाहीत अजून? “

“तुमचीच वाट पहात होते. ” त्या म्हणाल्या.

भूक लागली होती तरी जेवणात माझं लक्षच नव्हतं. जे सांगायचं त्यासाठी मी शब्द जुळवत राहिलो.

” काकू ” मी क्षणभर घुटमळलो. “.. माझी बदली झालीय.. “

त्यांनी अविश्वासाने चमकून माझ्याकडे पाहिलं.

“बदली? अशी मधेच? “

त्यांना झालेला विषाद त्यांच्या शब्दांत झिरपलेला होता.

“कुठं झाली म्हणायची? “

“अकोल्याला. “

“अकोला? कुठलं अकोला? म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यातलं, जवळचंच ना? “

“नगर जवळचं म्हणजे? “

“इथं आपल्या नगर जिल्ह्यांत एक खेडंगाव आहे ना अकोला नावाचं. तिथंच ना? “

“छे छे.. नाही. तिथं आमच्या बँकेची ब्रॅंच नाहीये. माझी बदली झालेलं हे अकोला नागपूर जिल्ह्यात आहे. “

” हां. ते कां? माहितीय. ते गजानन महाराजांच्या शेगाव जवळचं. ” त्या म्हणाल्या.

अपेक्षितपणे त्यांचे हे शब्द कानावर पडताच मी चमकून त्यांच्याकडे पहातच राहिलो.

“कां हो? काय झालं? “

“अ..? नाही.. कांही नाही. मला.. मला.. हे माहित नव्हतं. शेगाव अकोल्यापासून जवळ आहे कां? ” मी उत्सुकतेने विचारलं.

“हो तर. अगदी जवळ. एस. टी. ने फार फार तर तासाभराचं अंतर. “

मी थक्क होऊन ऐकतच राहिलो. या क्षणापर्यंत मला अडचणीची, नकोशी वाटणारी ही बदली महाराजांनीच घडवून आणलेली आहे असा विचार मनाला स्पर्शून गेला आणि मी शहारलो. ताई गेल्यानंतरच्या अस्वस्थतेत मी अतिशय तळमळीने गजानन महाराजांना मनोमन केलेली प्रार्थना आठवली आणि मन भरून आलं. आपली बदली ही आपत्ती नाही तर इष्टापत्ती आहे हा विचार मनात आला आणि शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाण्याचा अचानक आलेला हा योग मनाला उभारी देऊन गेला. त्याच मनोवस्थेत मी काकूंचा निरोप घेतला. जाण्यासाठी वळणार तेवढ्यांत त्यांनी मला थांबवलं.

” नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन, महाराजांचे आशीर्वाद घेऊन मगच रूजू व्हा. सगळं छान होईल. ” त्या म्हणाल्या.

मी हेच तर ठरवलं होतं. काकूंच्या तोंडून जणूकांही गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असंच वाटलं आणि मी निश्चिंत झालो!

पण…? हे वाटतं तेवढं सोपं नसणाराय, यानंतर येणारा प्रत्येक क्षण माझी कसोटी पहाणारच ठरणार आहे याची पुसटशीही कल्पना मात्र मला नव्हती!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “’मन:’ सामर्थ्य म्हणजे काय?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “’मन:’ सामर्थ्य म्हणजे काय?☆ श्री जगदीश काबरे ☆

‘मन’ या शब्दाचा किती विविध प्रकारे अर्थपूर्ण वाक्यात उपयोग करता येतो त्याची ही झलक…

‘मन’ हे भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती आणि भावविश्वाचा एक अतिशय गहन आणि महत्त्वाचा भाग आहे. मानवी जीवनाचे सर्व निर्णय, भावना, वर्तन, आणि भविष्य ‘मना’ च्या प्रभावाखाली असतात. ‘मन’ हा शब्द फक्त एक मानसिक अंग नाही, तर तो एका व्यक्तीच्या सर्व क्रियाकलापांचे केंद्र असतो. म्हणजे असे की, ‘मना’ ची शांती हा जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा ठेवा आहे. जो माणूस आपल्या ‘मना’ ला शांत ठेवतो, तो बाह्य वादळांचा प्रभाव झेलण्यास सक्षम होतो. आजच्या तणावपूर्ण जीवनात, ‘मना’ ची शांती राखणे अत्यंत आवश्यक आहे. ‘मना’ ची उर्जा अपार असते, ती आपल्या इच्छाशक्तीला दिशा देते. जर ‘मन’ जिंकले, तर कोणतीही कठीण कामे सहज पार केली जाऊ शकतात. वाचन, कला, विज्ञान आणि जीवनातील अन्य क्षेत्रात ‘मना’ चे उद्दीपन विविध कार्यांच्या उन्नतीसाठी प्रेरक ठरते. ‘मना’ च्या सीमांमध्ये खूप मोठ्या गोष्टी दडलेल्या असतात. अनेक वेळा, आपल्या ‘मना’ च्या सीमांमध्ये आपल्या अव्यक्त इच्छा, भावना आणि अमीट स्वप्ने दडलेली असतात. ‘मना’ चा गोंधळ होणे हा सर्वसामान्य अनुभव आहे. संकट, चिंता आणि अनिश्चितता यामुळे ‘मना’ चा गोंधळ उडतो. या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी योग्य विचार सुचावे म्हणून आपल्याला शांत ‘मना’ ची आवश्यकता असते. गोंधळलेल्या ‘मना’ मुळे आपल्याला योग्य मार्ग सापडत नाही आणि त्यामुळे कधी कधी निर्णय घेताना अडचणी येतात. ‘मना’ तील विचार हे व्यक्तीच्या आंतरिक जगाचा आरसा असतात. विचार हे आपल्या ‘मना’ ची मानसिक स्थिती, भावना आणि वृत्तीचे प्रतिबिंब असतात. आपल्या ‘मना’ तील विचार आपल्या क्रियांचे कारण ठरतात, आणि त्याचप्रमाणे आपले भविष्य घडवतात. सकारात्मक विचार ‘मना’ ला प्रोत्साहित करतात, तर नकारात्मक विचार ‘मना’ त अस्वस्थता निर्माण करतात. ‘मना’ तील संघर्ष हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आतापर्यंत जीवनात ज्या काही अडचणी आलेल्या असतात, त्या सर्वांचा सामना ‘मना’ च्या आंतरिक संघर्षातूनच केला जातो. कधी कधी ‘मना’ ने निर्णय घेणे किंवा स्वीकार करणे कठीण होते, कारण ‘मन’ एकाचवेळी अनेक गोष्टींच्या व्यवधानात अडकलेले असते. पण एकदा का आपण त्या समस्येतून मुक्त झालो तर ‘मना’ ला प्रचंड समाधान मिळते. ‘मना’ चे समाधान हे जीवनाच्या शाश्वत सुखाची किल्ली आहे. कोणत्याही बाह्य वस्तू वा परिस्थितीमुळे समाधान मिळाल्यानंतरही ‘मना’ चे समाधान होणे महत्वाचे असते. जेव्हा आपले ‘मन’ आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने भरलेले असते, तेव्हा जीवन देखील समृद्ध आणि पूर्णत: समाधानकारक वाटते. ‘मना’ च्या दृष्टीने समृद्ध जगणं म्हणजे जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेत जगणं होय. ज्या प्रमाणे दृष्टी आपल्याला बाह्य जग दाखवते, त्याचप्रमाणे ‘मन’ आपल्याला आपल्या अंतर्गत जगाचे ज्ञान देते. ‘मना’ च्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीमागे एक गहिरा अर्थ आणि अनुभव लपलेला असतो. म्हणून ‘मना’ च्या शक्तीवर विश्वास ठेवा. कारण ‘मना’ च्या शक्तीला कोणतीही सीमा नाही. जेव्हा आपला विश्वास असतो की, आपले ‘मन’ सक्षम आहे, तेव्हा आपली ‘मन:’ शक्ती वर्धित होते. आपल्या ‘मना’ च्या या कार्यक्षमतेमुळे आपण अशक्यप्राय कामेही पूर्ण करू शकतो. त्यासाठी ‘मना’ चे परिष्करण करणे ही जीवनात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा आपण आपल्या ‘मना’ चे परिष्करण करतो, म्हणजे आपल्या ‘मना’ ला शुद्ध करतो आणि परखड परीक्षण करतो, तेव्हा आपल्यामध्ये अधिक विचारशीलता, अधिक स्पष्टता आणि अधिक समज येते. असे परिष्कृत ‘मन’ जीवनाच्या प्रत्येक पैलूला सुसंगतपणे सामोरे जाऊ शकते. एवंच ‘मन’ एका संपूर्ण मानसिक आणि भावनात्मक प्रक्रियेचा भाग आहे, हे कधीही विसरू नये. ‘मना’ वर नियंत्रण ठेवणे म्हणजे जीवनाला एक नवा आयाम देणे, आकार देणे आहे, आणि या प्रक्रियेतच आपल्या प्रगतीची वाट दडलेली आहे. म्हणूनच म्हणतात, ‘मन’ चांगा तो कठौती में गंगा! थोडक्यात काय तर, ज्याने ‘मन:’ सामर्थ्य ओळखले त्याने जग जिंकले. 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत मुक्ताबाई व ज्ञानबोध ग्रंथ… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

🌸 विविधा 🌸

संत मुक्ताबाई व ज्ञानबोध ग्रंथ… ☆ सुश्री शोभना आगाशे

(दि. २२ मे हा दिवस संत मुक्ताबाई यांचा पुण्यस्मरण दिन होता. त्यानिमित्त लेख)

संत मुक्ताबाई म्हटलं की ताटीचे अभंग आठवतात. याव्यतिरिक्त ही त्यांचे कांही अभंग प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांच्या अध्यात्मिक उंचीची कल्पना देणारा त्यांचा ‘ज्ञानबोध’ ग्रंथ फारच कमी लोकांना ठाऊक आहे. हा ग्रंथ सहजासहजी कुठे उपलब्ध नाही, हे याचं एक कारण असू शकते. या ग्रंथात संत निवृत्तीनाथ व मुक्ताबाई यांच्यातील संवाद अभंग रूपात येतो. हा ग्रंथ ‘नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय’ प्रकाशनाने १९७६ साली प्रथम प्रकाशित केला. याचे मूळ हस्तलिखित देखिल येथे उपलब्ध आहे. या ग्रंथाची निर्मिती संत ज्ञानेश्वर, सोपानदेव व चांगदेव यांच्या समाधीनंतर झाली असावी. या ग्रंथनिर्मिती नंतर कांही दिवसातच मुक्ताबाई स्वरूपाकार झाल्या.

या ग्रंथाचे तीन विभाग करता येतील. पहिल्या भागात १२६ अभंगांतून निवृत्तीनाथांनी मुक्ता बाईंना बोलत्या करण्यासाठी केलेल्या विनवण्या आहेत व विचारलेले प्रश्न आहेत.

दुसऱ्या भागात या प्रश्नांना मुक्ताबाईंनी ५६ अभंगांतून दिलेली उत्तरे आहेत. ही प्रश्नोत्तरे संत नामदेव व इतर शिष्य गणांच्या उपस्थितीत झालेली आहेत.

तर तिसऱ्या भागात निवृत्तीनाथ व मुक्ताबाई यांच्यातील खाजगी संवाद आहे. एका अभंगातून निवृत्तीनाथांनी प्रश्न विचारावा तर पुढच्या अभंगातून मुक्ताबाईंनी त्याला उत्तर द्यावे. असे २१ अभंग आहेत.

प्रत्यक्ष गोरक्षनाथांची भेट झाल्यापासून मुक्ताबाई आत्ममग्न स्थितीत असल्यामुळे अबोल झाल्या होत्या. म्हणून निवृत्तीनाथांनी वारंवार विनवण्या करून त्यांना बोलते केले आहे. कारण अध्यात्मिक दृष्ट्या मुक्ताबाई आपल्या पेक्षाही प्रगत आहेत याची निवृत्तीनाथांना खात्री पटली होती. एक गुरू आपल्या शिष्याची महती जाणून, त्याच्या चरणी कसा लीन होतो याचे हृद्य दर्शन पहिल्या भागात होते.

संत निवृत्तीनाथ येथे मुक्ताबाईंकडे आपली लहान बहीण किंवा आपली शिष्या म्हणून पहात नाहीत तर साक्षात् आदिमाया म्हणून बघतात.

प्रत्यक्ष आदिमायेने स्वमुखाने ब्रम्ह आणि माया यांच्या स्वरूपाची चिकित्सा करावी असा विलक्षण योग येथे जुळून आला आहे.

गोरक्षनाथांकडून प्राप्त ज्ञाना बद्दल मुक्ताबाईंनी बोलावं व आपल्याला मार्गदर्शन करावे अशी निवृत्तीनाथांची इच्छा आहे. म्हणून इथे गुरू शिष्याची तीच जोडी, परंतु गुरू व शिष्य यांच्या स्थानांची अदलाबदल झालेली दिसते. आणि स्वतःच्या सद्गुरूंनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणारी, त्यांनासुद्धा अधिकारवाणीने चार शब्द सांगू पाहणारी मुक्ताबाई येथे आपल्याला भेटते.

(संदर्भ:- ‘कडकडून वीज निघाली ठायी चे ठायी’ संत मुक्ताबाई – व्यक्ती आणि वाङ्मय – डाॅ. केतकी मोडक – द्वितीय आवृत्ती).

संत मुक्ताबाईंचा जीवनपट, त्यांच्या या अलौकिक पण सामान्य साधकापर्यंत न पोहोचलेल्या ‘ज्ञानबोध’ ग्रंथाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. म्हणूनच मी माझ्या खाली उद्धृत केलेल्या मुक्ता बाईंच्या चरित्रात्मक कवितेत या ग्रंथाचा उल्लेख खास करून केला आहे.

☆ संत मुक्ताबाई ☆

*

आदिमाया अवतरली जगती

अश्विन शुद्ध प्रतिपदेसि

*

बोल बोबडे बोलत असता

अंतरली ती मायपित्यासि

*

बालपणाला त्वरे लंघुनि

माता बनली वडील बंधुंसि

*

दिधली दीक्षा निवृत्तीनाथे

गुरूभगिनी हो ज्ञानयासि

*

प्रवास अवघड अध्यात्माचा

शंका ती पुसते ज्ञानेशासि

*

अनुभवा येता समाधी निर्गुण

शून्याकार पाही जगतासि

*

आत्ममग्न ती राही एकली

अनुभवी सदा तुर्यावस्थेसि

*

पोकळ पंडिती शाब्दिक शस्त्रे,

जंव जखमी करिती ज्ञानोबांसि

*

आत्ममग्न ते होऊन चिंतित

मिटुनि घेती ज्ञान कवाडांसि

*

रुष्ट ज्ञानेशा, ती करि उपदेशा

रचुनि ताटीच्या अभंगांसि

*

कार्यप्रवण होती तंव ज्ञानेश्वर

रचती भावार्थ – दीपिकेसि

*

पैठण क्षेत्री भिंत चालविती

चांगदेव येता भेटीसि

*

पत्र पाहुनि कोरे त्यांचे

धाडिती त्यां पासष्टीसि

*

अर्थ न उमगे परंतु त्यांसि

येती शरण मग ज्ञानोबांसि

*

मुक्ताईचे शिष्यत्व पत्करी चांगा,

निजबोध प्राप्त मग होई त्यांसि

*

परमभक्त परि, अहंकारी नामदेव

गुरूविण ना मोक्ष, सांगे ती त्यासि

*

तीर्थाटना जाती बंधु नि संत, परि

मागे राहुनि उपदेशी ती शिष्यांसि

*

आळंदीस घेती ज्ञानेश समाधी

सोपान समाधिस्थ सासवडासि

*

उदास, अलिप्त होई मुक्ताबाई

त्यागुनि देई ती अन्नपाण्यासि

*

स्वरूपी निमग्न, अंगिकारी मौन

विनवी निवृत्ती उपदेशासि

*

अदलाबदली गुरू नि शिष्याची

निर्मि ‘ज्ञानबोध’ ग्रंथासि

*

तापी तीरी करिता भजन कीर्तन

ऐकिती सारे अगम्य घंटानादासि

*

पंचमहाभूते बेभान होऊनि

भेटती तेथे आदिमायेसि

*

मेघांची दाटी, विजेचा कल्लोळ

तुफान वारा, उडवी धुरळ्यासि

*

गगन धरा जणु होती एकरूप

पाऊस करी तांडवनृत्यासि

*

मुक्ताबाई गुप्त होताच

अवचित पसरे सर्वत्र शांतीसी

*

स्वरूपाकार मुक्ताई होता

मुखावर निवृत्तीच्या पसरे उदासी

(मुक्ताबाईंना भेटण्यास आलेली पंचमहाभूते 👉 मेघांची दाटी = आकाश, विजेचा कल्लोळ = तेज, तुफान वारा = वायु, उडवी धुरळ्यासि = पृथ्वी, पाऊस करी तांडव = आप)

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रोज बदलतं स्टेटस… ☆ सौ. वृषाली सहस्रबुद्धे ☆

सौ. वृषाली सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ रोज बदलतं स्टेटस… ☆ सौ. वृषाली सहस्रबुद्धे 

19.04. 2024 पासून लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा पहिला टप्पा सुरू झाला. सुजाण नागरिक मतदान करायला तर गेलेच आणि नंतर त्यांनी आपल्या मतदानाचा पुरावा त्यांनी व्हॉट्‌स ॲप किंवा इतर सोशल मीडियाच्या स्टेटसवर सादर केला. कुणी मतदान केंद्रावर तयार केलेल्या ‘सेल्फी पॉईंट’वर, कुणी मतदान केंद्राच्या आवारात वा प्रवेश द्वारात, कुणी घरी परत येण्यापूर्वी गाडीवर बसून तर काहींनी घरासमोर फोटो काढून ते स्टेटसवर टाकले. हा सगळा प्रकार पाहून मला प्रश्न पडला की खरंच असे आपल्या वैयक्तिक गोष्टींचे फोटो स्टेटसवर टाकणं इतकं आवश्यक आहे? समजा ‘मी मतदान केलं’ हे कुणालाही कळलं नाही तर मी ते केलं नाही असं होतं का? नाही ना! !

आजकाल अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीही स्टेटसवर ठेवल्या जातात. कुठे जेवायला गेले तर आधी तिथे फोटो काढणार आणि स्टेटसला टाकणार. तीच कथा जेवण आल्यावरची. समोर आलेलं गरमागरम सुग्रास जेवण जेवायचं सोडून ते वाढलेल्या ताटाचे फोटो आधी स्टेटसला जावे लागतात. त्यामुळे बहुतेक त्या पदार्थांची चव वाढत असणार. काही लोक तर जेवत असतानाचेही फोटो टाकतात. काय उपयोग याचा? कारण हे स्टेटस बघणारे जे लोक असतात ना तेही हे सगळं करत असतातच ना! मग त्यांना या फोटोंचं काय कौतुक?

यात आणखीही एक मजेदार प्रकार असतो. ग्रुपमधल्या एखाद्याचा वाढदिवस असतो. मग तो स्वतःचा वाढदिवस कसा साजरा केला याचे फोटो स्वतःच्या स्टेटसवर ठेवतो. इथपर्यंत सगळं ठीकच आहे. पण मग ग्रुपमधील कुणीतरी त्या स्टेटसचा स्क्रीन शॉट काढून तो आपल्या स्टेटसवर ठेवतं. काय सुचवायचं असतं नक्की त्याला? की बाबा रे बघ, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की माझ्याही स्टेटसला तुझेच फोटो आहेत असं? अर्थात जे तो वाढदिवस विसरले आहेत त्यांना त्याची आठवण यावी हाही एक छुपा उद्देश त्यामागे असावा. खरं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा वैयक्तिक संदेश पाठवूनही देता येतात. सरळ कॉल करून बोलणे तर फारच छान. पण नाही, जोपर्यंत मी काय केलं हे लोकांना कळत नाही तोपर्यंत जगण्याचा काय उपयोग?

तरी एक वेळ अशा आनंदाचं ठीक आहे, पण आपण जे सामाजिक कार्य करतो त्याची जाहिरात का स्टेटसवर केली जाते? आपण झाडं लावणार असू तर लगेच त्या रोपाबरोबरचा एक फोटो स्टेटसला. रक्तदान केलं तर लगेच हाताला सुई पोचलेल्या अवस्थेत रुग्णालयाच्या पलंगावर पडून असतानाचा फोटो स्टेटसला. कुठल्या तरी संस्थेला अगदी छोटीशी देणगी दिली तरी तिथल्या पदाधिकाऱ्यांबरोबरचा फोटो स्टेटसला येणं हे जास्त महत्वाचं असतं. तीच कथा अन्नदानाची. भुकेलेल्या लोकांना खायला घालण्यापेक्षा जास्त महत्त्व त्यांच्या घोळक्यासमोर उभं राहून घेतलेल्या सेल्फीला आणि ती स्टेटसवर येण्याला ही सध्याची अवस्था आहे. खरं तर आपल्या संस्कृतीत गुप्तदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. मग आता याचाही गाजावाजा करणं का आवश्यक झालं आहे? ‘मी दान करतो, अगदी याचक मागेल ते त्याला देतो’ अशी दवंडी न पिटताही कर्ण अजूनही दानशूर म्हणून प्रसिद्ध आहेच ना! !

आजकाल बहुतेक सर्वच लोक स्वतःच्या आयुष्यातील अगदी खाजगी बाबीही ह्या स्टेटसवरच्या फोटोंमुळे चव्हाट्यावर आणत असतात. मग ते मित्र-मैत्रिणींबरोबरचं भांडण असो वा घरातल्या लोकांशी झालेले मतभेद. मुलाचा वाढदिवस असेल तर त्याच्या खरेदीसाठी गेल्यावर तिथला फोटो, त्याची तयारी झाल्यावर त्याच्यासकट सजलेल्या घराचे आतून, बाहेरून फोटो, नवीन घेतलेल्या सगळ्या वस्तू – अगदी कपडे, दागिने, फर्निचर, कार इत्यादी – हे सगळं स्टेटसला जावंच लागतं. घरातले सगळे चित्रपट बघायला, जेवायला किंवा प्रवासाला गेले तर वारंवार ‘स्टेटस अपडेट’ करून त्याचा सतत गाजावाजा केला जातो. पण यातून आपण आपलं घरदार, जीवाभावाची माणसं, वैयक्तिक आयुष्य असुरक्षित करत असतो हे या सगळ्यांना कसं समजत नाही? प्रत्यक्ष भेटायला जायला तर सोडाच, पण आजकाल फोनवरही थोड्या वेळ बोलायलाही ज्यांना वेळ नसतो ते स्टेटसवर मात्र तासचे तास घालवताना दिसतात.

यावर आधारित एक गोष्ट मी काही वर्षांपूर्वी टीव्हीवर पाहिली होती. साधारणतः ५५ ते ६० च्या दरम्यान वय असलेलं एक जोडपं घरी बसून अशा तरुण जोडप्यांचं स्टेटस रोज बघतात ज्यांना तान्ही ते ९-१० वर्षांपर्यंतची मुलं आहेत. मग त्या मुलांच्या वाढदिवसाच्या म्हणा किंवा इतर काही निमित्ताने म्हणा ते कुटुंब ज्या दिवशी गर्दीच्या ठिकाणी जाणार असेल जसं की खरेदीसाठी बाजारात, मॉलमध्ये किड्स् झोनला खेळायला, किंवा एखाद्या यात्रेत वा प्रदर्शनात इत्यादी, तिथे आपल्या तरुण साथिदारांना पाठवून त्या लहान मुलांना पळवून आणतात आणि त्यांची विक्री करतात. त्या जोडप्याच्या वयामुळे ते बरेच दिवस पोलिसांच्या नजरेत येत नाहीत, कारण ते सोशल मीडियावरच्या स्टेटसचा असा काही वापर करत असतील आणि तेही त्यांच्या वयात हा संशय कुणालाही येत नाही. पण ती गोष्ट असल्याने यथावकाश पोलिस त्या दोघांसह त्यांच्या पूर्ण टोळीलाही पकडतात आणि तो मुलांचा व्यापार थांबवतात. पण हे वास्तव आहे का? आणि असेल तरीही तोपर्यंत विकल्या गेलेल्या त्या छोट्या मुलांचं नक्की काय झालं, त्यातली किती सापडली, किती घरी परतली, किती जणांना घरच्यांनी परत स्वीकारलं (मुलींच्या बाबतीत तर हा प्रश्न फारच विदारक स्वरूपाचा असतो), ज्यांना काहीच आठवलं नसेल त्यांचं काय झालं असे अनेक प्रश्न मला अजूनही सतावतात.

म्हणून असं वाटतं की आपल्याला होणारा आनंद किंवा दुःख अथवा आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी या सोशल मीडियावरच्या स्टेटसला सतत टाकून जगासमोर आणू नयेत. कारण ते स्टेटस पाहणारा प्रत्येक माणूस चांगलाच असेल, आपलं भलं चिंतीत असेल असं नाही. जे लोक वाईट प्रवृत्तीचे आहेत ते तुमचा गैरफायदाही उठवू शकतात. तेव्हा स्टेटसवर काहीही टाकण्यापूर्वी आपलं घर, संसार, आपली माणसं यांचा विचार नक्कीच करा.

©  सौ. वृषाली सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हिसाब बराबर… ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

सुश्री गायत्री हेर्लेकर

? विविधा ?

☆ हिसाब बराबर… ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

टी. व्ही. वर अर्थमंत्री निर्मला सीतारामन–अतिशय आत्मविश्वासाने सादर करत असलेले बजेट मी दरवर्षीप्रमाणे ऊत्सुकतेने पहात होते. नोकरदार वर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे आयकर–त्यातील बदल. तसे तर नोकरीवर असतांना या वर्षी तरी काही कर कमी होईल का?

का जास्तच वाढेल? कोणत्या वस्तु स्वस्त होतील, कोणत्या महाग?

किती गुंतवणुक करावी लागेल म्हणुन माझाही तो जिव्हाळ्याचाच मुद्दा असायचा. कारण गुंतवणुकीचे, नविन खरेदीच्या खर्चाचे गणित त्यानुसार जमवावे लागे.. पण आता कापु देत किती कर कापतात ते., आता कशाला त्या गुंतवणुकीच्या भानगडीत पडायचे,. खर्चही तसा कमीच होतो. मुख्य औषधाचाच., म्हणुन मी दुर्लक्ष करत होते.

वयाचा विशिष्ठ टप्पा ओलांडला की आर्थिक बाबतीतले स्वारस्य कमी होणे स्वाभाविक आहे म्हणा. पण आता वेध लागतात ते दुसर्‍याच हिशोबाचे. अहो, कुठल्या म्हणुन काय विचारता? लक्षात नाही आले का? बरं तर “जरा ईस्कटुन” (टी. वी. वरील ग्रामीण सिरियलचा प्रभाव) सांगते.

आता हिशोब बघायचा तो आयुष्याच्या जमाखर्चाचा.

आपुलकी, प्रेम–द्वेषमत्सर,

कौतुक–टीकाटिप्पणी,

जोडलेली नाती—तुटलेली नाती, एकमेकांची ऊणीदेणी,

अपेक्षापुर्ती—निराशा, स्पर्धा -यशापयश,

आणि अशा अनेक गोष्टी. पण सर्वांची गोळाबेरीज —आपल्या भाषेत म्हणजे

सुख आणि दुःख

सुखाची मिळकत -जमा खाते

आणि दुःखाचे खर्च खाते.

आणि त्या दोन्हीतील तफावत —म्हणजेच नफातोटा. आणि ते समजल्याशिवाय * हिसाब बराबर–आहे का नाही हे कसे समजणार?

 झाले, माझ्या डोक्यात एखादा विषय एकदा शिरला की तो पुर्ण केल्याशिवाय जीवाला स्वस्थता म्हणुन नसते.

सामान्य भाषेत केल्या कर्माचे फळ सुखदुःखाच्या रुपात प्राप्त होत असते.

मग काय, केल्या कर्मांची रोजकीर्द त्यानुसार ऊघडलेली वेगवेगळी खाती (accounts),

जमाखर्च पत्रक, नफातोटा पत्रक, आणि ताळेबंद —मनाच्या संगणकावर साठवलेल्या सर्व फाईल्स ओपन केल्या. आणि नोंदीचे ऑडिट सुरु केले. अकौंटसीत नेहमी टॉपला असणारी मी.

 पण हा हिशोब तपासताना मात्र गोंधळल्यासारखे झाले.

कारण केल्या कर्माला आणि त्यामुळे मिळालेल्या फळाला सुखाच्या खात्यात जमा धरावे की दुःख म्हणून खर्ची टाकावे, हे ठरवतांना मनाची द्विधा स्थिती. हा निर्णय वाटला तेवढा सोपानव्हता. “कर्मण्येवाधिकारस्तेमा फलेशु कदाचन””हे अगदी पाठ असले तरी सामान्य प्रापंचिक लोक ते सोईस्कर रितीने विसरतात. म्हणुनच ते सामान्य असतात. मी ही तशीच एक सामान्य.

 रोजकिर्दीतले मधलेच एक पान ऊघडले. दिवसभराच्या नोंदी अगदी सकाळपासून व्यवस्थित होत्या.

 सकाळी सकाळीच अंथरुणात डोळे ऊघडले, आणि डोळे चुरचुरु लागले, कारण रात्री गोळी घेऊनही झोपच नाही,. रात्रभर बेजार करणारा खोकला, मधुनच ऊजवा गुडघा दुखणे, तर मधुनच डाव्या पायात क्रॅम्प. , तर मधुनच पाठीत कळ

तोंडाला कोरड, -‘-येणार येणार वाटते हार्ट ॲटॅक’ म्हणुन रात्रभर बेचैनी. —म्हणजे दुःखच ना? छान मऊ गादी असलेल्या बेडकडे “काय तुझा ऊपयोग? “म्हणत जरा रागाने बघितले.

 पण ऊठुन बसल्यावर ना कुणाची मदत, ना काठीचा, वॉकरचाआधार, तरीही छान चालायला आले हे काय कमी सुख आहे का? –म्हणुन माझी माझ्याशीच खुदकन हसले.

बेसिन समोरच्या आरशात दिसणारा आपलाच सुरकुतलेला चेहरा, डोक्यावरचे विरळ पांढरे केस, —झाले आता म्हातारी, –दुःखाच्या खात्यात परत एक नोंद झाली.

पण सुनेने टेबलवर ठेवलेला भरपुर दुधाचा, माफक गोड मस्त चहा आणि बिस्किटांचा आस्वाद घेतांना

‘अरे वा, आपल्याला डायबेटिस नाही, हे किती छान’ म्हणुन मनात सुखाच्या खात्यावर जमेची मोठ्या खुशीत केली.

नाष्ट्याच्या वेळी, तर सर्वांच्या कुरकुरीत डोश्याकडे पहातांना आपल्या दातांच्या खिडक्यांनी, ‘तु नाही खाऊ शकणार ” ही दुःखाची नोंद झालीच. पण लोणी घातलेला मऊ लुसलुशीत ऊत्तप्पा, आणि तो खायला मिळतो, पचतो, मन तृप्त करतो-मुख्य म्हणजे घरातले आपल्या तब्येतीची काळजी घेऊन, आठवणीने आयते -करुन देतात. हे किती सुखदायक.

“आई, रात्री झोप लागली का?” -मुलगा.

“आई छान नाटक लागले आहे, मी बुकिंग केले, आज जाऊया”- सुन

“आई, किती दिवसात माझ्याकडे आली नाहीस, ये ईकडे. मी गाडी पाठवते. ८, १० दिवस जरा बदल होईल, ईथेच कुठेतरी जाऊ फिरायला”-मुलीचे फोनवर बोलणे.

 “औषधे संपत आली की सांगा आणून देतो” मुलीकडे गेल्यावर जावयाचे विचारणे.

असे अनुभव म्हणजे सुखच-सुख. जमेच्या नोंदी.

रोजच घडत असलेल्या सर्व प्रसंगांची नोंद रोजकिर्दीत होतच असते.

तसेच प्रासंगिक कर्मांच्या, –प्रसंगाच्या – नोंदीही सुखदुःखाच्या जमाखर्च पत्रकात नोंद केल्या जातात.

डोळे, कान, हात पाय, पोट, –सगळेच अवयव अधूनमधून असहकार पुकारुन संपावर जातात यामुळे चिडचिड होते, दुःख होते. हसायला काय झाले?

अहो, घरात आमरस -पुरी, भजी याचा मस्त सुगंध दरवळत असतो आणि पोट अचानक संपावर गेले तर दुःख होणारच ना? शिवाय कॅसर तर नसेल? का कसले ऑपरेशन करावे लागेल? काहीतरी भयंकर दुखणे तर नाही? –ही मनाला त्रिकाळ भेडसावणारी घोर चिंता, म्हणजे काय दुःख असते ते सांगून समजणार नाही. अनुभवावे लागते.

 पण, थोड्याफार गोळ्या औषधाने २, ४ दिवसात अवयव कामावर हजर झाले की, “चला, फारशा टेस्ट कराव्या लागल्या नाहीत “, किंवा केल्यातरी रिपोर्ट नॉर्मल आले -याचा आनंद, सुख म्हणजे जमेत लक्षणीय भर.

आणखी एक दुःख बरेच दिवस माझ्या मनात खदखदत होते. ते शिक्षणाबाबत. मेडिकल करायची मला लहानपणापासुन मनापासुन ईच्छा. ११वीला डिस्टिंक्शन मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढला. पण, अनेक अडचणींमुळे ऐनवेळी ते शक्य झाले नाही तेंव्हा तर अर्धवट वयामुळे —आता आपले काही खरे नाही, आयुष्य वाया गेले, आता जगण्यात तरी काय अर्थ? –म्हणुन झालेले दुःख— मोठा तोटा म्हणुन नोंद केला. पण नंतर कॉमर्सला जाऊनही नेहमी

नंबरात येऊन M. Phil. करुन प्राचार्यपदापर्यंत पोहचले, विद्यापीठात सर्व समित्यांवर, अगदी सिनेटपर्यंत काम केले, M. B. Aच्या, ३०, ३२विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टरिपोर्टची गाईड म्हणुन काम केले हे सर्व सुखाची जमा वाढवणारे होते.

प्रपंचातील सुखदुःखांच्या नोंदी तर न संपणाऱ्या असतात,. माझाही तसाच अनुभव. सुरवातीला थोडी आर्थिक ओढाताण, मोठ्या कुटुंबामध्ये कुणाचे आजारपण, मृत्यु, अपघात, मनात असुन मैत्रिणींबरोबर ट्रीपला जाता आले नाही, जुन्या फ्लॅटची किंमत कमीच मिळाली, मुले लांब गेली, आजारपण, करोनाची साथ -राजकीय, सामाजिक असुरक्षिता यामुळे ‘रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग’ तोंड द्यावे लागले. युध्द म्हटले की हारजीत आलीच. आणि अपयशामुळे येणारे दुःख तर सततच भोगावे लागले.

पण मुले अभ्यासात छान, त्यांची सहजपणे झालेली शिक्षणे, नोकरी, लग्ने, नाती यांचे यश, याचे सुख तर कशातच मोजता येत नाही पण जमेत भर पडली.

तरुण वयात नसेना पण निवृत्त झाल्यावर खुप फिरायला मिळाले, अगदी देशविदेशही.

लेखनाचा छंद जोपासता आला, -४, ५ पुस्तके छापली, रेडिओवर भाषणे, अध्यात्मिक अभ्यास यातून मिळालेले आत्मिक समाधानाचे भौतिक सुखासारखे मोजमाप करता येणार नाही.

 जिवलग जोडीदाराने जरा लवकरच साथ सोडली हे कधीही विसरता न येणारे दुःख मात्र खर्च खात्यात कायमचे ठाण मांडून आहे कारण कोणतीही, कितीही मोठी जमेची नोंद झाली तरी त्याची भरपाई होऊच शकत नाही.  अर्थात, मुलगा, सुन, मुलगी जावई, नाती आप्तेष्ट यांच्यामुळे दिलासा मिळतो ते सुखाची जमा आहे.

 मित्रमैत्रिणी हा तर माझा विक पॉइंट. या ना त्या कारणाने जिवाभावाच्या काही मैत्रिणी नकळत दुरावल्या. लांब गेल्या. काहींनी अकालीच आपला खेळ आवरला. माझे फार मोठे नुकसान झाले असे नाही. पण मनात खेद मात्र आहे, रहाणारच. आणि त्याचेच दुःखही वाटते. अनेक दशके कोल्हापुरला राहिलेली मी निमित्ताने पुण्याला आले. नवख्या ठिकाणी या वयातही पण मैत्रिणींचे वेड कमी झाले नाही. आता विसंवादाची भिती नसल्याने, व एकटेपणामुळे हे वेड अधिकच वाढले. अनेक नवनव्या मैत्रिणी जोडल्या, नशिबानेच मिळाल्या. आपल्या समुहावरील मैत्रिणींचा सिंहाचा वाटा. माझ्या आधीच्या मैत्रिणींच्या पुंजीत पडलेली ही फार मोठी भर.

ज्याच्यावर चक्रवाढ दराने मिळणारे व्याज म्हणजे सुखात नित्य होणारी वाढच.

 हिशोबपत्रकांवर नुसती नजर फिरवली तरी सुखदुःखाच्या कितीतरी नोंदी लक्षात आल्या. काटेकोरपणे ऑडिट करायचे ठरवले तर ऊरलेले आयुष्यही त्यातच सरुन जाईल. मग ताळेबंद केंव्हा मांडणार? आणि श्री शिल्लक किती ते केंव्हा पहाणार?

 आता त्याची गरजही वाटत नाही. कारण झाल्या हिशोबावरुन एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात आली. परमेश्वर हा तज्ञ हिशोबतपासनीस आहे.

प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार, पात्रतेनुसार, कर्मानुसार देत असतो आणि घेत असतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा हिशोब तो त्याच क्षणी पुर्ण करतो. फक्त आपणच अज्ञ असल्याने आपल्याला ते समजत नाही. कारण त्याचे महत्वाचे सुत्र म्हणा तत्व म्हणा असते ते म्हणजे — —

हिसाब बराबर

त्यातुन माझ्यासारखीला मनातुन वाटते, “नाही, परमेश्वराने आपल्याला आपल्या पात्रतेपेक्षा जरा जास्तच दिले. आता तो हिशोब पुढच्या जन्मी पुर्ण करणार.”

पण, माझ्यामते हिशोबाची ही खाती पुढच्या जन्मापर्यंत पुढे पुढे कशाला कॅरी फॉरवर्ड करायची? त्यापेक्षाआयकर भरुन मोकळे व्हावे. आणि भगवंताला आवडणारा कर म्हणजे “भगवंतावर श्रध्दा, भक्ति. आणि तीच मनात ठेवुन भगवंत नामाचा जप.”

हा कर जर नित्यनेमाने भरत गेलो तर आपोआप या जन्मीचा याच जन्मी होईल– हिसाब बराबर!

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाळवण!… ☆ सुश्री वैशाली पंडित ☆

सुश्री वैशाली पंडित

? विविधा ?

☆ वाळवण!… ☆ सुश्री वैशाली पंडित 

कडकपणाची सीमा पार करून जाणारं कर्मकठोर ऊन्ह!

त्याला सर्वांगाने झेलणारी, त्याचा दाह झेपववता झेपवता स्वतःच तप्त फुत्कार टाकणारी गच्ची…

हे बघितल्यावर ‘ती’ जातीची गृहिणी स्वस्थ बसणंच शक्य नसतं.

पंचमहाभूतांना मदतीला घेऊन तर अन्नपूर्णेची आराधना करायची असते तिला. त्यातलं ‘तेज’ आता तिच्यासमोर ज्वाळा ढाळत असतं.

मग काय?

 डाळी, धान्य बाहेर येतात.

कोणाला भिजवलं जातं, कोणाला शिजवलं जातं. कोणाला वाटलं जातं, कोणाला घाटलं जातं, कोणाला लाटलं जातं…!

 नाना चवींनी नटवलं जातं. मिरची, जिरे, मिरे, हिंग, मीठ यांचे स्वाद दरवळतात. जिभा आत्ताच खवळतात.

 कारल्यासारखी कडू जहर भाजीही आता मीठमाखल्या चकत्या होऊन ऊन्हाच्या कडकडीत अंघोळीला बसते.

मोठ्या आकाराचे बटाटे दादागिरी करत खसाखस किसून घेतात स्वतःला. त्यातले काही पातळ काच-या करून लाड पुरवून घेतात.

ऊन्हात जुन्या सुती साड्यांचा मोरपिसारा मांडला जातो.

 पापड, सांडगे, कुरड्या, खारोड्या, सालपापड्या, कीस…. वाळवणाच्या पदार्थांची एकच धूम उडते.

नुसतं वाळत घातलं म्हणजे झालं नाही. ऐन ऊन्हाच्या कारात ते उलट्याचं सुलटं करून घ्यावं लागतं. त्यांच्यावरून हात फिरवावा लागतो. तो हात मात्र संसारात मुरलेल्या ‘ ती ‘ चाच असावा लागतो. पापडाचा चेहरा बिघडता नये की पापडीचा नूर मोडता नये.

 टपलेलेच असतात कावळे, चिमण्या चोची मारायला. केल्या कामावर नाचायला.

ती आता वाळवण राखते.

तिच्या मनासारखी खडखडीत वाळली की, सावलीत आणते.

गार झाल्यावर डब्यात भरते. ती टिकवायचीत वर्षभर म्हणून जीवापाड जपते त्यांना.

आणि मग…

 वाळवणाच्या तळणीने सजलेलं जेवणाचं ताट पाहून ‘ ती’ सुगरण समाधानाने हसते. मुसळधार पावसाळी वातावरणासाठी, कडाड उन्हात तिने बेगमी केलेली असते.

‘ती ‘ हे कुठून शिकली?

 ‘ती’ च्याआधी ‘नि’ आणि ‘य ‘ ही अक्षरे लावणारी सुगरण तरी दुसरं काय करते?

प्रत्येकाचा उन्हाळा तिला ठाऊक असतो.

प्रत्येकाचा पावसाळा तिला विचारून येतो.

प्रत्येकाच्या आयुष्याचं ती असं वाळवण घालते. अनुभवांच्या नेसत्या साडीवर.

कोणाला अश्रूत भिजत घालते,

 कोणाला संघर्षात शिजत ठेवते,

कोणाला तणावाखाली बारीक वाटून घेते,

कोणाला जन्मभर पुरेल इतकी प्रश्नपत्रिका देऊन लाटून ठेवते.

कोणाचे सांडगे तोडते पेरांनी,

कोणाला पसरवते अशांतीच्या पळीनी.

कोणाला जास्त लागतं मीठ

कोण वाळतं गपगुमान नीट

सगळं माहीत असतं अचूक तिला. माणूस नावाचं वाळवण घालते ती बेगमीला.

मधूनमधून वाळवणावर काळजीवाहू हातही फिरवते.

 झडप घालणा-या हाव-या पिशा पाखरांपासून वाचवते.

उन्हाच्या झोतावर दुपार तिपार बघून वाळवण दहा ठिकाणी नाचवते.

तर!

 सावली आली तर वातड होईल ना! !

म्हटलं ना, ऋतु तिलाच कळतो फक्त प्रत्येकासाठीचा.

माणूस टिकवते ती तिच्या साठ्याचा.

कळतं का माणसाला आपलं वाळवण झालेलं?

कडाड ऊन्हात भाजून निघालेलं?

अनुभवांनी उलटंपालटं केलेलं…?

पण

शेवटी मनातली सगळी किल्मिष ओल वाळून खडखडीत झालेलं?

आपलंच वाळवण आपल्यालाच अडीअडचणीत साथ देणारं?

कोणी मग उकळत्या तेलात सोडा की चिमट्यात धरून निखा-यावर भाजा.

चहू बाजुंनी आहे त्या पेक्षा टक्क फुलूनच येणार.

कधी कळतं माणसाला हे?

 कोण जाणे.

ऊन्ह पाहिलं की, पावसाळ्यासाठीची बेगमी करायची धांदल उडतेच शेवटी.

‘ती’ असो

वा

नि य ‘ती’!!

केवढा महान गुरू हा!

©   सुश्री वैशाली पंडित

मालवण, जि. सिंधुदुर्ग, मो. ९४२२०४३०२५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – जगायचं कसं आणि कशासाठी हे शिकवणारे हे दोन्ही प्रसंग माझ्या मनावर कोरले गेलेले आहेत. ताई गेली तो दिवस होता १ मे १९९९. आज २५ वर्षं उलटून गेल्यानंतरही नुकतेच घडल्यासारखे ते प्रसंग माझ्या मनात ताजे आहेत!)

ताई गेली ते विरहाच्या दुःखाबरोबरच गजानन महाराजांच्या सांत्वन करणाऱ्या आशीर्वादांचं अमूल्य दान आम्हा सर्वांच्या असं स्वाधीन करून! पण तरीही त्या क्षणापासून माझ्या मनाला मात्र एक रूखरूख लागून राहिली होती. काही केल्या तो सल कमी होत नव्हता. होय. अज्ञान आणि अहंकारापोटी माझ्या हातून गजानन महाराजांचा अक्षम्य अनादर झाल्याची ती बोच होती. ताई गेल्याच्या हतबल करणाऱ्या दु:खाच्या पार्श्वभूमीवर तर ती मला अधिकच बोचरी वाटत होती!

“कोण गं हे गजानन महाराज?” असं मी ताईला विचारलं होतं ती गोष्ट ताई आजारी पडण्यापूर्वीच्या कितीतरी वर्षं आधीची. त्यामुळे एरवी त्याचा ताईच्या आजारपणाशी आणि जाण्याशी तसा अर्थाअर्थी कांही संबंध जोडावा असं वाटलंही नसतं. पण गजानन महाराजांवरील अतूट श्रध्देपोटी, ताईनं स्वतःचा काडीमात्रही स्वार्थ नसलेलं असं पोटतिडकीनं त्यांच्याकडे कांहीतरी मागणं, केवळ आपल्या पश्चात आपल्या आजारपणामुळे नवऱ्याला सगळं कांही हरवून गेलेल्या निष्कांचन अवस्थेत परावलंबी आयुष्य जगण्याची वेळ येणाराय या कल्पनेने असहाय्य अशा मनोवस्थेत मनाला त्रास देत राहिलेली स्वत:ची ही कैफियत तिने बिनतोडपणे महाराजांपुढं मांडणं, आणि मुख्य म्हणजे त्याबदल्यात स्वतःचे भोग आणि असह्य वेदना आतल्याआत सहन करण्याची तयारी तिने दाखवणं आणि आश्चर्य म्हणजे महाराजांनीही तिला जे हवं ते असं राजमार्गानं तत्काळ देणं हे सगळंच मला हलवून जागं करणारंच ठरलं होतं. ताईला ‘कोण गं हे गजानन महाराज?’ असं मी विचारणं हे कुतुहलापोटी नव्हतं यांची बोचरी जाणीव मला ताई गेल्यानंतरच्या त्या अस्वस्थ मन:स्थितीतच झाली आणि सतत टोचतही राहिली. माझं विचारणं कुतूहलापोटी नव्हतंच. ताई माझ्याकडे दुर्लक्ष करून खूप वेळ ती पोथी वाचत बसली होती या रागापोटी आणि शिवाय ‘पूर्वापार आपल्या घरी चालत आलेला दत्तसेवेचा मार्ग सोडून ही अशी पोथी तिने कां वाचावी?’ या नकारात्मक विचारामुळे नकळत मनात उभारलेल्या अहंकारापोटीच मी तिला उपहासाने ‘ कोण गं हे गजानन महाराज?’ हा उर्मट प्रश्न विचारलेला होता. हेच जर केवळ अज्ञानापोटी, कांही नवीन जाणून घ्यायच्या उद्देशाने मी विचारलं असतं तर ताईने तेव्हाच मला खूप छान समजावून सांगितलं असतं. पण तो आनंद माझ्या नशिबात नव्हता हेच खरं. माझ्या विचारण्याचा रोख तिच्या लक्षात आला तेव्हा ती कांहीशा नाराजीनेच माझ्याकडे पाहून फक्त एकच वाक्य बोलली होती. ‘तू स्वतःच ही पोथी वाच एकदा, म्हणजे तुला समजेल हे गजानन महाराज कोण ते. ‘ ती म्हणाली होती !

ताई गेली आणि हा सगळा भूतकाळ आठवून मी स्वत:लाच कोसत राहिलो. माझ्या मनातला तो अहंकाराचा कणभर काटा मी अलगद उपटून फेकून दिला, तरीही मनाला स्वस्थता कशी ती नव्हतीच. अगदी ‘ती पोथी खरंच एकदा तरी वाचायलाच हवी’ असं मला उत्कटतेने वाटलं तरी त्यानंतरही माझं मन स्वस्थ नव्हतंच. ‘आपण स्वत: शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं, स्वत:ची चूक कबूल करून त्यांची क्षमा मागायची ‘, असं तीव्रतेने मनात आलं खरं पण ते तातडीने अंमलात आणणं जमणार नव्हतंच. कारण ताईच्या आजारपणात सलग बरेच दिवस मी रजेवर होतो. आता याक्षणी कर्तव्याला प्राधान्य देऊन लगोलग ऑफीस-ड्युटीवर हजर होणंच गरजेचं होतं. अर्थात मी हाच निर्णय अंमलात आणला खरा पण तो मात्र मनोमन गजानन महाराजांना साक्षी ठेवूनच. त्या रात्री मी देवापुढे बसून डोळे मिटले. हात जोडून महाराजांना प्रार्थना केली. मी तोवर कधी त्यांचा फोटोही पाहिलेला नव्हता. त्यामुळे मिटल्या नजरेसमोर महाराजांचं मूर्तरूपही नव्हतंच. त्यांच्या नावाच्या रूपातलं अमूर्त रूप होतं ते फक्त माझ्या अस्वस्थ अंत:करणात!

‘मला शेगावला येऊन आपलं दर्शन घ्यायचंय. अनवधानानं कां होईना माझ्या हातून घडलेल्या आपल्या अनादराबद्दल मला तिथं येऊन मनःपूर्वक आपली क्षमा मागायचीय. माझ्या हातून अल्पशी कां होईना आपली सेवा घडावी एवढीच माझी इच्छा आहे. आपला आशीर्वाद असू दे. ‘

मी मनोमन अशी प्रार्थना केली तेव्हा कुठे मनातली रूखरूख थोडी कमी झाली.

त्या क्षणी मला हे माहितही नव्हतं की अचानक एखादं अस्मानी संकट यावं तशा अनेक अनपेक्षित घटना माझ्या सरळरेषेतल्या सुरळीत अशा बॅंकेतल्या नोकरीमधल्या तोवरच्या माझ्या दिनक्रमात अनेक अडथळे निर्माण करणार आहेत! आश्चर्य म्हणजे याचा प्रत्यय मला रजा संपून ऑफिसमधे जॉईन होताच लगेचच आला!

तेव्हा मी ऑडिट डिपार्टमेंटला होतो. ताईचं

दिवस-कार्य संपवून मी कामावर रुजू झालो त्याच दिवशी अहमदनगर ब्रॅंचमधे माझी ट्रान्सफर झाल्याचं आदेश-पत्र माझ्या हातात पडलं! तोवर सुरळीत चालू असलेल्या माझ्या रुटीनचा विचार केला तर त्याला अचानक मिळालेलं हे वळण माझ्यासाठी अनपेक्षित आणि कांहीसं अडचणीचंच ठरणारं होतं. अर्थात ऑडिट डिपार्टमेंटमधला माझा तीन वर्षांचा कार्यकाळ उलटून गेलेला असल्याने तिथून बदली होणार होतीच पण ती इतक्या तातडीने आणि तेही अहमदनगरला होणं हे माझ्यासाठी फारच गैरसोयीचं ठरणार होतं. अर्थात रूटीनचाच हा एक अपरिहार्य भाग म्हणून ते स्विकारणंच आवश्यक होतं!

मी नगरला लगेचच जॉईन झालो आणि पहिल्याच दिवसापासून तिथे साचून राहिलेल्या पेंडिंग कामांच्या व्यापात गुंतून गेलो. पहिले मॅनेजर मी येण्यापूर्वी पंधरा दिवस आधीच अकौंटंटकडे चार्ज देऊन रिलिव्ह झालेले होते. त्यामुळे ब्रॅंचचं संपूर्ण काम विस्कळीत होऊन गेलेलं होतं. ते पंधरा दिवस श्वास घ्यायलाही फुरसत न मिळालेल्या अकौंटंटने मला पहाताच सुटकेच्या निश्वास सोडला आणि त्याच क्षणापासून माझी मात्र घुसमट सुरू झाली!

ताई गेल्याचं दु:ख मनात कोंडून तिथल्या नवीन चक्रांत अक्षरशः भिरभिरत राहिलो. तिथं बऱ्यापैकी बस्तान बसायलाच दोन तीन आठवडे उलटून जावे लागले. तोवर बाहेरचं जेवण, रात्रीची जागरणं, दिवसभरातली बँकेतल्या कामाची गडबड यातून घरगुती जेवणाची सोय बघायला थोडीही उसंत मिळाली नाही. नंतर तिथल्याच आमच्या एका स्टाफच्या ओळखीने घरगुती जेवणाचे डबे देणाऱ्या एका गरजू कुटुंबात माझी दोन्ही वेळच्या ताज्या जेवणाची अखेर सोय झाली. ही माझ्यासाठी एक सुखद घटनाच होती. त्या रात्री मी अंथरूणाला पाठ टेकली तो खूप दिवसांनंतर मला लाभलेला एक शांत, निवांत क्षण होता! त्या क्षणी ‘ शेगावला जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घेऊन त्यांची क्षमा मागण्याचा ‘ बरेच दिवस मनाच्या तळांत पडून राहिलेला विचार झेपावत वर आला. या विचाराचा स्पर्श झाला आणि कांहीतरी राहून गेल्याची रूखरूख मन अस्वस्थ करू लागली. अर्थात माझी इच्छा कितीही तीव्र असली, तरी माझी दैनंदिन कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या यांनाच प्राधान्य देणं सध्या आवश्यक आहे हे मीच मला समजावलं. ‘याबाबतीत जे करायचं ते महाराजच करून घेतील’ हा विश्वासच मनातला अंधार नाहीसा करणारा ठरला.

माझी जिथे घरगुती जेवणाची झालेली होती ते घर आणि त्या घराशी माझे जुळलेले भावबंध हा माझ्या शेगावला जाण्याच्या उत्कट इच्छेच्या पूर्तीसाठी गजानन महाराजांनीच योजनापूर्वक निवडलेला अल्पकाळासाठीचा एक थांबा होता याची त्याक्षणी तरी मला कल्पना नव्हती!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares